तुम्ही जात मानता का?: विश्लेषण
याआधी: तुम्ही जात मानता का?: सर्वेक्षण
'जात मानणे' या वाक्प्रयोगाला व्यापक अर्थ आहे. मानवी व्यवहार आणि त्याची जात याची सांगड तुम्ही घालता का? आयुष्यातील विविध प्रसंगी तुमच्या आयुष्यात जातीचे स्थान काय आणि किती आहे? वगैरे विविध पैलू या विषयाला आहेत. यावर विविध माध्यमांतून विविध मते मांडली जातात. मात्र तुमच्या-माझ्यासारख्यांच्या प्रत्यक्ष दुनियेत 'जात' हे एक सत्य आहे. या सत्याने आपल्या आयुष्यात किती प्रभाव टाकला आहे हे पाहण्यासाठी हे सर्वेक्षण.
हे सर्वेक्षण परिपूर्ण आहे, सर्वार्थाने व्यापक आहे वगैरे दाबा अजिबात नाही. या सर्वेक्षणात भाग घेणेही ऐच्छिक असल्याने सर्व विचारांचे, विभागांचे यात प्रतिबिंब पडले असण्याची शक्यताही कमी आहे. हे जालावर होणार्या विविध सर्वेक्षण / पोल्स सारखेच एक असल्याने त्या माध्यमाचे फायदे आणि सीमा दोन्ही याही सर्वेक्षणाला लागू आहेत.
ज्या व्यवहारात जातींच्या आधारावर निर्णय घेतले जाताना दिसतात त्यांची बेटी व्यवहार (अर्थात लग्नसंबंध जोडणे), रोटी व्यवहार (शिवाशीव, अन्न, मुलांची देखभाल वगैरे) आणि दैनंदिन वागणूक अशी तीन भागात विभागणी करता येईल.
बेटी व्यवहार
या सर्वेक्षणाचे बेटीव्यवहारासंबंधी काय निष्कर्ष निघाले ते बघण्याआधी प्रत्यक्षात भारतात अश्या प्रकारच्या सर्वेक्षणातून काय निष्कर्ष आले आहेत ते बघूया.
भारतात २०१० मध्ये प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासात काय दिसले ते बघा:१
भारतात ८९.०४% लग्ने ही सजातीय असतात. आंतरजातीय लग्नांमध्ये मुलाची अथवा मुलीची जात उतरंडीवर खालच्या जातीची असण्याचे प्रमाण साधारण समसमान आहे. अपेक्षेप्रमाणे पश्चिम भारतात आंतरजातीय लग्नांचे प्रमाण सर्वाधिक(१६.७५% ) असून पूर्व भारतात हे प्रमाण सर्वात कमी (९.०४% ) आहे. उत्तर, दक्षिण आणि मध्य भारतात हे प्रमाण १०% च्या आसपास असून पूर्वोत्तर राज्यांत १०.८% आहे.
गोवा राज्यात सर्वाधिक आंतरजातीय लग्ने होतात (२०.६९% ) तर मिझोराममध्ये आंतरजातीय लग्ने अजिबात होत नाहीत
आंतरजातीय लग्नाचा आणि वयाचा किंवा शहरी/ग्रामीण भागांचा फारसा संबंध लावता येऊ नये. सर्व वयोगटात आणि शहरी भागातही साधारण सारख्याच प्रमाणात आंतरजातीय लग्ने होतात. गंमत अशी की अधिक शिक्षण असलेल्या व्यक्तींमध्ये आंतरजातीय लग्ने कमी आढळतात. (हे बहुदा ठराविक जातींमध्ये शिक्षण केंद्रित असल्याने असावे). धर्माच्या पट्टीवर वर्गीकरण केले तर हिंदूंमध्ये आंतरजातीय लग्ने (१०.६१% ) मुसलमानांपेक्षा कमी होतात (१४.०९% ). अजून एक रोचक माहिती अशी 'मास मिडिया' शी संपर्क अधिक असणार्या व्यक्तींमध्ये आंतरजातीय लग्नांचे प्रमाण तुलनेने अधिक दिसते आहे.
ऐसी-मिपा वरील सर्वेक्षण
बेटी व्यवहाराबद्दलचे निष्कर्ष देण्यापूर्वी कोणी उत्तरे दिली आहेत याचा अंदाज घेऊ.
वर दाखवल्याप्रमाणे या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ६८% आयडीमागील व्यक्ती या विवाहित होत्या तर ३२% अविवाहित होते. तर विवाहित व्यक्तींपैकी २९% व्यक्तींनी आंतरजातीय विवाह केला आहे तर ७१% व्यक्तींनी सजातीय व्यक्तीशी विवाह केला आहे. अर्थातच हे प्रमाण राष्ट्रीय पातळीवरील विदा बघता बरेच पुरोगामी आहे ;). मात्र यातून असे म्हणता येईल की या सर्वेक्षणात सहभागी झालेला 'सँपल बेस' हा पुरेसा व्यापक आणि/किंवा पुरेशा संख्येत नव्हता.
असो. आता लग्नाळू व्यक्तींचा विचार करूया. इथे लग्न झाले नसल्यास त्या व्यक्तीस लग्नाळू असे धरले आहे (म्हणजे लग्नाची इच्छा नसल्यास प्रतिसादकाला समजा लग्न करायचे आहे असे समजून उत्तर द्यायला सांगितले होते). अशा अविवाहित व्यक्तींना लागू असणार्या प्रश्नांचा हा निष्कर्ष आहे:
आंतरजातीय लग्नांना अनुकूल असणार्यांच्या गटातील काही असे लग्न करायच्या विचाराने इतके प्रेरित असतात का - की सजातीय का विजातीय जोडीदार असा प्रश्न आल्यास विजातीय जोडीदारास प्राधान्य देतील? या प्रश्नाला माझ्या अपेक्षेपेक्षा अधिक व्यक्तींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ३०% अविवाहित व्यक्ती जर स्वतःला एकट्याला निर्णय घ्यायची मुभा असेल तर विजातीय जोडीदारास प्राधान्य देतील. दुसरीकडे अरेन्ज्ड मॅरेज करताना आंतरजातीय जोडीदार बघणे काय विचार करणेही एकेकाळी दुरापास्त होते तिथे ऐसी-मिपावरील प्रतिसादक अविवाहित व्यक्तींपैकी ७०% व्यक्ती आंतरजातीय जोडीदाराचा विचार करण्यास तयार आहेत. त्याहून रोचक निष्कर्ष असा निघतो की जरी कुटुंबाने मिळून एकत्र निर्णय घ्यायची वेळ असेल तरीही ऐसी-मिपावरील प्रतिसादक अविवाहित व्यक्तींच्या कुटुंबांपैकी ६०% कुटुंबात जातीबाहेरच्या जोडीदाराचा विचार केला जाऊ शकतो.
दुसरीकडे जे अविवाहित किंवा त्यांचे कुटुंबीय जातीबाहेर लग्नाला तयार नाहीत त्यांच्यामध्ये त्यामागे सामाजिक दबाव नसून रोजच्या व्यवहारातील सवयी, खाण्याच्या सवयी वगैरे आहेत. यातून अनेकदा दिसणार्या एका समजावरही शिक्कामोर्तब होते की व्यक्तींच्या काही सवयी, अन्न, रोजची वागणूक याला त्या व्यक्तीच्या जातीशी अजूनही जोडले जाते. जरी प्रत्यक्षात यातील बहुतांश गोष्टी त्या व्यक्तीची जडणघडण कोणत्या प्रदेशात झाली, आर्थिक स्तर, शिक्षण वगैरेशी निगडित असतात, तरी आपल्याकडे त्याला जातीशी जोडले जाते. हा निष्कर्ष तिसर्या सेगमेन्टमधील प्रश्नात अधिक ठळकपणे अधोरेखीत झाला आहे.
आता स्वतःच्या लग्नाचा विचार करताना (किंवा जेव्हा केला तेव्हा) जातींचा विचार झाला असेल, नसेल किंवा करावा लागला असेल, मात्र ही जातींची बंधने आपल्या पुढील पिढीकडे सुपूर्त करण्याचा कल जाणून घेण्यासाठी काही विचारलेल्या प्रश्नातून असे चित्र दिसून आले:
सध्या जे विवाहित आहेत त्यापैकी तब्बल ८१% व्यक्ती आपल्या अपत्यांचा विवाह जातीबाहेर लावून देण्यास आनंदाने तयार आहेत आणि बाकीचेही नाखुशीने किंवा स्वतः सहभागी न होता का होईना लग्नास तयार आहेत, अन् सर्वेक्षणात सहभागी ऐसी-मिपावरील अशा एकाही विवाहिताने जातीबाहेर लग्नाला संमती न देण्यास विरोध केलेला नाही. इथेही SC/ST समाजाला मिळणार्या वेगळ्या वागणुकीची झलक दिसते आणि ७६% व्यक्ती त्यांच्याशी लग्न लावण्यास तयार आहेत तर ५% व्यक्ती मात्र अश्या लग्नाच्या विरोधात आहेत.
सदर निष्कर्ष अविवाहित व्यक्तींच्यात घेतले तर मात्र वेगळे चित्र दिसून येते. इथे केवळ ५०% व्यक्ती आनंदाने जातीबाहेर करून द्यायला तयार आहेत तर १०% व्यक्ती अश्या लग्नाच्या विरुद्ध आहेत. त्यातही सर्वेक्षणात भाग घेतलेल्या ऐसी-मिपावरील ३०% व्यक्तींना अपत्याने SC/ST जोडीदारांशी लग्न करणे मंजूर नाही. आता या निष्कर्षावरून भविष्यात जातिभेद वाढेल असे भाकीत करणे हास्यास्पद ठरेल तरी स्वतःचे लग्न झाल्यानंतर अनेक बाबतीत व्यक्ती अधिक समंजस होते असे म्हणता येईल का?
मिळालेला विदा वापरून अजून एक रोचक निष्कर्ष असा आहे:
स्वतः सजातीय विवाह करूनही आंतरजातीय विवाहास अनुकूल असणार्यांचे प्रमाण एकूण संख्येच्या ६२% आहे, शिवाय स्वतः आंतरजातीय विवाह करून अपत्यांसही हरकत नसणारे एकूण संख्येच्या २४% आहेत. मात्र अशाही व्यक्ती आहेत ज्यांनी स्वतः जाती बाहेर लग्न केले आहे मात्र अपत्यांनी तसे करू नये असे वाटते आणि स्वतः सजातीय लग्न करून अपत्यांनीही तेच करावे असे वाटणारेही ९% व्यक्ती आहेत.
रोटी व्यवहार
या प्रकारचे व्यवहार अधिक खाजगी पातळी वर चालत असल्याने याबद्दल बराच कमी विदा उपलब्ध आहे.५ मला आंतरजातीय लग्नांसारखा व्यापक प्रमाणावर सर्वेक्षण करून विदा मिळवण्याचे प्रयत्न जालावर शोधून मिळाले नाहीत. मात्र समाजात रोटी व्यवहारातही जातिभेद पाळला जातो याचे ठळक उदाहरण आहे 'मिड-डे मिल" या योजनेत दिसून आलेला जातिभेद. भारतातील अनेक राज्यांत या योजनेची अंमलबजावणी करतेवेळी ठराविक जातीच्या व्यक्तींना सापत्न वागणूक दिली जात असल्याचे समोर आले होते. त्यावर बरीच राजकीय चर्चा झाली परंतू हा प्रकार अजूनही बर्याच गावांतून दिसतो असे सांगणारे रिपोर्ट्स प्रकाशित होत असतात.
शाळांमध्ये जर अधिक SC/ST शिक्षक ठेवले तर तिथे येणार्या श्रीमंत विद्यार्थ्यांच्यात घट होते हा शाळाचालकांचा लाडका समज आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार ४८.५% शिक्षकांची आणि प्रोफेसरांची राखीव पदे २०१०-११ मध्ये रिकामीच राहिली आहेत२, याला "पात्र" शिक्षक उपलब्ध नाहीत असे कारण जरी दिले जात असले तरी अश्या प्रकारच्या नोकर्यांसाठी पात्र तरीही बेकार व्यक्तींची संख्या लक्षणीय आहे. तामिळनाडूमध्ये दुपारचे जेवण बनविण्याचे काम हलक्या जातीच्या व्यक्तीला दिल्याचे कळल्यावर अनेक पालकांनी मुलांच्या शाळा बदलल्याची बातमी वाचली असेलच, त्याहून धक्कादायक असे की तेथील 'ब्लॉक डेवलपमेन्ट ऑफिसर'ने त्या व्यक्तींची बदली केली.
तेव्हा या पार्श्वभूमीवर अश्या प्रकारची मते ऐसी-मिपावर फारशी मिळाली नाहीत. असो. इथल्या सहभागी सदस्यांनी दिलेल्या मतांचे विश्लेषण बघूया..
ऐसी-मिपा वरील सर्वेक्षण
इथे सहभागी झालेल्या सदस्यांपैकी जेवण बनविणार्या व्यक्तीची जात ८०% व्यक्ती बघत नाहीत तर १०% व्यक्ती धर्म बघतात. याच्या कारणांचे विश्लेषण केले तर जेवणातून जेवण बनविणार्याचे विचार/आसक्ती वगैरे झिरपतात असा समज ३३% प्रतिसादक बाळगतात तर १७% व्यक्तींच्या कुटुंबीयांतील काहींचा अजूनही या समजावर विश्वास असल्याने जात बघणे आवश्यक ठरते. स्वतःला फारसे जातीचे नसले तोच वारसा आपल्या अपत्याला देताना मात्र या प्रमाणात अधिक घट होते. अपत्याला जी व्यक्ती सांभाळणार आहे (प्रसंगी काही शिकवणार आहे) त्या व्यक्तीची जात किंवा किमान धर्म ३६% प्रतिसादकांना बघणे आवश्यक वाटते. व त्याचे कारण जातीय/धार्मिक संस्कारांशी आहे. इथे हे नमूद करावे लागेल की बहुतांश व्यक्तींनी एका ठराविक धर्माला विरोध दर्शवला आहे. याचा अर्थ सर्वेक्षणात सहभागी झालेला 'सँपल बेस' हा पुरेसा व्यापक आणि/किंवा पुरेशा संख्येत नव्हता हे पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून येते. त्याचवेळी हॉटेलात जाताना मात्र जवळजवळ ९०% लोक जातीचा विचार करत नाहीत.
इतर व्यवहार
इतर व्यवहारांचा उहापोह करायचा तर अनेक विषयांना स्पर्श करावा लागेल. या सर्वेक्षणासाठी जरी मोजकेच प्रश्न होते तरी जालावर भारतातील जातिभेदावर माहिती शोधली असता विविध क्षेत्रात जातिभेद प्रकर्षाने दिसतो. खाजगी क्षेत्रात जातिभेद नसतो असा एक गोड समज बाळगलेले अनेक जण असतील. मात्र विविध भारतीय आणि अमेरिकन युनिव्हर्सिटीजने केलेल्या शास्त्रशुद्ध सर्वेक्षणांतून प्रत्यक्ष स्थिती वेगळी दिसून आली आहे. उदाहरणादाखल Paul Attewell and Sukhdeo Thorat यांनी एका अमेरिकन युनिव्हर्सिटीसाठी जो अभ्यास केला३ त्यात त्यांनी एक प्रयोग केला. मुंबई, पुणे, बंगळूर, हैदराबाद, दिल्ली, नॉयडा आदी महानगरात एकसारख्याच पात्रतेचे, सारख्या प्रकारच्या कव्हर लेटरची विविध अॅप्लिकेशन्स पाठवली. प्रत्येक अॅप्लिकेशन्सवर फक्त नाव वेगळे होते. गुणात्मक रित्या किंवा लेखी कम्युनिकेशन मध्ये कोणताही रेझ्युमे कमी किंवा अधिक प्रतीचा नव्हता. मात्र असे दिसून आले की दलित व्यक्तींची आडनावे असणार्या व्यक्तींना सवर्ण आडनाव असणार्या व्यक्तींपेक्षा ३३% कमी कॉल आले. इतकेच नव्हे तर अल्पसंख्य धर्मातील व्यक्तींना बहुसंख्यांपेक्षा येणार्या कॉलेचे प्रमाण ६६% ने कमी होते.
अर्थातच याचा परिणाम राजकीयही असतो. आपल्या राजकीय पक्षांचे मनात खोलवर एका जातीचा पक्ष असे झालेले विभाजन एका युनिव्हर्सिटीच्या अभ्यासातून प्रकटला४. उत्तर प्रदेशात "तुमच्या जातीचा पक्ष कोणता?" या प्रश्नावर बसपा आणि सपा मध्ये सरळ विभाजन दिसून आले. (जितक्या बहुसंख्यांना भाजप हा आपला पक्ष वाटत होता त्याच्या कित्येक पट अल्पसंख्याकांना तो बहुसंख्यांचा पक्ष वाटत होता )
असो. थोडक्यात या जातीच्या गणितांनी अनेक क्षेत्रात आपले बस्तान कैक वर्षांपासून बसवले आहे. आता ऐसी-मिपावरील कल पाहू
ऐसी-मिपा वरील सर्वेक्षण
९७% प्रतिसादक भांडण झाले तरीही जातीवाचक शिव्या देत नाहीत तर उर्वरित ३%ही अगदी क्वचित जातीवाचक अपशब्द उच्चारतात. मात्र काही मोजक्या प्रतिसादकांनी हे आवर्जून सांगितले की ते भारतीय कठोर अॅट्रॉसिटी कायद्यामुळे अश्या शिव्या देण्यापासून स्वतःला रोखतात. मात्र अपेक्षेप्रमाणे (आणि आधीच्या प्रश्नात बघितल्या प्रमाणे) जवळजवळ ५५% व्यक्ती रोजच्या सवयींचा संबंध जातीशी जोडतात.जातींचा आणि आर्थिक व शैक्षणिक पातळीचा काही प्रमाणात तरी संबंध असतो असे जवळजवळ ८३% लोकांना वाटते. तर ५८% व्यक्तींना हेही पटते की जातींमुळे काही व्यक्तींना नोकरी/शिक्षण/बढतीपासून वंचित राहावे लागते.
या सर्वेक्षणानंतर माझी वैयक्तिक मते मुक्त चिंतन स्वरूपात लिहायची ठरवली होती पण विस्तारभयाने इथे थांबतो. समारोपाच्या प्रतिसादात आणि या निमित्ताने होणार्या चर्चेत माझी मते, काही अधिकचा विदा देत जाईनच. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सदस्यांचे आणि वेळोवेळी याचे विश्लेषण वेळेत करण्याबद्दल व्यनीतून प्रोत्साहन देणार्या मित्रांचे अनेक अभार
संदर्भः
१. http://epc2010.princeton.edu/papers/100157
२. http://www.thehindu.com/opinion/editorial/article3606836.ece
३. http://blogs.wsj.com/indiarealtime/2011/07/12/india-journal-combatting-c...
४. http://economics.ucsc.edu/news-events/downloads/caste.politics.2.22.12.pdf
५. http://articles.timesofindia.indiatimes.com/2010-01-11/india/28137114_1_...
प्रतिसादकांची जात?
प्रतिसादक परंपरेत सवर्ण मानल्या गेलेल्या जातींतले होते अथवा नव्हते अशा दोन भागांत, किंवा उच्चशिक्षित होते अथवा नव्हते अशा दोन भागांत जर हे विश्लेषण विभागलं तर आकडेवारीत काही फरक पडेल का, असा प्रश्न पडला. म्हणजे जन्मताना जी जात होती तिचा, किंवा किती शिक्षण मिळालं त्याचा ह्या समूहाच्या प्रतिसादांशी काही संबंध लावता येतो का, हे तपासता आलं असतं. बाकी विश्लेषण रोचक आहे. धन्यवाद!
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
आजचा सुधारकची आठवण
यावरुन आजचा सुधारक ची आठवण झाली. जात-आरक्षण या चर्चेत त्याचा उल्लेख आहे. http://mr.upakram.org/node/1208#comment-20002
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
रोचक
सर्वेक्षण आणि विश्लेषण रोचक वाटले. टक्केवारीबरोबरच सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांची एकूण संख्या दिल्यास ते सर्वेक्षणाबाबत काहीएक मत बनवण्यास पूरक ठरेल असे वाटते.
+१
मलाही सहभाग्यांची संख्या चटकन सापडली नाही.
होय एकूण आकडा देण्याचे
होय एकूण आकडा देण्याचे राहिले. एकूण ४० सहभागी सदस्य होते मात्र प्रत्येकाने प्रत्येक प्रश्नाची उत्तरे न दिल्याने प्रत्येक प्रश्नासाठी तितकेच प्रतिसादक असतील असे नाहि
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
छान. इतका सगळा विदा गोळा करून
छान. इतका सगळा विदा गोळा करून तो नेटक्या स्वरूपात मांडल्याबद्दल ऋषिकेशचं अभिनंदन.
या विद्याबाबतच्या मर्यादा नोंदवलेल्या आहेतच. त्या मर्यादांतच काही निष्कर्ष काढता येतात.
१. (ज्यांच्याकडून विदा गोळा केला आहे त्यातले) सुमारे २/३ (किंवा किंचित जास्त) लोक परजातीत विवाह करण्याचा विचार करतात. आणि त्यातले सुमारे निम्मे (किंचित कमी) लोक खरोखरच करतात.
२. लग्न झालेल्यांपैकी सुमारे ३/४ लोक आपल्या अपत्यासाठी आंतरजातीय विवाहाचा विचार करतात. यात २९% स्वतः आंतरजातीय विवाह करणारे गृहित धरले, तर उरलेल्या ७१ पैकी ३६ म्हणजे पुन्हा सुमारे निम्मे लोक तयार आहेत.
ही आकडेवारी मला खूपच आशादायक वाटते. हेच सर्वेक्षण शंभर वर्षांपूर्वी घेतलं असतं तर हे आकडे खूपच लहान दिसले असते अशी खात्री वाटते.
छान. इतका सगळा विदा गोळा करून
छान. इतका सगळा विदा गोळा करून तो नेटक्या स्वरूपात मांडल्याबद्दल ऋषिकेशचं अभिनंदन. -- +१
उत्तरांसाठी रेडीओ बटन्स वापरुन, अनामिक सर्वेक्षण केल्यास जास्त जणांनी सहभाग घेतला असता आणि विश्लेषण वेगळे आले असते असे वाटते.
आणि अनामिक सर्वेक्षण असल्याने चिँजं म्हणतायत त्याप्रमाणे प्रतिसादकाची जात/ओपन/रिझर्वड् इ देखील विचारता आले असते.
+१
ऋ, एवढे कष्ट घेऊन, माहिती मिळवून तिचं अनालिसीस दिल्याबद्दल अभिनंदन आणि आभारही.
सहमत आहे. यासाठी कौलांचा धागा वापरता आला तर बरं होईल. अनेक बहुपर्यायी प्रश्न एकाच धाग्यात घालता आले तर त्याचा फायदा होईल.
दिवाळी अंकात अशा प्रकारच्या सर्व्हेवर लेख लिहीणारे ऐसी सदस्य सर्किट यांच्याकडूनही काही मदत मिळेल का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
समरायझिंग उत्तम केलेले आहे.
समरायझिंग उत्तम केलेले आहे. रोचक निष्कर्ष.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
रोचक!
रोचक माहिती.
जात कितीही मानायची नाही असं ठरवलं तरी आम्हा डॉक्टराना पॉलिटिशियनप्रमाणे जातीशी फार देणं घेणं असतं. किमान इथे खेड्यात तरी.
समोरचा पेशंट आपल्याकडे परत फॉलो अपला येईल का, अॅडमिट केले तर अॅडमिट होईल का, झाल्यास नातेवाईक त्रास देतील का, पेशंट बरा झाल्यास उत्तमच पण बिघडल्यास कोणते राजकारणी येतील आणि ते काँप्लिकेशन हाताळायला आपल्यासाइडने कुणाला बोलवायचं हे सगळं आमच्याकडे जातीवर अवलंबून!
काही जातींत काही स्पेसिफिक आजार, काही जातींचे स्पेसिफिक आचार, ठराविक जातीच्या ठराविक श्रद्धा / अंधश्रद्धा या आमच्या ट्रीटमेंट आणि आउटकमवर अफेक्ट करतातच.
बाकी वैयक्तिक आयुष्यात रोटी, बेटी व्यवहार आणि आर्थिक पार्टनरशिपही वेगवेगळ्या जातींच्या लोकांबरोबर आहे. मैत्री करताना जातीचा विचारही मनात येत नाही.
सहमत
काही विश्लेषण व काही अनुमाने काढण्यासाठी असा विचार करावा लागतो. खेड्यामध्ये जनमानसातील नाळ जपण्यासाठी श्रद्धा अंधश्रद्दा याचा विचार करावा लागतो. खेड्यात भगत व डॉक्टर यांच्यात एक अलिखित करार असतो. शारिरिक दुखण्यासाठी भगत डॉक्टर ला रेफर करतो व 'बाहेरचे' असेल तर डॉक्टर अप्रत्यक्षपणे भगताला रेफर करतो.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
शारिरिक दुखण्यासाठी भगत
हे फार चांगलं आहे..
पण
हे फार म्हणजे फार भयानक आहे. भगताच्या शहाणपणाइतकंच अनपेक्षित आणि उलट दिशेने धक्कादायक हे सुशिक्षित डॉक्टरचं बेजबाबदार वागणं आहे.
आमचा लाडका सायकिअॅट्रिस्ट मित्र
भगत बनून समोर कॉलेजात विकत घेतलेल्या बोनसेटमधील कवटी अन हाडं मांडून बसलेला आहे. कोंबडीचा नैवेद्य अन तीर्थासाठी देशीची बाटली मागतोय असे चित्र डोळ्यासमोर तरळून गेले.
ऑन सिरियस नोट,
समुपदेशनासाठी आज तुटपुंज्या संख्येत उपलब्ध असलेल्या मानसोपचारतज्ज्ञांकडे वेळ नाही. मनोरुग्णच इतके जास्त आहेत, की नुसत्या मानसिक तणावास नुसते बोलूनच बरे करण्यासाठी 'तो' डॉकटर पुरेसा नाही. याशिवाय येड्याच्या डाक्टरकडे धाडू नका, असला टॅबू जनमानसात आहे तो वेगळाच.
बहुतेकदा, अमुक डॉ. कडे गेल्यावर त्यांच्या बोलण्यानेच अर्धा आजार पळतो, या वाक्यापाठीमागे त्या डॉ.चे समुपदेशन कौशल्य दडलेले असते. उदा. शाळेत जाताना पोट वा डोके दुखते म्हणून तक्रार करणार्या ४थीतल्या मुलाचे त्याच्याच रिक्षात बसणार्या 'बुली'शी बिनसल्याने ते दुखत असते. हे डॉक्टरने ओळखून योग्य मार्गदर्शन केले तर तो 'बाहेरचा' आजार आपोआप किंवा पालकांच्या थोड्या हस्तक्षेपाने बरा होतो.
भगताकडे अप्रत्यक्ष रिफर करणे यात अनेकदा हा अशा अप्रत्यक्ष समुपदेशनाचा भाग येऊ शकतो. जस्ट अ पॉसिबिलिटी.
रच्याकने.
परवाच एक इंजिनियर 'शेजारी' भेटले. दारू पिऊन लिव्हर खराब झाले आहे. आजकाल घरीच असतात. माझा चष्मा सुटला म्हणे. मी म्हटलं मोतीबिंदू यायची सुरुवात असेल. म्हटले नाही नाही, आजकाल माझ्या अंगात देवी येऊ लागली आहे. तेव्हापासून मला फार शारिरिक ताकत यायला लागली आहे.
त्यांच्या डोळ्यातली काविळीची झाक मला स्पष्ट दिसत होती. पण कोणत्याही कारणाने म्हणा याला मानसिक उभारी येत असेल, तर कशाला उगा ती मोडा? हा विचार करून मी गप्प राहीलो. अन विषय बदलला.
यांची ट्रीटमेंट करणारे सगळे डॉक्टर माझे मित्र आहेत, (त्यात मीही आहे) अन सगळी मेडीकल हिस्टरी मला ठाऊक आहे. असो. यांच्या अशा 'बाहेरच्या' वागण्याचे काय करावे? शुड आय ब्रेक हिज डिल्युजन?
ता.क. - आय विल ब्रेक द डिल्युजन, इफ - जर, त्यांनी त्या देवी अंगात येण्याचे जाहिर अवडंबर माजवणे सुरू केले. सध्या तरी साहेबांना घरातच देवी अंगात येत आहे.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
सुंदर विश्लेषण
ऋ,
सर्वप्रथम एवढी मेहनत घेऊन सर्व माहिती गोळा केल्याबद्दल आणि त्याचे व्यवस्थित विश्लेषण करुन वाचकांसमोर ठेवल्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद, अभिनंदन आणि कौतुकही. ही सर्व माहिती गोळा करुन त्याचे व्यवस्थित पृथःक्करण करणे हे एक तर संयमाने व वेळ देऊन करण्याचे काम आहे. आणि तू ते अगदी व्यवस्थित केले आहेस म्हणून हे कौतुक.
यापुढेही तुझ्याकडून अशा उपक्रमांची अपेक्षा करतो. सर्व विश्लेषणावर चिंतन चालू आहे
कष्टाचे काम
सर्व ४० संदेशांमधून सामग्री गोळा करणे म्हणजे कष्टाचे काम.
ते उत्तम प्रकारे सादर केल्याबाबत अभिनंदन!
+१
अगदी असेच म्हणतो.
+१
+१
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
+१
असेच म्हणतो
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
सगळ्यांचे कौतुकाबद्दल आभार
सगळ्यांचे कौतुकाबद्दल आभार
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
.
.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
So.... How many non-brahmins
So.... How many non-brahmins are currently, daily active on aisi?
हॅ हॅ
I am also there (and active).
I am also there (and active).
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
तुम्ही जात मानता का? नाही पण
तुम्ही जात मानता का?
नाही पण मी जात बदलतो... कुणी जात विचारली कि डोक्यात जे पहील्यांदा आलं ती जात मी सांगतो... भंगी,गारुडी,भिल्ल(फेवरेट आहे माझी), पारधी, ब्राम्हण,मराठा( मला मराठा हि जातच वाटत नाही तरीही) कधी कधी आई फासे पारधी व बाप भिल्ल हे फेवरेट कॉम्बीनेशन सांगतो...... बरेचदा चर्चेचे संदर्भ बदलतात... जाम मज्जा येते ...
रोटी-बेटी
सर्वेक्षण अभ्यासु आहे.
'रोटी-बेटी' या शब्दप्रयोगाविषयीच पहिल्यापासून माझ्या मनांत एक अढी आहे. मुलींना एका वस्तुच्या बरोबरीने व्यवहाराच्या पातळीवर आणले आहे, असे वाटते. 'ट ला ट' जुळवण्याच्या प्रयत्नांत, ज्या व्यक्तिला स्त्रियांबद्दल आदर नाही, अशा कोणीतरी हा वाकप्रचार रुजवला असावा, असे वाटते.
तुम्ही "पराठा-बेटा" असे
तुम्ही "पराठा-बेटा" असे वापरा.
ज्या व्यक्तिला स्त्रियांबद्दल
असेल. पण ती व्यक्ति एक आदिमानव असेल.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
आदिमानव असले की सर्व गुन्हे
आदिमानव असले की सर्व गुन्हे माफ असतात.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बेटी एक्सचेंज आदिमानवाच्या
बेटी एक्सचेंज आदिमानवाच्या काळापासून आहे. (आजही बोनोबोंत आहे.)
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मग काय करू?
मग काय करू?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मी जात, धर्म, देश, लिंग, वंश,
मी जात, धर्म, देश, लिंग, वंश, वर्ग, स्थानिक, आर्थिक, राजनैतिक, इ इ अशी कोणतीच अस्मिता पाळत नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
उदगीर, ब्रिगेड, हिंदी भाषा
उदगीर, ब्रिगेड, हिंदी भाषा आणि एकूणच जितक्या अडाणी प्रथा असतील त्या सर्वांची वकिली (प्रथा जितकी जास्त अडाणी तितके समर्थन जास्त) करणारांनी असं बोलावं हे बाकी रोचक आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मला बौद्धिक अस्मिता देखील
मला बौद्धिक अस्मिता देखील नाही असं लिहायला विसरलो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
आहे ना. गणिताची गरज नाही असे
आहे ना. गणिताची गरज नाही असे म्हणणे ही एक प्रकारची बौद्धिक अस्मिताच आहे. मोठी काठी द्या मग उपग्रह सोडतो म्हणणार्यांची बौद्धिक अस्मिता असतेच. सर्व शास्त्रे यूसलेस, नवा जमाना यूसलेस, जुने आणि अडाणी तेवढे भारी ही एक प्रकारची अस्मिताच आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
होय
मी मानतो. मला व्यक्तिशः काही फरक पडत नाही, पण प्राधान्य नक्की देतो. सर्वप्रथम पारशी आणि कोकणस्थ चित्पावन यांना, मग ब्राह्मण व्यक्तीला, मग मराठी, मग भारतीय यांना. गुजराथी, मारवाडी, ज्यू पण सर्रास असे प्राधान्य देतात.
माझ्या नणंदेची एक मैत्रिण
माझ्या नणंदेची एक मैत्रिण मुंबईला आमच्या घरी रहावयास आलेली होती. तिला माझे भयंकर कौतुक वाटले होते की सकाळी सकाळी ऑफिसला जाण्याआधी विविध भारती लावुन पोळ्या करत होते. खरच फार कौतुक वाटले होते.
त्या दिवशी काही कारणाने मी तिला जात विचारली. ती बौद्ध होती. पण तिला बहुतेक (१००%) ते फार लागलं कारण तिचा चेहरा पडला.
मी ही महामूर्ख होते तेव्हा जातीपाती मानत होते, संकुचित विचारांची होते. पण तिचा चेहरा आठवला की अजुनही स्वतःच्या बेशरमपणाची लाज वाटते. अजुनही पोटात कलवाकालव होते
.
आय हॅव्ह कम अ लॉन्ग वे.
जात ही अंधश्रद्धा आहे असे
जात ही अंधश्रद्धा आहे असे अंनिस ची भूमिका आहे. अनिष्ट, जाचक रुढी परंपरा कालबाह्य संस्कार हे सगळ एकाच अंधश्र्द्धा या प्रकारात अंनिस घालते.
जात मानत नाही याचा अर्था जन्मानुसार चिकटलेली जाती नुसार उच्चनीचता हा भेद मानत नाही असा घ्यावा. जात हे वास्तव नाकारता येत नाही.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/