Skip to main content

'सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व

धागा शीर्षकातील 'सर्व'-समावेशक हा शब्द सर्व बॅकग्राऊंडचे -कोणत्याही जाती-धर्म-वंशाचे- लोक एकत्र सहभागी होऊ शकतील या अर्थाने वापरला आहे. जसे की वाढदिवस आहे वाढदिवसास निमंत्रितांवर जाती धर्माची पुटे राहत नाहीत. (पंतप्रधान मोदीतर आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीसाठी वाढदिवसाची वेळ वापरून घेतात) नवीन वर्षाची सुरवात साजरे करणे (जगातल्या कोणत्याही कॅलेंडर नुसार) वस्तुतः निधर्मी असावे. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट हे सण सुद्धा निधर्मी असतात. फ्रेंडशीप डे सारखी कल्पना सुद्धा एक चांगली कल्पना आहे. जात अथवा धर्मवार नसलेली साहित्यसंमेलने सुद्धा सर्वसमावेशकतेच्या उत्सवाचे उदाहरण होऊ शकते किंवा अगदी एखादा आंतरजालीय लोकांचा कट्टासुद्धा.

भारतातील राजकीय नेतृत्व जनतेला जात आणि धर्मांपलिकडे पाहण्यास केव्हा शिकवेल माहित नाही, पण 'सर्व'-समावेशक सण आणि लोक उत्सव सामाजिक अभिसरणाचा आधार बनू शकतील किंवा कसे ? संस्कृती आणि धर्म याबद्दल कमीत कमी गल्लत झाली तर सामाजिक अभिसरणास अधिक हातभार लागू शकेल का ?

चार्वी Tue, 02/02/2016 - 16:37

तुम्ही त्या दुसर्‍या लेखात म्हटलंय तसं संस्कृती- धर्म या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे मला तंतोतंत पटत नाही, पण त्या आणि या लेखात मांडलेला मुख्य मुद्दा मलाही महत्त्वाचा वाटतो. आपल्या बर्‍याच सणा-उत्सवांवर धर्माची, जातींची छाप आहे. अनेक सण-उत्सवांतल्या प्रथांवर पितृप्रधान संस्कृतीची छाप आहे, हे मला सलतं. मग नास्तिक किंवा निधर्मी किंवा समता महत्त्वाची मानणार्‍या लोकांनी कुठले सण साजरे करायचे हा मला नेहमीच पडलेला प्रश्न आहे. त्या प्रश्नाची आतापर्यंत मिळालेली (अर्ध-समाधानकारक) उत्तरे:
१) रंगपंचमी ('होली')
२) कुठलाही सण - नकोशा वाटणार्‍या रूढी टाळून/ बदलून साजरा करणे
३) कलकत्त्यात पार्क स्ट्रीटवर साजरा होणारा 'बॉडो दिन' अर्थात नाताळ - सजावट, रोषणाई, खाणे-पिणे, उंडारणे - अशा प्रकारे मुळात सर्वसमावेशक नसलेले पण कालौघात/ बाजारपेठेच्या रेट्याने सर्वसमावेशक झालेले सण.
पण तरी मी अजूनही समाधानकारक उत्तरांच्या शोधात आहे

माहितगारमराठी Wed, 03/02/2016 - 18:35

In reply to by चार्वी

तुम्ही त्या दुसर्‍या लेखात म्हटलंय तसं संस्कृती- धर्म या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे मला तंतोतंत पटत नाही, पण त्या आणि या लेखात मांडलेला मुख्य मुद्दा मलाही महत्त्वाचा वाटतो.

दुसरा लेख ऐसिवर जरासा उशीरानेच चर्चेस घेणार आहे तेव्हा या मुद्द्यावर अधिक चर्चा करूयात.

कलकत्त्यात पार्क स्ट्रीटवर साजरा होणारा 'बॉडो दिन' अर्थात नाताळ हे माहित नव्हते अभ्यासतो आणि तुम्हाला समाधानकारक वाटलेल्या उत्सवाची माहिती करून घेण्याची नक्कीच प्रतिक्षा असेल.

इतरत्र काही चर्चा धाग्यांवरही व्यस्त असल्यामुळे उत्तरांना विलंब होत आहे त्या बद्दल क्षमस्व

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 02/02/2016 - 20:20

आजपासून दोन आठवड्यांत येणारा व्हॅलेंटाईन्स डे निदान भारतात निधर्मी समजायला हरकत नाही. बाहेरच्या देशांतून आयात केलेले आणि भांडवलशाहीमुळे जनाधार लाभलेले सण भारतात निधर्मी आणि पितृप्रधान नसतील असं वाटतं.

माहितगारमराठी Tue, 02/02/2016 - 21:06

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आजपासून दोन आठवड्यांत येणारा व्हॅलेंटाईन्स डे निदान भारतात निधर्मी समजायला हरकत नाही.

+१ एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति आणि वसुधैव कुटूंबकम म्हणणार्‍या भारतीयांनी व्हॅलेंटाईन्स डे भारतीयकरण करून आपलासा करण्यास हरकत नसावी. काही ठिकाणी चक्क रक्तदान वगैरेही करून साजरा केला जातो आहे असेच भारतीय संस्कृती सोबत जोडून घेण्याचे अधिक मार्ग शोधता यावेत.

बाहेरच्या देशांतून आयात केलेले आणि भांडवलशाहीमुळे जनाधार लाभलेले सण भारतात निधर्मी आणि पितृप्रधान नसतील असं वाटतं.

हे समजेले नाही.

मारवा Tue, 02/02/2016 - 22:38

In reply to by माहितगारमराठी

व्हॅलेंटाइन डे व्हॅलेंटाइन डे सारखाच साजरा करायला हवा.
मुळ कल्पनेचं अस रुपांतरण का ?
रक्तदान वेगळ्या वेळी करता येऊ शकते
त्यासाठी व्हॅलेंटाइन डे ला व्हॅम्पायर डे त बदलण्याची गरज का ?
समजा होळी च्या दिवशी रंग खेळण्या ऐवजी वृद्धाश्रमात एक दिवस सेवा करावी असा बदल करुन
साजरा केला तर ?
आता योगा च रुपांतरण न्युड योगा वा पॉवर योगा त केल योगा डे ला न्युड योगा डे पॉवर योगा डे मध्ये रुपांतरीत केल
तर त्यावर जसा आक्षेप तसा....

समजा होळी च्या दिवशी रंग खेळण्या ऐवजी वृद्धाश्रमात एक दिवस सेवा करावी असा बदल करुन
साजरा केला तर ?

टेम्प्लेट कोण ठरवणार? तुम्हाला वाटतय वृद्धाश्रमाचा मुद्दा जास्त महत्त्वाचा मला वाटतय अनाथाश्रमांचा मुद्दा जास्त महत्त्वाचा. कोणाला वाटतय "स्त्रीपुरुष समानता - नोकरीमधील" जास्त महत्त्वाची.

मारवा Tue, 02/02/2016 - 23:24

In reply to by .शुचि.

मी म्हणत होतो त्याला चायनीज ऑथंटीक चायनीज फुड सारखच का खाऊ नये ?
त्याला देसी इंडो चायनीज पातळीवर म्हणजे खाली आणुन
मगच का खाव ?
अस काहीस म्हणायच होत.

माहितगारमराठी Wed, 03/02/2016 - 18:45

In reply to by मारवा

रक्तदान केले पाहिजे असे नाही पण राजकीय-सामाजिक दबावामुळे ज्यांना सरळपणे व्हॅलेंटाईन डे साजरा करता आला नाही त्यांनी प्रेमा खातर समाजाला रक्तदान करून रक्तही देण्यास तयार असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले, गेल्या दोनचार वर्षापासून मेघालय ते कोल्हापूर व्हॅलेंटाईन डे रक्तदानाच्या बातम्या आल्या आहेत. एखाद्या परिस्थितीत संस्कृती वेगवेगळ्या प्रकारे रिअ‍ॅक्ट होतही आकारास येऊ शकते.

बाकी मी चायनीज ओरीजनल खाण्यापेक्षा इंडोचायनीज करून खाण्यावर विश्वास ठेवतो, ते जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकणे सोपे जाते.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 02/02/2016 - 22:56

In reply to by माहितगारमराठी

रक्तदान ही भारतीय संस्कृती आहे?

कामसूत्र दिवस असा एखादा दिवस शोधता येणार नाही म्हणून; एरवी भारतीयतेचा सोस असेल तर वसंतपंचमीलाच कामसूत्र दिवस म्हणायलाही ना नाही.

मारवा Tue, 02/02/2016 - 23:22

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कधीही करा वसंत पंचमी ला करा
कोजागिरी पौर्णिमेला करा
माझा पुर्ण पाठींबा
कसा साजरा करावा या समितीत मला घ्या फक्त मी अनेक सुंदर शालीन चौकटीत संस्कृती ताईंच्या चौकटीत बसतील अशा
विधींचा पुरवठा करेल.
काही सार्वजनिक विधी असतील काही व्यक्तीगत पातळीवर चे ठेउ या
फार सुंदर कल्पना

माहितगारमराठी Thu, 04/02/2016 - 12:14

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

रक्तदानच केले पाहिजे असे नाही पण राजकीय-सामाजिक दबावामुळे ज्यांना सरळपणे व्हॅलेंटाईन डे साजरा करता आला नाही त्यांनी प्रेमा खातर समाजाला रक्तदान करून रक्तही देण्यास तयार असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले, गेल्या दोनचार वर्षापासून मेघालय ते कोल्हापूर व्हॅलेंटाईन डे रक्तदानाच्या बातम्या आल्या आहेत. एखाद्या परिस्थितीत संस्कृती वेगवेगळ्या प्रकारे रिअ‍ॅक्ट होतही आकारास येऊ शकते.

व्हॅलेंटाईन डेचा उद्देश अबाधीत ठेऊन त्याचे भारतीयीकरणाचा मी पक्षधर आहे -स्थानिकीकरणामुळे प्रथा अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होऊ शकते - म्हणजे की प्रियकराने प्रेयसीस व्हॅलेंटाईन डे ला ओवाळले आणि प्रियकराच्या प्रेमाचा स्विकार प्रेयसीने ओवाळणीत फुले टाकून केला तर चालू शकेल ;) हे एक गमतीचे उदाहरण म्हणून पण असे कोणतेही भारतीयकरण करण्यास हरकत नसावी.

प्रतिसादांना पोच-उत्तरे देणे जरासे विलंबाने होते आहेत त्या बद्दल क्षमस्व

माहितगारमराठी Thu, 04/02/2016 - 12:18

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कामसूत्र दिवस असा एखादा दिवस शोधता येणार नाही म्हणून; एरवी भारतीयतेचा सोस असेल तर वसंतपंचमीलाच कामसूत्र दिवस म्हणायलाही ना नाही.

@ मारवाजी तुम्हाला कमिटीवर घेण्याची अदितींकडे शिफारस करु पण त्यापुर्वी वसंतपंचमीला कामसूत्र दिवस कशा पद्धतीने साजरा करावा या बद्दल एक निबंध धागालेखाच्या माध्यमातून ऐसिवर प्रकाशित करावे ;)

राही Wed, 03/02/2016 - 00:11

आमचा प्रत्येक सण म्हणजे मंगल, पवित्र असे तैलमर्दन आणि अभ्यंगस्नान. दिवाळीत तर सतत चार दिवस अभ्यंगस्नान आणि ओवाळणे. कदाचित जुन्याकाळी मोठ्या भूप्रदेशात पाण्याचे दुर्भिक्ष्य असेल म्हणून सचैल स्नानाचे महत्त्व वाटत असावे आणि तो एक सणासुदिनालाच करता येण्याजोगा विधी असावा. एरवीही आपल्याला पाण्यात डुंबणे, धबधब्याखाली उभे राहून मजा करणे हे प्रकार आवडतात. आपल्या लोकसंस्कृतीत पावसाची आतुरतेने प्रतीक्षा असते. इतर कोणत्याही संस्कृतींत पर्जन्याला इतके रोमँटिक रूप मिळाले नसेल.
स्नान ही साधी स्वच्छतेची गोष्ट. पण त्यालाही आपण कर्मकांडाने मढवून टाकले. म्हटले तर उन्नयन, म्हटले तर अवनयन.
आपले बहुतेक सण हे अशीच (सध्याच्या जमान्यात आचरणाला गैरसोयीची) कर्मकांडे बनून राहिले आहेत.
अलीकडे मात्र सणाची सुट्टी असली की बाहेर पडणे, बाहेर जेवणे, रोजच्या धकाधकीतून चार विरंगुळ्याचे क्षण मिळवण्याचा प्रयन करणे असा वेगळेपणा दिसू लागला आहे.

सुनील Wed, 03/02/2016 - 09:19

In reply to by राही

आपल्या लोकसंस्कृतीत पावसाची आतुरतेने प्रतीक्षा असते. इतर कोणत्याही संस्कृतींत पर्जन्याला इतके रोमँटिक रूप मिळाले नसेल.

याचे कारण मोसमी पावसात असावे.

वर्षाचे फक्त काही महिनेच पाऊस एरवी नाही, अशी परिस्थिती फक्त भारतीय उपखंडातच आहे. अन्यत्र बाराही महिने केव्हाही पाऊस पडू शकतो. सबब तिथे पावसाचे कौतूक नसावे!

राही Wed, 03/02/2016 - 11:04

In reply to by सुनील

तेच कारण आहे. उत्तर भारतात तर पाऊस फक्त दोन महिने असतो. आग्नेय आणि नैर्‍ऋत्येकडून द्वीपखंडाच्या दोहों बाजूंनी पाऊस उत्तरेकडे उशीरा पोचतो आणि लवकर परततो. त्यामुळेच कदाचित, तिथे श्रावणाचे कौतुक जास्त. कृष्णजन्म श्रावणातला आणि तेव्हा मथुरेत मुसळधार पाऊस पडत होता. आपल्या महाराष्ट्रात 'क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे' असाच श्रावण आपण जाणतो.
अवांतर : आपण वसंत, ग्रीष्म इत्यादि सहा ऋतु मानतो, पण सामान्य हिंदीत बहार आणि पतझड अशी दोन नावे अनेकदा दिसतात. दक्षिणेत ऑटम किंवा पानगळ असा स्वतंत्र ऋतु फारसा विशेष असा नसतो. आणि वसंत जरी चैत्र-वैशाखात मानला आहे तरी माघापासूनच बहार दिसू लागते. ज्येष्ठ-आषाढ ग्रीष्म ऋतु आणि फक्त श्रावणभाद्रपदाचे दोन महिने वर्षा ऋतु असे आपल्याकडे नसते.
किंवा, हजार दोन हजार वर्षांत आपल्या दिनदर्शिकेचा निसर्गाशी मेळ महिन्या-दीडमहिन्याने हुकला असावा का, किंवा हा कालनिर्णय उत्तरद्वीपकल्पाच्या हवामानाला डोळ्यांसमोर ठेवून झाला असावा का?

सुनील Wed, 03/02/2016 - 11:31

In reply to by राही

हजार दोन हजार वर्षांत आपल्या दिनदर्शिकेचा निसर्गाशी मेळ महिन्या-दीडमहिन्याने हुकला असावा का, किंवा हा कालनिर्णय उत्तरद्वीपकल्पाच्या हवामानाला डोळ्यांसमोर ठेवून झाला असावा का?

दोन्ही शक्यता असू शकतात.

आपल्या कालगणनेचा निसर्गाशी मेळ घालणारी 'अधिक मास'. ही संकल्पना कधीपासून अस्तित्वात आली ते पहावे लागेल. बहुधा गल्ली चुकत आल्याची जाणीव झाल्यावरच आली असावी.

खेरीज, आर्यांची पहिली वस्ती उत्तरेतच झाली. कालगणनेची पद्धतही तेव्हाच, त्या प्रदेशाला अनुसरून सुरू झाली असावी.

१ ग्रेगरीयन कॅलेंडरातही लीय इयर संकल्पना अशी गल्ली चुकल्यावरच घातली गेली.

अरविंद कोल्हटकर Wed, 03/02/2016 - 20:27

In reply to by सुनील

'लीप इयर संकल्पना' ह्याचा आढावा पुढील दोन लेखांमध्ये - संलग्न विषयाच्या स्वरूपात - घेण्यात आला आहे.

ईस्टर रविवार, ख्रिस्ताब्द कालगणना आणि अन्य तसलेच useless knowledge...(भाग १)
ईस्टर रविवार, ख्रिस्ताब्द कालगणना आणि अन्य तसलेच useless knowledge...(भाग २)

ह्यापैकी भाग २ मधील लीप इयर संबंधित भाग येथेच देतो:

"सांपातिक वर्षाचे प्रत्यक्ष मान सध्याच्या सूक्ष्म मापनानुसार ३६५.२४२५८ दिवस इतके आहे, म्हणजेच ३६५ दिवसांचे वर्ष पूर्ण सांपातिक वर्षाच्या तुलनेत सुमारे १/४ दिवसाने लहान आहे आणि तेच चालू राहिले तर त्याच्या तारखा ऋतूंच्या तुलनेने ४ वर्षांमध्ये १ दिवस, १०० वर्षांमध्ये २५ दिवस इतक्या आधी पडतील. असे होऊ नये म्हणून असेहि ठरले की इ.स.पूर्व ४५ पासून ४ ने भाग जाणारे प्रत्येक वर्ष ३६६ दिवसांचे असेल आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्यात २४ हा दिनांक दोनदा पडेल. दिनांक दर्शविण्याच्या रोमन पद्धतीनुसार हा दिवस VI Kal. Mar. (मार्च कॅलेंड्स् पूर्वीचा सहावा दिवस - ह्याचे विवेचन वर आलेलेच पहा.) असा ओळखला जात असे. तो दोनदा पडल्यामुळे अशा वर्षांना bissextile - सहावा दिवस दोनदा येणारे वर्ष - असे म्हणत असत. आपण इंग्लिशमध्ये त्यांना Leap year म्हणतो. अधिक दिवस फेब्रुवारीच्या अखेरीस जोडण्याची पद्धतहि नंतरची आहे. (Leap year ह्या वर्णनाचे मूळहि मनोरंजक आहे. सर्वसाधारण ३६५ दिवसांच्या वर्षात ५२ पूर्ण आठवडे आणि १ दिवस असतो. एका वर्षाच्या १ मार्चला सोमवार पडला तर पुढच्या साधारण वर्षाच्या १ मार्चला मंगळवार पडतो. पण ते पुढचे वर्ष ’लीप’ असेल तर १ मार्चला बुधवार पडतो, म्हणजेच एका वारावरून ’उडी’ मारली जाते म्हणून ते ’लीप’ वर्ष.)"

.....

"ह्या काळापर्यंत खरा वसंतसंपात ११ मार्चपर्यंत मागे आलेला होता.) ही शक्यता दूर करण्यासाठी तेव्हाचा पोप १३वा ग्रेगरी ह्याने १५८२ साली कालगणनेमध्ये पुन: मोठी सुधारणा घडवून आणली. तिच्यानुसार १५८२ सालातील गुरुवार ४ ऑक्टोबर ह्या दिवसानंतरचे १० दिवस मोजण्यात आले नाहीत आणि शुक्रवार १५ ऑक्टोबरला गणना पुन: सुरू झाली. लीप वर्ष मानण्याचा नियमहि बदलण्यात आला आणि ’दर चौथे वर्ष लीप, पण ते वर्ष १०० ने भागले जात असल्यास ते लीप नाही, पण ते वर्ष ४०० ने भागले जात असल्यास ते लीप आहे’ असा नियम करण्यात आला. ह्यामुळे ४०० वर्षात ९७ लीप दिवस आणि १४६०९७ दिनांक पडतात. त्याच काळात ४०० सांपातिक वर्षांचे १४६०९७.०३२ इतके सावन दिवस होतात. आता सांपातिक वर्ष ग्रेगोरियन वर्षापेक्षा मोठे आहे पण दोनांतील फरक ४०० वर्षांमागे ०.०३२ दिवस इतका आहे. सांपातिक वर्षाला ग्रेगोरियन वर्षाहून पूर्ण एक दिवसाने मोठे होण्यासाठी सुमारे १२५०० वर्षे लागतील म्हणून सध्यापुरते ह्या प्रश्नाला येथेच सोडलेले आहे. (पृथ्वीचीच दैनंदिन आणि वार्षिक गती कमी होणे इत्यादि बाबी येथे विचारात घेतल्या गेलेल्या नाहीत.)

आपल्याकडील 'अधिक मास' संकल्पनेबाबत मला माहीत आहे ते लवकरच वेगळ्या लेखाद्वारे लिहीन म्हणतो...

सुनील Thu, 04/02/2016 - 09:10

In reply to by अरविंद कोल्हटकर

बहुत धन्यवाद!

अधिक मासासंबंधीत लेखाच्या प्रतीक्षेत.

निसर्गाशी मेळ घालण्यासाठी कालगणनेत किंचित फेरफार (लीप इयर वा अधिक मास) करण्याची निकड युरोपियनांना वा भारतीयांना पडली तशी ती मध्यपूर्वेतील हिजरी कालगणना वापरणार्‍यांना का पडली नसावी? वाळवंटी प्रदेशात ऋतुचक्राला फारसे महत्त्व नसल्यामुळे काय?

राही Thu, 04/02/2016 - 12:26

In reply to by सुनील

तेच की. आणि त्यातूनही अरबांसारख्या अस्सल दर्यावर्दी जमातीला ग्रहनक्षत्रांची स्थिती आणि बदलता निसर्ग समजला कसा नाही? किंवा त्यांना कालदर्शिका निसर्गबदलांशी निगडित असणे आवश्यक वाटले नसावे. म्हणजे उदा. मोहर्रम हा वसंतऋतूतच आला पाहिजे, वर्षाची सुरुवात वसंतऋतूनेच झाली पाहिजे असे त्यांनी मानले नसावे. अनंत अशा काळाला ते त्यांच्या पट्टीने मापत राहिले असावेत.

माहितगारमराठी Thu, 04/02/2016 - 12:41

In reply to by राही

पण त्यालाही आपण कर्मकांडाने मढवून टाकले

एकवेळ कर्मकांडाने मढवणे ठिक कर्मकांडे कमी करण्याचा उपाय कर्मकांडे करणार्‍यांच्याच हातात असतो. त्यासोबत एखादी परंपरा का आहे/कशी आली याचा खरा इतिहास मागे पडतो आधारहीन मिथके आणि सोबत जोडीला अंधश्रद्धा असल्यास समस्या उद्भवते; या धाग्याच्या विषयाच्या दृष्टीने सांस्कृतिक कर्मकांडांना एखाद्या विशीष्ट धर्मासाठी राखीव असल्याचे भासवणारे आधारहिन विश्वास.

@ ऋषिकेश
सण म्हणजे मंगल, पवित्र असे तैलमर्दन आणि अभ्यंगस्नान या गोष्टी दिवाळीत करणे ठिकच पण बौद्धपौर्णीमा, महाविर जयंती, ख्रिसमस आणि मोहर्रमला सुद्धा तैलमर्दन आणि अभ्यंगस्नान केवळ हिंदू प्रथा न मानता सर्व धर्मीयांनी भारतीय संस्कृती म्हणून स्विकारण्यास हरकत नसावी नाही का ? पण नेमके हे आपल्या अनुयायांना सांगण्यात भारतातील सामाजिक, धार्मिक, आणि राजकीय नेतृत्व कुठेतरी कमी पडत नाही का ?

राजकारणाचा उद्देश केवळ सत्ताकारणच असतो का ? सामाजिक परस्पर विश्वास, सलोखा आणि स्थैर्य हि केवळ राज्यकर्त्या शासन पुरतीच मर्यादीत जबाबदारी आहे का त्यातील काही नैतिक जबाबदारी म्हणून उर्वरीत सामाजिक, धार्मिक, आणि राजकीय नेतृत्वावरही पडते ? आणि या नैतिक जबाबदारीच्या निर्वहनात भारतातील सामाजिक, धार्मिक, आणि राजकीय नेतृत्व कमी पडल्याने भारतातील जातीयता आणि धार्मीक अविश्वासाचे वातावरण सातत्याने शिजत आले आहे. या नैतिक जबाबदारीच्या निर्वहनात भारतातील सामाजिक, धार्मिक, आणि राजकीय नेतृत्व नापास झालेले असल्यामुळे स्वतः समाजानेच यात कुठेतरी पुढाकार घेण्याची गरज असू शकेल किंवा कसे.

चार्वी Fri, 05/02/2016 - 00:52

In reply to by अनुप ढेरे

अर्थातच नाही. पण उदाहरणार्थ पार्क स्ट्रीटवर तो ज्या प्रकारे साजरा होतो, त्यात काहीच धार्मिक दिसत नाही. सगळ्या धर्माचे लोक रस्त्यावर प्रचंड गर्दी करतात. मित्र-मैत्रिणी, कुटुंबाबरोबर उशीरापर्यंत हिंडणे, खाण्यापिण्याची चंगळ करणे वगैरे उत्सवी गोष्टी करतात. रस्त्यावर दिवाळीसारखी रोषणाई केलेली असते. गेले काही वर्षं तर पर्यटन विभागातर्फे त्या आठवड्यात गाण्याचे कार्यक्रम वगैरे आयोजित करण्यात येतात.
हा फार अनुकरणीय उत्सव आहे असं माझं म्हणणं नाही, पण सर्वसमावेशक नक्की आहे.

ऋषिकेश Thu, 04/02/2016 - 11:45

मला मुळात धार्मिक सण साजरे का करू नयेत हे समजलेले नाही.
त्यातील क्राही शोषक प्रथा, प्रतिके टाळू शकतो पण एखादा सण निव्वळ धार्मिक आहे किंवा धर्मात संगितला आहे म्ह्णून तो टाळणे मला आतातायी वाटते.

भारतातील राजकीय नेतृत्व जनतेला जात आणि धर्मांपलिकडे पाहण्यास केव्हा शिकवेल माहित नाही

शिकवेल!! ओएम्जी!!!
राजकीय नेतृत्त्वाकडे याहून बरेच चांगले काही करण्यासारखे आहे. या असल्या गोष्टीत "राजकीय" नेतृत्त्वाने वेळ वाया घालवू नये अशी इच्छा!

अनुप ढेरे Thu, 04/02/2016 - 11:54

In reply to by ऋषिकेश

सहमत आहे.

भारतातील राजकीय नेतृत्व जनतेला जात आणि धर्मांपलिकडे पाहण्यास केव्हा शिकवेल माहित नाही

भारतातले राजकीय लोक हे नेते नसून प्रतिनिधी आहेत. ते समजाला बदलणार नाहीत. समाजाचं चित्र दाखवतील.

माहितगारमराठी Thu, 04/02/2016 - 12:04

In reply to by ऋषिकेश

मला मुळात धार्मिक सण साजरे का करू नयेत हे समजलेले नाही.

धागा लेखात आपापले धार्मिक सण साजरे करू नका असे कुटेही म्हटलेले अपेक्षीलेले नाही. केवळ जोडीला 'सर्व' समावेशक सर्वांना सहभागी होण्याचा आनंद देणारे सण/ उत्सव प्रसंग सुद्धा उपलब्ध असावेत अशी धागा लेखातून अपेक्षा केली आहे. केवळ विवीध धर्मीय लोकांचे एकत्र येणे डोळ्यासमोर ठेवले नाही तर विवीध जाती पंथांच्या लोकांनाही एकत्र येण्याच्या अधिक संधी असाव्यात त्यासाठी कोण कोणते सण/ उत्सव / प्रसंग आणि कसे साजरे केले जाऊ शकतील ?

ऋषिकेश Thu, 04/02/2016 - 12:07

In reply to by माहितगारमराठी

आहेत ते सण काय अकमी आहेत. त्यातच यावे की एकत्र कोणी अडवलेय?
आणि तसेही लोक येतातच सद्य सणातही एकत्र

कोकणातील कित्येक मुसलमानांच्या घरी गणपती बसतो, कित्येक हिंदुच्या घरात ख्रिसमस ट्री सर्रास दिसू लागला आहे, तर ख्रिस्ती नववर्षे सर्व धर्म साजरे करताना दिसतात. अधिकचे सण केवळ व्यावसायिक कावा वाटतो. ज्या त्या समाजात सण, उत्सव "ऑर्गॅनिक" पद्धतीने आलेले असले तर मे मला अधिक आपलेसे वाटतात.

माहितगारमराठी Fri, 05/02/2016 - 16:34

In reply to by ऋषिकेश

नवे उत्सव सुद्धा अलरेडी ऑर्गॅनिक पद्धतीनेच येत आहेत, बर्थ डे, व्हॅलेंटाईन डे, प्रजासत्ताक दिवस सारख्या उत्सवांचे गळे संस्कृती रक्षकांकडून वेळोवेळी इनऑर्गॅनिक पद्धतीने दाबले जाताना दिसतात तेवढे नाही केले तरी पुषकळ आहे. 'सर्व' समावेशक उत्सवाची प्लॅटफॉर्मस जाती-धर्म दृष्ट्या न्युट्रल आहेत ही त्यांची उजवी बाजू.

एकमेकांचे धार्मिक सणही साजरे करता येतात आणि अल्पप्रमाणात केलेही जातात पण कुणी एखादा नवा कडवा प्रवचनकार आला की काळाची पावल मागे जाण्यात जाती-धर्म अधारित संणांच्या बाबतीत वेळ लागत नाही. असो.

राही Thu, 04/02/2016 - 12:17

In reply to by ऋषिकेश

सण साजरे करायला काहीच हरकत नाही. पण ते सुटसुटीतपणे साजरे व्हावे. अवडंबर नको. पूजा-अर्चा, रांगोळी, तोरणे, अभ्यंग आंघोळी, क्वचित सोवळे-ओवळे, खाण्यापिण्याची बंधने(कांदा नको वगैरे), नैवेद्य, यांनी प्रसन्न वगैरे वातावरणनिर्मिती होते खरी, पण झंझटच. सुट्टी नसेल तर ऑफिसला जाण्यापूर्वी आवरणे कठिणच. सुट्टीचा दिवस असेल तरी उशीरा उठणे, वर्तमानपत्र संपूर्ण वाचणे, टीवीवर ताज्या बातम्या बघणे यामध्येच वेळ निघून जातो. नातेवाईकांना शुभेच्छांचे आदानप्रदान, सणवार म्हणून घरकामवाल्यांच्या सुट्ट्या, यातून शिल्लक राहिली तर हौस-मौज करायची.

ऋषिकेश Thu, 04/02/2016 - 12:20

In reply to by राही

अर्थातच.. म्हटले तसे जाचक कर्मकांड, प्रतिके (राखी), प्रतिमा (विशिष्ट धर्माधिष्टीत खुण जसे स्वस्तिक, क्रॉस वगैरे) टाळून एकत्र येऊन, पदार्थ हौस असल्यास बनवून नसल्यास विकत आणून साजरे करावेत. माझ्यासाठी त्या त्या सणाला ते ते पदार्थ खाणे फारच महत्त्वाचे आहे ;) खूप आवडते.

माहितगारमराठी Fri, 05/02/2016 - 16:37

In reply to by ऋषिकेश

कर्मकांड टाळणे ठिक आहे पण राखी, रांगोळ्या आणि तोरणांसारखी मंगलमय सांस्कृतिक प्रतिके खुपण्यामागचे कारण निटसे उमगले नाही.