Skip to main content

सॅन अँटॉनिओ - गुरुद्वारा - अनुभव

3 minutes

पिडा यांनी अदितीच्या धाग्यावरती हा सुंदर प्रतिसाद दिलेला वाचला अन टेक्सासमधील काही स्मृतींना उजाळा मिळाला. तो या धाग्यात मांडते आहे.
.
नोकरीनिमित्ताने, टेक्सासच्या सॅन अँटॉनिओ या शहरात माझे जवळ्जवळ ३-३.५ वर्षे वास्तव्य होते. वाणी व दिपीका या माझ्या दक्षिण भारतिय रुममेटस होत्या. आम्ही एकत्र प्रचंड मजा करायचो ज्याची रेंज - रिव्हरवॉकवर भटकणे ते आर्ट्फुल वस्तू एकत्र बनविणे, स्वयंपाक करणे इतकी होती. तीळगुळाच्या वड्या मी त्यांना बनवायला शिकविल्या (स्माईल). त्यांच्याकडून बिर्याणी बनवायला शिकले. शॉपिंग व भटकणे हे मजा तर आम्ही सर्रास करत असू. एक मात्र होतं, तीघींना देवळात जाण्याची इच्छा होइ अन जाता येत नसे कारण ३५/४५ मैलांवर हिंदू टेंपल होते.
एके दिवशी गुगलवर शोधताना आम्हाला गुरुद्वारा सापडले अन तेही फक्त २.५/३ मैलांवर. म्हणजे टॅकसीने जेमतेम $८, अन वेळ ७ मिनिटे. एका शनिवारी आम्ही ११ वाजता जायची उस्फूर्त तयारी केली. तीघींना हे माहीत होते की गुरुद्वारात स्त्री-पुरुष सर्वांना डोके (माथा) झाकावे लागते. टॅक्सी एका अतिशय शांत व लोकवस्तीपासून दूर ठीकाणी थांबली अन तिथे एक कळेल न कळेलशी पाटी होती, तिच्या बाणाच्या रोखाने आम्ही एका प्रसन्न अंगणात प्रवेश केला. खूप फुलझाडे, टेक्सासच्या इतक्या उन्हाळ्यात तेथे जगविली होती. एकदम गारेगार वाटलं. एका बाबाजींनी आत जाण्यास हात केला व आम्ही एका व्हरांड्यात आलो जेथे स्त्री व पुरुषांच्या चपला वेगवेगळ्या खणात ठेवलेल्या आढळल्या. आतून माइकवर अतिशय गंभीर अन सूरात प्रार्थना ऐकू येत होती. आम्ही आत गेलो व जाजमावर स्त्रियांच्या बाजूस बसलो. अनेक स्त्रियांनी स्मितहास्याने आमचे स्वागत केले. खूप छान वाटलं ती प्रार्थना ऐकताना. मी तल्लीन झाले होते.
.
यापूर्वी व्हरमॉन्टमध्ये गुरमीत म्हणून माझी उत्तर प्रदेशिय रुममेट होती ती दररोज (अज्जिबात खंड नाही) संध्याकाळी सुखमणी साहीब ऐकत असे. अन तो अतिशय आवडून मी तिच्याकडून सर्व ग्रंथांची नावे घेतलेली होती. अन मीदेखील जपजी साहीब, सुखमणी साहीब, आनंद साहीब, चौपाई, अस दी वार आदि कीर्तने (https://www.youtube.com/watch?v=wCRNHDyUmOs) ऐकू लागले होते. पैकी आनंदसाहीब व जपजी साहीब अननुभूत कोमल व आनंददाई असल्याचे लक्षात आले होते तर रेहरास (गोविंदसिंग निर्मित) यात वीररस असल्याचे लक्षात आले होते. जपजी साहीब पहाटे ऐकतात असा नियम आहे तर रेहरास संध्याकाळी वाचतात. मी केव्हाही , काहीही लावत असल्याने गुरमीतने एकदा दटावल्याचे आठवते (दात काढत). मी गुरु ग्रंथसाहीब (http://www.srigranth.org/servlet/gurbani.gurbani?S=y) चा अर्थ वाचत असे व खूप आवडे, प्र-चं-ड शांती मिळे. किंबहुना एक हालचाल .. विचित्र मिरमिरी संवेदना मला टाळूपाशी जाणवत असे. हे मनाचे खेळ असतील तर असोत पण अन्य आपल्या देवी-देवतांच्या कीर्तन, पठनाने हा अनुभव कधी आलेला नाही.

नौ दुआरे परगट कीए दसवा गुपत रखाइआ॥"

.
तर सांगायचा मुद्दा हा की शीख धर्माचे स्क्रिप्चर ऐकण्याकरता पुरेशी प्रि-ग्रुम्ड होते. अन टेक्सासमध्ये मला त्याचा फायदाही झाला. या गुरुद्वाराला पहील्यांदा भेट देण्याच्या आदल्या रात्री मला निळ्या तळ्याचे , स्वच्छ पाण्याचे स्वप्न पडले होते अन हा संकेत मला महत्त्वाचा वाटतो. पुढेपुढे सकाळी शनिवारी ५:३० वाजता एकटी गुरुद्वारात जाऊ लागले.६:०० वाजता प्रार्थना सुरु होत ते थेट लंगर उरकल्यानंतरच कार्यक्रम संपे.
.
गुरुद्वाराचा अंतर्भाग इतका शांत अन सुंदर होता. काश्मीरी गालिचे, उंची झुंबरे, चवर्‍यांनी वारा ढाळणारे वृद्ध बाबाजी अन गंभीर मंद आवाजातील वाचन. माझ्या मनावर लगेच परीणाम होत असे. कधीतरी परत या गुरुद्वारास भेट द्यायची आहे. परत एकदा मनःशांती अनुभवायला तर खरच पण देणगीही द्यायची आहे. अन ही जी इच्छा अपूर्ण आहे ती अपूर्ण असण्यातच आमची पुनरेकवार भेट दडलेली आहे. या स्थळाचे व माझे ऋणानुबंध कधीतरी मला परत तिकडे घेऊन जातील, याची १००% खात्री आहे.
.
पिडांनी या सर्व आठवणींना उजाळा दिला त्याबद्दल त्यांचे शतशः आभार.

Node read time
3 minutes

ललित लेखनाचा प्रकार

.शुचि. Sun, 21/06/2015 - 22:01

In reply to by आदूबाळ

"लंगर" जाम चविष्ट असे. पण लाज वाटाते तिथे धर्मदान पेटीत पैसे व्यवस्थित न टाकता, लंगर मात्र नीट खाल्ल्याचे :(

मुळापासून Mon, 22/06/2015 - 00:02

अन्य आपल्या देवी-देवतांच्या कीर्तन, पठनाने हा अनुभव कधी आलेला नाही.

याला "घर की मुर्गी दाल बराबर" असं का म्हणू नये? बाकी चांगल्या लिहिलेल्या लेखात हे एक वाक्य थोडे खटकले.

.शुचि. Mon, 22/06/2015 - 02:04

In reply to by मुळापासून

नाही मूळापासून मला म्हणायचे होते की जर अंधश्रद्धा असेल तर मग आधीच हा अनुभव आला असता. यात शीख धर्माकडे मी वहावत गेले असा नाही. आपल्या हिंदू धर्मातूनच त्यांचा फाटा फुटलेला आहे. तसेच त्यांचा गुरु-संप्रदायावरती आधारलेला आहे तसा हिंदू धर्म नाही.
पण वाक्य खटकले हे चांगलेच झाले. कदाचित तसे लिहावयास नको होते.
___
अर्थात ही मिरमिर फक्त पहील्या काही काळात जेव्हा जेव्हा मी जपजी वगैरे ऐकले तेव्हा झाली. व्हरमाँटलाच झाली. टेक्सास काय अजुन कधीच तशी मिरमिर परत अनुभवली नाही. कदाचित ते शांत संगीत पहील्यांदा ऐकण्याचा परीणामही असेल.

पिवळा डांबिस Mon, 22/06/2015 - 10:35

आभार मानणे गरज नाही. सहज विषयातून विषय निघाला म्हणून तसं लिहिलं होतं....

बाकी कॅलिफोर्नियात फ्रेस्नोजवळ एका शीख परिचिताच्या आग्रहामुळे तिथल्या गुरुद्वारात जायचा योग आला होता. तो अनुभव आवडला होता....

माझ्या घरापासून १५ मिनिटांच्या ड्राईव्हवर लास व्हर्जिनेसचं हिंदू टेम्पल आहे. औत्सुक्यापोटी एकदा जाऊन आलो. त्याची सुरस आणि चमत्कारीक कथा अन्य केंव्हातरी!!!!

राही Mon, 22/06/2015 - 12:58

एकदोन गुरुद्वारांत जाणे झाले आहे. आत गेल्या गेल्या पहिली गोष्ट लक्ष्यात येते ती तिथली शांती. स्वच्छता आणि शिस्तसुद्धा तितकीच. गर्दी, गोंधळ, मोठ्याने बोलणे अजिबात नाही. मनातल्या मनात आपल्या देवळांशी तुलना होऊ लागतेच. दुसरी एक पद्धत जी मला माहीत नव्हती ती म्हणजे पंगतीत (तिथे पंगतीचे जेवण होते.) रोट्या ह्या आपण हातांची ओंजळ उंचावून त्यात घ्यायच्या असतात. बाकी अन्न पानात वाढले जाते.
अंत्यसंस्काराच्यावेळीदेखील शिस्त आणि शांतता जाणवण्याइतपत असते. (आम्हीच का असे?)

गवि Mon, 22/06/2015 - 13:49

In reply to by राही

साईड इफेक्ट आहे तो, असं मला वाटतं.

ज्या ज्या धर्मांमधे सगळं एका रेषेत ठरवून दिलेलं आहे, ज्यात एक(पाच, सात, अथवा चौदा इ इ) महान गुरु आहे(त) आणि त्यांनी गरीब बिच्चार्‍या पापी बालकांसाठी अपरिवर्तनीय "आज्ञा","कमांडमेंट्स","नियम" सर्वश्रेष्ठ जागी बसून ठरवून लिहून ठेवले आहेत अशा धर्मांमधे जनरली "चर्चा" फार होत नाही. वेगवेगळे मतप्रवाह असण्याची शक्यता मुळातच खुडलेली असते. एखाददुसरा पंथ असतो, आणि त्याचे शेपरेट कट्टर अनुयायी अन असेच शेपरेट धीरगंभीर प्रार्थनास्थळ. सरमिसळ नाही. त्यामुळे "आवाज" कमी अन शांतता जास्त असते.

हिंदूंचं तसं नाही. कोट्यवधी देवांना मानणारे कोट्यवधी वेगवेगळे भाविक.. पण कोणत्याही देवळात कोणीही डोकं टेकण्यात कमी मानत नाही. सर्व देव एकच हेही मान्य आणि प्रत्येक देव वेगळा हेही मान्य.. देवादेवांच्यात चढाओढ मान्य आणि एकाच वेळी मूर्तिपूजा आणि निर्गुण भक्तीही मान्य. बाबाबुवाही मान्य, प्रेषितही मान्य, दगडी मूर्तीही मान्य अन उंबर्‍यालासुद्धा वंदनीय मानणं हेही मान्यच.

कोणाला पेढ्याचा प्रसाद मान्य तर कोणाला दारुचा तर कोणाला मटणाचा.. देव कोणाचा बाप, कोणाचा भाऊ तर कोणाचा मित्र..

अंगात येऊन भिंतीला टकरा देत देवाला शिव्या घालणारेही असंख्य..

आता मला सांगा, अशा ओम्नीवोरस धर्मात शांत, स्वच्छ, धीरगंभीर वातावरण देवळात कसं असेल? प्रश्न, विचारभिन्नतेचं स्वातंत्र्य, अनेक मार्गांना मान्यता असा मोकळाढाकळा प्रकार असताना गोंगाट तर होणारच.

गवि Mon, 22/06/2015 - 14:17

In reply to by बॅटमॅन

स्वच्छता वेगळा मुद्दा आहे हे मान्य, आणि तो बर्‍यापैकी विविध स्तरांतल्या गर्दीशीच निगडीत आहे, पण ते असो. शांततेविषयी, गांभीर्याविषयी वगैरे तरी वरील विवेचन साधारणपणे लागू व्हावे. वैसेभी हिंदू पब्लिक बर्‍याचदा मनोरंजनासाठी, पर्यटनासाठी धार्मिक स्थळी लगबगा जात असते, गंभीर धार्मिक पालनासाठी नव्हे.. तीन दिवसाच्या सुट्टीत अष्टविनायक "करुन" आलो.. वगैरे..!! :)

बॅटमॅन Mon, 22/06/2015 - 14:31

In reply to by गवि

शांततेविषयी, गांभीर्याविषयी वगैरे तरी वरील विवेचन साधारणपणे लागू व्हावे. वैसेभी हिंदू पब्लिक बर्‍याचदा मनोरंजनासाठी, पर्यटनासाठी धार्मिक स्थळी लगबगा जात असते, गंभीर धार्मिक पालनासाठी नव्हे.. तीन दिवसाच्या सुट्टीत अष्टविनायक "करुन" आलो.. वगैरे..!!

सहमत. मुळात धार्मिक ठिकाण = खूप गंभीर हे आपल्याला पटतच नाही, कारण "आयॅम लॉर्ड & आय विल रेक माय व्हेञ्जन्स अपॉन दी" असा भयभक्तियोग आपल्याकडे चालत नाही. गीतेत अर्जुन घाबरला वगैरे ठीक, पण अदरवाईज़ नाही. शंकरही तापट असला तरी तितकाच आशुतोष अर्थात लौकर प्रसन्न होणारा आहे. जुन्या काळापासून देवादिकांची टवाळीदेखील आपल्याकडे लै कॉमन आहे, उदा. खालील श्लोक.

कमला कमले शेते हर:शेते हिमालये। क्षीराब्धौ च हरि: शेते मन्ये मत्कुणशंकया ||

लक्ष्मी कमळात, शंकर हिमालयात आणि विष्णू क्षीरसागरात का झोपतो? बहुधा अन्यत्र ढेकूण चावत असल्यामुळे.

असं बाकी ठिकाणी चालतच नाही, सो क्व चेष्टा क्व गोंगाट?

गवि Mon, 22/06/2015 - 14:34

In reply to by बॅटमॅन

असं बाकी ठिकाणी चालतच नाही, सो क्व चेष्टा क्व गोंगाट?

मेल्या, वाद घालशील असं वाटत होतं तर तू डायरेक्ट सहमतच.. काय हे ? कसं चालेल अशानं ? ;)

मिहिर Mon, 22/06/2015 - 14:34

In reply to by गवि

देवळांत असणारा गोंगाट काय 'आमच्या कुलदैवताला बकऱ्याचा नैवेद्य लागतो, तुमच्याला तमुक लागतो', 'आम्ही पानात भाजी डावीकडे वाढतो, तुम्ही कुठेही वाढता', 'तुम्ही विष्णूला पुजता, आम्ही शंकराला पुजतो' अशा प्रकारच्या 'चर्चां'मुळेच असतो?

बॅटमॅन Mon, 22/06/2015 - 14:37

In reply to by मिहिर

नेमके. रामाच्या देवळात जाऊन कोणी राम श्रेष्ठ की कृष्ण, रामनवमी कधी येते, इ. वर वाद घालताना पाहिलेले नाही.

गवि Mon, 22/06/2015 - 14:37

In reply to by मिहिर

गोंगाट नेमका कशाचा असतो यापेक्षा "गांभीर्य" नसण्यावर त्या मुद्द्यांचा भर होता. गांभीर्याने शांतता येते. एरवी नॉईज करणे हा मनुष्यस्वभावच.

राही Mon, 22/06/2015 - 14:44

In reply to by गवि

विचारभिन्नतेचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी किंवा ते उपभोगतो आहोत हे दाखवून देण्यासाठी देवळात जातात/जायचे असते/जावे का?
आपण हे विनोदाने अथवा उपरोधाने लिहिलंय आणि मला ते कळलं नाही असं तर नाही ना? शेपरेट असं लिहिलंय म्हणून वाटलं.
ऑम्निवोरची विकीची बेसिक व्याख्या मोठी मनोरंजक आहे. "Omnivores are often opportunistic general feeders that lack carnivore or herbivore specializations...for acquiring or processing foods."
मुळात आपल्याकडे नागरी सभ्यता विकसितच झालेली नाही. 'आमच्या मनाचे/गल्लीचे/राज्याचे/जंगलचे आम्ही राजे' असेच आम्ही वागत असतो. शिस्तबद्ध वागणे ही एक सेक्यूलर कृती आहे, धार्मिक नव्हे.
ही हाडीमांसी भिनलेली बेशिस्त इतरत्र होते तशीच देवळातही प्रकट होते इतकेच.

बॅटमॅन Mon, 22/06/2015 - 14:45

In reply to by राही

ही हाडीमांसी भिनलेली बेशिस्त इतरत्र होते तशीच देवळातही प्रकट होते इतकेच.

मग गुरुद्वारे आणि दक्षिणेतल्या देवळांची संगती कशी लावायची?

राही Mon, 22/06/2015 - 15:05

In reply to by बॅटमॅन

तो मुद्दा आहेच.
बहुसंख्य जनता अनागरी असणे, हे कारण असू शकेल काय? की हा संस्कृतीतला फरक आहे? की उत्तरेकडे अराजक आणि दक्षिणेकडे त्यामानाने सुस्थिती? पण शीख तर उत्तरेतले.
समूह 'होमोजिनसी' नसणे हेच कारण संभवते आहे.
एक प्रसंग ध्यानात राहिला आहे. गोव्यात चर्चेसमध्ये शांतता आणि शिस्त असते हे सर्वांना माहीतच आहे. एकदा असेच स्तब्धपणे ते वातावरण अनुभवताना अचानक कलकलाट सुरू झाला. तमीळ्नाडुहून दोन बसेस भरून यात्रिकांचा एक लोंढा आवारात शिरला. सर्व लोक नवपरिवर्तित वाटत होते. त्यांना ही यात्रा घडवली गेली असावी. त्यांनी आल्या आल्या आपल्या इथल्या पंढरपूर-तुळजापूर प्रमाणे गलका, धावाधाव, रांगेत घुसणे, लांबून हाका मारणे वगैरे सुरू केले. असे म्हणू नये पण हे सर्व निम्न जातीतले वाटत होते. अर्थात यावरून काही अनुमान काढणे कठिण आहे, पण
आमच्यातले सोळा संस्कार हे सर्वांना सक्तीचे नाहीत पण बेशिस्त हा संस्कार मात्र सर्वांसाठीच असावा.

बॅटमॅन Mon, 22/06/2015 - 15:12

In reply to by राही

आमच्यातले सोळा संस्कार हे सर्वांना सक्तीचे नाहीत पण बेशिस्त हा संस्कार मात्र सर्वांसाठीच असावा.

सहमत. पण मजा पाहिली तर भारतातले मुसलमान- ज्यांना अनेक शेलक्या विशेषणांनी उल्लेखण्यात अनेक इंटरनेट हिंदू आघाडीवर असतात- ते इतर प्रसंगी कसे का वागेनात, मशिदीत बाकी चुपचाप असतात. सबब नागरी संस्कृतीचा मुद्दा त्यांना लागू होत नाही.

अनु राव Mon, 22/06/2015 - 15:23

In reply to by राही

नक्की नागरी संस्कृती कशाला म्हणावी? मशिदीच्या आत वागण्याला का बाहेर वागण्याला?
मशीदीत वागण्याला मशिद संस्कृती म्हणावे आणि बाहेर वागण्याला नागरी संस्कृती.

गवि Mon, 22/06/2015 - 14:57

In reply to by राही

मुळात आपल्याकडे नागरी सभ्यता विकसितच झालेली नाही. 'आमच्या मनाचे/गल्लीचे/राज्याचे/जंगलचे आम्ही राजे' असेच आम्ही वागत असतो. शिस्तबद्ध वागणे ही एक सेक्यूलर कृती आहे, धार्मिक नव्हे.

देखो .. तुमने समस्या बदल डाली..

भयाधारित कमांडरभक्ती आणि खालमान्या एककल्ली फॉलोअर कळप अशा प्रकारचे धर्मतत्व नसल्याने "आमच्या गल्लीचे आम्ही राजे" असं होतं. त्यात फायदेही आहेत आणि तोटेही.

हे वैशिष्ट्य जगभरात आपण कसे "लिबरल", "सप्तरंगी","विविधतेत एकता"वाले इ इ म्हणून एक्झॉटिक मिरवायचं तर मग असा मागास, "बेशिस्त", गोंगाटपूर्ण, अगंभीर, चार दिशांना चार तोंडे असलेला जमाव सहन करावाच लागणार..

..अशा दिशेने विधान म्हणून पाहतो.

मी Mon, 22/06/2015 - 15:09

In reply to by राही

मुद्दा सद्य परिस्थितीतल्या धार्मिक अंधतेच्या संदर्भात जमला तरी आयसोलेशनमधे गडबड आहे,

मुळात आपल्याकडे नागरी सभ्यता विकसितच झालेली नाही. 'आमच्या मनाचे/गल्लीचे/राज्याचे/जंगलचे आम्ही राजे' असेच आम्ही वागत असतो. शिस्तबद्ध वागणे ही एक सेक्यूलर कृती आहे, धार्मिक नव्हे.

सभ्यता हि एक सामाजिक कृती आहे, सेक्युलर समाजात असभ्य वागणे घडत नाही असा विचार मोठा रोचक आहे.

राही Mon, 22/06/2015 - 15:14

In reply to by मी

सिविलाय्ज़ेशन आणि कल्चरसाठी सभ्यता आणि संस्कृती हे शब्द वापरले जातात असे धरून नागरी सभ्यता हे शब्द वापरले होते.

राही Mon, 22/06/2015 - 16:24

In reply to by मी

शिस्तबद्ध वागणे ही एक अधार्मिक कृती आहे, धर्माज्ञेशी किंवा धर्मपालनाशी तिचा संबंध नाही असे म्हणायचे होते. सेक्युलरसाठी नेमका मराठी शब्द कोणता?

मी Mon, 22/06/2015 - 16:55

In reply to by राही

शिस्तबद्ध वागणे ही एक अधार्मिक कृती आहे, धर्माज्ञेशी किंवा धर्मपालनाशी तिचा संबंध नाही असे म्हणायचे होते.

अहो 'कळपातही' शिस्त असू शकते, पण तुम्हाला शिस्त सिव्हिक सेन्स ह्याअर्थी अपेक्षीत आहे काय? तसे असल्यास त्याचाही संबंध धर्म किंवा सेक्युलरतेशी कसा जोडता येइल?

राही Mon, 22/06/2015 - 17:06

In reply to by मी

त्याचा संबंध धर्माशी नाहीच जोडता येणार. जे धर्माशी संबंधित नाही ते सर्व सेक्युलर अशी साधी व्याख्या करता येईल कदाचित. भौतिक म्हणूया का? ऐहिक किंवा इहवादी म्हटले की कॉन्ट्रास्ट म्हणून समोर 'पारलौकिक' येतेच.
नेहेमीचे उदाहरण म्हणजे माझ्या घराभोवती मला कुंपण उभारायचे आहे तर ही सेक्युलर गोष्ट आहे. धर्माशी तिचा संबंध नाही.

adam Mon, 22/06/2015 - 15:15

खूपशी प्रार्थनास्थळं मला छान वाटत्/वाटतात. तिथे येणार्‍या पॉझिटिव्ह वेव्ह्ज, सकारात्मक ऊर्जेमुळे असं होतं वगैरे मला सांगण्यात आलं होतं.
माझ्या मते :-
प्रार्थनास्थळं स्वच्छ असतात. प्रार्थनास्थळं शांत असतात. कित्येकदा (काही चर्चेस व मशिदी) ती भव्यही असतात. म्हणून ती "उदात्त" वाटतात.
उदात्त वाटने ही गुणात्मक संकल्पना आहे; भावनेच्या पातळीवर आहे;म्हणून ते काहीतरी अद्भुत आहे; असं वाटतं.
पण पहिल्या तीन गोष्टी ह्या शुद्ध भौतिक-ऐहिक आहे. मापनीय (measureable ) आहेत.
.
.
कल्पना करा, छानसं मैदान, त्यात एक हिरवळ पसरलेली. दूरवर फारसा गोंगाट नाही. (पशुपक्षी,वारा,वाहतं पाणी ह्यांचे "आवाज" त्या वातावरणात आहेत, पण "गोंगाट" नाही.) अशा ठिकाणी एका साध्याशा कम्पाउंड मध्ये एक प्रशस्त हॉल आहे.हॉल चांगला तीन चार मजले उंच आहे. स्वच्छ आहे. हवा-प्रकाश खेळती राहिल अशी त्याची रचना आहे. आतम्ध्ये विशेष काही नाही. बसायला चार दोन खुर्च्या आहेत. एका ठिकाणी सतरंजी /गालिचा अंथररलाय . अशा ठिकाणी नुसतच बसायला छान वाटेल की नाही ?
.
किंवा नुसतच शेणानं सारावलेलं पण स्वछ खोपटं आहे. त्यामध्ये बसायलाही छान वाटेल, दारं मोकळी टाकून.

.
.
दोन्ही केसमध्ये देवाचा काही संबंध नाही तरी छान वाटतय.

शांतता आणि स्वच्छता राखणे किंवा पाळणे या संबंधी चर्चा चालू होती. आणि शिवाय ''आम्ही आणि 'ते' " असाही मुद्दा होता.

प्रतिसाद आवड्लाच आहे नो डाऊट.
अजुन एक फॅक्टर आहे मन- देवळात जाताना आपण विशिष्ठ मनस्थिती/मूड घेऊन जातो. त्याचा ही परीणाम होतोच की.

घाटावरचे भट Tue, 23/06/2015 - 09:59

जानीवारी महिन्यात पतियाळा येथे एका सरदार मित्राच्या लग्नाला गेलो होतो. गुरुद्वारात लग्न होतं. तो सगळा लग्नाचा विधी, तिथलं पवित्र वातावरण पाहून बायकोला विचारलं, इथे येऊन परत लग्न करायचं का?

पिवळा डांबिस Tue, 23/06/2015 - 10:06

In reply to by घाटावरचे भट

बायकोला विचारलं, इथे येऊन परत लग्न करायचं का?

जर आवडीचा जोडीदार असेल तर मग कितीही वेळा लग्न करायला हरकत नाही!!!

आम्ही मुंबईत पहिल्यांदा लग्न केलं. मग एक वर्षाने गोव्याला देवस्थानामध्ये पुन्हा एकदा लग्न केलं.
आणि मग लग्नाच्या २५व्या वाढदिवसाला कोजागिरीच्या चंद्राच्या साक्षीने पॅरिसच्या आयफेल टॉवरच्या माथ्यावर पुन्हा एकदा आणाभाका घेतल्या!!!!
तेंव्हा तुम्हाला प्रीसीडेन्स आहे!!! ;)

विवेक पटाईत Sat, 27/06/2015 - 15:43

लेख आवडला. बाकी हिंदू धर्माशी इतर धर्मांशी तुलना होऊ शकत नाही. आपल्या देवताला अनुभव करण्याची प्रत्येकाला त्याच्या परीने स्वतंत्रता आहे. आजकाल दिल्लीतही मंदिरे भव्य आणि स्वच्छ असतात. अधिकांश मंदिरांत , डॉक्टर, लेब, दातांचा डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट इत्यादीची सोय असते. (जनक पुरीतील जवळपास सर्व सनातन धर्म मंदिरांमध्ये - ३०% जास्त लोक पाकिस्तान मधून आलेले आहे (१९४७) बहुतेक संघाच्या विचारसरणीचा प्रभाव)

सामो Thu, 13/04/2017 - 23:51

गुरुद्वारा, व‌रुण , स्व‌प्न‌ कौल‌, शुभ‌ स्व‌प्ने आणि अध्यात्म‌ असा विष‌य‌ निघाला आहेच त‌र ल‌गे हाथो ईराव‌तीचा हा धागाही इच्छुकांनी वाचाच. इट इस इन्ट‌र‌सेक्श‌न ऑफ ऑल अबाव्ह थिंग‌स्.

http://www.misalpav.com/node/15577
.
माझा स‌र्वाधिक‌ प्रिय‌ धागा!! म‌नास शांती मिळावी म्ह‌णुन कितीदा त‌री हा धागा वाच‌ते.

अमृता प्रीत‌म‌ यांच्या अजुन‌ एका क‌वितेब‌द्द‌ल‌चा हा आण‌खी एक सुंद‌र‌ लेख्-

https://www.lifepositive.com/visions-of-divinity/

सामो Tue, 02/10/2018 - 20:23

आदल्या रात्री मला निळ्या तळ्याचे , स्वच्छ पाण्याचे स्वप्न पडले होते अन हा संकेत मला महत्त्वाचा वाटतो.

गेले २ दिवस टेंबेस्वामी लिखित, 'गुरु चरित्र सार सप्तशती' वाचली अतिशय प्रसन्न स्वप्ने (कधी नव्हे ती) पडली. परत स्वप्नात स्वच्छ जल पाहीले. मला खूण पटली. तसेच गुरुचरित्र सार सप्तशतीच्या ३५ व्या अध्यायात 'गुरुचरित्र स्त्रियांनी का वाचू नये' याचे कारण सापडले.
कारण कोणाला पटो वा न पटो पण त्यांनी असे अनुरोधित (हिंट) केलेले आहे की स्त्रियांना सांगीतलेले मंत्र किंवा कोणतीही गोष्ट पट्ट्कन षट्कर्णी होते आणि एकदा षटकर्णी झाला की मंत्राचे सामर्थ्य नाहीसे होते.
यावर विश्वास ठेवायचा की नाही हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. अर्थात आडवाटेने, स्त्रियांवर 'पोटात काही ठेउ शकत नाही' असा आरोप आहे/असे म्हटले आहे.

पिवळा डांबिस Thu, 04/10/2018 - 08:38

In reply to by सामो

कारण कोणाला पटो वा न पटो पण त्यांनी असे अनुरोधित (हिंट) केलेले आहे की स्त्रियांना सांगीतलेले मंत्र किंवा कोणतीही गोष्ट पट्ट्कन षट्कर्णी होते

ह्यात कुणाला पटण्या ना पटण्याचा काय संबंध, शुचि? हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे!!!! :)

राजेश घासकडवी Thu, 04/10/2018 - 09:56

In reply to by सामो

या दुव्यात केकेल्या अभ्यसानुसार पुरुष जास्त लवकर पचकतात. त्याला तोंडाबाहेर शब्दांचं शीघ्रपतन होतं असं म्हणता येईस का?

सामो Thu, 04/10/2018 - 10:35

In reply to by राजेश घासकडवी

राघा ती डेली मेल यु के , दिव्य मराठीचा इंग्रजी अवतार आहेसे कुठेतरी वाचले आहे. पण विदा खरा की खोटा ते जाउ देत, मला मुद्दा कळला. पूर्वीच्या काळी जेव्हा स्त्रियांना उपजीविकेकरता कोणताही औपचारीक व्यवसाय करावा लागत नसे, तेव्हा कदाचित अन्य व्यवधाने सांभाळूनही, वेळ मुबलक असण्याची शक्यता आहे. आणि त्या वेळेत कदाचित गॉसिपिंग जास्त होत असेलही.
पण आता तसे काही नाही. स्त्री पुरुषांच्या कामच्या वाटण्या, त्यांच्या प्रायॉरिटीज, त्यांना मिळणारा मोकळा वेळ हे सारे समान आहे असे असल्याने, तो धोका राहीला नाही, तो फरक राहीला नाही.
गुरुचरित्रात एका अध्यायात पतिव्रता निरुपण/ पतिव्रतेच्या धर्माचे आचरण कसे करावे याचे विवेचन आहे. विधवा स्त्रीच्या आचरणाचे विवेचन आहे. त्या काळी तेव्हाच्या सो कॉल्ड् सामाजिक स्वास्थ्याकरता ते आवश्यक असेलही पण त्याचा आता संदर्भ आऊटडेटेड आहे हे नक्की.

पण एक आहे, गुरु-शिष्य परंपरेत गुरुने सांगितलेले वाक्य ब्रह्मवाक्य मानले जाते, काळ्या पाषाणावरची रेघ मानली जाते त्यामुळे अजुनही लोक त्या त्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचा आग्रह धरत असतील तर नवल वाटू नये.

अनेक ठिकाणी मी पाहीले आहे की पाळीत देवाला जायचे नाही असे नवरा स्वच्छ सांगतो बायकोने जर 'का?' असा प्रतिप्रश्न केला तर त्याचे म्हणणे असते देव आहे हीच जर मुळी अंधश्रद्धा असेल तर तर तुम्ही ती अंधश्रद्धा पूर्ण तरी पाळा मग त्यात अन्य अंध नियम आले किंवा मग मूळापासून उखडुन टाका. म्हणजे मग देव नाहीच असे म्हणुन चाला.

गुरुचरित्राचेही तेच लॉजिक असावे. एक तर विश्वास ठेवा व सर्व पाळा नाहीतर मग वाटेला जाउ नका.

गवि Thu, 04/10/2018 - 11:44

In reply to by सामो

स्त्री जास्त पचकते की पुरुष ते जाऊदे. मुळात मंत्र षटकर्णी झाल्यास सामर्थ्य कमी होते यात काय अर्थ आहे? का नको मुक्त प्रसार?

आणि ते "शास्त्र" असल्याने सर्वकाही मान्य अशा प्रकारे मानलं, म्हणजे षटकर्णी झाल्यास सामर्थ्य कमी होते यात आपोआप तथ्य आहेच असं मान्य केलं तर मग ते पोथीरुपात वाचनासाठी उपलब्ध का केलं आहे? त्यामुळेसुद्धा ते अधिकाधिक कर्णी पसरतं आहेच की त्यातल्या मंत्रांसहित.

सामो Thu, 04/10/2018 - 17:06

In reply to by गवि

होय गवि मलाही तेच वाटले. परंतु, त्यामध्ये डायरेक्टली असे काहीच लिहीलेले नाही की 'गुरुचरित्र' वाचू नका. ते परत इन्टरप्रिटेशनच आहे.

त्यात असे वर्णन व कथा आहे की 'स्त्री ही मंत्रदीक्षेस अपात्र असते' व पुढे मग देवयानी-कच कथा येते. की शुक्राचार्यांना अवगत असलेला 'मृतसंजीवनी' मंत्र , ब्रह्मदेव व अन्य देवांनी कसा षटकर्णी करुन 'बुडवायचा' ठरविले. मग ब्रह्मदेवाने त्याच्या मुलास कचास धाडिले वगैरे.
__________
हांहे मात्र आहे की पोथीच्या माध्यमामार्फत हा ग्रंथच प्रत्यक्षात ष्टकर्णी झालेला आहे तर ते का? यावर हे उत्तर असू शकते की हे पहीली चार-पाच प्रकरणे दत्तात्रेय आणि श्रीपाआदांचा जन्मवृत्तांत असुण, पुढील ५२ पर्यंतची प्रकरणे, नृसिंहस्वामिंचे चरित्र म्हणा लीला आहेत. तेव्हा मंत्र असे फार नाहीत. पण नृसिंहस्वामिंचे (अंगावर रोमांच आणणारे अतिशय सुंदर) अष्टक यात आहे.

गवि Thu, 04/10/2018 - 11:47

In reply to by सामो

एक तर विश्वास ठेवा व सर्व पाळा नाहीतर मग वाटेला जाउ नका.

अवश्य. बरोबर. आणि जे खुद्द विरोधाभास किंवा विसंगतींनी भरलेलं आहे अशा कशाकशाच्या वाटेला लागून मग सुसंगती शोधत बसू नका.

तिरशिंगराव Thu, 04/10/2018 - 14:07

अंधश्रद्धेतून पूर्ण मुक्तता हवी असेल तर, गरुडपुराणातील, माणसाच्या मृत्युनंतर काय होते, त्याचे वर्णन वाचा. इतक्या विसंगतींने भरलेली भाकडकथा, यापूर्वी वाचली नव्हती.

चिमणराव Fri, 05/10/2018 - 11:47

तुला वाचावेसे वाटते कोणते पुस्तक किंवा पोथी, तर वाच. कुणाचं मत घेऊ नको, कुणाला सांगू नको.
मला काहीच करावेसे वाटत नाही , आणि असं का करत नाही असंही कुणी विचारू शकत नाही, किंवा भीतीही नाही त्यामुळे मुक्त आहे.