Skip to main content

पुरोगामी महाराष्ट्र

4 minutes

शाहु फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र मला अत्यंत प्यारा ! राष्ट्रगीत भुलून महाराष्ट्र गीतच चोवीस तास जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी कुठेही का न घोळवावे ? च्यामायला जे व्हयील ते व्हयील. असा मंगल विचार देखील हल्ली मनात जोरदार थैमान घालू लागला आहे. त्याला कारणंही वारंवार तशीच घडलीत. घडतात. अगदी सज्जड. खैरलांजी, सोनई, सातारा, रमाबाईनगर एक ना अनेक ! किती सांगावी आणि किती शोधावी ? एक अंदाज ? तर या प्यार्या महाराष्ट्र राज्यातील कोल्हापुर जिल्ह्यात घडलेली एक ताजी घटना या ऊन्हाळी सुट्टीत अनुभवली. कोल्हापुर जिल्ह्यातलं गाव . पावण्याच्या पोरीचं लग्न. रणरणत्या दुपारीच गावात पोचलो. गावाच्या एण्ट्रीतच सिंहाचे दात मोजणार्या संभाजी महाराजांचे भव्य पोस्टर दिसले. बाजूला या खालील ओळी.
'वाघाचे कातडे पांघरल्याने वाघ होता येत नाही
आणि मराठ्यांच्या नादी लागलात तर अंगावर कातडेही राहत नाही.'
खाली आण्णा, तात्या, दादा ,भैय्या चे डरावने फ़ोटो . आरं तिच्या बायली ! म्हणुन डराला सलाम ठोकत मी गावनक्षे
पाहत सरळ पुढे चालत चालत , चलाओ ना नैनोसे बाण रे, बाण लेले ना जान रे, चलाओ ना नैनोसे बाण रे या जोरदार घुमणार्या आवाजाच्या दिशेने गेलो. निळकंठेश्वर मंगल कार्यालय. गुंगीत नाचणारा जथ्था. मला पाहून नाचातला चंदरभौ हारकून जवळ आला आणि गळ्यात पडला. चंदरभौ मुंबईतला रहिवासी. चेंबूरचा जुना पँथर ! सहा फुट उच्चा , काळाकुळा, तोँडावर देवीचे वण , खतरा वासाचं कुठलं तरी अत्तर लावतो. ह्याच्या मायेच्या मिठीत अत्तर वासानंच गुदमरुन जीव जावा असलं ! मला पावण्याकडे घेऊन गेला. पावणा म्हणजे पडेल पक्षाचा प्रमुख , वधुपिता ! मला पाहून घाईत हासला, घाईत स्वागत केलं, घाईत खुष झाला आणि चढेल पक्षाच्या, म्हणजे वरपक्षाच्या दिमतीला घाईतच पळाला . एव्हाना जथ्याच्या नाचाला नादवाय हुड हुड दबंग दबंग हुड दबंग दबंग चालू झालेलं. साऊंड बाँक्सातून बहुत बायकी आवाजात सुचना येऊ लागल्या. हाँलमधे सगळ्यानी जमावे. नवरी मुलीस स्टेजवर आणावे. मुलीच्या मामाने स्टेजवर यावे. विधीची सुरुवात होत आहे. शांतता राखावी वगैरे वगैरे वगैरे ... बाहेरची गाणी बंद झाली. सब गोतावळा आत आला. पिले खाल्लेले भाद्दर बाहेरच गमज्या करु लागले. नाचातलं जवान टोळकं वर्हाड निरखू लागलं. नवरा नवरीची जोडी स्टेजवर आली. सिँहासन टाईप खुर्च्यावर बसली. सुचना देता देता, ऎकता ऎकता एका एकी साऊंड मुके झाले. अय काय झालं ? चा गलका कोपर्या कोपर्यातून घुमू लागला. लग्न लावणारा धम्मचारी शांत उभा राहिला. चढेल पक्ष प्रमुख म्हणजे वरपिता. आपली करारी नसलेली नेभळट मुद्रा उगाच करारी करु लागले. पडेल पक्ष प्रमुखाला , वधुपित्याला दाती व्हटी धरु लागले. माझ्या लेकाचं जोम न्हाई म्हणुन वरमाय जहरी खेद व्यक्त करु लागली. पडेल पक्ष सदस्य चंदरभौ उठला. चौकशा करु लागला. लाईट गेलीय का ? जनरेटर घावतय का ? वायर लीक झालीय का ? इत्यादी..साऊंड मुके होण्यास प्रबळ कारण नसल्याने साऊंडाचा मुकेपणा चंदरभौला चिड आणू लागला. एवढ्यात चार दांडगे स्टेजवर चढले. धम्मचार्याला घेरलं. अंगाला हात न लावता त्याला असंच बिना साऊंडाचं लग्न लावाय सांगितलं. चंदरभौ स्टेजवर गेला. चंदरभौ म्हटला हाँलचे पयशे किल्लेर केलेत. लाईट गेल्याली नाय. मग सिस्टिम बंद का किलीय ? चारातला एक दांडगेश्वर म्हटला गावात पयल्यापासूनच बुध्दातली लग्न माईकवर लावू देत नाहीत. का असं विचारल्यावर सांगितलं कोल्लापुरच्या आईचाच आदेश हाय. आदेश ? व्हाय आदेश. कवा दिला ? कुणाजवळ दिला ? गावच्या बामणाला दिष्टांत झालाय. सगळी पाळताव.
चंदरभौ म्हटला चला हाँलच्या मालकाकडं. दांडगेश्वर म्हटला गावच मालक हाय. चला ग्राम पंचायतीत. चला तर चला. हाँलच्या बाहेरच कार्यकारिणीतले दोन जाणते आणि एक गुर्जी भेटले. गारानं घालणं चालू झालं. ही लोक साऊंड लावा म्हणत्यात. कसा लावता यील ? का लावता येत नाय ? रीतीनं लावाय येत नाय. कसली रीत ? पयशे दिल्यावर रीतबित काय नाय. साऊंड लावायचा. नायतं आय झवून टाकतो येकेकाची. आईची परवानगी नाय . बुध्द वंदना आयकायची नसलं तर शेमणं घाल म्हणावं कानात ज्याला दिष्टांत दिलाय त्याचंच. पावणं तोँड संभाळा. तुमी गांड संभाळा हाणतोच येकायेकाची. आरं गोड परसंग हाय वाद करु नका. अय डंगर्या हू बाजूला. धरा रं रांडच्याला..येका बापाचं आसलाव तर या येक येक या...आयी झवतो..
चंदरभौला चारपाच लोकांनी मारला..त्याचे ओठ त्याच्याच दातात रुतले. मुलीच्या बापाने सर्वाँच्या पाया पडून भांडण साँफ्ट केले. चंदरभौला भावनिक आवाहनाने माघार घ्यायला लावली. बिना माईकची , सिस्टीमची लग्न लागली. स्टेजवरच्या मंडळीनेच बुध्दवंदना ऎकली. कोल्हापुरच्या आईचे कान विटाळा पासून शाबूत राखण्यासाठी चंदरभौला रक्ताचं थोडं दान द्यावंच लागलं. जेवणाच्या पंगतीत एकट्या चंदरभौला तिखट नसलेली भाजी खूप तिखट लागत होती. मिठाच्या चिमटीवर चिमटी तो भाजीवर फिरवीत होता. त्यावेळेस मला तो जखमेवर मीठ चोळून वेदना ताजी ठेवणारा पँथर वाटला. एकाच वेळी अंगावर काटे, भरपूर वेदना आणि तरीही साजिंदा अभिमान मनात दाटत राहिला..

Node read time
4 minutes

किंबहुना सर्वसुखी Fri, 07/06/2013 - 00:33

अगदी जिवंत चित्रण..!!
जबरदस्त..जबरदस्त!!

राजन बापट Fri, 07/06/2013 - 00:44

जातिसापेक्ष समता, मागासवर्गीयांचे सबलीकरण इत्यादि इत्यादि प्रचाराच्या आवरणाखालची उघडीनागडी सच्चाई. या सच्चाईचा आणखी एक तुकडा.

प्रस्तुत संदर्भात पोलिसांकडे आणि मागासवर्गीयांकरता काम करणार्‍या संघटनांशी संपर्क का केला नाही ?

राजेश घासकडवी Fri, 07/06/2013 - 17:52

In reply to by राजन बापट

जातिसापेक्ष समता, मागासवर्गीयांचे सबलीकरण इत्यादि इत्यादि प्रचाराच्या आवरणाखालची उघडीनागडी सच्चाई. या सच्चाईचा आणखी एक तुकडा.

असंच म्हणतो. बाकी पोलिसांकडे का गेला नाहीत वगैरे प्रश्न पडले नाहीत. झालं इतकं वर्णन पुरेसं आहे.

'न'वी बाजू Sat, 08/06/2013 - 20:17

In reply to by राजन बापट

झाला प्रकार दुर्दैवी आणि असमर्थनीय, याबद्दल वाद नाही. परंतु,

प्रस्तुत संदर्भात पोलिसांकडे आणि मागासवर्गीयांकरता काम करणार्‍या संघटनांशी संपर्क का केला नाही ?

पोलीस अशा परिस्थितीत नेमक्या कोणत्या कलमाखाली यात हस्तक्षेप अथवा कारवाई करू शकले असते / करू शकले असते का, याबद्दल कुतूहल आहे. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

(पोलिसांमधील 'राजकीय इच्छाशक्ती'चा अभाव वगैरे शक्यता येथे गृहीत धरलेल्या नाहीत.)

राजन बापट Sat, 08/06/2013 - 20:47

In reply to by 'न'वी बाजू

>>>पोलीस अशा परिस्थितीत नेमक्या कोणत्या कलमाखाली यात हस्तक्षेप अथवा कारवाई करू शकले असते / करू शकले असते का, याबद्दल कुतूहल आहे. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

गृहितके :
१. लग्न समारंभाच्या प्रसंगी, त्या ठिकाणी लाऊडस्पीकरवर या समारंभात सामील झालेल्यांनी आपापल्या निवडीच्या गोष्टी वाजवणे हे कायदेशीर आहे.
२. असे करण्यात कुणाही बाहेरच्या घटकाला ढवळाढवळ करण्याचा हक्क नाही. अशी ढवळाढवळ म्हणजे वर उल्लेख केलेली कायदेशीर गोष्ट करण्याच्या लग्नसमारंभवाल्यांच्या अधिकाराची पायमल्ली आहे.

ही झाली तांत्रिक गृहितके. बाकी एक प्रशासकीय घटक म्हणून "विशिष्ट जातीयांना" उपरोक्त गोष्टींच्या बाबत नाकारलं जाणं ही बाब कायद्याच्या "जातिआधारित समतेच्या" काही मूलभूत तत्वांची राखण करणार्‍या पोलीसांच्या कक्षेत येत असावी असा माझा प्राथमिक अंदाज आहे.

ही झाली माझी सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातली समजूत. याची नेमकी कायदेशीर कलमे कुठली असतील याचं उत्तर माझ्याकडे नाही.

'न'वी बाजू Sat, 08/06/2013 - 21:19

In reply to by राजन बापट

...तत्त्वतः योग्यच आहेत, त्याबद्दल म्हणणे नाही. झाल्या प्रकाराचा मुकाबला करण्याची धारणाही रास्त, त्याबद्दलही वाद नाही.

फक्त, तो मुकाबला करण्याची दिशा, मार्ग उपयुक्त ('उपयुक्त'; 'योग्यते'बद्दल शंका नाही.) अथवा प्रभावी (किंबहुना शक्य) आहे किंवा कसे, याबद्दलचा प्रश्न आहे.

म्हणूनच, पोलिसांना या परिस्थितीत हस्तक्षेप करण्यास कायदेशीरदृष्ट्या वाव आहे किंवा कसे, असल्यास नेमक्या कोणत्या कलमांखाली आहे, आणि तसा तो नसल्यास याच्या निवारणाकरिता नेमके कोणते कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत (न्यायालयीन आदेश किंवा तत्सम?), याचा उहापोह व्हावा, या दृष्टीने ही पृच्छा.

'याचा मुकाबला व्हायला पाहिजे' असे म्हणणे सोपे आहे. 'तो का नाही केला' असा उपप्रश्नही त्यातून लीलया उद्भवू शकतो. परंतु, प्रत्यक्ष परिस्थितीत सापडलेल्या पक्षास त्या मुकाबल्याकरिता नेमके कोणते मार्ग उपलब्ध आहेत - आणि नेमके कोणते मार्ग उपलब्ध नाहीत, आणि का - याचे ज्ञान असणे आवश्यक असते. तेथे केवळ 'मुकाबला केला पाहिजे' ही भावना पुरेशी नसते. आणि केवळ तेवढ्या (रास्त) भावनेच्या आधारावर चुकीच्या दारी ठोठावण्यातून वेळ वाया घालवण्यापलीकडे काहीही साध्य होण्यासारखे नसते. म्हणूनच, 'अशा परिस्थितीस हाताळण्याचा नेमका सनदशीर आणि उपयुक्त मार्ग कोणता, त्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत, हे जर चर्चेतून निष्पन्न होऊ शकले, तर कळावे, एवढाच उद्देश.

(उत्तरे मला माहीत नाहीत. मात्र कुतूहल आहे. म्हणूनच जाणकारांना आवाहन.)

राजन बापट Sat, 08/06/2013 - 21:37

In reply to by 'न'वी बाजू

उत्तम प्रतिसाद.

वाघमारे यांनी या प्रतिसादाकडे लक्ष द्यावे हे सुचवतो.

'न'वी बाजू Sat, 08/06/2013 - 21:58

In reply to by राजन बापट

गृहितके :
१. लग्न समारंभाच्या प्रसंगी, त्या ठिकाणी लाऊडस्पीकरवर या समारंभात सामील झालेल्यांनी आपापल्या निवडीच्या गोष्टी वाजवणे हे कायदेशीर आहे.

इथवर ठीक.

२. असे करण्यात कुणाही बाहेरच्या घटकाला ढवळाढवळ करण्याचा हक्क नाही...

याबद्दल तत्त्वतः किंचित साशंक आहे. (झाला प्रकार योग्य नव्हता, हे मान्य करूनही.)

- समजा, तुमचा शेजारी त्याच्या घरी त्याला आवडणारी गाणी ऐकत आहे. (अंमळ मोठ्यानेच वाजवत असल्याकारणाने) ती तुमच्या घरी बसून तुम्हांसही ऐकू येत आहेत. काही कारणांमुळे तुम्हांस त्यांचा त्रास होत आहे. ('विटाळ होणे' वगैरेंचे समर्थन करण्याचा उद्देश नाही. तो प्रकार मानसिकतेच्या दृष्टिकोनातून असमर्थनीयच आहे.) अशा परिस्थितीत, ती गाणी तुम्हांस तुमच्या घरी बसून ऐकू येणार नाहीत अशा प्रकारे वाजवण्याची विनंती, प्रसंगी मागणी करण्याचा हक्क तुम्हांस आहे किंवा कसे? (कथित प्रसंगातील त्यापुढील अरेरावीचे, हाणामारीचे समर्थन नाही.)

अशी मागणी ही एका प्रकारे ढवळाढवळच नाही काय? नेमकी कोणत्या मर्यादेपर्यंत ढवळाढवळ करण्याचा हक्क त्रयस्थ अफेक्टेड पार्टीस असावा? ('अफेक्टेडनेस'चा वाजवीपणा हा मुद्दा तूर्तास बाजूला ठेवून?)

अशी ढवळाढवळ म्हणजे वर उल्लेख केलेली कायदेशीर गोष्ट करण्याच्या लग्नसमारंभवाल्यांच्या अधिकाराची पायमल्ली आहे.

अधिकाराची पायमल्ली आहे, हे मान्य. मात्र, कथित प्रसंगातील शेवटची मारामारी वगळता, 'गुन्हा' या सदरात मोडू शकेल, असे त्यात काही असावे, याबद्दल साशंक आहे. ('अधिकारांची पायमल्ली' आणि 'गुन्हा' या कायदेशीर दृष्ट्या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत, असे वाटते. चूभूद्याघ्या.) आणि म्हणूनच, (पुन्हा, शेवटची मारामारी वगळता) पोलिसांच्या अधिकारकक्षेत येऊ शकण्यासारखे यात कितपत असावे, याबद्दल कुतूहल आहे.

(शेवटची हाणामारी ही पोलिसांच्या अधिकारकक्षेत निश्चितच यावी. आणि त्याबद्दल - मारामारी होऊन गेल्यावर किंवा मारामारी नुकतीच सुरू झाली असता, किंबहुना प्रकरण हातघाईवर येत आहे अशी लक्षणे दिसू लागली असता - तक्रार करून तेवढ्यापुरता पोलिसी हस्तक्षेप अथवा कारवाई निश्चितच साधता यावी. मात्र, मूळ अडचणीच्या बाबतीत पोलीस प्रोअ‍ॅक्टिवली (मराठी?) काही करू शकतील किंवा कसे, याबद्दल खात्री नाही.)

सांगण्याचा मुद्दा, मुकाबला झाला पाहिजे, परंतु पोलीस हा याला प्रभावी मार्ग असेलच, असे नाही. याकरिता कोणता प्रभावी कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे, हे कळावे, म्हणून हा प्रश्नप्रपंच.

'न'वी बाजू Sat, 08/06/2013 - 20:29

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणजे असे बघा, बुद्ध हा (विष्णूचा) नववा अवतार म्हणायचा, परंतु यशोधरा ही काही (महा)लक्ष्मीची अवतार वगैरे नव्हे. आपल्या नवर्‍याने दुसरा पाट लावलेला कोठल्या बाईला खपेल? (मग भलेही पुढे तिला सोडून गेला तरीही?)

त्यामुळे, 'काही नाही ऐकायचं यांचं मला यापुढे!'* असे तिला वाटल्यास नवल ते काय?


* त्यापुढे, 'सौतन के संग रात बिताई, काहे करत अब झूठी बतिया' असेही तिने म्हटल्याबद्दलची कानगोष्ट ऐकिवात आहे. असो.

'न'वी बाजू Sat, 08/06/2013 - 20:55

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

...म्हणायला गेले, तर नेपाळचा राजादेखील स्वतःस विष्णूचा अवतार म्हणवून घेत असे. पुढे काय(काय) झाले?

(येथे बुद्धाची तुलना नेपाळच्या राजाशी करण्याचा हेतू नाही. बुद्ध हा एका अर्थाने 'नेपाळचा राजा' म्हणता येण्यासारखा असला, तरीही. सांगण्याचा मुद्दा, 'अवतार' वगैरे सगळे म्हणण्यापुरते, बकवास आहे. बुद्धाच्याच नव्हे, तर सगळ्याच अवतारांच्या बाबतीत. अन्यथा, 'एकपत्नीव्रत पाळणार्‍या रामाने पुढच्या अवतारात जाऊन सगळी कसर भरून काढली' असा काही(बाही) निष्कर्ष पचवून घेण्यास आपण तयार आहोत काय?)

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 08/06/2013 - 22:53

In reply to by 'न'वी बाजू

बुद्धवंदना चालणार नाही असं म्हणणारे हिंदूच असावेत. त्यांच्या धार्मिक ग्रंथांनुसार बुद्ध हा विष्णूचा नववा अवतार. जातीय उच्चनीचता, तुच्छता लपवण्यासाठी मात्र धार्मिक आवरण वापरणं हे धर्माच्या नावाखाली चालवलेलं ढोंगच. बुद्ध हा जर हिंदूंच्या विष्णूचा नववा अवतार असेल तर बुद्धवंदना ही विष्णूवंदनाच झाली. सगळे देव आपलेच तर मग अमक्या देवाची वंदना चालेल, तमक्याची चालणार नाही यातही फार अर्थ रहात नाही.

वरच्या कायदेशीर मुद्द्यांसमोर हा मुद्दा तसा मायनरच; पण ढोंग करताना ते किती बाजूंनी लंगडं आहे याचं आश्चर्य वाटलं.

'न'वी बाजू Sun, 09/06/2013 - 01:50

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बुद्धवंदना चालणार नाही असं म्हणणारे हिंदूच असावेत.

अर्थात.

बुद्ध हा जर हिंदूंच्या विष्णूचा नववा अवतार असेल तर बुद्धवंदना ही विष्णूवंदनाच झाली. सगळे देव आपलेच तर मग अमक्या देवाची वंदना चालेल, तमक्याची चालणार नाही यातही फार अर्थ रहात नाही.

"बुद्धवंदना चालणार नाही" असे म्हणणारे स्वतः होऊन थोडेच म्हणताहेत? तसे तर साक्षात महालक्ष्मी म्हणतेय; हे केवळ निरोप्याचे (अधिक एजंटाचे) काम करताहेत. सबब, जी काही आर्ग्युमेंटे करायची आहेत, जो काही पंगा घ्यायचा आहे, तो थेट महालक्ष्मीशी घ्या; एजंटाशी नडून काय उपयोग? डोण्ट शूट द मेसेंजर!

पण ढोंग करताना ते किती बाजूंनी लंगडं आहे याचं आश्चर्य वाटलं.

मग याहून वेगळे नेमके काय म्हणालो मी?

मैत्र Fri, 07/06/2013 - 13:20

वाचून विलक्षण त्रास झाला. विसुनानांचे वाक्य तर फार नेमके.
आईच्या नावाने काय काय दांडगाई होते आहे.

विषय भलतीकडे जाईल. पण बांगेला साउंड चालतो पण लग्नासाठी बुद्धवंदनेला नाही?
आणी माझा तर त्या बांगेच्या साउंडलापण किंचितही विरोध नाही. वाईट या अंतर्विरोधाचं वाटतं.

आणि तेही थेट सरकारी .. ग्रामपंचायतीतच असली वागणूक.. :(

............सा… Fri, 07/06/2013 - 17:50

राष्ट्रगीत भुलून महाराष्ट्र गीतच चोवीस तास जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी कुठेही का न घोळवावे ? च्यामायला जे व्हयील ते व्हयील. असा मंगल विचार देखील हल्ली मनात जोरदार थैमान घालू लागला आहे.

मला पाहून घाईत हासला, घाईत स्वागत केलं, घाईत खुष झाला

लेखनशैली भारी आहे तुमची. आवडते.

राजेश घासकडवी Fri, 07/06/2013 - 19:11

...आणि तालिबान्यांनी बुद्धाचे पुतळे नष्ट केले म्हणून आपण त्यांना असहिष्णु म्हणतो!

वरचं वाक्य लिहिलं आणि विचार केला की खरोखरच या गोष्टी तत्वतः सारख्याच आहेत का? माझ्या मते इथे असहिष्णुतेची जातकुळी एकच आहे. पण कुठच्या थराला जाणं होतं यातून त्या असहिष्णुतेमागे उभी असलेली ताकद दिसून येते. नवबौद्धांना धमकावणं ही एक गोष्ट झाली. ती निंदनीयच आहे. पण एका अर्थाने ती सॉफ्ट टारगेटं झाली. बुद्धमंदिरं उध्वस्त होतील का? मला शंका वाटते.

असो. पुन्हा, मला या लेखामागची भावना, आणि त्यात चित्रण केलेल्या अत्याचारांचं ट्रिव्हियलायझेशन करायचं नाही. मोठ्या परिप्रेक्ष्यात ठेवल्यामुळे काही गोष्टी लहान वाटतात. पण ऍब्सोल्यूटली विचार करताना त्या गर्हणीयच असतात. ही घटना तशीच आहे.

लेखाची मांडणी, शैली नेहेमीप्रमाणे उत्कृष्टच. पण ते जाणवण्याआधी प्रश्न जाणवतो, थेट भिडतो हे या लेखाच्या यशाचं गमक आहे.

नगरीनिरंजन Fri, 07/06/2013 - 19:29

जाऊ द्या, चालायचंच. कोणी जीवावर उदार होण्याइतकं महत्त्वाचं काही नव्हतं ना? मग द्या सोडून.

भडकमकर मास्तर Sat, 08/06/2013 - 00:15

तुमची लिहायची शैली आवडते.
वाचून खेद वाटतोच ( पण खेद वाटण्यापलीकडे काही करू शकत नाही याचा पुन्हा खेद वाटतो)...

तिरशिंगराव Sat, 08/06/2013 - 20:43

लेखन अस्वस्थ करणारे आहे. एकदातरी सर्वांनी मिळून यांच्या वाटेला जावं, मग बघुया कोणाचं कातडं अंगावर रहातं ते!

मी Sun, 09/06/2013 - 09:19

दिलेली गोष्ट वास्तव असली तरी इथे एक सत्य-घटना म्हणून लेखकाने ती मांडली आहे का? किंवा एक अती - लघु - कथेच्या माध्यमातुन लेखन झाले आहे?

तसे असल्यास वास्तवावर प्रतिसाद दिल्यामुळे लेखनाचा/शैलीचा निर्भेळ आनंद व त्याचे विश्लेषण दूरच राहिले आहे.

लेखकाचे प्रति-प्रतिसाद बघता वरील लेख माहिती देण्यापलीकडे सर्जनशीलतेचा एक अविष्कार म्हणून बघणे जास्त उचित राहील असे मला वाटते.

सहज Sun, 09/06/2013 - 09:27

१) एक वर्तूळ असे की ज्यात हा धर्माच्या नावाखाली उघड उघड भेदभाव, हक्क नाकारणे!

२) एक वर्तूळ असे की ज्यात हा मुळात लाउड स्पीकर प्रकारच नकोसा!

म्हणजे उद्या लाउड स्पीकर वाजवायला आता कुठे संधी मिळाली तर पुन्हा नवी कारणे देउन आमचा आनंद हिरावून घेणार असा प्रकार आलाच.

ज्याचे त्याचे वर्तूळ वेगळे!

अविनाशकुलकर्णी Tue, 11/06/2013 - 08:55

लेखन शैली मस्त ..पण

बामणाला दिष्टांत झालाय.... असे सांगितले व आपण विश्वास ठेवाला?? ्का ब्राह्मणाच्या आड लपुन तर हे धन+ तन दांडगे असे करत नसतिल??

लाऊड स्पिकर वर कर्कश्य आवाजातले नमाज चालतात देविला तर बुद्ध वंदना का नाहि चालणार?

सतीश वाघमारे Tue, 11/06/2013 - 16:03

In reply to by अविनाशकुलकर्णी

अविनाश कुलकर्णी करेक्ट मुद्दा , प्रश्न उपस्थित केलात. भूतकाळातले शोषक आणि वर्तमानातले शोषक जाती विचारांसह बदललेत. भूतकाळातल्यांनी आता वर्तमानात येऊन ठोकपणे त्यांच्या नावच्या बदनामीला व अशा प्रकारच्या कृत्यांना कृतीशील विरोध केला पाहिजे.

जयनीत Sun, 21/07/2013 - 20:00

देवबाप्पा लई मोठा!
सा-या विश्वाला साभळतो.
त्याच्या नावानी होणा-या असल्या चिल्लर अन्यायाकडे लक्ष देण्यासाठी टाईम नाही हो त्याच्या कडे.