भीमा कोरेगावमधील जयस्तंभ : राजकारण, जात आणि ब्रिटिशसत्तेची स्मृती

'इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली'मध्ये ऑक्टोबर २०१२मध्ये प्रकाशित लेखाचे हे सुधारित रूप परिवर्तनाचा वाटसरूच्या आगामी अंकासाठी (१६-३१ जाने. २०१८) स्वीकारलेले आहे.
मूळ इंग्लिश लेखाचा अनुवाद – अवधूत डोंगरे

भीमा कोरेगावमधील जयस्तंभाच्या स्मृतींचा इतिहास अतिशय विस्मयकारक आहे. वर्तमानामध्ये प्रभुत्वसत्तेसाठी (hegemony) सुरू असलेल्या चढाओढीचे ठसे स्मृतींमधील चढाओढीवरही पडलेले असतात, याचा लक्षणीय दाखला म्हणून कोरेगावमधील या स्मारकाकडे बघता येते. साम्राज्यवादी युद्धातील एका रक्तरंजित लढाईची स्मृती जतन करणारे हे स्मारक आहे. साम्राज्यवादी सत्ताधाऱ्यांनी आपलं बळ आणि वीरश्री यांच्यावरचा दृढविश्वास दर्शवण्यासाठी भीमा कोरेगाव इथे उभारलेला हा स्तंभ आता तोच उद्देश दुसऱ्या लोकसमूहासाठी- पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांसाठी- पार पाडतो आहे. अस्पृश्यांनी त्यांच्यावर जुलूम करणाऱ्या एतद्देशीय सत्तेविरोधातील लढ्यामध्ये वसाहतवाद्यांना साथ दिली होती. या स्मारकाच्या ठिकाणी वार्षिक यात्रा भरवण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असलेली दिसते. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांची (आताच्या नव-बौद्धांची) स्वतंत्र संस्कृती निर्माण करण्याचा व ती लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न म्हणून या परंपरेकडे पाहावे लागेल. विविध जातींमधील विषमतेची समस्या भारतीय समाजाला ग्रासून असताना या स्मारकाच्या भोवतीही परस्परविरोधी स्मृतींचा वेढा पडल्याचे निदर्शनास येते. आजघडीला, कोरेगाव स्मारकाबद्दलच्या स्मृतीचे स्वरूप, स्तंभाकडे बघणाऱ्याच्या सामाजिक स्थानावर अवलंबून दिसते. साम्राज्यवादी सत्तेचा शेवट होण्याच्या कितीतरी आधीच ब्रिटिश लोकस्मृतीमधून हे स्मारक विरून गेलेले आहे. परंतु, इथल्या स्मरणोत्सवाचे कायापालट झालेले पुनरुज्जीवित स्वरूप त्याच्या मूळ हेतूपेक्षा बऱ्याच भिन्न गोष्टी सूचित करते.

कोरेगावची लढाई आणि त्याचे स्मारक

भारताच्या पूर्व आणि उत्तर भागांमधील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे राजकीय वर्चस्व १७५७ सालच्या प्लासीच्या लढाईनंतर वाढत गेले. त्यानंतर हळूहळू कंपनीचा राजकीय प्रभाव भारताच्या इतरही भागांमध्ये विस्तारू लागला. याच काळात पुण्यातील सत्ताधारी पेशवे (१७०७-१८१८) आपला राजकीय प्रभाव विस्तारण्याचा प्रयत्न करत होते. परिणामी पेशवे आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील संघर्ष अटळ होता. तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धातील अनेक लढायांची आणि बाळाजीपंत नातूच्या वैयक्तिक स्वार्थाची परिणती होऊन १७ नव्हेंबर १८१७ रोजी शनिवारवाड्यावर यूनियन जॅक फडकला आणि दुसऱ्या बाजीरावाला सेनेसह पुणे सोडावे लागले. त्यानंतर लवकरच एक जानेवारी १८१८ रोजी कंपनीचा सेनाधिकारी एफ. एफ. स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखालील शिरूरहून पुण्याला निघालेल्या सुमारे ९०० सैनिकांच्या बटालियनची पेशव्यांच्या नेतृत्वाखालील २० हजार सैन्यबळ असलेल्या फौजेशी अचानकपणे गाठ पडली. भीमा नदीच्या काठावरील कोरेगाव या गावातल्या या लढाईत ब्रिटिशांचा विजय झाला. तत्कालीन अधिकारी व इतिहासकार ग्रान्ट डफ यांच्या शब्दांत, 'कॅप्टन स्टॉन्टन यांना रसदीची चणचण भासत होती. अशा परिस्थितीत आधीच विश्रांतीअभावी थकलेले सैन्य रात्रीची दीर्घ पायपीट करून आलेले, आता जळत्या उन्हात अन्नपाण्याविना संघर्षाला सामोरे गेले. ब्रिटिशांनी भारतात लढलेली ही एक अतिशय अवघड लढाई होती. या लढाईत मोठी हानी होऊनही आणि पेशवा सैन्याचा अगदी निर्णायक पराभव न करूनदेखील स्टॉन्टनच्या सैनिकांना आपल्या शस्त्रसामग्रीसह जखमी अधिकाऱ्यांना व जवानांना शिरूरला परत आणण्यात यश आले. पेशवा सैन्याने मात्र रणांगण सोडले आणि ते साताऱ्याच्या दिशेने निघून गेले.'

इंग्रज आणि मराठा यांच्यातील युद्धामधील शेवटच्या काही लढायांमध्ये या लढाईची गणना होते. या युद्धात कंपनीचा संपूर्ण विजय झाला, त्यामुळे ही चकमक विजयासाठी स्मरणात ठेवली गेली. ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या सैनिकांना मानसन्मान बहाल करण्यात अजिबात हयगय केली नाही. गव्हर्नर जनरलने स्टॉन्टनला ‘एड्-डी-कॅम्प’ (परिसहायक) या सन्माननीय पदावर बढती दिली. १८१९ सालच्या संसदीय चर्चेमध्येही या लढाईचा विशेष उल्लेख करण्यात आला. या ठिकाणी स्मारक उभारण्यासाठी तजवीज करण्यात आली आणि वर्षभराने या गावावरून जाणाऱ्या लेफ्टनंट जनरल देलामिन यांना ६० फुटी जयस्तंभाच्या रूपातील स्मारकाचे बांधकाम सुरू असलेले दिसले.

कोरेगावचे हे स्मारक आजही शाबूत आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यांचे सैन्य यांच्यातील ‘अटीतटीच्या संघर्षामध्ये या गावाचे यशस्वी संरक्षण केलेल्या’ ब्रिटिश व भारतीय सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा स्तंभ उभारला आहे. स्तंभाच्या चारही बाजूंनी संगमरवरी स्मारकशिला आहेत. दोन बाजूंच्या इंग्रजी मजकुराचे मराठीतील भाषांतर उर्वरित दोन बाजूंच्या शिलांवर आहे. 'ब्रिटिश सैन्याच्या पूर्वेकडील सर्वांत अभिमानास्पद विजयांपैकी एक विजय साध्य करणाऱ्या' कॅप्टन स्टॉन्टन व त्यांच्या सैनिकांनी कोरेगावचे संरक्षण केले, त्याच्या स्मरणार्थ हा स्तंभ उभारण्यात येत असल्याचे स्मृतिफलकावर म्हटले आहे. त्यानंतर लगेचच ‘कोरेगाव’ (Corregaum) हा शब्द आणि सदर जयस्तंभ यांना बॉम्बे नेटिव्ह लाइट इन्फन्ट्रीच्या (जिला पुढे महार रेजिमेंट हे नाव मिळाले) अधिकृत सन्मानचिन्हावर जागा मिळाली. या पराक्रमाचे वर्णन मार्च १८१९मधील ब्रिटिश संसदीय चर्चेत पुढील शब्दांत करण्यात आले होते : ‘अखेरीस त्यांनी सन्मान्य माघार घेतली, शिवाय आपल्यापैकी जखमी झालेल्यांना परतही आणले!’ चार्ल्स मॅकफार्लेन यांनी १८४४ साली प्रसिद्ध केलेल्या ‘अवर इंडियन एम्पायर’ या अभ्यासामध्ये गव्हर्नरला पाठवण्यात आलेल्या अधिकृत अहवालातील अवतरण दिले आहे. कोरेगावमधील लढाईत ‘युरोपीय व एतद्देशीय सैनिकांनी सर्वोच्च उदात्त निष्ठा आणि सर्वोच्च स्वप्नवत शौर्य दाखवले; कुठल्याही सैन्याने साध्य केलेल्या सर्वोत्तम कामगिरींमध्ये याची गणना होईल,’ असे त्यात नोंदवलेले आहे. ‘मानवी सहनशीलतेचा जवळपास अंत पाहाणारी तहान व भूक यांना तोंड देत’ कंपनीच्या शूर सैन्याने ‘दाखवलेली सर्वोच्च निष्ठा आणि सर्वोच्च अद्भुत शौर्य’ यांची मॅकफार्लेन यांनी प्रशंसा केली आहे. वीस वर्षांनी हेन्री मॉरीस यांनी अधिक आत्मविश्वासाने पुढील टिप्पणी केलेली दिसते : ‘भारतातील इंग्रजांच्या सर्वाधिक धाडसी कामगिऱ्यांपैकी एक कामगिरी पार पाडून कॅप्टन स्टॉन्टन शिरूरमध्ये परतले तेव्हा रंग उधळले जात होते, ढोल बडवले जात होते'१०. वासाहतिक सत्तेच्या त्यानंतरच्या बखरकारांनी या सैन्यावरील कौतुकाचा वर्षाव सुरूच ठेवला. १८८५ साली तर दूर न्यूझीलंडमध्ये प्रकाशित होणाऱ्या ‘ग्रे रिव्हर आर्गस’ या वर्तमानपत्रानेही सदर लढाईचे भपकेबाज वर्णन केले होते११. त्यानंतरचे शतक उजाडल्यावर मात्र या लढाईची चकाकी धूसर व्हायला सुरुवात झाली, आणि कालांतराने ही घटना ब्रिटनच्या लोकस्मृतीतून लोपच पावली१२. आता केवळ सैनिकी इतिहासाच्या विशेष वाङ्मयातच या लढाईचा उल्लेख केला जातो. त्यातही ब्रिटिश लढाऊ क्षमतेचा दाखला म्हणून नव्हे, तर भारतीय सैनिकांच्या लढाऊ क्षमतांबाबत हा उल्लेख होतो१३.

स्मृती: ‘आमच्या’ आणि ‘त्यांच्या’

आज हे स्मारक एका वर्दळीच्या महामार्गावरच्या टोलनाक्यापासून जवळच आहे. अशा प्रकारचे महामार्गीय वर्दळीचे चित्र जागतिकीकरणोत्तर भारतामध्ये सर्रास आढळते. या महामार्गावरून जाणारे शहरी मध्यमवर्गीय दर नववर्षीच्या पहिल्या दिवशी सदर स्मारकाजवळचा रस्ता टाळून प्रवास करण्याच्या सूचना एकमेकांना देतात. ‘ते लोक आज कोरेगावच्या त्यांच्या ठिकाणावर झुंडीने जमतील’, हे यामागचे मध्यमवर्गीयांचे कारण असते. हे स्मारक यात्रास्थळ बनले आहे आणि तिथे दर वर्षी १ जानेवारीला हजारो लोक जमतात. आपण कोणत्या कारणासाठी एकत्र आलोय, असा प्रश्न या सहभागी लोकांना विचारला, तर त्यांचे उत्तरही स्पष्ट असते. ‘आमच्या महार बापजाद्यांनी शूरपणे लढून अन्यायकारक पेशव्यांची सत्ता खाली खेचली, त्याची आठवण ठेवण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. डॉ. आंबेडकरांनी ही यात्रा सुरू केली. त्यांनी आम्हाला अन्यायाशी लढण्याचे आवाहन केले. त्या शूर सैनिकांपासून आणि डॉ. आंबेडकरांच्या आठवणींमधून प्रेरणा घेण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत.'१४

ब्रिटिशांच्या बाजूने लढलेल्या आणि आपल्याच देशवासीयांविरोधातील लढाईमध्ये प्राण गमावलेल्या एतद्देशीय सैनिकांबद्दलचा हा आदरभाव कुणाला बुचकळ्यात पाडू शकतो. परंतु स्मारकावर कोरलेल्या मृतांच्या यादीची काळजीपूर्वक छाननी केली असता लक्षात येते की, यातील एतद्देशीय नावांपैकी बावीस नावांना ‘नाक’ हे प्रत्यय जोडलेले आहे : येसनाक, रायनाक, गुणनाक, इत्यादी. ‘नाक’ हा प्रत्यय केवळ महार या अस्पृश्य जातीतमधील सैनिक वापरत असत१५. पेशवे हे सनातनी उच्चजातीय ब्राह्मण सत्ताधीश होते, या पार्श्वभूमीवर महार सैनिकांचा संदर्भ विशेष प्रस्तुत ठरतो. त्यामुळे कोरेगावची कहाणी केवळ वासाहतिक आणि देशी सत्तांमधील सरळ संघर्षासंबंधीची उरत नाही. ‘जात’ ही एक महत्त्वाची पण बरेचदा दुर्लक्षिली जाणारी बाजू या कहाणीला आहे.

पश्चिम भारतातील ब्राह्मण सत्ताधीश पेशवे हे त्यांच्या उच्चजातीय सनातनीपणासाठी आणि अस्पृश्यांच्या छळवणुकीसाठी कुख्यात होते. समान स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी उच्चजातीय लोकांपेक्षा तथाकथित कनिष्ठ जातींमध्ये जन्माला आलेल्या अस्पृश्यांना अधिक कठोर शिक्षा देण्याची पद्धत पेशव्यांच्या काळात होती, याची तपशीलवार नोंद करणारे अनेक स्रोत आहेत१६. अस्पृश्यांच्या लांबवर पडलेल्या सावल्या रस्त्यांवरून जाणाऱ्या-येणाऱ्या उच्चजातीयांना विटाळतील, या कारणामुळे सकाळी व संध्याकाळी अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास बंदी होती. लोकसंख्येतील एक मोठा भाग व्यापणाऱ्या अस्पृश्यांना केवळ शारीरिक गतिशीलतेबाबत मर्यादा घातलेल्या होत्या असे नव्हे, तर व्यावसायिक आणि सामाजिक गतिशीलताही त्यांना नाकारण्यात आली होती. ‘अस्पृश्यां’चा नरबळी दिला जाण्याचे प्रकारही अठराव्या शतकातील पेशव्यांच्या सत्ताकाळात दुर्मीळ राहिलेले नव्हते. अस्पृश्यांना त्यांच्या नावाप्रमाणे वागणूक मिळेल, याची खातरजमा करणारे तपशीलवार नियम आणि यंत्रणा पेशव्यांनी आखलेली होती. अस्पृश्य मांग जातीमधील १५ वर्षीय मुक्ता साळवे या मुलीने तिच्या जातीला सहन कराव्या लागणाऱ्या छळाचे चित्रदर्शी वर्णन करणारा निबंध १८८५ साली लिहिला होता. पुण्यातील पहिल्या एतद्देशीय शाळेत शिकलेल्या मुक्ताच्या निबंधातील पुढील उतारा पाहा :

“ज्या धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा व बाकीच्यांनी खादाड मनुष्याच्या तोंडाकडे पाहावे, तो व त्यासारखे दुसरे धर्म पृथ्वीवरून नष्ट होतील व अशा धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनात देखील न येवो. आम्हा गरीब मांग महारास हाकून देवून आपन मोठमोठ्या इमारती बांधुन हे लोक बसले. परन्तु इतकेच नाही. त्या इमारतीच्या पायात आम्हास तेल शेंदुर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा क्रम चालविला होता. बाजीरावाचे राज्य होते त्या समयी मांग अथवा महार यातून कोणी तालिमखान्यापुढून गेला असता गुलटेकडीच्या मैदानात त्यांच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून खेळत होते.”१७

कनिष्ठ जातीय लोकांविरोधातील पेशव्यांचे अत्याचार लोकस्मृतीमध्ये आजतागायत टिकून आहेत१८.

जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने ‘बॉम्बे आर्मी’साठी सैनिकांची भरती सुरू केली तेव्हा अस्पृश्यांनी या संधीचा लाभ घेतला. आर्थिक आणि सामाजिक मुक्तीची दारे खुली करणारे साधन म्हणून सैनिकी सेवेकडे पाहिले जात होते. गावाकडे जगताना मेलेल्या ढोराचे मांस हीच मेजवानी मानावी लागत होती१९ आणि सैन्यातील सेवेतून मात्र मानवी प्रतिष्ठेचा आदर राखणारे जीवन प्राप्त होत होते (शिवाय चांगला रोख मासिक पगार मिळत होताच). हे असे दोन पर्याय समोर असलेल्या अस्पृश्य जनतेसाठी राजकीय स्वातंत्र्य आणि राष्ट्रवाद या संज्ञा फिजूल होत्या.

अस्पृश्य सैनिक ब्रिटिशांच्या बाजूने आपल्याच देशवासियांविरोधात लढले असले तरी त्यांचे शौर्य ही आजघडीला लाजिरवाणी स्मृती मानले जात नाही. किंबहुना, कोरेगाव हे पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांसाठी एक प्रतीकात्मक स्थळ बनले आहे. अस्पृश्यांमध्ये शौर्य आणि सामर्थ्य यांचा अभाव असल्याचा दावा जातिव्यवस्थेने केला असताना याच गुणांच्या बळावर आपल्या पूर्वजांनी केलेल्या कामगिरीची आठवण म्हणून या स्थळाकडे पाहिले जाते. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला बांधण्यात आलेले वासाहतिक विजयाचे स्मारक भारतातील पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांना प्रेरणादायी स्थळामध्ये कसे रूपांतरित झाले, याचे स्पष्टीकरण मिळवण्यासाठी कोरेगाव स्मारकाची मदत होते.

महार आणि ब्रिटिश सैन्य

एकोणिसाव्या शतकात बराच काळ ब्रिटनमधील सैनिकी, साम्राज्यवादी व राजकीय वर्तुळांमध्ये कोरेगावची लढाई आणि त्यासंबंधीचे स्मारक यांच्या आठवणी उत्साहाने काढल्या जात होत्या. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात सर्वत्र ब्रिटिशांची सत्ता ठामपणे प्रस्थापित झालेली असली तरी कोरेगाव स्मारक मात्र मुख्य प्रवाहातील स्मरणोत्सवी कार्यक्रमांमधून लुप्त झाले होते. वासाहतिक कीर्तीच्या शिखरावर असलेल्या ब्रिटनला किंवा स्वातंत्र्याचे अंधुक अनुभव मिळायला लागलेल्या भारतालाही ‘सन्माननीय कंपनी’च्या काळातील हिंसक संघर्षाचा स्मरणोत्सव साजरा करण्याचे कारण राहिले नव्हते२०. परंपरेचे इतर प्रवाहही रोडावून गेले होते. महार रेजिमेन्टने काठियावाड (१८२६) आणि मुलतान (१८४६) या लढायांमध्येही स्वतःचे शौर्य आणि निष्ठा दाखवून दिली. कनिष्ठ जातीयांनी दीर्घ काळ ब्रिटिशांना सैनिकी साथ दिली असली तरी, ‘बॉम्बे आर्मी’चा भाग असलेल्या महार रेजिमेन्टमधील काही शिपाई १८५७च्या बंडामध्ये सामील झाले होते. महारांना सैन्यात भरती करून घेण्याबाबत ब्रिटिशांमध्ये आधीपासूनच काहीशी अनुत्सुकता होती, त्यात या बंडादरम्यानच्या घडामोडींनी भर टाकली२१. परिणामी, त्यांना बिगर-सैनिकी वंश घोषित करण्यात आले आणि मे १८९२मध्ये त्यांची भरती थांबवण्यात आली२२.

भरती थांबवण्यात आल्यानंतर महारांना त्याचा फटका बसायला सुरुवात झाली. त्यानंतर निवृत्त सैनिक गोपाळ बाबा वलंगकर यांनी ‘अनार्य दोष परिहारक मंडळी’ची स्थापन केली. ब्रिटिशांना भारतातील सध्याचे प्रभुत्व साध्य करण्यासाठी महार त्यांच्या बाजूने लढलेले आहेत याची आठवण करून देण्यासाठी या संस्थेच्या सदस्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला १८९४ साली अर्ज केला. महारांना सैनिकी वंशांच्या यादीतून वगळण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती त्यांनी अर्जात केली होती. हा अर्ज १८९६ साली फेटाळण्यात आला२३.

दुसरे एक अस्पृश्य नेते शिवराम जानबा कांबळे यांनी त्यांच्या मुक्तीसाठी आणखीनच सातत्यपूर्ण प्रयत्न केले. अस्पृश्य मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’च्या कामामध्ये कांबळे यांचा सहभाग होता. यातील एका शाळेत ऑक्टोबर १९१०मध्ये पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गव्हर्नरच्या कार्यकारीमंडळातील सदस्य आर. ए. लॅम्ब यांना निमंत्रित करण्यात आले होते. लॅम्ब यांनी भाषणामध्ये कोरेगाव स्मारकाला आपण दर वर्षी भेट देत असल्याचा उल्लेख केला. ‘युरोपीयांच्या आणि बहिष्कृत नसलेल्या भारतीयांच्या खांद्याला खांदा लावून शौर्याने लढताना जखमी झालेल्या वा मृत्युमुखी पडलेल्या अनेक महारांची नावे’ या स्मारकावर असल्याकडे लॅम्ब यांनी लक्ष वेधले. ‘(सैन्याच्या रूपातील) एका सन्माननीय उपजीविकेचा मार्ग या लोकांना बंद झाल्याबद्दल’ त्यांनी खेदही व्यक्त केला. लॅम्ब यांच्या भाषणामुळे कोरेगावच्या स्मारकाच्या स्मृतीला उजाळा मिळाला की आधीपासूनच त्याची स्मृती शाबूत होती, हे ज्ञात नाही. ब्रिटिशांना ‘पुण्याचे स्वामी’ बनवण्यासाठी महारांनी लढा दिल्याच्या युक्तिवादाला लॅम्ब यांच्या वक्तव्याने निश्चितपणे वजन प्राप्त झाले२४.

विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांमध्ये कांबळे यांनी या स्मारकाच्या ठिकाणी महार लोकांच्या अनेक बैठका आयोजित केल्या. १९१० साली दख्खनच्या महारांची एक महापरिषद घेतली. या परिषदेमध्ये पश्चिम भारतातील एकावन्न गावांमधील महार लोक सहभागी झाले होते. ‘ब्रिटिश प्रजाजन म्हणून ब्रिटिश सरकारकडून आपले अविभाज्य अधिकार’ मिळावेत, अशी मागणी करणारी याचिका या परिषदेच्या वतीने ‘सेक्रेटरी ऑफ स्टेट’ना पाठवण्यात आली. महारांना सैन्यात पुन्हा प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी ठाम युक्तिवाद केला आणि ‘आमच्या इतर कोणत्याही भारतीय सह-प्रजाजनांपेक्षा आम्ही मूलतः कनिष्ठ नाही’, असे प्रतिपादन केले२५. पश्चिम भारतातील अस्पृश्यांच्या विविध सभा-परिषदांमधून ही विनंती १९१६ सालपर्यंत वारंवार करण्यात येत होती. अखेरीस, पहिल्या महायुद्धाला तोंड फुटल्यानंतर मुंबई सरकारने महारांच्या दोन प्लाटून उभ्या करायचे आदेश १९१७ साली दिले२६.

आंबेडकरांचे आगमन

परंतु, महारांचा हा आनंद अल्पजीवी ठरला. युद्ध संपल्यावर लगेचच त्यांची सैन्यातील भरती थांबवण्यात आली. त्यामुळे, अस्पृश्यांच्या शौर्याची दखल घेतली जावी यासाठी नव्याने मोहीम सुरू झाली. सैन्यातील भरतीसंबंधीची ही मागणी तोपर्यंत अस्पृश्यांच्या एकूणच मुक्तीसाठीची चळवळ बनण्याच्या पातळीला पोचली होती. या मोहिमेमध्ये कोरेगावचे स्मारक हा मध्यवर्ती बिंदू ठरला होता. या जयस्तंभापाशी अनेक बैठका घेण्यात आल्या, त्यामध्ये कांबळे व इतर नेत्यांनी अस्पृश्यांना पूर्वजांच्या पराक्रमाची व सामर्थ्याची आठवण सातत्याने करून दिली. कोरेगाव लढाईच्या वर्धापनदिनी १ जानेवारी १९२७ रोजी उपस्थित अस्पृश्यांच्या गर्दीला संबोधित करण्यासाठी कांबळे यांनी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांना आमंत्रित केले२७. अस्पृश्यांचे केवळ आणखी एक नेते एवढेच आंबेडकरांचे स्थान नव्हते. भारतीय राजकारणाच्या संदर्भात त्यांचे प्रभावक्षेत्र लक्षणीय ठरलेले होते.

महार जातीमधील निवृत्त सुभेदारांच्या घरात १८९१ साली आंबेडकरांचा जन्म झाला होता. जातिआधारित भेदभावाचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना सहन करावा लागला असला तरी त्यांनी कोलंबिया विद्यापिठातून डॉक्टरेट पदवी मिळवली, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून डी. एससी. ही पदवी मिळवली आणि बत्तिसाव्या वर्षी त्यांना ‘ग्रे’ज् इन’मधल्या वकीलवर्गामध्ये दाखल करून घेण्यात आले. १९२६ साली ते मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे सदस्य झाले. अस्पृश्यांच्या मुक्तीचे ध्येय गाठण्याच्या मार्गामध्ये कोरेगाव स्मारकाचे स्थान महत्त्वाचे असल्याचे आंबेडकरांनी जाणले होते. या सभेमध्ये त्यांनी प्रेरणादायी भाषण केले, त्याचसोबत दर वर्षी कोरेगाव लढाईच्या वर्धापनदिनी या ठिकाणी यात्रा भरवून आपल्या पूर्वजांच्या पराक्रमांची स्मृती पुनरुज्जीवित करण्याच्या कल्पनेलाही त्यांनी पाठिंबा दिला. भारतीय राष्ट्राच्या भवितव्याविषयीचा निर्णय घेण्यासाठी भरवण्यात आलेल्या १९३१ सालच्या गोलमेज परिषदेला अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आंबेडकरांना निमंत्रित करण्यात आले होते. या परिषदेतील आपल्या युक्तिवादांवर आधारित एक लहानसा प्रबंध ‘द अनटचेबल्स अँड पॅक्स ब्रिटानिका’ या शीर्षकाखाली त्यांनी लिहिला. भारतातील ब्रिटिश सत्तेची स्थापना व दृढीकरण यांमध्ये अस्पृश्य साधनीभूत ठरले होते, या आपल्या प्रतिपादनाच्या समर्थनार्थ आंबेडकरांनी कोरेगावच्या लढाईचा संदर्भ दिला होता२८.

भारतीय राजकारणामध्ये १९२० पासून ते १९४७ पर्यंतचा मुख्य प्रवाह गांधी युग म्हणून ओळखला जातो. वैश्य या मध्यम जातीमध्ये जन्मलेल्या गांधींचा जातिव्यवस्थेमधील अस्पृश्यांच्या पद्धतशीर पिळवणुकीविषयीचा दृष्टिकोन भिन्न होता. अस्पृश्यांना ते हरिजन असे संबोधत. या नावाविषयी आणि त्यामागील आश्रयदातृत्वाच्या वृत्तीविषयी आंबेडकर व त्यांच्या अनुयायांनी चीड व्यक्त केली होती. या पृष्ठभूमीवरील समस्येचा अंतःप्रवाह आंबेडकर व गांधी यांच्यातील महत्त्वाच्या वैचारिक भेदांशी संबंधित होता. गांधी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे ज्या भारताचे प्रतिनिधित्व करत होते, त्यामध्ये वासाहतिक प्रभुत्व आणि भारतीयांच्या राजकीय स्वातंत्र्याची आकांक्षा यांच्यातील अंतर्विरोध हा मुख्य मानला जात होता. आंबेडकर आणि ते ज्या अस्पृश्य जनतेचे प्रतिनिधित्व करत होते त्यांच्या दृष्टीने दडपशाहीचे मूळ राजकीय व्यवस्थेत नव्हते, तर सामाजिक-आर्थिक अवकाशात ते रुजलेले होते. यातून हितसंबंधांचा संघर्ष उत्पन्न झाला. वासाहतिक सत्तेविरोधातील एकसंध आघाडीमध्ये एकंदर सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व आपण करतो आहोत, असा गांधींच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा दावा होता. तर ‘वासाहतिक सत्ता ही निःसंदिग्धपणे मुक्तिदायी शक्ती राहिली आहे, अशी दलितांमधील व ब्राह्मणेतरांमधील काही घटकांची धारणा राहिली होती’२९. मात्र डॉ. आंबेडकर हे ब्रिटिश सत्तेचे कट्टर समर्थक नव्हते. त्यांच्या मनातील नव भारत बराच भिन्न स्वरूपाचा होता. सुधारित हिंदू धर्मातून आदर्श समाजव्यवस्था उभारण्याचा गांधींचा मानस होता, तर आंबेडकरांनी ‘हिंदू समुदायापासून स्वतंत्र अशा राजकीय प्रतिनिधित्वा’ची मागणी केली होती३०. गांधींनी १९३० साली वासाहतिक सत्तेच्या व्यवस्था व संस्थांविरोधात सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. दलित वर्गांमधील शिवराम जानबा कांबळे व इतर काही मोजक्या प्रतिनिधींनी ‘इंडियन नॅशनल अँटी-रिव्होल्यूशनरी पार्टी’ अशा नावाने एक संघटना काढून सविनय कायदेभंगाच्या चळवळीला विरोध केला. या संघटनेच्या जाहीरनाम्याचा एक उतारा ‘द बॉम्बे क्रॉनिकल’मध्ये प्रसिद्ध झाला होता३१ :

“‘दलित’ वर्गीयांना मंदीर प्रवेश मिळावा आणि ‘अस्पृश्यते’चे संपूर्ण निर्मूलन व्हावं, यासाठी परिपूर्ण प्रयत्न करायच्या आधीच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हुकूमशहा श्री. गांधी यांनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीची घोषणा केली आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, सविनय कायदेभंगाचे आंदोलन पुढं ढकलावं आणि अस्पृश्यताविरोधी चळवळीमध्ये मनोभावे सहभागी व्हावं, यासाठी गांधीजी व त्यांच्या अनुयायांचे मन वळवण्याच्या उद्देशाने ‘इंडियन नॅशनल अँटी-रिव्होल्यूशनरी पार्टी’ची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे... (अस्पृश्यता) हे भारताच्या अधोगतीचे मूळ कारण आहे... अस्पृश्यतेचे संपूर्ण निर्मूलन होत नाही, तोपर्यंत ब्रिटिश सत्ता संपूर्णतः आवश्यक आहे असे पार्टीला वाटते.”

या पक्षाला मुख्य प्रवाहातील राजकारणामध्ये फारसा पाठिंबा मिळाला नाही, परंतु अस्पृश्यांच्या दृष्टीने राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक व आर्थिक कल्याण अधिक महत्त्वाचे व निकडीचे होते हे यातून दिसते. त्यामुळे बहुधा तात्पुरती आवश्यक हानी (necessary evil या अर्थी) म्हणून वासाहतिक सत्तेकडे पाहिले गेले. शिवाय, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये भिन्न आणि अनेकदा परस्परविरोधी स्वरूपाचे आवाज होते, हेही यातून दिसते. राष्ट्रवादी कथनांमध्ये अनेकदा ही बाब दुर्लक्षिली जाते.

नवीन स्मृती

भारताने १९४७ साली स्वातंत्र्य मिळवले. नवीन राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी तयार केलेल्या समितीचे अध्यक्षपद आंबेडकरांना देण्यात आले. परंतु, ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ हे एक दूरस्थ स्वप्नच राहिले. हिंदू सामाजिक-सांस्कृतिक अवकाशामध्ये विस्तृत सुधारणा घडवण्यासाठी आंबेडकरांनी प्रस्तावित केलेले ‘हिंदू कोड बिल’ संसदेने स्वीकारले नाही. भ्रमनिरास झालेल्या आंबेडकरांनी १९५१ साली मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. पाच वर्षांनी त्यांच्या नेतृत्वाखाली लाखो अस्पृश्यांनी एकत्रितपणे बौद्ध धर्मात प्रवेश केला. पिळवणुकीपासून संपूर्ण स्वातंत्र्य मिळवण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल म्हणून हे धर्मांतर करण्यात आले. त्याच वर्षी, आंबेडकरांच्या निधनानंतर ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ या नावाने एक राजकीय पक्ष स्थापन झाला. कनिष्ठ जातीय लोकांच्या हितसंबंधांचे प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशाने हा पक्ष अस्तित्वात आला होता.

धर्मांतरानंतर उच्चजातीयांसोबतच्या सांस्कृतिक संघर्षांना सुरुवात झाली. हिंदू उजव्यांनी तत्काळ नकाराची भूमिका घेतली. बुद्धाच्या काळापासून हिंदू धर्मासाठी सुयोग्य ठरलेली सांस्कृतिक अपहाराची व्यूहरचना आजही वापरली जाते आणि बौद्ध हे हिंदू धर्मातीलच एक निराळा पंथ आहेत अशी मांडणी केली जाते३२. यामुळे नवीन आणि निराळ्या सांस्कृतिक प्रथा सुरू करणे ही नवबौद्धांची गरज बनली. परिणामी, पश्चिम भारतातील नवबौद्धांनी शोधलेल्या सांस्कृतिक प्रथांमध्ये कोरेगाव स्मारकाची यात्रा ही एक प्रथा बनली. पेशव्यांची उच्चजातीय सत्ता उलथून टाकण्यासाठी सहाय्य केलेल्या महारांच्या पराक्रमाचा स्मरणोत्सव साजरा करण्यासाठी दर नववर्षाच्या पहिल्या दिवशी या स्मारकस्थळी नवबौद्धांची गर्दी जमते. डॉ. आंबेडकरांनी १ जानेवारी १९२७ रोजी या स्थळाला दिलेल्या भेटीचाही स्मरणोत्सव ही मंडळी साजरा करतात.

हिंदू यात्रास्थळांसारखी धार्मिक बाजारपेठांची कोणतीही सूचक चिन्हे कोरेगाव स्मारकापाशी दिसत नाहीत. मिठाई, देवांच्या प्रतिमा यांचे विक्रेते इथे आढळत नाहीत. वर्षभर हे ठिकाण सुने असते. परंतु, नवीन वर्ष सुरू होत असताना या ठिकाणी पुस्तके, कॅसेट आणि सीडी विकणारे अनेक लहान-लहान स्टॉल लागलेले दिसतात. आंबेडकरी साहित्याचे विविध प्रकाशक या ठिकाणी आपल्या पुस्तकांचे स्टॉल लावतात. स्टॉलांवरून नवबौद्धांची गाणी लावलेली असतात. ‘जग बदल घालुनी घाव, गेले सांगून मला भीमराव‘ अशा गाण्यांमधून आंबेडकरांच्या माहात्म्याचे वर्णन असते आणि जग बदलण्याची गरजही मांडलेली असते. आता असंख्य तुकड्यांमध्ये विभागलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आपल्या अनुयायांना इथं संबोधित करतात. नवबौद्ध कुटुंबे जयस्तंभरूपी स्मारकाला भेट देतात. तिथे फुले वाहातात किंवा मेणबत्ती लावतात. बुद्ध वंदना म्हणणे हा इथल्या विधीचा एक महत्त्वाचा भाग आहे.

पुस्तके विकत घेणे हाही इथला एक अतिशय महत्त्वाचा विधीच बनलेला आहे. अनेक पुस्तकविक्रेत्यांच्या मुलाखतींमधून एक विलक्षण वस्तुस्थिती समोर आली : नवबौद्धांची सभा किंवा यात्रा असेल तेव्हा पुस्तकांच्या स्टॉलवर जोरदार धंदा होतो. या स्टॉलवर विकल्या जाणाऱ्या पुस्तकांची सरासरी पृष्ठसंख्या कमी असते- साधारणपणे ३० ते ७० पानांच्या पुस्तिका १० ते ५० रुपयांना विकल्या जातात. हे वाचक नवसाक्षर असतात, वाचनावर खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे अतिशय कमी वेळ असतो आणि त्यांना स्वस्त पुस्तकेच परवडू शकतात, अशा कारणांमुळे हे घडत असावे. कोरेगाव यात्रा किंवा अशा इतर महत्त्वाच्या यात्रा (उदाहरणार्थ- मुंबई आणि नागपूर) अशा वेळी होणाऱ्या दैनंदिन विक्रीचे आकडे अनेकदा उर्वरित वर्षभरात होणाऱ्या विक्रीपेक्षा जास्त असतात, असे या पुस्तकांच्या अनेक प्रकाशकांनी सांगितले३३. नवबौद्धांमधील- विशेषतः पूर्वाश्रमीच्या महार जातीमधील शिक्षणाच्या मुक्तीदायी सामर्थ्यावरील श्रद्धेचे सूचन यातून होते, असे म्हणता येईल. इथे सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकांमधील काही आंबेडकरांच्या पुस्तकांची मराठी भाषांतरे असतात. उदाहरणार्थ- 'बुद्ध आणि त्याचा धम्म', 'जातिव्यवस्थेचे निर्मूलन', 'शूद्र पूर्वी कोण होते?'. इतर लोकप्रिय पुस्तकांमध्ये दलित आत्मचरित्रांचा समावेश असतो. दलित कविता आणि दलित नेत्यांची लहान चरित्रेही विकली जातात.

या पुस्तकांमधून भारतीय इतिहासाविषयीचा दलित दृष्टिकोन मांडलेला असतो. वासाहतिक सत्ता जातीय पिळवणुकीच्या वास्तवांबाबत अज्ञानी राहिली असली, तरी ती मुक्तीसाठी साधनीभूत ठरल्याचे यात नोंदवलेले असते. मुख्यत्वे जोतिराव फुले आणि आंबेडकर यांनी वासाहतिक सत्तेविषयीचा हा दृष्टिकोन मांडला. यामध्ये गांधी आणि भारतीय स्वातंत्र्यासाठीची चळवळ यांविषयी फारशी सकारात्मक मांडणी नसते३४. परंतु, १९५० साली भारतीय राज्यघटना निर्माण करणाऱ्या समितीचे अध्यक्षपद आंबेडकरांकडे होते, हे तथ्य सर्वोच्च महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे भारतीय राज्यघटनेवर टीका करण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास दलित जनतेकडून त्याला तीव्र विरोध होतो. अण्णा हजारे व त्यांच्या साथीदारांनी २०११ साली केलेले भ्रष्टाचारविरोधी आंदोलन हे याचे एक अलीकडचे उदाहरण होते. भ्रष्टाचाराचे प्रश्न सोडवण्याकरिता शक्तिशाली लोकपालाचे पद निर्माण करण्यासाठी राज्यघटनेच्या कक्षेबाहेरील रचना उभारण्याला दलित नेत्यांनी व जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.

विस्मृतीचे महत्त्व

कोरेगावचे स्मारक वासाहतिक सत्ताधाऱ्यांनी बांधलेले असले, तरी आजच्या ब्रिटिश जनतेच्या स्मरणोत्सवी अवकाशामध्ये त्याचा समावेश होत नाही. वासाहतिक स्मृती- विशेषतः हिंसक लढायांच्या स्मृती आजच्या ब्रिटनमध्ये अभिमानाचा विषय ठरत नाहीत, ही वस्तुस्थिती कदाचित या स्मृतिभ्रंशाला कारणीभूत ठरली असावी. भारतातील उच्च जातीयांमध्येही असाच स्मृतिभ्रंश आढळतो. पेशव्यांचे पुणे शहर आता सॉफ्टवेअर आणि शिक्षण यांचे केंद्र बनले आहे. नमुना म्हणून उच्चजातीय व नवश्रीमंत वर्गातील (यांच्यासाठी ‘कम्प्युटर कूली’ अशी संज्ञा वापरली जाते) १३० लोकांना कोरेगाव स्मारकाविषयी विचारले तर, त्यांच्यापैकी एकालाही हे स्मारक कुठे आहे ते माहीत नव्हते३५.

अर्थात, उच्चभ्रूंचा स्मृतिभ्रंश संपूर्ण स्वरूपाचा आहे असे म्हणता येणार नाही. परस्परविरोधी स्मृतीही अस्तित्वात आहेत. महाराष्ट्रामध्ये १९७०च्या दशकात अनेक लोकप्रिय ऐतिहासिक (खरेतर, अनैतिहासिक) कादंबऱ्या मोठ्या प्रमाणात खपण्याची लाट उसळली होती. मराठी भाषक मध्यमवर्गीयांच्या इतिहासविषयक आकलनावर यातील अनेक कादंबऱ्यांचा प्रभाव अजूनही आहे. यातील दोन महत्त्वाच्या कादंबऱ्यांमध्ये कोरेगावच्या लढाईचे ओझरते वर्णन आहे. या दोन्ही कादंबऱ्यांचे लेखक ब्राह्मण आहेत. यातील ‘मंत्रावेगळा’ ही ना. सं. इनामदारलिखित कादंबरी शेवटच्या पेशव्याच्या जीवनावर आधारीत आहे. कोरेगावची लढाई पेशव्यांनी जिंकली होती, असा दावा या कादंबरीत आहे३६. पेशव्यांच्या लढायांविषयी अशा पर्यायी स्मृती तयार करण्याचा प्रवाह अलीकडच्या काळात अधिक जोम धरू लागला आहे. पानिपतमध्ये १७६१ सालच्या लढाईमध्ये पेशव्यांच्या सैन्याचा पूर्ण पाडाव झाला होता, परंतु आज त्याचा स्मरणोत्सव साजरा करण्यासाठी अनेक दणदणीत मेळावे भरवले जातात३७. या मेळाव्यांमध्ये केल्या जाणाऱ्या कथनांमधून जणू काही ही लढाई पेशवे जिंकले होते असे सुचवले जाते.

आजच्या नवबौद्ध संस्कृतीमध्ये कोरेगाव स्मारकाचे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. कोरेगावची लढाई आणि या ठिकाणाला आंबेडकरांनी दिलेली भेट यांचे दस्तावेजीकरण करण्यासाठी व त्याचा स्मरणोत्सव करण्यासाठी इंटरनेट व इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर केला जातो. कोरेगाव स्तंभाच्या प्रतिमेसाठी इंटरनेटवर शोध घेतल्यास स्मारकाच्या स्तंभाची शेकडो छायाचित्रे सापडतात. यू-ट्यूबवर यासंबंधी चित्रफितीही उपलब्ध आहेत३८. कोरेगाव स्मारकाशी संबंधित किमान डझनभर इंग्रजी व मराठी ब्लॉग-नोंदी सापडतात. कोरेगावमधील लढाई आणि त्यातील महार सैनिकांची भूमिका यासंबंधीची माहिती या नोंदींमध्ये दिलेली असते आणि अस्पृश्यांनी निर्धार केला तर ते काय साध्य करू शकतात याची आठवणही वाचकांना करून दिली जाते.

निष्कर्ष

तर, कोरेगाव भीमा इथल्या जयस्तंभाने परस्परविरोधी स्मृती निर्माण केल्या आहेत. त्यांची निर्मिती करणाऱ्या गटांच्या भिन्न हितसंबंधांचे प्रतिनिधित्व या स्मृती करतात. उच्चजातीय वर्चस्वाचे प्रतीक असलेल्या पेशवा सत्तेच्या माहात्म्याचा स्मरणोत्सव करू इच्छिणारे लोक एकतर कोरेगावच्या लढाईकडे दुर्लक्ष करतात किंवा पेशव्यांच्या विजयाच्या मिथ्यास्मृती निर्माण करतात. हा जयस्तंभ साम्राज्याच्या स्मृतिस्थळांपैकी एक असला तरी साम्राज्याच्या मातृभूमीमध्ये तो बहुतांश विस्मृतीत गेला आहे, आणि पश्चिम भारतातील स्मरणोत्सवासंदर्भात त्याचा कायापालट झाला आहे. साम्राज्यवादी सत्तेची आठवण म्हणून त्याकडे पाहिले जात नाही. उच्चजातीय दडपशाही उलथवून टाकण्याच्या अस्पृश्यांच्या क्षमतेचा ‘ऐतिहासिक पुरावा’ म्हणून पूर्वाश्रमीचा अस्पृश्य समुदाय या स्मारकाकडे पाहातो. भारतीय समाजावर अजूनही जातीव्यवस्था वर्चस्व गाजवून आहे३९. या पार्श्वभूमीवर, वर्तमानामधील प्रभुत्वसत्तेसाठी (hegemony) सुरू असलेल्या चढाओढीचे प्रकटीकरण स्मृतींच्या चढाओढीतून होत असते, याचा दाखला म्हणून कोरेगाव स्मारकाकडे पाहाता येते.

संदर्भ :

१. J. Beltz, Mahar, Buddhist and Dalit: Religious Conversion and Socio-Political Emancipation
New Delhi: Manohar Publishers, 2005), pp. 173– 4.

२. Kulkarni, Sumitra, The Satara Raj, Mittal Publishers, New Delhi, 1995. Pp. 13-16. Also, T. C. Hansard, The Parliamentary Debates from the year 1803 to the present time, vol. 39, p. 887 (House of Commons, 4 March 1819); Carnaticus, Summary of the Mahratta and Pindarree campaign during 1817, 1818, and 1819 under direction of the Marquis of Hastings: chiefly embracing the operations of the army of the Deckan, under the command of His Excellency Lieut.-Gen. Sir T. Hislop, Bart. G.C.B.: With some particulars and remarks (London: Williams, 1820), pp. 70, 75 – 6.

३. J. G. Duff, A History of the Mahrattas, vol. 3, (London: Longman, Rees, Orme, Brown and Green, 1826), p. 434.

४. C. MacFarlane, Our Indian Empire: its History and Present State, from the Earliest Settlement of the British in Hindostan to the Close of the Year 1843, vol. 2, (London: C. Knight & Co., 1844), p. 233.

५. Hansard, The Parliamentary Debates (n. 2, above).

६. Lieut. Col. Delamin, Asiatic Journal and Monthly Miscellany 5 (1831), p. 135.

७. Inscription on the Memorial Obelisk, Koregaon Bheema 1822.

८. The second Battalion of the first Regiment of the Bombay Native Light Infantry that eventually came to be known as the Mahar Regiment. https://www.aviation-defence-universe.com/20-21-mahar-battalions-mahar-r... accessed on 07-01-2018.

९. Op. Cit., p. 233.

१०. H. Morris, The History of India (Madras: Madras School Book Society, fifth edn 1864), p.207.

११. Grey River Argus, XXXI: 5202 (28 May 1885), p. 2.

१२. ब्रिटिशकालीन भारताशी संबंधित आजकालच्या वाङ्‌मयामध्ये सर्वसाधारणपणे या लढाईचा उल्लेख केलेला आढळत नाही. उदाहरणार्थ, पाहा : J. Lawrence, Raj: The Making and Unmaking of British India (London: Little, Brown, 1997).

१३. R. Holmes, Sahib: The British Soldier in India 1750 –1914 (London: HarperCollins, 2005), pp. 297– 8.

१४ साठ किशोरवयीन शाळकरी मुलांच्या गटासोबत आलेल्या श्री. शंकर मुनोळी (वय ३६, शालेय शिक्षक) यांची मुलाखत . (1 January 2010).

१५. D. L. Ramteke, Revival of Buddhism in Modern India (New Delhi: Deep & Deep Publications, 1983), p. 81.

१६. H. G. Frank, Panchyats Under the Peshwas: An original and detailed review of a very ancient system of local self-government, based entirely on discoveries made during research in the Poona Residency Daftar with the especial permission of the Govt. of Bombay (Poona: Poona Star Press, 1900), p. 40.

१७. Salave Mukta (transl. Maya Pandit) in S. Tharu and K. Lalita (eds), Women Writing In India : 600 B.C. to the Present (New York: The Feminist Press, 1991), p. 214.

१८. For example, see G. P. Deshpande, Selected Writings of Jotirao Phule (New Delhi: Leftword Books, 2002); B. R. Ambedkar, Annihilation of Caste at http://ccnmtl.columbia.edu/projects/mmt/ambedkar/web/index.html (accessed 10 October 2011); R. O’Hanlon, Caste, Conflict and Ideology (Cambridge: Cambridge University Press, 2002); Vijay Tendulkar’s ‘Ghashiram Kotwal’ is a popular and controversial play that has run on and off since 1972 and depicts the caste-based exploitation, downfall of the Peshwas and the ensuing power-struggle.

१९. मेलेल्या म्हशीचे मांस ‘मेजवानी’ ठरत असल्याचे उल्लेख मराठीतील अनेक दलित आत्मचरित्रांमध्ये सापडतात. उदाहरणार्थ, पाहा- तराळ अंतराळ – शंकरराव खरात, आणि बलुतं - दया पवार. Also, see Dangle Arjun (ed.), Poisoned Bread (Mumbai: Sangam Books, 1992).

२०. Various reforms and acts, especially Lord Ripon’s resolution on local self-government in 1882 eventually led to self-government in a very limited sense. For details, see T. Hugh, Foundations of Local Self-Government in India, Pakistan and Burma (New York: Praeger, 1968), p. XII.

२१. S. P. Cohen, ‘The Untouchable Soldier: Caste, Politics, and the Indian Army’, Journal of Asian Studies 28 (1969), pp. 453– 68, 456; E. Zelliot, From Untouchable to Dalit: Essays on the Ambedkar Movement (New Delhi: Manohar, 1992), p. 58.

२२. R. K. Kshirsagar, Dalit Movement in India and its Leaders, 1857–1956 (New Delhi: M. D. Publications, 1994), pp. 137– 8.

२३. The original English petition and the government resolution to make no change in the recruitment policy are quoted in C. B. Khairmode, Dr. Bheemrao Ramji Ambedkar, vol. VIII, (Pune: Sugawa Prakashan, 2010, first published 1987), pp. 228 –50.

२४. Text of the petition to the Secretary of State quoted in H. N. Navalkar, The Life of Shivram Janba Kamble (Pune, 1997, first published SJ Kamble, 1930), p. 149.

२५. Ibid. P. 154.

२६. Ibid. P. 153.

२७. A. Rao, The Caste Question: Dalits and the Politics of Modern India (Berkeley: University of California Press, 2009), p. 346.

२८. 34 B. R. Ambedkar, The Untouchables and Pax Britannica, www.ambedkar.org (accessed 19 August 2011).

२९. G. Omvedt, Dalits and the Democratic Revolution: Dr. Ambedkar and the Dalit Movement in Colonial India (New Delhi: Sage, 1994), p. 82. Dalit is the widely used nomenclature for all the so-called low and Untouchable castes in India today, originating from the nineteenth century. It translates as suppressed or crushed. O. Mendelsohn and M. Vicziany, The Untouchables: Subordination, Poverty, and the State in Modern India (Cambridge: Cambridge University Press, 1998), p. 4.

३०. Beltz, Op. Cit. P. 49.

३१. 37 The Bombay Chronicle (2 April 1930). (Emphasis mine).

३२. For example, see the rightwing Hindu organisation RSS, which quotes from S. Radhakrishnan’s Indian Philosophy on its webpage – ‘Buddhism is an offshoot of Hinduism’ at www.sanghparivar.org (accessed 1 March 2012).

३३. आंबेडकरी वाङ्मयाचे प्रकाशक श्री. विलास वाघ व डॉ. नारायण भोसले यांच्या मुलाखती, जानेवारी २०१०.

३४. G. Omvedt, Dalits and the Democratic Revolution, pp. 169 –77.

३५. Spot interviews of approximately 120 people from software industry conducted in Pune, May– June 2011.

३६. N. S. Inamdar, Mantravegla (Pune: Continental Prakashan, 1969), pp. 17, 461.

३७. 45 For example see this text message received by the researcher on 1 December 2011: ‘3rd January to 28 January 2012, a March towards Panipat on two-wheelers! 8 states, 76 districts, many forts, ancient temples and caves and holy places included. 7000 Kms of travel on bikes. The March begins from the historical palace of Shrimant Sirdar Satyendraraje Dabhade Sirkar. Come one, Come all! Bring your friends along and join the Maratha forces. Yours Obediently, Prof.XXX ’.

३८. For example, see www.youtube.com/watch?v=gSKRQ--1Pc4 (accessed 1 March 2012).

३९. इंगळे देवेंद्र व कुंभोजकर श्रद्धा (अप्रकाशित निबंध), 'स्पॉल्डिंग सिंपोझियम ऑन एशियन रिलीजन्स' या ऑक्सफर्ड विद्यापीठात मार्च २००८मध्ये झालेल्या परिषदेत सादर केलेल्या निबंधातील प्रमुख निष्कर्ष असा होता की, पुणे शहरातील तरुण उच्च मध्यमवर्गीय लोक विवाह आणि शेजार याबाबत निर्णय घेताना जात व धर्म या घटकांना महत्त्व देतात.

(संपादकीय नोंद - संदर्भ असणाऱ्या तळटिपा आता लेखात वाढवल्या आहेत; तळटिपांकडून लेखाकडे जाण्याचे दुवे दुरुस्त केले आहेत.)

field_vote: 
0
No votes yet

फार सुंदर लेख आहे. आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

लोकशाहीमधे कुणी कशाची स्मृती ठेवायची , ह्याचे अभिव्यक्ति स्वातंत्र्य असले पाहिजे. कोरेगांव येथील स्मृतीचिन्ह जर दलितांना ब्राह्मणी सत्तेवरील विजय आणि अत्याचारांवर विजय वाटत असेल, तर तो त्यांना साजरा करु दिला पाहिजे. याठिकाणी, हा विजय म्हणजे ब्रिटिशांना मदत, या बाळबोध दृष्टीकोनातून बघणे चुकीचे आहे.
पण नुसत्या पास्ट ग्लोरीला कवटाळून त्या समाजाची प्रगती होणार आहे का ? आंबेडकरांना देवत्व देऊन त्यांची व्यक्तिपूजा करणे हा मार्ग प्रगतीपथावर नेणारा नाही. त्याउलट प्रत्येक दलित व्यक्तीला जर, आपण बाबासाहेबांसारखे झाले पाहिजे, असे मनापासून वाटू लागले आणि त्यासाठी ते कष्ट घेऊ लागले तरच काही फरक पडेल.
उच्चवर्णीयांनाही कायम आपल्या पूर्वजांच्या चुकांची शिक्षा आम्ही का भोगायची आणि तीही किती दिवस, असे मनापासून वाटत असते. पण अशी शिक्षा नको असेल तर, दलितांना विरोध न करता त्यांची लवकरात लवकर प्रगती कशी होईल ह्यादृष्टीने त्यांनी मनापासून प्रयत्न केले तरच सर्वजण एका लेव्हलवर येतील आणि मग आपोआपच सर्वच जातीतल्या राजकारण्यांचे दुकान बंद होईल, कारण असे होऊ नये, हीच तर त्यांची इच्छा आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दलितांना विरोध न करता त्यांची लवकरात लवकर प्रगती कशी होईल ह्यादृष्टीने त्यांनी मनापासून प्रयत्न केले तरच सर्वजण एका लेव्हलवर येतील

असे प्रयत्न करायचे म्हणजे नक्की काय करायचं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The biggest contribution anyone can make is go to the basti and teach English, esp. to kids, but whoever wants to learn. Also, a lot of the success of the upper castes is due to advice regarding careers and business. Make this available to the Dalits. Maharashtra is pretty OK in all this, but in UP, the Dalit cannot even open a shop in villages. And do not join caste-based organizations. They are going to perpetuate the casteism.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फेसबुकवर तर जातीय गटांचे इतके पेव फुटले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The biggest contribution anyone can make is go to the basti and teach English, esp. to kids, but whoever wants to learn.

'आपल्या' लोकांनी 'त्यांच्या' पोरांना इंग्रजी शिकवावे म्हणताय?

नाही, हेतू स्तुत्य असेलही (कदाचित), परंतु यामागे 'आपल्या' लोकांना चांगले इंग्रजी येते, हे जे गृहीतक आहे, ते तपासून पाहिले आहेत काय?

इंग्रजीने नक्की काय घोडे मारले हो तुमचे?

(बादवे, आपल्या भूतपूर्व देशाला आणि आपल्या सद्य देशालासुद्धा स्वातंत्र्य कसे मिळाले, याबद्दल आमची एक जुनीच - आणि ऑफ्ट-रिपीटेड - थियरी आहे. ती इथे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आपल्या' लोकांना चांगले इंग्रजी येते, हे जे गृहीतक आहे, ते तपासून पाहिले आहेत काय? : १. या मुलांना मुख्यतः नगरपालिकांच्या शाळाच उपलब्ध असतात. तिथल्या इंग्रजी शिक्षकांचा दर्जा तुम्ही पाहिला आहे काय? 'आपल्या ' पैकी जो/जी कोणी इंग्रजी शिकवायला उतरेल ती त्यांच्यापेक्षा कैक पटीने उत्तम असेल: अनेक कारणांमुळे. त्यातले सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे त्याला त्या कामात असलेला रस. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे सुशिक्षित मध्यमवर्गाला नकळत उपलब्ध असणारे प्रचंड रिसोर्सेस : आसपासच्या संभाषिताची (discourse) पातळी, घरातली पुस्तके, टीव्ही, इंटरनेट , वर्तमानपत्रे, ओळखी इत्यादि .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुची, दलितांबद्दल आकस बाळगू नये. आपल्या पुढच्या पिढीकडे "ते आपल्यासारखे चांगले नाहीत्" प्रकारची दृष्टी देऊ नये. एवढं करता आलं तरी खूप झालं. माझ्या आजूबाजूला बघते तेव्हा आढळतं की ते मध्यमवर्गीय नसले तर "गलिच्छ" आणि आपल्यासारखे असले तर "संधीचोर" अश्या प्रकारचा दृष्टीकोन् सर्रास् आढळतो.
मिलिन्द पद्की सांगतायत ते उत्तमय पण् करता येणं प्रत्येकाला जमेलच असं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१००

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या पुढच्या पिढीकडे "ते आपल्यासारखे चांगले नाहीत्" प्रकारची दृष्टी देऊ नये.

यात मुळात 'आपण चांगले आहोत' (व्हॉटेवर 'चांगले' माइट मीन) हे गृहीतक आहे, जे तपासून पाहिले पाहिजे.

अनेकदा हे जे 'आपण' लोक असतो, ते भिकारचोट असतो, अशी शंका आहे. ('तेही भिकारचोट असतो' किंवा 'तितकेच (किंवा त्याहूनही) भिकारचोट असतो' अशा प्रकारची शब्दयोजना जाणूनबुजून टाळली आहे. कारण त्यामागे '"ते" भिकारचोट असतात(च)' असे गृहीतक उभे असते, जे बरोबर असेलच, असे ठरविण्यासाठी माझ्याकडे पुरेसे (किंवा खरे तर काहीच) विदाबिंदू नाहीत.)

परंतु, '"आपण" "चांगले" आहोत (आणि "ते" भिकारचोट आहेत)' हा खयाल दिलाला बहलवण्यासाठी अच्छा असावा. (किंबहुना, असा खयाल हेच मुळात भैकारचोट्याचे लक्षण अथवा द्योतक असावे काय? (चूभूद्याघ्या.))

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मार्मिक देऊन दिल बेहेलला नाही म्हणून आणखी या चार टाळ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

नेमकं. (तिरशिंगरावांच्या प्रतिक्रियेला)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचं अगदी बरोबर असलं तरी:

आंबेडकरांना देवत्व देऊन त्यांची व्यक्तिपूजा करणे हा मार्ग प्रगतीपथावर नेणारा नाही. त्याउलट प्रत्येक दलित व्यक्तीला जर, आपण बाबासाहेबांसारखे झाले पाहिजे, असे मनापासून वाटू लागले आणि त्यासाठी ते कष्ट घेऊ लागले तरच काही फरक पडेल.

ही अपेक्षा साधारणत: नदलितांचीच असते. गंमत म्हणजे आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीला ह्याच लॉजिकने नाक मुरडणारे मात्र गणपतीत नाचणं सोडत नाहीत.
उलट मला वाटतं बाबासाहेबांनी आपले वारस पॉवरफुल केले नाहीत त्यामुळे दलित चळवळ, राजकीय पक्ष यांचे विभाजन होऊन खूप नुकसान झाले आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

Great points! I have seen pictures of people prostrating themselves at the feet of Babasaheb's statue. This is silly. What you need is his hard rational thought.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

औ मिलीन्सायेब,
तुमी वर जे काइ साहेबाच्या भाषेत लिवलय ते आमाला सोप्प्या मर्‍हाटीत सांगा ना. आमा अडान्यांना त्ये समजाया लई जड जातया. तुमी ढीगभार मर्‍हाटी गान्यांच्या जिलब्या पाडत असता न्हवं म आताच तुमची मर्‍हाटी कुटं ग्येली मरायला?

आणि Yep! हे अक्करमासं विंग्लिश तुमी कुटून शिकला व्हं?!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी3
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

माहितीपर उत्तम लेख.

शत्रुचा शत्रू मित्र असतो या न्यायाने लढायांमध्ये बाजू घेतल्या जातात आणि यावेळी संख्याबळाने आणि मानसिक पडझड होत राहाते. शिख आणि नेपाळी बटालिअन ब्रिटिशांनी केल्या होत्याच. ब्रिटिश लोक ,सैन्याधिकारी नेहमीच सूक्ष्म अभ्यास करत असत. कोणाला कोणत्यावेळी साथ द्यायची ते ठरवत असत.
दलितांचे उत्थान करण्यास कारणीभूत झालेल्या ब्रिटिशांना स्वराज्यसमयी विरोध करायचा का नाही या विचाराने दलीत नेते बरेच अडचणीत आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The 1857 Mutiny was broken up by Sikh soldiers(There weren't enough British soldiers). The shooters at Jalianwala baug massacre were Gurkhas (who are routinely recruited by the British army even today!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीच्या माध्यमातून बरीच माहीती कळते.
भारतापुढील समस्या विषण्ण करतात - जातींमधील तेढ, स्त्रियां वरील लैंगिक अत्याचार.
.
लेख फारच माहीतीपूर्ण आहे.
एखाद्याचे दु:ख कळण्यासाठी "जावे त्याच्या वंशा" हेच खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच छान लेख!

अवधूत डोंगरे आहेत ना ऐसीवर? त्यांच्याच नावाने प्रसिद्ध करता आला असता. >> खालील प्रतिसाद वाचून अपडेट: ओके मीच गोंधळलेले.... मुळ लेख श्रद्धाचाच आहे इंग्रजीमधून. आणि त्याचा मराठी अनुवाद अवधूतने केला आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटतं मूळ लेख अन्य कोणाचा आहे, अनुवाद डोंगरे यांचा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात संशोधन आणि मांडणीचं काम श्रद्धा कुंभोजकर यांनीच केलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या लेखाच्य लिन्क्स व्हॉॲ व फेबुवरही बघितल्या होत्या. इथे थेट लेखच आल्याने नीट वाचता आला. खूप माहिती यातली चांगली आहे आणि एक विश्लेषण म्हणून उत्तम आहे. अनेक ठिकाणी दोन्ही बाजूंनी विचार केलेला जाणवतो.

पण तरीही संशोधनात्मक लेख म्हणून खूप त्रुटी दिसल्या. अनेक निरीक्शणे ॲनेक्डोटल आहेत. पेशव्यांच्या १०० वर्षांच्या व मराठेशाही चा प्रचंड विस्तार करणाऱ्या राजवटीची "पश्चिम भारतातील ब्राह्मण सत्ताधीश पेशवे हे त्यांच्या उच्चजातीय सनातनीपणासाठी आणि अस्पृश्यांच्या छळवणुकीसाठी कुख्यात होते." अशा वाक्यात ओळख व बोळवण केली आहे हे आवडले नाही. विशेषत: इतर कोणत्याही राजवटीचा जातीवाचक उल्लेख टाळला जात असताना पेशव्यांचा तसा उल्लेख खटकतो.

दुसरे म्हणजे तत्कालीन जातीयवादामुळे अस्पृश्य इस्ट इंडिया कंपनीकडे गेले यातही इतर माहिती बघता तथ्य नाही. अनेक जातींचे लोक कोणत्याही राजवटीच्या बाजूने तेव्हा लढत - तेव्हा त्याला ही आपली आणि ती परकी राजवट वगैरे कंगोरे नसावेत. त्यामुळे त्यांच्या देशभक्तीबद्दल शंका घेणे जितके चुकीचे आहे तितकेच याला काहीतरी विस्तृत जातीयवाद विरोधी लढ्याचा भाग वगैरे दाखवणे ही तितकेच चुकीचे आहे.

एकूण त्या लढ्यात या रेजिमेण्ट कडून लढलेल्या लोकांनी प्रचंड पराक्रम गाजवला हे निश्चित. त्यातले काही लोक तत्कालीन समाजाने दिलेल्या वागणुकीबद्दल त्वेषाने लढले असतील हे ही खरे, पण यापेक्शा त्या लढाईला इतर संदर्भ नसण्याचीच शक्यता आहे.

बाय द वे, इतक्या अभ्यासपूर्ण लेखात सॉफ्टवेअर कुलीज सारखे खवचट उल्लेख करण्याची आवश्यकता काय होती? बाकी लेखाशी कसलाही संबंध नसताना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ लेखात काही तळटीपा आणि संदर्भ आहेत. त्याची PDF मिळण्याची वाट पाहात, मी ते हातानं टंकत बसलेले नाही.

इतर कोणत्याही राजवटी आणि त्यांच्या जातींचा इथे उल्लेख असण्याची आवश्यकता या लेखात दिसत नाही. पेशवे ब्राह्मण होते; लढाई पेशवे-ब्रिटिश अशी झाली. त्यापुढे उदाहरणार्थ, मुक्ता साळवेचा निबंध हा पुरावा सांगोवांगीचा का वाटला?

पेशवे मला मेलेली ढोरं खायला लावणार आणि इंग्रज रोख पगार देणार; अशा परिस्थितीत मी रोख पगार देणाऱ्या इंग्रजांकडे चाकरी करेन. त्यात मुळात प्रश्न अस्तित्वाचा आणि आत्मसन्मानाचा असतो. त्यातून जातीयतेविरुद्ध व्यापल लढा झाला तर झालाच. तेव्हा लढलेले महार जातीयतेविरोधात लढले, असा दावा लेखात केल्याचं मला तरी दिसलं नाही.

कंप्यूटर कूलीज हा उल्लेख त्या कामात फार काही थोरवी नाही, पण तरीही ही कामं करणारी माणसं ‘ते लोक आज कोरेगावच्या त्यांच्या ठिकाणावर झुंडीने जमतील’ यांसारखे उद्गार काढणाऱ्यांतली असतात; किंवा पेशवाईबद्दल अस्मिता बाळगणारी असतात; किंवा चित्तपावन कट्ट्यावर जमणाऱ्यांतली असतात. थोडक्यात आपण काही थोरवी गाजवलेली नसताना इतरांना फक्त जातीच्या आधारावर कमी लेखणं, या प्रवृत्तीकडे निर्देश जाणवतो.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बाय द वे, इतक्या अभ्यासपूर्ण लेखात सॉफ्टवेअर कुलीज सारखे खवचट उल्लेख करण्याची आवश्यकता काय होती? बाकी लेखाशी कसलाही संबंध नसताना?

हा हा हा. +१ Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ब्रिटिशांसाठी पेशवे हे पेशवे नव्हतेच. द लास्ट मराठा फाइटिंग पावर इन डेक्कन. बय्राच इतर राजांना त्यांची पुढे मुत्सद्दीपणे कब्जात घेतले. जिथे हे जमले नाही तिथे लढाया केल्या. उदाहरणार्थ टिपूच्या फ्रेंचशिक्षित सैन्याविरुद्ध निजामाचे सहाय्य घेतले.

सैन्य हे पोटावर चालते तसेच त्वेषावरही मुसंडी मारते हे प्रत्येक सेनानी ओळखून असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोर्चात झेंडे घेतलेले बरेच गट असतात त्यातल्या कुणाला पुढे करायचे ते नेतेमंडळी ओळखून असतात. घटनांचा उपयोग करून त्या तुमच्या गटासाठी,समुहासाठी, शहर,जिल्हा,राज्य,देश वगैरेसाठी महत्त्वाच्या आहेत याचे भांडवल करायचे असते. पण या साखळीत उत्तरोत्तर एकेक गळतात आणि जनतेच्या अथवा मतदाराच्या गळी उतरवणे कठीण होत जातं. असं नसतं तर हे सर्व फेसबुकीअस्मितापोस्टी इतक्याच महत्त्वाचे राहिले असते. लाइक्स मिळवण्यापुरता कुलिज उल्लेख आहे.

आज आमच्या भारीभारी क्यामय्रांनी काढलेले फोटो फेसबुकीफुकटमाध्यमातून जगाला दाखवता येत नसते तर क्याम्रे माळ्यावर पडले असते

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबासाहेबांच्या "नव्या परंपरा" तयार करण्याविषयी काय धारणा होत्या हे अजून विस्ताराने यायला हवं होतं.
धर्मग्रंथांचा, कायद्याचा आणि अर्थकारणाचा खोलवर अभ्यास असणारे बाबासाहेब नव्या परंपरा तयार करण्यात कमी पडले असं आहे का? की तेवढं आयुष्य किंवा तेवढी उसंत त्यांना लाभली नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

कमेंटरीच्या भरात तारतम्य सोडल्याचे दिसते काही ठिकाणी..बाकी उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाराष्ट्रामध्ये १९७०च्या दशकात अनेक लोकप्रिय ऐतिहासिक (खरेतर, अनैतिहासिक) कादंबऱ्या मोठ्या प्रमाणात खपण्याची लाट उसळली होती. मराठी भाषक मध्यमवर्गीयांच्या इतिहासविषयक आकलनावर यातील अनेक कादंबऱ्यांचा प्रभाव अजूनही आहे. यातील दोन महत्त्वाच्या कादंबऱ्यांमध्ये कोरेगावच्या लढाईचे ओझरते वर्णन आहे. या दोन्ही कादंबऱ्यांचे लेखक ब्राह्मण आहेत. यातील ‘मंत्रावेगळा’ ही ना. सं. इनामदारलिखित कादंबरी शेवटच्या पेशव्याच्या जीवनावर आधारीत आहे. कोरेगावची लढाई पेशव्यांनी जिंकली होती, असा दावा या कादंबरीत आहे .

दुसरी कादंबरी कोणती?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

स्वामी असेल पण देसाई ब्राह्मण होते की नाही ते ठाऊक नाही.

म म व चे इतिहासाचे आकलन या कादंबऱ्यांपुरते असते यावर सहमती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

स्वामी कादंब्री थोरल्या माधवरावासंबंधी आहे सबब १७७२ साली संपते. कोरेगावचा संबंधच नाही.

बाकी, रणजित देसाई मराठा होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाकी, रणजित देसाई मराठा होते.

साशंक आहे.

बोले तो, 'देसाई' हा मुळात (वतनदारी? चूभूद्याघ्या.) मुद्दा असल्याकारणाने जातिनिरपेक्ष असावा / अनेक जातींत हे आडनाव सापडणे अशक्य नसावे. (जसे, 'देशमुख' (देशस्थ/सीकेपी/मराठा) किंवा 'देशपांडे' (देशस्थ/सारस्वत/सीकेपी).) तदुपरि, 'देसाई' या आडनावाची महाराष्ट्र/गुजरात/गोवा/कारवार भागांतील विविध ब्राह्मणज्ञातींखेरीज अन्य जातींतील केस आजवर निदान ऐकली तरी नव्हती.

अर्थात, माझी समजूत चुकीची असू शकेल.

रणजित देसाई मराठा असल्याबद्दल आपणांस खात्रीलायक माहिती आहे काय? काही दाखला वगैरे? असल्यास आय वुड स्टँड करेक्टेड. (रणजित देसाईंच्या जातीबद्दल असे नव्हे - कारण, फ्रँकली, दॅट इज़ इर्रेलेव्हंट अँड इम्मटीरियल - परंतु 'देसाई' या आडनावाच्या जातिनिहाय डिस्ट्रिब्यूशनबद्दल. एक विदाबिंदू म्हणून.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देसाई आडनावाबद्दलची जनरल माहिती बरोबर आहे, परंतु वैयक्तिक ओळखीत एक ब्राह्मण, एक मुसलमान देसाई आहे. शिवाय कर्णोपकर्णी ऐकून एक मराठा देसाईही माहिती आहेत. पैकी मराठा देसाई कोल्हापूर जिल्ह्यातले. रणजित देसाईही कोवाडचे. कोवाड गाव कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातले. तस्मात ते मराठा असण्याची शक्यता जास्त.

हा काही निर्णायक पुरावा नव्हे हेही मान्य. पण समहाऊ असेच ऐकल्याचे आठवते. एकूणच दक्षिण महाराष्ट्रात मराठा देसाई सापडतात हे नमूद करून ठेवतो.

केस इन पॉईंट.

https://en.wikipedia.org/wiki/Balasaheb_Desai

हे मराठा होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

देसाई हे कुडाळदेशकर सारस्वत (गौड ब्राह्मण) सुद्धा असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

देसाई हे कुडाळदेशकर सारस्वत (गौड ब्राह्मण) सुद्धा असतात.

यू सेड इट.

(बाकी, 'देसाई' (किंवा 'देसाय') हे आडनाव सारस्वतांत खूप कॉमन आहे याची कल्पना आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वैयक्तिक ओळखीत एक ब्राह्मण, एक मुसलमान देसाई आहे.

रोचक विदाबिंदू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रणजित देसाई मराठाच होते. वतनदार खानदानी मराठा होते. माधवी र. देसाई (रणजित देसाई यांची पत्नी) यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रात बरीच माहिती आहे.
देसाई आडनाव गुजरात्यांत फक्त ब्राह्मणांत- अनाविल ब्राह्मणांत- असते.(मोररजीभाई, नारायणभाई इ.) हे लोक पूर्वी आपले आडनाव 'देशाई' असे लिहीत. आता उच्चारानुसारी 'देसाई' असेच लिहिले जाते. 'इ' पहिला की दुसरा याबद्दल खात्री नाही.
महाराष्ट्रात 'सरदेसाई' हे (कऱ्हाडे?) ब्राह्मणांत असतातच. शिवाय सारस्वतांतही असतात. देसाई मात्र अनेक जातीत आढळतात. नीला देसाई(नीलम प्रभु), लालजी देसाई, बाळासाहेब देसाई, टोपीवाले देसाई, वसंत देसाई वगैरे.
महिकावती बखरीत 'देसला' असा शब्द 'अमुक एका प्रांताचा मुख्य अधिकारी' या अर्थाने येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आय स्टँड करेक्टेड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देसले असे आडनाववालेही ऐकून माहितीयेत त्यांचे मूळ बहुधा यात असावे....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विषय निघालाच आहे म्हणून विचारतो...सिॲटल-टाकोमा परिसरात ताजे बोंबिल कुठे मिळतील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

Liberalism is a mental disorder

धाग्याशी इतका सुसंगत प्रश्न वाचल्याने उत्तर देणे कर्तव्य समजतो .
असं करा ,सीआटल वरून लोणावळा लोकल पकडून पोर्टलंड ला जा. तिथून थेट शेअर रिक्षा करून मल्टनोमा फॉल्स ला उतरा ( साडे सदतीस रुपये होतील ) तिथे सुपेकरांनी स्टॉल लावलाय . बोंबील बरोबर तिसऱ्या पण मिळतो . सोडे घेऊ नका , शिळे विकतात .
अशा धाग्यांवर असेच रोचक प्रश्न विचारत चला . त्या निमित्ताने लोकं धागे वाचतील .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो पण कुठल्या सुपेकरांचा? ब्राह्मण, गुजराती की कुडाळ देशकर गौड सारस्वत मराठा? ते सांगितल्याशिवाय तुमचे उत्तर धाग्याशी पुरेसे सुसंगत म्हणता येणार नाही, सॉरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Liberalism is a mental disorder

आणि पोर्टल्यांड स्टेशनावरच्या हमालांना हमाल म्हटलेलं आवडत नाही, 'लगेज प्रोग्रामर' म्हणावं लागतं, यावर एक सुपर-सुसंगत फोर्क सुद्धा काढून पायजेलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Liberalism is a mental disorder

कॅथलिक ब्राह्मण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोणावळा लोकल अत्यंत बेभरवशाची आहे. शिवाय रविवारी, मंगळवारी आणि शनिवारी पोर्टलंडला (साखळी ओढल्याशिवाय) थांबत नाही.

त्यापेक्षा सीआटल मनपाच्या थांब्यावरून पीएमटीची १२३ नंबरची किंवा पीसीएमटीची ७६ नंबरची बस पकडा आणि सरळ मल्टनोमा फॉल्सच्या थांब्यावर उतरा. रस्ता क्रॉस केल्यावर सुपेकराचा स्टॉल आहे. पीएमटीने दहा तर पीसीएमटीने साडेअकरा रुपये भाडे पडते, आणि दोन्हींमध्ये बसायला जागा मुबलक नि आरामात मिळते. पीसीएमटीची जलद सेवा असल्यामुळे थांबे कमी नि भाडे थोडे जास्त आहे, एवढेच; अन्यथा दोन्ही सेवा उत्तम आहेत. त्या लोकलच्या नादी लागू नका. त्या शेअर रिक्षावाल्यांनी आपला धंदा चालावा म्हणून लोकलच्या पर्यायाचा गवगवा करून ठेवलेला आहे, झाले. चोर आहेत लेकाचे! गिऱ्हाइकाला लुबाडतात.

किंवा, लोकल घ्यायचीच असेल, तर सरळ कोळणींच्या डब्यात घुसा, नि तिथल्या कोळणींकडून (जात: कोळी) थेट विकत घ्या. बोंबलांपासून सोड्यांपर्यंत काय वाटेल ते ताजे मिळेल, नि घासाघीस केलीत तर अत्यंत स्वस्तातसुद्धा मिळेल. सुपेकराला विसरा - तो तसाही ओव्हररेटेड नि अत्यंत माजोरी आहे. (त्याची अन्यत्र कोठेही शाखा नाही.) काही जातीयवादी व्हेस्टेड इंटरेस्ट्सनी त्याला लाडावून ठेवलाय. त्यापेक्षा कोळणींकडून थेट विकत घ्या नि छोट्या उद्योजकांना हातभार लावा. इत्यलम्|

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

औटडेटेड झालाय तुम्ही 'न'वी बाजू साहेब !! पीयमटी आणि पीसीयमटी या इतिहास जमा होऊन पीयमपीयमयल*नावाचं त्याहून भिकार प्रकरण निर्माण झालं आहे.

अवांतर: मुंबई महानगर प्रदेशात बेस्ट, टीएमटी, एनएमएमटी, केडीएमटी, एमबीएमटी आणि व्हीव्हीएमटी अशा अनुक्रमे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, मिरा-भाइंदर आणि वसई-विरार महानगरपालिकांच्या स्वतंत्र सेवा आहेत. ठाणे ते बोरिवली (घोडबंदर रोडमार्गे) हा पेईंग रूट असावा त्यामुळे त्या रूटवर केडीएमटी वगळून सर्व जण बस चालवतात. ग्रेटर पुणे महानगराप्रमाणे इथेही सर्व बससेवांचे एकत्रीकरण करावे असा विचार मनात येतो पण पीयमपीयमयलचा रिझल्ट पाहून तो व्यक्त करण्यास मी धजावत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

खोदकाम करून काय सिद्ध करायचे आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे खोदकाम कमी आणि निरनिराळ्या समाजांच्या किंवा जातींमध्ये काय धारणा असतात आणि त्या कशा आल्या असतील, याचा अभ्यास आहे.

प्रत्यक्षात भीमा-कोरेगावची लढाई का लढली गेली, ह्या वर्षी तिथे दंगली का झाल्या, दंगलींमध्ये कोणाची बाजू कमी लंगडी याचा इथे संबंध नाही. मूळ लढाई आणि दंगली या दोन घटनांच्या मध्ये काय घडलं, याचा हा अभ्यास आहे. त्यातून कदाचित दंगली का घडल्या हे समजायला आणि त्यातून कदाचित त्या टाळायच्या कशा हे समजेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छान लेख आहे. दुसरी कादंबरी झेप असावी. त्रिंबकजी डेंगळ्यांवरची.

पेशव्यांच्या सत्तेचा ब्राम्हणी असा उल्लेख करायचे कारण कदाचित त्यावेळी भारतात असणार्^या नॉन-मुस्लीम सत्ताधीशांमध्ये धार्मिक आणि राजकीय अश्या दोन्ही प्रकारचे अधिकार असणारे फक्त पेशवेच असावेत. (अधिकृत सत्ताधारी छत्रपती असले तरी). त्यामुळे धार्मिक बाबींमध्ये आपले राजकीय वजन वापरून त्यांनी निर्णय लादले असण्याची शक्यता वाटते. आणि ते अन्यजातीयांना अन्यायकारक असल्याचे/वाटल्याचे ही संभवनीय आहे.
अर्थात हे माझं आकलन आहे. ( आणि मी ही म म व आहे. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१)पेशव्यांनी १७५६मध्ये कुंभमेळ्यातल्या मारामारी नंतर निर्णय दिलेला कोणी कुठे स्नान करायचे ते.
परंतू इतर राज्यकरत्यांनीही धार्मिक निर्णय केले आहेत. २) झफरखान शेवटचा मोगल यानेही १८५७ उठावाच्यावेळी इदच्या गोहत्येवर बंदी आणली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0