Skip to main content

शायद कभी ख्वाबोंमे मिले..

3 minutes

अहमद फराझ एक पाकिस्तानी मनुष्य. "पाकिस्तानी कवी", "पाकिस्तानी गायक" असे शिक्के बसलेल्यांपैकी एक खरोखर दिलसे फनकार व्यक्ती.

गुलाम अली, फराझ, इक्बाल बानू, मेहंदी हसन यांच्यासारखे लोक जेव्हा कुठेकुठे त्यांच्या जिओग्राफिकल बाउंडरीने उल्लेखले जातात तेव्हा किमान काही गोष्टी तरी हद्दी न मानणार्‍या असाव्यात असा विचार ब्लेड मारल्यासारखा चरचर देऊन जातो. पण ते एक जाऊ दे आत्ता.

फराझचे शेर सांगताना त्याची खूप ओळख करुन द्यायची गरज नसते. त्याने खूप मोठ्या संख्येने खूप नजाकतपूर्ण शेरोशायरी केली आहे. सरळसोप्या शब्दरचनेपासून अतिशय गुंतागुंतीचा भाव दाखवणारे शेर, गजल्स त्याने जन्माला घातल्या आहेत. इतर अनेक प्रसिद्ध शायरांच्या मानाने हा अगदी अलीकडेपर्यंत सक्रिय होता असं म्हणता येईल.

ये क्या के सबसे बयाँ दिलकी हालते करनी
फराझ तुझको न आयी मोहोब्बते करनी

उच्चारी, खासकरुन गुलाम अलीच्या आवाजात :

ये किया के सबसे बयाँ दिलकी हालतें करनी
फराज तुझको नयायीं मुहोब्बते करनी.

या त्याच्या ओळींनी खूप वर्षांपूर्वी, म्हणजे अगदी कॉलेजात असताना फराझ येऊन डोक्यात बसला.

त्याच गजलेत आणखी एक शेर आहे..

मिलें जब उनसे तो मुबहमसी गुफ्तगू करना
फिर अपने आपसे सौ सौ वजाहतें करनी

तिला अगदी समोरासमोर, रुबरु भेटल्यावर गोलगोल, मुद्द्याजवळ किंचितही न भटकणारं काहीतरी बडबडायचं किंवा पुटपुटायचं.. आणि नंतर म्हणजे ती गेली की स्वतःलाच "मुद्दा" समजावून देण्याची शेकडो निरर्थक सेशन्स घ्यायची..

रोजरोज हम सोचता यही, के आज हमको वो अगर मिल जायें कहीं..
तो ऐसा बोलेगा, साला वैसा बोलेगा.. खुल्लमखुल्ला अपने दिल का राज हम खोलेगा.
वो सामने चमकती है तो सांस ही अटकती है और ये जुबान जाती है फिसल..

साउंड्ज टू फॅमिलियर?!

पण आज "ये क्या के सबसे बयाँ"चा दिवस नाहीये. आज दुसरी एक गजल.. "अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबोंमें मिले". तिच्यातले निवडक शेर. कारण प्रत्येक गजलेतले सर्वच शेर पुरते जमून येतातच असं नाही. एखादीच गजल याला अपवाद असेल.

अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबोंमे मिले
जिस तरह सूखे हुए फूल किताबोंमें मिले

ही तर सुरुवात आहे. तिचा अर्थ वेगळा लावण्याची गरज नाही. केवळ आकार लक्षात येण्यासाठी या ओळी..
एकंदरीत गजलेतले सर्व शेर एकमेकांशी थेट एका सीरीजमधे बांधलेले असतीलच असं नाही.

ढूंढ उजडे हुए लोगोंमे वफाके मोती
ये खजाने तुझे मुमकिन है, खराबोंमे मिले

खरंय.. निष्ठा, कशावरतरी वेड्यासारखी निष्ठा, इमानदार श्रद्धा म्हणावी अशी निष्ठा असणारे बरेच लोक "खराबां"तच ढकलले गेलेले असतात..तिथेच त्या सो कॉल्ड कचर्‍यात मोती मिळून जाईल..हेड स्ट्रेट टु द डंपिंग ग्राउंड ऑफ धिस बॅरन सोसायटी.

तू खुदा है न मेरा इश्क फरिश्तों जैसा
दोनो इंसां है तो क्यूं इतने हिजाबोंमे मिले?

क्या नजरिया है फराजसाहब.. त्या उगीच ईश्वरपातळीवर नेऊन ठेवलेल्या "तिला" आणि त्यानिमित्ताने त्याच पातळीवर चढवून ठेवलेल्या "इश्का"ला आपल्यासारखं इन्सान बनवून एकदम दोस्तखात्यात आणून बसवलंत. अरे तू खुदा नाहीस आणि माझंही प्रेम तसं उदात्त एंजललाईक नाही, तर मग इतके शरमेने, इतकं आडपडद्याने कशाला भेटायचं. आ.. गले मिल..!!

मला यावरुन सहज कुसुमाग्रजांच्या "वगैरे" कवितेतल्या या ओळी आठवतात..

कधी शिवालय पांघरुनी तू
समोर येता विरती हेतू
मनात उरते मात्र समर्पण
मी नसतो पण भक्त वगैरे!

....

....

पुढे..

...

आज हम दारपे खींचे गये जिन बातोंपर
क्या अजब कल वो जमानेको निसाबोंमें मिले

दार म्हणजे इथे घराचं दार नव्हे. तिच्या घराचं दार, अशी रोमँटिक कल्पना इथे नाही. इथे वधस्तंभ, बळीची वेदी, फाशीगेट असा अर्थ आहे. आज ज्या श्रद्धेपायी अन ज्या रुढाशी द्रोहसदृश असलेल्या विचारांपायी जमाना आपलं शिर उडवण्यासाठी घेऊन आला, तेच विचार, त्याच श्रद्धा कोण जाणे, उद्या अगदी याच दुनियेच्या चक्क अभ्यासक्रमात शिकवल्या जातील.. कोणीतरी लिहिलेल्या, सर्व देश जिला मानेल अशा राज्यघटनेत सामील होतील..अगदी धर्मग्रंथातही..कदाचित.

असं शेकडोवेळा झालेलंही आहे.. त्यासाठी शेकडो वर्षं का लागलेली असेनात.

शेवटचा शेर रचनेच्या बाजूने विलक्षण आहे.

अब न वो मैं, न वो तू है, न वो माजी है फराज
जैसे दो शख्स तमन्नाके सराबों मे मिले

तो, त्यावेळचा मी.. तो त्यावेळचा तू.. आणि तो त्यावेळचा भूतकाळ.. हे कोणीच आता नाहीत.. म्हणजे ते आता "ते" उरले नाहीत..

आत्ता, आजरोजी मात्र, त्या वेळच्या "त्यांच्या" सर्व इच्छा आकांक्षांच्या मृगजळात, भासात, कोणीतरी दोन वेगळ्याच व्यक्ती भेटताहेत. व्यक्ती फक्त खर्‍या, बाकी सर्व इल्युजन..मिराज..आभास..

इट्स अ व्हर्च्युअल रियालिटी..

...................

मैफिलीत शरीक लोकहो, आपले अर्थ आणि इंटरप्रिटेशन्स सांगून खर्‍या अर्थाने रंग भरा.. तीच इथली शराब...

Node read time
3 minutes

ललित लेखनाचा प्रकार

गब्बर सिंग Fri, 26/06/2015 - 12:46

गवि, धागा अधाशासारखा पुन्हापुन्हा वाचतोय. "अब के हम बिछडे" ही एकदम काळजातली गझल आहे. मेहदी हसन च्या गायकीची मिठास पूछो ही मत. आणि ती कल्पनाच इतकी नजाकतभरी वाटते की "जिस तरहा सूखे हुए फूल किताबों मे मिले". ही गझल ऐकताना "न चाहते हुए भी" मला त्या "दोन ओंडक्यांची होते सागरात भेट" बेदर्द ओळी आठवतात आणि त्यांपासून सुटका मिळवण्यासाठी मी त्या "गम-ए-दुनिया" ला बळेच बाजूला सारून "नशा बढता है शराबे जो शराबो मे मिले" कडे वळतो.

.शुचि. Fri, 26/06/2015 - 17:46

In reply to by गवि

अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबोंमे मिले
जिस तरह सूखे हुए फूल किताबोंमें मिले
.
ढूंढ उजडे हुए लोगोंमे वफाके मोती
ये खजाने तुझे मुमकिन है, खराबोंमे मिले
.
हे दोन शेर आहेत ते.

अनु राव Fri, 26/06/2015 - 16:09

In reply to by .शुचि.

@ गवि - पुन्हा धन्यवाद ह्या गजले साठी.

@ शुचि : हा बघ एक शेर बेगम अख्तर नी गायला आहे त्यामुळे शायर माहीती नाही. गवि चांगल्या पद्धतीने अर्थ सांगतील

तुम्हारी याद आसु बन के आई चश्म्-ए-वीरां मे
जहे किस्मत के वीरानो में बरसाते भी होती है

चश्म-ए-वीरां : उजाड, भकास डोळे