६०-७० वर्षांपूर्वीच्या जमान्यात अशी पद्धत होती की मराठी (आणि भारतात अन्य प्रांतातहि) शिक्षित आणि मध्यमवर्गी समाजात नव्या जन्मलेल्या मुलामुलींची नावे बहुतांशी पुराणातील आणि रामायण-महाभारत-भागवतासारख्या ग्रंथातील देवदेवतांच्या नावावरून घेतलेली असत - जसे की शंकर, राम, विष्णु, लक्ष्मण, सीता, गंगा, पार्वती, उमा इत्यादि. माझा असा तर्क आहे की १९३०-४०च्या सुमारास शरच्चन्द्र, रवीन्द्रनाथ अशा लेखकांच्या प्रभावामुळे की काय आपल्याकडे नव्या धाटणीची नावे कानावर पडू लागली. १९३०च्या पुढेमागे जन्मलेल्या माझ्या तीन काकांची नावे चित्तरंजन, चैतन्य आणि चन्द्रशेखर अशी होती तर आत्याचे नाव होते कलावती. अशा धाटणीच्या दिलीप, आनंद, संतोष, प्रफ़ुल्ल, अरुणा, निर्मला, शैला, सुनंदा अशा नावांनी नंतरच्या चाळीस-पन्नास वर्षे आपला जम बसविला होता. माझे स्वत:चे नाव ’अरविंद’ अशाच प्रकारचे. हे नाव १९व्या शतकातील महाराष्ट्रात कोठे कानावर पडले असते असे वाटत नाही.
अलीकडच्या दिवसात असे दिसू लागले आहे की हीहि नावे आता कालबाह्य होऊ लागली आहेत. अलीकडचे तरुण आईवडील अधिक नव्या नावांच्या शोधात भारतीय परंपरेमध्ये आणि जुन्या वाङ्मयात अधिक खोल जाऊन नवनवी नावे शोधू लागले आहेत. आर्य, जय, वेद, अन्वय, अनुजा, यश, तेजस् अशी नावे अलीकडे सरसहा दिसू लागली आहेत आणि त्यांनी शंकर-विष्णु-सुनील-प्रकाश आणि अरुणा-शैला-सुनंदा-रंजनांना पूर्ण हद्दपार करून टाकले आहे.
ही नवी नावे शोधतांना आईवडील ह्याकडेहि विशेष लक्ष्य देतांना दिसतात की मराठी किंवा भारतीय नसलेल्यांनादेखील ते नाव सहज उच्चारता येते, कानी पडताच समजते आणि उच्चरणात त्यांच्याकडून त्याची फार मोडतोड होऊ शकत नाही. भारताबाहेर राहणार्यांना ह्याचे विशेष महत्त्व वाटते.
ह्याला माझा विरोध आहे असे अजिबात नाही. माझ्या एका भाच्याने आपल्या मुलीचे नाव ठेवले ’सानिका’. हा शब्द माझ्या माहितीचा नव्हता आणि म्हणून मी थोडया साशंकतेनेच त्याला नावाचा अर्थ विचारला. ह्या नावाचा अर्थ ’बासरी’ आहे असे त्याने मला सांगितले. मोनियर-विल्यम्सकडे चौकशी केल्यावर तो अर्थ योग्य निघाला आणि एक नवे, उच्चारायला सोपे, भारतीय परंपरेतले आणि सार्थ नाव प्रचारात येऊ पाहात आहे हे मला जाणवले.
सगळ्याच ठिकाणी अशी नवी आणि अर्थपूर्ण नावेच ऐकायला मिळतात असे म्हणता येत नाही. अंधुक प्रकारे संस्कृत/भारतीय परंपरेतील वाटणारी आणि कानाला गोड लागणारी नावे शोधण्याचा हा प्रयत्न नेहमीच यशस्वी होतो असे नाही. नाव सुचविणार्यांना आणि निवडणार्यांना नावाचा अर्थ कळत नाही अथवा जाणून घ्यायची आवश्यकता वाटत नाही. अशी ’पोकळ’ नावे सुचविणार्या डझनावारी वेबसाइट्स् समोर असल्याने त्यातून एक ’रेडीमेड’ नाव उचलण्य़ाचा सुलभ मार्ग असे आईवडील चोखाळतात आणि त्यातून हास्यास्पद/वाईट/निरर्थक/ अशी नावे दिली जातात.
हास्यास्पद वाटू शकणार्या शब्दाचे एक उदाहरण देतो. ’स्वप्निल’ असे नाव मी अलीकडे दोनचार जागी ऐकले. खरे पाहता असा शब्दच मुळात अस्तित्वात नाही आणि आपणच तो पाडलेला आहे पण ते ठीक आहे असे म्हणून सोडून द्या कारण ’स्वप्न’ ह्या शब्दाशी त्याचा संबंध सहज दिसतो आणि 'deamy-eyed' असा त्याचा अर्थहि लागू शकतो. मला अडचण दुसरीच दिसत आहे. आजचा गोड मुलगा स्वप्निल ६०-७० वर्षांनी आजोबा होईल तेव्हा त्याची नातवंडे त्याला ’स्वप्निलआजोबा’ अशी हाक मारू लागतील ह्याची मला काळजी वाटत आहे!
वाईट अर्थाचे पण सर्वत्र बोकाळलेले आजचे एक नाव म्हणजे ’वृषाली’. ’वृषल’ ह्या शब्दाचे सर्व अर्थ अप्रिय वाटणारे आहेत. उदाहरणार्थ ’वृषल’ म्हणजे दासीपुत्र. (माझ्यामुळे चन्द्रगुप्त सम्राट् झाला अशी चाणक्याची मुद्राराक्षसातील दर्पोक्ति आहे आणि तिची जाणीव प्रत्येकाला व्हावी म्हणून चाणक्य चन्द्रगुप्ताला ’वृषल’ असे मुद्दाम संबोधतो.) वृषली/वृषाली म्हणजे दासीपुत्री. अर्थ जाणून घेतला तर कोणी आपल्या मुलीला बुद्ध्याच हे नाव ठेवेल असे वाटत नाही. ’अहन्’ (दिवस) असेहि नाव माझ्या कानावर आलेले आहे तसेच मुलीचे नाव ’सनेयी’. (म्हणजे काय देव जाणे. संस्कृत असावे असे वाटत आहे आणि कानाला गोड लागत आहे. आईवडिलांना एव्हढे बस्स आहे!)
प्रत्यक्षातील परिस्थिति ह्याच्याहि पार पलीकडे जाऊन पोहोचली आहे. अलीकडेच वेबसाइटवरून उचललेली ’आरुष’ आणि ’रेधान’ अशी नावे माझ्या कानावर आली. ’आरुष’ म्हणजे ’सूर्याचे पहिले किरण’ इति वेबसाइट. ’आरुष’वाल्यांनी ह्या नावाला काही अर्थ आहे का असे मला विचारले म्हणून मी त्याच्या थोडा खोलात गेलो. ’आरुष’, ’आरुष्’, ’आरुश’ किंवा ’आरुश्’ असा कोणताच शब्द कोषात मिळत नाही. (’आरुषी’ म्हणजे मनूची मुलगी आणि और्वाची आई असा अर्थ मिळतो.) ’अरुष’ असा मात्र शब्द आहे आणि त्याचे अर्थ ’प्रकाशमान्’, ’अग्निदेवतेचा तांबडा अश्व’, ’सूर्य’, ’उष:काल’ असे दिलेले आहेत, ह्याचा ’सूर्याचे पहिले किरण’ ह्याच्याशी दूरान्वयाने का होईना काही संबंध पोहोचतो. तेव्हा हे नावच द्यायचे असले तर ते ’अरुष’ असे हवे, ’आरुष’ असे नको. शब्द अचूकपणे वापरणे ज्यांना महत्त्वाचे वाटते त्यांनाच ह्याची आवश्यकता पटणार.
’रेधान’ मात्र माझ्या बुद्धीपलीकडे आहे. हे पूर्णत: अर्थशून्य नाव आहे. हे नाव म्हणे सिनेतारा ऋतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान ह्यांनी आपल्या मुलास दिले आहे आणि त्यांच्या नावांतून एकेक भाग उचलून ते नाव निर्माण केले आहे. ह्यापलीकडे त्याला काही अर्थ नाही. तरीहि माझी खात्री आहे की आपले सर्व विश्व सिने/दूरदर्शन तारे/तारकांभोवती फिरत असल्याने हे अर्थशून्य नाव लवकरच सर्वत्र कानी येऊ लागेल.
तरुण आईवडील अपत्यांना नाव देण्यासाठी आपल्या पारंपारिक ठेव्याकडे आणि वाङ्मयाकडे वळत आहेत ही नक्कीच उत्तेजनार्ह आणि आनंदाची बाब आहे पण तसे करतांना त्यांनी दाखविलेल्या उथळपणामुळे ओशाळवाणे वाटते हेहि तितकेच खरे असे मी म्हणतो.