Skip to main content

लेखक, विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या

प्रख्यात कन्नड लेखक, विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
डॉ. कलबुर्गी यांनी मूर्तिपूजेविरुद्ध विचार मांडले होते.

(व्यवस्थापन : हत्येवरील चर्चा दीर्घकाळ चालू राहिल्यामुळे स्वतंत्र धागा करण्यात आलेला आहे.)

ऋषिकेश Fri, 04/09/2015 - 13:40

In reply to by श्रीगुरूजी

स्वगत:
तुमच्यासारखा निषेध करून धर्मवादी गप्प बसले असते तर धर्मवाद्यांना असे खूनामुळे तोंड लपवावे लागते ना!
सगळेच धर्मवादी तुमच्यासारखे संयत निषेध नोंदवणारे होवोत ही त्यांच्या त्यांच्या देवदेवतांचरणी प्रार्थना

बॅटमॅन Fri, 04/09/2015 - 15:07

In reply to by ऋषिकेश

झालंच तर कर्ते पुरोगामी अजून वाढोत आणि कुंपणावर बसून "माय इनअ‍ॅक्शन इज़ अ‍ॅज़ गुड अ‍ॅज़ अ‍ॅक्शन" छाप किंचाळणार्‍यांचे प्रमाण कमी होवो.

राही Mon, 07/09/2015 - 19:23

१)मी हिंदू असेन तर मला मूर्तिपूजा नाकारण्याचे स्वातंत्र्य आहे की नाही? मूर्तिपूजा करू नका असा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य मला आहे की नाही? 'देव देव्हार्‍यात नाही' असे म्हणण्याचे स्वातंत्र्य मला आहे की नाही? की ते फक्त उच्च कोटीच्या संतांनाच आहे? संतांना अनुसरण्याचे स्वातंत्र्य मला आहे की नाही? की मी फक्त काही 'मान्यताप्राप्त' संतांनाच अनुसरावे? संतांचे जे विचार मला झेपतील तेव्हढेच विचार सिलेक्टिव्ली अंगीकारण्याचे स्वातंत्र्य मला आहे की नाही? यच्चयावत सर्व हिंदू संतांचे विचार मी अनुसरलेच पाहिजेत किंवा फक्त काही संतांचे विचारच मी अनुसरले पाहिजेत अशी सक्ती धाकदपटशासह करण्याचे स्वातंत्र्य इतरांना आहे का?
खाली कुठल्यातरी एका इंग्लिश अवतरणात 'मूर्तिपूजा करू नका असे त्यांनी सांगता कामा नये होते' अशा अर्थाचे इंग्लिश उद्धृत आहे, म्हणून.
२)गेल्या तीस चाळीस वर्षांपर्यंत (आणि कित्येक ठिकाणी अजूनही) म्हणजे यू आर. अनंतमूर्तींच्या बालपणकालानंतरही कित्येक वर्षे जाखाई, जोखाई, म्हसाई वगैरे ग्रामदेवता गावच्या सीमेबाहेर अनघड पत्थरांच्या रूपात असत. वेताळ असत, भुतदेव असत. तिथे दिवाबत्ती होत नसे. कुत्रे-मांजरे, गायी-म्हशी-गुरे तिथे काहीही करीत. अशा ठिकाणी एका लहान मुलाने केवळ कुतूहल (काय होते ते बघायला) म्हणून लघुशंका केली आणि त्यामुळे पुढील आयुष्यात काहीही वाईट झाले नाही असे खूप वर्षांनी सांगितले, यात एव्हढा मोठा गहजब (आणि मानवहत्या) करण्याजोगे काय होते? कोणी भीती दाखवली की ती गोष्ट मुद्दाम करून दाखवायची अशी काही जणांची, विशेषतः लहान मुलांची वृत्ती असते. अमावास्येच्या रात्री स्मशानात जाणे, जळत्या चितेवर विडी पेटवणे किंवा तिथली राख भर मध्यरात्री अंगाला फासणे, मुंजाच्या पिंपळाखाली पैजेवर रात्र काढणे अशा गोष्टी आपण सर्वांनी ऐकलेल्या असतात. याला आपण अतरंगीपणा म्हणतो. पण अनंतमूर्तींनी आपले समज तपासून पाहाण्यासाठी लहानवयातच हे कृत्य केले यावरून त्या वयातच त्यांच्याकडे चिकित्सक बुद्धी होती असा निष्कर्ष का काढला जाऊ नये?
३)मानवी शरीराची रचना जाणून घेण्यासाठी काही युरोपीय संशोधकांना चिरफाडीसाठी प्रेते मिळेनात तेव्हा आत्यंतिक ज्ञानलालसेपोटी त्यांनी थडग्यांतले ताजे मृतदेह उकरून त्यांची शवचिकित्सा केली तेव्हा हे कृत्य अनैतिक आणि धर्मविरोधी ठरून त्यांना प्रचंड जनरोष आणि छळाला सामोरे जावे लागले. रक्तांतरनाच्या बाबतीतही असेच घडले. या लोकांच्या अनमोल वैयक्तिक त्यागाचे फायदे आज सगळ्या जगाला मिळताहेत.
उद्या कदाचित आपल्याही समाजात सध्या असलेल्या काही अंधश्रद्धा दूर होतील आणि आपल्याला त्याचा फायदा होईलही. काही वेगळे, काळाच्या पुढचे विचार हिंदूजनमानसात रुजले तर त्यात वावगे ते काय?
असे सुधारक विचार रुजून त्याची फळे दिसू लागण्यास कित्येक दशके, शतके लागतात. पण काळाच्या एका तुकड्यात ते नवेच असतात आणि धर्मबाह्यही वाटू शकतात. तरी त्यामुळे अशा विचारांचे ऐतिहासिक मूल्य कमी होत नसते.
('ऐसी'ला अडचण होण्याची शक्यता असेल तर हा प्रतिसाद अदृश्य करावा.)

प्रकाश घाटपांडे Mon, 07/09/2015 - 21:09

In reply to by राही

यद्यपि शुद्धं लोकविरुद्धं नाकरणीयं नाचरणीयं। त्यामुळे यशस्वी विद्वान लोक हे ठंडा करके खाओ हे तत्व वापरतात. सत्ते पुढे वा समूहा पुढे शहाणपण चालत नाही. तुकारामाने देवाला शिव्या दिल्या तरी त्या चालू शकतात कारण त्यातून विरोध भक्तीच प्रतिबिंबित होते. इतरांनी केलेल ते चालणार नाही. प्रेमाने शिव्या देणे व द्वेषाने शिव्या देण यात फरक आहेच ना? प्रथम तुम्ही लोकांना आपलेसे वाटला पाहिजे तर लोक तुमची टिका टिप्पणी ऐकून घेतील.

राही Mon, 07/09/2015 - 22:41

In reply to by प्रकाश घाटपांडे

होय. आपले म्हणणे खरे आहे. कर्कश्य वाद घालू नये, लोकविरुद्ध असे वागू नये, मग ते कितीही तर्कसुसंगत असले तरी, यात शहाणपणा आहे. पण काही लोक वेडे असतात. ध्येयवेडे. त्यांना त्यांच्या कर्माची फळे मिळतातच आणि बहुधा याच जन्मात; पण इतरांना मात्र तीच फळे कालावधीमुळे परिपक्व आणि मधुर झालेली अशी, अनेक शतके उपभोगावयास मिळतात.
घर किंवा कोणतेही मोठे बांधकाम नव्या तंत्राने उभारताना काही प्रयोग तात्पुरते अयशस्वी होतात, कधी पाया खचतो, कधी पुलाचे गर्डर कोसळतात आणि काही माणसांचा जीवही जातो. पण पुढे तेच बांधकाम डौलाने उभे राहाते. तेव्हा असे अपघात घडणारच ही शक्यता ध्यानात घेऊनच बांधकाम उभारणीचे संकल्प सोडलेले असतात. मला इथे हौतात्म्याचा मुद्दा किंवा आव आणायचा नाही. पण प्रखर विरोधातही तत्त्वनिष्ठेने आणि कळकळीने (द्वेषाने आणि त्वेषाने नव्हे,) काम चालू ठेवणे यात धैर्य नाही काय? 'कीं घेतले व्रत न हें अम्हि अंधतेने' ही ओळ इथे का लागू होऊ नये? (इथे कुणाबरोबरही तुलना अपेक्षित नाही.)

श्रीगुरूजी Mon, 07/09/2015 - 21:24

In reply to by राही

१)मी हिंदू असेन तर मला मूर्तिपूजा नाकारण्याचे स्वातंत्र्य आहे की नाही? मूर्तिपूजा करू नका असा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य मला आहे की नाही? 'देव देव्हार्‍यात नाही' असे म्हणण्याचे स्वातंत्र्य मला आहे की नाही? की ते फक्त उच्च कोटीच्या संतांनाच आहे? संतांना अनुसरण्याचे स्वातंत्र्य मला आहे की नाही? की मी फक्त काही 'मान्यताप्राप्त' संतांनाच अनुसरावे? संतांचे जे विचार मला झेपतील तेव्हढेच विचार सिलेक्टिव्ली अंगीकारण्याचे स्वातंत्र्य मला आहे की नाही? यच्चयावत सर्व हिंदू संतांचे विचार मी अनुसरलेच पाहिजेत किंवा फक्त काही संतांचे विचारच मी अनुसरले पाहिजेत अशी सक्ती धाकदपटशासह करण्याचे स्वातंत्र्य इतरांना आहे का?

हे सर्व अधिकार तुम्हाला आहेत.

२)गेल्या तीस चाळीस वर्षांपर्यंत (आणि कित्येक ठिकाणी अजूनही) म्हणजे यू आर. अनंतमूर्तींच्या बालपणकालानंतरही कित्येक वर्षे जाखाई, जोखाई, म्हसाई वगैरे ग्रामदेवता गावच्या सीमेबाहेर अनघड पत्थरांच्या रूपात असत. वेताळ असत, भुतदेव असत. तिथे दिवाबत्ती होत नसे. कुत्रे-मांजरे, गायी-म्हशी-गुरे तिथे काहीही करीत. अशा ठिकाणी एका लहान मुलाने केवळ कुतूहल (काय होते ते बघायला) म्हणून लघुशंका केली आणि त्यामुळे पुढील आयुष्यात काहीही वाईट झाले नाही असे खूप वर्षांनी सांगितले, यात एव्हढा मोठा गहजब (आणि मानवहत्या) करण्याजोगे काय होते? कोणी भीती दाखवली की ती गोष्ट मुद्दाम करून दाखवायची अशी काही जणांची, विशेषतः लहान मुलांची वृत्ती असते. अमावास्येच्या रात्री स्मशानात जाणे, जळत्या चितेवर विडी पेटवणे किंवा तिथली राख भर मध्यरात्री अंगाला फासणे, मुंजाच्या पिंपळाखाली पैजेवर रात्र काढणे अशा गोष्टी आपण सर्वांनी ऐकलेल्या असतात. याला आपण अतरंगीपणा म्हणतो. पण अनंतमूर्तींनी आपले समज तपासून पाहाण्यासाठी लहानवयातच हे कृत्य केले यावरून त्या वयातच त्यांच्याकडे चिकित्सक बुद्धी होती असा निष्कर्ष का काढला जाऊ नये?

सार्वजनिक मूर्तीवर अनेकांच्या श्रद्धा असतात. कोणाला तरी चिकित्सक बुद्धी (?) आहे म्हणून स्वतःच्या चिकित्सेसाठी (?) मूर्तीवर लघुशंका करून मूर्ती अस्वच्छ करून अनेकांच्या श्रद्धांना धक्का लावणे हे अत्यंत अनुचित आहे. ज्याप्रमाणे कोणालाही नास्तिक असण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे कोणालाही आपल्या धार्मिक श्रद्धा जपण्याचा अधिकार आहे. अशी घाणेरडी कृत्ये करून इतरांच्या श्रद्धा आणि भावना दुखावण्याचा कोणालाही अधिकार नाही. भारतीय दंडविधान कलम २९५ आणि २९५-अ मध्ये अशा प्रकारची कोणती कृत्ये हा गुन्हा समजली जातील याचा स्पष्ट उल्लेख आहे व त्यानुसार अशी घृणास्पद करणे व त्याचे समर्थन करणे हा गुन्हा आहे.

कदाचित लहानपणी या घॄणास्पद कृत्याची तीव्रता अनंतमूर्तींच्या लक्षात आली नसेल, परंतु हे कृत्य घॄणास्पद होते हे मोठेपणी त्यांना समजायला हवे होते. तरीसुद्धा कळत्या वयात या कृत्याचा त्यांनी पुस्तकात उल्लेख केला आणि कलबुर्गींनी जाहीरपणे या घॄणास्पद कृत्याचे समर्थन केले.

बादवे, स्वत:च्या चिकित्सेसाठी अनंतमूर्तींनी मूर्तीवर लघवी करण्याव्यतिरिक्त अजून काही प्रयोग केले होते का याची माहिती असल्यास द्यावी.

३)मानवी शरीराची रचना जाणून घेण्यासाठी काही युरोपीय संशोधकांना चिरफाडीसाठी प्रेते मिळेनात तेव्हा आत्यंतिक ज्ञानलालसेपोटी त्यांनी थडग्यांतले ताजे मृतदेह उकरून त्यांची शवचिकित्सा केली तेव्हा हे कृत्य अनैतिक आणि धर्मविरोधी ठरून त्यांना प्रचंड जनरोष आणि छळाला सामोरे जावे लागले. रक्तांतरनाच्या बाबतीतही असेच घडले. या लोकांच्या अनमोल वैयक्तिक त्यागाचे फायदे आज सगळ्या जगाला मिळताहेत.
उद्या कदाचित आपल्याही समाजात सध्या असलेल्या काही अंधश्रद्धा दूर होतील आणि आपल्याला त्याचा फायदा होईलही. काही वेगळे, काळाच्या पुढचे विचार हिंदूजनमानसात रुजले तर त्यात वावगे ते काय?

लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या मूर्तीवर लघुशंका करून अनंतमूर्तींनी नक्की कोणत्या अनमोल वैयक्तिक त्याग केला आणि त्याचे नक्की कोणते फायदे जगाला मिळाले? मुळात मूर्तीपूजा ही अंधश्रद्धा हे कोणी ठरविले? हे ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? ज्यांना ती अंधश्रद्धा आहे असे वाटते त्यांनी आपले विचार इतरांवर का लादावे? त्यांना मूर्तीपूजा ही अंधश्रद्धा आहे असे मानून ती न करण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु मूर्तीपूजा ही डोळस श्रद्धा असून मूर्तीपूजा करण्याचे इतरांना स्वातंत्र्य आहे. आपले विचार मूर्तीपूजकांना पटले नाहीत म्हणून त्यांच्या श्रद्धास्थानाचीच विटंबना करण्याचे किळसवाणे कृत्य करण्याचा अधिकार कोणालाही नाही.

असे सुधारक विचार रुजून त्याची फळे दिसू लागण्यास कित्येक दशके, शतके लागतात. पण काळाच्या एका तुकड्यात ते नवेच असतात आणि धर्मबाह्यही वाटू शकतात. तरी त्यामुळे अशा विचारांचे ऐतिहासिक मूल्य कमी होत नसते.
('ऐसी'ला अडचण होण्याची शक्यता असेल तर हा प्रतिसाद अदृश्य करावा.)

माझा अनंतमूर्ती व कलबुर्गींच्या विचारांना अजिबात आक्षेप नाही. असे विचार असणे हा त्यांचा हक्क आहे. कायदेशीर मार्गाने आपले विचार मांडण्याचा व त्यानुसार कृती करण्याचा त्यांना हक्क आहे. परंतु देवाच्या मूर्तीवर लघवी करण्याचे घृणास्पद कृत्य करून मूर्ती अस्वच्छ करून इतरांच्या श्रद्धेला धक्का देणे व त्याचे समर्थन करणे याला माझा आक्षेप आहे.

राही Mon, 07/09/2015 - 23:14

In reply to by श्रीगुरूजी

या (उपरोल्लेखित) केसमध्ये वैयक्तिक त्याग म्हणजे प्रखर जनरोषाला आणि पाखंडी ठरून धर्मछळाला सामोरे जावे लागणे.
अनंतमूर्ती काय, कलबुर्गी काय, कार्नाड काय, दाबोलकर काय, या सर्वांना जननिंदेला सामोरे जावे लागलेले नाही काय? विचारजंत अशी (आणि त्याहूनही निंदाव्यंजक) कुत्सित शेलकी विशेषणे झेलावी लागली नाहीत काय? यातल्या दोघांना प्रत्यक्ष मृत्यूपूर्वी जिवे मारण्याच्या धमक्या मिळालेल्या नव्हत्या काय? नेमाड्यांना धमकीपत्र मिळाले नाही काय?
सर्वांसमोर, मुद्दाम त्यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूनेच असे कृत्य केले गेले असेल, तर ते चिथावणीखोर म्हणून निंदनीय ठरेल. पण लहानपणी दूर कोपर्‍यात काही केले तर ते माजाने, उद्धटपणाने मुळीच केले नसावे, स्वतःच्या पडताळणीसाठी केले असावे. अशा पडताळणीचे निकाल त्यांनी नंतर प्रसिद्ध केले.
कार्तिकेयाचे दर्शन बायकांनी घेऊ नये, कोप होतो, अंबाबाईच्या गाभार्‍यात बायकांनी प्रवेश करू नये, पावित्र्यभंग होतो, देवीचा प्रसाद बायकांनी कर्रू नये, या एकेकाळच्या श्रद्धा प्रखर विरोधामुळेच आज गळून पडत आहेत. ज्यांनी सुरुवातीला या प्रथा मोडल्या, त्यांना प्रखर विरोध झालाच. त्यांच्या मागे समूहशक्ति उभी राहाण्यासाठी मोठे प्रबोधन करावे लागले.
प्रबोधनाची चळवळ अशी काट्याकुट्यातूनच जात असते. आणि आज जे धर्मविरोधी, श्रद्धाविरोधी आहे ते उद्या तसेच राहात नाही. पण यासाठी कुठूनतरी सुरुवात ही व्हावीच लागते.

अतिशहाणा Tue, 08/09/2015 - 07:36

In reply to by राही

राही यांचे दोन्ही प्रतिसाद अतिशय आवडले. त्याची पोच.

परंतु देवाच्या मूर्तीवर लघवी करण्याचे घृणास्पद कृत्य करून मूर्ती अस्वच्छ करून इतरांच्या श्रद्धेला धक्का देणे व त्याचे समर्थन करणे याला माझा आक्षेप आहे.

आजपर्यंत हिंदू धर्मात झालेल्या सगळ्या सुधारणा या तत्कालीन घृणास्पद कृत्ये करुन व इतरांच्या श्रद्धेला धक्का देऊनच झाल्या आहेत. दलितांना मंदिरात प्रवेश देणे हे घृणास्पद कृत्य होते, मुलींना शाळेत पाठवणे हे घृणास्पद कृत्य होते, सती न जाणे हे घृणास्पद कृत्य होते, गावातले पाणवठे सर्व समाजाला मोकळे करुन देणे हे घृणास्पद कृत्य होते.

'मूर्तीपूजेच्या नादी लावून तुम्हाला गंडवणाऱ्या लोकांना बळी पडू नका' हे सांगण्यासाठी कलबुर्गी यांनी चांगला मार्ग वापरला होता असे माझे मत आहे. शिवाय देवाच्या मूर्तीला 'पवित्र होण्यासाठी' गायीचे मूत्र चालते आणि मानवाचे मूत्र चालत नाही ही श्रद्धा कोणी ठरवली याचं उत्तरही एकदा मिळायला पाहिजे. यामागचं रासायनिक तर्कशास्त्र जरा कळू द्या.

हे भावना दुखावणारे कलम कायमचे काढून टाकायला पाहिजे. निव्वळ एखाद्याला ब्लॅकमेल करण्यासाठी याचा वापर होतोय असं दिसतंय.

श्रीगुरूजी Tue, 08/09/2015 - 09:05

In reply to by राही

या (उपरोल्लेखित) केसमध्ये वैयक्तिक त्याग म्हणजे प्रखर जनरोषाला आणि पाखंडी ठरून धर्मछळाला सामोरे जावे लागणे.

या विशिष्ट केसमध्ये अनंतमूर्ती, कलबुर्गी इ. ना कोणत्या धर्मछळाला सामोरे जावे लागले? त्यांनी एक घॄणास्पद कृत्य करून सर्वसामान्यांना पूजनीय असलेल्या मूर्तीची विटंबना करण्याचा कायदेशीर गुन्हा केला व त्याचे समर्थनही केले. त्याबद्दल त्यांच्यावर टीका झाली. केलेल्या गुन्ह्याबद्दल झालेली टीका ही कधीपासून धर्मछळ व्हायला लागली? या तर्कानुसार कसाब, अफझल गुरू, याकूब मेमन इ. चा सुद्धा धर्मछ्ळ झाला नाही का?

अनंतमूर्ती काय, कलबुर्गी काय, कार्नाड काय, दाबोलकर काय, या सर्वांना जननिंदेला सामोरे जावे लागलेले नाही काय?

सर्वसामान्यांना पूजनीय असलेल्या मूर्तीवर लघवी करून तिची विटंबना करण्याचा कायदेशीर गुन्हा केल्यावर जननिंदा नाही होणार तर काय नोबेल मिळणार का?

विचारजंत अशी (आणि त्याहूनही निंदाव्यंजक) कुत्सित शेलकी विशेषणे झेलावी लागली नाहीत काय? यातल्या दोघांना प्रत्यक्ष मृत्यूपूर्वी जिवे मारण्याच्या धमक्या मिळालेल्या नव्हत्या काय? नेमाड्यांना धमकीपत्र मिळाले नाही काय?

स्वतःचे विचार समाजाला पटवून देण्यात अपयश आल्यामुळे समाजाच्या श्रद्धास्थानांचीच विटंबना करून त्याचे समर्थन करायचे असे कायदेशीर गुन्हे करणार्‍यांसाठी विचारजंत हा फार सौम्य शब्द झाला. धमक्यांचं म्हणाल तर जितेंद्र आव्हाड म्हणतो की मलासुद्धा अशा धमक्या आलेल्या आहेत. अशा धमक्या अनेकांना मिळालेल्या आहेत. त्यात जसे दाभोळकर होते, तसेच अण्णा हजारेही होते, बाळ ठाकरेही होते, अडवाणीही होते, मोहन भागवतही होते.

सर्वांसमोर, मुद्दाम त्यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूनेच असे कृत्य केले गेले असेल, तर ते चिथावणीखोर म्हणून निंदनीय ठरेल. पण लहानपणी दूर कोपर्‍यात काही केले तर ते माजाने, उद्धटपणाने मुळीच केले नसावे, स्वतःच्या पडताळणीसाठी केले असावे. अशा पडताळणीचे निकाल त्यांनी नंतर प्रसिद्ध केले.
कार्तिकेयाचे दर्शन बायकांनी घेऊ नये, कोप होतो, अंबाबाईच्या गाभार्‍यात बायकांनी प्रवेश करू नये, पावित्र्यभंग होतो, देवीचा प्रसाद बायकांनी कर्रू नये, या एकेकाळच्या श्रद्धा प्रखर विरोधामुळेच आज गळून पडत आहेत. ज्यांनी सुरुवातीला या प्रथा मोडल्या, त्यांना प्रखर विरोध झालाच. त्यांच्या मागे समूहशक्ति उभी राहाण्यासाठी मोठे प्रबोधन करावे लागले.

स्वतःच्या पडताळणीसाठी जे काही करावेसे वाटेल ते कायदे, नियम सांभाळून आणि समाजाच्या श्रद्धास्थानांची विटंबना न करता करा. दाभोळकर सुद्धा निरिश्वरवादी व विज्ञानवादी होते. आपल्या मतांचा त्यांनी आयुष्यभर प्रसार केला. परंतु हे करताना त्यांनी कधीही सश्रद्ध समाजाच्या श्रद्धास्थानांची विटंबना केली नाही. लहानपणी केलेले घॄणास्पद कृत्य मोठेपणी पुस्तकात लिहून जाहीर करणे आणि नंतर त्याचे जाहीर समर्थन करणे हे चिथावणीखोर कृत्यच आहे व त्यामुळेच ते निंदनीय ठरते.

प्रबोधनाची चळवळ अशी काट्याकुट्यातूनच जात असते. आणि आज जे धर्मविरोधी, श्रद्धाविरोधी आहे ते उद्या तसेच राहात नाही. पण यासाठी कुठूनतरी सुरुवात ही व्हावीच लागते.

देवाच्या मूर्तीवर लघवी करून नक्की कसलं प्रबोधन झालं? लघवी करणे, शौचाला जाउन शरीरस्वच्छता करने इ. कृत्ये चारचौघात केली जात नाहीत. बंद दाराआड केली जातात. भविष्यातसुद्धा ही कृत्ये अशीच केली जातील. एखाद्याचे श्रद्धास्थान असलेल्या गोष्टींवर लघवी करून श्रद्धास्थानाची विटंबना करणे हे अत्यंत किळसवाणे कृत्य आहे. असे कृत्य करण्याचा कोणालाही कायदेशीर अथवा कोणताच अधिकार नाही. आणि मूर्तिवर लघवी करणे ही सुरूवात! या तर्काने यापुढची पायरी म्हणजे मूर्तीवर विष्ठेला बसणे अशीच असणार ना? औरंगजेबने हिंदू देवदेवतांच्या मूर्ती फोडून त्याचे अवशेष संडासमध्ये वापरले होते असे वाचले होते. औरंगजेब सुद्धा प्रबोधनकारी होता असे मानायला हरकत नाही.

प्रकाश घाटपांडे Mon, 07/09/2015 - 20:57

मला सानेगुरुजींच्या शाम पुस्तकात ला म्हसोबा आठवला. मुलांच्या इच्छेप्रमाणे झाले तर देवाला फुले मिळत. मुलांच्या इच्छेप्रमाणे न झाले तर म्हसोबाला खेटरांची पूजा मिळे

मनोज२८ Mon, 07/09/2015 - 21:13

डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या ही दुर्दैवी घटना आहे.

ह्या हत्येशी 'हिंदु संघटनांशी' संबंध जोडणारा कोणताही पुरावा उपलब्द नाही.

ह्या हत्येशी डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येशी काही संबंध असेलच असे सुचवणारा कोणताही पुरावा नाही. ( हत्ये च्या पद्धती फक्त मध्ये साम्य आहे )

हिंदुत्व विचाराने भरकटलेल्या कोणाला असे कृत्य करायचे असेल तर त्याचे लक्ष तथाकथित शेक्युलर राजकारणी , दंगलीची चिथावणी देणारे किंवा त्यांचे वकीलपत्र घेणारे , सतत हिंदुत्वाला फटकारून आपले तथाकथित पुरोगामित्व सिद्ध करणारे असतील. एम. एम. कलबुर्गी किंवा पानसरे हे नक्कीच नसतील.

कॉलेजच्या स्नेहसामेलानामध्ये स्वतःलाच 'फिश पोंण्ड ' देवून प्रशिद्ध होणारे काही महाभाग असतात - हा त्यातलाच प्रकार तर नाही ना ?

स्वताचे नाक कापून दुसर्याला अपशकून अशी एक मराठी म्हण आहे.आपली भाभडी जनता 'कित्ती वाईट न...कोणी कापले नाक ' असे उसासे टाकते आणि हेच नेमके साध्य करायचे नसेल ना ?

आडकित्ता Mon, 07/09/2015 - 23:39

In reply to by मनोज२८

कॉलेजच्या स्नेहसामेलानामध्ये स्वतःलाच 'फिश पोंण्ड ' देवून प्रशिद्ध होणारे काही महाभाग असतात - हा त्यातलाच प्रकार तर नाही ना ?

चोरबाजारात सेकंडहँड घेतली होती का तुम्ही?

अहो, कलबुर्गींनी स्वतःला 'फिशपॉंड' टाकून फेमस होण्यासाठी स्वतःचीच सुपारी दिली होती असं काहीसं म्हणताहात का तुम्ही?

केवढ्याला घेतली होती ती सेकंडहँड?

मनोज२८ Tue, 08/09/2015 - 16:58

In reply to by आडकित्ता

तथाकथित शेक्युलर लोकांनीच ही हत्या घडवून आणली नसेल कशावरून ? असे म्हणायचे आहे .

केवढ्याला घेतली होती ती सेकंडहँड?

इतके वैयक्तिक घालून - पाडून का बरे बोलावे माणसाने ?

आडकित्ता Tue, 08/09/2015 - 18:39

In reply to by मनोज२८

साहेब, ते लॉजिकपेक्षा, उदाहरणच इतकं हिणकस दिलंय, की जे लिहिलं ते फारच मवाळ लिहिलं असं मला वाटतं.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 07/09/2015 - 23:49

In reply to by मनोज२८

ज्यांचा खून झाला त्या संशोधकाबद्दल असल्या कंड्या पसरवणं ही आणखी एक संतापजनक गोष्ट. या खोडसाळपणाचा निषेध.

बादवे, स्वत:च्या चिकित्सेसाठी अनंतमूर्तींनी मूर्तीवर लघवी करण्याव्यतिरिक्त अजून काही प्रयोग केले होते का याची माहिती असल्यास द्यावी.

स्वतः चिकीत्सा, अभ्यास काहीही न करता, कोणीतरी काहीतरी म्हटलं की ते प्रमाण मानून वर मृत व्यक्तींबद्दल, नुकत्या खून झालेल्या अभ्यासकाबद्दल असं बोलणं ... अच्छे दिन आले रे आले.

वामन देशमुख Tue, 08/09/2015 - 02:14

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वतः चिकीत्सा, अभ्यास काहीही न करता, कोणीतरी काहीतरी म्हटलं की ते प्रमाण मानून वर मृत व्यक्तींबद्दल, नुकत्या खून झालेल्या अभ्यासकाबद्दल असं बोलणं ... अच्छे दिन आले रे आले.

अधोरेखित भागाबद्धल अजून थोडे स्पष्ट करून सांगाल?
म्हणजे, नेमके कोण (कोणीतरी) काय (काहीतरी) म्हणाले, आणि त्याला प्रमाण मानून कोण कसं (असं) बोललं?
प्लीज सांगाल, प्लीज?

याशिवाय, "स्वतः चिकीत्सा, अभ्यास काहीही न करता" म्हणजे नेमकं काय करायचं? वेगवेगळ्या गावा-शहरांत लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणांची विटंबना करायची? त्याची नंतर प्रसिद्धी करायची? त्या प्रसिद्धीचे समर्थन करायचे?
तुम्ही यापैकी, किंवा तुमच्या चिकित्सेच्या आणि अभ्यासाच्या व्याख्येपैकी काय काय केले आहे?

http://aisiakshare.com/node/4280?page=2#comment-108779
इथे विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत अजूनही असलेला: वामन

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/09/2015 - 03:07

In reply to by वामन देशमुख

म्हणजे, नेमके कोण (कोणीतरी) काय (काहीतरी) म्हणाले, आणि त्याला प्रमाण मानून कोण कसं (असं) बोललं?

अनंतमूर्तींनी लहानपणी प्रयोग केल्याचं आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे, असं कलबुर्गी म्हणाल्याचं माध्यमं सांगतात. आणि त्यावर म्हणे कलबुर्गींनी त्याचं समर्थन केलं. अनंतमूर्तींचं मूळ पुस्तक कोणी वाचलंय? कलबुर्गींचं मूळ विधान किंवा त्याचं ग्राह्य भाषांतर कोणी वाचलंय/ऐकलंय?

प्रतिसादातल्या बाकीच्या भागाला भावनिक उद्वेगाखेरीज अन्य काही मूल्य दिसत असल्यामुळे दुर्लक्ष करत आहे.

श्रीगुरूजी Tue, 08/09/2015 - 08:39

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अनंतमूर्तींनी लहानपणी प्रयोग केल्याचं आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे, असं कलबुर्गी म्हणाल्याचं माध्यमं सांगतात. आणि त्यावर म्हणे कलबुर्गींनी त्याचं समर्थन केलं. अनंतमूर्तींचं मूळ पुस्तक कोणी वाचलंय? कलबुर्गींचं मूळ विधान किंवा त्याचं ग्राह्य भाषांतर कोणी वाचलंय/ऐकलंय?

असं कलबुर्गी म्हणाल्याचं माध्यमं सांगतात.?

त्यावर म्हणे कलबुर्गींनी त्याचं समर्थन केलं?

कलबुर्गींनी देवाच्या मूर्तीवर लघवी करण्याचे समर्थन केल्याचे पुरावे आहेत. एका मागील प्रतिसादात त्यांच्या जाहीर मुलाखतीची चित्रफीत असलेली लिंक दिली आहे. ती जरा नीट पहा.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/09/2015 - 17:08

In reply to by श्रीगुरूजी

तुम्ही अनंतमूर्तपुींचं पुस्तक वाचलंय? मी नाही वाचलेलं.
कलबुर्गींचं मूळ विधान ऐकलंय? मी नाही ऐकलेलं.
तुम्हाला कन्नडा समजतं? मला नाही समजत.

मी इंग्लिश पेपरांत वाचलं. मला इंग्लिश समजतं. त्यात संदर्भापुरते उल्लेख आहेत, समर्थन नाही.

श्रीगुरूजी Tue, 08/09/2015 - 21:01

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती


मी इंग्लिश पेपरांत वाचलं. मला इंग्लिश समजतं. त्यात संदर्भापुरते उल्लेख आहेत, समर्थन नाही.

कलबुर्गींनी फक्त संदर्भ दिलेला नव्हता. समर्थनच केले होते.

Dr M M Kalburgi's remarks 'there is nothing wrong in urinating on idols,' has sparked criticism in the literary, political and academic circles.

Researcher Dr M Chidananda Murthy termed Kalburgi's statements 'uncivilised and nonsensical'.

"His criticism of blind beliefs is not correct. Kalburgi said idols should not be worshiped and it is not wrong to urinate on them. This is pure nonsense," Murthy said.

श्रीगुरूजी Tue, 08/09/2015 - 08:37

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वतः चिकीत्सा, अभ्यास काहीही न करता, कोणीतरी काहीतरी म्हटलं की ते प्रमाण मानून वर मृत व्यक्तींबद्दल, नुकत्या खून झालेल्या अभ्यासकाबद्दल असं बोलणं ... अच्छे दिन आले रे आले.

कोणीतरी, काहीतरी? मी पुराव्याशिवाय बोलत नसतो. कलबुर्गींनी देवाच्या मूर्तीवर लघवी करण्याचे समर्थन केल्याचे पुरावे आहेत. एका मागील प्रतिसादात त्यांच्या जाहीर मुलाखतीची चित्रफीत असलेली लिंक दिली आहे. ती जरा नीट पहा.

ए ए वाघमारे Tue, 08/09/2015 - 16:27

अनेक मतमतांतरांनी गढूळ झालेल्या सदर चर्चेच्या पाण्यात आपणही एक दगड मारून पाहावा अशी अनिवार इच्छा झाल्याने हे लिहीत आहे.

मध्यंतरी मला फेसबुकवर एका ‘नास्तिकांच्या संमेलना’चे निमंत्रण आले होते. अशीही संमेलने असतात हे मला नवीनच होते. एक कुतूहल म्हणून तेथे जाऊन बघण्याची माझी मनोमन इच्छा होती, पण शक्य झाले नाही. असो.

एकीकडे धार्मिकता, आस्तिकता ही वैयक्तिक स्वरूपाची असावी. तिचे सार्वजनिक स्तरावर प्रदर्शन, इतरांना उपद्रव होईल असे आविष्करण करू नये असे नास्तिक, विवेकवादी मंडळी म्हणतात. याच विचारातून पुढे सेक्युलरिझम येतो. कंपू करणे, संघटना करणे पर्यायाने झुंडशाही ही कमकुवत विचारसारणीच्या (वाचा: दैववादाच्या) आधाराने उभ्या असलेल्या धर्मांना (पक्षी: धर्ममार्तंडांना) त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असते, अशीही एक मांडणी करण्यात येते. हे जर खरे असेल तर घातक अंधश्रद्धा निर्मूलन (अंनिस), अस्पृष्यतानिवारण (डॉ. आंबेडकर), स्त्री-शिक्षण(म.फुले) , हिंदू सबलीकरण-हिंदूराष्ट्र(रा.स्व.संघ) इ.इ. असे कुठलेही प्रकट वा छुपे, उपयोगी वा उपद्रवकारी उद्दीष्ट दिसत नसताना आणि पराकोटीचे विवेकवादी, विज्ञानवादी असणार्‍या नास्तिकांना आपल्या ‘विचारांचा प्रसार’ करण्याची गरज का वाटावी ? ‘आय अॅम प्राऊड टू बी अथेईस्ट’ असे समाजमाध्यमातून ओरडून सांगण्याची गरज का वाटावी ? आपली ‘एकजूट’ दाखवण्याची गरज का वाटावी ?

मुळात कोणी नास्तिक वा आस्तिक असणे हा वादाचा मुद्दा का असावा ? जोवर दोहोंपैकी कुठल्याही विचारसारणीच्या आचरणामुळे व्यापक असे सामाजिक स्वरूपाचे, मानवसंपत्तीचे वा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण होत नाही तोवर तू तुझ्या घरी बरा , मी माझ्या घरी बरा अशी वैचारिक भाषेत सांगायचे तर समन्वयवादी भूमिका दोन्ही बाजूंकडून का घेण्यात येत नाही ? (सगळ्या सामाजिक, राजकीय प्रश्नांना मध्यमवर्गीयांची उदासीनता इ.इ. कारणीभूत आहे या चालीवर ) धार्मिक, आस्तिक लोक हे बोलूनचालून धर्मांध, प्रतिगामीच आहेत असे एक वेळ समजून त्यांच्या कडून काही अपेक्षा करता येत नाही असे मानले तर मग स्वत:ला विवेकवादी, नास्तिक वगैरे म्हणणार्‍यांची जबाबदारी याबाबतीत अधिक वाढत नाही का ? मग हे असले वाद आस्तिकते-नास्तिकतेपासून उगम पावत हळुहळू शाकाहार-मांसाहार, आर्य-अनार्य, सेक्युलर- स्यूडोसेक्युलर, भांडवलशाही-समाज-साम्यवाद, सवर्ण-उपेक्षित, ब्राह्मण-ब्राह्मणेतर इत्यादी परिचयाची वळणे घेत शेवटी पुरोगामी-प्रतिगामी महासागरास जाऊन मिळतात. त्यात डुंबायची माझी सध्या तरी इच्छा नाही. त्यामुळे तूर्त नास्तिकतेवरच बोलतो.

हे सगळे वाद निर्माण होतात जेव्हा दोन्ही बाजू आपलेच तेवढे खरे असे सिद्ध करू पाहतात आणि ते समोरच्यावर थोपवण्याचा प्रयत्न करतात. यात त्या त्या विचारांशी असलेल्या बांधिलकीपेक्षा दुसर्‍याच्या मतांची व कधीकधी त्यापेक्षाही वैयक्तिकरित्या समोरच्याची आपण कशी खिल्ली उडवली, त्यांना कसे नामोहरम केले, आपापल्या कंपूत कशी प्रसिद्धी मिळवली असला बौद्धिक आनंद मिळवण्याची खुमखुमी अधिक असते.वरील आणि समाजमाध्यमातील या विषयावरील चर्चेत हे मला जाणवले.

पण मुळात एखाद्या विचाराशी मग तो आस्तिकतेचा, धार्मिकतेचा असो की विवेकवादाचा, नास्तिकतेचा असो त्याच्याशी आपली ‘बांधिलकी’ तरी का असावी ?एखादा माणूस आज आस्तिक, उद्या नास्तिक तर परवा आस्तिक का असू शकत नाही? समजा तो तसा असला तर त्याच्या या विचारांना आक्षेप घेण्याचा अधिकार एक आस्तिक/नास्तिक/तटस्थ म्हणून आपल्याला आहे का ? जिथे प्रत्यक्ष प्रभावशाली अशा राजकीय सत्तेचा संबंध असतो तेथे सुद्धा एखादा निवडून आलेला उमेदवार दुसर्याादिवशी ‘आपले मत बदलले, विचार बदलला’ म्हणून कालपर्यंत विरोधी असलेल्या पक्षात जातो. हे मात्र आपण लोकशाहीचे एक मूल्य म्हणून स्वीकारतो. इतकेच नव्हे तर जिथे लोक वारंवार आलटून-पालटून दोन विरूद्ध पक्षांना सत्ता देत असतात तेथेही आपण ही लोकशाही व्यवस्थेची कमाल म्हणून धन्य होतो. न्यूटन नंतरच्या भौतिकशास्त्रज्ञांनी त्याच्या ‘क्लासिकल मेकानिक्स’शी आपली वैचारिक बांधिलकी मानून वेगळा विचार करणे सोडले असते तर ‘क्वांटम मेकानिक्स’चे काय झाले असते? (इथे चर्च वि. गॅलिलीओ हे उदाहरण देणे मुद्दामच टाळले आहे नाहीतर लगेच धर्म वि. विज्ञान वर गाडी घसरली असती.) हे सारे माहीत असलेले ज्ञानी लोक वरील चर्चेत हमरीतुमरीवर येत असल्याचे पाहून विषाद वाटतो.

इति लेखनकंटाळा !

डिस्क्लेमर: मी विद्वान नाही. कुठलाही “-वादी” नाही. फक्त नेहमी काही फालतू प्रश्न पडणारा एक अडाणी माणूस आहे.
ता.क.: वरील माझी मते/विचार केवळ माझी मते आहेत. निर्विवाद, सार्वकालिक सत्य नव्हे. कोणाला ती न पटल्यास न पटो. मी पटवून देण्याची चेष्टा करणार नाही.

गवि Tue, 08/09/2015 - 16:42

In reply to by ए ए वाघमारे

‘आय अॅम प्राऊड टू बी अथेईस्ट’ असे समाजमाध्यमातून ओरडून सांगण्याची गरज का वाटावी ? आपली ‘एकजूट’ दाखवण्याची गरज का वाटावी ?

जबरदस्त..!!! क्या बात है..!! सही बोला.

"निधर्मीवादा"चा पंथ वाढवा असं ध्येय ठेवलं की कधीनाकधी "श्री. आद्यनिधर्मीबाबा की जय" हे होणारच..!!

मला वाटतं "वादी" या शब्दातच एखादी भूमिका नुसती मानण्यापेक्षा ती ठामपणे इतरांना सेल (फॉर मनी ऑर मोटिव्ह) करण्याची अर्थच्छटा असते.

Nile Thu, 10/09/2015 - 04:57

In reply to by गवि

"निधर्मीवादा"चा पंथ वाढवा असं ध्येय ठेवलं की कधीनाकधी "श्री. आद्यनिधर्मीबाबा की जय" हे होणारच..!!

नास्तिकांबाबत असले आरोप काही नवे नाहीत. हे आरोप करण्यार्‍यांचं अज्ञानच याने दिसून येतं. याबाबत पूर्वी अनेकांनी अनेकठिकाणी लिहून झालेलं आहे. असो.

गवि Thu, 10/09/2015 - 07:25

In reply to by Nile

..नास्तिकांवर अथवा नास्तिकतेवर "आरोप" नसून त्यातला एक उपगट त्याचाच पंथ बनवून इतरांवर लादू पाहतो किंवा प्रचारक, प्रसारक बनतो त्यांच्याविषयी आहे हे कळलं असेल अशी आशा.
-अप्रचारक नास्तिक किंवा अडाणीपणा मान्य करणारा (गवि)

Nile Thu, 10/09/2015 - 16:34

In reply to by गवि

आय अॅम प्राऊड टू बी अथेईस्ट’ असे समाजमाध्यमातून ओरडून सांगण्याची गरज का वाटावी ? आपली ‘एकजूट’ दाखवण्याची गरज का वाटावी ?

जबरदस्त..!!! क्या बात है..!! सही बोला.
"निधर्मीवादा"चा पंथ वाढवा असं ध्येय ठेवलं की कधीनाकधी "श्री. आद्यनिधर्मीबाबा की जय" हे होणारच..!!

वरच्या प्रतिसादातील हे उद्धरण. नास्तिकांनी एकजूट व्हा असे आवाहन करणे म्हणजे ते इतर नास्तिकांवर लादणे कसे हे जरा समजावून द्या. आणि हे लादलं कसं जातं ते ही सांगा. म्हणजे जर तुम्ही हे आवाहन नाकारलं तर तुम्हाला धर्मातून काढतात तसं नास्तिक्यातून हाकलण्याचाही काही विधी वगैरे असतो का? नास्तिक लोकांची अशी कोणती संस्था आहे का जी ऑफिशियली सर्टिफिकेट वगैरे देते, जे तुम्ही आव्हान नाकारलं तर खंडपीठ वगैरे बसवून मागे घेता येतं वगैरे? का लादलं जाणं याची तुमची काही वेगळी व्याख्या आहे ते सांगा.

प्रचारक अन प्रसारक बनण्यात काय वाईट आहे? कित्येक चांगल्या गोष्टीं आज समाजात सर्वसामान्य झालेल्या आहेत कारण त्याचा कोणीतरी प्रचार-प्रसार केलेला आहे म्हणूनच.

गवि Thu, 10/09/2015 - 16:54

In reply to by Nile

नास्तिकांनी एकजूट व्हा असे आवाहन करणे

कशाला ? या बेसिसवर एकजूट करुन काय करायचे आहे? "समान कारणासाठी एकजूट" यातूनच धर्मपंथ बनतात. प्रत्येक धर्म हा इतर प्रस्थापित धर्मातल्या तत्वांविरुद्ध एकजूट करण्याच्या प्रयत्नानेच बनला आहे. निरीश्वरवादी किंवा मूर्तिपूजाविरोधी विचार आणणार्‍यांनीही "एकजूट-कम-पंथवाढवा" धोरण केल्यामुळे त्यांचेही आणखी धर्म तयार झालेत, आणि त्यांचे आद्यप्रवर्तक देव झालेत. बेसिक प्रोसेसमधली एरर रिपीट का करावी?

प्रचारक अन प्रसारक बनण्यात काय वाईट आहे?

कारण हे प्रचारक आणि प्रसारकच उद्याची श्रद्धास्थानं बनण्याचा धोका असतो. मी पुन्हा एकदा म्हणतो..मी खुद्द नास्तिक आहे, पण एकाही व्यक्तीला मी नास्तिकता कशी योग्य / चांगली आहे हे सांगितलेलं नाही किंवा ती व्यक्ती नास्तिक झाल्यास बरं वाटेल असं वाटलेलं नाही. देव (दगडाचा ऑर अदरवाईज) नावाची एक गोष्ट आहे असं मानून त्यावर श्रद्धा ठेवू शकण्याला जसं "आंधळेपणा" म्हणता येतं तसंच त्याला "डॅम लकी गाय" असंही म्हणता येतं. कदाचित पटणार नाही पण ते खरं आहे. देवावर श्रद्धा न ठेवून खास काही साध्य होत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. पण देव वगैरे असं काही असण्याची अशक्यता आणि अनावश्यकता वैयक्तिक पातळीवर जाणवल्याने मी नास्तिक आहे. त्याचसोबत एखाद्या व्यक्तीला अपाय न करणारी देवावरची त्याची श्रद्धा मोडण्यासाठी कोणताही प्रयत्न करणं हे एखाद्या सुंदर स्वप्न पाहात असलेल्याला ताबडतोब झोपेतून जागं करण्यासारखं वाटतं.

त्याला कधी जाणीव झाली तर देव नाही, त्याला जाणीव नाही झाली तर त्याला देव असू दे. आपण कोण काढून घेणारे?

देवावर पूर्ण श्रद्धा ठेवूनही आपल्या क्षेत्रात चोख काम करणारे प्रामाणिक, प्रयत्नात कुठेही कसर न सोडणारे असंख्य लोक असतात.

हातचा न घेता गणित सोडवण्याचा अट्टाहास कशाला सर्वांसाठी ?

Nile Thu, 10/09/2015 - 17:03

In reply to by गवि

या बेसिसवर एकजूट करुन काय करायचे आहे?

याविषयी मी खालच्या (वाघमारे यांना लिहलेल्या) प्रतिसादात थोडक्यात लिहलेलं आहे.

ण एकाही व्यक्तीला मी नास्तिकता कशी योग्य / चांगली आहे हे सांगितलेलं नाही किंवा ती व्यक्ती नास्तिक झाल्यास बरं वाटेल असं वाटलेलं नाही.

मी ही सांगितलेलं नाही. प्रचार 'नास्तिक व्हा' असा खरंच असतो असं तुम्हाला वाटतं का? अंधश्रद्धा, अविज्ञान याविरुद्ध प्रचार असतो. तो आपोआपच नास्तिक्याकडे जातो कारण अनेक अंधश्रद्धा, रुढी परंपरा या धर्मावर आणि पर्यायाने देवावरच्या 'श्रद्धेवर' अवलंबून असतात.

देवावर पूर्ण श्रद्धा ठेवूनही आपल्या क्षेत्रात चोख काम करणारे प्रामाणिक, प्रयत्नात कुठेही कसर न सोडणारे असंख्य लोक असतात.

हे सगळ्याच बाबतीत खरं आहे. पण त्याच बरोबर अशा श्रद्धेमुळे कामात इतरांना अनेक अडचणी निर्माण करण्याचे प्रकारही घडतात. सद्ध्याचे अमेरीकेतील किम डेव्हीस प्रकरणाबद्दल ऐकले असेलच.

असो. मुख्य मुद्दा असा; ज्या नास्तिकतेचे मुळच 'फ्री थिंकिंग' मध्ये आहे तिथेच लोक आंधळेपणाने 'पंथवादी' होतात(च) असे तुमचे म्हणणे दिसले त्याला काही पुष्टी आहे का?

तुम्ही नास्तिक आहात का आस्तिक आहात याने या चर्चेत काही बदल होण्याचे कारण नाही. तो इथे मुद्दाच नाही. मुद्दा तुमचे मत मला पटलेलं नाही आणि म्हणून मी तुम्हाला मला ते का पटलं नाही हे सांगतोय. हेच लॉजिक जर पुढे चालवले तर आपण दोघेही नास्तिक असलो तर एकाच पंथाच येऊच याची खात्री नाही हे मी का म्हणतो ते स्पष्त होईल.

गवि Thu, 10/09/2015 - 17:16

In reply to by Nile

मी ही सांगितलेलं नाही. प्रचार 'नास्तिक व्हा' असा खरंच असतो असं तुम्हाला वाटतं का? अंधश्रद्धा, अविज्ञान याविरुद्ध प्रचार असतो. तो आपोआपच नास्तिक्याकडे जातो कारण अनेक अंधश्रद्धा, रुढी परंपरा या धर्मावर आणि पर्यायाने देवावरच्या 'श्रद्धेवर' अवलंबून असतात.

या मुद्द्यात भरपूर , पूर्णच, तथ्य आहे. नास्तिक एकजूट वगैरे शब्दांनी हा गोंधळ / मतभेद होत असावा. जर पूर्ण भर "लादण्याविरुद्ध" असेल तर मग "नास्तिकांनी" एकत्र येणे ही टर्मिनॉलॉजी टाळावी. न्यायप्रिय आस्तिकही "लादण्या"विरुद्धच्या लढ्यात या एकाच गटात आले पाहिजेत. माणसाची देवावरची व्यक्तिगत श्रद्धा नष्ट करण्याचा उद्देश जर अशा चळवळींत नसेल तर अतिशय चांगलेच आहे. पण इथे असं दिसतं की "सारे फसाद की जड" आखिर वो कम्बख्त आस्तिक्यच है, म्हणून नास्तिकांनी एकजूट करा..!! मुळात सर्वसाधारण माणसाला आस्तिक्यभाव, श्रद्धा, देव वगैरे गोष्टी अत्यावश्यक वाटतात हे अशा नास्तिकांच्या एकजुटीत बर्‍याच ठिकाणी दुर्लक्षित केलं जातं.

एका धर्माची, पंथाची, देवाची भक्ती आणि तत्वं यांची सर्वांवर सरसकट सक्ती होऊ नये याची मागणी किंवा लढा करण्यासाठी "नास्तिक्य" अश्या झेंड्याखाली एकत्र येण्याची आवश्यकता नाही. विरोध जर फक्त "सक्ती"ला असेल तर.. बाकी मुद्दे पटण्यासारखेच आहेत.

Nile Thu, 10/09/2015 - 17:44

In reply to by गवि

एका धर्माची, पंथाची, देवाची भक्ती आणि तत्वं यांची सर्वांवर सरसकट सक्ती होऊ नये याची मागणी किंवा लढा करण्यासाठी "नास्तिक्य" अश्या झेंड्याखाली एकत्र येण्याची आवश्यकता नाही. विरोध जर फक्त "सक्ती"ला असेल तर.

असा एकच झेंडा आहे असे नाही. नास्तिक, फ्री थिंकर्स, सेक्युलर ह्युमनिस्ट वगैरे अनेक ग्रुप्स आहेतच. यांच्यात आपापसात काही वैचारीक मतभेदही आहेतच. पण श्रद्धा लादली जाते हे खरे असल्याने हे ग्रुप्स एकाबाजूला आणि सश्रद्ध एका बाजूला असे चित्र अनेकदा पहायला मिळते, यात आश्चर्य नाही.

बाळ सप्रे Fri, 11/09/2015 - 15:26

In reply to by Nile

नास्तिकता अथवा विवेकवादात व्यक्तीपेक्षा विचाराला जास्त महत्व असते. व्यक्तीपूजेला तर अजिबात स्थान नाही. त्यामुळे "श्री. आद्यनिधर्मीबाबा की जय" असे होण्याची शक्यता फारच कमी.
ते संमेलन नास्तिकतेचा विचार पसरवण्याकरीता होते कशावरून. आपापले विचार मांडून त्यातही असणारे वेगवेगळे प्रवाह अनुभवून आणखी विचार करण्यास प्रवृत्त होणे असाही हेतु असु शकतो.. कायम आस्तिकांची खिल्ली उडवणे हाच हेतु असेल असे नाही. आणि खिल्ली उडवणे ही शेवटची पायरी असु शकते. पण एखाद्या गोष्टीची चिकित्सा करून पडताळून पाहिल्याशिवाय कोणी खिल्ली उडवत नाही. नवीन नवीन गोष्टींची चिकित्सा करणे हेदेखिल काम अशा ठीकाणी होउ शकते. चिकित्सा काय फक्त धार्मिक गोष्टींचीच होउ शकते का? एखाद्या सामाजिक / नैतिकगोष्टीची देखिल असू शकते.

नास्तिकता/ विवेकवाद/ निधर्मीवाद या विषयावरील परीसंवादाचे स्वरूप असण्याची शक्यता जास्त वाटते मला. आपल्याकडे जाती धर्माच्या झेंड्याखालील संमेलनांची सवय झाल्याने गवि तुम्हाला यातही "नास्तिकता प्रसारा"ची शंका येणे स्वाभाविक आहे. आणि विवेकवादी माणूसदेखिल अभिनिवेशात प्रसार वगैरे बोलण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असल्यास तो विवेकवाद नसेल हेदेखिल खरे.

ऋषिकेश Fri, 11/09/2015 - 16:46

In reply to by बाळ सप्रे

मुळात आस्तिक काय वा नास्तिक काय आपापल्या समजुतींवर/मतांवर आधारीत (पोकळ) अस्मितांसाठी का एकत्र यावे? असा तो प्रश्न आहे.

वर राघा म्हणतात तसे गे असणे, डावरे असणे, टकलु असणे, स्त्री असणे, पुरूष असणे वगैरे गोष्टी (आस्तिकता/नास्तिकता) अशासारख्या मानवी समजुती/कल्पना नाहीत तर बहुसंख्यांपेक्षा नैसर्गिक वेगळेपण आहे. त्यांच्या वेगळेपणाला जर अनैसर्गिक समजले जात असेल, त्यामुळे त्यांना सामाजिर अव्हेर सहन करावा लागत असेल तर/तेव्हा तर त्यांनी एकत्र येणे समजता येते. आस्तिकांनी धर्माच्या नावाखाली किंवा नास्तिकांनी असे गट स्थापून एकत्र का यावे हे माझ्यासारख्या आस्तिक व/वा नास्तिक दोन्ही नसलेल्याला अजिबात कळत नाही

बॅटमॅन Fri, 11/09/2015 - 17:08

In reply to by ऋषिकेश

वेगळेपणाचा स्रोत काहीही असो, त्या बळावर एकत्र येणे यात न समजण्यासारखे काय आहे? की एग्झिस्टन्शिअल क्रायसिस आल्याशिवाय तुमच्याकडून संमतीचे सर्टिफिकेट मिळणार नाही असे काहीसे? तसे असेल तर समजू शकतो.

नगरीनिरंजन Sat, 12/09/2015 - 21:20

In reply to by बॅटमॅन

लोकांना जीन टिकवण्यासाठी मुलांना जन्म देणे समजते कारण ते जुन्या मेंदूत आहे पण मीम टिकवण्यासाठी काहीतरी करावे लागते हे अजून समजत नाही.
मी अमुक विचार केला की झाले या वृत्तीच्या लोकांमुळे पिढ्यानपिढ्या तोच संघर्ष चालू राहतो.

ऋषिकेश Mon, 14/09/2015 - 17:38

In reply to by नगरीनिरंजन

ननि,

हे कैतरी इंटरेस्टिंग वाटतंय. नीट इस्कटून सांगा प्लीज
सध्याची वाक्ये संदर्भ माहित नसल्याने डोक्यावरून गेली

बॅटमॅन Tue, 08/09/2015 - 16:58

In reply to by ए ए वाघमारे

पण मुळात एखाद्या विचाराशी मग तो आस्तिकतेचा, धार्मिकतेचा असो की विवेकवादाचा, नास्तिकतेचा असो त्याच्याशी आपली ‘बांधिलकी’ तरी का असावी ?एखादा माणूस आज आस्तिक, उद्या नास्तिक तर परवा आस्तिक का असू शकत नाही? समजा तो तसा असला तर त्याच्या या विचारांना आक्षेप घेण्याचा अधिकार एक आस्तिक/नास्तिक/तटस्थ म्हणून आपल्याला आहे का ?

क्या बात है, क्या बात है!!!!! लैंगिकता फ्लुईड असते असा विचार इथे मांडला गेला होता आणि त्यावर "आज स्ट्रेट, उद्या गे असे जर कुणी असेल तर अडचण काय" वगैरे अर्ग्युमेंट्स देण्यात आली होती. त्यावर आम्ही "आज आस्तिक अन उद्या नास्तिक" असले तर चालेल काय अशा धाटणीचा एक फालतू प्रश्न विचारला होता त्याला प्यासिव्ह अग्रेसिव्ह श्रेण्या देऊन दाबून टाकण्यात आले होते ते आठवले अन मजा वाटली.

हे सगळे वाद निर्माण होतात जेव्हा दोन्ही बाजू आपलेच तेवढे खरे असे सिद्ध करू पाहतात आणि ते समोरच्यावर थोपवण्याचा प्रयत्न करतात. यात त्या त्या विचारांशी असलेल्या बांधिलकीपेक्षा दुसर्‍याच्या मतांची व कधीकधी त्यापेक्षाही वैयक्तिकरित्या समोरच्याची आपण कशी खिल्ली उडवली, त्यांना कसे नामोहरम केले, आपापल्या कंपूत कशी प्रसिद्धी मिळवली असला बौद्धिक आनंद मिळवण्याची खुमखुमी अधिक असते.वरील आणि समाजमाध्यमातील या विषयावरील चर्चेत हे मला जाणवले.

ते अन्प्रोसेस्ड फूड शरीराला पचत नाही, त्यावर चिरणे, शिजवणे वगैरे संस्कार करावे लागतात त्याचप्रमाणे अन्प्रोसेस्ड सत्यही झेपणे अवघडच आहे, वैचारिक पचनशक्तीवरचा तुमचा विश्वास बाकी अंमळ दांडगाच बघा.

ऋषिकेश Tue, 08/09/2015 - 17:13

In reply to by ए ए वाघमारे

याच मुद्द्यावर एका कट्ट्याला एका नास्तिक ऐसीकराशी झालेला वाद आठवला.
मुळात नास्तिकांनी असो वा आस्तिकांनी असो आपल्या अश्या समजूतींवर आधारीत 'अस्मितेला' कुरवाळण्यासाठी एकत्र येण्याची गरज आमच्यासारख्या अ‍ॅग्नॉस्टिकांना समजत नाही.

राही Tue, 08/09/2015 - 17:25

In reply to by ए ए वाघमारे

आवडले. सगळे पटलेच असे नाही..
भूमिकाबदल हा कालसापेक्षच नव्हे तर स्थलसापेक्षही असू शकतो. म्हणजे वडील माणसे दुखावू नयेत म्हणून त्यांच्या समोर आस्तिक व्हावे लागणे, किंवा आस्तिकता पांघरावी लागणे. गावी गेल्यावर वेगळे नियम पालणे, शहरात वेगळे वगैरे. पण वाद आणि अवमान नको म्हणून असे घडते. भूमिकेत खराखुरा बदल तेव्हा घडतो जेव्हा दुसरी सशक्त भूमी सापडते. किंवा मूळ भूमिकेतला फोलपणा जाणवू लागतो (इतरांच्या खंडनामुळे किंवा स्वतःच्या अनुभवामुळे). आणि असा भूमिकाबदल अनेकांचा झालेला आहे, त्याची खुली कबूलीही दिली गेली आहे. त्यात गैर मानण्याजोगे काहीच नाही. आयुष्यात तडजोड, समझोताही करावा लागतो, त्याला लवचिकपणा म्हणतात. पण असा कोणताही बाह्य दबाव नसताना 'सरशी तेथे पारशी' अशी धाव मारण्याचे काही कारण नाही. आपल्या विद्यमान विचारांचा प्रचार करायलाही हरकत नाही, फक्त तो धाकदपटशा किंवा सक्तीने, दहशतीद्वारे नसावा इतकेच. एरवीही आपण सिनेमा, नाटके, दुकाने, हॉटेले वगैरे आपल्याला आवडलेल्या गोष्टी इतरांना 'रेकमेंड' करीत असतोच. मग आपले विचार रेकमेंड केले तर काय बिघडले? तसेही हे विचार बहुतांशी आपण म्हणता तशा (क्वान्टम मेकॅनिक्स वगैरे) बदलांसाठीच असतात. किंबहुना हा वैचारिक संघर्ष स्थिरवाद विरुद्ध चरवाद असाच बहुधा असतो. बौद्धांतही थेरवाद आणि महायान असे पंथ किंवा प्रॉटेस्टंट्स आणि कॅथलिक्स हे पंथ बदलवादी विरुद्ध जडवादी असेच निर्माण झाले.
कुठल्याही भूमिकेत स्थलकालानुसार बदल होणे हे नैसर्गिक असते आणि त्या बदलांना कृत्रिमपणे थोपवू पाहाणे हे अनैसर्गिक.
पण क्षणोक्षणी सरड्याप्रमाणे रंग बदलणे हे मात्र फक्त सरड्याच्या बाबतीतच नैसर्गिक, मानवासाठी अनैसर्गिक.
इवल्यूशन आणि रिवल्यूशन यातही हाच फरक आहे, उत्क्रांती सततची असते आणि क्रांती एकदाच घडते, पण उत्क्रांतीची सुरुवात कुठेतरी झालेलीच असते. आणि तो एकच प्रारंभबिंदू नसतो, अनेक ठिकाणी, अनेक कालखंडांत अनेक बिंदूंतून सुरुवात होते.
असो. हरदासाची गोष्ट मूळपदावर आलीच शेवटी. कीर्तन हा आवडीचा विषय असल्याने असे होत असावे बहुतेक.

नितिन थत्ते Tue, 08/09/2015 - 17:30

In reply to by ए ए वाघमारे

>>धार्मिक, आस्तिक लोक हे बोलूनचालून धर्मांध, प्रतिगामीच आहेत असे एक वेळ समजून

हे दोन Mutually Exclusive गट असतात असा संशय आहे. जेन्युइनली धार्मिक/आस्तिक असणारे लोक धर्मांध नसतात. आणि धर्मांध असलेले लोक धार्मिक आणि आस्तिक नसतात.

प्रतिगामी हा एक वेगळाच प्रकार असावा तो कदाचित दोन्ही गटात ओवरलॅपिंग असेल.

Nile Thu, 10/09/2015 - 04:57

In reply to by ए ए वाघमारे

म्हणजे अडाणीपणा थोडा दूर झाला असता. हे थोडंसं विनोदाने अन थोडंसं उपरोधीपणाने म्हणले आहे, हे तुम्हाला जाणवेल अशी आशा.

एकीकडे धार्मिकता, आस्तिकता ही वैयक्तिक स्वरूपाची असावी. तिचे सार्वजनिक स्तरावर प्रदर्शन, इतरांना उपद्रव होईल असे आविष्करण करू नये असे नास्तिक, विवेकवादी मंडळी म्हणतात.

याचं कारणं ती इतरांवर लादली जाते हे आहे. कारण धार्मिकता ही प्रस्थापित आहे. उदाहरण: शाळेतील प्रार्थना. आमच्याशाळेत आम्ही सरस्वतीची प्रार्थना म्हणत असू, ती इतर धर्मींयाना विद्यार्थ्यांनाही थोडीशी बंधनकारकच होती. अमेरिकेत ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थना शाळेत म्हणतात त्या इतर धर्मींयाना म्हणाव्या लागतात वगैरे तक्रारी काल्पनिक नाहीत. हे फक्त एक उदाहरण झालं. अशा प्रकारे तुमचा धर्म इतरांवर लादू नका असं विवेकवादी म्हणतात. तुम्ही तुमच्या घरात, मित्रमंडळीत वगैरे खुशाल धर्म पाळा, हवा तो धर्म पाळा, त्याला विवेकवाद्यांचा विरोध नाही.

विज्ञानवादी असणार्‍या नास्तिकांना आपल्या ‘विचारांचा प्रसार’ करण्याची गरज का वाटावी ? ‘आय अॅम प्राऊड टू बी अथेईस्ट’ असे समाजमाध्यमातून ओरडून सांगण्याची गरज का वाटावी ? आपली ‘एकजूट’ दाखवण्याची गरज का वाटावी ?

नास्तिकांच्या त्या संमेलनाला गेला असतात तर कदाचित थोडासा उजेड पडला असता. मी अशा अनेक संमेलनांना/भेटींना गेलेलो आहे.
१. विचारांचा प्रसार करण्याची गरज का भासावी: अनेक धार्मिक देशांत विज्ञान धर्माच्या विरोधात आहे म्हणून ते शाळेत शिकवण्याविषयी अडचणी निर्माण केल्या जातात हे तुम्हाला माहीत नसावे. देवाने सृष्टी निर्माण केली हे शाळेत शिकवावे, किंवा ज्याला 'क्रिएशन मिथ' म्हणतात ते शिकवावे असे कायदेही काही ठिकाणी केलेले आहेत. पुन्हा एकदा, हे फक्त एक उदाहरण झालं.

२. एकजूट कशाला: आता नास्तिकांना लोकशाहीत संख्येचं बळ नाही. त्यामुळे अशा कायद्यांविरुद्ध त्यांना फार काही करता येत नाही. म्हणून, इतर कोणत्याही चळवळीप्रमाणे एकजूट झाल्यास राजकीयशक्ती मिळेल हा एक हेतू. शेवटी सगळं गणित बॅलटबॉक्सवर येतं हे तुमच्यासारख्यालाही कळावं.
त्याशिवाय, एकत्र येण्याने वेगवेगळ्या समस्या कशा सोडवाव्या ह्यावर विचारमंथन करता येते. हे एकत्र येणे सिनेमाप्रेमी, लेखनप्रेमी किंवा मार्क्सप्रेमीवगैरेंच्या एकत्र येण्याप्रमाणेच. आणि अशा ठिकाणी गेल्यावर तिथे असणारी मतमतांतरे, वादविवाद वगैरे आणि सार्वजनिक गणपती यातील फरकही लक्षात येईल.

मुळात कोणी नास्तिक वा आस्तिक असणे हा वादाचा मुद्दा का असावा? जोवर दोहोंपैकी कुठल्याही विचारसारणीच्या आचरणामुळे व्यापक असे सामाजिक स्वरूपाचे, मानवसंपत्तीचे वा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण होत नाही तोवर तू तुझ्या घरी बरा , मी माझ्या घरी बरा अशी वैचारिक भाषेत सांगायचे तर समन्वयवादी भूमिका दोन्ही बाजूंकडून का घेण्यात येत नाही ?

वरच्या उदाहरणातून हे वेगळेपण घरातच राहत नाही हे उघडच आहे. त्यामुळे वाद का हे ही समजले असेल.
पण वस्तुस्थिती काय आहे. इथल्या कोणाही नास्तिकाने/आस्तिकाने त्याच्या आसपासचे सर्वच लोक नास्तिक/आस्तिक आहेत का हे सांगावे? रोजच्या आयुष्यात हे लोक सतत एकमेकांशी नास्तिक-आस्तिक वादच घालत असतात का? आस्तिक-नास्तिक वाद हा मी इतर कोणत्याही राजकीय विचारसरणींबद्दल वाद, किंव विज्ञान विरूद्ध अंधश्रद्धा (धर्माधारीत नसली तरी), सामाजिक प्रश्नांवरील वाद, वगैरे वादांइतकाच घालतो. त्यामुळे नास्तिक-आस्तिक वादाबाबत विशेष असा प्रश्न का पडावा हे मला माहीत नाही.

मलाही कंटाळा आल्याने इतर मुद्द्याबांबत अजून लिहीत नाही. पण तुम्हाला वाद घालायची इच्छा असल्यास घालू. आणि अगदी तो इथे कोणत्याही कंपूसमोरच घालायला पाहिजे असे नाही, अगदी व्यनीतून फक्त एकमेकांकरताही घालायची माझी तयारी आहे. सगळ्यांनाचा काही सतत प्रामाणिकपणे वाद घालता येत नसेल, पण म्हणून वादालाच बाद केले जाऊ नये. असो.

राजेश घासकडवी Thu, 10/09/2015 - 19:26

In reply to by ए ए वाघमारे

‘आय अॅम प्राऊड टू बी अथेईस्ट’ असे समाजमाध्यमातून ओरडून सांगण्याची गरज का वाटावी ? आपली ‘एकजूट’ दाखवण्याची गरज का वाटावी ?

हा महत्त्वाचा प्रश्न आहे - तो बरोबर आहे म्हणून नाही, पण त्याचं उत्तर देण्याची गरज आहे म्हणून.

हा प्रश्न वाचल्याबरोबर 'गे लोकांनी आपल्या बेडरूममध्ये काय हवं ते करावं, पण आम्ही गे आहोत हे ओरडून सांगण्याची गरज काय? त्यांना लग्नसंस्थेचं पाठबळ घेण्याची गरज का वाटावी?' या व अशा प्रश्नांची आठवण झाली. तर त्याचं उत्तर थोडक्यात असं की जगाला खरोखरच माहीत नाही की इतकी सामान्य दिसणारी माणसं गे असतात. आणि लग्नाचा राजरोसपणा जर स्ट्रेट लोकांना असेल तर तो गेंनाही हवा. लग्नसंस्थाच जर निकालात काढली, आणि तिला असलेलं सामाजिक महत्त्व नाहीसं झालं तर गेंनाही लग्न करण्याची गरज वाटणार नाही.

हाच युक्तिवाद नास्तिकांबाबत लागू पडतो. आस्तिक असणं हे इतकं समाजमान्य आहे, की त्यापलिकडे काही विचारसरणी आहे हेच लोकांना माहीत नाही. जाहीरपणे नास्तिक असलेला माणूस अमेरिकेत प्रेसिडेंट होऊ शकत नाही. अनेक प्रेसिडेंट्स मनातून नास्तिक असतीलही पण जाहीरपणे त्यांना तसं करणं परवडत नाही. हे कपाटाच्या आतलं जगणं अनेक नास्तिकांना जगावं लागतं, आणि समाजात राहाण्यासाठी राही म्हणतात तसं आस्तिकत्व पांघरावं लागतं.

पुन्हा अमेरिकेचंच उदाहरण देतो कारण इथला विदा उपलब्ध आहे. सुमारे २२ टक्के लोक 'मी कुठचाच धर्म पाळत नाही' असं सांगतात. २२ टक्के हे प्रचंड मोठं प्रमाण झालं, तरीही जाहीर नास्तिकांचं कॉंग्रेसमधलं प्रतिनिधित्व किती? शून्य. जर नास्तिक विचारसरणीशी मिळतेजुळते कायदे व्हावे असं या २२ टक्क्यांना वाटत असेल तर कुठल्यातरी व्यासपीठावर एकत्र येऊन 'हो आम्ही नास्तिक आहोत, आणि आम्हाला हे हे कायदे जाचक वाटतात, किंवा हे हे कायदे झालेले आवडतील' असं सांगण्याची गरज आहे.

नास्तिकता आणि आस्तिकता यात मूलभूत फरक आहेत. कुठचाही धर्म पाळणं, देवभक्ती करणं यात एक बांधिलकी आहे. याउलट नास्तिकता ही या सर्व बंधनांपासून मुक्तता आहे. धर्मांच्या कुंपणांबाहेरचं ते जगणं आहे. प्रत्येक कुंपणाच्या आतले आपोआपच एका टोळीत दिसतात - तर बाहेरचे कायमच विखुरलेले दिसतात. त्यामुळे कधीतरी घोळक्याने एकत्र येणं आणि या मुक्ततेतून तयार होणारी आयडेंटिटी अधोरेखित करणं महत्त्वाचं ठरतं. कारण कुंपणांच्या आतून 'गर्व से कहो हम इस कुंपणवाले है' अशा एकत्रित गर्जना या विखुरलेल्यांचे स्वतंत्र आवाज झाकोळत उठतच असतात. वरचा 'गरज काय आहे' हा प्रश्न त्या कुंपणांना विचारला जात नाही याचं कारण ते लोक तसं करतातच, किंवा त्या कुंपणाचाच तसा नियम आहे वगैरे गोष्टी आपण गृहित धरतो.

आणि सर्वात शेवटी - हो, नास्तिक असणं हे अभिमानास्पद आहेच मुळी. जगातल्या वेगवेगळ्या धर्मांनी रचलेल्या परिकथांवर विश्वास उडवता येणं हे कठीण काम आहे. आपले आईवडील, बाजूचा समाज लहानपणी, जडणघडणीच्या वयात या परिकथांनी आपलं ब्रेनवॉशिंग करतात. मोठं होऊन ते संस्कार जमतील तितके पुसून टाकून स्वतंत्र विचार करणं आणि वैज्ञानिक सत्यावर विश्वास ठेवणं यातून एक प्रचंड बौद्धिक कर्तबगारी दिसून येते. कुठल्यातरी, आपल्या हातात नसलेल्या धर्माबद्दल निरर्थक अभिमान बाळगण्यासाठी काहीच कर्तृत्व लागत नाही. तो पूर्वजांचा आणि कल्पित देवांचा अभिमान असतो. नास्तिकतेचा अभिमान हा स्वतःचा, अस्सल अभिमान असतो.

ए ए वाघमारे Fri, 11/09/2015 - 10:40

In reply to by राजेश घासकडवी

वरचा 'गरज काय आहे' हा प्रश्न त्या कुंपणांना विचारला जात नाही याचं कारण ते लोक तसं करतातच, किंवा त्या कुंपणाचाच तसा नियम आहे वगैरे गोष्टी आपण गृहित धरतो.

असं नव्हे. मी काही गृहित धरून हे विचारलं नव्हतं.अशी कुंपणं अस्तित्वात असल्याची अनेक कारणं जसे कौटुंबिक आणि धार्मिक पूर्वजांचा प्रभाव,अज्ञान, धर्माच्या प्रचाराची इतिहासाने (अयोग्य असली तरी) पटवून दिलेली आवश्यकता, कंपूशाहीतून मिळणारे राजकीय-आर्थिक फायदे व संरक्षणाची भावना, जिवाच्या व वाळीत टाकले जाण्याच्या भीतीने इच्छा असूनही कंपूतून बाहेर पडण्याची न होणारी हिंमत इ.इ. परिचित आहेत.

माझा प्रश्न 'गरज का वाटावी?' असा फक्त कुतूहलजन्य होता;'गरज काय आहे?' असा काहीसा उद्धट नव्हे. असो.

दुसरा एक मुद्दा.या चर्चेत आपण धर्म आणि आस्तिकता यांची ओघाने सोबतच चर्चा करतो.कारण साधारणपणे या गोष्टी एक दुसर्‍यासोबतच चालतात.किंबहुना पहिल्याचा जन्म दुसर्‍यामुळे आहे. पण एखाद्याच्या बाबतीत या गोष्टी 'म्युच्युअली एक्स्लुसिव्ह' असू शकतात का? एखादी व्यक्ती रूढ पद्धतीचा कुठलाही धर्म, पूजापद्धती न मानता; कुठल्याही कंपूत न राहता; आपल्या या विचारसारणीचा कुठलाही प्रचार न करताही आस्तिक राहू शकते का , मग भलेही ती 'आजच्या' विज्ञान-तर्काच्या आधारावर पूर्णपणे चुकीची असेल. (इथे आस्तिकतेचा अर्थ केवळ देव या संकल्पनेवर असलेला 'विश्वास' इतकाच मर्यादित आहे. त्याची पूजा करणे,स्तुती करणे, अवकृपेची भीती वाटणे असा नव्हे.)आपला काय विचार आहे?

तिरशिंगराव Tue, 08/09/2015 - 17:18

सर्वप्रथम हत्येचा निषेध.
आपण कितीही नास्तिक असलो तरी सभोवतालच्या भक्तिधुंद तांड्यांच्या बौद्धिक उंचीचा विचार करुनच बोलायला पाहिजे. (जीव प्यारा असेल तर). आणि जीवावरच उदार झाला असाल तर काहीही बोला.
मधल्या कलगीतुर्‍यामुळे ऐसीचे तापमान वाढून प्रतिसाद राईटिस्ट(उजव्या बाजूला) झाले होते. शांत भीम शांत, असे म्हणायलाही वाव नव्हता.

ऋषिकेश Tue, 08/09/2015 - 17:22

In reply to by तिरशिंगराव

आपण कितीही नास्तिक असलो तरी सभोवतालच्या भक्तिधुंद तांड्यांच्या बौद्धिक उंचीचा विचार करुनच बोलायला पाहिजे. (जीव प्यारा असेल तर).

खरंय.. :( म्हणून तर म्हणतो प्रत्येकाला बोलू/ जसे विचार असतील तसे वागताच येईल असे नाही. :(
अनेक अडथळे असतात!

सुधीर Tue, 08/09/2015 - 19:39

In reply to by तिरशिंगराव

"जीव प्यारा असेल तर", अगदी!
कृत्रिम हौदात गणेश विसर्जन केल्यानेही काहींच्या भावना जिथे दुखू शकतात तिथे लघूशंकेचा "प्रयोग करून पाहण्याला" संमत्ती देणे/चुकीचे नाही असे म्हणणे खूपच दूरची (आणि मूख्य म्हणजे विकृत अशी) गोष्ट आहे. थोडक्यात कलबुर्गी चुकलेच म्हणायचे. त्यांनी भावना दुखावणारे काही बोलायला (समर्थन द्यायला) नाही पाहिजे होते.

त्यांनी तसे केले नसते तर अशी वेळ आलीच नसती (हा थेट न लिहिला गेलेला सूर तर नाही ना?).

श्रीगुरूजी Tue, 08/09/2015 - 20:53

कृत्रिम हौदात केले जाणारे विसर्जन ही आता बहुतेकांनी सोय म्हणून मान्य केलेली आहे. गणेशमूर्ती विसर्जनासाठी आता घराजवळ फारसे तलाव, विहिरी उपलब्ध नाहीत. शहरातील बहुतेक सर्व विहिरी बुजविल्या गेल्या आहेत. नदीत पाणी नाही. त्यामुळे बहुतेक सर्वजण घराजवळील कृत्रिम हौदात विसर्जन करतात. सुरवातीला काही जणांचा या कल्पनेला विरोध होता. परंतु हा विरोध आता बराचसा मावळला आहे. ज्यांचा विरोध होता त्यांनी फक्त शाब्दिक विरोध केला. खून, हल्ले इ. गोष्टी केलेल्या नाहीत.

त्यांनी तसे केले नसते तर अशी वेळ आलीच नसती (हा थेट न लिहिला गेलेला सूर तर नाही ना?).

माझ्या कोणत्याही प्रतिसादात असा कोणताही सूर नाही. त्यांचा खून निषेधार्ह आहे हे मी सुरवातीलाच लिहिले आहे. त्यांच्या खुनाचे कारण या प्रकाराशी संबंधित नसावे. त्यांचे एका जोडप्याशी झालेले वैयक्तिक भांडण किंवा लिंगायतांबद्दल आधी केलेले आणि नंतर मागे घेतलेले लेखन असण्याची जास्त शक्यता वाटते. त्यांचा खून करून संशय हिंतुत्ववादी संघटनांवर जावा असाही हेतू खुनामागे असावा. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे आसन लोकसभेतील पराभवामुळे व नुकत्याच झालेल्या बंगळूर महापालिकेतील पराभवामुळे काहीसे डळमळीत झाले आहे. त्यांच्या विरोधी सूर उमटत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना अधिक अडचणीत टाकण्याचाही हेतू असू शकतो.

चिंतातुर जंतू Wed, 09/09/2015 - 13:21

In reply to by श्रीगुरूजी

>> कृत्रिम हौदात केले जाणारे विसर्जन ही आता बहुतेकांनी सोय म्हणून मान्य केलेली आहे.

आपण कोणत्या शहरात राहता ते माहीत नाही. पण ह्या प्रतिसादाबद्दल विशेष उल्लेखनीय पारितोषिक म्हणून अनंत चतुर्दशीला २४ तास पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीत काढण्याची मुभा तुम्हाला ह्या निमित्ताने ह्या ठिकाणी देतो.

धनंजय Fri, 11/09/2015 - 02:17

वरील चर्चा न वाचल्यामुळे हा प्रतिसाद मूळ धाग्याबाबत, सुटा आहे.

भारतात दररोज ~२५-३० हजार लोक मरतात, पैकी शेकडो लोक अनैसर्गिक कारणांनी, प्रतिबंधनीय कारणांनी मरतात. या सर्वांची नोंद घ्यायला पाहिजे, ते आहेच. पण तरी दोन-एक वर्षांत झालेल्या या २-३ हत्यांची विशेष नोंद घ्यावीशी वाटते. आरण भूकबळी, जातीय दंगलीतली हत्याकांडे, नक्षलवादी भागांतील हत्याकांडे वगैरे, घातक असतात, परंतु जोवर त्यांबाबत कोणी टाहो फोडत राहते, अभिव्यक्त होत राहाते, तोवर त्यांच्याबाबत समाज जागरूक होऊ शकेल अशी आशा आपण करत राहू शकतो.

शहरी भागात राजरोस बुद्धिजीवी मारल्यामुळे एका प्रकारची दहशत निर्माण होत आहे. सुरुवातीला असे लक्ष्य टिपून हत्या करणारी कारस्थानी प्रत्येक टोळी छोटी आणि स्वायत्त-स्वयंभू असली (कोणास ठाऊक कशी आहे), तरी हे एक राजकीय हत्यार म्हणून उपलब्ध होईल. गुंड आणि पाताळयंत्री राजकारणी फक्त एकमेकांना ठार मारत, असे काही राहात नाही. "कोणीही" लक्ष्य बनू शकते. या दहशतीचा परिणाम म्हणून बरेच जण लेखी-बोली अभिव्यक्तीला आवरतील. असे होण्याकरिता खूप अधिक लोकांचा बळी पडणे आवश्यक नाही.

माझ्या वैयक्तिक स्वभावावरून बघावे, तर समाजाबाबत उपयोगी वाटते अशा माझ्या अभिव्यक्तीपेक्षा वाचलेल्या वैयक्तिक कातडीचे मोल अधिक असावे. आणि असा हिशोब करण्यासाठी अभिव्यक्त होणार्‍यांपैकी मोठ्या टक्केवारीचा मुडदा पाडणे आवश्यक नसते.

फक्त मोजक्या शूरवीर लोकांनी अभिव्यक्त व्हावे, बहुतेक लोकांनी कातडी वाचवून गप्प राहावे, हा सौदा समाजाला घाट्यात जाणारा आहे. नाहीतरी गप्प बसणार्‍यांपैकी मी एक आहे. खूप लोक बोलणाऐवजी थोडेच लोक बोलते राहिले, तर माझ्या मनातले मुद्दे अभिव्यक्त करणारे कोणीच नाही असे होण्याची शक्यता वाढत जाते. हे माझे वैयक्तिक नुकसानही होते.

प्रकाश घाटपांडे Sun, 13/09/2015 - 19:06

माझ्या मते अस्तिक व नास्तिक असे काही वॉटर टाईट कंपार्टमेंट नसते. त्या मनाच्या अवस्था आहेत. इश्वर या स्ंकल्पनेतील कुठली संकल्पना तुम्हाला अभिप्रेत आहे यावर बरच काही अवलंबून आहे. निर्गुण निराकार, सगुण साकार, भक्तवत्सल करुणाघन कोणते इश्वराचे रुप अभिप्रेत आहे?
ठार नास्तिक, मध्यममार्गी नास्तिक, मवाळ नास्तिक अशी सोयीसाठी विभागणी करता येते. हीच बाब अस्तिकांनाही लागू आहे. शिवाय मधे अज्ञेयवादी असा बँड आहेच की!