शाळा: पर्यायी आणि पारंपारिक
ह्या धाग्याच्या निमित्त्याने माझे अनुभव. लेख छोटा करायचा प्रयत्न केलाय पण जमलेलं नाही परंतु मनने माझ्याशी बोलुन इथे लिहीलय त्याची पुनरावृत्ती टाळलीय.
काल परवा चक्क पाउस पडला. पाउस आला की मला शाळा आठवते. ते नविन दप्तर, नव्या वह्या पुस्तकांचा वास आणि हो "यावर्षी मी पहिल्या दिवसापासून अभ्यास करणार" हा पावसाळी अळंब्यांसारखा चारच दिवस टिकणारा निर्धार.
त्यावेळी शाळेत घालणं हे यावर फार खास उहापोह होत असे असं नाही. मात्र आता शाळा ठरवणॆ हे त्याआधीचे कामच जास्त किचकट झालेय. कारण शाळाचे प्रकार. खास करुन पारंपारिक आणि अपारंपारीक किंवा पर्यायी.
सकाळमधे लीला पाटील यांचे नाशकातल्या कोल्हापुरातील सृजन-आनंद बद्द्ल वाचून माहिती होते तश्या शाळा आपल्याकडे नाहीत म्हणून तो विचार नव्हत्ताच. माझी मुलीला नर्सरीत घालताना आम्हाला एका पर्यायी शाळेचा रेफरन्स मिळाला. तीन वर्षांपूर्वीच सुरू झाली होती. (म्हणजे शाळेचं वय सुद्धा माझ्या मुलीएवढंच).
आम्ही ज्या कारणांसाठी शाळा ठरवली ती कारणे..
(१) २० ते ३० मुलं आणि दोन शिक्षक एका वर्गात
(२) गृहपाठ नाही, वह्या-पुस्तकं शाळेत ठेवायची
(३) मुलांच्या आवडीला महत्व देणार. एखादं मुलं एखाद्या विषयात जास्त पुढे जाउ शकत असेल तर त्याला त्या विषयाच्या पुढच्या वर्गात बसू देणार. त्या विषयात त्याला अजून मटेरिअल उपलब्ध अरुन देणार.
(४) ठराविक मिनीटांचे बंधन असणार्या तासिका नाहीत
(५) शाळेत स्वीमिंग, जीम्नॅस्टीक्स वैगेरे असणार.
(६) प्रत्येक विद्यार्थ्याला कश्यात गती आहे त्याचा अभ्यास करून त्याचा चार्ट बनवणार. त्यानुसार त्या विद्यार्थ्यावर त्या विषयावर जास्त मेहनत घेणार इत्यादी
या गोष्टीं ऐकून आम्ही प्रभावित झालो. फीही अवास्तव नव्हती. ज्यांनी त्या शाळेबद्द्ल सांगीतलं त्यांचाही मुलगा त्याच शाळेत होता. फक्त शाळा इंग्लीश माध्यमाची होती ही एकच अडचण होती कारण आम्ही मुलीसाठी मराठी माध्यम ठरवलं होतं. मग एवढे फायदे सोडून माध्यमाचा हट्ट धरण्यापेक्षा तो हट्ट सोडूया असं ठरलं.
मुलगी शाळेत जाउ लागली. पहिलीपर्यंत तक्रार नव्हतीच पण नंतर काही गोष्टी खटकल्या.
(१) ती मराठी उत्तम वाचायची पण मराठीतून काही वाचायचं नाही अशी ताकीद तिला दिली गेली. तिच्या वाचनाचं कौतुक करुन ते झालं असतं तर "अपारंपारिक" या शब्दाला काही अर्थ होता.
(२) शाळा छोटी आणि वर्गात फक्त २० पर्यंत मुले यामुळे संचालकांच्या ओळखीचे बरेच जण होते आणि त्यांना पुढे केलं जायचं.
(३) स्वीमिंग, जिमनॅस्टीक या कल्पना कल्पनेतच राहिल्या. नेट क्रिकेट, आर्चरी आणि असे कुठले-कुठले वेगळेच खेळ दिले जायचे. कित्येक पालक कोच म्हणून आपला सहभागाचा हात द्यायला तयार होते पण तेही शाळॆनं नाकारलं.
(४) चौथीत शाळेनं स्कॉलरशीपला बसवलं. त्यासाठी रोजच्या आठ तासांव्यतिरिक्तचे वर्ग घ्यायचे. जो निव्व्ळ फार्स होता. याच वेळी आम्हा साताठ पालकांच्या लक्षात आलं की या मुलांना गणितात अजिबात गती नाही कारण शिकवणं व्यवस्थित नाही ,मुलांना लिखाणाची सवय नाही.
(५) ५ वी नंतर अभ्यास वाढलाय या नावाखाली मुलं आठही तास अभ्यासालाच जुंपली होती. फक्त निवडक मुलांनाच खेळायला जाता यायचं. पीटीचा तास हा बरेचदा वह्या पुर्ण करणं यासाठी वापरला जायचा. (शाळा अधिकृतपणे स्टेट बोर्डचाच अभ्यासक्रम शिकवत होती. पण ईतर बोर्ड्ची पुस्तकं वापरली जात.)
(६) शिक्षक सतत बदलत असायचे.
(७) लहान वर्ग, शाळेतच जेवण यामुळे दिवस एकसूरी होत.
(८) यामुळे मुलं घरी आल्यावर अतिशय उद्धट्पणे , चिडचिड करत असायची. आणि फक्त स्ट्रीट स्मार्ट झालीयत असं आम्हाला तरी वाटत होतं. मुलांमध्ये एकमेकांच्या घरी रहायला जाणं वैगेरे प्रकारामुळे छान मैत्री होती पण इतर शाळेतल्या मुलांप्रती एक तुच्छ्तेची भावना असायची जिला शाळेतून थोडा बढावा दिला जायचा हे नंतर नंतर लक्षात येउ लागले. ( "मुलं कुणाची --शाळेची" . अर्थात अशी भावना सगळ्यांची असते पण ह्या शाळेचा वेगळा परिसर, चौथीपर्यंत गणवेश नाही, दप्तर घरी नाही वैगेरे मुळे हे सिरियसली वाटायचं या मुलांना. त्यामुळे शालांतर्गत स्पर्धांमध्ये ही मुलं ईतर शाळांमधल्या मुलांशी बोलत नसतं. )
(९) पण लहान वर्ग, गृहपाठ नाही, आपली शाळा किती छान याचा सततचा मारा, शाळॆचं लोकेशन यामुळे मुलं शाळा सोडायला तयार नव्ह्ती.
(१०) मुलांना स्वत:ची अभ्यासाची पद्धत ठरवणॆ, स्वत:चा वेळ देणं या प्रकाराला जराही वाव नव्हता. सतत टीचर बरोबर.
पण चांगल्या गोष्टीही होत्या.
उदा.
(१) मुलांना रोजच्या बातम्या सांगायला सांगायचे.
(२) वेगवेगळ्या शब्दांची ओळख करुन द्यायचे. चौथीनंतर अश्या पाठ्येतर शब्दांची, कवितांची लिस्ट द्यायचे त्याच्या पाठांतराची वेगळी परिक्षा घ्यायचे.
(२) मुलांना परिक्षेचं वेळापत्रक दिलं जायचं नाही. आम्हालाही ते माहीत नसायचं त्यामुळे परिक्षेचा ताण असा नसायचा. ज्यादिवशी जो पेपर असेल त्याची वर्गात आधी उजळणी व्हायची. (यावर एकाने "नेमके तेच प्रश्न हे पेपर मध्ये विचारत असतील आणि पोरं लिहीत असतील मात्र रिझल्टवरून आपण समजतोय आपलं मूल हुशार म्हणून." अशी संभावना केली होती. कारण पेपर आम्हाला दाखवले जायचे नाही. तुम्ही मुलांना त्यावरुन बोलणार हे कारण दिलं जायचं. ) बरेचदा पालक सभेच्या आधी मुलांच्या मागे लागून वह्या पूर्ण करायला लावल्या जायच्या.
(३) रोज डायरी लिहीणं. पण हा प्रकार नंतर मुलांना कंटाळवाणा होउ लागला त्यावर मी एका पालक सभेत सुचवलं की सुचवलं होतं की "दररोजच्या सक्तीपेक्षा शनिवार-रविवार किंवा सुटी लिहायला सांगा. जी शब्दांची यादी देता त्यातले शब्द वापरण्यासाठी प्रोत्साहन द्या. " वैगेरे पण हे काही ऐकलं गेलं नाही. मुलांनी रोज वैतागून डायरी लिहायची आणि टीचरने ती ( चुकीच्या वाक्यरचनेलाही) बरोबरच्या खुणा करून तपासायची. एका अतिशय चांगल्या कल्पनेचं प्राणहीन नैमित्तिक कर्म करुन सोडलेलं.
(४) सरांवर झालेल्या शस्त्रक्रियेबद्द्ल शाळेत त्यांचे एक्सरे वैगेरे दाखवून अतीशय सुरेख माहिती सोप्या भाषेत मुलांना दिली या सारख्या नाविन्यपुर्ण गोष्टी असायच्या पण त्या क्वचित.
(५) तिला प्रत्येक विषया़च्या प्राथमिक कल्पना कळल्या पाहिजेत त्यातली मजा कळली पाहिजे तिला त्या "विषयात गती नाही तर पुढचा अभ्यासक्रम का लादता?" असं (गणिताच्या बाबतीत) विचारल्यावर
"नाही हो ती सगळ्यात हुशार आहे तिचा काहीच प्रॉब्लेम नाही." असं उत्तर कायम ऐकवलं जायचं.
ण तरिही तोटे जास्त आहेत आणि मुख्य म्हणजे शाळा फक्त आश्वासनावर बोळवण करतेय असं वाटायला लागलं. पाचवीपासून खेळासाठी वेळ द्यावा आणि वह्या आठवड्या - पंधरवड्यातून एकदा घरी द्याव्यात, मुलांच्या उत्तरपत्रिका मिळाव्यात यासाठी आम्ही अथक आणि शांतपणे प्रयत्न केले पण शाळेने दाद दिली नाही.
शेवटी सातवीत आम्ही काही जणानी ठरवून शाळेला रामराम ठोकला. त्यात ’जॅक ऑफ ऑल..’ असणारी माझी मुलगी होती तसंच एका खेळात राज्य पातळीवर खेळणारा मुलगा होता. त्याचे आई-वडील त्या खेळाचे कोच. त्यांची शाळेत अभ्यासही होत नाही आणि वेळेअभावी त्याला खेळालाही वेळ देता येत नाही अशी तक्रार होती. दुसरा स्क्कॉलरशीप, आयपीएम सारख्या परिक्षेत मेरिट मध्ये येणारा मुलगा होता. त्याची सगळी तयारी आईच करुन घेत होती मग शाळेत एवढा वेळ, पैसा का घालवायचा असा तिचा प्रश्न होता. या दोन्ही मुलांचे पालक त्यांची मेहनत पुर्ण वर्गाला उपलब्ध करुन द्यायला तयार होते पण शाळेने त्यांचा योग्य उपयोग करुन घेतला नाही.
सर्वांच्याबरोबर मी ही तिला आयसीएस्सी बोर्ड च्या शाळेत प्रवेश परिक्षेला नेलं. ज्या परिक्षेला काहीही अर्थ नव्हता. सातवीच्या प्रवेशासाठी दोन चार बेरजा वजाबाक्या आणि चार वाक्य लिहीण्याची परिक्षा घेउन ही मुलं आयसीएस्सी अभ्यासक्रमाला लायक आहेत का बघणं म्हणजे फार्स होता. हे बघून मी वैतागले. सरळ पारंपारिक पण चांगल्या शाळेत प्रवेश घेतला. त्यासाठी मला नेटाने प्रयत्न करावे लागले. आयसीएस्सी बोर्डांच्या शाळांत जे गेले त्यांच्यासाठी पायघड्या घातलेल्या होत्या.
या शाळेत मुलगी रमली. सातवीत म्हणजे बारा वर्षाच्या अडनिड्या वयात शाळा बदलण्याच्या निर्णयाबद्द्ल मी थोडी साशंक होतेच. सुरुवातीला ओळखी होताना तिला जड गेलं पण आता ती रुळलीय. शाळेतला फरक सांगणारी तिची काही वाक्य.
(१) तिथे कसं सारखं टीचर लक्ष ठेवून असायच्या. तेच तेच शाळेतलं जेवणं. इथे प्रत्येकाच्या डब्यात वेगळं वेगळं असतं त्यामुळे मजा येते आणि रिसेसमध्ये कोणी टीचर नसते वर्गात, वॉव?
(२) ईथे मुलं परिक्षेला एवढं का घाबरतात? शिकवलेलं नाही लिहीत गाईड मधलं पाठ करून लिहीतात.
(३) इकडे कॉम्प्रीहेन्शन आणि अल्जिब्रा काय पाठ करतात?
या शाळेत जरा जास्तच शिस्त आहे ना ? असं एकदा मी म्हटलं तेव्हा ती म्हणाली "अशीच पाहीजे गं शाळा. तेवढ्याला तेवढी शिस्त पाळली की बाकी मज्जा."
शाळा का बदलली?
(१) वर्गातील वीस ते तीस (ती सहावीत असताना तिच्या वर्गात ३७ मुलं होती शिक्षिका एक.) संपुर्ण शाळॆत काहीशे मुलं या वातावरणातून मुलगी ११वीत वर्गातच १०० - २०० मुलं या प्रकाराला कसं काय सामोरं जाईल असं वाटलं.
(२) लहान पणी एकवेळ ठिक आहे पण ११ /१२व्या वर्षींही मुलांना स्वत:चा असा वेळ मिळू नये हे मला चुकीचं वाटलं. तिला ना स्वत:चा अभ्यास कसा करायचा ते ठरवायचं स्वातंत्र्य की ड्बा न खायचं स्वातंत्र्य. सकाळी बसमध्ये बसल्यापासून संध्याकाळपर्यंत सतत टीचरच्या नजरेखाली. दुपारी जेवायच्या वेळेला रांगेत आपापली ताटं घेउन जेवायचं ती धुवून ठेवायची.
(३) मुलांना बास्केटबॉल,हॉलीबॉल सारखे सांघिक आणि व्यायाम होतील असे खेळ घ्या या वारंवार सांगण्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या. मुले सकाळी योगा करतात हे एकच कौतुक आम्हाला ऐकवलं जायचं. (या वयातल्या मुलांना मोकळ्या हवेत खेळू न देता तासभर प्रार्थना+योगा करायला लावण हा "अपारंपारिकतेचा" कळस होता.)
माझी मुलगी आधी वेगळ्या ठिकाणी बास्केटबॉल खेळायची पण नंतर शाळॆची वेळ, शहरात सततची रस्त्यांची कामं यामुळे ते जमेनासं झालं. मार्क कमी मिळाले तरी चालतील पण तिने कोणतातरी मैदानी खेळ खेळलाच पाहिजेच हा माझा आग्रह होता जो घरच्यांच्या पचनी पडत नसल्याने तिला शाळेनंतर त्या मैदानावर पोचवण्यात बरेचदा टाळाटाळ केली जायची. अर्थात आठ तासांची शाळा आणि दोन तासांचं मैदान हे शेड्युल तिलाही हेक्टीक होतंच. ( मैदानी खेळांच्या दुरावस्थेची एक वेगळीच कहाणी.)
(४) सायन्स प्रोजेक्टला जे मुलांनी केलेलं नाही हे सरळ दिसतय त्याला बक्षीस. लॅपटॉपवर प्रेझेंटेशन नको हे सांगूनही जे आणायचे त्यांना हे बाजूला ठेवा असं सांगण्याची ताकद व्यवस्थापनात नव्ह्ती. आमच्यासारख्या नियम पाळणार्यांना स्वत:च्या मुलांना काय उत्तरं दयावीत हे कळायचं नाही.
(५) शाळा ट्यूशन लावू नका असं सांगायची पण क्लासला जाणारी मुलं स्कॉलरशीप, प्रज्ञाशोध सारख्या परिक्षात चमकली की श्रेय घ्यायची.
(६) शाळॆच्या वेगळेपणामुळे धनदांडगे आणि सतरा उद्योगांमुळॆ मुलांकडे लक्ष द्यायला सवड नसणारे नेते अश्यांच्या मुलांची संख्या वाढू लागली. शाळॆचा फंड हा या लोकांकडून प्रामुख्याने येत असल्याने त्याच्याशी कुठल्याही स्तरावर वाकडं घेणं शाळेला परवडत नव्हतं. यामुळे होणारे प्रॉब्लेम्स वेगळेच.
(७) शाळेच्या व्यवस्थापकांच्या आधीच्या ओळखीचे पालक, आपले मूल म्हणजे कोणीतरी स्पेशल असं मानणारे पालक हे अजून काही वेगळ्या खास नमुने. मोठ्या शाळेतही ते असतात पण त्यांचा थेट उपद्रव होत नाही. छोट्या आणि अश्या शाळांना त्यांना कुशलतेने हाताळता आलं नाही तर त्याचा थेट परिणाम तुमच्या मुला/मुलीवर होतो.
(८) काही तक्रारींना ज्या प्रकारची सारवासारवीची उत्तरं दिली गेली त्यावरुन वाटायला लागलं की शाळेला मुलांचं नुकसान काय होतय यापेक्षा स्वत:चा हेकेखोरपणा पुढे रेटण्यात जास्त रस आहे.
शाळा बदलल्यावर काय फरक पडला?
(१) गैरहजर असलो तर स्वत: कोणाकडून तरी घेउन वह्या पूर्ण करा, शिक्षकाकडून काही कारणांनी तपासल्या गेल्या नाहीत तर स्वत: लक्षात ठेवून परत चेकींगला द्या वैगेरेची सवय नसल्याने पहील्यांदा फट्का बसला तरी लवकरच ती त्यात तरबेज झाली.
(२) ईथेही काहींना स्पेशल ट्रीट्मेंट मिळते पण ते न मिळणार्यांचीही संख्या जास्त असल्यानं त्याचा विचार करणं, त्यामुळे आपल्यावर अन्याय होतोय वैगेरे भावनेचा परिपोष आपोआप टाळला गेला.
(३) मार्कांचं महत्व परस्पर कळलं. (शेवटी कोणत्याही डिग्रीचा मार्ग प्रचलीत शिक्षणपद्धतीतूनच जातो. ) जे आहे ते नाकारण्यात अर्थ नसतो हां ते स्वत: स्वीकारायचं की नाही हा पर्याय असतो.
(४) वेगवेगळ्या आर्थिक, मानसिक पातळीवरचे अनेक मित्र मैत्रिणी मिळाले. त्यांच्याशी जुळवून घेणं,वेळप्रसंगी भांडणं आणि हे सगळं स्वत:च्या जबाबदारीवर निभावणं हे सगळं तिला अनुभवायला मिळालं.
(५) आधीच्या शाळेत सगळं शिस्तशीर आखीव असायचं या शाळेत अव्यवस्थेमधली व्यवस्था अनुभवायला मिळाली .
(६) तिला गणित आवडायचं नाही म्हणून सातवीत ट्यूशन लावली. दोन वर्ष त्या बाईंकडे ती जातेय त्यांनी तिचं गणित तर सुधारलच पण आर्टसला गेले तरी गणित घेईन असं ती म्हण्ण्यापर्यंत तिला ए आवडायला लागलं. तिला गणित आवडायलाच हवं असा आग्रह नव्ह्ता पण ज्या शाळेने हुशारी ही वेगवेगळ्या प्रकारात असते हे म्हणत कोणत्याच प्रकाराकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही. बरेचदा मुलांच्या आवडी निवडी ह्या सापेक्ष असतात त्यावर आधीच लेबलं लावून त्यांचं मत पक्कं करण्यापेक्षा स्कील वापरलं तर कुठलाही विषय ठराविक मर्यादेपर्यंत आवडू शकतो. तिला भाषा आवडतात असं शाळेचं म्हणणं होतं पण तिचीच काय बर्याच जणांची मुलं आधी वाचायची आता वाचत नाहीत ही तक्रार होती.
(७) मुलीची आताच्या शाळेत तिची एक बंगाली मैत्रिण आहे तिच्या कडून जुजबी बंगाली ती शिकते . बंगाली गाणी डाउनलोड करुन ऐकते. दुसर्या एका जपानी शिकणार्या मैत्रिणी कडून ती जपानी लिपी शिकली. रिसेस किंवा ऑफ पिरेड्मध्ये मुलांना आपापसात मिळणारा हा वेळ आधीच्या शाळॆत मिळत नव्हता त्यामुळॆ मुलांमध्ये असा काही परस्पर-संवाद नव्ह्ताच.
या पारंपारिक शाळेत पहिल्यापासून असायला हवी होती असं वाटतय का?
नाही. कारण.......
मुख्य म्हणजे पारंपारिक शाळा अभ्यास आणि परिक्षा यांचा जो बागुलबुवा निर्माण करतात त्यापासून संवेदनक्षम वयात ती दूर राहिली.
आम्हाला अभ्यास घेणं, गृहपाठ पूर्ण करुन घेणं याचं ओझं नसल्याने जो काही मर्यादित वेळ मिळायचा त्याचा चांगला उपयोग करुन घेता आला. तिच्याशी त्या वयात खेळणं, गप्पा मारणं, फिरणं याचा उपयोग तिच्या टीन-एजला सामोरं जाताना होतो.
तात्पर्य किंवा सल्ला:
असं मर्यादित अनुभवावरुन सल्ला देणं चुकीचं आहे. हा अनुभव आहे. पण सांगायचं झालं तर
गरज नसताना सीबीएस्सी वा आयसीएस्सी शाळेत घालण्यापेक्षा अपारंपारिक शाळेत घालू शकत असाल म्हणजे जवळ आणि परवडणारी असेल तर सुरुवातीला तरी घालायला हरकत नाही असं मी म्हणेन.
अर्थात तुमच्या मनातली अपारंपारिकतेची व्याख्याच शाळॆच्या व्याख्येशी जुळेलच अश्या भ्रमात राहू नका.
जर मूल घूसमटत असेल तर कालांतराने पारंपारिक शाळेला शरण जाण्यात कमीपणा मानू नका.
आपली रुढ शिक्षण पद्धत, पालकांच्या अपेक्षा या सर्व निकषांवर उतरण्यासाठी अपारंपारिक पध्द्तीला नंतर तरी काही मर्यादा येतात त्या स्वीकारू शकत असाल तर तिथे रहायलाही हरकत नाही.
पारंपारिक शाळेत तुम्ही भले मुलाला म्हणाल की मार्क वैगेरे महत्वाचे नाहीत पण "मार्किस्ट" शिक्षक , ईतर विद्यार्थी यांच्यामध्ये स्वत:च्या विचारसरणीवर ठाम विश्वास ठेवून राहू शकत असाल मुलाला वेळ देउ शकत असाल आणि मूलही इतर काय म्हणतात याकडे दुर्लक्ष करु शकत असेल तर मस्तय. पण त्याला मग नंतर मार्कांच्या शर्यतीत ओढून सामिल करणं कसं जमवायचं ते नाही सांगता येणार. कदाचित आजूबाजूच्यांकडे बघून ते मूल ठरवत असेल मार्क महत्वाचे म्हणून.
शाळा नविन असेल तर बर्याच गोष्टींची केवळ आश्वासनं दिली जातात. आणि नेमकी तीच वर्षं आपल्या नोकरी वैगेरेच्या दृष्टीनेही महत्वाची असल्याने आपणंही पाठपुरावा करण्यात कमी पडतो. केल्यास त्याचा परिणाम मुलावर होउ शकतो कारण शाळा अपारंपारिक असली तरी पालकांचा राग विद्यार्थ्यावर काढण्याचे पारंपारिक नुख्से वापरले जातात.
शिक्षक टिकण्याचं प्रमाण शाळॆत काय आहे हे जरा आजू बाजूच्यांकडून जरुर माहिती करुन घ्या.
शाळेत शिक्षकांना जास्त राबवून घेत असतील आणि पगार कमी देत असतील अशी अवस्था पर्यायी शाळेत असू शकते. कारण या शाळांना अनुदान नसतेच आणि बरेचदा कोणतीही संस्थाही नसते पाठीशी.
शाळा जास्त वेळाची असणं आणि खाणं वैगेरे शाळेत असणं या गोष्टी आपल्याला सोईस्कर असल्या तरी आपल्या मुलाला नाहीत हे शक्य आहे.
आणि सर्वात महत्वाचं फार सुरुवातीपासूनच मुलांशी संवाद असणं. त्यावरुनच सोयीचे असोत नसोत पण ओझं न बनणारे निर्णय घेता येतात.
प्रतिक्रिया
वाचते गं सावकाश. "यावर्षी मी
वाचते गं सावकाश.
वा!! सुंदर वाक्य आहे. विशेषतः अळंब्या शब्द. कवक अन अळंब्यात फरक काय? अवांतर होत असेल तर खवत सांगावे.
Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down
फरक
'कवक' तत्सम. 'अळंब्या' (बहुधा) देशी. (चूभूद्याघ्या.)
बोले तो, मराठीत 'मश्रूम'. पूर्वीच्या काळचे मराठी लोक याला 'कुत्र्याच्या छत्र्या' किंवा 'कावळ्याच्या छत्र्या' म्हणत, असे ऐकून आहे. आमच्या लहानपणी शाळेच्या जीवशास्त्राच्या मराठी माध्यमाच्या पुस्तकात त्याला 'भूछत्र' असा शब्द वापरलेला पाहिला आहे.
अवांतर: आमचे जीवशास्त्राचे मराठी माध्यमाचे पुस्तक हा संस्कृत अपशब्दकोश होता. 'भूछत्र' काय, 'पश्चमस्तिष्कपुच्छ' काय, छ्या:! शिवाय, जीवशास्त्राचे मराठीतून अनेक वर्षे अध्ययन केल्याने त्याचत्याच अपशब्दांचे पाठभेदही कळत, हाही एक मोठाच फायदा होता. म्हणजे, पाचवीत असताना 'लंबमज्जा' म्हणून दिली जाणारी शिवी नववीत गेल्यावर 'पश्चमस्तिष्कपुच्छ' अशी द्यावी लागे. असो.
अतिअवांतर: 'पारंपरिक' हा शब्द 'पारंपारिक' असा लिहिणे हे ओल्ड स्कूल की न्यू स्कूल?
बापरे! इतका विचार?
बापरे! इतका विचार?
भरगच्च लेख आवडला. मुलांचं
भरगच्च लेख आवडला. मुलांचं शिक्षण हा बहुतेक पालकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. पूर्वी सहा सहा पोरं असताना 'मुलं शाळेत घातलीत आपोआप शिकतीलच. नाही शिकली तर त्यांचं नशीब.' असा दृष्टिकोन असायचा. याउलट आता एक-दोनच मुलं बहुतांश पालकांना असतात त्यामुळे मुलांना शाळेतून जे मिळतं त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे पाहण्यासाठी पालकांना वेळ असतो. त्यापेक्षाही महत्त्वाची म्हणजे एक जागरुकता असते. या जागरुकतेची जाणीव या लेखातून वाक्यावाक्याला दिसून येते.
या दोन शाळा कुठच्या हे जाणून घेण्यात रस आहे. व्यनिने कळवाल का?
खरय. त्याहीपेक्षा मार्क आणि
खरय. त्याहीपेक्षा मार्क आणि वर्गातल्या नंबराबरोबर घसरणारी प्रतिमा आणि त्यामुळे बसणारे वाग्बाण यामुळे मी पुर्ण शाळा-कोलेज कधी मजेत राहिलेच नाहीय. अजुनही माझ्या चुका झाल्या तर मला चट्कन स्वीकारता येत नाहीत. अर्थात यात आजूबाजूच्या वातावरणापेक्षा घरचं वातावरण कारणीभूत होतं. पण त्यामुळे मला मुलीने हे दिवस मनापासून मजेने अनुभवावेत असं वाटतं.
पालकांना तसा वेळ नसतो म्हणूनच एक अपराधीपणाची भावना असते. आणि पुढे मुलंच आपल्याला बोल लावतील ही सुप्त भितीही.
लेख विस्तृत झालाय पण हे विचार हळू हळू सात वर्षांच्या कालावधीत केलेले विचार आहेत. त्या त्या वेळेला काय विचारप्रक्रिया होती हे आठवून मुद्दे लिहीलेत .
लेख आणि हा प्रतिसाद
लेख आणि हा प्रतिसाद आवडला.
मुल साधारण १० वर्षाच होइपर्यंत होम स्कुलींग किंवा अपारंपारीक शाळा आणि त्यानंतर पारंपारीक शिक्षण हा पर्याय चांगला वाटतोय. आधी एका प्रतिसादात तू होम स्कुलींग नको म्हणालेली पण मला अजुनही वाटतं की 'पारंपारीक अभ्यासच पण स्वतः घरी शिकवलेला आणि मग वर्षाखेर थोडीफार फी देऊन शाळेतून परीक्षा द्यायला लावायची' हा एक चांगला पर्याय होऊ शकेल.
परदेशातील शाळा कशा असतात हे अनुभवी पालकांकडून ऐकायला आवडेल. कारण बरेच भारतीय तिकडची शिक्षणपद्धती ठीक वाटत नाही म्हणून परत भारतात येतात.
अर्थात यात आजूबाजूच्या वातावरणापेक्षा घरचं वातावरण कारणीभूत होतं. >> अगदी अगदी.
जे आहे ते नाकारण्यात अर्थ नसतो हां ते स्वत: स्वीकारायचं की नाही हा पर्याय असतो. >> वा! अतिशय आवडलं वाक्य.
होम स्कूलींगच्या मी पूर्ण
होम स्कूलींगच्या मी पूर्ण विरोधात आहे. मूल आजूबाजूच्यांकडून जे शिकतात आणि आपला स्वभाव घडवत जातात ते होमस्कूलींगमध्ये जमणंच कठीण. असं मूल बाहेरच्या जगात स्वतःला adjust करेलही पण त्याला/तिला तिथे पूर्ण मोकळेपणा कधीच वाटणार नाही असं मला वाटतं. कोणाचे होम स्कूलींगचे अनुभव असल्यास वाचायला आवडतील.
मला वाटतं ते शिक्षणपद्धतीमुळे नाही तर सामाजिक परिस्थितीतले वेगळेपणा न स्वाकारता आल्याने येतात. मुलांना तश्या समाजात भारतीय संस्कार पाळून वावरणे अशक्य आहे हे पटल्याने येतात .
इतके टोकाचे मत?
होम स्कुलिंग बद्दलचे गैरसमज आहेत. तुम्ही पैल्या वाक्यात सांगून टाकलय काय काय वाईट आहे होम स्कुलिंगमधे !:) होम स्कुलिंग ही अशी आयसोलेटेड एक्टीव्हिटी आहे असे का वाटते तुम्हाला? इतक्या निष्कर्षाप्रत येण्यायेवढे तुमचे अनुभव वाईट आहेत का?
लेख मस्तच आहे.
actions not reactions..!...!
correction:
सृजन-आनंद नाशिक मध्ये नसुन कोल्हापुरात आहे. मी स्वतः १ली ते ४थी ह्या शाळेत शिकले आहे आणि नन्तर सो कॉल्ड पारंपारिक शाळेत. खुप काही लिहिण्यासारख आहे पण सध्या बिलकुल वेळ नाही. हा किन्वा इथले सम्बन्धित लेख वाचुन लवकरच प्रयत्न करेन.
-सिद्धि
चुक सुधारलीय. पण लिहा तुम्ही
चुक सुधारलीय. पण लिहा तुम्ही तुमचे अनुभव.
कामाचं
कामाची माहिती.
उपयुक्त.
मनःपूर्वक आभार.
फार छान लेख आहे.
फार छान लेख आहे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
अतिशय उपयुक्त लेखन. आपण
अतिशय उपयुक्त लेखन.
आपण कट्ट्याला प्रत्यक्ष भेटलो होतो तेव्हा यावर थोडे बोलणे झाले होते. आता अधिक तपशीलवार व मुद्देसुद लेख अधिकच आवडला.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
छान!
छान महिती दिली आहे. मी पण माझ्या मुलासाठी पर्यायी शाळेचा विचार करत आहे. ह्या लेखामुळे मदत होईल
पुन्हा एकदा विचार करा.
पुन्हा एकदा विचार करा.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
माझे मत पारंपारीक शाळेंच्या
माझे मत पारंपारीक शाळेंच्या बाजुचे आहे. आधीच्या चर्चेत त्याबद्दल ची कारणे द्यायची राहुन गेली होती, ती इथे.
१. भारतातील शाळांचा आणि शिक्षण पद्धतीचा मुळ उद्देश मुलांना त्यांचा चरीतार्थ चालवण्यासाठी लागणारे बेसिक शिक्षण देणे हा आहे. हे बरोबर आहे का नाही हा मुद्दा इथे नाही. पण तसे ते आहे.
२. प्रत्येकाला पुढील आयुष्यात ( चरीतार्थ चालवण्यासाठी )शिक्षणा व्यतीरीक्त काही बाकीच्या गोष्टी पण आत्मसात करणे आवश्यक आहे, त्या गोष्टीं करवुन घेण्याचे काम शाळांमधुन होते. जसे
अ. वेळा पाळणे, शीस्त लागणे. आपल्या मनाविरुद्ध च्या गोष्टी करायला लागतात हे समजणे. उदा. खेळणे हवे असते तेंव्हा अभ्यास करायला लागणे.
ब. गृहपाठ करायला लावून दिलेली टास्क कीतीही निरुपयोगी वाटली तरी करण्याची सवय लावणे ( हे नोकरीत उपयोगी पडते ).
क. ज्या पद्धतीची परीक्षा पद्ध्त आहे त्यामुळे मुलांना पाठांतर करायलाच लागते. ज्या गोष्टी पाठ केल्या जातात त्या निरुपयोगी असल्या तरी मेंदुतले मेमेरी रीलेटेड एरीया डेव्हलप होतात.
ड. परीक्षेला खूप महत्व दिले असल्यामुळे मुलांना त्याच्रे प्रेशर येते. आणि त्या स्ट्रेस खाली पण परफॉर्म करण्याची सवय लागते. ही गोष्ट पुढच्या आयुष्यात फार उपयोगी पडते.
इ. इतर मुलांच्या बरोबर होत असलेली मार्क किंवा इतर गोष्टींच्या स्पर्धे मुळे, आयुष्यात पुढे ह्या गोष्टींचे विषेश वाटत नाही. तसेच Life is Not Fair ह्याचे शिक्षण मिळणे अतिशय गरजेचे असते, ते शाळेतुन मिळते.
ह्या मागचे माझे गृहीतक असे आहे की ८०-९० टक्के मुले ही सर्वसामान्य असतात. सर्वसामान्य म्हणजे शिक्षण सोडुन पण कला आणि खेळात पण सर्व सामान्य असतात. कदाचीत ५-७ टक्के मुले सरासरी पेक्षा वर असतील आणि १ टक्का जिनियस.
ह्या ५% मुलांना शाळे मुळे काहीच फरक पडत नाही. पण बाकीच्या ९५% मुलांसाठी पारंपारीक शाळा योग्य असे आपले माझे मत.
<i>१ टक्का जिनियस</i>
१ टक्का जिनियस
शुअर ?
जगाची लोकसंख्या सातशे कोटी असल्यास, सध्या जगात आपल्या आसपास सुमारे सात कोटी(!!!) इतके जिनियस आहेत ???
जिनियस ही अतिअतिअतिदुर्मिळ क्याटेगरी आहे अशी माझी समजूत आहे.
उदा :- आइनस्टाइन,शेक्सपिअर,आर्यभट्ट, गोपाल नायक - अमीर खुस्रो,
.
.
जिनियस ०.०१ टक्के किंवा ०.००१ टक्के असले काहीतरी असतील हो.
.
.
बाकी सगळं ठीकठाक आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
१ टक्का जिनियस शुअर ? मी फार
मी फार निगेटीव्ह लिहीते म्हणुन हे १ टक्का लिहीले होते. अगदीच कमी प्रमाणात जिनियस असतात. १ टक्का लोक काही खरंच चांगले अंगभुत गुण घेउन असतात. दुर्दैवाने शाळांबद्दल ची चर्चा सर्वसामान्य मुलांना समोर ठेवून न होता ह्या १ टक्का मुलांना समोर ठेवुन होतात म्हणुन हा प्रतिसाद लिहीला.
मला म्हणायचे होते की ह्या १ टक्का मुलांना कोणती शाळा आहे, इंग्लिश मिडीयम आहे का मराठी ह्यानी काहीच फरक पडत नाही.
ह्या मागचे माझे गृहीतक असे
मी नेमका याच विषयी साशंक आहे.
माझ्या भोवतालच्या बहुतांश व्यक्तींमध्ये कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात (विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्रे, दृश्यकला, इतिहास, खेळ, नृत्य, संगीत, अभिनय, एकुणच पर्फॉर्मिंग आर्ट इत्यादी) सामान्यांहून कितीतरी अधिक माहिती, रस व कल आहे. दुर्दैवाने हा कल व रस लक्षात येण्यासाठी त्यांपैकी बहुतांश व्यक्तींना आयुष्याची २०-२५ वर्षे मोजावी लागली जोवर त्या क्षेत्रात अधिक ज्ञान/गती मिळवण्याचे महत्त्वाचे वय निघून गेले होते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
@ऋषिकेश - ह्याचे कारण आहे.
@ऋषिकेश - ह्याचे कारण आहे. माणुस आपल्या भोवती आपल्या सारखीच माणसे जमवतो. म्हणुन तुम्हाला तसे चित्र दिसते. तुमच्या किंवा माझ्या आसपास १० वी ला ९० टक्क्यापेक्षा जास्त मार्क म्हणजे नॉर्मल समजले जातात. पण एकुण रीझल्ट बघीतला तर ९०% मार्क असलेल्याचा पर्सेंटाईल ९९ असतो.
पारंपारीक शाळा ह्यात कुठेही मधे येत नाहीत. अडचण निर्माण करत नाहीत. खरे तर "रस" आणि "कल" असला तर कोणीच अडचण निर्माण करु शकत नाही.
चला, आपल्या भोवतीची माणसे
चला, आपल्या भोवतीची माणसे सोडून देऊ!
पण तुमच्या गृहितकामागचा वैयक्तिक निरीक्षण हे कारण वगळता (असल्यास) तर्क/विदा किंवा जो काही बेस असेल त्याबद्दल वाचायला खरंच आवडेल.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
तुमच्या गृहितकामागचा वैयक्तिक
तुम्ही ज्याला आवड म्हणता आहात आणि मी ज्याला आवड म्हणते आहे त्याच्या व्याख्येत गुणात्मक फरक आहे ( कोण चांगले आणि कोण वाईट असे नाही ).
माझ्या आवडीच्या व्याख्येत "ओढ" " तळमळ", "जीव तुटणे" असल्या गोष्टी येतात. आणि अशी आवड असली तर कोणतीच शाळा तुमच्या आवडीच्या मधे अडचण निर्माण करु शकत नाही. म्हणले तर दिवस छोटा असतो आणि नीट बघितले तर दिवसातला प्रचंड वेळ विद्यार्थी मोकळे असतात ( शाळा काही त्रास देत नाही ). पण त्यांना वाटणार्या आवडीचा जीव इतका छोटा असतो की तो दुसरी छोटीमोठी प्रलोभने सहज त्या आवडीला मारुन टाकतात. ( रादर आपणच मारुन टाकतो आपल्या आवडी आपल्याच चॉइस नी ). नंतर आपल्यालाच वाईट वाटते आणि मग आपण कारणे शोधतो. त्यातले सर्वात सोप्पे टार्गेट शाळा असते.
तुम्ही ज्याला आवड म्हणता आहात
असेलही.
माझ्या मते तुम्ही म्हणताय अशी एखाद्या बाबतीत ओढ तळमळ वगैरे निर्माण व्हायला एक्सपोजर, प्रोत्साहन, सभोवतालचे वातावरण, ती शक्यता आजमावून पाहण्याची संधी इत्यादी अनेक घटक कारणीभूत असतात. पारंपरीक शाळा तशी संधी निर्माण व्हायची शक्यताही निर्माण होऊ देत नाहीत, तर पर्यायी म्हणवणार्या शाळा शक्यता निर्माण करत असाव्यात (मात्र तरीही या धाग्यावरून त्या त्यात किती यशस्वी होत असाव्यात शंकाच आहे)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
त्यातले सर्वात सोप्पे टार्गेट शाळा असते.....?
आपण रॅशनल विचार करता हे नेहमीच आवडत आले आहे.
याच्याशी मी प्रचंड सहमत आहे... प्रत्येक गोष्ट मी तरी ओढ, तळमळ, जीव तुटणे या पध्दतीनेच करतो न्हवे जगतो त्यामुळे माझीही आवडीची व्याख्या हीच आहे. बोले तो १००००००००० लाइक्स.
मला हेच तर म्हणायचे आहे शाळा ही या उरलेल्या ९५% मुलांसाठीच असावी/ असते. आणी जर ही ९५% मुले त्यांच्यातल्या सुप्त गुणांना शक्तीना प्रोत्साहन देणारे वातावरणात वाढु शकत नसतील तर त्यांची उपलब्धी ही फक्त उरलेल्या ५% लोकांच्या आयुष्यमैथुनाचा एक भाग इतकीच ठरते असे होत नाही काय ? मग सर्वात प्रथम टारगेट शाळाच असणार ज्यानी हे मनावर घेतले पाहीजे. कारण विचारप्रक्रिया ही यांत्रीक क्रिया आहे हे जोपर्यंत सिध्द होत नाही तोपर्यंत याची मुलभुत जबाबदारी शाळांनीच उचलायची आहे.
actions not reactions..!...!
पारंपारीक शाळा ह्यात कुठेही
यावरही सहमती नाही.
सध्या भारतात ज्याला पारंपरीक शिक्षण म्हटले जातेय त्या ब्रिटिशांनी सुरू केलेल्या पद्धतीत मुख्यतः अंक व अक्षरांभोवती फिरणारे 'स्मृतीजन्य' शिक्षण आहे. श्रम, खेळ, कला, कौशल्ये यांचा समावेश त्या शिक्षणात नाही. त्यामुळे अंक/अक्षरांवर आधारीत बाबतीत रूची/कल नसणार्या किंवा अंक/अक्षरे लक्षात ठेवण्यास सुलभता नसणार्यांना "सामान्य" हे लेबल लावले जाते. प्रत्यक्षात त्या त्या मुलांमध्ये खेळ, कला, विविध कौशल्ये (जसे कुंभकाम, सुतारकाम, क्लीष्ट उपकरांतील समज इत्यादी अनेक) उत्तम असु शकतात. मात्र सद्य शाळा या बाबतीत पूर्ण दुर्लक्ष तर करातच, शिवाय हे विषय शिकु न देऊन अडचणही निर्माण करतात.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+१ अगदी हेच वेगळ्या भाषेत
+१
अगदी हेच वेगळ्या भाषेत लिहायला आले होते.
आपली शिक्षण पद्धती आणि खास करुन समाज-मनच चरितार्थासाठी शिक्षण या प्रकाराला अनुकूल नाही तिथे शाळा कुठून असणार? त्या फक्त लिहीता वाचता येणारे ठोकळे निर्माण करतात. अपारंपारिक शाळा असे ठोकळे निरमाण करताना काही वैशिष्ठ्य्पूर्ण स्किल्स वापरतात एवढंच.
पूर्वी तरी सामान्य शाळेतही कार्यानुभव या विषयाखाली अश्या प्रकारच्या कौशल्यांची तोंडओळख करून दिली जायची. (आम्हाला कूकरी ,वीणकाम , गायन , आणि चक्क सुतरकाम ही होतं) आता पासरीभर भरताड विषय आहेत उपयोगाचं काही नाही.
@ अनुराव त्या शिस्त वैगेरेचं उत्तर देते सावकाशीनं
मी वर लिहीले होते त्यातला
मी वर लिहीले होते त्यातला अर्धाच भाग तुम्ही घेतलात. जर "रस" आणि "कल" असेल तर
ह्यात ही हे लिहायचे राहीले होते की "खरच रस आणि कल असेल तर"
दिवसातल्या जागे पणाच्या १३-१४ तासातले शाळा ( कोणतीही ) फार्फार तर ८ तास खाईल ( गृहपाठ धरुन ). बाकीचा वेळ प्रत्येका कडे असतोच. गाण्याची, चित्रकलेची इत्यादी आवड प्रत्येकालाच थोड्याबहुत प्रमाणात असते. पण खराखुरा जीवाची तळमळ करणारा रस फारच थोड्यांमधे असतो. त्यांना कोणीच आडवू शकत नाही. Dont Blame schooling आणि ज्याला थोडीफार आवड आहे त्या विद्यार्थ्याला दिवसात भरपूर रीकामा वेळ असतो and he/she makes choice of TV and Comp Games, sleeping, chatting Over his/her so called कला आणि खेळाची आवड.
आणि शिक्षण कुठलेही असो अगदी कलेचे सुद्धा ते पण असे निर्र्थक वाटणार्या रीपीटीशन, पाठांतर, नियम, शीस्त ह्यातुन च पुढे जाते. त्यामुळेच कला शिकणारे बरेसचे पहील्या ६ महीने ते १ वर्षात Dropout होतात. २-३ वर्ष टीकणारेच पूर्णत्वाला नेतात.
ह्या १ वर्ष ट्राय करणार्यांना आवड नसते असे नाही पण "तितकी" ओढ आणि डिव्होशन नसते. आणि कलेच्या प्रांतात हे नसेल तर तुम्ही चौथी सुद्धा पास होऊ शकणार नाही.
नशिबानी आपल्या शालेय शिक्षणाला अजिबात ओढ, डिव्होशन वगैरे लागत नाही.
खरा रस आणि कल याबद्द्लचे
खरा रस आणि कल याबद्द्लचे तुमचे म्हणणे मान्य पण तसा आहे हे कळायला वेगळ्या विषयांची थोडी तरी ओळख व्हायला हवी की नको? आताच्या शाळांमध्ये हे अजिबात घड्त नाही . सगळं शिक्षण कागदावरून सुरू कागदाशी अंत या पद्धतीचं.
कार्यानुभव, गाणं या प्रकारांना आमच्याही वेळी फार महत्व नसे पण वेळेवर तास होतं त्याच्याशी संबधीत गोष्टी शिकवल्या जात आता ते सगळं मोडीतच काढलेलं आहे. यातून जे शिकलो ते लक्षात आहे. नुसतं ऐकत बसण्यापेक्षा आपण काहीतरी करायचं म्हणून या विषयांच्या तासिका एन्जोय केल्या जात.
हल्ली पाच सहा वर्षापासून वेगवेगळ्या विषयांवरची प्रोजेक्ट्स या प्रकाराखाली माहिती जमा करणे ती लिहून काढणे यात मुलांचा वेळ जातो. ती माहिती जमा करताना पालकांनी रस घेउन काही वेगळ्या सोर्सेसशी परिचय करून दिला तर ठिक आहे नाहीतर माहिती गुगलून व्यवस्थित लिहीणे हेच बहुतांशी वेळा केलं जातं आणि सादरीकरणाला महत्व त्यामुळे ती अजून एक घोड मेहनत. यात थिअरीबेस्ड नसलेले विषय पडले मागे.
ऋषिकेश , हेच शिक्षण पर्यायी
ऋषिकेश , हेच शिक्षण पर्यायी म्हणवून घेणार्^या शाळा अधिक कौशल्याने देतात. आणि तश्या त्या देन नसतील तर त्या चालणार ही नाहीत. व्होकेशनल स्कूल्स कुठे आहेत आता?
लेख आवडला. आमच्या शाळेत
लेख आवडला.
आमच्या शाळेत पाचवीत सृजनानंद शाळा सोडून आलेली काही मुले होती. ती मुले पाढे म्हणताना 'सतरा सख्खं दुग्गोदरसे' म्हणायच्या ऐवजी 'सतरा सख्खं एकशेदोन' वगैरे म्हणायची.
आमच्या पारंपारिक मीडियम
आमच्या पारंपारिक मीडियम इंग्रजी शाळेत "झा" म्हणायला शिकवायचे. उदा. सेवन सिक्स झा फोर्टी टू.
मायाबापांना कळेना की इंग्रजीऐवजी भोजपुरी तर शिकवत नाहीयेत?
चौकशीअंती "झा" हा " 's are " चा उच्चारी अपभ्रंश आहे असं ध्यानात आलं. Seven sixes are forty two.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
अगदी नेमका हाच प्रश्न मलाही
अगदी नेमका हाच प्रश्न मलाही पडला होता. लै दिवसांनंतर एकदा असंच जालावर ते सापडलं अन एकदम युरेकलो. (साला अर्थदृष्ट्याही एकदम चपखल बसतंय.)
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
>>एकदम युरेकलो तुम्ही
>>एकदम युरेकलो
तुम्ही कुठल्या शाळेत शिकलात? पारंपरिक की काहीतरी सृजन वगैरे टाईप्स?
आम्ही अगदी साध्या पारंपरिक
आम्ही अगदी साध्या पारंपरिक शाळेत शिकलो- विद्यामंदिर प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय, मिरज.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
चीची इंग्लिश
हे अँग्लो-इंडिक (मुद्दाम अँग्लो-इंडियन हा शब्द वापरत नाही) पद्धतीचे 'ची ची इंग्लिश' आहे आणि इंग्रजी माध्यमाच्या बहुतांश शाळांमुळे ते भारतात भरपूर पसरले आहे.
मी कित्येक वर्षांपूर्वी दिल्लीत असतांना माझी मुलगी एका महागडया खाजगी शाळेत जात असे. एकदा घरी ती शाळेत शिकवलेला हिंदीचा पाठ मोठयाने म्हणत होती. 'का' से कबूतर, 'खा' से खरगोश, - हे सगळे खास उत्तर हिंदुस्तानी उच्चार - 'गा' से गमला, 'घा' से घडी, और अडा. ह्या 'अडा'वर मी अडकलो. अंकलिपीत पाहतो तो काय 'ङ'चा तोच उच्चार आहे असे तिच्या 'मिस'ने तिला सांगितले होते.
सविस्तर लेख
लेख सविस्तर आहे. त्यावर चर्चाही झाली आहे. हे दोन्हीही छान.
तत्वतः, मुख्य मुद्दा: ‘कशासाठी’ वा ‘कुणासाठी’ पर्याय? मुख्य धारेतील शिक्षण-विचार/ पध्दतीचा विचार करता तो पर्याय असेल तर तो ‘पर्याय’ मानता येईल का? दोन मुलांची मुख्य धारेतल्या शाळेत न जाण्याची कारणे वेगवेगळी ासतात. त्या-त्या वेळेस त्या कारणांना समोर धरुन निर्णय घेतले जातात. काही अपेक्षा ठेवलेल्या असतात. अपेक्षा कुठवर पु-या झाल्या याबद्दल लगेच बोलता येत नाही. भारतीय समाजात ‘अपारंपरिक’ वा ‘पर्यायी’ चे बहुविध मार्ग आहेत. काही ठिकाणी ते कुटूंबागणिक वा मुलागणिक बदलतात असे दिसते.
काही मुद्दे मनात येतात ते असे:
१. शिक्षणाविषयक आई वडीलांचे विचार काय आहेत हे महत्वाचे असते
२. शिक्षण आणि भवताल याबद्दल त्यांचे भान काय आहे यावरुन त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची दिशा सुरुवातीच्या काळात ठरते
३. मुख्य धारा आणी पर्याय यामधे मुलांचे सामाजिकीकरण हा मुद्दा असतो. पण, तो दोन्हीकडे समाज असतोच त्यामुळे सामाजिकीकरणाची प्रक्रिया आणि त्यातले मुल्य हे महत्वाचे असते.
४. मुले घडणे/न घडणे हे कुठेही घडू शकते. यश/अपयश कुठेही घडू शकते. म्हणजे, सोप्या ्भाषेत म्हणायचे तर, जगातल्या नामवंत शाळेत शिकूनही एखादा नापास होऊ शकतो, एखाद्याला गणित/भाषा नीट न येऊ शकते, व्यसनी होऊ शकतो किंवा एखादा निव्वळ स्ट्रिट स्मार्ट राहू शकतो.... किंवा ‘पर्यायी’ ठिकाणी राहूनही सगळे एखाद्या मुलाबरोबर घडू शकते/शकत नाही....
६. पीअर प्रेशर आई वडिल आणि आजुबाजूचे घेतात आणि देतात. नंतर, मुले ते पिक अप करतात.
५. आई वडील, जवळचे मित्र, नातेवाईक यांच्या शिक्षणाविषयी भूमिका, श्रध्दा काय आहेत, विचारप्रणाली काय आहेत, ते कशावर विश्वास ठेवतात यावर बरेच अवलंबून असते असे मला वाटते.
६. यामुळे, कुठल्या शाळेत जाणे न जाणे यापेक्षा काय साध्य करायचे आहे हे महत्वाचे असावे.
७. व्यावहारिकतेसाठी, कुठलीही शाळा घेतली तरी, चौथी, दहावी, बारावी, इत्यादि (कधीतरी) व्हायचे असते. फ़रक, इथे असतो: ती किती धावा-धाव करुन व्हायची आहे, कोणत्या मार्गे व्हायची आहे, किती प्रेशर घ्यायचे/द्यायचे...इत्यादि.
एक प्रश्न पडला आहे. पर्यायी
एक प्रश्न पडला आहे. पर्यायी शाळेत मुलांना घालणार्या पालकांना आपल्या अपत्याने पारंपारिक (म्हणजे नोकरी-धंदा-लग्न-मुले-घर-गाडी) जीवन जगावे की पर्यायी जीवन जगावे असे वाटते?
या प्रश्नाचे प्रयोजन कळाले
या प्रश्नाचे प्रयोजन कळाले नाही. जगण्यातला काही भाग जर वेगळ्या पद्धतीने पार पाडता आला तर ते बरे अशी मनोधारणा असू शकते. निव्वळ पर्यायी शाळेला पसंती आहे म्हणून पर्यायी जीवनच एकदम? & व्हॉट डज़ दॅट ईव्हन मीन इन द फर्स्ट (ऑर लास्ट) प्लेस?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बॅटमॅन व मनः प्रश्न अपेक्षित
बॅटमॅन व मनः प्रश्न अपेक्षित होता. मी म्हटलेय तो खोडसाळपणा नसून जेन्युईन प्रश्न आहे. पर्यायी जीवन म्हणजे अर्थातच समाजाने यशस्वीपणाच्या ज्या ढोबळ व्याख्या केल्या आहेत त्या न जुमानता स्वतःला वाटेल ते करणे. मग एखादा भीमसेन जोशींसारखा कलेला जीवन वाहून घेईल. एखादा बाबा आमटेंसारखा कोणा दुरितांसाठी आयुष्य वेचेल किंवा कोणी कुठल्या अन्यायाविरुद्ध चळवळ करेल. असे करावे अशी पालकांची आंतरिक इच्छा असते की नाही याचे मला कुतुहल आहे.
ओके. खुलाशाबद्दल
ओके. खुलाशाबद्दल धन्यवाद.
परंतु शाळा हा जीवनाचा लै छोटा भाग आहे. तो पार पाडण्यात पर्यायी व्यवस्था बरी असे मत असण्यामागे "समाजाच्या व्याख्येप्रमाणे यशस्वी होण्यासाठी हा पर्यायी मार्ग अधिक बरा वाटतोय" असेही मत असू शकते. इतकंच सांगायचंय की तेवढ्या अॅझम्प्शनवरून पर्यायी जीवन (तुमच्या व्याख्येप्रमाणे) आकर्षित करत असेलच असे सांगता येत नाही असे वाटते. आय होप आय अॅम क्लिअर.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
+१ शाळा खरोखर फार छोटा भाग
+१
शाळा खरोखर फार छोटा भाग असतो पुढच्या निर्णयांशी तुलना करता, पण बरेचदा तुमच्या सामाजिक सवयी, आवडी निवडी यांचा पाया शाळेत घातला जातो. त्यामुळे शाळा ही ओझं वाटू नये किमान सुरुवातीला एवढीच अपेक्षा असते शाळेत घालताना.
पर्यायी जीवन म्हणजे अर्थातच
ह्यासाठीची हिंमत आपलीच कमी होत जाते. त्यात चांगल्या वाईटाच्या व्याख्या तुमच्या आणि मुलांच्या वेगळ्या असल्या तरी पाठिंबा देणं किंवा किमान विरोध न करणं हे कितपत शक्य असतं किंवा होईल माहित नाही.
उदा. समजा मला वाटतय की मुलाने वेगळं पर्यावरणप्रेमी आयुष्य जगावं वैगेरे आणि त्यला मोटार-रेसिंगची स्वप्न पडतायत . तर? दोन्हीही चाकोरीबाहेरचे पर्यायच आहेत. मी काय करेन माहित नाही कदाचित चाकोरीतलंच चांगलं असं पटवत बसेन.
पर्याय़ी म्हणजे काय आणि कुणाला पर्याय?
तुम्ही म्हणताय ते योग्य वाटले मला. पर्यायी काय? कुणाला?
पर्यायी
'पर्यायी जीवन जगण्या'त नेमके काय अपेक्षित आहे ?
एखाद दुसर्या उदाहरणासह सांगू शकाल का
मला सुचलेली पर्यायी जीवनाची
मला सुचलेली पर्यायी जीवनाची उदाहरणे
१. अविवाहीत रहाणे. लग्न करणे पण मुद्दाम मुले होउन न देणे.
२. एका पेक्षा जास्त नवरे / बायको करणे ( एकाच वेळी ). लिव्ह्-इन आता "पर्यायी" आहे की नाही कोणास ठावुक.
३. नोकरी धंदा न करणे, नुस्ते मजेत आईबापाच्या पैश्यावर जगणे
४. राजकारणात जावून नगरसेवक्/आमदार होणे.
५. स्मगलिंग, माफिया टोळीत सामिल होणे. नक्षलवादी बनणे.
६. संन्यास घेणे. बाबा/माताजी बनणे. ज्योतिशी, टोरो कार्ड रीडर वगैरे होणे.
७. सायकल्/बाईक वरुन वर्ड टूर ला जाणे.
८. वनवासी कल्याण आश्रम/ आनंदवन अश्या कामाला वाहुन घेणे.
९. हींदी सिनेमात नट होणे ( कसलाही रोल )
तुम्ही गमतीनं लिहीलय हे सोडून
तुम्ही गमतीनं लिहीलय हे सोडून देउ पण पर्यायी जीवन जगण्याची हिम्मत पर्यायी शाळा देत असाव्यात कदाचित. कारण ऋषी स्कूल किंवा अश्या काही शाळांचे विद्यार्थी वेगळ्या प्रकारचं जीवन जगण्याची हिंमत दाखवू शकतात असं ढोबळ उदाहरणांवरून म्हणता येईल. अर्थात त्याला त्यांच्या घरची चांगली सांपत्तिक स्थिती हे ही कारण असू शकते.
पण वरिल प्रतिसादात मी म्हटल्याप्रमाणे आताच्या निमम्याहून जास्त पर्यायी शाळा या ऋषी स्कूल सारख्या खर्या पर्यायी नसून नुसतं तसं दाखवत असतात. पर्याय नसलेलं ठोकळेबाज शिक्षण युक्तीने मुलांच्या गळी उतरवणं हेच त्यांचं खरं काम.
कारण ऋषी स्कूल किंवा अश्या
ह्याची २-३ तरी उदाहरणे वाचायला आवडतील आणि पट्ली तर लगेच मान्य करायला पण.
ह्यातले "पर्यायी जीवन" म्हणजे काय हेच कळले नाही. ते कळले तर क्लीयर होइल.
आता डोळ्यासमोर नाहीत. (ऐसीवर
आता डोळ्यासमोर नाहीत. (ऐसीवर असे लेख विदा समोर ठेवून लिहावे ही सवय लागली नाहीय )
विदा म्हणुन नाही. मी इमॅजिन
विदा म्हणुन नाही. मी इमॅजिन नाही करु शकत की हे पर्यायी जीवन काय असु शकते ते. मला उत्सुकता आहे.
माझ्या ओळखीतला एक माणुस मर्चंट नेव्हीत कॅडेट म्हणुन गेला आणि आता ऑइल टँकरचा कॅप्टन म्हणुन काम करतो. हे पर्यायी होइल का? एक दुरचा नातेवाईक स्कॉड्रन लिडर आहे. हे पर्यायी होउ शकते का? दुर्दैवानी हे दोघेही पारंपारीक शाळेतलेच होते.
आधीच्या पिढीतल्या लोकांकडुन कोणी संघकार्याला वाहुन वगैरे घेतल्याचे ऐकायचे.
बाकी माझ्या दुरदुरच्या माहीतीत कोणी हुसेन, भिमसेन वगैरे नाहीत.
हाच अडथळा असतो आपल्या
हाच अडथळा असतो आपल्या विचारातला. पर्यायी म्हटलं की आपल्याला मोठं आणि प्रसिद्धच व्हायला हवं असं वाटतं त्यामुळे पर्यायी मार्ग निवडला जात नाही. साधीसुधी नोकरी करणारा आणि आपल्या गाण्याचा छंद जोपासणारा त्यात आनंद मिळवणारा आजूबाजूंच्यात वाटणारा माणूस हा पर्यायी मार्ग चोखाळून यशस्वी झालाय असं आपल्याला वाटत नाही. तो सेलिब्रिटी बनला तर यशस्वी.
प्रतिसाद अतिशय आवडला.
प्रतिसाद अतिशय आवडला.
(लेख आणि विषयाबद्दल वाचनमात्र.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
+१
काल्विन अँड होब्स वाल्या आमच्या बिल वॉटरसनकाकांची प्रचंड आठवण आली हे वाचून
.
त्यांचा एक ब्लॉग वाचला होता.
त्यातला एक उतारा -
Creating a life that reflects your values and satisfies your soul is a rare achievement. In a culture that relentlessly promotes avarice and excess as the good life, a person happy doing his own work is usually considered an eccentric, if not a subversive. Ambition is only understood if it’s to rise to the top of some imaginary ladder of success. Someone who takes an undemanding job because it affords him the time to pursue other interests and activities is considered a flake. A person who abandons a career in order to stay home and raise children is considered not to be living up to his potential — as if a job title and salary are the sole measure of human worth.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
साधीसुधी नोकरी करुन छंद
साधीसुधी नोकरी करुन छंद जोपासणारे लाखो लोक असतात. बहुतेक नोकरदार लोक हेच करतात त्यामुळे त्याला पर्यायी नाही म्हणता यायचं. पुलंनी "असा मी असामी" मधला सामान्य नायक आणि सामान्य माणसाच्या आयुष्याचीही यशस्विता सांगितली आहेच. पण मग सामान्य आयुष्यात शाळा-बिळा, नोकरी-बिकरी, छंद-बिंद हेही चारचौघांसारखेच असतात ना? त्यात वेगळेपणा तरी कशाला शोधायचा असा माझा प्रामाणिक प्रश्न आहे.
पारंपारिक शाळेत शिकलेले लोकही नोकरी सांभाळून काही ना काही स्वानंदापुरता छंद करतात हे यामागचे बेसिस आहे. (मराठी संस्थळावर फुटकळ गोष्टी लिहीणारे माझ्यासारखे पुष्कळ असतात).
साधीसुधी नोकरी करुन छंद
असं नव्हतं मला म्हणायचं. तुम्हाला नोकरीत पुढे जायची संधी असूनही पुढे न जाता, आणि स्वतःच्या पॅशनचं पैसा मिळवण्याचं मशिन करायची पुरेपूर शक्यता उपलब्ध असतानाही स्वतःच्या विषयाशी तडजोड करायची नाही म्हणून शांतपणे चांगलं जीवन जगणारा माणूस यशस्वी वाटत नाही आपल्याला.
छंद आणि पॅशन या वेगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं.
(आधीच्या प्रतिसादात मीच चुकून छंद शब्द वापरला हे आता पाहिलें मी पण मला हे म्हणायचं होतं.)
वाटतो ना यशस्वी असा माणुस. पण
वाटतो ना यशस्वी असा माणुस. पण मुळ प्रश्न असा आहे की त्यात अपारंपारीक शाळांचे कॉट्रीब्युशन काय?
अपारंपारीक शाळांमधले विद्यार्थी वयाच्या ह्या स्टेज ला पोचले आहेत का कन्क्लुजन काढण्या साठी.
तसेच अपारंपारीक शाळांमधे मुलांना घालणारे पालक मुळातच चांगल्या आर्थिक परीस्थितीतले असण्याची शक्यता जास्त. त्यामुळे मुलांना तडजोड न करणे शक्य आहे.
मुळात अपारंपारीक शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या बद्दल विदा जमायला चालु होण्यासच अजुन काही वर्ष लागतील. काही अर्थ लावण्या इतका विदा जमायला तर बरीच वर्षे.
ह्यात काय हो, जवळजवळ सर्वच
ह्यात काय हो, जवळजवळ सर्वच असे काहीतरी करतात. त्यात अपारंपारीक शाळांचा रोल काय आहे?
छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळवणे किंवा छंद जपणे हा स्वभावाचा भाग आहे.
छोट्या छोट्या गोष्टीत आनंद
हा स्वभाव घडवण्यात शाळांचाही वाटा असतो. अनेकदा प्रस्थापित व्यवस्थेत फक्त मला हवंय म्हणून किंवा मला आनंद मिळवायचाय म्हणून एखादी गोष्ट करताना एखाद्या गुन्हेगारासारखं वाटावं अशी मानसिकता निर्माण केली जाते (याला नुसती शाळाच जबाबदार नसली तरी त्या वयात शाळा एक मुख्य बाब आहे).
"हे हे करून काय फायदा?" अशी निव्वळ व्यवहारी वृत्ती शाळेत चांगलीच भिनवली जाते. अवचट म्हणत ते आठवते "शाळेने काय दिले असेल तर तो न्यूनगंड!"
२१ अपेक्षित प्रश्न हे परिक्षेत मार्क देत असले तरी प्रत्यक्ष आयुष्यातील प्रश्न नेहमी असे अपेक्षित संचातूनच येण्याची सवय लागणे/तशीच अपेक्षा ठेवणे घातक आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
तुम्ही नक्की कोणत्या बाजूने
तुम्ही नक्की कोणत्या बाजूने बोलत आहात ते कळले नाही.
तेच तर; पर्यायी शाळेत असा न्यूनगंड न मिळालेल्या मुलाने आनंदासाठी व्यावहारिकदृष्ट्या ओढगस्तीचे जीवन स्वखुशीने स्विकारण्याचा 'धोका' जास्त नाही का? त्याला पालकांची कितपत तयारी किंवा अनुमोदन असते तेच मला विचारायचे आहे.
मी बाजु घेऊन लिहित नाहीये,
मी बाजु घेऊन लिहित नाहीये, केवळ मनातील (उलट-सुलट) विचार मांडतोय.
माझ्या मते हा धोका नाही. जर ओढगस्तीचे जीवन त्याला आनंद देत असेल तर ते खुश्शाल स्वीकारावे, पण आवडत नसतानाही त्यात घुसमटू नये. किमान हा चॉइस करण्याची क्षमता (सक्षमता म्हणुया ) जागृत व्हावी असे पर्यायी शाळेत घालणार्या पालकांना वाटत असु शकते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
"हे हे करून काय फायदा?" अशी
माझे उलट मत आहे. "हे हे करुन काय फायदा?" असे प्रश्न मुलांच्या आणि पालकांच्या मनात येत असतात. उदा. भुगोलातील बालिश लेव्हल ची माहीती पाठ करणे. संकृत शिकणे ( किंवा हिंदी ). तसे तर मराठी हा विषय का आहे शिक्षणात? असले प्रश्न येतच असतात. जे पूर्ण पणे योग्य आहेत.
तरी मुलांना ते शिकायला लागते.
हा अवचटांचा प्रोब्लेम आहे. त्यांना मेडीकल कॉलेज नी पण काही ( बायको सोडुन ) दिले नाही. मग BJ Medical व्यर्थ आहे का?
उलट BJ Medical मधुन अतिशय हुशार आणि ज्ञानी डॉक्टर निपजले ( जे आवडीने डॉक्टरकी करतात ) पण अवचट मात्र शिक्षण वाया घालवून बसले. हा त्या कॉलेज चा प्रॉब्लेम का अवचटांचा?
हा अवचटांचा प्रोब्लेम आहे.
ठ्ठो
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
संस्कृत किंवा हिंदी किंवा
संस्कृत किंवा हिंदी किंवा मराठी का शिकायची? हा प्रश्न तुम्हाला योग्य वाटतो?
असं असेल तर प्रश्नच मिटला?
ह्या गोष्टी शिकायला शाळेची
ह्या गोष्टी शिकायला शाळेची गरज नाही, आवड असली तर मोठे पणी आपल्याला पाहीजे ते वाचन करता येते. लिहणे वाचण्या पुरती मराठी ( हिंदी ) येत असेल तर मराठी साहीत्य वाचू शकतो माणुस. त्या साठी १० वर्ष शाळेत तो विषय शिकवायची काय गरज आहे? ज्याला नसेलच आवड त्याला १० वर्ष मराठी चे पेपर द्यायला लावण्यात काय अर्थ आहे?
तुम्हाला जर असे वाटत असेल की १० वर्ष मराठीचे पेपर द्यायला लावले म्हणजे साहीत्याची आवड निर्माण होते तर १० कोटी मराठी लोकांना साहीत्याची आवड असती.
हो मग १० कोटी लोकांना एवढी
हो का? मग १० कोटी लोकांना एवढी वर्षं गणिताचे पेपर द्यायला लावलेत तेही गणित हाच विषय महत्वाचा असं कानीकपाळी ओरडून. किती गणितज तयार झाले. आणि सायंटीस्ट?
ईथेच तुम्ही नकळत पर्यायी शाळांचे महत्व अधोरेखित करत आहात. नुसते परिक्षा आणि पेपर आणि गुण यांच्या मागे न जाणारी शिक्षणाची आवड त्यांनी लावावी हीच अपेक्षा असते. पण आपल्या "गुणाधिष्ठित" शिक्षणपद्धतीला आणि समाजमनाला ते पूरक ठरत नाही.
पर्यायी ही शिकवण्याची पद्धत या दृष्टीने वापरलेला शब्द आहे त्याला पर्यायी जीवन काय वैगेरे म्हणत उगाच फाटे फोडले जात आहेत.
गणित आणी शास्त्र शिकावेच
गणित आणी शास्त्र शिकावेच लागते, स्वताचे स्वता येत नाही. म्हणुन शाळेत हे विषय असणे आवश्यक आहेत.
लिहीता वाचता येत असेल तर कोणीही न शिकवता साहीत्याचा आनंद घेता येतो, इतकेच काय स्वता साहित्य निर्माण पण करता येते.
नाही अनु राव, प्रत्येक
नाही अनु राव, प्रत्येक कवितेचे रसग्रहण उलगडून आमच्या बाईंनी सांगीतले व मुख्य म्हणजे आई ही मराठीची शिक्षिका होती अन तिने कवितेतील सौंदर्य अगदी उत्तम शिकविले म्हणून आज मला कवितेइतकं काहीही आवडत नाही. कवितेच्या बळावर मी एकटेपण देखील स्वीकारु शकते (स्वीकारलेले नाही) कारण कविता वाचताना एकटेपण जाणवत सुद्धा नाही. मराठीच्या सर्वच (आई धरुन) शिक्षकांनी अतिशय समृद्ध केले. इतके की हिंदी व इंग्रजी कवितेचीही गोडी लागली. अगदी संस्कृत स्तोत्रांचीही.
Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down
हिंदी मराठी माहित नाही पण
हिंदी मराठी माहित नाही पण संस्कृतपेक्षा जर्मन शिकणं चांगलं असा प्रश्न इथे अनेकांना पडला होता.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
अवचट
माझ्या माहितीनुसार अवचट पतीपत्नींनी हे काम उभं केलेलं आहे आणि ते महत्त्वाचं आहे. डी-अॅडिक्शनमध्ये प्रशिक्षित डॉक्टरचं काही कामच नाही असं मला वाटत नाही. शिवाय, खाजगी प्रॅक्टिस वगैरे करून बक्कळ पैसे कमावणारे माझ्या माहितीतले बीजेमधले इतर काही डॉक्टर आणि हे काम ह्यांत पुष्कळ फरकही आहे. टाइमपास करण्याच्या नादात आपण अंमळ वाहावत तर जात नाही आहात ना?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पत्नीने काम उभे केले आहे. ते
पत्नीने काम उभे केले आहे. ते सुद्धा खुप नंतर.
ह्यात डॉक्टरचे काय काम आहे? आणि व्यसन्मुक्ती केंद्र चालू करण्यासाठी डॉक्टर असावे लागते का?
अजिबात नाही. वर कोणीतरी अवचट असे म्हणले होते असे लिहीले होते. अवचट जे म्हणतात ते बरोबर असते असे नाही. आणि ते बरोबर वाटावे अशीही परिस्थिती नाही. त्यांचा उल्लेख आला म्ह्णुन त्यांच्या मेडीकल शिक्षणाचा पण उल्लेख करावा लागला. मला एकूणच त्यांची विचार करण्याची पद्धत दाखवायची होती.
डॉक्टरांचं कामच काय?
डी-अॅडिक्शनमध्ये डॉक्टरचं काही कामच नाही असं हे वाचून मला तरी वाटलं नाही. शिवाय, व्यसनमुक्ती केंद्र उभारण्याची क्षमता अवचट पतीपत्नींत असू शकेल असं वाटण्यामागे अनिल अवचटांनी लिहिलेलं 'गर्द' हे पुस्तकही एक घटक होता असंसुद्धा त्यात म्हटलं आहे.
असो. आपला सर्वच क्षेत्रांत प्रचंड व्यासंग असल्यामुळे मी पामर ह्या बाबतीत अधिक बोलू इच्छित नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
शिवाय, खाजगी प्रॅक्टिस वगैरे
माझ्या मते "खाजगी प्रॅक्टिस वगैरे करून बक्कळ पैसे कमावणार" अश्या डॉक्टरांचे काम जास्त चांगले आहे. समाजाला ह्या डॉक्टर लोकांची गरज आहे. अश्या कष्ट करुन पैसे कमवणार्या लोकांच्या पैश्यावरच अवचटांचे केंद्र उभे आहे.
हा अवचटांचा प्रोब्लेम आहे.
एकच नंबर प्रतिसाद! तोडलंस मैत्रिणी*.
*इफ आय क्यान से सो.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
तुमच्या एकुण बोलण्याचा रोख
@ अनु रावः
तुमच्या एकुण बोलण्याचा रोख पर्यायी शाळेला विरोध करणारा वाटतो. ते तुमचे वयत्तिक मत असल्यामुळे माझी काही हरकत नाही. पण तुम्ही म्हणता त्या प्रमाणे 'छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळवणे किंवा छंद जपणे हा स्वभावाचा भाग आहे.' तर एकुणच सन्स्कार ह्या गोष्टीला काही फारसा अर्थ नाही असेही म्हणावे लागेल आणि ते मला पटत नाहिये. जर सगळे काही माझ्या आतच आहे तर मला पारम्पारिक शाळेची तरी काय गरज?
मला पण असे वाटते कि पर्यायी शाळा जर उपलब्ध असतील तर मी माझ्या मुलाला नक्कीच त्या शाळेत घालीन. त्याला जर वेगवेगळ्या गोष्टी करुन बघायला मिळणार असतील तर मला त्याला ते अवकाश द्यायला अवडेल मराठी माध्यमातून शिकल्याने त्याला व्यक्त व्हायला मदतच होईल असेही वाटते. बाकी आई बाबा ला लक्ष हे द्यावेच लागेल ना? आपलीच तर मुले आहेत!
ननि, प्रश्न खूप आवडला.
ननि, प्रश्न खूप आवडला. विचारात पाडणारा आहे. या दृष्टीने विचार केला नव्हता.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पर्याय
पर्यायी जीवन ही खूप लांबची गोष्ट झाली. जगात पुष्कळ ज्ञानक्षेत्रं आहेत आणि डॉक्टर किंवा इंजिनियर (आणि आता कदाचित एमबीएसुद्धा) होण्याव्यतिरिक्त इतर व्यवसायांचे पर्यायही उपलब्ध असतात ह्याची जाणीव झाली, आणि त्या ज्ञानक्षेत्रांतला मुलांचा अंगभूत असलेला कल ओळखण्यात किंवा आवड जोपासण्यात मदत झाली तरीही अशा शाळांची पुष्कळ मदत होईल.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
+१कल ओळखण्यात, जोपासण्यात
+१
कल ओळखण्यात, जोपासण्यात आणि तसा कल असण्यात काही वाईट नाही ह्याबद्द्ल विश्वास निर्माण करण्यास अशा शाळांची पुष्कळ मदत होईल.
मला ही हेच मह्त्वाचे वाटते.
मला ही हेच मह्त्वाचे वाटते. शाळांचे मुलभुत काम मुलांमध्ये आपल्या ज्ञानाबद्दल आत्मविश्वास निर्माण करणे हेच आहे... हे साध्य जी शाळा करते ती चांगली मग ती पारंपारीक असो वा नसो. ज्या व्यक्तीला आपल्या ज्ञानाबद्दल आत्मविश्वास असतो तो कुठेही डगमगत नाही. आणी आयुष्यात ही शिदोरी सगळ्यात महत्वाची आहे.
actions not reactions..!...!
??
अनु राव:
तुमच्या लिस्टमधला टोन मला कळला नाही. तो जास्त सिनिकल वाटतो. एखाद्या व्यक्तिला वा कुटूंबाला वा समाजाला मुख्यधारे मधल्या मर्यादा समजून घेतल्यावर पर्यायी मार्ग शोधावासा वाटू शकतो. अर्थात, मुख्य धारा काय वा कोणती असेही आपण विचारू शकतो. पण, ‘पर्याय’ हा तितकाच गंभीर असू शकतो, नाही का? तो त्याच्या/तिच्या जीवनप्रणालीचा/धारणेचा भाग असू शकतो. सोलर एनर्जी, पाण्याचा जपून वापर करण्यासाठीच्या उपाययोजना, पेट्रोलचा वापर करण्याऐवजी चालत/सायकलने जाणे. ही काही ढोबळ उदाहरणे. अर्थात, या किंवा अशा विविध उदाहरणांची चेष्टा होऊ शकते. पण, त्या त्या टप्प्यावर, त्या त्या समाजासाठी तो विचार/ती कृती महत्वाची असू शकते.
तो प्रतिसाद मी उगाचच टाईम पास
तो प्रतिसाद मी उगाचच टाईम पास म्हणुन लिहीला होता, म्हणुनच हसणारी बाहुली पण टाकली होती.
बापरे
शाळेसाठी इतका विचार पालकांना करावा लागतो हे वाचून खरंच हादरलोय.
पर्यायी की वेगळी परंपरा?
लेख आवडला. माहितीपूर्ण आणि सविस्तर आहे. शिवाय, शाळा, ह्या विषयांवर उहापोह व्हायलाच पाहिजे असं मला वाटतं.
थोरामोठ्यांची मुलं, व्यवस्थापन, हे विषय जरा वेगळे काढून मुळात पर्यायी शाळा पर्यायी का आहे? हा प्रश्न विचारायला पाहिजे. पारंपारिक शाळांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं, एवढ्याच मुद्द्यावर पर्यायी शाळा यशस्वी होऊ शकत नाही. त्यामागचं शैक्षणिक तत्वज्ञान काय आहे? आणि ते प्रत्यक्षात कसं आणि कितपत राबवता येतं/राबवलं जातं, हे तपासून पाहणं महत्त्वाचं आहे, हा माझा गोषवारा आहे. तुमच्या लेखावरून ती शाळा अमेरिकन पद्धतीचे अंधानुकरण करणारी वाटली, कारण इथेही विषयातील गतीप्रमाणे मुलं वेगवेगळ्या विषयांच्या वेगवेगळ्या सेक्शनला बसू शकतात, आणि युनिफॉर्म नाहीत वगैरे.
अर्थात, पालक म्हणून आपल्याला समस्येची केवळ एकच बाजू दिसते. शिक्षकांची बाजू जाणून घ्यायला हवी. प्रत्येक शाळा किती वर्षांपासून आणि कशी "इव्हॉल्व" होतीये, हे कळलं तरीही खूप फरक पडेल मला वाटतं.
पर्यायी शाळा पारंपारिक
पर्यायी शाळा पारंपारिक शाळांपेक्षा महाग का असाव्यात? लॉजिकली त्या स्वस्त असाव्यात असे वाटते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
किती पर्यायी शाळांची फी ही
किती पर्यायी शाळांची फी ही पारंपरिक शाळांपेक्षा जास्त असते याबद्दल काही विदा आहे का?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पारंपारिक शाळांत फि अत्यंत
पारंपारिक शाळांत फि अत्यंत कमी ते अत्यंत जास्त अशी काहीही असते. पण तरीही दिल्लीत प्रतिष्ठीत+श्रीमंत शाळांत अॅडमिशन २ लाख रु च्या आसपास ला असते. (यात लाखभर रिफंड असतात.) दरमाही फीस ७०००-९००० + ट्रान्सपोर्ट
-----------------------------
गेल्या पंधरा दिवसात आम्ही तिसरीपासून मुलाला प्रिसिडियम नावाच्या अपारंपारिक शाळेत (=परीक्षा नसणे, इतर उद्योग असणे) घालायचा विचार करत होतो. तिथे सुरुवातीला ३.५ लाख फीस आहे (यातही लाखभर रिफंडेबल आहेत). वर दर महिन्याला १२७०० रु फी आणि २७०० रु ट्रान्सपोर्ट इ इ . धिस वॉज लाइक टू मच.
--------------
प्रश्न हा आहे पारंपारिक शाळा "जवळजवळ फुकट" ते "ठिकपैकी महाग" पैकी काहीही असते. अपारंपारिक फक्त महागच असतात.
------------------
परवडत नाही, वर्थ नाही इ इ म्हणून मी ते सोडून दिलं आहे. (शिवाय श्रीमंतांची थेरं म्हणत स्वतःचं समाधान करून घेतोय. असं म्हणायला कारण नाही. माझ्यात अँटी-गब्बर इलिमेंट्स आहेत त्याचा परिणाम!!!)
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
दिल्ली = भारत हे नवीन इक्वेशन
दिल्ली = भारत हे नवीन इक्वेशन कळालं. धन्यवाद.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
विनम्रपणे वरचा अख्खा प्रतिसाद
विनम्रपणे वरचा अख्खा प्रतिसाद मागे घेत आहे. संपादकांना तो हटवण्याची विनंती. I don't want the things to mean the things that I don't want to mean.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
त्या शाळेबद्दल कल्पना नाही.
त्या शाळेबद्दल कल्पना नाही. मात्र कमी विद्यार्थी संख्या, सरकारी ग्रांट नसणे वगैरे कारणाने अधिक फी असु शकेल असे वाटते.
कारण कमी विद्यार्थी असले मेंटेनन्स व ऑपरेशनल खर्च तितक्या प्रमाणात कमी होत नसावेत.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हे सगळे पारंपारिक शाळांत
हे सगळे पारंपारिक शाळांत देखिल असते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
नै कळले. कमी फी असणार्या
नै कळले. कमी फी असणार्या पारंपारिक शाळेत विद्यार्थीसंख्या कमी असते?
==
माझ्या माहितीतल्या पर्यायी मराठी शाळांची फी पारंपरिक शाळांएवढीच वा आसपास आहे, तर अक्षरनंदनसारख्या सेमीपर्यायी शाळांची फी तर भरपूरच कमी आहे (वर्षाला १३०००)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पाने