Skip to main content

मूल्यबदल आणि त्याचं मराठी साहित्यात प्रतिबिंब

व्यवस्थापन : मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग २० इथे सुरू झालेली ही चर्चा विषयानुसार वेगळी केली आहे.
---

आभार.
यातील काही गेल्या दशकातील आहेत असे वाटते. यातही जी वाचली नाहियेत ती वाचायचा प्रयत्न असेलच.
------
मला जरा वेगळी उत्सुकता आहे, हल्लीच्या काळात कोणी आर्थिक उदारीकरणासोबत वाढलेला (म्हणजे फारतर ३०-३२) वर्षाच्या आसपासचा लेखक/लेखिका आली आहे का? किंवा कोणी आपल्या लेखनात हल्लीच्या काळातील नायक/नायिका उभे केलेत का? या काळात नुसते अनुभवच नाही तर मुल्यांमध्येही बरेच बदल होत गेले. त्याचे प्रतिबिंब मराठी साहित्यात पडू लागलेय का ते पहायचे होते.

कितीही म्हटलं तरी मेघना पेठे / कविता महाजन वगैरेंच्या कादंबर्‍याही "धीट" विषय मांडणार्‍या, धीट नायिका उभ्या करणार्‍या असल्या तरी मानसिकता, मुल्य, जे "चांगले" म्हणून दाखवले जाते ते काहिसे जुनेच असते. दलित लेखक, स्त्री लेखिका, वेगवेगळे व्यावसाय करणारे वगैरे लिहू लागल्यावर नव्या जाणीवा मराठी साहित्यात आलेल्या दिसतात. नवी - हल्लीची- मुल्ये मात्र मला दिसलेली नाहीत.

भारतीय इंग्रजी साहित्यात मात्र तितकी निराशाजनक परिस्थिती नाही. अद्वैता कालाचे 'ऑलमोस्ट सिंगल' वगैरे पुस्तकातील नायिकेची मुल्यही तशी गेल्या दशकाच्या सुरूवातीला दिसणारी असली - अगदी हल्लीची नसली - तरी तुलनेने फ्रेश वाटतात. तसे काही मराठीत आहे का? येतेय का?

======

अगदीच ढोबळ उदा द्यायचे तरमागे ऐसीवर एक "रापचिक" मुलगी कोणीतरी रंगवली होती. अगदी तशी नाही पण त्या काळातील नायिका/नायक/परिस्थिती/प्रश्न लेखनात आलंय का?

मेघना भुस्कुटे Wed, 06/08/2014 - 14:16

इतक्या लवकर मराठी साहित्यात बदलांचं प्रतिबिंब पडतं का? मी साशंक आहे.

नाही म्हणायला, मला श्रीधर तिळवेंची नवीन कादंबरी आठवतेय. पण ती माझ्या पचनी पडली नव्हती. नावही मी विसरले. 'अंधारवारी' लिहिणारे ऋषिकेश गुप्तेही 'शोले पाहणार्‍या माणसाची गोष्ट'च लिहिताहेत.

मूल्यं बदलली तरी साहित्य ही काहीतरी संस्कार/उपदेश करणारी, आदर्श चित्र समोर ठेवणारी वस्तू असल्याची (निदान मराठी) लोकांची जनरल समजूत दिसते. प्रत्यक्ष आयुष्यात काहीतरी निराळं आणि सणासुदीला मात्र नथ-नऊवारी-पुरणपोळी अशा दुहेरी जगण्यातच साहित्याचाही समावेश असतो. त्यामुळे बदलती मूल्यं मराठी साहित्यात कितपत दिसतील, त्याबद्दल मला शंका आहे.

अजून अवांतरः 'नवीन' मूल्यं म्हणजे कोणती मूल्यं?

गवि Wed, 06/08/2014 - 14:19

In reply to by मेघना भुस्कुटे

मूल्यं बदलली तरी साहित्य ही काहीतरी संस्कार/उपदेश करणारी, आदर्श चित्र समोर ठेवणारी वस्तू असल्याची (निदान मराठी) लोकांची जनरल समजूत दिसते. प्रत्यक्ष आयुष्यात काहीतरी निराळं आणि सणासुदीला मात्र नथ-नऊवारी-पुरणपोळी अशा दुहेरी जगण्यातच साहित्याचाही समावेश असतो.

अत्यंत मार्मिक अशी श्रेणी दिली आहे.

ऋषिकेश Wed, 06/08/2014 - 14:47

In reply to by मेघना भुस्कुटे

अजून अवांतरः 'नवीन' मूल्यं म्हणजे कोणती मूल्यं?

काही हल्लीच्या पिढीकडून (माझ्या परिचयातील वय १५ ते २५मधील) ऐकलेली अवतरणे (की अवतरण चिन्हे! ;) ) त्यावरून काही अंदाज यावा:

-- ऑनलाईन सेक्स तसा "ओके" आहे, रादर सेफ. उगाच कसले ते रोग नै होत नाहीत हे काय कमीये?. (मत देणारी व्यक्ती निमशहरी भागातील,चाळीशी+ पुरूष, मुलाला वेबकॅमवर नग्न देहाचे प्रदर्शन करताना स्वतःच पकडलेल्या मुलाचे वडील मला लाल डब्याच्या यस्टीत भेटले होते. त्यांचे हे अवतरण :) )
-- वन नाईट स्टँड इज सो एक्सायटिंग, फन विदाऊट रिस्पॉन्सिपिलीटीज (व्यक्ती गिरगाव चाळीत रहाणारी, निम्न मध्यमवर्ग, नवतरूण स्त्री)
-- ब्लाईंड डेटिंग हे किती कूल आहे. (अल्पसंख्यांक समाजातील, बिहारमधील खेडेगावातून गेली २ वर्षे पुण्यात शिक्षणासाठी रहाणारा, पुरूष)
-- आय जस्ट डम्प्ड दॅट बिच, तिच्यात काही मजा राहिली नव्हती शिवाय घरी कोणी नसताना यायलाही नखरे करू लागलेली. तो गाडीवाला भेटलाय ना तिला (बीपीओ फ्रेशर, पुरुष)
-- मला अबॉर्शनसाठी सुट्टी हवीये असं स्पष्टपणे (चांगल्या तुपातल्या कोथ्रुडीय बॉसला) सांगणारी अविवाहित फ्रेशर तरुणी [ त्या बिचार्‍याचा सदमा इतका मोठा होता की बसमध्ये भेटल्यावरही दोन दोनदा ही स्टोरी ऐकवली ;) ]
-- भेटल्याभेटल्या मिठी मारणे, पहिल्या दुसर्‍या भेटीतच एकमेकांच्या खांद्यावर माना टाकून फोटो काढणे यात काहीही गैर नसणे. [ हे मी कोकणात, गुहागरला शाळा सुटल्यावर पाहिले आहे, शहरे जाऊ द्या ]

आणि इतके स्पष्ट अनुभव नेहमी येत नसले तरी त्यांच्या दुनियेत असे अनुभव फार अनकॉमन नाहियेत हे त्यांच्या अशा गोष्टींवरील प्रतिक्रियेवरून लक्षात येते.

========

मूल्यं बदलली तरी साहित्य ही काहीतरी संस्कार/उपदेश करणारी, आदर्श चित्र समोर ठेवणारी वस्तू असल्याची (निदान मराठी) लोकांची जनरल समजूत दिसते. प्रत्यक्ष आयुष्यात काहीतरी निराळं आणि सणासुदीला मात्र नथ-नऊवारी-पुरणपोळी अशा दुहेरी जगण्यातच साहित्याचाही समावेश असतो. त्यामुळे बदलती मूल्यं मराठी साहित्यात कितपत दिसतील, त्याबद्दल मला शंका आहे.

हे मार्मिक आहेच पण खेदजन्य सुद्धा! :(

............सा… Thu, 07/08/2014 - 12:43

In reply to by बॅटमॅन

अगदी अगदी. का माहीत नाही पण हे वाक्य आठवले - She'll probably tell U you that waltzing in at midnight doesn't indicate promiscuity any more than coming home at a more conventional hour indicates innocence.

बुरसट मूल्ये ही फक्त लॅक ऑफ अपॉर्च्युनिटीमुळे असतील ती काही फार महान गोष्ट नसावी.

ऋषिकेश Wed, 06/08/2014 - 14:58

In reply to by गवि

बाकी मुल्यांमध्ये मोठे बदल गेल्या दशकात किंवा त्याही आधी झालेले दिसतात
मंगळसुत्र न घालणार्‍या बायका किंवा बापाला नावाने हाक मारणारे तरूण वगैरे आमच्या वर्गातही होते.

मेघना भुस्कुटे Wed, 06/08/2014 - 14:58

In reply to by ऋषिकेश

साली सगळीच्या सगळी मूल्यं 'स्पर्श, सेक्स, गर्भधारणा, विवाह' या वर्तुळापाशी येऊनच थांबावीत?!

मोठ्यांचा आदर, गुरुजनांचा आदर, उद्धट/उलटून बोलणे वाईट, प्रश्न न विचारता आज्ञापालन थोर, वेळेवर/लवकर उठणे / लवकर झोपणे थोर, सिनेमे न पाहणे संस्कारांचे लक्षण, सिनेमा-नाटकात काम करणे म्हणजे चारित्र्याचा सत्यानाश, खोटे बोलणे वाईट, अन्नदात्याशी / धन्याशी ईमान राखले पाहिजे.... इत्यादी मूल्यांबद्दल काही निरीक्षणं नाहीत का?

बॅटमॅन Wed, 06/08/2014 - 14:59

In reply to by मेघना भुस्कुटे

साली सगळीच्या सगळी मूल्यं 'स्पर्श, सेक्स, गर्भधारणा, विवाह' या वर्तुळापाशी येऊनच थांबावीत?!

आयला, मेघना छुपी काँझर्व्हेटिव्ह तर नाही ना? ;)

ऋषिकेश Wed, 06/08/2014 - 15:00

In reply to by मेघना भुस्कुटे

त्यात मला अताशा काही वेगळॅ व/वा धक्कादायक मुळातून वेगळे वाटत नसावे म्हणून ती उदाहरणे आलेली नसावीत.
या मुल्यांचा अभाव/बंड/बदल आमच्या पिढीपासूनच सुरू आहेत. हल्लीच्या पिढीला या मुल्यांमध्ये बदल आवश्यक होते हेच मुळी कादंबर्‍यांत वाचावे लागेलसे वाटते

प्रश्न न विचारला आज्ञापालन थोर वगैरेतर पुलंनी सत्तरीत ताशेरे ओढलेले दिसतात. केवळ हल्लीच्या पिढीपासून प्रकर्षाने दिसू लागलेली वेगळी मुल्ये म्हणून तु दिलेल्यातील एकही उदा बसु नये बहुदा

मन Wed, 06/08/2014 - 15:09

In reply to by मेघना भुस्कुटे

साली सगळीच्या सगळी मूल्यं 'स्पर्श, सेक्स, गर्भधारणा, विवाह' या वर्तुळापाशी येऊनच थांबावीत?!

प्रणाम देवी .
--/\--

ऋषिकेश Wed, 06/08/2014 - 15:17

In reply to by आदूबाळ

:) मलाही हाच प्रश्न पडतो
पण हल्लीच्या पिढीतील कोणी फारसे पूर्ण मराठीत बोलताना दिसले नाहीत, असे मिश्रच बोलतात. त्यांची अवतरणे म्हणून तशीच आली आहेत.

अजो१२३ Wed, 06/08/2014 - 14:59

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेशदा, चर्चमधे कंफेशन्स ऐकण्यार्‍या पाद्र्याच्या श्रुतपदांप्रमाणेच रोचक माहिती आहे. अजून चार उदाहरणे सांगा ना. म्हणजे या चार वचनांतून समाजाची नवी मूल्ये कॅप्चर झाली आहेत कि केवळ अविस्मरणीय अपवाद उल्लेखले आहेत ते कळेल.

ऋषिकेश Wed, 06/08/2014 - 15:03

In reply to by अजो१२३

आमच्या पिढीत ज्या मुल्यांमध्ये फरक जाणवतात त्याहून वेगळेच (आणि त्यामुळे स्मरणात राहिलेले) अनुभव नोंदले आहे.
बाकी वर मेघनाने दिलेले अनुभवही त्यात आहेतच पण खास त्या पिढीतील बदल असे त्यात काही वाटले नाही

मेघना भुस्कुटे Wed, 06/08/2014 - 17:31

In reply to by ऋषिकेश

हम्म...

आमच्या लहानपणी संध्याकाळी देवापुढे बसून 'शुभंकरोति' म्हणणे म्हणजे काहीतरी बाय डिफॉल्ट चांगले अशी समजूत करून दिलेली होती. आताच्या लहान मुलांना हे प्रकरण क्वचितच माहीत असतं.

पण मग प्रश्न असे: -

तुमच्या आजूबाजूचे सर्वसामान्य लोक आपल्या मुला-नातवंडांना मूल्यं म्हणून नक्की काय शिकवताना दिसतात? आणि शाळांमधूनही मूल्यशिक्षणाच्या तासाला देवादिकांचे श्लोक सोडून इतर काय शिकवलं जातं?

माझ्या माहितीप्रमाणे 'पैसा लागतो रे बाबा / गं बाई' हे एक 'मूल्य' तेवढं पोटतिडिकीनं शिकवलं जातं. त्यामुळे पाठोपाठ येणारी 'मूल्यं' (पैसा हवा असेल तर (इंग्रजीतून आणि शक्यतोवर परदेशी) शिक्षणाला पर्याय नाही. आयुष्य मनापासून उपभोगायचं असेल तर आरोग्याला आणि त्यामुळे व्यायामाला नि 'वैयक्तिक' स्वच्छतेला पर्याय नाही. प्रतिष्ठा हवी असेल तर प्रतिष्ठित भाषेला (अर्थात इंग्रजीला) पर्याय नाही, वगैरे वगैरे.) बाकी आपली शुभंकरोति वगैरे जनरल सारवासारवी.

मी Wed, 06/08/2014 - 17:43

In reply to by मेघना भुस्कुटे

आमच्या लहानपणी संध्याकाळी देवापुढे बसून 'शुभंकरोति' म्हणणे म्हणजे काहीतरी बाय डिफॉल्ट चांगले अशी समजूत करून दिलेली होती

बहुदा शुभंकरोती हे पॉप्युलर कल्चरमधलं प्रातिनिधीक उदाहरण आहे, पण खरे बोलावे, मोठ्यांना उलट बोलु नये, रात्री घराबाहेर राहु नये, अंथरुण पाहून पाय पसरावे, घरात आल्यावर हात/पाय धुवावेत, जेवताना फार गप्पा मारु नयेत, ब्राह्मणाच्या घरात - डाव्या हताने जेवु नये, उष्टे खाउ नये, खरकटे आणि बाकिचे मिक्स करु नये तसेच इतरांची मने दुखवू नयेत असे मूल्य-संस्कार पाहिले आहेत.

मेघना भुस्कुटे Wed, 06/08/2014 - 18:02

In reply to by मी

हो, सगळ्याला सहमती. शिवाय 'लवकर उठणे' या गोष्टीला एक अनावश्यक मूल्य चिकटलेले दिसते. खेरीज दारू-सिगारेट-इतर व्यसने करणे म्हणजे काहीतरी बाय डिफॉल्ट पाप हेही.

मला वाटतं, ऋ म्हणत असल्याप्रमाणे ही सगळी मूल्यं आता व्यवहारात कुणी पाळत नाही. पण त्यांचं 'मूल्य'पण अजून गळून पडलेलं नाही. त्यामुळे एखाद्या हादर्‍यानं कासावीस झालेले आणि गोंधळलेले पालक / लोक आसरा म्हणून या तथाकथित मूल्यांकडे वळताना दिसतात. मग ते फारच विनोदी आणि केविलवाणं वाटू लागतं.

इथे कुणाला 'चाहूल' हे नाटक आठवतं आहे का?

राजेश घासकडवी Wed, 06/08/2014 - 18:33

In reply to by मी

वर दिलेल्या गोष्टी संस्कार किंवा जीवनमूल्यं यापेक्षा शिष्टाचार या सदरात मी टाकेन. सगळ्यात महत्त्वाची मूल्यं खरं तर 'इतरांशी कसं वागावं?' या बाबतची असतात.

- इतरांचं मन दुखावू नये
- घरी आलेल्या पाहुण्याची योग्य ती खातिरदारी करणे
- आपल्या पतीला आपल्यापेक्षा अधिक महत्त्वाचं स्थान देणे
- मित्रांना/नातेवाईकांना त्यांच्या गरजेच्या काळात मदत करणे
- आपल्या बायकोला 'पायातली चप्पल पायातच' या न्यायाने वागवणे
- आपल्या बहिणीच्या शीलाचं रक्षण करणे
- वगैरे वगैरे

यातली कुठचीच मूल्यं, कुठच्याच काळात सार्वत्रिकपणे किंवा एकसंधपणे पाळली जात नाहीत. सर्वांचंच लोकसंख्येत एक प्रकारचं डिस्ट्रिब्यूशन असतं. गेल्या काही दशकांत यातली काही डिस्ट्रिब्यूशनं या ना त्या दिशेला सरकताना दिसत आहेत.

मी Wed, 06/08/2014 - 18:47

In reply to by राजेश घासकडवी

यातली कुठचीच मूल्यं, कुठच्याच काळात सार्वत्रिकपणे किंवा एकसंधपणे पाळली जात नाहीत. सर्वांचंच लोकसंख्येत एक प्रकारचं डिस्ट्रिब्यूशन असतं. गेल्या काही दशकांत यातली काही डिस्ट्रिब्यूशनं या ना त्या दिशेला सरकताना दिसत आहेत.

सहमत.

............सा… Wed, 06/08/2014 - 19:24

In reply to by राजेश घासकडवी

कालच आमच्या कंपनीत मीटींगमध्ये सांगीतलं -
नियम १ कोणता मुलांनो? - ट्रीट अदर्स द वे यु लाईक टू बी ट्रीटेड
पण नियम ० कोणता? - ट्रीट अदर्स द वे दे लाईक टू बी ट्रीटेड
=))

गब्बर सिंग Thu, 07/08/2014 - 05:04

In reply to by ............सा…

पण नियम ० कोणता? - ट्रीट अदर्स द वे दे लाईक टू बी ट्रीटेड

इतरांना ट्रीट करताना "त्यांना" हवे तसे ट्रीट केले तर माझी पर्सनॅलिटी वृथा होते का ? (प्रामाणिक प्रश्न. हा मी आमच्या म्याडम ना विचारला होता. पॉला कप्रोनी ... आमची ऑर्ग. बिहेवियर ची प्राध्यापिका.)

............सा… Thu, 07/08/2014 - 06:07

In reply to by गब्बर सिंग

वृथा म्हणजे ढोंगी? खरय होत असावी. मी हा नियम विशेष पाळत नाही.
_________________
वृथा = रिडन्डंट. येस्स्स्स!!!! होते होते. यु आर राईट्ट!!!! :)

अजो१२३ Thu, 07/08/2014 - 13:49

In reply to by राजेश घासकडवी

- इतरांचं मन दुखावू नये
- घरी आलेल्या पाहुण्याची योग्य ती खातिरदारी करणे
...
- वगैरे वगैरे

याला(च) मूल्ये म्हणणारा, नि ही भारतीय समाजात ही मूल्ये प्रकर्षाने आहेत असे (म्हणायचे असल्यास) म्हणणारा व्यक्ति बॉर्न अँड ब्रॉट इन मेट्रो असतो, शिवाय फार कादंबर्‍या वाचतो नि फार सिनेमे पाहतो हे पक्के ओळखावे.

बॅटमॅन Thu, 07/08/2014 - 15:06

In reply to by अजो१२३

असेच काही नाही. वरील गोष्टींना तुम्ही मूल्ये म्हण्णार नाही का ते सांगा. जर म्हण्णार असाल तर

नि ही भारतीय समाजात ही मूल्ये प्रकर्षाने आहेत असे (म्हणायचे असल्यास) म्हणणारा व्यक्ति बॉर्न अँड ब्रॉट इन मेट्रो असतो, शिवाय फार कादंबर्‍या वाचतो नि फार सिनेमे पाहतो हे पक्के ओळखावे.

याला तुमच्याच उदा. ने छेद जातो. :)

अजो१२३ Thu, 07/08/2014 - 14:00

In reply to by ऋषिकेश

-- वन नाईट स्टँड इज सो एक्सायटिंग, फन विदाऊट रिस्पॉन्सिपिलीटीज (व्यक्ती गिरगाव चाळीत रहाणारी, निम्न मध्यमवर्ग, नवतरूण स्त्री)

असं विधान त्या स्त्रीनं काही एकनिशानंदाचे अनुभव घेऊन त्यांचं मूल्यमापन करताना केलेलं कि अस्संच एक तात्विक भूमिका म्हणून केलेलं? व्यक्तिची तात्विक मूल्ये नि व्यवहार्य मूल्ये भिन्न असू शकतात. म्हणून सरळ(हा ळ जास्तीचा आहे का?)मिसळ न करता तात्विक मूल्ये कशी बदलली आहेत नि व्यवहार्य मूल्ये कशी बदलली आहेत हे वेगवेगळे सांगावे.

ऋषिकेश Thu, 07/08/2014 - 15:28

In reply to by अजो१२३

तिला थेट विचारलं नव्हतं पण ऐकीव बातम्यांनुसार ती तो आनंद कित्येक नवरात्रीत घेत आली आहे. त्यामुळे मुद्दामच ती चौकात आल्यावर काही पोरांनी याबद्दल चर्चा सुरू केली होती, ती रंगत गेल्यावर तिचं हे स्टेटमेंट होतं :P

ते असो.

व्यक्तिची तात्विक मूल्ये नि व्यवहार्य मूल्ये भिन्न असू शकतात

पुर्ण सहमत आणि दोन्ही मुल्येसुद्धा सतत बदलत असतात.

अजो१२३ Thu, 07/08/2014 - 15:54

In reply to by ऋषिकेश

काही हल्लीच्या पिढीकडून (माझ्या परिचयातील वय १५ ते २५मधील) ऐकलेली अवतरणे (की अवतरण चिन्हे! ) त्यावरून काही अंदाज यावा:

पिढी म्हणजे ती स्त्री असे मला वाटलेले. (म्हणून तुम्ही थेट ऐकले असले असे वाटलेले.) पण पिढी म्हणजे ती मुले हे देखिल चोख बसतेय.

बॅटमॅन Thu, 07/08/2014 - 15:57

In reply to by अजो१२३

पिढी म्हणजे ती स्त्री असे मला वाटलेले.

हे भाषेचे नसून अजोंचे दौर्बल्य आहे.

भाषेची बदनामी थांबवा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

अतिशहाणा Wed, 06/08/2014 - 17:44

मराठी साहित्यात पहिल्यापासूनच अनावश्यक आणि रोगट लैंगिक चर्चा भरपूर होते आहे. (उदा. रेगे, खानोलकर, दळवी वगैरे असे नेमाड्यांच्या लेखात वाचले आहे!) हल्लीच्या काळात निदान लैेंगिकता मागे पडून जगण्याचे प्रश्न मांडले जातील अशी अपेक्षा आहे. मिलिंद बोकील मला चांगले वाटतात. त्यांच्यापेक्षा नवीन असे काही वाचनात आले नाही.

मेघना भुस्कुटे Wed, 06/08/2014 - 17:58

In reply to by अतिशहाणा

अनावश्यक आणि रोगट का बरं? नेमाडे म्हणतात म्हणून? वा रे वा!

बोकील एकसाची आणि प्रेडिक्टेबल लिहितात असं मला वाटतं.(बादवे, बोकिलांच्या 'शाळा'मधल्या आणि नंतर 'गवत्या'मधल्या अ. आणि रो. लै. चर्चेबद्दल तुमचे मत काय आहे हो? ;-))

अतिशहाणा Wed, 06/08/2014 - 18:05

In reply to by मेघना भुस्कुटे

बोकील यांचे समुद्रापारचे समाज, झेन गार्डन आणि उदकाचिया आर्ती नंतर मी काही वाचलेले नाही. तिथपर्यंतचे लेखन फारच आवडले होते. शाळामध्ये लैंगिक चर्चा नसून पौगंडावस्थेतील आकर्षणाची चर्चा होती असे वाटते. मेघना पेठे किंवा वालावलकर यांच्या कादंबऱ्यांमध्ये 'समकालीन मूल्यां'ची जी चर्चा आढळते ती मलाही रोगट आणि अनावश्यक वाटते. 'गवत्या' नक्की काय प्रकार आहे ते कळले नाही.

अनावश्यक आणि रोगट का बरं? नेमाडे म्हणतात म्हणून? वा रे वा!

वेल... नेमाड्यांचा तो लेख वाचल्यानंतर काही प्रसिद्ध लेखकांची पुस्तके चुकून पुन्हा वाचनात आली असता या लैंगिक चर्चांचा उद्देश प्रामुख्याने टिटिलेशनसाठी केला असावा असे वाटण्यास जागा आहे असे मला जाणवले.

मेघना भुस्कुटे Wed, 06/08/2014 - 18:17

In reply to by अतिशहाणा

बोकील यांचं 'एकम', 'रण / दुर्ग', 'समुद्र' वाचून कंटाळा आला. 'समुद्र'मध्येही त्याच त्या विवाहबाह्य संबंधांशी संबंधित तथाकथित मूल्यचर्चा होती. 'दुर्ग'मध्येही. 'गवत्या'मध्ये काही मूल्यांबद्दल चर्चा होती. पण पुस्तकाच्या शेवटी 'सारे काही समाजमान्य पद्धतीने अमेरिकेत जाऊन गोड' होते आणि मूल्यचर्चेला गोडुला विराम मिळतो हे पाहून बोकील डोक्यात गेले. ते एक असोच.

मेघना पेठेच्या 'नातिचरामि'बद्दल काही बोलायला तोंड नाही. मला ती तुकड्यातुकड्यांत आवडत असली, तरी ती एक फसलेली कादंबरी आहे हे मान्य करायला पाहिजे. पण तिच्या कथासंग्रहांबद्दल मात्र रोख आदर आहे. त्यांतली चर्चा रोगट आणि अनावश्यक वाटत नाही.

वालावलकर - अनावश्यक आणि रोगट. मान्य.

दळवी, पेंडसे, रेगे यांच्या कादंबर्‍यांतली लैंगिक वर्णने टिटिलेशनसाठी होती असे अजूनही वाटत नाही. नेमाड्यांच्या 'त्या' लेखाचा दुवा / इतर काही स्रोत मिळेल का?

आदूबाळ Wed, 06/08/2014 - 18:24

In reply to by मेघना भुस्कुटे

पण पुस्तकाच्या शेवटी 'सारे काही समाजमान्य पद्धतीने अमेरिकेत जाऊन गोड' होते आणि मूल्यचर्चेला गोडुला विराम मिळतो हे पाहून बोकील डोक्यात गेले. ते एक असोच.

अगदी अगदी.

गवत्याचा नायक आनंद हा शाळाच्या मुकुंदाचा वयाने वाढलेला पण समज वाढू न शकलेला अवतार आहे असंही वाटून गेलं.

अतिशहाणा Wed, 06/08/2014 - 18:44

In reply to by मेघना भुस्कुटे

'दुर्ग'मध्येही. 'गवत्या'मध्ये काही मूल्यांबद्दल चर्चा होती. पण पुस्तकाच्या शेवटी 'सारे काही समाजमान्य पद्धतीने अमेरिकेत जाऊन गोड' होते आणि मूल्यचर्चेला गोडुला विराम मिळतो हे पाहून बोकील डोक्यात गेले. ते एक असोच.

हे पुस्तक वाचनात आलेले नाही. मात्र त्यामुळे बोकील यांचे आधीचे दर्जेदार लेखन कमी दर्जाचे ठऱत नाही. नेमाड्यांचा हा लेख बहुदा टीकास्वयंवरमध्ये आहे. त्यांनी रेग्यांची सावित्री व त्या अनुषंगाने खानोलकरांच्या काही लेखनाचे विश्लेषण केले आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी वाचल्याने संदर्भ कदाचित चुकला असण्याची शक्यता आहे. पण फडक्यांपासून लैेगिक टिटिलेशनची परंपरा प्रतिष्ठित मराठी साहित्यात आहे. आणि त्यात आजच्या तथाकथित मूल्यांचा समावेश झाल्याने मराठी साहित्याचा दर्जा उंचावेल असे वाटत नाही. याउलट लैेगिक लेखनावरचा फोकस कमी केल्यास चांगले मराठी साहित्य येऊ शकते असे वाटते.

बॅटमॅन Wed, 06/08/2014 - 18:49

In reply to by अतिशहाणा

पण फडक्यांपासून लैेगिक टिटिलेशनची परंपरा प्रतिष्ठित मराठी साहित्यात आहे. आणि त्यात आजच्या तथाकथित मूल्यांचा समावेश झाल्याने मराठी साहित्याचा दर्जा उंचावेल असे वाटत नाही. याउलट लैेगिक लेखनावरचा फोकस कमी केल्यास चांगले मराठी साहित्य येऊ शकते असे वाटते.

फडक्यांचं माहिती नै पण ही प्रंप्रा आहेच. अन बाकी प्रतिसादाशीही सहमत. लैंगिक लेखनावर फोकस्ड मचाकसारखा इतका सुंदर पर्याय असताना, त्याच्या अभिवृद्धीस यथाशक्ती हातभार लावायचे सोडून इतर मराठी साहित्यावरचा अपेक्षांचा बोजा कशाला वाढवायचा? इतरही अनेक विषय आहेतच की.

हा शब्द पाहिला नाही, अन मनातही काहीही आलं नाही.

............सा… Wed, 06/08/2014 - 19:03

In reply to by मेघना भुस्कुटे

नाही, दळवींच्या कादंबर्‍यातील वर्णने टिटीलेशन अजिबात वाटत नाहीत. लैगिकता मानसशास्त्राच्या प्रिझममधून पाहीली असे मला लख्ख आठवते.
पेंडसेंच्या तुंबाडचे खोत मधील वर्णने बोल्ड वाटलेली पण तीही कादंबरीची गरज असावी असे म्हणावयास वाव आहे.
_______________

http://aisiakshare.com/node/1867 (मराठी लिखाण अन लैंगिकता) या धाग्यातील माझा मजकूर परत पेस्ट करतेय

नंतर नंतर जयवंत दळवींच्या कथांची अतिशय, अतोनात गोडी लागली. त्यातील स्त्रीपुरुष संबंधांचे सूचकतेच्याही पलीकडे जाऊन केले गेलेले चित्रण व एखादे तरी वेडसर पात्र असणे ही वैशिष्ट्ये अतिशय आवडली. जयवंत दळवींच्याच (बहुतेक) एका कथेते कॉलनीत दिवे जातात अन मग कशी मजा येते, कोणी पुरुष अंधारात चुकून बायकोचा परकर घालून मीटरपाशी, खाली येतो , "चान्स घेऊन" कोणी कुणाला तरी अंधारात मागून आवळते, दोघानांही एकमेक कोण ते कळत नाही पण रिस्पॉन्स दिला जातो अन मग दिवे आल्यावर जीवन परत आलबेल होते अशा टाइपची हलकीफुलकी कथा वाचली. अन आवडलीही होती.

अनुप ढेरे Wed, 06/08/2014 - 18:19

In reply to by अतिशहाणा

असावा असे वाटण्यास जागा आहे असे मला जाणवले.

वा वा... सुंदर वाक्यरचना! एक्दम पॉलिटीकली करेक्ट... क्या बात है अशी दाद निघाली तोंडातून!

चिंतातुर जंतू Wed, 06/08/2014 - 18:49

In reply to by अतिशहाणा

>> बोकील यांचे समुद्रापारचे समाज, झेन गार्डन आणि उदकाचिया आर्ती नंतर मी काही वाचलेले नाही. तिथपर्यंतचे लेखन फारच आवडले होते. शाळामध्ये लैंगिक चर्चा नसून पौगंडावस्थेतील आकर्षणाची चर्चा होती असे वाटते. मेघना पेठे किंवा वालावलकर यांच्या कादंबऱ्यांमध्ये 'समकालीन मूल्यां'ची जी चर्चा आढळते ती मलाही रोगट आणि अनावश्यक वाटते. 'गवत्या' नक्की काय प्रकार आहे ते कळले नाही.

'समुद्रापारचे समाज'मध्ये बोकील जेव्हा अ‍ॅमस्टरडॅममधल्या देहविक्रयाकडे पाहतात तेव्हा शक्य तितकी समंजस उदारमतवादी भूमिका घेऊन नीट समजून घेण्याचा प्रयत्न ते करतात असं वाटतं, पण त्यांना आधुनिक लैंगिक व्यवहार समजतो आहे असं वाटत नाही. 'शाळा'मधला लैंगिक आकर्षणाचा भाग डेटेड वाटला, पण कादंबरीचा काळच जुना असल्यामुळे ते खटकलं नाही. (हे मी आज का वाचावं असा प्रश्न मात्र पडला, पण ते असो.) कमलेश वालावलकरांच्या 'बाकी शून्य'मध्ये 'पुन्हा एकदा कोसला'शिवाय वेगळं काही आढळलं नाही. मेघना पेठे - विशिष्ट कथा किंवा कादंबरी फसली आहे किंवा नाही (थोडक्यात 'साहित्यिक मूल्य') वगैरे तपासता यावं, पण गांधीवाद/समाजवाद/हिंदुत्ववाद किंवा ह्या कोणत्याही पगड्याखाली नसलेल्या पूर्वीच्या मराठी मध्यमवर्गीय समाजाच्या तुलनेत साधारण १९९०च्या आसपासच्या मध्यमवर्गात लैंगिकतेसंदर्भात जो फरक पडला आहे तो ह्या लिखाणात दिसतो असं वाटतं. त्यामुळे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून हे लिखाण अभ्यासलं जायला हवं असं वाटतं.

बॅटमॅन Wed, 06/08/2014 - 18:22

In reply to by मेघना भुस्कुटे

रोचक.

लैंगिक संबंधी काहीही आलं की ढोलताशे पिटून ते जाहीरपणे मांडलंच पाहिजे तरच लेखन मॉडर्न कहलायेगा. बरोबरे.

............सा… Wed, 06/08/2014 - 18:24

In reply to by बॅटमॅन

=))
अन देवाचं आलं की माझा विश्वास नाही हे शीरा ताणून सांगीतलेच पाहीजे तोही पुरगामी कहलाओगे तस्सेच ;)

बॅटमॅन Wed, 06/08/2014 - 18:30

In reply to by ............सा…

किंवा

- हे सगळे कसे थोतांड आहे
-मी कसा/कशी एकादशीला मुद्दाम चिकन खातो/ते (पर्यायाने एकादशी लक्षात ठेवतो/ते)
-देवाधर्मावर थोडासाही विश्वास असणारे सगळे कसे ऑटोम्याटिक चु* होतात
-ॐ नमः (नमो म्हणत नै नैतर उगी त्यावरूनही झोडायचे) अमुकतमुक असं म्हणायचा अवकाश की तसे म्हणणारे सर्वजण लगोलग बहुजनविरोधी काष्ट सिष्टिमपुरस्कर्ते, इहवादाला झोडून शून्यवत् निरर्थक चर्चा करणारे (अन त्यामुळेच परकीयांनी तुमच्यावर राज्य केले इ.)

वगैरे. यांपैकी पाहिजे तो रोचक पर्याय शोधावा, कसं लिबरलमय अन सेकुलरपूर्ण अन मॉडर्नदायक वातावरण होतं - पक्षी दिल मॉडर्न मॉडर्न हो जाता है.

मन Thu, 07/08/2014 - 13:26

In reply to by बॅटमॅन

-हे सगळे कसे थोतांड आहे
-मी कसा/कशी एकादशीला मुद्दाम चिकन खातो/ते (पर्यायाने एकादशी लक्षात ठेवतो/ते)
-देवाधर्मावर थोडासाही विश्वास असणारे सगळे कसे ऑटोम्याटिक चु* होतात
-ॐ नमः (नमो म्हणत नै नैतर उगी त्यावरूनही झोडायचे) अमुकतमुक असं म्हणायचा अवकाश की तसे म्हणणारे सर्वजण लगोलग बहुजनविरोधी काष्ट सिष्टिमपुरस्कर्ते, इहवादाला झोडून शून्यवत् निरर्थक चर्चा करणारे (अन त्यामुळेच परकीयांनी तुमच्यावर राज्य केले इ.)

"तथाकथित" लिबरल लोकं आक्रस्ताळी असतात असं ह्या आक्रस्ताळ्या शब्दरचनेवरून सुचवायचं असावसं वाटलं.
तर दोन मिनिटं मानू की ते आक्रस्ताळे आहेत.
शंका -->
धार्मिकांच्या कोणत्या वागणुकीमुळे ते असे आक्रस्ताळे झाले असावेत ?
ह्यांनी आक्रस्ताळं होण्यात धार्मिकांचा काहीच वाटा नाहिये का?

बॅटमॅन Thu, 07/08/2014 - 15:08

In reply to by मन

धार्मिकांच्या कोणत्या वागणुकीमुळे ते असे आक्रस्ताळे झाले असावेत ?
ह्यांनी आक्रस्ताळं होण्यात धार्मिकांचा काहीच वाटा नाहिये का?

धार्मिक भिकारचोट आहेत हे लिबरल १०१ मधलं पहिलं अ‍ॅक्झिअम आहे. ते एक सोडच.

पण लिबरल लोक जर इतके शहाणे असतील तर आक्रस्ताळेपणाच्या पायरीपलीकडे जाऊन प्रबोधन इ. करणे जमत नै का? आक्रस्ताळेपणातून दिसणारा पोरकटपणा बाकी रोचक वाटतो.

अस्वल Wed, 06/08/2014 - 22:36

कधीही कुठल्याही मूल्यांबद्दल बोलताना 'विषय' उत्तम! :प

नवीन मूल्ये असा विचार केला तर जाणवलेल्या गोष्टी
- भाषा मिश्र झाली आहे आणि त्यात कोणाला काही वावगं वाटत नाही.म्हणजे "अ‍ॅप्पल खाणार की ऑरेंज?" किंवा "तो कलरच छान आहे पैठणीला" वगैरे बोलणं प्रातिनिधीक समजलं जावं.
+/- idols मध्ये मोडल्या जाणार्या व्यक्ती वेगळ्या असाव्यात असा सौशय आहे. फिल्मस्टार, पॉप गायक, खेळाडू, यशस्वी CEOs ही मंडळी नवी idols आहेत.
+ मोकळेपणा : कुठल्याही बाबतीत. सेक्स, पगार, चित्रपट, राजकारण, धर्म अशा छिन्नभिन्न वस्तूंना एकाच मापात तोलणं. सगळीकडे असंच असेल असं नाही, पण कल "मोकळेपणा"कडे आहे. ह्या आणि अशा विषयांबद्दल बोलणं सहजस्वरूपी होतं, त्यात आता खोटा अभिनिवेश खूप कमी आहे.
+ ९० नंतरचे लोक तंत्रज्ञानाला स्वत:चा भाग समजतात. म्हणजे मग "किती लवकर बदलतंय ना जग" ही गोष्ट त्यांना स्वाभाविक वाटते. बदल हा त्यांच्यासाठी कायमस्वरूपी आहे, त्यांनी मान्य केलाय. इतरांना कदाचित भोवंड आणणारा तंत्रज्ञानाचा वेग ह्या लोकांना कूल आणि हवाहवासा वाटतो.

मुद्दा क्र १. चा विचार केला तर असं वाटतं की असं सगळं जगणारा मराठी मनुष्य "मराठी"तून हे मांडायला जाईल का? बहुधा नाही. त्याची भाषा म.टा. पुरवणीची (मिंग्लिश) असेल. किंवा इंग्लिशच.

सिद्धि Thu, 07/08/2014 - 07:14

In reply to by अस्वल

भाषेचा फार लोचा होतो राव !! ३-४ भाषा येत असल्यामुळे डोक्यात विचार मिश्र भाषेत केले जातात आणि अगदी perfect translation करता येत नाही … strange thing is हे असं शब्द आणि शब्द जर कोणत्याही एका भाषेत भाषांतरित करून बोलायचं किंवा लिहायचं झालं कि असं वाटतं कि मला जे म्हणायचंय ते पूर्णपणे व्यक्त झालंच नाहीये … ह्या भाषा to भाषा translation मध्ये काही भाग कुठेतरी सांडून गेलाय …

हि माझ्या भाषांतराची मर्यादा असेल कदाचित पण ऐसी वर लिहिताना मला बर्याचदा पर्यायी मराठी शब्द शोधत बसावे लागायचे … पण मग त्यामुळे लिखाणाचा flow disturb व्हायचा …

मन Thu, 07/08/2014 - 13:29

In reply to by सिद्धि

लिहिता लिहिता व्यवस्थित लिहिणं जमू लागतं असा स्वानुभव आहे.
मला कुठलीच भाषा धड येत नसे; अजूनही येत नाही.
विचित्र मिश्रण असे.
लिहित राहण्याने निदान पूर्वीपेक्षा बरेच बरे आहे.
हवं तर सुरुवातीला लिखाण मला व्य नि करुन पाठवा.
मला वेळ मिळेल तसं मी मराठीत बनवून पाठवून देत जाइन.

घाटावरचे भट Thu, 07/08/2014 - 09:14

मूल्य म्हणजे एखादी गोष्ट नैतिकदृष्ट्या बरोबर की चूक हे ठरवण्याच्या कसोट्या अशी माझ्यापुरती व्याख्या आहे. ब्रॉड लेव्हलला ही मूल्य बदलली नसली तरी एखादी घटना / गोष्ट त्या मूल्यांवरवर किती घासून पाहायची याचे आयाम बदलले आहेत. जो पर्यंत एखादा मूलभूत बदल होऊन ब्रॉड लेव्हललाच आपली मूल्य बदलत नाहीत, तो पर्यंत साहित्यात त्याचं प्रतिबिंब किती पडेल याबाबत मी साशंक आहे.

ऋषिकेश Thu, 07/08/2014 - 09:27

In reply to by घाटावरचे भट

असेलही. मात्र भारतीय इंग्रजी साहित्यात त्याचे प्रतिबिंब दिसावे नी मराठीत नाही असे का व्हाव?

मेघना भुस्कुटे Thu, 07/08/2014 - 12:32

In reply to by ऋषिकेश

थोडं विषयांतर होतंय. पण आपण मूळ विषयाकडे परतूच, म्हणून स्वातंत्र्य घेते.

ऋषिकेश, तुझ्या प्रतिक्रियेपासून या विषयाला सुरुवात झाली, म्हणून तुला आधी विचारते: तुझी मूल्यं काय आहेत?

आपण - आंतरजाल सररास वापरणारा आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गात मोडणारा मराठी जणांचा गट - आज सर्वसाधारणपणे कोणती मूल्यं मानतो?

ऋषिकेश Thu, 07/08/2014 - 13:18

In reply to by मेघना भुस्कुटे

माझी चिरंतन ठाम ठोस अशी मुल्य नाहियेत. मी त्या बाबतीत फ्लेक्झिबल असतो. कोणतीही गोष्ट चांगली किंवा वाईट असे कप्पेकरण टाळण्याकडे माझा कल असतो.
त्यावेळच्या परिस्थितीनुसार, परिसरानुसार, प्रसंगानुसार माझे वागणे बदलते - आणि तसेच इतरांनीही केले तरी मला वावगे वाटत नाही.
उदा. "मग तो मागे नै का असं असं म्हणालेला, मग त्याने तसं तसंच वागलं पाहिजे नैतर मग तो माणूस वैट्ट आहे, खोटारडा आहे, फसवा आहे, दुतोंडी आहे" असे शिक्के घेऊन बसायला मला आवडत नाही. जो तो माणूस आपला स्वार्थ बघतो व तो त्याने व्यवस्थित बघावा हे मला सध्या पटतेय.

"माझी सध्या असलेली मते ठाम न ठेवणे आणि ती दुसर्‍यावर न लादणे" हे त्यातल्या त्यात स्थायी मुल्य म्हणता यावे.

त्या अर्थाने माझे 'निर्मुल्यन' म्हणता यावे काय? ;)

मन Thu, 07/08/2014 - 13:33

In reply to by ऋषिकेश

"मग तो मागे नै का असं असं म्हणालेला, मग त्याने तसं तसंच वागलं पाहिजे नैतर मग तो माणूस वैट्ट आहे, खोटारडा आहे, फसवा आहे, दुतोंडी आहे"
कम ऑन ऋ.
एखाद्याने मागे काहीतरी म्हटलं आणि त्यानेच आता विरोधी कृती केली म्हणून इतर बोंबलत नसावेत.
तर एखाद्याने मागे काहीतरी म्हटलं, त्यानेच आता विरोधी कृती करुनही स्वतःतली इनकन्सिस्टन्सी मान्य केली जात नसेल किंवा त्याने आपले मत बदलल्याचे मान्य केले जात नसेल तर मात्र ओरडा होणारच, नै का ?

ऋषिकेश Thu, 07/08/2014 - 15:08

In reply to by मन

मी ओरडा करायला कुठे नै म्हटलेय?
त्यावरून त्या व्यक्तीला मी जज करणे टाळतो इतकेच म्हटले. "बोले तैसा चाले त्याची.." वगैरे मला तितकेसे पटत नाही.

म्हणून तर भाजपा काँग्रेसवर पूर्वी ज्या कारणासाठी टिका करूनही सत्तेवर आली नी मग काही बाबतीत तोच रस्ता घेते तेव्हा मी त्यांचे कौतुक करतो.
जे योग्य वाटते आहे ते करावे, आधी आपण काय बोललो होतो त्याचे बॅगेज वाहत नावडत्या/तोट्याच्या गोष्टी करत राहु नयेत. दुनियेला ओरडा करायचा असेल तर करू द्यावा. ते पटल्यास पुन्हा वागणे बदलावे, नैतर दुनियेकडे सरळ दुर्लक्ष करावे!

अजो१२३ Thu, 07/08/2014 - 15:19

In reply to by ऋषिकेश

जे योग्य वाटते आहे ते करावे, आधी आपण काय बोललो होतो त्याचे बॅगेज वाहत नावडत्या/तोट्याच्या गोष्टी करत राहु नयेत. दुनियेला ओरडा करायचा असेल तर करू द्यावा. ते पटल्यास पुन्हा वागणे बदलावे, नैतर दुनियेकडे सरळ दुर्लक्ष करावे!

अगदी क्वोटणीय वचन आहेत. माणसाची मूळ मूल्ये काय असावीत याबद्दल हा प्रतिसाद शांत आहे, पण बदलावरचं भाष्य स्तुत्यच आहे.

ऋषिकेश Thu, 07/08/2014 - 15:32

In reply to by अजो१२३

आभार
बाकी, माणसाची मूळ मूल्ये काय असावीत याबद्दल मागे चर्चा झाली आहे बहुदा.
माझे मत मुळात "मूळ मुल्य" असे ठाम/ठोस अपरिवर्तनीय असे काही नसते. फक्त "बदल" हाच शाश्वत असतो. तेव्हा तो जितक्या लवकर स्वीकारू तितके जीवन सुसह्य होते.

बॅटमॅन Thu, 07/08/2014 - 15:35

In reply to by ऋषिकेश

फक्त "बदल" हाच शाश्वत असतो. तेव्हा तो जितक्या लवकर स्वीकारू तितके जीवन सुसह्य होते.

१६ मे उगीचच आठवून गेला. ;)

अजो१२३ Thu, 07/08/2014 - 16:42

In reply to by ऋषिकेश

माझे मत मुळात "मूळ मुल्य" असे ठाम/ठोस अपरिवर्तनीय असे काही नसते. फक्त "बदल" हाच शाश्वत असतो.

बदल होण्यासाठी माणसानं मनमोकळ असावं (एक मूल्य म्हणून वा अन्यथा) हे तर आहेच. पण बदल हा एकूणाचा अल्पांश असतो. गेल्या ५ वर्षांचा काळ घेतला तर मी कसा बदललो आहे हे महत्त्वाचं आहेच, पण मी कसा बदललो नाही हे ही महत्त्वाचं आहे. तर पाच वर्षांच्या प्रारंभीची किती लेगसी मी कॅरी करत आहे, त्यातली किती स्थिर आहे, किती मी प्रश्नतो, किती खरोखरीच बदलतो यात पाच वर्षांपूर्वीच्या मूल्यांना महत्त्वच नाही असं कसं म्हणाल? म्हणजे ५ वर्षांपूर्वीचा ऑफिशियल ऋषिकेश नावाचा माणूस आणि आजचा तोच माणूस "वास्तवात वेगळेच" आहेत असे म्हणायचे आहे? इतका बदल होतो?
----------
काही मूल्येच बदलली (आली वा गेली) असणार. काही मूल्यांचे इंटरप्रिटेशन (मूल्य पाळतोचंय पण हाच त्याचा अर्थ आहे) बदलले असणार. काही मूल्यांची रँक वर खाली झाली असणार (स्वतःच्या नोकरीपेक्षा जनसेवा महत्त्वाची, इ नि मग उलटे). काहींची तीव्रता बदलली असणार (देशासाठी काहीतरी केलंच पाहिजे ते देशाचं काही वाईट होऊ नये). काहींचे अप्लिकेशन कसे करावे याची पद्धत बदलली असणार (रोज पूजा करायची गरज नाही त्यापेक्षा नेहमी जगन्नियंत्याचे ऋणी रहा).
यांपैकी केवळ मूल्ये येणे/जाणे हेच मूल्यबदल म्हणवते. बाकीच्यांची कोर शाबूत आहे.
----------------------
नि म्हणून जीवनात आपण बदल हाताळण्यात डेक्स्ट्रस असलो तरी एकूणात आपण कसे आहोत हे मूल्यविषयक सर्वात मोठा प्रश्न असतो.

ऋषिकेश Thu, 07/08/2014 - 16:52

In reply to by अजो१२३

उत्तम प्रतिसाद अतिशय आवडला. पहिल्या मुद्द्यांवर शीप ऑफ थीसीयस पर्यंत चर्चा जाईल तेव्हा त्या आर्मवरील चर्चा थांबवतो :)

अन्यथा बर्‍याच मुद्द्यांवर - विशेषतः दुसर्‍या परिच्छेदात - सहमती आहे. (अपवादः कोअरही बदलत असतो. आधी जे अगदी वाईट वाटायचे ते आता काही प्रसंगात अगदी चांगलेही समजले जाऊ लागते/शकते - माझे अगदी एक्सेप्शनल का होईन पण काही मुल्ये पूर्णपणे बदलली आहेत. उदा. लहानपणी (१५-२० वर्षाचा असेपर्यंत) स्वतःचा विचार करणे मला अपराधी वाटायचे, स्वार्थ हा वाईट गुण वाटायचा आता तो काही प्रसंगी चांगलाच नाही तर आवश्यक गुणही वाटतो)

घाटावरचे भट Thu, 07/08/2014 - 13:10

In reply to by ऋषिकेश

मेघनाच्या प्रतिसादाच्याच अनुषंगाने पाहिलं तर मराठी साहित्यात हा प्रभाव न दिसण्याचं कारण 'लॅक ऑफ एक्स्पोजर टु द सो कॉल्ड मॉडर्न सेट ऑफ व्हॅल्यूज' असं असू शकेल काय? हे लिहिताना, इंग्रजी साहित्य लिहिणारे हा बर्‍याच प्रमाणात कॉस्मोपॉलिटन पार्श्वभूमीचे असावेत, असं मी समजून चाललो आहे.

मेघना भुस्कुटे Thu, 07/08/2014 - 14:29

In reply to by घाटावरचे भट

कुठल्या अँगलनं लॅक ऑफ एक्स्पोजर हो? असं कुठलं एक्स्पोजर नसतं आज मराठी माणसांना, जे कॉस्मोपॉलिटन पार्श्वभूमीतल्या लोकांना असतं?

घाटावरचे भट Thu, 07/08/2014 - 15:07

In reply to by मेघना भुस्कुटे

माझा पॉईंट मांडायला चुकला बहुतेक. मराठी माणसांना एक्स्पोजर तेच आणि तसंच आहे जे इतरांना आहे. पुन्हा मांडताना मी असं म्हणीन की किती मराठी साहित्यिकांनी ही नवीन मूल्यं त्यांना एक्सपोज झाल्यावर अंगीकारली (अ‍ॅडॉप्टेड?) आहेत? जोपर्यंत मूल्य आचरणात येत नाही तोवर त्याचं प्रतिबिंब साहित्यात पडू शकणार नाही असं मला वाटतं. त्याअनुषंगाने मूळ प्रस्तावात मांडलेला प्रश्न (पक्षी: ३०-३२ वयाचे कोणी लेखक/लेखिका मराठीत आहेत काय ज्यांच्या साहित्यात ही नवीन मूल्ये दिसतात?) रिलेव्हंट आहे. असे कोणी असल्यास त्यांचं साहित्य वाचायला मला नक्कीच आवडेल.

अवांतरः 'कुठल्या अँगलनं लॅक ऑफ एक्स्पोजर हो?' पेक्षा 'कुठल्या अँगलनं लॅक ऑफ एक्स्पोजर रे?' हे जास्त योग्य ठरेल.

ऋषिकेश Thu, 07/08/2014 - 15:10

In reply to by घाटावरचे भट

त्याअनुषंगाने मूळ प्रस्तावात मांडलेला प्रश्न (पक्षी: ३०-३२ वयाचे कोणी लेखक/लेखिका मराठीत आहेत काय ज्यांच्या साहित्यात ही नवीन मूल्ये दिसतात?) रिलेव्हंट आहे. असे कोणी असल्यास त्यांचं साहित्य वाचायला मला नक्कीच आवडेल

माझंही एव्हढंच साधं म्हणंय हो.. पण त्यावरून किती इंटरोगेशन चालुये ;) (उत्तरार्ध ह घेणे)

मेघना भुस्कुटे Thu, 07/08/2014 - 15:16

In reply to by ऋषिकेश

उत्तरार्ध पोचला ह्हो! ;-)

पण खरंच प्रश्न आहे मला, नवीन मूल्यं म्हणजे नक्की काय? अशी काही नवी मूल्यव्यवस्था प्रस्थापित झाली आहे का? की फक्त आचरणात आहे आणि आदर्शात अजूनही जुनीच मूल्यं आहेत? तसं असेल तर साहित्यात त्याचं प्रतिबिंब कसं दिसणार?

साहित्याचं एक राहू द्या. ते जरा स्लो असतं असं म्हणू. सिनेमा आणि नाटक? मराठी नाटकात आणि सिनेमात अशी काही बदलती मूल्यं दिसतात का? जुन्या मूल्यांना प्रश्न विचारले जातात का? जर होकारार्थी उत्तर असेल, तर उदाहरणं देता येतील का? (मला वाटतं, मनस्विनी लता रवीन्द्रच्या 'सिगारेट्स'मध्ये ऋला तरी बदलती मूल्यं सापडावीत. 'चाहूल' आणि 'कळा...' ही तर लगेचच आठवलेली आणि आता जुनीच म्हणावीत अशी उदाहरणं. तसा 'बालक-पालक'ही इंट्रेष्टिंग होता. अजून उदाहरणं? :-S)

ऋषिकेश Thu, 07/08/2014 - 15:20

In reply to by मेघना भुस्कुटे

पटकन आठवलं ते छापा काटा नाटक. अर्थात आई कित्ती थोर्थोर -(छुपा अर्थः ती माणूस असुच शकत नाही - असु नये - 'देवी'च असावी / तिने आदर्शच असावे) असल्या जुन्या मुल्यांना छेद देण्याकरिता किती पसारा उभारावा लागला बघ!

चंप्रंची काही नाटके त्या त्या वेळच्या मुल्यांना छेद देणारी होतीच की

सविता Thu, 07/08/2014 - 15:21

In reply to by मेघना भुस्कुटे

माहेरची साडी (अन सासरचे धोतर) वरून गाडी पुढे आलीये की!

रडक्या, सहनशील आणि सत्गुणांच्या पुतळ्या, देवीला नवस करणार्‍या(आणि खलनायकाला चांडाळा अशी हाक मारणार्‍या) - इन ऑल अपर्णा रामतीर्थकरांनी जी आदर्श सून, बायकोची तत्वे सांगितली आहेत तशा नायिका आता दिसत नाहीत.

त्या ऐवजी बिनधास्त, सातच्या आत घरात, घरोघरी मातीच्या चुली वगैरे च्या नायिका बघा!

घाटावरचे भट Thu, 07/08/2014 - 15:21

In reply to by मेघना भुस्कुटे

की फक्त आचरणात आहे आणि आदर्शात अजूनही जुनीच मूल्यं आहेत? तसं असेल तर साहित्यात त्याचं प्रतिबिंब कसं दिसणार?

अगदी असंच काहीसं आहे असं वाटतं... आठवा: रंग दे बसंती मधला ड्वायलॉक - 'हमारा एक पैर पास्ट में ते एक पैर फ्यूचर में...' नव्या मूल्यांची व्यवहार्यता हवीहवीशी वाटते पण जुने आदर्श टाकावेसेही वाटत नाहीत, असं काही तरी.

मेघना भुस्कुटे Thu, 07/08/2014 - 15:23

In reply to by घाटावरचे भट

मूल्य आणि व्यवहार्यता यांचा काय संबंध असतो? असावा? (कीस काढणारे प्रश्न आहेत खरे, पण पडताहेत आता, काय करणार!)

घाटावरचे भट Thu, 07/08/2014 - 15:30

In reply to by मेघना भुस्कुटे

आदर्शवादी मूल्यांच्या सिस्टीममधे 'चलता है' / 'जाने दो यार' टाईप तडजोडी करायला वाव फारच कमी असतो/असायचा. बरीचशी बायनरी सिस्टीम; हे बरोबर ते चूक अशी. व्यवहार्यता म्हणजे माझ्या दृष्टीने ' सध्याच्या परिस्थितीत मी एवढंच करू शकतो आणि तो मला सर्वात उत्तम उपलब्ध मार्ग वाटतो. बाकी जाने दो. डोक्याला ताप नाही करायचा' अशी काहीशी सोय. अर्थातच हे माझं अंडरस्ट्यांडिंग आहे.

मेघना भुस्कुटे Thu, 07/08/2014 - 15:40

In reply to by घाटावरचे भट

मूल्यं म्हणजेच मुळात आदर्श नाहीत का? किंवा काय आदर्श असावं त्याच्या कसोट्या? त्याच्या शक्य तितक्या जवळ जायला जमतं किंवा नाही. ते ठीक.

घाटावरचे भट Thu, 07/08/2014 - 16:08

In reply to by मेघना भुस्कुटे

म्हणूनच मी वर म्हटलं आहे की आपल्या कसोट्या त्याच आहेत, फक्त आपण त्यावर एखादी गोष्ट किती घासून पाहतो यात बदल झाला आहे.

अवांतरः आता माझी खेचली जात असल्याचा संशय मज येऊ लागला आहे. ;-)

मेघना भुस्कुटे Thu, 07/08/2014 - 16:14

In reply to by घाटावरचे भट

हम्म. आपण एकच गोष्ट गोलगोल बोलत सुटलो आहोत!

अवांतरास उद्देशून, अर्थात अवांतर: चक! तसं नसून आज मला वेळ चिकार आहे इतकंच. ;-)

चिंतातुर जंतू Thu, 07/08/2014 - 13:33

In reply to by घाटावरचे भट

>> ब्रॉड लेव्हलला ही मूल्य बदलली नसली तरी एखादी घटना / गोष्ट त्या मूल्यांवरवर किती घासून पाहायची याचे आयाम बदलले आहेत. जो पर्यंत एखादा मूलभूत बदल होऊन ब्रॉड लेव्हललाच आपली मूल्य बदलत नाहीत, तो पर्यंत साहित्यात त्याचं प्रतिबिंब किती पडेल याबाबत मी साशंक आहे.

'ब्रॉड लेव्हलला मूल्यं बदलली नाहीत' ह्या विधानाविषयी साशंक आहे. पैसा, लैंगिकता अशा अनेक गोष्टींबाबत आणि मुळातच 'कशासाठी जगायचं' ह्या बाबतीत आजचा सुशिक्षित मराठी वर्ग आणि ३०-३५ वर्षांपूर्वीचा तोच वर्ग ह्यांच्या मूल्यांत पुष्कळ फरक पडला आहे असं वाटतं. अनेक जण हे अजूनही मान्य करायला तयार नाहीत आणि कदाचित म्हणूनच साहित्यात त्याचं प्रतिबिंब फारसं पडत नाही असं वाटतं.

घाटावरचे भट Thu, 07/08/2014 - 13:51

In reply to by चिंतातुर जंतू

पैसा, लैंगिकता अशा अनेक गोष्टींबाबत आणि मुळातच 'कशासाठी जगायचं' ह्या बाबतीत आजचा सुशिक्षित मराठी वर्ग आणि ३०-३५ वर्षांपूर्वीचा तोच वर्ग ह्यांच्या मूल्यांत पुष्कळ फरक पडला आहे असं वाटतं.

मग कदाचित मी मूल्य या गोष्टीकडे जरा संकुचित दृष्टिकोनातून बघत असेन (इन द सेन्स ऑफ इट्स डेफिनिशन). मी वर लिहिल्याप्रमाणे मला अजूनही असं वाटतं बरं-वाईट ठरवायची कसोटी साधारणपणे तीच असेल, पण समजा एखादी गोष्ट वाईट ठरतीये असं दिसलं तरी त्याला होणारी आपली प्रतिक्रिया नक्कीच बदलली आहे. आजकाल काही गोष्टी त्या कसोटीवर वाईट ठरल्या तरी समाजात सर्रास चालू असल्याने आपण सोडून देतो, किंवा काही गोष्टी तोंड वेंगाडून का होईना स्वीकारतो. पूर्वीइतकी जहाल प्रतिक्रिया कदाचित होत नसेल (व्यक्तीशी संबंध तोडणे, बोलणे टाकणे, वगैरे)...

मन Thu, 07/08/2014 - 14:00

मूल्य म्हणजे काय ?
समाजाची किंवा एका काळाची अशी काही मूल्ये असतात का ?
की मूल्ये वैयक्तिक असतात ?
की दोन्ही प्रकारची असू शकतात ?
बदल तपासणार कसा ?
त्यासाठी उदाहरण प्रातिनिधिक कधी मानता यावे ?

मेघना भुस्कुटे Thu, 07/08/2014 - 14:17

मूल्य स्थलकालव्यक्तिनिरपेक्ष नसतात हे ऋषिकेशचं मत मान्यच आहे. तरीही बरं-वाईट ठरवण्याच्या काहीतरी कसोट्या असतात. माझ्या बाबतीत या कसोट्या शरीरसंबंध, लिंगभाव, धर्म आणि देव, व्यसनं यांच्याशी निगडीत नाहीत. मी सहसा स्त्रीपुरुषसमता, पर्यावरणाच्या बाबतीतली संवेदनशीलता, विषमताधारित शोषणाला विरोध, आंधळ्या परंपरापालनाला विरोध, प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य... या गोष्टी कसोटीसाठी वापरते, असं वरकरणी पाहताना वाटतं आहे. बाप रे, प्रश्न भलताच अवघड आहे की!

ऋषिकेश Thu, 07/08/2014 - 15:16

In reply to by मेघना भुस्कुटे

मी सहसा स्त्रीपुरुषसमता, पर्यावरणाच्या बाबतीतली संवेदनशीलता, विषमताधारित शोषणाला विरोध, आंधळ्या परंपरापालनाला विरोध, प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य... या गोष्टी कसोटीसाठी वापरते, असं वरकरणी पाहताना वाटतं आहे

प्रत्येक मुल्याबद्दल लिहिता येईल. पण ते फारच अवांतर होईल.

उदा: मी स्त्रीपुरूष समानतेपेक्षा लिंगनिरपेक्षता अधिक प्रेफर करतो पण जर कोणी ती दाखवत नसेल तर लगेच ती व्यक्ती माझ्यासाठी व्हिलन होत नाही - तिचे ते वर्तन त्यावेळी मला आवडत नाही इतकेच - त्याने ती व्यक्ती वाईट ठरत नाही. त्या व्यक्तीचे सतत तसे वर्तन असेल तर माझा त्या व्यक्तीशी संवाद कमी होऊ शकतो/थांबुही शकतो पण त्या व्यक्तीत असणार्‍या दुसर्‍या एखाद्या मला आवडलेल्या गुणाबद्द्ल मी त्याचे कौतुकही करू शकतो - करतो.

प्रॅक्टिकली मी लिंगनिरपेक्ष वागतो का? तर बहुतांशवेळा जाणीवपूर्वक होय, नेणीवेत काही प्रसंगी नाही! मला त्यातही काही गैर वाटत नाही.

मी Thu, 07/08/2014 - 14:30

पुर्वग्रह दुषित न होता इतरांचे मत विचारात घेणे, विचार पटला नाही तरी मांडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत करणे त्याचप्रमाणे इतरांची मते सापेक्षरित्या परिस्थितीजन्य असु शकतात त्यामुळे हिणकस प्रतिक्रीया न देता आपली भुमिका संयमीतरित्या मांडता येणं आणि आपली भुमिका फक्त दडपत न रहाता ती बदलत जाणार्‍या अनुभवांवरुन आणि चिंतनातुन बदलता येणे ही आजची मुल्ये आंतरजालावर व एकूण समाजातच महत्त्वाची ठरावीत.

ऋषिकेश Thu, 07/08/2014 - 15:04

In reply to by मी

हिणकस प्रतिक्रीया न देता आपली भुमिका संयमीतरित्या मांडता येणं आणि आपली भुमिका फक्त दडपत न रहाता ती बदलत जाणार्‍या अनुभवांवरुन आणि चिंतनातुन बदलता येणे ही आजची मुल्ये आंतरजालावर व एकूण समाजातच महत्त्वाची ठरावीत.

बास बास! __/\__
तुला एक कटिंग लागू! :)

रोचना Thu, 07/08/2014 - 15:23

धागा वाचताना श्याम मनोहरांचं "उत्सुकतेने मी झोपलो" पुस्तक आठवलं. ठराविक मूल्यांचे ठासून समर्थन अथवा खंडन नाही, पण व्यक्तिगत पातळीवर प्रस्थापित मूल्यांबद्दल साशंक पात्रांच्या तीन कथा त्यात आहेत. कुठलेही पात्र ठामपणे त्यांच्या विरुद्ध नवीन मूल्ये मांडल्याचे आठवत नाही. पण व्यवस्थेचे सुंदर परीक्षण मात्र करतात. सेक्स त्यात आहे, पण वर मांडलेल्या "नवीन" मूल्यांच्या उदाहरणांसारखा मात्र नाही.

(हे टंकता टंकता वाटतंय की "मूल्ये" हा कदाचित फार मोठा शब्द झाला - या पुस्तकात तरी "व्यवस्था", "प्रस्थापित जीवन" वगैरे जास्त सूटेबल होईल, कारण चांगले/वाईट, योग्य/गैर या मुद्द्यांवर सगळं काही बेतलेलं नाही. आणि मूल्ये म्हटल्यावर हे मुद्दे आलेच. पण तरी पुस्तक भारी आहे हे मात्र खरं :-))

ऋषिकेश Thu, 07/08/2014 - 15:33

In reply to by रोचना

आभार! आता पुस्तक वाचणं आलं.. या चर्चेतून ३ नवीपुस्तके (तुम्ही सांगताय ते एक नी मेघनाने सुचवलेली दोन) वाचायला मिळावीत हे ही नसे थोडके

मी Thu, 07/08/2014 - 16:12

In reply to by रोचना

सहमत.

धागा वाचताना श्याम मनोहरांचं "उत्सुकतेने मी झोपलो" पुस्तक आठवलं.

हेच ते, काल हेच मी आठवत होतो पण मला 'यशवंत मनोहर' आठवत राहिले.

राही Thu, 07/08/2014 - 16:35

मूल्य वगैरेचं माहीत नाही,पण गुणावगुणांविषयी आणि संस्कृतिबदलांविषयी सांगता येईल.
पूर्वी शांती, समाधान, धैर्य हे गुण चांगले समजले जायचे. आज अधिरेपणा(इम्पेशन्स्)ला महत्त्व आहे. थांबणे, वाट पहाणे हे प्रकार कालबाह्य होत चाललेत. सर्व काही आता, आत्ताच्या आता, ताबडतोब हवे आहे. त्यासाठी काहीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, ही वृत्ती चांगली समजली जाते. सौम्यपणा, शांत स्वभाव ही पुचाटाची किंवा नामर्दाची लक्षणे. नियम तोडणे, कानाखाली वाजवणे यात पुरुषार्थ असतो. बायकाही भाळतात म्हणे.
पैसे न साठवता उलट ते खर्च करणे, (आणि त्याद्वारे रोब/इम्प्/मार्केटिन्ग जमवणे) हा मोठा गुण. स्वतःची स्तुती करणे, अगदी खरीसुद्धा, याला पूर्वी बढाया मारणे म्हणत. आज सेल्फ-मार्केटिन्ग म्हणतात.
प्रत्येकाशी स्पर्धा करणे हा एक नियम. प्रत्येक ठिकाणी आपण(च) अग्रेसर(च) हवे हा सोस. त्यामुळे प्रयेक क्षेत्रात लुडबूड. काही क्षेत्रे इतरांसाठी सोडून द्यावी वगैरे नाही चालणार. ह्याला मल्टिफॅसेटेड असणे म्हणतात आणि अशा स्वरूपाच्या कामाला मल्टिटास्किंग. नुसतं बी.ई. चालणार नाही. फिनॅन्स, बी.एम. पाहिजेच. हे कौशल्यवर्धन, क्षमतावर्धन.
कुठे काय मिळतं किंवा चांगलं मिळतं याची यादी ओठांवर असणे आणि ती घडाघडा म्हणून दाखवता येणं. हा रिसोअर्स्फुल्नेस. अर्थात अमर्याद शॉपिंग, बाहेर खाणे आलेच. बाहेर फारसे खाऊ नये हे मूल्य नव्हतेच, तो संकेत होता म्हणा. चंगळवादाला किंवा चंगळीला मूल्य म्हणता येईल किंवा कसे ही चर्चा होऊ शकेल.
आरोग्यसंपन्न असणे यावर दिखाऊ भर. ट्रेकिंगला जायलाच पाहिजे, फारसे चालले नाही तरी चालेल. कास पठार बघायलाच पाहिजे, तिथल्या फुलांची रटाळ माहिती कोणी सोबत्यांनी न दिली तर उत्तम. आणि पावसात भिजणे, 'भुट्टा' खाणे, वाफाळता चहा/कॉफीचा कप हे आवश्यक. ( हे संस्कृतिशील वगैरेंसाठी. इतर हुच्चांसाठी बीअर वगैरे.) ही अ‍ॅड्वेंचरची परमावधी. यात मुळामुठेचा/कृष्णा-कोयनेचा पूर किंवा चौपाट्यांवर उसळत्या लाटा बघायला जाणे हे आलेच. (यात भर म्हणजे कुठेही मोठा अपघात, स्फोट, दरडकोसळण झाली की सर्वात आधी बघायला गर्दी करणे. पोलिस हाकलू लागले तर 'मदतकर्त्यांना हाकलता' म्हणून त्यांना शिव्या देणे, जमावाचा पाठिंबा असेल तर भांडणेही.)
वगैरे.
.

अतिशहाणा Thu, 07/08/2014 - 16:43

In reply to by राही

मस्त प्रतिसाद. ५ स्टार.

मराठी साहित्यात या मूल्यांचेही फारसे दर्शन नसतेच.

मी Thu, 07/08/2014 - 16:57

In reply to by राही

पण गुणावगुणांविषयी आणि संस्कृतिबदलांविषयी सांगता येईल.

हा बदल आहे असे तुम्हाला का वाटते? नक्की उदाहरणे सांगु शकाल काय?

थांबणे, वाट पहाणे हे प्रकार कालबाह्य होत चाललेत. सर्व काही आता, आत्ताच्या आता, ताबडतोब हवे आहे. त्यासाठी काहीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, ही वृत्ती चांगली समजली जाते

बदलाचे उदाहरण देता येईल काय? म्हणजे पुर्वी होतं पण मर्यादीत होतं, आता मर्यादा नाही वगैरे.

सगळ्याच बदलांचे काही 'तौलनिक' उदाहरण देता येईल काय? म्हणजे बदल घडला आहे किंवा प्रमाण वाढले आहे, नक्की काय आहे?

मुली घराबाहेर पडल्यामुळे स्वतंत्र झाल्या आणि त्यांच्यासंदर्भात चंगळवाद बोकाळला हे उदाहरण होउ शकेल काय?

अतिशहाणा Thu, 07/08/2014 - 18:18

In reply to by मी

हा बदल आहे असे तुम्हाला का वाटते? नक्की उदाहरणे सांगु शकाल काय?

राही यांच्या प्रतिसादाच्या अनुषंगाने चटकन सुचलेले एक उदाहरण म्हणजे मनमोहनसिंग विरुद्ध नरेंद्र मोदी.
सुशिक्षित, उच्चविद्याविभूषित, सुसंस्कृत, मितभाषी आणि संयमी मनमोहनसिंग हे 'पूर्वीचे' मूल्य. आताचे हाय अचिवर, मल्टिटास्किंग, मल्टिफॅसेटेड, सेल्फ प्रमोटिंग आणि रिसोर्सफुल्ल मूल्य नरेंद्र मोदी. (त्यांच्याविषयी सेल्फसेन्सॉरशिपचे बोटचेपे धोरण मी स्वतःपुरते आखून घेतल्याने नेमक्या शब्दात लिहीत नाही. :( )

मी Thu, 07/08/2014 - 18:25

In reply to by अतिशहाणा

सुशिक्षित, उच्चविद्याविभूषित, सुसंस्कृत, मितभाषी आणि संयमी मनमोहनसिंग हे 'पूर्वीचे' मूल्य. आताचे हाय अचिवर, मल्टिटास्किंग, मल्टिफॅसेटेड, सेल्फ प्रमोटिंग आणि रिसोर्सफुल्ल मूल्य

पंतप्रधान पदाच्या संदर्भात हे मूल्य आपण सांगत आहात काय? उदाहरण मान्य करायला हरकत नाही पण पूर्वीचे आणि आताचे ह्यामधे एक पूर्वीचे चांगले आणि आताचे थोडे नकारात्मक ह्या अर्थाने ते जाणवत आहे ते तसे आहे काय? कि फक्त 'बदला'चे उदाहरण दिले आहे?

मनमोहन सिंग हे मूल्य म्हणून निवडून दिलेले पंतप्रधान नाहित हे ही लक्षात घेण्यासारखे आहे, इंदिरा गांधींच्या काळापर्यंत मागे गेल्यास पूर्वीचे 'मूल्य' वेगळे असेल काय?

अतिशहाणा Thu, 07/08/2014 - 18:27

In reply to by मी

निव्वळ पदाच्या संदर्भात नाही. देशातील जनतेला स्वतःच्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करणारा नेता कोण वाटतो त्या संदर्भात हे उदाहरण दिले आहे.

आताचे ह्यामधे एक पूर्वीचे चांगले आणि आताचे थोडे नकारात्मक ह्या अर्थाने ते जाणवत आहे ते तसे आहे काय?

मला स्वतःला ते नकारात्मक वाटते त्यामुळे तशी छटा आलीच आहे. पण हाय अचिवर, गो-गेटर , हे महत्त्वाचे 'गुण' मानले जातात 'हिंदू ग्रोथ रेटची' परंपरा सांगणारे जुने गुण काहींना वाईट वाटू शकतात व नवे गुण सकारात्मक वाटू शकतात. टू ईच हिज ओन.

कि फक्त 'बदला'चे उदाहरण दिले आहे?

निव्वळ बदलाचे उदाहरण नसून नवीन मूल्ये कशी सर्वमान्य होत जातात त्याचे उदाहरण आहे.

मी Thu, 07/08/2014 - 18:51

In reply to by अतिशहाणा

तुम्ही प्रतिसाद देताना माझा प्रतिसाद मी थोडा बदलला त्यामुळे कदाचीत सगळ्या मुद्द्यांना तुम्ही स्पर्ष केला नसावा.

निव्वळ बदलाचे उदाहरण नसून नवीन मूल्ये कशी सर्वमान्य होत जातात त्याचे उदाहरण आहे.

कशी हे समजले नाही, मी वर म्हंटल्याप्रमाणे मनमोहन हे निवडून आलेले पंतप्रधान नाहीत त्यामुळे 'पूर्वीची' मूल्ये ठरविण्यसाठी ते उदाहरण चपखल आहे असे वाटत नाही, त्याचप्रमाणे मनमोहनसिंग ह्यांचा स्वभाव पंतप्रधान/नेता ह्या पदाला साजेशा आहे हा विचार (मूल्य) पूर्वी होता असे तुमच्या प्रतिसादातून सुचीत होते ते योग्य आहे काय?

अतिशहाणा Thu, 07/08/2014 - 21:50

In reply to by मी

हा मुद्दा इंटरेस्टिंग आहे. मला वाटते यूपीए-२ च्या निवडणुकीत मनमोहनसिंगांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून काँग्रेसने जाहीर केले होते. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे नवमतदारांशी न जुळलेली नाळ. नवमतदारांना मोदी जवळचे वाटण्यामागे ही नवी मूल्यप्रणाली महत्त्वाची वाटते.

अजो१२३ Thu, 07/08/2014 - 22:38

In reply to by अतिशहाणा

अच्छे दिन वैगेरे केवळ दाखवायचे दात आहेत. ते कधीही येणार नाहीत. मात्र पक्के रस्ते, वीज, बंदरे, रेल्वे, पाणी यांची खात्री बाळगावी. एन डी ए चे पायाभूत क्षेत्राला जी कमिटमेंट आहे तिला तोड नाही.

वामन देशमुख Fri, 08/08/2014 - 11:00

In reply to by अजो१२३

अच्छे दिन वैगेरे केवळ दाखवायचे दात आहेत. ते कधीही येणार नाहीत.

  1. "अच्छे दिन" म्हणजे काय आणि कोणत्या कारणांनी "ते कधीही येणार नाहीत" हे थोडं विस्तृत करून सांगू शकाल?
  2. "पक्के रस्ते, वीज, बंदरे, रेल्वे, पाणी" आणी "पायाभूत क्षेत्राला कमिटमेंट" यांची "अच्छे दिन" मध्ये गणना होत नाही याची खात्री बाळगावी काय?

अजो१२३ Fri, 08/08/2014 - 11:06

In reply to by वामन देशमुख

ह्युमन डेवलपमेंट इंडेक्स मधे यातलं काहीच नाही. मग अजून एक अमर्त्या सेन येणार नि म्हणणार कि मोदीशासित भारतापेक्षा मालदिवची प्रगती कशी जास्त झाली आहे. अनंतमूर्ती राहायला अजून एक देश शोधणार, वैगेरे वैगेरे.

राही Fri, 08/08/2014 - 17:35

महाराष्ट्रापुरतेच : (आणि कोणत्या संदर्भात वगैरे.)
पूर्वी मुले परवचा म्हणत. आता पाढे, अडीचकी औटकी पाठ करणे आवश्यक राहिलेले नाही. ते काम छोटेसे यंत्र करू शकते.
पण पुन्हा, ही परवचा-रामरक्षा वगैरे सर्व थरांतील मुलांकडून म्हटली जात होती का? जर नव्हती, तर जे नव्हतेच ते बदलले असे कसे म्हणता येईल?
पूर्वी बायका घरकामातच दंग असत. किंवा घरकामच त्यांना दिवसभर पुरत असे. आज शहरांमध्ये घरकामाची फारशी ओढ बायकांना राहिलेली नाही.
पण पुन्हा, बायका शेतावर कामाला जात नसत का? मोलमजुरी, मोलाने दळण-कांडण-भांडीधुणी-सारवण करीत नसत का? सुग्रास आणि निगुतीच्या स्वयंपाकाची संस्कृती सर्वत्र होती का?
आज मुंबईतल्या चाळी-झोपड्यांतून एकत्र जमून बायका रात्री चालत सिद्धिविनायकाला, लालबागच्या राजाला, महालक्ष्मीला, मोतमाउलीला जातात. तेवढी फुरसद आणि मोकळीक त्यांना असते/मिळते. हा बदल आहे का? आज मार्गशीर्षातले गुरुवारचे उपास समस्त झोपडीवासी बायका करतात. फ्लॅटवासी बायका बहुधा करत नाहीत. हा रिवर्स बदल म्हणावा का?
आज नऊवारी साडी कुणीही नेसत नाही. पंजाबी घालतात नाहीतर नुसत्याच गाउन-कम-हाउसकोट घालून फिरतात. अंगभर लांबरुंद कपडा न घालणे याला मूल्यबदल म्हणावे का? पण पुन्हा; अंगभर कपडे सगळ्यांकडे होते का? आज बायका अंतर्वस्त्रे वापरतात. पूर्वी वापरत नसत. याला राहाणीबदल म्हणावे की संस्कृतिबदल? जर निव्वळ राहाणीबदल असेल तर जीन्स घातल्यावर संस्कृति का बुडते?
आज काही बायका सिगरेट ओढतात, दारू पितात, शिव्या (बहुधा इंग्लिश मधून) देतात. हा मूल्यबदल अथवा संस्कृतिबदल म्हणवला जावा का? पूर्वी काही बायका विडी ओढायच्या, दारू प्यायच्या, मायबोलीतून शिव्या द्यायच्या. मग आता नेमका बदल कोणता? राजमान्यता हा?
पूर्वी चार बुके शिकणे किंवा त्याही पूर्वी याज्ञिकी, अमरकोश, ज्योतिष इ. थोडेसे वेदांग ,धर्मनिर्णय शिकणे हे एका छोट्याश्या समाजगटासाठी आवश्यक होते, कदाचित मूल्यही होते. आज शिकणे हे मूल्य आहे, सार्वत्रिक आहे. आज घरकामवाली बाई तिच्या मुलांना कान्वेन्तमध्ये घालण्यासाठी धडपडते. शिकवण्या 'लावते'. हाही पुन्हा बदलच.
ही मूल्ये किंवा त्यातील बदल हे कोणत्या संदर्भात मोजले जावेत? संस्कृतीचा मुख्य प्रवाह कशाला (साठी नव्हे, ला च, द्वितीया.) म्हणावे?
कविवय सुर्व्यांची एक कविता आहे, 'काय ते पत्रात लिवा'. एका बाईचा नवरा मध्यपूर्वेत हरकामाला गेलेला. बाईच्या वागणुकीविषयी काही लोक त्याच्याकडे चुगली करतात. तो बायकोला पत्र पाठवतो की बाहेर पडू नकोस, शेजारीपाजारी बोलू नकोस वगैरे. ती त्याला उलट पत्र लिहिते त्याचा साधारण सारांश असा की मुलांच्या फिया भरल्या नाहीत म्हणून शाळेत बोलवलंय, 'आता शाळंत जाऊ की नको, काय ते पत्रात लिवा. सासरा आजारी झालाय तर दवाखान्यातून औषध आणू की नको, काय ते पत्रात लिवा. मुलाला हॉस्पिटलमध्ये भरती करू की नको, काय ते पत्रात लिवा. वगैरे. हा बदल मला लक्षणीय वाटला.

ऋषिकेश Fri, 08/08/2014 - 17:43

In reply to by राही

छान प्रतिसाद.. डोक्याला उत्तम खाद्य :)
असं पत्रात लिवा ही कविता स्वतः सुर्वे तर मोठ्या मिश्कील ढंगात सादर करत त्याची आठवण झाली.

राही Fri, 08/08/2014 - 18:30

In reply to by ऋषिकेश

सुर्व्यांच्या तोंडून ऐकली आहे. अलीकडे महेश केळूसकरही छान वाचतात.
बाय द वे, ही कविता अनेक भारतीय भाषांत भाषांतरित झालेली आहे.

मेघना भुस्कुटे Fri, 08/08/2014 - 17:48

In reply to by राही

ही कविता माहीत आहे.

(मैं अच्छी हूं घबराओ नको, ऐसा खत में लिखो

कुणी मेल्याने तुझको लिखा मैं निकली रोडावर

गर तुझको शक है मुझ पर, नहीं निकलूंगी बाहर

मैं पानी को जाऊँ क्या नको, ऐसा खत में लिखो

सौ रुपये का हिसाब मांगे तो मैंने घर में क्या खाई

पानी को तीस,लाइट बीस, पच्चीस का राशन लाई

दी पच्चीस दूधवाले को , ऐसा………………॥

पिछ्ली बार आए, कुछ नहीं लाए, अबकी लाना टेप

बेबी बड़ी हुई ऐकन को,ऐसा खत ……………… ।

बाबा को आया बुखार खांसी, प्राइवेट में गई उसको लेकर

सौ रुपया दिया, इंजेकशन लिया, असर न हुआ बच्चे पर,

मैं जे जे को जाऊँ क्या नको, ऐसा ………………।

बेबी को मैं ने इस्कूल डाला, खूब अच्छा पढ़ती है

औरतों ने भी है पढ़ना लिखना, आवाज़े-ए-निस्बां का मन है

मैं पढ़ने को जाऊं क्या नको, ऐसा………………।

आवाज़े-ए-निस्बां है महिला मंडल, जाती मैं उस मीटिंग को

तेरी बहन को शौहर जब पीटे, जाती सब धमकाने को

उसको मदद मैं करुं क्या नको, ऐसा……………।

मंहगाई इतनी रोजगार भी नहीं, तेरे जैसे जाते दुबई को

घर भी कितने टूट जाते हर दिन, दुख होता मेरे मन को

तू आजा जल्द मिलने को, ऐसा………………।

गया तू जबसे बिगड़ा है माहौल , फ़साद का डर है मुझको

धर्म के नाम पे कैसे ये झगड़े, अमन से रहना है सबको

ये बस्ती में समझाऊं क्या नको, ऐसा………॥

सऊदी जाके, दुबई जाके कितने दिन हम टिकेगें

इसी समाज को हमको बदलना, बच्चों के लिए अपने

मैं मोर्चे में जाऊँ क्या नको, ऐसा…………॥

कोणी मेल्या ने तुझको लिखा, मैं निकली रोडावर

मीटिंग में जाती, मोर्चे में जाती, सुधरने जिंदगानी को

तू भी आजा साथ देने को, ऐसा…………… )

पण सुर्व्यांची नाही माहीत. या दोन्ही कवितांमध्ये काही धागा आहे का?

नितिन थत्ते Sat, 09/08/2014 - 09:44

In reply to by राही

फ़ारच उत्तम प्रतिसाद.

पूर्वीच्या काळी (म्हणजे मी लहान असताना आणि त्याच्या आधी) सामाजिक संपर्क बहुधा खूप कमी असे. विशेषतः समाजाच्या इतर थरात मिसळणे क्वचितच होत असे. त्यामुळे आपल्या मर्यादित वर्तुळात जी मूल्ये/प्रथा असतात तीच त्याकाळची सगळ्या समाजाची मूल्ये होती असा समज निर्माण होतो.

अजो१२३ Sat, 09/08/2014 - 14:39

In reply to by नितिन थत्ते

माझे एक्झॅक्टली उलटे आहे. आमचे शहरी सवर्ण (वयस्क वा कोवळे) सहकारी जुनी समाजमूल्ये म्हणून जे काही सांगतात ते ऐकून मला घेरी येते.

मी Fri, 08/08/2014 - 19:17

@राही - प्रतिसाद आवडला.

ही मूल्ये किंवा त्यातील बदल हे कोणत्या संदर्भात मोजले जावेत? संस्कृतीचा मुख्य प्रवाह कशाला (साठी नव्हे, ला च, द्वितीया.) म्हणावे?

कुटुंबातील/समाजातील सर्व स्तरातील लोकांना मिळणार्‍या संधी, अवांतर/अतिरिक्त साधनांचा(पैसे, वेळ, श्रम) होणारा उपयोग, परस्पर स्वातंत्र्याबद्दलची भुमिका ह्या निकषांवर मूल्ये किंवा त्यातील बदल मोजता यावेत असे वाटते.