भुकेले आणि माजलेले
प्रसंग पहिला :
परगावचा मुक्काम संपवून मी ट्रेनने माझ्या गावी परत येतोय. प्रवास अगदी शेवटच्या टप्प्यात आलाय. आमची ट्रेन आता प्लॅटफॉर्म मिळण्याची वाट पाहत स्टेशनच्या ‘आउटर’ ला थांबली आहे. गाडी जरा जास्तच रखडल्याने प्रवासी चुळबूळ करताहेत. मी कंटाळून खिडकीतून बाहेर पाहत असताना अचानक एका दृश्याने माझे लक्ष वेधून घेतले.
पलीकडच्या रिकाम्या रुळांदरम्यान ढीगभर अन्न टाकून दिलेले होते अन ते अन्न एक माणूस खाली बसून अधाशीपणे खात होता. दोन-तीन रंगांचे भात त्यामध्ये दिसत होते. कदाचित ते रेल्वेच्या खानपान सेवेतील उरलेले वा लोकांनी टाकून दिलेले पदार्थ असू शकतील. त्या कंगाल माणसाकडे पाहताच त्याचा ‘भिकारी’ हा दर्जा लगेच लक्षात आला. त्याच्या चिवडून बकाबका खाण्याच्या पद्धतीवरून तो बराच काळ उपाशी असणार हेही जाणवले. आता तो माणूस जिथे बसला होता तिथेच आजूबाजूला जुन्या-नव्या मानवी व प्राण्यांच्या विष्ठा विखुरलेल्या असणार होत्या. परंतु, त्याची भूक एवढी तीव्र असणार की असले स्वच्छतेचे विचार करणे त्याला परवडणारे नव्हते. ते दृश्य बघून अगदी गलबलून आले.
तेवढ्यात आमच्या गाडीने मोठ्ठा हॉर्न दिला व ती पुढे सरकली. त्या दहा मिनिटांमध्ये मनात असंख्य विचारांचे काहूर माजले. ते केविलवाणे दृश्य मनातून जाता जात नव्हते. ‘‘का अशी वेळ येते एखाद्यावर’’ हा विचार माझ्या मनाला अक्षरशः कुरतडत होता.
तात्पर्य : तीव्र भुकेल्या जिवाला कुठलेही अन्न चालते – अगदी कुजलेले व घाणीत बरबटलेले देखील. भूक ही एकमेव भावना त्याला खाण्यायोग्य काहीही पोटात ढकलायला लाचार करते.
प्रसंग दुसरा :
सुमारे तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. शनिवारची रात्र होती. त्या शहरातील एक प्रथितयश डॉक्टर त्यांच्या पत्नी व दोन मुलींसह एका प्रतिष्ठीत रेस्तराँमध्ये जेवायला आले होते. त्यांच्या आठवडाभरातील कामाच्या व्यापानंतरचे हे विरंगुळ्याचे क्षण होते. रेस्तराँमध्ये मंद प्रकाश पसरला होता. चित्तवृत्ती फुलवणारे संगीत चालू होते आणि झकपक गणवेशातील कर्मचाऱ्यांची लगबग दिसत होती. डॉक्टर नुकतीच वयाची चाळीशी ओलांडलेले, तर त्यांच्या मुली या शालेय वयातील. आता हे कुटुंब एका टेबलावर स्थिरावले. तेथे वेटर येताच त्यांनी सूप व ‘स्टार्टर’ ची ऑर्डर दिली.
‘स्टार्टर’ हे मुख्य जेवणाआधीचे अल्पखाद्य असते याची जाणीव अद्याप त्या खादाड मुलींना नसावी. त्यामुळे, आई-वडिलांचा विरोध असतानाही त्या नावाखाली तब्बल चार प्लेट्सची ऑर्डर दिली जाते. ते पदार्थ येतात. खाणे सुरू झाल्यावर थोड्याच वेळांत त्यांच्या टेबलावर नजर टाकता हे स्पष्ट होते की त्या पदार्थांपैकी निम्मा भाग तरी खाऊन संपणार नाही. त्यावर मुलींचे आईवडील त्यांना रागावतात. पण, त्याचा फारसा परिणाम होत नाही. आता मुख्य जेवणाची ऑर्डर दिली जाते. पुन्हा एकदा मुलींचा हावरेपणा आवरणे आईवडिलांना जड जाते. वेटर जेवण आणून ठेवतो. थोड्या वेळातच अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा निम्मे पदार्थ पानात शिल्लक राहणार हे दिसू लागते.
डॉक्टर व त्यांच्या पत्नीने मागवलेल्या अन्नाला यथाशक्ती न्याय दिलेला असतो; पण केवळ मुलींच्या हट्टामुळे मागवलेले गरजेपेक्षाचे जास्त अन्न आता उरत होते. ते बघून हे दांपत्य खरोखर अस्वस्थ झाले. त्या दोघांना अन्न टाकणे ही कल्पनाही सहन होणारी नव्हती. मुली मात्र त्याबाबत बेफिकीर होत्या. एव्हाना ताटातले अन्न संपत नसतानाही त्या दोघी यानंतर ‘ज्यूस का आईसक्रिम’ मागवायचे याची चर्चा करू लागल्या. किंबहुना अशा उच्चभ्रू रेस्तराँमध्ये असेच वागायचे असते, ‘अन्न टाकले तर त्यात काय एवढे’ असे भाव त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
रेस्तराँमधील इतर टेबलांवरसुद्धा थोड्याफार फरकाने अशीच स्थिती होती. काहीतरी अन्न टाकल्याशिवाय ‘पार्टी’ साजरी झालेली नव्हती. अशा टाकलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे हा तेथील कर्मचाऱ्यांच्या रोजच्या कामातील अप्रिय पण अटळ भाग होता. तेव्हा आता हे कुटुंब उठेल व आपल्याला ते टेबल स्वच्छ करायचेय या प्रतिक्षेत तिथले नोकर होते. परंतु, आता त्या टेबलावर एक अनपेक्षित प्रकार घडला.
आपल्या मुलींवर क्रुद्ध झालेल्या डॉक्टरांनी ‘डेझर्ट’ ची ऑर्डर निक्षून थांबवली. एवढेच नाही, तर पानात उरलेले सर्व अन्न अजिबात टाकता येणार नाही असे मुलींना खडसावून सांगितले. मग डॉक्टरांनी वेटरला बोलावले व ते उरलेले सर्व अन्न ‘पार्सल’ करून देण्यास सांगितले. वेटर त्यांच्या या पवित्र्याने अवाक झाला. त्याने त्यांच्या आज्ञेचे पालन करायचे ठरवले. खरे तर आतापर्यंत त्या रेस्तराँमध्ये असा प्रकार घडला नव्हता. त्याकाळी (म्हणजे सुमारे ३० वर्षांपूर्वी) अशा उरलेल्या अन्नाचे पार्सल करायची पद्धत रुळलेली नव्हती. अखेर कशाबशा प्लास्टिकच्या पिशव्या जमवून वेटरने ते पार्सल केले. आता डॉक्टरांचे कुटुंब ते पार्सल घेऊन निघाले. ते बाहेर पडत असताना तेथील सर्व कर्मचारी डॉक्टरांकडे कौतुकाने व आश्चर्याने बघत राहिले.
तात्पर्य : अन्न टाकण्याचा माज हा उतरवलाच पाहिजे आणि त्याची सुरवात ही आपल्या घरापासूनच हवी.
प्रसंग तिसरा :
संध्याकाळची वेळ. छान वारे सुटलेले. एका शहरातील उपनगराचा भाग. छोट्या-मोठ्या दुकानांच्या गर्दीत रस्त्यावर एक वडापावची गाडी उभी आहे. या तळणीतल्या वड्यांचा खमंग वास दरवळतो आहे. तिथेच एक बसण्यासाठी कट्टा आहे. त्यावर बसून काही ज्येष्ठ नागरिक निवांत गप्पा मारताहेत. एवढ्यात आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधून घेतले जाते एका माणसाकडून. तो माणूस कळकट कपड्यांमध्ये आहे आणि चालता चालता काकुळतीने म्हणतोय, ‘’ओ दादा, ओ भाऊ, गावाकडून आलोय, दोन दिस उपाशी हाये, पोटात अन्नाचा कण नाही. लई भूक लागलीय हो. द्या कुणीतरी धा रुपये तरी.” त्याचे लक्ष तिथल्या वडापावच्या गाडीवर आहे आणि ‘’वडापाव दहा रुपये” ही त्या वडेवाल्याची आरोळी त्याने ऐकलेली आहे. त्याच्या चेहऱ्यावरून तो खूप भुकेला वाटतोय. तो जीवाच्या आकांताने भीक मागतोय – फक्त दहा रुपयांची. एकीकडे त्या गाडीच्या बाजूने त्याच्या येरझाऱ्या चालू आहेत.
ते दृश्य पाहून कट्ट्यावरच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये जरा अस्वस्थता आली. त्यांच्या गप्पा जरा बाजूला ठेवून ते त्या माणसाबद्दल चर्चा करू लागले. त्यांच्यात थोडेफार संवाद झडले ते असे :
‘’जाऊ द्या हो, नका लक्ष देऊ त्याच्याकडे. जाईल निघून जरा वेळाने’’,
‘’आता भीक मागायची म्हटली की दोन दिवसांच्या उपाशीपणाची कथा सांगणारच की हो तो’’,
‘’अहो, कष्ट नाही केले की हे वेळ येते माणसावर. मग भीक मागणे हा सगळ्यात सोपा धंदा.’’
त्या माणसाच्या येरझाऱ्या आणि आर्त स्वरातले भीक मागणे सुरूच आहे. अखेर, त्या ज्येष्ठांपैकी एकांना राहवत नाही. भीक देणे हे त्यांना तत्वतः मान्य नाहीये. पण, आता ते जागेवरून उठतात. झपाटल्यासारखे त्या भिकाऱ्याजवळ जातात. थोड्याशा चढ्या आवाजात ते त्याला हाक मारतात आणि वडापावच्या गाडीजवळ बोलावतात. आता ते खिशातून दहाची नोट काढतात व ती त्या गाडीवाल्याला देउन त्याला त्या भिकाऱ्याला एक वडापाव द्यायला सांगतात. त्यानुसार कृती होते. मग तो भिकारी वडापाववर अक्षरशः तुटून पडतो व दोन मिनिटात तो फस्त करतो. त्या गृहस्थांना समाधान वाटते. ते भिकाऱ्याकडे अधिक लक्ष न देता शांतपणे चालू लागतात.
तात्पर्य : भिकाऱ्याची भूक भागवणे ही प्राथमिकता. भिकारीपणावरील तात्विक चर्चा ही त्यानंतरची गोष्ट.
प्रसंग चौथा( व शेवटचा) :
शहरातील एका शानदार मंगल कार्यालयात लग्नसोहळा चालू होता. त्यात भोजनाची पंगत बसली होती. त्यामध्ये माझ्या शेजारी एक उच्चशिक्षित व्यावसायिक गृहस्थ बसलेले होते. आमच्याकडे येणारा प्रत्येक वाढपी हा ‘वाढू का’ असे विचारूनच वाढत होता. माझ्या शेजारचे ते गृहस्थ त्याला दरवेळी ‘वाढा’ असेच म्हणत होते. याउलट मी मात्र, मी जेवढे खाऊ शकणार होतो तेवढेच वाढायला लावले.
थोड्या वेळांत माझे जेवण संपत आले व माझे ताट स्वच्छ दिसू लागले. त्या गृहस्थांचे ताट मात्र अजून तुडुंब भरलेले दिसत होते. वाढलेले सर्व पदार्थ ते खाऊन संपवू शकणार नाहीत हे आता स्पष्ट होते. एकदम ते मंद स्मित करीत माझ्या ताटाकडे पाहत मला म्हणाले, ‘’तुम्ही ताट किती स्वच्छ केले आहे ते दाखविता आहात काय?’’ त्यावर मी जोरकसपणे ‘’हो’’ म्हणालो आणि नंतर माझ्या ताटातील सर्व अन्न संपवून उठलो. मी हात धुउन परत येताना पाहिले की ते गृहस्थ आता उठले होते व त्यांनी ताटात अनेक पदार्थ टाकून दिले होते. त्यामध्ये किमती गोड पदार्थही होते.
अन्न टाकणे हा प्रतिष्ठेचा एक निकष मानणारे ते महाशय बघून मला मनस्वी चीड आली. तसेच त्या क्षणी आपण याबाबत काहीही करू शकत नाही याचा विषाद वाटला. समाजातील अशा मस्तवाल लोकांचा बंदोबस्त कसा करावा याचा विचार करत मी कार्यालयाबाहेर पडलो. जेवणाची पंगत असो वा बफे पद्धत, असे अन्न टाकणारे अनेक मुजोर आपल्याला सदैव दिसतात खरे.
तात्पर्य: एकजण अन्न टाकणारा आणि दुसरा ते लवून भजून खाणारा. पहिल्याच्या दृष्टीने दुसरा हा टिंगलीचा विषय, तर दुसऱ्याच्या दृष्टीने पहिला हा चीड आणणारा विषय.
... अन्न – माणसाची जगण्यासाठीची मूलभूत गरज. ते अन्न काहीही करून मिळवलेच पाहिजे याची जाणीव करून देणारी संवेदना म्हणजे भूक.
समाजातील बहुतेक लोक कष्ट करून अन्न मिळवतात आणि आपली भूक भागवतात. त्यामुळे त्यांना अन्नाची किंमत समजलेली असते. ते नेहेमी अन्न लवून भजूनच खातात.
काही लोकांच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी असते. त्यांना अन्न मिळवण्यासाठी कष्ट नाही केले तरी चालणार असते. त्यांची भूक भागवण्याची सोय एकतर त्यांच्या पूर्वजांनी करून ठेवलेली असते किंवा, दुसऱ्याचे शोषण करून स्वतःची पोटे भरण्यात हे लोक तरबेज असतात. सुबत्तेतून आलेला माज त्यांच्यामध्ये अगदी भिनलेला असतो. अशा लोकांमधूनच मग निर्माण होतात अन्न टाकणारे मुजोर. भुकेची वेदना कधीही न जाणवलेली ही माणसे. त्यांना अन्नाची किंमत ती काय कळणार?
या दोघांशिवाय तिसरा एक वर्ग समाजात असतो. हे लोक अन्न मिळवण्यासाठी कष्ट व धडपड करण्याऐवजी भिकारी होण्याचा सोपा पर्याय निवडतात. तेव्हा या लोकांना फुकट मिळेल तेवढेच व वाट्टेल तसले अन्न खाण्याची वेळ येते. त्यांच्या सततच्या भुकेल्या अवस्थेला ते स्वतःच जबाबदार असतात. ‘ज्याचे हात काम करतात तो कधीही उपाशी राहत नाही’ या वास्तवाचा त्यांना बहुधा विसर पडलेला असतो.
विष्ठेने बरबटलेले अन्न चिवडून खाणारा भिकारी, काबाडकष्ट करुनही अर्धपोटी असलेली माणसे, मुक्तहस्ते अन्नाची नासाडी करणारी आणि ते टाकण्यात प्रतिष्ठा मानणारी माणसे यांसारखी दृश्ये आपल्या अवतीभवती वारंवार दिसतात. ही सगळीच दृश्ये व्यथित करणारी. ही दृश्ये आपल्याला ‘समाजातील आर्थिक विषमता व वाढती दरी’ यांसारख्या जडभारी विधानांचा अर्थ अगदी स्पष्ट करून सांगतात. एवढेच नाही, तर या वास्तवाची प्रखर जाणीव करून देतात.
एखाद्या माणसाच्या भिकारी होण्याला नक्की जबाबदार कोण? फक्त तो स्वतः की आपण सगळेच? उत्तर देणे अवघड आहे. पण, काही मुद्दे अगदी स्पष्ट व स्वच्छ दिसतात :
१. माणसाने कोणतेही काम हलके न मानता वाटेल त्या कष्टांची तयारी दाखवली तर त्याची भूक भागण्याइतके अन्न त्याला जरूर मिळते.
२. ज्या लोकांना अन्न, वस्त्र, निवारा आणि कित्येक सुखसोयी या विनासायास मिळाल्या आहेत, त्यांनी निदान अन्न टाकण्याचा माज तरी करू नये ही अपेक्षा.
३. आपली भूक भागण्यामागे आपण सोडून इतर अनेकांचे कष्टही कारणीभूत असतात, ही जाणीव सर्वांना असणे हेही महत्वाचे.
ज्या दिवशी या पृथ्वीतलावरील उपलब्ध अन्न हे मानवासहित सर्वच प्राणिमात्रांची भूक भागवून सर्वांना तृप्त ठेवेल तो अर्थातच सुवर्णदिन असेल.
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी ( 'भूक' या नावाने) : ‘अंतर्नाद’ मासिक. संबंधित संपादकांच्या परवानगीने येथे प्रकाशित.)
******************************************************************************************
ललित लेखनाचा प्रकार
अतिशय सुंदर!
हे तीनही प्रसंग, कमीअधिक प्रमाणात आपल्या सगळ्यांच्याच आजूबाजूला होताना दिसतात. ह्याबाबत थोडं अवांतर: एका भारतीय शेफने दक्षिण भारतात कुठेतरी लोकांना फुकट अन्न द्यायला सुरुवात केली होती. (त्याचा व्हिडीओ सध्या गावत नाहीये.) तर, त्या माणसाच्या प्रेरणेमागचं कारण फार भयावह आहे. त्याने एका मुलाखतीत म्हटलेलं की एका माणसाला मी स्वत:ची विष्ठा खाताना पाहिलं, आणि तिथल्यातिथे ठरवलं की माझ्याच देशाला माझी जास्त गरज आहे, आणि त्याने (बहुतेक चेन्नईत) त्याचं काम सुरु केलं.
आता, थोडी ऐसीछाप अजून अवांतर चर्चा. (:p)
मी आईमुळे लहानपणापासून हे ताट चाटूनपुसून खाणं वगैरे अंगिकारलेलं आहे. आजी कौतुकाने (की तिरकसपणे?) म्हणायची की ह्याचं ताट धुवायचीही गरज नसते. वडिलांचं म्हणणं हे, की आधीच्या काळात जेव्हा विधवांना पुरेसं अन्न दिलं जायचं नाही, तेव्हा त्या ताटात जे काही आहे ते अगदी निपटून निपटून खायच्या, ती सवय ह्यामागचं उगमस्थान आहे.
आईचं मत हे, की ही सवय फक्त ब्राह्मणांना असते. इतर जातीय (हिंदूच, बाकी धर्मांचं माहित नाही.) लोक ताटात अन्न उरणं हे संपन्नतेचं प्रतीक समजतात. आधीच्या काळी अहेवपणी मरशील, ताटात शितं उरतील असा आशिर्वाद दिला जायचा ह्यातच सगळं आलं. बाकी माझं अॅनॅलिसीस तोकडं आहे, ह्या अॅंगलचा फार रिसर्च नाही, विधानं सपशेल चुकीची असू शकतात. नंतरच्या लिव्ह इट लार्ज वाल्या पिढ्यांनी मग 'जास्त टाकणं/उरवणं' हे जास्त समृद्धीचं लक्षण मानणं हा कालौघाचा कौल मानणं साहजिक आहे.
तिसऱ्या अनुभावाबद्दल तिरशिंगरावांच्या आधीच्या दुव्यात चर्चा झालेली आठवते. मुंबईकर लोक्स साधारण सगळेच स्कॅमर हीच भूमिका घेऊन फिरतात, त्याचीच निष्पत्ती तिसरा प्रसंग असू शकतो. (Just for arguments' sake.)
विधवाच कशाला?
माझे (ब्राह्मण) आजोबा म्हणायचे की, भांडी घासणाऱ्यांना आपलं ताट बघून किळस वाटली नाही पाहिजे. म्हणून ते स्वतःचं पान स्वच्छ करायचे. मला याची शिस्त निराळी लावायची गरज पडली नाही; आजोबांनी सहज केलेली कॉमेंट पुरली.
आमच्या शेजारचे (ब्राह्मण) आजोबा त्यांच्या सख्ख्या आणि आमच्यासारख्या मानलेल्या नातवंडांना कधीकधी ५-१० पैशांचं बक्षीस द्यायचे. पान स्वच्छ करण्याबद्दल. तेव्हाही त्या पैशांचं मोल नव्हतं; पण एरवी शिस्तशीर अप्पा बक्षीस देणार यातच पुरेसं हुरळून जायला होत असे.
मात्र हे दोन्ही आजोबा लष्करच्या भाकऱ्या भाजण्याऱ्यांतले होते आणि (त्यांच्या काळानुसार) बरेच पुरोगामीही होते.
मला इतर जातीच्या लोकांचा फार अनुभव नाही; जे काही ब्राह्मणेतर मित्रमंडळ आहे त्यांनी त्यांच्या जाती सांगेस्तोवर त्यांच्या सवयी निराळ्या असल्याचं मला लक्षातही आलं नव्हतं. हा कदाचित शहरी वातावरणाचा परिणाम असेल. त्यामुळे जातींबद्दल कॉमेंट नाही.
विधवा म्हणजे आलवण काळातल्या- सवयीच्या फक्त उगमासाठी.
उगीच जात जिथेतिथे आणण्यात काही अर्थ नसतो. माझे मित्र जेवताना बघायचे झाले तर जनरली डबाच खाताना दिसलेले आहेत. आणि तो तर सगळेच नीट खातात. अनुभव मलाही नाही, अंनिसच्या एका पुस्तकात हे वाचलेलं आठवत होतं. आईचा जातिलेव्हलवरच्या रीतिभातींचा अनुभव फार दांडगा आहे, तेव्हढं एक लिहीलं फक्त.
तुम्हाला नक्की काय म्हणाय
तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे लेखकराव्?
प्रसंग २,३,४ च्या तात्पर्यांचा अर्थ काय्?
तुम्हाला जे स्वच्छ मुद्दे दिसले आहेत त्यातला पहिला ठिक आहे, पण मुद्दा २ आणि ३ बरोबर आहेत का?
२. ज्या लोकांना अन्न, वस्त्र, निवारा आणि कित्येक सुखसोयी या विनासायास मिळाल्या आहेत, त्यांनी निदान अन्न टाकण्याचा माज तरी करू नये ही अपेक्षा.
माज करणे म्हणजे नक्की काय, नको असलेली गोष्ट खाल्ली नाही तर माज करणे अशी व्याख्या आहे का?
सुखसोयी विनासायास मिळाल्या आहेत हे तुम्हाला कोणी सांगितले?
३. आपली भूक भागण्यामागे आपण सोडून इतर अनेकांचे कष्टही कारणीभूत असतात, ही जाणीव सर्वांना असणे हेही महत्वाचे.
हे २००% चुक विधान आहे. इतरांच्या कष्ट करण्यामुळे मला खायला मिळत असेल तर मी कष्ट का करावेत्?
-----------
बाकी काही प्रश्न आहेत जसे.
मी अन्न टाकले नाही तर वाचलेले अन्न इथिओपिआतल्या उपाशी लोकांना कसे मिळेल हे सांगता का?
----------
एक मुलभुत प्रश्न : माझ्या मालकीच्या गोष्टीचे काय करावे हे तुम्ही किंवा समाज कोण सांगणार्.?
मन की बात
>>इतरांच्या कष्ट करण्यामुळे मला खायला मिळत असेल तर मी कष्ट का करावेत्?<<
>>मी अन्न टाकले नाही तर वाचलेले अन्न इथिओपिआतल्या उपाशी लोकांना कसे मिळेल हे सांगता का?<<
>>माझ्या मालकीच्या गोष्टीचे काय करावे हे तुम्ही किंवा समाज कोण सांगणार्.?<<
टिपिकल माजलेला प्रतिसाद. दुर्लक्ष केल्यास उत्तम. अन्यथा, त्यांच्यावर मोदींना सोडा. कारण, ह्या ताईंना आवडणारं सरकार आहे ते.
काय हो चिंजं, तुमच्या कडुन
काय हो चिंजं, तुमच्या कडुन ही अपेक्षा नव्हती.
लेखक चावेझ, स्टॅलिन, माओ ची विचारसरणी लागु करावी असे म्हणतोय्. तसे झाले तर सर्वात जास्त नुकसान तुमचेच होइल्. चावेझ नी व्हेनेझुएलातल्या लोकांची केली तशी अवस्था भारतातल्या लोकांची व्हावी अशी लेखकाची इच्छा आहे का?
चिंजं - तसेही, तुम्हाला मॉरल पोलिसिंग आवडत नाही. तुम्हाला सेंसॉर बोर्ड नकोय्. मग इथे लेखक माझ्या/तुमच्या जेवणाच्या ताटात वाकुन बघताय्त हे कसे चालतय्?
तुमचे वैयक्तीक मत सांगा की
तुमचे वैयक्तीक मत सांगा की चिंजं..
आत्ता लेखक ताटात वाकुन बघतोय, मग घराच्या हॉल मधे बघेल, मग बेडरुम मधे बघेल्. हे फार डेंजरस आहे हो.
थोड्या दिवसांनी म्हणेल की ६० वर्षाच्या वरच्या माणसांना मारुन टाका आणि अन्न वाचवा. मग ते वाचलेले अन्न भिकाऱ्यांना द्या.
लेखक पुढे म्हणेल की मध्यमवर्गानी स्वताची मुले जन्माला घालायच्या ऐवजी भिकाऱ्यांची मुले दत्तक घेतली पाहिजेत्. धिस इज अ व्हेरी स्लिपरी रोड्..
?
स्लिपरी स्लोपबद्दलच बोलायचे झाले, तर...
थोड्या दिवसांनी म्हणेल की ६० वर्षाच्या वरच्या माणसांना मारुन टाका आणि अन्न वाचवा.
...'फडतूसांना मारून टाका' म्हणण्यात नि यात क्वालिटेटिव फरक नक्की काय आहे?
(दुसरे म्हणजे, लेखकाची एकंदर ष्टाईल, उपदेशलोलुपता वगैरे - आणि ३०+ वर्षांपूर्वीची उदाहरणे - लक्षात घेता, लेखक स्वत: ६०+ (किंवा गेटिंग देअर) असण्याची शक्यता लक्षात घेतली आहेत काय? काही नाही म्हणणार लेखक असे!)
खूप म्हणजे खूपच्च माहितीपूर्ण.
एवढा माहितीपूर्ण प्रतिसाद आत्तापर्यंत वाचनात आला नव्हता. या प्रतिसादाला कोणी तरी एक पुलित्झर द्या ... फडका मारून!
गांभीर्यानं - "हास्यास्पद प्रश्न आहे." हे वाक्य वाचून ना मला नवी माहिती मिळाली, ना विचारांना चालना मिळाली, ना वाक्य लिहिणाऱ्याचं मत नक्की काय आहे याबद्दल काही आकलन झालं. मग कोणीही असले निरर्थक प्रतिसाद का वाचायचे? या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित नाही; पण असल्या पिंका जाहीररीत्या टाकण्यापूर्वी विचार करावा, अशी विनंती.
या जाहीर पिंकेमधून जे प्रतीत होते
एवढा माहितीपूर्ण प्रतिसाद आत्तापर्यंत वाचनात आला नव्हता. या प्रतिसादाला कोणी तरी एक पुलित्झर द्या ... फडका मारून!
पुलित्झर नव्हे नोबेल नोबेल.
--
गांभीर्यानं - "हास्यास्पद प्रश्न आहे." हे वाक्य वाचून ना मला नवी माहिती मिळाली, ना विचारांना चालना मिळाली, ना वाक्य लिहिणाऱ्याचं मत नक्की काय आहे याबद्दल काही आकलन झालं. मग कोणीही असले निरर्थक प्रतिसाद का वाचायचे? या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित नाही; पण असल्या पिंका जाहीररीत्या टाकण्यापूर्वी विचार करावा, अशी विनंती.
तुमची विनंती ही ताटात मागे सोडलेल्या अन्नात समाविष्ट करण्यात येत आहे.
--
त्याच लेखकाच्या या धाग्यावरीलच पण दुसऱ्या प्रतिसादामधून जे प्रतीत होते त्याचा विचार केलात तर मी "हास्यास्पद" हा शब्द का वापरला ते लक्षात येईल. न आल्यास तुमचीच रेसिपी वापरा - विकांताला रेसिपी ट्राय करण्याची. अंडं घालता अथवा न घालून.
http://www.aisiakshare.com/node/5305
अनुशी सहमत आहे.
_____
या विषयावर "विचार मंथन्/चर्वितचर्वण्" झालेले आहे.
________
http://www.aisiakshare.com/node/5305
मस्तच !
लेख मस्तच !
माझे वडील म्हणजे हरिश्चंद्राचा अवतार आहेत , ते पैसे देत नाहीत पण उपाशी लोकांना जेऊ घालतात. मी भिकाऱ्यांना / पोटासाठी पैसे मागणाऱ्यांना काहीही वाटण्याच्या सक्त विरोधात होते.
एकदा गोरेगाव ला आई सोबत फिरत असताना , एक आंधळा लंगडा माणूस समोर होता , खायला पैसे द्या वगैरे सुरु होतं, एकंदरीत त्याच्याकडे बघितल्यावर भूक स्पष्ट दिसत होती चेहऱ्यावर..
आंधळ्या आणि लंगड्या माणसाकडून कामाची काय अपेक्षा करणार , आणि मिळणारा मोबदला कितीसा , त्याच्या व्यंगाचा फायदा उचलणारे तरी किती असतील , एकंदर पोट भरीचं खाणं १० रुपयात मिळायला तो काही मंत्री नाही.
थोडीशी दया आली त्याची आणि विचारलं पैसे देणार नाही , खायला घालेन , चालेल का , हो म्हंटला , समोर वडा पाव वाल्याकडे घेऊन गेले, म्हंटलं किती खाशील दोन की तीन , त्याने फक्त एकच पूरे म्हंटलं.. त्याला खायला घालणं त्या वेळी तरी चुकीच वाटलं नाही.
आमच्या आईसाहेब म्हणजे अन्नपूर्णा माई आहेत , घरी कोणीही आलं तरी न खाता परत जात नाही. पोट भरलेलं असलं कि डोकं शांत राहतं हे तिच म्हणणं.
आम्ही लहान असताना नाटकं केली , डबा परत आणला कि तोच खायला लागायचा घरी , घरी केलय ते सगळं खायचं , खाऊन माजा , टाकून माजू नका , खाल्लं नाहीस तर डोक्यावर थापेन सगळं , कुठे घशात अडकतंय वगैरे मंत्र असायचेच.
एकंदरीत आता लोकं जेवण फुकट घालवतात , ताटात टाकतात , त्यांची कीव येते. पार्सल करणं कमी प्रतिष्ठेच वाटणाऱ्या लोकांमध्ये गुदमरल्यासारखं होतं. निर्लज्जपणे मी पार्सल घेऊन येते किंवा सिग्नल वरच्या मुलांना देऊन टाकते. (सिग्नल वरच्या मोठ्या भिकाऱ्यांना काहीही देणं मूर्खपणा आहे असा वाटतं)
मध्यंतरी एका रॉबिनहूड आर्मी बद्दल वाचलेलं. जास्त झालेलं अन्न ते भुकेलेल्याना वाटतात (जास्त शिजवलेलं देतात. टाकलेलं , अर्धवट खाल्लेलं नाही )
त्यांची माहिती
इथे
क्रोम + गमभन
ह्या धाग्यावर गमभन वापरून टंकण्याविषयी बरीच चर्चा झाली आहे. ती वाचली का?
(मीसुद्धा हा प्रतिसाद क्रोममध्ये गमभन वापरून टंकला आहे.)
मुद्यावर कोणीच येत नाहीये.
मुद्यावर कोणीच येत नाहीये. लेखक म्हणतो काहींना अन्न अजिबात मिळत नाही,काहीना खूप मिळतं ते टाकतातहेत. अनुराव: हे स्वातंत्र्यावर गदा आहे.
१) भीक मागणे वाइट हे लहानपणापासूनच बिंबवलं पाहिजे.
२)ताटात अन्न टाकून देताना प्रथम चूक लक्षात आली पाहिजे की इथे फार वाढलं जातं ते सर्व खाऊ शकणार नाही. पुढच्या वेळेस सुधरून कमी घेतील.
३)भिकाय्रांना अन्न दिल्याने पुण्य लागतं या कल्पना बदलायला हव्यात.
।
।
६०+ होत चाल्लोय हा आरोप होणारे आता. गप्प बसतो.
अन्न
आपले मायबाप सरकार, प्रत्येक बाबतीत स्वत्:चे नाक खुपसत आहे. त्यानुसार, हॉटेलात ऑर्डर करायला आधार कार्डाची सक्ती असावी.
किंवा,
कॅशलेस पेमेंट करणाऱ्यांनाच अन्न पार्सल करुन द्यावे. बाकीच्यांना ते तिथेच संपवायची सक्ती करावी.
किंवा,
उष्टेपणा ही संकल्पना रद्द करावी. एकाचे उरलेले अन्न गोळा करुन, नवीन ऑर्डरमधे मिसळायची सवलत, हॉटेलमालकांना द्यावी.
(भांडवलशाही, माजलेल्या, स्थूल) अमेरिकेतल्या अन्नसंस्कृतीबद्दल
या लेखाच्या निमित्तानं (भांडवलशाही, माजलेल्या, स्थूल) अमेरिकेतल्या अन्नसंस्कृतीबद्दलचा हा लेख आठवला - Dog’s Dinner
हे आमच्या उदारमतवादी (ओअॅसिस) शहराचं धोरण, गेल्या काही महिन्यांतच आलेलं आहे - Austin businesses face fines if food waste not reduced
मुंबईत बय्राच ठिकाणी काही लोक
मुंबईत बय्राच ठिकाणी काही लोक बिस्किटे विकत घेऊन रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना खायला घालतात यावरूनही चर्चा होते. कुत्रेही लगेच खात नाहीत आणि कोपय्राकोपय्रावर ढीग पडलेले असतात बिस्किटांचे.
शनिची साडेसाती चुकावी म्हणूनही काही वेगवेगळे अन्नदान नदीत सोडायला सांगतात. उडिद,तूप वगैरे.
अचरट्बाबा, तुम्ही स्वताला
अचरट्बाबा, तुम्ही स्वताला वेगळे समजु नका. डोंबवलीत शेकडो लोक उपाशी झोपत असताना तुम्ही कुंडीतल्या फुलझाडांना शेकडो रुपयांची खते घालता. किती ही नासाडी.?
लेखकानी हा धागा ऐसी वर टाकायलाच नको होता. इथले प्रॉमिनंट मेम्बर इतकी नासाडी करतात की ती बंद केली आणि वाचलेल्या पैश्याचे वडापाव वाटले तर पुण्यात कोणाला उपाशी झोपायला लागणार नाही.
भटोबा तर "पुण्याचे निरो" आहेत, आजुबाजुला शेकडो लोक उपाशी असताना हे मजेत गाणं गात असतात्.
इथल्या सिनिअर मेंबरांना अन्नाची किम्मत नाही. गहु, मका, बार्ली, द्राक्ष कुजवुन पितात्. कोट्यावधी लोक उपाशी असताना मुळात गहु मका लावायचे सोडुन द्राक्ष लावायची हेच किती राक्षसी कृत्य आहे.. वर ती द्राक्ष उपाशी लोकांनाअ द्यायछी सोडुन कुजवायची हे तर इन्-ह्युमन आहे. वर त्याच्या चर्चा खफवर करायच्या.
"कयामत के दिन " तुमचा फैसला करायला कुमार्१ "चित्रगुप्त्" बसले तर तुम्ही त्यांना क्या जबाब दोगे.?
प्रतिसादातील भाषेतला उर्मटपणा
प्रतिसादातील भाषेतला उर्मटपणा थोडा बाजूला ठेवला तर अनुरावांच्या मुद्द्याशी बऱ्यापैकी सहमत.
माझंच उदाहरण देतो. कारण मी पण काही प्रमाणात टाकणाऱ्यांमध्ये मोडतो.
मी घरी कधीच खाताना टाकत नाही. उलट बचकभर वाढून घेण्यापेक्षा पळीने थोडं थोडं वाढून घेत खातो. चपाती पण पूर्ण खाऊ शकत नाही अशी शंका आली तर चतकोर चतकोर वाढून घेतो. भाताचंही तसंच.
पण हॉटेलात मात्र असं होत नाही. हां, मित्र किंवा घरचे असतील सोबत तर सगळं ताट पूर्ण साफ होतंच. पण मला आहे सारखं बाहेर हादडायची सवय. आणि ज्यांच्याबरोबर सर्वात जास्त खादाडी करायचो ते आता दुसऱ्या शहरात राहतात. त्यामुळं अनेकदा एकटंच जावं लागतं. आणि एकटं गेलं तरी फुलंच घ्यावं लागतं. आता खाज तर प्रचंड असते खायची त्यामुळे मागवतो. आता फूडी असलो तरी खातो तेवढंच जेवढं झेपेल. पण अनेकदा खूप क्वांटिटी जास्त असते एकट्यासाठी . नाईलाजाने कुचमत खाण्यापेक्षा जाईल तेवढं खाऊन उरलेलं टाकून देण्याशिवाय पर्याय नसतो. मेन्यूकार्ड वरून मेन्यू निवडताना मी जितका कन्फ्युज होतो तितका कधीच होत नाही. त्यामुळे हे घेऊ कि ते घेऊ असं होत. अनेकदा त्यातून दोन्ही ट्राय करूया म्हणून दोन्ही मागवतो. मग कधी कधी एखादा पदार्थ गंडलाय हेही कळतं आणि मग तो जाईल तेवढा खाऊन टाकून देतो. यात कुठेही "चला आज टाकायचा माज करूया, मजा येईल येस्स्स" असा भाव नसतो. उलट उगाच मागवलं इतकं असंच वाटत राहतं.
वर एका प्रतिसादात कँटीनच उदाहरण सांगितलंय ते हि माझ्यासोबत होतं. म्हणजे कँटीनवाला ढीगभर सगळे पदार्थ ताटात टाकून देतो पण प्रत्येक वेळी हे कमी टाक ते टाकूच नको असं सांगता येत नाही कारण त्या माणसाची एक लय तयार झालेली असते वाढताना ती बिघडते. म्हणून मग टाकणं होतं.
चंपाषष्ठी ला आमच्या कडे घरी
चंपाषष्ठी ला आमच्या कडे घरी चोपडेकर महाराज त्यांच्या लवाजम्यासकट यायचे. लवाजमा म्हणजे दोन बैलगाड्या व त्यांचे सेवक - सहकारी. त्यांची विठ्ठलाची महापुजा साग्रसंगीत असायची त्यानंतर महाआरती असा तो सोहळा असायचा. त्यानंतर प्रसादाचे जेवण. भरपुर उशीर व्हायचा जेवायला. भुकेने कळवळू नये म्हणून आमची आई आम्हाला सकाळीच काही तरी भरीव खायला द्यायची. पुजा चालू असताना आम्ही ओट्यावर खेळायचो. आरतीला हजर व्हायला लागायचे.
बाहेर खेळताना मारुतीच्या देवळाजवळील ध्वजस्तंभापाशी नारायण घुटमळत होता. तो म्हणाला ," प्रकाश भुक लागलीये खायला देतोस का काही?" मी म्हटले की तुला माहिती आहे कि महाराजांची पुजा आरती झाल्याशिवाय काही खाता येत नाही. तुला मी नंतर प्रसाद आणून देईन. मी घरात गेल्यावर नंतर विसरुन गेलो. आमची यथासांग प्रसादाची जेवणे झाली सुद्धा. नंतर मला समजले की नारायण भुकेल्या पोटीच त्या ध्वजस्तंभावर असाच 'खुडुक' झाला. आज मला त्या बद्दल अपराधी वाटत. त्यावेळी त्याला जर धार्मिक रिवाज तोडून अन्न दिले असते तर न जाणो तो कदाचित वाचला असता.
लग्नात आग्रह करु करु लोकांना खायला घालतात. बरेच लोक नुसते उष्टावतात व ताटात टाकून देतात. हेच अन्न जर भुकेलेल्या लोकांना मिळाले तर? ज्यांची पोट भरलीत त्यांना आग्रह करु करु वाढणार आणी जे उपाशी आहेत त्यांना कोणि विचारत नाही? हे बघुन मी नेहमीच उद्विग्न होतो. बुफे बरा वाटतो किमान अन्न तरी आपल्या गरजेनुसार घेता येते.
आहो माजलेले काय्?
आहो माजलेले काय्?
फारच सरसकटीकरण होतं आहे.
अन्न वाया घालवू नये हे बरोबर आहे. विशेषत: भारतीय लोकांनी. कारण खूप गरीब भुकेलेले लोक आहेत आपल्याकडे.
आपल्याला भूक असेल, त्यापेक्षा थोडे कमीच घ्यावे, म्हणजे टाकायची वेळ येत नाही.
माझ्या ' आहो' च्या कंपनीने एक चांगला उपक्रम केलाय.... फूड डोनेशन म्हणून.
आपल्या घरातले कोरडे आणि न वापरले पदार्थ द्यायचे, म्हणजे डाळी , तांदूळ , पास्ता , नूडल्स, बिस्कीटस इ.
माझ्याकडे असे जास्तीचे काही नव्हते. म्हणून मी म्हणलं, आपण विकत घेऊन देऊ.
बुफे पद्धतीमध्ये अन्नाची
बुफे पद्धतीमध्ये अन्नाची नासाडी होत नाही या विधानाबद्दल मी जरा साशंक आहे.
के० कॉ०ला ठराविक पानांचं कॉण्ट्रॅक्ट द्यावं लागतं. समजा, दोनशे पानांचं दिलं. पानात टाकणाऱ्यांची संख्या पान स्वच्छ करणाऱ्यांपेक्षा जास्त आहे असं गृहितक धरू. के कॉ जे अन्न शिजवेल, ते "खाल्लं गेलेलं अन्न + टाकलेलं अन्न" याची सरासरी असेल. घाटपांडेकाकांनी कितीही मोजूनमापून पदार्थ घेतले, तरी केटरिंग कॉण्ट्रॅक्टर त्याच्या आडाख्याप्रमाणेच (त्याच्या bill of materials प्रमाणेच) पदार्थ शिजवणार.
म्हणजे, घाटपांडेकाकांनी पानात टाकलं नाही याचा अर्थ ते अन्न केटररकडे उरलं. त्यामुळे ते केटरर टाकून देईल. म्हणजे, अन्न टाकून देण्याचं burden कमी झालं नाही, त्याचा incidence बदलला फक्त.
असे नाही आबा, आता तुम्ही इत
असे नाही आबा, आता तुम्ही इतका विचार करता आहात तर कॉन्ट्रॅक्टर ला फीडबॅक लुप असणार ना, वर तो हिस्टॉरिकल डेटा चा अभ्यास पण करत असणार्.
जसे जसे लोक कमी टाकत जातिल त्या फीडबॅक वर केटरर त्याचे बिल ऑफ मटेरिअल पण सुधारत जाइल्.
एक दिवस असा येइल की एक शीत पण वाया जाणार नाही पुलावाचे.
जसे जसे लोक कमी टाकत
जसे जसे लोक कमी टाकत जातिल त्या फीडबॅक वर केटरर त्याचे बिल ऑफ मटेरिअल पण सुधारत जाइल्.
एक दिवस असा येइल की एक शीत पण वाया जाणार नाही पुलावाचे.
हो, खरं आहे. पण सामाजिक उच्चनीचतेच्या संकल्पना अन्नाच्या क्वांटिटीशी संबंधित आहेत तोपर्यंत असं होणं अवघड आहे.
बाकी केटररला फीडबॅक लूप आजही असतं. माझ्या एका मैत्रिणीचा नवरा 'गुंठामंत्री-लग्न-जेवण-स्पेशालिस्ट' आहे. त्याला कधी शहरात केटरायची वेळ आली तर तो आडाखे बदलतो.
अहो आबा, उपरोध्/गम्मत होती
अहो आबा, उपरोध्/गम्मत होती माझा प्रतिसाद म्हणजे. तुम्ही सिरीअसली नक्क घेऊ इतके.
तसेही पुणेरी ब्राह्मण ( जात आणली की बरे वाटते ) केटरर कमीच करतात स्वैपाक्. पूर्वी पंगती असायच्या तेंव्हा वाढपी तुफान वेगात तुमच्या पुढुन निघुन जायचे, तुम्हाला काही हवे असले तरी तुमच्या कडे दुर्लक्ष करण्याचे प्रशिक्षण त्यांना असायचे. आता बुफे पद्धतीत सुद्धा, जास्त काउंटर लावण्यापेक्षा मोठी लाइन च लागेल अशी व्यवस्था केली जाते अन्नाची नासाडी वाचवण्यासाठी.
उपरोध असला तरी मुद्दा एक
उपरोध असला तरी मुद्दा एकदम बरोबर आहे. :)
आता बुफे पद्धतीत सुद्धा, जास्त काउंटर लावण्यापेक्षा मोठी लाइन च लागेल अशी व्यवस्था केली जाते अन्नाची नासाडी वाचवण्यासाठी.
मोठी लाईन म्हणजे पदार्थ मिळयला जास्त वेळ लागेल. म्हणजे 'एकदाच काय ते भरपूर वाढून घेऊ, परतपरत कोण जाणार' ही वृत्ती बळावेल. म्हणजे पानात टाकलं जाण्याची शक्यता वाढेल. (पण पंगतीपेक्षा कमी टाकलं जाईल हे खरं.)
माझ्या मते श्रीमंतांनी अन्न
माझ्या मते श्रीमंतांनी अन्न टाकलं नाही तर अन्नाची मागणी प्रचंड कमी होईल. आत्ताच शेतकर्यांना पुरेसे पैसे मिळत नाहीत. मागणी घटली तर भाव अजूनच पडतील. नोटबंदीच्या काळात अशी मागणी घटल्यामुळे टोमेटो रस्त्यांवर चिखल होईल इतके फेकून द्यावे लागले होते. तेही कोणालाच त्यांचे पैसे न मिळता. त्यापेक्षा शेतकर्याला पैसे मिळून मग ते अन्न कचर्यात गेलं तर काय बिघडलं?
आदर्श व्यवस्थेत प्रत्येकाला पोटभर मिळेल अशी अन्नवितरण व्यवस्था किंवा सार्वत्रिक समृद्धी असेल. मग अन्न फुकट घालवणं तोट्याचं पडेल. पण सध्या ती नाही. मग आहे ती मोडकी व्यवस्था अजून का मोडायची?
असा विचार का नाही करून पाहात?
श्रीमंतांनी अन्न टाकलं नाही तर अन्नाची मागणी प्रचंड कमी होईल. आत्ताच शेतकर्यांना पुरेसे पैसे मिळत नाहीत. मागणी घटली तर भाव अजूनच पडतील. नोटबंदीच्या काळात अशी मागणी घटल्यामुळे टोमेटो रस्त्यांवर चिखल होईल इतके फेकून द्यावे लागले होते. तेही कोणालाच त्यांचे पैसे न मिळता. तर सांगायचा मुद्दा, अन्नाची मागणी कमी झाली नि भाव पडले, तर शेतकरी कंगाल होतील, फडतूस होतील. मग आपण (ते निमित्त साधून) त्यांना गोळ्या घालू नि मारून टाकू. हाय काय नि नाय काय?
(तसेही शेतकरी हे लाडावलेले, माजलेले, ट्याक्सपेयरच्या पैशावर सरकारने पोसलेले इ.इ.च असतात ना? मग त्यांची काळजी कशासाठी करायची? साधा संधी नि करून टाका एन्कौंटर एकदाचा, तेज्यायला!)
Foodgrain production
Foodgrain production estimated at a record 272 million tonnes in 2016-17: govt
The agriculture ministry estimates show that production of key crops like rice, wheat and pulses will be at record levels during the year
जोडीला आमचे एक मित्र आयएएस ची तयारी करीत आहेत्. त्यांच्याकडून मिळालेल्या माहीती नुसार गेल्या दोन वर्षांत भारतात रेकॉर्ड अन्नधान्याचे उत्पादन झालेले आहे. पुरवठा प्रचंड वाढला की किंमती प्रचंड् कमी होतात. जोडीला अन्नसुरक्षा योजना आहेच ज्याकरवी धान्य हे नाममात्र किंमतीत जनतेला उपलब्ध करून दिले जाते.
(१) धान्याच्या किंमती प्रचंड् कमी झाल्या की लोकांना त्या धान्याचा उपयोग करताना काळजीपूर्वक, काटकसरीने करायची गरज का भासावी ??
(२) व धान्याच्या किंमती कमी झाल्या नसतील (म्हंजे धान्य महाग असेल्) तर लॉजिस्टिक्स्/सप्लाय चेन मधे समस्या आहे किंवा मधले लोक (म्हंजे दलाल, व्यापारी) हे प्रचंड पैसा बनवत आहेत्. ( हॅ ? यात काय नवीन आहे ??). काही शेतकऱ्यांनी या दलालीच्या/व्यापाराच्या धंद्यात उतरायला हरकत नसावी. नैका ? ( गब्बर चा नेहमीप्रमाणे पुस्तकी मुद्दा.).
थोडे मोठे (सातवी-आठवी)
थोडे मोठे (सातवी-आठवी) झाल्यावर आई हातावर ५००-७०० ₹ टेकवायची आणि बाजरात जाऊन महिन्याचे सामान आणायलाय सांगायची. तेव्हा समजू लागलं जेवणाची किंमत किती आहे ती!
बआयुष्यात कधी भीक नाही दिली, आणि देणार हि नाही. अन्न वाचविन ते स्वतःसठी. कोणाला फुकट देणार नाही
(१) आपल्या अपत्यांनी ते क
(१) आपल्या अपत्यांनी ते कमावलेले आहेत हे कशावरून ? असं काय त्यांनी केलं की ज्याच्या आधारावर तुम्ही म्हणता कि त्यांनी ते कमावले ?
(२) जे पैसे व्यक्तीने कमवलेले नसतात ते त्या व्यक्तीला देणाऱ्याकडून स्वेच्छेने दिले गेले तर ते देणगी का गुंतवणूक की मोबदला की डीपॉझिट कि भीक की टिप की पगार की बोनस इतर काही ?
फार छान लिहिलंय. आवडला
फार छान लिहिलंय. आवडला लेख.