टोलनाक्यावर..
मी टोलनाक्यावर उभा असतो.
हौसेने नाही राहात.
टोलनाक्यावर उभं राहणं हाच माझा जॉब.
मुष्किलीने लागलाय. दोन वर्षं गेली तिसरंही जाईल.
उभं राहूराहू पायाच्या नळ्या दुखतात.
पण मी टोलनाक्यावर उभा असतो.
..
तसा मी ब्राह्मणाचा.
अण्णाआईसोबत चांगला होतो.
अण्णा गांजा भरुन सिगरेट ओढायचे अन मग तासनतास शांत.
आई नुसती तडतडत रहायची.. कढल्यात जळलेल्या मोहोरीसोबत.
मोहरी करपली, तडतड थांबली..
मला शाळेच्या पुस्तकांनी ओकारी यायची. अण्णा म्हणायचे, कशाला शिकतोस.. व्यर्थ आहे सगळं.
अण्णा एकदम अध्यात्मिक. महिनामहिना घराबाहेर.
मग वर्षं वर्षं.
एकदम आईला म्हणाले तू माझी माऊली.. आणि गेले निघून.
मग मी शाळेला लावला घोडा आणि चैन्या केल्या जिवाच्या वर्षामागून वर्षं..आईच्या जिवावर.. अन नानांच्या..
अण्णा गेले अन नाना आले.
आईच्या मदतीला खूप जण पैदा झाले एकदम..
नानांनीच आईसमोर शाळा घेतली माझी.. ताळ्यावर ये म्हणे. गाव सोड म्हणे. शिक्षण नाही म्हणे.. शिपाई म्हणूनही लायकी नाही म्हणे.
नानांनीच लावला टोलनाक्यावर.
साला भाड्या.. आई घेतलीन माझी..
..
दिवसभर टोलनाक्यावर मी उभा असतो.
रापरापून कातडीचा बामणपणा कंप्लीट गेलाय.
मला कलेक्शनला पण नाही उभे करत. लायकी नाही माझी. नाना म्हणालेले तशी.
मी फक्त उभा राहतो. बूथपासून लांब. दबा धरुन.
टोल चुकवून पळणार्या गाडीला कोलदांडा घालायला.
दर गाडीच्या वेळी दबा धरायचो..आता शांत झालोय.
दिवसात एकतरी माजुरडा भेटतो.
कोणाकोणाची नावं सांगून टोलऐवजी कचाकचाकचा बडबडत राहतो.
कलेक्शनवाले त्याच्यावर चढतात.
मी कोलदांडा काढत नाही.
मागून अडकलेल्या गाड्यांच्या केकाटण्याचा जोर मिन्टामिन्टाला डब्बल होत असतो.
मला काम मिळाल्याचा आनंद असतो.
शेवटी त्याने नोटा भिरकावल्या की मी कोलदांडा काढतो.
अस्सा माजुरडा दोन दिवस भेटला नाही तर नोकरीची चिंता लागते..
पायाचे नळ आणखीन दुखतात. कंटाळा येतो.
उन्हात जळत मी टोलनाक्यावर उभा असतो.
टोल भरताना दरेक गाडीची खिडकी उघडते अन माझ्यापर्यंत पोचेस्तो बंद होते.
वर सरकणार्या काचेतून शेवटची थंड फुंकर मला चिडवून जाते.
त्या बंद होणार्या काचेतून मधेच दिसतो एक गोर्या गोर्या छातीचा तुकडा. आणि त्यात एक घळ.
पायातली ताकद एकदम जाते.
पण कोलदांडा पकडून मी उभाच असतो.
दोन वर्षं गेली तिसरंही जाईल.
उभं राहूराहू पायाच्या नळ्या दुखतात.
पण मी टोलनाक्यावर उभाच असतो.
......
प्रतिक्रिया
!!!
!!!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
:(
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
आवरा!
आवरा!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
(काय बोलावं कळत नाही)
:- |
(काय बोलावं कळत नाही)
नानांनीच आईसमोर शाळा घेतली
चर्र झालं वाचून
नानांच्या पैशावर आधी मजा करून
नानांच्या पैशावर आधी मजा करून झालीये!
अशा कर्तृत्वहीन लोकांचं शेवटी हेच प्राक्तन होतं. त्यामुळे मला असल्या गोष्टींमधल्या नायकांबद्दल अजिबात सहानुभूती वाटत नाही. वाटलीच तर चीड! ही गॉट व्हॉट ही डिजर्वड!
अर्थात गविंची गोष्ट छान जमून आलीये.
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
अगदी.कर्तृत्वहीन.. सहमत..
अगदी.
कर्तृत्वहीन..
सहमत.. माझी बरीचशी पात्रे जस्टिफायेबल किंवा सहानुभूतियोग्य नसतात. त्यामुळे वाचकांना जास्तीचा त्रास होतो. सिंपथी दाखवण्याची वाचकसुलभ इच्छा असूनही ते शक्य न झाल्याचा.
माझा "गजनी" झालेला असल्याने
माझा "गजनी" झालेला असल्याने मला तुमच्या या पुर्वीच्या कथा आठवत नाहीत(आठवते ती विमान अपघातवाली मालिका!)
त्यामुळे "तुमची बरीचशी पात्रे जस्टिफायेबल किंवा सहानुभूतियोग्य नसतात" असं विधान मी तरी करणार नाही, पण तुम्ही स्वतः तसे म्हणत असाल तर असेल बापडे!
उलट कथेतल्या पात्राबद्दल राग, लोभ, चीड, सहानुभूती - जे काय अप्लिकेबल असेल ते वाचकाच्या मनात निर्माण होते हे लिखाणाचे यश असते असा माझा समज आहे.
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
या पात्राची इम्पोटंट घुसमट
या पात्राची इम्पोटंट घुसमट अगदी व्यवस्थित उमटली आहे त्या ४ ओळींतून. जयवंत दळवींची आठवण झाली.
टिपिकल गविटच. मस्त.
टिपिकल गविटच. मस्त.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
येस्स्स!!! गविटच.
येस्स्स!!! गविटच.
"गविट" म्हणजे काय.. काळविटाचा
"गविट" म्हणजे काय.. काळविटाचा भाऊ असावा की काय, असा काही वेळ विचार करावा लागला मग ट्युब पेटली!
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
कविट म्हणजे कोंबडीचं अंडं असं
कविट म्हणजे कोंबडीचं अंडं असं ऐकून आहे..
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
...
कविट नाही. कवट.
काही ओळींतच झडझडून सोडायचं
काही ओळींतच झडझडून सोडायचं आणि संस्थळाचा माहौल बदलायचा अशी कला साध्य असलेले गवि म्हणजे संस्थळ जॉकीच म्हणायला पाहिजे.
गविंचं बहुतेक लेखन प्रथमपुरुषी का असतं कोण जाणे, पण त्यामुळेच ते फार परिणामकारक असतं.
सहमत आहे. प्रथमपुरुषी लिहिणं,
सहमत आहे. प्रथमपुरुषी लिहिणं, आणि त्यातही ग्रे शेडचं पात्र प्रथमपुरुषी लिहिणं भयंकरच अवघड असावं.
प्रथमपुरुषी नॅरेटिवमध्ये स्वसमर्थनाचा सूर आला नाही तर कृत्रिम वाटतं. स्वसमर्थन करूनही ग्रे शेड दाखवणं अवघड.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
मी असं जास्त स्पष्ट लिहीत
मी असं जास्त स्पष्ट लिहीत नाही पण,
आपल्याला सर्वकाही प्रथमपुरुषातच दिसत असतं आणि कोणत्याही गोष्टीची आपल्याला नेहमी एकच व्हर्शन / बाजू दिसते.
एक लेखक एका पॅरेग्राफमधे मुंबईतली पात्रे काय कट रचताहेत ते लिहून दुसर्याच पॅरेग्राफमधे कानपूरला वेगळ्या दोन पात्रांचे काय संवाद चाललेत असं सांगतो. यात वाचक सर्वज्ञानी बनतो आणि सगळं सरळसोपं होतं. तसंही असायला हरकत नाही.
पण प्रथमपुरुषी वर्णनात कोणते पात्र खरोखर कसे असेल हे अजिबात सांगता येत नाही. मुळात एका व्यक्तीच्या परसेप्शनमधून आल्याने एकच बाजू कळते आणि तरीही आपल्या कल्पनाशक्तीला पूर्ण वाव राहतो.
-नाना संधिसाधू असतील असं वाटू शकतं. त्यांनी प्लॅन करुन, पैसे खर्च करुन या पोराला सफाईने दूर करुन त्याच्या आईशी संबंध प्रस्थापित केले असतील.
-मुळात पोटेन्शियल असलेल्या कथानायकाला नानांनी घालूनपाडून बोलत आणि पैशाच्या उपकाराखाली खच्ची करत नेले असेल.
किंवा
-अगदी उलट, नाना हे त्या कुटुंबाचे खरे हितचिंतक असून त्यांच्यामुळेच निदान हा वाया जाऊ घातलेला पोरगा किमान उभा तरी आहे असंही असेल. खरेच हा टोलनाक्यावर उभे राहण्याचा जॉबही मिळवून देताना त्यांना तोंड वेंगाडावे लागले असेल. ते फार इन्फ्लुएन्शियल असतीलच असं नव्हे.
-त्याची आई आणि नाना यांचे संबंध अत्यंत हळवे असू शकतील. दिलेल्या परिस्थितीत त्यांचं एकत्र येणं पूर्ण जस्टिफायेबल असेल.
-त्याची आई आणि नाना यांचे एकत्र असणे याचा वाईट अॅंगल फक्त कथानायकाच्या मनातच असेल.
नायक मात्र त्याला "भाड्या, माझी आई घेतलीन" वगैरे असं म्हणून स्वतःवरचं फ्रस्ट्रेशन अशा रितीने काढत असेल.
हे आपल्याला थेट कधीच कळणार नाही.. कारण प्रथमपुरुष हीच रियालिटी आहे.
प्रथमपुरुषातच आपण सर्वजण अडकलेले आहोत. त्याच एका कोनातून आपण खर्या आयुष्यात कहाण्या जाणतो..मग एकाला सहानुभूति देतो आणि एकासाठी चीड बाळगतो.
आपल्याला कथेची एकच बाजू नेहमी दिसत असते आणि कथा सांगणार्याच्या नजरेपलीकडचं बाकीचं खरं जग कधीच दिसत नाही.. अनलेस यू आर अ सीबीआय ऑफिसर..
ही मुख्यत्वे कथानायकाची आई आणि नाना यांचीही कथा असू शकते. निरीक्षक बदलला फक्त.
नेमकं याच कारणांमुळं मला ललित
नेमकं याच कारणांमुळं मला ललित वाचन म्हणजे लुटुपुटुचा मोबाईलवरचा गेम वाटतो. पक्षी वास्तव, विज्ञान, सत्ये सप्पक असली तरी अधिक रोचक वाटतात.
---------
जनरली माणसाला स्वतःच्या जीवनाविषयी प्रेम असतं. काही लोकांचं 'सांगण्यासाठीचं', 'आढावा घेण्यासाठीचं', 'इतिहास उगळण्यासाठीचं', 'इतरांचे लेखी आपलं मूल्य काय असेल हे ठरवण्याचं' तत्त्वज्ञान कडवट असलं तरी डे टू डे बाबतीत मनुष्य स्वतःवर नितांत प्रेम करत चालतो. जेव्हा असं प्रेम करावंच का असं प्रश्न माणसाला पडायला लागतो तेव्हा त्याला डिप्रेशन येतं.
सबब अशा कथा वाचून पात्रांबद्दल फार वाईट वाटून घेऊ नये. ती खरी असू शकतात असे मानले तर चालेल पण हीच मानसिकता त्यांच्यात २४ तास असते असे मानू नये. असला हिशेब क्वचित होतो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मस्त, आवडली.
मस्त, आवडली.
छान. आवडले.
छान. आवडले.
खूप मिताक्षरी, बोलकं स्फुट
खूप मिताक्षरी, बोलकं स्फुट आहे हे. 'तुकडा' म्हणणार होते, पण काही केल्या याला तुकडा म्हणवेना. सुंदर.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
टोलनाक्यावर असं थांबलेलं
टोलनाक्यावर असं थांबलेलं कोणाला पाहिल्याचं आठवत नाही. म्हणजे अधिकृत नोकरी करत तर नाहीच नाही. आणि काच बंद होईतो एसीची हवा लागेल इतक्या जवळ कधीच नाही. शिवाय हे कोलदांडा काय प्रकरण आहे? टोल चूकवून 'पळत असणार्या' गाडीला हा सुरक्षितरित्या, स्वतः न इजा करून घेता, कसा घातला जातो?
------------------
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
असतात. स्वयंचलित बूम बॅरियर
असतात. स्वयंचलित बूम बॅरियर पुरेसे ठरत नसल्याचे कळून त्याऐवजी अनेक ठिकाणी काही मीटर्सवर मनुष्य उभा केलेला असतो. टोल कलेक्टरने इशारा केला किंवा कोणी टोल न देता पुढे जायला लागला की ताबडतोब हाताने अधिक मजबूत असलेला एक बार खाली पाडणे किंवा एखादी लोखंडी फ्रेम चाकांवर आडवी सरकवून लेन बंद करणे हे त्यांचे काम असते. ते स्वतः गाडीच्या मधे येत नाहीत. बाजूला उभे राहून फक्त उपरोक्त प्रकारचे कोलदांडे मधे सरकवतात. कारला अद्याप वेग आलेला नसल्याने कोलदांडा पाहून थांबायला पुरेसा वेळ मिळतो किंवा थोडीशी टक्करही होऊ शकते.
तुमच्या पाहण्यात हा प्रकार आला नसेल अशी शक्यता नक्कीच आहे. पण अनेक वर्षं भरपूर निरीक्षणात आल्याखेरीज असे तपशील लिखाणात कल्पनेने घातले जाऊ शकत नाहीत. निदान मला तरी तसे शक्य नाही.
Well, Nadann Nilekani had
Well, Nadann Nilekani had prepared a report on the technological architecture for electronic toll collection for national highways in India. It envisaged movement of vehicles past the toll plazas without halting using near feild communication technology. I had done (exhastive) costing for a cluster of highways for a bidder and the manpower cost estimates did not feature this koldanda chap. Hence I was curious.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
(अवांतर)
टायपो छे, की फ्रॉयडियन स्लिप?
कथा नीटशी समजली नाही,नायक
कथा नीटशी समजली नाही,नायक ऐतखाऊ आहे हे कळले, नाना कोण आणि काय घडले नायकाच्या बाबतीत नक्की.नायकाच्या आईने दुसरे लग्न केले काय?
™ ग्रेटथिंकर™
नाना हा संधीसाधू माणूस. आईला
नाना हा संधीसाधू माणूस. आईला मदत करायला अनेक बांडगुळं उगवली पैकी एक बांडगुळ नाना. आई देखील फार "दूधसे नहायी" असण्याची शक्यता नसणारे किंवा मजबूरी का नाम महात्मा गांधी असेलही.
पण आड्निड्या वयात नायकाच्या मनावर जे ओरखडे उमटले अन त्यातून त्याचे जे व्यक्तीमत्व (कर्तुत्वहीन अथवा कसेही) घडले त्याचे मार्मिक चित्रण हा धागा करतो.
संधीसाधू कशावरून? त्यांचेही
संधीसाधू कशावरून? त्यांचेही पैसे उडवलेच की नायकाने! बांडगुळ कसलं आणि नायकच बांडगुळ आहे - हे सांगितलेले जे इंटर्प्रिटेशन आहे त्यापेक्षा बरेच वेगळे आहे माझे!
असो, इतकी फोड आणि एका वाक्यात सार सांगण्याची गरज पडत असेल तर.....
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
एका करंट्याचे आत्मवृत्त
वाचून एका करंट्याचे आत्मवृत्त असं काहिसं वाटलं.
नायकाबद्दल he totally deserves this अशी प्रतिमा उभी राहिली.
जे कुणी नाना होते त्यांच्याबद्दल नायकाच्या मनात असलेला राग आहे - की चैनीचे दिवस संपले आणि आपल्याला कामाला लावलं.
त्यामुळे "साला भाड्या.. आई घेतलीन माझी.." ह्या उद्गारावर विश्वास ठेवावा, असं वाटणारा हा नायक नाही, सहानुभूती वगैरे तर नाहीच.
पण अशा माणसाच्या मनातील विचार मांडणे -ही कल्पना मस्त आहे!
==================
भूतकाळातील आस्वल्य.
मार्मिक अन अचूक...
मार्मिक अन अचूक...
यापूर्वीही छोटीसी बात या कथेत कथानायक कसा स्वार्थी, दुबळ्या कमकुवत मनाचा , ढोंगी , लूझर वाटतो असे बरेच प्रतिसादकर्ते म्हणत होते.
ते पात्र तस्सेच आहेच.. आणि अशी पात्रेही बॅलन्स न करु जाता लिहीता येतात ..
छोटीसी बातची लिंक प्लीज.
छोटीसी बातची लिंक प्लीज.
नेमकं!
खूपच नेमकं लिहिलंय… चुकून दोन शब्द भडक वापरले असते तर "मेलोड्रामा" झाला असता. तुम्ही वापरलेले शब्द खूप साधे आहेत… पण तरी ते ज्या पद्धतीने बांधले आहेत त्याने नेमका परीणाम साधलाय…
बिचारी आई
बालपणापासून टोलनाक्यापर्यंत विखूरलेले आत्मकण वेचणारे हे पात्र प्रस्तुत स्फूटातही लबाडपणा करतांना दिसते.
आवडलं.
सहानुभूती वाटू नये असं आयुष्य असूनही पात्राचं माणूसपण समोर येत राहतं. "या असल्यांना काय सहानुभूती दाखवायची" असं व्यवहारी मनाला वाटत असलं तरीही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
प्रकटन आवडले.
गब्बर सिंग ज्यांना 'फडतूस' म्हणतात त्यांपैकी हा एक आहे का?
अशा प्रकारची, समाज ज्यांना फुकट गेलेली म्हणतो अशी खूप माणसं आसपास दिसतात. बर्याचदा योग्य वेळी योग्य दिशा न सापडल्याने (किंवा तत्कालीन मोहात अडकून ती दिशा न घेतल्याने) अशी परिस्थिती ओढवते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
लेखन आवडलं. अगदी मोजक्या
लेखन आवडलं. अगदी मोजक्या शब्दांत एक व्यक्तिचित्र उभं राहतं. अशी माणसं दिसतात आसपास. त्यांच्या काय कथा असतील असा प्रश्न उपस्थित होतो. या कथेतून त्या प्रश्नाचं एक उत्तर मांडलेलं आहे. अर्थातच प्रत्येक कथा वेगळी असते, त्यामुळे उत्तर हे शेवटचं नसतं. पण अशी उत्तरं शोधण्यातूनच डोळ्यासमोर काही चित्रं निर्माण होतात, त्यातलं एक हृदयस्पर्शी चित्र मांडलेलं आहे. कॅलिडोस्कोपचा एक विशिष्ट कोन दाखवणारं. त्या काचतुकड्यांतून हे एकच चित्र निर्माण होणार नाही, इतरही अनेक असतील. गविंवी आपला कॅलिडोस्कोप वेगवेगळ्या कोनांतून, वेगवेगळ्या दिशांना फिरवून अशीच चित्रं मांडत राहावं.
लेखन आवडले
फार आवडले