मुंबैत/ठाण्यात राहणारे लोक
मुंबैत/ठाण्यात राहणारे लोक आवडीने तिथे राहतात की नाइलाज म्हणून?
(व्यवस्थापन : चर्चा लांबल्यामुळे वेगळा धागा केला आहे.)
मला मुंबई आवडली ती अमाप
मला मुंबई आवडली ती अमाप उर्जेकरता - खूप अलोट लोकं अन त्यांना असलेली माणुसकीही. रंगीबेरंगी गर्दी, चौपाटी, सिद्धीविनायक, बागा, समुद्र, बेस्ट बसेस, रिक्षा, फळभाज्यांचे बाजार अन ओहोहो मासळी बाजार कशी विसरले मी?
आई गं!! फुटपाथवर मिळणार्या हनुमान चालीसा अन तत्सम स्तोत्रे = प्रामाणिक गरीब विक्रेते. मला खूप हळवं करतात ती फाटक्या अंगाची, कष्ट्करी अन प्रामाणिक लोकं.
माझ्या तेव्हा चिटुकल्या मुलीबरोबर मी बेस्ट (आयुष्यातला बेस्ट) वेळ घालवला आहे. कधी काही वाईट अनुभव आला नाही. मुंबईनी खूप दिलं. माझा पहीला जॉब इथे मिळाला.
खादी भांडार, सँडविचचे ठेले अन घाटकोपर ग्रंथालयातील अनवट पुस्तके, आमच्या सोसायटीच्या टेरेसवर संध्याकाळी वारा खाणं, लाल गुलाबी आकाश, तो तेजाचा गोळा अन आजूबाजूचा परीसर पहाणं.
जॉब इन्सेक्युरिटी होती, एक निरागस भाबडेपणा होता, तरुणपणीचे दिवस तिथे व्यतीत झाले, मजेत अन स्ट्रगलमध्येही.... मुंबईत जादू आहे, व्हाईट मॅजिक!!
मर्मबंधातील ठेवी आहेत या.
मैत्रिणींनी सोसायटीच्या गच्चीवर केलेले डोहाळजेवण, रोज त्यांच्याबरोबर भाजी खरेदी करणं, संध्याकाळी आपली व मैत्रिणींची मुलं खाली खेळत असताना सोसायटीच्या सिमेंटच्या बाकांवर बसून गप्पाटप्पा करणं, किती निवांतपणा होता. अमेरीकेत निघाले तेव्हा त्यांनी सेंडऑफ दिला, मला आवडतात म्हणून पाणीपुरी अन ईडली केली होती हे प्रेमाचे बंध मी विसरु शकत नाही.
अचानक रात्री/कधी सकाळी/संध्याकाळी आमच्या मित्रमैत्रिणींबरोबर डबल डेट वर जायचं (= एकत्र मनमुराद फिरायचं + परस्परांच्या समस्या ऐकून सल्ले द्यायचे, तेव्हा आमचं नवीन लग्न झालेलं होतं अन त्या जोडप्याच्या लग्नाला ११ वर्षे झाली होती. तेव्हा लग्नाला ११ वर्षं म्हणजे खूप वाटायची. :) अगदी एन्व्हिअस नंबर वाटायचा. )- सिद्धीविनायक किंवा कोकण किंवा एकवीरा = लोणावळा/खंडाळा केवढी मजा होती.
अपुली गपुली, अगदी खरयं. मलाही
अपुली गपुली, अगदी खरयं.
मलाही मुंबई आवडते. लोकं तुमच्या आजूबाजूला असतात आणि नसतातही. दादर, जिथे मी ५वी ते १० वी ची वर्षं घालवली. पारसी कोलोनीतल्या चाफ्याची फुलं, गुंजा आम्ही शाळेत जाता येता गोळा करायचो. सुटी पडली की सकाळी मिल्क सेंटर वर जाण्यासाठी मी आणि बहीण लवकर उठायचो कारण तिकडे प्राजक्ताची बरीच झाडं होती. परेल, लालबाग, रानडे रोड ची बाजारगर्दी. गणपती सुद्धा रांग लावून पाहीलेत. खुप मजा केलीय. लग्नानंतरची काही वर्षं घाटकोपर मध्ये काढल्याने तेही आपलं वाटतं.
ठाणं मात्र शिष्ठ वाटतं. कॉलेजची वर्षं ठाण्यात काढूनही ठाण्याशी फारशी मैत्री झाली नाही. (पण 'फडतूस' नाही. :(( )
घाटकोपर ग्रंथालयातील अनवट पुस्तके
छान. घाटकोपरचे ग्रंथालय घाटकोपर पुर्वेला म्युनिसिपल ऑफीसमधे असतांना मी तिथला सभासद झालो. पुस्तक घ्यायचे आणि तिथेच निवांत मागच्या गल्लीत (बहुतेक मेहता रोड) पालिकेची बाग आहे तेथे रखवालदार हाकलून देईपर्यंत वाचत बसायचे. कधी कधी पुस्तक घेऊन हॉटेल सम्राट नाहितर पश्चिमेला भारत क्याफेमधे बसून निवांत उतप्पा सांबार खात अर्धेअधिक पुस्तक वाचून संपवायचे मगच घरी जायचे असा माझा जवळजवळ वर्षभर दिनक्रम होता. ज्या दिवशी पैसे कमी असतील त्या दिवशी कामा गल्लीच्या कोपर्यावर दाबेली आणि काला खट्टा ज्युस प्यायचा. अगदी १०-१५ रुपयांत मनसोक्त मज्जा केली.
मी सभासद झालो तेव्हा माझा सभासद क्रमांक २५० होता तो आता ३६ पर्यंत आला आहे. एकंदरीत वाचनालयातील सभासदसंख्येस गळती लागली आहे. आता वाचनायल कामा गल्लीमधील स्वतःच्या जागेत आले आहे. दिवसा अभ्यासिका चालवून उत्पन्न वाढविण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. सुरुवातीला पुस्तकांच्या शेल्फ चाळू देत नव्हते पण आता बरेच वर्षांची ओळख म्हणून की काय, कोणतेही पुस्तक चाळू देतात. मी ठाण्यातील ग्रंथालयाचा सभासद झाल्याने घाटकोपर वाचनायलात फारसे जाणे होत नाही पण गतस्मृतींना उजाळा देण्यासाठी महिन्यातून एखादे पुस्तक घेऊन येतो.
तुझ्या भाषेत "फडतूस" अगदी
तुझ्या भाषेत "फडतूस"
अगदी धारावीतले लोक सुद्धा फडतूस आहेत असे मला वाटत नाही. अधिक माहीती साठी "मिस्टरी ऑफ कॅपिटल" हे हर्नांडो डी सोतो (पेरुवियन अर्थशास्त्री) यांचे पुस्तक वाचणे. (मी संपूर्ण वाचलेले नाही. पण अनेक पाने चाळलेली आहेत.) तूनळी वर यांचे अनेक व्हिडिओज आहेत.
स्थानमाहात्म्य (अर्थात, एक काडी)
पुणेकरांच्या नि मुंबईकरांच्या मनोवृत्तीत एक महत्त्वाचा फरक जाणवलेला आहे, तो असा:
पुणेकर स्वतःला शहाणा समजतो, अॅटिट्यूड मारतो, अगदी स्वतःला विश्वाच्या केंद्रस्थानी समजतो नि इतरांना शहाणपणा शिकवतो खरा, परंतु त्याचे हे शहाणपण तो पुण्यात असतानापुरतेच असते. एकदा का तो पुणे महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर पडला, की शेपूट घालतो. तेथे त्याचे काही चालत नाही, आणि आपण आपल्या कुंपणाबाहेर आहोत, याची त्याला जाणीव असते. पुण्याबाहेर पडल्यावर तो नेटिव्हांना शहाणपण शिकवायला सहसा जात नाही.
(आमच्यासारखे तुरळक नग - जे पुण्याबाहेर पडून य वर्षे झाली, तरीसुद्धा आपण अजून १९९० सालच्या ४११०३०मध्येच आहोत या समजुतीखाली वावरतात - त्यांचे सोडा. आम्ही इनकॉरिजिबल आहोत खरे, परंतु तो अपवाद.)
मुंबईकरांचे याच्या नेमके उलटे असते. ते मुंबईत असताना लायनीवर असतील, पण एकदा मुंबईबाहेर पडून अगदी पुण्याला जरी आले१, तरी, आपण मुंबईकर बोले तो पुढारलेल्या शहरातले बोले तो सर्वज्ञ, या मागासलेल्या नेटिव खेडुतांना काय कळतेय या मोडमध्ये जातात. पदोपदी हुज्जत घालतात नि शहाणपण शिकवू पाहतात. तमाम दुनिया म्हणजे प्रतिमुंबई नसते, प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक पद्धती, नियम नि व्यवस्था या मुंबईबरहुकुम नसतात, नि असणे अपेक्षितही नाही, हे यांना कोणी शिकवलेले नसते. मुंबईत भले कोणी "मुंबई एक भिकार" म्हटल्यावर "मुंबई सात भिकार" म्हणतील, पण बाहेर पडल्यावर "म्हणजे? तुमच्याकडे असे नसते?" म्हणून हुज्जत घालतील. मुंबईपुरताच लागू असलेला कुठलातरी ऑबस्क्युअर नियम काढून "पण हे असे असायला पाहिजे ना?" म्हणून भांडतील. सगळीकडे सगळ्या गोष्टी या डिट्टो मुंबईसारख्या असल्या पाहिजेत, अशी अपेक्षा करतील. अत्यंत झापडबंद लोक! (पुणेकर तुलनेने - तुलनेने! - बरेच अॅडाप्टेबल असतात.)
पण हा बहुधा मुंबईकरांचा दोष नसावा. महानगरात राहण्याबरोबर महानगरी ईगोही आपोआपच येत असावा. किंबहुना, दिल्लीकरांबद्दलही बव्हंशी हेच पाहिलेले आहे. (विशेषतः दिल्लीकर पंजाबी - रेफ्युजी जमात. यांच्याइतके माजोरी आणि अॅटिट्यूडयुक्त लोक त्रिभुवनात शोधून सापडणार नाहीत. तेवढे ते सरदारजी लोक वगळता - म्हणजे, त्यांच्यात माजोरी नमुने सापडत नाहीतच, असे नाही, परंतु मानवी म्हणता यावेत, असे नगही अनेकदा सापडू शकतात, नव्हे, बव्हंशी सापडतात. पण एकंदरीत, व्यक्तिगत मत मांडायचे झाले तर, मला व्यक्तिशः हिंदुस्थानच्या फाळणीबद्दल फारसे दु:ख वाटत नाही; मात्र, पंजाबच्या फाळणीबद्दल अतीव दु:ख वाटते. पण ते एक असो.)
अतिअवांतर:
भगवान बुद्धांची एक रोचक आणि उद्बोधक कथा आहे. ती येथे डकविण्याचा मोह अनावर होतो.
एकदा भगवान बुद्ध आणि त्यांचा शिष्यगण आपल्या नित्यनेमास अनुसरून एका गावास भिक्षा मागण्याकरिता येतात. तेथील लोक त्यांना चांगले वागवत नाहीत, त्यांचा अपमान करून त्यांना हाकलून लावतात.
संध्याकाळी प्रार्थनेच्या वेळेस भगवान बुद्ध म्हणतात, "हे गाव सुरक्षित राहो." शिष्यांना ते विचित्र वाटते, परंतु ते काही बोलत नाहीत, गप्प राहतात.
दुसर्या दिवशी दुसर्या एका गावात भिक्षेसाठी गेले असता तेथील लोक त्यांचा आदरसत्कार करतात, त्यांना उत्तमोत्तम पक्वान्ने खाऊ घालतात.
सायंप्रार्थनेच्या वेळेस बुद्ध म्हणतात, "या गावात दुष्काळ पडून लोकांची अन्नान्नदशा होवो नि ते देशोधडीस लागोत."
आता मात्र शिष्यांची खोपडी सटकते, नि ते भगवान बुद्धांना स्पष्टीकरण मागतात.
भगवान बुद्ध उत्तरतात, "अरे यार, सोप्पा फंडा आहे! त्या पहिल्या गावातले लोक वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, दुष्ष्ट!!!!!! होते. ते गाव जर सुरक्षित राहिले, तर या लोकांना कध्धीकध्धी बाहेर पडावे लागणार नाही, बोले तो, त्यांचा वैवैवैवैवैवैदुपणा त्यांच्या चतु:सीमांपुरताच मर्यादित राहील, जगभर पसरणार नाही. उलटपक्षी, त्या दुसर्या गावातले लोक गोग्गोड होते. ते देशोधडीस लागले, तर आपला गोग्गोडपणा जगभर घेऊन जातील नि पसरवतील. एवढी शिंपल गोष्ट तुमच्यासारख्या झंटलमन लोकान्ला समजू नये? थुत् तुमच्या जिन्दगानीवर! फुका स्वतःला माझे शिष्य म्हणवून घेता!"
सांगण्याचा मतलब, पुणेकरच काय, तमाम दुनियेतले लोक देशोधडीस लागोत, पण मुंबई आणि दिल्ली ही शहरे सुरक्षित राहोत. (तथास्तु!)
- (दुर्दैवाने प्रॉप्पर मुंबईत जन्माला आलेला, टनभर मुंबईकर नातेवाईकांशी पाला पडलेला नि त्यांना जमेल तितके कटाक्षाने टाळणारा मनाने पुणेरी अमेरिकन) 'न'वी बाजू.
............................
मला मुंबईचा प्रचंड तिरस्कार
मला मुंबईचा प्रचंड तिरस्कार आहे. माझ्या आयुष्यातले सगळ्यात घाण दिवस मुंबईत काढले. मुंबईच्या ४-५ गोष्टी सोडल्या तर मला तिथले काहीच आवडत नाही.
१. मुंबईचे पाणी फार गोड आहे. नुसते पाणी पिऊन माझ्या शरीराला संतोष मिळतो.
२. मुंबईपासून निसर्गरम्य स्थळे खूप जवळ आहेत. दिल्लीच्या मानाने खूपच.
३. नवी मुंबई प्लॅन्ड आहे, सुटसुटीत आहे.
४. मुंबईत अन्नाची चव माझ्या मराठी जीभेशी जास्त जुळते.
पाचवं का? असो, सुचत नैयय.
+(पाहिजे तो आकडा घाला). तसे
+(पाहिजे तो आकडा घाला).
तसे मुंबईत आवडावे असे काही नाही. हवामान खराब आहे. उकाडा आणि चिकचिक आहे. धो धो पाऊस (जो मला आवडतो) आहे त्यामुळे पाणी तुंबणे आहे. डास आहेत (पूर्वी ही मुंबई ठाण्याची ख्याती होती. पण आता पुरेसे नागरीकरण झाल्यावर पुण्यातसुद्धा डास आले आहेत) मलेरिया आहे. आणि गर्दी तर काय......
वरच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे येथेच राहणारे लोक सवयीने येथे राहतात.
मला इंजिनिअरिंग केल्यावर पुण्यात चांगली नोकरी मिळाली असती तर कोण जाणे पुण्यात राहिलोही असतो.
पूर्वी तुम्ही कोकणात काय आवडण्यासारखं आहे? असं विचारलं होतं तेव्हा तुम्हाला मुंबई न आवडण्याची शक्यता खूपच आहे. कारण भौगोलिकदृष्ट्या मुंबई हे कोकणच आहे.
मुंबईत बाहेरून येणार्यांना मुंबई आवडतेच असं नाही. पण मुंबईत व्यवसाय नोकरीच्या जितक्या संधी आहेत तितक्या इतरत्र मिळत नाहीत. म्हणून लोक मुंबईत येऊन राहतात. आवडीने नव्हे.
मुंबई ऑसम आहे असं म्हणणारे २
मुंबई ऑसम आहे असं म्हणणारे २ गट बघितले आहेत
१. मुंबईतच आयुष्यभर राहून मुंबई इज द बेश्ट म्हणणारे.
२. बरीच इतर शहरं (परदेशातलीही) पाहूनही मुंबई बेश्ट म्हणणारे.
पैकी १ ला वगळायला हरकत नसावी. २ मधे बरेचदा नॉस्टाल्जिक फॅक्टर जास्त असतो. आजकालच्या मुंबईशी गट २ कितपत जु़ळतं घेऊ शकेल याबद्दल शंकाच आहे. म्हणजे ८०तली मुंबई आवडणार्या लोकांना २०१० मधली मुंबई आवडू शकते हे झेपत नाही!
निव्वळ city planning किंवा सौंदर्य, हवामान ह्या निकषांवर मुंबई कुठल्या कुठे घसरेल. वादच नाही.
पण -मुंबईत सग्गळं काही मिळतं :प
निव्वळ city planning किंवा
निव्वळ city planning किंवा सौंदर्य, हवामान ह्या निकषांवर मुंबई कुठल्या कुठे घसरेल. वादच नाही.
मुंबई सारख्या चिकण्या(%) पोरी (वैविध्यपूर्ण**) न्युयॉर्क मधे सुद्धा असतील की नाही ही शंका आहे.
--
** वैविध्यपूर्ण म्हंजे मराठी, पंजाबी, सिंधी, गुज्जु, मारवाडी, टँब्रॅम ....... यादी लांबलचक होईल.
% - चिकण्या या शब्दास अनेक कनोटेशन्स आहेत. तुम्ही कोणतेही वापरू शकता.
आयला, एक्दम अलास्का?
कधी अलास्का, हवाईला गेलेत का तुम्ही?
होय, दोन्ही ठिकाणी गेलोय. (आता बोला!) :)
अलास्काच्या पोरी ह्या पुण्यातल्या पोरींच्या सासवा असल्यागत गुरफटून असतात. (आम्ही भर उन्हाळ्यात तिथे गेलो नव्हतो हा बाकी आमचा दोष!)
हवाईत मात्र एकदम टपोरे टपोरे मळे फुललेले दिसतात!!! देव त्यांचं भलं करो!! :)
असो.
बाकी मुंबईत पश्चिम उपनगरात किनार्याजवळ रहात असाल आणि गाडी (म्हणजे मोटार, दुचाकी नव्हे!) असेल तर तो स्वर्ग आहे!
आणि जर मध्य रेल्वेवरच्या उपनगरात रहात असाल आणि गाडी नसेल तर तो नरक आहे!!
:)
@गब्बर.मुंबई सारख्या
@गब्बर.
मुंबई सारख्या चिकण्या(%) पोरी (वैविध्यपूर्ण**) न्युयॉर्क मधे सुद्धा असतील की नाही ही शंका आहे.
आणि शिवाय त्या पुण्यातल्या पोरींप्रमाणे ओढणीनशीन होऊन चिकणेपण झाकत नाहीत.
गब्बर.. कोल्हापुरातही खूप दिसायच्या रे चिकण्या, रापचिक इत्यादि. तुला नाही का असं वाटत.
त्यातल्या कित्येकजणी मुंबईच्या पोरींपेक्षा जास्त चटका लावायच्या..आपल्या "रेंज"मधल्या असल्याने ( ;: ) ..
असं नाही वाटत..? :)
कोंकणाविषयीही काहीसं तसंच..
...
पण -मुंबईत सग्गळं काही मिळतं
असेलही. आणि आता, मुंबईचा नवाकोरा आंतरराष्ट्रीय विमानतळ अमेरिकेतल्या कोठल्याही विमानतळाच्या तोंडात मारेल१ इतका अप्रतिम आहे, हेही मान्य. मुंबईतून बाहेर पडण्यासाठी - आणि त्यानंतर मुंबईपासून शक्य तितके दूर, जगाच्या दुसर्या टोकास जाण्यासाठी तो अतिशय उपयुक्त आहे, हेही जाता जाता नमूद करतो.
बरे मग?
...................
१ विच इज़ नॉट सेइंग मच, अॅज़ अमेरिकन - ऑर, फॉर द्याट म्याटर, युरोपियन - एअरपोर्ट्स, इन माय अंबल ओपीनियन, आर नथिंग मच टू राइट होम अबाउट, पण अप्रतिम आहे खरा.
?
आमच्या गिरगाव, झालेच तर ताडदेव वगैरे भागांत कध्धीकध्धी डास नव्हते. ती खासियत तुमच्या सबर्बांची. बहुधा वांद्र्याच्या उत्तरेला. (सेंट्रल लाइनीवरील किंवा हार्बरवरील सबर्बांशी कधी संबंध न आल्याकारणाने, तेथील कॉरस्पाँडिंग पॉइंट ठाऊक नाही.)
बाकी, पुण्यात डास खूप पूर्वीपासून आहेत. आणि कोथरुडात तर माणसे जास्त की डास, हा प्रश्नआहे. असो.
मुंबैत/ठाण्यात राहणारे लोक
मुंबैत/ठाण्यात राहणारे लोक आवडीने तिथे राहतात की नाइलाज म्हणून?
माझा जन्म मुंबईत झाल्याने सुरवातीला नाईलाज म्हणून राहिलो, नंतर सवयीने राहिलो, मग आवडीने राहिलो आहे.
पुण्यातही आधी नाईलाज म्हणून आलो, नंतर नावडीने टिकलो, आता हवामानाशिवायही पुण्यातील काही गोष्टींची सवय झाली आहे तर काही आवडूही लागल्या आहेत.
अनेक दिवसांनी पुण्याहून मुंबईला भेट दिल्यावर पूर्वी जाणवत नसे इतकी घाण व अस्वच्छता (आणि लहानगे रस्ते) आता जाणवते हे मात्र खरे. (पूर्वी न्यूयॉर्क किंवा आम्रिकन शहरांतून मुंबईला गेल्यावर असे काही जाणवले नाही). हे गेल्या काही वर्षात खरोखरच मुंबईत घाण वाढल्याचे लक्षण समजावे की नाही हे कळत नाही.
तरीही अजूनही मुंबईशी संबंधित असंख्य छान आठवणी असल्याने ते माझ्यासाठी आवडत्या शहरांपैकी एक आहे (मात्र त्यातले पर्सनल टच काढले तर सर्वोत्तम शहरांपैकी एक म्हणेन का साशंक आहे)
मला मुंबईतले आवडते ते तेथील खरेखुरे "कॉस्मो" वातावरण. कोणत्याही एका गटाचा प्रत्यक्षात वरचष्मा न जाणवणे! शिवाय दक्षिण मुंबईची ऐट काही वेगळीच आहे. तिथे तर मी कितीही बागडत राहु शकतो.
मुंबईतलं स्वातंत्र्य लाजवाब
मुंबईतलं स्वातंत्र्य लाजवाब आहे. इतरांच्या तंगड्यात तंगडे न अडकवता काय वाटेल ते करा. बंधने नाहीत. ड्रेसकोड्स नाहीत. कशावरही घाऊक बंदी नाही. सर्व प्रकारचे सर्व भाषांचे लोक आहेत. खवचटपणा नगण्य आहे. भोचकपणा नगण्य आहे. कोणत्याही प्रकारचं खाद्य मिळतं, चालतं. नाकं मुरडण्याचे प्रकार होत नाहीत. कोणी सोशल मनमिळाऊ आहे किंवा एकलकोंडा स्वमग्न आहे यामुळे त्याला रोजच्या जगण्यात काही फरक पडत नाही. पैसा दिला की सर्व सेवा मिळतात. फुकट घरपोच अश्या प्रकारच्या कन्व्हिनियंट व्यवस्था वाण्यापासून लायब्ररीपर्यंतचे सर्व सेवादाते आनंदाने विनाकटकट देतात. किमान पगारही भरपूर असतात. भाड्याने जागा मिळणं सोपं आहे. एकदा का मालकीच्या घराचा सोस सोडला तर सर्व उत्तम आहे.
इनफॅक्ट लोक कोणत्या प्रकारे राहतात हा प्रश्नच चुकीचा आहे. लोकांना जिथे आहेत त्याहून खूप जास्त काहीतरी मिळतं म्हणूनच ते मुंबईत येऊन राहतात आणि केवळ यामुळेच मुंबई इतकी वाढली आहे. कमवायचं खायचं मुंबईत आणि मुंबईला शिव्या घालून गावाकडचे गोडवे गायचे हे समजण्यापलीकडचं आहे.
मुंबईच असं नव्हे, पण आपण जिथे कुठे राहतो त्या गावात मजबुरीने कमवायला राहायचं आणि आपल्या मूळ रम्य गावांचे अन इतर थंड स्वच्छ शहरांचे गोडवे गायचे हे मुंबईतल्या घाणीपेक्षाही जास्त बकाल आहे.
हेच अमेरिकेत राहून तिथल्या चैनीपणाला, संस्कृतीला अन अतिसमृद्धीला नाके मुरडत तिथल्याच स्टारबक्समधे कॉफी पीत पीत इथल्या "कटिंग चहा"चे उमाळे काढणार्यांनाही लागू.
इतरांच्या तंगड्यात तंगडे न
इतरांच्या तंगड्यात तंगडे न अडकवता काय वाटेल ते करा. बंधने नाहीत. ड्रेसकोड्स नाहीत. कशावरही घाऊक बंदी नाही. सर्व प्रकारचे सर्व भाषांचे लोक आहेत. खवचटपणा नगण्य आहे. भोचकपणा नगण्य आहे. कोणत्याही प्रकारचं खाद्य मिळतं, चालतं. नाकं मुरडण्याचे प्रकार होत नाहीत. कोणी सोशल मनमिळाऊ आहे किंवा एकलकोंडा स्वमग्न आहे यामुळे त्याला रोजच्या जगण्यात काही फरक पडत नाही. पैसा दिला की सर्व सेवा मिळतात. फुकट घरपोच अश्या प्रकारच्या कन्व्हिनियंट व्यवस्था वाण्यापासून लायब्ररीपर्यंतचे सर्व सेवादाते आनंदाने विनाकटकट देतात. किमान पगारही भरपूर असतात. भाड्याने जागा मिळणं सोपं आहे. एकदा का मालकीच्या घराचा सोस सोडला तर सर्व उत्तम आहे.
गवि - ह्या सर्व गोष्टी पुण्यात पण मिळतात हो. :-). पिंची मधे पण
हल्ली कुठल्या मोठ्या शहरांना चेहरे राहीले आहेत.
म्हणूनच शेवटी मुंबईशी
म्हणूनच शेवटी मुंबईशी स्पेसिफिक न ठेवता मत मांडलं ना.
मुंबईत हे सर्व आहे याचा अर्थ अन्य शहरांत नाही असं मुळीच नव्हे. आता सातार्यात अन सोलापुरातही असं झालं असेल तर आनंदच आहे.
हाही एक फरक आहे. मी सहसा मुंबईकराला इतर शहरांना नावं ठेवताना बघितलं नाहीये. मुंबईला मात्र बाहेरचे बरेचजण नावं ठेवतात.
मला स्वतःला मुंबई,पुणे, पणजी, कोल्हापूर, बडोदा आणि रत्नागिरी अश्या सर्व शहरांमधे आवडीच्या खूप गोष्टी दिसतात. विविध गावांत राहणारे माझे नातेवाईक मात्र "मुंबईला जाऊन आयुष्याची वाट लावून घेतात लोक" असे ऐकवत असतात.
मोस्ट्ली, खरा पुणेकर मुंबई
मोस्ट्ली, खरा पुणेकर मुंबई बद्दल फारसा विचारच करत नाही. त्याच्या द्दृष्टीने पुणे आणि नॉन-पुणे इतक्या दोनच कॅटेगरी असतात. चुकुन कोणी मुंबईकर भेटला किंवा मुंबईचा विषय निघाला तर "कीव" ही भावना असते :-) ( जसे - काय ही बिचारी लोक, पोटासाठी काय सहन करायला लागते ह्यांना ).
उलट मुंबईची मराठी माणसे पुण्यातल्या सदाशिवपेठेवर खार खाउन असतात असा अनुभव आहे.
एनीवे- हे सर्व १९९५ च्या पूर्वीचे बोलते आहे.
मला स्वतःला मुंबई,पुणे, पणजी,
मला स्वतःला मुंबई,पुणे, पणजी, कोल्हापूर, बडोदा आणि रत्नागिरी अश्या सर्व शहरांमधे आवडीच्या खूप गोष्टी दिसतात. विविध गावांत राहणारे माझे नातेवाईक मात्र "मुंबईला जाऊन आयुष्याची वाट लावून घेतात लोक" असे ऐकवत असतात.
अगदी सहमत!
मी स्वतः सोडलेल्या/सुटलेल्या गोष्टींपासून स्वतःला सहज आणि लगेच डिटॅच करू शकतो म्हणून असेल किंवा मुळातच घडण तशी असेल, एका मर्यादे पलिकडे मी कोणत्या शहरात राहतोय याने फार फरक पडत नाही. कोणत्या -कशा प्रवृत्तीच्या - माणसांत राहतोय त्याने मात्र पडतो. पण त्याचा नी शहराचा काही संबंध दिसलेला नाही. माझ्या मातृभाषेत बोलणारे मित्र-मैत्रिणी तर आता गेल्या ४-५ वर्षात मिळाले आहेत त्यामुळे त्याच तर अप्रूप अजिबात नाही. उलट अशा मित्रांचं भयंकर नाविन्य आहे.
वरचं सगळं मान्यच. शिवाय
वरचं सगळं मान्यच.
शिवाय पुरवणी:
मुंबईचं एक वैशिष्ट्य म्हणजे ती कधीही आवाक्यात आलीशी वाटत नाही. अमुक इतका भाग सवयीचा झाला, इतकंच काय ते म्हणता येतं. फार भोचक वा उत्सुक नसाल, तर तितक्यावर सहज सराईतपणे आयुष्यभर जगताही येतं. पण आपण ज्या गावात राहतो, ते गाव आपल्याला नीट तळहातासारखं माहीत हवं, असल्या काहीतरी अपेक्षा असतील (नि मी हे सामाजिक संदर्भात म्हणत नाहीय. म्हणजे लोक परिचयाचे हवेत, लोकांना आपल्याबद्दल आणि व्हायसा व्हर्सा जिव्हाळाबिव्हाळा हवा - असलं काहीतरी मी म्हणत नाहीय. मी स्वच्छ भौगोलिक संदर्भात म्हणते आहे.) तर मुंबई वारंवार चकवते. तिचा आकार आणि आवाका अवाढव्यच्याही पलीकडचा आहे. हे एकाच वेळी अमानवी-यांत्रिक-भीतिदायक आहे आणि पराकोटीचं व्यक्तिस्वातंत्र्य देणारं म्हणून मोहकही.
मला तसा शहरांशी परिचय करून घेण्याचा फार सोस नाही, ना प्रवासाची फारशी आवड. तरी फार निरीक्षण करण्याची सवय नसूनही - राहतं गाव घरगुती-बैठं-टुमदार होतं, ते मुंबईनं कवेत घेऊन तिच्या चेहर्यामोहर्याचं करून टाकल्याचं गेल्या १०-१५ वर्षांत दिसलं. मुंबईचं माहीत नाही. पण निदान ठाण्यातली गर्दी आणि घाण तरी या काळात प्रचंड वाढली. तरीही इथे राहायला सत्तेचं घर असल्यामुळे इथले बाकीचे फायदे सुखनैव अनुभवता येतात. खाजगीपणातलं स्वातंत्र्य तर सगळ्यांना मान्यच आहे. पण ठाण्यासारख्या उपनगरांमध्ये इतरही अनेक फायदे असतात. एकतर मुंबईशी असलेला नजीकचा संपर्क - त्यामुळे तिथल्या कामापासून चैनीपर्यंतच्या अनेक संधी. शिवाय ठाण्यातली ग्रंथालयं, नाट्यगृहं, सिनेमागृहं, तर्हेतर्हेचे सांस्कृतिक कार्यक्रम, पायी फिरण्याजोगे रस्ते आणि तळी. आपल्या मातृभाषेत व्यवहार करता येण्यातलं सुख. जुन्या संस्थांमध्ये अद्याप टिकून असलेल्या ओळखी आणि त्यामुळे मिळणारं वातावरण. जुन्या पद्धतीची विशिष्ट दुकानं. वगैरे.
लोकांच्या शहरांबद्दल वाचायला आवडेल. :प
- हावरट मेघना
ठाणे हे मुंबईतल्या सर्व
ठाणे हे मुंबईतल्या सर्व गोष्टींचं तुलनेत कमी क्षेत्रफळात आणि कमी ड्रायव्हिंग / तंगडतोड करुन मिळणारं मिनिएचर मॉडेल बनलं आहे. आत्ता अशी कोणतीही सुविधा नाही की जिच्यासाठी ठाण्याची वेस ओलांडावीच लागेल.
-टिल लास्ट ब्रेथ सर्व डायग्नोस्टिक्स आणि कॅन्सरसह सर्वांवर उपचार करु शकणारं हॉस्पिटल
-सबवे, मॅक्डोनाल्ड, पिझा हट, स्टारबक्स, पॉप टेट्स, अर्बन तडका, टिंबक्टू, व्हिलेज, जगहेड्स आणि तत्सम सर्व चेन रेस्टॉरंट ब्रँड्स
-जवळजवळ सर्व मुख्य "थाळी रेस्टॉरंट्स"चे ब्रँड
-पब्स
-विवियाना, कोरमसारखे मुंबईच्या कोणत्याही मॉलपेक्षा मोठे आणि पार्किंगची चणचण नसलेले मॉल्स.
-मुंबईइतकीच भारी आणि चालणारी नाट्यगृहं
-मोठ्या लायब्ररीज
-मॅजेस्टिक, क्रॉसवर्ड्स आणि त्याहूनही मोठी तत्सम पुस्तकदालने
-आर्ट गॅलरी
-चार आणि सात स्क्रीन असलेली अफाट आकाराची मल्टिप्लेक्स
-सर्वच्या सर्व (फास्ट, स्लो, लोकल, दूरच्या) रेल्वे कंपल्सरी थांबणारं एस्केलेटरवालं स्टेशन
-स्केटिंग रिंकपासून अत्यंत लॅव्हिश बोलिंग अॅलीजपर्यंत स्पोर्ट्स
-मोठे स्विमिंग पूल्स
-हजारो स्क्वेअरफुटात पसरलेलं केवळ स्पोर्ट्स या विषयाला वाहिलेलं दालन, त्यासमोरच्या प्ले आरेनासहित
-येऊरचं जंगल कम रिसॉर्ट व्हिलेज
-वॉटर पार्क
शहरी म्हणून जे जे काही सिंबॉल्स आहेत ते सर्व आता ठाण्यातही आहेतच.
१००% सहमती
१००% सहमती. पुर्वीचा मुंबईकर आणि आताचा ठाणेकर म्हणून.
अजून काही पॉईंटस
१. तलावांचे शहर (जवळपास १५ तलाव)
२. एक असे शहर जिथे टीएमटी, बेस्ट, वसई विरार नगरपालिका परीवहन, मीरा भाईंदर नगरपालिका, एनएमएमटी, एसटी, खाजगी बसेस या सर्वांद्वारे सार्वजनिक वाहतूकीची सेवा. (आता टीएमटी धड चालली असती तर बाकीचे तिथे घुसले नसते हा भाग वेगळा)
गर्व आहे मला ठाणेकर असल्याचा (सचिन खेडेकर स्टाईल आठवा आणि ह्रदयावर ठोसा मारुन घ्या स्वतःच्याच)
:)
मुंबईच असं नव्हे, पण आपण जिथे
मुंबईच असं नव्हे, पण आपण जिथे कुठे राहतो त्या गावात मजबुरीने कमवायला राहायचं आणि आपल्या मूळ रम्य गावांचे अन इतर थंड स्वच्छ शहरांचे गोडवे गायचे हे मुंबईतल्या घाणीपेक्षाही जास्त बकाल आहे.
समजा आत्ता आहे तेवढच अर्थार्जन त्याच व्यवसायात राहून दुसर्या शहरात करायची संधी मिळाली, समजा पुणे/कोल्हापूर्/नासिक इत्यादी ठिकाणी, तर लोक मुंबैला राम राम ठोकतील का?
समजा आत्ता आहे तेवढच
समजा आत्ता आहे तेवढच अर्थार्जन त्याच व्यवसायात राहून दुसर्या शहरात करायची संधी मिळाली, समजा पुणे/कोल्हापूर्/नासिक इत्यादी ठिकाणी, तर लोक मुंबैला राम राम ठोकतील का?
आत्ता आहे त्याहून जास्त असेल तरच. मुळात मुंबई विरुद्ध इतर हेच मान्य नाही. कोल्हापुरात राहणं हा अत्यंत आनंददायक अनुभव असू शकतो. जर तिथे पुरेसे उत्पन्न मिळाले नाही, बारा तास लोडशेडिंग चालू झाले, हवा असह्य झाली तर दुसरीकडे चरितार्थ शोधला जाऊ शकतो. पण कोल्हापुरात मजबुरीने राहणे आणि मुंबई किंवा पुण्यात कसे उत्तम लाईफ आहे असे म्हणून तुलनेत कोल्हापूरची पंचगंगा कशी वास मारते आणि इथले पब्लिक कसे पैलवानी गुडघामेंदू आहे अश्या प्रकारचे ताशेरे मारत तिथेच पडून राहणे हे पटत नाही.
प्रवासही आवडतो, आणि नवीन
प्रवासही आवडतो, आणि नवीन गाव/शहर पहाण्याचा उत्साहही आहे. पण मुंबईतून मात्र वर्षभरात कलटलो. एक तर घामोळी, चिकचिकाटी हवा. शरीर चेपवून काढणारा लोकलप्रवास१. सर्वात महत्वाचं म्हणजे पुणे अक्षरशः चार तासांच्या अंतरावर - त्यामुळे कायम पुण्याचे वेध लागलेले असायचे.
मुंबैतल्या आवडलेल्या गोष्टी म्हणजे (१) शॉवर सुरू केल्यासारखा, पूर्वसूचना न देता येणारा पाऊस (२) मी रहायचो तो लालबाग-परळ भाग (३) हपीस होतं तो कुलाबा/कफ परेड भाग.
----------------------
१ तरी तो फक्त एल्फिन्स्टन रोड ते चर्चगेट होता. माझ्या विरार, वसई, अंबरनाथहून येणार्या तत्कालीन सहकार्यांच्या तुलनेत काहीच नाही. "पावसात लोकल्स बंद पडल्या तर एल्फिन्स्टन रोड पासून आम्ही चालत येऊ" असं एकाने फुशारकीने सांगितलं होतं.
आमची मुंबई
मुंबईत तुम्ही कुठे रहाता याला खूप महत्व आहे. श्रीमंत वस्तीत सुखसोयी जास्त चांगल्या आहेत. बकालपणाही कमी आहे. मध्यमवर्गीयांसाठी विले-पार्ले पूर्व, गोरेगांव पूर्वचा काही भाग हे रहायला छान आहेत.रोज लोकलने प्रवास करायचा असेल तर तुम्ही बोरिवली,अंधेरी, बांद्रा अशा गाड्या सुटण्याच्या आरंभस्थानी रहावे. अधेमधे राहिलात तर लोकलमधे आंत घुसणेच कठीण. एकेकाळी डोंबिवलीला राहिलो असल्यामुळे, सेंट्रल साईडला रहायचा विचारही करु शकत नाही.
निवृत्त असाल तर मात्र मुंबई चांगली! फोनवरुन आणि बाकीची ऑनलाईन कामे बरीच विनासायास होतात. वैद्यकीय सेवा उत्तम प्रतीची आहे. मुख्य म्हणजे विजेचा पुरवठा २४ तास! आणि व्होल्टेज स्टॅबिलायझर लागत नाही.
मी जन्मापासून मुंबईतच वाढल्याने आता इथे रहाण्याची संवय झाली आहे.बाकीची शहरे त्यामानाने संथ आणि सुस्तावलेली वाटतात.
सकाळी साडेसहा ते साडेसात
सकाळी साडेसहा ते साडेसात ठाण्यात बाहेर उनाडत होते. बहुतेकसं अंग झाकलेल्या दोन बायकांकडे बहुतेकसे लोक एवढे चोरून, वळून, टक लावून, मुद्दाम किंवा कसेही का बघत होते याचं कोडं सुटलं नाही. थोडी वैतागलेच मी. "आमच्या काळी असं नव्हतं ठाणं!" असं झालं. सकाळी साडेदहा-अकराला बाहेर पडले तर कोणालाही माझी दखल घ्यायला वेळ नव्हता. मग लक्षात आलं. सकाळी लवकर मी पण या लोकांकडे बघून "फोटो काढायला मजा येईल. गर्दी झाली की तिला काही चेहेरा राहत नाही", असा विचार करत होते. सकाळचे ते सगळे लोकही कॅमेऱ्याशिवाय फोटो काढत असणार.
हे असं गर्दीचा भाग बनता येईल असं कोणतंही शहर मला आवडतं.
मुंबई/ठाण्यात
राहणारे लोक सवयीने राहतात.
बाहेरून येऊन का राहतात ठाऊक नाही.