Skip to main content

ईच्छा

4 minutes

मुंबईतून निघता निघता थंडी परत आली होती. सकाळी ९ वाजता उकाड्याऐवजी सुखद गारवा जाणवत होता. वर्ल्ड ट्रेड सेंटर कडून जाणार्‍या बसमधून बाहेरची मजा बघताना मला ती दिसली. बारिक अंगकाठी, अंगभर पदर, तोंडाचं बोळकं झालेलं काही अंतरावरूनही दिसतंय. वयापेक्षा आघाताने आल्यासारखं म्हातारपण सोबतीला. रस्तादुभाजकावर केलेल्या फ्लॉवरबेड्च्या कडेला सुर्यप्रकाशाकडे तोंड करून बसलेली. हातात कोपर्‍याला अडकवलेली साधी कापडी पिशवी आणि आईस्क्रिमचा कप. सभोवतालच्या गर्दीशी देणंघेणं नसल्यासारखी ती शांतपणे आईस्क्रिम खात होती. पण मला त्यातही तिच्या चेहर्‍यावरल्या नि:संगतेचं कुतुहल वाटलं. का घेतलं असेल तिने आईस्क्रिम? सकाळी आणि तेही थंडीत एकटी खातेय म्हणजे फारच मनापासून खावंसं वाटलं असणार तिला. इथे बसून का खातेय? कदाचित घरी नातवंड असतील . त्यांनाचं देताना तिची खायची ईच्छा राहून जात असेल. "ही हल्लीची मुलं म्हणजे. परवा मी एक किलोचा आईस्क्रिमचा डबा नेला. काल फ्रिज उघडून बघतो तर चमचाभर सुद्धा शिल्लक नाही. केव्हा खाल्लं देव जाणे? ज्याने आणलं त्याला थोडं द्यायचीही पद्धत नाही. आम्हालाही वाटतं ना खावंसं थोडं. आमच्यावेळी एवढे प्रकार कुठे होते? " असा एकदा एका आजोबांचा वैताग व्यक्त झालेला ऐकला होता. पण आपण मनापासून खातोय या आनंदाचा मागमूस तिच्या चेहेर्‍यावर नव्ह्ता. एखादं रूटीन काम शांतपणे करावं तसं वाटतं होतं. वाढत्या वयानॆ ईच्छा पूर्ण करण्याची उतावीळ वाढत असेल; तशी ती पूर्ण झाल्यावर होणारं समाधान उणावत असेल का? का मन, ’ झालं समाधान? आता पुढे काय?’ असं विचारत असेल? साधी साधी ईच्छाही ’ही नको रहायला’ म्हणून पूर्ण करावी वाटत असेल का? अश्या साठलेल्या ईच्छाचा साठा संपत आल्यावरचा अंधार भेडसावत असेल का?
मला तिच्या जागी मी दिसले. एवढया साध्या नाहीत पण किती ईच्छा मारून मी रहातेय. रोज ऑफिसला जाताना दिवस म्हणजे ओझं वाटायचा. या ठिकाणी आपण का येतोय? असं वाटायचं. इथून बाहेर निघता यावं म्हणून मी क्वार्टर्स सोडले. मध्यमवर्गीयात सर्रास दिसणारे आणि लोभस वाटणारे ’हम दो हमारे दो’ या चित्राऐवजी जुना त्रिकोणच आपलासा केला. ऑफिसच्या कुठल्याच गप्पा, पोस्ट्स , प्रमोशन्सचे चान्सेस कशातच लक्ष घातलं नाही. मग आता बाहेर का पडत नाहीय मी? सवय झालीय.

सवयीत स्वातंत्र्य उपभोगायचीही सवय लागते. आपल्याला आवडत नसणार्‍या गोष्टीही कश्या उपयुक्त आहेत हे वर्षानुवर्ष मनाला पटवून दिलेलं असतं ते पट्कन पुसून टाकता येत नाही. आपल्या आर्थिक स्वातंत्र्याच्या बळावर आपण बर्‍याचश्या गोष्टी झेललेल्या असतात. करिअरिस्ट बाईचं जगणं हे असं विचित्र झालेलं आहे. करिअरिस्ट हा शब्द केवळ प्रचलीत म्हणून वापरलाय एवढंच. ईमानेईतबारे चाकरी बजावणार्‍यां ,घरासाठी नोकरी करणार्‍या आणि नोकरी करताना घराकडे त्याही पेक्षा आपल्या आवडींकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत बाळगणार्‍या मला हा शब्द काही शोभत नाही. तरीही अगदी पाट्या टाकून रहाता येईल असंही काम माझं नाही. आणि उगाच वितंडवाद घालून ’ हे काम माझं नाहीच " वगैरे म्हणणारे जसे सुखी दिसतात तसंही माझ्या बाबतीत अशक्यच आहे.

"अमुक तमुकची आवड होती हो पण जमलंच नाही" असं म्हणत वयाच्या साठीनंतर गाणं, नाच शिकणार्‍या, लिहिणार्‍या बायका मी बघत आलेय. मी लहान असताना या बायकांचं कौतुकही वाटायचं. पण आता जाणवतं ते त्यांच्यातलं अपुरेपण, वर्तमान/ सत्यपरिस्थितीशी सांगड घालण्यात आलेला थिटेपणा, स्वत:बद्द्लची कीव , न्यूनगंड आणि अभिमान यांचं विचित्र मिश्रण. काही अपवाद असतीलही पण अश्या लोकांना शाबासकी फार पटकन हवी असते. स्वकेंद्रीतता फार असते आणि आपले कमी दिवस उरलेत अशी भावना असल्यामुळे की काय शिकणं ओरबाडून घेण्याकडे कल असतो. त्यात संसाराचा कोशात फार गुरफटून गेलेल्या असल्याने निर्व्याजपणे आवडत्या गोष्टीत रमता येत नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठल्या ना कुठ्ल्या व्याधी हमखास मागे लागलेल्या असतात. त्यामुळे येणारी बंधनं .

मी स्वत:ला अशी नाही बघू शकत. खूप प्रयत्न केले मी नोकरीत रमायचे. पण आता नाही शक्य होत. मग असं काही दिसलं की आत काहीतरी हलतं. विपश्यना, ब्रम्हविद्या, REBT वगैरेची औषधं देऊन शांत केलेलं मन गडबड करू लागतं. आणि निर्णय पकका होऊ लागतो. पण कोणाला तो शहाणपणाचा वाटत नाही. जर कोणाला वाटला तर त्यातले धोकेही तत्परतेने दाखवली जातात. माझी किंमत ही फक्त मी माझ्या टेक्निकल फिल्ड्मध्ये किती पैसे कमवू शकते यावरंच अवलंबून आहे की काय असं वाटायला लागतं . ठरवून न वाढवलेल्या जबाबदार्‍या, साध्या सवयी या विचारात घेण्याजोग्या वाटतंच नाहीत कुणाला. "मुलीच्या शिक्षणासाठी आहेत पैसे. लग्नाला हवे असतील तर तिचे तिने साठवावेत नाहीतर साधं लग्न करावं. " हे माझ वाक्यं मला आई म्हणून बेजबाबदार ठरवून जातं. आपली ईच्छा आणि जगाची मतं या गोष्टी इतक्या गोंधळून टाकणार्‍या का असाव्यात? का आपलं आपल्यालाच ओळखता येत नाही? आणि ठरवणं एवढं अवघड का असावं?

"बघ कसं ते. तू ठरव. " अश्या वाक्यांनी विषयाचा समारोप झाल्यावर एक भान येतं की निर्णय आपला आपल्यालाच घ्यायचाय. अगदी एकटे आहोत आपण. आपण तोंड्देखलं का होईना "कर रे तू हवं ते माझी नोकरी आहे ना " असं नवर्‍याला म्हटलेलं असतं. पण तो असला मुर्खपणा बिल्कूल करत नाही. "तू तुझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहेस. तुझ्याएवढं मला कुठे कळतं तुझ्या विषयातलं. " असं म्हणत त्याने आपल्यावरची जबाबदारी तर झटकलेली असतेच पण पुढे नावं ठेवायचं आपलं स्वातंत्र्यही अबाधीत राखलेलं असतं. रडणं, ईमोशनली ब्लैक्मेल करणं, मी तुझ्यावरं(च) कशी अवलंबून आहे हे पुन्हा पुन्हा प्रत्येक कृतीतून दाखवून देणं ही बायकांच्या हातातल्या पारंपारिक शस्त्र त्यागून आपण आपलं कसं नुकसान केलय हे जाणवतं. चलो यही सही. सुरुवात अशीच व्हावी. स्वतं:वरचा विश्वास कमावण्याची, आपल्याला जे करायचय ते स्वत:च्याच बळावर करायची आणि प्रत्येक प्रवासाची. ज्याची सुरुवात अवघड तो प्रवास आपल्याला सुंदरसं काहीतरी देणार ही खुणगाठ पक्की बांधूनच स्वत:च्या मनातला डोंगर चढायला सुरुवात करायला हवी.

Node read time
4 minutes

............सा… Sun, 15/06/2014 - 18:38

"कर रे तू हवं ते माझी नोकरी आहे ना " असं नवर्‍याला म्हटलेलं असतं. पण तो असला मुर्खपणा बिल्कूल करत नाही.

फक्त टाळ्या!!!!
छान आहे लेख.

तिरशिंगराव Sun, 15/06/2014 - 18:39

इच्छा तला 'इ' पहिला आहे असे वाटते.

बॅटमॅन Tue, 17/06/2014 - 23:19

In reply to by ............सा…

होय र्‍हस्वच आहे.

तदुपरि: र्‍हस्व हे स्पेलिंग मराठी उच्चाराबरहुकूम असले तरी वरिजिनल संस्कृत स्पेलिंगप्रमाणे पाहता चूक आहे. संस्कृतात 'ह्रस्व' असे लिहितात.

राजेश घासकडवी Mon, 16/06/2014 - 00:14

मुक्तक आवडलं. अपुऱ्या इच्छांचं चित्र बोळक्या तोंडात निरिच्छपणे शिरणाऱ्या आइस्क्रीममधून दिसतं आणि त्यातून आत दाबून ठेवलेल्या मधमाशांचं मोहोळ बाहेर येतं.

शांत सकी हो अब तक, साकी, पीकर किस उर की ज्वाला,
'और, और' की रटन लगाता जाता हर पीनेवाला,
कितनी इच्छाएँ हर जानेवाला छोड़ यहाँ जाता!
कितने अरमानों की बनकर कब्र खड़ी है मधुशाला

या बच्चनच्या काव्यपंक्तीप्रमाणे एके ठिकाणी अनंत इच्छांची भूक आहे, आणि त्यांचा प्याला पिण्यासाठी दोनच हात आहेत. तो प्यालाही सदासर्वकाळ हातात मिळत नाही. पोटाची भूक भागवण्यासाठी तो बाजूला ठेवून काम करावं लागतं. तो प्याला दुरून खुणावतो, आणि मग कामाला जुंपलेले हात सैलावतात. का करायचं हे सगळं?

गोलमाल सिनेमातल्या एका विनोदी गाण्यातल्या कडव्याचा अर्थ काहीसा असा आहे - पैसा कमवायचा असेल तर घाम गाळावा लागतो, घाम पुसण्यासाठी रुमाल घ्यावा लागतो, रुमालासाठी पुन्हा पैसा लागतो... मग घामासाठी रुमाल की रुमालासाठी घाम? कुठच्या रुमालांची स्वप्नं सोडली तर घाम कमी गाळावा लागेल? याचं उत्तर वाटतं तितकं सोपं नाही.

ऋषिकेश Mon, 16/06/2014 - 10:12

मुक्तक प्रचंड आवडले!
आपल्याकडे "त्याग" या गुणाला सद्गुणाच्या कॉलममध्ये घातले गेले आहेच, त्याहून भयानक म्हणजे हा सद्गुण हे स्त्रीत्त्वाचे अभिन्न अंग करून टाकले आहे. त्याग करणे हे स्त्रीत्त्वाचे अविभाज्य अंग झाले आहे. मग त्याग तुम्ही किती छान आई आहात, बायको आहात, बहिण आहात नी मुलगी आहात सारे काही ठरवतो यासारखा क्रूर प्रकार नसावा! :(

समांतरः

मुलीच्या शिक्षणासाठी आहेत पैसे. लग्नाला हवे असतील तर तिचे तिने साठवावेत नाहीतर साधं लग्न करावं.

अगदी मान्य व योग्य आहे! ही भुमिका घेताना समाजनामक निव्वळ प्रेक्षकाची भुमिका बजावणार्‍यांची बुज्ज बाळगू नये. माझ्या मते मुलीला (व मुलालाही) स्वातंत्र्याबरोबर जबाबदार्‍या पेलायचं भान यायलाच हवं. तिचं/त्याचं पहिले २०-२१ वर्षांचे शिक्षण/क्रिडा/कला इत्यादी ज्यात रस असेल त्याला आर्थिक आधार देणे ही पालकांची जबाबदारी - ती ही झेपेल व स्वतःच्या आवडी जपत जमेल तितकीच- पुढे त्याचे/तिने लग्न करायचं की नाही, कसं करायचं, अधिकचं शिक्षण घ्यायचं की नाही वगैरे प्रश्न सर्वस्वी त्याचा/तिचा आहे आणि त्याची आर्थिक तरतूद करणेही त्याची/तिचीच जबाबदारी आहे. आमची लग्न आम्ही स्वखर्चाने केली व आमच्या पालकांनीही!

"चिन्ड्रेन आर बेस्ट पॅरासाईट" हे मला इथेच ऐसीवर कोणीतरी शिकवले आहे जे वाक्य मला मनोमन पटते :)

ॲमी Mon, 16/06/2014 - 14:08

In reply to by ऋषिकेश

मुक्तक छानच आहे!
बाकीच्या प्रतिसादालाही +१.
चिन्ड्रेन आर बेस्ट पॅरासाईट >> आडकित्ता. मला जेवढं आठवतय त्यावरून बेस्ट नव्हते म्हणाले ते. फक्त बांडगूळ म्हणालेले.

अजो१२३ Mon, 16/06/2014 - 12:41

In reply to by ऋषिकेश

आपल्याकडे "त्याग" या गुणाला सद्गुणाच्या कॉलममध्ये घातले गेले आहे

बहुतेक हिसकावून घेणे हा सद्गुण असायला हवा होता नि त्याग दुर्गुण असायला हवा होता असं म्हणायचं आहे का?

त्याहून भयानक म्हणजे हा सद्गुण हे स्त्रीत्त्वाचे अभिन्न अंग करून टाकले आहे.

बहुतेक दुर्गुण हे स्त्रीत्वाचे अभिन्न अंग असायला पाहिजे होते असं म्हणायचं आहे?

मग त्याग तुम्ही किती छान आई आहात, बायको आहात, बहिण आहात नी मुलगी आहात सारे काही ठरवतो यासारखा क्रूर प्रकार नसावा!

वाईट आई, इ असणे प्रेमळ प्रकार असावा का?

मुलीच्या शिक्षणासाठी आहेत पैसे. लग्नाला हवे असतील तर तिचे तिने साठवावेत नाहीतर साधं लग्न करावं.

अगदी बाळंतपणापासूनचा आईबापांनी केलेला खर्च लिहून ठेवावा नि ४८% प्रतिवर्ष चक्रवाढ व्याजाने नंतर तो वसूल करावा. हे जास्त योग्य. मुलांच्या शिक्षणाचा नि विवाहाचा नि आईवडिलांचा काय संबंध?

ही भुमिका घेताना समाजनामक निव्वळ प्रेक्षकाची भुमिका बजावणार्‍यांची बुज्ज बाळगू नये.

तुम्ही ज्यांना समाज म्हणता ते तुम्हाला समाज म्हणतात. इतकेच समाजाचे वावडे असेल तर समाजाचा एकही नियम पाळू नये.

माझ्या मते मुलीला (व मुलालाही) स्वातंत्र्याबरोबर जबाबदार्‍या पेलायचं भान यायलाच हवं.

यायलाच? प्रत्येक क्षेत्रात सेटल व्हायला वेगळा वेळ लागतो, वेगळी गुंतवणूक लागते. प्रत्येकाची क्षमता, रस वेगळा असतो. जबाबदारीचं भान डिक्टेट करणारे आपण (सर्व) कोण? आणि असे भान असतेच. ते ठासवायची गरज नसावी.

तिचं/त्याचं पहिले २०-२१ वर्षांचे शिक्षण/क्रिडा/कला इत्यादी ज्यात रस असेल त्याला आर्थिक आधार देणे ही पालकांची जबाबदारी - ती ही झेपेल व स्वतःच्या आवडी जपत जमेल तितकीच- पुढे त्याचे/तिने लग्न करायचं की नाही, कसं करायचं, अधिकचं शिक्षण घ्यायचं की नाही वगैरे प्रश्न सर्वस्वी त्याचा/तिचा आहे आणि त्याची आर्थिक तरतूद करणेही त्याची/तिचीच जबाबदारी आहे.

धन्य. मुले २० वर्षांची होतात तेव्हा पालकांचे सेविंग पोटेंशिअल शिगेला पोचलेले असते. त्यावेळेस पाल्यांची मदत न करून त्यांना काय साध्य होते?

"चिन्ड्रेन आर बेस्ट पॅरासाईट" हे मला इथेच ऐसीवर कोणीतरी शिकवले आहे जे वाक्य मला मनोमन पटते

असंच असेल तर मुले का पैदा करत असावेत लोक? आमच्या लैंगिक सुखोपभोगाच्या वेळी निर्माण झालेले तुम्ही अनावश्यक बायप्रॉडक्ट आहात असे सांगून खरेतर त्यांना हाकलून द्यायला हवे.

ऋषिकेश Mon, 16/06/2014 - 13:19

In reply to by अजो१२३

हल्ली मला ऐसीवर फारच मजा येऊ लागली आहे. आपल्याला हवे ते अर्थ काढून त्यावर लिहण्याची नवी उगवती कला आत्मसात करायला हवी ;)

बहुतेक हिसकावून घेणे हा सद्गुण असायला हवा होता नि त्याग दुर्गुण असायला हवा होता असं म्हणायचं आहे का?
बहुतेक दुर्गुण हे स्त्रीत्वाचे अभिन्न अंग असायला पाहिजे होते असं म्हणायचं आहे?
वाईट आई, इ असणे प्रेमळ प्रकार असावा का?

नाही. असं म्हणायचं नाही

अगदी बाळंतपणापासूनचा आईबापांनी केलेला खर्च लिहून ठेवावा नि ४८% प्रतिवर्ष चक्रवाढ व्याजाने नंतर तो वसूल करावा. हे जास्त योग्य.

तुमचे विचार रोचक आहेत. ४८% हा आकडा कसा काढलात?

मुलांच्या शिक्षणाचा नि विवाहाचा नि आईवडिलांचा काय संबंध?

माझ्यामते शिक्षण देणे गरजेचे आहे त्यामुळे मुलांना वेळीच स्वावलंबी बनवणे सुकर होते व त्यांची पालकांवरील डिपेन्डन्सी संपण्याकडे वाटचाल सुरू होते. विवाहाचा काहीच संबंध नाही.

तुम्ही ज्यांना समाज म्हणता ते तुम्हाला समाज म्हणतात. इतकेच समाजाचे वावडे असेल तर समाजाचा एकही नियम पाळू नये.

खरे आहे. आम्ही कोणतेही नियम समाजाचे आहेत म्हणून पाळत नाही, मला जे पटते किंवा मला ज्यातून आनंद मिळातो, समाधान मिळते तसेच वागते.

यायलाच? प्रत्येक क्षेत्रात सेटल व्हायला वेगळा वेळ लागतो, वेगळी गुंतवणूक लागते. प्रत्येकाची क्षमता, रस वेगळा असतो. जबाबदारीचं भान डिक्टेट करणारे आपण (सर्व) कोण? आणि असे भान असतेच. ते ठासवायची गरज नसावी.

खरे आहे. जबाबदारीचे भानही डिक्टेट करू नये. सज्ञान मुलांना योग्य ते भान आणण्याचे प्रयत्न करावेत. त्याउप्पर त्यांना मोकळे सोडावेत हे तुमचे विचार सपशेल मान्य!

धन्य. मुले २० वर्षांची होतात तेव्हा पालकांचे सेविंग पोटेंशिअल शिगेला पोचलेले असते. त्यावेळेस पाल्यांची मदत न करून त्यांना काय साध्य होते?

त्यांना मदत करून काय साध्य होते? बाकी माझं सेविंग हे मुलांसाठी केलेलं आहे असा सोयीस्कर समज कशावरून बाळगलात?

असंच असेल तर मुले का पैदा करत असावेत लोक? आमच्या लैंगिक सुखोपभोगाच्या वेळी निर्माण झालेले तुम्ही अनावश्यक बायप्रॉडक्ट आहात असे सांगून खरेतर त्यांना हाकलून द्यायला हवे.

हो ना! बरोबर आहे.
मुलांची पैदास ठरवून रोखणे समजु शकतोच, मात्र एखाद्या इन्व्हेस्टमेंटप्रमाणे मुले ठरवून पैदा करणे तसेही माझ्या विचारशक्तीला झेपण्याच्या पलिकडचे आहे. नैसर्गिक प्रेमातून निर्माण झालेल्या शरीरसंबंधाचे ते बायप्रोडक्ट आहेत हे खरेच आहे! पण त्यांना सांभाळावे की हाकलावे, किती सांभाळावे नी किती स्वतःच्या पायावर उभे रहायला सक्षम करावे हा ज्याच्यात्याच्या आवडीचा + वकुबाचा वैयक्तिक प्रश्न झाला. नाही का?

अनुप ढेरे Mon, 16/06/2014 - 13:37

In reply to by ऋषिकेश

आपल्याकडे "त्याग" या गुणाला सद्गुणाच्या कॉलममध्ये घातले गेले आहेच,

या वाक्यावरून

बहुतेक हिसकावून घेणे हा सद्गुण असायला हवा होता नि त्याग दुर्गुण असायला हवा होता असं म्हणायचं आहे का?
बहुतेक दुर्गुण हे स्त्रीत्वाचे अभिन्न अंग असायला पाहिजे होते असं म्हणायचं आहे?
वाईट आई, इ असणे प्रेमळ प्रकार असावा का?


नाही. असं म्हणायचं नाही


आपल्याला हेच म्हणायचे आहे असे भासले.

ऋषिकेश Mon, 16/06/2014 - 13:40

In reply to by अनुप ढेरे

खिक्
त्याग हा सद्गुणाच्या कॉलममध्ये घातलाय म्हटल्याने हिसकावून घेणे हा सद्गुण असायला हवा होता असे मला म्हणायचे आहे असे भासले? बापरे! असो.
तरी तुम्हाला असे भास झाले आय मीन भासले असल्यास "तसे म्हणायचे नाही" असे सुस्षष्ट स्पष्टिकरण पुरेसे ठरावे.

मेघना भुस्कुटे Mon, 16/06/2014 - 14:09

In reply to by अनुप ढेरे

त्याग सद्गुण नाही - या वाक्याचा अर्थ 'हिसकावून घेणे हा सद्गुण आहे' असा लावणे हे एक भारीपैकीच उपयुक्त कौशल्य आहे. ते अंगी असल्यास मग सेक्युलर म्हणजे हिंदुविरोधी, पुरोगामी म्हणजे स्वैराचारी, विचारवंत म्हणजे ढोंगी कृतिशून्य, उत्क्रांतिवादी म्हणजे थापेबाज.. असे अनेक मजेदार अर्थ लावता येतात. वादसंवादकाव्यशास्त्रविनोदात भर पडते. अवघा आनंदीआनंद उसळतो...

बॅटमॅन Mon, 16/06/2014 - 14:16

In reply to by मेघना भुस्कुटे

सेक्युलर म्हणजे हिंदुविरोधी, पुरोगामी म्हणजे स्वैराचारी, विचारवंत म्हणजे ढोंगी कृतिशून्य, उत्क्रांतिवादी म्हणजे थापेबाज.

झालंच तर परंपरेला न शिव्या घालणारे ते प्रतिगामी, आक्रस्ताळेपणे स्त्रीवादाचा पुरस्कार न करणारे ते स्त्रीद्वेष्टे, इ.इ. इंटरप्रिटेषण्स देखील वरील कौशल्यातूनच जन्माला येतात.

बॅटमॅन Mon, 16/06/2014 - 14:23

In reply to by मेघना भुस्कुटे

आपलं एकमत न होणं ही दुर्मीळ गोष्ट नाही, तशी एकमत होणं हीदेखील नाही.

रिलेटिव्ह दौर्मिळ्य तुलणेचे करावे ;)

बॅटमॅन Mon, 16/06/2014 - 16:24

In reply to by 'न'वी बाजू

आत्ता भरतभूमीत दुपारचे च्यार वाजले आहेती. तस्मात सक्काळी सक्काळी चावूनही इफेक्ट उरेलच, याची ग्यारंटी नाही.

तदुपरि कुसुमाग्रज म्ह. कु-सुमा-ग्रज म्ह. वैट सुममध्ये ग्रज धरून बसणारे असेल तर वरील प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असूही शकेल.

परंतु कोणी चावल्यानंतर नक्की काय होईल याबद्दल मात्र

"यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम्|
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति||"

हाच यादृच्छिकन्याय अथवा पेताडपथन्याय लागू शकेलसे वाटते.

'न'वी बाजू Mon, 16/06/2014 - 16:35

In reply to by बॅटमॅन

बाकी,

यस्मै कस्मै प्रदातव्यं

याचा दात लावण्याशी काही संबंध असावा काय?

वैट सुममध्ये

'सुममध्ये' बोले तो?

बॅटमॅन Mon, 16/06/2014 - 16:43

In reply to by 'न'वी बाजू

दात लावण्याशीच याचा संबंध असावासे आमच्या पुनाओकीय डिक्षनर्‍या सांगतात.

सुममध्ये(मूळ कन्नड-सुम्मने)-गुपचूप. शाळा कादंब्रीतही हा शब्द आलेला आहे.

नंदन Tue, 17/06/2014 - 14:50

In reply to by 'न'वी बाजू

सदर वाक्य नाटकातील असल्याने येथे कुसुमाग्रजांऐवजी वि. वा. शिरवाडकर अधिक योग्य ठरावे ;)

अनुप ढेरे Mon, 16/06/2014 - 14:25

In reply to by मेघना भुस्कुटे

माझा तसा ग्रह झाला. मी ऋषिकेशरावांना तसं विचारून क्लॅरिफाय केलं. त्यावर वरचा प्रतिसाद? छान. सुतावरून स्वर्ग म्हण आठवली. पण स्वर्ग वगैरे लिहिलं तर काय गदारोळ उसळेल माहित नाही. सो राहु दे.

मेघना भुस्कुटे Mon, 16/06/2014 - 14:28

In reply to by अनुप ढेरे

अवांतरः सोमवारी चांगला टीपी होईल म्हणून मी मजेने हात चोळले खरे इथले प्रतिसाद पाहून. पण मला इतक्यातच यातली व्यर्थता जाणवून अंमळ कंटाळ्य आले आहे. असो.

ऋषिकेश Mon, 16/06/2014 - 15:10

In reply to by मेघना भुस्कुटे

त्यात अजोही गायबले आहेत. ते परतेपर्यंत बाकीच्यांनी कितीही फुगायचा प्रयत्न केला तरी ते व्यर्थ्य आहे.
वर निर्देश केलेली कला इतरांमध्ये त्यांच्या ३.५%ही नाही!

सविता Mon, 16/06/2014 - 14:53

In reply to by ऋषिकेश

हल्ली मला ऐसीवर फारच मजा येऊ लागली आहे. आपल्याला हवे ते अर्थ काढून त्यावर लिहण्याची नवी उगवती कला आत्मसात करायला हवी

ट्यार्पी वाढतो, असं काय करता?

दोन सदस्य वाद घालत असताना, उरलेल्या लोकांना ते सर्व वाचायला जाम मजा येते हे माहित नाही का तुम्हाला?

आणि वाद घालणार्‍या सदस्यांपैकी काहीजण "वाद घातले की अटेन्शन मिळते" यामुळे सुद्धा वाद घालत असतात!

'न'वी बाजू Mon, 16/06/2014 - 16:56

In reply to by सविता

आणि वाद घालणार्‍या सदस्यांपैकी काहीजण "वाद घातले की अटेन्शन मिळते" यामुळे सुद्धा वाद घालत असतात!

थ्यांक्यू फॉर द रेकग्निशन!

याबद्दल आमच्या याच जन्मी आमच्या कातड्याचे जोडे करून आपल्या चरणांवर चढवले, तरी इ.इ.

याचिसाठी केला होता अट्टाहास!

'न'वी बाजू Mon, 16/06/2014 - 19:24

In reply to by सविता

वाटलेच होते! म्हणूनच तर विचार रहित केला. म्हटले, उगाच चांगले कमावलेले लेदर वाया का घालवा? (म्हटलेलेच आहे ना, की 'न'वी जातो जिवानिशी, अन्...)

अजो१२३ Mon, 16/06/2014 - 15:55

In reply to by ऋषिकेश

पण त्यांना सांभाळावे की हाकलावे, किती सांभाळावे नी किती स्वतःच्या पायावर उभे रहायला सक्षम करावे हा ज्याच्यात्याच्या आवडीचा + वकुबाचा वैयक्तिक प्रश्न झाला.

कचर्‍यात टाकलेले अर्भक बघून डिट्टो हाच विचार तुमच्या मनात येतो का?

ऋषिकेश Mon, 16/06/2014 - 16:45

In reply to by अजो१२३

होय.
मुले सांभाळायचा (आर्थिक + मानसिक) वकूब नसला की त्याची परिणीती अशी होते.

बाकी इतर मुद्द्यांवर टिपणी दिसली नाही. तेव्हा तो प्रतिवाद मान्य आहे समजावे किंवा कसे?

अजो१२३ Mon, 16/06/2014 - 17:35

In reply to by ऋषिकेश

मुले सांभाळायचा (आर्थिक + मानसिक) वकूब नसला की त्याची परिणीती अशी होते.

लोक अर्भके का त्यागतात असा तो प्रश्न नसून लोकांनी त्यागलेली मूले पाहून त्यांनी आपल्या अगदी योग्यपणे "स्वेच्छेचा" मान राखला आहे असे "आपणांस" वाटते का असा तो प्रश्न आहे.
वकूब आणि इच्छा यांची गल्लत करू नका. सध्याला मी सगळा वकूब असणार्‍या लोकांबद्दल बोलतोय. त्याग करणारांचा त्याग करण्याचा वकूब असतो. वकूब असताना त्यांनी तो करणं कसं मूर्खपणाचं आहे असं आपण म्हणताय.
म्हणून प्रश्न असा आहे कि "अर्भक त्यागणार्‍या" व्यक्तिच्या वकूबावर न जाता त्याने आपल्या "त्याग न करण्याच्या" शहाणपणाच्या इच्छेचा सन्मान केला आहे असे आपणांस वाटते का?

बाकी इतर मुद्द्यांवर टिपणी दिसली नाही. तेव्हा तो प्रतिवाद मान्य आहे समजावे किंवा कसे?

एक एक मुद्द्दा घेऊ. पहिले त्याग विषयावरच आपली मते काय काय आहेत ते पाहतोय.

ऋषिकेश Mon, 16/06/2014 - 17:40

In reply to by अजो१२३

तुम्ही प्रश्न सरळसरळ फिरवला आहे. तुमचा प्रश्न होता की मुलांना कचर्‍यात फेकलेले बघुन उधृत केल्यासारखेच वाटाते का, तर होय तसेच वाटते असे त्याचे स्पष्ट उत्तर दिले आहे.

मुळ विधानात वकूब शब्द आहे तो मी तसाच वापरला आहे. आता काय बोलावे असे न समजल्याने शब्द फिरवलेले नाहीत.

त्याग करणारांचा त्याग करण्याचा वकूब असतो. वकूब असताना त्यांनी तो करणं कसं मूर्खपणाचं आहे असं आपण म्हणताय.

खिक्
पुन्हा एकदा कलेचं प्रात्यक्षिक! अशा निष्कर्षावर तुम्ही कसे आलात हे सांगा? मुळात मी काय म्हणतोय याचा तुम्हाला मी काय म्हणायला आवडेल असा अर्थ का काढताय?

अजो१२३ Mon, 16/06/2014 - 18:01

In reply to by ऋषिकेश

कृपया आपला मूळ प्रतिसाद पाहा. संगोपन करावे कि नाही हा "आवडीचा + वकुबाचा" प्रश्न आहे असे तुम्ही लिहिले नाही. समजा वकूब १००% आहे पण आवड मूळीच नाही म्हणून मूल कचर्‍यात टाकले तर अशा व्यक्तिच्या अशा आवडीचा आपणांस आदर आहे काय? तर तुमच्या त्यागाप्रेमाच्या मूर्खतांचा अर्थ काढू जाता - होय!

बाय द वे, त्याग सद्गुण नाही तर काय आहे?

मेघना भुस्कुटे Mon, 16/06/2014 - 18:21

In reply to by अजो१२३

'त्याग हा एक आचरटपणा आहे' असं टारगट उत्तर तोंडावर आहे. पण ते एक असो.

मुदलात कुटुंबसंस्था-लग्नसंस्था-परंपरा-रिवाज इत्यादी गोष्टींना शतकानुशतके जे अतिरिक्त महत्त्व दिलं गेलं आहे आणि त्याचा जो सामाजिक दबाव व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो - त्या महत्त्वाला, दबावाला मोडीत काढण्यासाठी कधीकधी खडबडीत आणि टोकदार विधानं केली जातात. ही विधानं समजा -१ मानली, आणि त्याच्या बरोबर उलट टोकाची भूमिका +१ मानली, तर सत्य आणि वास्तव बरेचदा ० च्या आसपास असण्याची शक्यता असते.

हे आपण ध्यानात घेतलं, तर फुकाचे वादंग टळतील. अर्थात फुकाचे वाद घालण्यात मज्जा येते, हे मला मान्यच आहे!

'न'वी बाजू Mon, 16/06/2014 - 16:59

In reply to by अजो१२३

कचर्‍यात टाकलेले अर्भक बघून डिट्टो हाच विचार तुमच्या मनात येतो का?

काय कल्पना नाय ब्वॉ! कधी अनुभव आलेला नाही, त्यामुळे सांगू शकत नाही.

कृपया तज्ज्ञ मार्गदर्शन करू शकाल काय?

ॲमी Mon, 16/06/2014 - 18:58

In reply to by 'न'वी बाजू

सलमान खानची बहीण अर्पिता, त्यांच्या घरासमोरच्या कचर्याच्या पेटीपाशीच सापडलेली असं फार्फार पुर्वी वाचल्याच आठवतय.
असो. मीपण अनुभवसंपन्न तज्ञ नाहीय यात, पण एक किंचीत वेगळा अनुभव सांगते.
साधारण १२ वर्षांपुर्वी स्वारगेटला रिझर्वेशन करायला गेलेले. एक भिकारीण ट्रेमधे नवजात बाळाला घेऊन भीक मागत होती. मी दिली नाही. साधारण आठवड्याने प्रवासाच्या दिवशी तीच बाई दिड वर्षाच्या मुलाला घेऊन भीक मागायला आली. मी विचारल 'रोज नवीन बाळाला घेऊन भीक मागता का?'. गेली निघून.
परत एकदा असो. गरीबांची/भिकार्यांची मुलं ही काही विचार करून जन्माला घातलेली असतात असे वाटत नाही. वर अजोच म्हणतायत तसे they are byproduct of sex. Dwarfism (शब्द शारीरीक व्यंगाला उद्देशून वापरला नाहीय) प्रमोट करायलाच निर्माण झालेल्या सरकारने, डाव्यांनी करावे त्यांच्यासाठी काय करायचे ते. पण उगाच इमोशनल अपील घेऊन सगळ्यांकडे जाऊ नये. गेलातच आणि त्यांनी लाथाडले तर रडगाणे गाऊ नये.

बॅटमॅन Mon, 16/06/2014 - 19:05

In reply to by ॲमी

उलट जितकी जास्त पोरं तितके हेल्पिंग हँड्स जास्ती हे कॅल्क्युलेशन उलट काहीतरी प्रॅग्मॅटिक विचार दर्शवते. लग्नाला अमुक इतकी वर्षे झाली, चला 'चान्स' घेऊ हा काय विचार आहे? त्या हिशेबाने पाहता सेक्शुअल बायप्रॉडक्ट म्हणून जन्मायचे प्रमाण उच्चवर्गीयांतच जास्त असावे =))

'न'वी बाजू Mon, 16/06/2014 - 19:16

In reply to by ॲमी

कळले नाही.

सलमान खान (किंवा, रादर, त्याचे आईवडील) हे (१) खुजेपणाचा पुरस्कार करण्यासाठीच निर्माण झालेले आहेत, आणि/किंवा (२) डावे आहेत, यांपैकी नेमके काय म्हणायचे आहे?

ॲमी Mon, 16/06/2014 - 19:48

In reply to by 'न'वी बाजू

यापैकी काहीच म्हणायचे नाहीय.
'काय कल्पना नाय ब्वॉ! कधी अनुभव आलेला नाही, त्यामुळे सांगू शकत नाही.' असे लिहीलय ना तुम्ही, म्हणुन सलीम खानच उदा दिलं. ते आहेत तज्ञ अनुभवी वगैरे.
त्यापुढचा प्रतिसाद इनजनरल लाउड थिंकींग आहे. वेगळीकडे लिहीण्याऐवजी एकत्रच लिहीला. तिकडे भिकार्यांना घर देण्याबद्दल चर्चा झाली; इकडे परत कचर्याच्या पेटीतली मुलं वगैरे :-/

'न'वी बाजू Mon, 16/06/2014 - 19:53

In reply to by ॲमी

तिकडे भिकार्यांना घर देण्याबद्दल चर्चा झाली; इकडे परत कचर्याच्या पेटीतली मुलं वगैरे :-/

चर्चा करणार्‍यांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. आपणांस त्याबद्दल काही आक्षेप आहे काय?

(डिस्क्लेमर: आक्षेप हादेखील अभिव्यक्तीत मोडू शकतो, अत एव अभिव्यक्तिस्वातंत्र्याखाली फुल्ली कव्हर होतो, हेही जाताजाता नमूद करू इच्छितो.)

बाकी चालू द्या.

बॅटमॅन Mon, 16/06/2014 - 13:57

In reply to by अनुप ढेरे

झालंच तर झाडावर चढून मोक्याची जागादेखील पकडलेली आहे.

सविता Mon, 16/06/2014 - 14:48

In reply to by मी

अपर्णा ताई/आई मोड ऑन>
बघा, आजकाल च्या या मुली, नोकर्‍या करायच्या त्या करायच्या आणि वरती हे असले विचार!

कशाला पाहिजेत ही थेरं? आमच्या वेळी असले विचार करत होतो का आम्ही? आमचं काय वाईट झालं?
अपर्णा ताई/आई मोड ऑफ>

बॅटमॅन Mon, 16/06/2014 - 14:54

In reply to by सविता

नकलेत नच असावा स्वल्पहि मार्दवाचा मोड नामाचा |
करिता नच ऐसे, काय मग अपर्णा मोड कामाचा ||

बॅटमॅन Mon, 16/06/2014 - 20:38

In reply to by सविता

नको मोड नको. बसायला त्रास होतो!

अरे वो अपर्णा मोड नक्को रे भाय दूसरा मोड होना मेरेकू. मेरेकू बसना हय!

-सलीम फेकूमियाँकडून साभार.

सविता Mon, 16/06/2014 - 14:56

छान मुक्तक!

"हे सगळे नक्की कशासाठी" वगैरे प्रश्न पडायला लागले की मी डोकं बधीर करणार्‍या मनोरंजनाचा आधार घेते!

तसंही प्रश्न पडतायेत म्हणून परिस्थिती फार काही बदलता येणार नसतेच! आणि हे नाही तर अजून काय हेही माहित नसतं, अध्यात्म, वैराग्य हे आपले प्रांत नव्हेत हेही एव्हाना कळून चुकलेय!

............सा… Mon, 16/06/2014 - 21:42

In reply to by सविता

मी डोकं बधीर करणार्‍या मनोरंजनाचा आधार घेते!

हे माझ्याबाबतीत देखील १००% खरय!!! अर्थात आहे त्या सेट-अप मध्ये रहायची सक्ती कोणीच केलेली नाहीये पण एकदा पिंजर्‍यात अडकलेल्या पक्षाला मुक्त आकाशात झेप घ्यायची भीती ही वाटतेच.

अंतराआनंद Mon, 16/06/2014 - 20:08

लेख वाचल्याबद्द्ल आणि प्रतिक्रियांबद्द्ल धन्यवाद.
इच्छा (इ पहिलाच) ,गरजा आणि हांव ( हा शब्द लागत असेल तर ’आजूबाजूचे काय म्हणतील/कसं दिसेल असं म्हणत वाढवलेल्या गरजा’ असं म्हणू) यातला फरक ओळखता येत नाही. आलाच तर स्विकारता येत नाही आणि स्विकारून अंमलात आणायचं ठरवलतं तर कोणाच्या पचनी पडत नाही. आणि मग आपण आपल्या पायाखालची जमीन टिकवण्यासाठी जे धावत सुटतो ते सक्तीचा ब्रेक लागल्यावरचं थांबतो. येवढचं म्हणायचं होतं . त्याचे वेगवेगळे अर्थ - त्या अर्थाचे वेगवेगळे अनर्थ हे वाचायला मजा येतेय.
कोणताही स्वभाव हा निरपवाद्पणे आणि सदैव केवळ दुर्गुणच किंवा केवळ सद्गुणच असतो असं नाही. त्यागाचंही तसंच. त्यागाचं फळ मिळत नाही ही तक्रार होते तेव्हा तो त्याग नसून इन्वेस्ट्मेंट होती असं खुशाल समजावं.
हल्ली बालमानसशास्त्राचा अतिरेक एवढा होतोय की मुलांवर कुठलीही जबाबदारी टाकणं हा म्हणजे अपराध वाटायला लागलाय पालकांना. आम्ही मुलांना देतोय त्याहून काय जास्त वेळ आमच्या आईबाबांनी आम्हाला दिलाय? त्याबद्द्ल त्यांनी अपराधी नाही वाटून घेतलं. त्यामुळे आमचं काही वाईटही झालं नाही. आम्हालाही स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायची त्या अनुषंगाने येणार्‍या परिणामांची जबाबदारी निभावायची सवय लागली. आज हेच होत नाहीय. मुलीचं लग्न करून देणं असो किंवा मुलगा/मुलगी एंजिनेर झाल्यावर त्यांना M.S. साठी (स्वखर्चाने) परदेशात पाठवणे असो हे आईवडिलांनी का म्हणून करायचं? हे म्हणजे पिलांना पंख फुटल्यावरही मायपाखरानं त्यांना अन्न भरवत रहाण्यासारखं आहे. ( आगरकर लेखसंग्रहात "आपल्या समाजातले विवाह हे आईवडिलांनी ठरवलेले म्हणजे बालविवाह्च " असं म्ह्टलेलं आहे. ) . याचा परिणाम एवढाच होतो की माणूस "मी आणि माझा संसार" यातचं गुंतून रहातो. माणसाला सामाजिक अंग ही असतं ते फक्त चर्चेपुरतंच उरतं.
लहान मुलं पलंगावर उताणं झोपून , मान खाली टाकून सभोवतालच्या गोष्टी/ माणसं कशी उलटी दिसतात हे खिदळत बघत बसतात. अजोंनी हया खेळाची आवड अजून जोपासली आहे असं दिसतयं. एक मुल असं बघायला लागलं की अख्खी पलटणच तशी बघत खिदळायला लागते त्याची आठवण झाली, प्रतिसाद वाचताना.

मिसळपाव Mon, 16/06/2014 - 21:44

In reply to by अंतराआनंद

लेखावर प्रतिक्रिया दिली नव्हती कारण मी वाचेपर्यंत फारच धुराळा उडाला होता. पण तुमचा हा सुरेख प्रतिसाद वाचल्यावर रहावेना. मूळ लिखाण छान आहेच पण हि जोड पण बरोब्बर आहे. शेवटच्या तीन ओळी तर....व्व्वा!

बॅटमॅन Mon, 16/06/2014 - 23:40

In reply to by अंतराआनंद

एखाद्या प्रकारची वागणूक आपल्याला आवडत नसेल तर ती कशी पोरकट आहे हे इम्प्लायवण्याचा प्रयत्न लोकका करतात ते कळत नाही. आञ मीन, मुद्द्यात काय ते पकडा. उगा ही वागणूक कशी पोरकट आहे नि ते कसं बालिश आहे असं कशाला?

अजो१२३ Tue, 17/06/2014 - 11:31

In reply to by अंतराआनंद

लहान मुलं पलंगावर उताणं झोपून , मान खाली टाकून सभोवतालच्या गोष्टी/ माणसं कशी उलटी दिसतात हे खिदळत बघत बसतात. अजोंनी हया खेळाची आवड अजून जोपासली आहे असं दिसतयं. एक मुल असं बघायला लागलं की अख्खी पलटणच तशी बघत खिदळायला लागते त्याची आठवण झाली, प्रतिसाद वाचताना.

लेखकाच्या मुक्तकाच्या आशयाबद्दल मी काहीच बोललो नाही.

बरचसं जीवन जगून झाल्यावर व्यक्ति आपण ज्या मूल्यांच्या आधारावर ते जगलो त्यांचेच मूल्यमापन करू शकते नि काहीतरी राहून गेल्याची हुरहुर, खंत व्यक्तिला वाटू शकते. कधी कधी एखादे मूल्य जे भोग म्हणून आपलेसे केले ते आयुष्यभराचे बंधन बनून जाते. व्यक्ति पश्चातबुद्धीने औट घटकेसाठी सद्य मूल्याची उणी बाजू अभ्यासू लागते. त्या अर्थाने हे मुक्तक कोणास भावले तर त्याबद्दल माझे म्हणणे नाही.

पुन्हा लक्षात घ्या, लेखकाने भावूकतेने मानवी जीवनातला एक क्षण टिपला आहे, नि त्यात जो कोणी समरस झाला/ झाली आहे त्याबद्दल माझे म्हणणे नाही.

माझा आक्षेप ऋषिकेश साहेबांच्या खालिल स्वीपिंग स्टेटमेंटला आहे-

आपल्याकडे "त्याग" या गुणाला सद्गुणाच्या कॉलममध्ये घातले गेले आहेच, त्याहून भयानक म्हणजे हा सद्गुण हे स्त्रीत्त्वाचे अभिन्न अंग करून टाकले आहे. त्याग करणे हे स्त्रीत्त्वाचे अविभाज्य अंग झाले आहे. मग त्याग तुम्ही किती छान आई आहात, बायको आहात, बहिण आहात नी मुलगी आहात सारे काही ठरवतो यासारखा क्रूर प्रकार नसावा.

त्याग हा नि:संशयपणे सद्गुण आहे. स्त्रीया (वा कोणीही) सद्गुणी असण्यात वा त्यांना तसे मानण्यात क्रौय आहे, ते ही अत्त्युच्च कोटीचे, हे साहेबांचे म्हणणे सर्वस्वी अस्वीकार्य आहे. माझी आई, बहीण, मुलगी छान का नसावी? कोणी छान वागले वा त्याग केला तर तो आपसूक त्या व्यक्तिवर अन्याय होत नाही. यापुढे जाऊन मी असे म्हणेन कि किमान आईच्या बाबतीत निसर्गाने तिला काही मिनिमम त्याग कंपल्सरी केला आहे. तो तिला करावाच लागतो. म्हणूनच आणि एरवीही मला ती आवडते. तुम्ही कुंपणावर बसून आम्हा दोघांना आरोपीच्या, मूर्खांच्या, इ इ पिंजर्‍यात ठेऊ लागलात तर लहान मूल बनून उलटे बघण्याचा खेळ मला पसंद आहे असे खुलेपणाने सांगतो. क्रूर नि दुर्गुणी बनण्यापेक्षा मी बालबुद्धी असण्याचा आरोप आरामात झेलू शकतो.

ऋषिदांना स्पेसिफिकली त्यागाचे, छानपणाचे सद्यकालीन स्वरुप काय असावे, त्याच्या मर्यादा काय असाव्यात, त्यांचा मेकॅनिझम काय असावा, इ इ बद्दल व्यक्तिगत मते असतील तर वेगळी बाब आहे. त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही.

सांप्रतकालीन नवमूल्यव्यवस्था जन्मण्याअगोदर, कोणेतेही फॉर्मल शिक्षण नसताना, २२ लाख वर्षे मानवता काही सनातन मूल्यांधारे टिकून आहे. इतक्या फटकन त्यांना केराची टोपली दाखवणे श्रेयस्कर नसावे.

मेघना भुस्कुटे Tue, 17/06/2014 - 12:21

In reply to by अजो१२३

त्याग हे मूल्य म्हणून सुंदरच आहे. एखादी व्यक्ती आपला स्वार्थ स्वतःहून बाजूला सारून दुसर्‍या व्यक्तीच्या फायद्यासाठी काही कृती करते याहून अधिक सुंदर काय असणार? पशुपातळीवरच्या प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया बाजूला ठेवता येणे हे माणसाला पशूपासून वेगळे करणारे काही भव्य-उदात्त आहे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही.

पण अडचण केव्हा उद्भवते?

जेव्हा एखादी व्यक्ती जन्माने अमुक एखाद्या गटात आहे (ज्याबद्दल निवड शक्य नाही), म्हणून त्याच्याकडून त्याग या भव्यउदात्त सद्गुणाची अपेक्षा केली जाते तेव्हा. अशा अपेक्षा दिसतात तितक्या साध्यासुध्या नसतात. व्यक्तीच्या जडणघडणीत या अपेक्षांचा दबावतंत्र म्हणून वापर सुरू होतो. व्यक्तिगत पातळीवर मुद्दामहून नसेलही होत. पण हळूहळू होत जातो. उदाहरण देते: मी स्त्री आहे. पण स्त्री सहसा जे त्याग नैसर्गिकरीत्या (तुमच्या मते) करते (मुलाला जन्म देण्यासाठी ९ महिने खस्ता खाणे, नंतर काही वर्षे घरी थांबून त्याचे पालनपोषण करणे, नंतर जन्मभर एका जिवाच्या भल्यासाठी सतत जागरुक - उत्तरदायी राहणे), ते करण्याची माझी इच्छा नाही. या अनिच्छेबद्दल मला आडून आडून गोष्टी ऐकवल्या जातात. 'बाई असून कशी बाई जर्रा माया नाही हिच्या पोटात?', 'काय धटिंगण मुलगी आहे! असल्या मुलींना नुसतं हिंडायला नि मजा करायला हवी, जबाबदार्‍या नकोत.' इत्यादी. मी घट्ट आहे, म्हणून दुर्लक्ष करते - करू शकते.

पण हा दबाव झुगारणे सगळ्यांना शक्य होतेच असे नाही. अशा दबावतंत्राला कुणालाही कळत वा नकळत बळी पाडणे (आणि त्या बळावर एखादी संस्कृती - मग ती किती का थोर असेना - उभारणे) क्रूरच आहे. मग असले दबाव मुळातून नाहीसे करता आले तर? ज्यांना त्याग करायचा आहे, त्यांनी आनंदाने करावा. आम्ही मानवजात म्हणून त्यांचे ऋणी राहू. पण ज्यांना करायचा नाही, त्यांना त्याबद्दल दूषणे नकोत.

दूषणे देण्याच्या या प्रवृत्तीला धक्का देण्यासाठी म्हणून पुढीलप्रमाणे 'स्वीपिंग स्टेटमेंट्स' केली जातात.

आपल्याकडे "त्याग" या गुणाला सद्गुणाच्या कॉलममध्ये घातले गेले आहेच, त्याहून भयानक म्हणजे हा सद्गुण हे स्त्रीत्त्वाचे अभिन्न अंग करून टाकले आहे. त्याग करणे हे स्त्रीत्त्वाचे अविभाज्य अंग झाले आहे. मग त्याग तुम्ही किती छान आई आहात, बायको आहात, बहिण आहात नी मुलगी आहात सारे काही ठरवतो यासारखा क्रूर प्रकार नसावा..'

त्यातून मूर्तिभंजन केल्यासारखे वाटते व लोक दुखावले जातात हे खरेच आहे. पण धक्का देणे, त्या अनुषंगाने चर्चा घडवून आणणे, मतपरिवर्तनाचा प्रयत्न करणे अशी त्यांची उपयुक्तताही असते.

अशा मूर्तिभंजक वाक्यांनी अजो फारच दुखावले जातात, असे आपले माझे निरीक्षण आहे. त्यात तुम्हांला दुखावण्याचा हेतू नसतो, हे कृपा करून लक्षात घ्या.

मी Tue, 17/06/2014 - 14:12

In reply to by मेघना भुस्कुटे

(मुलाला जन्म देण्यासाठी ९ महिने खस्ता खाणे, नंतर काही वर्षे घरी थांबून त्याचे पालनपोषण करणे, नंतर जन्मभर एका जिवाच्या भल्यासाठी सतत जागरुक - उत्तरदायी राहणे)

स्वत: घेतलेल्या निर्णयांना 'खस्ता खाणे', घरी थांबून त्याग करणे, 'दुसर्‍या जिवाच्या' भल्यासाठी 'उत्तरदायी' असणे अशा प्रकारचा परिप्रेक्ष्य आयुष्याच्या प्रत्येक स्थित्यंतरांमधे लागू पडावा, दबावाला बळी पडणार्‍यांबद्दल सहानुभूती आहे पण विचार करणार्‍यांनी तरी निदान आपल्या निर्णयाला अशी लेबले लावू नयेत? का ते प्रत्येक घेतलेल्या निर्णयामुळे येणार्‍या 'बंधनांना'(?) अशीच लेबले लावतात?

मेघना भुस्कुटे Tue, 17/06/2014 - 14:23

In reply to by मी

ही क्रियापदे वापरणारी मी आहे आणि त्यामुळे दृष्टिकोन उघडच माझा आहे. किंबहुना मला आज मूल नसण्यात या दृष्टिकोनाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे मी कुणा दुसरीच्या बुटांत जाऊन 'खस्ता खाणे - मातृत्वाचा महन्मंगल अनुभव घेणे', 'घरी थांबणे - संसाराचे सुखचित्र अनुभवत कृतकृत्य होणे', 'एका जिवाच्या भल्यासाठी उत्तरदायी राहणे - एक जीवन घडवण्याची थोर संधी अनुभवणे' अशी भाषांतरे कशी बरे करणार?!

माझी भाषा माझ्या निर्णयांना साजेशी आहे. मी दुसर्‍या कुणाच्या निर्णयांना लेबले लावलेली नाहीत.

बादवे, हे अवांतरः तुमच्या जवळच्या नात्यात कुणी गरोदर स्त्री / नंतर सुमारे ६-७ वर्षांचे मातृत्व (शूशीदूधपाणीऔषधजागरणेकाळज्या) पाहिली आहे का हो तुम्ही? मी पाहिली आहे. आनंद अर्थातच जगावेगळा दिसतो. ते मला मान्यच आहे. पण त्यात काहीच 'खस्ता' नाहीत, असे तुमचे म्हणणे आहे?

मी Tue, 17/06/2014 - 14:31

In reply to by मेघना भुस्कुटे

किंबहुना मला आज मूल नसण्यात या दृष्टिकोनाची भूमिका महत्त्वाची आहे.

हे फक्त मुलाच्या बाबतीतच आहे का इतरही निर्णय जे स्वातंत्र्याला बाधा आणणारे आहेत का इतर निर्णयातून येणारे बंधन हा जाणिवपूर्वक घेतलेला निर्णय आहे? उत्तर तार्किक दिलेत तरी चालेल, वैयक्तिक प्रश्न आहे म्हणून खुलासा.

माझी भाषा माझ्या निर्णयांना साजेशी आहे. मी दुसर्‍या कुणाच्या निर्णयांना लेबले लावलेली नाहीत.

प्रश्न वैयक्तिक आहे त्यामुळे तुम्ही त्याचे उत्तर तुम्हाला त्या स्तरावर द्यावे लागू नये असे वाटले म्हणून मी तुम्हाला थेट विचारले नाही. असो.

पण त्यात काहीच 'खस्ता' नाहीत, असे तुमचे म्हणणे आहे?

फार कशाला इथेच ऐसीवरच्याच मातांना विचारा, परिप्रेक्ष्य आहे असे माझे मत आहे. इथल्या मातांनी कृपया प्रतिसाद द्यावा.

मेघना भुस्कुटे Tue, 17/06/2014 - 14:35

In reply to by मी

अतिअवांतरः या उद्धृतांच्या उजव्या बाजूला येणार्‍या राखाडी रेषा कशा आणायच्या हो? मला फार आवडतात, पण जमत नाहीत!

प्रश्नाबद्दलः (हे फक्त मुलाच्या बाबतीतच आहे का इतरही निर्णय जे स्वातंत्र्याला बाधा आणणारे आहेत का इतर निर्णयातून येणारे बंधन हा जाणिवपूर्वक घेतलेला निर्णय आहे?)

मला प्रश्न कळलेला नाही. प्लीज पुन्हा वेगळ्या शब्दांत विचाराल का?

बाकी ऐसीवरच्या मातांनो:
प्रतिसादाच्या प्रतीक्षेत. ;-)

मी Tue, 17/06/2014 - 14:43

In reply to by मेघना भुस्कुटे

प्रश्नाबद्दलः (हे फक्त मुलाच्या बाबतीतच आहे का इतरही निर्णय जे स्वातंत्र्याला बाधा आणणारे आहेत का इतर निर्णयातून येणारे बंधन हा जाणिवपूर्वक घेतलेला निर्णय आहे?)
मला प्रश्न कळलेला नाही. प्लीज पुन्हा वेगळ्या शब्दांत विचाराल का?

तुम्ही त्याग, स्वातंत्र्याचा संकोच वगैरे विचार/भावना फक्त मुल होण्यासंदर्भातच व्यक्त केल्या आहेत, त्याचप्रमाणे आयुष्यातील बरेचसे मोठे निर्णय स्वातंत्र्याचा थोड्याफार प्रमाणात संकोच करतात त्यामुळे अशा सर्वच निर्णयांना अशी लेबले लावता येतील काय? कि हे विचार फक्त मुल होण्यासंदर्भातच आहे?

अतिअवांतरः या उद्धृतांच्या उजव्या बाजूला येणार्‍या राखाडी रेषा कशा आणायच्या हो? मला फार आवडतात, पण जमत नाहीत!

वांछित विधान सिलेक्ट करून ["] असे दिसणारे बटण दाबले असता blockquote ची सुविधा वापरता येते.

अनुप ढेरे Tue, 17/06/2014 - 14:45

In reply to by मी

तुम्ही त्याग, स्वातंत्र्याचा संकोच वगैरे विचार/भावना फक्त मुल होण्यासंदर्भातच व्यक्त केल्या आहेत, त्याचप्रमाणे आयुष्यातील बरेचसे मोठे निर्णय स्वातंत्र्याचा थोड्याफार प्रमाणात संकोच करतात त्यामुळे अशा सर्वच निर्णयांना अशी लेबले लावता येतील काय? कि हे विचार फक्त मुल होण्यासंदर्भातच आहे?

रोचक. हेच विचारणार होतो.

मेघना भुस्कुटे Tue, 17/06/2014 - 14:52

In reply to by अनुप ढेरे

आता हे थोडं वैयक्तिकच होणार. माफी असावी. असो. उदाहरणादाखल हरकत नाही.

स्वातंत्र्याचा संकोच ही सडीफटिंग गोष्ट नाही. त्यासोबत इतरही गोष्टी असतात. काही मिळते, काही गमावले जाते. या आपल्या-आपल्या करण्याच्या बेरजा-वजाबाक्या. माझ्यासाठी स्वातंत्र्य वा त्याचा संकोच ही एकमेव निर्णायक बाब नाही. मूल होण्यासंदर्भातच नव्हे, इतरही सर्वच निर्णयांबाबत. हां, महत्त्वाची बाब जरूर आहे.

मी Tue, 17/06/2014 - 15:01

In reply to by मेघना भुस्कुटे

या आपल्या-आपल्या करण्याच्या बेरजा-वजाबाक्या.

मग आपल्याच हिशोबाला लेबले(खस्ता, उत्तरदायित्व वगैरे) लावण्याचा मोह 'विचार' करणार्‍यांना का होतो असे मूळ प्रश्नात विचारले होते.

मेघना भुस्कुटे Tue, 17/06/2014 - 15:11

In reply to by मी

सगळ्यांनाच या बेरजा-वजाबाक्या 'आपल्या-आपल्या' ठरवता याव्यात. इतर कुणाचेच दबाव नसावेत, असे माझे म्हणणे आहे.

खस्ता-उत्तरदायित्व = वजाबाक्या. बाळंतपणातले (आणि नंतरचे) मला वाटणारे कष्ट ही माझ्याकरता ऋण बाजू आहे, असे माझ्या शब्दनिवडीतून प्रतीत होते. खस्ता खाणे ही मला वजाबाकी वाटते.

यात मोहाचा काय प्रश्न आला. मला अजूनही कळत नाही आहे. :-S

मी Tue, 17/06/2014 - 15:22

In reply to by मेघना भुस्कुटे

सगळ्यांनाच या बेरजा-वजाबाक्या 'आपल्या-आपल्या' ठरवता याव्यात. इतर कुणाचेच दबाव नसावेत, असे माझे म्हणणे आहे.

सहमत.

ज्यांना त्याग करायचा आहे, त्यांनी आनंदाने करावा. आम्ही मानवजात म्हणून त्यांचे ऋणी राहू. पण ज्यांना करायचा नाही, त्यांना त्याबद्दल दूषणे नकोत.

त्यागाचे किंवा दूषणाचे लेबल जाणिवपूर्वक घेतलेल्या निर्णयाला(बेरजा, वजाबाक्या) का लावावे? जे दबावाला बळी पडतात त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, पण त्यांच्या कृत्यालाही लेबले लावू नयेत.

मेघना भुस्कुटे Tue, 17/06/2014 - 15:59

In reply to by मी

मी माझ्या दृष्टिकोनातून कुठल्याच निर्णयाचे मूल्यमापन करू नये, असे तुमचे म्हणणे आहेसे वाटते. मला ते अशक्य आहे. (कोणतीच भूमिका न घेणे हीदेखील एक भूमिकाच आहे, या वाक्याची आठवण होते आहे. ;-)) शिवाय कुणी जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे आणि कोण दबावापोटी निर्णय घेते आहे - हे पाहण्याची नजरही माझी असणार! ती कशी काय टाळणार, सांगा बरे!
***

एकेरी झब्बू खेळताना दोनच भिडू उरले आणि दोघांकडे बरोब्बर विरोधी पाने असली की जे होते, ते आपले चाललेले आहेसे दिसते. अशा वेळी जशी जास्तीची पाच-पाच पाने वाटून खेळ निर्णायक करतात, तसेच करू.

'गरोदरपण म्हणजे खस्ता खाणे असते' असे 'लेबल' मी लावू नये, असे तुमचे मत दिसते. का नये लावू लेबल? गेली कित्येक वर्षे 'मातृत्व हे महन्मंगल स्तोत्र आहे'छापाची लेबले फिरतातच आहेत की नाही प्रतिष्ठितपणे? बरे, ही लेबले लोक स्वतःपुरती ठेवताना दिसत नाहीत. माझ्या वागण्यालाही लावतात आणि त्यावर शेरे मारतात. मुदलात अशा शेर्‍यांवर उतारा म्हणूनच मी 'मला नाही वाटत मातृत्व म्हणजे स्तोत्रंबित्रं. डोक्याला शॉट आहे नुसता' अशी भूमिका उघडपणे मांडण्याची भूमिका घेतली आहे की. त्यालाच मूर्तिभंजन म्हणतात.

मुदलात मूर्ती अस्तित्वात आहे, म्हणून भंजनाची गरज आहे.

मग 'अमुक एका बाईंनी गरोदरपणाच्या खस्ता खाल्ल्या आणि सगळे आयुष्य घरी खितपत काढले' असे का नाही म्हणायचे? बाईंच्या निर्णयाला मी हरकत घेणारी कुणी नव्हे. पण बाईंच्या निर्णयाचे जे (माझ्या मते झालेले) उदात्तीकरण आहे (आणि त्यामुळे काही लोकांवर माझ्या मते जो अन्याय होतो) त्याचे भंजन करण्यासाठी शेरे मारण्याचा हक्क मला नाही का?

(आता मात्र दमले बुवा.)