‘..और हम कर भी क्या कर सकते है.?’
भूका रहना आप के यहॉँ आजकल ‘फॅशनेबल’ हो गया, फास्ट इज अॅन इव्हेण्ट फॉर यू.! यहां जो सालोंसे ‘भूका’ है. उस को क्या फर्क पडता है.? यहॉँ वो इरॉम शर्मिला सालोंसे फास्ट कर रही है.उस को ग्लॅमर नहीं मिला.तो कॉमन मणिपूरी भूक से मर भी जाए.तो क्या बडी बात है.!’
-इम्फाळ मधे राहणारी केम लोटिंगबाम. सरकारी नोकरी करते. नवराही कमावता. कुठलंही मध्यमवर्गी कुटूंब असावं तसंच केमचं घर, पैसा आहे गाठीशी. पण त्याचा उपयोग काय.? तिच्या दोन वर्षाच्या मुलाला अस्थमा आहे. खोकून खोकून मुलाचा श्वास कोंडताना पाहण्यापलिकडे केमकडे दुसरा पर्याय नाही. इम्फाळमधे आजच्या घडीला तरी तिच्या लेकावर उपचार होऊ शकत नाहीत.
होणार कसा.?
सा:या शहरात दोन मोठी हॉस्पिटलं. त्यात आजारी माणसांची तोबा गर्दी, डॉक्टर-नर्स मात्र हातावर हात धरून बसलेत. कुणावर आणि कसा उपचार करणार.? उपचारांसाठी औषधं हवीत, काही जेमतेम पुरतील एवढी आहेत, बाकीची कधीच संपली. साधं ड्रेसिंग करायचं कुणाच्या जखमेवर तर प्रथमोपचाराचं साहित्य सुद्धा संपलेलं अशा अवस्थेत कुठून करणार उपचार.?
‘जा घरी,’ असं लोकांना सांगत ‘सक्तीने’ डिसचार्ज देण्याची वेळ आली आहे. केम आपलं दोन वर्षाचं आजारी पोरगं घेऊन शेवटी गुवाहाटीत आली, सध्या तिथं त्याच्यावर उपचार होताहेत. पण एवढय़ा मोठय़ा गुवाहाटी शहरात ओळखीचं कुणी नाही, राहण्याची सोय नाही. आनंद फक्त एवढाच की निदान मुलाला गुवाहाटीसारख्या मोठय़ा शहरात आणून उपचार करण्याइतपत पैसा तरी तिच्याकडे आहे. निदान मुलाच्या जीवाला धोका नाही, तो ही नसता तर मुल जीवानिशी जाताना पाहण्यापलिकडे दुसरं काहीच करता आलं नसतं. हाती पैसा नाही म्हणून, पर्यायच नाही म्हणून आज मणिपूरात कुणाकुणाची लेकरं-बाळं, म्हातारी माणसं अशी औषधपाण्याविना तडफडताहेत. पण पर्याय काही नाही. मणिपूराची राजधानी असलेल्या इम्फाळमधे ही अवस्था तर दूर डोंगरद:यात माणसं कशी जगत असतील.जगत तरी असतील का.?
केमला फोन केला, तरी तिनं ही एवढी सगळी मोठ्ठी कहाणी सांगितली. ती ऐकताना मी एकदम म्हणाले,
‘फ्रस्ट्रेटिंग है.’!
ती चटकन म्हणाली,
‘व्हाट फ्रस्ट्रेटिंग.? नथिंग.! नाऊ वी आर यूज टू धीस. धिस इज आवर डेस्टीनी. हमारे मणिपूर में ये सब ऐसाही चलता है. जिंदा है ना, उतना बस है. और कर भी क्या सकते है.?’
मणिपूरात राहणा:या, इम्फाळ, उखरूल, तमिंगलॉंग, चोराचंबूलमधे जगणा:या, नव्हे मणिपूर सोडून मुंबईत स्थिरावलेल्या ज्याच्या ज्याच्याशी म्हणून बोलले, ऐकायला मिळतं ते फक्त एवढं एक वाक्य.
‘..और हम कर भी क्या कर सकते है.?’
ही ‘कर भी क्या सकते है.’ची विषण्ण हतबलता आपल्याला सहजी कळत नाही. आपण बातम्या वाचतो, गेले 93 दिवस सगळं मणिपूर ठप्प होतं. आता रस्ते मोकळे झालेत, पण किती दिवस मोकळे राहतील सांगता येत नाही. या ‘ब्लॉकेड’च्या कृपेने सिलेंडर दोन हजार रुपयांना मिळतंय, त्याचा काळाबाजार वाढलाय. पेट्रोल 16० ते 18० रुपये लिटर, कांदे किमान 75 रुपये किलो, बटाटे 45 रुपये किलो आणि डाळी तर 8क् रुपयांच्या पुढेच. गेल्या आठवडय़ात न्यूज चॅनलवर एक दिवस ही ब्रेकिंग न्यूज होती. बडय़ा इंग्रजी दैनिकातही दोनशे शब्दांच्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या. पण तेवढय़ाच. त्याने मणिपूरातले चित्र बदलले का.? कुणी दखल घेतली का.? एका जिल्ह्याच्या विभाजनाची आणि स्वतंत्र जिल्ह्याची मागणी पूर्ण होत नाही म्हणून हे रस्ते बंद करण्यात आले. ज्या ‘कुकी’ जमातीच्या लोकांना आपल्यासाठी स्वतंत्र ‘सदार हिल्स’ जिल्हा हवा आहे त्यांनी एक महामार्ग अडवला. सध्या नागबहूल असलेल्या आत्ताच्या सेनापती जिल्ह्यातल्या नागा लोकांना असा वेगळा जिल्हा द्यायचा नाही, म्हणून त्यांनीही रस्ता अडवलाय. केवळ एका नव्या जिल्ह्याच्या मागणीसाठी संपूर्ण राज्य दोन महिने वेठीस धरले गेले . मागच्या वर्षीही ब्लॉकेडमुळे हे सारे असेच झाले होते. स्थानिक माणसांवर उपासमारीने नाहीतर आजारपणाने मरण्याची वेळ आली आहे आणि जे जगताहेत. त्यांचं जगणं इतकं भेसूर झालंय की त्याला ‘जगणं’ म्हणू नये.
पण मणिपूर सरकार काहीच तोडगा काढायला तयार नाही, केंद्र सरकारही गप्पच. इम्फाळपासून दिल्ली बरीच दूर असल्याने असेल कदाचित पण आपल्याच देशातल्या सीमावर्ती आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचं स्थान असलेल्या राज्याचा गेले 93 दिवस आपल्याशी संपर्क नाही, तिथल्या माणसांवर उपासमारीची वेळ आली आहे. गाडय़ाच धावत नसल्याने लोकांना मैलोंमैल चालत जावं लागतंय, जीवनावश्यक गोष्टींनी भरलेले ट्रक्स रस्त्यावर एका रांगेत शांतपणो उभे आहेत आणि आपल्या गावापासून 1०-15 किलोमिटर दूरवर स्वस्त बटाटे मिळताहेत असं जरी कळलं तरी काही लोक पायपीट करत किलो-दोन किलो बटाटे आणायला जाताहेत. पण त्याहून मोठं म्हणजे बहुसंख्य माणसं निमूट-गपगार आला दिवस ढकलताहेत. आणि विचारलंच त्यांना की असं कसं जगता तुम्ही तर ते आपल्यालाच विचारतात,
‘और हम कर भी क्या सकते है.?’
चारी बाजूंनी शेजारी राज्यांच्या सिमांनी वेढलेल्या मणिपूरला जगाशी संपर्क ठेवायचा तर रस्ते हा एकमेव पर्याय. 9० टक्के पहाडी भूभाग असलेल्या मणिपूरात आजवर रेल्वे पोहचलेलीच नाही. एनएच 39 आणि एनएच 53. हे दोन मुख्य महामार्ग, किंबहुना रस्ते म्हटले तर हे दोनच पर्याय. एनएच 39 मणिपूरला नागालॅण्ड मार्गे आसामशी जोडतो आणि दुस:या टोकाला थेट म्यानमार्पयत जाऊ शकतो. एनएच 53 इम्फाळ ते सिल्चर या दोन शहरांना जोडतो. सगळी वाहतूक या दोन महामार्गावरून. ते ठप्प झाले की राज्याचा देशाशी संपर्क तुटतो. वाहतूक बंद म्हणजे सगळंच बंद. ना अन्नधान्य पोहचतं, ना औषधं, ना गॅस सिलेंडर-डिङोल-पेट्रोल, ना भाज्या.कम्पलिट ब्लॉकेड.
‘
ब्लॉकेड’ हा गेली काही वर्षे मणिपूरात परवलीचा शब्द झाला आहे. मागच्याच वर्षी मणिपूर 68 दिवस ठप्प होतं. 2००३ मधे 52 दिवस असंच ब्लॉकेड करण्यात आलं होतं. आणि मणिपूरी माणसं. त्यांनीही आपले मेंदू कधीच बंद करून टाकलेत. आपण काहीच करू शकत नाही. ब्लॉकेड आहेत याचं दु:ख करायचं नाही, ते असणारच. ते निघालं तर आनंद. नाही तर नाही इतकं सगळं अंगवळणी पाडत माणसं जगायला शिकली आहेत.
नेंम्बूक, नवी मुंबईतल्या एका बडय़ा मॅनेजमेण्ट कॉलेजात शिकतोय. घरचा श्रीमंत. मुळचा चोराचंबूल जिल्हयातला. म्हणजे कुकी जनजमातीचा. या कुकी जमातीनेच सध्या मणिपूरात ब्लॉकेड केलं आहे. त्याला पुन्हा तोच प्रश्न विचारला की,
‘ माणसं चिडत कशी नाहीत. आपली ‘होमलॅण्ड’ म्हणून स्वतंत्र जिल्हा असावा ही मागणी एका बाजूला पण रोजचं जगणंच महिनोंमहिने जगता येत नाही त्याचं काय.?
तो हसला, म्हणाला.
‘पावसाळा येतोच, थंडी पडते. आपलं जगणं अवघड होतं त्या काळात काय करतो आपण.? गाव सोडतो का जगणं सोडतो.? आप ये अर्बन मिडलक्लास की तरह सोचना छोड दो. जैसे बारिश आती है वैसे ब्लॉकेड आते है. मौसम खतम होने के बाद चले जाते है.फिर आते है. और हम उस में जी लेते है.!’
इतकी परिस्थितीशरणता.? इतकी हताशा.? आणि सवाल काय तर,
‘ और हम कर भी क्या सकते है.!’
माणसांना काहीच करता येत नाही हे मान्य पण आपण काही करू शकतो याची जाणिवही मरून जावी इतकी टोकाची विषण्णता येते. असं का व्हावं.?
अस्मितेचं राजकारण करणारे स्थानिक राजकीय गट, व्यापारी, साठेबाज, वाहतूकदार सगळे मिळून माणसांना वेठीस धरतात. सोयीचं राजकारण करणारं सरकार
‘काही न करण्याची’ भूमिका घेतं. आणि आपण वेठीस धरले जातो आहोत हे कळत असूनही डोक्यात भिनलेलं अस्मितेचं ‘स्पिरिट’ इतकं जहाल की, जे चाललंय त्याला कुणी पुसटसा विरोधही करत नाही. ज्यांना करावासा वाटतो तसा विरोध त्यांच्यात तशी rिामत नाही. आधीच जगणं अवघड त्यात जीवावर बेतेल असं कशाला काही करा, असा विचार करून जाणती माणसंही मौन पत्करतात. एकीकडे राज्य मागास, त्यात ड्रग्ज आणि एचआयव्हीनं पोखरलेलं. माणसांच्या हातांना काम नाही, सरकारी नोक:यांपलिकडे रोजगार उपलब्ध नाहीत. आरक्षण आणि हक्कांच्या लढाईत जाती-जमातींमधली पिढय़ांपिढय़ाची तेढ आणखी वाढली आहे. शेजारी राज्य आणि देशाच्या सीमापारहून पैशाचा ओघ येतोच, केंद्र सरकार आपल्याला ‘कर्न्सन’ आहे हे दाखवण्यासाठी भरमसाठ पैसा राज्याच्या तिजोरीत ओततं. पण बाकी जबाबदारी शून्य. राज्यातली परिस्थिती जैसे थे. रोजगार नाही, विकास नाही. वीज नाही. चोवीस तासांपैकी फक्त 3 तास इम्फाळ शहरात वीज असते. राज्याच्या राजधानीत ही अवस्था, दुर्गम खेडय़ातल्या अंधाराचं काय कोणाला अप्रूप.?
निम्बुक म्हणतो तसं,
‘वीज नसते हा नियम, तीन तास आहे याचा आनंद. तसेच ब्लॉकेड असतात, रस्ते बंद होतात हा नियम.रस्ता मोकळा मिळाला तर नशिब.!’
निम्बुकपेक्षा वेगळं काही मत नाही उखरुलमधे राहणा:या
‘जेम्स ङिामिक’ याचं. ते सरकारी नोकरीत आहेत. उखरूल तसं सदार हिल्सपासून बरंच लांब. पण महागाईचा नाग तिथंही फणा काढून उभाच आहे. राज्यच ठप्प झालं तर उखरुलमधे तरी कुठून मिळणार कांदे-बटाटे आणि औषधं.?
ते सांगतात,
‘ कुणाही मणिपुरी माणसाला विचारा, ब्लॉकेडचं काय.? तो हताश आहे, त्यानं ही मानसिक तयारीच केली आहे की, सध्या सुरू असलेले ब्लॉकेड अजून किमान काही महिने चालेलच. अजून तर काहीच नाही, पुढे अजून वाईट दिवस आहेत. कुकी आणि नागा दोन्ही जमाती मणिपूरात तुल्यबळ आहेत, कुणा एकाची बाजू सरकार घेणार नाही, हा प्रश्न सुटणार नाही. प्रश्न सुटला तरी काय, सरकार काहीतरी वायदे करेल, ब्लॉकेड करणा:यांना पैसे देईन. ब्लॉकेड संपेल आणि डिमाण्ड विल कण्टिन्यू..प्रॉब्लेम विल कण्टिन्यू.! काही दिवसांनी पुन्हा ब्लॉकेड होईल, मागणी पूर्ण होत नाही म्हणून.!’
जेम्स ङिामिक म्हणतात, त्याला ऐतिहासिक संदर्भ आहेत. नागा-कुकी या दोन जमातीतलं हाडवैर आणि त्यातही सदार हिल्समधलं हे भांडणं देश पारतंत्र्यात असल्यापासून इंग्रजकाळापासून सुरू आहे. गेली किमान ४० वर्षे वेगळ्या जिल्ह्याची मागणी होते आहे आणि तिला तितकाच टोकाचा विरोधही होतो आहे. प्रश्न शक्यतो सोडवायचाच नाही हीच भूमिका घेणा:या राज्य-केंद्र सरकारच्या बेफिकीरीने मणिपूरी माणूस मात्र पुरता विरुन गेला आहे. जेम्स ङिामिक सांगतात तशी त्याने मानसिक तयारीच केली आहे की,
‘अजून अवस्था फार वाईट नाही, निदान दोन वेळ जेवता तरी येते आहे. नाही कांदे तर नाही, नाही बटाटा-डाळ मिळत तर नाही मिळत, पायी चालणं, द:याखो:यातून पहाडांतून चालणं नेहमीचंच, औषधपाणी मिळणं म्हणजे नशिब, हातात पैसे येणं म्हणजे तर देवाची कृपा असं मानून जगायचीच सवय लागली आहे.आणि जे आहे ते बरंय पुढं अजून वाईट दिवस आहेत असं माणसं सतत स्वत:ला सांगत, समजूत काढत जगताहेत.!’
पण ते जगणं तरी कुठं पुर्वीइतकं सोपं उरलंय.
‘हिल्स’ आणि ‘प्लेन’ हे मणिपूरातलं भांडणं मोठं, कारण परस्परांचं जगणं अत्यंत वेगळं आहे. डोंगराळ पहाडी माणसाला पठारावर जगणं अवघड आणि पठारावर जगणा:याला पहाडांत राहणं जिकिरीचं. पण ‘जगणं’ आणि जिवंत राहणं ही एकमेव गोष्ट हातात उरली तर स्थलांतराला पर्याय नसतो. गेल्या वर्षभरात मणिपूरातून किमान लाखभर माणसं स्थलांतरीत झाल्याची आकडेवारी उपलब्ध आहेत. ही माणसं दिल्ली गाठतात किंवा कोलकाता किंवा फार तर बंगळूरू. पण पहाडातल्या माणसांना या बडय़ा सपाट शहरातच काय पण इम्फाळ-गुवाहाटीत येऊन जगणं दुर्धर होतं. तिथं वेगळेच प्रश्न निर्माण होतात. पण मुलाबाळं जगवायची तर हे करावं लागतं. जे आपल्या वाटय़ाला आलं ते मुलांच्या वाटय़ाला येऊ नये म्हणून कर्ज काढून, आहे नाही ते विकून मुलांना शिक्षणासाठी मणिपूरबाहेर पाठवणा:या पालकांचे प्रमाण आजच्या घडीला लक्षणीय आहे. पण जी लहान मुलं जिवंत आहेत त्याचं काय, ती मोठी होतील.? २००१ मधे जे ब्लॉकेड झालं त्यात आठ वर्षाखालील 5 लाख मुलं वेगवेगळ्या आजारांनी ग्रासली गेली किंवा त्यांच्या आजारपणात त्यांच्यावर औषधपाणीही उपलब्ध होऊ शकलं नाही.
आजही चित्र काही वेगळं नाही, ब्लॉकेड संपलं. पण प्रश्न सुटलेला नाही. पुढचं ब्लॉकेड फार लांब नाही. ते झालं की लोक पुन्हा तेच म्हणतील. और हम कर भी क्या सकते है.?
-मेघना ढोके
सह-अनुभूती आणि सहानुभुती
तिथे दूर कुठे मणिपूर राज्यात एका जिल्ह्याच्या विभाजनावरून पूर्ण राज्य वेठीला धरले गेले, माणसाला जगणे दुर्धर झाले म्हणजे नक्की काय झाले असेल ते थोडेथोडे 'कळते' आहे.
इथे एका राज्याच्या विभाजनावरून आंदोलन होऊन सरकारयंत्रणा, सार्वजनिक वहातुक यंत्रणा, शाळा-कॉलेजे हे सर्व २८ दिवस ठप्प होते. 'सिंगारेनी कॉलरीज' कंपनीच्या खाणींतून कोळसा निघणे बंद झाले. दिवसाआड सार्वजनिक बंद पुकारले गेले. ज्यांचे नातेवाईक सरकारी इस्पितळात होते, ज्यांना सिटीबसने कामावर जायचे असे, ज्यांचे पोट हातावर चालते त्यांना फार सोसावे लागले. तरीही मुलांच्या शिक्षणाचे दिवस बुडाल्याने मनाला येणारी अस्वस्थता आणि दिवसाला चार-पाच तास गायब होणारी वीज सोडली तर बहुसंख्य मध्यमवर्गीयांच्या रोजच्या आयुष्यात काही मोठा फरक पडला नाही. आता ते आंदोलन मागे घेतले गेले आहे. पण मूळ प्रश्न तसाच आहे. त्यामुळे पुन्हा कधीतरी ते होणारच.
त्यामानाने लेखिकेने नमूद केलेले मणिपूरचे अनुभव फारच दाहक आहेत. परस्परांचे हितसंबंध पोसणार्या काही मूठभर मंडळींमुळे त्या राज्यातली जनता होरपळत आहे. आणि अशा प्रश्नांकडे लक्ष देण्यात प्रसिद्धी माध्यमांनाही रस दिसत नाही. यातून मार्ग काढणे त्या मूठभर मंडळींच्या हिताचे नाही म्हणूनच हा प्रश्न लोंबकळवलेला असणार हे निश्चित. इथेही तेच घडत आहे. एका जाणकार मित्राच्या म्हणण्यानुसार आदिवासींच्या हालअपेष्टांचा आणि नक्षल चळवळीचा प्रश्नही मुद्दाम लोंबकळत ठेवला जात आहे. थोडक्यात, आपली पोळी भाजण्यासाठी काही स्वार्थी लोक प्रश्न उकरून काढतात आणि त्याचा निकाल लागू नये म्हणून मुद्दाम प्रयत्न करतात. असे अनेक प्रश्न आहेत जे सोडवता येतील. पण ते पेटते ठेवण्यात काही संधीसाधूंचा फायदा आहे आणि दुर्दैवाने तेच निर्णयकर्तेही आहेत.
हे सारे हताशपणे बघत रहाण्याव्यतिरिक्त एक मध्यमवर्गीय, कुटुंबवत्सल माणूस काय करू शकतो?
या प्रश्नाचे एक उत्तर मणिपूरचा प्रश्न इथे मांडून लेखिकेने कदाचित दिलेले आहे.
दूरवरून
दूरवरून दृष्टिक्षेप चांगला.
पण केवळ प्रश्न आहेत. प्रश्नांची उत्तरे? त्यासाठी मात्र जवळून (किंवा आतून) दृष्टिक्षेप हवा. तो इथं गवसत नाही. लोक जगतात कसे, या एकाच प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलं तरी इतर अनेक वर्तुळं समोर येतील. पेट्रोल - गॅस अमूक किंमतीपर्यंत भडकले हे ठीक. त्याचे समर्थन नाही, पण मग त्याची जागा कशाने घेतली आहे? पाच लाख बालकांचा एक संदर्भ शेवटच्या परिच्छेदात आला आहे. काय झालं त्यांचं? प्रश्न अनुत्तरित राहतो.
इरोम शर्मिलाबाबत ग्लॅमर असा शब्दप्रयोग आला आहे. लेखिका त्याचं समर्थन करते का? ग्लॅमर मिळालं तर भागणार आहे का?
अवघड आहे
हे असं वाचून कळतं की शायनिंग इंडिया फक्त मोठ्याशहरातल्या मूठभर लोकांचाच आहे. बाकी ठिकाणी सारखीच विषण्ण करणारी परिस्थिती दिसते. कारणं थोडी फार वेगळी असतीलही पण सामान्य रहिवाश्यांवर होणारा अन्याय, त्यांना तोंड द्यायला लागणारी परिस्थिती सारखीच.
ही वर्णनं वाचून, जर आपल्या वेगवेगळ्या करांचा पैसा (स्विस बँकांत जावून स्वित्झर्लँडच्या विकासाला हातभार न लावता) खरंच आपल्या देशाच्या विकासाला उपयोगी पडला असता तर... हा कल्पनाविलास करावासा वाटतो.
आवडला
लेख आवडला. चावी हरवलेल्या पिंजऱ्यात बसण्याची सवय झालेल्या व तेच आपलं भाग्य असं म्हणून नाईलाजाने जगणाऱ्या जनतेची दया येते.
या जिल्ह्यांबाबत इतकं ताणून धरण्यासारखं दोन्ही बाजूंमध्ये काय आहे? आख्ख्या राज्याला दावणीला बांधता यावं इतकी शक्ती त्या दोन गटांमध्ये कुठून येते? यावर उपाय काढण्याचे प्रयत्न काय झाले, आणि ते कशामुळे फिसकटले?
एका जिल्ह्यासाठी हे भाण्डण
एका जिल्ह्यासाठी हे भाण्डण चाललेले असले..तरी ते केवळ तेव्ढेच नाही. तो होम ल्याण्ड साठिचा अस्मितेचा प्रश्न आहे. जो जेरुसलेम चा आहे, जो कश्मिर चा आहे..तसाच हा प्रश्न फक्त जमिनिचा नाही..! त्यामुळे प्रश्न सुटता सुटत नाही..हा प्रश्न ही साधारणतः ब्रिटिश काळापासून चिघळलेला आहे.
मेघना, मराठी आंतरजाल आणि 'ऐसी
मेघना, मराठी आंतरजाल आणि 'ऐसी अक्षरे'वर स्वागत.
फेसबुकावर अलिकडेच "आणखी एक" स्टेटस मेसेज पाहिला, अर्थ काहीसा असा, "आजकालच्या मुलांना फोटो पाहून करीना ओळखता येते पण इरोम शर्मिला ओळखता येत नाही." कदाचित मलाही तिच्या फोटोवरून ओळखता येणार नाही, पण तिच्याबद्दल माहितीच नाही असं नाही. सामान्य मणिपुरी माणसाला इरोम शर्मिलाबद्दल आपुलकी असणं मी समजूच शकते, पण ब्लॉकेड करणार्यांविरोधात त्यांना काहीही वाटत नाही का? पहाडी आणि पठारी वस्त्यांमधे आपसांतच एवढा विरोध का?
पेट्रोल, कांदे-बटाटे, औषधं या प्रश्नांपेक्षाही अस्मितेचे प्रश्न महत्त्वाचे वाटणे आणि पाणी, वीज, वाहतूकीची कोंडी वगैरे प्रश्न सोडून दादोजी कोंडदेवांचा पुतळा लालमहालासमोर असावा का नाही यावरून भांडणारे मराठी लोकं यांच्यात फरक काय तो दिसतच नाही.
वीज नसणं हीच वस्तुस्थिती मान्य करू शकतात पण जिल्ह्याच्या हद्दी आहेत तशाच रहातील हे मान्य करू शकत नाहीत हा विरोधाभास कसा येतो?
मेघना, ईशान्य भारतातली परिस्थिती पुण्या-मुंबईपेक्षा भयंकर वाईट आहे हे दिसत आहे, पण लोकांची विचार करण्याची पद्धत अगदी एकसारखीच आहे.
अदिती.. खरे तर तुम्च्या
अदिती..
खरे तर तुम्च्या प्रश्नातच सारी उत्तरे आहेत.
प्रश्न होम ल्याण्ड चा आहे. त्यांमुळे..अस्मितेला विरोध कोण करत नाही..!
ब्लोकेड चे म्हण्शिल तर खरेच या भागातले लोक ब्लोकेड प्रूफ झालेले आहेत.
नित्य मरे त्याला कोण रडे..?
आणि आता मुद्दा..पहाडी आणि पठारी भागात राहण्यर्या लोकाचा..
एकेकाळी या शुर जमाती एन्ग्रजन्साठी लढत होत्या.. त्याचे वैर तेव्हा पासुन चे आहे.
आणि खरे तर या दोन्हि भागात राहणार्या लोकाची जीवन शैली परस्पराहुन इतकी वेगळी आहे कि पहाडात्ल्या माणसाना पठारी भागात जगायला साण्गणे म्हणजे माश्याला जमीनीवर रहायला सांगण्यासाऱखे आहे. तेच आता होते आहे. जे राजकारण करतात ते भावनिक आणि अस्मितेचे प्रश्न सोडवत नाहीत. मणिपुर सह ईशान्य भारतात हेच होत आहे गेली किमान ६० वर्षे. त्यात विकास नाही..त्यामुळे हे प्रश्न लोकांना मह्त्वाचे वाटतात.
खुप मोठा विषय आहे..
पुन्हा तपशिलात लिहिन.
ईशान्येत खूप समस्या आहेत हे
ईशान्येत खूप समस्या आहेत हे ऐकून होते पण हे ब्लोकेड प्रकरण नवीनच कळले. सामान्य लोक काहीच कशी प्रतिक्रिया देत नाहीत याचे प्रचंड आश्चर्य वाटले. एखाद्या ऋतुसारखे हेसुद्धा त्यांनी स्वीकारलेय याचं दुख: होतं खरं पण जवळ पैसा नाही, देशातील इतर जनतेला यांच्याबद्दल माहिती फारशी किंवा अगदी नाहीच म्हंटल तरी चालेल अशी.
असं ब्लोकेड केल्याने जो काळाबाजार होतो त्यासाठी तर हे पक्ष असं करत नसतील ना? उगाच एक शंका.
निराश
लेख चांगलाच आहे पण मन उद्विग्न करणारा व नैराश्य वाढवणारा आहे. संपूर्ण भारत देशाची सामान्य जनता एक कळसूत्री बाहुल्यासारखी झाली आहे. प्रजेने आपली विचारशक्ति हरवली आहे. सामान्य माणूस फक्त, आला दिवस ढकलायचा, असा मुक्या प्राण्यांच्या अवस्थेला येऊन पोचला आहे. अराजक यापेक्षा वेगळे काय असते?
भयंकर
सुन्न करणारं लेखन.
"हम कर भी क्या सकते हैं" या वाक्यात जगभरात असलेली विषमता आणि अन्याय टिकून का राहू शकतो याचं उत्तर सापडतं.
अवांतर : ईशान्य भारताचं एक वेगळंच चित्र असल्याचं वाचलं होतं. त्याला छेद गेला.
अतिअवांतर : धाग्याला श्रेणी देण्यास गेलो तेव्हा सर्वोच्च श्रेणी ऑस्सम अशी दिसली. ऑस्सम हा शब्द चपखल न वाटल्याने ग्रेट अशी श्रेणी दिली.