Skip to main content

लढवय्या शेतकरी

वॉर ऑन हंगर आणि एफिशियंट मार्केट्स
"अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूळ गरजा आहेत" हे घासून गुळगुळीत, बुळबुळीत झालेलं वाक्य; पण प्रगतीचं घोडं अजून पहिल्याच पायरीवर अडलेलं आहे. अर्थातच, पुढचं वळण घेतलं की आलंच नंदनवन आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण तिथे लवकरच पोचू हा विश्वास अटळ आणि अढळ आहेच. माणूस सर्वसुखी होण्यात अनेक नैसर्गिक अडचणींचा मोठा अडथळा आहे आणि त्यासाठी माणसाला अनेक पातळीवर युद्ध करावे लागते. त्यापैकीच एक आहे वॉर ऑन हंगर.
वर्ल्ड बँक, युनो आणि जगातली तमाम सरकारे यांना गरिबांची भलती काळजी लागून राहिलेली असते. सध्या जी८ देशांची "हंगर समिट" चालू आहे, त्यात २.७ अब्ज पाऊंड्स खर्च करून दरवर्षी कुपोषणाने मरणार्‍या लाखो मुलांना वाचवण्याची प्रतिज्ञा करण्यात आली आहे. जगाची लोकसंख्या आज सात अब्ज आहे आणि त्यातले एक अब्ज लोक उपाशी आहेत. त्यातले बरेच भारतात आहेत. पण त्याचवेळी भारत अन्नधान्याचा निर्यातदारही आहे. एकूणच जगात आजच्या घडीला दहा-अकरा अब्ज लोकांना पुरेल इतके अन्न निर्माण होते. (जगाची लोकसंख्या दहा अब्जावर स्थिर होईल असा अंदाज आहे.)
जगात निर्माण होणार्‍या अन्नापैकी ४०-५०% अन्न वाया जाते. हे वाया जाणारे अन्न काही शेतात वाया जात नाही. ते वाया जाईल याची काळजी घेतात आपली एफिशियंट मार्केट्स. उदाहरणार्थ, धान्यापासून इंधन तयार करणे, दारू तयार करणे किंवा गेलाबाजार कत्तलखान्यातल्या गुरांना ते खाऊ घालणे जास्त फायदेशीर असल्याने ज्यांच्याकडून काहीही आर्थिक लाभ नाही अशा लोकांना अन्न देण्यात काय हशील? समजा अगदी निर्यात करता आले नाही, इंधनासाठी वापरता आले नाही, दारूसाठी वापरता आले नाही तरी ते फुकटात वाटण्याचा जास्तीचा खर्च कोण करणार? त्यापेक्षा ते तसेच पडून सडून गेलेले बरे.
पण मग लक्षावधी लोक भुकेले असताना आणि टनावारी अन्न वाया जात असताना करता येण्यासारखा सोपा-सुटसुटीत उपाय काय असावा बरं?

करेक्ट!

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आणखी अन्न निर्माण करणे!
इतके अन्न-धान्य निर्माण झाले पाहिजे की पडून सडून जाणार्‍या अन्नाची विल्हेवाट लावण्याचा खर्च ते फुकटात वाटण्यापेक्षा जास्त झाला पाहिजे असे अगदी सोप्पे गणित आहे; पण हे गणित प्रत्यक्ष यायला आधुनिक तंत्रज्ञानात पारंगत अशा काही विशेष शेतकर्‍यांची मदत घेणे भाग आहे. आपल्या मदतीची इतकी गरज आहे हे पाहून आणि "वॉर ऑन हंगर"मधला फायदा पाहून मॉन्सॅन्टो, बेयर, सिन्जेन्टा सारखे अनेक नवे शेतकरी आता झपाट्याने या क्षेत्रात उगवून फोफावले आहेत.
आता वॉर म्हटले की रक्तपात, हिंसा आणि मृत्यू हे ठरलेलेच. भुकेविरुद्धच्या युद्धात अन्नधान्याचे उत्पादन कमी होण्यास कारणीभूत असलेल्या (आणि नसलेल्याही) कीडिंचा, तणाचा आणि इतर जीवजंतूंचा नाश होणार हे ओघानेच आले आणि हा असा नाश करण्याचा जोरदार अनुभव ही या शेतकर्‍यांची जमेची बाजू आहे.

डीडीटी ते राऊंडअप

अगदी दुसर्‍या महायुद्धापासून ते छोट्या-मोठ्या युद्धांपर्यंत अमेरिकन सरकारला मदत करणार्‍या मॉन्सॅन्टोने १९४४ साली अशाच एका वॉर ऑन मलेरियामध्ये डीडीटीचा शोध लावला. अगदी काळजीपूर्वक त्याचे टेस्टिंग करून त्यापासून काहीही धोका नाही आणि फक्त डास, पिकांवरची कीड व मलेरियाचे जंतूच मरतील ही खात्री केल्याचे दावे करून त्यांनी ते विकायला आणले. लवकरच आपण रोगमुक्त होणार म्हणून समस्त जगाने आनंदाने त्याचा मुबलक वापर सुरु केला. १९७२साली रेचेल कार्सन यांच्या 'सायलेंट स्प्रिंग' या पुस्तकानंतर केवळ लोकाग्रहास्तव त्यावर अमेरिकेत बंदी आणण्यात आली आणि ते युद्ध थांबवावे लागले. पण इतरत्र त्याचा वापर बराच काळ चालू राहिला.
अर्थात त्यापूर्वीच मॉन्सॅन्टोने दुसरी महत्त्वपूर्ण जबाबदारी शिरावर घेतली होती. व्हिएतनामच्या युद्धात व्हिएतनामी सैनिक लपून गनिमी कावा करतात म्हणून तिथली दाट वृक्षराजी नष्ट करण्यासाठी एजंट ऑरेंज आणि त्या सैनिकांना अन्नपुरवठा करणारी त्यांची पीके नष्ट करण्यासाठी एजंट ब्लू अशी दोन अमोघ रासायनिक अस्त्रे मॉन्सॅन्टोने निर्माण केली. ती फवारल्यानंतर जवळजवळ सत्तर-ऐंशी लाख व्हिएतनामी लोकांना उपासमार टाळण्यासाठी स्थलांतर करावे लागले. एजंट ऑरेंजच्या आणि त्यात मिसळल्या गेलेल्या डायॉक्सिनच्या विषारीपणामुळे पिढ्याच्या पिढ्या बरबाद झाल्या. मॉन्सॅन्टोचा दबदबा वाढतच होता.
विसाव्या शतकाच्या शेवटी आपल्या रासायनिक ज्ञानाचा उपयोग या कंपन्यांनी शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी करायला सुरुवात केली. उदाहरणार्थ जीनटेक नावाच्या कंपनीने बोव्हाईन सोमॅटोट्रॉपिन नावाचा एक हार्मोन कृत्रिमरीत्या तयार करायचे प्रयत्न चालवले होते. मॉन्सॅन्टोने या कंपनीशी हात मिळवणी केली आणि तीस कोटी डॉलर्स खर्चून रिकॉम्बिनन्ट डीएनए वापरून एकदाचा हा हार्मोन तयार केला. डीडीटीप्रमाणेच याच्याही काटेकोर तपासण्या करण्यास मॉन्सॅन्टो विसरली नव्हती. त्यांनी या हार्मोनच्या काटेकोर फील्ड ट्रायल्स घेतल्यावरच ते बाजारात आणले. त्यांनीच केलेल्या या तपासण्यांमध्ये थोडा जरी धोका आढळला असता तरी त्यांनी तीस कोटी डॉलर्सवर हसत-हसत पाणी सोडले असते यात काय संशय? हा हार्मोन गायींच्या दूध निर्मितीसाठी कारणीभूत असतो, त्यामुळे बाहेरून हा हार्मोन टोचल्यावर गायींचे दुग्धोत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढते आणि शेतकर्‍यांचा अमाप फायदा होतो. सध्या हा हार्मोन भारतासह अनेक देशांमध्ये वापरला जातो.
असे असूनही काही लोकांनी याविरुद्ध ओरड सुरु केली. अतिदुग्धोत्पादनाने गायींच्या सडा-आचळांमध्ये जंतूसंसर्ग होऊन पू होतो आणि असा पू दुधात मिसळला जाऊ शकतो असा प्रचार काही लोकांनी चालू केला. मॉन्सॅन्टोच्या चाचण्यांमध्ये, असा पू दुधात जाऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेतली जाते असे नमूद केलेले असूनही काही लोकांनी त्यावर विश्वास दाखवला नाही. शिवाय या जंतुसंसर्गावर औषध म्हणून वापरली जाणारी प्रतिजैविकेही दुधात मिसळतात असाही आरोप केला.
काही डेअरीचालकांनी आमच्या दुधात असा हार्मोन नसतो असे लेबल त्यांच्या दूधपिशव्यांवर लावायला सुरुवात केली. पण नैसर्गिक हार्मोन आणि मॉन्सॅन्टोच्या हार्मोनमध्ये काहीही फरक नाही असा दावा करून मॉन्सॅन्टोने त्यांच्यावर खटले ठोकले आणि ती लेबल्स बाद ठरवली. काही लोकांनी असा हार्मोन टोचणे गायींच्या आरोग्याला धोकादायक आहे असा आरोप केला. इन्शुलिन माणसाच्या शरीरातले नैसर्गिक द्रव्य असले तरी ते बाहेरून टोचत राहिल्यास माणूस आजारी पडेल तसेच गायींचेही आहे असे त्यांचे म्हणणे होते.
त्याच दरम्यान जेन अ‍ॅक्रे आणि स्टीव्ह विल्सन या फॉक्स टीव्हीसाठी काम करणार्‍या पत्रकारांच्या जोडगोळीने मॉन्सॅन्टोच्या चाचण्यांच्या कागदपत्रांचा अभ्यास करून व मॉन्सॅन्टोच्या संशोधकांच्या मुलाखती घेऊन या बोव्हाईन ग्रोथ हार्मोनवर एक चार भागांची मालिका बनवली.या मालिकेत या हार्मोनचा गायींच्या व माणसांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतात असे सांगणारे अनेक दावे होते आणि मॉन्सॅन्टोच्या दाव्यांचे खंडन होते. जेफ्री स्मिथ या "Seeds Of Deception" पुस्तकाच्या लेखकाने लिहिलेल्या या लेखात त्याबद्दल विस्तृत माहिती आहे. मॉन्सॅन्टो हे फॉक्स टीव्हीचे मोठे गिर्‍हाईक असल्याने त्यांनी फॉक्स टीव्हीने खाल्ल्या मीठाला जागून या मालिकेत काही बदल करावे असे सुचवले; पण या पत्रकारांनी ते ऐकले नाही. फॉक्स टीव्हीला नाईलाजाने त्यांना नोकरीवरून काढावे लागले, तर त्यांनी कोर्टात धाव घेतली. कोर्टाने सुरुवातीला पत्रकारांची बाजू घेतली पण मॉन्सॅन्टोने अपील केल्यावर कोर्टाच्या लक्षात आले की एखाद्या बातमीत टीव्ही चॅनलने फेरफार करू नयेत असा फक्त संकेत आहे, कायदा नाही. अशा रीतीने मॉन्सॅन्टोने आणखी एक लढाई जिंकली.
जैवतंत्रज्ञानातल्या या सुरुवातीच्या यशानंतर मॉन्सॅन्टोने जनुकांतरित (जेनेटिकली मॉडिफाईड) पीके निर्माण करायला सुरुवात केली. बेयर कंपनीने निर्माण केलेले बीटी तंत्रज्ञान वापरून बीटी मका, बीटी वांगे, बीटी कापूस अशा अनेक कीटकनाशक क्षमता असलेल्या वनस्पती त्यांनी निर्माण केल्या. अमेरिकेत उगवणार्‍या मक्यापैकी आता बराचसा मका जनुकांतरित मका आहे. भारतातही बीटी कापूस शेतकरीप्रिय झाला आहे आणि अनेक शेतकर्‍यांचा बीटी कापसाने बराच फायदा झाला आहे.
बीटी तंत्रज्ञानाने वनस्पतींमध्येच कीडनाशक प्रथिने टाकल्याने कीटकनाशकांचा खर्च वाचतो, शिवाय कीटकनाशक फवारावे न लागल्याने जमिनीत व पाण्यात प्रदूषण होत नाही. असा दुहेरी फायदा होत असला तरी त्याविरुद्धही काही लोकांनी ओरड सुरु केलीच. या जनुकांतरित पिकांची पूर्ण चाचणी घेतली गेलेली नाही असा काहींचा आक्षेप होता. मध्यंतरी एका शास्त्रज्ञाने जनुकांतरित अन्न खाऊन उंदरांमध्ये गंभीर आजार निर्माण होतात असा निष्कर्ष काढणारे संशोधन प्रसिद्ध केले. सुदैवाने त्या संशोधनातल्या महत्त्वाच्या त्रुटी लगेच लक्षात आल्याने त्या शास्त्रज्ञाला लगेच कामावरून काढून टाकण्यात आले आणि मॉन्सॅन्टोला लढायची वेळ आली नाही.
मॉन्सॅन्टोने कीटकनाशक वनस्पतींप्रमाणेच तणनाशकरोधी वनस्पतीही निर्माण केल्या आहेत. शेतात शेतकर्‍याला हव्या असणार्‍या पिकांबरोबरच नको असलेले तण आणि मातीतले इतर जीवजंतू त्या पिकांशी स्पर्धा करत असतात. या स्पर्धकांमुळे पिकांची वाढ हवी तशी होत नाही आणि शेतकर्‍याला कमी उत्पादन मिळते. या स्पर्धकांचा समूळ नायनाट करण्यासाठी त्यांच्यावर जहरी तणनाशक औषध फवारणे आवश्यक असते. परंतु, असे जहरी औषध फवारल्यास सामान्य पिकांनाही त्याचा त्रास होतो. म्हणून मॉन्सॅन्टोने संशोधन करून एक जहरी तणनाशक आणि त्या तणनाशकाच्या फवार्‍यातही जिवंत राहील असे पीक अशी जोडगोळी तयार केली. त्या तणनाशकाला अतिशय समर्पक असे नाव देण्यात आले: राऊंडअप. आणि अशा पिकांना राऊंडअपरेडी पीक असे म्हटले जाऊ लागले. राऊंडअपरेडी सोयाबीन आणि करडई ही दोन पीके बघता बघता लोकप्रिय झाली आहेत.
या राऊंडअपविरोधातही काही लोकांनी लगेच ओरडा सुरु केला. काहींच्या मते ते इतके जहरी आहे की राऊंडअपरेडी पीके सोडल्यात मातीत उगवणार्‍या कोणत्याही वनस्पतीसह सूक्ष्मजंतूंनाही ते नष्ट करते आणि यात पिकांना पोषक अशा जीवजंतूंचाही समावेश होतो.काहींच्या मते या राऊंडअपरेडी पिकांची मातीतून खनिजे शोषण्याची शक्ती कमी असते त्यामुळे त्यांचे पोषणमूल्य नेहमीच्या पिकांपेक्षा फारच कमी असते.

बर्‍याच लोकांचा तर मुळात जनुकांतरित पिकांनाच विरोध आहे आणि त्यांना असे अन्न खायचे नसते. म्हणून अनेक देशांमध्ये अशा अन्नाच्या पिशव्यांवर ते जनुकांतरित असल्याचा इशारा छापणे बंधनकारक केले आहे. याविरुद्ध मॉन्सॅन्टोची लढाई चालू आहे. अमेरिकेतही अशी मागणी जोर धरू लागली आहे; पण मॉन्सॅन्टोने एफडीएकडे असे प्रतिज्ञापत्र दिले आहे की जनुकांतरित पीकांमध्ये आणि सामान्य पारंपारिक पीकांमध्ये काहीही फरक नाही त्यामुळे अशा अन्नधान्यावर वेगळा इशारा छापायची गरज नाही. कोणत्याही कंपनीला आपल्या उत्पादनावर स्वतःचे नाव छापून स्वतःची जाहिरात करायचीच असते; पण याबाबतीत आपल्या उत्पादनांवर स्वत:चे नाव न छापण्याचा उदारतावाद वाखाणण्यासारखा आहे. अर्थात स्वत:चे व्यावसायिक हितसंबंध सांभाळण्यासाठी मॉन्सॅन्टोला पेटंट ऑफिसात मात्र नाईलाजाने जनुकांतरित पीके सामान्य पीकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत आणि ती मॉन्सॅन्टोच्या परवानगीशिवाय कोणालाही वापरता येणार नाहीत असे ठामपणे सांगावे लागतेच.
इतकेच नाही, तर चोरून जनुकांतरित पीके वापरणार्‍या भामट्या शेतकर्‍यांविरुद्ध सतत लढावेही लागते. हे शेतकरी वार्‍याने जनुकांतरित बियाणे आमच्या शेतात आली असा बहाणा करतात. अशा अनेक शेतकर्‍यांना मॉन्सॅन्टोने कोर्टात खेचून धडा शिकवला आहे, शिवाय वार्‍याने जनुकांतरित बियाणे येऊन रुजू नये म्हणून आपापल्या शेतांमध्ये कडेचा काही भाग बफर म्हणून पडीक ठेवण्याचा सज्जड दमही भरला आहे. मॉन्सॅन्टोच्या दुर्दैवाने पर्सी श्माइसर नामक एका कॅनेडियन शेतकर्‍याने अनेक वर्षे चिवट लढा देऊन मॉन्सॅन्टोविरुद्धचा खटला जिंकला; पण मॉन्सॅन्टोची लढाई संपलेली नाही.
शेतकर्‍यांना पूर्वापार तयार झालेल्या धान्यातून बियाणं वाचवून ठेवायची, वेगवेगळे संकर करायची खोड आहे आणि भारतासारख्या देशात असल्या उद्योगांमधून प्रत्येक धान्याच्या अक्षरश: शेकडो जाती तयार करून ठेवल्या आहेत. ही सवय मॉन्सॅन्टोच्या व्यवसायास अतिशय मारक आहे. उद्या कोणी मॉन्सॅन्टोची जनुकांतरित बीजे घेतली आणि त्यातून भरघोस पीक घेऊन नंतर त्यातलीच बीजं वापरून फुकटात स्वत:चा फायदा करून घेतला तर मॉन्सॅन्टोचे दिवाळे वाजेल. म्हणून मॉन्सॅन्टोने टर्मिनेटर टेक्नॉलॉजी नावाचे अतिशय चतुर तंत्रज्ञान निर्माण केले आहे. हे तंत्रज्ञान वापरून तयार केलेली पीके एका पिढीनंतर स्वतःला नष्ट करतात म्हणजे फुकटात वर्षानुवर्षे बीजे वापरणे किंवा त्यांचा दुसर्‍यांशी संकर करून पेटंट नसलेल्या प्रजाती निर्माण करणे शक्यच होणार नाही. आता स्वत:चा व्यवसाय सांभाळण्यासाठी हे आवश्यक असतानाही काही लोक जैवविविधता धोक्यात येईल म्हणून त्याविरुद्ध बोंबाबोंब करू लागले आहेत.

मॉन्सॅन्टोच्या अशा प्रत्येक कृतीला विरोध करणे हा काही स्वतःला मानवतावादी आणि पर्यावरणवादी म्हणवणार्‍या लोकांचा धंदाच झाला आहे. ज्या देशांमध्ये राज्यकर्त्यांनी जनुकांतरित पिकांना पाठिंबा दिला आहे त्या देशातले ते राज्यकर्ते व उच्चभ्रू लोक स्वतः मात्र जनुकांतरित अन्न खात नाहीत; किंबहुना खुद्द मॉन्सॅन्टोच्या कॅन्टीनमध्ये त्यांच्या कर्मचार्‍यांना जनुकांतरित अन्न न दिले जाण्याची ग्वाही दिली जाते असा प्रचार करण्यापर्यंत या लोकांची मजल गेली आहे.
मध्यंतरी अमेरिकेत शेतकर्‍यांच्या हिताचा एक विधेयक पास करण्यात आले. या कायद्यानुसार (Farmers Assurance Provision) एखाद्या शेतकर्‍याच्या उत्पादनाविरुद्ध एखाद्याने कोर्टात तक्रार केली आणि ती ग्राह्य मानून कोर्टाने त्या उत्पादनावर बंदी आणली तरी त्या शेतकर्‍याचे हित पाहून सरकारला ती बंदी अंमलात न आणण्याची मुभा दिली आहे. या कायद्यामुळे उठसूट कोणीही मॉन्सॅन्टोच्या जनुकांतरित पीकांविरुद्ध तक्रार केली आणि कोर्टाने त्यावर बंदी घातली तरी मॉन्सॅन्टोचे नुकसान होण्यापासून संरक्षण होणार आहे. अर्थातच या कायद्यामुळे मॉन्सॅन्टोच्या हितशत्रूंना पोटशूळ उठला आणि त्यांनी या कायद्याला Monsanto Protection Act असे नाव देऊन त्याविरुद्ध जोरदार आघाडी उघडली आहे.
जगातून भूक कायमची नष्ट करण्यासाठी या सर्वांविरुद्ध मॉन्सॅन्टोची अथक लढाई चालू आहे.

भारत आणि मॉन्सॅन्टो

भारतात मॉन्सॅन्टोचा चंचुप्रवेश आधीच झालेला आहे आणि भारतीय शेतकर्‍यांनी बीटी कॉटनच्या वापराने स्वत:च्या समृद्धीत वाढही करून घेतलेली आहे. अर्थात भारतातही मॉन्सॅन्टोचे हितशत्रू आहेतच. या हितशत्रूंमुळे जनुकांतरित अन्नधान्याला अजून भारतात परवानगी मिळू शकलेली नाही.
वंदना शिवांसारखे पर्यावरणवादी मॉन्सॅन्टोचे कट्टर विरोधक आहेत. मॉन्सॅन्टोने काही वर्षांपूर्वी कारगिल (Cargill) नामक बियाण्यांची कंपनी विकत घेतली. या कंपनीच्या राजस्थानमधील अधिकार्‍याने राजस्थानातल्या एका कृषी विद्यापीठाने शोधलेले एक बियाणे चोरले असा आरोप वंदना शिवा यांनी आपल्या "Soil not Oil" या पुस्तकात उघडपणे केला आहे. शिवाय विदर्भात होणार्‍या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा संबंध बीटी कॉटनशी जोडण्याचाही प्रयत्न केला गेला आहे.
भारतात जनुकांतरित अन्नधान्यांच्या वापराला परवानगी मिळावी म्हणून मॉन्सॅन्टोच्या प्रयत्नांना वारंवार खीळ बसली आहे. बीटी वांग्याच्या वापरावर कोर्टाने बंदी आणली आहे.
२०१२ मध्ये बासुदेब आचार्य यांच्या अध्यक्षतेखाली एक संसदीय समिती स्थापन करून भारतात जनुकांतरित धान्यांच्या क्षेत्रचाचण्यांसाठी परवानगी देण्याबाबत विचार करण्यात आला. या समितीने बराच अभ्यास करून शेवटी एकमुखाने जनुकांतरित धान्याला भारतात परवानगी देऊ नये असा निष्कर्ष काढला.
या समितीच्या अहवालात लिहिलेला हा उतारा पाहा:

During their extensive interactions with farmers in the course of their Study Visits, the Committee have found there have been no significant socio-economic benefits to the farmers because of introduction of Bt. cotton. On the contrary, being a capital intensive agriculture practice, investments of the farmers have increased manifolds thus, exposing them to far greater risks due to massive indebtedness, which a vast majority of them can ill afford. Resultantly, after the euphoria of a few initial years, Bt. cotton cultivation has only added to the miseries of the small and marginal farmers who constitute more than 70% of the tillers in India.

भविष्यात भुकेचा प्रश्न सोडवणारी सस्टेनेबल शेती देण्याचा दावा करणार्‍या मॉन्सॅन्टोला हा एक मोठा धक्का होता. पण मॉन्सॅन्टोने आशा सोडलेली नाही.
नुकतीच भारताचे कृषीमंत्री श्री. शरद पवार व भारताचे पंतप्रधान श्री. मनमोहनसिंग यांनी जनुकांतरित धान्यांच्या क्षेत्रचाचण्यांसाठी अनुकुलता दर्शवली आहे. शिवाय भारताच्या मनुष्यबळ खात्याचे मंत्री श्री. शशी थरूर यांनी जैवतंत्रज्ञानक्षेत्रात कितीतरी रोजगार निर्माण होतील अशा स्वरुपाचे वक्तव्य केले आहे. दूरदृष्टीसाठी प्रसिद्ध असलेले स्वामिनॉमिक्सवाले स्वामीनाथन यांनीही जनुकांतरित पिकांची भलामण केली आहे.
लढवय्या मॉन्सॅन्टोच्या लढाईला यश येईल का हा प्रश्न नसून, कधी येईल हा प्रश्न फक्त उरला आहे.

Node read time
10 minutes
10 minutes

गब्बर सिंग Wed, 18/06/2014 - 22:10

In reply to by मी

नमस्कार मी, मला फारसं काही त्यातलं माहीती नाहीये ओ. म्हंजे बीटी कॉटन च्या आयपी राईट्स मधे काय समविष्ट आहे व ते का असावे. अजोंनी उपस्थित केलेला मुद्दा पण लक्षणीय आहे. की जर आयपी राईट्स ची एन्फोर्समेंट खर्चिक असेल व एका वर्षीचे दुसर्‍या वर्षी चालत असेल तर शेतकरी फायदा घेणार नाहीत असे नाही. व टेक्निकली जर ते बियाणे म्हणून पुढच्या वर्षी चालणार नसेल तर प्रश्नच मिटला. शेतकर्‍यास नवीन घ्यावे लागेल.

विकिपेडिया वर वाचले की ICAR ने याला सर्कमव्हेंट करायचा यत्न केला होता ... पण ते जमले नाही.

सरकारे (केंद्र् व राज्य) दाखवताना आम्ही शेतकर्‍यांचे तारणहार आहोत असे दाखवत असतील व आतून काय काय करीत असतील हे माहीती नाही. क्रोनीइझम. मोन्सँटो शी आतून व्यवहार करून ... वरकरणी दुसरेच दाखवायचे. दुसर्‍या बाजूला बीटी कॉटन ची जवळपास ऑफिशियल मोनोपोली निर्माण झालेली आहे हे ही सत्य. जर ICAR मधे पडून राडे करीत असेल तर त्याचा परिणाम इतर कंपन्यांना या क्षेत्रातील प्रवेशास Deter (नाउमेद) करण्यात होतो व हे मोन्सँटो स फायदेशीर ठरू शकते. Most people believe that Govt's role is to protect the consumer's "right" to have free and fair competition between sellers. But Govt. is many times misused (or cleverly used) by incumbents to thwart competition or entry.

मी Thu, 19/06/2014 - 11:08

In reply to by गब्बर सिंग

धन्यवाद, पेटंट मुदत संपल्याने शेतकरी आता जनुकीय बदल केलेले बियाणे फुकटात(दुबार) वापरू शकतो, पेटंट कायद्यानुसार कंपनीची रिसर्च कॉस्ट आता रिकव्हर झाली आहे पण ह्याचे भांडवली बाजुने पडणारे पडसाद काय असतील ह्याचा विचार करत होतो.

गब्बर सिंग Thu, 19/06/2014 - 18:14

वॉर ऑन हंगर आणि एफिशियंट मार्केट्स

नगरीनिरंजन, इथे मात्र विकेट पडली हो आमची. मार्केट एफिशियन्सी व उपासमारीविरोधी चे युद्ध यातील संबंध काही लक्षात आला नाही.

नगरीनिरंजन Fri, 20/06/2014 - 07:49

In reply to by गब्बर सिंग

दोघांचा काही संबंध नाहीय हेच सांगायचे आहे. मार्केट एफिशियन्सी या शब्दाचा बर्‍याचवेळा वेगळा अर्थ घेतला जातो. दुर्मिळ स्रोतांचे वाटप किंवा जिकडे मागणी तिकडे पुरवठा हे 'एफिशियंट' मार्केटमु़ळे आपोआप होईल असा युक्तिवाद केलेला पाहिला आहे.
प्रत्यक्षात रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये मार्केट्स अतिशय ढिसाळ असतात आणि फायदा नसेल तर ढिम्म हालत नाहीत. एफिशियंट मार्केट म्हणजे मार्केटमध्ये आर्बिट्राजची संधी फार काळ न टिकणे एवढाच अर्थ आहे हे आर्थिक क्षेत्राशी निगडीत नसलेल्या लोकांना स्पष्टपणे सांगितले जात नाही.

गब्बर सिंग Fri, 20/06/2014 - 07:57

In reply to by नगरीनिरंजन

प्रत्यक्षात रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये मार्केट्स अतिशय ढिसाळ असतात आणि फायदा नसेल तर ढिम्म हालत नाहीत.

अधोरेखित भाग - हे मार्केट व्यवस्थित चालू असल्याचे लक्षण आहे.

मन Fri, 20/06/2014 - 09:15

In reply to by गब्बर सिंग

तेच.
तोच मुद्दा आहे.
मार्केट व्यवस्थित चालू आहेत; म्हणजे suffer होणारे काही घटक अस्तित्वातच नाहित; असे नव्हे.

अजो१२३ Fri, 20/06/2014 - 11:50

In reply to by मन

नको त्या लोकांना एकत्र आणायचं नि त्यांना प्लेअर्स म्हणायचं, नको ती उत्पादने एकत्र करायची नि त्यांना एक उत्पादन म्हणायचे, त्या उत्पादनांच्या व्हॅल्यू चेन्स इतक्या लांब करायच्या कि त्यांची गुंतागुंत सोडवायला जगातल्या सार्‍या माणसांच्या भावनाग्राफांचा दीर्घकालीन ट्रेंड लिहावा लागेल, मग ज्यांची डिमांड पूर्ण झाली नाही त्यांना मरू द्यायचे, ज्यांचा सप्लाय बसून आहे त्यांनाही मरू द्यायचे, ज्यांना त्या उत्पादनाची फायनल कंजप्शनसाठी वा मूल उत्पादनासाठी गरजच नाही त्यांची बँकाकडील पत वापरून कितीही लोन घेऊन ते प्राईस इतकी इंफ्ल्यूएंस करणार कि खरे उत्पादक आणि उपभोक्ते गाढवाच्या गांडीत जाणार नि अर्थशास्त्री त्याला सक्षम बाजार म्हणून टाळ्या वाजवणार.

गब्बर सिंग Fri, 20/06/2014 - 11:12

In reply to by मन

मार्केट व्यवस्थित चालू आहेत; म्हणजे suffer होणारे काही घटक अस्तित्वातच नाहित; असे नव्हे.

अधोरेखित भाग - हे मान्य आहेच. व होतेच.

समस्येचे विवेचन एवढेच आहे का - की - suffer होणारे काही घटक अस्तित्वात आहेत?????
पुढे काय ??? प्रिस्क्रिप्शन काय ? Market failure is a widely recognized phenomenon. पण म्हणून काही लोकांवर जबरदस्ती करून त्यातून आलेल्या निधीतून त्या suffer होणार्‍या घटकांना वाचवायचे ???????

विलासराव Thu, 14/08/2014 - 20:09

माझ्या मते म्हणाल तर नंगा सच.

लोक जाग्रुत होतील तो सुदीन एवढीच मलातरी यातुन आशा.

प्रकाश घाटपांडे Sat, 23/08/2014 - 09:45

हा लेख व त्यावरील काही निवडक प्रतिक्रिया आजचा सुधारक ऑगस्ट २०१४ च्या अंकात आला आहे. हा अंक जनुक संस्कारित अन्न विशेषांक आहे.अपरिमेय, हारुन शेख, रुची,नितिन थत्ते,राजेश घासकडवी यांच्या प्रतिक्रियांचा समावेश आहे. ऐसी चे या निमित्त अभिनंदन

नगरीनिरंजन Thu, 04/09/2014 - 18:45

In reply to by प्रकाश घाटपांडे

सुधारकवाल्यांनी लेखातल्या व प्रतिसादांतल्या लिंकांचे काय केले आहे ते कळावे अशी फार उत्सुकता आहे. कोणी वाचला असल्यास कृपया सांगावे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 03/09/2014 - 22:04

याच संदर्भात, वंदना शिवा यांच्यावर न्यू यॉर्करमध्ये आलेला लेख विचार करण्यायोग्य वाटला.
Seeds of Doubt

---

न्यू यॉर्करमधल्या लेखाबद्दल वंदना शिवा यांची प्रतिक्रिया -
Seeds of Truth – A response to The New Yorker

या प्रतिक्रियेतला सुरूवातीचा काही भाग सोडून द्यायलाही हरकत नाही. मध्येच त्या हत्तीबद्दल आक्रमक लिहीतात तो भाग विनोद म्हणून वाचता आल्यामुळे फारशी निराशा झाली नाही.

---

स्क्रोलवर या वाद-प्रतिवादाबद्दल, विशेषतः शिवा यांच्या प्रतिसादाबद्दल टिप्पणी आहे. मला ही टिप्पणी objective टीका वाटली. कदाचित वंदना शिवा यांना स्क्रोलही मॉंसांटोचे बगलबच्चे वाटू शकतील.
Vandana Shiva is confusing ideology for science – and getting rational people to believe her

राजेश घासकडवी Thu, 04/09/2014 - 09:38

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

न्यूयॉर्क टाइम्सच्या लेखाचा थोडा भाग, वंदना शिवांची बाजू मांडणारा भाग, वाचला. त्यात वंदना शिवांचं उद्धृत वाचून मी हैराण झालो.

“There are two trends,” she told the crowd that had gathered in Piazza Santissima Annunziata, in Florence, for the seed fair. “One: a trend of diversity, democracy, freedom, joy, culture—people celebrating their lives.” She paused to let silence fill the square. “And the other: monocultures, deadness. Everyone depressed. Everyone on Prozac. More and more young people unemployed. We don’t want that world of death.”

जग असं 'अस व्हर्सेस देम' स्वरूपांत पाहणारांबद्दल मला नेहमीच अविश्वास वाटत आलेला आहे.

स्क्रोलमध्ये आलेल्या लेखात शिवांवर टीका आहेच, मात्र शिवांचं समर्थन करणारांचा मुद्दाही मला गमतीदार वाटला.

I have discussed this issue with friends I respect who lean green, and they often say, “I see your point, but we need people like Shiva to argue for the alternative, since the dominant ideology is so powerful.” In this view, one kind of extremism is necessary to battle another in order to reach a happy mean.

यावरूनही मला 'थोडंसं चुकीचं असलं, पण भल्यासाठीच आहे ना, मग ती चूक दुरुस्त करू नये...' या स्वरूपाचं समर्थन आठवलं. सर्वसामान्य जनता इतकी महामूर्ख आहे का की अशा टोकाच्या चुकीच्या युक्तिवादांशिवाय सत्य समजणारच नाही?

ऋषिकेश Thu, 04/09/2014 - 09:43

In reply to by राजेश घासकडवी

वरील उदा. बद्दल असे नाही पण, काही वेळा टोकाच्या अ‍ॅक्शन्स / युक्तिवाद काही पटवण्यासाठीच केले जातात असे नव्हे. काही वेळा ते लक्ष वेधून घेण्यासाठी, दुर्लक्ष करणार्‍यांना किंवा झोपलेल्यांना जागे करण्यासाठीही वापरले गेले आहेत (आणि त्यातील काही वेळा ते यशस्वीपणे वापरले गेले आहेत).

आता युक्तीवाद टोकाचा किंवा चुकीचा असला तर दुर्लक्ष करता येते किंवा प्रतिवाद करता येतोच की. पण असा युक्तिवाद कोणी करूच का नये? हे समजले नाही.

बॅटमॅन Thu, 04/09/2014 - 11:00

In reply to by ऋषिकेश

आता युक्तीवाद टोकाचा किंवा चुकीचा असला तर दुर्लक्ष करता येते किंवा प्रतिवाद करता येतोच की. पण असा युक्तिवाद कोणी करूच का नये? हे समजले नाही.

घासकडवींच्या प्रतिसादातून असे ध्वनित होते असे वाटत नाही. अमुक एका प्रकारचा प्रतिवाद हा टोकाचा/चुकीचा इ.इ. आहे इतकेच दिसते. त्याचे इम्प्लिकेशन असे काढणे रोचक वाटले.

राजेश घासकडवी Thu, 04/09/2014 - 11:33

In reply to by ऋषिकेश

टोकाचा, चुकीचा युक्तिवाद असेल तरी भल्यासाठीच आहे ना, मग काय हरकत आहे? असा मुद्दा वारंवार उपस्थित होताना दिसतो. त्यामागे विचार योग्य आहे की नाही, यापेक्षा कळकळीने मांडणाऱ्या व्यक्तीने तो मांडला आहे याबाबतची सहानुभूती दिसते. म्हणजे व्यक्तीला आधी क्रेडिबिलिटी मिळते मग तिच्या मतांना (ती मतं चुकीची, टोकाची असली तरीही) मान्यता मिळते. वंदनीय पाउलांकडून विचार आला तर तो/ती बोलेल तैसा मी चालेन हे होताना दिसतं. हे मला आवडत नाही.

कितीही थोर व्यक्ती असो, तिचे विचार बरोबर किंवा चूक असू शकतात असं माझं मत आहे. (कितीही निंदनीय व्यक्ती असो, तिचे विचार बरोबर किंवा चूक असू शकतात. हा त्याचा व्यत्यासही पटतो)

ऋषिकेश Thu, 04/09/2014 - 11:47

In reply to by राजेश घासकडवी

सहमत आहे. मात्र टोकाचा युक्तिवाद हा नेहमी धुळफेकीसाठीच असतो किंवा लोकांना काहितरी पटवण्यासाठीच असतो असे गृहितक मला मुळ प्रतिसादात असल्याचे वाटले.

राजेश घासकडवी Thu, 04/09/2014 - 12:24

In reply to by ऋषिकेश

मूळ प्रतिसादात त्यांच्या विचारांविषयी काहीच म्हणणं मांडलेलं नव्हतं. किंबहुना शिवांच्या चळवळीबद्दल सहानुभूती असणाऱ्या, पण तरीही त्यांचे विचार पूर्णपणे बरोबर नाहीत हे जाणवलेल्या व्यक्तींनी जे रॅशनलायझेशन दिलं होतं त्याबद्दल टिप्पणी होती.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 04/09/2014 - 17:35

In reply to by राजेश घासकडवी

ही चर्चा काहीशी अवांतर वाटते, स्क्रोलच्या लेखाचा रोख तसाच असला तरीही. तंत्रज्ञान का परंपरा का मध्यममार्ग (तो कोणता) या प्रश्नाला बगलच मिळते आहे.

गब्बर सिंग Thu, 04/09/2014 - 11:49

In reply to by राजेश घासकडवी

वंदनीय पाउलांकडून विचार आला तर तो/ती बोलेल तैसा मी चालेन हे होताना दिसतं. हे मला आवडत नाही.

काय द्याचं बोला मधे शेवटी अनासपुरेंनी हाच मुद्दा मांडलेला आहे.

घासकडवी फ्यान क्लब मधे आमालाबी घ्या की.

बॅटमॅन Thu, 04/09/2014 - 11:51

In reply to by राजेश घासकडवी

"विचारांवर फोकस करा, व्यक्तीवर नको" या तत्त्वाशी हे तत्त्व सांगणार्‍यांनीच फारकत घेतल्याचं दिसणं रोचक आहे.

नंदन Thu, 04/09/2014 - 13:16

In reply to by राजेश घासकडवी

यावरूनही मला 'थोडंसं चुकीचं असलं, पण भल्यासाठीच आहे ना, मग ती चूक दुरुस्त करू नये...' या स्वरूपाचं समर्थन आठवलं. सर्वसामान्य जनता इतकी महामूर्ख आहे का की अशा टोकाच्या चुकीच्या युक्तिवादांशिवाय सत्य समजणारच नाही?

The devil is in the details (with or without advocates ;))

विवेक पटाईत Mon, 25/08/2014 - 20:36

बीटी हे विषाणूचे नाव आहे. विषाणू जसा किड्यांसाठी घातक तसा इतर जीवांसाठी ही. शिवाय पुनरुत्पादन क्षमता नसलेलं बीज केंव्हा ही योग्य आही. याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.

एका शेतात बीटी बिया लावल्या तर दुसर्यांच्या शेतात ही परागकण द्वारा नपुंसकता पोहचते. अर्थात एकाने बीटी लावले तर काही वर्षात त्या भागात सर्वाना बीटी लावावे लागेल.

किड्यांमध्ये प्रतीरोग क्षमता स्वाभाविक रीतीने निर्माण होतेच आणि परिणाम अधिक विषयुक्त अन्न. शिवाय काही वर्षांत जमीन ही रोगट होते. लक्षात ठेवा सर्वात जास्त आत्महत्या बीटी वाले शेतकरीच करतात आहेत.

लढव्यया शेतकरी खरोखरच शेतकरी आहे का? कि .......

मन Wed, 03/09/2014 - 20:12

ह्या प्रश्नाची दुसरी बाजू.
लेखक :- शरद जोशी.अर्थतज्ज्ञ आणि 'योद्धा शेतकरी' म्हणून गौरवले गेलेले शेतकरी संघटनेचे संस्थापक .

http://www.loksatta.com/sampadkiya-news/farmers-predominate-hate-about-…

****************************लेख सुरु****************************************
तंत्रज्ञानाबाबतही प्रबळ शेतकरीद्वेष

'एन्डोसल्फान' असो वा बीटी वियाणे, हे कसे घातक आहेत याची हाकाटी पिटली जाते. भारतासारख्या भणंग देशातील स्वयंसेवी संघटनांना कोटय़वधी रुपयांचे साहाय्य देऊन त्यांच्यामार्फत जैविक शेतीविरोधी प्रचार घडवला जातो. त्यात आपल्या काही संशोधन संस्थाही सामील असतात हे त्याहून मोठे दुर्दैव..शेतकऱ्यांविरुद्धचे हे कारस्थान केवळ आर्थिक नाही तर तंत्रज्ञानाच्या बाबतीतही कसे आहे, याचा हा ऊहापोह..
शेती म्हणजे थोडक्यात, अन्नधान्ये, कडधान्ये, भाजीपाला, फळफळावळ इत्यादी वनस्पतींची केलेली सामूहिक लागवड होय. शेतीमध्ये एक दाणा पेरला असता त्याची हजारो फळे बनतात याचे कारण हे की निसर्गातील सर्व पंचमहाभूतांत साठवलेल्या ऊर्जेचा शेतीमध्ये उपयोग केला जातो. या पंचमहाभूतांचा पुरवठा कमी पडला म्हणजे शेतीतील उत्पादन आपोआप घटत जाते. हे प्रमाण कायम राहावे यासाठी वेगवेगळी पूरके किंवा तंत्रज्ञाने माणसाने शोधून काढली आहेत.
भारताला हरितक्रांतीचे तंत्रज्ञान काही नवे नव्हते; नेहरूकाळाच्या सुरुवातीपासूनच ते सर्व शेतकऱ्यांना ज्ञात होते. परंतु, हरितक्रांतीतून रक्तबंबाळ क्रांती निपजेल अशी धास्ती शासनाने आणि स्वयंसेवी संघटनांनी उभी केली. त्यामुळे हरितक्रांतीचे आगमन लांबणीवर पडले. हा प्रकार तंत्रज्ञानाच्या बाबतीत वारंवार घडला आहे. कपाशीच्या बीटी वाणामुळे उत्पादन वाढते, धागा अधिक लांब होतो आणि त्या बियाण्याचे जीवसृष्टीवर काहीही दुष्परिणाम होत नाहीत हे वारंवार सिद्ध झाले असूनही स्वयंसेवी संघटनांनी बीटी कपाशीच्या पराटय़ा जनावरांच्या जिवास घातक असतात वगरे विरोधी प्रचार करून या बियाण्याच्या वापरास किमान सात वष्रे वेळ लावला. तोच प्रकार आज जनुकीय परिवíतत (GM) टोमॅटो, वांगी इत्यादी खाद्यपदार्थाबाबत घडत आहे.
प्रत्यक्षात असे दिसून येते की हरितक्रांतीच्या सुरुवातीपासूनच स्वयंसेवी संघटना, सरकारी संशोधन संस्था, एवढेच नव्हे तर न्यायव्यवस्थाही शेतकऱ्याला त्याच्या जमिनीत आवश्यक ती ऊर्वरके वापरता येऊ नयेत असे सातत्याने प्रयत्न करीत आहे. ऊर्वरकांचा वापर वाढल्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाइतका भाव मिळेनासा झाला असा एक युक्तिवाद वारंवार केला जातो. हा युक्तिवाद खरा असता तर खते, पाणी, औषधे इत्यादी ऊर्वरकांच्या वापराला नाउमेद करणारी धोरणे सरकारने आखली असती. थोडक्यात, हरितक्रांतीच्या सुरुवातीपासूनच शेतकऱ्याला तंत्रज्ञानापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान सुरू आहे. शेतीत जमिनीइतकेच महत्त्व पाण्याच्या उपलब्धतेस आहे आणि तितकेच महत्त्व खते, औषधे इत्यादी पूरकांना आहे. १९६०च्या दशकात भारतात जी हरितक्रांती झाली ती प्रामुख्याने पाणी, रासायनिक खते, संकरित बियाणी आणि त्या पिकांवर वारंवार प्रादुर्भाव होणाऱ्या रोगांवरील व किडींवरील औषधे या सर्वाच्या संतुलित वापरामुळे झाली. हरितक्रांतीपासून सरकारी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या मालास उत्पादन खर्च मिळण्याचे बंद झाले. एवढेच नव्हे तर जगात कोणत्याही दुकानाच्या फळीवर उपलब्ध असलेली औषधे, रसायने भारतातील शेतकऱ्यास अनुपलब्धच राहिली. भारतातील स्वयंसेवी संघटना आणि युरोपातील रासायनिक औषधांचे कारखानदार यांची युती यास कारणीभूत आहेच.
शेतकऱ्यांना उणे सबसिडीच्या (Negative subsidy ) जालीम यंत्रणेने कायम कर्जात ठेवले जाते. त्याचप्रमाणे जगभर उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानावर वेगवेगळे र्निबध आणून शेतकऱ्यांना शक्य ती विकासाची गती गाठू दिली जात नाही. शेतकऱ्यांविरुद्धचे कारस्थान केवळ आर्थिक नाही तर ते तंत्रज्ञानाच्या बाबतीतही आहे. याची अनेक उदाहरणे देता येतील. युरोपातील देशांत शेतीला लागणाऱ्या औषधांच्या शोधात पुष्कळ प्रगती झाली आहे. भारतासारख्या विकसनशील देशातही रासायनिक औषधांच्या शोधामध्ये मोठी प्रगती झाली आहे. औषधांच्या क्षेत्रातील या प्रगतीचा उपयोग शेतकऱ्यास करता येऊ नये आणि त्या औषधांचा लाभ घेऊन शेतीतील उत्पादकता वाढवता येऊ नये यासाठी अनेक युक्त्या योजल्या जातात. हे एक मोठे कारस्थानच आहे. या कारस्थानात अनेक मंडळी सामील आहेत. परदेशातून कोटय़वधी रुपयांचे धन मिळविणाऱ्या स्वयंसेवी संघटनांचा यात मोठा भाग आहे. या स्वयंसेवी संघटना मोठय़ा प्रमाणावर गुळगुळीत कागदांच्या पत्रकांवर साहित्य उपलब्ध करतात आणि त्याद्वारे शेतीला अत्यंत उपयुक्त अशा औषधांविरुद्ध प्रचार करून ही औषधे मनुष्यप्राण्यांना, पाळीव जनावरांना आणि शेतीतील मित्रकीटकांना घातक आहेत असा जहरी प्रचार करतात. बिगरशेती समाजात, विशेषत: नागरी उच्चभ्रू समाजात पेस्ट कंट्रोलच्या नावाने हीच रसायने सर्रास व मनमुराद वापरली जातात, त्याविरुद्ध मात्र ही मंडळी ब्रसुद्धा काढीत नाहीत.
महत्त्वाची गोष्ट अशी की, रसायनांच्या क्षेत्रात एक परमाणू निर्माण करणेसुद्धा अत्यंत दुरापास्त असते. त्यामुळे अगदी सरकारी संशोधन संस्थांतसुद्धा या क्षेत्रात प्रचंड अज्ञान आढळते. सरकारच्या जोडीला स्वयंसेवी संघटना अनेक तऱ्हांनी विषारी प्रचार करतात. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे केरळ राज्यात 'एन्डोसल्फान' या औषधाची काही प्रदेशांत काजूच्या बागांवर हवाई फवारणी करण्यात आली. या फवारणीमुळे या भागात अनेक आजार पसरले असा प्रचार स्वयंसेवी संघटनांनी केला. त्यांनी डॉक्टर लोकांच्या फौजाच्या फौजा वापरून शेतकऱ्यांकडून आणि सामान्य नागरिकांकडून 'आपल्याला या हवाई फवारणीमुळेच वेगवेगळे आजार झाले' असे लेखी लिहून घेतले. प्रत्यक्षामध्ये या आजारांचा आणि एन्डोसल्फानच्या फवारणीचा काहीही संबंध नव्हता; त्यातील पुष्कळसे आजार हे आनुवंशिक असल्याचे आता सिद्धही झाले आहे. या विरोधाचे खरे कारण हे आहे की एन्डोसल्फानच्या उत्पादनात भारत एक क्रमांकावर आहे आणि युरोपीय देशांना त्याच्या उत्पादनात स्वारस्य उरलेले नाही.
बीटी कापसाच्या बियाण्याबद्दल असाच वाद या स्वयंसेवी संघटनांनी रंगवला आहे. बीटी बियाण्यांमुळे जनावरे मरतात, पिकाचे उत्पादन कमी येते असा खोडसाळ प्रचार या संघटनांनी चालवला आहे. वास्तविक पाहता बीटी बियाण्याच्या वापरानंतर भारत आता कापसाच्या उत्पादनाच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर जाऊन बसला आहे. त्याखेरीज भारतातील कापसाच्या धाग्याच्या लांबीतही सुधारणा झाली आहे. गमतीची गोष्ट अशी की, पर्यावरणाच्या नावाने रासायनिक औषधांविरोधी मोहिमा राबविणारी ही मंडळी बीटी वाणांच्या पिकांवर ही औषधे वापरावी लागत नाहीत तरी विरोध करीत आहेत. शेतीला जितके खाली बुडवावे तितका कारखानदारीस फायदा होतो. शेती फायद्याची झाली म्हणजे कच्चा माल महाग होतो आणि लोकांना खाण्यासाठी लागणारे अन्नधान्यही अधिकाधिक महाग होते. साहजिकच, कारखानदारी क्षेत्राचा फायदा करून देण्याकरिता शेती तोटय़ात ठेवली जाते.
शेतीला तंत्रज्ञानाच्या बाबतीत मागासलेले ठेवण्यात कोणता हेतू असावा? कारखानदारीच्या आंतरराष्ट्रीय स्पध्रेत अमेरिका वगरे राष्ट्रांत औषधांच्या कारखानदारीच्या पलीकडे मजल मारून आता ते जनुकशास्त्राधारित जैविक शेतीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. या जैविक शेतीला औषधांची गरज खूपच कमी प्रमाणात असते. यामुळे, युरोपात तयार होणाऱ्या औषधी उत्पादनांचा वापर अत्यंत कमी होतो. या दोन उद्योगांतील स्पध्रेमुळे युरोपीय देशांतील औषधींचे कारखानदार भारतासारख्या भणंग देशातील स्वयंसेवी संघटनांना करोडो रुपयांचे साहाय्य देऊन त्यांच्यामार्फत जैविक शेतीविरोधी प्रचार घडवून आणतात.
गमतीची गोष्ट अशी की, या कारस्थानामध्ये केवळ स्वयंसेवी संघटनाच नव्हे तर त्याबरोबर वेगवेगळ्या संशोधन संस्थाही सामील आहेत आणि त्यांनी दिलेल्या बनावटी अहवालांच्या आधाराने वेगवेगळ्या न्यायसंस्थासुद्धा, या ना त्या कारणांनी, शेतकऱ्यांविरुद्ध निर्णय देतात. या ना त्या कारणाने स्वयंसेवी संघटना, संशोधन संस्था आणि न्यायसंस्थादेखील शेतकऱ्यांविरुद्धच्या या कटात सामील होऊन त्याला जमीनदोस्त करतात ही सत्यस्थिती आहे. या सर्व कारवायांमागे, केवळ भारतीय शेतकऱ्याचे नुकसानच नाही तर हेतुपुरस्सर काही शत्रुराष्ट्रांचा फायदा करून देण्याचेही कुटिल कारस्थान असावे. सध्याची परिस्थिती अशी आहे की भारतात निरोगी टोमॅटो जवळजवळ पिकतच नाही. जो टोमॅटो उचलून पाहावा तो कोणत्या ना कोणत्या भागात किडलेलाच असतो. यावर तोडगा म्हणून GM टोमॅटोचे बियाणे विकसित करण्यात आले. अद्भुत गोष्ट अशी, की जे भारत सरकार देशात GM अन्नास प्रतिबंध करते तेच सरकार चीनमध्ये या क्षेत्रात झालेल्या प्रगतीचे तोंड भरून कौतुक करते. कापसाच्या बाबतीत हीच परिस्थिती आहे. साऱ्या जगात बीटी कापसाचा खप वाढतो आहे; परंतु आपले शासन बीटीविरोधी प्रचार करणाऱ्या स्वयंसेवी संघटनांना उदंड हस्ते विदेशी मदत मिळू देते. आपल्या देशातील शेतकऱ्यांना चांगले भाव मिळण्याची शक्यता असताना त्या मालावर निर्यातबंदी घालायची आणि कांद्यासारख्या वस्तूवरही, शेतकऱ्यांना तोटा होत असताना त्याच्याही निर्यातीवर र्निबध लादायचे, हा सर्व शेतकरीद्वेषाचाच प्रकार आहे. सरकारचा हा शेतकरीद्वेष केवळ आर्थिक क्षेत्रापुरताच आहे, असे नाही तर तंत्रज्ञानाच्या बाबतीतही तितकाच प्रबळ आहे हेच खरे.
****************************लेख समाप्त****************************************

राजेश घासकडवी Thu, 04/09/2014 - 09:02

In reply to by मन

'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले' 'ज्याने या क्षेत्रात काम केलं आहे त्याच्या मताला अधिक किंमत' यावरून नुकतीच झालेली चर्चा आठवली. शरद जोशींनी गेली कित्येक दशकं शेतकऱ्यांसाठी लढा दिलेला आहे. तेच 'बीटी कापूस फायद्याचा आहे... जीएम बियाणांचा फायदा होतो' वगैरे म्हणत आहेत. हम्म्म्म...

ऋषिकेश Thu, 04/09/2014 - 09:13

In reply to by मन

प्रश्न साधे आहेत आणि सरळ आहेत:

१. अधिक अन्नाचं उत्पादन का करायचं आहे? अन्नाची कमतरता आहे म्हणून की व्यापार म्हणून?
२. जर अन्नाची कमतरता आहे म्हणून हे आवाहन आहे तर ती कमतरता कशामुळे आहे कमी उत्पादनामुळे की वितरणदोषांमुळे?
३. जर उत्पादन वाढवून साठा व वितरण तसंच कुचकामी राहिलं तर या अतिरिक्त उत्पादनाचा फायदा काय?
४. संभाव्य धोका लक्षात घेता (जो शरद जोशींना अमान्य आहे - पण त्यांचं मत हे त्यांचं आहे म्हणून स्वीकारण्यात काहीच हशील नाही. त्यांनी आपल्या म्हणण्याला किमान विरोधकांइतकेही पाठबळ लेखात दिलेले नाही. मी म्हणतोय म्हणून मान्य करा हे पटत नाही) वितरण, साठ्याची सोय दुरुस्त न करता इतक्या घाईने जीएम व बीटी पिकांना इथे का येऊ द्यावे?
५. जर या पिकांमुळे शेतकर्‍यांचे काही नुकसान/अन्याय झाले तर त्यांची सुरक्षा करणारे कायदे अस्तित्त्वात आहेत का? नसल्यास यांना परवानगी देण्याआधी तसे कायदे अस्तित्त्वात यायची गरज नैये का?
६. जर उत्पादन व्यापार म्हणून करायचं आहे तर त्यासाठी भारतातील जमिनच हवी असे बंधन का?

बाकी, युपीए सरकारमध्ये जयराम रशेम पर्यावरण मंत्री असेपर्यंत यावर बरीच चिकित्सा झाली. पुढे श्रीमती नटराजन, विरप्पा मोईली नी आता जावडेकर सगळा आनंदी आनंद आहे! यात कोणत्याही पूर्वतयारीशिवाय, आवश्यक त्या लीगल फ्रेमवर्कशिवाय ही पिके भारतात येतील याची पुन्हा "भिती"च वाटते :(

सविता Thu, 04/09/2014 - 12:43

In reply to by ऋषिकेश

येता जाता भिती जरा अतीच होतेय असं वाटत नाही का? "भित्या पाठी ब्रम्हराक्षस" वगैरे वगैरे आठवले.

बाकी

२. जर अन्नाची कमतरता आहे म्हणून हे आवाहन आहे तर ती कमतरता कशामुळे आहे कमी उत्पादनामुळे की वितरणदोषांमुळे?
३. जर उत्पादन वाढवून साठा व वितरण तसंच कुचकामी राहिलं तर या अतिरिक्त उत्पादनाचा फायदा काय?
५. जर या पिकांमुळे शेतकर्‍यांचे काही नुकसान/अन्याय झाले तर त्यांची सुरक्षा करणारे कायदे अस्तित्त्वात आहेत का? नसल्यास यांना परवानगी देण्याआधी तसे कायदे अस्तित्त्वात यायची गरज नैये का?

२ आणि ५ पूर्ण पटले,३ अंशतः
पण

१. अधिक अन्नाचं उत्पादन का करायचं आहे? अन्नाची कमतरता आहे म्हणून की व्यापार म्हणून?
६. जर उत्पादन व्यापार म्हणून करायचं आहे तर त्यासाठी भारतातील जमिनच हवी असे बंधन का?
४. वितरण, साठ्याची सोय दुरुस्त न करता इतक्या घाईने जीएम व बीटी पिकांना इथे का येऊ द्यावे?

हे विशेष पटले नाहीत.

जाता जाता : माझा बीटी ला पाठिंबा नाही. धुवून निघून जाणार नाहीत अशी किटकनाशके असलेले धान्य मला रिस्की वाटते.

पण ज्या प्रकारचा गदारोळ बीटी वरून चालला आहे ते बघता अगदी सहजपणे हे इकडे येईल असेही वाटत नाही

बॅटमॅन Thu, 04/09/2014 - 12:49

In reply to by सविता

येता जाता भिती जरा अतीच होतेय असं वाटत नाही का?

असं कसं असं कसं असं कसं? आम्हांला भीती वाटते म्हणून बोलायचंसुद्धा नाही की काय? :(

शिवाय त्या भीतीला असं जजमेंटल होऊन उडवून लावणं हेही इग्नोर करण्यालायकच आहे.

बॅटमॅन Thu, 04/09/2014 - 13:56

In reply to by सविता

१. चिंभारा न्हवे, चिभांरा.

२. विचारस्वातंत्र्याच्या बाजूने बोलले तरी लोक भडकाऊ श्रेणी देतात हे अतिशय उद्बोधक वगैरे आहे.

ऋषिकेश Thu, 04/09/2014 - 13:19

In reply to by सविता

बीटी चाचण्यांना मंजूरी मिळाली आहे. सहजपणे की कसे ते माहिती नाही बाजारात ही पिके दिसणे फार दूर (या ४-५ वर्षात) नाही असे वाटते.

बाकी भिती वाटणे व्यक्तीसापेक्ष आहे, तुम्हाला सारखी कशी वाटते? हे विचारण्यास हशील नाही.
दरवेळी त्या त्या भितीची कारणे मी सविस्तरपणे सांगतो. अनेकदा भिती बाळगणे कसे गैर आहे हे मला कोणीही सांगत नाही कि ती कारणे खोडत नाही.
नुसतेच माझ्या भितीवर टिका/टिंगल केल्याने कारणे दूर होतील किंवा भिती कमी होईल असा समज असेल तर तो अर्थातच चुकिचा आहे.

कारणे देऊनही माझी भिती बिनबुडाची/निराधार आहे असे वाटल्यास/पटल्यास फारतर मला मानसिक विकार आहे समजा नी सोडून द्या! हाकानाका!

मन Thu, 04/09/2014 - 12:56

In reply to by ऋषिकेश

क्र १ ४ ६ ह्याबद्दल :-
"शेतकर्‍याला उत्पादन करायचं आहे; म्हणून करु दिलं पाहिजे " ही सरळ साधी भूमिका मला पटते.
उत्पादन करायचय का व्यापार का अजून काही हे काहीही न सांगण्याचं शेतकर्‍याला स्वातंत्र्य हवं.
"मला तुझी उत्तरं पटू देत. मग तू ते करायचस की नाही हे मी ठरवीन" ही लायसन्स राज मधली भारत सरकारची भूमिका उचित नाही.
शेतकर्‍याला ती गोष्ट करायची आहे, म्हणून तो ती करतो आहे; इतकं हे सरळ साधं हवं.
हां, ह्यामुळं दूरगामी/मूलभूत असे पर्यावरणास धोके होत असतील किंवा कुणाच्या तब्य्तीस अपाय होत असेल; तर गोष्ट वेगळी. (उदा :- इथाइल कार्बाइड का काहीतरी कार्सिओजनिक केळी व लिंबाला टोचायला सक्त मनाइ आहे म्हणे.)

ऋषिकेश Thu, 04/09/2014 - 13:14

In reply to by मन

"मला तुझी उत्तरं पटू देत. मग तू ते करायचस की नाही हे मी ठरवीन" ही लायसन्स राज मधली भारत सरकारची भूमिका उचित नाही.
शेतकर्‍याला ती गोष्ट करायची आहे, म्हणून तो ती करतो आहे; इतकं हे सरळ साधं हवं.
हां, ह्यामुळं दूरगामी/मूलभूत असे पर्यावरणास धोके होत असतील किंवा कुणाच्या तब्य्तीस अपाय होत असेल; तर गोष्ट वेगळी. (उदा :- इथाइल कार्बाइड का काहीतरी कार्सिओजनिक केळी व लिंबाला टोचायला सक्त मनाइ आहे म्हणे.)

हा प्रतिसाद आपल्या स्वतःतच विरोधाभास निर्माण करतो असे वाटत नाहीये का?
दूरगामी/मूलभूत असे पर्यावरणास धोके होत असतील किंवा कुणाच्या तब्येतीस अपाय होत असेल हे कोणी ठरवायचं?

फक्त "शेतकर्‍याला हवं म्हणून त्याला हवं तसं पिक काढू द्यायचं?" की "पर्यावरणाचा नाश होईल की नाही याचा पुरेसा अभ्यास न झाल्याने तसेच याच्याशी संबंधित कायदेशीर व आर्थिक बांधिलकीचे मुद्दे निकालात न निघाल्याने सध्या केवळ हे पर्याय उपलब्ध आहेत यापैकी तु कोणताही निवड. वरील बाबतीत शहानिशा झाली की हा जीएम पिकांचा किंवा बीटी पिकांचा पर्यायही उपलब्ध होऊ शकेल, त्या सबुरीत तुमचा तसेच सगळ्यांचाच दूरगामी फायदा आहे" हे तुम्हाला योग्य वाटतं?

मन Thu, 04/09/2014 - 13:45

In reply to by ऋषिकेश

प्रतिसाद समजला नाही.
आणि माझ्याही प्रतिसादात मी प्रश्न क्रमांक चुकीचे टंकले होते.
मी पुढील प्रश्नांबद्दल म्हणत होतो :-

१. अधिक अन्नाचं उत्पादन का करायचं आहे? अन्नाची कमतरता आहे म्हणून की व्यापार म्हणून?
२. जर अन्नाची कमतरता आहे म्हणून हे आवाहन आहे तर ती कमतरता कशामुळे आहे कमी उत्पादनामुळे की वितरणदोषांमुळे?
३. जर उत्पादन वाढवून साठा व वितरण तसंच कुचकामी राहिलं तर या अतिरिक्त उत्पादनाचा फायदा काय?

उत्पादन का करायचं आहे ?
कोनतही उत्पादन ज्या कारणासाठी करतात, त्याच कारणासाठी करायचं आहे.
मला करावंसं वाटतं म्हणून मला उत्पादन करायचं आहे; असं शेतकर्‍याला म्हणता यावं.

ऋषिकेश Thu, 04/09/2014 - 13:49

In reply to by मन

हे एकीकडे म्हणताना तुम्हीच पुढे म्हणता 'ह्यामुळं दूरगामी/मूलभूत असे पर्यावरणास धोके होत असतील किंवा कुणाच्या तब्य्तीस अपाय होत असेल; तर गोष्ट वेगळी'
आता हा धोका आहे की नाही अपाय/आहे की नाही यावर बराच मोठा वाद चालु आहे, अभ्यास चालु आहे, दावे प्रतिदावे चालु आहेत, कोर्टात केस आहे इत्यादी.
एकमत होईपर्यंत थांबा असं म्हणणं नाही, सभाव्य हानीला रोखु शकेल इतपत पुरेसं कुशनिंग निर्माण होईपर्यंत सबुरीनं घ्या या सांगण्यात काय गैर आहे?

जितका उशीरा निर्णय घेऊ तितका कोणत्या तरी कंपनीचा कित्येक कोटींचा टर्नओव्हर बुडेल हे मला घाईने निर्णय घेण्यास पुरेसे कारण वाटत नाही

मन Thu, 04/09/2014 - 18:28

In reply to by नितिन थत्ते

माझ्या माहितीप्रमाणे ते शेतकरी संघटनेतील ज्येष्ठ पदाधिकारी आहेत. शेतकरी संघटनेचे शरद जोशी हे अध्यक्ष.
मुट्यांच्या लिखाणातही संघटनेचा गौरवपर उल्लेख असतो.
मुट्यांचे school of thoughts शेतकरी संघटनेच्या तत्वांशी मिळतेजुळते असणे स्वाभाविक आहे.

नितिन थत्ते Thu, 04/09/2014 - 19:46

In reply to by मन

हो. ते ठाऊक आहे.

पण ते प्रत्यक्ष शेती करणारे शेतकरी आहेत. त्यांच्या मताला निदान आपल्या सर्वांच्या मतापेक्षा अधिक मूल्य असायला हवे. (कारण आपण कोणीच प्रत्यक्ष शेती केली नाही. आपल्यातल्या कोणी शेती केली असेल तर हा मुद्दा गैरलागू).

नगरीनिरंजन Thu, 04/09/2014 - 20:53

In reply to by मन

लॉजिक अत्यंत रोचक आहे. जीएम पिकांमुळे सुरुवातीची काही वर्षे फायदा होतो हे कोणीच नाकारत नाहीय, पण नंतर काय?
या लोकांनी शेती केली आहे म्हणून त्यांनी सध्याचा फायदा बघून मत बनवले नाही हे कशावरुन?
आणि मग ते आचार्य समितीचा अहवाल वगैरेला काहीच मूल्य नाही का? नसेल तर कशाला खटाटोप?

शिवाय वंदना शिवांनी आपण विरुद्ध ते अशी मांडणी केलेली घासकडवींना आवडली नाही (त्याबद्दल आक्षेप नाही) पण शरद जोशींच्या लेखात शेतकरी विरुद्ध स्वयंसेवी संघटना, पेस्टिसाईड इंडस्ट्री, डॉक्टर्स, सरकार, परकीय शक्ती म्हणजे थोडक्यात भारतीय शेतकरी विरुद्ध सगळे अशी आक्रस्ताळी मांडणी आहे ते आक्षेपार्ह वाटले पाहिजे.

म्हणजे शॉर्ट टर्म फायदा होतो ही आधीच दोन्ही बाजूंना मान्य असलेली गोष्ट सोडल्यास त्यांच्या मतात अधिक मूल्यवान ते काय आहे?

राजेश घासकडवी Fri, 05/09/2014 - 05:31

In reply to by नगरीनिरंजन

शरद जोशींची मांडणी आक्रस्ताळी आणि कॉन्स्पिरसी थियरीवाली आहे हे मी नाकारलेलं नाहीच. किंबहुना त्यांचं म्हणणं बरोबर आहे असंही म्हटलं नाही. माझा प्रश्न असा होता की ऑथॉरिटी फिगर म्हणून त्यांचं म्हणणं सकृत्दर्शनी मान्य करावं का? शेतकऱ्यांचं हित मनात धरून कळकळीने चळवळ करणारा म्हणून त्यांच्या चुकीच्या विधानांनाही चालवून घ्यावं का? माझं दोन्हीला उत्तर नाही असंच आहे. मात्र त्यांची शेतकऱ्यांना फायदा मिळण्याबद्दलची विधानं विचारार्ह आहेत का? माझ्या मते आहेत.

नगरीनिरंजन Thu, 04/09/2014 - 18:36

In reply to by मन

१९६०च्या दशकात भारतात जी हरितक्रांती झाली ती प्रामुख्याने पाणी, रासायनिक खते, संकरित बियाणी आणि त्या पिकांवर वारंवार प्रादुर्भाव होणाऱ्या रोगांवरील व किडींवरील औषधे या सर्वाच्या संतुलित वापरामुळे झाली.

सध्याची परिस्थिती अशी आहे की भारतात निरोगी टोमॅटो जवळजवळ पिकतच नाही. जो टोमॅटो उचलून पाहावा तो कोणत्या ना कोणत्या भागात किडलेलाच असतो

http://www.thehindu.com/news/national/bt-cotton-ineffective-against-pest-in-parts-of-gujarat-admits-monsanto/article183353.ece/

--------—-----------

शेतकरी कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करतात असे आम्ही समजत होतो. शरद जोशींसारखे अर्थतज्ज्ञ नसते तर सरकार जीएम वापरु देत नाही म्हणून आत्महत्या होत आहेत हे कधीच कळले नसते. शिवाय जीएम कापूस वापरणार्‍या पट्ट्यातच कोट्यवधी रुपये खर्चून आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांची फौज या स्वयंसेवी संस्थांनी उभी केली आहे हे सत्यही कळले नसते.
भारताची इतकी प्रचंड प्रगती होत आहे की भारताला खाली कसे खेचावे याचीच काळजी युरोप-अमेरिकेला लागून राहिली आहे आणि त्यात आपले हरामखोर सरकारही सामील आहे म्हणजे काय म्हणावे? शरद जोशींनी डोळे उघडले आमचे गंमतीची गोष्ट सांगून.

स्वधर्म Fri, 05/09/2014 - 00:12

मी पुण्यातल्या सेंद्रीय शेती अभ्यास गटाच्या काही बैठकांना गेलो होतो. तिकडे अर्थातच या विषयाबद्दल तीव्र विरोध आहे. जी एम पिके आणण्यात काही अजून माहिती नसलेले धोके असू शकतातच. या पार्श्वभूमीवर त्याची घाई करणे खचितच योग्य वाटत नाही. मूळात हे सगळे आपण (शेतकरी, ग्राहक व कंपन्या) आधिक फायदा मिळवू या उद्देशाने चालू आहे. त्यात निसर्ग ही एक निविष्ठा (रिसोर्स) मानून त्याचे आपल्या व्यापारी फायद्यासाठी आधिकात आधिक शोषण कमीत कमी वेळात कसे करता येईल हा दृष्टीकोन आहे. पण निसर्गाला काहीच फरक पडणार नाही. त्याला पैसा, फायदा, अगदी काळही कळत नाही. उद्या जर या जनुकांनी निसर्गचक्रात काही अपरिवर्तनीय बदल केले, तर त्याची जबाबदारी घ्यायला आपण नसणारच आहोत. निसर्गात एक नवी प्रणाली (बिघाड) येईल, ती टिकेल वा टिकणार नाही. उद्या इथे वाळवंट झाले, तर त्यात तगणारे जीव काहीशे वर्षानी तयार होतीलही.

*One of the major misconceptions of modern scientific and industrial community is that they think we can manage anything. It doesn't matter whether we understand it today or not.

अशा अर्थाचे डेव्हीड ऑर या विचारवंताचे मत आठवले.

-स्वधर्म

नगरीनिरंजन Fri, 05/09/2014 - 05:15

In reply to by स्वधर्म

स्वतःच्या धाग्यावर श्रेणी द्यायची सोय नाही, अन्यथा प्रतिसाद आणि ऑर यांच्या वाक्याला मार्मिक अशी श्रेणी दिली असती.

माणसांच्या आयुष्य, भावभावनांसकट सगळी सृष्टीच मॅनेज करण्याचा जो अहंकारी प्रयत्न आहे त्यालाच विरोध आहे. विरोध फक्त जीएम फूडला नाही. विरोध इंडस्ट्रीयल सिव्हिलायझेशनला आहे. सगळं मॅनेज करण्यात आलेल्या प्राथमिक आभासी यशालाच प्रगती म्हणण्याला आहे आणि अशी प्रगती झाली म्हणून तुम्हाला जगायला आणि पोटभर खायला मिळतंय असं म्हणण्याला आहे. स्वतःला लिबरल समजणार्‍या आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याची खूप काळजी करणार्या लोकांना आपलं सगळं आयुष्य दुसर्‍या कोणीतरी मॅनेज केलेलं कसं काय आवडतं हा मोठा प्रश्न आहे.
याच गोष्टीसाठी देवाच्या पारंपारिक कल्पनेला विरोध आहे. माणसाचा मेंदू मोठा असल्याने माणसाची बुद्धिमत्ता इतर प्राण्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे पण बुद्धिमत्तेचा वापर करण्याची बुद्धिमत्ता सगळ्यांना आहे का याबाबत साशंक आहे. बरेच लोक देवावर विश्वास ठेवतात. आकाशात बसलेले कोणीतरी आपलं आयुष्य मॅनेज करतंय अशी कल्पना लोकांना स्वीकारार्हच नव्हे तर सुखावह वाटते. मग येताजाता अस्तित्वात नसलेल्या त्या आकाशातल्या मॅनेजमेंटपुढे हात जोडून चांगलं मनासारखं घडायची प्रार्थना करायची आणि शेवटी घडायचं ते घडल्यावर देवाची इच्छा म्हणून गप्प बसायचं. जर शेवटी सगळी देवाचीच इच्छा आहे तर मग प्रार्थना केली न केली काय फरक पडतो?
या देवभोळ्या माणसांना नावं ठेवणारे आणि स्वतःला पुरोगामी समजून तंत्रज्ञानाची पूजा करणारे काहीही वेगळे नाहीत. मुळात शेतीला सुरुवात झाली तेव्हाच निसर्गाच्या व्यवस्थापनेला सुरुवात झाली आणि आता तर त्याचा कळस होऊ पाहतोय.
नद्या, तळी, जंगले, डोंगर यांचं खाजगीकरण (किंवा राष्ट्रीयीकरण), हे जनुकांचे व्यवस्थापन, माणसांच्या आयुष्याचे एकसाचीकरण आणि विचारहीन कंझम्शनमधून प्रतिष्ठेची व सामर्थ्याची भूक भागवण्याची लावलेली सवय या सगळ्यालाच विरोध आहे.

अतिशहाणा Fri, 05/09/2014 - 05:42

In reply to by नगरीनिरंजन

प्रतिसादाच्या आशयाशी सहमत आहे

नितिन थत्ते Fri, 05/09/2014 - 06:30

In reply to by नगरीनिरंजन

>>मुळात शेतीला सुरुवात झाली तेव्हाच निसर्गाच्या व्यवस्थापनेला सुरुवात झाली आणि आता तर त्याचा कळस होऊ पाहतोय.

एवढे म्हटल्यावर फक्त तपशीलातच फरक उरतो.

रोचना Mon, 15/09/2014 - 16:05

In reply to by नगरीनिरंजन

माणसांच्या आयुष्य, भावभावनांसकट सगळी सृष्टीच मॅनेज करण्याचा जो अहंकारी प्रयत्न आहे त्यालाच विरोध आहे. विरोध फक्त जीएम फूडला नाही. विरोध इंडस्ट्रीयल सिव्हिलायझेशनला आहे. सगळं मॅनेज करण्यात आलेल्या प्राथमिक आभासी यशालाच प्रगती म्हणण्याला आहे आणि अशी प्रगती झाली म्हणून तुम्हाला जगायला आणि पोटभर खायला मिळतंय असं म्हणण्याला आहे.

१००% सहमत.

रोचना Mon, 15/09/2014 - 15:58

In reply to by स्वधर्म

पुण्यातील एका नातेवाइकासाठी या अभ्यास गटाबद्दल माहिती हवीये. इथे पत्ता-फोन नंबर द्यायचे नसल्यास व्यनी ने प्लीज कळवा.

रोचना Mon, 15/09/2014 - 16:04

आजच हा लेख वाचला, या धाग्याची आठवण झाली.

Soil degradation in enormous tracts of land, unprecedented deforestation to claim more land for farming, rising chemical costs to farms and resultant farmers’ debts, loss of biodiversity through mono-cropping, increasing resistance of pests to poison and the appearance of “super-pests”—these are all facts that no community can choose to ignore any more. However, the successful marketing of the chemical wastes of war (ammunition factories re-invented themselves as chemical factories after World War II ended) (2) lets industrial agriculture continue unhindered. So even though small farmers grow 70% of the world’s food, seed and chemical corporations continue to propagate the myth that corporate farming is the only way to feed the world’s growing populations. Even though there are sufficient calories for everyone on the planet, hunger is always a problem of distribution, and no manner of production will fix that problem. Corporate farming does not have the power to increase production sustainably and has no interest in bettering distribution systems, so when they talk about feeding the world, they are merely playing a psychological game with the minds of ordinary people—they are suggesting that whoever does not support chemical farming does not want to feed the hungry. It looks like it has been a successful strategy by means of which ten thousand years of sustainable agricultural practices in human history are losing out to about 50 years of chemical practices.

In doing our part as responsible consumers, we came to the realization that we were rather tired of that identity. After all, there was something distinctly passive about being a consumer—the very word necessitates a certain detachment from the realities of production, because it seems to indicate that we are opening our mouths willingly to whatever was being poured down our throats, and naively celebrating the mere choice of flavor for the same toxic mix. It did not matter, for example, if we were eating organic food if we had no part to play in how that food was being produced or transported to us. Although we were now less likely to support growers who were transporting manure on eighteen wheelers from Virginia to fertilize mono-cropping organic farms in California, we still needed to know who exactly was growing our food. What was the philosophy of this person? Did she care about the environment? Was he caring for his ecosystem? Would she think twice about using grow “organic” produce from hybrid or genetically modified seeds? Did he care how far his produce was being transported? In other words, we had to meet the farmer who was growing our fruits and vegetables (the farmer growing our grains was still oceans away). We soon found ourselves in a Community Supported Agriculture Farm about fourteen miles from where we lived, talking to a farmer who had quit a cushy engineering job to start a farm on family land. This 10 acre farm, which supplies chemical-free vegetables to over a hundred families from May to September, became the first place where we came face to face with the person who grew our food. In exchange of a very reasonable subscription (much cheaper than big organic stores), the farm allowed members to pick up their share of fresh produce every week. This was all about going as local and as low-energy as possible, because the CSA model avoids transportation and storage, and encourages seasonality. That summer was one of the most enlightening and happy times of our lives—we walked around the farm looking at things growing, talking about chemical-free growing and pest-control methods, picking and eating strawberry from the bushes, and admiring how children grew up in a farm. Here was a great model, a small-scale fix for big problems, our final inspiration to get involved in the community and be part of a local food system. It was time to tell people that they could change a lot of things by changing how they ate, and what could be a better place than where we grew up? It was time to go back home and get our hands dirty!