Skip to main content

संपादक ही संस्था कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे का?

मागे आदूबाळ यांच्याशी झालेल्या काहीश्या त्रोटक चर्चेनंतर हा विषय डोक्यात राहून गेला होता. त्याबद्दल चर्चाप्रस्ताव मांडते आहे.

***

माध्यमं बदलताहेत. छापील माध्यमांखेरीज आणि टीव्ही-सिनेमाखेरीज इतर अनेक माध्यमं आंतरजालामुळे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेली आहेत. ब्लॉग्स आहेत. रीजनल फोरम्स आहेत. फेसबुकासारखी सर्वव्यापी फोरम्स आहेत. ई-बुक्स फुकट काढून देणार्‍या संस्था आहेत. दृश्य, ध्वनी आणि शब्द या तिन्ही माध्यमांतून जालावर व्यक्त होण्यावर संपादकांचा अंकुश / आडकाठी नाही. अभिव्यक्तीला कागदोपत्री तरी बरंच स्वातंत्र्य आहे. एके काळी संपादक या संस्थेचं छापील माध्यमांवर असलेलं वर्चस्व संपलेलं नाही. (वर्तमानपत्रांच्या संपादकांबद्दल आणि त्यांच्या व्यवस्थापनाशी असलेल्या संबंधांबद्दल बोलत नाहीय. तो पूर्णपणे निराळा विषय आहे.) पण संपादक काहीसे बाजूला मात्र सारले गेले आहेत. जालीय माध्यमांमधले संपादक हे संपादक कमी आणि व्यवस्थापक जास्त आहेत.

हे कितपत स्वागतार्ह आहे? मी संभ्रमात आहे.

अक्षरजुळणी + मुद्रितशोधन + पृष्ठमांडणी या गोष्टी करायला लेखक सक्षम असतोच असं नव्हे. पण या गोष्टी करून देणारे सेवादाते आजही बाजारात उपलब्ध आहेत. ते संपादकांशी वा प्रकाशकांशी संलग्न असलेच पाहिजेच अशी परिस्थिती नाही. पण लेखनाला काळाच्या चौकटीत डोळसपणे पाहू शकेल, त्या लेखनाची परंपरेतल्या लेखनाशी तुलना करू शकेल, जगभरच्या लेखनाच्या तुलनेत ते तपासू शकेल, लेखकाच्या आधीच्या लेखनाच्या पार्श्वभूमीवर त्या लेखनातल्या गुणदोषांकडे, वैशिष्ट्यांकडे आणि न वापरलेल्या क्षमतांकडे लक्ष वेधू शकेल - असं संपादकाशिवाय दुसरं कोण असतं? ही संस्था अजून कालबाह्य झालेली नाही. पण होण्याच्या मार्गावर मात्र दिसते आहे.

याचे लेखनावर काही बरेवाईट परिणाम होताहेत / होतील का? की संपादक आणि त्यायोगे प्रकाशक या संस्थेची मातब्बरी / मक्तेदारी संपवणं हे स्वागतार्हच आहे? या परिस्थितीवर उपाय करायला हवा असेलच, तर जालीय माध्यमं तो कसा करू शकतील?

तुमचं काय मत?

गवि Wed, 12/08/2015 - 13:21

संपादक अ‍ॅज सच पूर्ण कालबाह्य व्हायला वेळ लागेल, पण संपादक + प्रकाशक या हुद्द्याला लागलेलं सोनं, ऊर्फ त्यांचा दबदबा नक्की कमी होईल.

कागदावरची छपाई हीच येत्या काही काळात.. दहाएक वर्षांत प्रॅक्टिकली ऑब्सोलीट होईल ही फोटोशॉपमधली काळी रेघ आहे.

मेघना भुस्कुटे Wed, 12/08/2015 - 13:24

In reply to by गवि

दबदबा कमी होणं स्वागतार्हच आहे. कागदावरच्या छपाईला तसंही काही सोनं लागलेलं नाही.

पण माझा प्रश्न थोडा निराळाही आहे. संपादक हा लेखनाच्या सर्जनप्रक्रियेतला महत्त्वाचा घटक असतो असं मी मानते. तो नाहीसा होणं कितपत बरं आहे?

गवि Wed, 12/08/2015 - 13:50

In reply to by मेघना भुस्कुटे

पूर्वी प्रवासी विमानांमधे पायलट, कोपायलट, नॅव्हिगेटर आणि फ्लाईट इंजिनियर असे चारजण असायचे.

विमानाच्या प्रत्येक नव्या जनरेशनसोबत क्रू मेंबर कमी होऊन फक्त पायलट आणि तो कोलॅप्स झाल्यास बॅकअप म्हणून, शिवाय प्रोसेसचं विस्मरण टाळण्यासाठी मेकर चेकर अरेंजमेंट म्हणून कोपायलट एवढे दोघे शिल्लक उरलेत.

सोफिस्टिकेटेड नॅव्हिगेशनल उपकरणं आणि संगणकीकृत रिडन्डंट फ्लाईट सिस्टीम्स असल्यावर नॅव्हिगेटर आणि फ्लाईट इंजिनियर यांची प्रवासात सोबत असण्याची गरज संपली.

ऑटोपायलटमुळे तर पायलटच्या सततच्या कौशल्याची गरजही संक्षिप्तात आली आहे पण टेकऑफ, लँडिंग आणि इमर्जन्सीमधे मनुष्याचा मेंदू उपलब्ध असावा म्हणून ते शिल्लक आहेत.

लेखकाला उगाच "तुमच्या लेखनाला खोली आहे पण टोक नाही" किंवा "अमका पार्ट रि-राईट करा" किंवा "अमुक पानांत बसवा" असे सल्ले देणार्‍या अडत्यांपेक्षा लेखकानेच थेट प्रकाशित करुन वाचकाकडून तातडीने प्रतिसाद मिळून त्यानुसार स्वतःची हवी असल्यास वाढ करावी हे मॉडेल डेव्हलप झालं तर उत्तमच. आणि ते होणारच. आपण थांबवू शकतच नाही.

लेखकही पुढे कधीकाळी ऑब्सोलीट झाले तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. ए.आय. वगैरे बद्दल कोणाचं मत काही असेल पण लिखाण करण्यातही ऑटोमेशन येणं फार अशक्य नाही.

माहितगारमराठी Wed, 12/08/2015 - 19:41

In reply to by बॅटमॅन

माणूस किमान वाचक म्हणून तरी शिल्लक राहिल का ? कि भविष्य बाय कॉप्म्प्युटर्स फॉर कॉम्प्युटर्स असेल?

अतिशहाणा Wed, 12/08/2015 - 18:48

In reply to by गवि

लेखकही पुढे कधीकाळी ऑब्सोलीट झाले तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. ए.आय. वगैरे बद्दल कोणाचं मत काही असेल पण लिखाण करण्यातही ऑटोमेशन येणं फार अशक्य नाही.

सहमत. पुस्तकांची दुकान बंद पडायला सुरुवात होऊन आता किमान दोन वर्षं झाली. प्रकाशक आता जवळपास अनावश्यक झालेच आहेत. लेखक-समीक्षक ऑब्सोलीट होणार यात काहीच शंका नाही.

चिंतातुर जंतू Wed, 12/08/2015 - 18:54

In reply to by अतिशहाणा

>> पुस्तकांची दुकान बंद पडायला सुरुवात होऊन आता किमान दोन वर्षं झाली. प्रकाशक आता जवळपास अनावश्यक झालेच आहेत. लेखक-समीक्षक ऑब्सोलीट होणार यात काहीच शंका नाही.

अॉटोमेशनचा मुद्दा बाजूला ठेवू. इ-पुस्तकांमुळे जर दुकानं बंद होत असतील, किंवा पुस्तक व्यवसायात होणाऱ्या कन्सॉलिडेशनमुळे जर दुकानं बंद होत असतील, तर त्यावरून लेखक ऑब्सोलीट होणार हा निष्कर्ष कसा निघेल?

अतिशहाणा Wed, 12/08/2015 - 19:08

In reply to by चिंतातुर जंतू

बहुदा माझ्या वाक्यरचनेमुळे कार्यकारणभावाचा घोळ झाला आहे. ऑटोमेशनमुळं एक गोष्ट झाली आहे (दुकानं बंद), एक गोष्ट होते आहे (प्रकाशक/ कागदी पुस्तकं अनावश्यक), एक गोष्ट होईल (लेखक-समीक्षक अनावश्यक)

उदय. Wed, 12/08/2015 - 21:27

In reply to by गवि

असे सल्ले देणार्‍या अडत्यांपेक्षा लेखकानेच थेट प्रकाशित करुन वाचकाकडून तातडीने प्रतिसाद मिळून त्यानुसार स्वतःची हवी असल्यास वाढ करावी हे मॉडेल डेव्हलप झालं तर उत्तमच. आणि ते होणारच. आपण थांबवू शकतच नाही.

सहमत.

घाटावरचे भट Wed, 12/08/2015 - 13:25

लेखनाला काळाच्या चौकटीत डोळसपणे पाहू शकेल, त्या लेखनाची परंपरेतल्या लेखनाशी तुलना करू शकेल, जगभरच्या लेखनाच्या तुलनेत ते तपासू शकेल, लेखकाच्या आधीच्या लेखनाच्या पार्श्वभूमीवर त्या लेखनातल्या गुणदोषांकडे, वैशिष्ट्यांकडे आणि न वापरलेल्या क्षमतांकडे लक्ष वेधू शकेल - असं संपादकाशिवाय दुसरं कोण असतं?

आपल्याकडील साहित्यात (निदान मराठीत तरी) तुम्ही म्हणताय एवढी चौफेर दृष्टी असलेले संपादक सध्या आहेत काय? मराठीतील प्रकाशकांकडची सध्या परिस्थिती काय आहे?

बादवे या धाग्यावरून 'यू'व्ह गॉट मेल' सिनेमातील टॉम हँक्सची गर्लफ्रेंड (जी पब्लिशर असते) त्याला लहान मुलांच्या पुस्तकांचे दुकान चालवणार्‍या मेग रायनबद्दल (जिचे दुकान टॉम हॅंक्सने बंद पाडलेले असते) सांगत असते तो प्रसंग आठवला (त्यात ती मेग रायनचे वर्णन थोडेसे वर क्वोट केलेल्यासारखे आणि इतर काही असे करते).

मेघना भुस्कुटे Wed, 12/08/2015 - 13:49

In reply to by घाटावरचे भट

माझ्या माहितीत अशी संपादकीय दृष्टी असलेले लोक आहेत. प्रकाशकांकडे आहेत की नाही त्याची कल्पना नाही. ;-)
गंमत अलाहिदा, राम पटवर्धन यांचं नाव या बाबतीत अतिशय आदरानं घेतलं जात असे.

चिंतातुर जंतू Wed, 12/08/2015 - 14:07

Why All Self-Publishers Need a Good Editor

F. Scott Fitzgerald, Ernest Hemingway, आणि Thomas Wolfe ह्या लेखकांचे संपादक Maxwell Perkins ह्यांचा त्यात उल्लेख आहे. अशी अनेक उदाहरणं इतिहासात आहेत. संपादकाची काही कामं -

  • लिहिलेल्या मजकुराची पुनर्रचना करून तो अधिक परिणामकारक करायला लेखकाला उद्युक्त करणं
  • एखादा भाग पुरेसा परिणामकारक झाला नसला तर त्याचं पुनर्लेखन करायला सुचवणं
  • एखादं पात्र कथानकाला फार उपयुक्त ठरत नसलं तर ते काढून टाकण्यासारख्या सूचना करणं
  • एखादं पात्र पुरेसं फुललेलं नसलं तर ते फुलवायला उद्युक्त करणं
  • लिखाणाच्या शैलीत सुसूत्रता आणणं
  • पात्रांच्या पार्श्वभूमीनुसार संवादांच्या भाषेत सुसंगती घडवणं आणि त्यासाठी शैलीत बदल करवून घेणं
  • पुस्तकाला सुयोग्य शीर्षक सुचवणं

वगैरे.

अशी अनेक कामं चांगला संपादक करतो. लेखकाला स्वतःचं लिखाण अपत्याप्रमाणे प्रिय असतं असा साधारण अनुभव असतो. त्या प्रेमापोटी त्याच्या दृष्टीत जे दोष येतात ते दाखवून देण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी अशा संपादकाची आवश्यकता असते. हे मला अनेक थोरामोठ्यांच्या बाबतीतही खरं असलेलं दिसतं. त्यामुळे काही सन्माननीय (जिनियस लेखकांचे) अपवाद सोडता संपादकाला पर्याय नाही असं माझं मत झालं आहे.

घाटावरचे भट Wed, 12/08/2015 - 14:59

In reply to by मेघना भुस्कुटे

खरेच एवढे भारी असलेले संपादक लेखकांना नवनवीन कल्पनांवर काम करण्यास उद्युक्तही करत असतील ना? म्हणजे वैचारिक आदानप्रदानातून नवीन पुस्तकाच्या संकल्पनेचा जन्म आणि मग संपादकाने लेखकाला त्यावर काम करण्यास भरीला घालणे वगैरे? अशी कुठली उदाहरणे आहेत काय?

चिंतातुर जंतू Wed, 12/08/2015 - 15:11

In reply to by घाटावरचे भट

>> खरेच एवढे भारी असलेले संपादक लेखकांना नवनवीन कल्पनांवर काम करण्यास उद्युक्तही करत असतील ना? म्हणजे वैचारिक आदानप्रदानातून नवीन पुस्तकाच्या संकल्पनेचा जन्म आणि मग संपादकाने लेखकाला त्यावर काम करण्यास भरीला घालणे वगैरे? अशी कुठली उदाहरणे आहेत काय?

भालचंद्र नेमाड्यांचा लेखक म्हणून जन्मच असा झाला. प्रकाशक देशमुख पतीपत्नींकडे नेमाडे आणि अशोक शहाणे ह्या विद्यार्थीदशेतल्या मित्रद्वयीचं नियमित येणंजाणं असे. पुण्यातले लोक, प्राध्यापक वगैरेंविषयी जहाल विनोदी शेरेबाजी करण्यात नेमाडे-शहाणे द्वयी रमत असत. त्यांच्यात साहित्यिक चर्चाही घडत असत. सध्याचं मराठी साहित्य आणि सगळ्या साहित्यिकांचं अनुभवविश्व किती थिटं आहे असं नेमाडे-शहाणे म्हणत असत आणि देशमुखांशी वाद घालत असत. त्यावर 'एवढं असेल तर तुम्ही लिहून दाखवा एखादी कादंबरी' असं आव्हान प्रकाशकांनी ह्या तरुणांना केलं. त्यावर तिरीमिरीत येऊन नेमाड्यांनी कोसला लिहिली. ते एकटाकी लिहीत जात, मग शहाणे आणि देशमुख लिहिलेलं वाचत जात आणि त्याविषयी सूचना करत जात. (काही भाग शहाण्यांनी लिहिलेला आहे असंही मानलं जातं.)

नंदन Thu, 13/08/2015 - 12:54

In reply to by चिंतातुर जंतू

प्रकाशक देशमुख पतीपत्नींकडे नेमाडे आणि अशोक शहाणे ह्या विद्यार्थीदशेतल्या मित्रद्वयीचं नियमित येणंजाणं असे. पुण्यातले लोक, प्राध्यापक वगैरेंविषयी जहाल विनोदी शेरेबाजी करण्यात नेमाडे-शहाणे द्वयी रमत असत. त्यांच्यात साहित्यिक चर्चाही घडत असत. सध्याचं मराठी साहित्य आणि सगळ्या साहित्यिकांचं अनुभवविश्व किती थिटं आहे असं नेमाडे-शहाणे म्हणत असत आणि देशमुखांशी वाद घालत असत. त्यावर 'एवढं असेल तर तुम्ही लिहून दाखवा एखादी कादंबरी' असं आव्हान प्रकाशकांनी ह्या तरुणांना केलं. त्यावर तिरीमिरीत येऊन नेमाड्यांनी कोसला लिहिली.

+१
'हूल'मध्ये नेमाड्यांनी याचं साद्यंत वर्णन केलं आहे. पुलंनी रेखाटलेल्या रा.ज.देशमुख-सुलोचनाबाईंच्या 'परखड पण प्रेमळ' या चित्रणापलीकडे जाऊन अर्थात.

गवि Wed, 12/08/2015 - 15:30

लेखनाचं थोडं कटिंग / अ‍ॅडिशन/ पुनर्लेखन करुन त्याला जास्त आकर्षक बनवता येतं हे मान्य. पण ते काम पुनर्वाचन करुन लेखकानेच करावं की तिसर्‍या व्यक्तीची मदत त्यात घ्यावी याविषयी लेखन करणार्‍यांचं काय मत आहे? इतर कोणी ऑब्जेक्टिव्ह सूचना करणं हे काहीजणांना रास्त वाटतं तर काहीजणांना उत्स्फूर्तता मारणारं. कोणतं मत योग्य मानायचं ?

काही क्षेत्रांमधे (संशोधन, मेडिसिन-सर्जरी इ) यात सब्जेक्टिव्हिटी टाळण्यासाठी आवर्जून इतर त्रयस्थांकडून रिव्ह्यू करुन घेणं आणि बदलणं योग्य ठरतं पण क्रिएटिव्ह (लिखाण , चित्रकला, काव्य) यात तसं योग्य वाटतं का?

मत एक लेखन करणारी व्यक्ती म्हणून द्यावं.. सम्यक ग्लोबल पॉईंट ऑफ व्ह्यूमधून नको.

मेघना भुस्कुटे Wed, 12/08/2015 - 15:33

In reply to by गवि

मला संपादकाची मदत मोलाची वाटते. त्याच्या सूचना / सुचवण्या स्वीकारायच्या की नाही, याचा अंतिम निर्णय माझाच असतो. पण अनेकदा आधी लक्षात न आलेल्या गोष्टी संपादकांमुळे लक्षात येतात असा अनुभव.

मेघना भुस्कुटे Thu, 13/08/2015 - 13:12

In reply to by चिंतातुर जंतू

'शहाणा माळी वेळ येण्याआधी झाडाला फळ येऊ देत नाही' या मुंबई दूरदर्शनकालीन कुटुंबनियोजनप्रसारक जाहिरातीची आठवण झाली. :ड

पिवळा डांबिस Thu, 13/08/2015 - 00:27

In reply to by गवि

काही क्षेत्रांमधे (संशोधन, मेडिसिन-सर्जरी इ) यात सब्जेक्टिव्हिटी टाळण्यासाठी आवर्जून इतर त्रयस्थांकडून रिव्ह्यू करुन घेणं आणि बदलणं योग्य ठरतं पण क्रिएटिव्ह (लिखाण , चित्रकला, काव्य) यात तसं योग्य वाटतं का?
मत एक लेखन करणारी व्यक्ती म्हणून द्यावं..

वैचारिक आणि ललित या दोन्ही प्रकारचं लेखन प्रकाशित केलेली व्यक्ती म्हणून माझे विनयपूर्वक दोन पैसे.
वैचारिक लेखनाला माझ्या मते पिअर रिव्ह्यू आवश्यक आहे. कारण तिथे शुद्ध ज्ञान/विचार/ माहिती वाचकांसमोर मांडायची असते. तेंव्हा चार समज्ञानी लोकांच्या डोळ्याखालून घालून लिखाणात जर काही न्यून/ हीण असेल तर ते प्रकाशित करण्यापूर्वी काढून टाकणं हे उचित असतं. तिथे सहमत.
माझ्या ललित लेखनाला मात्र मी कुणाकडून रिव्ह्यू करून घेणं गरजेचं समजत नाही. मला जे काही रुचेल ते मी लिहितो आणि त्याचं मूल्यमापन करायचं काम थेट वाचकांवर सोपवतो.
त्याचबरोबर मी लिहिलेलं एखादं लिखाण खुद्द माझ्याच पसंतीला येईपर्यंत मी सहसा प्रकाशित करत नाही. माझ्या लॅपटॉपवरचे अनेक लिखाणांचे अपूर्ण/पूर्ण अवस्थेत पडलेले अवशेष याला साक्ष आहेत! :)
मी वेळोवेळी आणि विविध ठिकाणी प्रकाशित केलेलं लिखाण तिथल्या कुठल्याही मॉडरेटर्स/संपादकांनी (एक अपवाद वगळता, ती एक निराळीच ष्टोरी आहे!) संपादित न करता तसंच्या तसं प्रकाशित होऊ दिलेलं आहे.
सारांश, माझी ललित लेखनाच्या बाबतीतली भूमिका अशी की,
वाचकांनी माझ्या लिखाणाला जोड्याने मारलं तरी चालेल पण (आचार्य अत्र्यांच्या शब्दात) माझ्या ताजमहालाला कुणा संपादकांच्या विटांची दुरुस्ती नको!
:)

अनु राव Thu, 13/08/2015 - 09:54

In reply to by पिवळा डांबिस

त्याचबरोबर मी लिहिलेलं एखादं लिखाण खुद्द माझ्याच पसंतीला येईपर्यंत मी सहसा प्रकाशित करत नाही. माझ्या लॅपटॉपवरचे अनेक लिखाणांचे अपूर्ण/पूर्ण अवस्थेत पडलेले अवशेष याला साक्ष आहेत!

पिडा - जालावर सर्व लोक तुमचासारखा विचार करणारे असते तर कचरा तयार झाला नसता. संपादक ही पोस्ट कंपलसरी करावी आणि त्या संपादकाला सुद्धा वर्षाचा कीती पाने ( छापलेली किंवा जाल अथवा इबूकमधली ) प्रकाशीत करता येतील ह्याचा कोटा ठरवुन द्यावा असे मनापासुन वाटते.

स्नेहांकिता Wed, 12/08/2015 - 15:54

लेखनाच्या आशयाला धक्का न लावता त्याला शुद्ध/आकर्षक/परिणामकारक बनवणे खरेतर अतिशय कौशल्यपूर्ण काम आहे. पण बदलत्या काळात सगळे काही 'एक्स्प्रेस' झाले असल्याने त्याची कुणाला फारशी गरज राहिलेली नाही. एकूणच क्वालिटी कॉन्शसनेस कमी होत चालला आहे. अभिव्यक्तीच्या गुणवत्ता-सौदर्यापेक्षा किंवा मुद्देसूदपणापेक्षा मॅटर आणि अपील हेच पाहिले जात आहे.
...अशात संपादक ही सुविधा खरोखरच कालबाह्य झाली असे असे म्हणावेसे वाटते.

आदूबाळ Wed, 12/08/2015 - 20:12

मेघना, चर्चाप्रस्तावाबद्दल धन्यवाद! (मैं और मेरा आळशीपणा, अक्सर ये बातें करते हैं... वगैरे)

तर ही चर्चा सुरू झाली, ती "लेखक (प्रोड्युसर) आणि वाचक (कंझ्युमर) ही दोन टोकं जोडणार्‍या मूल्यसाखळीचं बदलत्या टेक्नॉलॉजीमुळे किती सुलभीकरण होऊ शकतं?" यावरून. एजंट, जुळारी, प्रकाशक वगैरे टप्पे घेत हे संपादकापर्यंत आलं.

पण लेखनाला काळाच्या चौकटीत डोळसपणे पाहू शकेल, त्या लेखनाची परंपरेतल्या लेखनाशी तुलना करू शकेल, जगभरच्या लेखनाच्या तुलनेत ते तपासू शकेल, लेखकाच्या आधीच्या लेखनाच्या पार्श्वभूमीवर त्या लेखनातल्या गुणदोषांकडे, वैशिष्ट्यांकडे आणि न वापरलेल्या क्षमतांकडे लक्ष वेधू शकेल - असं संपादकाशिवाय दुसरं कोण असतं?

माझ्यामते हे काम वाचकच करेल. एकप्रकारे संपादनाचं क्राऊडसोर्सिंग. आंजामुळे लेखक आणि वाचकातलं अंतर कमी झालंच आहे. लेखक अक्षरजुळणी + मुद्रितशोधन + पृष्ठमांडणी वगैरे चार पावलं पुढे आला आहे, वाचकही संपादकाची एक पायरी पुढे येईल.

मला व्यक्तिशः आंजावर लिहायला (आणि लिहिलेलं वाचायला) आवडतं ते यामुळेच. माझ्या मआंजावरच्या (फ्यू अँड फार बिटवीन) लेखनावरच्या काही प्रतिक्रिया या संपादकाच्या टेरिटरीमध्ये प्रवेश केलेल्या आहेत. साहजिकच त्यांचं मूल्य मला जास्त वाटतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे भागवत विशेषांकातली फास्टर फेणे फॅनफिक. मी प्रथम लिहिली तेव्हा त्याला एकच शेवट होता. त्यावर मेघना, अमुक आणि माझा ऐसीबाह्य मित्र विनीत यांनी "काय घंटा समजलं नाही..." अशी प्रतिक्रिया दिली, आणि त्या चर्चेतूनच सहा शेवटांची कल्पना सुचली.

अरविंद कोल्हटकर Thu, 13/08/2015 - 03:01

हा काहीसा योगायोगच आहे की ही चर्चा सुरू होण्याच्या काही काळ आधी मला काही हितचिंतकांनी सुचविले की माझे येथील, तसेच 'उपक्रम'मधील आणि अन्य काही चर्चास्थळांमधील लेखन मी ई-बुक स्वरूपात प्रकाशित करावे. मला ही कल्पना आकर्षक वाटल्याने त्याची तयारी मी आता सुरू केली आहे.

म्हाझ्या विषयांचा शुष्कपणा ध्यानी घेता त्यां पुस्तकावर उत्सुक वाचकांच्या उडया पडतील असले काही स्वप्न मी पाहात नाही आहे पण ई-बुक करण्यास अत्यल्प खर्च येतो आणि सामग्री तर माझ्या हाताशी तयार आहे म्हणून मी हे करण्यास बाहेर पडणार आहे. माझे अल्पस्वल्प प्रयत्न कोठेतरी ग्रथित होऊन राहतील हेच मला दिसणारे प्रमुख प्रलोभन.

राजेश घासकडवी Thu, 13/08/2015 - 07:35

फारच जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा सुरू केलीत! ऐसी अक्षरेची स्थापना करताना निदान माझ्या डोळ्यासमोर असलेलं स्वप्न होतं पुढीलप्रमाणे - पंचवीस वर्षांनी मराठी साहित्य आणि विचारविश्वात अग्रणी असणाऱ्या लोकांपैकी काही लोकांनी म्हणावं, की हो आमची सुरूवात ऐसीअक्षरेवर झाली, आणि आम्हाला तिथे खूप काही शिकायला मिळालं. हे होण्यासाठी संपादकांकडून अपेक्षा अशी होती, आणि अजूनही आहे की त्यांनी व्यवस्थापक म्हणून साइटवर येणारा कचरा साफ करत बसण्यापेक्षा नवोदित लेखकांना उत्तेजन देणं, वेगळे विचार मांडणारांचं कौतुक करणं आणि आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या फीडबॅकमधून लेखकांचं लिखाण सुधारण्याचा प्रयत्न करावा. आणि हे केवळ निवडक संपादकांकडूनच नव्हे तर ऐसीवर वावरणाऱ्या अनेक शहाण्यासुरत्या वाचक-लेखकांकडून व्हावं.

गेल्या साडेतीन-चार वर्षांच्या प्रवासाकडे मागे वळून पाहता काही चांगली पावलं पडलेली दिसतात. आदूबाळ यांनी म्हटल्याप्रमाणे काही प्रमाणात संपादकत्वाचं क्राउडसोर्सिंग झालेलं आहे. श्रेणीसुविधेतून आणि लेखनाला तारका देण्यातून एक प्रकारचा नीरक्षीरविवेक लेखकापर्यंत पोचतो. अनेक वेळा संपादकांकडून विशिष्ट लेखकांना उत्तेजन, काही चुका दाखवणं आणि नवीन लेखन करायला उद्युक्त करण्याचा प्रयत्नही झालेला आहे. तो पुरेसा आहे का? कल्पना नाही. मात्र अजूनही सकस, शक्तीमान, प्रयोगशील लिखाण - विशेषतः ललित लिखाण - होताना किंवा त्या दिशेने प्रयत्न होताना दिसत नाहीत. कदाचित ऐसीचे संपादक आणि क्राउडसोर्सिंग कमी पडत असतील. कदाचित तेच ते अन् तेच ते वाद उद्भवलेले पाहून चांगले लेखक सदस्य दूर जात असतील. माझ्या बाबतीत बोलायचं तर साडेतीन वर्षांपूर्वीचा आशावाद किंचित कमी झाला आहे हे खरं आहे. याचा अर्थ अजून पुढे चांगलं काही होणार नाही, असं नाही. आत्तापर्यंत आलेले दिवाळी अंक आणि भारा भागवत विशेषांकासारखा अंक पाहून बरं वाटतं खरं.

मात्र हे निमित्त साधून क्षुल्लक व्यक्तिगत वाद टाळावे आणि जिथे काही सकस दिसेल त्याचं कौतुक करावं, स्फुल्लिंग असलेलं पण सुधारण्यासारखं काही लिखाण दिसलं तर काही सकारात्मक सूचना कराव्यात असं सर्वच संपादक आणि सदस्यांना आवाहन करावंसं वाटतं. याप्रकारच्या फीडबॅकची अनेक लेखकांना नितांत गरज आहे.

ऋषिकेश Thu, 13/08/2015 - 09:03

-- वर चिंजं ने लिहिलेले सगळॅच मुद्दे चांगल्या संपादकाच्या अधीन येतात - रादर यायचे हे मान्यच. मात्र ते "एका" चांगल्या संपादकाच्या अधिक असावेत का? - रादर असतील का? तर माझ्या मते ते तसे नसावे. एकतर एकच एक संपादक दरवेळी योग्यच असेल याची शाश्वती नाही. त्याने ५० चांगले लेखक निर्माण केले म्हणून तो ५१व्यांदा चांगला लेखक निर्माण करण्याऐवजी त्याचे लेखन बिघडवणार नाही आपल्या अहंगंडाखाली येणार नाही याचीही शास्वती नाही. तेव्हा एक संपादक असण्यापेक्षा मला "संपादक मंडळ" आणि पुढे आदुबाळ म्हणतो तसे संपादक पदाचे "क्राउड सोर्सिंग" करणे अधिक श्रेयस्कर वाटते.

-- दुसरे असे की समजा मी सुजाण संपादक आहे. तर माझ्या टिकण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता आहे. माझे सुजाणत्त्व सर्वजनांच्या सुजाणत्त्वाच्या लसाविशी जरातरी मेळ खाणारे हवे हे एक (म्हणजे मी फारच ढगात असलो वा फारच गाळात असलो तर त्या सुजाणत्त्वाला वाचक हिंग लाऊनही विचारणार नाहीत). दुसरे या सुजाणत्त्वाची समाजाला चाड असल्याचे मला वाटणे. तिसरे म्हणजे मी हे सुजाण संपादकत्त्व करण्याचा मला योग्य तो आर्थिक+सामाजिक मोबदला मिळणे. आणि चौथे म्हणजे माझ्या सुजाणत्त्वातून जी अभ्जिव्यक्ती होईल त्याला या समाजात स्वातंत्र्य उपलब्ध असणे. जेव्हा एकच एक व्यक्ती संपादक म्हणून उभा रहातो तेव्हा या चारही आघाड्यांवर तो कमी जास्त प्रमाणात तोकडा पडण्याची शक्यता मोठी आहे.

-- तिसरं, जसंजसं लेखन डिजिटल होत जाईल तसतसं, शुद्धिचिकित्स, व्याकरण आदी गोष्टी ऑटोमेट होतील. लेखकांसाठी अशी अ‍ॅप येतील की तुम्ही ते वापरून बराच काळ लिहिलंत की ते तुमची शैली आत्मसात करून तुम्हालाच हा प्रसंग कसा फुलवायचाय याचे ऑप्श्न्स देऊ लागतील. शिवाय आदुबाळ म्हणते ते क्राउड सोर्सिंग करणेही नव्या काळात अधिक सोपे व सुलभ होत जाईल.

तेव्हा संपादक हे एका व्यक्तीचे पद हळुहळू कालबाह्य होत जाणार - जाईल - जावे असे मला वाटते. (हे माझ्या वैयक्तिक आवडीच्या, सोयीच्या आणि सवयीच्या विपरीत असेल पण ते अपरिहार्य वाटते)

चिंतातुर जंतू Thu, 13/08/2015 - 11:50

In reply to by ऋषिकेश

>> एकतर एकच एक संपादक दरवेळी योग्यच असेल याची शाश्वती नाही. त्याने ५० चांगले लेखक निर्माण केले म्हणून तो ५१व्यांदा चांगला लेखक निर्माण करण्याऐवजी त्याचे लेखन बिघडवणार नाही आपल्या अहंगंडाखाली येणार नाही याचीही शास्वती नाही.

मुळात कोणतीच व्यक्ती किंवा गट / संस्था दीर्घकाळ योग्य राहते असंही नाही. वर राम पटवर्धनांचा उल्लेख झाला म्हणून सांगतो. राम पटवर्धन ही व्यक्ती आणि मौज ही संस्था मराठी साहित्याच्या इतिहासात महत्त्वाची आहे ह्यात वादच नाही. पण संपादक म्हणून त्यांचं हुकलं ह्याचीही उघड उदाहरणं आहेत.

  • सतिश आळेकरांच्या लोकसत्तामधल्या 'गगनिका' लेखमालेत त्यांनी सांगितलं आहे की त्यांच्या काही एकांकिका 'सत्यकथे'त छापल्या गेल्या होत्या, पण 'झुलता पूल' ही (माझ्या मते मराठीतली अत्यंत महत्त्वाची) एकांकिका राम पटवर्धनांना उमजली नाही.
  • नेमाड्यांची 'कोसला' मौजेनं नाकारली होती. नंतरच्या काळात श्री.पु. भागवतांनी आपल्या हातून झालेली सर्वात मोठी संपादकीय चूक म्हणून त्याची कबुली दिली होती.
  • एकंदरीत साठोत्तरी अनियतकालिकांतून वर आलेलं साहित्य मौजेला झेपलं नव्हतं.

शिवाय, नरहर कुरुंदकरांचा 'कोसला'वरचा लेख वाचला तर त्यांनाही ती झेपली नव्हती हे उघड होतं. किंवा, 'तीन पैशांचा तमाशा' श्री. के. क्षीरसागरांना झेपलं नव्हतं. थोडक्यात काय, तर जेव्हा नवा प्रवाह वेगळी अभिव्यक्ती घेऊन येतो तेव्हा अनेक भल्याभल्यांचं हुकू शकतं.

मेघना भुस्कुटे Thu, 13/08/2015 - 12:54

व्यक्ती म्हणून संपादकांच्याही मर्यादा असणारच. आणि व्यक्तीच्या मर्यादा तिच्या संस्थेत पर्यायानं प्रतिबिंबित होणं ओघानं आलंच. त्यामुळे काही चांगल्या संपादकांकडून काही गोष्टी हुकणं अगदी समजण्यासारखं आहे. किंबहुना तसं न होतं, तरच नवल. संपादकांचं क्राउडसोर्सिंग जरी केलं गेलं, तरीही अशा निरनिराळी टोकं असलेली लोकं एका संस्थेत किती गुण्यागोविंदानं नांदतील हा एक प्रॅक्टिकल प्रश्न आहे. त्यामुळे काही संस्था एकखांबी असणं, काही संस्था एका विशिष्ट विचारधारेचं प्रतिनिधित्व करणार्‍या असणं (आणि परिणामी त्यांच्याकडून इतर महत्त्वाच्या गोष्टी हुकणं) हे अगदी सहज घडणारी बाब वाटते.

त्यावर उपाय म्हणून संपादकच रद्दबातल होईल किंवा व्हावा असं म्हणणं मला जरा अतिरेकी वाटतं.

आदूबाळ म्हणतो आहे, तसं जालावर लोक क्राउडसोर्सिंग करून संपादनाच्या सूचना करतात हे सत्य आहे. फॅनडममध्ये बीटाइंग करायला वाचकांना आवाहन करणं आणि फिक पूर्ण झाल्यावर बीटाइंगचं जाहीर श्रेय देऊन ते करणार्‍या माणसाचा सर्जनशील कामातला वाटा मान्य करणं हे अगदी नेहमीचं आहे. पण तिथेही बीटाइंग करण्याचं आवाहन आधी केलं जातं आणि शक्यतोवर फिक त्या मदतीसह पूर्ण करून मग प्रकाशित केली जाते. अगदी मोठ्या तपशिलाच्या चुका असतील, तर दुरुस्त्या होतात, नाही असं नाही. पण शक्यतोवर पूर्ण - संस्कृत (संस्कार केलेली) गोष्ट प्रकाशित करण्याकडे कल असतो. हे कशामुळे होत असावं? तर प्रकाशित गोष्टीला किती काळ सुधारत राहणार? वाचक तर अनंत असणार आहेत. मुळात गोष्ट लिहून उरणार आहे. तिचं किती काळ नि किती वेळा संपादन करायचं? कुठेतरी थांबणं भाग आहे. नि हे कुठेतरी थांबायचं आहेच, तर शक्यतोवर, होता होईतो संस्कार करणार्‍या वाचकाची / संपादकाची / बीटाअरची (नाव काहीही द्या, ते महत्त्वाचं नाही) मदत प्रकाशनापूर्वीच का घेऊ नये?

या प्रश्नाचं उत्तर, मला वाटतं, कायम ट्रिकी असणार आहे. कारण छापील माध्यमासारखं जालीय माध्यम हे काळ्या दगडावरची रेघ नाही. ते बदलता येतं. सहजी बदलता येतं. त्याचं उत्तर लेखकावरच अवलंबून राहणार.

आता अजून महत्त्वाचा नि वादग्रस्त मुद्दा: ललित लेखनात लेखकाखेरीज इतर कुणाच्या मताला अर्थ नाही, असं प्रतिपादन वर पिडाकाकांनी आणि गविंनी केलं आहे. मीही अनेक वर्षं या भ्रमात वावरले आहे. पण आता माझ्या असं लक्षात येतं (मी ललित लिहिते - जरी त्याचा जीव कितीही क्षुद्र असला, तरी माझ्यापुरती मी ललिल लेखक आहे हे सत्य आहे - आणि संपादनही करते. वैचारिक - नको, हा फारच मोठा शब्द आहे. आपण अललित म्हणू - तर अललित आणि ललित दोन्ही प्रकारच्या लेखनाचं संपादनही करते.) की संपादक अतिशय मोलाची भर लेखनात घालू शकतो. त्याचं श्रेय त्याला मिळायला पाहिजे असं नाही. कारण अखेरशेवट निर्णय लेखकाचा असतो. संपादक फक्त 'सुचवक' असतो आणि असावा. पण त्याच्याकडून कल्पनेच्या अंगानं आणि सामाजिक-राजकीय-भाषिक अंगानं अनेक मोलाच्या सुचवण्या मिळू शकतात. त्यानं लेखन अधिक चांगलं होऊ शकतं. त्या सुचवण्यांमध्ये कायम 'याला टोक हवं', 'हे पात्र विस्तारा', 'ते पातळ करा', 'हे स्पष्ट व्हावं' असल्या तद्दन समीक्षकी भाषेतल्याच सूचना मिळतील ही समजूत जेवढ्या लवकर इतिहासजमा होईल तेवढी लेखकासाठी उत्तम. 'ताजमहालाला विटा' वगैरे शब्दांत संपादकीय सूचनांची संभावना करणं म्हणजे लेखकानं मोठ्याच महत्त्वाच्या मदतीला अव्हेरण्यासारखं आहे.

ललित लिहिणार्‍या लेखकांना यावर मतप्रदर्शन करण्याचं कळकळीचं आवाहन. ;-)

गवि Thu, 13/08/2015 - 13:27

In reply to by मेघना भुस्कुटे

शेवटचा परिच्छेद विचार करण्यासारखा आणि स्वीकारण्याजोगा आहे. खुद्द मी आत्तापर्यंत एकदाही संपादकाची मदत घेतली नाही किंवा अभिप्राय मागितला नाही. माझी मतं ही इतरांचे अनुभव फर्स्टहँड ऐकून / पाहून / त्या जागी उपस्थित असल्याने कानावर पडून इ इ मार्गाने आलेली आहेत. फायदा होत असू शकतो. माझा मुद्दा दुसर्‍याच्या मताने एडिटिंग करण्यामधे होत असलेला उत्स्फूर्ततेचा नाश आणि लेखक-लिखाण अद्वैताला धक्का याच्याशी संबंधित होता. संपादकाची मदत घ्यायला हरकत नसावी असं वरील मजकूर वाचून वाटतं आहे.

ऐसीवरचा उत्तम लेख घेऊन त्याचं इथे लाईव्ह संपादन करुन दाखवतेस का? म्हणजे सर्वांना अंदाज येईल. एखादी कथा किंवा ललित घेशील का ऑफ युअर चॉईस? तू किंवा कोणीही असा प्रयोग इथे उलगडून दाखवेल का?

मग सूचना कितपत पटताहेत (वाचकांना, क्राउडला, लेखकाला) हेही इथेच पाहता येईल. संपादकाची टिपणी ही टीकाच असते का? ती मूळ कथेला / क्रिएशनला डॉमिनेट करायला आणि त्याचा फ्लेवर बदलायला जाते का? आणि अन्य प्रश्नांची उत्तरंही क्लियर होतील.

मेघना भुस्कुटे Thu, 13/08/2015 - 13:29

In reply to by गवि

अत्यंत इंट्रेष्टिंग सूचना आहे. मला प्र चं ड आवडेल करायला. कथा किंवा ललित घेणं अधिक आवडेल. पण देईल कोण?!

adam Thu, 13/08/2015 - 15:11

In reply to by मेघना भुस्कुटे

अत्यंत इंट्रेष्टिंग सूचना आहे. मला प्र चं ड आवडेल करायला. कथा किंवा ललित घेणं अधिक आवडेल. पण देईल कोण?!

ह्या प्रयोगाला सहाय्य म्हणून http://www.aisiakshare.com/user/189/authored इथलं कोणतंही लेखन घेतलं तर मला चालेल.
त्यात माझ्या मते तुम्हाला वैचारिक, विश्लेषणात्मक, संभ्रम मांडणारं, माहितीपर, ललित, कथा,विनोदी वगैरे विविध क्याटेगरी पैकी एकेक तरी नमुना मिळावा.

धर्मराजमुटके Thu, 13/08/2015 - 21:32

In reply to by मेघना भुस्कुटे

आभार उपलब्ध करून दिल्याबद्दल.
गृहपाठ : भो वाचकहो, घ्या बरे मेघनाताईंचे हेच वाक्यच संपादनासाठी.

विवेक पटाईत Thu, 13/08/2015 - 20:00

In reply to by मेघना भुस्कुटे

मझ्या लेखनात भाषेच्या बाबतीत, भयंकर चुका असतात, कोणी ठीक केल्या तर आनंदच होईल.

ऋषिकेश Thu, 13/08/2015 - 13:44

In reply to by मेघना भुस्कुटे

त्यावर उपाय म्हणून संपादकच रद्दबातल होईल किंवा व्हावा असं म्हणणं मला जरा अतिरेकी वाटतं.

का बुआ अतिरेकी? 'लगेच उद्या' संपादक हे पद बंद करा असे कोणी म्हणत नाहिये.
कालांतराने (किती काळ, किती वेग यावर प्रत्येकाचे मत वेगळे असेलच) हे घडणे अटळ दिसते आहे - घडावे इतकेच म्हणणे आहे.

याला कदाचित कित्येक दशके लागतील व हळुहळू बदल होतील कदाचित त्वरेने होऊन येत्या २०-२५ वर्षांतही ते जाणवण्याइतपत होऊ लागेल.

--

दुसरे असे की संपादक चुका करू शकतात म्हणून त्यांना रद्द करा इतकाच मुद्दा नाहिये. त्याहून अधिक किमान ४ मुद्दे वरील प्रतिसादात आहेत.

मेघना भुस्कुटे Thu, 13/08/2015 - 14:34

In reply to by ऋषिकेश

अतिरेकी म्हटलं, ते अशा अर्थी की हे तर्काला फार खेचणं वाटतं.

शिवाय घडणे अटळ आहे असं म्हणणं निराळं नि घडावे असं म्हणणं निराळं.

मला ते घडावं असं तर वाटत नाहीच; पण घडेल असंही वाटत नाही. मी कारणं दिली आहेत. त्याचं योगदान (मराठी शब्द काये राव? मगाचपासून मी कॉण्ट्रिब्यूशनवर अडखळते आहे!) मला मोलाचं वाटतं. बाकीची कारणं महत्त्वाची आहेत. पण त्यानं संपादक या संस्थेचं रूप तेवढं बदलेल असं वाटतं. ते पदच रद्दबातल होईल असं वाटत नाही. कारण आताही आदूबाळ म्हणतो आहे त्याप्रमाणे क्राउडसोर्सिंग करून का होईना, वाचकांच्या रूपात का होईना - संपादनाचे संस्कार अस्तित्वात आहेतच. ते खालसा झालेले नाहीत. उदाहरणार्थः तंत्रज्ञान भाषांतरकाराला बाजारातून हाकलून देईल असं मी गेल्या दहा वर्षांपासून ऐकते आहे. पण त्यानं झालं असेल तर इतकंच की तंत्रज्ञानाची मोलाची मदत भाषांतरकाराला उपलब्ध झाली आहे. कामाचा वेग आणि सोपेपणा वाढला आहे. कामाचं स्वरूप बदललं आहे. पण भाषा जाणणार्‍या माणसाची आवश्यकता संपलेली नाही. नजीकच्या भविष्यात तरी संपताना दिसत नाही. (ती संपू नये, हा माझा प्राधान्यक्रम झाला. ;-)) तसंच काहीसं संपादकाचं होईल असा अंदाज. मुद्रितशोधन, अक्षरजुळणी, पानमांडणी हे सगळं करणारी तंत्र असतील. संपादकाकडे दबदबा+अधिकार+मक्तेदारी+दादागिरी+सर्वाधिकार नसतील. पण त्याची आवश्यकता मात्र असेल. कदाचित सल्लागाराच्या स्वरूपात.

कारण शेवटी लेखकाचा लेखनाशी असलेला अन्योन्य संबंध आणि त्यातून लेखकाच्या सुराचं लेखनात पडणारं प्रतिबिंब - त्याचं अनाघ्रात असणं - हे जितकं महत्त्वाचं आहे; तितकंच लेखकाला त्याच्या लेखनापासून कदापि न साधता येणारं त्रयस्थपणही महत्त्वाचं आहे. त्यासाठी तिसरी व्यक्ती हवीच. मग तिला नाव नि अधिकार काहीही नि कितीही द्या किंवा देऊ नका.

ऋषिकेश Thu, 13/08/2015 - 15:01

In reply to by मेघना भुस्कुटे

पण त्यानं संपादक या संस्थेचं रूप तेवढं बदलेल असं वाटतं. ते पदच रद्दबातल होईल असं वाटत नाही.

हे विरोधाभासी नाही काय? जर क्राउडसोर्स झाले तर तो "पद" रद्दबालतच झाले नाही काय?

तंत्रज्ञान भाषांतरकाराला बाजारातून हाकलून देईल असं मी गेल्या दहा वर्षांपासून ऐकते आहे. पण त्यानं झालं असेल तर इतकंच की तंत्रज्ञानाची मोलाची मदत भाषांतरकाराला उपलब्ध झाली आहे. कामाचा वेग आणि सोपेपणा वाढला आहे. कामाचं स्वरूप बदललं आहे. पण भाषा जाणणार्‍या माणसाची आवश्यकता संपलेली नाही.

फारच लहान काळाबद्दल तुम्ही विचार करताय. आणि इतक्याशा वर्षातही मला अनोळखी लिपीमधला, भाषेमधला मजकूर माझ्या कामापुरता भाषांतरीत करण्यासाठी दरवेळी माणूस लागतोच असे नाही. एखादी परभाषिक वेबसाईट गुगल क्रोमवर उघडली असता तिथल्यातिथे ती इंग्रजीत वाचता येते.तो उत्तम अनुवाद असतो असे नाही. पण काम चालून जाते. अजून २०-३० वर्षांत ललित लेखन सोडल्यास अनुवादक ठेवणे हे प्रेस्टीज वा फ्याशन या पलिकडे रहाणार नाही. (संसदेत इतर भाषेतले भाषण लाईव्ह वेगळ्या भाषेत ऐकू येते. तेव्हा तंत्रज्ञान आहे फक्त ते सुलभ उपलब्ध नाही). तर ललित लेखनाच्या अनुवादासाठी यांत्रिक मार्ग अवलंबणे अजून १००-१५० (हे सुद्धा डोक्यावरून पाणी पण ते असो) वर्षांनी चालु होईल फार तर!
पण तोवर मनुष्य जात टिकली व याच वेगात तांत्रिक प्रगती करत राहिली तर हे होईल निश्चित.

मुद्रितशोधन, अक्षरजुळणी, पानमांडणी हे सगळं करणारी तंत्र असतील. संपादकाकडे दबदबा+अधिकार+मक्तेदारी+दादागिरी+सर्वाधिकार नसतील. पण त्याची आवश्यकता मात्र असेल. कदाचित सल्लागाराच्या स्वरूपात.

=))
असो. हा बचाव केविलवाणा वाटला.
दबदबा नाही, अधिकार नाही, बहुतांश कामं यांत्रिक झाली आहेत, असे संपादकपण भुषवायला (ख्रंतर फुकटच्या भाकर्‍या भाजायला) कोणी का राजी व्हावे? मुळ प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे हे पड टिकायला लेखकाची गरज असणे इतकेच कारण पुरेसे नाही. संपादकाला आपली गरज वाटण्यासारखी परिस्थिती असणेही तितकेच आवश्यक आहे.

===

शिवाय या बदलत्या वातावरणात संपादकांपेक्षा कितीतरी अज्ञात/अनोळखी/वेगवेगळ्या क्षेत्रांतील/सामाजिक स्तरावरील लोकांचे त्रयस्थ मत मिळाणे शक्य असताना या संपादकांना कोण का विचारेल?

आता हे सगळे संपादकच आहेत म्हणून जितं संपादक म्हणायचं असेल तर मग चर्चा करायची कशावर?

चिंतातुर जंतू Thu, 13/08/2015 - 18:11

In reply to by ऋषिकेश

>> इतक्याशा वर्षातही मला अनोळखी लिपीमधला, भाषेमधला मजकूर माझ्या कामापुरता भाषांतरीत करण्यासाठी दरवेळी माणूस लागतोच असे नाही. एखादी परभाषिक वेबसाईट गुगल क्रोमवर उघडली असता तिथल्यातिथे ती इंग्रजीत वाचता येते.तो उत्तम अनुवाद असतो असे नाही. पण काम चालून जाते. अजून २०-३० वर्षांत ललित लेखन सोडल्यास अनुवादक ठेवणे हे प्रेस्टीज वा फ्याशन या पलिकडे रहाणार नाही. (संसदेत इतर भाषेतले भाषण लाईव्ह वेगळ्या भाषेत ऐकू येते. तेव्हा तंत्रज्ञान आहे फक्त ते सुलभ उपलब्ध नाही).

ऋ, माझा अनुभव अगदी उलटा आहे. म्हणजे, तू म्हणतोस ती भाषांतरं कदाचित साध्या साध्या गोष्टींसाठी चालून जात असतीलही, पण इंग्रजी-फ्रेंच दोन्ही भाषा येत असल्यामुळे मी कधी कधी गंमत म्हणून एखाद्या प्रतिष्ठित वृत्तपत्रातला किंवा नियतकालिकातला लेख भाषांतरित करून पाहतो आणि त्यात अनेकदा खूप मोठ्या ढोबळ चुका आढळतात.

ह्याउलट, अनेक लोकांचं लिखाण मला वाचावं लागतं (संपादक म्हणून नव्हे; आकलन व्हावं ह्यासाठी). तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की सहज, मुद्देसूद, प्रवाही, सोपं आणि नेटकं लिहिणं हीदेखील एक कला / कसब आहे. त्यामुळे कॉपी-पेस्ट केलेला मजकूर, इतर लोकांचे उचललेले मुद्दे स्वतःच्या शब्दांत मांडताना झालेले गोंधळ, स्वतः लेखकाचे वैचारिक गोंधळ आणि त्याचे भाषिक गोंधळ असं सगळं मिळून पहिला खर्डा नावाचं जे काही रसायन बनतं त्यात ९५% वेळा खूप बदल आवश्यक असतात. आणि मी ज्याविषयी बोलतो आहे ते लालित्यपूर्ण साहित्यिक वगैरे लिखाण अजिबातच नाही बरं; विशुद्ध 'मुद्दे कळले म्हणजे पुरेसे' प्रकारचं हे लिखाण असतं.

मेघना भुस्कुटे Thu, 13/08/2015 - 21:23

In reply to by चिंतातुर जंतू

+१

तशी मला पोटापुरती जर्मन भाषाही येते आणि मी केलेली भाषांतरं बिनबोभाट चालवून घेतली जाऊन मला पगारही मिळतो. पण मी केलेल्या भाषांतरात व्याकरणाची एकही चूक राहत नसली तरीही प्रवाही भाषा म्हणून त्या भाषांतरांची लायकी काय असते, हे माझं मला पक्कं ठाऊक असतं. आणि हे मानवी भाषांतराबद्दल.

यांत्रिक भाषांतराबद्दल तर काय बोलावं! एखाददुसर्‍या वाक्यापुरतं यांत्रिक भाषांतर उपयोगी पडत असेलही. तेही एखाद्याच विशिष्ट वाक्यात. पण जिथे एक शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो (मराठीतलं उदा. नाव, तीर, पीठ इ.) तिथे ही यंत्रं इतकी बिनडोकपणे गंडतात, की हसावं की रडावं ते कळत नाही. नि ही तर अतिशय मूलभूत पातळीवरची, फक्त नामाबद्दलची, अपेक्षा.

यंत्रामुळे काम सोपं होतं. त्याची स्मरणशक्ती तयार करता येते. कामातलं तोचतोचपणा, पुनरावृत्ती टाळता येते. पण हे सगळं करायला माणूस लागतोच. पुन्हा ते तपासायलाही माणूस लागतो.

त्यामुळे कामाचं स्वरूप खूप बदलेल, त्याबद्दल मला शंका नाही. पण भाषा आतून-बाहेरून येणार्‍या माणसाची गरज कदापि संपणार नाही, याबद्दलही मला शंका नाही. जे भाषांतराबद्दल, तेच - किंबहुना अधिक तीव्रतेनं - संपादनाबद्दल.

ऋषिकेश Thu, 13/08/2015 - 22:57

In reply to by मेघना भुस्कुटे

तुम्ही दोघंही आत्ता जे काही आहे त्यात अजून काय/कितीशी सुधारणा होणार! आणि झाली तरी शेवटी त्यासाठी माणूस लागेलच या चिरंतन चालत आलेल्या आशावादाला चिकटून आहात.

१००-१५० वर्षांपूर्वी माणूस कित्येक गोष्टी करत होता ज्या आता पूर्णतः यांत्रिक झाल्या आहेत. कला वगैरे प्रांतात अंतःप्रेरणा महत्त्वाची असल्याने त्यांना नियमांत बांधण सध्या माणसाला कठीण जातंय म्हणून तितकेसे बरे अल्गोरिदम्स नाहीत. पण भविष्यात माणूस हे करू शकणारच नाही इतका ठामपणा असण्यापेक्षा माणसाच्या इतिहासाकडे बघून उलट हे ही (याही बाबतीत १००% ऑटोमेशन/यांत्रिकीकरण) माणूस करूनच दाखवेल असा विश्वास मला अधिक वाटतो.

आता हे चांगलं की वाईट हा वेगळा मुद्दा झाला पण हे होईल का? तर माझ्या मते होय!

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 13/08/2015 - 23:09

In reply to by ऋषिकेश

होणारच नाही, जमणारच नाही यापेक्षा आहे ते नष्टच होईल का नाही असा प्रश्न आहे. आजसुद्धा संगणक चित्रं काढू शकतो. पण काही विचारान्ती काढलेली चित्रं अधिक बघितली जातात. तेच लेखनाचंही होईल. दर्जाची चिंता न करता, समोर येईल ते वाचणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असेलही; म्हणून आहे तशी किंवा तसं काम करणारी संपादक संस्था नष्टच होईल असं का वाटतं हे समजत नाही.

लेखन, चित्रकला या वस्तुनिष्ठ गोष्टी नाहीत; त्यांची अल्गोरिदम्स बनवणं (बहुदा) शक्य नाही, मग त्यात ऑटोमेशन आणून आणून किती आणणार?

अवांतर/समांतर कुतूहल - काही प्रश्नांना उत्तरं नसतात, अशी गणितं आहेत. बरं या वाक्याची सिद्धताही देता येत नाही; पण हे वाक्य मान्य केलं जातं. जर वस्तुनिष्ठ गणिती प्रश्नांना उत्तरं नाही हे मान्य केलं जातं तर व्यक्तिनिष्ठ प्रश्नांना एकसरळ उत्तरं नाहीत, म्हणून ती यंत्रं वापरून सोडवता येणार नाहीत, माणूस लागणारच, हे मान्य करणं अवघड का होत असेल?

ऋषिकेश Thu, 13/08/2015 - 23:24

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लेखन, चित्रकला या वस्तुनिष्ठ गोष्टी नाहीत; त्यांची अल्गोरिदम्स बनवणं (बहुदा) शक्य नाही, मग त्यात ऑटोमेशन आणून आणून किती आणणार?

याला तर्क म्हणावे का? हे केवळ अंदाज झाले तुमच्या मते हे शक्य नाही माझ्या मते माणूस एक दिवस हे ही करून दाखवेल!

.शुचि. Thu, 13/08/2015 - 23:27

In reply to by ऋषिकेश

ज्या गोष्टी मूड्नुरुप बदलतात, मूड रिफ्लेक्ट करतात, ज्या कलाकृतींमध्ये आत्मा असतो, उस्फूर्ततेचे स्पिरिट असते - त्यांचे यांत्रिकीकरण शक्य वाटत नाही. (अर्थात अशक्य कशालाच म्हणू शकत नाही) पण तरीही.

ऋषिकेश Thu, 13/08/2015 - 23:33

In reply to by .शुचि.

जरा हार्श भाषेत सांगायचं तर हे कलाकृतींचे स्तोम आहे ;)

जर स्टेम सेलच्या अधिक सखोल अभ्यासाने (समजा आणखी पाचशे वर्षांनी - कमी आकडा लिहिला तर उगाच विरोध होईल म्हणून पाचशे) अख्खा मेंदूच्या मेंदू कसा काम करतो हे समजू लागले, तर त्याच मेंदूतून होणारी कलानिर्मिती कशी होती हे मात्र समजणार नाही?

कला फक्त मेंदूतून बनत नाही त्याला आत्मा असतो वगैरे मत असेल तर असो बापडे :प

==

विज्ञान हे सुरवातीला धर्मातील गूढतेमागील रहस्ये उघडकीस आणून त्याचा फोलपणा दाखवायला उपयोगी पडले. कालांतराने कलेलाही यंत्रवत बनवेल.
"माझा देव म्हणजे माझे अज्ञान. आणि देव टेण्ड्स टु झिरो" या माझ्या जुन्या थियरीची मी अजूनही घट्ट बिलगून आहे. (इथे कलेबद्द्लच्या अनेक प्रश्नांवर माणूस अज्ञानी असल्याने अनेकांसाठी कला दैवी भासते आहे. ती नक्की कशी निर्माण होते हे कळलं की त्याचे हे वलय लोप पावेल)

बॅटमॅन Thu, 13/08/2015 - 23:37

In reply to by ऋषिकेश

कला फक्त मेंदूतून बनत नाही त्याला आत्मा असतो वगैरे मत असेल तर असो बापडे

म्हणजे विश्वात फक्त नेहमीचे मासच नव्हे तर ते डार्क मॅटरही आहे वगैरे मताप्रमाणे काय? :)

बॅटमॅन Thu, 13/08/2015 - 23:34

In reply to by ऋषिकेश

कंप्यूटर कितीही अ‍ॅडव्हान्स्ड झाला तरी 'मानवासारखे' म्हणजे काय याची पातळी कायम उंचावत राहील. त्यामुळे अल्गोरिदम, ऑटोमेशन आणून कंप्यूटर जे करेल ते माणसाच्या एक स्टेप मागेच असणार. यात 'आपल्याला पाहिजे ते करणारी यंत्रे डिझाईन करणे' हेही काम आलेच. हे कितपत करू शकेल? एका मर्यादेपलीकडे जमेलसे वाटत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 13/08/2015 - 23:40

In reply to by ऋषिकेश

चित्रं, लेखन या बाबतीत ऑटोमेशन आधीच आलेलं आहे. संपादनातही आणता येईल. माझा तो मुद्दा नाहीच. म्हणणं असं की माणसाने केलेल्या कामापेक्षा यंत्रं सरस काम करतील का? याचं उत्तर माझ्या मते नाही असं आहे.

यामागचा तर्क गणिताशी संबंधित आहे. काही प्रश्नांची उत्तरं शोधताना १००% एफीशियन्सी आणता येत नाही, किंवा काही गणितांना उत्तरं नसतात. उदा - नागपूर, मुंबई, पुणे, नाशिक, हैंद्राबाद या शहरांना भेट द्यायची आहे. तर कोणता रस्ता १००% एफिशियन्ट असेल? या प्रश्नाला उत्तर नाही. उत्तरासाठी आहे त्यात एफिशियन्सीसाठी तडजोड करावी लागते.

चित्र, लेखन, संपादन हे प्रश्न त्या प्रकारचे वाटतात. किंबहुना ज्यात मानवी प्रतिसाद येतो, यांत्रिक नव्हे, तिथे सगळीकडेच हा नियम लागू होणार.

व्यावहारिक बाजूने - माणसाने काम केलेलं आहे अशा कलाकृती, लेखनाची मागणी पूर्ण संपली असं होणार नाही. कारण ज्यांना मानवी भावभावनांमध्ये रस आहे, असे लोक माणसाने लिहिलेल्या गोष्टींची, कथांची, चित्रांची मागणी करतच राहणार.

ऋषिकेश Thu, 13/08/2015 - 23:45

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मानवी प्रतिसाद म्हणजे मेंदूतूनच आलेला ना?
एकदा मेंदू चालण्याचा अल्गोरिदम कळला की मग?

वामन देशमुख Mon, 17/08/2015 - 14:40

In reply to by ऋषिकेश

एकदा मेंदू चालण्याचा अल्गोरिदम कळला की मग?

मला वाटतं, ज्याच्यावर मेंदू चालतो त्याला "अल्गोरिदम" इतकंच मर्यादित लेबल लावता येणार नाही.

मेंदू आणि मन हे एकाच वेळी तर्क, भावना, विकार, उर्मी, प्रेरणा, जिद्द, परिस्थिती, नातेसंबंध, आतला आवाज ब्ला ब्ला ब्ला यापैकी काहींच्या किंवा सर्वांच्या मिश्रणावर चालतो.

संगणकाला असे अल्गोरिदम असते का?

ऋषिकेश Mon, 17/08/2015 - 16:00

In reply to by वामन देशमुख

मेंदू आणि मन हे एकाच वेळी तर्क, भावना, विकार, उर्मी, प्रेरणा, जिद्द, परिस्थिती, नातेसंबंध, आतला आवाज ब्ला ब्ला ब्ला यापैकी काहींच्या किंवा सर्वांच्या मिश्रणावर चालतो.

मुळात मन आणि मेंदु असे वेगळे काही नसते. मन= मेंदू
दुसरे हे जे मिश्रण असते त्यावर मेंदू जसा चालतो त्याचे गणिती रुपांतर म्हणजे अल्गोरिदम

तर्क, भावना, विकार, उर्मी, प्रेरणा, जिद्द, परिस्थिती, नातेसंबंध, आतला आवाज

या सगळ्या मेंदुच्याच विशिष्ट स्थिती आहेत. मेंदु कसा काम करतो ए कळलं की यावरही कंट्रोल ठेवता येईल

संगणकाला असे अल्गोरिदम असते का?

सध्या नसते. भविष्यात असे शक्य होईल

अतिशहाणा Thu, 13/08/2015 - 23:34

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

गॅरी कास्पारोवला कंप्युटरने हरवलं त्यालाही आता २० वर्ष होत आली. संगणक दर्जेदार चित्र काढू शकेल आणि दर्जेदार लिहूही शकेल याबाबत शंका का आहे? आता कंप्युटर गाड्या चालवतो, वस्तू डिलीवर करतो, वॅक्युम क्लीनिंग करतो.
माणूस लागणार हे मान्य पण अशा लागू शकणाऱ्या माणसांची संख्या झपाट्याने कमी होणार. फारतर अशा कंप्युटरला अॅडमिनिस्टर करणारा किंवा शेवटची साफसूफ करणारा एखादा सुपरसंपादक असला की पुरे.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 13/08/2015 - 23:50

In reply to by अतिशहाणा

सॉरी कदाचित हे विषयांतर वाटू शकेल, पण ते नाही.

कॅस्परॉव वि. संगणक हे उदाहरण इथे फार उपयुक्त आहे. म्हटलं तर बुद्धीबळ हे गणित आहे, तांत्रिक गोष्ट. पण दोन संगणक एकमेकांशी लढतायत हे किती लोक चवीने बघतील आणि माणूस वि. माणूस किंवा माणूस वि. संगणक हे आवडीने बघतील? संगणक वि. संगणक बुद्धिबळ बघितलं गेलं तरी त्याचे पडसाद प्रोग्रॅमर वि. प्रोग्रॅमर असेच पडणार नाहीत का?

गाडी चालवणं, वस्तू पोहोचवणं, साफसफाई, विमान चालवणं ही बहुतांशी बिनडोक कामं आहेत. त्यात क्रिएटीव्हीटीला फार जागा नाही. जिथे बौद्धिक श्रेष्ठत्व सिद्ध करायचं असतं किंवा मानवी भावना-प्रतिक्रिया दाखवायच्या असतात तिथे माणूसच लागणार. मग ती साहित्यकृती असो, चित्रं वा बुद्धीबळ.

एकदा मेंदू चालण्याचा अल्गोरिदम कळला की मग?

(हे इथेच लिहिते.)

मेंदू चालण्याचा अल्गोरिदम बहुतांशी समजेल. उदा - बहुतेक माणसांना पावसात भिजायचं नसतं, छत्र्या, रेनकोट वापरले जातात. पण म्हणून सगळ्यांना, सगळ्याच वेळी पावसात भिजायचं नसतं असं थोडीच आहे? माणसं कुठे पर्फेक्ट असतात. माणसं चुका करतात, कधी करतात आणि कशा करतात ते नक्की सांगता येत नाही.

ऋषिकेश Thu, 13/08/2015 - 23:57

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जिथे बौद्धिक श्रेष्ठत्व सिद्ध करायचं असतं किंवा मानवी भावना-प्रतिक्रिया दाखवायच्या असतात तिथे माणूसच लागणार. मग ती साहित्यकृती असो, चित्रं वा बुद्धीबळ.

हे तोवर जोवर भावना कशी निर्माण होते हे कोडं अज्ञात आहे तोवर. मेंदूच्या अल्गोरिदम सोबत एकदा का ते कळलं की मग?

उदा - बहुतेक माणसांना पावसात भिजायचं नसतं, छत्र्या, रेनकोट वापरले जातात. पण म्हणून सगळ्यांना, सगळ्याच वेळी पावसात भिजायचं नसतं असं थोडीच आहे? माणसं कुठे पर्फेक्ट असतात. माणसं चुका करतात, कधी करतात आणि कशा करतात ते नक्की सांगता येत नाही.

एकदा अल्गोरिदम कळला की काही यंत्रांना भिजावेसे वाटेल काहिंना नाही. प्रत्येक यंत्र सारखाच विचार करणार नाही. अगदी मेंदूप्रमाणेच

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 14/08/2015 - 00:03

In reply to by ऋषिकेश

(कुठेतरी या धाटणीचे प्रतिसाद या धाग्यातून छाटून नवं कलम करायला पाहिजे. कुठे करायचं?)

एकेकाळी चित्रकार समोर दिसतंय ते जसंच्या तसं चित्रात दाखवायचे. कॅमेरा आल्यावर याला महत्व राहिलं नाही. म्हणून चित्रकला संपली नाही. चित्रकला बदलली/सुधारली.

एकदा अल्गोरिदम कळला की काही यंत्रांना भिजावेसे वाटेल काहिंना नाही. प्रत्येक यंत्र सारखाच विचार करणार नाही. अगदी मेंदूप्रमाणेच

मान्य. काही यंत्रं "मला भूक लागली" असं स्पष्ट सांगतात - उदा. मोबाईल "बॅटरी ढपली" असं सांगतात. तान्हं मूल जे करू शकत नाही ते निर्जीव यंत्र करू शकतं. स्वतःला दुरुस्त करणारी न्यूरल नेटवर्क्स आहेत. वेगवेगळी यंत्रं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मानवी कृती करू शकतात.
जर यंत्रं माणसासारखाच विचार करायला लागली तर मग यंत्र आणि माणूस यांच्यातली सीमाही धूसर होईल. तेव्हा त्या यंत्राला शुद्ध १००% यंत्र म्हणायचं का? यंत्र म्हणजे नक्की काय?

अतिशहाणा Fri, 14/08/2015 - 00:04

In reply to by ऋषिकेश

स्टायलोमेट्रीसारखं तंत्रज्ञान आजकाल वापरलं जातंय. भाषेची रचना, शब्दांचा वापर यांचं विश्लेषण करुन पुस्तकाचा खप किती होऊ शकतो याचे आडाखे बांधले जाताहेत. वॉटसनसारखं तंत्रज्ञान भाषेमागच्या भावना जाणून घ्यायचा प्रयत्न करतंय. हे सगळं पुढे वेगाने प्रगत होऊन उदाहरणार्थ कोणत्या स्वरुपाची कादंबरी 'पाडायची' हे सांगून १ प्रेमभंग, ३ रोम्यांटिक प्रसंग, २ पावसाळ्याची वर्णनं असं असेंबल करता येईल.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 14/08/2015 - 00:12

In reply to by अतिशहाणा

असेंबल्ड कादंबरी - :ड

हुबेहूब चित्र काढण्याच्या कौशल्याला आता अभिजनाश्रय नाही (काही प्रमाणात लोकाश्रय आहे); सगळ्यांना चकचकीत, ग्रीटिंग कार्डासारखे फोटो काढता येणं तंत्रज्ञानामुळे शक्य झाल्यावर खरबरीत पोताच्या प्रतिमांना अभिजनाश्रय मिळाला. तसंच आज जशा कादंबऱ्या असतात तशा उद्याचे संगणक लिहितील. पण माणसांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांचं स्वरूपही बदलेल. तंत्रज्ञानामुळे मानवी क्रिएटीव्हीटीचं स्वरूप बदलतं, तंत्रज्ञान मागाहून तिथपर्यंत पोहोचतं, असा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. हा पॅटर्न का बदलेल?

ऋषिकेश Fri, 14/08/2015 - 00:18

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बदलेल बदलेल!
वर ब्याट्या म्हणतो तसं सध्या माणूस एक घर पुढे आहे - त्याचं कारण आहे त्याचा मेंदू.
त्याचे यंत्र एकदा का बनले की हेच नाही, सगळेच बदलेल

नवे प्रश्न नवा देव निर्माण होईल तेव्हा!

चिंतातुर जंतू Fri, 14/08/2015 - 13:23

In reply to by ऋषिकेश

>> तुम्ही दोघंही आत्ता जे काही आहे त्यात अजून काय/कितीशी सुधारणा होणार! आणि झाली तरी शेवटी त्यासाठी माणूस लागेलच या चिरंतन चालत आलेल्या आशावादाला चिकटून आहात.

खरं सांगायचं तर, माझा आशावाद तू म्हणतो आहेस तसा नाही; वेगळा आहे. त्यासाठी समर्पक उदाहरण म्हणून 'ब्लेड रनर' नावाच्या चित्रपटाकडे लक्ष वेधून घेईन. त्यात काही माणसं असतात आणि काही यंत्रमानव. यंत्रमानव वरवर पाहता दिसायला-वागायला हुबेहूब माणसासारखे असतात, पण भावभावना वगैरे गोष्टींमध्ये ते माणसासारखे (अर्थात) नसतात. सायन्स फिक्शनमधल्या एका टिपिकल प्रवाहानुसार यंत्रमानव आपल्या चड्डीत न राहता मानवाला वरचढ होऊ लागले आहेत. त्यामुळे असे यंत्रमानव हुडकून त्यांना नष्ट करण्याचं काम नायक हॅरिसन फोर्डसारखे लोक करत असतात. एखाद्या व्यक्तीचा भावनिक प्रतिसाद तपासून त्यावरून तो यंत्रमानव आहे की माणूस ते ओळखण्यासाठी एक चाचणी माणसांनी विकसित केलेली असते. त्याची ही चुणूक -

स्रोत

ह्यातल्या नायकाला हळूहळू असं लक्षात येऊ लागतं, की काही यंत्रमानवांचा भावनिक प्रतिसादही माणसांसारखाच आहे. मग त्यांना मारण्यात काय हशील? असा (माझ्या मते समर्पक) नैतिक प्रश्न त्याला पडतो. तर, सांगायचा मुद्दा असा : जर इतकं ऑटोमेशन झालं की सर्व बाबतींत माणसासारखंच साहित्य यंत्राकडून प्रसवता येऊ लागलं, तर त्यात चुकाही माणसासारख्याच होऊ लागतील. इथे चुका म्हणजे, नेमाड्यांची 'कोसला'मधली मराठी जशी त्या काळच्या समीक्षक / संपादकांना 'चुकीची' वाटली तशा चुका, किंवा 'सात सक्कं त्रेचाळीस' ही काही कादंबरीच नव्हे, पक्षी ती 'चुकीचीच' आहे, असं अजूनही अनेक लोकांना वाटू शकतं, तशा 'चुका'. जर यांत्रिक निर्मितीतून प्रसवणाऱ्या साहित्यात जर अशा 'चुका' होऊ लागल्या, तर ते साहित्य खरं माणसानं निर्मिलेल्या साहित्यासारखंच होईल. आणि मग अर्थातच, त्यातल्या काही 'चुका' नवनिर्मितीला पोषक असतील आणि काही नसतील. त्यापैकी काही 'चुका' काही संपादकांकडून स्वीकारल्या जातील आणि काही संपादक त्या नाकारतील. असं होऊ लागेल हा माझा 'आशावाद' आहे. लक्षात येतंय का? :-)

आता तू म्हणशील कदाचित, की हे कलाकृतीचं स्तोम आहे. तर ते तसं असेलही कदाचित, पण 'कोसला' किंवा 'सात सक्कं...'चं वेगळेपण ज्यात आहे ते घटक स्वयंस्पष्ट आहेत, आणि मानवी कलानिर्मितीत ते अनेक वेळा आढळतात. त्यामुळे जरी ते स्तोम असलं तरीही यंत्रनिर्मित साहित्याकडून अशी अपेक्षा करणं मला तरी अवाजवी वाटत नाही. ;-)

ऋषिकेश Fri, 14/08/2015 - 13:30

In reply to by चिंतातुर जंतू

नाही कळलं. संपादकांची गरजच काय? जर कृत्रिम मेंदू तयार करता आला तर माणून्स ज्या चुका करतो त्याही तो त्या घडण्यामागचा अल्गोरिदम कृत्रिम मेंदूत का घालेल? आणि तशा चुका त्या मेंदूत गेल्याच तर त्या चुका न करणारा मेंदू बनवताच येऊ लागेल की! यंत्रांचे म्युटेशन म्हणावे तसे काहीसे

चिंतातुर जंतू Fri, 14/08/2015 - 13:33

In reply to by ऋषिकेश

>> जर कृत्रिम मेंदू तयार करता आला तर माणून्स ज्या चुका करतो त्याही तो त्या घडण्यामागचा अल्गोरिदम कृत्रिम मेंदूत का घालेल? आणि तशा चुका त्या मेंदूत गेल्याच तर त्या चुका न करणारा मेंदू बनवताच येऊ लागेल की!

त्या चुकांचा अल्गोरिदम घालावाच, असा माझा आग्रह नाही; मात्र, त्या 'चुकां'शिवाय 'कोसला' किंवा 'सात सक्कं...' सारखी साहित्यकृती जन्मालाच येऊ शकणार नाही. त्यामुळे त्या चुका नसतील, तर ते ऑटोमेशन कलानिर्मितीच्या चौकटीत तरी मर्यादित वकुबाचंच राहील.

ह्या भाषेत सांगितलं तर अधिक पटकन कळेल का?

  • it's not a bug it's a feature ;-)

ऋषिकेश Fri, 14/08/2015 - 13:51

In reply to by चिंतातुर जंतू

असो.
संपादक, कलाकार आणि सगळी व्यवस्था अमर आहे असे आज इथे या ठिकाणी घोषित करतो!

चिंतातुर जंतू Fri, 14/08/2015 - 14:43

In reply to by ऋषिकेश

>> असो.
संपादक, कलाकार आणि सगळी व्यवस्था अमर आहे असे आज इथे या ठिकाणी घोषित करतो!

असा प्रतिसाद वाचून मला ह्या ठिकाणी असं वाटायला लागलंय की मी अजोंसारखे प्रतिसाद देऊ लागलोय की काय ;-)

मेघना भुस्कुटे Fri, 14/08/2015 - 13:55

In reply to by चिंतातुर जंतू

पुन्हा एकदा +१. काल ऋच्या प्रश्नाचं मला सुचलेलं उत्तर हे असंच काहीसं होतं. शेक्सपिअरनं लिहिलेली काही नाटकं ही शेक्सपिअरनं लिहिलेली नसून दुसर्‍याच कुणी लिहिली आहेत असा काहीसा वाद असल्याचं जीएंच्या पत्रात वाचलं होतं. तद्वत जी कुणी ’माणसासारखी’ यंत्र असतील, त्यांना आपण माणसं म्हणू नि त्यातल्या एका यंत्राला संपादक यंत्र म्हणून. फरक काय पडतो?!

बॅटमॅन Fri, 14/08/2015 - 14:08

In reply to by मेघना भुस्कुटे

शेक्सपिअरनं लिहिलेली काही नाटकं ही शेक्सपिअरनं लिहिलेली नसून दुसर्‍याच कुणी लिहिली आहेत

By someone of the same name असे वाचल्याचे आठवते. =))

बॅटमॅन Fri, 14/08/2015 - 14:11

In reply to by मेघना भुस्कुटे

तसा वाद नव्हे, तर तशी फुसकुली सोडलेली आहे हे अ‍ॅडवायचं राहिलं. परमार्थेण न गृह्यतां वचः|

तदुपरि जीएंनी उल्लेखिलेला वाद तर आहेच.

मेघना भुस्कुटे Thu, 13/08/2015 - 21:16

In reply to by ऋषिकेश

मानापानाचं ठाऊक नाही. पैसेबैसे किती मिळतील, मागणी किती असेल तेही माहीत नाही. पण संपादनाच्या कामाला मरण आहे असं मात्र वाटत नाही. आपण आपल्या जागी अटळ असल्यामुळे आणि मुदलात आपण दोन निराळ्या गोष्टींबद्दल बोलत असल्यामुळे (मी संपादन या कामाबद्दल, तू संपादक या हुद्द्याच्या आजच्या मानमरातबाबद्दल आणि आर्थिक-सामाजिक महत्त्वाबद्दल) वादात - आपलं, चर्चेत - काय अर्थ आहे? ;-)

आदूबाळ Thu, 13/08/2015 - 14:43

In reply to by मेघना भुस्कुटे

तर प्रकाशित गोष्टीला किती काळ सुधारत राहणार? वाचक तर अनंत असणार आहेत. मुळात गोष्ट लिहून उरणार आहे. तिचं किती काळ नि किती वेळा संपादन करायचं? कुठेतरी थांबणं भाग आहे.

प्रकाशनोत्तर सुधारणा करणं हे जुनं प्रकरण आहे. टॉलस्टॉयच्या "वॉर अँड पीस"च्या अनेक ड्राफ्ट्समध्ये प्रकाशनोत्तर केलेले बदल होते.

पूर्वी, कागदी जमान्यात, "प्रकाशन" ही गोष्ट सॅक्रोसँक्ट होती. प्रकाशन करायला लागणार्‍या वेळामुळे आणि श्रमामुळे असेल. आता प्रकाशनाच्या सुलभीकरणामुळे प्रकाशित साहित्यात सुधारणा करणं चट्कन शक्य होतंय, तर ते होऊदे की.

नि हे कुठेतरी थांबायचं आहेच, तर शक्यतोवर, होता होईतो संस्कार करणार्‍या वाचकाची / संपादकाची / बीटाअरची (नाव काहीही द्या, ते महत्त्वाचं नाही) मदत प्रकाशनापूर्वीच का घेऊ नये?

घ्यावी की. पण यात गृहितक असं आहे, की लेखकाला आपला वाचक(+संपादक) कोण आहे ते माहीत आहे. पण हे कसं शक्य होईल?

राही Thu, 13/08/2015 - 15:04

In reply to by मेघना भुस्कुटे

अलीकडे कार्यकारी संपादक असतात. विशेषतः मासिके आणि दिवाळी अंक यांच्यात. मुख्य संपादक अंकाची रूपरेषा ठरवतात आणि त्यानुसार लेखकांकडून लेख मागवतात. ह्या लेखनावर कार्यकारी संपादकाद्वारे प्रक्रिया केली जाऊन अंतिम मसुदा तयार होतो. पण असे आढळते की बर्‍याच वेळा मूळ मसुदा हा फारच कच्चा म्हणजे निव्वळ एक कच्चा खर्डा असतो. त्यावर भाषेचे, वाक्यरचनेचे, मुद्देसूदपणाचे, नेमकेपणाचे अनेक संस्कार करावे लागतात. कित्येकदा फॅक्चुअल एरर्स असतात. कित्येकदा आकर्षक आणि वाचनीय व्हावा म्हणून पूर्ण लेख नव्याने लिहावा लागतो. अशा तर्‍हेने सुसंपादित झालेला लेख लेखकाच्या नावावर प्रसिद्ध होतो. वर्तमानपत्रात तर हा कळीचा मुद्दा आहे. बातमीदार कशीही अजागळपणे आणि निष्काळजीपणे बातमी टंकतात. आशय महत्त्वाचा म्हणून. पण ती सुधारणे अगदी जरूरीचे असते. मग एखादा भाषाप्रभु उपसंपादक सगळी उस्तवारी करतो. बातमीला नटवतो, थटवतो, सनसनाटी, भावुक, टिंगलखोर, शोधक वगैरे बनवतो. तेव्हा कुठे ती बातमी वाचनीय बनते. रॉ, कच्च्या बातम्या अजिबात वाचनीय नसतात. त्या तश्याच छापल्या तर वर्तमानपत्राचा खप नक्की घसरेल याची खात्रीच असते. मग श्रेयावरून वादावादी होतेच. आणि संगणकामुळे काम झटपट होत असले तरी ते होईलच ह्या खात्रीने आयत्या वेळी काम देण्याचे प्रमाणही वाढले आहे आणि त्या प्रमाणात संपादनाचे कामही.

ऋषिकेश Thu, 13/08/2015 - 15:51

In reply to by राही

होय, सध्या अशी परिस्थिती असवीच.
सर्व भाषांत बोललेले थेट सुयोग्य व प्रमाणभाषेत टंकन होणे सुरू झाले की मग अशी कामे करायला चांगले "बोलता" येणार्‍याला घेतले की ही उस्तवार बरीच सोपी व्हावी. जर पत्रकार चांगले व स्पष्ट बोलु शकत असतील तर त्यांनी फिल्डवरून दिलेला रिपोर्ट थेट प्रकाशित होण्याइतपत करायला फार जास्त सुजाणतेची आवश्यकता पडु नये.

हे कधी होईल? सांगता येणार नाही, मात्र होईल नक्की असे वाटते.

गवि Thu, 13/08/2015 - 16:14

In reply to by ऋषिकेश

हे अगदी मान्य आहे आणि एक दिवस लवकरच होईलही.

पण..

ऑटोकरेक्ट आल्गोरिदम्स, बोलून थेट सुयोग्य टंकले जाणे इत्यादि हे सध्याच्या "लेखणी"चेच वेगवेगळे प्रकार आहेत, लेखकाचे नव्हेत. या सर्वाचा फक्त तांत्रिक (शुद्धलेखनादि) गोष्टींशी संबंध आहे. तो खुद्द लेखकाने, अन्य कोण्या मनुष्याने केला काय किंवा यंत्राने केला काय.. तो मुद्दा महत्वाचा नाही. मूळ कंटेंटची क्वालिटी बदलणे हा भाग मात्र एकदम वेगळा आहे. चांगले (मशीन रेकग्नायझेशनच्या दृष्टीने) बोलू शकणे आणि उत्तम कंटेंट सुचून तो बोलणे हे दोन गुण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत.

ऋषिकेश Thu, 13/08/2015 - 22:51

In reply to by गवि

मान्य.

फक्त पत्रकारांच्या केसमध्ये त्यांच्या वेळेच्या अनुपलब्धतेमुळे + काही वेळा लेखनाच्या नावडीमुळे/आळसामुळे तपशीलवार-सलग लेखन/वार्तांकन दिले जात नाही. मात्र आपण नुसते बोलायचे आहे आणि एखादा पी.ए. जसे लिहून घेई तसे ते लिहून घेतले जाणार आहे, असे स्वरूप आल्यास उपसंपादकांना सध्या जी उस्तवार करावी लागते ती करावी लागणार नाही इतकेच.

कंटेण्टची क्वालिटी बदलण्याच्या दृष्टीने "आर्टिफिशियल इंटेलिजन्स" जसजसा प्रगत होत जाईल तसतसे हे कामही यांत्रिक होत जाईल. आधी अललित माहितीपर लेखनाचे, नंतर ललित लेखनाचेही!

२०८२मध्ये (असाच रँडम भविष्यातील आकडा) संपादकच काय, प्रकाशक, वितरक हे सगळेच पूर्णपणे गैरलागू व कालबाह्य ठरलेले असेल व कलाकार (इथे लेखक) व रसिक(इथे वाचक) यांचा झिरो-इन्टरफियरन्स असलेला थेट समागम सुरू झाला असेल - आमेन!!

धर्मराजमुटके Thu, 13/08/2015 - 21:30

In reply to by ऋषिकेश

एसएमएस, व्हॉट्सअप इतकेच नव्हे तर ईमेलवर देखील संक्षिप्त भाषा वापरण्याला चटावलेले (की निर्ढावलेले) पब्लिक पाहिले की तुमच्या ' जर पत्रकार चांगले व स्पष्ट बोलु शकत असतील तर' या भविष्यकालीन दुर्दम्य आशावादाचा मला मनापासून आदर वाटतो.
परत यात तुम्ही छापील माध्यमांचे रिपोर्टर गृहित धरलेय असे मी मानतो. दृश्यमाध्यमातील चमकों बद्दल हा आशावाद असेल तर मात्र आनंद वाटतो.

मेघना भुस्कुटे Thu, 13/08/2015 - 21:27

In reply to by ऋषिकेश

सर्व भाषांत बोललेले थेट सुयोग्य व प्रमाणभाषेत टंकन होणे सुरू झाले की

हा ’की’ फार ट्रिकी आहे बघ! अजून प्रमाणभाषा नक्की करायला जमलेलं नाही मराठीला. प्रमाणभाषेच्या नियमांवरून वादंग चालू आहेत स्वातंत्र्यपूर्व काळापासून. नि प्रमाणभाषा तरी काय फोटोफ्रेम थोडीच आहे? केली नि लटकावली भिंतीवर की संपायला? ती बदलती असते, हाच सगळ्यांत महत्त्वाचा भाग आहे महाराजा!

सुयोग्य म्हणजे काय? चांगले म्हणजे काय? या विशेषणांचा उपयोग नाही. तिथे यांत्रिक मोजमापं आणणंही शक्य नाही. याचं कारण भाषा सतत बदलती, व्यक्तीगणिक-काळागणिक-परिस्थितीगणिक निरनिराळे निकष असलेली असते हाच आहे.

रुची Thu, 13/08/2015 - 21:04

In reply to by मेघना भुस्कुटे

मी या धाग्यावर काहीही भाष्य करणं धाडसाचं आहे खरं पण ललित लिहिण्याच्या अत्यल्प अनुभवावरून एक गोष्ट लक्षात आली आहे ती म्हणजे ललित लेखनासाठी, लेखकाचं स्वतःशी प्रामाणिक असणं आणि स्वतःच्या नैसर्गिक प्रेरणेप्रमाणं आणि नैसर्गिक शैलीत लिहिणं फार महत्वाचं असतं, अगदी त्यातल्या दोषांसकट! मला वाटतं की ललितलेखन एक आरसा असतो, ज्यात त्या लेखकाचं प्रतिबिंब स्वच्छ दिसतं. ते नेहमी आकर्षक असेलच असं नाही पण ते अस्सल असणं अधिक महत्वाचं असतं. त्यावर संपादकाच्या "चांगल्या लिखाणाच्या" प्रमाणाची झाक पडली की त्यातले दोष दूर होऊ शकतात पण अनेकदा त्यातलं सत्व हरवून जाण्याची शक्यता असते. अर्थात हे संपादनाच्या योग्यतेवर आणि दर्जावर अवलंबून आहे हे मान्य आहे कारण कोणत्याही सूज्ञ संपादकाला लिखाणाचं सत्व न हरवता त्यात थोडे उपयुक्त बदल सुचवणे शक्य असावं. चांगले ललितलेखक स्वसंपादन करतच असावेत आणि ते करताना संपादकाने त्यात प्रत्यक्ष ढवळाढवळ न करता काही गोष्टी सुचवून पाहून त्या प्रक्रियेत मदत केली तर ती अधिक उपयुक्त होईल.

मेघना भुस्कुटे Thu, 13/08/2015 - 21:30

In reply to by रुची

मला वाटतं, संपादक फक्त ’चांगल्या आणि प्रमाण लेखनाचा’ वरवंटा फिरवतो की थोडी गैरसमजूत आहे. चांगला संपादक कधीही लेखकाचा ठसा पुसला जाऊ देत नाही; अनघडपणा लेखनाला शोभेसा असेल, तर त्यावर हात फिरवत नाही; त्यावर आपल्या लिखाणाची छाया पडू देत नाही - किंवा त्यानं देऊ तरी नये.

पिवळा डांबिस Fri, 14/08/2015 - 00:22

In reply to by मेघना भुस्कुटे

ललित लेखनात लेखकाखेरीज इतर कुणाच्या मताला अर्थ नाही, असं प्रतिपादन वर पिडाकाकांनी आणि गविंनी केलं आहे.

असं मी म्हंटलेलं नाही. ललित लेखनात लेखकाखेरीज वाचकांच्या मतालाही महत्व आहेच ना?
गविंनी आपापले मत लिहा असं सांगितल्यावरून मी मला स्वतःला अशा प्री-पब्लिकेशन संपादनाची गरज वाटत नाही असं मी लिहिलं होतं. जे काय आवश्यक (ग्रामर, स्पेलिंग वगैरे) संस्कार करायचे ते मी करतोच.
बाकी कथावस्तूबद्दल म्हणाल तर माझ्या दृष्टीने लिखाण हे एखाद्या चित्रासारखं असतं. कदाचित मी काही व्यक्तिचित्रं लिहिली आहेत म्हणून ही उपमा सुचली असेल.
जसा एखादा चित्रकार चित्र काढत असतांना दुसर्‍याच्या हातात ब्रश देऊन 'आता तुम्ही मारा चार स्ट्रोक' म्हणत नाही तसंच माझ्या लेखनाचं आहे. विशेषतः माझ्या हाती असलेल्या केवळ शब्दांतून एक चित्र/वातावरण/अनुभव निर्माण करायचा असल्याने माझ्या शब्दांच्या निवडीबद्दल मी जागरूक असतो. जर कुणी त्यातले थोडके शब्द जरी बदलले (अगदी त्याबदल्यात समानार्थी शब्द वापरले तरी) तरी त्या चित्राचा तोल जाऊ शकतो.
सारांश, संपादक ही संस्थाच बरखास्त करावी किंवा कुणी संपादकांचा उपयोग करूच नये असं माझं अजिबात म्हणणं नाही. ज्यांना ते आवडतं किंवा तशी गरज वाटते त्यांनी ते अवश्य करावं. पण चांगलं लेखन करायला यायला संपादकीय सूचनांची धूळपाटी गिरवलीच पाहिजे असं नाही इतकंच माझं अनुभवाअंती मत.
बाकी 'मोकलाया दाहि दिशा' तत्सम लिखाण वाचून आणि समजून घ्यायला तर संपादकीय मदतीची अत्यंत गरज आहे...
:)

ए ए वाघमारे Thu, 13/08/2015 - 16:07

मीच माझा संपादक असल्याने आणि मला आजवर कोणी संपादक भेटला नसल्यामुळे संपादक या संस्थेबद्दल मी अधिक बोलण्यास असमर्थ आहे. तूर्त जालीय लेखनाबद्द्लचे माझे अनुभव:

१. इथे ललितेतर/वैचारिक लेखनावर विविध मतमतांतरे व्यक्त होणे साहजिक आहे. त्याबद्दल विशेष तक्रार असण्याचे कारण नाही. परंतु ललित लेखनावर व्यक्त होणार्‍या प्रतिक्रिया पाहता जालीय वाचक ललित लेखन का वाचतात हा एक प्रश्न मनाला पडतो. ललित लेखनाबद्दलच्या प्रतिक्रिया/प्रतिसाद अनेकदा लेखनाच्या ग़ुणवत्तेबद्दल भाष्य करणारे नसून त्याच्या कंटेटबद्दल बोलणारे असतात. त्यातल्या तार्किक चुकांचा कीस पाडणारे असतात. ललित लेखनातले हे पात्र असेच का वागले, तसेच का वागले अशा स्वरूपाच्या सुद्धा प्रतिक्रिया मिळतात.

२. मुळात जालीय लेखनात (म्हणजे विविध मराठी आंतरजाल संस्थळांबद्दल) लेखन- वाचन क्रियेच्या मूळ फिनॉमिनॉलाच धक्का लागतो असे माझं मत आहे . कुठल्याही प्रकारचं लेखनाचा उद्देश हा मूलत: वाचकाने ते शांतपणे वाचावे, स्वत:च्या विचार-वृत्तीत अॅसिमिलेट होऊ द्यावे आणि मग लेखकाने लिहिताना जितका विचार केला निदान त्याच्या किमान १०% विचार करून शांततेने आपली प्रतिक्रिया (त्याला लेखन प्रतिसादयोग्य वाटलं तर) द्यावी; असा असावा असे वाटते. या प्रतिक्रियेची शब्दरचना काय असावी ही वाचकाची विवेकबुद्धी. अशा प्रक्रियेतून येणारी प्रतिक्रिया ही बर्यादपैकी फिल्टर्ड राहते. बरेचवेळा लेखकाच्या दृष्टीने विधायक राहते. परंपरागत (पक्षी:छापील) लेखनात हे प्रारूप होतं. अर्थात ही परंपरागत लेखनाची मर्यादाही होती/आहे. जालीय लेखनात मात्र हे लेखन-वाचन या कम्युनिकेशन प्रक्रियेचे सिम्प्लेक्स – युनिडीरेक्श्नल स्वरूप जाऊन ती फूल ड्युप्लेक्स स्वरूपाचे झाले. वाचकांना ताबडतोब प्रतिसाद देण्याची सोय झाली. थ्रेड पद्धत आली. जालीय लेखनातील या ताबडतोब प्रतिक्रिया देण्याच्या सोयीमुळे वाचकांना ताबडतोब व्यक्त होण्याची सवय लागते. आणि मुख्य म्हणजे आपली प्रतिक्रिया इतर वाचकांना दिसते हे माहीत असल्यामुळे चटपटीत, प्रक्षोभक, खडूस,उथळ प्रतिसाद देण्याची वृत्ती बळावते. अर्थात हे सरसकट सर्वांना लागू नाही. अनेक विचारी, प्रामाणिक वाचकसुद्धा आहेत. संस्थळ संस्थापकांच्या मनात मुळात काय उद्देश होते ते माहिती नाही परंतु या सर्व घटकांमुळे मराठी आंतरजाल स्थळांचे स्वरूप लेखन-वाचनापासून भरकटून मराठी सोशल नेटवर्किंग साईटपुरते मर्यादित झाले आहे की काय अशी शंका येते.

३. यात थोडा दोष लेखकांचाही आहे. मआंजावर प्रसिद्ध होणारे सर्व लेखन मुळात ‘लेखन’ असते का, दर्जेदार असते का ? बरेचवेळा ते मतप्रदर्शन, पोल, युटीलिटी प्रकारचे प्रश्न इत्यादीपर्यंत मर्यादित असते. हे असे व्यक्त होताना नवीन पोस्टच्या मेन्यूबटनला ‘लेखन करा’ असं शीर्षक देण्यात काय हशील ?

४. आता संपादकाकडे वळतो. संपादक या संस्थेचे जतन करावयाचे असेल तर वरील मॉडेलमध्ये थोड्या सुधारणा / पूर्णपणे नवे मॉडेल आवश्यक आहे. त्या अशा.

a. ललित आणि ललितेतर विषयांसाठी स्वतंत्र नावाने स्वतंत्र संस्थळे असावीत.

b. काय प्रसिद्ध करावे याचा संपूर्ण अधिकार संपादकाचा राहील. प्रसिद्ध झालेला प्रत्येक मजकूर हा ‘संपादकांची निवड’ असेल.

c. धड्याखालच्या प्रश्नासारख्या लेखाखाली लगेच प्रतिक्रियांची सोय बंद करावी. प्रतिक्रियेवर प्रतिक्रियेची सोय बंद करावी. लेखकांनीही एखाद्या प्रतिसादाने उचकून प्रति-प्रतिसाद देऊ नये. दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया मॉडरेशन केल्यावरच प्रसिद्ध कराव्यात.

d. फक्त आवडले/ नावडले/ श्रेणी प्रकारच्या प्रतिसादासाठी वेगळी सोय असावी(आताही ती बरेच ठिकाणी आहे). सविस्तर प्रतिसाद देण्यासाठी मात्र ‘कमीत कमी १००’ शब्दांची अट असावी.

e. लेखकांनी आणि संपादकांनीही त्यांची वैचारिक ,राजकीय बांधिलकी त्यांच्या प्रोफाइल मध्ये स्पष्ट करावी.

f. संस्थळाचे स्वरूप मॅगजिन बेस्ड असावे. आले तसे लेखन प्रसिद्ध करू नये. व एकदा प्रसिद्ध झालेले लेखन तेथेच पडून राहून देऊ नये. संपादकीय(व्यवस्थापकीय नव्हे) नियंत्रण असले तरच हे शक्य आहे.

५. मला कल्पना आहे की वरील सर्व उपाय केले तर नवीनच इ-नियतकालिक सुरू करावे लागेल / संस्थळाचा टीआरपी कमी होईल. पण हे करणे आवश्यकच झाले आहे असे माझे मत आहे नपेक्षा आमच्यासारखे नवीन लेखक जे आधीच या माध्यमाबाबत जरा नाराज आहेत ते पूर्णपणे यापासून तुटण्याची भीती आहे. यात नुकसान मराठीचेच आहे. आजच्या आणि यापुढच्या जगात मराठी या ऑनलाईन विश्वात मागे पडणे आम्ही पाहू शकत नाही.

वरील गोष्टींबाबत कोणी खरोखरच गंभीर असल्यास मी सहभागी होण्यास/सेवा देण्यास तयार आहे.

गवि Thu, 13/08/2015 - 16:28

In reply to by ए ए वाघमारे

प्रक्रियेचे सिम्प्लेक्स – युनिडीरेक्श्नल स्वरूप जाऊन ती फूल ड्युप्लेक्स स्वरूपाचे झाले. वाचकांना ताबडतोब प्रतिसाद देण्याची सोय झाली. थ्रेड पद्धत आली. जालीय लेखनातील या ताबडतोब प्रतिक्रिया देण्याच्या सोयीमुळे वाचकांना ताबडतोब व्यक्त होण्याची सवय लागते. आणि मुख्य म्हणजे आपली प्रतिक्रिया इतर वाचकांना दिसते हे माहीत असल्यामुळे चटपटीत, प्रक्षोभक, खडूस,उथळ प्रतिसाद देण्याची वृत्ती बळावते. अर्थात हे सरसकट सर्वांना लागू नाही. अनेक विचारी, प्रामाणिक वाचकसुद्धा आहेत. संस्थळ संस्थापकांच्या मनात मुळात काय उद्देश होते ते माहिती नाही परंतु या सर्व घटकांमुळे मराठी आंतरजाल स्थळांचे स्वरूप लेखन-वाचनापासून भरकटून मराठी सोशल नेटवर्किंग साईटपुरते मर्यादित झाले आहे की काय अशी शंका येते.

उत्कृष्ट निरिक्षण..!! काहीतरी केलं पाहिजे हे खरं, पणं पारंपरिक पुस्तकांबाबत फारच उलट होतं. ते असं की छापील पुस्तक किती काळाने वाचलं जाईल ते सांगता येत नाही. त्यातले संदर्भ ताजेशिळे कसेही झालेले असू शकतात. अनेकदा त्या वेळी प्रतिक्रिया देण्याची वेळ निघून गेलेली असू शकते. लेखकाशी संपर्क साधण्यासाठी मार्ग खुंटलेले असतात. ते मार्ग इतपत तापदायक असतात की प्रतिक्रियेतली उत्स्फूर्तता मारली जाऊन प्रसंगी "त्यापेक्षा नकोच ती प्रतिक्रिया देणं" असंही वाटतं. शिवाय "मासेस" म्हणता येतील असे वाचक "वा", "आवडलं", "सही है भिडू", "टुकार आहे राव" इतक्याच पण मनापासून प्रतिक्रिया देऊ शकत असतात, त्यांना या क्लासिक पद्धतीत (किंवा प्रतिक्रिया द्यायचीच तर किमान शंभर शब्दांची अट अशा प्रकारच्या नियमनात) बाहेरच फेकल्यासारखं होतं. तेही वाचकच असतात. पण अशा अपेक्षांनी त्यांना बळंच समीक्षकाच्या रोलमधे कोंबल्यासारखं होतं.

खडूस, उथळ इत्यादि टाळण्यासाठी क्लासिकच्या दिशेने पावलं टाकणं म्हणजे एकदम सिलेक्टिव्ह प्रतिसाद "मागवून घेणं" असं होऊन जातं. अशा वेळी लेखक वृथाच हवेत तरंगत राहण्याची शक्यता असते. त्यापेक्षा त्या खडूस उथळादिकडे दुर्लक्ष केलेलं परवडतं.

.शुचि. Fri, 14/08/2015 - 01:00

In reply to by ए ए वाघमारे

सविस्तर प्रतिसाद देण्यासाठी मात्र ‘कमीत कमी १००’ शब्दांची अट असावी.

हा मुद्दा फार आवडला. पण वाचकांनी १०० शब्द करायचेच म्हणून एकच मुद्दा घोळवत बसू नये, क्लीन कट अ‍ॅप्रोच असावा.
.

कुठल्याही प्रकारचं लेखनाचा उद्देश हा मूलत: वाचकाने ते शांतपणे वाचावे, स्वत:च्या विचार-वृत्तीत अॅसिमिलेट होऊ द्यावे आणि मग लेखकाने लिहिताना जितका विचार केला निदान त्याच्या किमान १०% विचार करून शांततेने आपली प्रतिक्रिया (त्याला लेखन प्रतिसादयोग्य वाटलं तर) द्यावी; असा असावा असे वाटते. या प्रतिक्रियेची शब्दरचना काय असावी ही वाचकाची विवेकबुद्धी. अशा प्रक्रियेतून येणारी प्रतिक्रिया ही बर्यादपैकी फिल्टर्ड राहते.

हा मुद्दादेखील आवडला.

ए ए वाघमारे Fri, 14/08/2015 - 09:05

In reply to by मेघना भुस्कुटे

ठाऊक असावा कदाचित
म्हणजे २००७ पासून एक अनियमित ब्लॉग चालवतो आहे त्यावरून असं वाटण्यास हरकत नाही,नाही का? ;)

मेघना भुस्कुटे Fri, 14/08/2015 - 14:22

In reply to by ए ए वाघमारे

खवचटपणे नव्हतं विचारलं. तुम्ही म्हटलेलं बरीच वैशिष्ट्यं ब्लॉग या माध्यमात उपलब्ध आहेत असं वाटलं. तसंच तुम्ही मांडलेल्या अनेक अपेक्षा अगदी माझ्या मनातल्याच आहेत असं वाटलं, म्हणून विचारलं.

ब्लॉग हे माध्यम इतका गल्बला असलेलं नसतं. तिथे प्रतिक्रियांची अशी लड सहसा लागत नाही. लेखकाचा शब्द अतिशय महत्त्वाचा असतो (फोरमपेक्षा अतिशय जास्त), त्याला प्रतिक्रिया गाळून प्रकाशित करता येणं शक्य असतं, तिथला एकान्त ललित लेखनाला (निदान गंभीर प्रकृतीच्या लेखनाला) अधिक साजेसा असतो, असं मला वाटतं प्रतिक्रिया मिळतात आणि त्यातून सुचवण्याही मिळतात. पण एकूणच प्रतिसाद हे फोरम्सवर जितकं वाजतंगाजतं आणि ताकदवान प्रकरण असतं तितकं ब्लॉगवर नसतं. किंबहुना प्रतिक्रिया हे प्रकरण बंद ठेवण्याचाही पर्याय असतो. शब्दवेल हा ब्लॉग अनेक वर्षं प्रतिक्रियाविरहित आहे.

तुमचा काय अनुभव?

ए ए वाघमारे Fri, 14/08/2015 - 16:24

In reply to by मेघना भुस्कुटे

खवचटपणे नव्हतं विचारलं>>
ते जाउद्या.ही खरंतर नुसत्या (कंटेक्स्टविरहित)शाब्दिक कम्युनिकेशनची मर्यादा आहे. इमोटिकॉन चिकटवल्याशिवाय आपल्याला समोरच्याच्या भावना समजून घेता येत नाही ही या ऑनलाईनमाध्यमाची मोठी मर्यादा आहे.असो.

ब्लॉगचा मुख्य प्रॉब्लेम म्हणजे त्याची पोहोच मर्यादित (तो किती लोकांना माहित आहे या अर्थी)आहे. ब्लॉगचा प्रचार करायला तुम्हाला दुसर्‍या कुठल्यातरी समाजमाध्यमाचा,फोरमचा आधार घ्यावाच लागतो.

ब्लॉगवरील प्रकाशनातही बरीच अनियमितता,शिस्तीचा अभाव आढळतो.याला माझा ब्लॉगही अपवाद नाही.कारण हे लेखकाच्या विलवर आधारित आहे. त्यामुळे ब्लॉग या शब्दातील 'लॉग'या शब्दाद्वारे जी वारंवारिता सूचित होते ते सातत्य फारसं आढळत नाही.

प्रत्यक्ष वाचनक्रियेतली सुलभता या दृष्टीने बर्‍याचदा ब्लॉगचे डिझाईन हादेखील रसभंग करणारा फॅक्टर ठरतो. अनेक छापील मराठी प्रकाशनं पाहिली तर लेखनाचं उत्तम व्हियुअल प्रेझेंटेशन हा अजूनही अनेकांच्या लेखी महत्वाचा विषय नाही तेव्हा ब्लॉगलेखकांकडून-नवलेखकांकडून तशी अपेक्षा करणं योग्य नाही.

त्यामुळे ब्लॉग आणि फोरम या दोन्ही प्रकाशनप्रकारांच्या प्रोज आणि कॉन्समधून काहीतरी मध्यममार्ग काढायला हवा,जिथे दोन्ही माध्यमांचे गुण आपल्याला एकत्र करता येतील अशी खरंतर माझी इच्छा आहे.

माझा अनुभव:प्रतिक्रियांच्या संख्येबद्दल मी काही जास्त विचार करत नाही.

adam Thu, 13/08/2015 - 16:24

जालिय-छापील वाचन-लेखन त्यातील दर्जा व गुणात्मक-संख्यात्मक फरक वगैरे दिशेनं चर्चा चालली की मला हमखास एक लेख आठवतो,
अतिशहाणा ऊर्फ आजानुकर्ण ह्यांचा.

www.misalpav.com/node/389
.
.
कहर म्हणजे जालिय लेखनाला बालिश,थिल्लर वगैरे समजणारे कोण आहेत, तर मटावाले की सकाळवाले!
आरारा.
त्यांनी इतरांचा दर्जा काढणं म्हणजे...
असो.

नगरीनिरंजन Thu, 13/08/2015 - 19:07

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हम्म्म. विचारात पाडलंत. अ‍ॅक्च्युअली माझ्या भविष्याच्या कल्पनेत मराठीतलं सगळं कालबाह्य होणार नाही; पण तुम्ही ज्या भविष्याच्या कल्पनेला सबस्क्राईब करता असं मला वाटतं त्या भविष्याच्या कल्पनेला हे मत लागू आहे. पण अर्थातच तुम्हाला हे मत इन्व्हॅलिड वाटणार कारण मतभिन्नता असल्यानेच भविष्याच्या कल्पनांमध्ये विसंगती आहे ना!

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 13/08/2015 - 20:27

In reply to by नगरीनिरंजन

तार्किक विसंगती फक्त विनोदासाठी दाखवली होती, त्याला तेवढंच महत्त्व.

मतभिन्नता आहेच. आज जशी मराठी वापरली जाते तशी ती उद्या राहणार नाही. संपादक हे पद आज जसं आहे तसं ते उद्या राहणार नाही. पण भाषेचा प्रवाह आणि संपादनाची प्रक्रिया टिकेल असं मला वाटतं. प्रक्रियेतल्या पायऱ्याही कदाचित बदलतील. पण चांगलं लेखन उत्तम बनवण्याची क्षमता असणारे लोक आणि त्या उत्तम लेखनाला-प्रक्रियेला उत्तेजन देणारे वाचक टिकणारच नाहीत हे मला पटत नाही. यांचं प्रमाण कमी होईलही; कारण साक्षरता, सुबत्तेमुळे वाचनाचं प्रमाण वाढणार. त्या प्रमाणात दर्जाची मागणी वाढेलच असं नाही.

विवेक पटाईत Thu, 13/08/2015 - 20:03

अंतरजाला वर मराठी वाचून आमच्या सारखे मराठी न शिकलेले लोक हि लिहू लागले, याचाच अर्थ मराठीचे भविष्य उज्ज्वल आहे.

.शुचि. Thu, 13/08/2015 - 21:37

In reply to by विवेक पटाईत

तुम्ही विरळे आहात पटाइतजी. ट्रेंड हा आहे की मराठी शाळेत शिकलेल्या पालकांचे, पाल्य इंग्रजी शाळेत जातात. त्यांना मराठीची ओढ वाटत नाही.

आदूबाळ Fri, 14/08/2015 - 14:49

मेघना, त्या "लाईव्ह संपादक डेमो" बद्दल एक सुचवू का? याच चर्चेचं संपादन करून त्याचा मुद्देसूद, विषयाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारा लेख बनवायचा डेमो दे ना.

आणि (शक्य झालं तर) कोणत्यातरी ऐसी-बाह्य संपादकाला त्यांच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यासाठी विचार. म्हणजे "थर्ड पार्टी टेस्टिंग" सुद्धा लगे हाथ होऊन जाईल!

मेघना भुस्कुटे Fri, 14/08/2015 - 14:55

In reply to by आदूबाळ

पण मग ते संपादन कसं? लेखनच नाही का होणार? शिवाय लेखक आणि संपादक यांनी एकमेकांच्या पार्टीत अतिक्रमण करता कामा नये, या सिद्धांताची सिद्धता?

आदूबाळ Fri, 14/08/2015 - 15:18

In reply to by मेघना भुस्कुटे

नाही. लेखन अगोदरच झालेलं आहे इथे.

विस्कळित मुद्दे, उपचर्चा सगळ्या नीटवार मांडून, मधल्यामधल्या अवांतराला / व्यक्तिगत प्रतिसादांना फाट्यावर मारून, सगळ्या मुद्द्यांचा परामर्श घेत लेख मांडायचा हे संपादकाचं काम ना?

गवि Fri, 14/08/2015 - 15:26

In reply to by आदूबाळ

नको. ललित, प्रेफरेबली फिक्शनविषयी हे पाहणं जास्त योग्य ठरेल असं वाटतं. त्यात एकाच लेखकाची पूर्ण क्रिएशन /जग असते.

अनेक लोकांच्या नॉन फिक्शन मतांचं एकत्रीकरण वगैरे हा वेगळा प्रकार झाला.