मोबाईलवर MBA
एखाद महिन्यापूर्वी फोनवर बोलताना धनंजयने “वापरलेला लॅपटॉप मिळेल का”, असं विचारलं.
धनंजय हा कातकरी वाडीतला माझा मित्र; कर्जतपासून साधरण दहा किलोमीटरवर असलेल्या डोणेवाडीतला. ही वाडी जांभिवली ह्या आमच्या गावाला लागून आहे. त्याची नोकरी सांभाळून तो सामाजिक कामात सक्रिय आहे. तो जवळपास १२ वर्षं त्याच्या वाडीत स्थानिक शालेय विद्यार्थ्यांना शिकवणी परवडत नाही म्हणून मोफत वर्ग चालवतो ; त्याच्यासारखाच, कर्जतच्या परिसरातला एक शिक्षित आदिवासी तरुणसुद्धा गेली दोन-एक वर्षं विद्यार्थीवर्गाला शिकवण्याचं काम करत आहे. साधारण दहा वर्षांपूर्वी धनंजय एका एनजीओतर्फे कर्जत तालुक्यतल्या नांदगावजवळ डामसेवाडीत शनिवार-रविवारी आसपासच्या ठाकर आणि कातकरी विद्यार्थ्यांना शिकवायचा. धनंजयने डामसेवाडी सोबतच, नांदगाव, झुगरेवाडी, बलीवरे, ऐनाची वाडी, चई चेवणे या दुर्गम भागांत सतत स्थानिक मुलांची व त्यांच्या पालकांची भेट घेतो; त्यांच्याशी बोलून, तांत्रिकदृष्ट्या समुपदेशन करून त्यांना शाळेत टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो; आणि किमान शैक्षणिक साहित्य उपलब्ध होण्यासाठी मदत करतो. आर्थिक परिस्थिती आणि इतर अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांनी शाळा सोडून दिली असती, ते आज पदवीधर झाले आहेत; व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत आहेत. पण आजही ह्या भागातल्या विद्यार्थ्यांच्या आर्थिक विवंचना, पर्यायानं शैक्षणिक अडचणी कमी झालेल्या नाहीत.
धनंजयनं मागितलेला लॅपटॉप डामसेवाडीतल्या एम.बी.ए. करणार्या प्रवीण खंडवीला assignments आणि presentations करण्यासाठी हवा होता.
डामसेवाडी हे ठाकर लोकांचं गाव भीमाशंकर डोंगररांगांच्या पायथ्याशी. नांदगावपासून दोन किलोमीटर, आणि (मुंबई-पुण्यतल्या गिर्यारोहकांना सहसा परिचित असलेल्या) खांडसपासून अंदाजे आठ किलोमीटर अंतरावर आहे. ह्या गावात चाळीस-पंचेचाळीस घरं आहेत आणि वस्ती सुमारे अडीचशेच्या आसपास आहे. सध्या गावात फक्त चौथीपर्यंत शाळा आहे. पुढे शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान दोन किलोमीटर लांब नांदगावला किंवा साधारण पाच किलोमीटरवर एका आश्रमशाळेत जावं लागतं.
ढगात दिसेनाशा झालेल्या डामसेवाडीच्या जवळ असलेल्या भीमाशंकर डोंगररांगा
डामसेवाडी
दोन आठवड्यांपूर्वी मी जांभिवलीला जाणार असं ठरल्यावर, “आपण प्रवीणला भेटायला जाऊया”, असं मी धनंजयला सुचवलं. त्यानं तयारी दाखवली
हरेश वाघे हा धनंजयचा मित्रसुद्धा आमच्याबरोबर डामसेवाडीला यायला तयार झाला. हरेश इंग्रजी विषयाचा पदवीधारक आहे; त्यानं पाच वर्षं इंग्रजी विषय शाळेत शिकवला आहे आणि सध्या तो कातकरी समाजाच्या प्रश्नांवर काम करतो.
आम्ही तिघे डामसेवाडीत शिरत असताना धनंजयनं मला आणि हरेशला शाळेची पडकी वास्तू दाखवली. धनंजय पूर्वी ह्याच शाळेत शिकवायचा. ह्या बैठ्या वास्तूवरचे पत्रे व त्यांच्या कैच्या - छपराचे आधार - गायब होत्या. हे पाहून मला थोडं आश्चर्य वाटलं. हरेश आत्तापर्यंत बर्याच वाड्या आणि वस्त्या फिरलेला असल्यमुळे त्याला त्यात काही नवल वाटलं नाही. हरेश फक्त मुंबईजवळच्या ठाणे, रायगड किंवा पालघरच नाही तर चंद्रपूर, गडचिरोली आणि महाराष्ट्राच्या इतर मागास भागांमध्येही फिरलेला आहे.
साधारण वीस वर्षांपूर्वी मी मोरबे धरण प्रकल्पात घरं आणि जमिनी गेलेल्या काही ठाकर लोकांना गिर्यारोहणाच्या निमित्तानं भेटलो होतो. कातकरी लहानपणापासून जवळून पाहिले असले तरी ठाकर जमात आणि त्यांच्याबद्दल काहीच मला माहीत नव्हतं. रायगड जिल्ह्यत ह्या जमातीचे लोक आहेत एवढीच माहिती होती. धनंजयचे काही ठाकर मित्र मला माहीत आहेत.
प्रवीण नववीत असताना त्याची शाळा सुटली असती, असं धनंजय म्हणाला. प्रवीणला त्या काळी फिट यायच्या; त्यात त्याच्या घरची आर्थिक स्थिती तोळामासाच होती. त्याचे वडील एकटे कमावणारे. घरात पाच-सहा लोक. प्रवीणच्या आईची तब्येत पूर्वीपासून ठीक नसते. प्रवीणच्या मेंदूत गाठ होती आणि कर्जतच्या परिसरात त्याचं बराच काळ योग्य निदान झालं नाही. नंतर मुंबईला के.ई.एम. रुग्णालयात त्याचं योग्य निदान आणि उपचार झाले. प्रवीण आजारातून बरा झाला आणि पुढे शिकला. सकाळी कॉलेजात जायचं आणि संध्याकाळी पाच-सहा वाजल्यापासून ते रात्री बारा-एक वाजेपर्यंत हॉटेलमध्ये काम करायचं असा दिनक्रम सांभाळून, आणि आश्रमशाळेत राहून प्रवीण पदवीधर झाला.
पावसाळा सुरू असताना डामसेवाडीपर्यंत जाणारा रस्ता तसा बरा होता, डांबरी व मधेमधे खड्डे पडलेला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दाट झाडी आहे. असाच रस्ता डामसेवाडी गावातून जातो. आम्ही प्रवीणच्या घरासमोर गाडी उभी केली. गावात शिरतानाच वसंत भेटला. वसंत प्रवीणचा चुलत भाऊ. तो बारावी पास आहे. लाॅकडाऊन सुरू झाल्यावर त्याची नोकरी सुटली होती, पण आता तो मुरबाडला कामाला जातो.
डामसेवाडी
आम्ही प्रवीणच्या घरी पोहोचताच धनंजयला भेटायला त्याचा जुना विद्यार्थीवर्ग आला. त्यांपैकी योगेश एम. ए. करतो आणि सध्या शाळा बंद असल्यामुळे गावातल्या शाळकरी विद्यार्थ्यांना शिकवतो. तो पुढे काही स्पर्धापरीक्षा देण्याची त्याची इच्छा आहे. योगेशला वेळ नसेल त्या दिवशी प्रवीण शिकवतो.
तेवढ्यात वसंताची बहीण ज्योत्स्ना चहा घेऊन आली. ती गावातच शिंप्याचा व्यवसाय करते. प्रवीणशी बोलताना समजलं की त्यानं एम. बी. ए. करण्यासाठी कर्ज घेतलं आहे. तो शिक्षणासाठी नेरळच्या आश्रमशाळेत राहायचा आणि डोंबिवलीला कॉलेजला जायचा. पण करोनाचा फेरा आल्यापासून तो घरीच आहे. गावात ४ Gची रेंज येते, त्यामुळे तो त्याच्या मोबाईलवरून कॉलेजचे क्लास करू शकतोय. तो assignments आणि presentations सुद्धा त्याच मोबाईलवर करून शिक्षकांना पाठवतॊ.
डामसेवाडी गाव
डामसेवाडीत एकही संगणक नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे भारतातल्या बहुतेक सर्व खेडेगावांची अशीच परिस्थिती असावी. डोणेवाडीत एकच संगणक आहे, धनंजयच्या एका मित्राचा वापरून झाल्यावर त्यानं दिलेला, आठ वर्षं जुना!
गेली किमान दहाएक वर्षं माझ्याकडे, माझ्यासाठी किमान एक लॅपटॉप असतो. ऑफिसचा एक आणि घरचा एक, हेही माझ्यासारख्या घरांत फार नवीन नाही. प्रवीणसारख्या मुलांना मात्र जेमतेम फोनवर भागवायला लागतंय. माझ्या ताटातलं थोडं काढून त्यांना दिलं तर मी उपाशी राहणार नाहीये, पण प्रवीण, आणि त्याच्यासारख्या अनेकांसाठी त्याचा फायदा खूपच जास्त आहे. करोनाच्या भीतीपोटी सगळं जग बंद असताना, ह्या नाही-रे वर्गाला त्याचा सगळ्यात जास्त आणि दीर्घकालीन त्रास होणार आहे. काही कोटी विद्यार्थी संगणक अथवा मोबाईल ह्या सुविधा नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत, त्यांत हे विद्यार्थी सुद्धा येतात; शाळा बंद असल्यामुळे हे विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नयेत, आणि शाळेत आणि जगातही टिकून राहावेत ह्यासाठी आपण काही करण्याची गरज आहे.
सध्या प्रवीणच्या लॅपटॉपसाठी धनंजय पवार काही जुळवाजुळव करत आहे; मी माझ्या परीनं त्याला मदत करत आहे.
प्रतिक्रिया
सामाजिक कामाबद्दल कौतुक आहे.
त्या भागात भटकंती दरम्यान फिरणं झालं आहे.
जगाशी जरा जवळचा संपर्क इंटरनेट माध्यमातून खर्चिक आहेच. पण कर्जतला जाऊन येण्यासाठी शंभर रुपये लागतात. तेही गरीबांना परवडणारे नाही.
सार्वजनिक वाहतूक?
आम्ही लहानपणी जांभिवलीला जायचो तेव्हा कर्जतहून जांभिवलीला जाण्यासाठी एस्टी असायची. दर अर्ध्या तासाला. अंतर साधारण ८ किलोमीटर. आता दिवसातून एक एस्टी असते. त्या मार्गावर होणारी वाहतूक आणि माणसांची ये-जा वाढली तरीसुद्धा आता बस नाहीच.
वाडीतल्या लोकांना सरकारी कामांसाठी कर्जतला किंवा आणखी पुढे जावं लागतं. कुणी आजारी पडलं तर काय? मुलांनी कॉलेजात कसं जायचं? वाड्यांमध्ये काही पिकवलं, तयार केलं तर ते शहरी गिऱ्हाईकांपर्यंत कसं पोहोचवायचं? नियमित आणि स्वस्त प्रवास शक्य नसेल वाड्यांची क्रयशक्ती कशी वाढवायची? अद्वैत म्हणाला, शेजारच्या गावात काही रिक्षा आहेत. ती किती लोकांना परवडणार?
लहानपणी काही कातकरी लोक साप चावून मेल्याचं ऐकलं होतं. तेव्हा एस्टीतरी होती. आता...?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कर्जत एसटी
स्थानिक लोकांना रोजगार म्हणजे ओटोरिक्षा. त्यांनी बऱ्याच मार्गावरच्या एसट्या ( खांडस, नांदगाव, कशेळे(२ चालू),मुरबाड बंद पाडल्या. पलीकडे म्हणजे पेण,पनवेल,आपटा, अलिबाग आहेत खूप.
पनवेल कर्जत नवीन रेल्वेलाईनीवर तीन स्टेशने, एक्सप्रेस थांबत नाहीत. प्यासेंजर ट्रेन्स नाहीत.
सार्वजनिक वाहतूक
माझ्या माहितीप्रमाणे काही लोकांच्या दबावामुळे सरकारने गावोगाव जाणारी बससेवा बंद केली आहे. त्याचा फायदा मूठभर लोकांना झाला असेल. पण ह्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
कोव्हिडनंतरचं जग
कोव्हिडमुळे घरून काम सुरू झाल्यावर, एक मैत्रीण म्हणाली होती - कोव्हिडनंतर येणारं जग मी आणि माझ्यासारख्या लोकांना आणखीनच धार्जिणं असणार आहे. ह्याचा आनंदही कसा साजरा करावा ते मला समजत नाही.
तिचं वाक्य पुन्हापुन्हा आठवत राहतं. प्रवीणची गोष्ट ऐकल्यावर फारच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
खरंय. परवाच आम्ही विनोद करत
खरंय. परवाच आम्ही विनोद करत होतो, घरात माणसं कमी आणि लॅपटॉप जास्त झालेत. दोघांचे एक -एक खाजगी (जे महिन्यातून एकदा उघडले जातात), ऑफिसचे एक एक जेनेरिक आणि शिवाय ऑफ़िसचाच एक अजून वेगळा. अर्थात ह्यात आमची उधळपट्टी नसून व्यवसायामुळे तसं झालंय. तरीसुद्धा आता हा लेख वाचल्यानंतर त्या निरुद्योगी कोपऱ्यात बसून राहिलेल्या लॅपटॉपांकडे बघून अपराधी वाटतंय.
-सिद्धि
पुस्तकं वाचून अभ्यास
ही कुवत {शहरातल्याही }थोडक्याच पोरांच्यात उरली आहे. त्यांना एमबीए काही अवघड नाही.
बाकी डिस्टन्स लर्निंग कोर्सेस पुस्तकांवरूनच केले जातात. मुंबई युनि, इंदिरा गांधी, यशवंतराव मुक्त विद्यापीठ.
( अवांतर)
एम.बी.ए
मला एक मूलभूत प्रश्न आहे - अशा परिस्थितीतल्या तरुणांना एम.बी.ए करून नोकरी-व्यवसायात काही फायदा होतो का? की त्यापेक्षा प्रत्यक्षात व्यवहारोपयोगी किंवा लोकोपयोगी शिक्षण घेतले तर अधिक चांगले होईल?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
इतर व्यवसाय
गाड्या( टू वीलर ) रिपेर हा प्रमुख ठरेल.
प्रत्येकाने आपापला निर्णय
प्रत्येकाने आपापला निर्णय घेतलेला बरा, असे मला वाटते.
कुतूहल
ते मान्य आहेच, पण एमबीए करावेसे वाटण्यामागे त्यांची प्रेरणा काय आहे आणि केल्यास मिळू शकणाऱ्या नोकरी व्यवसायाच्या संधींविषयी अपेक्षा काय आहेत याविषयी मला कुतूहल आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
प्रवीणशी बोलून त्याला MBA
प्रवीणशी बोलून त्याला MBA करावेसे का वाटले ते विचारून जरूर कळवीन .
अशा परिस्थितीतल्या बायकांनी
अशा परिस्थितीतल्या बायकांनी शाळा कॉलेज शिकून त्यांच्या उत्पन्नाच्या दृष्टीने काही फायदा होतो का?
त्यापेक्षा पोळीभाजी डबे करणे, मेस चालवणे, लोणची, मसाले आणि गृहोपयोगी वस्तू बनवून विकणे या प्रकारचे व्यवहारोपयोगी आणि लोकोपयोगी काम शिकून घेतले तर अधिक चांगले होईल?
इंजिनीयर, एमबीए हजारोंच्या संख्येने बेकार पडलेत. हलाखीच्या परिस्थितीतही उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्या / मुलींना कॉलेजात पाठवू इच्छिणार्या काही स्त्रियांची या शिक्षणाकडून काय अपेक्षा असावी?
हा व हा ग आहे..
हा व हा ग आहे..
अर्थात हा उपरोधिक प्रतिसाद आहे. हे सांगावे लागेल असे वाटले नव्हते. चालायचेच.
eBay
वापरलेले लॅपटॉप eBay वर पुष्कळ असावेत.
….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!
.
सल्ले देणाऱ्या लोकांचा हेतू वाईट नसावा, एवढं आणि एवढंच बोलून मी खाली बसते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
+
थोडक्यात, पण मार्मिक.
----------
हेतूवरून आठवले:
The pathway to hell is paved with good intentions.
किंवा, येशूचे शेवटचे विधानही किंचित फेरफाराने मांडता येईल. ('...कारण त्यांना ते काय बोलतात, ते समजत नाही.' डिस्क्लेमर: युअर्स ट्रूली नॉट एक्स्क्लूडेड.)
----------
नाही, पण सीरियसली. काहीकाही सल्ले वाचता, 'बायकांना करायचेय काय शिकून? चूल आणि मूल या बायकांच्या पारंपरिक क्षेत्रात (त्याचेच व्हेरिएशन म्हणजे पोळीभाजीचा व्यवसाय करणे.) चिकटून राहाण्यात नक्की काय वाईट आहे? (एस्पेशियली सध्याच्या इकॉनॉमीत, वगैरे...)' या विधानात नि त्या सल्ल्यांत, क्वालिटेटिवली (ऑल्दो परहॅप्स नॉट इंटेन्शनली) काय फरक आहे, असा प्रश्न पडू लागतो.
'त्यांना करायचेय काय उच्च शिक्षण घेऊन? (इथे अगोदरच पदवीधर बेकार पडलेले असताना) त्यात त्यांना काही फायदा आहे काय (थोडक्यात, त्यांची भर कशाला), असे कुतूहल वाटते. (त्यापेक्षा त्यांनी रिक्षा चालवण्यात त्यांना जास्त फायदा नाही का?)' या छापाची विधाने 'ब्राह्मणी पितृसत्ताक पद्धती'ची का कसलीतरी द्योतके समजली जातात, म्हणे. (यात 'ब्राह्मण' हे टीकेचे लक्ष्य नव्हे, हा दावा पटू लागतो. चालायचेच.)
गंमत म्हणजे, एखाद्या प्रोफेशनल करियर काउन्सेलरने वगैरे (इन अ प्रोफेशनल कपॅसिटी - कोणीतरी 'आपण काय करावे' असा सल्ला विचारला असता, सल्ल्याचे पैसे घेऊन अथवा न घेऊन, परंतु विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरार्थ) असा सल्ला दिला, तर एक वेळ - एक वेळ! - ते समजता येते. (परंतु कोठलाही प्रोफेशनल करियर काउन्सेलर वर्थ हिज़ ऑर हर नेम 'तू उच्च शिक्षण घेऊ नको' असा सल्ला देणार नाही, अशी शंका आहे. (चूभूद्याघ्या.)) इथे कोणाला ना घेणे ना देणे. लेखकाने कोणीतरी कसे कष्टाच्या परिस्थितीत जिद्दीने उच्च शिक्षण घेऊ पाहात आहे, आणि त्यात त्यांना काय अडचणी येत आहेत, हे मांडलेले आहे. वर्णन म्हणून. (माझ्या समजुतीत तरी कोणाचा सल्ला मागितलेला नाही. फार फार तर लेखक स्वत: त्यांना मदत करण्यासाठी काय प्रयत्न करीत आहे, याचे अत्यंत त्रोटक आणि वरवरचे वर्णन आहे. बास तेवढेच.) आणि त्याचे (त्या जिद्दीचे) कौतुक तर बाजूला राहिले, पण मुळात 'यात फायदा काय? त्यापेक्षा त्यांना रिक्षा चालवून नि पोळीभाजी विकून अधिक पैसे मिळणार नाहीत काय?' ही प्रतिक्रिया???
अरे, ते जर एवढ्या जिद्दीने उच्च शिक्षण घेऊ पाहात आहेत, तर त्यातून त्यांना काही फायदा होतो आहे की नाही, हे त्यांचे त्यांना पाहू (नि ठरवू) द्या ना! तुम्हाला काय पडली आहे? परंतु असो.
अवांतर: याला मी 'ब्राह्मणी पितृसत्ताक पद्धती'चे उदाहरण म्हणणार नाही. (ऑल्दो, त्याचाही काही अंश निदान मी तरी रूलआउट करू शकणार नाही.) रादर, 'अर्बन मेंटॅलिटी'चा आविष्कार समजेन. परंतु तेही असो. शेवटी, नावात काय आहे?
(टीप: पोळीभाजीच्या किंवा रिक्षाच्या व्यवसायात काही कमीपणा असण्याचा दावा नाही. परंतु, पोळीभाजीचा किंवा रिक्षा चालविण्याचा धंदा करायचा, की उच्च शिक्षण घ्यायचे (किंवा दोन्ही) हा एक आत्यंतिक वैयक्तिक असा निर्णय नव्हे काय? असो.)
----------
लेखकाने अशा एका पृच्छेस अत्यंत थोडक्यात, समर्पकपणे, संयतपणे, नि अत्यंत डिप्लोमॅटिकली उत्तर दिले आहे, असे मला वाटले. त्याबद्दल लेखकाला मानले. (त्याव्यतिरिक्त, 'कोणीतरी, कोठेतरी, काहीतरी बरे करू पाहात आहे', एवढ्या ढोबळ पातळीहून अधिक फारसा अर्थबोध या लेखातून मला झाला नाही. परंतु ते ठीकच आहे.) असो.
सल्ले विचारले नाहीत.
पण अशी भीती वाटते म्हणजे की शिक्षणासाठी केलेला खर्च आणि मिळणारा संभाव्य रोजगार ( टक्केवारी) पाहता गरीब माणूस आणखी गरीबीत न पडो अशी कळकळ. ज्याचे आईलवडील पैसे बाळगून आहेत त्यांना पैसे गेल्याचा चिमटा बसला तरी किंचाळत नाहीत. सोसू शकतात.
एके काळी मी त्या भागातून भटकंती करून येताना (गुरुवारच्या) कशेळे बाजारातून एक दोन किलो कडवे वाल (१८ रु किलोने) आणत असे. तेच ठाण्याच्या नौपाडा भागात दुकानात विकत मिळत. ( "कर्जतचे कडवे वाल रु ५५/ किलो.") म्हणजे मी काही मुद्दाम वाल आणण्यासाठी जात नसे. पण मुद्दा असा की त्या भागातल्या लोकांना वस्तू स्वस्त मिळत होत्या. आता परिस्थिती बदलली आहे. वाल १०० रूनेच मिळतात आणि तूर डाळ १२०. पण कमाई वाढण्याची शक्यता नाही. तिथला माणूस खांडस ते कशेळे १२ किमी - ओटो वीस रु शीट देतो.( अधिक कशेळे ते नेरळ मेन लाइन स्टेशन १२ किमी चे वीस रुपये) मुंबईत लोकल ट्रेनचा प्रवासी चाळीस किमीटरला १५ रु देतो.
शहर आणि गावातली गरीबीची दरी वाढत आहे.
हाच उमेदवार खर्च करून शिकेल तेव्हा त्यास जाऊन येऊन जॉब करणे परवडणार नाहीच शिवाय गावातले राहते घर सोडून कुठे दुसरीकडे महागडा आसरा शोधावा लागू शकतो.
केवळ एका ल्यापटॉपने प्रश्न सुटायचा नाही.
(अवांतर फार झालं.)
सिरीयसली?
समजा, प्रवीण कसंही करून शिकला, एमबीए झाला आणि शहरात महाग मिळणाऱ्या वस्तू गावात पिकतात, स्वस्तात मिळतात, तर आपणच त्या शहरात विकायच्या असा विचार त्यानं केला; स्वतःचा व्यवसाय सुरू केला; त्यातून गावातल्या आणखी चार लोकांना रोजगार मिळाला; शिक्षणामुळे त्याला बाहेरच्या जगात काय सुरू आहे आणि व्यवसाय कसा वाढवायचा ह्याच्या कल्पना मिळाल्या; शिक्षणामुळे त्याच्या ओळखी वाढल्या; त्यानं दाखवलेल्या जिद्दीमुळे चार बाहेरच्या लोकांनी त्याच्यावर विश्वास दाखवला ... वगैरे, वगैरे शक्यता तुमच्या डोक्यात येतच नाहीत का?
प्रवीणनं शिकून कुठेतरी नोकरीच केली पाहिजे; विस्थापित झालंच पाहिजे; किंवा अमुकच एक गोष्ट केली पाहिजे आणि त्याच्या शिक्षणाचा, अनुभवाचा, त्याच्या ओळखींचा फायदा करून घेऊन ठरावीक मार्गालाच लागलं पाहिजे, हा शहरी-ब्राह्मणी चाकोरीबद्ध विचार का? त्याचा तो इथवर आला आहे; त्याला पुढे काय करायचं हे ठरवता येणार नाही का? त्याचं आयुष्य आणि त्याच्या इच्छा-आकांक्षा त्याला माहीत का इतरांना?
त्यातून ज्यांना हा विचार करायचा आहे, त्यांनी जरूर करा. पण तो इतरांवर का लादता?
(होय, होय, मी स्वानुभवातूनही वैताग काढत आहे. 'तू खगोलशास्त्र शिकलीस मग त्यातच का नाही नोकरी करत?', 'पीएचडीची एक सीट का फुकट घालवली'? वगैरे प्रश्नावल्या माझ्यासमोरही लोकांनी टाकल्या होत्या.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हे सुद्धा ठीकच.
विचार करायला हवा.
.
त्याचे आयुष्य, त्याच्या इच्छा-आकांक्षा, आणि त्याचे मार्ग. एवढीच किंचित सुधारणा तूर्तास सुचवू इच्छितो. बाकी चालू द्या.
वाढता चालता धंदा
हा आणखी दहा जणांना पोसतो. आता तेच बंद झाले.
जसं राजस्थानातले काही राजे युद्ध न करता मांडलिक झाल्यावर त्यांच्या दरबारातले कलाकारही पोसले गेले. कलावंत टिकले. तेच महाराष्ट्रात झाले नाही.
मोठा कर्माचारी वर्ग संभाळू शकणारा उद्योग दोन चार म्यानिजमेंट ट्रेनी सहज पोसत होता करोनापूर्वकाळात. पण आता हिशोब आला.
मध्यंतरी एमपीएससी परीक्षा देऊन ( त्यासाठी बराच खर्च करणारे) विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. महाराष्ट्र सरकार इतक्या लोकांना सामावून घेवू शकत नाही.
आता desktop वर MBA
माझ्या एका नातेवाईकांनी हा लेख वाचून आपला desktop प्रवीण आणि डामसे वाडीतील इतर विद्यार्थ्यांना द्यायचे ठरवले. काल मी हा desktop धनंजय, शरद व मोतीराम ह्या तीन मित्रांबरोबर प्रवीणकडे सुपूर्त केला.
सध्या प्रवीणचा चुलत भाऊ वसंत photoshop शिकत आहे. त्याला सुद्धा ह्याचा फायदा होईल.
वसंत खंडवी, शरद ठोंबरे, धनंजय पवार, प्रवीण खंडवी व मोतीराम पादीर (डावीकडून उजवीकडे)
टीशर्ट?
प्रवीण आणि वसंतानं कुठल्यातरी टीमचे टीशर्ट घातलेले दिसतात. तिकडे क्रिकेट वगैरे चालतं का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हो. क्रिकेट खूप लोकप्रिय आहे.
हो. क्रिकेट खूप लोकप्रिय आहे. माझ्या माहितीप्रमाणे कातकरी आणि ठकार लोकं नियमितपणे खेळतात. काल संध्याकाळी आम्ही परत येताना धनंजय, प्रवीण व मोतीरामचे मित्र क्रिकेट खेळताना दिसले. क्रिकेटच्या स्पर्धांमुळे कर्जतच्या परिसरातले बरेच खेळाडू एकमेकांना ओळखतात.
लेख आवडला. स्वस्त मोबाइल
लेख आवडला. स्वस्त मोबाइल इंटरनेटचे फायदे. (भारतात स्वस्त 4 जी एका माणसामुळे झाले आहे. )
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
कोण ते महानुभाव ?
कोण ते महानुभाव ?
नाव आठवत नाही, पण मोठे
नाव आठवत नाही, पण मोठे उद्योगपती आहेत. गाड्यांचे तांडे आहेत म्हणतात त्यांच्याकडे!
( सीरियस उत्तर - मुकेश अंबानी. )
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
माझ्याकडे कॉम्प्युटर टेबल आहे
माझ्याकडे कॉम्प्युटर टेबल आहे. उपयोग होणार असेल तर चिंचवडवरुन कलेक्ट कराल का?
त्याचा नक्की उपयोग होईल.
त्याचा नक्की उपयोग होईल. त्यासंदर्भात मी आपल्याशी बोलीन.
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद