मुंबईतील काही रस्ते आणि जागा - भाग 3
मुंबईतील काही रस्ते आणि जागा - भाग 3 (भाग १. भाग २)
३२) फोरास रोड (आर एस निमकर मार्ग) - हे नाव कोठल्याहि साहेबाचे नसून मुंबई बेटे पोर्तुगीज अमलाखाली असण्याच्या दिवसांत ह्या शब्दाचा उगम आहे. तेव्हा ही बेटे वसईकर पोर्तुगीज अमलाचा भाग होती. बेटावरील जमीन ज्या धारकांकडे होती त्यांचे जमिनीवरचे हक्क कशा प्रकारचे होते ह्या विषयाशी ह्या नावाचा संदर्भ आहे आणि त्याचे दोन परस्परविरोधी अर्थ लागू शकतात असे दिसते. अशा जमिनीस पोर्तुगीज शासक ’फोरा’ जमीन असे म्हणत असत. हा पोर्तुगीज ’फोरा’ शब्द कसा निर्माण झाला ह्याविषयी दा कुन्हा ह्यांनी विस्तृत वर्णन केले आहे परंतु त्यांच्या पुस्तकाचे जालावरील उपलब्ध पान संपूर्णपणे अवाचनीय आहे. मायकेल वेस्ट्रॉप ह्या न्यायाधीशांच्या निर्णयात ह्याच शब्दाचा वेगळा अर्थ लावला आहे. त्या सर्व वादात अधिक न शिरता असे म्हणता येईल की १८४० नंतर वाढत्या मुंबईत किल्ल्याच्या उत्तरेस सार्वजनिक सोयी - रस्ते, नाले इ. - निर्माण करण्यासाठी सरकारला ह्या जमिनीचा काही भाग हवा होता आणि तो सरकारने कसा घ्यावा ह्याविषयी सरकार आणि जगन्नाथ शंकरशेट, दादाभाई पेस्तनजी अशा जमीनधारकांमध्ये विवाद होता.
किल्ल्याच्या उत्तरेकडील सर्वच जमीन ’फोरा जमीन’ ह्या वर्णनाखाली येते आणि त्या भागात जाणार्या रस्त्यांना ’फोरास रस्ते’ असे सार्वत्रिक नाव होते. कालक्रमाने हे रस्ते जेव्हा पक्के बांधून वापरात आले तेव्हा त्यांना स्वत:ची अलगअलग नावे मिळाली आणि केवळ एकाच रस्त्याचे म्हणून हे नाव शिल्लक उरले. बेलासिस रोड (जहांगिर बोमन बेहराम मार्ग) आणि ग्रॅंट रोड ह्यांना जोडणार्या रस्त्यालाच काय ते हे नाव उरले आहे. १९०९ सालच्या इंपीरिअल गॅझेटमधील नकाशात ह्याचा उल्लेख ’कामाठीपुरा रोड’ असा केला आहे. त्या नकाशाचाहि तुकडा खाली जोडला आहे.
३३) फ्लोरा फाउंटन (हुतात्मा चौक) - फ्लोरा फाउंटन हे मूळचे फ्रियर फाउंटन आणि सर बार्टल फ्रियर ह्यांच्या नावे ते विक्टोरिया गार्डनमध्ये उभे राहायचे होते. अग्रि-हॉर्टिकल्चरल सोसायटी नावाची संस्था ह्या प्रस्तावामागे होती पण तिच्याजवळचे पैसे संपल्यामुळे त्यावेळचे क्रॉफर्ड ह्यांनी पुढाकार घेऊन त्याला सध्याच्या जागी आणले. कर्सेटजी फर्दूनजी ह्यांची मोठी देणगीहि ह्या कामी लागली. मूळच्या चर्चगेटच्या जागीच ते आता उभे आहे. फाउंटनवरील फ्लोरा देवतेवरून हे नाव पडले आहे. खालील चार स्त्रिया हिंदुस्तानात उत्पन्न होणार्या चार शेतमालांची प्रतीके असून डॉल्फिन्स, सिंह अशा प्राण्याच्या शिल्पांनी त्याला शोभा आणली आहे. त्याची सध्याची दोन चित्रे आणि १८७१ मध्ये ’सायंटिफिक अमेरिकन’ नियतकालिकाच्या अंकात दिसणारे एक चित्र पुढे दाखवीत आहे. (श्रेय )
३४) जेकब सर्कल - सातरस्ता (गाडगेमहाराज चौक) - मे.ज. सर जॉर्ज जेकब (१८०५-६१) ह्यांचे नाव मुंबई प्रांतात प्रामुख्याने सावंतवाडी, कोल्हापूर आणि काठेवाड संस्थानांमध्ये मुंबईकरांचे प्रतिनिधि म्हणून माहीत आहे. कोल्हापुरात १८५७ च्या काळात संस्थान शांत ठेवण्याच्या कार्यात त्यांनी विशेष कर्तबगारी दर्शविली. त्यांचे नाव मुंबईतील ह्या प्रमुख चौकास देण्यात आले होते. चौकात सात मोठे रस्ते एकत्र मिळत असल्याने स्थानिक रहिवासी चौकास सातरस्ता ह्या प्रसिद्ध नावानेहि ओळखतात. चौकातील कारंजे जेकब ह्यांच्या मानलेल्या मुलीने दिलेल्या देणगीतून बांधण्यात आले आहे. जेकब हे मराठी आणि संस्कृत भाषांचे अभ्यासकहि होते. गिरनार येथील अशोकाच्या शिलालेखाचे त्यांनी वाचन केले होते.
३५) कामाठीपुरा - बेलासिस रोड (जहांगीर बोमन बेहराम मार्ग), सुखलाजी स्ट्रीट, ग्रॅंट रोड (मौलाना शौकत अली मार्ग) आणि डंकन रोड (मौलाना आझाद मार्ग) ह्या मर्यादा असलेल्या भागास कामाठीपुरा असे नाव तेथे वसतीला आलेल्या कामाठी-कोमटी लोकांवरून पडले आहे. निजामाच्या प्रदेशातील हे मूळचे लोक १८व्या शतकाच्या अखेरीच्या दिवसात कामधंद्यासाठी मुंबईत आले आणि ह्या भागात स्थायिक झाले. प्रथमपासून हा भाग निम्नस्तरातील जनतेच्या वस्तीचा आणि तेथे चालणारा वेश्याव्यवसायहि असाच त्या दिवसांपासूनचा आहे. (१८व्या शतकाच्या पहिल्या दशकांमध्ये मुंबईत रामा कोमटी नावाचा सधन हिंदु राहात असे. कान्होजी आंग्रे ह्यांच्याशी गुप्त संधान बांधल्याच्या आरोपावरून इंग्रजांनी १७२०मध्ये त्याच्यावर खोटा ’कांगारू’ खटला चालवून त्याला आयुष्यातून उठविले. त्याच्याशी कामाठीपुर्याचा संबंध लावल्याचे मी वाचले आहे पण त्यात मलातरी काही अर्थ दिसत नाही. ह्या खटल्याचा वृत्तान्त मुंबई उच्च न्यायालयाच्या ह्या संस्थळावर वाचायला मिळतो. ह्या अनुसार हा खटला १७२० साली झाला आणि रामा कोमटी हा कोमटी नसून राम कामत नावाचा शेणवी जातीचा गृहस्थ होता. तसेच १७८४ मध्ये महालक्ष्मीजवळ समुद्राला हॉर्नबी वेलार्ड हा बांध घालण्यापूर्वी सध्याचा कामाठीफुरा हा पाण्याखालीच होता. ह्या दोन कारणांसाठी रामा कोमटीचे नाव कामाठीपुर्याशी जोडता येत नाही.)
३६-३९) केनेडी ब्रिज, मॅथ्यू रोड, फ्रेंच ब्रिज आणि गवालिया टॅंक - ही चारहि स्थाने खाली जोडलेल्या इंपीरिअल गॅझेट १९०९ मधील नकाशाच्या तुकडयात दिसत आहेत. तसेच केनेडी, मॅथ्यू, फ्रेंच ह्या तिघांचे पुतळे पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट येथील मुख्यालयात एकत्र ठेवलेले आहेत त्याचे चित्रहि दिसत आहे.
कर्नल जे.पी.केनेडी कन्सल्टिंग एंजिनीअर म्हणून, कर्नल पी.टी.फ्रेंच हे रेल्वे कंपनीच्या संस्थापकांपैकी एक म्हणून आणि फ्रान्सिस मॅथ्यू हे चीफ एंजिनीअर आणि नंतर एजंट (मुख्य अधिकारी) म्हणून असे तिघेहि १८६० ते १८८० च्या दशकांमध्ये BB&CI रेल्वेच्या कामाशी संबंधित असे उच्च अधिकारी होते. फ्रेंच ह्यांच्याविषयी आणखी मनोरंजक माहिती म्हणजे त्यांना हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची समज आणि गोडी असावी असे जालावरील उल्लेखांवरून वाटते. बहुतेक इंग्रजांना पाश्चात्य संगीताची सवय असल्याने हिंदुस्तानी संगीत समजत नसे आणि कंटाळवाणे वाटे. त्याचे कारण म्हणजे बहुतेकांची ह्या संगीताशी ओळख संस्थानिकांच्या दरबारात होणार्या नाचगाण्यांमधून होते आणि खर्या गवयांचे गाणे त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही असेहि एका इंग्रजाने लिहून ठेवले आहे. पी.टी.फ्रेंच हे ह्या बाबतीत थोडे निराळे असावेत कारण त्यांनी मेहनतीने गोळा केलेल्या भारतीय वाद्यांच्या संग्रहाचे - जो संग्रह त्यांनी नंतर रॉयल आयरिश ऍकॅडेमीकडे सुपूर्द केला - कर्नल मेडोज टेलर ह्यांनी केलेले परीक्षण जालावर येथे पाहता येते.
१८५०-६० पर्यंत गवालिया टॅंक हा भाग जवळजवळ मोकळाच आणि ग्रामीण भागासारखा होता. गवळी आणि गुराखी आपली गुरे चरण्यासाठी आणि धुण्यासाठी येथे आणत असत. हे गायीम्हशी धुण्याचे काम ज्या तलावावर चालत असे गवळी तलाव असे नाव पडले. चालू ’गवालिया’ हे नाव मूळ नावाचे बदललेले रूप दिसते कारण १९०९ च्या नकाशात त्याचे नाव Gowli Tank गवळी तलाव असेच दर्शविले आहे. १९०९ नंतर लवकरच हा तलाव बुजविण्यात आला कारण शेपर्ड ह्यांनी तसा उल्लेख केला आहे. सध्याच्या नाना चौकातून केम्प्स कॉर्नरमार्गे भुलाभाई देसाई मार्ग (Warden Road) आणि एल. जगमोहनदास मार्ग (Nepean Sea Road) ह्यांच्याकडे जाणार्या रस्त्याला प्रथम गवालिया टॅंक रोड असे नाव होते आणि ते तसेच चालू राहिले. बुजवलेल्या तलावाच्या जागी मोकळे मैदान निर्माण झाले. ऑगस्ट ८, १९४२ ह्या दिवशी महात्मा गांधींनी ह्या मैदानामध्ये छोडो भारत - Quit India - ही घोषणा करून स्वातन्त्र्यलढयाचे शेवटचे पान उलटले. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ अलीकडच्या काळात रस्त्याचे नाव ऑगस्ट क्रान्ति मार्ग आणि मैदानाचे नाव ऑगस्ट क्रान्ति मैदान असे बदलण्यात आले. गूगल मॅप्समधील मैदानाचे चालू चित्र आणि त्यामध्ये उभारलेल्या स्मृतिस्तंभाचे चित्र खाली दर्शवीत आहे. (श्रेय.)
४०-४३) ग्रीन स्ट्रीट, एल्फिन्स्टन सर्कल (हॉर्निमन सर्कल), हमाम स्ट्रीट (अंबालाल दोशी मार्ग). - मुंबईतील प्रसिद्ध टाउन हॉलसमोरील जागेस ब्रिटिश दिवसांमध्ये एल्फिन्स्टन सर्कल असे नाव होते. त्या मोकळ्या जागेचा उपयोग निर्यातीसाठी मुंबईत आणलेल्या कापसाच्या साठवणीसाठीहि केला जात असे आणि त्या कारणाने त्या मोकळ्या जागेस कॉटन ग्रीन असे म्हणत असत. ही साठवणीची जागा कुलाब्यात नेईपर्यंत ’कॉटन ग्रीन’ एल्फिन्स्टन सर्कल मध्येच होते. कॉटन ग्रीन तेथून हलले तरी त्याची आठवण अद्यापि ’ग्रीन स्ट्रीट’ ह्या रस्त्याच्या नावात टिकून आहे. स्वातन्त्र्यानंतर एल्फिन्स्टन सर्कलचे नाव बदलून ’हॉर्निमन सर्कल’ असे करण्यात आले आहे. खालील चित्रामध्ये हमाम स्ट्रीट आणि एल्फिन्स्टन सर्कल दिसत आहे. ग्रीन स्ट्रीट ह्या नकाशाच्या तुकडयात दिसत नाही पण हमाम स्ट्रीटपासून पश्चिमेकडे जाणारा रस्ता म्हणजे ग्रीन स्ट्रीट. गूगल मॅप्समध्ये हा नावासकट दिसतो.
बी.जी.हॉर्निमन हे जन्माने ब्रिटिश वृत्तपत्रकार पत्रकारितेच्या व्यवसायासाठी हिंदुस्तानात आले आणि ब्रिटिश राजवटीचे विरोधक आणि स्वातन्त्र्य चळवळीचे पाठिराखे बनले. मुंबईतील बॉंबे क्रॉनिकलचे संपादक असतांना जालियनवाला बागेसंबंधीच्या त्यांच्या लिखाणामुळे त्यांना हिंदुस्तान सोडावा लागला पण परत येऊन त्यांनी पुन: ते पत्र हाती घेतले. १९२९ नंतर त्यांनी स्वत:चे वृत्तपत्र सुरू केले.
खाली ’बॉंबे क्रॉनिकल’चा मार्च १,१९१९ चा अंक दाखवीत आहे. (श्रेय.) अंकामध्ये मध्यभागी 'The Satyagraha Vow' अशा शीर्षकाखाली रौलट बिलाविरुद्ध महात्मा गांधींची सत्याग्रहाची घोषणा दाखविली आहे. त्याखाली 'Mr. Gandhi's Manifesto' दिसतो. त्याच्या शेजारी दोन कॉलम्समध्ये 'Signatories to the Pledge' अशी नावे आहेत. डाव्या बाजूचे पहिले नाव 'Mohanadas Karamchand Gandhi, Satyagraha Ashram, SabaramatI' आणि त्याखालचे नाव ’Vallabhbhai J. Patel, Bar-at-Law, Ahmedabad' अशी आहेत. उजव्या बाजूचे पहिले नाव B.G.Horniman, Editor, "The Bombay Chronicle," Bombay असे आहे. पुढे डी.डी.साठे (गिरगावातील डी.डी.साठे मार्ग), अवंतिकाबाई गोखले (अवंतिकाबाई गोखले मार्ग), सरोजिनी नायडू अशीहि नावे दिसतात.
ग्रीन स्ट्रीटजवळच ’हमाम स्ट्रीट’ आहे. येथे कधीकाळी असलेल्या सार्वजनिक स्नानगृहावरून ते नाव पडले.
४४) किंग्ज सर्कल स्टेशन - २०व्या शतकाच्या प्रारंभापासून मुंबईच्या वाढत्या वस्तीला राहण्यासाठी जागा आणि पाणीपुरवठा-मलनि:सारणासारख्या बाबी पुरविण्यासाठी विचार करावयास हवा अशी जाणीव मुंबई सरकार आणि महानगरपालिकेस होऊ लागली होती आणि त्यातूनच १९०९च्या सुमारास Bombay Development Committee, Bombay Improvement Trust अशांची निर्मिती झाली होती. त्यांच्या शिफारशीतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे दादर-माटुंगा ह्यांच्या पूर्वेकडील भाग वस्तीयोग्य करणे असा होता आणि त्यामध्ये क्रॉफर्ड मार्केटपासून शीवपर्यंत १५० फूट रुंदीचा रस्ता बांधणे हा विचार समाविष्ट होता. प्रत्यक्षात इतका मोठा रस्ता झाला नाही पण नायगाव-दादर-माटुंगा भागात विन्सेंट रोड (सध्याचा बाबासाहेब आंबेडकर मार्ग) नावाचा रुंद रस्ता बांधला गेला. विन्सेंट हे मुंबईचे पोलिस कमिशनर होते. ह्या रस्त्याच्या शीवकडील बाजूचा शेवट एका वर्तुळाकृति बागेमध्ये झाला आणि त्या बागेस ’किंग्ज सर्कल’ असे नाव दिले गेले. हल्ली ह्याच बागेस माहेश्वरी उद्यान असे नाव आहे पण जुने किंग्ज सर्कल एका उपनगरी स्थानकाच्या रूपाने अजून जिवंत आहे. अंधेरी ह्या पश्चिम रेल्वेवरील स्थानकाकडे जाणार्या मध्य रेल्वेच्या उपनगरी गाडया हार्बर लाईनने येऊन शीव आणि माटुंगा ह्या मध्य रेल्वेच्या स्टेशनांदरम्यान पूर्व बाजूकडून पश्चिम बाजूकडे येऊन अंधेरीकडे जातात. येथे असलेल्या स्टेशनास किंग्ज सर्कल असे नाव आहे.(किंग्ज सर्कलसंबंधित पुढील चित्रे विकिपीडियावरून घेतली आहेत.)
कांदेवाडीमध्ये कांदे साठवण्याची वखार - godown - होती आणि शेपर्ड ह्यांच्या काळापर्यंत ती तेथे असावी असे दिसते.
करेलवाडी - हे नाव मूळचे करळवाडी असे असावे कारण तेथे मिळणार्या ’Karel’ जातीच्या दगडावरून हे नाव पडले आहे असे शेपर्ड लिहितात. मोल्सवर्थच्या १८३१ च्या कोशात ’करळ’ असा शब्द असून त्याचा अर्थ ’a soft sandy stone’ असा दिला आहे.
गायवाडी - गायी ठेवण्याची जागा असा ह्याचा स्पष्ट अर्थ शेपर्ड देतात. मुंबईत अजूनहि दोनतीन गायवाडया आहेत असे ते नोंदवतात. उदा. लेडी जमशेटजी रोडपासून माहीम बझारकडे जाणारा रस्ता. आज हा रस्ता कोणता असावा असा तर्कच करावा लागेल.
मुगभाट - दा कुन्हा ह्यांच्या मताने ’मुंगा’ नावाचा कोळी जमातीमधील कोणी एक पुढारी व्यक्ति होऊन गेला. त्याचे ’भाट’ (शेत) ते मुगभाट. रा.ब.जोशींच्या मते ’मुगाचे शेत’ अशा अर्थाने हे नाव पडले आहे. (मुंबादेवीच्या नावाशीहि मुंगा कोळ्याचा संबंध कोठेकोठे लावला आहे. ’मुंगादेवी’चे ’मुंबादेवी’ असे रूपान्तर झाले असे म्हणतात.)
झावबाची वाडी हे नाव विश्वनाथ विठोजी झावबा ह्यांच्या नावावरून पडले आहे कारण १८व्या शतकात त्यांनी ही वाडी - जिचे तत्पूर्वीचे नाव रणबिल वाडी असे शेपर्ड नोंदवतात - विकत घेतली आणि ती त्यांच्या वंशजांकडे वारसाहक्काने जात राहिली. विश्वनाथ ह्यांचे नातू विठोबा झावबा ह्यांनी तेथील ’झावबा राम मंदिर’ ह्या नावाने ओळखले जाणारे देऊळ १८८२ मध्ये बांधले. विश्वनाथ ह्यांचे एक पणतू नारायण मोरोजी हे तेथे शेपर्ड ह्यांच्या काळापर्यंत राहात होते.
५१) लालबाग - जहाजबांधणी व्यवसायातील प्रख्यात वाडिया कुटुंबातील लवजी वाडिया ह्या मूळ व्यक्तीचे पणतू दादाभाई पेस्तनजी हे सध्याच्या लालबाग-परळ भागातील जमिनीचे मालक होते आणि तेथील त्यांच्या बंगल्याला ’लालबाग’ असे नाव होते. ओरिएंटल बॅंक १८७५ मध्ये बुडाली त्यात पेस्तनजींची बहुतेक मालमत्ता नष्ट झाली. ही माहिती जेम्स डग्लस ह्यांच्या 'Glimpses of Old Bombay' ह्या १८७५ मध्ये छापलेल्या पुस्तकात मिळते (पान १११). ह्यावरून मी असा तर्क करतो की त्या भागात नंतर निर्माण झालेल्या वस्तीला लालबाग बंगल्यावरून ’लालबाग’ हे नाव मिळाले असावे.
५२) लेडी जमशेटजी रोड - दादर-माहीम भागातील ह्या महत्त्वाच्या रस्त्याच्या बांधणीची कथा आर.पी.करकारिया ह्यांनी २२ सप्टेंबर १९१०च्या 'The Advocate of India' मध्ये सांगितली आणि ती शेपर्ड ह्यांनी नोंदवली आहे. वान्द्रे आणि त्यापलीकडील भाग हा मुंबईपासून माहीम खाडीने अलग ठेवलेला होता आणि इकडून तिकडे येण्याजाण्यासाठी नावांचा वापर केला जात असे. १८२०-३० पासून हे दोन भाग जोडून सलग करण्याचे प्रयत्न मुंबईतील सधन व्यापार्यांकडून चालू होते पण त्यासाठी पुरेसे पैसे उभे करता आलेले नव्हते. खाडीमध्ये नंतर एकदा वीस नावा बुडून सर्व प्रवासी मृत्यु पावले तेव्हा सर जमशेटजी जीजीभॉय ह्यांनी सर्व खर्च स्वत: करून हे काम अंगावर घेण्याचे ठरविले. एकूण २ लाखाहून अधिक खर्च करून हा भराव आणि रस्ता १८५४ च्या सुमारास बांधला गेला आणि जमशेटजींची पत्नी लेडी जमशेटजी ह्यांचे नाव त्या रस्त्याला देण्यात आले.
प्रतिक्रिया
रोचक माहिती
हाही लेख माहितीपूर्ण आहे, ह्या लेखमालेतील पुढील लेखांची वाट पहातो.
काही वर्षांपूर्वी म. टा. मधे अरूण टिकेकरांची अशाच विषयावरील लेखमाला आली होती, तिची आठवण आली.
सुरेख
छान माहिती.
केनेडी आणि फ्रेंच ब्रिजला लागूनच, लॅमिंग्टन रोडवरून नाना चौकात उतरणार्या पुलाला फ्रियर ब्रिज असे नाव होते (जे तुम्ही दिलेल्या नकाशातही दिसत आहे). ते फ्रियर आणि फ्लोरा फाउंटनचे फियर एकच काय?
पूर्वी विजेच्या तारांखालून जाणार्या बेस्ट्च्या ट्रॉली बसेस असत (गेल्या त्या आता!), त्यातील एक रूट ह्या फ्रियर ब्रिजवरून असे. लहानपणीचा एक विरंगुळा म्हणजे, आजोळच्या चाळीच्या मागच्या (कॉमन) बाल्कनीतून धडाधड जाणार्या विरार लोकल्स (हो, तेव्हा ग्रँट रोड स्टेशनला फक्त २ फलाट होते आणि विरार फास्ट येथून धुरळा उडवीत निघून जात!) किंवा धिम्या त्रंधेरी (हो, त्यांच्या पाट्यांवरील "अ" हा "त्र" सारखा दिसे!) पाहणे किंवा पुढच्या (कॉमन) बाल्कनीतून फ्रियर ब्रिजवरून येणार्या ट्रॉली बसेस पाहणे, हा असे.
पुभाप्र
जुनी हिंदी अक्षरे
हा जुना 'आ'
तसाच आता झ सुद्धा बदलला आहे.
जुना झ असा दिसे. अगदी २०-२५ वर्षांपूर्वीपर्यंत असा झ काढला जाई. मिथुन-पद्मिनी कोल्हापुरेच्या प्यार झुकता नही चित्रपटाला आम्ही प्यार भुकता नही म्हणत असू.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सुंदर
छान लेख. मुंबईबाबत फारशी माहिती नसल्याने आमचा पास.
मुंबईतील मैलांचे दगड
ही जुनी मालिका आता वर आणण्याचे कारण असे की तिच्यामध्ये उत्तम बसेल अशी काही नवी माहिती अलीकडेच माझ्या नजरेत आली. मुंबईची निर्मिति होत असतांना ब्रिटिशांनी हॉर्निमन सर्कल (जुने एल्फिन्स्टन सर्कल) जवळच्या सेंट थॉमस चर्च पासून अंतरे मोजणारे दगड मुंबईत जागोजागी उभारले होते. त्यापैकी अजून टिकून असलेल्या सहा दगडांच्या जागा आणि त्यांपैकी काहींची छायचित्र दाखविणारा हा अभ्यासू लेख येथे मला मिळाला. बाकीचे दगड काळाच्या उदरात केव्हाच गुप्त झाले आहेत. मुंबईच्या जुन्या इतिहासामध्ये स्वारस्य असणार्यांना तो माहितीपूर्ण वाटेल अशा अपेक्षेने ही टीप लिहिली आहे.
सर्व दगड रस्त्यांच्या कडेला उपेक्षित अवस्थेत पडलेले आहेत आणि केव्हा ते तेथून नाहीसे होतील ह्याचा भरंवसा नाही. तेथून त्यांना उचलून त्यांची राणीच्या बागेतील भाऊ दाजी संग्रहालयामध्ये पाठवणी करणे अत्यावश्यक आहे. ते संग्रहालयाचा विषय 'जुनी मुंबई' हाच आहे.
मुंबईत सध्या राहात असणार्यांना त्या त्या जागेवर जाऊन ते सहज पाहता येतील.
(अशीच पुण्यामधील एका जुन्या दगडाची माहिती मला थॉमस गे ह्यांनी सांगितली होती. स्थानिक इतिहासातील ह्या छोट्या तळटीपेचीहि येथे नोंद करून ठेवतो. त्यांच्या सांगण्यानुसार जन.वेलस्ली अमृतराव पेशवा/होळकर ह्यांना पुण्यातून बाहेर काढण्यासाठी पुण्यावर चालून आला आणि पुण्यामध्ये पोहोचला. सरदेसाई 'मराठी रियासत - उत्तर विभाग ३' मध्ये वेलस्ली २० एप्रिल १८०३ अशी ह्याची तारीख देतात. त्याचा मुक्काम संगमाजवळ होता आणि सध्याच्या जनरल पोस्टाच्या इमारतीपाशी त्याचा हत्ती एका मोठ्या दगडाला बांधून बांधून थेवलेला असे. हा दगड आणि त्याची गोष्ट तदनंतर सवाशे-दीडशे वर्षे जागृत होती. तदनंतर केव्हातरी दगड तेथून काढला गेला आणि गोष्टहि विसरली गेली.)
माहितीपूर्ण लेखमाला
जन्माला मुंबईत आलो आणि तिथेच वाढलो.
लेखमालेत वर्णिलेले काही भाग परिचित आहेत. उरलेल्या काही भागांबद्दल आमच्या आईबापां-आजीआजोबांकडून ऐकून होतो.
अ नाईस वॉक थ्रू द नॉस्ताल्जिक मेमरी लेन!!!!
प्लीज कंटिन्यू...
अलिकडे एक नवीनच माहिती
अलिकडे एक नवीनच माहिती कळली.
मीरा भाइंदर भागात इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी नामक कंपनी ब्रिटिश काळापासून अस्तित्वात आहे. मिरा भाइंदर येथील सर्व जमिनी त्यांच्या ताब्यात किंवा तत्सम मालकीच्या आहेत. सध्या मिरा भाइंदर भागातल्या कोणत्याही जमिनीचे व्यवहार करताना या कंपनीचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असते.
नुकतीच "डीम्ड कन्व्हेयन्स" विषयावर ठाण्याला एक सभा झाली त्यात मिरा भायंदरच्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांनी कन्व्हेयन्स करताना या कंपनीच्या नाकदुर्या काढाव्या लागतात अशी तक्रार केली असता ठाण्याच्या जिल्हाधिकार्यांनी याबाबत हतबलता व्यक्त केली. आणि या प्रकरणी कायदेशीर मार्ग काढण्याचा प्रयत्न चालू आहे असे सांगितले.
राष्ट्रीयीकरणाच्या रेट्यात या कंपनीचे राष्ट्रीयीकरणा झाले नाही हे आश्चर्य आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
'मिरा'
इस्टेट इन्वेस्ट्मेंट कंपनी बाबत फारशी माहिती नाही, पण आपण आवर्जून 'मिरा' असे लिहिले म्हणून हा प्रतिसाद. आजकाल बहुतेक सर्वत्र 'मीरा' असे लिहिलेले दिसते. मिरा रोड हे नाव काशी-मिर्यें या जोड गावावरून आले आहे. मिर्यें/मिरें/मिरा म्हणजे पाणथळ जमिनीतला किंवा पाण्याने वेढलेला उंचवट्याचा भाग. पूर्वी मिरा रोड स्टेशनलगत दूरवर काहीच वसती नव्हती. सर्वात जवळचे लोकवसतीचे गाव म्हणजे चेणे खाडीवरचे काशी-मिर्ये. तिथे जाण्याच्या रस्त्यासाठी रेल्वेतून उतरण्याचे ठिकाण म्हणून ब्रिटिश नॉमेन्क्लेचरनुसार स्टेशनचे नाव मिरा रोड. अलीकडे इथे भक्तिवेदान्त हॉस्पिटल झाल्यापासून कृष्णभक्ती आणि अनुषंगाने मीरेचे महत्त्व लोकांच्या मनात वाढू लागले आहे. 'मीरा रोड' नाव असूनही इथे संत मीरेच्या काहीच खाणाखुणा नाहीत असे एखाद्या संघटनेच्या मनास येऊन न जाणो इथे पुढेमागे संत मीरेचे एखादे भव्य देऊळ उभे राहायचे आणि बिचार्या जुन्यापुराण्या काशीमिर्याचा विसर पडायचा.
जसे विले पारले मधल्या विलेच्या इंग्लिश स्पेलिंग (ville) मधला एक एल काढून ते vile असे करण्याची मोहीम तिथल्या गुजराती बांधवांनी राबवून (आणि ती राबवताना तिला देशभक्तीची डूब देऊन) तसा अध्यादेश काढवून घेतला तसेच इथेही व्हायचे. ville हे स्पेलिंग विळ्ये/विळे या मूळ नावासाठी ब्रिटिशांनी बनवले. विळे आणि पाटळे या जोड गावांचा महिकावतीच्या बखरीत उल्लेख आहे. मराठी 'ळ' हा 'ल' पासून वेगळा ओळखता यावा म्हणून काही ठिकाणी ब्रिटिशांनी डबल एल वापरला आहे. जसे नाळा-सोपार्यासाठी नल्ला सोपारा वगैरे. जिथे 'ळ'वर जोर असे तिथे डबल एल असे सूत्र त्यांनी राबवले असावे. परळचे जुने स्पेलिंग काय होते ते आता आठवत नाही. आणि 'विळ्ये-पाटळे'चे स्थानिक आगरी/ईस्ट इंडियन बोलीत आधीच विरले/इरले/विल्ले-पाटले/पारले झालेले होते. त्यामुळेही ville असे स्पेलिंग केले गेले असेल.
मुंबईविषयक धागा म्हणून इतके अवांतर करावेसे वाटले.
रत्नागिरी येथेही एक मिर्या
रत्नागिरी येथेही एक मिर्या बंदर आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मिर्या डोंगर?
मला वाटते तेथे जवळच मिर्याचा डोंगर नावाची टेकडीही आहे. जाणकारांनी सत्यता कळवावी.
देशभक्तीची डूब
देशभक्तीची डूब अशीच नावे बदलण्यास ठिकठिकाणी कामी येते. आमच्या सातार्यात गावाच्या दक्षिण सीमेवर जुना 'अजमतारा' नावाचा किल्ला आहे. लहानपणी आम्ही त्याला ह्याच नावाने ओळखत होतो आणि सर्व जुन्या पुस्तकात हेच नाव सापडते. औरंगजेबाने १७०० साली हा - आणि जवळचाच परळीचा - असे दोन किल्ले जिंकले. सातार्याची मोहीम त्याचा मुलगा मुअज्जम चालवत होता आणि त्याचे नाव किल्लयास दिले गेले. त्यापूर्वी त्याला कोणतेच नाव नव्हते, तो केवळ सातारचा किल्ला म्हणून ओळखला जात असे.
सध्या सार्वत्रिकरीत्या त्याला 'अजिंक्यतारा' असे स्फूर्तिपूर्ण नाव मिळाले असून छत्रपति उदयनराजेंचा जयजयकार करण्याच्या चालू दिवसात हे सत्य अप्रिय ठरत आहे. आता किल्ल्यावर 'अजिंक्यतारा' अशी निऑनमध्ये मोठी हॉलिवुडी पाटी लागली असून ती गावभरून दिसते. तेव्हा नामकरण आता पूर्ण झाले आहे असे मानावे!
एकूण ही सर्व माहिती फारच
एकूण ही सर्व माहिती फारच मजेदार आहे.
१)पुर्वीच्या इमारतींना जे एक वेगळं व्यक्तिमत्त्व त्यांच्या स्थापत्यकला,नावावरून मिळालं होतं तसं आताच्या इमारतींना नाही.बरं हे वाचून त्यात रमावं तर त्या वास्तूही गायब होत/होणार आहेत.- गायवाडी गिरगाव.लालबाग,हरिनिवास ठाणे.
२)# दगड: सायन/शीव येथे रस्ते खोदाइत फुटबॅाल ते टेनिसबॅाल आकाराचे दगडी गोळे निघालेले ते आम्ही पायाने ढकललेले खेळ म्हणून.नंतर पायांची बोटे ठणकत होती दोन दिवस.इथे म्हणे हे गोळे छोट्या जहाजांवर फेकण्यासाठी असायचे.शीवचा किल्ला,काळा किल्ला इथेही मजेदार गोष्टी सापडायच्या.
>>हरिनिवास ठाणे. हरीनिवास ही
>>हरिनिवास ठाणे.
हरीनिवास ही वास्तू ऐशीच्या दशकातच इतिहासजमा झाली.
हरीनिवास या नावाच्या आवारात दोन बंगले होते. त्या बंगल्यांत दोन ठाणावाला बंधू रहात असत. तिसरे बंधू दम्माणी इस्टेटच्या समोरच्या बाजूस रहात होते. त्या दोन बंगल्यांपैकी एक पाडून तिथे १९८२-८३ मध्ये मोठी इमारत झाली. दुसरा बंगला अजून आहे परंतु तिथे कोणी रहात नसावे.
-(ठाणावालांचा भाडेकरू) नितिन थत्ते
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
दगडी गोळे
असे गोळे मराठवाड्यातल्या औसा, परांडा किंवा नळदुर्ग यांपैकी एका किल्ल्यातल्या एका दालनात गोळा करून ठेवलेले पाहिले आहेत. असे दगडगोळे तोफेतून उडवीत असत.
Grapeshot?
Grapeshot?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
नसावेत.
ग्रेप शॉट नसावेत. कारण हे गोळे बरेच मोठे आणि वेगवेगळ्या आकारमानाचे होते. टेनिस चेंडूपेक्षा मोठे. ते एकत्र उडवले जात होते असतील असे वाटत नाही. आणि गोफणीने उडवण्याइतके लहान आणि हलकेही नव्हते.
माहितीपूर्ण
माहितीपूर्ण लेख.
एक छोटीशी दुरुस्ती. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला ज्याच्यावर खटला चालवला गेला त्या सधन हिंदु व्यक्तीचे नाव रामा कोमटी असे नसून ते राम कामती असे होते. पूर्वी 'कामत' (kaamath) न लिहिता कामती '(kaamthee)' असे म्हणण्याची आणि लिहिण्याची पद्धत होती. ह्या राम कामतीविषयी खूप माहिती जालावर आणि अन्यत्रही आहे.
राम कामतीहि नाही
त्या व्यक्तीचे नाव 'राम कामती'हि नव्हते तर 'राम कामत' होते. पहा वर मूळ लेखात दिलेला दिलेला मुंबई हायकोर्टाचा निकाल. तेथून उद्धृत 'Rama Kamath, better known as Rama Komathi, was a Shenvi (Pancha-Goud Brahmin) by caste, and not a Kamati as supposed by some writers.'
कामत
कामत (Kamath) आडनावाच्या व्यक्तींना 'कामती' म्हणण्याची पद्धत अजूनही आहे. शिवाय मला वाटते कान्होजी आंग्रे यांच्यावरील कर्नल माळगावकरांच्या इंग्लिश पुस्तकाच्या पु.ल. देशपांडेकृत मराठी भाषांतरात कामती हा शब्द वापरलेला आहे. पुस्तक आत्ता हाताशी नाही त्यामुळे संदर्भ तपासता येत नाही. पण तिथे किंवा इतरत्र कुठेतरी (गंगाधर गाडगीळ?) वाचलेल्या 'कामती' या उल्लेखाने माझी उत्सुकता चाळवली जाऊन कामत लोकांना कामती का म्हणतात अशी विचारणा खूप ठिकाणी केली. कामती म्हणतात याला भक्कम दुजोरा मिळाला, पण कारण कळू शकले नाही. शोध अजूनही सुरू आहे. कोणी कोंकणी व्याकरणाचा जाणकार भेटत नाहीय. मला स्वतःला कामचलाऊ कोंकणी बर्यापैकी येते आणि कामानिमित्त काही कोंकणी भाषकांशी बोलणेही घडते. पण मी जाणकार नाही.
मराठीत या प्रकरणाविषयी विस्तृत माहिती नाना शंकरशेठांचे कुलकर्णी यांनी लिहिलेले चरित्र, गंगाधर गाडगीळांचे मुंबईविषयक पुस्तक आणि अर्थात माळगावकर/देशपांडे यांचे कान्होजी आंग्रे या सर्व जालपूर्वकालीन पुस्तकांत आहे. आता जालावर तर आहेच आहे, पण तिथे कामतीचे कामाठी/कोमटी झाले आहे किंवा आम्ही लोकांनी केले आहे.
कामत-कामती-कामोतिम
'कामत' पासून 'कामती-कामोतिम' ह्याचा संबंध पोर्तुगीज भाषेच्या व्याकरणाशी असावा. त्या भाषेला नामांचा वापर करतांना अखेरीस 'o','m' अशी अक्षरे असणे आवश्यक असावे असे वाटते. त्यामुळे Panaji/Panjim, Sankhali/Sanquelim, Kudtar/Curtorim, Kutthali/Cortalim
असे बदल पोर्तुगीज अमलात झाले. वसई ( इंग्रजी Bassein) ह्या समुद्री किल्ल्याचे पोर्तुगीज नाव Fortaleza de São Sebastião de Baçaim असे होते ह्याची आठवण होते.
कोणी पोर्तुगीज जाणकार सध्या उपलब्ध नाही.
आणखी एक अंदाज
मला ह्या अनुस्वारान्त शब्दांविषयी एक अंदाज सुचतो. मराठीतल्या जुन्या शुद्धलेखनानुसार 'अ'कारान्त शब्द सोडून इतर बहुतेक सर्व नपुंसकलिंगी शब्द काही अपवाद वगळता अनुस्वारान्त असत. उदा. मोतीं (अनेक वचन मोत्यें), पाखरूं, लेकरूं, लुगडें, सोंवळें, सोनें, नाणें, इ. तसेंच सध्याची सर्व 'ए'कारान्त ग्रामनामे पूर्वी अनुस्वारान्त होती. उदा. दिवें, आपटें, खंडाळें, तुरुंबें, केळवें, ठाणें वगैरे. वि.का. राजवाड्यांच्या एका लेखात सध्याच्या अंबेजोगाई गावाचे नाव 'जोगाईचें आंबें' असे लिहिलेले मी वाचले आहे. कोंकणीमध्येसुद्धा बहुतेक सर्व ग्रामनामे ('अ'कारान्त सोडून) अनुस्वारान्त असतात. आणि हे अनुस्वार अनुच्चारित नसतात. पोर्तुगीजमध्ये हे अन्त्य अनुस्वार आणताना 'm' या रोमन अक्षराची मदत घ्यावी लागली असणार. पणजीचा मूळ उच्चार 'पोणज्यें' असा होता. 'वसई'चा स्थानिक उच्चार वस्संय असा होता. त्यानुसार स्पेलिंग बनवले गेले होते असणार. ei या जोडस्वराचा उच्चार जर्मन आणि इतर काही भाषांत साधारण अय्/आय् होतो हे आपण सारे जाणतोच. तर मयें, कुडचडें, सांखळीं, पेडणें, केंपें, वेरणें, नारवें, अशा ग्रामनामांच्या पोर्तुगीज़ स्पेलिंगमध्ये शेवटी 'm' येत असावा. मराठीतल्या शींव, गांव, ह्या शब्दांच्या इंग्लिश स्पेलिंग्ज़मध्येसुद्धा 'n' वापरलेला आहे.
दगडी गोळे फेकण्याकरता ट्रॅाय
दगडी गोळे फेकण्याकरता ट्रॅाय युद्धात वगैरे जी गोफण -लाकडी चमचा असायचा तसा असावा लागतो.तोफेतून फुटतील बहुतेक.जहाजांवर फेकले की जहाज फोडून बुडवता येत असावे.किंवा खंदकातून पार येणाय्रा शत्रुंवर गडगडत सोडत असावेत.
भारी माहिती आहे. नुकताच
भारी माहिती आहे. नुकताच फेसबुकवर मुंबईचे नाव मुंबादेवीवरून नाही तर बिंबराजावरून पडलंय त्याबद्दलचा रोचक व्हिडीओ पाहिला.
गर्दीतला दर्दी
नवीन संशोधन
नुकतात मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागातर्फे सुरू असलेल्या साष्टी बेटाच्या सर्वांगीण शोध मोहिमेचा पहिला टप्पा पार पडून त्यातून काही विस्मयकारक निरीक्षणे हाती आली आहेत. हा भूगर्भ, पुरातत्त्व आणि मानववंशशास्त्रीय विदा इतका प्रचंड आहे की त्याची छाननी होण्यास कित्येक महिने लागतील. प्रसारमाध्यमांतील बातम्यांनुसार भाभा अणुशक्तिकेंद्राच्या जागेत एक शिलालेख सापडला असून त्यावरील एक स्थळउल्लेख 'माहीम-बिंबस्थान' असा आहे. शिवाय इथे नागरी जीवन होते, इतकेच नव्हे तर कारभार आणि महसूल व्यवस्थाही होती असा निष्कर्ष शिलालेखातल्या इतर काही उल्लेखांवरून काढता येण्याजोगा आहे. पोर्तुगीज़ काळापूर्वी मुंबईत काहीच नव्हते, सुप्रशासित व्यवस्था नव्हती हे म्हणणे आता खोडले जाऊ शकते. कारण साष्टी बेट आणि मुंबईची मूळची सात बेटे ही अगदी एकमेकांना लागून, आठदहा मैलांइतक्या अंतरावर आहेत.
+१
खेरीज, मुंबादेवी -> मुंबई ही आजपावेतो मान्य असलेली व्युत्पत्ती वादग्रस्त ठरण्याची शक्यता असून बिम्बस्थान -> मुंबई ही नवी व्युत्पत्ती तीची जागा घेण्याची शक्यता आहे!