ताई
मी तेव्हा पुण्यामध्ये खोली भाड्याने घेऊन रहात होतो. दिवसभर कॉलेजात, मित्रमंडळींच्या सोबत वेळ जायचा. संध्याकाळी सहा साडेसहा वाजता रुमवर आलो की मस्त फ्रेश होऊन चहा बनवायचा. आठाला खानावळी कडे प्रस्थान. जेवण झाल्यावर थोडंफार वाचन, रेडिओ ऐकणं.
घरमालक कुटुंब शेजारीच रहायला होतं. खूप सज्जन आणि मनमिळाऊ स्वभावाचे लोक होते ते. काका आणि काकू दोघेच होते. संध्याकाळी साडेसात वाजता बरोबर त्यांच्या कडे एक भारीपैकी साडी नेसलेली, गोरीपान आणि धिप्पाड बांध्याची एक महिला रोज येत असे.
बाहेरुनच "आबाजीSS" अशी हाळी मारत. आतून काका लगेच या या असे म्हणून स्वागत करीत. त्या आल्या की चहापाणी होई आणि मग त्या ( त्यांना नंतर मी ताई म्हणू लागलो.) पिशवीतून बायबल बाहेर काढून आदल्या दिवशी जेथे वाचन संपलं तेथून पुढे वाचायला सुरुवात करीत. ताईंचा आवाज खूप खणखणीत होता. सतत हसरा चेहरा आणि बोलके डोळे. त्वचा एकदम नितळ तुकतुकीत. बायबलमध्ये त्या फार रंगून जात, जणू त्या काळात त्या पोहोचल्या आहेत असे वाटू लागे.
बायबल ची सगळी वंशावळ त्यांना पाठ होती. अगदी सहजच कधी काय घडले हे सांगत असत. माझे कान त्यांच्या वाचनाकडे असत. हळूहळू मीही तिकडे खेचला गेलो. व ताईंचं बायबल सांगणं समोर बसून ऐकू लागलो.
हळूहळू एकमेकांशी संभाषण करताना एकमेकांची माहिती कळत गेली. ताई एका सरकारी कार्यालयात नोकरी करत होत्या. त्यांच्या पूर्वजांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. काकांनी सांगितल्यानुसार त्या आपल्या पती आणि दोन मुलांपासून वेगळ्या रहात होत्या. पती संशयी स्वभाव आणि घरीच बसणारा होता. तो सतत ताईंच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत असे. मुले देखील बापाची बाजू घेत. सतत आईकडून पैसे मागत. थोडक्यात वाया चालली होती. अशातच एका कर्णपिशाच्च वश असणाऱ्या माणसाला त्या भेटल्या. तो म्हातारा माणूस बोलला, बाई तू फार भोगलंस, तूला यातून सुटायचं असेल तर एकटी बाजूला रहा. ताईंनी हिम्मत करून घर सोडलं. लपून लांब भाड्यानं घर घेऊन राहू लागल्या. त्यांचे घरमालक हे ख्रिस्तीच होते त्यांनी ताईंना मुलगी मानलं. व ताईंच्या पैशातून ताईंना जागा घेऊन छोटासा बंगला बांधून दिला. तिकडे पतीनं कामधंदा शोधला व एकटाच मुलांना वाढवू लागला.
ताईंचे हे असे घर, मुलं सोडून जाण माहेरी आवडलं नाही तरी काही भावंडं त्यांच्या बाजूने होती.
माझे घरमालक ताईंना बहिणीप्रमाणे वागवत होते. व ताईसुध्दा दवाखाना, अडी अडचणीत मदत करत असत. हळूहळू ताई आणि माझी ओळख वाढली. मला मुलासारखे माणून मला खूप जीव लावत. रविवारी मी आणि काका ताईंकडे जेवायला जायचो. मस्त गरमागरम जेवण टेबलावर मांडून ताटं वाढली की मी लगेच जेवायला हात पुढे करायचो. तेवढ्यात ताई प्रार्थना सुरू करत, " हे आमच्या आकाशातल्या बापा, तू आमच्या वर अशीच कृपा ठेव. तुझ्या कृपेने आम्ही दोन घास सुखाचे खातो".... वगैरे वगैरे. मी शरमून हात मागे घेई. पोटभर जेवण करून तिथेच आराम, गप्पागोष्टी करत वेळ जाई. कधीकधी ताईंबरोबर रविवारी सकाळी मी चर्च मध्ये जायचो. ताईंना ओळखणारे माझंही हसून स्वागत करत. खूप छान दिवस चालले होते.
अशातच माझं कॉलेज संपले. गावी आलो. नंतर मला नोकरी मिळाली. ताईंबरोबर अधुन मधुन पत्रव्यवहार सुरू होता. दरम्यान माझं लग्न जमलं. मी ताईंना निमंत्रण पाठवले. त्या आल्या. खूप उत्साहाने लग्नात सामील झाल्या. माझ्या घरच्यांची त्यांच्याशी अगोदर ओळख होतीच. घरातल्यांना सुध्दा आनंद झाला.
पुढे माझी बदली खूप दूर गावी झाली. मी माझ्या संसारात रमलो होतो. ताईंशी तुटक तुटक संपर्क होता. त्या आता रिटायर झाल्या होत्या. माझे घरमालक काका वारले. ताई आता एकाकी पडल्या.
अचानक एक दिवस त्या माझ्या नोकरीच्या ठिकाणी आल्या. आधी माझ्या घरी जाऊन मग तिथून पत्ता घेऊन सरप्राइज द्यावं तशा
माझ्या घरी आल्या. मलाही आनंद झाला. आठवडा झाला, पंधरा दिवस झाले तरी राहिल्या. वेगवेगळे पदार्थ करून पत्नीला मदत करीत. मी पण खूश होतो. वडीलधारी व्यक्ती घरी आली म्हटल्यावर.
हळूहळू माझ्या बायकोचे दोष त्या काढू लागल्या, मला म्हणू लागल्या तूझी बायको आळशी आहे. मुलांवर ओरडू लागल्या. मला त्यांचं वागणं पटेना पण मी काही बोललो नाही. एक दिवस परत गेल्या.
नंतर परत एके दिवशी माझ्या गावाकडील घरी गेल्या. तिकडेच थांबल्या. मला घरुन फोन आला. त्या माझ्या घरच्यांना सतत बायबलच्या गोष्टी सांगून पिडत होत्या. तुमचे दगडाचे देव, मातीचे देव तुमचं काय रक्षण करणार? प्रभु येशूला शरण या. तोच फक्त तुमचा उद्धार करेल वगैरे वगैरे. माझा ताईंशी स्नेह असल्यामुळे घरचे ताईंना उलट बोलत नव्हते. पण माझ्या आईच्या चेहऱ्यावरील भाव ताईंना कळले असावेत. त्या परत गेल्या.
मध्यंतरी चार पाच वर्षे गेली. मी एकदा ताईंना भेटायला पुण्यात गेलो. तर ताई ओळखू येईनात इतक्या लठ्ठ बनल्या होत्या. त्यांना स्वैपाकही खूर्चीवर बसून करावा लागत होता. घरातील पाण्याचं नळ कनेक्शन बंद केले होते त्यांनी. एकच लाईट वापरत होत्या. मी नेलेला खाऊ त्यांनी आत ठेवून दिला. मी जाईपर्यंत बाहेर काढला नाही. धाकटा मुलगा अधुन मधून डबा घेऊन येत होता. ताईंनी त्याला काही पैसे दिले होते. बंगल्यात सगळीकडे अडगळ वाटत होती आणि प्रवेशद्वार लोखंडी दरवाजे बसवून बंद केले होते. घरात एक कुबट वास भरुन राहिला होता. खर्च नको म्हणून फोन सुध्दा बंद केला होता. बाहेरुन पाणी आणत होत्या कुठल्या हौदावरुन. त्या फक्त आणि फक्त बायबल वरच बोलत होत्या. नॉनस्टॉप! मला सुखदुःखाचं बोलायचं होतं पण त्यांची गाडी भन्नाट सुटली होती. काकांचा विषय निघाला तर त्या म्हणाल्या की ते भूत आलं होतं माझ्या कडे. काकांनी काही पैसे ठेवलेत का म्हणून विचारत होते. मी म्हटलं कोण भूत? तर त्या काकूंना भूत म्हणत होत्या. मनात विचार आला की किती बदलल्या ताई? काकांच्या मागं मदत करायला हवी होती काकूंना. किती प्रेमाने काकूंनी अनेक वेळा आम्हाला जेऊ घातले होते. माझा डबा असला तरी मी हक्कानं त्यांच्यात जेवण करायचो.
ताईंना मी सहज म्हटलं की, ताई प्रभू शेजाऱ्यावर प्रेम करा म्हणतो आणि आपण तर नातेवाईकांना पण दूर लोटतो. ताईंना हे बोलल्याचा फार राग आला. मला म्हणाल्या आणि तूमचा धर्म तर म्हणतो जीवो जीवस्य जीवनम्. तुमचे देव असे आणि तसे.
हळूच माझ्या बायकोचा विषय निघाला. मी सहज बोलून गेलो, आजकाल भांडत असते माझ्याशी. तर ताई मला बोलल्या तू माझ्या सारखा घराबाहेर पड, मग तिला अद्दल घडेल. तू इथं येऊन रहा. आपण इकडं तूला नोकरी शोधू. बाहेर पडताना सगळे सर्टिफिकेट बरोबर घे. म्हणजे परत तूला त्या घरात जावं लागणार नाही.
मी हो ला हो केले आणि निरोप घेतला.
प्रतिक्रिया
तुम्हीं काहीं म्हणां, उस्मानशेठ...
हिंदू असो वा ख्रिस्ती, सर्व पारंपरिक दक्षिण आशियाई थेरडेशाही सारखीच! (आमलेऽऽऽऽऽऽट!)
काय स्टोरी आहे!
काय स्टोरी आहे!
धन्यवाद आबाबा. मला सविस्तर
धन्यवाद आबाबा. मला सविस्तर प्रतिसाद अपेक्षित होता तुमच्याकडून.
।।श्रीराम जयराम जय जय राम।।
धन्यवाद आबाबा. मला सविस्तर
..
।।श्रीराम जयराम जय जय राम।।
उस्मान क्वोन आता आनी?
उस्मान क्वोन आता आनी?
।।श्रीराम जयराम जय जय राम।।
'म्हैस'मधला
.
म्हस कुटं गावायची? ( मला खरंच
म्हस कुटं गावायची? ( मला खरंच आठवत नाही)
।।श्रीराम जयराम जय जय राम।।
म्हस कुटं गावायची? हितं!
दुवा
बापरे. छान लिहिलंय.
अजून घडामोडी घडल्या तर स्टीफन किंगच्या गोष्टीसारखी होईल!
आवडलं!
आवडलं!
अजून सविस्तर लिहिता आलं असतं - म्हणजे नंतर त्या बदलल्या का? वगैरे.
-----
==================
भूतकाळातील आस्वल्य.
?
'बदलल्या का' बोले तो? 'घरवापसी'???
अस्वलराव, तुमच्याकडून या प्रश्नाची अपेक्षा नव्हती!
नव्हे हो
नव्हे हो
बदलल्या म्हणजे नंतर एकदम सॅड-मोड मधे गेली ष्टोरी. तर ते आणखी खुलवता आलं असतं.
असं.
असो.
भूत वगैरे वाचून मला त्या कॅरेक्टरबद्दल थोडा जिव्हाळा वाटायला लागलेला.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
ज्या काही घटना घडल्या त्या
ज्या काही घटना घडल्या त्या लिहिल्या आहेत त्या पुरेशा आहेत. उगाच कथानक पसरवून वर्णन करून चार पाच भाग केले नाहीत ते आवडले.
एकूण छान.
अशा सत्यकथा फार पूर्वी 'अमृत' मासिकात 'याला जीवन ऐसे नाव' या सदरात येत असत. मी शाळेत लहान होतो पण त्या कथानकांतून 'जे नात्यागोत्यांत, मैत्रीत असते ते बदलू शकते हे समजले. शिवाय कटुंबांत उलथापालथ होते. याचे मूळ लोभ आणि काही हेतू मनात धरून वागणाऱ्या व्यक्ती नंतर साध्यता न मिळाल्याने फिरतात हे आहे. सांपत्तिक स्थिती बदलल्यानेही चिकटलेले लोक दूर जातात.
बाकी या कथेतील ताई पात्र, क्रिस्चन धर्म, प्रचार यावर बोलणार नाही.
आयुष्याच्या शेवटीशेवटी निराधारता आल्याने येणारी अगतिकताही हीसुद्धा माणसं बदलवते.
---------
युट्युबवर पुलंची म्हस (आणि इतर गोष्टी )आहेच.
धन्यवाद आ'बाबा. अत्यंत अचूक
धन्यवाद आ'बाबा. अत्यंत अचूक निरीक्षण आहे तुमचं. मनुष्य स्वभावाचा थांगपत्ता लागणं कठीण आहे. परिस्थिती प्रमाणे माणूस रंग बदलतो.
।।श्रीराम जयराम जय जय राम।।