एनआरआयची भारतभेट...
मिलिंद बोकिलांचं झेन गार्डन बर्याच काळाने पुन्हा उघडलं आणि पायर्या ही गोष्ट वाचली. सिंगापूरमधे कष्टाने सेटल झालेला बिझनेसमन श्रीपाद बर्याच वर्षांनी भारतात आपल्या एका मैत्रिणीला, जयाला आणि तिच्या फॅमिलीला फाईव्ह स्टार हॉटेलात भेटतो. जयाचा नवरा अशोकसुद्धा पूर्वी चळवळीतच असतो. तेव्हाचे त्यांचे संदर्भ, तरुण वयात चळवळीत असणारे हे तिघे आणि त्यांच्या इतर मित्रांचे संदर्भ.. आणि आताची वागणूक. तत्वांचा फोलपणा, परदेशातून आलेल्या मित्राकडून गिफ्ट्स, फाईव्ह स्टार खाना जमेल तितका वसूल करण्याची वृत्ती, अगदी आपण एरवी जिकडे जातही नाही अशा महागड्या ठिकाणी जाऊन त्याच्या खर्चाने हौस भागवून घेणं, आणि बरंच कायकाय. आणि वरुन जयाचं फाईव्ह स्टार अन्नाचा बकाणा तोंडात असतानाच श्रीपादला "पैशाच्या मागे गेलेला, प्रतिपक्षाला जाऊन मिळालेला भांडवलवादी" वगैरे म्हणणं..लहान मुलानेसुद्धा गिफ्ट मागून वसूल करणं..
अर्थात श्रीपादचीही एक अनावश्यक वा आवश्यक असो पण "गिफ्ट देण्याची" मानसिकता आहेच..ती खूप सटल आहे. ही दोन्ही बाजूंची मानसिकता कथेत मस्त आणि सहज दिसते.
वर्षा-दोन वर्षांतून, अन कधीकधी पाचदहा वर्षांनी एन आर आय लोक भारतात सुट्टी काढून येतात. महिना, पंधरा दिवस. त्या काळात येणार्या काही अनुभवांचं वर्णन "फॉर हिअर ऑर टु गो" या पुस्तकात थोडंसं वाचलं होतं.
माहेरी चार दिवस, सासरी चार दिवस, मित्रांसाठी पुण्यामुंबईत दोन दिवस, घरच्या इतर कौटुंबिक अन सरकारी भानगडी निस्तरण्यात आठवडा. वेगवेगळ्या प्रकारची जेवणं. तिथे सहज न मिळणारी घरगुती चव शोधायला जाणं अन इथेही तिकडच्याच पदार्थांची इंडियनाइज्ड व्हर्शन मिळणं. अनेक प्रतिमाभंग. असं बरंच काही असावं असं ऐकून अन वाचून वाटलं.
प्रत्यक्ष अनुभव मात्र फार थोडे लोक सांगतात. फारच थोडे. कडवटपणा नको म्हणून टाळत असतील.
भारतीय लोकांचेही अशा फ्लाईंग व्हिजिटवर आलेल्या परदेशी पाहुण्यांबद्दल ग्रह असतात. अॅटिट्यूड असतात.
परदेशात राहणार्या अन इथल्या अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचे काय अनुभव आहेत? खरंच असे गिफ्टवसुली करणारे, फेवर्स मागणारे लोक प्रातिनिधिक म्हणता येतील का?
काही प्रश्न, टु बिगिन विथः
-ते तिकडे मजा करत आहेत आणि आपण इकडे देशाची अन घराची जबाबदारी घेत आहोत असा भारतातल्या नातेवाईकांचा /मित्रांचा अॅटिट्यूड भासतो का?
-मत्सर हेवा दिसतो का?
-भारतात आता आर्थिक चित्र बदललं आहे त्याने काही फरक पडला आहे का? अप्रूप कमी झालंय का?
-इम्पोर्टेड चॉकलेट्स, खेळणी, गिफ्ट्स यांसाठी लोक आवर्जून भेटतात का? परदेशी मित्राकडून, अंकल-आंटींकडून गिफ्ट मिळणे ही इच्छा भेटीचा एक मुख्य भाग असतो का?
-तिकडच्या श्रीमंतीचं प्रदर्शन इकडे केलं जातं का?
-तिकडची समृद्धता इथल्या भाऊबंदांना कळावी अशी (स्वाभाविक?!) इच्छा असते का? ती दाखवण्यासाठी ताण घेऊन भेटवस्तू आणल्या जातात का?
-भेटवस्तू न आणल्यास नाराजी दिसते का भारतात?
-नातेवाईक स्थळ यादृष्टीने किंवा तिकडे सेटल होण्यासाठी मार्गदर्शन, मदत अशा कार॑णांनी मागे लागतात का? ते तेवढ्यासाठीच तुम्हाला भेटताहेत अशी भावना येते का? त्यांना मदत करायला आवडतं का?
-चुटपुट लागल्याने नकोच ती भारतभेट असं वाटतं का?
-परदेशात सेटल झाल्यावर अनेक वर्षांनी प्रथम मुलं आणि मग जनरली पत्नी भारतात आठवडाभरही यायला साफ नकार देते अन एकटा पुरुषमाणूस येऊन झेंडावंदन (फॉर्मॅलिटीज) करुन जातो असं उगीचच मला तरी वाटत आलेलं आहे. हे कॉमन आहे का?
अनेक प्रश्न मनात येतात अधुनमधून, पण या कथेच्या निमित्ताने ते विचारावेसे वाटले इतकंच.
परदेश म्हणजे या ठिकाणी प्रगत देश असं समजलेलं आहे. तिथे समृद्धी आहे असं गृहीत धरुन. अमेरिका, युरोपातले काही देश, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा वगैरे.
आपला प्रश्न रोचक आहे.
पण इंटरनेट ही गरज तसेच आधुनीक तंत्रज्ञान आणी मनोरंजनाचा खजीना आहे, जगातील सर्वोत्तम वा आधुनीक ज्याला गणले जाते असे जिवनव्यापी तंत्रज्ञान आहे. त्यामुळे नेट स्पिड हा फॅक्टर सोडला तर अमेरिका व भारतातील(सर्वसामान्य ) लोकं जेंव्हा जवळपास एकसमान गोष्ट उपभोगतात जी आधुनीक आहे... लोकांनी "असा विचार" करणे फार चुकीचे नाही. अर्थात इतर घटकही या अनुशंगाने विस्तृत करता येतिल पण हा प्रमुख असे वाटते.
-ते तिकडे मजा करत आहेत आणि
-ते तिकडे मजा करत आहेत आणि आपण इकडे देशाची अन घराची जबाबदारी घेत आहोत असा भारतातल्या नातेवाईकांचा /मित्रांचा अॅटिट्यूड भासतो का?
घराची आणी देशाची सोडुन द्या, पण म्हातार्या आई वडीलांची काळजी बाकीच्या भावंडावर पडल्यामुळे चीडचीड नक्कीच होते आणि ती सहाजिक आहे. त्यात काही म्हातार्या माणसांना परदेशात असलेल्या मुलांचा जास्त पुळका आणि कौतुक असते त्याने तर ती चीडचीड अजुनच वाढते.
भारतात आता आर्थिक चित्र बदललं आहे त्याने काही फरक पडला आहे का? अप्रूप कमी झालंय का?
नक्कीच चित्र बदलले आहे. आता आमच्या सारखे येणारे लोक पण अॅक्सेंट वगैरे लावून बोलत नाही. तसेही फोन वगैरे नी सातत्यानी संपर्कात असल्यामुळे गॅप पडली आहे असे वाटत नाही.
-नातेवाईक स्थळ यादृष्टीने किंवा तिकडे सेटल होण्यासाठी मार्गदर्शन, मदत अशा कार॑णांनी मागे लागतात का? ते तेवढ्यासाठीच तुम्हाला भेटताहेत अशी भावना येते का? त्यांना मदत करायला आवडतं का?
वेळ पडली तर मुलांच्या शिक्षणाची परदेशात सोय ह्या एनआरआय नी करावी अशी थोडी अपेक्षा असते.
बाकी भेटवस्तू वगैरेचे फार काही अप्रुप राहीले नाहीये.
-तिकडच्या श्रीमंतीचं प्रदर्शन इकडे केलं जातं का?
सर्जन वगैरे असतील तर ठीक आहे पण आमच्या सारखे सामान्य एनाआराय श्रीमंत वगैरे नसतात ( पर्चेसिंग पॉवर च्या हिशोबानी )
सर्जन वगैरे असतील तर ठीक आहे
सर्जन वगैरे असतील तर ठीक आहे पण आमच्या सारखे सामान्य एनाआराय श्रीमंत वगैरे नसतात ( पर्चेसिंग पॉवर च्या हिशोबानी )
हे बरोबर आहे. आणि हेच फार वेळा उघड होत नाही. "तुम्ही काय राव अमेरिकेत dollar छापता…" किंवा "महिन्याला ५०००$ म्हणजे अडीच लाख रुपये…. बापो…" असली वाक्यं ऐकवली जातात. त्या ५००० मध्ये घर कसं चालतं ते कळून घेण्याच्या भानगडीत फारसं कुणी पडत नाही…
मी इथला. त्यानुशंगाने प्रतिसाद लिहत आहे.
-ते तिकडे मजा करत आहेत आणि आपण इकडे देशाची अन घराची जबाबदारी घेत आहोत असा भारतातल्या नातेवाईकांचा /मित्रांचा अॅटिट्यूड भासतो का?
ते तिकडे फक्त मजा करतात असे वाटत नाही पण जी मजा करता ती इकडे करायला मिळत नाही याची खंत वाटते. (उदा. डिस्नेलँड, स्ट्रीपटीज वगैरे...) तिकडे हार्ले डेवीडसन बाळगणारा इकडे आल्यावर बुलेटला १ मिनीटही विश्रांती देत नाही यावरुन आनंदात फार फरक आहे वाटत नाही पण तरीही... जरासं...
-मत्सर हेवा दिसतो का?
हेवा त्यंच्या आनंदाचा नाही पण अॅकंप्लीशमेंटचा थोडासा वाटतो.
-भारतात आता आर्थिक चित्र बदललं आहे त्याने काही फरक पडला आहे का? अप्रूप कमी झालंय का?
आर्थिक चित्र नक्किच बदलत आहे अन अप्रुपही कमी झालय पण तरीही चित्र बदललं आहे असं ठामपणे म्हणता येत नाही.
-इम्पोर्टेड चॉकलेट्स, खेळणी, गिफ्ट्स यांसाठी लोक आवर्जून भेटतात का? परदेशी मित्राकडून, अंकल-आंटींकडून गिफ्ट मिळणे ही इच्छा भेटीचा एक मुख्य भाग असतो का?
मी चॉकलेट्स आवर्जुन आणायला आजही सांगतो. बाकी गिफ्ट मिळणे ही इच्छा भेटीचा एक मुख्य भाग मला माझ्या बालपणी नक्किच होता. व्हीडीओ गेम्स, टीशर्ट अन चॉकलेट मला गिफ्ट मिळावेत असं प्रचंड अगदी आतुन वाटायचं, व्हीडीओगेम्स बाबत पालकांनी तंबी दिलेली असायची पण कपडे अन खादाडीची अपेक्षा रहायचीच. आता फक्त चॉकलेट्स :) अगदी व्यावसायीक संबंध असलेली व्यक्ती जरी बाहेरुन भेटायला आली त्यांनाही (एंबरेसिंग वाटो अथवा न वाटो) चॉकलेट् आवश्य आणा असेच म्हणतो.
-तिकडच्या श्रीमंतीचं प्रदर्शन इकडे केलं जातं का?
नाही वाटत.
-तिकडची समृद्धता इथल्या भाऊबंदांना कळावी अशी (स्वाभाविक?!) इच्छा असते का? ती दाखवण्यासाठी ताण घेऊन भेटवस्तू आणल्या जातात का?
कल्पना नाही.
-भेटवस्तू न आणल्यास नाराजी दिसते का भारतात?
हो.
-नातेवाईक स्थळ यादृष्टीने किंवा तिकडे सेटल होण्यासाठी मार्गदर्शन, मदत अशा कार॑णांनी मागे लागतात का? ते तेवढ्यासाठीच तुम्हाला भेटताहेत अशी भावना येते का? त्यांना मदत करायला आवडतं का?
हे चालायचेच.
-परदेशात सेटल झाल्यावर अनेक वर्षांनी प्रथम मुलं आणि मग जनरली पत्नी भारतात आठवडाभरही यायला साफ नकार देते अन एकटा पुरुषमाणूस येऊन झेंडावंदन (फॉर्मॅलिटीज) करुन जातो असं उगीचच मला तरी वाटत आलेलं आहे. हे कॉमन आहे का?
हो.
अनेक प्रश्न मनात येतात अधुनमधून, पण या कथेच्या निमित्ताने ते विचारावेसे वाटले इतकंच.
आवडलं.
परदेश म्हणजे या ठिकाणी प्रगत देश असं समजलेलं आहे. तिथे समृद्धी आहे असं गृहीत धरुन. अमेरिका, युरोपातले काही देश, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा वगैरे.
मेरे मुकी बात छिनली.
एनआरआय मित्र
एकदोन मित्र अमेरिकेत आहेत. त्यापैकी एक प्रोजेक्टवर जाऊन येऊन असतो तर दुसरा आता तेथेच सेटल व्हायच्या विचारात आहे. दोघेही दिवाळीच्या सणाला सेंटी होतात आणि (भारतातल्या) अपरात्री फोन करुन शुभेच्छा देतात. अधूनमधून फोनवर गप्पा होतात. त्यापैकी एक आहे तो प्रिय अमुचा भारत देश हा टाईपचा आहे तर दुसरा एक्स प्रिय अमुचा भारत देश हा टाईपचा आहे. मागच्या भारतभेटीत मला म्हणाला की आता ३-४ वर्षे जाऊन येतो मग इथेच सेटल होतो पण मग तिकडे गेला तर आता तिथेच राहायच म्हणतोय. हिरवं कार्ड मिळालय त्याला. आमचे बोलणे प्रामुख्याने तिकडे कसली टेक्नोलॉजी चालू आहे ती भारतात आहे काय अशा विषयावर गप्पा होतात. इन्फ्रास्ट्रक्चरवर गप्पा होतात. बाकी तिकडच्या राजकारणावर बोलणारा मित्र मला अजून भेटायचाय. भारतात काम करताना याचीमारु की त्याचीमारु प्रकारचे काम करता येते. ( हे ही कर आणि तेही कर चे जापानीच वर्जन) पण परदेशात कामातल्या काही ठराविक भागावरच काम करता येते त्याबद्द्ल मित्राला हळहळ वाटते.
इकडे आल्यावर त्याला ट्राफीक, प्रदुषण इ. नकोसे वाटते तेव्हा तो उगाचच शायनिंग मारतोय असे वाटत नाही किंवा त्यात इथल्या गोष्टींचा अपमान करायचा असतो असा टोन वाटत नाही. ती एक इन जनरल टिपण्णी असते एवढेच. त्याचप्रमाणे तो एनआरआय आहे म्हणून मला हेवा वाटत नाही. मात्र तिथे मिळणारी काही काही गॅझेटस इथे मिळत नाही म्हणून कधी कधी खेद वाटतो. (लॅपटॉप, फोन्स साठी मी इथे गॅझेट शब्द वापरला नाहिये.)
काही ओळखीतली मंडळी तिथून महागडे लॅपटॉप्स घेऊन येतात व आम्हाला कसा स्वस्तात पडला त्याचे गुणगाण करतात तेव्हा मात्र ते माझ्या डोक्यात जातात. "याची इंटरनॅशनल वॉरंटी घेतलीय काय ? की खराब झाल्यावर रिपेअर करायला परत युएसला जाणार असे विचारले की मग त्यांचे चेहरे पाहण्यासारखे होतात. मात्र जे जाण्यापुर्वी अगोदरच विचारतात त्यांना ही गोष्ट आवर्जून सांगतो.
बाकी तुमच्या प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे
-ते तिकडे मजा करत आहेत आणि आपण इकडे देशाची अन घराची जबाबदारी घेत आहोत असा भारतातल्या नातेवाईकांचा /मित्रांचा अॅटिट्यूड भासतो का?
नाही.
-मत्सर हेवा दिसतो का?
नाही.
-भारतात आता आर्थिक चित्र बदललं आहे त्याने काही फरक पडला आहे का? अप्रूप कमी झालंय का?
होय.
-इम्पोर्टेड चॉकलेट्स, खेळणी, गिफ्ट्स यांसाठी लोक आवर्जून भेटतात का? परदेशी मित्राकडून, अंकल-आंटींकडून गिफ्ट मिळणे ही इच्छा भेटीचा एक मुख्य भाग असतो का?
माहित नाही. मी स्वतः शाकाहारी असल्याने चॉकलेटस घेत नाही. त्यात अंडे असते की नाही याचे उत्तर आणणार्याला पण माहित नसते आणि इथल्यासारखा शाकाहारी वस्तूंसाठी वापरला जाणारा वेष्टनावरील हिरवा टिपका पण नसतो त्यांच्या पॅकींगवर. युकेच्या एका चॉकलेट बनविणार्या कंपनीच्या उत्पादनांबद्दल आंतरजालावर बरेच प्रवाद बघायला मिळतात. त्यामुळे टेकींग नो रिस्क.
-तिकडच्या श्रीमंतीचं प्रदर्शन इकडे केलं जातं का?
असे वाटत नाही. पुन्हा लिमिटेड सँपल्स माहित असल्यामुळे असे असू शकेल. मात्र माझ्या ओळखीतला एकजण माझे अंडरवियर्स पण युकेमधून येतात असे नेहमी सांगतो पण मी ते तपासून पाहिलेले नाही.
-तिकडची समृद्धता इथल्या भाऊबंदांना कळावी अशी (स्वाभाविक?!) इच्छा असते का? ती दाखवण्यासाठी ताण घेऊन भेटवस्तू आणल्या जातात का?
माहित नाही. असू शकेल किंवा प्रेमाचा भाग / रिवाजाचा भाग म्हणून पण आणत असतील
-भेटवस्तू न आणल्यास नाराजी दिसते का भारतात?
माहित नाही.
-नातेवाईक स्थळ यादृष्टीने किंवा तिकडे सेटल होण्यासाठी मार्गदर्शन, मदत अशा कार॑णांनी मागे लागतात का? ते तेवढ्यासाठीच तुम्हाला भेटताहेत अशी भावना येते का? त्यांना मदत करायला आवडतं का?
माहित नाही.
-चुटपुट लागल्याने नकोच ती भारतभेट असं वाटतं का?
माहित नाही.
अॅपल
>> काही ओळखीतली मंडळी तिथून महागडे लॅपटॉप्स घेऊन येतात व आम्हाला कसा स्वस्तात पडला त्याचे गुणगाण करतात तेव्हा मात्र ते माझ्या डोक्यात जातात. "याची इंटरनॅशनल वॉरंटी घेतलीय काय ? की खराब झाल्यावर रिपेअर करायला परत युएसला जाणार असे विचारले की मग त्यांचे चेहरे पाहण्यासारखे होतात.
इतरांचं माहीत नाही, पण अॅपल तरी आपल्या वॉरंटी पीरियडमधल्या लॅपटॉपला इतर देशांत अडचण आली असता वॉरंटीनुसार फुकटात दुरुस्त वगैरे करून देते.
गूगल करा ना भाऊ
गूगल करा ना भाऊ. आल्या भट्टलासुद्धा तेवढं येत असावं ;-)
https://locate.apple.com/in/en/
आता तिकडे आणि इकडे फारसा फरक
आता तिकडे आणि इकडे फारसा फरक उरला नाही असं वाटतं, इकडे तिकडच्यापेक्षा त्याच वयोगटात अधिक कमावणारे मोजके काही माहित आहेत आणि ते इथे खुश आहेत, अर्थात हे सापेक्ष आहे.
-ते तिकडे मजा करत आहेत आणि आपण इकडे देशाची अन घराची जबाबदारी घेत आहोत असा भारतातल्या नातेवाईकांचा /मित्रांचा अॅटिट्यूड भासतो का?
नाही, निदान माझ्या पहाण्यात नाही.
-मत्सर हेवा दिसतो का?
मत्सर असावा, पण तिकडे कुठेतरी व्योमिंग(बरोबर का?), डकोटा, विस्कान्सिन ला रहाण्यापेक्षा पुण्या-मुंबैत जास्त मजा आहे असंही अनेकांना वाटतं. बर्याचदा तिकडे उताह(काय तर नाव)ला रहाणारा पण कसा सॅन-होजे मधे रहात असल्यासारखा भासवत असतो.
-भारतात आता आर्थिक चित्र बदललं आहे त्याने काही फरक पडला आहे का? अप्रूप कमी झालंय का?
नक्कीच, इकडे आता काय मिळत नाही असं नाही. अर्थात ते वर काही सुखांची यादी कोणीतरी दिलेली आहे ती सोडल्यास. पण कच्छच्या वाळवंटाचा 'विकास' करत लवकरच मोदी 'लास वेगास' किंवा 'लास कच्छ' चालु करतील तेंव्हा कळेल तुम्हाला.
-इम्पोर्टेड चॉकलेट्स, खेळणी, गिफ्ट्स यांसाठी लोक आवर्जून भेटतात का? परदेशी मित्राकडून, अंकल-आंटींकडून गिफ्ट मिळणे ही इच्छा भेटीचा एक मुख्य भाग असतो का?
लहान मुलांसाठी, होय, ते महत्त्वाचं असतं, पण हे सगळं पुण्यावरुन मौजे काळेवाडी, कळम, उस्मानाबादला जाणार्या काकुलाही लागू होतं.
-तिकडच्या श्रीमंतीचं प्रदर्शन इकडे केलं जातं का?
माणुसपण चुकलयं का कोणाला?
-तिकडची समृद्धता इथल्या भाऊबंदांना कळावी अशी (स्वाभाविक?!) इच्छा असते का? ती दाखवण्यासाठी ताण घेऊन भेटवस्तू आणल्या जातात का?
'ताण' घेउन काही आणलं जात नाही, 'ताण' देऊन बोललं जातं, फुकटात माज शक्य आहे, ताण देऊन आणण्यासाठी खरचं प्रेम असणार.
-भेटवस्तू न आणल्यास नाराजी दिसते का भारतात?
लहान मुलं नाराज होऊ शकतात.
-नातेवाईक स्थळ यादृष्टीने किंवा तिकडे सेटल होण्यासाठी मार्गदर्शन, मदत अशा कार॑णांनी मागे लागतात का? ते तेवढ्यासाठीच तुम्हाला भेटताहेत अशी भावना येते का? त्यांना मदत करायला आवडतं का?
ह्ये माहित नाही.
-चुटपुट लागल्याने नकोच ती भारतभेट असं वाटतं का?
ह्येपण माहित नाही.
-परदेशात सेटल झाल्यावर अनेक वर्षांनी प्रथम मुलं आणि मग जनरली पत्नी भारतात आठवडाभरही यायला साफ नकार देते अन एकटा पुरुषमाणूस येऊन झेंडावंदन (फॉर्मॅलिटीज) करुन जातो असं उगीचच मला तरी वाटत आलेलं आहे. हे कॉमन आहे का?
इकडची फ्यमिली कशी आहे ह्यावर अवलंबून असावे, बर्याचदा इकडे १ आठवड्यासाठी भावंडांना भेटून धमाल करायला बर्याच लोकांना आवडते.
विस्कॉन्सिन जेव्हा बर्फ नसतो
विस्कॉन्सिन जेव्हा बर्फ नसतो तेव्हा म्हणजे १ आठवडा ;) अत्यंत scenic आहे. विपुल नैसर्गिक सौंदर्य व अत्यंत कमी लोकसंख्या असे आहे. गर्दी नसल्याने कार चालवायला फार मजा येते.
याऊलट कॅलिफोर्नियात बंपर-टू-बंपर रहदारी आहे. खूप झगमगाट आहे. लोकं अगदी फॅशनेबल व मॉडेल-लाइक आहेत.
मी दोन्ही ठिकाणी राहीले आहे. मला शांत राज्ये (विसकॉन्सिन व व्हरमॉन्ट) जास्त आवडली.
++
एका प्रतिसादास एकदाच श्रेणी देता येते, म्हणून, या प्रतिसादाकरिता (अधिकच्या) पाच 'मार्मिक' (आणि पंचवीस 'भडकाऊ') माझ्यातर्फे तुम्हांस बहाल. ह्याव फन!
बाकी, मूळ धाग्याबद्दल बोलायचे झाले, तर: स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तस्मात्, स्वर्ग पाहणे असेल, तर स्वतः मरणे श्रेयस्कर. (स्वर्ग पाहण्याकरिता - किंवा तेथे 'पोचलेल्यां'च्या अनुभवांबद्दलच्या कुतूहलशमनार्थ - स्वतः मरण्याची इच्छा वा तयारी नसेल - किंवा जिवावर येत असेल - तर इन द्याट केस, इट इज़ प्रॉबेब्ली नॉट वर्थ इट इन द फर्ष्ट प्लेस. बाकी, जावे त्याच्या वंशा, तेव्हा(च) कळे.)
(तीच थीम पुढे वाढवून: प्लांचेट वगैरे करून मृतात्म्यांशी संपर्क साधणे, त्यांना (मनाला येतील ते१) प्रश्न विचारणे एक वेळ शक्य असेलही, पण त्यांच्याकडून मिळणारी उत्तरे खरी असतीलच, याची शाश्वती काय? 'यथा प्रश्न, तथा उत्तर' या न्यायाने तीही मनाला येतील तीच नसतील कशावरून?
तस्मात्, कधीतरी केव्हातरी एनाराय२ चुकूनमाकून इंडिया झपाटायला येणार, तर बिचार्याला शांतपणे झपाटू द्यानाबे! उगाच नसते प्रश्न विचारून काय भंडावता बिचार्याला?)
इत्यलम|
..........
१ लहानपणी एकदा विस्तृत कुटुंबातील कझिनावळीत प्लांचेटचा प्रयोग चालला होता, त्यात नेहरूंना बोलावले होते. तेव्हा, "तुमची मौण्टब्याटनबाईबरोबर भानगड होती, म्हणून हे जे काही ऐकतो, ते खरे, की गंगाधर बाष्ट्याच्या शुद्ध बेळगावी लोण्यासारखे पीठ मिसळलेले?" असा प्रश्न त्यांना विचारण्याचा मोह अनावर झाला होता. पण, "नको! भडकले, तर झपाटतील!" अशी भीती घालून मला गप्प बसवण्यात आले. माझ्या एका दूरच्या वहिनीने की मामीने "आमच्या ह्यांना या वर्षी प्रमोशन मिळेल काय?" म्हणून विचारले, ते मात्र बरे चालले! तरी बरे, सदर बाईंचा नवरा सरकारी नोकरीतसुद्धा नव्हता, चांगला प्रायव्हेट कंपनीत होता. आणि हा प्रश्न नेहरूंना! नेहरू म्हणजे काय 'भोलानाथ' आहेत? पण असो चालायचेच, इ.इ.
२ किंवा पीआयो. किंवा ओशीआय (आमच्यासारखा).
धागा
धागा रोचक आहे.
धाग्यात विचारलेल्या प्रश्नांना कधी ना कधी "हो" असं उत्तर काही व्यक्तींना देता येईल असं वाटतं. सर्व संबंधित व्यक्तींना सार्वकालिक हो किंवा नाही असं उत्तर देता येणार नाही. उदाहरणार्थ "चुटपुट लागल्याने नकोच ती भारतभेट असं वाटतं का ?" तर हो असं क्षणैक वाटतं कधीकधी. दरवेळी वाटतं असं नाही. एखाद दोन वेळा वाटलं असेल नसेल.
थोडक्यात सांगायचं तर धाग्यात प्रदर्शित केलेले प्रश्न बरोबर आहेत आणि त्यात काही निरीक्षणं चांगली पकडली आहेत. पण याचं होय/नव्हे असं ठराविक उत्तर देता येत नाही.
एनाराय लोकांबद्दलचा एक्झॉटिक फ्याक्टर क्रमाक्रमाने कमी होऊन गेलेला जाणवतो. उभयपक्षी बरीच माहिती आता उपलब्ध असते त्यामुळे धक्का बसण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. माझ्यामते देशविदेशाबद्दल भारतीय लोकांना आणि भारताबद्दल एनाराय लोकांना मिळणार्या अद्ययावत माहितीमुळे एनाराय लोकांची भारतवारी ही गोष्ट आराय आणि एनाराय लोकांकरता कमी दचकवणारी, अधिक सरावलेली, आणि पर्यायाने गेल्या अनेक दशकांच्या मानाने गुणात्मक दृष्ट्या चांगली सुधारलेली आहे.
माझं अमेरिकेतलं हे पाचवं वर्ष
माझं अमेरिकेतलं हे पाचवं वर्ष चालू आहे. विद्यार्थी म्हणून इथे आलो आणि आता नोकरी करतोय. इंजिनियर होत असताना कॉग्नी / इन्फी असल्या कंपन्या ट्रक घेऊन येत असत कॉलेजात आणि भरभरून पोरांना ऑफर देऊन जात असत. माझा तो ट्रक मिस झाला, पण कसाबसा इन्फी मध्ये पोचलो. दोन वर्षं रडत पडत केलेली नोकरी MS करायचं म्हणून सोडली. तेव्हाच आईबाप / नातेवाईक अशांच्या भुवया उंचावल्या होत्या. आई ने तर अगदी अलीकडे सुद्धा मला "तू कंपनी च्या खर्चाने जायला हवा होतास" असं बोलून दाखवलं. तरी बरं, गेल्या गेल्या पार्ट टाईम जॉब मिळाल्याने घरी पैसे मागावे लागले नाहीत. MS संपता संपताच नोकरी लागल्याने education loan ची परतफेड पण नीट सुरु झाली. नंतर लग्न झालं, दोघं वेगवेगळ्या शहरात काम करत होतो. तेव्हा घरी आई वडिलांना पटत नसताना काही निर्णय घेतले माझ्या / तिच्या नोकरीच्या बाबतीत, वर्षभर संघर्ष केल्यानंतर दोघंही एकाच शहरात नोकरी करायला लागलो. मी घेतलेले निर्णय कसे योग्य होते ते सिद्ध करून दाखवलं, तरीही आई वडील, बहिण आणि तिचा नवरा, आणि बाकी नातेवाईक यांच्या वागण्यातून थोडेफार तुम्ही विचारलेले प्रश्न डोकावतात. लग्नाआधी हे प्रश्न फार जाणवले नाहीत, लग्नानंतर जास्त जाणवतात. संसारी माणसांकडून वेगळ्या अपेक्षा का असतात समजत नाही.
या पार्श्वभूमीवर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो -
-ते तिकडे मजा करत आहेत आणि आपण इकडे देशाची अन घराची जबाबदारी घेत आहोत असा भारतातल्या नातेवाईकांचा /मित्रांचा अॅटिट्यूड भासतो का?
---- हे लग्नानंतर जास्त जाणवतं. लग्नाआधी माझ्या career साठी उत्साह वाढवणारे लोक आता पालटले असं जास्त जाणवतं.
-मत्सर हेवा दिसतो का?
---- जवळच्या नातेवाईकांमध्ये नाही. चुलत / मामे भावंडांमध्ये आहे.
-भारतात आता आर्थिक चित्र बदललं आहे त्याने काही फरक पडला आहे का? अप्रूप कमी झालंय का?
---- मला भारतातल्या किमती आणि इथल्या किमती यात काहीच फरक दिसत नाही. अमेरिकेत laptop / phone या गोष्टी भारतापेक्षा स्वस्त मिळत नाहीत. समृद्धी म्हणाल तर, पुण्यातले एक एक करोडचे flat आणि तिथल्या सुखसोयी इथे सामान्य apartment मध्ये असतीलच असे नाही, उलट कमीच. पण तरीही तिकडच्या लोकांना आमच्या घराचे अप्रूप वाटते.
-इम्पोर्टेड चॉकलेट्स, खेळणी, गिफ्ट्स यांसाठी लोक आवर्जून भेटतात का? परदेशी मित्राकडून, अंकल-आंटींकडून गिफ्ट मिळणे ही इच्छा भेटीचा एक मुख्य भाग असतो का?
---- माझे बरेच जुने मित्र एरवी facebook वर सुद्धा ओळख दाखवत नाहीत. पण, डिसेंबर महिना आला की phone / message वगैरे करतात. उगाच इकडचं तिकडचं बोलून हळूच कधी येणार मग? असं विचारतात. तेव्हाच आपण समजून घ्यावं, याला काहीतरी मागवायचं आहे. आपण "नाही रे यावर्षी" असं म्हटला तर हळूच chat window मधून पोबारा करतात.
-तिकडच्या श्रीमंतीचं प्रदर्शन इकडे केलं जातं का?
---- मी तरी केलेलं नाही. माझ्याबद्दल तसं तिकडच्या लोकांना वाटलं असल्यास माहित नाही.
-तिकडची समृद्धता इथल्या भाऊबंदांना कळावी अशी (स्वाभाविक?!) इच्छा असते का? ती दाखवण्यासाठी ताण घेऊन भेटवस्तू आणल्या जातात का?
---- एक मोठा भाऊ म्हणून मी थोडाफार यशस्वी आहे हे दाखवायची इच्छा असते पण अमेरिकेत वगैरे आहे म्हणून नाही. मी भारतात दुसऱ्या गावात वगैरे नोकरी केली असती तरी तशीच इच्छा असली असती. मी जेव्हा जेव्हा गेलोय परत तेव्हा या इच्चेसाठी नाही, पण लोक रागावतील, त्यांना काही न नेलेलं आवडणार नाही, नपेक्षा काहीतरी घेऊया हि भावना जास्त असते आणि त्यासाठी ताण घेतला जातो.
-भेटवस्तू न आणल्यास नाराजी दिसते का भारतात?
---- नाराजी दिसेल असं आपल्यालाच वाटतं. आपण थोडे दिवस जातो त्यात कशाला कुणाची नाराजी घ्यावी हा आपणच विचार करतो.
-नातेवाईक स्थळ यादृष्टीने किंवा तिकडे सेटल होण्यासाठी मार्गदर्शन, मदत अशा कार॑णांनी मागे लागतात का? ते तेवढ्यासाठीच तुम्हाला भेटताहेत अशी भावना येते का? त्यांना मदत करायला आवडतं का?
---- हो, हो आणि नाही. माझी काही अत्यंत दूरची भावंडं केवळ त्याच कारणासाठी इमेल करतात. त्यांचं इंजिनियरिंग चं शिक्षण पूर्णही झालेलं नाही. प्रश्न इथल्या शिक्षणाविषयी असेल तर समजू शकतो, पण मिसरूड फुटलेली पोरं मला भारतात नाही अमेरिकेतच जॉब करायचा आहे, माझ्यासाठी नोकरी बघ असं म्हणून मागे लागतात तेव्हा वैताग येतो. अशा वेळी मी university मध्ये पार्ट टाइम झाडू मारणे / भांडी घासणे या नोकऱ्या कशा केल्या याची वर्णनं मी तिखट मीठ लावून सांगतो. मग ते लोक परत बोलत नाहीत.
-चुटपुट लागल्याने नकोच ती भारतभेट असं वाटतं का?
---- नको ती भारतभेट असं कधीच वाटलेलं नाही. नको ते नातेवाईक हे मात्र दर वेळी.
-परदेशात सेटल झाल्यावर अनेक वर्षांनी प्रथम मुलं आणि मग जनरली पत्नी भारतात आठवडाभरही यायला साफ नकार देते अन एकटा पुरुषमाणूस येऊन झेंडावंदन (फॉर्मॅलिटीज) करुन जातो असं उगीचच मला तरी वाटत आलेलं आहे. हे कॉमन आहे का?
---- अजून त्या stage ला पोचलो नाही. पण परदेशात settle व्हावं या बाबतीत माझ्यापेक्षा पत्नीच्या मनात जास्त ओढ आहे हे जाणवतं…. ती ओढ बरोबर की चूक याचा विचार मी केलेला नाही.
पहिलं म्हणजे मिलिंद
पहिलं म्हणजे मिलिंद बोकिलांच्या कथेबद्दलः आपण किती यशस्वी आहोत हे दाखवण्याची श्रीपादची मानसिकता बरोब्बर टिपलीयत तुम्ही. मध्येच तो "मी कशा परिस्थितीत दिवस काढले आहेत तुम्हाला माहिती आहे का? माळ्यावर कॉम्प्युटर, शेगडीवर नूडल्स उकळताहेत, जेवायला तेवढंच आहे,..." वगैरे छापाची वर्णनं करतो तेव्हा त्या श्रीपाद मॅनचा अक्षरशः उबग येतो.
दुसरं: मी एकदम ब्र्याण्ड ण्यू येनाराय असल्याने हे अनुभव अजून आले नाहीत / कमी प्रमाणात आले आहेत. आणि काहीएक उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर (किंवा ते उद्दिष्ट आपल्याला झेपणारं नाही ही खात्री पटल्यावर) परतायचं असल्याने "स्थायिक होणे" टैप प्रश्नांना पास.
-ते तिकडे मजा करत आहेत आणि आपण इकडे देशाची अन घराची जबाबदारी घेत आहोत असा भारतातल्या नातेवाईकांचा /मित्रांचा अॅटिट्यूड भासतो का?
नायबा. उलट जबाबदारी घेतात पण अॅटिट्यूड दाखवत नाहीत. विशेषतः मित्र.
-मत्सर हेवा दिसतो का?
हेवा दिसतो. काही काही लोकांत मत्सरही दिसतो, पण ते अपवादात्मक. (अवांतरः हे मत्सरवाले काका इज अ स्टडी इन हिमसेल्फ. त्यांचा स्वतःचा जावई मुलीसह आम्रविकेत सेटलला आहे. तो परदेशी गेला कारण त्याच्या स्किलसेट्सना भारतात नोकर्याच नव्हत्या म्हणे. आणि आम्ही मात्र जांभळ्या नोटांच्या मागे इथे आलो आहोत!)
-भारतात आता आर्थिक चित्र बदललं आहे त्याने काही फरक पडला आहे का? अप्रूप कमी झालंय का?
काय की! पास.
-इम्पोर्टेड चॉकलेट्स, खेळणी, गिफ्ट्स यांसाठी लोक आवर्जून भेटतात का? परदेशी मित्राकडून, अंकल-आंटींकडून गिफ्ट मिळणे ही इच्छा भेटीचा एक मुख्य भाग असतो का?
असं नाही जाणवलं.
-तिकडच्या श्रीमंतीचं प्रदर्शन इकडे केलं जातं का?
काय की! पास.
-तिकडची समृद्धता इथल्या भाऊबंदांना कळावी अशी (स्वाभाविक?!) इच्छा असते का? ती दाखवण्यासाठी ताण घेऊन भेटवस्तू आणल्या जातात का?
ताण वगैरे घेऊन भेटवस्तू नेल्या नव्हत्या.
-भेटवस्तू न आणल्यास नाराजी दिसते का भारतात?
हवी ती भेटवस्तू न दिल्याने नाराजी दिसली. उदा. एक काका जॅक डॅनियल्स का आणली नाहीस असं म्हणाला. एका मित्राच्या बायकोने "ही असली चॉकलेटं हल्ली भारतातही मिळतात" असा नीचा दाखवला. :ड
-नातेवाईक स्थळ यादृष्टीने किंवा तिकडे सेटल होण्यासाठी मार्गदर्शन, मदत अशा कार॑णांनी मागे लागतात का? ते तेवढ्यासाठीच तुम्हाला भेटताहेत अशी भावना येते का? त्यांना मदत करायला आवडतं का?
तिकडच्या एका स्थळाची चौकशी कर म्हणून एक काकू मागे लागल्या होत्या खर्या!
-चुटपुट लागल्याने नकोच ती भारतभेट असं वाटतं का?
नॉट अॅप्लिकेबल
-परदेशात सेटल झाल्यावर अनेक वर्षांनी प्रथम मुलं आणि मग जनरली पत्नी भारतात आठवडाभरही यायला साफ नकार देते अन एकटा पुरुषमाणूस येऊन झेंडावंदन (फॉर्मॅलिटीज) करुन जातो असं उगीचच मला तरी वाटत आलेलं आहे. हे कॉमन आहे का?
नॉट अॅप्लिकेबल
विंट्रेस्टींग... रोचक
जरा गंमतशीर आहेत खरे प्रश्न. ते अश्या साठी एवढ्या फेर्या मारुन देखिल असे प्रश्न पडले नाहीत किंवा असे प्रश्न पडायला परदेशातच जायला पाहीजे असं नाही हे गेल्या कित्येक वर्षांच्या अनुभवातुन बघितलेलं आहे. जसं की, काही नातेवाईक जे मुंबई बाहेर राहायचे, ते सुद्धा अशी मानसिकता दाखवुन व्यक्त करायचेच की.
तुम्ही काय बाबा..किंवा तुमच्या कडे काय बाबा...आई काय नोकरी करते वगैरे. सगळेच नाही तरी थोडे फार होतेच कि.
त्यासाठी लांब जायची गरज नव्हती.
राहता राहीला प्रश्न एनाराय ट्रिप चा... जवळपास १५ वर्ष घराबाहेर/भारताबाहेर राह्तोय म्हणजे आम्ही काहीतरी वेगळे वागायला पाहिजे होतं किंवा आजुबाजुच्या लोकांनी वेगळी ट्रिट्मेंट द्यायला पाहिजे होती असं कधीच झालं नाही.
--मयुरा.
प्रतिसाद खूप चांगले आहेत.
प्रतिसाद खूप चांगले आहेत. वाचताना बरं वाटलं. भरपूर कडवटपणा दिसला नाही. ही कथा वाचून अन पूर्वी "फॉर हिअर ऑर टु गो" पुस्तक वाचून भारतातल्या मंडळींचं विचित्र चित्र उभं केलेलं दिसलं.
भारतातली मंडळी ही प्रातिनिधिकरित्या तशी नसणार असंच वाटत होतं. मी स्वतः कोणताही एनाराय मित्र / नातेवाईक आला तर त्याला इथे आपल्याला येऊन केवळ भेटण्यासाठी बराच त्रास अन भुर्दंड पडणार नाही अशा रितीने आवर्जून वागणूक ठेवतो. सोबत हॉटेलात गेलो तर शक्यतो बिल स्वतः देतो. (परदेशात आलो तर तुम्ही द्या असं म्हणतो) पण कुठेही ते आलेत तर त्यांना पैशाला अथवा शब्दांनी कापावे असा विचार येत नाही. त्यामुळे बहुतांश भारतीय असे असतात का हे जाणण्याचीही इच्छा होतीच. आंतरजालावर आपण परदेशात आहोत हे उघड सांगितलंही जात नाही. कदाचित लगेच हिरवा माज अथवा तत्सम काहीतरी ऐकावे लागेल म्हणून की काय कोण जाणे. पण आपण जिथे राहतो त्या देशातल्या आपल्या अनुभवांवर अन परिसरावर लिहायला लोक फारसे उत्सुक नसतात. थोडेच अपवाद.
म्हणून प्रत्यक्ष लोकांकडून मतं ऐकायची होती.
ऑ?
अहो गवि
. पण आपण जिथे राहतो त्या देशातल्या आपल्या अनुभवांवर अन परिसरावर लिहायला लोक फारसे उत्सुक नसतात. थोडेच अपवाद.
अमेरिका, युरोप, मध्यपूर्व, आफ्रिका, सिंगापूर, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, टिंबक्टू, नायजेरिया, सोमालिया इथली प्रवासवर्णनं आणि हॉटेलातलं खाण यावर तर मुक्तपीठ-पैलतीरसकट सगळीकडं रतीब चालू आहे की.
मी तिथे जाऊन सफर करुन
मी तिथे जाऊन सफर करुन येणार्यांची प्रवासवर्णनं ऑनलाईन वाचली आहेत. पण तिथेच राहून आपल्या रोजच्या जगण्यातले अनुभव, आसपासचं कल्चर, परिसर, एका टूरपेक्षा दीर्घकाळ तिथे राहिल्यानंतर खरोखर जास्त खोलवर समजलेला तो देश, तिथली कुटुंबव्यवस्था, सण असं काही लिहिलेलं जास्त पाहिलेलं नाही.
नाईलने मधे काही खुसखुशीत लिहिलं होतं.. तसा एखादा अपवाद सापडतो फक्त. असं लेखन अजून यायला पाहिजे.
हो पण
दीर्घकाळ तिथे राहिल्यानंतर खरोखर जास्त खोलवर समजलेला तो देश, तिथली कुटुंबव्यवस्था, सण असं काही लिहिलेलं जास्त पाहिलेलं नाही.
हो पण तसं समजत असेल तरच लिहिता येईल ना! इथं राहूनही तिळगूळ-संक्रांत-गुढीपाडवा-सत्यनारायण-मुंज हेच प्रकार कंपूत राहून करण्याची प्रथा आहे. अर्थात अपवाद आहेतच. पण ते नियमाला सिद्ध करण्याइतकेच.
रंजक धागा आहे. गेल्या पंचवीस
रंजक धागा आहे. गेल्या पंचवीस वर्षांत बऱ्याच भारतभेटी झालेल्या आहेत. त्यामुळे भारतभेटीत काय होतं हे स्टॅटिक नसून डायनॅमिक प्रकरण आहे हेसुद्धा लक्षात आलेलं आहे.
पहिल्या काही भेटींत काहीसं किंचित हळद पिऊन गोरं होण्याचा अनुभव घेतलेला आहे. म्हणजे अमेरिकेतले सुंदर रस्ते, आणि एकंदरीत नीटनेटकेपणा, स्वच्छता पाहून आपल्याकडे असं का नाही यामुळे फ्रस्ट्रेट झालेलो आहे.
नातेवाईक वगैरेंच्या बाबतीत सगळ्यांना भेटून येणं एक कर्तव्य असतं या भावनेपोटी अनेकांना भेटायला गेलो होतो. त्यात गिफ्ट्सच्या आदानप्रदानापेक्षा वेळेचा तुटवडा आणि त्यातल्या देवाणघेवाणीबद्दलचा असमतोल खूप वेळा जाणवला. आवर्जून घरी बोलावणारे अनेक लोक तितक्याच आवर्जून मला भेटायला येत नाहीत हेही जाणवलं. म्हणजे मी फक्त वीस दिवसांसाठी, महिन्यासाठी भारतात येणार पण अगत्य दिसण्यासाठी मीच त्यांच्याकडे जाणं ही अपेक्षा दिसलेली आहे. जशी वर्षं सरली तशी कोणाला खरोखरच मनापासून मला भेटावंसं वाटतं आणि कोणाला तो उपचार आपल्या सोयीने पाळावासा वाटतो हेही लक्षात यायला लागलं. त्यामुळे आपोआपच हळूहळू हे उपचार पाळणं बाजूला सारता आलं. वर्षं सरली तसे मुळात निव्वळ औपचारिक असलेले संबंधही हळूहळू सैल झाले. ते बरंच झालं.
गेल्या दीड वर्षात दोनदा भारतात लांबलचक ट्रिपा केल्या. त्यात भर मुख्यत्वे नवीन, आंतरजालीय मित्रमंडळींना प्रत्यक्ष भेटून संबंध दृढ करण्यावर भर ठेवला. या भेटींमध्ये मी गिफ्ट काय आणतो आहे यापेक्षा एकमेकांना भेटायची इच्छा आहे हेच प्रकर्षाने जाणवलं.
आणि हो, माझ्या आसपासचे अनेक जण अधिक श्रीमंतीत आणि आरामात जगत आहेत हे जाणवलं. स्वयंपाक, कचरा, लादी, कपडे धुणे, भांडी घासणे या सर्वांसाठी लोकांकडे कामाला कोणीतरी असतं. आम्ही ही कामं आमची आम्ही करतो. घरं लहान असतात हे खरं आहे, पण त्यांच्या किमती ऐकून पोटात गोळा येतो.
यावरून आठवलं.
आवर्जून घरी बोलावणारे अनेक लोक तितक्याच आवर्जून मला भेटायला येत नाहीत हेही जाणवलं.
कॉलेजकाळात एका मुलीशी काहीसे मैत्रीपूर्ण संबंध होते, ते पुढे टिकणं कठीण आहे याची जाणीव तेव्हाही मला होती. आता तर कधी तिचा फेसबुकावर निरोप आला तर तेवढंच.
मी भारतात आहे हे तिला समजल्यावर पुन्हा मेसेज आला. उपलब्ध वेळेची कमतरता, फार लोकांना भेटणं, प्रचंड सर्दी-खोकल्यामुळे फोनवर बोलण्याइतपतही इच्छा+शक्ती नसणं वगैरे गोष्टी असूनही मी तिला माझा फोन नंबर दिला. "बराच खोकला झालाय, फार वेळ बोलता येणार नाही," वगैरे सांगूनच. त्यातही "तू नाशिकला ये ना. तुला भेटायची खूप इच्छा आहे," हे वाक्य दोनदा ऐकल्यावर माझा नसलेला पेशन्स पुन्हा संपला. "मी शब्दशः हजारो रूपये खर्च करून, २७ तास प्रवास करून, पृथ्वीचा अर्धा परीघ पार करून अमेरिकेहून ठाण्यात आल्ये. झोपेची बोंब, जेटलॅग, हवेतल्या बदलामुळे खोकला, ताप असली आजारपणं सहन करत्ये. तुला भेटायची एवढी इच्छा आहे म्हणत्येस तर माझ्यासाठी दोनचारशे रूपये खर्चून, चार तास बसमधून प्रवास करून नाशिकहून ठाण्याला येता येत नाही?" असं बोलून टाकलं.
हे असे ड्वायलाक मारले आणि त्याबद्दल पुरेसं गॉसिप आपल्यामागे इतरांनी केलं की गळेपडू नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांचा आपल्याला त्रास होत नाही असं वाटायला लागलंय. एकदा काय ते मनातलं बोलून टाकायचं, कडवटपणा घ्यायचा की मज्जानू लाईफ.
अलिकडेच दोन महिने भारतात होते, भेटण्याची इच्छा दोन्ही बाजूंनी होती अशाच लोकांना भेटले, पुन्हापुन्हा भेटले आणि एकंदर मानभावीपणापासून स्वतःची सुटका करून घेतली.
चाललं असतं तर आणखी काय हवं
चाललं असतं तर आणखी काय हवं होतं!
नोकरी न करणारे, सुट्टीवर भारतवारीला/घरी आलेले लोक रिकामटेकडेच असतात; त्यांनी आपल्यासाठी एवढंतरी करावं अशी गृहितकं, अपेक्षा ठेवण्याइतपत आपले संबंध आहेत का याचा विचार लोक करत नाहीत. त्यातही माझ्याकडे फार पेशन्स नाहीत हे मी आधीच मान्य केलंय. घाव घातला की त्याच वर्तुळातल्या आणि नको असणाऱ्या आणखी चार लोकांचा ताप कमी होतो.
लोकांनाही आपसांत बोलण्यासाठी काहीतरी विषय मिळतो, हीच माझी समाजसेवा! :प
सिलेक्शन बायस
> ही कथा वाचून अन पूर्वी "फॉर हिअर ऑर टु गो" पुस्तक वाचून भारतातल्या मंडळींचं विचित्र चित्र उभं केलेलं दिसलं. भारतातली मंडळी ही प्रातिनिधिकरित्या तशी नसणार असंच वाटत होतं.
ते ठीकच आहे, पण अशा प्रकारच्या वर्णनांमध्ये 'सिलेक्शन बायस' असतो हे विसरता नये. समजा मी इथून (म्हणजे कॅनडातून) भारतात गेलो आणि परत आल्यानंतर माझ्या अनुभवांवर काही लिहिलं. तर अशा परिस्थितीत ते लिखाण रंजक करण्यासाठी चमत्कारिक अनुभवांवर किंवा हे दोन देश ज्या बाबतींत खूप वेगळे आहेत त्यांच मुद्द्यांवर जास्त भर दिला जाणं हे साहजिक आहे. पुण्यातल्या रस्त्यावर फिरायला जाणं आणि व्हँकूवरमधल्या रस्त्यावर फिरायला जाणं हे अनुभव मुळीच सारखे नसल्यामुळे त्यावर लिहिलं जातं. पण 'भारतातला एच डी टीव्ही आणि कॅनडातला एच डी टीव्ही हे एकसारखेच असतात बरं का' असं कुणाला आउट अॉफ द वे जाऊन लिहावंसं वाटणार नाही.
तेव्हा 'compare and contrast' अशी थीम जिथे जिथे दडलेली असते तिथे थोडंफार असं होतंच.
"फॉर हिअर ऑर टु गो" - अवान्तर.
"फॉर हिअर ऑर टु गो" ह्या पुस्तकाच्या शीर्षकाचे मला नेहमीच फार कौतुक वाटलेले आहे. पुस्तकाच्या अंतरंगाविषयी मतमतान्तरे असू शकतील पण शीर्षक अतिशय अन्वर्थक आहे.
भारतामध्ये उपहारग्रहातून तयार पदार्थ घरी घेऊन जाण्याची jargon 'take-away' किंवा 'pack-up' अशी असते. इकडे ती कोठल्याच रेस्टॉरंटवाल्याला कळत नाही. त्याला 'I want a take-away' असे म्हटले तर तो बुचकळ्यात पडतो कारण त्यालाच येथे 'to go' म्हणतात. तुम्ही काउंटरपाशी ऑर्डर दिली की त्याचा प्रश्न 'for here or to go' असा असतो.
अशी ही अत्यंत मर्यादित संदर्भ असलेली jargon येथे भारतातून येथे लांब मुदतीसाठी आलेल्या पुष्कळांना अतिशय चपखल बसते आणि तेच आपल्या पुस्तकाचे शीर्षक करण्यामागे लेखिकेचे हा सूक्ष्म तपशील उपयोगात आणण्याचे कौशल्य लक्षात भरते.
टेक अवे
भारतामध्ये उपहारग्रहातून तयार पदार्थ घरी घेऊन जाण्याची jargon 'take-away' किंवा 'pack-up' अशी असते.
'टेक अवे' हा शब्द भारतात ऐकल्याचे आठवत नाही. संपूर्ण ऑर्डर घेऊन जायची असेल तर 'पार्सल' हा शब्द वापरल्याचे ऐकले आहे. याऊलट हॉटेलात खाऊन उरलेल्या पदार्थांना 'पॅक अप' करतात .
भारत .......... हामेरिका
भारत .......... हामेरिका .......... खरा सायब
प्रॉफिट .......... प्राssssssफिट .......... प्रॉफिट?
डॉटर .......... डाssssssटर .......... डॉटर?
ब्रिटांची वाक्याच्या शेवटी प्रश्न विचारल्यासारखं शेवटचं व्यंजन उडवायची ष्टाईल मला लय आवडते. आणि हामेरिकनांचं रेकणं डोक्यात जातं.
(बादवे - हामेरिकेत प्रांताप्रांताप्रमाणे अॅक्सेंट बदलतो का? उदा. मिन्नेपोलिस(चुभू) मधला अॅक्सेंट कॅलिफोर्नियापेक्षा वेगळा असतो का?)
अमेरिकेत प्रांताप्रमाणे
अमेरिकेत प्रांताप्रमाणे accent नक्कीच बदलतो. स्वानुभवावरून सांगतो, मिन्नेपोलीस चा accent इतर प्रांतांपेक्षा वेगळा आहे. शहरी भागातला accent बऱ्याच प्रमाणात न्युत्रालाईझ झाला आहे पण छोट्या गावात गेल्यावर जाणवतो. माझे बरेच सहकारी मिन्नेसोटा चे मूळ रहिवासी असल्याने त्यांच्यात पण जाणवतो. मिन्नेपोलीस accent चे छान (काही बाबतीत अतिशयोक्तीपूर्ण) उदाहरण म्हणून "फार्गो" हा सिनेमा बघा. याप्रमाणेच, शिकागो accent, बोस्टन accent असे पण प्रकार मी ऐकलेले आहेत. अर्थात काही प्रकार इतके सटल आहेत की माझ्यासारख्या फ़ोरेनर ला कळणार नाहीत. एकदा मी एका अमेरिकन सहकाऱ्यासोबत वाद घातला होता - "छट, तुमच्याकडे आक्सेण्ट बिक्सेण्ट काय नाय… आमची मराठी दर १० मैलांवर बदलते… " तेव्हा त्याने मला boston, chicago, cleveland, maine, alabama असले बरेच प्रकार बोलून दाखवले होते. आणि अलाबामा सोडले तर बाकी सगळे सारखे वाटले होते मला.
आइडिया चांगली आहे..
"पण तिथेच राहून आपल्या रोजच्या जगण्यातले अनुभव, आसपासचं कल्चर, परिसर, एका टूरपेक्षा दीर्घकाळ तिथे राहिल्यानंतर खरोखर जास्त खोलवर समजलेला तो देश, तिथली कुटुंबव्यवस्था, सण असं काही लिहिलेलं जास्त पाहिलेलं नाही."
ऑस्टीन मध्ये सध्या चालु असलेल्या 'साउथ बाय साउथ वेस्ट' - SXSW बद्द्ल लिहायला हवे काहीतरी. मी स्वःत अजुनपर्यंत कधीही बघितले नाहीये पण होपफुली लवकरच योग यावेत. तसचं ऑस्टीन सिटी लिमिट्स,काईट्-पंतग फेस्टीवल, बॅट (वटवाघुळ)फेस्टीवल्-हे खास ऑस्टीनचं आर्कषण आहे. ह्याबद्दलही लिहायला हवयं(स्वःताचा आळशीपणा झटकायला पाहिजे त्यासाठी). पण दिवाळी, संक्रात, हळदीकुंकु, गणपती हे ही तितक्याच आवडीने साजरे होतात हे ही खरं आहे. उगाच का नावं ठेवा, ते ही हॅलोविन, थँक्स गिविंग्,क्रिस्ट्मस एवढेच मस्त एन्जॉय करतातच बरेचजणं.
माझ्या ओळखितले बरेच जणं वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमधुन वॉलिंटीअरींग काम करतात. ह्या आणि अश्या समांतर घडामोडी दुर्दैवाने सगळ्यांपर्यत पोहोचत नाहीत, आणि मग त्यातुन बाय्सड मत बनवलं जातं. अर्थात ते चुकिचं नाहीये पण होतं खरं असं.
ह्या सगळ्या प्रकाराना हवी तेवढी प्रसिध्दी कदाचित मिळतंही नाही किंवा नसेल,
टॅक्स, बँकेचे व्यवहार, दळणवळण्च्या सुविधांवर होणारा खर्च्,आरोग्यसेवा-सरकारी/प्रायव्हेट, शिक्षण व्यवस्था, बालस्ंगोपन, वाढलेल्या किंमती, हाउसिंग मार्केट, गुन्हे, ह्या रोजच्या जीवनातल्या गोष्टी कुठलाही, कसलाही भेदभाव न करता सगळ्यांच्याच वाटेला येतात.
असो.
-
मयुरा.
बॅट (वटवाघुळ)फेस्टीवल्- आमचे
बॅट (वटवाघुळ)फेस्टीवल्-
आमचे एक देऊळ तिथे उभे केले जावे अशी या ठिकाणी या माध्यमातूण आमच्या फॅन लोकांना आज्ञा करीत आहोत. स्तोत्रेबित्रे लिहायचे काम आमच्याकडे लागले. पाहिजे त्या भाषेत अन पाहिजे त्या फॉरम्याटात स्तोत्रे लिहून मिळतील. सुप्रभातम् सारखे सुनिशीथम् लिहिले जाईल.
"थॉमस्मार्थासुत ब्रूस, रात्रिरेषा प्रवर्तते | उत्तिष्ठोत्तिष्ठ हे ब्रूस उत्तिष्ठ वाल्गुदध्वज |" इ.इ.
आमच्या देवळाचे नावः बृहद्वाल्गुदीश्वरर कोईल किंवा वाल्गुदेसर का मंदिर किंवा बादूडमोंदिर किंवा वाघळालय असे असावे. नेहमीप्रमाणे बॅटमॅनही शैव दाखवला जावा. शंकराच्या अनेक गणांमध्ये त्याचीही वर्णी लागायला काहीच हरकत नाही.
कोणत्याही वाक्यात अमेरिका
कोणत्याही वाक्यात अमेरिका शब्द घातला कि त्याला वजन येतं असं जनरल निरीक्षण आहे.
उदा. आपल्या घराच्यांबद्दल संक्षिप्त ओळख करून देताना -
एकजण
१. मला दोन मुली आहेत. दोघींची लग्ने झाली आहेत.
हे आणि दुसराजण
२. मला दोन मुली आहेत. दोघींची लग्ने झाली आहेत. मोठी अमेरिकेत आहे आणि दुसरी ऑस्ट्रेलियात आहे.
असे म्हटले जाते.
यातल्या पहिल्या ओळखीत, जरी तसे असले तरी, पहिली दरभंग्याला दिली आहे आणि दुसरी मधुबनीला दिली आहे, असे अज्जिबात सांगीतले जात नाही.
=========================================================
सदर शब्द दुसर्याच्या मुखीचे असले तरी, स्त्रीवादी शक्तींचा भयसन्मान* करण्यासाठी काटण्यात आले आहेत.
*पंचमी तत्पुरूष समास.
ललित लेखनात "दिली आहे" हा
ललित लेखनात "दिली आहे" हा वास्तवदर्शी संवाद म्हणून योग्यच आहे.
असे घाब्रु नका! ;) तुम्हीच घाबरलात तर असे कसे व्हायचे!
==
पूर्ण अवांतर: (यावरून उगाच आठवले वरील प्रतिसादाशी संबंध नाही :) )
बादवे दोन आठवड्यापलिकडे सांगली, मिरज ते मुधोळ असा प्रवासाचा योग आला.
नक्की कुठले गाव आठवत नाही पण त्याच भागात "भारतातील पहिले नोंदणीकृत पुरूष मुक्ती संस्था/केंद्र असे लिहिलेली पाटी दिसली.
चालत्या बसमध्ये होतो व हातात क्यामेरा/फोन नव्हता. फोन खिशातून काढेपर्यंत पाटी मागे गेली होती :(
हे सांगली मिरजकडील लोक चांगलेच समानतावादी निघाले हो! ;)
तुम्हीच घाबरलात तर असे कसे
तुम्हीच घाबरलात तर असे कसे व्हायचे!
मला ऐसीचा शरद यादव व्हायचं नाही.
===================================================================
अवांतर-
गेल्या वर्षभरात अनेक जालशत्रू कमावले आहेत. पण यावेळेस बेस्ट ऐसीमेंटेरियन अवार्डसाठी वर्तन, प्रयत्न तसेच लॉबिइंग करण्याचा मानस आहे.
'हात्तंगडी' आत्ता पाहिला
प्रतिसाद आत्ता बघितला. (म्हणजे आत्ताच कळला असे नव्हे, हेवेसांन.) विनोद
तर मला हे हात्रेकाऊ असे वाटले. तसे करतानाची प्रतिमासुद्धा डोळ्यांसमोर आली. (कल्पना गेली खड्ड्यात. दस्तुरखुद्द प्रतिमा!) पुढे, 'आपण त्याचे घर उन्हात बांधू हंsss' असेही वाक्य ऐकल्यासारखे वाटले.
नक्की कुठले गाव आठवत नाही पण
नक्की कुठले गाव आठवत नाही पण त्याच भागात "भारतातील पहिले नोंदणीकृत पुरूष मुक्ती संस्था/केंद्र असे लिहिलेली पाटी दिसली.
माझे स्मरण बरोबर असेल तर ही पाटी सांगली व मिरजेच्या मध्ये मिडवे असलेल्या विश्रामबाग नामक भागातल्या तीनपदरी रस्त्याच्या कडेला आहे. पुरुष हक्क संरक्षण समिती की असे काहीसे नाव आहे बहुधा. आता कदाचित मजकूर बदलला असावा.
नक्की कुठले गाव आठवत नाही पण
नक्की कुठले गाव आठवत नाही पण त्याच भागात "भारतातील पहिले नोंदणीकृत पुरूष मुक्ती संस्था/केंद्र असे लिहिलेली पाटी दिसली.
माझे स्मरण बरोबर असेल तर ही पाटी सांगली व मिरजेच्या मध्ये मिडवे असलेल्या विश्रामबाग नामक भागातल्या तीनपदरी रस्त्याच्या कडेला आहे. पुरुष हक्क संरक्षण समिती की असे काहीसे नाव आहे बहुधा. आता कदाचित मजकूर बदलला असावा.
न संपणारी चर्चा
१० वर्षे अमेरिकेत आहे. गेली २ वर्षे सातत्याने भारतभेटीचा योग आला. त्यामुळे अधिकाधिक चुटपुट लागतेय असं लक्षात आलं. मधे २-३ वर्षं आई वडीलच येत गेले, आणि आमचे जाणे झाले नाही, तेव्हा भारत काहीसा विसरायला झाला होता.
भारतात गेल्यावर मला, इमोशनली "थॉ" झाल्यासारखं वाटतं. तिकडे नातेवाईकांत राग-लोभ, भावना, ह्यांची खूप चर्चा असते. इथे मित्रपरिवारात ते फारसं होत नाही (म्हणजे, रागलोभांबद्दल बोललं जातं, पण प्रत्यक्षात कोणी एकमेकांकडून खूप दुखावलेले वगैरे नसतात, जे भारतात कायमच असतात :)
राहणीमानातला फरक आता फारसा जाणवत नाही, पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, पूर्वीच्या अगदी जिवाभावाच्या मित्र-मैत्रिणींकडून/मावशी आत्यांकडून मला अशी अपेक्षा असायची, की त्यांनी इमेल लिहाव्या, माझ्याइतक्या सविस्तर नकोत, तरी त्यांचे रोजचे काही शेअर करतो, तसल्या. त्या काळी व्हॉट्सॅप नव्हते. पण मी इतके लिहायची, तितके आणि तसे प्रत्युत्तर मला माझ्या आई-आजींव्यतिरिक्त कुणाकडूनही मिळाले नाही. भारतात जशी गिफ्टसची अपेक्षा असते, तशी माझी संवाद साधण्याची अपेक्षा होती, पण तिथले कोणीही, कितीही सांगितले तरी, इथल्या रहाणीमानाशी रिलेट करू शकत नाहीत, आणि परिणामी, त्यांनाही आपले रोजचे काही माझ्याशी शेअर करावेसे फारसे वाटत नसावे, किंवा तेवढा इमेल-मेसेजचा उरक नसावा.
मग शेवटी रोजची सुखदु:ख शेअर करणारेच जास्त जवळचे वाटू लागतात. भारतात गेल्यावर त्याच त्या प्रश्नांना उत्तरं देणं, हे सगळ्यात जीवावर येतं. लेखातल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलंय कारण माझी बरीच उत्तरं वरती दिलेल्यांसारखीच आहेत.
भारतात गेल्यावर मला, इमोशनली
भारतात गेल्यावर मला, इमोशनली "थॉ" झाल्यासारखं वाटतं. तिकडे नातेवाईकांत राग-लोभ, भावना, ह्यांची खूप चर्चा असते. इथे मित्रपरिवारात ते फारसं होत नाही (म्हणजे, रागलोभांबद्दल बोललं जातं, पण प्रत्यक्षात कोणी एकमेकांकडून खूप दुखावलेले वगैरे नसतात, जे भारतात कायमच असतात (स्माईल)
काय सुरेख मांडलयत हेच हेच अगदी अस्सच वाटतं.
____
तिथली झाडं,चिमण्या, भारद्वाज, कावळे सग्गळं आवडतं. चाइल्डिश वाटेल पण तिथली पहाट अन इथली पहाट फरक असतो. ते चैतन्य इथे खरच नाही.
पण प्रत्यक्षात कोणी
पण प्रत्यक्षात कोणी एकमेकांकडून खूप दुखावलेले वगैरे नसतात, जे भारतात कायमच असतात
परदेशात भेटलेल्या लोकांबाबत मला शाश्वतीची भावना येत नाही आणि बहुतेक त्यांनाही माझ्याबद्दल येत नसावी. परदेशात निर्माण होणारी मैत्री किंवा ओळख म्हणा काहीशी कोरडी, व्यवहारी आणि वरवरची वाटते. इथे तर बरेचसे लोक ट्रान्झिटमध्ये असल्यासारखेच असतात. आज इथे असलेला कधी अमेरिकेला जाईल किंवा भारतात परत जाईल त्याची खात्री नाही. ज्यांची पोरं मोठ्ठी आहेत असेच लोक फक्त तंबू गाडून बसलेत (आणि त्यांच्यात हेवेदावे आहेत असं कळतं).
तेच भारतात होतो तेव्हा असं कधीही वाटलं नाही की उद्या आपण आणि हे लोक बरोबर असू-नसू. तसं वाटलं असतं तर हेव्यादाव्यांतली आणि प्रेमाची असोशी नक्कीच कमी झाली असती. परदेशात येऊन मी कोरडा, अलिप्त झालोय की काय असं मला वाटतं. एकूणच शाश्वतीची भावना कमी झाल्याने तसे होत असेल.
अमेरिका हे बर्याच जणांचे ड्रीम डेस्टिनेशन असल्याने तिकडे असा प्रश्न कदाचित नसेलही.
मला तरी नऊ वर्षांनीही आता आपण इथलेच असं फीलिंग आलेलं नाही.
भारतीयांची एन आर आय भेट ...परदेशात
हा धागा आणि धाग्यातले प्रश्न जुने (झाले) आहेत ...
आता याच्या बरोब्बर उलट धागा काढला तर काय चित्र दिसेल ..... हे विचारतोय . म्हणजे समजा
मायदेशातील आणि कायम मायदेशातच राहणारी मंडळी जेव्हा काही कामानिमित्त तात्पुरते किंवा मुलांकडे ( उगाचच किंवा पूर्वी नेहमी असलेले ... आज्जीचे कामकरायला )किंवा केसरी छाप जाऊन जेव्हा अम्रीकेत/विलायतेत / आफ्रिकेत / इतर कुठेही ऑस्ट्रेलिया/जपान/टिम्बक्तू इथे कुठे जातात तेव्हा या पूर्वभारतीयांचे काय अटीट्युड दिसले आहेत . मूळ प्रश्नावली बरोब्बर उलटी करा ( किंवा तशीच ठेवा )
तसेच पूर्वभारतीयांना , कायम भारतीयांचे काय अनुभव आले आहेत ...
येऊंद्या ...!!!
आंतरजालाला लोक सरावल्यानंतर
आंतरजालाला लोक सरावल्यानंतर चित्रात बराच फरक पडला असावा, असं वाटतं. प्रत्यक्ष काय ते एनाराय लोकच सांगू शकतील.