सुष्ट-दुष्ट
"को S हम" प्रश्न सनातन आहे असे म्हणतात. पण मला तरी जवळ जवळ त्या प्रश्नाइतकाच सनातन प्रश्न जो वाटतो तो म्हणजे - जगामध्ये "खल प्रवृत्ती चे अस्तित्व का आहे?"
जरा चराचरात ईश्वर भरलेला आहे, तर मग तो/ती, विश्वामध्ये चालू असलेल्या अन्याय, क्रूरता, विटंबना आदि घटनांकडे दुर्लक्ष का करते? जर देव सर्वसाक्षी, कर्मासाक्षी आहे, तसेच सर्वशक्तिमान आहे तर त्याने हे दुरित चालून कसे दिले? अनेक धर्मानी या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला असावा. माझ्या माहितीत हिंदू धर्माने तरी निश्चितच केलेला आहे. हिंदू धर्मानुसार, या प्रश्नाचे उत्तर, "कर्मविपाक" असे एका शब्दात देता यावे. अर्थात जसे करावे तसे भरावे. जर तुम्ही पूर्वजन्मी एखाद्या व्यक्तीवरती अन्याय केलेला असेल तर या जन्मी तुम्हाला त्या अन्यायाचे फळ भोगावे लागते. पण खोलात विचार करता असे लक्षात येते की पण मागेमागे जात गेलो तर नक्की पहिला अन्याय कसा झाला? सत चित आनंदमय अशा अस्तित्वात पाहिलं विष आले कोठून? बरं जर हे मूलभूत अस्तित्व जर इतके परिपूर्ण होते तर त्या अस्तित्वाने शॉक ऍबसॉर्बेर सारखी हि पहिली विकृती का नाही नामशेष केली?
"Regression Therapy " वरचे एक पुस्तक वाचत असतेवेळी मला या विषयावरचा एक विचार सापडला जो की "चराचरात एकच तत्व भरून राहिलेले आहे" या विचाराचा विस्तार आहे. जर आपल्या सर्वामध्ये एकच तत्व आहे, परंतु अगणित भिन्नत्व आहे, दिसण्यात, वागण्यात, विचार करण्यात तर मग अन्य व्यक्ती हि केवळ माझाच एक दुसरा पर्याय नाही का? अधिक स्पष्ट करून सांगायचे झाले तर, Another person is just another option, I, myself could have been. आणि जर तसे असेल तर मी तरी त्या पर्यायाचा तिरस्कार का करू? कारण त्या व्यक्तीत व माझ्यामध्ये भिन्नत्व आहे ते निव्वळ(?) पर्यायाचे. मी एखादा श्लाघ्य पर्याय जाणून बुजून निवडला नाही याउलट अन्य वक्तीने तसा पर्याय निवडून त्यावरती अंमल केला एवढाच (?) फरक. माझाच, मी तिरस्कार करू शकतच्न नाही. जास्तीत जास्त मी तसे आपण वागू नये याची दक्षता घेऊ शकते, जमल्यास अन्य व्यक्तीला त्या त्या श्लाघ्य कर्मापासून परावृत्त करू शकते.
मंगला आठवले लिखित, जयवंत दळवींवरच्या पुस्तकात एक वाक्य आहे "वयाच्या ६ ते १६ वर्षांमध्ये जे काही घडते ते माणसाला जन्मभर पुरून उरते."
मला ते वाक्य बऱ्याच अंशी पटते. कदाचित हे सारे माझ्या मनाचे Defence Mechanism देखील असू शकेल पण जशा संगणकावरती, काही न दिसणाऱ्या processes backend वरती चालू असतात तसे या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न कुठेतरी माझ्या मर्यादित अस्तित्वात, बुद्धीच्या, अनुभवांच्या परिघात सतत चालू असतो. जसजसा काळ सरकतो तसतशी या प्रश्नांचे उत्तर शोधण्याची निकड तीव्र बनते, हे सर्वांचे होते का मला माहीत नाही. परंतु या प्रश्नाने माझा पिच्छा पुरविलेला आहे. आणि वरील उत्तर सापडल्याने कदाचित तात्पुरती, कदाचित बऱ्यापैकी कायमस्वरुपी शांती मिळालेली आहे.
प्रतिक्रिया
प्रत्येक व्यक्ति एकमेव
प्रत्येक व्यक्ति एकमेव अद्वितीय असते.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
दिसण्यात की वागण्यात?
दिसण्यात की वागण्यात?
वागण्यात व्यक्ती एकमेवाद्वितिय असते हे गृहीतक आहे जसे प्रत्येक हिमकण एकमेवाद्वितिय असतो हे गृहीतक आहे. प्रत्येक हिमकण तपासुन पाहील्याखेरीज या प्रमेयाची सिद्धताच होउ शकत नाही. आणि तशी प्रयोगशाळा अस्तित्वात येउ शकत नसल्याने आपण गृहीत धरलेले आहे की प्रत्येक हिमकण हा एकमेवाद्वितिय असतो.
त्याच्प्रमाणे, २ व्यक्तिंना अगदी तंतोतंत पर्याय (आई-वडिलांच्या प्रेमापासुन ते प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी) आपण देउच शकत नाही. त्यामुळे या प्रमेयाचीहि सिद्धता होउ शकतच नाही.
उत्तर माहित नाही.
उत्तर माहित नाही.
धन्यवाद 'च्रटजी
धन्यवाद 'च्रटजी
वाक्यांचे सुटे अर्थ कळले, पण
वाक्यांचे सुटे अर्थ कळले, पण एकूण मुद्दा काय आहे ते कळलं नाही. तिरस्कार करु नये यासाठी काही कॉम्प्लिकेटेड थियरी आहे का यात?
व्यक्ती ही स्वकेंद्रित असते.
व्यक्ती ही स्वकेंद्रित असते. बरेचदा एखादी व्यक्ती माझ्याशी अमुक एकच का वागली या प्रश्नाने ऑब्सेस झालेली असते, शांती गमावलेली असते. त्यातुन ती स्वत:ला आलेल्या एखाद्या अथवा अनेक अनुभवांचा जाब ईश्वराला मागत असते, पुस्तकात शोधत असते, कुंडलीतील ग्रहताऱ्यानंमध्येही. या हरवलेल्या मानसिक शांतिकरता मग "कर्मविपाक" , "ग्रहांचे भ्रमण" सारख्या थिअरी वाचते, पण प्रत्येक थिअरीत खोल जाता काही ना काही तृटी आढळुन येतात.माणुसकीला काळीमा फासणारे हिटलर सारख्या व्यक्ती आपल्याला अचंब्यात टाकतात.
"Regression Therapy" च्या पुस्तकात हे जे काही मला सापडलं ते सखोल वाटले.
'एकमेवाद्वितीय'
घाटपांडेकाका म्हणाले त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती ही एकमेवाद्वितीय असते. एकासारखी दुसरी नसते. जुळ्या व्यक्तीसुद्धा एकमेकांसारख्या नसतात. दिसायला सारख्या असल्या तरी त्यांचे मनोव्यापार सारखे नसतात. जसा काळाचा एक तुकडा, एक क्षण दुसऱ्यासारखा नसतो, त्याचे एक्स वाय झेड ॲक्सेस बदललेले असतात, आणि त्यामुळे एका क्षणामागचे जगही तेच तसेच नसते, त्याप्रमाणे. आपण शाश्वताची, समतेची अश्या काही कल्पना मनात धरतो. दोन दिवसांपूर्वीची व्यक्ती, तिच्या भावभावना, मूड्स् तेच असणार्र असे धरून चालतो. आपण स्थळ काळाच्या मितीत वागणे योग्य असते. यातली एखादी मिती आपल्या हातून निसटली तर घोटाळा होतो. व्यक्तीच्या स्वभावानुसार तिच्याशी वागणे योग्य असते. म्हणजे तिच्या कलाने वागावे असा अर्थ नाही किंवा तिच्या 'हो'ला 'हो' करावे असेही नाही. अप्रिय व्यक्तीचे अस्तित्व मान्य करून टाकणे हा एक पर्याय होऊ शकतो. आपल्याला न आवडणारी असली तरी ती माणसे जगात असणारच, त्यांना या जगात असण्याचा ईश्वरदत्त हक्क आहे (मानवदत्त नव्हे) हे एकदा गळी उतरवून घेतले की मनस्ताप होत नाही. घिशापिट्या शब्दांत सांगायचे तर उंट तिरकाच चालणार, हत्ती सरळच चालणार हे ठरलेले असते. विधिलिखित म्हणा हवे तर.
माणुसकी किंवा मानवता म्हणजे खरे तर मानव असण्याचा भाव. या शब्दातून 'माणसाचे सर्व भावविभाव' असा अर्थ निघतो. आपण त्याचा अर्थ सज्जनता असा धरतो. कारण माणूस आणि पशू किंवा माणूस विरुद्ध पशु अशी तुलना आपल्या संज्ञाप्रवाहात असते. मानवता आणि पशुता असे द्वन्द्व आपण मानतो. खरे तर मानव हाही एक पशूच आहे. ॲड्वान्स्ड पशू. काही खास फीचर्स बाळगणारा पशू. दुष्ट माणसेसुद्धा त्यांना आवडणाऱ्या, त्यांना योग्य वाटणाऱ्या रीतीने वागत असतात. सर्वांशी सारखे वागणे म्हणजे समभाव नव्हे. माणूस पाहून वागणे आणि सहसा कुणाला न दुखवणे, ही किल्ली आहे. आणि बलवान व्यक्तीशी एकट्याने पंगा न घेणे योग्य असते शेवटी. इफ यू कान्ट रेझिस्ट, एन्ड्युअर. असे हे अगदी एलिमेंटरी व्याख्यान.
या सर्व लिखाणात सार्वजनिकपणामुळे थोडासा भाबडेपणा जाणवेल कदाचित, व्यनि करायला हवा होता; पण धागा सार्वजनिक आहे म्हणून आत्मीयतेने लिहिले आहे.
राही प्रतिसाद आवडलाच.
राही प्रतिसाद आवडलाच.
सुंदर. हेच्च.
काळजी घ्या
आज २ एप्रिल
स्वमग्नता दिवसाच्या शुभेच्छा
तुम्हालाही.
तुम्हालाही.