पुस्तक वाचणार्या सहप्रवाशांत घट
मी बरीच वर्ष झाली प्रवासात वाचन करतोय.
शेजारी कोणी काही वाचत असेल तर मला प्रचंड उत्सुकता असते की ती व्यक्ती काय वायतेय. जर ते पुस्तक मी वाचलेले नसेल तर ते काय आहे? कशाबद्दल आहे? वगैरेही उत्सुकता असते जी बहुतांशवेळा मी ते पुस्तक हाताळायला मागून व मालक/मालकीण बोलका/की वाटली तर प्रश्न विचारून शमवतो
गेल्या ४-६ वर्षात माझ्या बाजुला पुस्तक वाचणारेच मला अभावाने भेटले आहेत. जे भेटले त्यापैकी २५% मंडळी पोथ्या वाचत होती, उर्वरीतांपैकी जे मराठी वाचत होते ते पुलं, वपु, विश्वास पाटिल नाहितर डोक्यावरून पाणी म्हणजे कोसला आणि इंग्रजीतही हॅरी पॉटर, पॉलो कोहेलो, जेफ्रि आर्चर, शेल्डन, ग्रिशम वा तत्सम हेच वाचताना दिसली आहेत. पण ते असो, तो वेगळा विषय झाला
उलट भुमिकेतही, पूर्वी (मी शाअळा-कॉलेजात असताना) मी कोणते पुस्तक वाचतो आहे त्यात डोकावून पहा (ज्याचा मला तेव्हा राग येत असे - अजुनही येईल कदाचित) किवा काय वाचतोय त्याची चौकशी कर, त्याबद्दल चर्चा कर असे प्रसंग प्रवासात येत. हल्ली प्रवासात पुस्तक वाचताना आजुबाजुच्यांपैकी कोणाला किती उत्सुकता असते प्रश्नच आहे.
हे असे का झाले असावे? प्रवासात वाचन करणे डोळ्यांना हानीकारक आहे असे समजल्याने अनेकांनी गाडीत पुस्तके वाचणे सोडले आहे की कानात गाणी वाजवायची सोय आल्यावर / मोबाईलवर विडीयो बघायला मिळू लागल्यावर / मोबाईलवरच मनोरंजनाची-संवादाची ढिगभर साधने वाढल्यावर पुस्तक वाचनाचा ओढा कमी झाला आहे की एकुणातच पुस्तके आणि त्याबद्दलची उत्सुकता कमी आहे?
परदेशात मात्र मला नेहमी उलट अनुभव आला आहे. कितीही तंत्रदृष्ट्या प्रगत राष्ट्र असले तरी अनेक प्रवासी वाचताना आढळले आहेत, इतकेच नाही तर त्यांना पुस्तके आणि एकुणच साहित्यविश्वाबद्दल काहिना काही चर्चा करताना वगैरेही पाहिले आहे. मग मला जाणवणारी घट हा माझ्या लिमिटेड सँपल सेटचा परिणाम आहे की खरोखरच घट आहे? खरोखर असल्यास ही फक्त भारतातच का असावी?
माझ्या आजूबाजूला लोक अजूनही
माझ्या आजूबाजूला लोक अजूनही प्रवासात वाचताना दिसतात. बरेचदा ते हॅरीपॉटर, कोहेलो, आर्चर, शेल्डन, ग्रिशम, संघवी असले काहीतरी असते. पण कंपनीच्या बसमधे २० लोक असतील, तर निदान ५-६ जण तरी पुस्तक वाचताना दिसतात. बसमध्ये मोबाईलवर (पुस्तक) वाचणारे किमान ३ लोकही माहीत आहेत. मराठी पुस्तक मात्र अगदी अभावानेच हातात दिसते. (एकाच्या हातात गौरीचे 'मुक्काम' पाहिल्यावर मला त्या अनामिक मॅनेजरबद्दल आपलेपणा वाटला होता. :प)
मी काय वाचते आहे ते लोकांनी पाहिलेले मला आवडत नाही. याला काहीही सयुक्तिक कारण नाही. नाही आवडत खरे. म्हणून पुस्तकांना कव्हर घालायची काळजी बर्याचदा घेतली जाते. पण लोक काय वाचताहेत हे माना शक्यतोवर साटल्याने वाकड्या करकरून जाणून घेण्याची उत्सुकताही मला असते, हा मनोरंजक भाग आहे.
सध्याच्या कंपनीतल्या एका सिक्युरिटी गार्डने मला सुखद धक्का दिला होता. येता जाता वाचण्यासाठी मी कर्व्यांचे जाडजूड चरित्र आठवडाभर रोज वाहून नेत असे. पुढच्या आठवड्यात ते संपले, तेव्हा हातात दुसरे काहीतरी पुस्तक होते. एरवी कधी साधे स्माईलही न देणार्या त्या गार्डने बॅग तपासताना मला विचारले: संपली रघुनाथाची बखर? मी सेकंदभर बावचळून त्याच्याकडे पाहतच राहिले. मग मात्र 'काय वाचताय सध्या?'ची देवाणघेवाण त्याच्याशी सुरू झाली!
तुझा प्रतिसाद वाचून, मी चार
तुझा प्रतिसाद वाचून, मी चार वर्षापूर्वी राहते शहर बदलले त्यामुळे मला (प्रवसात) वाचन न करणारी माणसे भेटु लागली की काय असे वाटले :)
आमच्या सध्याच्या कंपनी बसमध्ये अनेकजण पेपरात डोके खुपसून असतात मात्र पुस्तक वाचन करणारी माझ्यासकट फार तर २-३ टाळाकी दिसतात (कपॅसिटी ४०+ सीट्स).
बाकीचे झोपलेले असतात.
हे झोपलेले चांगले, पूर्वी कोथरूडहून येताना तर अजून वीट येत असे, वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट्स, (तथाकथित न वाढणारे) पगार, काँग्रेसला शिव्या आणि शिक्षणक्षेत्र व त्यायोगे शेवटी आरक्षणाला शिव्या या चौकटित बंदिस्त राहून, तेच चेहरे कित्येक वर्षे तेच मुद्दे घेऊन, अविश्रांत तीच ती चर्चा करत असत! मराठी संस्थळांवर आल्याचा फील घरापासूनच येऊ लागे ;)
??
न वाचले तर मळमळत नाही असे आहे का? अंमळ विचित्रच वाटतेय, पण असो. मला स्वतःला वाचन ऑर नो वाचन, एसी(बंदिस्त) बसमध्ये बसले की २-३ तासांनी मळमळायला लागते. झोप लागली तर तो त्रास नै, पण पुण्याहून मिरजेला जाताना हा त्रास अधूनमधून होतो खरा. तरी आधीपेक्षा पुष्कळच बरंय. नॉन एसीत हा त्रास होत नाही. आधी मिरजेहून रत्नागिरीस जाताना बस अंबा घाटात आली रे आली की एक तरी उलटी हरहमेश अनुभवलेली आहे.
अनकूल नर्ड!
>> हल्ली प्रवासात पुस्तक वाचताना आजुबाजुच्यांपैकी कोणाला किती उत्सुकता असते प्रश्नच आहे.
मी प्रवासात अनेकदा वाचतो. त्याबद्दल आजूबाजूच्या कुणाला उत्सुकता असते असं नेहमीच नाही, पण कधी कधी घडतं. त्यावरून संभाषण सुरू होऊन ते माझ्यावर हलकेच लाईन मारण्याच्या प्रयत्नापर्यंत गेल्याचेदेखील अनुभव मला आहेत. आताशा प्रवासात (विशेषतः विमानात किंवा रेल्वेच्या एसी वर्गांमध्ये वगैरे) लोकांच्या हातात किंडल/टॅबलेटही दिसतात. युरोपात आणि अमेरिकेच्या काही शहरांत मेट्रोचा प्रवास करून रोज शिकण्याच्या / कामाच्या ठिकाणी जाणारे लोक जिथे दिसतात तिथे वाचणारे पुष्कळ असतात. त्या मानानं मुंबई-पुण्यातले रोजचे प्रवासी कमी वाचत असावेत किंवा वर्तमानपत्रं वाचताना अधिक दिसतात; पण मुंबईच्या लोकलमध्ये पुस्तक वाचणारे मोजके लोक दिसतात.
जाता जाता : आजच वाचलेल्या बातमीनुसार परदेशात वाचन 'अनकूल' आहे.
मलाही प्रवासात वाचन करायला
मलाही प्रवासात वाचन करायला आवडते आणि शक्य तेवढा प्रयत्न करतो वाचन करायचा. बाकी वेळेस झोपायचा प्रयत्न करतो किंवा खिडकीतून गंमत-जंमत बघत वेळ घालवतो. पण मोठी अडचण असते ती रात्रीच्या (बस) प्रवासाची कारण तेव्हा ना वाचन करता येते ना बाहेरची गंमत बघता येते. कानात बोळे घालून गाणे ऐकावे म्हंटलं तर त्याचाही जाम कंटाळा येतो अर्ध्या-एक तासानंतरच. त्यात माझा जास्त प्रवास व्हायचा पुर्वी तो नाशिक-पुणे हाच आणि नाशिक-पुणे प्रवास हा रात्रीचा करणेच सोयीचं असल्याने दिवसा प्रवास करण्याचा पर्यायही नसायचा. त्यात प्रवासात झोप येत नाही (हात-पाय पसरून नी अशक्य लोळून झोपायची सवय अजून गेली नसल्याने कदाचित बस मधे छोट्याश्या आसनावर झोप लागत नसावी) शिवाय पटकन समोरच्याशी वा नवीन व्यक्तीशी बोलणे जमत नाही -वेळ लागतो ओपन-अप व्हायला मग ती ही विरंगुळ्याची सोय नाही. त्यामुळे आजूनही बसने एकट्याने रात्रीचा प्रवास करायचे म्हंटले की जाम जीवावर येते.
बादवे हया (बरेचदा रात्रीच्या) प्रवासांत मी एक 'ऑब्झर्व' केलय की बरेच लोक (शक्यतो नुकतच लग्न ठरलेले वा प्रेमीयुगल) फोन वर आपल्या जोडीदाराशी आख्खा प्रवास गप्पा मारत बसलेले असतात ते ऐकून थोडी चिडचीड होतेच पण आश्चर्य ही वाटतं की एवढं काय बोलतात लोक आणि एवढी बॅटरी साथ देते का पाच-पाच तास? असो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न.
बादवे हया (बरेचदा रात्रीच्या)
बादवे हया (बरेचदा रात्रीच्या) प्रवासांत मी एक 'ऑब्झर्व' केलय की बरेच लोक (शक्यतो नुकतच लग्न ठरलेले वा प्रेमीयुगल) फोन वर आपल्या जोडीदाराशी आख्खा प्रवास गप्पा मारत बसलेले असतात ते ऐकून थोडी चिडचीड होतेच पण आश्चर्य ही वाटतं की एवढं काय बोलतात लोक आणि एवढी बॅटरी साथ देते का पाच-पाच तास?
ईव्हन विथौट क्याटवुमन, बॅटमॅन डज़ क्नोव धिस. डोंट यू? ;)
रात्रीच्या बसप्रवासात
रात्रीच्या बसप्रवासात वाचनाबद्दलः
मध्यंतरी मुंबै-पुणे वार्या बर्याच होत. तेव्हा मोबाईलवर वाचायची सवय इतकी झाली नव्हती. रात्रीच्या एका शिवनेरीत मी चक्क मोबाईलचा टॉर्च लावून त्या प्रकाशात वाचत होते. मधेच बस थांबली. डायवर चक्क उठून मागे आला आणि माझ्यापाशी थांबून म्हणाला, "त्या दिव्याचा त्रास होतोय पुढच्या आरशात. प्लीज घालवता का?" लोक माझ्याकडे टकमक बघतायत. मग काय करता? तेव्हापासून मीही रात्रीच्या प्रवासाचा वेळ राहिलेल्या फोनीय गप्पांचा कोटा पुरा करण्यात घालवते. :ड
बादवे: तुम्ही एकही अफेअर केलेलं नाही? फोनवर लोक काय बोलतात, असा प्रश्न पडलाय तुम्हांला, म्हणजे बहुधा नाही! ;-)
बादवे: तुम्ही एकही अफेअर
बादवे: तुम्ही एकही अफेअर केलेलं नाही? फोनवर लोक काय बोलतात, असा प्रश्न पडलाय तुम्हांला, म्हणजे बहुधा नाही! (डोळा मारत)
हा हा हा, म्हणजे फोन वर किती बोललो किंवा फोनवर फार बोललो हा काय आता विदाच समजावा का 'एकतरी' अफेअर केला ह्याचा ;)
थोडक्यात माहिती आहे काय-काय बोलतात ते (आणि अनुभवही ;) ) :P पण पाच-सहा तास सलग बोलणे म्हणजे वैताग येत नाही का? (अर्थात माझा समज असा आहे की ह्या गप्पा अश्य ढंगातल्या असतात 'शोनू तू का खाल्लं' , 'बच्चू तू गोडेस' 'ओ हनी' , 'यु मा आप्पल पा' आणि तसंच काही अती लाडी-लाडी वगैरे. ह्या असल्या गप्पांना प्रेमाच्या गप्पा म्हणत असतील तर माझी पहिल्या १० मिनीटातच चिडचिड होईल ते ऐकून आणि म्हणून आश्चर्य वाटत इतकच)
पण पाच-सहा तास सलग बोलणे
पण पाच-सहा तास सलग बोलणे म्हणजे वैताग येत नाही का?
ते बोलण्याच्या स्पीडवर अवलंबून असतं असं वाटतं. एकतर सर्वकाळ आपणच बोलत नै, सबब ५-६ तास म्हटले तरी आपल्या 'बोलण्या'चा वेळ निम्माच. शिवाय त्यातही बराच वेळ मोनोसिलॅबिक हमिंग, तसेच लॅकॉनिक लव्हडिक्लरेशन/फ्लर्टिंग/टीजिंग/व्हर्बल कडलिंग यात जात असल्याने तितकेसे त्रासदायक जात नसावे.
अर्थात, इतके सर्व असले तरी ५-६ तास हा वेळ जास्तच वाटतो याच्याशी सहमत. १-२ तास इज़ ओके.
बादवे हया (बरेचदा रात्रीच्या)
बादवे हया (बरेचदा रात्रीच्या) प्रवासांत मी एक 'ऑब्झर्व' केलय की बरेच लोक (शक्यतो नुकतच लग्न ठरलेले वा प्रेमीयुगल) फोन वर आपल्या जोडीदाराशी आख्खा प्रवास गप्पा मारत बसलेले असतात ते ऐकून थोडी चिडचीड होतेच पण आश्चर्य ही वाटतं की एवढं काय बोलतात लोक आणि एवढी बॅटरी साथ देते का पाच-पाच तास? असो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न.
हाय कंबख्त, तूने पीही नहीं।
असो. स्वानुभव सांगते. बोलण्यासारखं पुष्कळ असतं. आलेले अनुभव, काही डोक्यात जाणारी माणसं, हापिसात्/घरी काय घडले, काय करायचं होतं, प्रत्यक्षात काय चालू आहे, पुस्तक्/नाटक्/चित्रपट्/खाणं, वेगवेगळी ठिकाणं इ. इ. ओळख नवीनवी असते त्यामुळे एकमेकांना सांगण्यासारखं आणि ऐकण्यासारखं पुष्कळ असतं. त्यात बॅट्या म्हणतो त्याप्रमाणे एकच एक व्यक्ती बोलत नसते, दुहेरी संभाषण असतं. त्यामुळं प्रेमविवाह झालेल्या/लग्नाआधे फोनवर बोलायला पुरेसा अवसर मिळालेल्या व्यक्तींना एकमेकांच्या वर्तुळातल्या सगळ्या व्यक्ती त्यांच्या कंगोर्यांसह माहित असतात. थोडक्यात सांगायचं तर आजकाल आपण आपल्या Whatsapp ग्रुपवर जे काही बोलतोय तसंच काहीसं. गप्पांचे रोख कधी कसे बदलत जातात कळत नाही.
अर्थात कुणाचा वेगळा काही अनुभव असेल तर तोही सांगावा.
नुकतेच लग्न झालेले लाजरे अन्
नुकतेच लग्न झालेले लाजरे अन् साजरे मुखडे बरेच बघितले आहेत, विशेषतः गावाकडे. पण शहरात लग्न झालेले जोडपे आठवड्याभरानंतर नवीनच आहे असे क्वचित भासते. कदाचित माझा सँपलसेट वेगळा असेल.
प्रेमी युगुलं काय बोलतात यावर काही धरबंध नाही. एकदा ट्रेनमध्ये एका जोडप्यातली मुलगी मुलाला,'My parents were too *****. They got married in feb and I was born in December. Before that my mother had an abortion.' असं अगदी सहजपणे म्हणाली. त्यापूर्वी ती त्याच्यासोबत त्याने तिचे फेसबुक आणि कुठले कुठले डिसप्ले पिक्स लाईक केले नाहीत म्हणून फुरंगटून बसली होती. अर्थात मी या छचोर वयाच्या पलिकडे असलेल्या प्रेमी युगुलांबद्दल (हा शब्द खरंच बोली भाषेत वापरला जातो का?) बोलतेय.
+१
प्रेमी युगुल हा शब्द फक्त वर्तमानपत्री आणि ग्रांथिक लेखनातच आहे सध्या तरी. "प्रेमी युगुलास मारहाण(पोकळ/भरीव बांबूने इ.इ.)", "प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे१", "प्रेमी युगुलातील मुलीचा विनयभंग", इ.इ. संदर्भातच वाचावयास मिळणारा.
१"ये लोग बगीचे में जाके अश्लील चाळे करते हैं", एक शिवसेना नेते-टीव्हीवर एकूणच व्हॅलेंटाईन डे आणि भारतीय संस्कृती इ.इ. बद्दल आपली मधुर वाणी ऐकवीत असताना.
मला शक्यतोवर प्रवासात वाचन
मला शक्यतोवर प्रवासात वाचन करायला आवडत नाही-जर एखादं ललित पुस्तक असेल तर.
पण नॉनफिक्षण असेल तर हर्कत नाही. एखादं इतिहासाचं पुस्तक असलं किंडलात तर मग टेण्षणच नाही. सहप्रवाशी कधी लक्ष देत नाहीत त्यामुळे मग वाचन आणि आपण दोघेही तल्लीन होऊन जातो. पुण्याहून तासदीडतास हा उत्साह टिकतो. मग पुढे वाचलेल्यावर चिंतन मनन करीत असताना अचानक सांगली येते. ती शृंखला भंगून मी वडापमध्ये बसून मिरजेला जातो. घरी जेवणबिवण झालं की पुन्हा मग मागील पानावरून पुढे आहेच.
विमानप्रवास असेल तर मात्र मी नेहमीच वाचन करतो. त्याही वेळी कधी कोणी डिष्टर्बवल्याचे आठवत नाही, तस्मात मजेत वेळ निघून जातो.
प्रवास
पूर्वी प्रवासात वाचीत असे. गेल्या काही वर्षांपासून (खरे म्हणजे वाचनाचा चष्मा लागल्यापासून) बस-रेल्वेत वाचताना त्रास होतो म्हणून बंद केले आहे. सहप्रवासी बोलका असेल तर उत्त्मच अन्यथा स्वस्थ बसून राहतो!
कानात बोळे घालून गाणी ऐकण्याचे सोडल्यालाही काळ लोटला!
हल्लीहि सहप्रवासी वाचतांना दिसतात पण
हल्लीहि सहप्रवासी वाचतांना दिसतात, विशेषतः लोकल प्रवासात, पण...
ते काय 'वाचत' असतात? बहुतेकजण आपापल्या सेल/मोबाइल मध्ये डोके खुपसून बोटांनी स्क्रीन वरखाली करत जुन्या मेल्स, नाहीतर फेसबुकी संदेश तरी चाळत असतात किंवा काही खेळत असतात अथवा दहादहा मिनिटे कोणाशीतरी बोलत असतात.
(मी स्वतः काहीतरी 'चांगले' वाचतो किंवा - जास्ती वेळा - सुडोकू सोडवत बसतो. 'Evil' पातळीच्या सुडोकूंचे प्रिंट-आउट्स माझ्या बॅगेमध्ये ह्यासाठी कायमचेच ठेवलेले असतात.)
पर्याय
एखाद्याला वाचनाची आवड असेल तर तो प्रवासात पुस्तक वाचत असे/वाचतो.
एखाद्याला संगीत ऐकण्याची आवड असेल तर तो संगीत ऐकतो. mp3 पूर्वी हे अशक्य होतं.
चित्रपट पहाणे, मित्रांशी गप्पाटप्पा करणे अशा अनेक गोष्टी लोक आवडीने करतात- जे पूर्वी प्रवासात अशक्य.
आता portable devicesअसल्याने हे सगळं एकाच वेळी आणि एकाच साधनाने शक्य झालं आहे.
प्रवासात वाचन हा पर्याय पूर्वीपासून उपलब्ध होता, आता बाकीचेही उपलब्ध झाले आहेत.
शिवाय पूर्वी "वेळ घालवणे" ह्या सदराखाली कित्येक लोक मिळेल ते वाचत. आता त्यापेक्षा उत्तम आणि विविध पर्याय असल्यावर हे लोक का उगाच वाचायला जातील?
तीन वर्षांपूर्वी शिकत असताना
तीन वर्षांपूर्वी शिकत असताना मी बहुधा बसने प्रवास करायचे. बसची वेळ बेभरवशाची, कदाचित रस्त्यातल्या रहदारीमुळे असावी. पण मग वाट पाहतानाचा+प्रवासाचा असा वेळ मिळून सकाळचा तासभर आणि येतानाचा अर्धा तास मिळे. यातही पुष्कळ वाचन होतसे. माझा थांबा हा बसचा दुसर्या टोकाहून दुसरा थांबा असे. पहिल्या ठिकाणी एखाद-दुसराच प्रवासी, नाहीतर पूर्ण बस रिकामी असे. येताना गर्दीमुळे बसायला जागा मिळेपर्यंत अर्धा प्रवास संपून जाई. तर जातावेळी चेहरे ओळखीचे झाले असतील तरी क्वचितच कुणी कुणाशी बोले. मग मागाहून पुस्तकावरून चर्चा चालू झाल्या आणि कळालं की त्या बसस्टॉपवर माझ्याशी आठवडाभर गप्पा मारणारे लोक माझ्याच बिल्डिंग मध्ये राहतात.
माझ्या बसमध्ये मी एकटीच पुस्तक वाचणारी होते. माझ्या वाचनाची सवय झालेला रोजचा कंडक्टर मी काय काय वाचते याबद्दल माझ्याकडे चौकशी आणि चर्चा करत असे. आधी मला जाम छान वाटलं होतं ते. नंतर त्या काकांना सगळ्याच शिकलेल्यांना आणि वाचणार्यांना पु वि वर्तकांबद्दल आदर असेल असं वाटून माझ्याशी त्या चर्चा करायला यायचे. मला त्यात गम्य नाही हे मी नम्रपणे अनेकदा समजावले पण त्यात फरक पडला नाही.
गतानुगतिक
>>> नंतर त्या काकांना सगळ्याच शिकलेल्यांना आणि वाचणार्यांना पु वि वर्तकांबद्दल आदर असेल असं वाटून माझ्याशी त्या चर्चा करायला यायचे.
--- बसमध्ये असल्याने 'गतानुगतिक'ही म्हणता येत नाही :). पण सूक्ष्मरुपाने कुठेही प्रवास करण्याच्या क्षमतेचा हेवा कंडक्टरकाकांना वाटल्यास नवल नाही.
हे अ-ग-दी अवांतर आहे. पण
हे अ-ग-दी अवांतर आहे. पण कंडक्टरच्या किश्शावरून मला माझ्या स्टॉपवरच्या कुंडलिनीकाकू आठवल्या.
कंपनीची बस जिथे थांबते, तिथे अनेक कंपन्यांचे लोक असतात. या काकू पहिल्या दिवसापासून आडव्या केळ्याएवढं मोठ्ठं स्मित द्यायच्या, म्हणून एकदा मोबाईलमधलं डोकं उचलून त्यांना हेल्लो केलं. बास - त्या सुटल्याच. (पुढचा घटनाक्रम मी काकूंचा धसका घेऊन अत्यंत रूडली फोनमध्ये घुसेपर्यंतच्या दिवसांचा.)
कुठे राहतेस, कुठे काम करतेस, काय काम करतेस, काय शिकली आहेस, किती वाजता येतेस, घरी कोणकोण असतं.... + माझ्या घरी माझी मुलगी असते तुझ्याएवढीच, ती संस्कृत शिकलीय, तीपण 'अशीच' होती (इथे मी भिवया उंचावल्या), आता तिचं वजन कमी झालंय... असा लोंढा सुरू झाला. 'मला नाही वजन कमी करायचंय' असं हसून सांगून मी ती लाईन बाद केली. मग त्यांच्या मुलीच्या संस्कृतचं कौतुक, तिचं लग्न ठरत नाहीय कारण तिला शाकाहारी-निर्व्यसनी-अभ्यासू-श्रद्धाळू-आधुनिक मुलगा हवाय, ती कुंडलिनी जागृत करायच्या कसल्याशा बैठकीला जाते.....
कुंडलिनी या शब्दावर मी आ करून बघत राहिले. मग त्या स्वतःच्या आध्यात्मिक अनुभवांबद्दल माझ्याशी बोलायच्या. त्यांना कुंडलिनी कशी 'फट्टदिशी' जागृत करता येते, बसमधे त्या अज्जिबात गॉसिपमधे वेळ न घालवता कशी कुंडलिनी जागृत करतात वगैरे वगैरे. मग त्यांनी मला त्यांच्या घरी यायचा आग्रह सुरू केला. फोन नंबर घेऊन फोन करून पाहिला. मी फोनही न उचलता तो आग्रह अत्यंत हलकटपणे तत्काळ हाणून पाडला.
मग एका रम्य सकाळी माझी दमलेली मुद्रा बघून त्यांनी मला कुंडलिनी जागॄत करायला यायचं आमंत्रण कम आग्रह केला. 'अगदी फ्रेश वाटेल बघ तुला. अशी उठवून देईन झटक्यात कुंडलिनी-'
त्या दिवसापासून मी नुसता मोबाईल न वापरता सोबत हेडफोन्सही वापरायला सुरुवात केली. कुणीही काहीही बोलत असलं, तरी हेडफोन्स कानातून न उपसण्याचा उद्धटपणाही अंगी बाळगला हेवेसांन.
चित्त
प्रवासात चित्त विचलित करणार्या अनेक घटना आजुबाजुला घडत असतात त्यामुळे शांतपणे वाचन करता येत नाही असा अनुभव आहे, त्यापेक्षा शेजार्याशी गप्पा मारणे किंवा आजुबाजुला बघत बसणे अधिक रोचक असते. मी पुणे-मुंबई-पुणे प्रवास रुटीनली अनेकदा केला आहे, सहप्रवासी आणि त्यांचे अनुभव हे फार रोचक रसायन आहे त्यामुळे मला वाचनापेक्षा सहप्रवाशात अधिक इंटरेस्ट असतो ;). मुंबईमधे बेस्ट किंवा लोकलमधे नुसते कान पुरेसे उघडे ठेवले तरी अनेक रोचक किस्से ऐकायला मिळतात, बाहेर देशात भाषेची अडचण येते पण एकंदर सहप्रवास हा कायमच मला रोचक वाटतो.