टिळक आणि जातव्यवस्था
http://anita-patil.blogspot.in/2012/10/blog-post_5.html या लेखात जे उतारे आहेत ते केसरीत असत काय हा प्रश्न मी यापूर्वीही विचारला होता.
मी हा सातत्याने ब्लॉग वाचत
मी हा सातत्याने ब्लॉग वाचत आलो आहे. ब्लॉगवर ब-याचशा गोष्टींचा अतिरेक असला तरी लेखन अभ्यासू आहे. विना संदर्भाचे लेखन ब्लॉगवर फारसे आढळून येत नाही. अलीकडे ब्लॉगवर नवीन लेखन नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पाच वर्षे लेखणी बंद करण्याचा निर्णय ब्लॉगकर्त्यांनी घेतल्याचे एका पोस्टवरून दिसते.
ब्लॉगची भाषा आणि मानसिकता
ब्लॉगची भाषा आणि मानसिकता नक्कीच चिंताजनक आहे, पण त्यांनी प्रतिपादन केलेल्या गोष्टी खऱ्या निघणं अजुनच दु:खदायक आहे. मला जातीच्या आधारावरून प्रेम वा द्वेष करणारे लोक इग्नोर करता येतात, मात्र ज्या लोकांना आयुष्यभर महान मानत आलेलो आहोत ते तसे नसणं हे मॅटर करतं. त्या ही पेक्षा दु:खाची गोष्ट अशी कि त्यांच्या चरित्राची अशी बाजू रिजनेबल वाचन असूनही शाळेनंतर २० वर्ष कळू नये. एका विशिष्ट वयानंतर कुठेतरी पुस्तकात, सिनेमात, पेपरात हे यायला हवं. याची पहीली दखल जर फक्त याच ब्लॉगने घेतली असेल तर (घ्यावी लागली असेल तर) मी त्याला रद्दी म्हणणार नाही. गांधींवर खूप वाचलेलं आहे नि माझी बरीच मतं त्यांच्याबद्दल वाईट झाली आहेत (मंजे पूर्विच्या अतिमहानएकमेवाद्वितीयमहापुरुष प्रतिमेपासून). पण त्यांच्या तोडीचे टिळक पूर्ण सुटले कसे (अज्यूमिंग ब्लॉग इज राइट)? १९२० (पूर्वी) पासून इमेज मॅनेजमेंट? मला वाटतं टिळकांच्या काळात, विशेषत: फुले पुण्याचेच होते, बहुतेक त्यांच्या अगोदरचे होते, म्हणून तरी, टिळक जातीयवादी असणं अजिबात अपेक्षित नाही.
म्हणून हे लेख खोटे निघाले तर ठिक नाहितर माझ्याकडून गांधींप्रमाणे टीळकांनापण डच्चू. आय अॅम वेटींग फॉर कॉलिंग इट रद्दि टू बी फेअर.
अजो , माझे मत असे की तुम्ही
अजो , माझे मत असे की तुम्ही टिळक आणि गांधी यांच्यावर अन्याय करताय . पूर्ण पुरुषोत्तम कोणीही नसतं . याच न्यायाने टिळक आणि गांधी ही नव्हते . त्यांच्यात (आजच्या parameters नि) अनेक न पटणाऱ्या गोष्टी होत्या . पण तरीही त्या दोघांचे contribution हे निदान माझ्या मते तरी निर्विवाद मोठे होते . हा ब्लॉग वाचण्याबरोबर इतरही पुस्तके वाचून अंतिम मत ( जर बनवायचेच असेल तर) बनवावे अशी विनंती .
तथाकथित बहुजनांचे कैवारी
तथाकथित बहुजनांचे कैवारी जी अडाण** मते लादू पाहतात त्याच्या कचाट्यात सापडणे अगदी सोपे आहे. अजोने तसे पडू नये अशी अपेक्षा. सिक्युलरांचा प्रोपोगण्डा दिसणाऱ्या अजोला या बाहेर बहुजनवादी पण मनातून पूर्णपणे मनुवादी असलेल्या मूर्खांची लबाडी दिसू नये हे एक महदाश्चर्य आहे.
त्या साईटचं कवरेज, सर्च,
त्या साईटचं कवरेज, सर्च, इ इ पाहिलं तर ते कोणत्याही अंगाने मूर्ख नाहित. फक्त ते अंध द्वेष्टे आहेत हे सुस्पष्ट आहे. काही सत्यांत काही असत्ये गुंफून पेरायची स्टाईल असेल.
============
माझा इंटेरेस्ट फार लिमिटेड आहे. शाळेने, पेपरांनी, पुस्तकांनी, ब्लॉगांन्नि, नेटने, समोर आणलेले टिळक आणि खरे टिळक. बाकी ब्राह्मणांचा भयंकर द्वेष करणाऱ्या लोकांची लहानपणापासून सवय आहे. म्हणून त्याची अभिव्यक्ति ब्लॉगवर झाली तर ती सवय कामाला येईल. पण मी इथे द्वेष या विषयावर बोलत नाहिये. सत्य या विषयावर बोलत आहे.
याने महान लोकांची प्रतिमा आपल्या कशी बनवायची असते, त्यांचा किती आदर करायचा किति नाही, किति प्रेरणा घ्यायची याचं माझं शिक्षण होइल.
गांधीजी मनातनं उतरले अस
गांधीजी मनातनं उतरले असले तरी त्यांनी जे काही पुण्य केलं आहे त्याची जाणिव आहे. तशीच टिळकांबद्दल असेल.
================
टिळक फुल्यानंतरचे आणि त्यांच्याच गावाचे पुढारी असून जातीतवादी कसे काय असू शकतात (असल्यास) हा एक व्हॅलिड प्रश्न आहे.
====================
बापट सर, आपण (पुरोगामी आणि प्रतिगामी) भूमिका नको एक्सचेंज करायला. तुम्ही पुरोगामीच शोभता.
===========
लेट्स स्टॉप डिस्कसींग धिस अनटिल समवन टेल्स व्हाट्स ट्रूथ्. बाजारात तुरी ....
>>टिळक फुल्यानंतरचे आणि
>>टिळक फुल्यानंतरचे आणि त्यांच्याच गावाचे पुढारी असून जातीतवादी कसे काय असू शकतात (असल्यास) हा एक व्हॅलिड प्रश्न आहे.<<
मला ह्या प्रश्नाचा रोख कळला नाही. 'टिळकांआधी फुले होऊन गेले होते' असं नक्की म्हणता येतं का? टिळकांचा जन्म १८५६चा आणि ते पुण्याला आहे १८६६ साली. १८७३ला फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि 'गुलामगिरी' लिहिलं. १८८१ला केसरी (आणि मराठा) चालू झाला. १८८३ साली फुल्यांनी 'शेतकर्याचा आसूड' लिहिलं. १८९०साली फुले गेले. १८९६चा दुष्काळ आणि १८९७ची प्लेगची साथ ह्या काळात टिळकांचं नेतृत्व बहरलं.
म्हणजे एक प्रकारे हे समांतर घडत होतं. बरं, कोणत्याही समाजसुधारणा कोणताही रुढीप्रिय समाज लगोलग स्वीकारत नाही. त्यातच, 'आधी सुधारणा की आधी स्वातंत्र्य' हा वाद तेव्हा जोरात होता आणि त्यात घेतलेल्या भूमिकांनुसार दोन तट पडलेले होते. टिळक अर्थातच सुधारणावादी गटात नव्हते. इतकंच काय, पुण्यातला बहुसंख्य ब्राह्मण समाज तेव्हा त्या बाजूला नव्हता. म्हणूनच तर सुधारणावादी 'पुरोगामी' ठरले.
थोडक्यात, टिळक फुल्यानंतरचे मानता येतात का? आणि दोघे पुण्यातले पुढारी होते म्हणून त्यांच्यात जातपात पाळण्या न पाळण्याविषयी एकवाक्यता असावी अशी अपेक्षा का?
आधी सुधारणा की आधी
आधी सुधारणा की आधी स्वातंत्र्य'
यात आधी सुधारणा कोणाची? लोकांची!! आधी स्वातंत्र्य म्हणणारांची नव्हे!!! लोकांची सुधारणा नंतर करू म्हणणं मान्य आहे, पण असा म्हणणारा स्वत: सुधारित असायला हवा ही अपेक्षा जास्त नाही.
१८७३ ला सत्यशोधक समाज आणि १८९७ चा प्लेग (जेव्हाचे दाखले लिंकमधे आहेत) म्हणजे नंतरचे म्हणायला पुरेसे आहे.
आणि दोघे पुण्यातले पुढारी होते म्हणून त्यांच्यात जातपात पाळण्या न पाळण्याविषयी एकवाक्यता असावी अशी अपेक्षा का?
अर्थातच. सगळ्या लोकांकडून न पाळून घ्यायला नसली तरी चालेल, पण दोघांत असायलाच पाहिजे होती. बेसिक आहे ते.
मूलभूत माहिती
>>लोकांची सुधारणा नंतर करू म्हणणं मान्य आहे, पण असा म्हणणारा स्वत: सुधारित असायला हवा ही अपेक्षा जास्त नाही.<<
तुमची अपेक्षा रास्त नाही असं मी म्हणत नाही आहे, तर टिळक त्याला उतरत नाहीत (आणि उपरोल्लेखित ब्लाॅगमधले दावे खरे नसले तरीही ते मान्य करावं लागेल) असं मी म्हणतोय.
>>अर्थातच. सगळ्या लोकांकडून न पाळून घ्यायला नसली तरी चालेल, पण दोघांत असायलाच पाहिजे होती. बेसिक आहे ते.<<
- फुल्यांची मांडणी ब्राह्मणांवर टीका करणारी होती;
- टिळक स्वतः ब्राह्मण होते आणि आगरकरांसारखे ब्राह्मणांवर टीका करणारे नव्हते.
- किंबहुना, आगरकरांच्या विचारांचे ब्राह्मण तेव्हा अल्पसंख्यच होते.
माझा इतिहासाचा विशेष अभ्यास नाही, पण ह्यात वेगळी किंवा नवी माहिती काहीच नाही. म्हणून तुमच्या आश्चर्याचं मला आश्चर्य वाटतंय एवढंच.
तिथेच तर अडचण आहे...
पूर्ण पुरुषोत्तम कोणीही नसतं .
अर्थात.
याच न्यायाने टिळक आणि गांधी ही नव्हते .
निश्चितच. आणि ते ठीकही आहे.
त्यांच्यात (आजच्या parameters नि) अनेक न पटणाऱ्या गोष्टी होत्या . पण तरीही त्या दोघांचे contribution हे निदान माझ्या मते तरी निर्विवाद मोठे होते . हा ब्लॉग वाचण्याबरोबर इतरही पुस्तके वाचून अंतिम मत ( जर बनवायचेच असेल तर) बनवावे अशी विनंती .
गांधींच्या काँट्रिब्यूशनचे महत्त्व यत्किंचितही कमी न करता, आणि गांधींबद्दल हलक्या आवाजात काही गोटांत जे काही बरेवाईट (रादर, बरेचसे वाईट) कुजबुजले जाते, त्यास पूर्णपणे डिस्काउंट करूनसुद्धा, गांधींबद्दल स्वतंत्र बुद्धीने काही बरेवाईट मत करून घेणे हे तुलनेने सहज शक्य आहे. याला कारण म्हणजे गांधींनी स्वत: इतक्या विषयांवर इतक्या ठिकाणी इतके लिहून ठेवलेले आहे, आणि हे सर्व मटीरियल जालावर आणि जालाबाहेर संकलित किंवा विस्कळित स्वरूपात आणि भाषांतरातसुद्धा इतके मुबलक आणि सहज उपलब्ध आहे, की ज्याला इच्छा आहे त्याने गांधींचे लेखन आणि विचार स्वत: फर्स्टहँड वाचावेत नि काय ते ठरवावे. (कदाचित तितक्या प्रमाणात नाही, परंतु काही अंशी सावरकरांबद्दलही तेच म्हणता येईल.)
टिळकांबद्दल तसे म्हणता येईल काय? साधा 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय' हा अग्रलेख (जो आमच्या पिढीलाही केवळ हियरसेनेच ठाऊक, तिथे पुढील पिढ्यांची काय गत!), शिंचा आहे तरी काय या कुतूहलाने अथपासून इतिपर्यंत वाचावा म्हणून गूगलसर्च मारला, तर सापडत नाही. नि त्यांचे बाकीचे प्रसिद्ध नि ठळक अग्रलेख आमच्या आजोबांच्या पिढीस कदाचित मुखोद्गत असतीलही, नि आमच्या तीर्थरूपांच्या पिढीतील बहुतांशास किंवा अनेकांसही नव्हे, तरी काहीजणांस तरी गेला बाजार त्यांची जंत्री ठाऊक असेलही. परंतु आमचे काय? आणि अशा परिस्थितीत त्या सर्व ठळक अग्रलेखकांची साधी तोंडओळख जरी आम्ही करून घ्यावी म्हटली, तरी ते सहजी कोठे उपलब्ध आहेत? वस्तुत:, टिळकांच्या उत्तराधिकाऱ्यांना, वंशजांना हे सर्व मटीरियल संकलित करून पब्लिकला उपलब्ध करून देणे सहज शक्य असावे. केसरीवाड्याच्या (गायकवाडवाड्याच्या) आर्काइवात नव्हे, जेणेकरून केवळ खास परवानगीनेच आणि त्या प्रेमाइसांतच ते अभ्यासूंना जातीने (आणि कदाचित ओळख नि बोना फाइडीस पटवून दिल्यानंतरच) उपलब्ध व्हावेत. तर जालावर, जेणेकरून जो चाहेल त्याला ते घरबसल्या उपलब्ध व्हावेत. असे करण्यात फायदाच आहे. एक तर लोकमान्यांचा वारसा पोस्टेरिटीसाठी कायमचा जपला जाईल, शिवाय लोकमान्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनीच असे केल्यास ती आवृत्ती अधिकृत (आणि म्हणूनच ऑथेंटिक असण्याची शक्यता अधिक) तरी राहील. (नाहीतर काय आम्ही अनिता पाटील ब्लॉगवर नाहीतर कोणाच्यातरी फेसबुक पानावर अवलंबून राहायचे?) पण लक्षात कोण घेतो? (दूरदृष्टी हा तसाही मराठी सद्गुण खासा नसावा.)
टिळकांचे अग्रलेख
टिळकांचे केसरीतील लेख/अग्रलेख अशा नावाने प्रसिद्ध आहेत. काही वर्षांपूर्वी एकदा वाचनालयात सहज दिसला म्हणून त्याचा एक खंड आणला होता. सरकारच्या डोक्याचे ठिकाण त्या खंडात होते का ते माहीत नाही. ते वाचण्याआधी टिळक आणि सुधारक ह्यांच्यात केवळ 'तात्त्विक' वाद होते अशी माझ्या मनात जी मधुरकल्पना होती, तिच्या हे लेख वाचून ठिकऱ्या झाल्याचे लक्षात आहे. काही लेख तर अगदी कोल्हापूर सकाळ आणि पुढारी ह्यांच्यातल्या भांडणासारखे वाटले होते व वैतागून पुस्तक ठेऊन दिले होते.
काही लेख तर अगदी कोल्हापूर
काही लेख तर अगदी कोल्हापूर सकाळ आणि पुढारी ह्यांच्यातल्या भांडणासारखे वाटले होते व वैतागून पुस्तक ठेऊन दिले होते.
या रेफ्रन्ससाठी जोर्दार टाळ्या. सकाळ-पुढारी लाथाळ्या कोणे एके काळी लय जोरात होत्या.
बाकी, पुण्यात आल्यावर पुढारीला लोक संध्यानंदच्या पंगतीस बसवत ते पाहून वाईट वाटे. पुढारी इतका वाईट कधीही नव्हता आणि नाही. किंबहुना मिरजेस आमच्याकडे कैक वर्षे एकमेव पेपर होता तो म्हणजे पुढारी. भरारी पुरवणीतले लेख, वा दा रानडे यांचे जागतिक राजकारणावरचे लेख, विश्वसंचार, इ. तेव्हा खूप भारी वाटायचे. आता नेटनंतर इतके काही वाटत नाही ते एक सोडून सोडा, पण अगोदर आमच्यासारख्या कैकांचे बालपण पुढारीने विदासमृद्ध केले हे नक्कीच. पुढे नेटवर मी मला लक्षात असलेल्या पुढारीत वाचलेल्या अनेक गोष्टी चेकवल्या तेव्हा त्या बरोबर असल्याचे दिसून आले. सो मच फॉर संध्यानंदी लेबल.
पुढारीच्या रविवार बहार पुर
पुढारीच्या रविवार बहार पुरवणीत 'सोमाजी बिन गोमाजी' या नावाने ऐतिहासिक भाषेत कंटेंपररी राजकिय घटनांवर टिप्पणी करणारे सदर कुणी तरी लिहायचे. ते जबरदस्त होते. अतिशय टंग इन चिक असायचे त्यातील विनोद आणि भाषेचा लहेजा तर अप्रतिम.
शिवाय पुढारीचे अग्रलेख बरेच निष्पक्ष आणि निर्भीड असत/असतात(म्हणजे कॉंग्रेस आणि भाजप दोघांनाही झोडपतात :प). डोक्यात जाणारी एकमेव गोष्ट म्हणजे प्रतापसिंव्ह जाधव आणी त्यांचे सुपुत्र यांच्यावर एका दिवसाआड येणारी कौतुकसुमनं..
आमचा गावी पेपरचा धंदा आहे, लोकांचा पुढारीवर किती विश्वास आहे हे माहित आहे. आमच्याकडे पुढारी/लोकमत यांचे गुणोत्तर ३:१ एवढे विषम आहे पुणे पुढारी सुरू झाल्यापासून(पुर्वी १:२ होते ऑलमोस्ट).
गाव: निमगाव केतकी, ता.
गाव: निमगाव केतकी, ता. इंदापुर, जि. पुणे..
बाकी ते सोमाजी बिन गोमाजी फक्त कोल्हापूर पुरवणीत यायचे बहुधा.
हो, नंतर पुणे पुरवणीतदेखिल येत असे.
सोमाजी म्हणजे कोण याची जबर उत्सुकता मला आहे, कधी कधी प्रविण टोकेकरांवर वहिम येत असे.. आता वाटतं नसावेत ते..
आजो ह्यांनी जो मुद्दा मांडला
आजो ह्यांनी जो मुद्दा मांडला आहे त्याला थेट प्रतिसाद (किंवा प्रतिवाद) फार कमी दिसत आहेत। केवळ 'त्या' ब्लॉगकरत्याचा पूर्वेतिहास बघणे, हे प्राथमिक अनुमान काढण्यापुरते ठीक, पण निष्कर्ष काढण्यास कितपत उपयोगी आहे?
कोणत्याही लोकोत्तर नेता किंवा व्यक्तीला देवत्व (सर्वगुण परिपूर्ण, ह्या अर्थाने) बहाल केलेच पाहिजे हा आग्रह चुकीचा नव्हे का?
त्यातून, लोकमान्य टिळक ह्यांनी स्वतःच (वेदोक्त प्रकरण, पंच हौद मिशन प्रकरण हीं अजून कांही उदाहरणे) आपण मुळातून, सनातनी ब्राह्मण/हिंदू धार्जिणे आहोत ह्या टीकेला वाव दिला असे वाटते।
आजो ह्यांनी, त्यांनी स्वतःच (वेदोक्त प्रकरण हे अजून एक उदाहरण) आपण मुळातून, सनातनी ब्राह्मण/हिंदू धार्जिणे आहोत ह्या टीकेला खूपच वाव दिला असे वाटते। आजो ह्यांनीच म्हटल्याप्रमाणे, लोकोत्तर व्यक्तींच्या अश्याही बाजू पुढे न येणे ही आपल्या बौद्धिक अभिसरणातील उणीव दाखविते।
इतक्या गंभीर विषयावर काही उथळ आणि आक्रमक प्रतिक्रिया वाचून खेद वाटला।
टिळकांना देवत्व नाही द्याय
टिळकांना देवत्व नाही द्यायचंय. पण त्यांन्नी जातपात नाही पाळली पाहिजे. पाळत असले तर ते लोकमान्य कसे. आपण सनातनी हिंदू आहोत असे गांधी पण म्हणत. पण ते जातीयवादी इ इ नव्हते. असेच टिळक असायला पाहिजे होते (नव्हते तर बरं का. मी काही अजून कंक्लूजन काढलेलं नाही). मला ते उत्तर ध्रुव, संस्कृत प्रेम, गीतारहस्य, वेदोक्त, कुठेतरी चहा न पिणे, इ इ माहित आहे, पण ते जातीयवादी नसलेला माणूस पण करतो. लेखिकेने दिलेले टिळकांचे अग्रलेखांतिल शब्दांचे चयन अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे नि कोणत्याही काळातल्या "लोकमान्य" नेत्याला साजेसे नाही. उद्या मोदींचा इतिहास "गोध्रा होगा तो अहमदाबाद होगा" या वचनांशिवाय देणे म्हणजे त्यांचा जातियवाद वा अपरिपक्वता (जे काय ते) लपवण्यासारखे आहे.
+१
आपल्याकडे म. गांधींना जेव्हढं अनेक चष्म्यांतून, अनेक अंगांनी तपासलं गेलंय, विच्छेदन केलं गेलंय, तेव्हढं लो. टिळकांना तपासलं गेलेलं नाही. त्यांच्या कृती, स्वभाव, लेखन यांची झडझडीत चिकित्सा झालेली नाही. किंबहुना टीका फारशी दिसतच नाही. न.चिं. केळकर यांनी लिहिलेलं लो.टिळकचरित्रही गुळमुळीत वाटतं. गणपति उत्सवामागची प्रेरणा अनेकांना ठाऊक होती. तुरळक उल्लेखही आहेत. पण त्याचीही झाडाझडती घेतली गेलेली नाही. (मी वाचले आहेत पण नक्की संदर्भपुरावे आता मजपाशी नाहीत.) लखनऊ करार हा अजूनही नीटसा समीक्षिला गेला नाहीय. १९१६मधे गांधी फारसे प्रभावी नव्हते. टिळकांनी जीनांचा आक्रमकपणा पुरेसा जोखला नाही असे मला वाटते. पुढे गांधींनी जीनांमधली सत्तालालसा आणि मुस्लिमांचा एकमेव नेता बनण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी हे स्वभावगुण ओळखले आणि हळूहळू त्यांचे महत्त्व कॉ़ग्रेसमधून कमी केले. टिळकांकडे कदाचित अॅकॅडेमिक विद्वत्ता अधिक होती, पण द्रष्टेपणा, करुणा, सामाजिक समरसता बरीच कमी होती असेही मला वाटते. त्या काळाच्या चौकटीत बोलायचे तरीही टिळकांसमोर ब्राह्म समाज होता, गोखले, न्या. रानडे, आगरकर, फुले होते पण (कदाचित ब्राह्म समाज सोडून) या सर्वांवर त्यांनी अतिशय कटू आणि टिंगलटवाळीयुक्त टीका केली. पुढे अत्र्यांनी ही शैली टोकाला नेली. उलट गांधींचे लेखन वाचले तर त्यात व्यक्तिगत टीका कधीही दिसणार नाही. 'विचारांचा सामना विचारांनी' हे तत्त्व त्यांनी पुरेपूर आचरणात आणले होते. असो. मात्र आयुष्याच्या शेवटी शेवटी लो. टिळकांना यातल्या काही बाबी उमजल्या होत्या असे म्हणण्यास जागा आहे.
बाकी सर्व ठीक, पण...
पण त्यांन्नी जातपात नाही पाळली पाहिजे. पाळत असले तर ते लोकमान्य कसे.
पहिले वाक्य ठीक असू शकेलही. दुसरे वाक्य काही पटले नाही ब्वॉ. (तर्कास धरून वाटले नाही.)
समजा, टिळक जातपात पाळत होते, असे क्षणभर मानून चालू. (होते की नव्हते, ईदर वेज़ मला नक्की माहिती नाही, आणि तूर्तास तो मुद्दाही नाही. पण समजा होते.) तरीही, का असू नये त्यांनी लोकमान्य? लोकमान्यतेचा नि जातपात पाळण्या-न पाळण्याचा संबंधच काय?
लोक (बोले तो, लोकांच्यापैकी ज्यांना काही से होता, असे. ज्यांना हिंग लावून विचारले जाण्याची काही शक्यता होती, असे.) तरी कोठले जातिनिरपेक्ष होते? लोक जर स्वत: जातपात पाळणार, तर का नाही जात पाळणाऱ्याला मान्यता देणार? यथा लोक, तथा लोकमान्य!
लोकमान्यतेचा नि जातपात
लोकमान्यतेचा नि जातपात पाळण्या-न पाळण्याचा संबंधच काय?
१.लोकमान्य आणि जात पात पाळणाऱ्या लोकांची यादी देता येईल का? उदा. मंगल पांडे जात पाळे, पण ते सर्वांना माहीत आहे. म्हणून त्याला चरबी असंतोषाचा जनक अशी प्रतिमा बहाल आहे/करता येते.
२. मी देखिल जात पात मानतो. वा मानणे गैर नाही म्हणतो. पण फक्त अन्य कोणत्या जातीला कमी लेखणे वेगळे आणि जातपात मानणे वेगळे. मंजे मी स्वत्:ला भारतीय मानतो पण चिनी असणं मी कमी मानत नाही. तसं. जातीचे अनेक अस्पेक्ट्स आहेत, त्यातले तुमच्या जातीचे काही तुम्हाला आवडत असू शकतात.
३. तुमच्या याच अर्थाने गुलाम ठेवणारा वॉशिंग्टन शुक्लकृष्णवर्णियमान्य म्हणता येईल का? म्हणजे गुलाम ठेवणे त्याला मान्य, गुलाम असणे गुलामांना मान्य म्हणून जॉर्ज सर्वमान्य?
यथा लोक, तथा लोकमान्य!
जे चित्र समोर उभं केलं जातं त्यात इतकं स्पष्ट साफ थोडंच लोकमान्यत्त्व व्याख्यित केलं आहे? त्यांचं चित्र पुरोगामी असं आजच्यांना दिसतं. म्हणून लोकमान्यत्वाची जुनी धारणा नि तसे लोकमान्य हे कुठं सगळं सांगीतलं जातंय?
कृपया माझं चरित्रण थांब
कृपया माझं चरित्रण थांबवा. मला फुकाच टिळकांना (वा अनिता पाटिल यांना देखिल) बदनाम करायची इच्छा नाही. मी ज्या स्रोतांवर विश्वास ठेवतो त्यांना चाचपून समाधान करून घ्यायचं आहे. "माझ्या निकषांवर" मला टिळकांना नि:संशय महान मानायचं आहे किंवा काही अपेक्षा मुडपून घ्यायच्यायत.
मला टिळकांच्या चरित्राचा
मला टिळकांच्या चरित्राचा अभ्यास नाही करायचाय. (मंजे करायला हरकत नै, पण प्राधान्य नाही.) पण कोणि जर वाचले असेल तर टिळकांचा जातियवाद (तसं काही असल्यास) नव्हता, किंवा गौण होता, किंवा त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील धन योगदान आणि समाजसुधारणेतील ऋण (?) योगदान यांची बेरीज कशी होते असं मत मांडायला हरकत नाही.
===========================
लोकोत्तर पुरुषांबद्दल आदर ठेवणे चालूच राहील, मात्र विशिष्ट विषयावरील त्यांचे मत जाणून "लोकमान्य" शब्दाचा शब्दश्: अर्थ काढायचे थांबेल.
पन लोकमान्य म्हणजे
पण.. लोकमान्य म्हणजे लोकांना मान्य(राजकिय दृष्टीने) असणारा नेता या अर्थाने म्हटलं जातं ना(बादवे, ही पदवी कुणी दिली?).. जातपात माननारा माणूसदेखिल राजकिय नेता म्हणून आवडू शकतोच की लोकांना(उलट अधिक आवडतो).. लोकांना त्याम्च्याकडून ज्या राजकिय अपेक्षा असतील त्या पूर्ण झाल्या की बास. शिवाय टिळक त्यांच्या काळाच्या मानाने बरेच पुढारलेले म्हणावे लागतील, त्यांच्याच काळातील सनातनी त्यांच्यावर डूख धरून होतेच की.
शिवाय व्यक्तिगत जीवनात त्यांनी जातीभेद केल्याचे उदाहरण आहे का? तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हंटले जाते, त्यांचा उमाजी नाईक(?)लहूजी वस्ताद आदींशी असणारा स्नेह, त्यांच्या शिष्यांना नाईकांच्या तालमीत पाठवणे वगैरे घटनांमधून फार कर्मठ ब्राह्मण ते नसावेत असे वाटते. त्यांनी स्वत्:च्या मुलीचे लग्न ती सोळा वर्षांची झाल्यावर केले, म्हणजे बालविवाहाला समर्थन वगैरे पण फक्त राजकिय असावे.
आणि तसेही त्या काळच्या कॉंग्रेसमध्ये ज्या जेवणावळी व्हायच्या त्यात कोकनस्थ, देशस्थासाठी सुद्धा वेगळे आचारी असायचे. म्हणजे सगळ्या जातपात फाट्यावर मारणाऱ्या राजकिय नेत्यांत हेच तेवढे प्रतिगामी, जातीवादी असे काही नव्हते.
गांधींचे वेगळे म्हणावे लागेल, बनारस हिंदू विद्यापिठाच्या उदघाटनावेळी केलेल्या भाषणापासून रॅडिकल सुधारणावादी भुमिका घेतली होती. सामजिक सुधारणा- राजकिय जागृती हे हातात हात घालून जाईल ही भुमिका त्यांनी सुरुवातीपासून घेतली आणि अखेरपर्यंत त्यापासून ढळले नाहीत(त्यांना सामजिक सुधारणा घडवून आणण्यात यश किती मिळाले हे सोडून द्या..)
टिळकांना लोकमान्य म्हणावे की नाही ते जात माननारे होते(१००- १२० वर्षापुर्वी) यावर ठरणार असेल तर ते चुकीचे वाटते..
हे अधिकच निष्हेधार्ह नाही का?
>>फार कर्मठ ब्राह्मण ते नसावेत असे वाटते. त्यांनी स्वत्:च्या मुलीचे लग्न ती सोळा वर्षांची झाल्यावर केले, म्हणजे बालविवाहाला समर्थन वगैरे पण फक्त राजकिय असावे.
हा प्रकार हल्ली तरी निष्हेधार्ह मानला जातो. एखादी चळवळ करणे आणि स्वत: मात्र त्याविरोधात वर्तन ठेवणे. उदा. बाळ ठाकरे मराठीचा मुद्दा मांडत होते तेव्हा त्यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात अशी टीका त्यांच्यावर होत होती.
एखादी गोष्ट हिताची असूनही त्याला राजकीय हेतूने विरोध करणे आणि स्वत: मात्र ती हितकारक गोष्ट करणे हे निषेधाचे कारण असू शकते.
मूळ लेख वाचता आला नाही (इथून
मूळ लेख वाचता आला नाही (इथून लिंक उघडत नाही)
प्रतिक्रिया वाचल्या. त्यावरून मूळ लेखात नेमके काय असेल याचा थोडाफार अंदाज करता आला.
अजो, तुम्हीही आजच्या पॅरामीटरवरून कालच्या घटनांचे मूल्यमापन करण्याच्या वैचारिक सापळ्यात अडकलात असं वाटतं.
छ. शिवाजींना सेक्युलर ठरवण्यार्यांच्या नादी लागलात की काय?
लोकमान्याने किंवा लोकप्रिय नेत्याने (आजच्या आणि कालच्याही) रुढ निकषांप्रमाणे जातपात न मानता कायम पॉलिटिकली करेक्टच राहावं हा आग्रह कशासाठी ? आपल्या इतिहासकारांवर आणि भाष्यकारांवर याचा प्रचंड दबाव जाणवतो. त्यामुळे ऐतिहासिक व्यक्तीचं नीट मूल्यमापन तर सोडाच आपण अभ्यासही नीट करू शकत नाही. उदा. 'इंदू सरकार' सारख्या चित्रपटाचा प्रचार सुद्धा लोक करू देत नाहीत. दुसरीकडे (वैचारिक मांडणीत) कालपर्यंत धर्मांध असलेले अडवाणी आज ज्येष्ठ व्यक्ती झाले आहेत. आदित्यनाथ आल्यावर मोदी मवाळ झाले आहेत. उद्या अजून कोणी जहाल नेता आल्यावर आदित्यनाथ प्रेमळ व सेक्युलर वाटू लागतील. चालायचंच.
टिळक हे जातव्यवस्था मानत होते व त्याचे पुरस्कर्ते होते या दृष्टीने तुम्ही अभ्यास सुरू करू शकता व काहीही निष्कर्ष काढू शकता; ती मुभा सगळ्यांना आहे कारण टिळक ब्राहमण होते. या संधीचा जरूर लाभ घ्यावा. इतर जातीतील व्यक्तींबद्दल (अपवाद-गांधी) तुम्ही थेट चिकित्सक असं काही बोलू शकत नाही हे आजचं वास्तव आहे.
सर्व सहभागी प्रतिसादकांना- दुसरा मुद्दा असा की येथे आधी सुधारणा की आधी स्वातंत्र्य या मुद्द्यावरही बरीच चर्चा झालेली दिसते. मग १९४७ साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ते कुठल्या तत्वानुसार? आधी सुधारणा झाली व नंतर स्वातंत्र्य मिळाले? की आधी आपण स्वातंत्र्य घेऊन आता सुधारणा करतो आहोत? नेमकी कोणती विचारप्रणाली यशस्वी ठरली व किती प्रमाणात ? विसाव्या शतकातील इतक्या वैचारिक घुसळणीचा नेमका उपयोग काय झाला? (इथे सुधारणेची चिकित्सा करताना शांतताप्रिय पंथांचाही विचार करणे गरजेचे आहे.)
टिळक हे जातव्यवस्था मानत होते
टिळक हे जातव्यवस्था मानत होते व त्याचे पुरस्कर्ते होते या दृष्टीने तुम्ही अभ्यास सुरू करू शकता व काहीही निष्कर्ष काढू शकता; ती मुभा सगळ्यांना आहे कारण टिळक ब्राहमण होते. या संधीचा जरूर लाभ घ्यावा.
मी ब्राह्मण आहे आणि टिळक पण आहेत म्हणून टिळक जातीयवादी नसलेलं आणि खरेखुरे लोकमान्य असलेलं पाहायला आवडेल. थांबा. वादग्रस्त वाटेल हे वाक्य, पण माझा मतितार्थ सांगतो. ब्राह्मण असणे या गोष्टिचे अनेक चांगले पदर असतात, म्हणून ब्राह्मण असल्याचा अभिमान असणे, टिपिकल ब्राह्मणी सवयी असणे, संस्कृती असणे, विधी करणे, आपली जात सांगणे, जात पंचायतीत असणे, इ इ गोष्टि काळामानाप्रमाणे ओके आहेत. मात्र इतर जातिंबद्दल बोलताना किंवा पेपरात "आम्ही" म्हणजे कोण हे सर्वनाम वापरतात कडवाहट असेल, प्रचंड संकुचितता असेल, अन्य जातिंबद्दल हलकेपणाची भावना असेल (ती अन्य जातिंना मान्य का असेना!!!) तर अशा व्यक्तिस तेव्हा तरी लोकमान्य का म्हणावे आणि आज तरी लोकमान्य काहीही डिस्क्लेमर न टाकता का म्हणावे?
===========
काळाप्रमाणे ब्राह्मणांना मूल्यमापनात ढिलाई देण्याचा निकष द्न्यानेश्वर आणि रामदासांनाही* बसेलच ना? पण ते रिलेटिवलि फार सेक्यूलर आहेत.
=====================
थोडक्यात ते ब्राह्मण आहेत म्हणून झोडा असं माझं धोरण नाही, असलं तर उलटं असेल, प्रेम असेल, म्हणून मला ते सवळेवादी निघाले तर चालतील पण जात्यंध असलेले चालणार नाहीत. तुम्हाला लिंक उघडलेली दिसत नाही, पण शब्दांचं चयन व्यक्तित्वाबद्दल बरंच काही सांगून जातं. मी ब्राह्मण आहे म्हणून ठिक आहे, मी महार असतो तर त्यांना लोकमान्य मानणं तत्क्षणि बंद केलं असतं, इतकं ते वाईट आहे. आणि असं मटेरियल या ब्लॉगवर (आणि तत्सम काही विकिवर्) असताना त्याचा प्रतिवाद न करणं हे टिळकांवर (वा ब्राह्मणांवर?) अन्याय होऊ देत राहण्यासारखं आहे.
म्हणून दूध का दूध, पानी का पानी होऊ देत ना, ते शब्द त्यांचेच आहेत का हे कळू देत.
========================
* याच ब्लॉगवर रामदासांची बदनामी पण आहे, पण निराधार आहे असं मानणं मी पसंद करतो.
अजोंच्या मूळ मुद्द्याशी सहमत.
१)अजोंच्या मूळ मुद्द्याशी सहमत आहे.
टिळक आपल्या विरोधकांना झोडपताना कसलाही मुलाहिजा ठेवीत नसत. हीच शैली पुढे बाळासाहेब ठाकरे आणि आचार्य अत्रे यांनी अतिलोकप्रिय केली. पण या दोघांच्याही उक्ती आणि कृतीमध्ये प्रचंड विरोधाभास होता जो टिळकांमध्ये शोधूनही सापडला नसता. ते चारित्र्यसंपन्न होते. (त्यांच्या आजूबाजूच्या केळकर-खाडीलकरादिंचे काही एक वर्तन समाजमान्यही होते तरीही.) अर्थात एखाद्याच्या सार्वजनिक कर्तृत्वाचे मूल्यमापन करताना त्याचे वैयक्तिक चारित्र्य विचारात घ्यावे किंवा नाही हा वेगळा आणि अलीकडचा प्रश्न. शिवाय त्या काळीही सुधारकातल्या मुळमुळीत लेख आणि अग्रलेखांपेक्षा किंवा रानडे-गोखले यांच्या विद्वत्तापूर्ण, मुद्देसूद पण सौम्य युक्तिवादापेक्षा केसरीतले तिखट झणझणीत लिखाण लोकांना अधिक आवडत असे.
टिळकांनी संमतीवयाच्या कायद्याला कडाडून विरोध केला.
स्त्रीशिक्षणालासुद्धा त्यांनी सपाटून विरोध केला. हुजूरपागा शाळा (तेव्हा नाव वेगळे होते.) सुरू होऊ नये म्हणून पराकाष्ठा केली.
कुठल्याही सुधारणेची आणि सुधारकांची जोरदार खिल्ली उडवली.
पुढे नंतर गांधींनी सुधारणा आणि स्वातंत्र्य या दोन्हींना समान महत्त्व दिले. महिलांना राजकारणात आणि समाजकारणात दृश्यमान स्थान दिले. दलितोद्धार हा त्यांचा(ही एक) प्रमुख कार्यक्रम होता. दोन्ही मुद्दे हातांत हात घालून पुढे चालवल्याने आधी स्वातंत्र्य की आधी सुधारणा हा प्रश्नच उरला नाही.
"सरकारचे डोके ठिकाणावर आहे
"सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा केसरीतील अग्रलेख ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्त्वाचा असूनही दाबून का ठेवण्यात आला आहे, हा खरा प्रश्न आहे. तो दाबून ठेवण्यात आला आहे, याचा अर्थ त्यात काही तरी दडवण्याजोगे आहे. प्लेग काळात महार सैनिकांचा वापर करून इंग्रज सरकारने फवारणी केली, याला विरोध करण्यासाठी हा अग्रलेख लिहिला गेला आहे, असे अनिता पाटील यांच्या ब्लॉगवरील लेखात म्हटले आहे. ते खरे असावे, असे या दडवादडवीवरून वाटते.
याच ब्लॉगवरील खाली दिलेलया
याच ब्लॉगवरील खाली दिलेलया लिंकमधील लेख वाचा. अजोंनी उपस्थित केलेल्या काही प्रश्नांची उत्त्तरे त्यात मिळू शकतील. टिळकांना मंडालेच्या तुरुंगात असताना इंग्रजांनी सन्मानाची वागणूक दिली होती, असे या लेखावरून दिसते. या लेखात दोन मुद्दे महत्त्त्वाचे आहेत, असे वाटते.
१. तुरुंगात टिळकांच्या मागणी प्रमाणे त्यांना ब्राह्मण स्वयंपाकी पुरविण्यात आले होते.
२. टिळकांचे बहुतांश सारे अनुयायी ब्राह्मण होते, हे दोन मुद्दे अधिक महत्त्त्वाचे आहेत.
Non sequitur
१. तुरुंगात टिळकांच्या मागणी प्रमाणे त्यांना ब्राह्मण स्वयंपाकी पुरविण्यात आले होते.
हे एक मायनर कन्सेशन (ह्यूमॅनिटेरियन ग्राउंड्सवर म्हणा किंवा कसेही) असू शकते, परंतु याचा अर्थ मंडालेच्या तुरुंगात रंभा टिळकांच्या टकलावर तेल थापायला येत असे आणि उर्वशी त्यांचे पाय चेपून देत असे (साभार: पु.ल.), असा घेता येईलसे वाटत नाही. सबब...
टिळकांना मंडालेच्या तुरुंगात असताना इंग्रजांनी सन्मानाची वागणूक दिली होती, असे या लेखावरून दिसते.
...स्वर्गप्रवासाकरिता सुतासारखा धागा नसावा, असे दृग्गोचर होते.
कुठल्यातरी (जरा प्रचारकी
कुठल्यातरी (जरा प्रचारकी थाटाच्याच) पुस्तकात, टिळकांना नंतर तुरुंगातल्या जेवणाचा बराच त्रास होऊ लागला होता, तेव्हा कोणीतरी (जेलरने?) त्यांना (का माहित नाही, पण) गूळ-खोबरं द्यायला सुरुवात केली होती, असं वाचल्याचं आठवतं. नंतर दिवसरात्र तेच खाल्ल्याने त्यांना परत त्रास होऊ लागला, तेव्हा ते थांबवण्यात आलं. तुरुंगातून सुटल्यावर ते आपला तो प्रसिद्ध शेला त्याला भेट देऊन गेले. पुढे पण बरंच कायकाय आहे, पण ते असो.
असो. ब्लॉगमध्ये एकाच पुस्तकातले प्रचंड दाखले दिलेले आहेत. कोणाकडे ते पुस्तक उपलब्ध आहे का? असल्यास, कोणी शहानिशा करु शकेल तर पूर्णच वादावर कायमचा पडदा पडेल. मुंबईत ही पुस्तकं मिळणं म्हणजे नशीबच हवं जोरावर.
"या लेखात जे उतारे आहेत ते
"या लेखात जे उतारे आहेत ते केसरीत असत काय" हा प्रश्न अजोंनी विचारला, पण त्याचं सरळ उत्तर कुणीच देत नाही. हे फारच बोलकं आहे असं म्हणता यावं का?
मला नक्की माहिती असतं तर मी पहिल्या झटक्यात सांगितलं असतं. निव्वळ अजोच्या प्रश्नाखातर केसरीवाड्यात जाऊन शोध घेत नाही म्हणजे बोलकं आहे का? ज्याला कुणाला माहिती आहे त्याने सांगावे खुशाल. अन्य नेत्यांच्या लिखाणातूनही असे नगेट्स नक्की काढता येतील. टिळकांना बामन म्हणून झोडपणं सोपं, बाकीच्यांचे काय? आंबेडकरांचे इस्लामविषयक विचारही असेच कोणी उघड करत नाही. :)
http://anita-patil.blogspot
http://anita-patil.blogspot.in/2012/05/blog-post_6334.html
याच लेखातील परिचछेद :
१. भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००.
या पुस्तकातील काही उल्लेख पुढील प्रमाणे :
अ) २० जुलै १९०५ रोजी बंगालच्या फाळणीचा निर्णय लॉर्ड कर्झनने घोषित केला. त्याविरुद्ध टिळकांनी केसरीत लेखमाला लिहून रान माजविण्याचा प्रयत्न केला. बंगालची फाळणी रद्द करावी, ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकावा आणि राष्ट्रीय शिक्षणसंस्थांची स्थापना करून स्वदेशी शिक्षणाची व्यवस्था करावी, अशी त्रिसूत्री टिळकांनी जाहीर केली. (पान ८५)
ब) टिळकांना एकेक समर्थ अनुयायी मिळत होते. ‘मराठा'चे संपादक तात्यासाहेब केळकर, ‘केसरी'चे सहसंपादक कृष्णाजीपंत प्रभाकर खाडिलकर, कर्नाटकसिंह गंगाधर देशपांडे, टिळकांचे परममित्र अमरावतीचे दादासाहेब खापर्डे, नागपूरचे डॉ. मुंजे, यवतमाळचे बापूजी अणे या अनुयायांनी आपल्या नेत्याचा संदेश देशाच्या कानाकोप-यांत पोहोचविला. (पान ८७)
क ) टिळकांनी परिस्थितीचा सांगोपांग विचार करून १९०७ सालचा आपला कार्यक्रम आखला. न. चि. केळकर, कृ. प्र. खाडिलकर, गंगाधर देशपांडे, दादासाहेब खापर्डे आदि कार्यकर्ते टिळकांचा संदेश देशाच्या कानाकोपèयात पोहोचविण्यास सिद्ध होतेच. (पान १०४).
बापूजी अणे?
अणे म्हणजे मूळचे अन्नमवार ना?१ मग ते ब्राह्मण असण्याबाबत साशंक आहे.
नाही म्हणजे ते ब्राह्मण असण्यानसण्याने खरे तर काहीच फरक पडू नये, परंतु त्याने 'सगळेच ब्राह्मण होते' थियरीला छेद जाऊ शकतो, इतकेच.
(बहुतांश ब्राह्मण होते, हे तरीही खरे असू शकेलही, परंतु कम से कम एक ग़ैर-बम्मन ने उन्हें उन का अनुयायित्व जताने के क़ाबिल समझा, चलो इतना ही सही|)
..........
१ ऐकीव माहिती; चूभूद्याघ्या. मात्र, त्याच न्यायाने काणे हे मूळचे कन्नमवार ठरू नयेत. (पुन्हा चूभूद्याघ्या.)
अन्य नेत्यांच्या लिखाणातूनही
अन्य नेत्यांच्या लिखाणातूनही असे नगेट्स नक्की काढता येतील. टिळकांना बामन म्हणून झोडपणं सोपं, बाकीच्यांचे काय? आंबेडकरांचे इस्लामविषयक विचारही असेच कोणी उघड करत नाही.
आंबडेकरांना दलित नेते म्हणतात. लोकमान्य किंवा लोक नेते नव्हे. आंबेडकरांनी स्वत:ही आपल्याला देशातील सर्व समाजाचे नेते म्हणवून घेतले नाही. ते दलित नेते म्हणूनच वावरले. टिळकांचे तसेच नाही. टिळकांना लोकमान्य म्हटले जात असेल, तर त्यांची चिकित्सा त्याच पातळीवर होणार.
आंबडेकरांना दलित नेते म्हणतात
आंबडेकरांना दलित नेते म्हणतात. लोकमान्य किंवा लोक नेते नव्हे. आंबेडकरांनी स्वत:ही आपल्याला देशातील सर्व समाजाचे नेते म्हणवून घेतले नाही. ते दलित नेते म्हणूनच वावरले. टिळकांचे तसेच नाही. टिळकांना लोकमान्य म्हटले जात असेल, तर त्यांची चिकित्सा त्याच पातळीवर होणार.
करा की चिकित्सा, अडवलंय कोण? उलट त्यांच्यावर टीका केली की आजकाल वाहवा वगैरे होते तेव्हा वाहत्या गंगेत हात धुवून घ्या अजून, अनमान करू नका. बाकीच्यांच्या अस्मिता फार टोकदार झाल्यात आणि संख्याबळावरती त्यांचा धाक वगैरे दाखवतात. लोकशाही ही संख्याठोकशाही असल्याने बहुसंख्यांची मक्तेदारी चालते, चालायचंच. तेव्हा गो ऑन! :)
बाकीच्यांच्या अस्मिता फार टोक
बाकीच्यांच्या अस्मिता फार टोकदार झाल्यात आणि संख्याबळावरती त्यांचा धाक वगैरे दाखवतात.
बाकीच्यांपैकी कुणावर धागा काढायचा असेल तर व्हॉल्यूंटिअर करायला मी तयार आहे. संख्याबळ वैगेरे हे राजकारण्यांसाठी असतं. आपण थोडीच समाजात जाऊन भाषणं करणार आहोत? मात्र लोकप्रतिमा नि वास्तव नि शांतता हे क्रायटेरिया असतील तर इंटरेस्टिंग असेल.
मूळ मुद्दा संबंधित ब्लॉगवरील
मूळ मुद्दा संबंधित ब्लॉगवरील टिळकांबाबतच्या लिखाणाचा आहे. तो अशा वादावादीत बाजूला पडला आहे. या ब्लॉगवर जे मुद्दे मांडले गेले आहेत, जे काही संदर्भ वापरले गेले आहेत, त्यावर चर्चा व्हायला हवी. ब्लॉगवरील निष्कर्ष सत्याच्या निकषावर किती टिकतात, यावर चर्चा व्हायला हवी. त्याऐवजी टिळक का, अन्य नेते का नको यावर खल केला जात आहे.
'भटमान्य टिळक
बळवंतराव खरेच 'लोकमान्य' होते का केवळ 'भटमान्य' होते ह्याचा निर्णय आजच्या सन्दर्भात आणि आजच्या जाणीवांच्या पार्श्वभूमीवर करण्यासाठी इतकी शाई वापरायची काहीच आवश्यकता नाही. ते 'भटमान्य' होते असे मान्य करण्यात काहीच अडचण नाही. परन्तु 'भटमान्य' ह्या उपाधीऐवजी त्यांना त्या काळात 'लोकमान्य' ही उपाधि का चिकटली ह्याचा विचार करता येईल.
शतकाहून अधिक जुन्या काळात अशा त्या काळात त्यांचे अनुयायी ( म्हणजे त्यांच्या सभांना गर्दी करणारे, 'बघू या बळवंतराव आज काय म्हणतायत' असे म्हणत 'केसरी' उघडणारे इत्यादि, पक्षी गावोगावचे मध्यमवर्गी वकील, शिक्षक, कारकून, छोटे दुकानदार आणि व्यावसायिक, सर्वच जण कमीअधिक प्रमाणात 'भट'च होते. परकीय सत्ता, पारतन्त्र्य, हिंदुस्तानची हलाखीची स्थिति असल्या रोजच्या जीवनात न डोकावणाऱ्या बाबींशी 'लोकां'ना काही देणेघेणे नव्हते. (नंतरहि ही परिस्थिति फारशी बदलली असे म्हणवत नाही. १८९० च्या दशकापासून पुढे जन्मलेले शेकडो सर्व जातींचे आणि सामाजिक स्तरांवरचे सर्वसामान्य लोक माझ्या आसपास माझ्या लहानपणी होते. पारतन्त्र्याच्या त्या दिवसात ते बहुतेक जण सज्ञानहि होते. पण त्यापैकी मूठभर सोडले तर इतरांनी स्वातन्त्र्यप्राप्तीसाठी एखादी काडीहि उचलली असे मी म्हणणार नाही.) ह्याच अल्पसंख्य भटांनी आपल्यातीलच एक बळवंतराव इंग्रजांविरुद्ध धीटपणे उभा राहून दोन हात करायला तयार आहे हे पाहिल्यावर त्याला 'लोकमान्य' असे गौरवाने संबोधायला सुरुवात केली तर त्यामध्ये आज आपणास संताप आणण्याजोगे काय आहे? आजचे 'पुरोगामित्व' पूर्वलक्ष्यी प्रभावाने टिळकांच्या काळापर्यंत नेऊन त्यांचे 'लोकमान्य' हे बिरुद कसे कुचकामी आहे हे दाखविण्याचा हा कालबाह्य आणि अव्यापारेषु व्यापार कशाला आणि त्यातून कोणाच्या कपाळावर चार चांद लागणार आहेत?
कोणीहि कार्यकर्ता आपल्या स्वभावाला आणि शक्तीला रुचेल असे कार्यक्षेत्र आपल्या सभोवतालच्या परिसरातून निवडतो. टिळकांनी प्रथम उच्च शिक्षणाचा प्रसार हे क्षेत्र आणि नंतरच्या काळात वृत्तपत्रकारिता, सार्वजनिक उत्थान ही क्षेत्रे स्वत:साठी निवडली. त्यांचे सहकारी आणि अनुचर साहजिकच आसपासच्या ब्राह्मण समाजातील होते. आठवणीकार बापटांनी टिळकांच्या आठवणींचे जे तीन खंड प्रसिद्ध केले त्यातील शेकडो आठवणींपैकी जवळजवळ सर्व वर उल्लेखिलेल्या मध्यमवर्गीयांच्या आहेत. त्यांमध्ये कोणीहि ’दलित’ मला दिसत नाही.
महर्षि कर्व्यांनी विधवा स्त्रियांचा उद्धार आणि त्यासाठी त्यांचे शिक्षण हे क्षेत्र आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले. त्यांचे कार्य जवळजवळ पूर्णत: ब्राह्मण विधवांपुरते मर्यादित होते. त्यांनी बहुजन समाजातील विधवांसाठी काही केले नाही जरी खरे असले तरी तो मुद्दा त्यांच्याविरुद्ध कोणी उचलून धरतांना दिसत नाही. टिळकांनी ’रँड साहेबाचे आवडते महारसोल्जर’ घरात शिरतात आणि आणि जिकडेतिकडे फवारणी करतात ह्यावर 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' असा अग्रलेख लिहिला. ते शिपाई महार जातीचे असले काय आणि नसले काय पण टिळकांचा रोख शिपायांनी घरात दंडेलीने शिरणे ह्यावर होता. ते महार होते ह्यावर नाही, म्हणजे उत्तर हिंदुस्थानातून ब्राह्मण शिपाई आयात केले असते तर त्यांची दंडेली पचवता आली असती असे नव्हते. 'Every man's home is his castle' हे इंग्लंडमधल्या कायद्याचे मूलतत्त्व होते पण हिंदुस्तानी जनता गुलाम असल्याने त्यांना ह्याचा लाभ मिळत नाही ही बोचहि ह्या विधानामागे होती. हया अन्यायाच्या जाणीवेतूनच चाफेकर बंधूंची रॅंड साहेबाविरुद्धची कारवाई पार पडली. (सं. वि.गो.खोबरेकर-संपादित दामोदर हरि चाफेकर आत्मवृत्त.) ते चाफेकर बंधू आता हुतात्मे मानले जातात. त्यांनी महार शिपायांविरुद्ध हे पाऊल उचलले असे कोणी मानत नाही. कर्वे आणि चाफेकर ह्यांना जो न्याय मिळतो तो टिळकांना का मिळत नाही? त्यांनी वापरलेल्या ’महार’ शब्दातून इतके रामायण का रचले जाते?
आता थोडे मंडालेच्या तुरुंगातील टिळकांना दिलेल्या सवलतींबाबत आणि ब्राह्मण स्वैपाक्यांबाबत. त्यांना मंडाले जेलमधील युरोपीयन कैद्यांसाठीच्या विभागात जागा दिली होती आणि त्यांच्या जेवण्याखाण्याच्या सोयीसाठी ब्राह्मण स्वैपाकी (कुलकर्णी आडनावाचा, त्याच्या आठवणी बापटांच्या आठवणीसंग्रहामध्ये आहेत) पाठविण्यात आला होता. टिळक मंडालेला गेले तेव्हा त्यांना मधुमेहाने पूर्णत: ग्रासलेले होते. त्यांच्या जिवाला आबाळीमुळे काही होऊन त्याचा ठपका आपल्यावर येऊ नये अशी इंग्रज सरकारची इच्छा होती कारण तसे झाले असते तर टिळकांच्या विद्वत्तेमुळे त्यांच्यामागे जे आन्तरराष्ट्रीय वलय होते त्यांच्याकडून हिंदुस्तानातील स्थानिक ब्रिटिश सत्तेला त्रास झाला असता आणि पार्लमेंटात प्रश्नांना तोंड द्यावे लागले असते. ही वस्तुस्थिति आहे. माझे चुलत आजोबा अच्युत बळवंत ह्यांनी इंग्रज सत्तेविरोधात चळवळ केली म्हणून त्यांना कैद करून नागपुरामध्ये रस्त्याने बेड्य़ा घालून सामान्य कैद्याप्रमाणे नेले गेले ही बातमी लंडनमध्ये पोहोचली आणि हिंदुस्तानी जनतेचे हितचिंतक असलेल्या काही MPs कडून त्यावर पार्लमेंटात प्रश्न विचारले गेले. सप्टेंबर ९, १९०९ च्या लंडन टाइम्समध्ये त्याचा रिपोर्टहि आला होता. असे टिळकांबाबत होऊ नये हा विचार हिंदुस्तानातील इंग्रज सत्तेच्या मनामध्ये असणारच आणि म्हणून टिळकांना राहण्यास स्वतन्त्र जागा, दुधासारख्या पौष्टिक आहाराची विशेष तरतूद केली गेली होती. इतकी ही साधीसरळ बाब होती. टिळकांविरुद्ध लेखन करण्यासाठी तिचे भांडवल का केले जाते?
तत्रापि, टिळकांना 'लोकमान्य' ऐवजी 'भटमान्य' ह्या उपाधीचे डिमोशन देऊन अजो आणि तत्सम विचाराच्या लोकांना काही समाधान मिळणार असेल तर त्यांच्या मार्गात आम्ही नतद्रष्ट्रांनी विघ्ने का आणावीत?
’महार’ शब्दातून इतके रामायण
>>त्यांनी वापरलेल्या ’महार’ शब्दातून इतके रामायण का रचले जाते?<<
बाकी सर्व ठीक, पण असा प्रश्न का पडावा, ते समजलं नाही. नुकत्याच संपलेल्या पेशवाईपर्यंत ज्या जातीला अस्पृश्य मानलं जात होतं, त्या जातीच्या माणसाला थेट स्वयंपाकघरात घेण्याविषयीचा तत्कालीन आक्षेप हा काही केवळ 'Every man's home is his castle' धर्तीचा नसणार हे अगदी स्पष्ट आहे. तेव्हाच्या वाचकांच्या लेखीही त्याचा संदर्भ तेवढ्यापुरता केवळ नसणार. आणि ह्याची जाणीव शब्दाचा वापर करणाऱ्या टिळकांना नसेल असं तर मला अजिबातच वाटत नाही.
महर्षि कर्व्यांनी विधवा
महर्षि कर्व्यांनी विधवा स्त्रियांचा उद्धार आणि त्यासाठी त्यांचे शिक्षण हे क्षेत्र आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले. त्यांचे कार्य जवळजवळ पूर्णत: ब्राह्मण विधवांपुरते मर्यादित होते.
कोल्हटकरांचे विधान हे वस्तुस्थितीला धरुन नाही हे नमुद करावेसे वाटते आणि त्यंच्यावर अन्यायकारक पण आहे.
कर्वे ह्यांनी त्यांचे कार्य ब्राह्मण जाती पुरते मर्यादित अजिबात ठेवले नव्हते, तर कर्वे जो मार्ग सांगत होते तो स्वीकारायची तयारी जास्त करुन ब्राह्मण स्त्रीया आणि समाजातच होती. तो दोष कर्व्यांचा नक्कीच नव्हता.
अजुनही अनेक जातीतल्या स्त्रीया ब्राह्मण स्त्रीयांपेक्षा तुलनेत अतिशय वाइट आयुष्य जगतात्. पण तो दोष ब्राह्मण स्त्रीयांचा होऊ शकत नाही.
>>टिळकांना राहण्यास स्वतन्त्र
>>टिळकांना राहण्यास स्वतन्त्र जागा, दुधासारख्या पौष्टिक आहाराची विशेष तरतूद केली गेली होती. इतकी ही साधीसरळ बाब होती.
येथे मी जे लिहितो आहे ते हलक्यानेच घ्यावे.
हे वाचल्यावर तर मला टिळकांच्या देशभक्तीविषयी आणि त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या योगदानाविषयीच शंका निर्माण होते. विशेषत: "जन्मठेप होऊन अंदमानात कोलू चालवावा लागणे" हे स्वातंत्र्यसैनिक असल्याचं मिनिमम क्वालिफिकेशन असताना; आणि त्या बेसिसवर इतर काही जणांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाला डिसमिस केले जात असताना टिळकांचा अपवाद तरी का करायचा? टिळकांना "शिक्षा झालीच नसून त्यांना पर्यटनासाठी मंडालेला पाठवले होते" असे म्हणावे लागेल.
कोल्हटकर सरांनी दिलेलं म
कोल्हटकर सरांनी दिलेलं महर्षी कर्वे यांचे उदाहरण रोचक आहे. कर्वे "हा काळ नाही" असे म्हणत, म्हणजे त्यांना पुढच्या काळात ती सुधारणा अभिप्रेत होती. असो.
======================
कोणत्या काळचे निकष कोणत्या काळात लावावेत, लावू नयेत असं अभ्यासताना १८५० ते १९२० काळातला नेता जात्यंध नसावा ही अपेक्षा टिळक पुरे करतात असे दिसते. इंग्रजांच्या विरुद्ध लढताना "इंग्रजांचे लाडके महार शिपाई" हि फ्रेज वापरताना त्यातला भर इंग्रजी शिपाई यावर आहे असं मानता येईल. (मात्र इंग्रजांचे इतर जातींचे शिपाई पण हेच काम करत असले, खूप असले, नि त्यांचा उल्लेख टाळला असला तर असे म्हणता येणार नाही. महाराष्ट्रात एवढ्या लढवय्या जाती असताना फक्त महारच इंग्रजांकडे प्रामुख्याने होते का, का होते याच स्टॅट/कारण माहित असायला पाहिजे. ती भीमा कोरेगाव लढाई, पेशव्यांच्या सैन्याचं कंपोझिशन, इ इ गोष्टी असततील. असो.)
====================
भटमान्य आणि लोकमान्य शब्दांची व्युत्पत्ती आणि त्या का वापरात आल्या हे स्वीकार्य आहे.
====================
परकीय सत्ता, पारतन्त्र्य, हिंदुस्तानची हलाखीची स्थिति असल्या रोजच्या जीवनात न डोकावणाऱ्या बाबींशी 'लोकां'ना काही देणेघेणे नव्हते.
हे निरिक्षण, त्या लोकांवरील सिंगल क्वोट्समुळे, अस्वस्थ करणारे वाटले.
======================
टिळकांना 'लोकमान्य' ऐवजी 'भटमान्य' ह्या उपाधीचे डिमोशन देऊन अजो आणि तत्सम विचाराच्या लोकांना काही समाधान मिळणार असेल
असल्या कोणत्या समाधानाच्या शोधात मी नाही. समाजाच्या सक्ऱिय समूहाचं जरी फक्त नेतृत्व केलं तरी ते लोकमान्य म्हणून घ्यायला पुरेसं आहे ही आर्गुमेंट मला मान्य आहे. व्यक्तिगत आयुष्यात ते जातीयवादी वा प्रतिगामी असलेलं इथे दुर्लक्षिता येईल.
कर्वे ह्यांनी त्यांचे कार्य
कर्वे ह्यांनी त्यांचे कार्य ब्राह्मण जाती पुरते मर्यादित अजिबात ठेवले नव्हते, तर कर्वे जो मार्ग सांगत होते तो स्वीकारायची तयारी जास्त करुन ब्राह्मण स्त्रीया आणि समाजातच होती. तो दोष कर्व्यांचा नक्कीच नव्हता.
याच ब्लॉगवरील धोंडो केशव कर्वे यांचा जातीय अहंगंड हा लेख वाचा. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे हे आपली बहीण जनाक्का हिला घेऊन कर्व्यांच्या आश्रमात गेले होते. पण कर्व्यांनी जनाक्काला आश्रमात प्रवेश नाकारला होता.
कर्वेंनी कारण दिलेले
कर्वेंनी कारण दिलेले इग्नोर करता येत नाही. "इतर जातिंबद्दल असं करण्याची ही वेळ नाही" म्हणून प्रवेश नाकारला आहे. म्हणजे वेळ पाहून कर्व्यांना सर्व जातींत सुधारणा करायची होतीच (समजा ते तेवढे जगले तर्) किंवा नंतर होईल असा आशावाद होता. शिंदे खट्टू झाले म्हणून कर्वे जातीयवादी ठरत नाहीत.
ब्लाॅग कोणाचा?
ब्लाॅगचं शीर्षक वगळता एरवी महर्षी कर्वेंच्या 'जातीय अहंगंडा'चा पुरावा पुढे नाही.
सदानंद मोरे ससंदर्भ लिहितात की, ब्राह्मण देणगीदार आणि घरच्या स्त्रियांना आश्रमात पाठवणारे ब्राह्मण दुरावू नयेत, म्हणून महर्षी कर्व्यांनी जनाक्कांना प्रवेश नाकारला. (समाजमान्यता झिडकारून योग्य गोष्टीचा पाठपुरावा करणारे रधों या पार्श्वभूमीवर निराळे दिसतात.)
हेच ते
त्याच अनुभवाला "घाबरून", ज्या ४-८-१०-१२ विधवा मुली शिकत आहेत, त्यांचं शिक्षण थांबू नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतल्याचा उल्लेख मोरे करतात.
(एक विरूद्ध अनेक मुलींचं शिक्षण असा विचार त्यांनी केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांना पुरेसं स्वातंत्र्य होतं का, असा प्रश्न पडतो.)
यावर काहीच कमेंट नाही. कारण,
यावर काहीच कमेंट नाही. कारण, हुजूरपागेतील शाळा ख्रिस्ती होती, हा दावा माझा नाही. ‘अनिता पाटील विचार मंच’वाल्यांचे तसे म्हणणे आहे. धोंडो केशव कर्वे यांचा जातीय अहंगंड या लेखातील एक उतारा मी येथे टाकला आहे, एवढेच. ही ख्रिस्ती कधी होती, हे सिद्ध करण्याची जबाबदारी अपाविमंवाल्यांची आहे. आपण हा प्रश्न त्यांच्या ब्लॉगवर प्रश्न विचारल्यास योग्य राहील.
ख्रिस्ती शाळेने दिला जनाक्काला प्रवेश
याच लेखातील हा ुतारा पाहा :
"..आधी पंडिता रमाबाई आणि नंतर धोंडो केशव कर्वे यांनी जनाक्काला आपल्या आश्रमात ठेवून घेण्यास नकार दिला. पण महर्षि शिंदे हरणा-यांपैकी नव्हते. जनाक्काला शिकवायचेच, असा निश्चय त्यांनी केला होता. पुढे त्यांनी जनाक्काला पुण्यातील प्रसिद्ध हुजूरपागेतील मुलींच्या हायस्कुलात घातले. ही शाळा ख्रिस्ती होती. मिस हरफर्ड नावाची एक युरोपियन बाई शाळेची हेडामास्तरीण होती. ख्रिस्ती शाळांत कोणताही जातीभेद पाळला जात नसे. येथे जनाक्काला सहजपणे प्रवेश मिळाला. जनाक्काची शाळा सुरू झाली, पण फीसचा प्रश्न निर्माण झाला. या शाळेत मिस मेरी भोर नावाची एक हुशार ख्रिस्ती बाई शिक्षकीण होती. त्यांनी हेडमास्तरीण बार्इंना सांगून स्कॉलरशिपसाठी प्रयत्न केले. जनाक्काला संस्थान मुधोळच्या राजेसाहेबांकडून दरमहा १० रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली..."
ख्रिस्ती अधिक सुधारक होते, असे दिसते.
हं???
हिज हायनेस चिंतामणराव पटवर्धन गर्ल्स हायस्कूल उपाख्य हुजूरपागा ही शाळा ख्रिस्ती कधी होती?
शाळेच्या संस्थळावर, झालेच तर विकीवर वगैरे तपासले असता शाळेच्या संस्थापकमंडळींत महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, शंकर पांडुरंग पंडित, झालेच तर वामन आबाजी मोडक असल्याच मंडळींचा - बोले तो, बहुतकरून कोब्रांचा - भरणा दिसतो. (रा.गो. भांडारकरांच्या जातीविषयी नक्की खात्री नाही. कोब्रा बहुधा नसावेत. पण ख्रिस्तीही नसावेत.) हं, नाही म्हणायला शाळेच्या संस्थापकमंडळींत वरील नावांबरोबरच एक सर विल्यम वेडरबर्न नामक इंग्रज (आणि प्रेझ्यूमेबली ख्रिस्ती) गृहस्थही आढळतात खरे, परंतु वन स्वालो डथ नॉट अ समर मेक. शिवाय, अधिक चौकशीअंती, हे सर वेडरबर्न हे ख्रिस्ती मिशनरी वगैरे किंवा तत्सम कोणी नसून निवृत्त आयसीएस अधिकारी आणि काँग्रेसच्या आद्य संस्थापकांपैकी होते, असे कळते. म्हणजे तीही बाजू बाद. पुढे सांगलीचे राजे पटवर्धन (आणखी एक कोब्रा) शाळेचे आश्रयदाते बनले, शाळेस जागा देऊ केली, वगैरे वगैरे.
म्हणजे मग नेमक्या कोणत्या अंगाने ही ख्रिस्ती शाळा म्हणायची?
बरे, दुसरी गोष्ट. अगोदर पंडिता रमाबाईंच्या (पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या) शारदा सदनाने आणि नंतर कर्व्यांनी प्रवेश नाकारल्यावर मग हुजूरपागेने प्रवेश दिला, असे म्हटले आहे. आता ही क्रोनॉलॉजी आणि ही ष्टोरी बरोबर असेलही. त्याबद्दल शंका घेण्याचे काही कारण मला तरी दिसत नाही. पण हे जर बरोबर मानले - आणि, अगोदर म्हटल्याप्रमाणे, हे बरोबर मानण्यास काही प्रत्यवाय दृग्गोचर होत नाही, परंतु - अधिक तपासाअंती आणखीही काही बाबी लक्षात येऊ लागतात.
शारदा सदनची स्थापना १८८९ची. पंडिता रमाबाई अगोदर इंग्लंडमधील आणि तेथून मग नंतर अमेरिकेतील दीर्घ वास्तव्यानंतर हिंदुस्थानात परत आल्यानंतरची. पंडिता रमाबाईंनी आपल्या इंग्लंडमधील वास्तव्याच्या काळात, १८८३ आणि १८८६च्या दरम्यान कधीतरी, ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. (पुढे कधीतरी - जनाक्कांच्या या एपिसोडच्या नंतरही असेल कदाचित, पण - मिशनही काढली.) आहे की नाही गंमत?
म्हणजे मग, मधला कर्व्यांचा भाग सोडून देऊ, पण, ख्रिस्त्यांच्या - एका ख्रिस्ती बाईने स्थापलेल्या - संस्थेने प्रवेश नाकारला, पण कोब्रांच्या - बहुतांशी कोब्रांनी स्थापलेल्या - संस्थेने आश्रय दिला, असे म्हणायचे का?
आय मीन, ढुसकुली तरी किती सोडावी माणसाने, म्हणतो मी.
तिथे कुठे खूप प्रतिसाद अस
तिथे कुठे खूप प्रतिसाद असलेला धागा आहे काय मला माहिती नाही. त्यांचं स्वरुप काय आहे हे बघायला लागेल.
===============
तिथल्या प्रतिसादकांना सभ्येतच्या मर्यादेतच प्रतिवाद करायचा असेल तर (मंजे तशी त्यांची आजपर्यंतची प्रथा असेल तर्) तिथे प्रतिसाद टाकायला हरकत नाही.
जर त्याच काळात "कोब्रांच्या -
जर त्याच काळात "कोब्रांच्या - बहुतांशी कोब्रांनी स्थापलेल्या - संस्थेने आश्रय दिला" / देऊ शकत होते तर धोंकेक चे वागणे / त्यासाठी (इथे) दिले गेलेले एक्सक्युज अजूनच लेम वाटतायत...
मला वाटत यावर (धोंकेक आणि जनाक्का) ऐसीवर पूर्वी चर्चा झाली आहे. ती लक्षात असल्याने इथे या टिळक/अग्रलेखबद्दलच्या चर्चेतुन काय निष्कर्ष/सार निघणार याचा अंदाज होताच. झालेही तसेच.... तो ब्लॉग काय किंवा हे इथले स्वघोशीत यंव त्यंव काय.... अटलिस्ट तिथे काय वाढून ठेवलेय हे माहित तरी असते....
असो.
सारं कसं अपेक्षेनुसारच!
हे आमचं थोडं नवनीत गाईड -
धोंडो केशव कर्व्यांनी चालवलेलं विधवांचं शिक्षण त्या काळात अनेक ब्राह्मणांच्या पचनी न पडणारं होतं. तिथे शिकणाऱ्या मुलींच्या घरच्यांना सामाजिक असंतोषाला सामोरं जावं लागत होतं. खुद्द महर्षी कर्व्यांनाही विधवेशी विवाह करण्याबद्दल घरच्या असंतोषाला सामोरं जावं लागत होतंच. याच्याशी तुलना करता हुजुरपागा या शाळेत कमी बंडखोरी चालत होती. इतर शाळांत ज्या - लग्न न झालेल्या वा विधवा नसलेल्या - मुली शिकू शकत होत्या, तशाच प्रकारच्या मुली तिथे शिकत होत्या. जनाक्कांना शाळेत प्रवेश देणं ही बंडखोरी आणि त्याचा परिणाम त्यांना सहन करण्याजोगा होता. महर्षी कर्व्यांना वाटणारी भीती काहीशी अशी होती की मराठा विधवेला शाळेत घेतलं तर देणगीचा स्रोतही आटेल आणि शाळेत शिकणाऱ्या मुलींपैकी काहींना शाळेतून काढून घेतलं जाईल.
आता तुमच्या प्रतिसादाच्या भाषेबद्दल. महर्षी कर्व्यांनी काय निर्णय घेतले त्याबद्दल आजच्या काळात कोणत्याही जातीच्या व्यक्तीनं काही लिहिल्यास ती एक्सक्युज किंवा (मराठीत) सबब नसते; ते वर्तनाचं विश्लेषण असतं. त्यामुळे तुम्हाला जे लेम वाटतंय, ते मुळात अस्तित्वात नाही. महर्षी कर्वे आता जिवंत नाहीत. तुम्हाला हौस असल्यास तुम्ही त्यांना नावं ठेवू शकता, पण त्यांनी केलेलं काम पुसता येणं कठीण आहे. ते काम चांगलं किंवा वाईट कसं का असेना, त्याचा महाराष्ट्राच्या इतिहास आणि समाजावर भलाबुरा परिणाम झाला; ही गोष्ट कोणीही, कितीही कंठशोष केला तरीही बदलता येत नाही.
पूर्वी कधीतरी, कोणत्यातरी विषयावर चर्चा झालेली आहे, म्हणून आता चर्चा करू नये असा ऐसीचा नियम नाही. उलट ऐसीवर 'चर्चा तर होणारच'. मात्र पूर्वीच्या चर्चांचे दुवे देणं, हे ऐसीच्या प्रकृतीला शोभेलसं आहे. तसा एखादा दुवा द्या, दुवा घ्या.
श्री कोल्हटकर यांचा प्रतिवाद
श्री कोल्हटकर यांचा प्रतिवाद हा त्यांच्या व्यासांगाला साजेसाच आहे। असे लेख कोणत्याही चर्चेला प्रतिष्ठा प्रदान करतात।
त्यासंदर्भातील माझया कांही टिप्पण्या:
1) असे वाटून जाते की त्यांनी प्रतिवादाचा परीघ (सोयीस्करपणे?) सीमित ठेवला। मुद्धा केवळ टिळकांच्या 'लोक'मान्य ह्या बिरुदाचा नव्हता, तर त्यांच्या एकूण मनोधारणेचा होता। जेथे इंग्रजांविरुद्धचा संघर्षाचा संदर्भ नव्हता-अश्या वेळी सुद्धा, टिळकांनी सनातनी (ब्राह्मणी) मताच्या बाजूने आपली शक्ती वापरली असे आढळते। उदा. वेदोक्त आणि पंचहौद प्रकरण।
ह्या पार्श्वभूमीवर, महार विशेषणाचा उपयोग लेखक म्हणतात तेवढा निरुद्देश मानता येत नाही।
2) त्या काळाचा संदर्भ घेतला तर टिळकांना प्रामुख्याने ब्राह्मण अनुयायी(च) मिळाले असतील हे समजण्यासारखे आहे। पण त्यांचे आवेशपूर्ण समर्थन सनातनी विचारसारणीलाच का राहिले ह्याचा उलगडा होत नाही।
3) एकूण चर्चेत कोठेही टिळकांच्या 'लोकोत्तर'पणाला आक्षेप घेतलेला दिसत नसतांना, लेखकाचे विवेचन जरा जास्तच अभिनिवेशपूर्ण आणि थोडेसे भावनात्मक (sentimental) वाटले।
4) एरवी अत्यंत समतोल लिखाण करणाऱ्या लेखकाने अजों विषयी केलेले निर्देशन आणि हेत्वारोप (अजो आणि त्यांचे समाधान.... इत्यादी) खटकला।
मुद्धा केवळ टिळकांच्या 'लोक
मुद्धा केवळ टिळकांच्या 'लोक'मान्य ह्या बिरुदाचा नव्हता, तर त्यांच्या एकूण मनोधारणेचा होता।
मुद्दा किंबहुना त्यांचं लोकमान्य हे बिरुद कितपत योग्य आहे ह्याबाबतचा आहे. त्याचा प्रतिवाद करताना त्यांनी सध्या
आजचे 'पुरोगामित्व' पूर्वलक्ष्यी प्रभावाने टिळकांच्या काळापर्यंत नेऊन
हा अतिशय योग्य प्रतिवाद केलेला आहे. लोकमान्य ही एक व्यक्तीच होती. समाज संघटन, शिक्षण आणि सरकारवर परखड वास्तववादी टीका हा मार्ग निवडला असताना, त्यात अफाट योगदान दिलेलं असताना त्यांनी जातींबाबत कसं काही केलं नाही हा वाद करणं म्हणजे आधी एका धाग्यात कोणी म्हटल्याप्रमाणे - 'किशोरीताईंनी सहेला रे न गाता रंबा हो हो का गायलं नाही' असं झालं. त्यामुळे आत्ता जे काही चाललंय ते का, ह्याबाबत बरीच चर्चा झालेली आहे.
पण त्यांचे आवेशपूर्ण समर्थन सनातनी विचारसारणीलाच का राहिले ह्याचा उलगडा होत नाही।
कारण तेव्हा मनुस्मृतीचं जाहीर दहन आजकाल जितकं होतं तितकं नाही व्हायचं.
लेखकाचे विवेचन जरा जास्तच अभिनिवेशपूर्ण
आणि ह्याच हिशोबात तो ब्लॉग कसा आहे, हेही सांगूनच टाका.
ठपका आपल्यावर येऊ नये अशी इंग्रज सरकारची इच्छा होती
इथपासून पूर्णत: तर्कशुद्धप्रतिवाद केलेला आहे. जो, मला तरी अजिबात भावनात्मक वाटत नाही.
अजों विषयी केलेले निर्देशन आणि हेत्वारोप
हे बाकी पटलं. मला अजोंची बाजू पटते. काय आहे ते अगदी ससंदर्भ पडताळून घ्यावं आणि मग मत बनवावं अशी त्यांची एकूण भूमिका आहे. फॉर आर्ग्युमेंट्स सेक ते जे लिहीत आहेत त्यामुळे त्यांच्यावर बाकी हेत्वारोप करत आहेत हे दुर्दैवाने खरं आहे.
विवेकसिंधु नि वनफॉरटॅन( हे
विवेकसिंधु नि वनफॉरटॅन( हे काय असतं?) यांचे समजून घेतल्याबद्द्ल आभार.
===========================
वास्तविक वर नवीबाजूंनी कर्वेंच्या बाबतीत जसं ब्लॉगनं लोकांना मिसलिड केलं आहे ते उघड केलं आहे तसं टिळकांबद्दलही होईल अशी मला आशा होती. पण दुर्दैवानं तसं नाही. आता कंक्लूड करू नि चर्चा थांबवू -
१. टिळक लोकमान्य होते, आजही मानले जावेत यात काही चूक नाही. माझ्या लोकमान्य शब्दामधून ज्या अपेक्षा होत्या त्या अवास्तव होत्या नि पूर्वलक्षी प्रभाव लावला होता तो चूक होता.
२. ब्लॉग वर क्वोट केलेले उतारे टिळकांचेच आहेत.
३. टिळक प्रतिगामी नि जातियवादी होते असं आजच्या फॉर्म्यूल्यांवर आरामात म्हणता येतं. मात्र त्या काळात तितकं जातियवादी असणं इतकं सामान्य होतं कि त्यांना विशेष दूषण लावता येत नाही. मंगल पांडे प्रमाणे ही बाब सोडून त्या व्यक्तिचं भारतीय राजकारणात, स्वातंत्र्यलढ्यात काय महत्त्व होतं ते पहावं.
४. टीळक "समाज" सुधारणा नंतर आधी स्वातंत्र्य असं म्हणायचे असं जे शाळेत शिकवलं जातं ते बऱ्यापैकी चुकिचं आहे. "लोकांची सुधारणा" नंतर असं म्हणण्याकरिता टिळक स्वत्: एका विशिष्ट डिग्रिला सुधारलेले होते असं जे ध्वनित होतं ते तसं नाही.
५. टिळकांच्या आयुष्यातील अन्य जातींच्या लोकांचा अनुभव काय होता, इ इ फार कमी डाटा / अभ्यास (इथे) आहे. त्यामुळे डाटा मिळेपर्यंत ते अति जात्यंध होते वैगेरे असं खोटं म्हणू नये.
६. 'इंग्रजांचे लाडके महार' इ इ विधानांमधील महार शब्दाचा विपर्यास करू नये. महार इंग्रजांना जास्त लॉयल असतील, वा त्यांच्या सैन्यात जास्त असतील. तो रोष नक्की कशाचा आहे ह्याचा अर्थ अभ्यास होईपर्यंत काढायची घाई करू नये.
७. "व्यक्तिश: माझ्या मते" स्वत्:च्या जाती धर्माचा योग्य अभिमान असणे हे योग्य, आणि कदाचित आवश्यक आहे. टिळकांना वेद, शास्त्रे, ब्राह्मण्य, इ इ चा अभिमान असेल,नि त्यांची काही विशिष्ट जीवनशैली असेल, तर त्याला जातियवादाचे नाव देऊ नये. मात्र प्रमाण धर्मामधे अभिप्रेत असलेली उदात्त तत्त्वे बाजूला सारून विषमताजनक रुढि जोपासणे, हे वाईटच. यातले काही ट्रेट्स टिळकांमधे होते असे चर्चेत दिसते. मात्र यात "अन्य जातींचा द्वेष, आकस, हिनता" असं काही होतं का याचं उत्तर नाही असं आहे.
८. अनिता पाटील यांच्या ब्लॉगमधे ज्या प्रकारे एकिकडे इतिहासाचा अभ्यास नसणाऱ्या आणि लोकोत्तर पुरुषांचा सन्मान असणाऱ्या आणि दुसरीकडे या लोकांकडून भारतातल्या सर्वच जातींधर्मांवर समान प्रेम असावं अशी अपेक्षा करणाऱ्या (नैतर मग तुम्ही कसचे नेते) माझ्यासारख्या लोकांना फार धुरीणपणे हेरलं आहे. टिळक आणि कर्वे त्यांच्या ब्राह्मणद्वेषाचे बळि ठरले आहेत असं म्हणता येईल. कोणाला इतका इतिहास माहित असतो? कोण इतके संदर्भ तपासतो? कदाचित याच कारणाने ब्राह्मण पोलिटिकली फार करेक्ट बोलत असावेत, कारण सायटिंग कसं होईल याचा भरोसा नाही.
९. याचा अर्थ या ब्लॉगवर दिलेलं सगळंच असत्य आहे असा होत नाही. निश्चितच धूर्त, दुराचारी, विषमतावादी, कुटिल, क्रूर, फसवे, बाह्यप्रतिमि, गद्दार पण सत्ताधीश, धर्मधिश, इ इ ब्राह्मण देशात झालेच असतील आणि त्यांचा कुणीतरी समाचार घेतलेलं बरंच. पण या ब्लॉगवरचं महान आणि लोकोत्तर नेत्यांबद्दलचं लेखन मिठमिरचू पुसून त्यांना समजून घ्यावं.
==============================
यात कोणाला अजून काही कंक्लूजन काढायचं असेल, वा काही रिफाईन करायचं असेल तर स्वागत आहे.
आजच्या काळाची मूल्ये
आजच्या काळाची मूल्ये तेव्हाच्या टिळकांना लावून त्यांना दोषी ठरवू नये हे ठीक. पण त्यांच्याच काळात फुले, आगरकर, मलबारी, कर्वे, गोखले अस्तित्वात असताना टिळकांचे सनातनीपण उठून दिसते. त्यामुळे टिळकांना (तेव्हाच्या काळाच्या मानाने सुद्धा) सनातनी म्हणणे योग्यच आहे.
अगदी सहमत
समजा टिळकांनी 'स्वातन्त्र्यप्राप्ती' हेच ध्येय प्राधान्यक्रमाने स्वत:साठी ठरवलेले होते तरी आजूबाजूला इतर काही लोक आपापल्या प्राधान्यक्रमाने काही विधायक कामे करीत होते असतील तर त्यांच्याकडे टिळकांनी दुर्लक्ष्य केले असते तरी चालले असते. या लोकांना टिळक अनुल्लेखाने मारते तरी ते समजण्यासारखे होते. पण त्यांना खच्ची करणे, त्यांना समाजहितविरोधी आणि समाजद्रोही समजून झोडपून काढणे हे समजून घेणे कठिण आहे. म्हणजे हे लोक करीत असलेले कार्य समाजहिताचे नाही असाच टिळकांचा पक्का ग्रह होता. टिळकांना प्रस्थापित समाजरचनेत बदल अजिबातच नको होता असाच निष्कर्ष यातून निघतो.
आपण दिलेल्या विकीवरील चर्चेत
In reply to चर्चा : टिळक by चिंतातुर जंतू
आपण दिलेल्या विकीवरील चर्चेत भा. द. खेर यांच्या ‘लोकमान्य टिळक दर्शन’ या पुस्तकाचा संदर्भ आला आहे. हे पुस्तक मिळविले आहे. वाचतोय. काही आढळल्यास डकवतो.