माझा दर महिन्याचा खर्च
"महिन्याला साधारण किती खर्च येतो?" असा एक अवांतर प्रश्न माझ्या आधीच्या एका लेखावर विचारला गेला होता. त्यावर निरनिराळी आकडेवारी देणार्या उत्तरांचा पाऊस पडला. "या गोष्टीसाठी तुमच्याकडे इतके पैसे पडतात? अबबबबब .. " किंवा "बैबैबैबै आता इतके तरी खर्च करायला नकोत का?", "होहोहो" किंवा "नैनैनै" वगैरे सारखे प्रतिसाद होतेच, शिवाय ठाण्यात किंवा पुण्यात, त्यातसुद्धा नौपाड्यात की कासारवडवलीला, नारायण पेठेत की पिंपळे सौदागरला असे भेदसुद्धा होते. दिल्लीचं तर सगळच अचाट असे इकडच्या लोकांना वाटले. मूळ लेखाच्या झुडपापेक्षा हे बांडगूळ बरेच मोठे होणार याचा अंदाज आल्याने ते कलम उपटून "सध्या मासिक खर्च किती आहे?" या नावाने दुसरीकडे लावले गेले आणि पाहता पाहता ताडमाड वाढले.
एवढेच नव्हे तर दर महिन्याला अमूक इतका खर्च होतो असे गृहीत धरले आणि इतके मोठे डबोले घेऊन आज कोणी धनिक बाहेरून भारतात किंवा महाराष्ट्रात आला तर तो माणूस यापुढे पैसे कमावण्यायाठी काहीही काम न करता अनंत कालपर्यंत (खरे तर त्याच्या अंतकालापर्यंत) आरामात राहू शकतो का? या विषयावर दुसरा धागा निघाला आणि तोही चांगला फुलला. यात भविष्याचा वेध घ्यायचा असल्यामुळे कल्पकतेला जास्तच वाव होता. काही लोकांनी एक्सेललशीटवरील आकड्यांची मोठमोठी भेंडोळी सादर केली. या चर्चेत एका विद्वानाने अशा प्रकारचे प्रतिपादन केले की (पैसे आहेत तोवर) रोज केक आणून खा आणि तो (कदाचित त्याचा रिकामा खोका) कपाटातही ठेवा म्हणजे पुढे खाता येईल. (यू कान्ट हॅव अ केक अँड ईट इट टू अशी एक इंग्रजी म्हण) ही चलाखी एका चाणाक्ष वाचकाच्या लक्षात आल्यावर पुन्हा हिशोब केला तेंव्हा अनंतकाल पुरणारे पैसे काही वर्षात संपून जातांना दिसले. माझ्याकडे जेंव्हा नव्याने पीसी आला होता, त्यावेळी मी अशा प्रकारची असंख्य कोष्टके तयार केली होती. त्या काळात माझा जो काही मासिक पगार होता त्यात दरवर्षी ५, १०, १५, २० टक्के वाढ धरली, त्यातून दरमहा ५, १०, १५, २०, २५ टक्के बचत केली, त्या बचतीमधून केलेल्या इन्व्हेस्टमेंटवर दरवर्षी १०, १५, २०, २५ टक्के परतावा मिळाला, ते पैसे पुन्हा गुंतवले तर मी कधीपर्यंत लक्षाधीश, कोट्याधीश, अब्जाधीश वगैरे होईन ते पाहिले होते आणि मनातल्या मनात मांडे खाल्ले होते. पुढल्या काळात मीच काय, माझ्या ऑफिसातले सगळे प्यून आणि ड्रायव्हरदेखील 'लक्षाधीश' झाले. मात्र फार थोडे लोक कोटीपर्यंत पोचले. पुढच्या पिढीतल्या ज्या मुलांनी मुंबईपुण्यात बांधल्या जात असलेल्या जंगी इमारतींमध्ये मोठाले फ्लॅट्स बुक करून ठेवले आहेत किंवा ताब्यात घेतले आहेत ते बहुधा आताच 'कोट्याधीश' झाले असणार. पण तसे वागणे मात्र त्यांच्यासाठी जरा कठीण वाटते. कारण पुढच्या महिन्यातला ईएमआय कसा भरायचा याची काही लोकांना विवंचना असते आणि अमेरिकेत झाले तसे इकडे झाले आणि प्रॉपर्टीजच्या किंमती धडाधड कोसळायला लागल्या तर काय होणार? याची टांगती तलवार डोक्यावर लोंबकळत असते.
ऐसी अक्षरेवरले हे दोन्ही लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचतांना मला खूप गंमत वाटत होती. "महिन्याला साधारण किती खर्च येतो?" या प्रश्नाचे ठाम उत्तर इतक्या सगळ्या लोकांना माहीत होते, मग माझे मलाच ते का सापडत नव्हते? तसा मी गणितात फार कच्चा नाही. पूर्वीच्या काळातल्या एसएससी बोर्डाच्या परिक्षेत मला अंकगणितात १०० पैकी १०० गुण मिळाले होते. "यात काय आहे? ते तर आजकाल कोणालाही मिळतात!" असे कोणी ना कोणी म्हणणार म्हणून 'पूर्वीच्या' काळाचा उल्लेख! त्यामुळे निदान बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार वगैरे मला अजूनही येत असतील असे समजायला हरकत नसावी. पण मुळात माझ्याकडे खर्चाचे विश्वसनीय असे आकडेच नसतील तर कशाची बेरीज आणि कशाचा गुणाकार करणार?
पन्नास वर्षांपूर्वी मी कॉलेज शिकायला शहरात गेलो तेंव्हा मला पै न पैचा (खरे तर नव्या पैशांचा) हिशोब लिहून द्यावा लागायचा. त्यामुळे मेसबिल सारख्या मुख्य आकड्यापासून केशकर्तनालयात द्यायच्या रकमेपर्यंत आणि कागद, पोन्सिल, वह्या, पुस्तकांपासून ते सुई दोरा आणि टांचण्यांपर्यंत सगळे खर्च मी एका कच्च्या वहीत लिहून ठेवत असे आणि महिना संपताच ते 'फेअर' करून आणि त्यात (अत्यावश्यक) फेरफार करून घरी पाठवून देत असे. पण या सगळ्याचा मला इतका उबग आला की मी स्वतः पैसे मिळवायला लागल्यानंतर कधीही त्यांचा हिशोब ठेवला नाही तो नाहीच!
तसे पाहता माझ्या हातात रोख पैसेही क्वचितच मिळाले. लहानपणी आमच्या शेजारीपाजारी किंवा कोणा नातलगाच्या घरी कसलीशी पूजा असली किंवा त्यातल्या एकाद्या काकूच्या एकाद्या व्रताचे उद्यापन असले तर ते लोक ओळखीतल्या दोन चार मुलांना जेवायला बोलावत असत. त्या जेवणातल्या पक्वान्नांवर आडवा हात मारून घेतांना मजा यायची, पण पानातल्या डाव्याउजव्या बाजूचे सगळे पदार्थ आवडत नसले तरी ते निमुटपणे गिळावे लागायचे. ते सगळे संपवल्यावर पाटावरून उठायच्या आधी दक्षिणा म्हणून एक भोकाचा पैसा हातावर ठेवला जात असे आणि घेतलेल्या कष्टाची थोडी भरपाई होत असे. यजमान जरा उदार असला तर त्याच्या दुप्पट किंमतीचा ढब्बू पैसा मिळायचा. ताट, पाट, रांगोळीवाल्या तसल्या पंगतीच आता दुर्मिळ झाल्या आहेत. दहा बारा वर्षांपूर्वी कुणाकडे तरी जेवण झाल्यानंतर हातात एक बंदा रुपया पडला होता ती मला मिळालेली शेवटची 'दक्षिणा'. मित्रांच्या कोंडाळ्यात किंवा पिकनिकला गेलो असतांना कधी एक पैसा पॉइंट अशा 'डॅम चीप' स्टेकवर रमी खेळतांना नशीबाने दोन चार जोकर आले आणि प्यूअर सिक्वेन्सही लागला तर पंचवीस तीस रुपयांची रोख कमाई व्हायची, एकाद्या मेळाव्यात हाउसी तंबोला खेळतांना 'अर्ली फाय' किंवा 'लास्ट रो'चे बक्षिस विभागून मिळायचे. असे काही क्षुल्लक अपवाद सोडले तर माझ्या कमाईचे रोख पैसे हातात पडल्याचे फारसे आठवत नाही.
मी नोकरीला लागल्यापासून मला चेकने पगार मिळाला आणि नंतर तर तो थेट बँकेतल्या खात्यावर जमा व्हायला लागला. व्याज, डिव्हिडंड, कन्सल्टन्सी फी, ऑनररियम वगैरे मार्गांनी झालेली इतर आयसुद्धा चेकने मिळत गेली किंवा परस्पर बँकेत जमा होत आली. इतकेच काय पण जी काही 'उत्तेजनार्थ' वगैरे बक्षिसे मिळाली ती सुद्धा भेटवस्तूंच्या रूपात किंवा चेकनेच! दर वर्षी आयकराचे विवरण (इन्कमटॅक्स रिटर्न) भरणे सक्तीचे झाल्यापासून मिळालेल्या उत्पन्नाचा वार्षिक हिशोब ठेवणे गरजेचे होते, नाइलाजाने बँकेची पासबुके पाहून तेवढे काम करावेच लागत होते. पण खर्चाचा हिशोब ठेवण्याची सक्ती नव्हती. त्यामुळे तो ठेवण्याची गरजही नव्हती. त्या काळात ई बँकिंग नव्हते तरी अनेक ठिकाणी चेकने पैसे दिले जात असत. त्यातले काही एक रकमी, तर काही हप्त्याहप्यांनी दिले जात. शिवाय खिशातल्या पाकिटातले किंवा कपाटाच्या खणातले किती पैसे कधी होममिनिस्टरच्या पर्समध्ये जातील आणि त्यांचे तिथून कोणत्या दिशेने बहिर्गमन होईल ते समजणे शक्य नव्हते. "त्याबद्दल विचारण्याएवढे धारिष्ट्य मला मिळू दे" अशी देवाला प्रार्थना करून काही उपयोग नव्हता. कारण माझ्यासमोरच अनेक देवळांच्या पेटीत किंवा पुढ्यात तिने पैसे ठेवलेले असल्यामुळे ते सगळे देव तिच्याच बाजूने झालेले असणार हे उघड होते. एकंदरीत काय? नेहमीच्या सर्वसामान्य खर्चाचा तपशीलवार हिशोब ठेवण्याचा विचार मी कधीच मनात आणला नाही.
पंचवीस तीस वर्षांपूर्वी एकदा माझ्या इन्कमटॅक्स रिटर्नची कसून तपासणी झाली होती. त्या वेळी मला इन्कमटॅक्स ऑफिसरकडे जाऊन त्याला पासबुके वगैरे दाखवावी लागली. त्या गृहस्थाने सुद्धा "तुमचा महिन्याचा खर्च किती?" हा प्रश्न विचारला आणि मी उत्तरादाखल खांदे उडवून दाखवले. त्या काळात माझा मूळ पगार (बेसिक पे) दोन अडीच हजार रुपये असेल आणि महागाई भत्ता, शहर भत्ता वगैरे मिळून त्यावर आणखी सात आठशे रुपडे मिळत असतील. त्यातून सगळ्या प्रकारच्या छाटण्या होऊन दरमहा सुमारे दीड हजार रुपये बँकेत जात होते. त्यातले कधी बाराशेहे, कधी तेराशेहे तर कधी चौदाशेहे रुपये मी काढून घेत होतो आणि उरलेले शिल्लक पडत होते. त्या माणसाने हे आकडे पाहिले आणि माझ्यावर एक जळजळीत दृष्टीक्षेप टाकला. बाहेरच्या कोणा नवख्या माणसाला (किंवा कदाचित बाईंना) भेटायला जायचे म्हणून मी त्या दिवशी जरा बरे दिसणारे कपडे घालण्याची चूक केली होती. त्या काळातल्या सुखवस्तूपणाची निशाणी माझ्या पोटाच्या आकारावरून दिसत होती, चेहेर्यावरही थोडा तुकतुकितपणा होता. हे सगळे त्याने एका नजरेत टिपून घेतले आणि तो उद्गारला, "तुमच्यासारखा माणूस आणि या मुंबईमध्ये हजार बाराशे रुपयात महिना काढू शकतो हे शक्यच नाही. तुमचे आणखी कसकसले उत्पन्न आहे ते बर्या बोलाने सांगा."
मी माझे पगारपत्रक (पे स्लिप) काढून त्याच्यासमोर धरले आणि म्हंटले, "यातली उजवी बाजू वाचून पहा. मी ऑफिसने दिलेल्या घरात राहतो, त्याचे फक्त दोन अडीचशे रुपये भाडे कापले जाते. घरून ऑफिसला आणि परत घरी यायला ऑफिसचीच बस आहे, त्याबद्दल फक्त पन्नास रुपये घेतात, औषधोपचारासाठी आमची वैद्यकीय सेवा आहे, तिची वर्गणी महिन्याला तीस रुपये, मुलीचे शिक्षण फुकट, मुलाच्या शिक्षणासाठी आमच्या वसाहतीतल्या सेंट्रल स्कूलला वर्षातून एकदा चार पाचशे रुपये फी द्यावी लागते. मी जर बाहेर कुठे नोकरी करत असलो तर याच घराचे (त्या काळातसुद्धा) पाचसहा हजार रुपये भाडे पडले असते, ट्रेनचा पास, बस, टॅक्सी रिक्शा वगैरेंवर हजार बाराशे रुपये तरी खर्च आला असता, डॉक्टरची फी आणि औषधांची किंमत मिळून दीड दोन हजार रुपये खर्च झाले असते, शाळा आणि शाळेची बस यावर दोन मुलांसाठी मिळून दर महिना तीन चार हजार रुपये खर्च झाला असता. हे सगळे आकडे जोडले तर माझा पगार निदान बारा तेरा हजार रुपये तरी होईल. माझ्यासारख्यासाठी तेवढे पुरेसे असतील नाही का? शिवाय माझे हे सगळे खर्च आणि वीज, पाणी, सफाई, टेलिफोन वगैरे सगळ्यांची बिले माझ्या पगारातूनच कापली जातात. इन्कमटॅक्स, प्रॉव्हिडंट फंड आणि कसकसल्या वर्गण्याही कापून घेतल्या जातात. दर महिन्याला जे काही बारातेराशे रुपये मी बँकेतून काढतो ते फक्त खाणेपिणे, कपडेलत्ते, साबण, शँपू असल्या खर्चासाठी लागतात. मी दारूही पीत नाही किंवा महागड्या हॉटेलात जाऊन कोंबडीही खात नाही. कधी चेंज म्हणून आम्ही हॉटेलात गेलोच तरी इडली, डोसा किंवा बटाटा वडा नाहीतर मिसळ खाऊन येतो. एरवी घरची दालरोटी खाऊन राहण्यासाठी एवढे पैसे बख्खळ आहेत नाही का?" बिचारा निरुत्तर झाला. चुकीच्या बकर्याला पकडून त्याच्यावर उगाच वेळ वाया घालवल्याचा कदाचित त्याला पश्चात्तापही झाला असेल. या ठिकाणी हे सांगण्याचा उद्देश एवढाच की त्या वेळी सुद्धा माझा महिन्याचा खर्च किती होता असे म्हणायचे? रोख खर्च होणारे हजार बाराशे, की पगारातून कापलेले पैसे धरून दीड दोन हजार की मार्केट व्हॅल्यूप्रमाणे बारा तेरा हजार?
त्याच सुमाराला मला कोणीतरी सांगितले, "बघा, त्या सुशीचा दीर आताच रिलायन्समध्ये लागला आहे. तुमच्याच वयाचा असेल, पण त्याला चांगला पंधरा हजार पगार आहे, आणि तुम्ही (दोन अडीच हजारात)?" मी शांतपणे म्हंटले, "असेल, पण मी छान वसाहतीतल्या उत्तम प्रकारच्या घरात राहतो, माझी मुले चांगल्या शाळेला चालत जातात, त्यांची काही काळजी नाही. आम्हाला गरज पडताच चांगल्यापैकी वैद्यकीय उपचार मिळतात, शिवाय माझे काम मला मनापासून आवडते, माझे सहकारी माझ्याशी फार चांगले वागतात. त्या सुशीच्या दिराकडे यातले काय काय आहे? आणि त्याला किती श्रम करावे लागतात तेही त्याला विचारा." माणसाचे उत्पन्न नेमके कशात मोजायचे असते आणि त्यातल्या प्रत्येकाचे पैशात मूल्य करता येते का?
आजकालसुद्धा जसे मला सर्व स्त्रोतांपासून मिळणारे पैसे परस्पर बँकेत येतात तसेच माझी बरीचशी देणी चेक पेमेंट, डेबिट वा क्रेडिट कार्डे, इंटरनेट बँकिंग वगैरेंमधून परस्पर बँकेतून भागवली जातात. दर महिन्याच्या सुरुवातीला घरातल्या उपयोगाच्या सामानाची यादी बनवायची आणि आणलेले सामान महिनाअखेरपर्यंत संपवायचे किंवा पुरवायचे असे आम्ही अलीकडे करत नाही. पूर्वी ग्राहकसंघाचे सभासद असतांना ते लोकच एक मोठी यादी पाठवत असत आणि त्यात आकडे घालून त्या यादीसोबत आम्ही एक कोरा चेक देत असू. जो सभासद त्या महिन्याचा हिशोब करत असे तोच त्यावर रकमेचा आकडा घालून तो चेक पुढे पाठवत असे. त्यानंतर कित्येक दिवसांनी सामान घरी यायचे. त्यामुळे 'इतके पैसे मोजून इतके सामान आणले' असा फील त्या काळातही कधीच आला नाही. आजकाल घरातल्या एकेका डब्यातले सामान संपायला येते तेंव्हा ते आणले जाते किंवा एकाद्या दुकानात गेलो असतांना तिथे ठेवलेले कोणतेही सामान जरा चांगले किंवा स्वस्त दिसते आहे असे वाटले की त्याची खरेदी होते. त्या विकत घेण्याचा महिन्यांशी सहसा थेट संबंध नसतो. यातल्या कोणत्याच खरेदीत एका वेळी खूप घसघशीत रक्कम खिशातून जात नसल्यामुळे ती किती गेली ते जाणवतही नाही.
आजकाल लक्षात येण्यासारखा मोठा खर्च असतो तो वैद्यकीय कारणासाठीचा. काही स्पेशॅलिस्ट डॉक्टर लोक एका वेळा हजार, दोन हजार, तीन हजार अशी जबरदस्त फी घेतातच, त्यांनी सांगितलेल्या सगळ्या टेस्ट करून घेण्यात आणखी दोन तीन हजार रुपये जातात, काही तपासण्यांसाठी तर चार पाच हजारांवर खर्च येतो आणि हॉस्पिटलायझेशन करावे लागले तर मग विचारायलाच नको. शिवाय डॉक्टरकडे आणि लॅबमध्ये टॅक्सीने जाण्यायेण्यात हजारपाचशे रुपये खर्च होतात आणि त्यात दिवसभर जाणार असला तर खाणेही बाहेरच होते त्यासाठी पैसे मोजले जातात. त्यामुळे जेंव्हा हे करण्याची गरज पडते त्या महिन्यात एकदम मोठा फटका बसतो, राहत्या घराचे भाडे द्यावे लागत नसले तरी सोसायटी चार्जेस, प्रॉपर्टी टॅक्स वगैरे द्यावे लागतात. ते तीन महिन्यातून किंवा वर्षातून एकदाच दिले जातात. शिवाय बिल्डिंगचे वॉटरप्रूफिंग, रंगकाम वगैरे करायचे असल्यास त्यासाठी बरीच मोठी रक्कम पाच सहा वर्षातून एका वर्षी पण अनेक हप्त्यांमध्ये द्यायची असते. आपल्या घराचे अंतर्गत रिपेअर किंवा रंगकाम करायचे झाल्यास त्याचाही जवळ जवळ तितकाच खर्च येतो. या सगळ्यांची बेरीज करून दरमहिन्याला त्यावर किती खर्च आला ते ठरवण्यासाठी बरेच प्रयास पडतील. ते कुणी करायचे आणि कशासाठी? त्यानंतरचा टेलिव्हिजन, टेलिफोन्स, टेलिफोन, इंटरनेट वगैरे टेलिकम्यूनिकेशन्सवर होणारा मोठा खर्च हा बराचसा नियमित असतो पण बँकेकडून परस्पर जात असतो. त्यामुळे तो जाणवत नसतो पण त्याचा अंदाज करता येईल. थोडक्यात सांगाटचे तर ज्या खर्चांचा अंदाज करता येतो ते झाल्याचे जाणवत नाही आणि जे खुपतात ते अनियमित असतात.
एक ओव्हरऑल विचार केला तर खिशात पैसे नाहीत म्हणून उपाशी रहायची वेळ कधीच आली नाही आणि खूप पैसे खुळखुळतात म्हणून कधी पानावर तुपाची धारही धरली नाही. चार्वाकमहर्षींचा उपदेश ऐकून त्यासाठी ऋण तर कधीच काढले नाही आणि पिळदार मिशाच कधी न ठेवल्यामुळे त्यांना तूप लावायचा प्रश्नच उद्भवला नाही. मग दर महिन्यात किती पैसे आले, किती गेले आणि किती राहिले याचा हिशोब ठेवला काय आणि न ठेवला काय, काय फरक पडतोय्?
प्रतिक्रिया
मुक्तक, स्फुट आवडले.
मुक्तक, स्फुट आवडले.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+१
छान लेख. आवडला.
मस्त लेख ओ. आवडला.
मस्त लेख ओ. आवडला.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
स्फूट आवडले.
स्फूट आवडले.
मग दर महिन्यात किती पैसे आले,
मौजमजा सदरात हा लेख लिहिला आहे, त्यामुळे हे गंमत म्हणून लिहिले आहे की गंभीरपणे ते कळले नाही, म्हणून उत्तर देऊ शकत नाही. जर गंभीरपणे लिहिले असेल, तर नक्कीच उत्तर द्यायला आवडले असते. (माझी विनोदबुद्धी तशीही कमीच आहे.)
जर गंभीरपणे लिहिले असेल, तर
जर गंभीरपणे लिहिले असेल, तर नक्कीच उत्तर द्यायला आवडले असते. >> 'मनातले छोटे मोठे प्रश्न आणि विचार' धाग्यावर लिहू शकता. उत्तर वाचायला आवडेल.
स्थळ कोणते, सदर कोणते, लेख
स्थळ कोणते, सदर कोणते, लेख कोणता, मूड कोणता याने प्रतिक्रिया काय द्यायची असे वाटतेय त्यावर परिणाम व्हायला नको.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
गंमत आणि गंभीर विचार
हा लेखच मौज मजा या सदरात आहे आणि त्याचा शेवटही त्याला धरून आहे. या वाक्याच्या आधीच्या वाक्यांमध्ये त्याचे कारण दिले आहे.
गंभीर विचार करायचा झाल्यास सुद्धा रुक्ष आकड्यांपेक्षा त्यांचा जीवनावर होणारा परिणाम अधिक महत्वाचा आहे असे या लेखाचे सार आहे.
एक ओव्हरऑल विचार केला तर
हे वाचून माझा असा समज झाला की तुमचे म्हणणे आहे की "पैशाचा विचार कसला करताय? जमेल तेव्हडी मजा करा. बजेटिंग करून काय उपयोग आहे? माझे आयुष्य नाही का मजेत गेले?"
माझ्या मते हा अनुभव तुम्हाला सुखद ठरला असला, तरी इतरांना (विशेषतः कॉलेजमधून नुसत्याच बाहेर पडलेल्या तरुण पिढीला) हे असे सांगणे, मला पटत नाही. पैसे वाचवण्याची सुरुवात आयुष्यात जितकी लवकर लागेल, तितका त्याचा फायदा नंतरच्या आयुष्यात होतो. वयाच्या २० व्या वर्षी सुरू केलेला आणि फक्त १० वर्षे गुंतवणूक केलेला Roth IRA (किंवा भारतात PPF समजा) हा वयाच्या ५० व्या वर्षी तितकीच गुंतवणूक सुरू करून, पण २० वर्षे चालवलेल्या गुंतवणूकीपेक्षा अधिक फायद्याचा असतो. दुर्दैवाने आपल्या शाळा-कॉलेजात पर्सनल फायनान्सचे प्राथमिक ज्ञानसुद्धा शिकवले जात नाही, किमान मला तरी कधी कोणी शिकवले नाही. मी स्वतः हॉस्टेलवर राहिलो होतो, त्यामुळे नकळत मला हे शिकता आले. पण माझे वडील तुमच्यासारख्याच मनोव्रुत्तीचे असल्याने नेहमीच "आपलं चांगलं चाललय ना, मग कशाला विचार करा" असे वागले. त्यामुळे आयुष्यात नेहमी कंपनीच्या वसाहतीत राहिल्याने त्यांनी रिटायर होताना देखील, मुंबईत, चाळीतसुद्धा कधी १ खोली घेऊन ठेवली न्हवती. असो.
मला हे उत्तर वाचून गंमत वाटली नाही, तर कीव आली. महिन्याला साधारण किती खर्च येतो, शिल्लक किती राहाते हे अचूक माहित नसले, तरी +/- १०% मध्ये प्रत्येकाला त्याचा अंदाज असला पाहिजे.
ही गोष्ट बर्याच लोकांच्या बाबतीत (दुर्दैवाने) खरी असते. पैशाचे नियोजन ही गंभीरपणे घेण्याची गोष्ट आहे, गमतीने नाही. आजचेच उदाहरण देतो, माझ्या कंपनीत मिटींग होती की आपल्या ४०१(k) मध्ये फक्त ९४% टक्के लोक का सहभागी होतात? तसं म्हटलं तर ९४% हा इतरांच्या तुलनेत फारच चांगला आकडा आहे. पण १००% का नाही हा खरा मुद्दा आहे. उरलेले ६% लोक सहभागी होत नाहीत, याचा अर्थ ते स्वतःच्या रिटायरमेंटसाठी प्रयत्न करत नाहीत. इतकंच नाही तर कंपनी मॅचिंगचा "फुकट" मिळणारा पैसा पण नाकारत आहेत. याची कारणं अज्ञान, आळस अशी काहीही असू शकतात, पण त्याचा परिणाम दूरगामी होऊ शकतो.
यावर मी फक्त इतकेच म्हणेन की I would rather cry in a BMW than smile on a bicycle.
याचा अर्थ ते स्वतःच्या
याचा अर्थ ते स्वतःच्या रिटायरमेंटसाठी प्रयत्न करत नाहीत. इतकंच नाही तर कंपनी मॅचिंगचा "फुकट" मिळणारा पैसा पण नाकारत आहेत. >> ४०१क म्हणजे भारतातल्या EPF सारखे वाटतेय. भारतातदेखील बेसिक ५हजारपेक्षा जास्त असेल तर EPF देणे कंपल्सरी नाही. आयटीत कंपनी जी ऑफर देतात ती CTCच असते. त्यात एम्प्लॉयी काँट्री + कंपनी काँट्री दोन्ही असतात. त्यामुळे EPF नको म्हणले तर आपला पैसा आपल्याला मिळतो. फुकट वाया जात नाही.
४०१क म्हणजे भारतातल्या EPF
नाही बहुदा. EPF लम्प्सम मिळतो रिटायर झाल्यावर. ४०१क च्या समांतर NPS म्हणून स्कीम सुरु झालिये भारतात.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
NPS बद्दल पहील्यांदाच
NPS बद्दल पहील्यांदाच ऐकल.
EPF लम्प्सम मिळतो रिटायर झाल्यावर. >> ना बेसिकच्या १२% स्वतःचे आणि १२% कंपनीचे असे EPF असते. त्यातल्या कंपनीच्या १२ पैकी ८.६६% पेंशन फंडमधे जातात जे विड्रॉ करता येत नाहीत. उरलेले १५.३३% कंपनी सोडल्यावर ३महीन्यांनी विड्रॉ करता येतात.
एनपीएस
>>NPS बद्दल पहील्यांदाच ऐकल.
एनपीएस बद्दल खास महत्त्वाची उपयुक्त माहिती म्हणजे एनपीएस मध्ये बेसिक पगाराच्या १० टक्क्यापर्यंत केलेल्या गुंतवणुकीबद्दल कलम ८० क च्या एक लाखाखेरीज डिडक्शन मिळते. बेसिक पगार वीस हजार असेल तर महिना २००० गुणिले १२ (२४०००) एवढे अॅडिशनल डिडक्शन मिळते. [हे सध्याप्रमाणे. नव्या सरकारच्या नव्या बजेटमध्ये -अच्छे दिन यावेत म्हणून- ही सवलत काढून घेतली तर सांगता येत नाही].
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अरेरे बराच ट्याक्स वाचला असता
अरेरे बराच ट्याक्स वाचला असता
पण ते EPF च्या पेंशन फंडातले आणि हे NPS चे पैसे कधी आणि कसे मिळतात?
रिटायर झाल्यावर २०% काढता
रिटायर झाल्यावर २०% काढता येतात. उरलेल्याची लाईफ अन्युइटी घ्यावी लागते जी तुम्हाला मरेपर्यंत पेंशन देते.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
२०% आकडा चुकला आहे बहुदा. ४०
२०% आकडा चुकला आहे बहुदा. ४० का ६०% वाचल्यासारखे वाटते.
बाकी @अस्मि, यावरील हे बिल पास होऊन जास्त महिने झालेले नाहित (बहुदा गेल्या हिवाळी अधिवेशनात) {अन् बिलाची माहिती आपल्या संसदेच्या धाग्यात दिली होती - वाचत नाहीस ना तो धागा ) त्यामुळे याबद्दल उलटसुलट माहिती फिरते आहे. या जुलैचे बजेटमध्येही फारसा बदल होण्याची शक्यता नाही, तरी बॅंका त्यानंटरच यावर फोकस करून नीट माहिती देतील बहुदा.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हो... ४० आहे.
हो... ४० आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
ओह गुगलल्यावर NPS २००४ वगैरे
ओह गुगलल्यावर NPS २००४ वगैरे दिसलं म्हणून फारसे न वाचताच मी गृहीत धरल की जुनीच आहे ही स्कीम.
हे हे हे वाचते मी ते धागे; पण बरीच माहिती डोक्याच्या ३फूट वरून जाते :-P.
कलम ८० क च्या एक
त्याच्यासाठी तुमच्या एम्प्लॉयरनी सीटीसीचा काही भाग NPS मध्ये टाकावा लागतो.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
पेन्शन फंड
भारतात पेन्शन फंड कॉन्ट्रिब्युशन कंपन्यांना सक्तीचे नाही. त्यामुळे अनेक कंपन्यांमध्ये सर्व पैसे ईपीएफला टाकले जातात
अनेक
अनेक ऐवजी "बहुतांश" , "जवळपास सर्वच" हे शब्दप्रयोगही चपखल बसावेत इतपत कंपन्यात फक्त इपीएफच असते.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
nps
nps काही फार थोर वगैरे वाटली नाही. त्यातल्या त्यात ppf ब्येष्ट. पण त्यातही पैसा अडकून पडतो , लॉक होतो, हे मात्र खरे.
त्यालाही आता मार्केट लिंक करून टाकलेच आहे UPA सरकारच्या काळात.
मार्केट वर चढत असेल तेव्हा सगळ्यांनाच तसे केलेले लै भारी वाटेल.
पण मार्केट नेहमीच वर कसे जात राहिल ही शंका आहेच.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
माझ्या माहितीनुसार तुम्हाला
माझ्या माहितीनुसार तुम्हाला तीन ऑप्शन्स आहेत
१. तुमचे पैसे मार्केटात गुंटवण्याचा
२. तुमचे पैसे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवण्याचा
३. तुमचे पैसे इतर कमी टक्के परंतू फिक्स रिटर्न देणार्या योजनात गुंतवण्याचा
तुम्हाला जितकी रिस्क घेण्याची तयारी आहे तो पर्याय तुम्ही निवडायचा आहे. इतकेच नाही तुम्ही तुमचा पैसा दरवर्षी विविध पर्यायात विविध टक्क्याने गुंटवू शकता. म्हणजे जेव्हा शेअरमार्केट खाली जाईल त्यावर्षी सगळे पैसे पर्याय ३ वर लावा, मध्यम परतवा विथ मध्यम रिस्क हवा असल्यास १,२ व ३ मध्ये काही टक्के पैसा टाका
दरवर्षी किती पैसे कोणत्या पर्यायात टाकायचे ते वित्तवर्ष सुरू होण्यापूर्वी एकदा ठरवता येते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
401(k)
401(k) प्लॅन म्हणजे IRS च्या 401(k) टॅक्सकोड आधारित आहे म्हणून त्याला तसे नाव पडले आहे.
हा जवळपास प्रॉव्हिडंड फंडसारखा प्रकार आहे, म्हणजे आपण पगारातून थोडे पैसे टाकायचे, आणि त्याला जोडून तुमची कंपनी पण त्यात तितकेच पैसे टाकणार. निवृत्त झाल्यावर ते पैसे तुम्हाला मिळणार. पण प्रॉव्हिडंड फंड आणि 401(k) मध्ये बरेच फरक आहेत.
मी भारतात नोकरी करत होतो तेव्हा पगारातून प्रॉव्हिडंड फंड कापून घ्यायचे. (१०% का १२% नक्की आठवत नाही.) यात सहभागी व्हायचे की नाही, असा मला चॉईस न्हवता, पैसे कापले जायचेच. मग कंपनीपण तितकेच पैसे मॅच करत असे. हे सगळे पैसे ते माझ्या नावाने प्रॉव्हिडंड फंड अकाउंटमध्ये ठेवायचे आणि दरवर्षी साधारण १०% किंवा ८% व्याज द्यायचे. व्याजाचा दर दरवर्षी बदलत असे, जो गव्हर्मेंट ठरवत असे. तो दर त्या वर्षासाठी फिक्स, मग स्टॉक मार्केटला तेजी येवो अथवा मंदी येवो. मी नोकरी सोडली तेव्हा मला ते पैसे lumpsum घेण्याचा चॉईस होता किंवा मी नवीन कंपनीच्या प्रॉव्हिडंड फंड अकाउंटमध्ये ते ट्रान्स्फर करू शकलो असतो. (मी पैसे घेऊन माझ्या खिशात टाकले).
401(k) प्लॅनचा उद्देश जवळपास तसाच आहे की रिटायरमेंटला तुम्हाला पैसे मिळावेत. पण सर्व कंपन्यात ४०१(क) असेलच असेल, असे नाही. असला तरी तुम्ही त्यात सहभागी व्हायचे की नाही ही तुमची मर्जी. सहभागी झालात तरी किती टक्के पैसे टाकणार ती तुमची मर्जी. तुम्ही पैसे टाकले तरी कंपनी किती मॅच करणार ते प्लॅन डिझाइनवर अवलंबून असते. तसेच तुम्ही pre-tax or post-tax or roth 401(k) मध्ये पैसे टाकणार का ते पण प्लॅन डिझाइनवर अवलंबून असते. प्लॅनमध्ये कुठले फंड उपलब्ध आहेत, ते प्लॅन डिझाइनवर अवलंबून असते, पण ते पैसे कसे गुंतवायचे ते तुमच्यावर स्वतःवर अवलंबून असते. आणि अजून बर्याच गोष्टी (फी, टॅक्सवर परिणाम, vesting आणि withdrawal चे नियम, लोनचे नियम, रोलओव्हरचे नियम इ.) लक्षात घ्याव्या लागतात.
शेवटचा परिच्छेद सोप्या भाषेत
एक ओव्हरऑल विचार केला तर खिशात पैसे नाहीत म्हणून उपाशी रहायची वेळ कधीच आली नाही आणि खूप पैसे खुळखुळतात म्हणून कधी पानावर तुपाची धारही धरली नाही. चार्वाकमहर्षींचा उपदेश ऐकून त्यासाठी ऋण तर कधीच काढले नाही आणि पिळदार मिशाच कधी न ठेवल्यामुळे त्यांना तूप लावायचा प्रश्नच उद्भवला नाही. मग दर महिन्यात किती पैसे आले, किती गेले आणि किती राहिले याचा हिशोब ठेवला काय आणि न ठेवला काय, काय फरक पडतोय्?
खिशात पैसे नाहीत म्हणून उपाशी रहायची वेळ कधीच आली नाही = मूलभूत गरजा आधी कमी ठेवल्या. त्या भागल्या कारण प्रयत्नाला नशीबाची साथ .
खूप पैसे खुळखुळतात म्हणून कधी पानावर तुपाची धारही धरली नाही. = गरजेपेक्षा जास्त पैसे मिळाले म्हणून फार चैन केली नाही.
चार्वाकमहर्षींचा उपदेश ऐकून त्यासाठी ऋण तर कधीच काढले नाही = चैनीसाठी कर्ज घेतले नाही (उगाच मिळतात म्हणून हायर परचेसवर महागड्या वस्तू घेतल्या नाहीत.
मिशांना तूप लावायचा प्रश्नच उद्भवला नाही = श्रीमंतीचा खोटा आव आणला नाही.
एव्हढा फीड फॉरवर्ड कंट्रोल ठेवल्यावर पूर्ण फीडबॅक मिळाला न मिळाला तरी फार फरक पडू नये. वर्षातून एकदा तरी तो मिळत होताच.
बचत करू नये किंवा प्लॅनिंगचा विचार करू नये असे मी लिहिलेले नाही. मी पाळलेली पथ्ये पाळली तर शक्य तेवढी बचत होईलच. माझेच उदाहरण घ्यायचे झाल्यास सेवानिव्रुत्त होण्याआधी माझे जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग होते ते मी रिटायर होऊन आठ वर्षे झाल्यावर सुद्धा स्वतःच मेंटेन केलेले आहे.
किरकोळ हिशोब लिहिण्याचा अतिरेक करू नये, तो टॅली होत नसेल तर झोप उडवून घेण्यात अर्थ नाही. उत्पन्नाचे तसेच खर्चाचे सगळेच आयटम आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. ते नुसते लिहून काढण्याने कमी किंवा अधिक होत नाहीत.
मला दर महिन्याला किती खर्च येतो ते का सांगता येत नाही याचे कारण मी लेखात दिलेले आहे. ते असे की दर महिन्याला नियमितपणे होणारा खर्च कमी आणि अनियमितपणे होणारा जास्त असतो.
मला तरी महालात रडत बसण्यापेक्षा झोपडीत बसून हसायला जास्त आवडेल. पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना.
>>किरकोळ हिशोब लिहिण्याचा
>>किरकोळ हिशोब लिहिण्याचा अतिरेक करू नये, तो टॅली होत नसेल तर झोप उडवून घेण्यात अर्थ नाही. उत्पन्नाचे तसेच खर्चाचे सगळेच आयटम आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. ते नुसते लिहून काढण्याने कमी किंवा अधिक होत नाहीत.
मला दर महिन्याला किती खर्च येतो ते का सांगता येत नाही याचे कारण मी लेखात दिलेले आहे. ते असे की दर महिन्याला नियमितपणे होणारा खर्च कमी आणि अनियमितपणे होणारा जास्त असतो.
अधून मधून एखादा महिना अगदी डिट्टेलवार खर्च लिहितो. अनेक फुटकळ खर्च लक्षात येतात. मी याची सुरुवात केली याचे कारण आपले उत्पन्न आणि आपली शिल्लक यांचा मेळ लागत नव्हता. पक्षी माझे उत्पन्न ५०००० असेल आणि महिना २०००० खर्च होतो असे मला वाटत असेल तर दरमहा सरासरी ३०००० ने माझी शिल्लक वाढली पाहिजे. दरमहा अगदी नाही तरी वर्षाला ३ लाख साठ हजाराने शिल्लक वाढलेली दिसली पाहिजे. ती दिसत नव्हती म्हणून हिशेब लिहिला आणि महिन्याचा खर्च २०००० नसून २८-२९ हजार आहे असे लक्षात आले. यातून काही गोष्टी कळल्या. १. आपल्या खिशातून पैसे सांडत नाहीयेत. २. अपेक्षेपेक्षा जास्त होणार्या खर्चापैकी फारसा खर्च वायफळ नाही.
एकदा वायफळ खर्च होत नाही असे कळले की मग काही काळ खर्च लिहिला नाही तरी फरक पडत नाही.
पण दर सहा महिन्यांनी वरील प्रमाणे मेळ (उत्पन्न- खर्च = शिल्लक) घालून पाहिलेला बरा.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
शत प्रतिशत सहमत आहे. परवा
शत प्रतिशत सहमत आहे.
परवा अरूणजोशीच्या प्रतिसादानंतर आम्ही पुन्हा खर्च ट्याली केला माझा अंदाज २५K चुकीचा निघाला. जवळजवळ महिना सरासरी ३०-३३K खर्च येतो असे समजले.
आभार अजो!!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
दोन दिवसात कळलं आहे म्हणजे
दोन दिवसात कळलं आहे म्हणजे तुम्ही ग्रॉस लेव्हललाच टॅली केला आहे.
खर्च लिहून पहाच. ३०-३३ चा ३७-३८ वर जाण्याची शक्यता आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
उत्तम प्रतिसाद
घारेसरांसारखाच सल्ला माझेही वडील देत असतात. 'काळजी करु नका जे होईल ते होईल'. मात्र घारेसर व माझे वडील दोघांनाही सरकारी पेन्शनची निश्चिती आहे. मला ती नाही.
बाकी अनेक उच्चशिक्षण घेतलेल्या तरुणांना पर्सनल फायनान्सची अजिबात माहिती नसते हे पाहून फारच वाईट वाटते. अगदी इन्कमट्याक्च्या नोटिसा आल्यानंतर सरल फॉर्म वगैरे म्हणजे काय आणि कंपनी आपल्याला १६-ए कशासाठी देते, टीडीएस काय असतो याची चौकशी सुरु केल्याचे काही उदाहरणांमध्ये पाहिले आहे.
बाकी अनेक उच्चशिक्षण
याचा दोष तरुणांइतकाच "आत्ता फक्त अभ्यास करायचा. नोकरी लागली की पैसा वगैरे बघू" छाप संस्कारवाल्या बुढ्ढ्यांचाही आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
नाही
असे शिकवणाऱ्या बुढ्ढ्यांनी न सांगताही तरुणां/णीना पोरी/रे कशा/शी पटवायच्या/ची, फिरवायच्या/ची, मॉलमध्ये पैसे कसे उधळायचे, हॉष्टेलमध्ये भक्त प्रल्हाद कसा बघायचा वगैरे आयुष्याचे शिक्षण मिळतेच की. मग याच बाबतीत बुढ्ढ्यांवर आरोप कशाला करायचे.
वॉव
बॅट्या व अतिशहाणा दोघांच्याही प्रतिसादाला :-
वॉव
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
हे सहज घडणारे प्रकार आहेत.
हे सहज घडणारे प्रकार आहेत. पैशाचे प्ल्यानिंग असे सहज करता आले असते तर काय पाहिजे होते? तसे ते येत नाही, थोडेतरी शिकवावे लागते. त्यामुळे वेळीच अर्थसाक्षर न करणार्या बुढ्ढ्यांचा दोषही आहेच.
तरुण हे जातिवंत भिकारचोट आहेतच, त्यांना अक्कल ती नसतेच इ.इ. पण बुढ्ढ्यांनाही नसावी म्हणजे आश्चर्य वाटले इतकेच. बुढ्ढ्यांना जबाबदारीतून अज्जीच एक्स्क्लूडवण्यातला प्वाइंट कळाला नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
rights and entitlements
rights and entitlements ह्यात गल्लत होते आहे.
बुढ्ढ्यांनी पोट्ट्यांना काही शिकवणं, अधिकची माहिती देणं ह्यास entitlements म्हणता यावं.
तो तरुणांचा हक्क/right नाही.
अर्थात पोरांना अर्थसाक्षर करण्यात ज्येष्ठांचाही संभाव्य फायदा असू शकतो हे त्यांच्या ध्यानी यावे असे वाटते.
शिवाय वरील चर्चेत ज्येष्ठ बाय दिफॉल्ट अर्थ साक्षर असतात असे सूचित होते आहे.
काही केसेस उलटही पाहण्यात आहेत.(स्मार्ट तरुण व अर्थअर्धसाक्षर मागील पिढी)
आणि ह्या "काही" केसेस नगण्य नाहित.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
एंटायटलमेंट नसेल तर मग
एंटायटलमेंट नसेल तर मग तरुणांना कै कळत नै, अरेरेरे...करत गळे काढण्यातही अर्थ नाही. तरुण शिकतील हळूहळू. सगळे काय जन्मतः वॉरन बफेट(हो आम्ही शेवटचा ट उच्चारतो) नसतात. तरुणांबद्दल असे बोलणारे किती ज्येष्ठ आपल्या तारुण्यातही अर्थसाक्षर होते? उगा काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ज्येष्ठ आणि युवक
वरील चर्चेत ज्येष्ठ बाय दिफॉल्ट अर्थ साक्षर असतात असे सूचित होते आहे. .... प्रत्यक्षात असे नाही. ती पिढी इकॉनॉमिक टाइम्स, फायनॅन्शिअल एक्स्प्रेस वगैरे वाचत नव्हती. इन्वेस्टमेंटच्या बाबतीत धोका पत्करणे त्यांना परवडण्यासारखे नव्हते. त्यांना संधीपेक्षा सुरक्षितता अधिक महत्वाची वाटत होती. हर्शद मेह्ताच्या काळात किंवा संचयितासारख्या स्कीम्समध्ये काही लोकांचे हात पोळलेले त्यांनी पाहिले होते.
काही केसेस उलटही पाहण्यात आहेत.(स्मार्ट तरुण व अर्थअर्धसाक्षर मागील पिढी) आणि ह्या "काही" केसेस नगण्य नाहित. ... माझ्या मते अशा केसेसच अधिक असाव्यात.
सर आयझॅक न्यूटनने असे म्हंटले होते की मी माझ्या वडिलांच्या खांद्यावर उभा असल्यामुळे मला त्यांच्यापेक्षा अधिक दिसते. ही गोष्ट सर्वच क्षेत्रामध्ये लागू पडत असावी. मी तर असे म्हणतो की आमच्या पुढची पिढी आमच्याहून जास्त हुशार आहे, त्यांच्यापुढची पिढी त्यांच्याहून जास्त हुशार निघणार आहे.
जबाबदारी असतेच असे नाही
स्वानुभवावरुन सांगतो. माझ्या पालकांना फिक्स्ड रेट गुंतवणुकीपेक्षा काहीही वेगळे माहीत नव्हते. 'पाच वर्षात दामदुप्पट' करुन देणाऱ्या सरकारी योजना असताना युटीआयसारखे म्युच्युअल फंड किंवा घोटाळे होणाऱ्या इक्विटीकडे न वळल्याबद्दल मी त्यांना दोष देणार नाही. गेल्या काही वर्षात सेबी-अँफी वगैरे संस्थांमुळे हे प्रकार बरेच स्ट्रीमलाईन झाले आहेत. मात्र निव्वळ पुढच्या पिढीचे आर्थिक स्वातंत्र्य चांगले राहावे या कारणासाठी त्यांनी या सर्व गोष्टींचा अभ्यास करत राहावा व ह्या माहितीचे स्पूनफीडिंग करत राहावे ही अपेक्षा चुकीची आहे. आजकाल कोणता मोबाईल घ्यायचा (५०००० रुपये खर्च), कोणती गाडी घ्यायची (५ लाख खर्च) वगैरे गोष्टींसाठी तरुण मंडळी आईवडिलांवर अवलंबून राहत नाहीत. परदेशात जाऊनयेऊन नोकऱ्या वगैरे करतात. घरच्यांनी न सांगतााही व्हिसा-पासपोर्टसकट सगळी माहिती मिळवतात. मग आर्थिक साक्षरतेच्या अपयशाचे तेवढे खापर आधीच्या पिढीवर कशाला फोडायचे.
आणि अगदी आधीच्या पिढीने सल्ला द्यायचेच ठरवले तर ९९ टक्के वेळा ते सरकारी योजनांचाच देणार हे उघड आहे. आजच्या महागाईदराच्या काळात तो सल्ला किती चुकीचा आहे हे वेगळे सांगायला नको.
थोडा असहमत आहे, पण...ठीके.
थोडा असहमत आहे, पण...ठीके. धिस इज़ ओके.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
याचा दोष तरुणांइतकाच "आत्ता
तरुणांइतकाच दोष किंवा कसे माहिती नाही पण त्यांचाही दोष आहे याच्याशी सहमत आहे.
माझ्या लहानपणीच (चौथी-पाचवीत असतानाच) मला बँकेत अकाऊंट ओपन करून देण्यात आले होते. मला द्यायचे सगळेप पैसे बाबा ब्यांकेत भरत व मला तेथून काढावे लागत. नोकरीला लागूनही 'क्रॉसचेक'चे महत्त्व (मुळात त्याचा अर्थच) माहित नसलेली जन्ता पाहिली की माझ्या माफक अर्थसाक्षरतेत घरातील मोठ्यांचा वाटा आहेच हे जाणवते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
बाब्बौ!
चवथीत असतानाच ब्यांक अकौंट? _/\_
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आमचेही होते
आमचेही पाचवीत असताना पोष्टात सेविंग खाते होते.
हाहा, ते आमचेही होते. पण
हाहा, ते आमचेही होते. पण तेव्हा कै झेपत नव्हते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वाटा
अर्थसाक्षरतेत घरातल्या मोठ्यांचा वाटा आहेत. पण माझ्याबाबतीत तो अक्षरओळखीपुरता असे वाटते. मोठा वाटा एका प्रसंगाचा आहे.
२००३ की २००४ मध्ये मी पटनी कंप्युटर्समध्ये काम करत होतो. तेव्हा त्यांचा आयपीओ आला होता. कर्मचाऱ्यांना डीमॅट वगैरे खाती उघडण्यासाठी कंपनीने मदत केली होती. कंपनीतील सीनियर लोकांमध्ये इस्क्रो अकाऊंट, फेस व्हॅल्यू, अॅलॉटमेंट वगैरे सर्वत्र त्याची चर्चा ऐकून हा शिंचा आयपीओ असतो तरी काय ही शंका मनात आली व गूगलच्या मदतीने काही माहिती शोधली तेव्हा हाती आलेल्या दुव्यांच्या वाचनातून अर्थसाक्षरतेची सुरुवात झाली असे वाटते. आयपीओला अॅप्लाय करुन काहीही शेअर्स मिळाले नाहीत. मात्र तिथून पुढे माझ्यापुरते गुंतवणुकीच्या धोरणात मी मोठे बदल केले.
या आयपीओपूर्वी मी किती निरक्षर होतो याची साक्ष म्हणजे नोकरीला लागल्यावर गुंतवणूक म्हणून काढलेली 'कॅशबॅक इन्शुरन्स पॉलिसी'. शहाणा असतो तर मी टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेतली असती.
असो.
एक ओव्हरऑल विचार केला तर
तरी म्हटल घारे साहेब एवढे आनंदी कसे? त्यांच्या नावातच आनंद आहे म्हणा!
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
आवडला.
लेख आवडला. त्यातल्या आकडेवारीवरून आमच्या वडिलांनी सांगितलेली त्यांच्या वडिलांची एक आठवण जागी झाली. त्या काळी 'किश्को' कंपनीची कट्लरी प्रसिद्ध होती. चर्च् गेट बँड-स्टँडला मोक्याच्या जागी तिची शोरूम होती. बरेचसे लोक आशाळभूतपणाने काचेच्या आतल्या त्या चकचकीत नक्षीदार काटेचमच्यांकडे बघत बघत फूट-पाथ ओलांडीत. एकदा त्यांच्या वडिलांना त्यातले सुंदर नक्षीचे जेवणाचे चमचे फारच आवडले. विकत यायचेच अशा निर्धाराने ते आत गेले. भाव विचारला तर चौवीस रुपये डझन. बाप रे! शेवटी त्यातला एक चमचा घेऊन आणि दर महिन्याला एक एक चमचा विकत घेऊन 'सेट' करायचा असे मनाला बजावून ते बाहेर पडले. त्याकाळी हाताने जेवण्याची पद्धत होती त्यामुळे काटेचमचे ही चैनच होती असणार.
ओ हेलो!
भारतातील माणसे अजूनही हातानेच जेवतात बरे.
( पण आकडेवारी द्या, दुवा द्या, संदर्भ रेफरन्स हवा; असले ऐसी स्टाइल प्रश्न विचारु नका प्लीझ. )
काटे चमचे असतात मंडळींकडे, पण भारतात कितीजण नियमित घरी वापरत असतील ह्याबद्दल डौट आहे.
पोळी भाजी किंवा भाजी भाकरी हे काट्या चमच्याने खाणे सोयीस्कर पडत नसावे.
पण भावार्थ पोचला.
"कोणे एके काळी काटा चमचा घेउन खाणे हे ही चैन्/नखरे/हौस अशा प्रकारात येत असावे" असा आशय दिसतो.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
बरेच नार्दिंडियन एका हाताने
बरेच नार्दिंडियन एका हाताने भाजी चमच्यात घेऊन तिला पोळी लावून खाताना दिसतात. तेव्हा अशाप्रकारे तरी चमचा वापरत असावेत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
खरे आहे. त्यांचे बघुन मलाही
खरे आहे.
त्यांचे बघुन मलाही डबा खाताना आता तशी सवय लागली आहे. (घरी ताटातून खाताना चमचा लागत नाही, थेट डब्यातून खाताना वापरतो.)
त्यामुळे एरवीपेक्षा अधिक भाजी पोटात जाते व हात कमी खरकटा होतो असे लक्षात आले आहे.
(पावभाजी खाताना म्हणून मी मुद्दाम चमचा वापरतो. नैतर पाव आवडणार्या माझ्याच्याने भाजी फारशी संपत नै. चमचा असला की बरीच जास्त खाल्ली जाते)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अमराठी माणसाची तक्रार असते की
अमराठी माणसाची तक्रार असते की मराठी माणुस जेवताना(बोलतानाचं सोडून द्या) फारच जीभ बाहेर काढतो, निरीक्षण केल्यावर इतरांच्या तुलनेत जास्तच काढतो असे लक्षात आले आहे.
काय एकेक तक्रारी तरी
काय एकेक तक्रारी तरी
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हम्म..चमच्याने ऑप्टिमायझेशन
हम्म..चमच्याने ऑप्टिमायझेशन होते खरे, पण ते गिरवीवाल्या भाज्यांचेच. अदरवाईज़ विशेष फरक नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
लेख आवडला. मग दर महिन्यात
लेख आवडला.
मागच्या पिढीला जीवनाचे नक्की पर्पज काय आहे हा संभ्रम कधी सुटला नाही. आज जीवनाचे सुनिश्चित उद्दिष्ट 'नेट वर्थ' असताना हे तत्त्वज्ञान पचनी पडणे असंभव.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
लेख आवडला
लेख अतिशय आवडला. 'समाधान' ह्या मनोवृत्तीची व्याप्ती आजकाल इनफायनाईट झाली आहे.
लेख आवडला
लेख आवडला
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
आकडे
ऋ वगैरे मंडळी आपापल्या खर्चाचे आक्डे, बचतीचे डिटेल्स वगैरे देत आहेत.
कुणाचा पगार किती असावा ह्याचे अंदाज बांधण्यात वेळ मस्त जातोय.
देत रहा आकडे!
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मी तरी माझ्या स्वतःच्या
मी तरी माझ्या स्वतःच्या खर्चाचे आकडे कूठेच दिले नाहीत. गैरसमज नसावा.
पण तरीही,
१. खर्च ही महत्त्वाची बाब आहे, ती चर्चिणे मला स्वागतार्ह वाटते.
२. इथे आपला खर्च लिहिला, शिवाय आपण एन आर आय नसलो, तर संभाव्य हॅकर आपल्याकडे दुर्लक्ष करतात.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
माझा पगार किती हे इतरांना
माझा पगार किती हे इतरांना कळून त्यांना तो मिळणारे थोडाच?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
...
तुम्हाला शंभर गोष्टी नि स्किमा विकू पाहणार्यांच्या दृष्टीने ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे, हे तर खरेच!
(हे म्हणजे, माझा सोशल सेक्युरिटी नंबर इथे जालावर सर्वांना उघड दिसेल असा लिहिला, तर काय बिघडते? वाचणार्यांना माझे (तुटपुंजे) बेनेफिट्स (तोवर स्कीम शिल्लक असेल तर - दोन्हीं पक्षांच्या राजकारण्यांनी नेऊन गा.च्या गां.त घातली नसेल तर!) थोडीच मिळणार आहेत, की वाचणारे तो वापरून माझ्या नावाने ट्याक्स भरणार आहेत? असे विचारण्यासारखे झाले.)
मान्य. पण ती मी न देताही
मान्य.
पण ती मी न देताही त्यांनी आगोदरच मिळवली आहे याची खात्री आहे!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हम्म्म्म्म्...
प्वाइण्ट आहे.
आपल्या या एका केवळ अनावश्यक
आपल्या या एका केवळ अनावश्यक प्रतिसादामुळे धाग्याचे बरेच नुकसान झाले आहे असे वाटत नाही. निखारे विझल्यावर द्यायचा ना हा प्रतिसाद. आता बाकी डाटा नाही, मिळणार.
एकतर ओळखीचा अन भरोश्याचा माणूस असला लोक खर्च, पगार चर्चित नाहीत. तो एक सभ्य नागरी संस्कार आहे. मग त्यावर जाऊन हे संकेतस्थळ. शिवाय प्रत्येकाला इतराची थोडीफार माहिती. वर तू असा प्रतिसाद टाकायचा अवकाश मंजे कोणी काय बोलायलाच नको.
आपला खर्च (पगार नव्हे) सांगायला कोनी व्हॉल्यूंटिअर नसू शकतो का? शिवाय खर्च क्ष आहे मंजे पगार त्यापेक्षा जास्तच आहे हे आवश्यकच आहे का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
चेष्टा
चेष्टा करण्याचा प्रयत्न होता.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
भांडवली (कॅपिटाल) आणि महसुली (रेव्हेन्यू)
मी जर दर वर्षी इन्कमटॅक्स रिटर्नसाठी बँकांची पासबुके पहात होतो तर वर्षाच्या सुरुवातीची आणि अखेरची शिल्लक मला दिसली असतीच. मग त्यावरून ती वाढली असली तर जमेपेक्षा कमी खर्च झाला आणि घटली असली तर तो जास्त झाला. अर्थातच मला जर माझे वार्षिक उत्पन्न समजत असले तर किती खर्च झाला हे ही मला समजतच होते असे कोणालाही वाटेल. मग मी "नाही" असे का म्हणत आहे?
मला असे वाटले होते की कोणी ना कोणी वाचक हा प्रश्न विचारेल म्हणून मी त्याचे उत्तर तयार करून राखीव ठेवले होते. आता मीच हा प्रश्न विचारून त्याचे उत्तर देत आहे.
हा विषय वाटतो तितका सोपा नाही. आय आणि व्यय यांचे भांडवली (कॅपिटाल) आणि महसुली (रेव्हेन्यू) असे उपप्रकार असतात. आपल्याला मिळालेले सगळे पैसे म्हणजे उत्पन्न नसते. उदाहरणार्थ आपण कोणाकडून (कधी कधी आपल्याच पी एफ मधून) उसने घेतो किंवा कोणी आपल्याकडून उसने घेतलेले पैसे परत देतो. तसेच गेलेले सगळे पैसे खर्च नसतो (उदा: कोणाला उसने देणे, कर्जाची परतफेड). या शिवाय समजा मी तांदळाचे एक पोते विकत आणले तर त्याने माझी संपत्ती कमी होत नाही माझ्या संपत्तीचे स्वरूप बदललेले असते. जेंव्हा मी त्यातले थोडे थोडे तांदूळ शिजवून तो भात खातो (किंवा वाया घालवतो) तेंव्हा तो खर्च झाला. दीर्घ मुदतीच्या कर्जाची हप्त्याहप्त्याने परत फेड करत असतांना दिलेल्या ईएमआयचा किती भाग भांडवली आणि किती महसुली हे प्रमाण दर वर्षी बदलत जाते आणि मुद्दाम चौकशी करणार्यांनाच ते माहीत असते. शिवाय या वस्तूचे डिप्रिशिएशन (किंवा) अॅप्रिशिएशन होत असते.
यामुळे फक्त बँक बॅलन्स आणि रोख रक्कम मोजून संपूर्ण माहिती मिळत नाही. आपल्याकडल्या मालमत्तेची किंमत किती वाढली किंवा कमी झाली हे देखील पहावे लागेल. .... आणि हे फारच कठिण काम असते.
This exercise would be
This exercise would be computation of individual networth every year that invloves valuation of all assets afresh.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बरोबर
त्याशिवाय त्या काळात आपल्या संपत्तीमध्ये किती वाढ किंवा घट झाली ते कळणार नाही. जमाखर्च लिहिण्याचा उद्देश यावेगळा काय असतो?
जमाखर्च लिहिण्याचा उद्देश
जमाखर्च लिहिण्याचा उद्देश असतो की कॅशफ्लो कसा आहे, ते बघणे. कॅशफ्लो स्टेटमेंटमध्ये आवक आणि जावक बघतात. हे महत्वाचे आहे कारण त्यातून कळते की तुमचे खर्च फेडण्यासाठी किंवा नवीन अॅसेट विकत घेण्यासाठी, तुमच्या हातात सध्या पुरेशी कॅश आहे की नाही. पॉसिटीव्ह कॅशफ्लो चांगला कारण याचा अर्थ तुमच्या हातात रक्कम शिल्लक आहे. निगेटिव्ह कॅशफ्लो म्हणजे तुम्हाला अॅसेट विकून पैसे उभे करावे लागतील.
संपत्तीमध्ये किती वाढ किंवा घट झाली हे कळण्यासाठी बॅलन्स शीट बघावी लागते. तुमच्या अॅसेट, लाएबिलिटी आणि इक्विटी(नेटवर्थ)ची माहिती बॅलन्स शीट मधून मिळते. (नेटवर्थ = सर्व अॅसेट - सर्व लाएबिलिटी).
कॅशफ्लो स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट या भिन्न गोष्टी आहेत. म्हणून एखाद्या कंपनीच्या स्टॉकबद्दल अभ्यास करताना कॅशफ्लो स्टेटमेंट, इन्कम स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट या तिन्ही गोष्टी बघतात.
एक उदाहरण द्यायचे तरः कॅशफ्लो म्हणजे नळातून तुमच्या हातात पडणारे पाणी समजा आणि नेटवर्थ म्हणजे पिंपातले पाणी समजा.
१) हातात खूप कमी पाणी आणि पिंप तुडूंब भरलेले असू शकते.
२) हातात भरपूर पाणी आणि पिंप रिकामे असू शकते.
पर्फेक्ट
कॅशफ्लो स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट यांच्यातला फरक आपण अचूक दाखवला आहे. व्यावसायिक आस्थापनांसाठी जमाखर्च आणि ताळेबंद वेगवेगळा करावाच लागतो. त्याचा अभ्यास करणारे ते पाहतात. व्यक्तीगत बाबतीत सहसा कोणीही त्यात फरक करत नाहीत. "गेल्या महिन्यात नवा टीव्ही घेतला", "आम्हाला सुद्धा वॉशिंग मशीन घ्यावेच लागले, त्यामुळे खूप खर्च झाला हो." असे मी संवाद मी अनेकांच्या तोंडी ऐकले आहेत. यात कॅशफ्लो झाला पण बॅलन्स शीटच्या बॉटमलाइनमध्ये फरक पडला नाही. सोनेखरेदीमुळे तर मुळीच नाही. कॅशफ्लो आणि इन्कम एक्स्पेंडिचर हे दोन्ही पूर्वीच्या काळात एकच असतील, पण आज बहुतांश व्यवहार बँकेमार्फत होत असल्याने त्यात गोँधळ होतो. यातले काही परस्पर होत असतात.
आणखी
३. पिंपाचा नळ सोडून ठेवल्यामुळे हातात भरपूर पाणी दिसत असू शकेल (eating into the capital)
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
बरोबर आहे. नॉन्-रेग्युलर खर्च
बरोबर आहे. नॉन्-रेग्युलर खर्च (उदा.टॅक्सच्या वेळी, सुट्टीचा प्रवास, प्रॉपर्टी टॅक्स देताना वगैरे) वेळी पिंपातून पाणी काढावे लागते. पण पिंप थोडेफार गळके असले तरी दरवर्षी पिंपातले पाणी वाढत आहे ना, एव्हडे जमले तरी पुरे.
उदयसाहेब, व्यक्तिगत पातळीवर
उदयसाहेब, व्यक्तिगत पातळीवर हे सगळं बनवतात का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मला अरे-तुरे म्हटलं तर आवडेल.
मला अरे-तुरे म्हटलं तर आवडेल. (आणि आय्.टी.मध्ये आम्ही सगळ्यांना तसेच म्हणतो, त्यामुळे तशीच सवय आहे.) नाहीतर उगीच पोक्तपणाचा फील येतो.
हो, mint.com मध्ये मला नेटवर्थ आणि कॅशफ्लो दोन्ही वेगवेगळे दिसतात.
प्रश्न
चल, तूला एकेरी बोलून घ्यायचंय तर घे बापडा. संवादामधे सन्मान आणि ट्रस्ट माझ्याकडून तरी पुरेशी आहे हे सुस्पष्ट व्हावं म्हणून जी, साहेब असलं लिहित असतो ( प्रत्येक वेळी थोडीच लिहिणार कि आपणाबद्दल मला आदर आहे नि आपण लिहिताय ते मी सत्य मानतोय,इ इ? ). असो.
मी तूला प्रश्न वेगळा विचारला होता. P&L, BS, FFS (Fund Flow statement), CFS (cash ...), हे सगळं कंपन्यांचं मोजतात. 'माणसांचं मोजतात का' असा तो प्रश्न होता.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मोजायला पाहिजे
हे मोजायला पाहिजे. त्यातून आपल्या आर्थिक परिस्थितीबाबतच्या बऱ्याच गोष्टी कळतात.