खेळ मांडला...
मग माझी गोगलगाय होऊन जाते, म्हणून मला कादंबरी लिहिण्याचा राग येतो.
पाठीवर तिचा शंख, कुठ्ठंही जा... अंगाला कादंबरी चिकटलेलीच, अंगचाच भाग आहेही आणि नाहीही. म्हटलं तर घर, म्हटलं तर ओझं. चालायला सुरुवात केली की दोन्ही अँटिने ताठ आणि चाल मंद. चंदेरी माग ठेवायचा मागे, यायचं त्यांनी यावं. आणि आलंच कुणी खरोखर तर शिरून बसायचं शंखात.
लोकं बोंबलतात आपल्या नावानं.
उदाहरणार्थ : स्वतःला काय समजते / माज चढलाय / साधं भेटत-बोलत नाही / मोठी झाली ना आता फार / इतकं काय मेलं ते लिहिणंलिहिणं... लग्नंकार्यांना यायचं नाही - सणवार करायचे नाही / नाही काय म्हणताय व्याख्यानाला? वाचकांसाठीच लिहिता ना? मग ते बोलावतात कार्यक्रमाला तर कसला भाव खाताय? / एवढाल्या कादंबर्या लिहिताय, एक साधा लेख पेपरला लिहून द्या म्हटलं तर म्हणे अध्येमध्ये बारीकसारीक काही करणार नाही! कादंबरी संपली की बघा कशा कॉलम पाडायलाही तयार होतात / किती बोअर आहेस तू आई, तुझं लक्षच नसतं मी काय सांगते तिकडे / पत्राला निदान उत्तर तरी पाठवायचं ना मॅडम आणि फोनही घेत नाही तुम्ही, हे काही बरोबर नाही / तरी बरं, मराठीतच लिहितात आणि एवढुशा प्रती खपतात, दोनपाच हजार प्रती खपल्या इतकं इतरतात, लाखांनी प्रती खपल्या असत्या परदेशात खपतात तशा तर काय बाई वागली असती ही?
ऐकून घ्यायचं.
व्यवहाराची गतीच साली मंद होऊन जाते आणि किती खोळंबे, किती अभाव सहन करावे लागतात हे या पब्लिकला काय सांगणार? म्हणजे पैसे कमवायचे, हौसामौजाच नव्हे प्रसंगी गरजाही बाजूला ठेवून संदर्भांची पुस्तकं विकत घ्यायची, प्रवासासारख्या इतर खर्चांसाठी बाजूला ठेवायचे, प्रसंगी कर्जं काढायची आणि लिहिण्याचा हा भिकारचोट, येडझवा उद्योग करायचा. का? तर केवळ आपली खाज म्हणून. ती खाज दुसर्या कशानं भागत नाही. एक तंगडी और सौ घोंगडी म्हणतात ना, तसं होतं. लिहिणं ते लिहिणंच, दुसरं काहीही त्याची जागा घेऊ शकत नाही. त्यातनं जे सुख मिळतं ते दुसर्या कशातनं मिळत नाही आणि त्यातनं जो दु:खाचा निचरा होतो तोही दुसर्या कशातनं होत नाही.
काही माणसं यातही आपली भेटतात. समजून घेतात, समजावूनही सांगतात. सोबत देतात अनेक तर्हांनी. त्यांना गणगोत मानायचं. ते सहन करतात आपल्याला, कारण त्यांनाही जे वाटत असतं त्याला शब्द देण्याची धमक तमाम किमती मोजून मी दाखवलेली असते. याची जाणीव असते त्यांना. ते ऐकून घेतात सगळी बडबड 'मां की किरकिरी' न म्हणता. राहायला घरं देतात अनोळखी गावात, जेवण देतात घासातला घास काढून. त्यांचा जिव्हाळा वाटचाल सुरू ठेवतो माझी.
तरीही...
तरीही एक कादंबरी संपताच दुसरी सुरू करायची नसते मला. मी फेकून देऊ पाहते माझ्या लिबलिबितपणाला चिकटून वाढणारं ते कवचाचं घर, माझ्याच स्रावांचं.
शाळेत एक मैत्रीण होती. दहावीला नापास झाली इंग्लीशमध्ये आणि तिचं लग्न करून टाकलं गेलं लगोलग. माझं लग्न झालं तोवर तिला चार लेकरं झालेली होती. तीन मुली आणि चौथा मुलगा. पाठोपाठ. एकात एक असणार्या जपानी बाहुल्यांसारखी ती मुलं बघताना गंमत वाटायची. पत्रिका द्यायला गेले, तेव्हा ताईचा सल्ला देत कानात खुसफुसली की, "माझ्यासारखं होऊ देऊ नकोस बाई तुझं. लग्न झालं आणि लग्गेच गरोदर राहिले. सासरघरी एकदाही पाळी आली नाही. एक मूल दूध पितंय तोवर दुसर्यांदा गरोदर. दर दीड वर्षांना पोर झालं. चौथा पोरगा झाला, त्यानंतर ऑपरेशन केलं. मग कुठे त्यानंतर पाच महिन्यांनी मला पाळी आली."
चिपाड झाली होती पिळून.
पोरं नाही होऊ दिली तिच्यासारखी, पण कादंबर्या होताच आहेत. एक प्रकाशित व्हायच्या आधी दुसरी लिहिणं सुरू होतं. पोट घेऊन फिरायचं जड पायांनी, नाहीतर लेकराला दूध पाजत बसायचं. आधीच्यांची हगणीमुतणी निस्तरावी लागतात, ते चुकत नाही. कुणी कौतुक केलं तरी ऐकायचं जीवावर येतं. दुसर्याचं लेकरू खेळणं वाटतंच कुणालाही.
इस्मत चुगताईंनी आत्मचरित्राच्या सुरुवातीला लिहिलंय,"माझ्या आईला इतकी मुलं झाली होती की, आता मूल हा शब्द ऐकला तरी तिला मळमळून उलटी होते."
हे असलं वेडंवाकडं मनात येतं. तुलना योग्य-अयोग्य माहीत नाही, तरी होतेच.
पण पर्यायही नसतो. तो जो किडा असतो ना मेंदूत, तो दादला आहे. तो दुसरं काही सुचू देत नाही. वेडी होशील अशी भीती दाखवतो. मग मी पुन्हा निमूट गोगलगाय होते.
आता मांडलाय पुन्हा खेळ, पाचव्या कादंबरीचा!
प्रतिक्रिया
म्हन्जे समजलं नाय
म्हन्जे समजलं नाय नक्की.
लिखाणासोबत "तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना" असा प्रकार आहे का?
==================
भूतकाळातील आस्वल्य.
कादंबरी एकदा झाली, म्हणजे
कादंबरी एकदा झाली, म्हणजे प्रकाशित झाली की काय काय काळजी घ्यावी लागते?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
काय काळजी घ्यावी लागते?
लेखनाचेच अनेक खर्डे होतात. मग संपादकीय संस्कार, मुद्रितशोधन, मांडणी आणि मग छपाई.
यानंतर प्रकाशकांच्या लेखकाकडून काही सहकार्याच्या अपेक्षा असतात. उदा. प्रकाशन पूर्वप्रसिद्धी व प्रकाशनानंतरच्या प्रसिद्धीत सहभाग हवा असतो. त्यात निर्मितीप्रक्रियेविषयी लेखन, मुलाखती, गप्पांचे कार्यक्रम इत्यादी येतात. यात वावगं काहीच नाही, पण दुसरं लेखन सुरू केलं असेल तर आधीचं विस्मरणात गेलेलं असतं, ते खेचून आठवण्यात मानसिक वेळ जातो. प्रत्यक्ष वेळही जातोच.
काही भूमिका घेण्याची, काही गोष्टी विचारपूर्वक निश्चित ठरवण्याची वेळ येते; ज्यांची आधी गरज भासलेली नसते. कोणत्या व्यासपीठांवर जायचं, कोणत्या नाही? कोणाचे पुरस्कार घ्यायचे, कोणाचे नाही? माध्यमं अनेक बाबतीत प्रतिक्रिया विचारतात, त्या आपल्या अभ्यासविषयाशी संबंधित असतातच असं नाही; तर या भानगडीत अडकायचं की नाही? संमेलनांना जायचं की नाही? इत्यादी. डोक्यात लेखन विषयाचे विचार सुरू असताना या गोष्टी अडथळे आणतात.
तिसरा मुद्दा येतो अनुवाद व माध्यमांतरं. अनुवादाबाबत तुलनेत थोडी सोपी प्रक्रिया असते; पण माध्यमांतर भयाण मनःस्ताप देणारे असते. उदा. कादंबरीवर होणारा चित्रपट वा टीव्ही मालिका वा एकपात्री प्रयोग इत्यादी. माझ्या पहिल्याच कादंबरीबाबत मी हे जबर फटके खाल्ले. ब्र वर जो चित्रपट बनला तो भीषण अनुभव होता. त्यात त्यांना सहकार्य करायचं म्हणून / आदिवासी भागांची माहिती नाही म्हणून लोकेशन्स शोधून देण्यापर्यंत उचापती कराव्या लागल्या. चारेक महिने या सिनेमाने खाल्ले. पटकथेचं पहिलंच पान वाचून हिस्टेरिया होईल अशी अवस्था बनली. मग वृत्तपत्रांमध्ये त्याचे वाद, कायदेशीर भानगडी इत्यादी मनःस्ताप. त्यानंतर कादंबर्या माध्यमांतरासाठी द्यायच्या नाही असं ठरवलं, तरी इच्छुकांच्या फोन / भेटी याला सामोरं जावं लागतंच.
चौथा मुद्दा आर्थिक व्यवहारांचा. ते मला कळत नाहीत. जमवावे लागतातच, पण त्यात प्रचंड उर्जा वाया जाते. आकडे बघितले की गरगरायला लागतं. त्यात चुका, त्या निस्तारणं. हे प्रकाशकांसोबत होणारे करार, अनुवाद, माध्यमांतर, इबुक्स / ऑडिओ बुक्स अशा अनेक स्तरांवर चालू राहतं.
पाचवा मुद्दा वाचकांचा त्रास. जाणकार वाचक कमी, अजाणते अधिक. कशाने कुणाच्या भावना दुखावतील याची खात्रीच नसते. मग ब्लँक कॉल्स, अश्लील पत्रं, धमक्या इत्यादी गोष्टी सुरू होतात. चांगली पत्रं असली तरी पत्रांना उत्तरं देण्यात वेळ व पैसा खूप जातो. आजकाल पोस्टकार्डं वापरण्यास शिकले आहे, पण काही उत्तर मोठी असतील तर पाकिट-तिकीट आलंच. अशा एका पत्रामागे निदान रु. ७.५० /- जातात. उत्तरं दिली नाही तर माणसं दुखावली जातात. सामाजिक विषयांवरील लेखन असल्याने अनेक वाचक आपल्या समस्या शेअर करतात. भिन्न नंतर तर माझं कन्फेशन बॉक्समध्ये रूपांतर झालं होतं. यात लोकांना प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा असते. ती दरवेळी शक्य होतेच असं नाही, पण जमेल तितकी केली जाते.
सहावा मुद्दा पायरसी इत्यादी. ते निस्तारतात प्रकाशकच, पण त्यातही लक्ष घालावं लागतंच.
सातवा मुद्दा मला तापदायक ठरलेला नाही, पण इतर काही लेखकांचे विपरित अनुभव आहेत. प्रकाशकांनी किती प्रती छापल्या हे न समजणे, रॉयल्टी न देणे वा वेळेत न देणे, लेखकांना गृहित धरून काही व्यवहार परस्पर करणे इत्यादी.
आठवा मुद्दा अभ्यासक्रमांमध्ये लेखन समाविष्ट होणे, विद्यापीठांमध्ये पुस्तकं लावली जाणे, स्पेशल ऑथर म्हणून एखाद्या विद्यापीठात संशोधनासाठी नाव नोंदले जाणे इत्यादी प्रकार. यात कादंबर्यांवर एम.फिल्. / पीएच्.डी. करणार्या विद्यार्थ्यांचा त्रास अतोनात होतो.
काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित
सविस्तर प्रतिसादासाठी
सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
+१
+१
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद
मला एक प्रश्न पडला आहे, जमले तर उत्तर द्याल का? तुम्ही कथा, कादंबरी असे लेखन करता आणि त्याच क्षेत्रातील आहात, म्हणून विचारतो. लेखन हा पूर्णवेळ व्यवसाय कसा होऊ शकतो, हा मला नेहमी पडणारा प्रश्न आहे. उदा. हॅरी पॉटरची लेखिका आर्थिक पातळीवर खूप यशस्वी झाली, पण ते बहुतेक करून exception to the rule असावे. माझ्यामते ९०-९९% लेखक/लेखिका/कवी/कवयित्री काही त्या पातळीवर यशस्वी होत नसतील, असा माझा अंदाज आहे. समजा एखाद्याने २०० रुपये किंमतीचे पुस्तक लिहिले तर त्याला/तिला ५० रुपये रॉयल्टी मिळत असेल आणि ५००० कॉपी विकल्या गेल्या तरी जेमतेम २.५० लाख रुपये मिळतील. (मी सिनेमा स्क्रीप्ट लिहिणार्यांबद्दल बोलत नाही, त्यांना कदाचित जास्त पैसे मिळत असतील). मग असा व्यवसाय पूर्णवेळ करणे कसे शक्य आहे? आणि जर कुठे पूर्णवेळ नोकरी करून लिखाण केले तर त्याला वेळ कसा मिळणार? हे अर्थगणित मला कधीच कळले नाही. व्यक्तिशः तुमच्याबद्दल बोलत नाही, पण मला वाटते की हा प्रश्न सगळ्याच लेखक/लेखिकांना असणार ना, मग ते मराठी असोत किंवा तेलगु असोत, भारतातले असोत किंवा बाहेरच्या देशातले असोत. आणि माझा अंदाज थोडाफार जरी बरोबर असेल, तर पूर्णवेळ लेखन करणारे हा उद्योग कसा काय आणि का करतात?
इथे "पूर्णवेळ लेखक" ची
इथे "पूर्णवेळ लेखक" ची व्याख्या "ज्याचा उदरनिर्वाह फक्त पुस्तके लिहिणे आणि त्यासंबंधित बौद्धिक संपदेच्या विक्रीतून होतो असा मनुष्य" असा करत आहे.
बरेच लेखक पुस्तकं लिहिण्याबरोबर प्राध्यापकगिरी (अमिताव घोष), स्तंभलेखन, पत्रकारिता वगैरे करत असतात. ते पूवेले नव्हेत.
पूवेले मराठीच काय, पण इंग्रजी साहित्यसृष्टीतही कमी असावेत. रोलिंगला (हॅरी पॉटरची लेखिका) सुरुवातीला तिच्या एजंटाने "don't leave your day job" असा सल्ला दिला होता!
आमिश त्रिपाठी (मेलुहाचा लेखक) पूवेले आहे म्हणे.
----
कदाचित सरसकटीकरण असेल, पण बर्याच लेखकांचा डे जॉब त्यांना भयंकर व्यस्त ठेवणारा नसावा. घराचं-दार-ते-घराचं-दार १२ तास घालवणारा डे जॉब काही सृजनशील लिहू देईल हे जरा अवघडच आहे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
पुस्तक लेखन, प्रकाशन आणि त्याचे अर्थशास्त्र
योगायोगाने आज "इकॉनॉमिक्स ऑफ रायटिंग ऑफ अ बुक" हा लेख वाचायला मिळाला. त्यात लेखकाने पुस्तक प्रकाशित करून ते विकण्याचा, त्याचा स्वतःचा अनुभव सांगितला आहे, जे बहुतेक माझ्या प्रश्नाचे उत्तर आहे. लेखकाच्या अनुभवानुसार, भविष्यात स्व:प्रकाशित पुस्तके अजून बघायला मिळाली, तर आश्चर्य वाटायला नको.
सुंदर आहे स्फुट. अतिअवांतर
सुंदर आहे स्फुट.
अतिअवांतर आणि अतिकडवटः आता लिखाणाची प्रकृती समजून न घेता, जे काही लिहिलं जातं ते सगळं आपल्या तथाकथित व्यवहारी प्रश्नांनी सोलून घेण्याकरताच - अशा गाढ समजुतीसह इथे आता काही प्रश्न विचारले जातील. काही कुत्सित पिंका टाकल्या जातील. शंख म्हणजे काय, आपले स्राव म्हणजे काय, कवच म्हणजे काय - अशा निरर्थक चर्चा झडतील. माझी चिडचिड होईल. असो. असो.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
खत्रा प्रकार आहे एकूण.
खत्रा प्रकार आहे एकूण.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
स्फुट खूपच छान झालेलं आहे.
स्फुट खूपच छान झालेलं आहे. गोगलगायीचा शंख आणि भाराभर होणारी पोरं दोन्ही रूपकं चपखल.
आवडले.
आवडले.
+१
+१
तुमचा दुसरा प्यारा अत्यंत
तुमचा दुसरा प्यारा अत्यंत आवडला .....
लोकं बोंबलतात आपल्या नावानं.
उदाहरणार्थ : स्वतःला काय समजते / माज चढलाय ......
ह्या पुढे जे काही लिहिलेय तुम्ही ते एकदम आवडले.
प्रथितयश माणसानं कसं ... प्रचंड यश मिळाल्यावरही विनम्रतेने वागावे ही आपल्या समाजाची निर्लज्ज अपेक्षा असते. बघा - वृक्ष सुद्धा फळे लगडल्यावर झुकतात ... व ते नम्रतेचे लक्षण आहे - असे लेक्चर ठरलेले. आणि त्याही पुढे जाऊन प्रथितयश व्यक्तीच्या हातून एक छोटीशी चूक झाली ... की संपलं. तुम्ही एवढे मोठ्ठे ... यवढीशी गोष्ट समजत नाय तुम्हाला ??? हा डायलॉग ठरलेला.
+१
+१
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
"शंख आणि दादला"
प्रतिभावंताच्या वेदना मांडणारा लेख आवडला.
>>>>वेडी होशील अशी भीती दाखवतो. >>>>>
लिहिण्याची तीव्र ऊर्मी लेखकाला खरोखरीच वेडे करत असेल का? की लेखक मुळात थोडे वेडेच असतात आणि ते वयाची चाळीशी गाठेपर्यंत फार उघड होत नाही असे काहीसे?
अशी काही उदाहरणे आहेत का?
वेडेच असतात
वेडेच असतात, त्याचा चाळीशीशी काही संबंध नाही.
"मी का लिहिते?" या प्रश्नाचं एका मुलाखतीच्या रॅपिड फायरमध्ये मी उत्तर दिलं होतं :
"सायकाअॅट्रीस्टची फी परवडत नाही म्हणून!
राजहंस प्रकाशनाचे ( यांनी माझी बहुतांश पुस्तकं प्रकाशित केली आहेत ) प्रकाशक श्री. दिलीप माजगावकर यांना कुठलासा मोठा पुरस्कार मिळाला, तेव्हा त्यांना लिहिलेल्या अभिनंदनाच्या पत्रात मी म्हटलं होतं की,"तुम्ही चार पिढ्यांचे लेखक जवळून पाहिलेत. प्रत्येकजण स्वतंत्रपणे विक्षिप्त तर्हेचा! त्यांना सांभाळणं सोपं नव्हतंच."
मित्र माजगावकर
काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित
आभार
प्रांजळ उत्तराबद्दल आभार.
पण एक कादंबरी हातावेगळी झाली...(प्रचंड काम आहे ते) की मग मानसिक थकवा येत असेल.
आता काहीही लिहायला नको असेही वाटत असेल. त्या काळाबद्दलही वाचायला आवडेल.
असा काळ किती असतो आणि मग ते "मला लिही..." म्हणणारे भूत मानगुटीवर पुन्हा कधी बसते?
जनाचे बोलणे कोठवरी
लोक काय म्हणतात/म्हणतील ह्याचा विचार विचारवंतही करतात हे पाहून वाईट वाटलं, साहित्य-निर्मिती मधे होणार्या विचार-मंथनामधे हा इतरेजन काय म्हणतील ह्याचा विचार न करण्याबाबत विचार होत नसावा काय?
समर्थ म्हणतात त्याप्रमाणे -
बोले बहु त्याला म्हणती वाचाळ । बोलेना तो खळ मैंद म्हणती
बळकट धश्चोट ते काय व्यसनी । कर्मठ जो प्राणी तो पोंचट
होईना संसार म्हणोनि संन्यासी । हांसती तयासी ऐशा रीति
रामदास म्हणे बरवे पाहणे । जनाचे बोलणे कोठवरी.
हि जंतूंची स्वाक्षरीही होती असे स्मरते.
लोकांचा विचार करणं
< लोक काय म्हणतात/म्हणतील > लोकांचा विचार करणं हे दोन प्रकारे होतं. लोक काय म्हणतील याचा विचार करणं / दडपण घेणं / भीती बाळगणं हा एक प्रकार आहे आणि लोकांना विचारात घेणं हा दुसरा प्रकार. मी दुसर्या प्रकारातली आहे. लोकांची मतं विचारात घेणं, त्यांना काय वाटेल याची पर्वा करणं हे समूहात जास्त जगल्याने व सामूहिक निर्णयांची सवय असल्याने मला गरजेचं वाटतं. याचा अर्थ मी लोकानुनय करते असा होत नाही, अन्यथा इतकी टीका माझ्यावर झाली नसती. पण लोकांना / वाचकांना तुच्छ लेखणं, अडाणी समजणं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं, बेपर्वाई दर्शवणं पटत नाही.
कोंडी होते ती यामुळेच. लोकांपर्यंत पोचायचं असतं, लोकांमध्ये रहायचं असतं आणि लेखनासाठी एकांतही हवा असतो.
काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित
हळवे स्फुट, माहितीपूर्ण प्रतिसाद
हळवे स्फुट, माहितीपूर्ण प्रतिसाद. धन्यवाद.
सहमत
असेच म्हणतो.
अवांतर, पण…
या निमित्ताने एक विनंती अशी की 'मराठी कादंबरीचं अर्थकारण' यावर त्यातल्या माहितगार माणसाने काही लिहिलं तर वाचायला आवडेल. म्हणजे उदाहरणार्थ, समजा कादंबरीची किंमत तीनशे रुपये आहे. त्यापैकी उत्पादनखर्च किती जातो? शिल्लक राहिल्यातले प्रकाशकाला किती मिळतात, दुकानदाराला किती आणि लेखकाला किती? एकूण किती प्रती निघतात आणि त्या खपायला किती वर्षं लागतात? अशासारख्या प्रश्नांची ढोबळ उत्तरं का होईना, मिळाली तर माहितीत भर पडेल. यात अर्थात पुस्तकापुस्तकानुसार आणि लेखकालेखकानुसार आकडे खूप वेगळे असणार हे अपेक्षित आहेच.
> एकात एक असणार्या जपानी बाहुल्यांसारखी ती मुलं बघताना गंमत वाटायची.
माझ्या समजुतीप्रमाणे त्या रशियन बाहुल्या.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
प्रकाश घाटपांडे
प्रकाश घाटपांडे ह्याम्चा ह्यापूर्वी ह्या अर्थकारणाबद्दल धागा आलेला आठवतो आहे.
कोणत्या संकेतस्थळावर आलेला होता, ते मात्र आठवत नाही.
लेखकास पुरेसे मानधन दिले जात नाही; पुन्हा वर अशीच "साहित्यसेवा" करीत जा वगैरे डोस पाजले जातात;
पण असले डोस प्रकाशकास कोणी पाजत नाही; अशा धर्तीवरची तक्रार त्यात असल्याचं दिसतं.
पु लं नी बर्याच मुलाखतीत व अललित लेखात लेखक + कलावंत ह्यांची भारतातील स्थिती आणि पाश्चात्त्य जगातील स्थिती ह्यांची तुलना केली आहे
तिकडे पूर्णवेळ लेखक किंवा कलावंत बनता येणे कसे शक्य आहे; व इथे त्यात काय काय अडचणी येतात; ह्यांचं तपशीलवार वर्णन त्यांनी दिलय.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मात्र्योश्का ........रशियन बाहुल्या
त्या मात्र्योश्का नावाच्या रशियन बाहुल्या आहेत .
साधारण गणित
रशियन बाहुल्या ही दुरुस्ती सांगितल्याबद्दल आभार.
लेखकाला किमान १० % रॉयल्टी दिली जाते. ( ब्र ची लोकावृत्ती काढली, तेव्हा प्रकाशकांनी त्यांना फायदा कमी केला व मी माझा. त्या आवृत्त्यांची ७.५ % रॉयल्टी मिळाली / मिळतेय. यात कमी किमतीमुळे प्रती जवळपास दुपट्ट झाल्याने आवृत्तीमागे मला ३ ते ४ हजार मिळाले. ) ही रॉयल्टी जास्तीत जास्त २० पर्यंत दिली जाते. ( चाळेगत या कादंबरीसाठी शब्दालय या प्रकाशनाने प्रवीण बांदेकर यांना रॉयल्टीपोटी १०० प्रती दिल्या, बाकी खडकू नाही. अर्थात हे करारावेळीच स्पष्ट केले जाते. ) अनुवाद असेल तर लेखकाला निम्मी व अनुवादकाला निम्मी रॉयल्टी मिळते. एकरकमी पैसे द्यायचे असतील तर गणित बदलते.
वितरक / विक्रेत्यांना २५ % पासून ते ५० % पर्यंत कमिशन दिले जाते. ते त्यातूनच ग्राहकाला १० % ते २५ % सवलत देतात. प्रकाशनपूर्व बुकिंगच्या योजना आखल्या तर हे कमिशन वाचते. अनेक विकल्या न जाणार्या पुस्तकांच्या प्रती प्रकाशक वा स्वत: लेखक काही विशिष्ट वितरकांना ७० ते ८० % कमिशनने देऊन टाकतात. म्हणून ब व क दर्जाच्या वाचनालयांमध्ये भरताड पुस्तकांचा भरणा दिसतो.
खर्च किती होतो हे पाहूनच पुस्तकाची किंमत ठरवली जाते. ती किमान रुपयाला एक पान अशी ठरवतात. त्यामुळे कादंबर्याही जास्तीत जास्त ३०० पानांपर्यंत असाव्यात असा प्रकाशकांचा आग्रह असतो. माझ्या कादंबर्या साधारणपणे सव्वाचारशे पानांच्या झाल्याहेत, त्यांची किंमत १५० ( लोकावृत्ती ) ते ३५० पर्यंत असत आली आहे. आता नव्या कादंबरीची काय ठरेल माहीत नाही, कारण त्यात दोन मुखपृष्ठं + दोन ब्लर्ब असल्याने रंगीत छपाईचा खर्च वाढेल. मुखपृष्ठ हार्डबाउंडवर जाकीट आहे की साधं आहे, यानेही फरक पडतो. टंकन, मुद्रितशोधन, मांडणी यांचा खर्च एकदाच होतो आणि नंतर कागद व छपाईचा खर्च फक्त होत राहतो. कागदही अनेकदा पहिल्या आवृत्तीला काकणभर अधिक दर्जाचा वापरला जातो, पुढच्या आवृत्त्यांना कमी दर्जाचा. काही ठरावीक प्रती वेगळ्या कागदावर छापून घेतल्या जातात, असंही काही पुस्तकांबाबत घडतं. ( माझ्या ग्राफिटीवॉल या पुस्तकाच्या ठरावीक संख्येच्या प्रती आर्टपेपरवर छापण्यात आल्या होत्या. ) त्यामुळे हे खर्च प्रत्येक पुस्तकानिशी बदलतात.
सध्या चित्रकाराला मुखपृष्ठासाठी २ ते ४००० रु./ दिले जातात. पहिल्या आवृत्तीवेळी हे सर्व खर्च धरून साधारणपणे ३० % एकूण खर्च होतो, तो पुढे घटतो. किमान ११०० प्रतींची आवृत्ती काढावी लागते, कमी काढली तर खर्च वाढतो, जास्त काढली तर कमी होतो, असंही एक गणित आहे.
थोडक्यात लेखक १० %, वितरक २५ %, खर्च ३० टक्के व प्रकाशकाला ३५ % असे मिळतात. या पस्तीस टक्क्यांमधून जाहिरातींचा खर्चही काही प्रकाशक करतात, सगळे नाही.
< एकूण किती प्रती निघतात आणि त्या खपायला किती वर्षं लागतात? >
प्रती साधारणपणे ११०० एका आवृत्तीत छापल्या जातात. लोकप्रिय व प्रस्थापित लेखक असेल तर ५००० ची आवृत्ती निघते. प्रकाशनपूर्व नोंदणी आखली तर याचा अंदाज प्रकाशकांना येतो. माझी पहिली कादंबरी आली, तेव्हा तिच्याचसोबत अजून ३ कादंबर्या याच प्रकाशकांनी छापल्या होत्या. पैकी २ कादंबर्यांची नावंही स्मरणात नाहीत, तिसरी 'बाकी शून्य'. या कादंबरीची पहिली आवृत्ती आक्रमक मार्केटिंगच्या तंत्राने बर्यापैकी खपली, पण दुसरी आवृत्ती बर्याच काळाने आली व तीही लोकावृत्ती म्हणून आली, पण ती अद्याप संपलेली नाही. न आठवणार्या नावांच्या त्या दोन कादंबर्या वाचनालयांमध्ये काही प्रती गेल्या असतील तितक्याच, बाकी बोजा प्रकाशकांवर आहे. त्यामुळे मजकूर चांगला आहे की नाही, मार्केटिंगचं तंत्र याला ओलांडून जाऊनही वाचक कशाला डोक्यावर घेईल याचा अंदाज अनुभवी प्रकाशकांनाही ललित पुस्तकांच्या बाबत येत नाही; त्यामुळे त्यांची जोखीम वाढते. बेडरिडन पुस्तकाच्या तोटा धावणार्या पुस्तकाच्या फायद्यातून अॅडजेस्ट करावा लागतो. म्हणून 'मजेत कसे जगावे' पद्धतीची पुस्तकं मोठे प्रकाशकही अनेकदा प्रकाशित करताना दिसतात.
खपाबाबत काहीच नक्की सांगता येत नाही. ब्र च्या १२ आवृत्त्या झाल्याहेत, त्यातील काही ११०० प्रतींहून मोठ्या होत्या. साधारणपणे लोकप्रिय ठरलेल्या पुस्तकांच्या पहिल्या वर्षात ५ ते ७ आवृत्त्या ( योग्य शब्द पुनर्मुद्रण ) निघतात; पुढे वर्षाला २. अपवाद ऐतिहासिक कादंबर्यांचा. त्या अर्थातच अधिक खपतात.
काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित
थॅँक यू
तपशीलवार उत्तराबद्दल आभार! एकूण पाहता, लेखकाला ज्याने उभारी यावी असं या हिशेबात फारसं काही दिसत नाही.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
इलेक्ट्रॉनिक वितरण?
या सगळ्यामध्ये 'लेखकाला पैसे कमी मिळणं' हे मुळातलं जे दुखणं आहे, ते कादंबरीचं इलेक्ट्रॉनिक वितरण करून काही प्रमाणात कमी करता येणार नाही का?
उदाहरणार्थ, 'अमेझॉन' ही पुस्तकं विकणारी (अमेरिकन) कंपनी कशी चालते ते थोडक्यात लिहितो. अमेझॉनमध्ये माझं अकाउंट आहे, म्हणजे माझा क्रेडिट कार्ड नंबर त्यांना माहित आहे. माझ्याकडे 'किंडल' नावाचा इलेक्ट्रॉनिक बुकरीडर आहे. समजा मला एखादी कादंबरी विकत घ्यावीशी वाटली, तर अॉनलाइन अॉर्डर केल्यानंतर सुमारे पंधरा सेकंदात वायरलेसने ती माझ्या किंडलवर येऊन पोहोचते, आणि ताबडतोब वाचायला सुरुवात करता येते. (अर्थात अमेझॉन कंपनी ही कागदी पुस्तकं आणि इतरही बरंच काही विकते, पण इथे त्याचा संबंध नाही.)
असं काहीसं मराठी कादंबरीच्या बाबतीत का करता येणार नाही? समजा 'मुठा' नावाची कंपनी परदेशस्थ मराठी माणसांना 'पाच डॉलरला एक पुस्तक' या भावाने इलेक्ट्रॉनिक फाइल्स विकू लागली तर निदान मी तरी आनंदाने घ्यायला तयार आहे. (अशा फाइलमध्ये आर्टवर्क वगैरे कदाचित नसेल आणि मुखपृष्ठही नसेल, पण त्याबद्दल माझी काही तक्रार असणार नाही). मुठा चालवणाऱ्याने समजा पाचपैकी खच्चून दोन डॉलर्स खाल्ले तरी लेखकाला तीन डॉलर्स (म्हणजे पावणेदोनशे रुपये) मिळतील. कागदी प्रतीमागे जितके मिळतात त्यापेक्षा हे खूपच जास्त झाले. निदान इंग्लंड-अमेरिकेत तरी बुकरीडर्स, आयपॅडस् वगैरे मुबलक आहेत (आणि मराठी माणसंही मुबलक आहेत), तेव्हा अशा मार्गाने बऱ्यापैकी मिळकत होऊ शकेल असं वाटतं.
काही संभाव्य शंकाचं थोडक्यात निरसन करतो:
१. वायरलेस वगैरे उपलब्ध नसेल, तर 'मुठा'च्या वेबसाइटवरून पुस्तक डाउनलोड करायची सोय करता येईल. त्याने तादृश फरक पडत नाही.
२. फाईल फॉर्मॅट कुठला असावा (पीडीफ की मोबी की आणखी काही) वगैरे तांत्रिक कटकटी यात येतील, पण त्या सोडवणं अवघड वाटत नाही.
३. पुस्तक जर पाच डॉलर किंवा तत्सम किंमतीला असेल, तर ते घेण्याआधी (निदान माझ्या अंदाजाप्रमाणे) वाचक अति चोखंदळपणा करणार नाहीत. समजा महिन्यात पाच पुस्तकं घेतली आणि त्यातली दोन वाईट निघाली तर जिवाला लावून घेण्यासारखं त्यात फारसं काही नाही. अर्थात वाढलेल्या खपाचा लेखक मंडळींना फायदाच होईल.
४. हे मार्केटिंग भारतात उपलब्ध नसावं असं मला मुळीच म्हणायचं नाही, पण किंमत किती ठेवावी लागेल वगैरेचा मला अंदाज नाही. आणि भारतात बुकरीडर्स वगैरे फारसे प्रचलित नाहीत ही एक अडचण आहेच.
५. इलेक्ट्रॉनिक फाईल एकदा विकल्यानंतर वाचकाने ती परस्पर दुसऱ्याला देऊ नये, यासाठी काहीतरी लॉकिंगची व्यवस्था लागेल. असं तंत्रज्ञान माझ्या समजुतीप्रमाणे उपलब्ध आहे (कमर्शियल सॉफ्टवेअरमध्ये ते वापरलं जातं), पण ते किती चांगलं चालतं यातल्या खाचाखोचा मला माहित नाहीत.
(हे सगळं खूपच अवांतर झालं आहे, तेव्हा संचालकांना धागा वेगळा काढायचा असल्यास माझी हरकत नाही.)
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
मराठी पुस्तकांच्या इ-आवृत्त्या
'बुक गंगा'नं काही पुस्तकांच्या इ-आवृत्त्या उपलब्ध केल्या आहेत. मराठीत प्रकाशक ही संस्था फार प्रबळ आहे. त्यामुळे कोणत्या प्रकाशनाची नक्की किती पुस्तकं अशी उपलब्ध केली गेली आहेत ते माहीत नाही, पण फारशी नसावीत असा अंदाज आहे. खप किती आहे तेदेखील सांगता येत नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
आत्मस्तुतीचा जबराट फंडा
'बाकी शुन्य'सोबत छापल्या गेलेल्या इतर २ कादंबर्यांची नावेही तुम्हाला आता आठवत नाहीत, असे तुम्ही येथे एका प्रतिक्रियेत लिहिलेत. छान. आपल्या दोन पुस्तकांची नावेही न आठवणार्या 'लेखकताई'च्या ('लेखकराव'चे स्त्रिलिंगी रूप 'लेखकताई'च होइल ना?) लेखननिष्ठेबद्दल काय बोलावे? गंमत म्हण्जे "पोरं नाही होऊ दिली तिच्या सारखी पण कादंबर्या होतातच आहेत", असेही तुम्ही लिहिता! आपल्या कादंबर्यांची तुलना मुलांशी करताय तुम्ही आणि त्याचवेळी आपल्या दोन कादंबर्यांची नावे आठवत नाहीत तुम्हाला. कोणी माता आपल्या मुलांची नावे विसरणे शक्य आहे का? किती फेकम फाक कराल हो.
आपण कसे लेखनाचे अॅडिक्ट आहोत, असे दाखवून लेखक म्हणून स्वत:चे माहात्म्य वाढवून घेण्याचा हा प्रकार आहे. असे नसते तर, भिकारचोट, येडझवा असे शब्द वापरून उगाच सेन्सेशन निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही केला नसता. आत्मस्तुतीचा जबराट फंडा असे या लेखाचे वर्णन करता येईल. असे फंडे वापरून आपल्या हयातीत साहित्य सम्राट म्हणून मिरविणारे अनेक जण मराठीत होऊन गेले. त्यांच्या पुस्तकांची तर सोडाच खुद्द त्या लेखकरावांची नावेही आता मराठी वाचकांना आठवत नाहीत.
असो. तुमचे कौतुक एवढ्यासाठी की, तुम्हाला हे सगळे फंडे जमतात.
:-).
< त्याचवेळी आपल्या दोन कादंबर्यांची नावे आठवत नाहीत तुम्हाला > या माझ्या नव्हे, इतर कुणाच्या तरी दोन कादंबर्या होत्या. माझ्या सर्व मुलांची नावं मला आठवतात.
बाकी चालू द्या.
काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित
या माझ्या नव्हे, इतर कुणाच्या
अच्छा म्हन्जे, आपला तो बाब्या दुसर्याचे ते कार्टे असा प्रकार आहे म्हणजे.
शेजार्यांच्या मुलांची उणीदुणी काढून स्वत:च्या मुलांचे महत्त्व वाढविण्याचा का प्रयत्न करताय तुम्ही.
त्या लेखकांनाही तुमच्या पुस्तकाचे नाव आठवत नसेल कदाचित. त्याने काय होते.
कितीवेळा तोच खोडसाळ प्रतिसाद
कितीवेळ तोच खोडसाळ प्रतिसाद संपादित करताय
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
कितीवेळ तोच खोडसाळ प्रतिसाद
अहो, आम्ही काही प्रतिभवंत लेखकराव नाही आहोत. जसे सुचते तसे लिहितो. आणि यात खोड्साळपणा काय आहे? लेखक मंडळींना काही प्रश्न विचारूच नये की काय?
काही नाही होत
< त्या लेखकांनाही तुमच्या पुस्तकाचे नाव आठवत नसेल कदाचित. > नसेलही कदाचित.
< त्याने काय होते > काही नाही होत. मुळात पुस्तकं लोकसंख्येच्या मानाने इतकी कमी खपतात आणि इतकी कमी वाचली जातात की लेखकांची वा पुस्तकांची नावं हजारो लोकांना माहीत नसतात. त्या हजारो लोकांमध्ये लेखकही आले.
मी जिकडं कामं करते तिथं आणि मी राहते तिथंही मी लिहिते किंवा काय लिहिते किंवा माझ्या पुस्तकांची नावं कुणाला नाही माहीत. अगदी माझ्या शेजार्यांनाही नाही माहीत. त्यानं काही होत नाही.
काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित
"ऐसी" एकरंगी असायला हवी आहे का?
अहो, मला जे वाटते ते किमान मांडू तर द्या. आपल्या मताशी कोणी असहमत असेल, तर लगेच त्याला खोडसाळ वगैरे संबोधने योग्य नाही. प्रतिक्रियेला खोडसाळ श्रेणी देऊन झाकून टाकणे तर पूर्णत: चुकीचे आहे. विरोधी मतांचाही आदर झाला पाहिजे. आपण एकमेकांना चांगले म्हणण्यासाठी येथे जमलो आहोत का? असे असेल, तर मग बोलायलाच नको. कविता ताई छान लिहितात, सर्वांच्या प्रतिक्रियाही कशा गोग्गोड आहेत, असे मी जाहीर करून टाकू का?
"ऐसी अक्षरे" एकरंगी असायला हवी आहे, असे कोणाचे मत आहे काय?
सहमत
अगदी सहमत. अन्यथा, 'बाकी शून्य' ही बहुखपाऊ कादंबरी कविता महाजनांची आहे वगैरे आपलं सामान्यज्ञान आमच्यासारख्या सर्वसामान्यांना कसं बरं दिसलं असतं? त्यामुळे आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
'बाकी शून्य' ही बहुखपाऊ
या लेखाच्या लेखकताई श्रीमती कविता महाजन यांचा पुस्तकांसोबतचा संबंध आणि सहवास माझ्यापेक्षा जास्त असणार की नाही? आता त्यांना स्वत:लाच त्यांच्या पुस्तकासोबत प्रसिद्ध झालेल्या दोन पुस्तकांची नावे आठवत नाहीत. मग 'बाकी शुन्य' कोणाचे हे मला माहिती नसले किंवा आठवले नाही; तर त्यात एवढे काय? अशा पुस्तकांना सामान्यज्ञानाचा विषय ठरविणे, हे फार म्हणजे फारच झाले.
मराठीत बहुखपाऊ म्हणजे काय, याचे गणित मी ऐशीवरच अन्यत्र मांडले आहे. ते जिज्ञासूंनी अवश्य पाहावे.
छान स्फुट!
कविताताई, तुमची ब्र कादंबरी मी वाचलीय, छान वाटली, तिचे परिक्षण वगैरे करण्याइतका वा अजून काही समीक्षास्पद करण्याइतका मी मोठा नाही आणि माझी तेवढी कुवतही नाही. पण चांगली वाटली, एक पर्स्पेक्टिव्ह देणारी वाटली, अशाप्रकारचे जग अस्तित्त्वात आहे याची थोडी धक्कादायक जाण दिली त्याने. पण एक प्रश्न विचारावासा वाटतो- हे लेखन एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याच्या अनुभवातून आलेले वाटले, तशा पिंडाने केलेले ते लेखन आहे असं वारंवार वाटत राहिले कादंबरी वाचताना. तसं खरंच आहे का- म्हणजे ते तुमच्या लेखनातून आलेले आहे की तो तुमच्या संपन्न कल्पनाशक्तीचा तो आविष्कार आहे?
उत्तर
< ते तुमच्या लेखनातून आलेले आहे की तो तुमच्या संपन्न कल्पनाशक्तीचा तो आविष्कार आहे? > काही माझे अनुभव आहेत, काही समकालिन कार्यकर्त्यांचे. महिला सरपंचाबाबत अभ्यासही केला थोडा शेवटच्या टप्प्यावर. 'ब्र' मध्ये काहीही काल्पनिक नाहीये. अनेक लेखक सांगतात की आपले लेखन हे कल्पना व वास्तवाचा मेळ आहे, मी सांगते की, माझे लेखन हे वास्तव व वास्तवाचा मेळ आहे. ब्र मधल्या प्रफुल्लाची कहाणी ही माझी गोष्ट नाहीये. कल्पना + वास्तव नव्हे, तर ते वास्तव + वास्तव आहे. यातली एकही घटना काल्पनिक नाहीये, ती कुणा ना कुणाच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेली आहे. तो माझ्या संपन्न कल्पनाशक्तीचा आविष्कार नाही.
संपन्न असेल ( म्हणजे क्रेडिट द्यायचेच असेल ), तर ती आहे माझी स्मरणशक्ती. सगळं तपशीलात आठवतं. ( अवांतर : ते लेखनासाठी पूरक असतं, व्यक्तिगत आयुष्यात जीवावरचं दुखणं बनतं. )
बाकी : तुमचा समीक्षास्पद हा शब्द अतोनात आवडला.
काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित
मनस्वी लेखन. आवडले.
मनस्वी लेखन. आवडले.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.