विज्ञान आणि आधुनिक अंधश्रद्धा!
(सुचना – हा लेख वाचून ज्यांच्या भावना दुखवू शकतात अशा “प्राचीन भारतीय तंत्रज्ञानाभिमानी” लोकांनी तो वाचू नये किंवा स्वत:च्या जबाबदारीवर वाचावा. भावनाना ठेच लागल्यास अस्मादिक जबाबदार असणार नाहीत.)
आय आय टी च्या विद्यार्थ्याना पुराणातले पुष्पक विमान शिकवा एवढेच नाही तर राईट बंधुन्च्याही आधी ८ वर्षे विमान बनवून उडवणार्या भारतीय वैज्ञानिकांबद्दल ही त्यांना सांगा.- केंद्रीय शिक्षणमंत्री सत्यपाल सिंग.
https://www.ndtv.com/india-news/wright-brothers-who-indian-invented-aero...
हल्ली असली फालतू आणि दिशाभूल करणारी विधाने करायची साथच आली आहे.सोशल मिडीयाने त्याला प्रसिद्धीही फार मिळते. चुकीच्या गोष्टीना तर ती फारच मिळते.आता ३१ तारखेला झालेल्या चंद्रग्रहणाच्या निमित्ताने बेंगलोर मधील रसत्यांवर शुक शुकाट होता तर आमच्या कम्पनीतल्या एका नवीन जॉईन झालेल्या इन्जीनियरच्या आईने त्याला काय वाटेल ते झालेतरी ४ च्या आत घरी यायला सांगितले होते.(तोही गेला हे विशेष नाही तर त्याचा त्यावर विश्वास होता हे विशेष) पूर्वी हे सोशल मिडीया नावाचे प्रकरण नसतानाही वर्तमानपत्रात क्वचित अशा विषयावर लेख येत असत. अशा विषयावर पुस्तकेदेखील लिहिली जात. जिज्ञासूनी डॉ प. वि वर्तक ह्यांचे उपनिषदांचे विज्ञान निष्ठ निरुपण भाग १ व २,स्वयंभू किंवा वास्तव रामायण वाचून पाहावे. हा माणूस डॉ आहे म्हणून आमच्या वडलांनी ती घेतली आणि भयंकर निराशा झाली. रामायणात जम्बो जेट काय, महाभारतात अण्वस्त्र काय, सूक्ष्मदर्शक आणि टेस्ट ट्यूब बेबी काय.राम राम राम ....हे म्हणे स्वतः योग सामर्थ्याने मंगळावरगेले होते आणि त्यांची निरीक्षणं चक्क नासाने खरी मानली आहेत.(नासाला कामधंदे नाहीत). मला वाटतं पावसाळ्यात जशा रोगाच्या साथी येतात हा तसाच काहीसा हा प्रकार असावा...असो तर आता आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्री सत्यपाल सिंग. साहेबानी उल्लेख केल्लेल्या त्या भारतीय वैज्ञानिकाबद्दल काही माहिती मिळते का ते पाहू. श्री प्रताप वेलकर ह्यानी लिहिलेल्या पठारे प्रभूंचा इतिहास ह्या ग्रंथात ह्याविषयी बर्यापैकी सविस्तर असे एक प्रकरणच आहे.(पृ ९३ ते१०५ ) ह्यात आलेल्या महिती नुसार श्री शिवकर बापुजी तळपदे हे १९ व्या शतकात मुंबई येहे राहत व जे जे स्कूल ऑफ आर्त मध्ये Art and Hand Craft ह्या विभागात शिक्षक होते. त्यांचे शिक्षण काय होते ह्या विषयी माहिती नाही ( त्याने काही फरक पडत नाही). त्याना परदेशात चाललेल्या निरनिराळ्या प्रकारे विमान बनवण्याच्या व उडवण्याच्या प्रयत्नांबद्दल वाचून ऐकून आपणही असे काही करून बघावे अशी इच्छा निर्माण झाली आणि त्याकरता त्यानी अगस्ती आणि भारद्वाज ऋषीनी लिहिलेल्या बृहद विमानशास्त्र , पारद्गुटीका,तसेच वेदांमधील विविध ऋचा, इतर ग्रंथ ह्यांचा तपशीलवार अभ्यास करून मरुत्सखा हे मानवरहित विमान बनवले व मुंबई चौपाटीवर उडवले ते हवेत २०० फुट वर गेले असा त्यानी उल्लेख केला आहे. ( त्याला श्री वेलकर डीरीजीबल –म्हणजे capable of being steered, guided, or directed असे म्हणतात तसेच कधी त्याचा उल्लेख स्पेस शिप असा करतात). एकंदरीत ते मानवरहित विमान तर होतेच पण मुळात ते विमान तरी होते का हा प्रश्न ही पडतो.त्यात पाऱ्यावर सूर्य किरणांची प्रक्रिया घडवून आणून हायड्रोजन वायू तयार करून त्यावर विमान उडवण्याचे तंत्र वापरले होते म्हणतात . आता असा पाऱ्यापासून हायड्रोजन वायू तयार करता येतो का आणि आला तरी त्यावर विमान उडेल का की ते झेपलिन प्रमाणे वायूयान (air ship) होते आणि असेल तर ते मागे पुढे कसे जात असे ह्याबद्दल एकूण काहीच माहिती नाही. मध्यंतरी आलेल्या( आणि दाणकन पडलेल्या) हवाईजादे ह्या चित्रपटाच्या निमित्तानेही हा प्रश्न पुढे आलेला होता. त्यावर लेन्दुप भुतिया ह्या पत्रकाराने ह्याप्रकरणावर वर शोधाशोध करून हफिन्ग्तन पोस्त मध्ये एक विस्तृत लेख लिहिला होता. त्याची लिंक खाली दिलेली आहे जरूर वाचा. त्यातले फोटो आणि चित्र ही पहा आणि स्वत: ठरवा. श्री तळपदे ह्यांनी विमान उडवण्याचा प्रयत्न केला ही स्तुत्य गोष्टच आहे पण त्यांचे प्रयत्न अजून पुढे न्यायाच्या ऐवजी तेव्हाही आणि आजही आपण पुन्हा वेद आणि आमचे प्राचीन प्रगत तंत्रज्ञान ह्याबद्दलच बोलत आहोत. असो ....
http://www.huffingtonpost.in/open-magazine/the-myth-of-the-indian-av_b_6...
मागे एकदा कुठेतरी ज्ञानेश्वरी तले विज्ञान किंवा असेच काहीतरी भन्नाट लिहिलेला लेख वाचला होता. त्यात म्हणे ज्ञानेश्वरांना ऋतुचक्र, मानसशास्त्र, ते अगदी प्रसूतिशास्त्र यांची साद्यंत माहिती कशी होती आणि त्याचे संदर्भ ज्ञानेश्वरीत कसे ठायी ठायी सापडतात याचे रसभरीत वर्णन केलेले होते. तसाच काहीसा लेख समर्थ रामदासांवर सुद्धा वाचण्यात आला.
माझा एक मित्र आहे.. त्याची बायको भांडारकर संस्थेत जुन्या संस्कृत ग्रंथांचे भाषांतर करायचे काम करते. माझी तिची नुकतीच चर्चा झाली कि बुवा हे जे वेदकाली विमान ,अंतराळ यान , ब्रह्मास्त्र म्हणजे atom bomb अशा गोष्टी होत्या असं आम्ही ऐकतो, वाचतो त्यात काही तथ्य आहे का? यावर तिने सांगितलेली माहिती उद्बोधक ठरेल.
एक तर काय असत कि जुने ग्रंथ, जुने ग्रंथ असे जे महणतात ते फार फार तर ८ व्या किंवा ९ व्या शतकातले असतात ते सुद्धा अत्यंत जीर्ण आणि तुटक. त्या आधी चे ग्रंथ असे मिळत नाहीत, शिलालेख, ताम्रपत्र मिळतात आणि ते अत्यंत महत्वाचे पण ते म्हणजे ग्रंथ नाही त्यातली माहिती त्रोटक आणि मुख्य म्हणजे फक्त मथळे(NOTICE BOARD) स्वरुपाची असते. आता यावरून प्राचीन भारतात उच्च तंत्रज्ञान होते अशी खातरजमा करता नाही आली तरी ह्या गोष्टी निखालस खोट्या आहेत असंही काही खात्रीलायकरित्या म्हणता येत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे हे ग्रंथ जरी जुने असले तरी ते अस्सल असतात असे नाही म्हणजे त्यात प्रक्षेप असतात उदा महाभारत या ग्रंथाचे घेतले तर महाभारताची जी चिकित्सक आवृत्ती आहे की जी अनेक थोर इतिहास संशोधकांनी ( सुखटणकर, कोसंबी, मिश्र वगैरे )अनेक वर्षांच्या अनंत परिश्रमांन्द्वारे सिद्ध केली आहे तिच्या मध्ये सुद्धा प्रक्षेप आहेत पण ते साधारणतः २ रया किंवा ३ रया शतकातले. म्हणजे आपण असे म्हणू शकतो कि हि महाभारताची चिकित्सक आवृत्ती आपल्याला साधारण ई स १५० च्या सुमारास प्रचलित असलेल्या महाभारतकथे कडे घेऊन जाते. आता तुम्ही विचार करा इतक्या महान इतिहास संशोधकांना इतक्या प्रचंड मेहनती नंतर जर सर्वांना माहित असलेल्या महाभारत कथेच्या त्यातल्या त्यात अस्सल प्रती पर्यंत पोहोचायला एवढा त्रास होत असेल तर आजकाल उठ सुट कोणीही लुंगासुंगा प्राचीन भारतात विमाने , अंतराळ याने, अण्वस्त्रे आणि काय काय शोधून काढतात त्यांच्या विश्वासार्हते बद्दल आपण काय बोलावे.
आता रामायणात येणारा पुष्पक विमानाचा उल्लेख घ्या, एक तर हा एक प्रक्षेप आहे. तो नंतर कुणीतरी घुसडला आहे पण चला घटकाभर पुष्पक विमान होते असे गृहीत धरले तर ते कोणत्या इंधनावर चालायचे ते इंधन कुठून मिळायचे ? ते शुद्ध कुठे आणि कसे करायचे ? जिथे बनवले तिथून विमानापर्यंत कसे आणायचे? रथातून कि गाढवावर लादून?कि आजच्या सारख्या रेल्वे गाड्या , मोटारी डांबरी सडका होत्या तेव्हा? असतील त्याचे उल्लेख कसे कुठे नाहीत? कसे असतील कुणा शहाण्या माणसाने आपल्या गोष्टीवेल्हाळ स्वभावाला अनुअसरुन एक छान गोष्ट रचून दिले घुसडून झाले, अन काय? आणि एकच विमान बनवले विमानांचा ताफा नाही? कमाल आहे
तीच गोष्ट अण्वस्त्रांची, अण्वस्त्र म्हणजे काय दिवाळीचे आपट बार आहेत का? ती अण्वस्त्र काय घोडागाडी(रथ) किंवा बैल गाडीतून तीर कामठ्याने हात दोन हात दूरवरच्या शत्रूवर मारायचे, एव्हढा मोठा अणुबॉम्ब असा टाकायचा, तर काही क्षेपणास्त्र वगैरे नाही ? कमाल आहे? अण्वस्त्र बनवायला लागणारे तंत्रज्ञान होते मग क्षेपणास्त्र बनवायचे नव्हते ते सोडा सध्या तोफा सुद्धा नव्हत्या तेव्हा.
आता मूळ मुद्दा, त्याचं असं आहे कोणी ऋषी मुनी तप:सामर्थ्याच्या जोरावर एखादे विमान किंवा तत्सम गोष्ट बनवू शकत नाही (तसच ते बनवत असतील असं कुणाच म्हणण असेल तर मग प्रश्नच मिटला)विमान सोडा एक साधा विजेचा दिवा बनवायचा म्हटला तर काय गोष्टी लागतात बघा . १) विजेचा शोध, उत्पादन आणि खात्रीशीर असा पुरवठा / वितरण करणारी यंत्रणा(नुसता दिवा पेटवायला नव्हे तर बनवायला सुद्धा) २) अत्यंत पातळ आणि स्वच्छ पारदर्शक काच बनवण्याची परिष्कृत पद्धती. ३) Tungston सारख्या धातूंचा शोध उत्पादन तसेच त्यांच्या गुणधर्माची छाननी करणारी सुसज्ज प्रयोग शाळा आणि metallurgy सारख्या शास्त्राचा पुरेसा विकास.शिवाय त्याचे अत्यंत पातळ तंतू (फिलामेंट) बनवण्याची पद्धत. ते सोडा, दिवा बनवण्याच्या निरनिराळ्या विभागात द्यायला drawings च्या असंख्य प्रती काढण्यासाठी छपाईचे तंत्र.ते लागेल कि नाही? (वेदामध्ये काचेचा उल्लेख नाही तसाच लोखंडाचा हि नाही, कोळशाचा हि नाही . वेदाइतक्याच जुन्या आणि कदाचित त्यांची जन्मभूमी असलेल्या सिंधू संस्कृतीच्या अवशेषात काच, लोखंड, कोळसे सापडत नाहीत. आपल्या पुराणांमध्ये विमानाचे विविध अस्त्रांचे उल्लेख आहेत पण तुम्ही अनेक आधुनिक विज्ञानकथाकारांच्या गोष्टी वाचल्या तर तुम्हाला त्या सुद्धा तशाच खऱ्या वाटतील पण त्या माणसाच्या कल्पनेच्या भराऱ्या आहेत, खऱ्याखुऱ्या नाही.) आणि या सगळ्या पेक्षा महत्वाच म्हणजे प्रयोजन आणि बाजारपेठ. जर साधे तेलाचे दिवे पेटत असतील तर विजेच्या दिव्याच्या साह्याने उजेड पाडायचा कशाला? एव्हढे उपद्व्याप करून विजेचे दिवे बनवून जर घ्यायला खात्रीची बाजारपेठ नसेल तर कोण हा धंदा करेल. रामायण महाभारत या चांगल्या, मनोरंजक कथा आहेत असच नाही तर तो आपला इतिहास सुद्धा आहे हे खर पण इतिहास इतिहास म्हणून शिवाजी महाराजांना भवानी माता खरोखर प्रसन्न झाली आणि भवानी तलवार दिली यावर विश्वास ठेवण वेडेपणाच नाही का? ( खरच भवानी प्रसन्न झाली असती तर तिला महाराजांना एखादी AK47 द्यायला काय हरकत होती? भवानी मातेला काय अशक्य आहे?)
एक नीट समजून घ्या, तंत्रज्ञानाचा विकास आणि समाजात सर्वदूर त्याचा प्रसार सरंजामशाही कधीच करत नाही. त्यांना सर्वसामान्य लोकांना गुलाम करण्यासाठी त्यांना अज्ञानात आणि मागास ठेवण भाग असतं. भांडवलशाही जरी सरंजामशाहीशी हातमिळवणी करून मजूर गुलाम वर्गाला सुरुवातीला वेठीला धरते, त्यांचे शोषण करते असे दिसले तरी त्यांच्या स्वतःच्या फायद्या साठी तरी त्यांना एका मर्यादे नंतर लोकांचे राहणी मान उंचावण्यासाठी/ त्यांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी अनिर्बंध शोषणाला आळा घालावा लागतो. लोकांची क्रयशक्ती अचानक घटली तर कसा हाहाकार उडतो ते मी काय वेगळ सांगायला हवं का ? समजा एक शाम्पू विकत घ्यायची लोकांची ऐपत नसेल तर कुणी धंदा करावा कसा? आणि खायची प्यायची भ्रांत असलेला गरीब गुलाम माणूस शाम्पू का विकत घेईल? त्याची, त्याच्या बायकोची चार लोकात उठ बस आणि किमान प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता असेल तर तो हा खर्च करून स्वतःला/ स्वतःच्या बायकोला सुंदर दाखवायचा प्रयत्न करेल.त्याची दोन वेळची खायची प्यायची सोय झाली तर तो पुढे पुढे काही जास्त खरेदी करू लागेल आणि उद्योग धंद्या शिवाय हे शक्य आहे का? सरंजामशाहीत मोठ मोठे शोध लागून त्याची उपयुक्तता पटल्यावर सरंजामशाही सरकार त्यांना स्वीकारते आधी संशोधकांना पदरमोड करून शोध लावावे लागतात. भांडवलशाहीत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कमी खर्चात जास्त उत्पादन करण्यासाठी संशोधकांना उद्योग प्रोत्साहन देतात. आपले वेद , रामायण, महाभारत, हे सरंजामशाही समाजव्यवस्था दाखवतातच पण तेव्हा उद्योग आणि औद्योगीकरण हा प्रकारच नव्हता.तो काळ एकवेळ, सोडा आपल्या पेशवाईच्या शेवटी शेवटी म्हणजे १९व्या शतकाच्या सुरुवातीला सुद्धा आपल्याकडे छापील नकाशे बनवायचे तंत्र , होकायंत्र , दुर्बिणी नव्हत्या आपण त्या इंग्रज, पोर्तुगीजांकडून विकत घ्यायचो. साधे शेतातले नगराचे फाळ लोखंडी करायाल २० वे शतक उजाडावे लागले. अन सुरुवातीला लोकांनी आगगाडी मध्ये बसावे म्हणून ब्रिटीश सरकार पैसे देत असे. आपल्याकडे औद्योगीकरण सुरु झालं तेच मुळी १९ व्या शतकाच्या शेवटी आणि ते सुद्धा जुजबी.
तेव्हा आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान असावा पण असं उगाच कुणी सुबुद्ध माणूस टर उडवेल असे काही करू नये त्याने या वारशाचाच अपमान होतो. असं नाही वाटत तुम्हाला .
हा प्रश्न नास्तिक, आस्तिक, पुरोगामी, मूलतत्ववादी असा नाही. साधा बुद्धी आणि तर्काचा आहे.
आदित्य---
प्रतिक्रिया
कोरडे
प्राचीन शास्त्रांचा भुभुत्कार करणाऱ्यांना सुनावलेच पाहिजे. पण हे 'कोरडे' तुम्ही चुकीच्या जागी ओढताय, असे वाटते. इथे सगळे कधीच, पुराणकथांच्या नांवे आंघोळी करुन 'कोरडे' झालेत.
हे पहा
'ऐसी'मधीलच 'समरांगणसूत्रधार ग्रन्थातील यन्त्रविधान आणि विमानविद्या' हा धागा पाहावा.
शिवाजीमहाराजांचे जाऊ द्या, पण...
शिवाजीमहाराजांचे माहीत नाही, परंतु ज्ञानेश्वरांनी भिंत चालविली हे मात्र खरे असावे. कारण मागे एकदा आम्हीसुद्धा भिंत चालविली होती, प्रात्यक्षिक म्हणून. आणि ही टेक्नॉलॉजी आमच्या कल्पनेप्रमाणे किमान ज्ञानेश्वरांच्याइतक्या जुन्या काळात उपलब्ध असावयास हरकत नसावी. (कदाचित पाणिनीच्या काळातलीही असू शकेल.)
एका शिवभक्ताला शिवाजी महाराजांचे उदाहरण दिलेले आवडले नव्हते ....
मागे हा लेख फेस बुकावर टाकला होता त्यात एका शिवभक्ताला शिवाजी महाराजांचे उदाहरण दिलेले आवडले नव्हते .... प्रत्यक्ष भेटून माझे शंका निरसन (!) करण्याचा मनोदय व्यक्त केला होता त्यांनी ...तुमची प्रतिक्रिया पाहून(मथळा) आधी तसेच काहीसे वाटले नंतर पूर्ण प्रतिक्रिया वाचून जरा जीव भांड्यात पडला...
आदित्य
ड्रोन
अहो, ते मरुत्सखा हे ड्रोन होतं. आता अमेरिका आणि द. कोरीयात त्याचा बोलबाला झाल्यावर तुम्हाला त्याचं महत्त्व समजतंय, एवढंच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.