मी आणि जातीयवाद
गेली अनेक वर्षे दलित हत्याकांड, शिक्षण व नोकऱ्यांत आरक्षण, अस्पृश्यता यांविषयी बातम्या व चर्चा, ६ डिसेम्बरचा मोर्चा आणि त्याने मागे सोडलेली घाण, ६ डिसेंबरला 'दादरला जाऊ नकोस बरे' अश्या अर्थाची टिप्पणी याव्यतिरिक्त माझा व्यक्तिशः जातीयवादाशी संबंध आहे असं कधी वाटलंच नाही. आणि ते साहजिकच होतं. मुंबईत ट्रेन आणि बसमध्ये आपण कोणत्या जाती-धर्माच्या गर्दीत गुदमरतोय याचा मी आणि आपण सर्वजण विचार करत नाही. तसंच कॉलेजमध्ये मैत्री करताना अथवा नोकरी करतानाही मी जातीपातीचा निकष लावत नाही. पण 'भीमा-कोरेगाव'नंतर या विषयाचा विचार करताना स्वतःच्याच मनाचे लपलेले पदर उलगडत गेले आणि अस्वस्थता वाढली म्हणून हा लेखन खटाटोप.
शाळेत असताना लहानपणी कामवाल्या बाईकरता वेगळा कप आणि ताट बघितलेले पुसटसं आठवतंय. खात्रीने नाही सांगता येणार. आणि त्यावेळेस ते खटकलंही नाही. कारण एकतर खूप कळण्याचं आणि विचार करण्याचं वय नव्हतं. ही स्वच्छता की जातीयवाद? मात्र मी कॉलेजमध्ये गेल्यापासून घरात कोणाकरताही वेगळी भांडी नाहीत हे मात्र नक्की.
आमच्या 'तृप्ती' बिल्डिंगमध्ये फक्त तीनच ब्राह्मण कुटुंब. आम्ही देशपांडे, खालचे भट आणि शेंबेकर. इतर सर्व बहुतांश कोकणवासीय, मालवणी. रविवारी रटरटणाऱ्या चिकन, मटण आणि माशांचा उग्र वास सर्वत्र दरवळायचा. मग आई आणि माझं पित्त आणि डोकेदुखी उसळायची. आम्ही उलट्यांनी बेजार. आता काळानुसार तो वास सहन झाला तरी कधीतरी अजूनही डोकं उठतं. पण आम्ही मांस-मच्छी खात नाही म्हणून क्वचित आमच्या दारात मुद्दामहून अंड्यांची टरफलं टाकलेली व नंतर मग आमची चीडचीड अजूनही लक्षात आहे. मी मांसाहार करावा म्हणून काही बायकांनी केलेला प्रयत्नही आठवतो. 'वरण-भाताने अंगात ताकद व पौरुषत्व येत नाही' हा त्यांचा लाडका युक्तिवाद. 'एकदा माझ्या हातचं खाऊन बघ तुझी जात विसरशील' (जी मला कळलीच नाही आणि मी पाळलीही नाही) हा दुसरा. हे आईला कळल्यावर 'अजिबात तसं काही खायचं नाही' हा इशाराही लक्षात आहे जो ती अजूनही देते. बाय द वे, मी आतापर्यंत चिकन, मटण, मासे, खेकडे, जवळे, डुक्कर आणि आणि गायही चाखून पाहिलंय. पण मिटक्या मारत खावं असं वाटतच नाही. मला डुक्कर आणि गाय खाऊ घालताना एका ख्रिश्चन सहकाऱ्याचा आनंदही लक्षात आहे. पण आजही हे सर्व प्राणी खाताना समोरच्या ताटात ते अचानक जिवंत होतील आणि आक्रोश करतील अशी भीती वाटते. त्यामुळे शाकाहाराचा संबंध फक्त जातीवादाशी नसून माझ्या प्राणीप्रेमाशी आहे हे नक्की. शिवाय मांस-मच्छी व दारू पचवण्याची माझी क्षमता नाही हे खरंय. यात आईच्या मते 'ब्राह्मणी पिंड' आहे की माझी वैयक्तिक कमजोरी हा संशोधनाचा विषय होऊ शकेल.
मी जातीयवादाशी प्रथम अस्फुट संघर्ष केला तो दहावीत. परांजपे शाळेत आठवी ते दहावीत मी 'स्कॉलर' तुकडीत, ज्यात बहुतांश ब्राह्मण होते. अन्य जातीय जरा दबूनच असावेत अशी मला शंका होती पण मी तेव्हाही निग्रहाने 'हा मूर्खपणा आहे' म्हणून त्याचा विचारही करत नसे. दहावीत मात्र सर्व काही उघडं पडलं. एक एस सी/ एस टी शिक्षिका शाळेत दाखल झाल्या आणि तेही (बहुतेक) मराठी शिकवायला. त्यांचे 'आनी, पानी, णळ' हे उच्चार ऐकून सुरुवातीला हास्याचे कारंजे फुटले आणि नंतर रंगाचा भडका उडाला. 'आम्हाला ही शिक्षिका नको' अशी बहुतांश ब्राह्मण विद्यार्थ्यांची मागणी मुख्याध्यापकांपर्यंत गेली. तसेच त्यांना टोमणे मारणे, वर्ग चालू असताना छद्मी हसणे, असहकार हे चालू होतेच. मी त्यावर वाद घातले आणि असहकारही पुकारला. माझा त्या शिक्षिकेला उघड पाठिंबा होता. मी एक गोष्ट प्रामाणिकपणे मान्य करेन की ही गोष्ट १९९२ ची आहे आणि त्यावेळची प्रत्येक गोष्ट मला बारकाईने आठवत नाही. पण हे झालं नक्की. आणि त्याचा शेवट बहुतेक बाईंचीच तुकडी बदलण्यात झाला. आता यात 'भाषेचं पावित्र्य' जपण्याचा भाग किती आणि जातीयवादाचा किती यावर वाद होईल पण मी मात्र त्याकाळात जातीयवादी कॉमेंट्स ऐकले हे नक्की. शिवाय भाषेच्या पावित्र्याचा आणि जातीपातीचा संबंध हाही एक वेगळा विषय आहे.
पुढची पाच वर्षं मात्र चुकूनही कधी जाती-पातीचा संबंध आला नाही. अपवाद कॉलेजच्या अॅडमिशनच्या वेळेस आरक्षणामुळे झालेली इतरांची चिडचिड आणि चर्चा.
२००१ साली मात्र मला स्वतःला जातीयवादाचे चटके बसले आणि तोपर्यंत मी त्याचा विचारही करू लागलो होतो. पर्यावरणशास्त्र विषयात एम एससी करण्यासाठी मी अहमदनगरच्या पद्मश्री विखे-पाटील कॉलेजमध्ये दाखल झालो. घरापासून प्रथमच दूर राहत होतो. त्यामुळे थोडा चिंताग्रस्त आणि हळवा. त्यात कॉलेजमधली काही निवडक मुलं माझ्यापाशी कुत्सितपणे व थोडेसे दुष्टपणानेच वागायची. मी जुळवून घ्यायचा प्रयत्न केला पण मला जाणवलं कि त्यांच्या मनात माझ्याविषयी अढी आहे. मी मुंबईतून असण्याची? की मुलींशी बोलतो म्हणून? (तेव्हा गावात, विशेषतः कॉलेजमध्ये, मुलं- मुली जास्त बोलत नसत). पण तिढा सुटत नव्हता. शेवटी माझ्याच वर्गातल्या दुसऱ्या एकमेव ब्राह्मण मुलाने खुलासा केला : 'आपण ब्राह्मण आहोत आणि ही मराठा मंडळी आपल्याला त्रास देणारच’. 'हे बहुसंख्य आणि दांडगट आहेत त्यामुळे तू यांच्यापासून चार हात लांब राहा', असा कळकळीचा सल्लाही मिळाला. पण तरीही एकदोनदा संभाषणात मला टोमणे मारणाऱ्यांवर मी पलटवार केला आणि ते चपापले. शिवाय माझे काही खूप खास मित्रही होते जे कायम माझ्यासोबत होते. त्यामुळे हे सर्व फारच थोडक्यावर निभावले.
पुढे मी स्वयंसेवी संस्थांमध्ये अथवा कॉर्पोरेटमध्ये नोकरी केली जिथे आरक्षण नव्हते. मात्र सतत जातीची आठवण केल्याने आणि त्यावर आधारित आरक्षण दिल्याने जातीवाद कधीच संपणार नाही असे माझे ठाम मत झाले. आमच्या कौटुंबिक व्हाट्सअप ग्रुपमध्ये फिरणाऱ्या जातीयवादी पोस्ट्स अजूनही अस्वस्थ करतात. 'सगळ्यात चांगला जन्म मानवाचा, मग पुरुषाचा, मग ब्राह्मणाचा, मग देशस्थ ब्राह्मणाचा, मग देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणाचा. तेव्हा त्याचा सदुपयोग कर' असं जेव्हा आई गंभीरपणे/चेष्टेने म्हणायची तेव्हा हसावं की रडावं हेच कळत नाही. मला मारलेली 'बामणा' किंवा 'भटुक' ही हाक प्रेम की जातीयवाद?
जातीयवादी राजकीय पक्षांची मला उघड चीड आहे. मात्र मी आता जेव्हा शांतपणे त्रयस्थपणे विचार करतो तेव्हा एक लक्षात येतं : जर का सुशिक्षित मुंबईकरांमध्ये जातीयवाद आढळतो तर गावांत, जिथे बहुतांश लोकसंख्या आहे, तिथे काय परिस्थिती असेल? जेव्हा दलितांवर बलात्कार होतात तेव्हा आपण दुर्लक्ष करतो अथवा मनात काही क्षण हळहळतो, पण त्यांचे मोर्चे निघाले की आपण उघड चरफडतो.. हे कशाचे लक्षण आहे? जातीयवादाच्या सोयीस्कर आणि निवडक तिटकाऱ्याचे? की समूहाच्या भीतीचे? की आता ते एकत्र आले तर आपल्या पूर्वजांनी केलेल्या पापाच्या शिक्षेच्या भीतीचे?
जातीयवाद आपल्या समाजाला आणि देशाला पोखरतोय हे नक्की. पण इतकी बहुअंगी बिकट समस्या कशी सोडवायची यावर स्वतःच्या जातीपलीकडे जाऊन केलेली चर्चा अजूनही क्वचितच आढळते. आणि यातच आपलं अपयश लपलंय बहुतेक.
--
अमर (लक्ष्मिकांत) देशपांडे
प्रतिक्रिया
तुम्ही जातीयतावादी म्हणताय!
पण गंमत म्हणजे या सुशिक्षित मुंबईकरांबद्दल समाज म्हणून किंवा व्यक्तिगत पातळीवर उदाहरणं देऊन 'आपण जातीयवादी आहोत' असं म्हटलं तर काय प्रतिक्रिया उमटते! अडाणीपणाबद्दल तक्रार नसते; आपल्याला समजत नाही हे सुद्धा समजत नाही हे बघून मी अजूनही हतबुद्ध होते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ब्राह्मणांचा जातीयवाद
हल्लीच्या पिढीचं माहीत नाही, पण माझ्या पिढीपासूनच कधी आम्ही वा आमच्या आसपासच्या ब्राह्मण कुटुंबांनी इतर जातींना तुच्छ लेखलेलं, मुंबईत तरी पाहिलं नाही.. इतर मुलं, मला भटा अशी हांक मारायची, पण त्यांतही कधी मला वावगं वाटलं नव्हतं. म्हणजे जे काही जातीवाचक शेरे मी लहानपणी ऐकले ते ब्राह्मणांकडून नाही तर इतर लोकांकडून! मॅट्रिकला संस्कृत मधे जास्त मार्क्स मिळाले तेंव्हा, तुम्ही काय भटं, मग मिळणारच, असा शेरा ऐकला होता. घरी येऊन आईला सांगितलं तर ती म्हणाली,"सांगायचं त्यांना, आम्ही काही घरी संस्कृत मधे बोलत नाही."
आता व्हाटस ॲप आणि तत्सम मिडियावर जे ब्राह्मणी अहंकाराचे नमुने बघायला मिळतात ते चुकीचेच आहेत पण ते प्रतिक्रियात्मक आहेत असं मला वाटतं. एखाद्याची कायम जातीवरुन हेटाळणी करत राहिलं तर कधीतरी तो प्रतिक्रिया देणारच, अनेक अपमानांनंतर आलेली असल्यामुले ती अतिरेकी असण्याचा संभव जास्त!
कोकणस्थांचा Whatsapp ग्रुप
'सगळ्यात चांगला जन्म मानवाचा, मग पुरुषाचा, मग ब्राह्मणाचा, मग देशस्थ ब्राह्मणाचा, मग देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणाचा असे तुम्ही म्हणता. आमच्या कोकणस्थांच्या Whatsapp ग्रुपला हे बिलकुल अमान्य आहे. आमच्याकडे 'जगात सर्वांमध्ये भारतीय संस्कृति श्रेष्ठ, भारतामध्ये मराठी संस्कृति श्रेष्ठ, महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणी आचारविचार श्रेष्ठ, आणि त्यातहि चित्तपावन आचारविचार सर्वश्रेष्ठ' ह्याला सर्वमान्यता आहे.
"सर्व परंपरा या बौद्धिक आळसातून जन्म घेतात "
लेख उत्कृष्ट आहे. "जात" न जाण्याच्या मुख्य कारणांमध्ये ती जीवनशैलीशी अत्यंत निगडीत आहे असे वाटते (अन्न , पैसा , भाषा इ . ) तसेच राजकीय फायदे मिळविण्याचेही ते एक महत्वाचे साधन आहे (उच्चवर्णीयांसह!). आणि "सर्व परंपरा या बौद्धिक आळसातून जन्म घेतात " हे लक्षात घेतले तर जात अशीच का टिकून राहिली आहे/राहणार आहे हे समजू शकेल!
पुणे मुंबईतल्या ब्राह्मणांचा
पुणे मुंबईतल्या ब्राह्मणांचा आणि त्यांच्या दृष्टिकोनाचा अतिप्रचंड कंटाळा आला आहे.
लहान शहरातले किंवा खेड्यातील कोणी असतील तर त्यांची जातीयवाद आणि ब्राह्मण याबद्दलची मतं वाचायला आवडतील.
अजो? अभ्या?? मनोबा???
===
मराठी आंजावर आल्यापासून "Thank god मी ब्राह्मण नाहीय नाहीतर मीपण अशीच pathetic झाले असते!" असे वाटू लागले आहे.
एनिवे सोलापूरसारख्या लहान शहरात २१ वर्षे घालवून नंतर पुण्यात १७ वर्ष राहिल्यानंतरही हेच मत आहे कि ब्राह्मण फारसे महत्वाचे नाहीत आणि कोणी त्यांच्याकड फारसं लक्षपण देत नाही. फक्त जास्त संख्येने एकत्र आले कि ते आपला ढोल वाजवायला चालू करतात. जे मराठी आंजावर सारखं दिसत राहतं :O=
खुद के उपर्
तुमी बरोबर बोलते एमी दीदी. पण मग अमी काय म्हनते ए बम्मन लोक आपने खुद के उपर पण टीका करते और दुसरे लोकना पण टीका करू देते. तुमी पण खुद के उपर टीका करा ना दीदी. आम्हाला आवडेल ते पढायला.
लंगडा आला रे
तुम्हाला काय पढायला आवडते ते
तुम्हाला काय पढायला आवडते ते तुमचे तुम्ही शोधून पढा की!
बम्मन लोग काय करते आणि काय करत नाही हे काही मी त्यांना विचारायला गेले नाहीय. तेच परत परत येऊन सांगतायत.
"आता सांगतच आहात तर जरा वेगळं काहीतरी तरी सांगा; तेचते वाचून कंटाळा आला" असे मी म्हणतेय....
शुक्रिया
तीर निशाने पे लगा!
लंगडा आला रे
डु प्र का टा आ
डु प्र का टा आ
110% सहमत !
110% सहमत !
आताच्या जगात व्यक्ती,घटना आणि
आताच्या जगात व्यक्ती,घटना आणि परिस्थितीप्रमाणेच बोलले पाहिजे किंवा कृती केली पाहिजे. ते सोडून आचरण म्हणजे जातीयवाद.
अॅमी म्हणतात....
अॅमी म्हणतात....ब्राह्मण फारसे महत्वाचे नाहीत आणि कोणी त्यांच्याकड फारसं लक्षपण देत नाही. हे अगदी योग्य बोलणे आहे आणि मला हे पटले.
ब्राह्मण वर्ग आपल्या घरात कसा वागतो आणि इतरांकडे कोठल्या नजरेने पाहतो हा केवळ त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे आणि त्यामध्ये इतरांना काही सोयरसुतक असायचे कारण नाही. सार्वजनिक पातळीवर जर त्यांनी इतरांना नीच प्रकारची वर्तणूक दिली तरच इतरांना त्यावर टीका करण्याचा अधिकार पोहोचतो.
ही कसोटी लावून आता आपण त्यांच्याकडे पाहू. कूळ कायद्याने त्यांच्या जमिनी गेल्या, सावकारी संपली आणि जोसपण/भिक्षुकीमध्ये पूर्वीहि काही दम नव्हता आणि आत्ताहि नाही. ब्राह्मणवर्ग आता खेड्यांमधून अधिकाधिक नगरकेन्द्रित झालेला आहे आणि समाजाच्या अन्य गटांशी त्यांचे कलह व्हायचे प्रसंगहि खूपच कमी झालेले आहेत. राजकारण, साखर कारखाने, सूतगिरण्या, सहकारी बँका ही आधुनिक सत्तास्थाने त्यांना बंदच आहेत. उपजीविकेसाठी कोठले बौद्धिक काम, नोकरी आपल्याला मिळेल ह्याचीच चिन्ता त्यांना असते. एक ते तरी किंवा आपण कॅलिफोर्नियात कसे लवकर जाऊन पडू इकडे त्यांची नजर असते. थोडक्यात म्हणजे त्यांचा आणि अन्य समाजाचा संघर्ष व्हावा असे कोणतेहि कारण आता उरलेले नाही.
तरीहि समाजातील एका मोठ्या गटाला त्यांची असूया वाटते आणि त्यांवच्याबद्ध द्वेश वाटतो हे का? तुम्हाला सोडवायला दुसरे प्रश्न नाहीत का? ते प्रश्न सोडून 'गागाभट्टाने शिवाजी महाराजांना भरपूर दक्षिणेच्या मार्गाने लुटले,' 'संभाजीला सोडून द्यायचेचे औरंगझेबाने ठरविले होते पण केवळ ब्राह्मणांनी संभाजीद्वेशातून त्याचा वध घडविला,' 'औरंगझेब मोठा सज्जन आणि दयाळू सत्पुरुषच होता. देवळे पाडण्याच्या त्याच्या कथा झाल्याच नाहीत, त्याचे काळे चित्र रंगवून बहुजन आणि मुस्लिम ह्यांच्यामध्ये झगडा लावण्याचे ब्राह्मणी कारस्थान आहे' असला खुळचट आणि तद्दन खोटा इतिहास वर्णून आणि खाजवून खरूज काढून काय मिळते?
बिनमहत्त्वाच्या ह्या समाजघटकाला दुर्लक्षित करायला शिका ना!
जाऊ द्या हो
जाऊ द्या हो, कोल्हटकर साहेब, सोडून द्या. ब्राह्मण जमात तशी 'ॲमि केबल' नाही असंच इतरांना वाटत रहाणार. त्यामुळे दुर्लक्ष करणे म्हणजे सुद्धा त्यांच्या आस्तित्वाला मूक संमती देणे. पण कुणाला त्यांचे आस्तित्वच नको असेल, तर कोण काय करणार ?
तरीहि समाजातील एका मोठ्या
तरीहि समाजातील एका मोठ्या गटाला त्यांची असूया वाटते आणि त्यांवच्याबद्ध द्वेश वाटतो हे का?
>> काही असूया बिसूया वाटत नाही हो. मी म्हणल्याप्रमाणे कोणी लक्षच देत नाहीत त्यांच्याकडे. असूया जाऊदेत लक्ष जाण्यासारख/डोळ्यात भरण्यासारखं काहीच नसत त्यांच्याकडे. तरीही तेच येऊन बोलताना पहिल्या भेटीतच आपली जात सांगणे, काही काळाने दुसर्याला शहाणपण शिकवणे, उच्चारावरून चिडवने, आपल्या जातीचा ढोल वाजवणे चालू करतात. मग लोकपण "तू भारी तर जा घरी" म्हणतात.
हे मी सर्वसामान्य लोकांबद्दल बोलतेय. तुम्ही पुढे जी काही 'असूये' ची उदा. दिली आहेत ती वेगळी झाली. त्याच्याशी सर्वसामान्याला काही देणं घेणं नसतं.
त्याऐवजी राजकारण, साखर कारखाने, सूतगिरण्या, सहकारी बँका झालंचतर गुंठामंत्री, गळ्यातल्या सोन्याच्या साखळ्या, बुडाखालच्या चार/दोन चाकी किंवा फ्लेक्स यांचा उल्लेख करत राहणे हि "असूया" आहे!
===
आणि तिमांच्या प्रतिसादातून व्हिक्टीम प्लेयिंग मानसिकता दिसते.
===
बादवे एवढा लालभडक पार्श्वरंग द्यावसा का वाटला? हि काही तुमची नेहमीची स्टाईल नाही.
'ब्राह्मण वर्ग आपल्या घरात
'ब्राह्मण वर्ग आपल्या घरात कसा वागतो आणि इतरांकडे कोठल्या नजरेने पाहतो हा केवळ त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे आणि त्यामध्ये इतरांना काही सोयरसुतक असायचे कारण नाही'.
अंशतः असहमत. ब्राह्मणांच्या घरीदारी अस्पृश्यता पाळली जात असे आणि अस्पृश्यांना शिवत नसत. त्यांना घरात प्रवेशही नसे. पाणी द्यायचे झालेच तर वरून ओतत असत आणि त्याचे शिंतोडे आपल्यावर उडणार नाहीत याची खबरदारी घेतली जात असे. ही वर्तणूक निव्वळ खाजगी जागेतली असली तरी तेव्हढ्यामुळे ती समर्थनीय अथवा दखल न घेण्याइतकी क्षुल्लक ठरत नाही.
पराभूत लोकांच्या कथा
खाण्यापिण्याच्या बाबतीत जात विसरण्याचा प्रयत्न मी सोडून दिलाय. एवढ्या वर्षांत अनेक भाज्या खायला शिकले नाहीये तर आणखी मांस-मच्छी खायला कुठे शिकणार! गेल्या आठवड्यात 'बीन बुरितो' हा शब्द हिस्पॅनिक बाईनं 'बीफ बुरितो' असा ऐकला. दोन घास खाल्ल्यावर हे माझ्या लक्षात आलं. तेवढ्यापुरती भूक भागेस्तोवर बुरीतो खाल्ला आणि बाकीचा टाकून दिला. काळ्या वाटाण्याचा बुरीतो थोडा निराळा लागतो; मला ती चव आवडते, बीफची आवडली नाही.
हे तर फार पुढचं झालं. मला माझ्या अनेक सख्ख्या नातेवाईकांच्या हातचा स्वयंपाक लहानपणीही आवडत नसे. या सगळ्या कागाळ्या मी घरी येऊन आईला सांगायचे. "आई, काकूकडचं वरण गोड लागतं, पुरणासारखं." आईच्या सुदैवानं या गोष्टी घरी येऊन बोलायच्या हे मला तेव्हा समजत असे; आता ... हॅ हॅ हॅ. तर नवाच पदार्थ, नव्याच पद्धतीनं खाऊन 'जात विसरणं' हा माचो-इस्ट्रोजेनी जिन्नस फारच मजेशीर वाटला.
तसला कंटाळा मलाही आलाय. बरं मग?
मी यांतलीच एक असल्यामुळे मला त्यात भर न घालणं या पॅसिव्ह कृतीखेरीज काहीही करता येत नाही. या मर्यादित परीघाबाहेरचे लोक लिहिते होणार नाहीत तोवर शहरी ब्राह्मणांचीच मतं-अनुभव येता-जाता वाचायला मिळणार. या परीघाबाहेरच्या लोकांनी (कोल्हटकरांनी दिलेल्या ब्रिगेडी उदाहरणांपलीकडच्या) वाचनीय लेखन केल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही.
ते तेवढंच आहे असं मला वाटत नाही. ही तद्दन पराभूत मनोवृत्ती आहे. कातडी जाड नसणारे लोक एवढ्या-तेवढ्या गोष्टींबद्दल पेटून प्रतिक्रिया देतात; प्रतिसाद निराळा आणि प्रतिक्रिया निराळी.
माझ्या आई-वडलांच्या पिढीची कारकीर्द घडत होती तेव्हा इतर जातींतले लोक खालच्या पायरीवर होते; त्यांना हात देऊन वर खेचून घेण्यात ब्राह्मणांना मोठेपणा मिळत होता. आता परिस्थिती बदलत आहे. शाळांमध्ये 'आनि-पानि' शिक्षकांना नावं ठेवण्याचे दिवस गेले; आता फेसबुकवर 'मिञ' आणि 'कोमेंत्स' असे शब्द सर्रास बघण्याचे दिवस आलेत. बहुमताच्या रेट्यावर प्रमाणलेखनाची हयगय न ठेवता केलेल्या लेखनालाही 'चान-चान' म्हणण्याचे दिवस आहेत. आता मोठेपणा मिळवायचा तर खरोखर काही तोशीस पडण्याची गरज आहे.
आपल्या बरोबरीच्या माणसांमध्ये मोठेपणा मिळवण्यासाठी बरेच कष्ट करावे लागतात. पुरेशी बुद्धी असेल आणि त्या जोडीला कष्ट घेतले तर कॅलिफोर्नियात किंवा कोथरुडात शक्य तितपत ऐषोआरामात राहणं अनेक उच्चवर्णीयांना सहज जमतं. ज्यांना ते जमत नाही त्यांना 'कोब्रा कट्टे' (किंवा कॅलिफोर्नियात सत्यनारायणं) भरवण्याच्या हौशी असतात; धागाकर्ते आणि कोल्हटकरांनी म्हटल्याप्रमाणे आपली जात आणि पौरुषच कसं थोर हे म्हणावंसं वाटतं. 'ते कसे रामदास आणि दादोजींची बदनामी करतात; आपण पण त्यांची बदनामी करायला पाहिजे', असला बावळटपणा करत संभाजी ब्रिगेड आणि तत्समांना हवा घालावीशी वाटते.
ब्राह्मणी अहंकाराचे जे काही नमुने बघायला मिळतात, ते नालायक आणि आळशी लोकांच्या पराभूत मनस्थितीमधून आलेले असतात. चाळीशी आली तरी 'रिझर्व्हेशनमुळे माझी इंजिनियरींची सीट हुकली' म्हणत रडणारी बालकं सगळ्यांच जातींत असतात. (अशी बालकं जालावरही मोप दिसतात.) मात्र ब्राह्मणांवर जातींच्या इतिहासाचं ओझं आहे; कॅलिफोर्निया किंवा कोथरुडात राहून यशस्वी होणाऱ्यांना हे ओझं झेपतं. बाकीच्यांची रडारड चालू राहते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मी यांतलीच एक असल्यामुळे मला
मी यांतलीच एक असल्यामुळे मला त्यात भर न घालणं या पॅसिव्ह कृतीखेरीज काहीही करता येत नाही. या मर्यादित परीघाबाहेरचे लोक लिहिते होणार नाहीत तोवर शहरी ब्राह्मणांचीच मतं-अनुभव येता-जाता वाचायला मिळणार. या परीघाबाहेरच्या लोकांनी (कोल्हटकरांनी दिलेल्या ब्रिगेडी उदाहरणांपलीकडच्या) वाचनीय लेखन केल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही. >> हे मान्य आहे. पण परिघाबाहेरच्यांनी लिहले आणि त्याची परिघातल्यानी टर उडवली नाही असे काही काळतरी व्हायला हवे (वाचनीय वाटले नाही तरी)
===
मला जरा वेगळा प्रश्न पडतो. इथे मअंजावर बरेचजण anonymously येतात. तरीही पहिल्याच लेखात किंवा बऱ्यापैकी सुरुवातीलाच आपला वर्ण, जात, पोटजात वगैरे सांगावीशी का वाटत असेल? असे करणारे ब्राह्मण आणि दलितच दिसलेत मलातरी.
रोचक
प्रश्न रोचक आहे. जात या विषयाबद्दल लिहितात आपली ओळख लपवून काय साधेल, वा साधणार नाही, याचा विचार केला पाहिजे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
जात हा विषय नसतानादेखील
जात हा विषय नसतानादेखील स्वतःची जात सांगतात. तो identity चाच भाग आहे दोघांसाठी (ब्राह्मण आणि दलित).
आपण कसे जातपात मानत नाही हे सांगायलादेखील आधी स्वतःची पोटजात वगैरे... झालंचतर आपले जवळचे मित्र कसे ब्राह्मणेतर आहेत. ऑ तुम्हाला कुठून कळली त्यांची जात? मलातर माहितपन नाही माझ्या मित्रमैत्रिणींच्या जाती...
सगळेच ब्राह्मण असे करतात असे नाही पण करणारे ब्राह्मणच असतात.
मराठी आंजावर आल्यापासून
हं..
ते हं टाकून सो कॉल्ड खवचटपणा
ते हं टाकून सो कॉल्ड खवचटपणा करण्यापेक्षा मी इथे २०१२ पासून आहे आणि मराठा मोर्चा धाग्यावर प्रतिसाद देईपर्यंत माझी जात कोणाला माहित नव्हती आणि त्यांनतरदेखील माझी पोटजात माहित नाहीये ते बघा जमलं तर.... तुमच्याकडून फरकाही अपेक्षा नाहीयत म्हणा माझ्या....
तुमचे विचार किंवा तुम्ही
तुमचे विचार किंवा तुम्ही ज्या विचारांचा विरोध करत आहात त्याबद्दल हे लिहीत नाही .
परंतु " तुमच्याकडून फरकाही अपेक्षा नाहीयत म्हणा माझ्या...."
हे असे लिहून तुम्ही ( निदान त्या माणसाबरोबर ) चर्चा का थांबवता असा तुम्हाला प्रश्न .
ऐसीवर धाग्यांवर प्रतिसाद
ऐसीवर धाग्यांवर प्रतिसाद देताना ऐसे प्रतिसाद देऊनच मजा येते हे आत्तापर्यंत जाणवले आहे. बाकी लौ यू ऑल.
अहो माझी पत्नीही फक्त परजातीयच नव्हे तर परप्रांतीयही आहे, आणि बिलिव्ह मी ऐसी, मिपा इत्यादि स्थापन होण्यापूर्वीच आम्ही विवाहबद्ध झालो.. आणि आजतागायत मला तिची जात माहीत नाही.
पण आपण कुठल्या जातीचे आहोत याप्रमाणेच आपण कुठल्या जातीचे नाही हेही आवर्जून सांगू नये असं माझं मत आहे. ते काहीशा छद्मी टोनमधे व्यक्त झालं असेल तर क्षमस्व. ते प्रतिक्रियात्मक असू शकेल अशी शक्यता विचारात घेता येईल. अर्थात ही विनंतीच, सक्ती नव्हेच. __/\__
अहो माझी पत्नीही फक्त
अहो माझी पत्नीही फक्त परजातीयच नव्हे तर परप्रांतीयही आहे, आणि बिलिव्ह मी ऐसी, मिपा इत्यादि स्थापन होण्यापूर्वीच आम्ही विवाहबद्ध झालो.. आणि आजतागायत मला तिची जात माहीत नाही. >> छान!
मला वाटतं अजोपन सेमच आहे. यासाठी तुम्ही आणि अजो दोघांना _/\_
आपण कसे ब्राह्मण असून जातपात मानत नाही आणि लोकांनी कसे Sc, St क्षमस्व लिहू नये वगैरे शहाणपण शिकवत स्वतः स्वतःच्याच जातीत 'प्रेमविवाह' करणाऱ्यांपेक्षा तुम्ही जास्त पुढारलेले आहात.
===
पण आपण कुठल्या जातीचे आहोत याप्रमाणेच आपण कुठल्या जातीचे नाही हेही आवर्जून सांगू नये असं माझं मत आहे. >> हम्म सहमत आहे.
===
बाकी ते क्षमस्व आणि लौ यू वगैरे राहुदेत तुमच्यापाशीच
भावना दुखावल्या
अॅमी आणि गवि दोघंही माझ्या शास्त्रीय आणि अपराधगंड-नसण्याच्या भावना दुखावत आहेत. (घाईत आणि फोनवरून एवढंच. विकेण्डला सवडीनं सविस्तर.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
बिघडलं काय?
>> तरीही पहिल्याच लेखात किंवा बऱ्यापैकी सुरुवातीलाच आपला वर्ण, जात, पोटजात वगैरे सांगावीशी का वाटत असेल? असे करणारे ब्राह्मण आणि दलितच दिसलेत मलातरी.
समजा सांगत असतील तर नक्की काय बिघडलं?
काय करतात यापेक्षा कशा करता करतात याला जास्त महत्त्व द्यावं. कंटेक्स्ट काय आहे?
जात धर्म वगैरे गोष्टींना सांस्कृतिक बाजूही असते. आणि इतिहास-समाजशास्त्रात रुची असलेल्या लोकांचा त्याबाबतचा दृष्टीकोन जातीयवादीच असतो असे नाही.
उदाहरण द्यायचंच झालं तर 'सुदाम्याचे पोहे' वाचून पहा. त्यात कोल्हट्कर आपला ब्राह्मणीपणा सांगून पुढे त्याचीच थट्टा करतात, असे दोन चार तरी प्रसंग आहेत. (ऐसीवर "शेवटी आम्ही भटेचं" प्रसिद्ध आहेच.) अमेरिकेत असेच ज्यू लोकांविषयीचे विनोद प्रचलित आहेत. थोडक्यात, जात व्यक्त करण्याच्या उद्देशाकडं पहा. उद्देशाशिवायच्या रडगाण्याला काय अर्थ आहे. आणि शेवटी, कोंबडं झाकून ठेवलं म्हणून उजाडायचं राहतंय का?
-Nile
???
???
रोचक आहे.
विदा?
किंवा गेला बाजार एखादी सांगीवांगीची गोष्ट (anecdote) तरी?
बरीच आहेत.
ठरावीक नातेवाईक आणि लहानपणापासून ओळखीचे असलेले, ऐसीवर एक उदाहरण वाचलं होतं (या व्यक्तीची तिशी निश्चितच उलटली होती); आणि मराठी लोकांचे इतर काही कानेकोपरे, जिथली माहिती चारचौघांत सांगू नये अशी अट आहे. (म्हणूनच लोक अधिक उत्साहानं तिथे अशा गोष्टीही लिहीत असावेत.) तिथेही 'आमची सीट दोन मार्कांनी हुकली, पण तिला जातीमुळे सीट मिळाली हो' अशी रडारड वाचली आहे.
काही लोकांबद्दल माझा अंदाज की हे लोक ब्राह्मण नसावेत; पण शहरी, निमशहरी (मुंबई-पुणे आणि त्यांची उपनगरं वगळता महाराष्ट्रातली बाकीची शहरं) आणि उच्चवर्णीय आहेत. निमशहर आणि उच्चवर्णीय म्हणजे काय, याबद्दल माझे बरेच 'गैर'समज असू शकतात.
'चाळीशी आली', यातही ३५+ वय असं मी गृहित धरते. त्याबद्दलही मतभेद असू शकतात. पण बारावी पास झाल्यावर ५-७ वर्षांनंतरही लोकांच्या मनातली डावलल्याची भावना नष्ट होत नसेल तर 'बरंच झालं यांना हवं ते मिळालं नाही' असा दूश्ट विचार माझ्या डोक्यात येतो.
(बाकी मुद्द्यांना प्रतिसाद सवडीनं, येत्या आठवड्यात.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
...
अधोरेखित उदाहरण फाऊल. (तुमचे नातेवाईक भटांपैकीच असावेत असे गृहीत धरले आहे. अर्थात, नसल्यास मी माझा आक्षेप मागे घेतो.)
भट उदाहरणांत मला इंटरेस्ट नाही. ('भटांत असले नमुने सापडायचेच!' हे जे एक सामान्य/सर्वमान्य (?) गृहीतक आहे, ते मीही जमेस धरलेले आहे. त्यामुळे, लेट्स नॉट वेस्ट अवर व्हॅल्युएबल टाइम ऑन देम.)
एक्झॅक्टली!
ब्राह्मणभट नसलेल्या उदाहरणांबद्दलच कुतूहल आहे. (मग भले ते तथाकथित उच्चवर्णीय का असेनात. किंबहुना, तथाकथित निम्नवर्णीयांत (आणि त्यातही तथाकथित आरक्षित कॅटेगरीत) असे - बोले तो, 'जातीमुळे आमची सीट हुकली, पण तमक्या/कीला मिळाली' म्हणून बोंबाबोंब करणारे - एखादे उदाहरण आढळल्यास ते फारच म्हणजे अतिरेकी रोचक ठरेल, परंतु, 'देअर इज़ नो सच अॅनिमल' - अर्थात, असे उदाहरण अस्तित्वात नसावे - अशी माझी अटकळ आहे. त्यामुळे, द फोकस लाइज़ प्रायमरीली अपॉन उच्चवर्णीयाज़ हू आर नॉटब्रॅह्मिन्सभटाज़.)असूद्यात. उदाहरणे तर द्या. समज की गैरसमज वगैरे छाननी, शहानिशा वगैरे वगैरे सगळे नंतर पाहून घेता येईल.
वयाचा मुद्दा गौण आहे. किंबहुना, तो विचारात घेतलेला नाही. असो.
मक्तेदारी
भटो वगळता इतर उच्चवर्णीयांमध्ये, विशेषतः शहरी लोकांमध्ये शिक्षण ही आपली मक्तेदारी असल्याचा समज आहेच की! माझा अंदाज असा की आपली मक्तेदारी मोडीत काढण्याबद्दल ही तक्रार असते, आणि त्यामुळे भटेतर उदाहरणांमध्ये तुम्हाला अधिक रस असावा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पण बारावी पास झाल्यावर ५-७
मुळात असं वाटूच नये अशी मांडणी कदाचित समजून घेता येईल.. पण समजा अन्याय डावलल्याची भावना (हे डावललं गेल्याची भावना असं पाहिजे पण सध्या असो) असं वाटत असेल जेन्युइनली अशांच्या बाबतीत बारावी पास झाल्यानंतर ५-७ वर्षानी ती जाणीव टिकून राहिली तर डायरेक "बरं झालं यांना हवं ते मिळालं नाही" असं? पैले म्हणजे हा बारावीचा मुहूर्त कुठूनसा आला?
म्हणजे बलात्कारानंतर ५-७ वर्षानीही अत्याचारित असल्याची भावना एखादीत टिकून असेल तर बरंच झालं की तिच्यावर बलात्कार झाला ???
आँ ?
डिस्क्लेमर: भावना टिकून राहू नये याला पाठिंबा आहे, पण एखाद्या व्यक्तीला नाही जमलं तर थेट "बरं झालं हिच्यावर मूळ अन्याय झाला ते.. शी डिझर्वड इट" असं?
तो दुष्टपणाच आहे.
मुळातच 'बरं झालं ...' हा बालिश-दुष्टपणा आहे, हे मला मान्य आहे.
या दुष्टपणासाठी कुठलीही सबब पुरेशी नाहीच. पण त्याचा उगम असा की - बारावीनंतर मेडिसीन, इंजिनियरींग अशा प्रकारच्या व्यावसायिक शिक्षणासाठी स्पर्धा अधिक तीव्र असते; बारावीतले मार्क आणि त्यावरून आपल्याला कुठे प्रवेश मिळणार हे ठरतं. माणूस म्हणून आपण तेवढेच मर्यादित असतो, असं ज्यांना वाटतं, त्यांना महत्त्वाच्या कोर्सला प्रवेश मिळाला नाही; म्हणजे खुज्या आणि मर्यादित लोकांना महत्त्वाची पदं मिळणार नाहीत/मिळाली नाहीत, या विचारांनी 'बरं झालं ...' असं मला वाटतं. या लोकांना महत्त्वाची पदं मिळणार नाहीत; हा विचार बालिश आहे.
त्यातला दुष्टपणा असा की माणूस कधी बदलतच नाही, ही माणसं कायमच बारावीतल्या प्रवेशप्रक्रियेवरून जगाबद्दल किंवा आरक्षणाबद्दल कुजकट बोलत राहणार, असं मी ठरवून टाकते. ही माणसं स्वतःला त्या नकारापुरती मर्यादित ठेवतात, आणि मीसुद्धा त्यांना तेवढंच मोजते. हे लोक 'त्यांच्या'बद्दल दुष्टपणानं बोलतात; मी त्या लोकांबद्दल दुष्ट विचार करते. त्यांच्या दुष्टपणाची बाधा मी कधीमधी स्वतःला होऊ देते. याला कसलीही सबब नाही. खुज्या माणसांमुळे मी त्यांच्या पातळीवर उतरण्याचं समर्थन करता येणार नाही.
या संदर्भात बलात्कार या शारीरिक आणि मानसिक हिंसेची तुलना आरक्षणाशी करणं, ही गोष्ट मला अत्यंत खटकली. फक्त स्त्रीवादी म्हणून नव्हे किंवा फक्त आरक्षणाची गरज समजणारी व्यक्ती म्हणूनही नव्हे तर मेलोड्रामाबद्दल तिटकारा असल्यामुळे मला सर्वप्रथम 'ईऽऽ' झालं. पण विषय काढलाच आहे तर मला त्यामुळे कोण आठवली तेही सांगते. निर्भया प्रकरणाच्या वेळेस सध्या अमेरिकेत राहणाऱ्या मूळच्या मुंबईच्या एका स्त्रीचे लेख वाचले होते; चेंबूरच्या आसपास तिच्यावर दोन-तीन लोकांनी बलात्कार केला होता. (सवडीनं शोधून दोन्ही लिंका डकवते). तिनं त्या प्रकरणानंतर लगेच (काही महिन्यांत असेल) लिहिलेल्या लेखात कडवटपणा नव्हता; आता काही दशकं उलटून गेल्यावर लिहिताना ती किती कडवट असणार! दोन्ही लेखांचा सूर 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि' असाच होता.
कोणताही एक प्रसंग, दुर्घटना किंवा व्यक्ती, आपल्या आयुष्याची दिशा आणि आपण कोण हे ठरवू शकत नाही; हे तिच्या लेखांतून सरळ दिसत होतं. ज्यांना तिच्याएवढं मोठं होता येत नाही, त्या लोकांबद्दल मला बहुतेकदा करुणा वाटते, पण तेवढंच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
राज्यकर्ते कुणा एका गटाला
राज्यकर्ते कुणा एका गटाला घाबरून असतात आणि देश,कालाप्रमाणे दोन्ही बदलतात. गटात नसलेलेही आपोआपच बदलतात. रडं काढण्यात काही अर्थ नाही. राज्यकर्तेही आपला मतदार गट आणि लोक कोणते नाहीत हे समजून असतात आणि जाहीर सभांतून ( राजकीय नसलेल्याही) रडं काढण्यात मागे नाहीत. पण जे यांपलीकडे गेले त्यांचा पक्ष वाढला. जातीयवाद हा जुना शब्दश: अर्थ न घेता व्यापक अर्थाने बघितला तर आर्थिकही असतो हे जाणवेल.
(अवांतर)
बंगालीत जात, जातीय वगैरे शब्द राष्ट्र, राष्ट्रीय अशा अर्थाने वापरले जातात. (आंतरजातिक बिमानबन्दर म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्ट, जातीय संसद म्हणजे नॅशनल पार्लमेंट, वगैरे वगैरे.)
एका अर्थी बरोबरच आहे. जात आणि nation, दोहोंचाही (व्युत्पत्ति)संबंध जन्माशी आहे.
कुळकायद्यात जमिनी गेल्या हे
कुळकायद्यात जमिनी गेल्या हे सांगत राहण्याची ब्राह्मणांची सवय जुनी आहे. आणि त्या गोष्टीला 70 वर्ष झाल्यावर सुद्धा ते सांगत असतात. ही गोष्ट त्यांच्या कुटुंबांतून सतत उगाळून तिची आठवण ताजी ठेवली जाते.
मुळात त्यांच्या ज्या जमिनी होत्या त्या जमीन मालकीच्या ब्रिटिशांच्या संकल्पनेच्या अंमलबजावणीमुळे "त्यांच्या" झाल्या होत्या ही गोष्ट शंभर दीडशे वर्षाआधीच घडलेली होती. त्या काही मुळात त्यांच्या जमिनी नव्हत्या.
याचा दुसरा अँगल असा- अनेकदा कुटुंबाला नावडती गोष्ट केली म्हणून एखादया माणसाला कुटुंबाच्या मालमत्तेतून बेदखल करण्याचे प्रकार घडत. ते लोकही असेच सर्वस्व गेल्याच्या परिस्थितीतून आपला संसार उभारत असत. सो कुळकायद्यात जमिनी गेल्या ही काही सतत सांगत राहावे अशी गोष्ट नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
कूळकायदा
जे जमीनमालक स्वत: जमीन न कसता कुळांकडून कसवून घेत होते त्या सर्वांच्या जमिनी कूळकायद्यामुळे गेल्या. फक्त ब्राह्मणांच्याच गेल्या असे नव्हे. ब्राह्मणांपैकी बहुसंख्य लोक जमीन स्वत: कसत नव्हते म्हणून त्यांच्या जमिनी गेल्या. त्यामुळे हे दुखणे ब्राह्मणांकडूनच जास्त वेळा उगाळले जात असावे. शिवाय मालक, जे ब्राह्मण असत, ते नुकसानधारक आणि कुळे, जी अब्राह्मण असत, ती लाभधारक अशी नफ्यातोट्याची जातवार वाटणी झाली. कोंकण सोडून इतरत्र नफातोटाधारक हे बहुधा एकाच जातीतले असावेत. त्यामुळे सल जास्त दिवस राहिला नसावा.
जातियवादी प्रतिसादांनी
जातियवादी प्रतिसादांनी संस्थळं विस्कटली आणि बरेचजण बाहेर पडले अथवा बाद झाले.
फेसबुकियपोस्टींतून धगधग जिवंत ठेवत असतील तर वेळ वाया घालवत आहेत.
"भावना दुखावण्या"बद्दल.
अॅमी लिहिते -
यात माझ्या "भावना दुखावतात" कारण -
१. हे एका व्यक्तीचं मत आहे; तसा सरळच उल्लेख या वाक्यात आहे. मात्र वाक्याचा रोख किंवा आकलन करून घेताना विदेतून काढलेला ठोस निष्कर्ष असल्यासारखा आहे.
२. फेसबुक नव्हे, मराठी संस्थळांवर अजूनही मोठ्या प्रमाणात ब्राह्मण/उच्चवर्णीय आहेत. दिवाळी, गणपती वगैरे साजरे होतात, बुद्धजयंती किंवा शिवाजी महाराज जयंती मोठ्या प्रमाणावर साजऱ्या होत नाहीत, असं सध्याचं दृश्य तरी आहे. तेव्हा हे निरीक्षण नक्की कुठे केलं, त्यावरून विदा बदलेल. शिवाय विदा आहे म्हणून त्यातून निघणारे निष्कर्ष ग्राह्यच असणार, असं अजिबात नाही.
३. विदा गोळा केली असेल तरीही, नक्की कोणत्या प्रश्नाचं उत्तर त्यातून द्यायचं आहे? ब्राह्मण आणि दलित लोकच जातीबद्दल फार लिहितात/बोलतात असा प्रश्न आहे का? तसं असेल तर अन्य जातींची विदा गोळा करावीच लागेल. प्रश्न असा असले - किती ब्राह्मण, दलित लोक आपली जात सहज सांगतात; तर इतर जातींबद्दल मोजमापं करण्याची गरज नाही.
४. उदाहरणार्थ, कोल्हटकरांनी आपली जात पहिल्याच लेखात सांगितली नाही. अनुभव म्हणून काही लिहिताना त्यांची जात काय ते लक्षात आलं/समजलं. मात्र त्यांनी त्यांचं आडनावही जालावर वापरलेलं आहे; त्यातून त्यांची जात समजतेच. तरीही अरविंद कोल्हटकर, नितिन थत्ते, राजेश घासकडवी, अबापट या लोकांबद्दल ते आपली जात सांगतात, असं म्हणणं योग्य नाही.
५. Nileनं मांडलेला मुद्दा आहेच; जात नक्की का सांगितली. स्वतःची टिंगल करण्यासाठी - काय करणार आम्ही भटेच; किंवा सदर लेखात जो सूर आहे - आहे मी ब्राह्मण, पण मला नाही त्याचं कौतुक; यात कुठेही अस्मिताप्रदर्शन, इतरांना हिणवणं, वा अन्य हिणकसपणा नाही. मग 'मी मराठी, भारतीय आहे' असं म्हटल्यासारखं 'मी ब्राह्मण आहे' असं म्हटलं तर त्यात कोणत्याच पक्षांनी किंवा जातींनी अंगाला लावून घेण्यासारखं काही नाही.
६. जात हे प्रकरण आपल्या कोणाच्याही आयुष्यात नष्ट झालेलं असेल याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे त्याबद्दल बेदरकारपणा दाखवण्यात निदान शहरी उच्चवर्णीयांसाठी व्यावहारिक शहाणपण आहे. (आपल्याला ती सोय आहे.) त्यातून स्वजातीय आणि इतर जातींमधले जात-अस्मिताधारक दोन्ही गटांच्या अस्मितांना वारा घातला जात नाही.
असे बरेच मुद्दे वगैरे सोडून, जालावर कोणी तरी काही तरी म्हटलं, म्हणून त्यांना आपण उत्तर, प्रतिक्रिया द्यावी का? कोणाला तरी काही तरी वाटलं; म्हणून लगेच आपण अपराधगंड बाळगत मलमपट्टी उत्तरं द्यावीत का? (त्यावर पेटून आणखी काही लिहिण्यात हशील नाही, त्यामुळे त्याचा विचारच करत नाही.) त्या ऐवजी, 'तुम्हाला असं का वाटतं', अशा प्रकारचे सूचक प्रश्नही विचारता येतात. दुर्लक्षच करावं असं माझं म्हणणं नाही. सभ्यपणे बोलणाऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करू नये; नाही तर 'कट्टार कोब्रे' किंवा 'संभाजी ब्रिगेड' माजतात; किंवा तशा छापाचे अस्मिताप्रेमी व्यासपीठाचा ताबा घेतात.
जात या प्रकाराबद्दल आपण दाखवतो तेवढे किंवा आपल्याला वाटतं तेवढे बेदरकार आहोत का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
>>कोल्हटकरांनी आपली जात
>>कोल्हटकरांनी आपली जात पहिल्याच लेखात सांगितली नाही.
अगदी पहिल्याच लेखात असं ॲमीने म्हटलेलं नाही. आणि कोल्हटकरांवर तो आरोप ॲमीने केलेला नसावा. ती ओव्हरऑल आंजाबाबत म्हणत असावी. ऐसीपेक्षा माबोवर हा प्रकार जास्त असू शकेल आणि त्यामुळे तिला ते जास्त जाणवत असेल.
मी सहसा माझी जात सांगितली असेल तर "कोब्रा या जातीबद्दल मी जे म्हणतोय ते स्वानुभवातील ऑथेंटिक आहे" अशी पुष्टि मिळवण्यासाठी सांगतो. माझ्या जातीचं कौतुक मी जालावर कधीही केलेलं नाही. किंवा त्यांच्या स्वभाववैशिष्ट्याचं समर्थनही मी कधी केलेलं नाही.
तुम्ही म्हणता तसं मआंजा हे मुख्यत्वे ब्राह्मणांनी भरलेले आहे आणि त्यात आयटीक्षेत्रात अमेरिकेत मिळवलेल्या यशामुळे आपला मूळचा श्रेष्ठत्वाचा गंड मजबूत झाला आहे हे खरेच.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ती ओव्हरऑल आंजाबाबत म्हणत
ती ओव्हरऑल आंजाबाबत म्हणत असावी. >> एकंदर आंजाबद्दलच म्हणत होते. आता हा लक्ष्मीकांतचा पहिलाच लेख किंवा एका phd करणाऱ्या मुलीने सुरवातीलाच मी टिळक, सावरकरांच्या जातीची आहे लिहिलेलं, अधूनमधून प्रतिसादात मी देब्रा तू कोब्रा आणि कोणीतरी सारस्वत वगैरे चालूच असतं. 'मला' ती unnecessary info वाटते. या माहितीच इतरांनी काय करणं अपेक्षीत आहे? आपले शिक्षण, नोकरी-व्यवसाय, जन्मगाव, सध्या कुठे आहात ही माणसाची identity असू शकते. जात ही introductory identity कशी असेल? तेपण anonymous आयडी घेऊन जात कशाला सांगायची?
"खरं तर मी जन्माने ब्राह्मण पण जातपात मानत नाही" हे तर अगदीच विनोदी वाक्य वाटत. त्याचा अर्थ उच्चनीच मानत नाही असा घ्यायचा असे काहीतरी सांगितले होते पण तेदेखील मला पटले नाही. खरंतर मी जन्माने उच्च आहे ( असे मला बालपणापासून सांगितले गेले) पण मी इतरांना नीच मानत नाही (ohh wow! फारच उपकार केलेत इतरांवर!! आम्ही तुमचे गुलाम आहोत!!! [ हे Toy Story मधल्या आपने हमारी जान बचाई! हम आपके गुलाम है!! चालीवर वाचा ])
तेच मराठा जातीचे जे थोडेफार आहेत आंजावर ते फक्त मोर्चाच्या वेळी रिव्हिल झाले होते. आता परत हिडन गेलेत. एकच लिंगायत पाहिला पण त्यानेदेखील अगदी reluctantly सांगितलेलं ते कुठल्यातरी भांडणात. अजून कोण असतं बरं खुल्या वर्गात ?? Obc असतील कोणी तर ते फक्त आरक्षणाचा विषय निघाला तर बोलतात जातीबद्दल. किंवा तेव्हादेखील बोलत नाहीत.
दलितांनी जातीबद्दल बोलणे ठीकच आहे. 'मला' त्यात काही unnecessary वाटत नाही.
ऐसीपेक्षा माबोवर हा प्रकार जास्त असू शकेल आणि त्यामुळे तिला ते जास्त जाणवत असेल. >> सगळीकडेच आहे ऐसी, मिपा, माबो.
कोल्हटकर, थत्ते, बापट बद्दल काहीच म्हणणं नाही. They all are alright. ते आपल्या खऱ्या नावानेच आलेत आणि ज्यांना आडनावावरून जात ओळखायची आहे ते ओळखतील आणि लोणचं घालतील त्या माहितीच. मला टीपिकल आडनावखेरीज जात ओळखू येत नाही; जोशी कुलकर्णी वगैरे.घासकडवीची जात माहित नाही, त्यानी कधी उल्लेख केला नाही and it doesn't matter...े
शाळा,कॅालेजे,नोकरीची ठिकाणे
शाळा,कॅालेजे,नोकरीची ठिकाणे इथे सरकारकडून अधिकृतपणे जात विचारली जाते. जातियवाद असा चालूच राहणार आहे. शाळेत लहानपणी (५-६) जातीचा फॅाम भरून आणायला सांगितला तेव्हा काही मुलांना वाइट वाटले होते. एकमेकाशी इतके छान बोलतो खेळतो ते आपण वेगवेगळे आहोत हे समजून गेले. तेव्हा विचार करण्याची एवढी शक्ती नसते. पुढे मोठेपणी समजते की हा भेदभाव उच्चशिक्षण,सरकारी नोकय्रा आणि मतदारसंघ यांमध्ये भारतात आहे.
बोलण्या वागण्यात आचरणात ते किती रेटून आणायचं हे वैयक्तिक आहे.
संकेत पाळावेत?
जातीचा उल्लेख होईल असे संकेत पाळणे वा न पाळणे या दोन्हीतही जात गृहीत धरणे आलेच.
पण जात गृहीत न धरता केल्या जाणाऱ्या मांडणीत असे संकेत पाळले(च) पाहिजेत का?
अवांतर - भाषण स्पर्धेतील यश, अपयश यानुसार जातीवाचक शेरे मिळतात, असा अनुभव आहे. म्हणून एका भाषण स्पर्धेला आडनावानेच सुरुवात करून आशय मांडणी केली होती. त्यावरील प्रतिक्रियांमध्ये काहींनी ती खटकल्याचे तर काहींनी प्रभावी वाटल्याचे नमूद केले होते. कोण कसा पाहतो यावरही ते अवलंबून. पण असे संकेत पाळणं (पाळली जाणं) कठीण आहे, असं वाटतं.
जात हे वास्तव नाकारता येत नाही, पण म्हणून ते वैयक्तिक पातळीवर टाळता येणं-पण सोपं वाटत नाही.
डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…
तुम्ही जेव्हा जात मानीत नाही
तुम्ही जेव्हा जात मानीत नाही असे म्हणता त्यावेळी त्याचा अर्थ जन्माधिष्ठीत असलेल्या जातीवर व जात हा निकषाच्य आधारे उच्चनीचता मानीत नाही असा आहे. तुमची वृत्ती व वर्तन याधारे तुमचे मुल्यमापन होत असतेच. विवेकवादी म्हणवणाऱ्या चळवळीतील अंनिस चळवळीतील ग्रुपुमधील सुद्धा काही लोक आपले जातीय द्वेष सुप्तावस्थेत ठेवू शकत नाहीत हे मी पाहिले आहे. जातीय द्वेष वाढवणारे साहित्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रचार व प्रसार करत असताना मला दिसतात.
कम्युनिस्टांनी वर्गविग्रहाच्या चष्म्यातून कुणी जातीय चष्म्यातून कुणी प्रांतिय चष्म्यातून कुणी धर्माच्या चश्म्यातून या जगातील प्रश्नांकडे पहातो.मला चळवळींमधे तसेच आंतरजालावर काही ठिकाणी एक गोष्ट जाणवली.
जातीअंताच्या लढ्या ऐवजी जातीय अस्मितेचच राजकारण होताना दिसते आहे.अनेक बुद्धीदांडगे जातीय दरी कमी करण्याऐवजी विश्लेषणाच्या बहाण्यातून जातीय त्वेष व द्वेष फुलत राहतील याचीच व्यवस्था करतात.
तरुणांची माथी सतत भडकत राहतील याची व्यवस्था करतात.विवेकी व विचारी अशी भूमिका कुणी घेतली वा घेण्याचा प्रयत्न केला कि त्याला 'भटाळला' विचारांचे बामनी करण झाले अशी दूषणॆ द्यायला सुरवात करतात.
असो. विवेक व विद्रोह हे एका ठिकाणी नांदत नाही".
. आमचा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्याला आहे ही शब्दरचना तर मी कित्येक वर्षे ऐकतो आहे. यात ब्राह्मण्य म्हणजे काय तर अज्ञानाचा फायदा घेउन केलेले शोषण, समाजात जेजे काही विषमता पसरवणारे आहे ते म्हणजे ब्राह्मण्य. अन्यायाचे जे समर्थन करते ते ब्राह्मण्य.जे जे सकल कुटील ते ब्राह्मण्य. असा तो ब्राह्मण्याचा अर्थ अभिप्रेत आहे. सहवेदनेचा विचार तुम्ही मांडलात की त्याला ब्राह्मणी कावा म्हणतात. डॉ नरेंद्र दाभोलकर देखील या आरोपातून सुटले नाहित. त्यांच्या तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाच्या मनोगतात पान ७ वर वाचा. http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=5421983945435441997...
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
पहिल्या नावांबाबत निरीक्षण
वरती आडनावावरून जात समजते, असा उल्लेख अाला अाहे. पण पहिल्या नावांबाबतही असेच निरीक्षण अाहे.
खूप पूर्वी म्हणजे १००-२०० वर्षे अाधीच्या काळात ब्राम्हण समाजातली प्रचलित नावें दामोदर, कृष्णाजी, बळवंत, गोपाळ, शिवराम (देवाची नांवे) अशी असत, तर बहुजन समाजातली प्रचलित नांवे धोंडीबा, कोंडीबा, ज्ञानोबा (उच्चार द्यानबा किंवा द्यानू), रावजी, संभाजी असायची. हळूहळू बहुजन समाज अापली निरर्थक नावें टाकून ब्राम्हणांचे अनुकरण करत देवाची नावें (गोपाळ, रामचंद्र इ.) अापल्या मुलांना ठेऊ लागला, तेंव्हा ब्राम्हण समाज श्रीधर, पुरूषोत्तम, मंदार, केदार कडे सरकला. ती नावे काही फारशी बहुजन समाजाने अापलीशी केली नाहीत, कदाचित उच्चार अवघड असल्याने असेल. पण हळूहळू बहुजन समाज प्रकाश, प्रदीप, संजय इ. देवाची नसलेली नावें ठेऊ लागला. अाता बहुजन समाजातही ४० च्या पुढचे प्रकाश, नितीन, सचिन सर्रास अाढळतात. मग ब्राम्हण समाज अजूनच भाववाचक नावांना पसंती देऊ लागला - अमोघ, अोज, वेद, अार्य इ. अाता बहुजन समाजातही ही नांवे प्रचलित अाहेत. शालेय वयातली दोन्ही समाजाची मुले पहिल्या नावांवरून अोळखणे सहजशक्य नाही. बहुतेक हे अंतर अाता फारसं नसावं. एक मात्र वाटतं, की बहुजन समाज अजूनही प्रगत समजल्या जाणार्या समाजाचे अनुकरण करत अाला अाहे. पण ब्राम्हण मात्र बहुजन समाजातल्या चांगल्या गुणांचे अनुकरण करेलच असे नाही. उदा. बहुजन समाजात ज्ञानेश्वर, रामदास अशी ब्राम्हण संतांची नावें सहज अाढळतात, पण ब्राम्हण समाजात मात्र तुकाराम, नामदेव किंवा शिवाजी असे नांव सहसा अाढळत नाही. यामागे ठोस विदा नाही, अापलं एक निरीक्षण.
मी वयाची १८ वर्षे पुणे
मी वयाची १८ वर्षे पुणे जिल्ह्यातल्या एका 'नॉट सो छोट्या' पण खेड्यात घालवली आहेत, तसेच जन्माने ब्राह्मण आहे त्यामुळे ॲमींच्या अटीत बसतो असे वाटते. माझे गाव माळीबहुल असले तरीही बलुतेदारांचे गावपांढरीत प्राबल्य आहे. तर आजूबाजूला वाड्यावस्त्यांवर माळी समाजाचे लोक बहुतांश आहेत, मतदारांत माळ्यांचाच टक्का ७०-७५ इतका मोठा. व्याख्येने माळी बलुतेदार ठरत असले तरीही आमच्या गावात ती डॉमिनन्ट कास्ट होती. त्याउलट मराठे आमच्यापेक्षा कमी. त्यामुळे सामाजिक- राजकिय बाबींत अर्थात बहुसंख्यांक अश्या माळी समाजाचा वरचष्मा असणारच. अश्या वेळी अगदी २००-५०० लोकसंख्या असणाऱ्या ब्राह्मणांना या व्यवहारांत इतर बलुतेदार जातींना असते तितकेच महत्व(अतिशय कमी) होते आणि आहे. प्रतिष्ठीत नागरीक म्हणून जी लोकं गावात मोठे गावकीचे निर्णय घ्यायचे जसे, जत्रेसबंधी, गावाच्या विकासाच्या स्किमा(!), देवळातील हरीनाम सप्ताह वगैरे संबंधी, किंवा आमदार- खासदारांकडून गावासाठी करायच्या मागण्या इत्यादीमध्ये ब्राह्मणांना काहीही स्थान नव्हते आणि आजही नाही. मतांसाठीसुद्धा कुणी फार लांगूलचालन करायला येत नाही. त्याउलट ब्राह्मणांइतकीच लोकसंख्या असणाऱ्या पण धनिक असणाऱ्या गुजर- जैनांचा राजकारण- अर्थकारण- उद्योग- व्यवसाय यावरला प्रभाव अतिप्रचंड म्हणावा असा आहे. त्याउलट एक घर सोडले तर श्रीमंत ब्राह्मण नव्हतेच कधी. तालुका पातळीवर जातीवाद प्रचंड चालतो, गावात प्राबल्य असणाऱ्या माळ्यांचे, तालुक्यात बहुसंख्य असणारे मराठे ऊट्टे काढतात. धनगर, माळी वगैरे विरोधी उमेदवार आमदारकीला उभा राहिला की मराठे ज्या प्रकारचा जातीवादी प्रचार करतात त्याने जातीनिर्मुलनाचे स्वप्न- बिप्न पाहणाऱ्यांना झीट येऊ शकते. तसाच प्रकार धनगर- माळी करतात आपल्या प्रभावक्षेत्रात. एक ब्राह्मण उमेदवार ४ वेळा निवडणुक लढवून तुडुंब मताधिक्याने प्रत्येक वेळा आपटलेला. त्याचे मुख्य कारण त्याला दलित + ब्राह्मण यांचा सपोर्ट होता.
फार उच्चशिक्षित, शिक्षणाचे महत्व जाणणारे असा लौकिक आमच्या गावतल्या ब्राह्मणांचा तरी मुळीच नव्हता. पुर्वी असू शकेल पण माझ्या लहानपणी बाकीच्या जातीची मुले जेवढी शिक्षणात पुढे होती तितकेच ब्राह्मणाची मुले होती. उलट इंजिनिअरींग, मेडिकल वगैरेला जाणारी माझ्या आधीच्या पिढीतली मुले इतर जातीतच होती. शाळेत नंबर काढणारी मुले जी असतात त्यात ब्राह्मण कधीही नसत. अपवाद म्हणजे मीच. माझ्या आधी किंवा नंतर कुणी ब्राह्मण मुलगा शाळेत फार चमकलाय असे होते नव्हते. हे ब्राह्मण म्हणजे फार ब्राईट वगैरे गंड मी केवळ फेबु, मराठी संस्थळे आणि शहरी लोकांच्या गप्पांतच ऐकलाय. तसेच ब्राह्मण म्हणजे अनुनासीक स्वरांत, अतिशय शुद्ध बोलणारे ह्या चित्रात देखिल एक खोट आहे ती गावात आलात तर आढळेल. माझ्या घरच्यांसकट सगळे ब्राह्मणांचा टोन ग्रामीणच आहे फक्त 'बी' म्हणायच्या ऐवजी 'पण', 'लई' म्हणायच्या ऐवजी 'खुप' असा काही शब्दांचाच फरक असतो. इतर जातीतील शिक्षक फालतू शिकवतात ही सुद्धा अपप्रचाराची हाईट आहे. आमच्या शाळेत ९०% शिक्षक हे बहुजन समाजातून आलेले होते. त्यांच्या आणि ब्राह्मण शिक्षकांत डावेउजवे करण्यासारखी परिस्थिती नव्हती. सगळे शिक्षक त्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे चांगलंच शिकवत. आरक्षण आलं आणि कशी शिक्षणव्यवस्थेची वाट लागली हा शुद्ध जातीवादी प्रोपगंडा आहे.
आता घरातल्या जातीवादाबद्दल. माझ्या दोन्हीही मावश्यांनी ३०-३५ वर्षांपुर्वी आंतरजातीय विवाह केले होते. थोरल्या मावशीने दलीताशी आणि मधल्या मावशीने मराठ्याशी. त्या दोघींनाही तिच्या आजोळचे दार बंद झाले होते. आमच्या घरात मात्र थोरल्या मावशीचे येणे जाणे असे. शेजाऱ्यापाजाऱ्यांना त्याचे काही विशेष वाटत नसे. मधल्या मावशीला भेटायचे म्हणजे मात्र तिच्या गावी चोरून जावे लागत असे. गेल्या काही वर्षांपासून मात्र तिच्या येण्याजाण्याला आणि फोनाफोनीला वडिलांकडून कसलाही मज्जाव राहिला नाही. असे असल्यामुळेच कदाचित मात्र जातीपातींच्या बाबतीत आई खुप ओपन आहे. शिवताशिवत, सोवळेओवळे, 'खालच्या जातीच्या' लोकांना चहासाठी वेगळा कप असले प्रकार तिने कधी केले नाहीत. आजी होत्या तेव्हा सोवळं ओवळं केल्याचे नाटक करावे लागे, आता तेही नाही. आम्हा भावंडांचे मित्र मंडळी कुठल्या जातीची आहेत ह्याची चौकशी देखिल घरात कधी झालेली आठवत नाही. मात्र वडिल 'मांस-मच्छी' खात नाहीस ना, याची चौकशी करत असतात. त्यांच्या साठी ब्राह्मण 'राहणे' हे नॉन व्हेज न खाण्यावर अवलंबून आहे. आणि गंंमत म्हणजे माझ्या गावात नॉन व्हेज न खाणारा एकही तरूण ब्राह्मण नाही. आमच्या शेजारच्या एका ब्राह्मण घरातील कर्ती बाई चक्क अस्पृष्यता पाळायची. रस्त्याने जाताना दलित बायकांचे धक्के लागू नये म्हणून जपून जाणाऱ्या तिला त्यातल्या एका बाईने अर्वाच्च शिव्या दिल्या होत्या तेव्हा भयानक आनंद झाला होता हे आठवते.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
खुला दृष्टीकोन
तुमचा खुला दृष्टीकोन अावडला. बहुसंख्य जर असा विचार करू शकले, तर अापल्या समाजातून जर जात गेली तर जाईल.
मस्त प्रतिसाद!! बऱ्याचदा'अगदी
मस्त प्रतिसाद!! बऱ्याचदा'अगदी अगदी' म्हणावसं वाटत होतं.
हेच मी सांगायचा प्रयत्न करत होते की ब्राह्मण बहुसंख्य असलेल्या पुण्यासारख्या शहरात किंवा इतर शहरातील ब्राह्मण घेट्टो असलेल्या जागी वाढले नसाल, ब्राह्मणबहुल शाळेत जात नसाल तर तुमची मतं काहीतरी वेगळीच असतील; जी (माझ्यामते) reality च्या जास्त जवळची आहेत.
मीदेखील आतापर्यंत नेहमीच अशाच जागा, शाळा, कॉलेज, हॉँस्टेल, कम्पन्या मध्ये राहिली आहे जिथे ब्राह्मण 'बहुल' कधीच नसतात ( एकच exception कमिन्स कॉलेजमधली 3 वर्ष नोकरी. पण तिथेदेखील आमचा ग्रुप 3 आरक्षित, 2 मराठा, 1 देशस्थ असा झालेला). त्यामुळे मआंजवरचे एकेक stereotypes बघितले ब्राह्मण, मराठा बद्दलचे कि "काहीही काय!" वाटत राहतं.
खूप आभार रे पुम्ब्या
(नेहमीप्रमाणे ) इंटरेस्टिंग
(नेहमीप्रमाणे ) इंटरेस्टिंग माहिती पुम्बा . ( बा द वे , गाव कुठलं , बारामतीजवळच ...?)
मला वाटतं जुन्नर तालुक्यात
मला वाटतं जुन्नर तालुक्यात असावं.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
नाही. निमगाव केतकी. इंदापूर
नाही. निमगाव केतकी. इंदापूर तालुक्यात आहे.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
माझी फेसबुक खाती नावालाच आहेत
माझी फेसबुक खाती नावालाच आहेत. मोबाइलमधून पाहतो त्यामुळे ट्रेन्डिंग येत नाही. त्यावरच्या पोस्टी वाचनात येत नाहीत. शाळेत असताना राहण्याच्या जागी आजुबाजूस इतकी विविधता होती की यातले बरेच अनुभव घेता आले नाहीत. बरीच माहिती ही पुस्तकातूनच कळली. एकमात्र सांगतो आजोळी सांगली जिल्हा - पाणवठे वेगवेगळे होते. वस्ती वेगळी असायची.
आर्य लोकांनी जात आणली म्हणतात. ते आलेच नसते तर?
हत्ती आणि आंधळ्यांची गोष्ट
हत्ती आणि आंधळ्यांची गोष्ट आठवली