ज्येष्ठ विचारवंत प्रा. राम बापट यांचे निधन
ज्येष्ठ विचारवंत व राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. राम बापट यांचे आज निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. पुणे विद्यापिठात १९६५पासून १९९१पर्यंत राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभागात प्रथम व्याख्याता व नंतर प्रपाठक म्हणून त्यांनी काम केले. काही काळ त्या विभागाचे प्रमुख म्हणूनही काम पाहिले. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात त्यांनी सहभाग घेतला. दलित, आदिवासी, मागास व स्त्रिया आणि पर्यावरण याविषयीच्या चळवळीत त्यांना रस होता. त्यांची रसाळ व्याख्यानं आणि त्यातून गुंतागुंतीचे तत्त्वविचार मांडण्याची त्यांची हातोटी महाराष्ट्राची वैचारिक परंपरा पुढे नेणारी होती. प्रा. बापट यांनी वयाची ८० वर्षे पूर्ण केली तेव्हा 'प्रहार'मध्ये त्यांच्याविषयी आलेल्या मौखिक परंपरेचे पाईक या लेखातून त्यांच्या कार्याचा अधिक परिचय होईल.
डॉ. सदानंद मोरे यांच्या 'तुकाराम' पुस्तकाची राम बापट लिखित प्रस्तावना या दुव्यावर वाचता येईल.
प्रतिक्रिया
अरेरे! स्वतःच्या
अरेरे! स्वतःच्या विचारसरणीपलिकडे जाऊन विविध अंगांनी प्रश्नांकडे पहायची कुवत असणार्या मोजक्या विचारवंतांपैकी अजून एक हरपले
प्रा. बापट यांना श्रद्धांजली
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
संबंधित वृत्त
संबंधित वृत्त :
महाराष्ट्र टाईम्स
लोकसत्ता
सकाळ
--
माहितगार
प्रा. बापट याना श्रध्दांजली.
प्रा. बापट याना श्रध्दांजली.
अत्यंत दुखद बातमी!
अत्यंत दुखद बातमी!
मृत्यूलेखांचे दुवे
लोकसत्ता : चालतेवोलते विद्यापीठ!
महाराष्ट्र टाइम्स : चिकित्सक मार्गदर्शक
प्रहार : परिवर्तनवाद्यांचा मित्र
दिव्य मराठी
सकाळ : कृती आणि विचार यांना जोडणारा सेतू
शनिवार दिनांक ७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता एस. एम. जोशी सभागृह येथे श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
किस्सा
पुणे विद्यापीठात एकदा एका कार्यक्रमाला गेलो होतो. बहुतेक परिसंवाद असावा. त्यात लक्ष्मण माने पण होते. राम बापटांचे भाषण चालू होते. त्यात ते व्यासपीठावरील लक्ष्मण माने यांचा उल्लेख ते लक्ष्मण साने असा करत होते. श्रोतृवर्गात चूळबूळ चालू झाली. व्यासपीठावरील वक्ते देखील जरा अस्वस्थ होते. लवकरच प्रा राम बापटांच्या ते लक्षात आले. ते म्हणाले, "अरे मी तर त्यांची जातच बदलून टाकली" लक्ष्मण मान्यांसकट सगळे हसले.
बापट सर गेल्यावर ते आठवलं.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
वा
ते 'राम बापट' होते, हेच खरं. एरवी असं झाल्यानंतर जे घडू शकतं त्याची कल्पनाच केलेली बरी.
आणखी काही लेख
गेल्या काही दिवसांत राम बापट यांच्याबद्दल विविध ठिकाणी प्रकाशित झालेले आणखी काही लेख -
क्रांतिप्रेरक बापट सर - निशिकांत भालेराव (दिव्य मराठी)
अस्सल विचारवंत - यशवंत सुमंत (लोकसत्ता)
शहाणे करून सोडावे सकल जन - राम जगताप (प्रहार)
आभाळाएवढा मोठा माणूस - हेमंत (चरैवेति ब्लॉग)
१९७२साली राम बापटांनी लिहिलेलं 'समाजवादी मित्रांना अनावृत्त पत्र' त्या निमित्तानं संपादित स्वरूपात 'प्रहार'नं दिलं आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
संपादन
राम बापटांचे ते पत्र वाचायला गेलो. आणि उपसंपादकांच्या डुलक्या पाहून खुर्चीतून पडलो. मग जरा नीट पाहिल्यावर संपादित पत्र खाली दिसले.
बापट सरांचा आज प्रथम स्मृतिदिन!
बापट सरांचा आज प्रथम स्मृतिदिन!
सरांच्या प्रेरक स्मृतीस विनम्र आदरांजली!!
किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||
राम बापट स्मृती व्याख्यानमाला
प्रा. राम बापट स्मृती व्याख्यानमालेतलं पहिलं व्याख्यान पुण्यात येत्या शनिवारी होणार आहे.
वक्ते : प्रा. सदानंद मेनन
विषय : VISUALISING IDENTITY : The Cultural Politics of Dravidian Nationalism
द्रविड अस्मिता निर्माण करण्यासाठी सिनेमा आणि इतर सांस्कृतिक फळ्या कशा प्रकारे वापरल्या जातात आणि त्यांद्वारे राजकीय खेळी कशा खेळल्या जातात ह्याविषयी ते बोलणार आहेत.
स्थळ : एस. एम. जोशी सभागृह
वेळ : ६ जुलै संध्याकाळी ६ वा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मस्त रोचक विषय आहे!!!जमल्यास
मस्त रोचक विषय आहे!!!जमल्यास अटेंडायला आवडेल. एसेम जोशी सभागृह कुठे आहे बादवे?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
एस.एम.जोशी सभागृह
गरवारे महाविद्यालयाच्या मागील पुलावरून (एस.एम.जोशी पूल) शास्त्रीरस्त्याकडे जातानाचा वैकुंठाकडे जाणाऱ्या गल्लीच्या सुरुवातीला डाव्या हाताला, पत्रकार भवनाला लागून! किंवा गांजवे चौकातून गरवारे कॉलेजकडे जाताना पुलाच्या आधी डावीकडे वळावे!
किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||
पत्रकारभवनाची हिंट पुरेशी
पत्रकारभवनाची हिंट पुरेशी आहे, धन्यवाद
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
व्याख्यानातील तपशिलाविषयी
व्याख्यानातील तपशिलाविषयी जाणून घ्यायला आवडेल!!
धन्यवाद!
किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||
माझी चेपु पोस्ट, जशीच्या तशी.
"द्रविड नेत्यांच्या चित्रपटातील प्रतिमा आभासी - सदानंद मेमन"
सकाळी सकाळी लोकसत्ताच्या छापील आवृत्तीमधील बातमीचे (ई-आवृत्तीमधे ही बातमी अजून दिसत नाही) हे शीर्षक वाचून आमचे झाकण उडले. उथळ पत्रकारितेचा आणखी एक नमूना! सतत सनसनाटीपणाच्या प्रेमात असलेल्या तथाकथित पत्रकारांना मुद्द्यांचा विपर्यास वगैरे गोष्टी एकतर ठाऊक नसाव्यात किंवा तितपत बौद्धिक कुवत असलेले पत्रकार हल्ली दुर्मिळ झाले असावेत.
मेनन यांचे व्याख्यान अतिशय अनोख्या विषयावरचे. सिनेमाचा 'माध्यम' म्हणून वापर करून समाजकारण नि राजकारण या दोनही क्षेत्रात द्रविडी राष्ट्रवादाची रुजवण करून, आपल्या सामाजिक अजेंडाचे भविष्यातील चित्र चक्क सादर करून (जेणेकरून प्रेक्षकांना त्याबाबत तर्काची आवश्यकता नाही.) त्या त्या क्षेत्रात प्रथम द्रविड कळ्घम, मग द्रविड मुन्नेत्र कळ्घम नि अखेर अन्ना द्रविड मुन्नेत्र कळ्घम या पक्षांनी केलेली वाटचाल असे काहीसे व्याख्यानाचे स्वरूप होते. यात नायकरांची जस्टिस पार्टी (जी राजकारणाला अस्पर्शच नव्हे तर शोषणाचे माध्यम मानून केवळ समाजकारणाच्या माध्यमातून पारंपारिक ब्राह्मणी वर्चस्वाला आव्हान देत होती) अशा चित्रपटातून आपले जे तत्त्वज्ञान मांडत होती ते पददलितांचे, शोषितांचे हुंकार होते. सर्वसामान्यांतून आलेले हिरो, उच्चवर्णीयांतून वा सत्ताधारी वर्गातून येणारे शोषक वा विलन अशी मांडणी असे. त्यानंतर जेव्हा हीच पार्टी किमान स्थानिक राजकारणात आपण भाग घेतला पाहिजे, आपला अजेंडा राबवण्यासाठी सत्ता हवी या निष्कर्षाप्रत आली नि 'द्रविड कळ्घम' ऊर्फ डीके या राजकीय पक्षाच्या रूपात उभी राहिली तेव्हा या चित्रपटातून त्यांचा पोस्टर बॉय म्हणून मिरवणार्या एमजीआरच्या भूमिका कोणत्या होत्या, त्यानंतर केंद्रीय सत्ताधार्यांशी ६५च्या आसपास झालेल्या करारानुसार राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात सहभागी झाल्यानंतर त्या कशा होत्या, नि अखेर स्वतःच सत्ताधारी झाल्यावर त्या कशा बदलल्या याचे कालानुक्रमे अतिशय नेमके सादरीकरण मेनन यांनी केले. यात केवळ चित्रपटच नव्हे तर त्याच वेळी राजकारणात, समाजकारणात घेतलेल्या भूमिका, राबवलेली लक्षणीय धोरणे यांचे विवेचनही मेनन यांनी केले. ज्याचे लोकसत्ताच्या पत्रकाराने शीर्षक बनवले नि त्यानुसार सारी बातमीच फिरवली आहे तो केवळ समारोपाचा भाग होता, पण ते काही व्याख्यानाचे सार नव्हे. याच व्याख्यानात त्यांनी या द्रविड राष्ट्रवादातून उभ्या राहिलेल्या पक्षांबाबत काही महत्त्वाच्या बाबीही अधोरेखित केल्या. जिथे बंगालमधे ३५ वर्षे सलग राज्य करणार्या कम्युनिस्ट राजवटीचा उल्लेख आवर्जून होतो तिथे सुमारे पन्नास वर्षे नेमक्या विचारधारेचे - फक्त राजकीय दृष्ट्या वेगळे - असलेले दोन पक्ष गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ तिथे सत्ताधारी आहेत हे आपण ध्यानात घेत नाही, याचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. याच विचारधारेवर असलेला, नायकरांकरवी आलेला, बोल्शेविजमच्या प्रभावाचाही यात उल्लेख येतो. असे विलक्षण परिणामकारक व्याख्यान अनुभवून परतलो असताना हे असे सर्वस्वी अडाणीपणाचे शीर्षक नि बातमी वाचून डोके फिरले नसते तरच नवल.
या द्रविड पक्षांची वाटचाल पाहता बाळासाहेब ठाकरेंनी याच मॉडेलवर शिवसेना उभी केली असे मला राहून राहून वाटत होते. त्यानंतर प्रथम शिवसेना ही अराजकीय संघटना म्हणून उभी राहणे. प्रस्थापितांऐवजी इथे प्रथम कम्युनिस्ट , नंतर दाक्षिणात्य व पुढे व्यापक पायाची गरज लागल्यावर मुस्लिम सांस्कृतिक, राजकीय आक्रमणाविरूद्ध उभे राहणे, अगदी नायकरांची आव्हानात्मक, प्रसंगी अपमानकारक वा अश्लील वाटावी अशी भाषादेखील. फक्त चित्रपट माध्यम हे केवळ करमणुकीचे म्हणून आधीच रुजून बसल्याने नि सुरुवातीच्या काळात जस्टीस पार्टीला जसा सामाजिक कामातून स्वत:ची इमेज निर्माण करणे फायदेशीर ठरते हे चटकन ध्यानी घेतलेल्या धनिकांचा आश्रय लाभला तसा न लाभल्याने (कदाचित धनिकांच्या दृष्टीने आता त्याचे महत्त कमी झाल्याने म्हणा वा बाळासाहेबांचे कार्यक्षेत्र असलेल्या मुंबईत धनिकांचे बस्तान आधीच व्यवस्थित बसले असल्याने त्याची गरज न वाटल्याने म्हणा) पुरेशी आर्थिक ताकद नसल्याने कदाचित बाळासाहेबांना हा पर्याय उपलब्ध झाला नसावा. नि याबाबत अत्रेंचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून त्यांनी चित्रपटासारख्या खर्चिक माध्यमाऐवजी पत्रकारितेसारख्या संपूर्ण आपल्या कह्यात असणार्या माध्यमाची निवड केली असावे. असो. (अर्थातच ही शेवटची नरोटी माझी, मेनन यांच्या व्याख्यानाचा भाग नव्हे.)
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
वेगळा धागा
थोडा विस्तार केल्यास या प्रतिसादाचा वेगळा धागा होऊ शकतो. रमताराम आणि संपादकांनी याची नोंद घ्यावी.