साहित्य संमेलने: प्रस्थापित वि. विद्रोही: एक टिपण
अ.भा. मराठी साहित्य संमेलन जवळ येवू लागलं की माध्यमांतून नेहमीच्या त्याच त्या चर्चा रंगतात. ते यंदाच्या संमेलनाबाबतही खरं आहे. याच संदर्भात राजीव काळे यांचा प्रस्थापित व विद्रोही या दोन्ही साहित्य संमेलनांबाबतच्या प्रासंगिकतेबद्दल विवेचन करणारा 'निदानाच्या पुढे काय ?' हा लेख दै.लोकसत्तात आला आहे.
यासंदर्भात आणखी काही मुद्दे मांडावेसे वाटतात.
आपण प्रस्थापित, विद्रोही, बहुजनवादी साहित्य इत्यादी संज्ञा अनेकदा अतिशय स्वैरपणे वापरतो. त्यांच्या नेमक्या व्याख्या करणे बदललेल्या युगात करणे आवश्यक आहे. काळाने कूस बदलली की आजचे विद्रोही उद्याचे प्रस्थापित कधी होऊन जातात हे त्यांनाही कळत नाही. मध्यंतरी 'सैराट' चित्रपटावरून महाराष्ट्रात एक वैचारिक खळबळ निर्माण झाली होती. आता 'सैराट' हा चित्रपट त्याच्या कथावस्तूनुसार 'विद्रोही' आहे असं मानायचं की त्याच्या निर्मात्यांच्या नावांकडे पाहून (भाजप समर्थित खासदार सुभाष चंद्रा प्रणित एस्सेल विजन/झी टॉकिज चे निखिल साने, नितीन केणी आदी) तो 'प्रस्थापित' आहे असं मानायचं की एक शुद्ध धंदेवाईक निर्मिती म्हणून सोडून द्यायचं? (मूळ लेखासोबतच्या चित्राला सैराट चा संदर्भ आहे म्हणून हा उल्लेख.) हा विचार येण्याचे कारण म्हणजे कलावंताचे आडनाव पाहून त्याच्या कलाकृतीचे मूल्यमापन करण्याची वाईट खोड महाराष्ट्राला लागलेली आहे. पूर्वी प्राय: वैचारिक पातळीवर असलेले हे मतभेद राजकीय पाठिंब्याने दिवसेंदिवस अधिकाधिक टोकदार व कटू होत चालले आहेत, हे गेल्या दोन-अडीच वर्षांत वारंवार दिसून आले आहे. ते निवळण्याची व नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी दोन्ही बाजूंची आहे. प्रस्थापितांच्या अ.भा.साहित्य संमेलनात विद्रोही विचारांना स्थान नाही हा आरोप एक वेळ मान्य केला तर दुसर्या बाजूने विद्रोही साहित्यिकांनीही तरी प्रस्थापितांना त्यांच्या व्यासपीठावर बोलावून 'रीच आउट' करण्याचा प्रत्यत्न कितपत केला आहे; विद्रोही साहित्याची अपरिहार्यता प्रस्थापितांना व प्रकाशकांना कितपत जाणवून दिली आहे असेही प्रश्न उरतातच.
हा सदाशिवपेठी- तो दलित साहित्यिक, हा बहुजनवादी- तो स्त्रीवादी, हा आंबेडकरवादी- तो समाजवादी, हा उजवा -तो पुरोगामी असे असंख्य कप्पे स्वत:च पाडून घेण्याचा आणि ते एखाद्या अस्मितेप्रमाणे जपण्याचा गंमतीशीर प्रकार फक्त मराठी साहित्यविश्वातच असावा असे वाटते. परंतु मुद्दलात एखाद्याने कुठलेतरी '-वादी' असावे हा अट्टाहास का? लेखक आणि वाचक यांचा संबंध 'वन टू वन' असा असताना आधी एक गट, मग त्याला विरोध म्हणून दुसरा गट, मग तिसरा यांचे औचित्य काय? गटाने राहण्याची गरज लेखकांना का वाटावी? या गटबाजीचा प्रत्यक्ष साहित्यनिर्मितीशी काय संबंध असतो? लेखकाने त्याला वाटेल तसे लिहावे आणि त्याचा निर्णय वाचकांवर व समीक्षकांवर सोडून द्यावा. लेखन दर्जेदार असेल तर टिकून राहिल, नाहीतर विस्मरणात जाईल. ही इतकी साधी गोष्ट आहे. रोजच्या सवयीने, हे असले कंपू जणू काही साहित्याच्या आवश्यक लक्षणांपैकी एक आहेत असाही अनेकांचा समज झाला आहे. यातून संपादक, समीक्षकही सुटले नाहीत. उदा. प्रा. राम शेवाळकरांना एका टेलिव्हिजन मुलाखतीत एका नामवंत संपादकांनी ते एकाच वेळी रा.स्व संघाच्या, समाजवादी, सर्वोदयवादी मंचावर कसे जातात ते विचारल्याचे स्मरते. किंवा नरेंद्र जाधव संघपुरस्कृत व्यासपीठावर(कुठल्याही छुप्या-उघड कारणाने का असेना) गेल्यावर त्यांच्यावर झालेली टीका ही फार जुनी गोष्ट नाही. जणू काही एका लेखकाने दुसर्या विचारसारणीच्या व्यासपीठावर जाणे, त्यांच्याशी वैचारिक पातळीवर व्यवहार ठेवणे हे पाप आहे. यालाच असहिष्णुता म्हणत असावेत कदाचित. असो.
दुर्दैवाने आपण जात जशी जन्माशी बांधून घेतली आहे तशी आपली अभिव्यक्ती आपण आपल्या जातीशी बांधून घेतली आहे. प्रस्थापित, विद्रोही इत्यादी भेद समाजवादी काळात काही प्रमाणात आर्थिक परिस्थितिशी निगडीत असतीलही, परंतु आजच्या खुल्या जमान्यात हे भेद आता मुख्यत: जातीभेदांशी व त्यातून उद्भवणार्या तर काही प्रमाणात आधीपासून असलेल्या राजकीय मतभेदांशी समांतर झालेले आहेत हे कटू असले तरी वास्तव आहे. साहित्यिकांत साहित्यावरील निष्ठेपेक्षा साहित्यबाह्य राजकीय निष्ठेने घुसखोरी केलेली दिसते. साहित्यिक असल्यामुळे मिळणार्या प्रसिद्धीच्या, सरकारी- गैरसरकारी पदांच्या, निवडक वर्तुळात मिळणार्या मानमरातबाच्या, काही 'जाणत्या' नेत्यांच्या पुढेपुढे करण्याच्या, आपापले कंपू सांभाळण्याच्या या सगळ्या अनावश्यक चढाओढीत सर्वात जास्त दुर्लक्ष होते ते साहित्यनिर्मितीकडे. लेखकांमध्ये असलेल्या या गटबाजीमागे कमअस्सल दर्जाचे लेखन फक्त एखाद्या '-वादा'प्रती असलेल्या बांधिलकीपोटी वाचक-कार्यकर्त्यांमध्ये खपवण्याचा स्वार्थी हेतूही दडलेला असावा अशीही शंका घेण्यास वाव आहे.
थेटपणे सामाजिक संदेश देणारे,उपदेशात्मक साहित्य हेच खरे साहित्य व रंजन करणारे, विचारप्रवण करणारे, ललित साहित्य हे कमअस्सल दर्जाचे पलायनवादी साहित्य या समाजवादी काळातील छद्मविचाराच्या प्राबल्याने वाचनीयतेसोबतच इतर साहित्यमूल्यांच्या बाबतीत मराठी साहित्याचे अध:पतन झाले आहे. एखाद्या नाटककाराला, सिनेमाकाराला आमच्या कलाकृतीत कसा 'सामाजिक संदेश' आहे हे मुद्दामहून सांगावे लागते, नाहीतर तो 'फाऊल' धरला जातो. वैचारिक बहुसंख्याकवाद सर्जनशीलतेचा गळा कसा घोटतो याचे हे उदाहरण आहे. हे प्रस्थापित आणि विद्रोही दोहोंना लागू आहे. त्यामुळे जागतिकीकरणाच्या काळात अनुभवांचे वैविध्य, एक्स्पोजर वाढले असले तरी ते साहित्यात आणण्यात आपण अपयशी ठरतो आहोत. मग एखादेच 'एम टी आयवा मारू', एखादेच 'रारंगढांग', एखादेच 'उद्या' यासारखी पुस्तके भिंग लावून शोधावी लागतात व वर्षानुवर्षे त्यांचे तेच ते गुणवर्णनपर लेख वाचावे लागतात. परिणामी अनुवादित साहित्याची मागणी वाढली आहे, यात नवल ते काय?
वरील लेखात काळे यांनी 'एखाद्या संमेलनाला, एखाद्या संस्थेला, एखाद्या प्रवाहाला विरोध करायचा म्हणून आम्ही उभे आहोत, हा पवित्रा किती काळ घ्यायचा' असा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. कारण ज्याला अभिजात म्हणावं असा विचार, असे साहित्य शेवटी लेखकाच्या मूलगामी दीर्घ चिंतनातूनच निर्माण होऊ शकते. केवळ विरोधासाठी विरोध म्हणून प्रसवलेले साहित्य काही काळ चटकदार, आकर्षक वाटेलही पण कालांतराने त्याचे ऐतिहासिक संदर्भमूल्य हरवल्यावर ते अप्रासंगिक होत जाते. याउलट धर्माचरणाचा प्रश्न आला की आप्तेष्ट असले तरी अधर्माच्या बाजूचे असलेल्यांचे काय करायचे, सत्याप्रती माणसाचे कर्तव्य, कर्मविचार, भक्तिविचार, स्थितप्रज्ञता आदी मूलभूत प्रश्नांचा उहापोह करणारी एखादी गीता ही कालजयी ठरते.
अखेरीस साहित्य संमेलनांबाबतच्या या मतमतांच्या गलबल्यात साहित्य हे मुख्यत: लेखक आणि वाचक या दोघांचाच वैचारिक व्यवहार आहे हे विसरता कामा नये. बाकीचे मुद्दे दुय्यम आहेत.
. . वाघमारे साहेब, आमची
.
.
वाघमारे साहेब, आमची असहमती.
--
पूर्वी प्राय: वैचारिक पातळीवर असलेले हे मतभेद राजकीय पाठिंब्याने दिवसेंदिवस अधिकाधिक टोकदार व कटू होत चालले आहेत, हे गेल्या दोन-अडीच वर्षांत वारंवार दिसून आले आहे. ते निवळण्याची व नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी दोन्ही बाजूंची आहे.
हा तुमचा मुख्य मुद्दा आहे असं गृहित धरतो.
(१) माझा विद्रोही साहित्य संमेलनाला थेट व नि:संदिग्ध पाठिंबा आहे.
(२) विचार कितीही टोकाचे असले तरी मांडणार्याला ते कितीही काल व कोणत्याही व्यासपीठावरून (व्यासपीठाच्या मालकाची परवानगी असेल तर) मांडायचे स्वातंत्र्य असावे.
(३) वैचारिक कटुता निर्माण झाली तरी त्यात काहीही चूक, अनिष्ट नाही. जोपर्यंत हिंसामार्गाचा अवलंब होत नाही तोपर्यंत कोणतीही व कितीही टोकदार भूमिका कोणीही मांडावी (विशेषतः सार्वजनिक व्यासपीठांवर).
(४) पुनश्च: - कितीही कठोर, टोकदार विचार असले तरीही ... "निवळण्याची जबाबदारी" वगैरेचं ओझं फेकून देऊन अवश्य मांडावेत. व खोडणार्यांनी ते अवश्य खोडायचा यत्न करावा (प्रसंगी अतिटोकदार शब्दात). अर्थातच हिंसा/धमकी/बलप्रयोगाचा अवलंब न करता.
(५) Please call this a fanatic idea if you want. This is the market for ideas. In this market people who want to offer ideas, & thoughts should be free to use any words, tone, language to present their ideas. Sooner or later others will rebut or endorse or improve or reject these ideas and thoughts. So let people collaborate or compete in the market for ideas.
(६) अभिव्यक्तीवर बंधने कमीतकमी असावीत. उदा. (अ) अभिव्यक्तीमधे Credible threat असेल तर ती दंडनीय असावी. (ब) अश्लीलता/अर्वाच्यता असेल तर ते व्यासपीठाचे मालकांच्या मानहानीस कारणीभूत होऊ शकते तेव्हा मालक मंडळी त्याचे नियम बनवतीलच.
----
संभाव्य आक्षेप - (नेहमीचेच)
(१) आपले लोक तितके परिपक्व नाहीत. त्यामुळे हे मा. हा. को.....
(२) याचे पर्यावसान दंगली मधे होते
(३) गब्बर, तू जे म्हणतोस ते तिकडे अमक्याढमक्या देशात ठीकाय पण इथे .... ????
(४) सहिष्णुतेचे काय ?
----
“The [classical] liberal argument is in favor of making the best possible use of the forces of competition as a means of coordinating human efforts, not an argument for leaving things just as they are.” ____________ F A Hayek
एखाद्याने कुठलेतरी '-वादी' असावे हा अट्टाहास का?
नव्हे..
एखाद्याने कुठलेतरी '-वादी' असावे हा अट्टाहास का? लेखक आणि वाचक यांचा संबंध 'वन टू वन' असा असताना आधी एक गट, मग त्याला विरोध म्हणून दुसरा गट, मग तिसरा यांचे औचित्य काय? गटाने राहण्याची गरज लेखकांना का वाटावी? या गटबाजीचा प्रत्यक्ष साहित्यनिर्मितीशी काय संबंध असतो? लेखकाने त्याला वाटेल तसे लिहावे आणि त्याचा निर्णय वाचकांवर व समीक्षकांवर सोडून द्यावा. लेखन दर्जेदार असेल तर टिकून राहिल, नाहीतर विस्मरणात जाईल. ही इतकी साधी गोष्ट आहे.
हा माझा मुख्य मुद्दा आहे. आणि लेखन दर्जेदार असेल तर टिकून राहिल, नाहीतर विस्मरणात जाईल. हा तर सरळसरळ बाजारवादी का भांडवलवादी म्हणतात तसला विचार आहे.
ते निवळण्याची व नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी दोन्ही बाजूंची आहे हे म्हणण्याचं कारण म्हणजे मी काही सर्वसमावेशकतावादी,समन्वयवादी वगैरे नसून या प्रकारामुळे कर्कशता वाढली आहे,तिचा त्रास होतो. अधिक म्हणजे वादग्रस्त ठरू शकणार्या विषयावर लिहिणे टाळण्याची प्रवृत्ती वाढीस लागते, जे एक वाचक म्हणून माझे नुकसान आहे.
बाकी चारही मुद्द्यांशी सहमती. माझा कितीही संमेलने भरवायला विरोध नाही. त्यामागच्या प्रेरणा शुद्ध साहित्यिक,अॅकेडमिक,प्रादेशिक असतील तर अधिक उत्तम. सध्या भरणार्या भारंभार संमेलनांमागच्या प्रेरणा तशाच आहेत का याची कल्पना नाही.
हा माझा मुख्य मुद्दा आहे. आणि
हा माझा मुख्य मुद्दा आहे. आणि लेखन दर्जेदार असेल तर टिकून राहिल, नाहीतर विस्मरणात जाईल. हा तर सरळसरळ बाजारवादी का भांडवलवादी म्हणतात तसला विचार आहे.
अधोरेखित भागाबद्दल : तुम्ही असे म्हणणार हे माहीती होतं व म्हणूनच मी pre-emptively सही बदलली होती.
वस्तुस्थिती ही आहे की हा खराखुरा लिबरल विचार आहे.
(खराखुरा लिबरल म्हंजे "अमेरिकन लिबरल" नव्हे. "अमेरिकन लिबरल" विचार हा कमी सहिष्णु आहे.)
एखाद्याने कुठलेतरी '-वादी' असावे हा अट्टाहास का?
वाद न स्वीकारता जगता कसे येते हेच समजत नाही. जेंव्हा तुम्ही स्वतःला याप्रकारचे निःसंग, अलिप्त म्हणून घोषित करता तेंव्हा तुम्ही आपोआप प्रस्थापिताचे पाईक नाही होत का? (काय चालले आहे ते चालू द्या, मला काय त्याचे?"). शुद्ध क्रांतिवादी विरुद्ध शुद्ध सौंदर्यवादी (ज्या दोघांबद्दलही मला आदर आहे!) यात तुम्ही (म्हणजे लेखक) कोणत्या बाजूचे आहात याचा अप्रत्यक्षपणे तुमच्या सर्जनावर प्रभाव पडतोच. आपण कशासाठी लेखणी उचलत आहोत हे लेखकाला माहिती असतेच. प्रचारकी साहित्यात साहित्यमूल्ये कमी असतात हा जुना आणि नेहमीचा आरोप आहे. पण लेखक "ते" करायला उतरलेलाच नाही, त्यामुळे तुमची मोजपट्टीच चुकीची ठरते.
वाद न स्वीकारता जगता कसे येते
वाद न स्वीकारता जगता कसे येते हेच समजत नाही. जेंव्हा तुम्ही स्वतःला याप्रकारचे निःसंग, अलिप्त म्हणून घोषित करता तेंव्हा तुम्ही आपोआप प्रस्थापिताचे पाईक नाही होत का?
साधु साधु !!!
ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः
( याचा अर्थ मला माहीती नाही. उगीचच फेकलेले आहे. )
बाकी सर्व सहमती
आपली दोन विधाने -
१. साहित्यिकांत साहित्यावरील निष्ठेपेक्षा साहित्यबाह्य राजकीय निष्ठेने घुसखोरी केलेली दिसते.
२. जणू काही एका लेखकाने दुसर्या विचारसारणीच्या व्यासपीठावर जाणे, त्यांच्याशी वैचारिक पातळीवर व्यवहार ठेवणे हे पाप आहे. यालाच असहिष्णुता म्हणत असावेत कदाचित. असो.
===========
आयटम १ बद्दलही (नियम म्हणून नाही पण ) कदीमदी सहिष्णू असायला हरकत नाही.
टाळ मृदंग उत्तरेकडे, आम्ही
टाळ मृदंग उत्तरेकडे, आम्ही गातो पश्चिमेकडे मंजे काय असू शकतं?
अजो, या व्हिडिओ मधे तुमच्या प्रश्नाचे अर्धेमुर्धे उत्तर आहे. बाळासाहेबांनी उत्तर द्यायचा यत्न केला आहे.. तुम्हाला पटेलच असे नाही पण उत्तर देण्याचा यत्न केलेला आहे.
प्रश्न बरोबर आहे. पण
प्रश्न बरोबर आहे. पण साहित्यबिहित्य वगैरे गोष्टींना प्रोत्साहन दिलं पाहिजे असे सर्कारात नमूद असल्यामुळे इकडे पैसा वळता होतो, इतकेच काय ते. उद्या सरकारने ठरवले की इस्त्रीवाल्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की मग अखिल भारतीय इस्त्रीवाले परिषदेचा मेळावा लोकांचा पैसा वापरून होईलही. दोन्ही सारखेच गर्ह्य किंवा ग्राह्य आहेत.
बायदवे जैपूर लिटफेस्टला केंद्राकडून किंवा राजस्थान सरकारकडून अनुदान वगैरे काही असतंय का?
मेळा असायला हरकत काहीच नाही.
मेळा असायला हरकत काहीच नाही. पण पब्लिकचा पैसा वापरून मेळा करू नये. अखिल भारतीय इस्त्रीवाले परिषदेचा मेळावा लोकांचा पैसा वापरून होतो का?
मुद्दा "इन-प्रिन्सिपल" मान्य आहे.
आता स्पेसिफिक्स कडे वळूया. पब्लिक चा पैसा म्हंजे कराची गंगाजळी. साहित्य संमेलनासाठी निधी राज्यसरकारकडून मिळावा ही अपेक्षा असते. राज्यसरकारच्या प्राप्तीचा मुख्य स्त्रोत हा विक्रीकर.
विद्रोही साहित्य संमेलन हे उपेक्षितांचे, वंचितांचे, व शोषितांचे साहित्य संमेलन आहे असा त्या संमेलनसमर्थकांचा/संस्थापकांचा दावा आहे. पण हा जो पब्लिक चा पैसा आहे (ज्याला आपण कर म्हणतो) त्या कराच्या गंगाजळीमधे उपेक्षितांनी, वंचितांनी, व शोषितांनी किती योगदान केले ? व योगदान केलेले असेल तर ते उपेक्षित्/वंचित्/शोषित कसे ? ते प्रस्थापित कसेकाय नाहीत ? प्रत्येक व्यक्ती अप्रत्यक्षरित्या टॅक्स भरत असते कारण इन्सिडन्स ऑफ टॅक्स हा प्रत्येकावर पडत असतो पण तो तर राजेशाहीत पण पडत होता व लोकशाहीत पण पडतो. व तो प्रस्थापितांवर पण पडतो व उपेक्षितांवर सुद्धा पडतो. तेव्हा हे अप्रत्यक्ष टॅक्स चे आर्ग्युमेंट खूपच कमकुवत आहे. उपेक्षित्/वंचित्/शोषित लोक वस्तू विकत घेत नाहीत असे नाही. घेतात. व त्यातील काही वस्तूंवर कर सुद्धा भरतात. पण तो कर त्यांच्यासाठी इतर महत्त्वाच्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी (उदा. रस्ते, पोलिस) खर्च होतो व व्हावा अशी अपेक्षा असते. तेव्हा उपेक्षितांनी/शोषितांनी/वंचितांनी (व त्यांच्या दलालांनी) उगीचच आपण डोंगराएवढे योगदान करत आहोत असा आविर्भाव बाळगून सरकारकडून निधी मिळवण्याचा यत्न करू नये.
माझा विद्रोही साहित्य संमेलनाच्या अस्तित्वावर आक्षेप नाही. परंतु त्यांची भूमिका (की त्या संमेलनाचा खर्च सरकरने उचलावा) ही सडेतोड आहे असा कोणताही पुरावा अजूनपर्यंत माझ्या समोर आलेला नाही.
आजपर्यंत झालेली विद्रोही साहित्य संमेलने ही खाजगी निधीतून आलेल्या पैशातून झालेली आहेत असा माझा समज आहे. खखोमाना.
संमेलनांना चार तुकडे टाकून दलितांचे कैवारी असल्याचा देखावा!
सरकार ही एक 'नैतिक" संस्था असून उपेक्षित्/वंचित्/शोषित लोकांचा उद्धार करणे हे तिचे नैतिक कर्तव्य आहे, अशी एक विचारधारा आहे. (याबाबत मतभेद असू शकतात!, किंबहुना या चर्चेवरून दिसते आहे की ते आहेतच!). काही प्रमाणात आजपर्यंतची सरकारे हे करतही आली आहेत. जिथे सत्ताधाऱ्यांचे हितसंबंध आड येतात (उदा. आदिवासींच्या शतकानुशतकांची पारंपरिक वहिवाटीची जमीन हिसकावून घेऊन ती राष्टीय-परराष्टीय कंपन्यांना विकणे ), तेंव्हा सरकारे (सर्वच पक्षांची!) सरळसरळ फॅसिस्ट, दमनकारी पद्धतीने वागतात हे आपण दंडकारण्यात बघत आहोतच . आणि दलित ऍट्रॉसिटी कायद्याखाली शिक्षा होण्याचे प्रमाण पुरते दोन टक्केही नाही, यावरुन सरकारची दलितांबद्दलची खरी आस्था समजून येईलच. पण अशा संमेलनांना, पुस्तकाना वगैरे चार तुकडे टाकून आपण दलितांचे कैवारी असल्याचा देखावा नक्कीच निर्माण करता येतो. या संमेलनांच्या उदघाटनास काँग्रेसचेच काय, पण भाजपचेही मंत्री आल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही (किंबहुना दलित -अनुययाची भाजपाची उघड नीती आहेच!)
पण या सगळ्या साहित्य
पण या सगळ्या साहित्य संमेलनांनी आजवर साध्य काय केलं आहे?
आदूबाळ व बॅट्या दोघांना सामायिक उत्तर,
जे काही साध्य केलं गेलं ते सिद्ध करण्यासाठी मोजदाद करता यायला हवी. साहित्यिक मंडळी जे काही पेश करतात ते सहजपणे मोजता येण्याजोगे नसते. त्यामुळे काय साध्य केलं गेलं आणि काय नाही या प्रश्नाचं उत्तर देता येणं कठिण आहे. हा दोष साहित्यिकांच्या माथी मारू नये.
हा दोष अकाउंटंट किंवा स्टॅटिस्टिशियन्स च्या माथी मारावा. कारण मोजदाद करण्याची एकके व पद्धती त्यांनी शोधून काढायला हवी होती.
( पळा पळा )
साहित्यिकांनाच नाही तर
साहित्यिकांनाच नाही तर प्रत्येकालाच काहीतरी लेबलं लावायची आणि त्या लेबलाप्रमाणेच त्या व्यक्तीने वागलं पाहिजे असा आग्रह धरायचा ही जुनी सवय आहे. माणसं एकसाची नसतात, त्यांना बारा राशींत कोंबता येत नाही तसं पंधरावीस वैचारिक भूमिकांच्या लेबलांमध्येही कोंबता येत नाही. अर्थात हे लोकांना शिकवण्याची जबाबदारी साहित्यिकांचीच आहे, ही आणखीन एक गंमत.
अवांतर आणि विस्कळीत
हे लोकांना शिकवण्याची जबाबदारी साहित्यिकांचीच आहे, ही आणखीन एक गंमत.
लिहिणाऱ्यांवर, कलाकारांवर अधिकची जबाबदारी असते, यात काही 'गंमत' वाटत नाही; ही गोष्ट रास्तच आहे. (लोकांना ती पटते का, हा निराळा मुद्दा.) ज्यांना दोन गोष्टी जास्त समजतात त्यांनी त्या मांडाव्यात, लोकांनी त्यातून काही जमलं तर घ्यावं, नाही तर सोडून द्यावं.
गेल्या आठवड्यात 'टाईम' नियतकालिकानं छापलेलं एक मत आठवलं - मेरील स्ट्रीपचा प्रांत आहे अभिनय, चित्रपटांचा. तिनं ट्रंपवर (कोणावरही) टीका करताना तिच्या क्षेत्रात राहून करावी; म्हणजे चित्रपट हे माध्यम वापरून तिनं टीका करावी. अशा टीकेमुळे खरोखर बातमीमूल्य असणाऱ्या गोष्टी बाजूला सारल्या जाणार नाहीत आणि तिनं भाषणात लावलेला मुद्दा - अपंगत्वावरून माणसांची टिंगल करू नये - रास्तच आहे, तोदेखील चर्चेत राहील.
इथल्या मूळ धाग्याच्या शेवटी, वाघमाऱ्यांनी ज्या कादंबऱ्यांची उदाहरणं दिलेली आहेत, मी त्यातली फक्त 'उद्या' वाचली आहे. 'उद्या'मधून खरे असाच एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात. राजेश घासकडवी, तुम्हाला स्वतःला खऱ्यांची 'उद्या'मधली भूमिका, मतं फार पटली नाहीत तरीही कादंबरी म्हणून तुम्हाला ती आवडली. याच पुस्तकावर ऐसीच्या दिवाळी अंकात चर्चाही झाली आहे. (दुवा)
प्रश्न असा की साहित्याचा आपल्यावर (-समाजावर) खरोखर मोठा (किंवा माफक) परिणाम होतो का? 'उद्या' वाचल्यामुळे आपण आपली जीवनपद्धती, माफक प्रमाणात का होईना, बदलतो का? मेरील स्ट्रीपनं भाषणात मांडलेला मुद्दा - अपंगात्वाबद्दल टिंगल करू नये - निःसंशय ग्राह्य आहे असं मानतो का? साहित्यिक आणि कलाकारांचा आपल्यावर खरोखरच किती परिणाम होतो?
मतांतरे
प्रतिसाद लांबलचक झाला आहे,म्हणून मूळ लेखातील परिच्छेदानुसार क्रमश: माझे मत लिहीत आहे.शेवटी एकत्र करता येईल.
परिच्छेद १)
प्रस्थापितांमध्ये विद्रोही विचारांना स्थान नाही तसे विद्रोहयांमध्येसुद्धा प्रस्थापिता विचारांना स्थान नसणारच. विद्रोही संमेलनांची विशेषता म्हणजे त्यात विद्रोह हीच थीम असते. त्यामुळे त्यात प्रस्थापित शिरू शकत नाहीत.
विद्रोही साहित्याची अपरिहार्यता विद्रोहींनी प्रस्थापितांना का पटवून द्यावी? विद्रोही साहित्य जर सातत्याने निर्माण होत असेल तर त्यामागे कसलातरी रेटा असणारच. त्याचे कारण हवे तर इतरांनी समजून घ्यावे. घ्यावेच असेही नाही. न घेतल्यास काही बिघडेल असेही नाही. पुरेसा ग्राहकवर्ग असेल तर असे साहित्य प्रकाशित होत राहील. यात समेटाची मांडवली करण्याची गरज/जरूर नाही. म्हणजे सदैव लढाईच असली पाहिजे असे नाही. सहअस्तित्व राहू शकते. ते शांतिपूर्णच असले पाहिजे असेही नाही.
परिच्छेद २)
गटागटांचे औचित्य काय हा प्रश्नच पोकळ आहे. समान विचारधारेचे लोक एकत्र येणारच. समानशीले व्यसनेषु सख्यं' वगैरे. त्याला गटबाजी किंवा कंपूशाही असे नाव देउन वातावरण कलुषित का केले जावे? साहित्यनिर्मितीचा गटांशी संबंध असला काय नसला काय. उत्तम साहित्यनिर्मितीसाठी गट नसणेच उचित आहे असे नाही. निर्मितीमध्ये (प्रसव)वेदना असतात असे एक वेळ म्हणता येईल पण औचित्याशी संबंध कसा जोडता येईल? निर्मिती ही स्थळकाळाचे औचित्य पाहात नसते.
एकाच वेळी अनेक विचारसरण्यांतले काही अंश आवडू शकतात याच्याशी सहमत.
परिच्छेद ३)
प्रस्थापित विरुद्ध विद्रोही हे प्रकरण अनादिकाळापासूनचे आहे. त्याचा समाजवादाशी काही संबंध नाही. प्रस्थापित संकल्पनांच्या विरुद्ध सकारात्मक बंडखोरी करणारे ज्ञानेश्वर हे थोर विद्रोही होते. आज हे भेद अधिक करून आर्थिक परिस्थितीशीच निगडित आहेत. आपल्याकडे प्रत्येक ज्ञातिच्या संस्था असतात. यातले अधिकांश पदाधिकारी धनदांडगे प्रस्थापितच असतात. प्रस्थापित कमिटी उखडून टाकावी म्हणून इतर ज्ञातिबांधव जंग जंग पछाडत असतात. anti incumbencyच्या रूपात राजकारणातही हे भेद दिसतात आणि ते जातिनिष्ठ नसतात. सत्यकथेचे अंक जाळणारे तरुण जातिबद्ध नव्हते, केवळ विद्रोही होते.
साहित्यनिर्मिती थांबते ती प्रतिभा संपल्यामुळे. अनावश्यक चढाओढीचा साहित्यानिर्मितीवर फारसा परिणाम होत नसावा. उलट ही उलघाल आणि संघर्ष थोड्याफार प्रमाणात उत्कट साहित्यनिर्मितीला कारणीभूत होत असावा.
आणि स्वत:ची पुस्तके खपवण्याचा प्रयत्न करणे हा स्वार्थीपणा कसा?
परिच्छेद ४)
'थेटपणे सामाजिक संदेश देणारे,उपदेशात्मक साहित्य हेच खरे साहित्य व रंजन करणारे, विचारप्रवण करणारे, ललित साहित्य हे कमअस्सल दर्जाचे पलायनवादी साहित्य या समाजवादी काळातील छद्मविचाराच्या प्राबल्याने वाचनीयतेसोबतच इतर साहित्यमूल्यांच्या बाबतीत मराठी साहित्याचे अध:पतन झाले आहे.'
एक तर हा समाजवादी विचार नव्हता. ८०-९० वर्षांपूर्वी (बहुधा जगात कुठेच) ग्राहकवादाचा बोलबाला नव्हता. आजचा सुप्रसिद्ध मध्यमवर्ग भारतात उदयासही आला नव्हता. काटकसर ऐच्छिक नव्हती, सक्तीची होती. काटकसर हेच जीवन होते आणि ते समाजवादाच्या पगड्यामुळे नव्हते.
कलेसाठी कला की जीवनासाठी कला हा वाद फडके-खांडेकरांच्या काळात खूप हिरीरीने खेळला गेला. फडके, हडप, कवठेकर, ह.ना आपटे,वा.म जोशी, अत्रे, रांगणेकर असे लोक आपापल्या परीने मराठी साहित्य समृद्ध करीत होते. हिंदीतला छायावाद मराठीत फोफावला नाही. उलट फडक्यांच्या 'प्रतिभासाधना'तून सौंदर्यवादाने मराठीत जोमाने पाउल रोवले. तेव्हा साहित्य एकसुरी, एकछापी झाले हे म्हणणे वास्तवाला धरून नाही.
अनुभवाचे वैविद्ध्य नाही, असले तरी त्याचे प्रतिबिंब साहित्यात दिसत नाही ही रड जुनीच आहे. माधव मनोहरांनी 'मराठी साहित्य थिटे आहे' अशी डरकाळी फोडली होती. लिहित्या वर्गाचा वावर एका मर्यादित परिघात असणे हे त्याचे एक कारण आहेच, पण अनुभववैपुल्य आणि वैविध्य जवळ आहे म्हणून उत्तम साहित्य निर्माण होईलच असे नसते. नाही तर 'घे अनुभव आणि पाड साहित्य' असा प्रकार झाला असता.
अनुभवांचे यथातथ्य वर्णन करणारे साहित्य हे उत्तम असतेच असे नाही. उत्तम साहित्य हे असे अनुभव मनात रिचवून-जिरवून, रवंथ करून झाल्यावर स्फुरलेले जीवनभाष्य असते. उत्तम साहित्यनिर्मितीसाठी प्रज्ञा,प्रतिभा,चिंतन आणि अभिव्यक्तिक्षमतेची आवश्यकता असते. मासेमारीचे अनुभव अनेक कोळी बांधवांना असतात. पण त्यातला नियतीचा थरार टिपणारा हेमिंग्वे एखादाच असतो.
परिच्छेद ५)
प्रवाहविरोधाचा पवित्रा कितीकाळ घ्यायचा हा प्रश्नच उद्भवत नाही. सगळेच काही प्रवाहपतित होऊन प्रवाहाबरोबर वाहाणारे नसतात. प्रवाह क्षीण झाला तर विरोधी पवित्र्याचे कारणच न उरून पवित्रे आपोआपच गळून पडतात आणि प्रवाह सशक्त झाला तरीही विरोध क्षीण होउन पवित्रे गळून पडू शकतात. यात फार टेन्शन घेण्यासारखे काही नाही. कुठल्याही भाषेतल्या साहित्यात उत्तम साहित्याची टक्केवारी अत्यल्पच असते. मग विरोधासाठी विरोध असो वा सत्यासाठी असो वा विरोध नसोही.
संपूर्ण.
सम्मेलन अधिक पुस्तक प्रदर्शन
सम्मेलन अधिक पुस्तक प्रदर्शन यास तिकिट लावून कोणी मेळा भरवला असता, सरकारी मदत घेतली नसती तर टीका फारच कमी झाली असती.
जयपूर लिट्ररीचं माहित नाही राजस्थान सरकार मदत करते का पण एक प्रायोजक (झी टेलिलिजन,झी) आता आहे. ते मध्ये एकदा चर्चेत अशासाठी आले होते कारण सलमान रश्दि याना मुलाखतीसाठी बोलावले होते.
थेटपणे सामाजिक संदेश
थेटपणे सामाजिक संदेश देणारे,उपदेशात्मक साहित्य हेच खरे साहित्य व रंजन करणारे, विचारप्रवण करणारे, ललित साहित्य हे कमअस्सल दर्जाचे पलायनवादी साहित्य या समाजवादी काळातील छद्मविचाराच्या प्राबल्याने वाचनीयतेसोबतच इतर साहित्यमूल्यांच्या बाबतीत मराठी साहित्याचे अध:पतन झाले आहे. एखाद्या नाटककाराला, सिनेमाकाराला आमच्या कलाकृतीत कसा 'सामाजिक संदेश' आहे हे मुद्दामहून सांगावे लागते, नाहीतर तो 'फाऊल' धरला जातो. वैचारिक बहुसंख्याकवाद सर्जनशीलतेचा गळा कसा घोटतो याचे हे उदाहरण आहे. हे प्रस्थापित आणि विद्रोही दोहोंना लागू आहे. त्यामुळे जागतिकीकरणाच्या काळात अनुभवांचे वैविध्य, एक्स्पोजर वाढले असले तरी ते साहित्यात आणण्यात आपण अपयशी ठरतो आहोत. मग एखादेच 'एम टी आयवा मारू', एखादेच 'रारंगढांग', एखादेच 'उद्या' यासारखी पुस्तके भिंग लावून शोधावी लागतात व वर्षानुवर्षे त्यांचे तेच ते गुणवर्णनपर लेख वाचावे लागतात. परिणामी अनुवादित साहित्याची मागणी वाढली आहे, यात नवल ते काय?
हा कळीचा मुद्दा आहे. एखाद्या ठराविक लेखनालाच "साहित्य" म्हणून बाकी सगळे काही "खपाऊ" म्हणून दूर ढकलणे हा येडझवेपणा आहे.
उ.दा गूढकथा, विज्ञानकथा, भयकथा, नवलकथा (fantasy) हे सगळे प्रकार मग "इतर" मधे ढकलले जातात. खरं तर ही सगळी स्वयंभू genres असून त्यातही उप-प्रकार आहेत!
पण आपण अजूनही त्याच चिंधीचटोर गोष्टींमधे रमलोय. मग लोक कशाला मराठी पुस्तकांच्यामागे धावतील?
बाकी संमेलनं वगैरेबद्दल नो कॉमेंट्स!
लेखक आणि वाचक या दोघांचाच
हे जर तुम्हाला माहिती आहे वाघमारे साहेब तर तुम्ही असल्या विषयांवर वेळ, उर्जा का वाया घालवत आहात?