मॅकियाव्हेलीचा ‘राजकुमार’: नमो !
सध्या संपूर्ण देश एकाच व्यक्तिमत्वाने भारावून गेला आहे. या रुबाबदार व्यक्तीच्या प्रेमात पडावे अशीच सारी अवस्था आहे. मल्लिका शेरावत असो वा मिस एशिया, यांना हा मोह आवरता आला नाही तिथे सामान्यांची काय अवस्था ! लतादीदींच्या या भैय्याने समस्त देशाचे रक्षण करण्याचा मनोदय जाहीर केल्यापासून भैय्या पतंप्रधान व्हावेत, ही लतादींचीच काय, सबंध हिंदुराष्ट्राचीच इच्छा आहे. कदाचित मोहनलाल गांधी ( काही इतिहासाचा अभ्यास करणारे लोक मोहनदास असेही म्हणतील, पण तुकारामांनी म्हटलेलंच आहे, “ नावात काय आहे ?” त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा ) यांच्यानंतर इतकी लोकप्रियता असणारा दुसरा नेता नाही. नमोंच्या या देखण्या रुपड्याने सारा देश उजळून गेला आहे. नमो देखणे आहेत. सौंदर्याचा आणि बुध्दीचा सहसंबंध तसा कमीच. अपवादांविषयी नितांत आदर. स्टॅटिस्टिक्स मध्ये कोरिलेशन कोइफिशियन्ट (सहसंबंध गुणांक) नावाची एक संकल्पना आहे. दोन घटकांचा सहसंबंध याच्याव्दारे निर्धारित केला जातो. त्यानुसार मोदींच्या देखणेपणाचा आणि बुध्दीचा सहसंबंध लावण्याचा कोणी प्रयत्न करु नये. त्यांचे अल्पवाचन असल्याचे कौतुक करु नये. इतिहास किंवा भूगोल या गोष्टी त्यांनी वाचलेल्या नसल्या तरी त्यांचा स्वतःचा असा एक इतिहास आहे, भूगोल आहे. बाकी त्यांनी काहीही वाचले नसेल ;पण मॅकियाव्हॅलीचे प्रिन्स मात्र त्यांनी वाचले आहे.(आतल्या गोटातून) मोदींचे रुपडे देखणे आहेच ;पण आमच्या मते तर ते राजकुमार आहेत, तेही आधुनिक राजकीय विचाराचा जनक, राजकीय वास्तववादाची ज्याने पायाभूत मांडणी केली त्या मॅकियाव्हॅलीचे.
मॅकियाव्हेली हा फ्लोरेन्समधला राजकीय विचारवंत. फ्लोरेन्स येते इटलीत. इटलीचा संबंध तसा सोनिया गांधींशी; पण सोनिया गांधींनी नाकारलेल्या पदाची महत्वाकांक्षा बाळगणा-या नमोंचा आणि इटलीचा संबंध तसा अनेक अर्थांनी आहे. बेनितो मुसोलिनी असो वा प्रिन्सचा राजकुमार, नमोंचे त्यांच्याशी एक जैव नाते आहे. मुसोलिनीनंतर मॅकियाव्हेलीचा राजकुमार पुन्हा जन्माला आला आहे ,तोही भारतात. प्रिन्समध्ये मॅकियाव्हेलीने पंधराव्या शतकात मांडले ते आज एकविसाव्या शतकात खरे होत आहे. मॅकियाव्हॅलीला हवा असणारा राजकुमार नमोंच्या रुपाने आज आपणाला पहायला मिळत आहे. हा राजकुमार समजून घेण्यासाठी मॅकियाव्हॅली नेमके काय म्हणतो, ते समजून घेतले पाहिजे.
मॅकियाव्हेली म्हणतो, मनुष्य स्वभाव हा अत्यंत दुष्ट (wicked) आणि स्वार्थी आहे. (कधी कधी स्वतःवरुनही माणसाला जग समजू शकते,त्याचा हा पुरावा. नमोंनाही हे स्वतःवरुनच समजले आहे.) त्याच्या मते, हा स्वार्थ साधण्यासाठी मनुष्य काहीही करु शकतो. माणसाच्या मनात भीती ही भावना प्रेमापेक्षाही बलवत्तर असते, त्यामुळे प्रिन्सने प्रेमळ असण्याऐवजी त्याची दहशत असली पाहिजे. लोक प्रिन्सला घाबरले पाहिजेत. नमोंमुळे लोकच नव्हे तर कॉन्ग्रेस सरकारदेखील घाबरलेले आहे. नमोंच्या गोध्रातल्या विकासाने छावणीतले मुस्लिम परत आलेले नाहीत. नमोंच्या पंतप्रधान होण्याच्या कल्पनेने यू आर अनंतमूर्ती देश सोडून चालले आहेत,त्यामुळे एकूणात काय तर नमोंची दहशत आहे. मॅकियाव्हॅलीच्या मते, राज्य हेच आपले सर्वस्व आहे, ते स्वयंमेव आहे. राज्यासाठी काहीही केले तरी ते समर्थनीय ठरते. गुजरातसाठी नमोंनी काय काय केले हे आता सांगावे अशी स्थिती नाही. अगदी उत्तराखंडच्या आपत्तीच्या वेळी भारतीयांमधून पंधरा हजार गुजराथींना निवडून-हुडकून त्यांनी त्यांचे जीव वाचवले. राज्यासाठी यापेक्षा आदर्श राजकुमार असू शकतो काय ? असू शकेल काय ? मॅकियाव्हेली म्हणतो, राज्यसंस्थेने नैतिकतेचा बाऊ करु नये.राज्यसंस्थेने नैतिकतेचा विचार करु नये. (State has no ethics !)प्रसंगी राजकुमाराने खोटेपणा,अनैतिक साधने यांचा वापर राज्यासाठी करायला हवा. राज्य टिकणे महत्वाचे. ते वाढवणे गरजेचे. काही दिवसांपूर्वी नमो म्हणाले की, तक्षशिला भारतात बिहारमध्ये आहे. विषयाचे समग्र आकलन नसलेल्या अनेकांना हे विधान आक्षेपार्ह वाटले. यात खरंतर आक्षेपार्ह काहीच नाही. उलट स्वातंत्र्यवीरांनी म्हटलेले नमोंच्या स्मरणात आहे-
“आसिंधू सिंधू पर्यन्ता यस्य भारत भूमिका । पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिती स्मृतः”
आता आक्षेप घेणारे लोक त्या भूभागाला पाकिस्तान वगैरे म्हणत असतीलही;पण मुळात ते हिंदुंचे साम्राज्य आहे. त्यांच्या अधिपत्याखालील हा प्रदेश होता आणि आहे.अखंड राष्ट्राचे नमो हे पुरस्कर्ते आहेत. समजा हा प्रदेश आपला म्हणजे हिंदुंचा नसेल,तरी आपल्या अधिपत्याखाली आणणे हे मॅकियाव्हेलीच्या ‘राज्याचा विस्तार या कल्पनेला धरुन आहे.( असा विस्तार करायला त्या युनोसारख्या फडतूस संघटना प्रतिबंध घालतात; पण असल्यांना भीक घालेल तो मॅकियाव्हेलीचा राजकुमार नव्हे ! मॅकियाव्हेलीचा राजकुमार शूर आहे! ) समजा इतके स्पष्टीकरण देऊनही आक्षेप घेणा-यांना तक्षशिला भारतात आहे, हे समजत नसेल तर आपण असे मानू की, नमो खोटं बोलले. तर मग त्या खोटं बोलल्याचा एवढा काय इश्श्यू करायचा ! मॅकियाव्हेली तर म्हणतोच ना राजकुमाराने खोटं बोलण्याचा वापर करुन सत्ताप्राप्ती केली पाहिजे आणि तसंही प्रेमात आणि युध्दात सारं काही माफ असतं. आपण मोदींच्या प्रेमात आहोत आणि बीजेपी आणि कॉन्ग्रेसचे युध्द सुरु आहे त्यामुळे तसंही नमोंना आपण माफ केलं पाहिजे.
एवढं सांगूनही नमोंवर आक्षेप घेणारे म्हणणार- चंद्रगुप्त मौर्य हा गुप्त घराण्याचा पहिला राजा. त्याचे काय ? खरंतर नमो अशा ‘गुप्त’गोष्टी कधी सांगत नाहीत.ही तर त्यांनी कोणालाच माहीत नसलेली गुप्त बातमी सांगितली, तर त्यांचे आभार मानायचे सोडून हे लोक किती गहजब माजवणार ? याला काही अर्थ नाही. गुप्त असो किंवा मौर्य, नमोंना मुळात ‘घराणे’ ही कन्सेप्टच मान्य नाही,(त्यांना ‘परिवार’ माहीत आहे) म्हणून तर ते घराणेशाहीला विरोध करतात. उलट या सा-या पलिकडे जाऊन सर्वांच्या आणि वेगवेगळ्या काळाच्या इतिहासाचे एकीकरण ही क्रांतिकारक गोष्ट त्यांनी केली तर त्याचे कौतुक करायचे सोडून हे लोक त्यांच्यावर टीका करत आहेत ! हा कसला प्रकार आहे !
…तर मॅकियाव्हेली म्हणतो की मनुष्य स्वभावात मानवी आणि पाशवी असे गुण असतात. राजकुमाराने मात्र या सा-यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोल्हा आणि सिंह यांचे गुण आत्मसात करण्याची गरज आहे. सिंहाला सापळ्यापासून बचाव करता येत नाही, तर कोल्ह्याला लांडग्यापासून बचाव करता येत नाही सबब राजकुमारामध्ये सिंह आणि कोल्हा यांच्या गुणांचे मिश्रण असले पाहिजे जेणेकरुन सिंहाच्या गुणांमुळे लांडग्यापासून बचाव होईल आणि कोल्ह्याच्या गुणांमुळे सापळा ओळखता येईल. राजकुमाराने कोल्ह्यासारखे दांभिक असायला हवे. आता नमो यात किती परफेक्ट बसतात हे काही सांप्रतकालीन भारतीय जनमानसाला सांगावे, अशी स्थिती नाही.सापळ्यांविषयीची त्यांची शोहरत तर सारे जहां में है ! दांभिकतेविषयी तर बोलू नये मनात सद्भावना ठेवावी; पण मुळात दांभिकतेला वाईट का मानावे ? पशूंचे गुण नमोंमध्ये असणे तर क्रमप्राप्त आहे कारण मागेच नमोंनी कुत्र्याचे पिलूविषयी प्रेम व्यक्त केले. हे प्रेम तर फक्त हिमनगाच्या टोकाएवढे आहे. या प्रेमातूनच त्यांच्यात पशूंचे- कोल्ह्याचे, सिंहाचे गुण आलेले आहेत. स्त्रियांचे शीलभ्रष्ट होऊ नये याची काळजी घ्यावी असे मॅकियाव्हेली सांगतो तसेच अगदी शेजा-यावर देखील पाळत ठेवली पाहिजे. नमो सध्या कोणा-कोणावर पाळत ठेवत आहेत यावर कोब्रापोस्टने माहिती काढलेली आहे; पण यात देखील आक्षेप घ्यावा असे काहीच नाही कारण राजकुमाराचे हे कर्तव्यच आहे. नमो अगदी ‘इमाने इतबारे’ कर्तव्यं पार पाडत आहेत ;पण ही कॉन्ग्रेसप्रेमी जनतेला ‘पटेल’ असे दिसत नाही. ती जनता भयभीत आहे; पण उद्याच्या सुवर्णयुगाची ही नमोंनी केलेली सुरुवात आहे. भविष्य उज्व्वल असणार आहे, यात शंका नाही कारण मॅकियाव्हेली रोमन रिपब्लिकचे कौतुक करत असे आणि प्रत्यक्षात एकाधिकारशाहीचे समर्थन करत असे. नमो देखील भारतीय गणराज्याचे कौतुक करत आहेत आणि नव्या फॅसिस्ट एकाधिकारशाहीची कारस्थाने रचत आहेत. पण यात देखील आक्षेपार्ह असे काही नाही,लोकशाहीचा अतिरेक होतोय. नमो नावाचा मॅकियाव्हॅलीप्रणित राजकुमार आपले भविष्य घडवणार आहे आणि लोकशाहीच्या या भयप्रद विळख्यातून सोडवणार आहे. त्याविषयी कोणाला चिंता असण्याचे कारण नाही.
-श्रीरंजन आवटे
(सदर लेख साप्ताहिक कलमनामा २८ मार्च २०१४ मध्ये प्रसिध्द)
प्रतिक्रिया
छान लिहिले आहे
छान लिहिले आहे
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
थॅन्क्स
थॅन्क्स अ लॉट
सहमत
मस्त लेख!
रॅण्ट डोळ्याखालून घातला. नंतर
रॅण्ट डोळ्याखालून घातला. नंतर सावकाशीनी नीट वाचीन असं वाटत नाही. पण नमो मुळे अनेकांच्या कपाळात आलेल्या दिस्तायत.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
पितृभूः पुण्यभूश्चैव...
"आसिन्धुसिन्धुपर्यन्ता यस्य भारतभूमिका । पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिती स्मृतः||"
'हिंदु' ह्या संकल्पनेचे सावरकृत वरील व्याख्या अतिशय चपखल आणि दूरदृष्टिदर्शक आहे असे मला नेहमीच वाटत आले आहे. ह्या व्याख्येनुसार हिंदु, जैन, शीख, बौद्ध हे 'आपले' धर्म, तसेच वनवासी आणि आदिवासी ह्या सर्वांना आत घेईल पण मुसलमान आणि ख्रिश्चन अशा 'त्यांच्या' धर्मांचे आचरण करणार्यांना बाहेर ठेवील अशी ही अल्पाक्षरी, गोळीबंद आणि लक्षात ठेवायला सोपी व्याख्या आहे.
हिंदु, जैन, शीख, बौद्ध हे 'आपले' धर्म पाळणारे आहेत आणि येथेच जन्मलेले आहेत, त्यांची पवित्र स्थाने येथेच आहेत, त्यामुळे ते 'पितृभूः पुण्यभूश्चैव' मध्ये अलगद बसतात. तसेच दलित, वनवासी आणि आदिवासी हेहि येथेच जन्मलेले आणि हिंदु देवतांचीच, सभ्य समाजाला मान्य नसणार्या का होईना, स्वरूपात पूजा करतात त्यामुळे तेहि तसेच 'पितृभूः पुण्यभूश्चैव' मध्ये अलगद बसतात. आर्यबन्धु पारसिकांनाहि 'आत' घेता येते कारण ते येथे जन्मलेले आहेतच, शिवाय त्यांच्या इराणातील पुण्यस्थानांची तेथील अयातोल्ला-मुल्ला-मौलवीनी केव्हाच वाट लावली आहे त्यामुळे तेहि 'बाहेर' बघत नाहीत
मुसलमान आणि ख्रिश्चन ह्यांची पवित्र स्थळे मध्यपूर्वेत आहेत. मुसलमानांचा नमाज मक्केकडे तोंड करूनच पढला जातो. येशूच जन्म त्याच भागातला. त्यामुळे समजा ते येथे जन्मल्यामुळे 'पितृभू' भागात पडले तरी त्यांची 'पुण्यभू' येथे नसल्यामुळे त्यांच्या येथे राहण्यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो. पुढेमागे हिटलरला मिळाली होती तशी Ethnic cleansing करण्याची संधि मिळालीच तर त्यासाठी चपखल व्याख्या तयार आहे!
+
>>Ethnic cleansing करण्याची संधि मिळालीच
७ डिसेंबर १९९२ रोजी अशी वक्तव्ये एरवी सोबर वाटणार्या कलीग्जकडून ऐकली आहेत.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
तिरकसपणा आवडला.
लेखातला तिरकसपणा आवडला. (न आवडून सांगणार कोणाला! )
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लेख वाचून कुमार केतकरांची
लेख वाचून कुमार केतकरांची आठवण झाली. तिकडे उचकी लागली असणार केतकरांना.
कुणाचे तरी नाक कुठेतरी रगडले
कुणाचे तरी नाक कुठेतरी रगडले गेल्याबद्दल तुम्हीच कुठेतरी बोलला होतात का?
की म्हातारपणामुळे स्मृतीभ्रष्ट झालिये माझी?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
हो. बोललो असेन. आठवत नाही.
हो. बोललो असेन. आठवत नाही. माझीही स्मृती भ्रष्ट झाली आहे.
जो जाकर न आये वो जवानी देखी
जो आकर न जाये वो बुढापा देखा
अनाकलनीय
मी तीव्रपणे मोदी/भाजप यांच्या विरुद्ध आहे मात्र मला मोदीविरोधकांच्या संतापाची तीव्रता समजू शकत नाही. वरच्या लेखातील लक्षणे लागू न पडणारे लोक अपवादानेच राजकारणात सापडतात. असे असूनही भारतीय लोकशाही मात्र व्यवस्थित काम करते आहे.
__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद
एकुणच लेखक मोदींच्या
एकुणच लेखक मोदींच्या कर्तृत्त्वापेक्षा त्यांच्या कायिक सौंदर्यावरच अधिक भाळला आहे असे पहिल्या परिच्छेदावरून वाटले. पुढे फारसे वाचले नाही.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
:)
ढिंग टांग वाचल्यासारखं वाटलं.
फक्त भाषेचा बाज बराच शहरी व उच्चभ्र्रू आहे इतकेच.
वरती अनुप ढेरे म्हणतात तेही पटले.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
तिरकसपणा आवडला.
तिरकसपणा आवडला.
लकी नेते
टिळकांच्या आणि गांधीजींच्या काळी माध्यमे इतकी विस्तारली नव्हती. जी काही अल्प माहीती होती तितून लोकांनी त्यांना नेते मानले. मग त्यांच्यापुढे तेव्हा लागलेल्या गर्दीमुळे आज आपण त्यांना त्याकाळचे महान नेते मानू लागलो*. नंतर माध्यमे इतकी फोफावली कि प्रत्येक नेत्याची प्रत्येक माहीती लोकांना माहित होऊ लागली. त्यामुळे नेहरू, इंदीरा, वाजपेयी सारखे मधल्या पट्टीचे प्रसिद्ध नेते झाले. नंतर माध्यमे प्रचंडच जास्त माहीती देऊ लागली आणि कोणास सर्वमान्य तर सोडाच, प्रांतिक नेताही बनता येईना. आता कोणाला मोठा नेता बनायचे असेल तर जवळजवळ आदर्शच असायला पाहिजे. अशी आशा मावळलीच होती. पण तितक्यात मोदी उगवले. आज मोदींनी (केवळ) प्रसिद्धीच्या बाबतीत इतिहासातल्या सार्याच नेत्यांना मागे टाकले आहे. हीच मोठी नवलाची गोष्ट आहे. ते जिंकोत वा न जिंकोत, पण जितक्या कठिण परिस्थितीत (जिथे लोक बापाचे ऐकत नाहीत असे म्हणायचे आहे. टिळकांच्या काळातले लोक गाढव होते म्हणता येईल. ते नुसते माना डोलवायचे.) ते जितके मोठे नेते झाले आहेत ते वाखाणण्याजोगे आहे.
सगळ्यात हाइट म्हणजे 'अन्यथा भाजपच्या नसलेल्या' महाशिक्षित लोकांचा त्यांना असलेला पाठिंबा. मोदींना महिलादिनी सगळीकडे आणि ओमर अब्दुल्लांना इंग्लिश बातमी वाहिनीवर मुलाखत देताना पाहिले तर contrast क्लिअर होतो. मोदींना जेव्हा अतिशिक्षित महिला शुद्ध इंग्रजीत प्रश्न विचारत होत्या, तेव्हा मोदी अवघडून जसा आपला कान करत होते, आणि त्यांना प्रश्न कळतच नसे, आणि ते दुसरेच काहीतरी बोलत, हा सगळा प्रकार अगदी हसू आणणारा होता. म्हणजे त्याकाळात टिळक, गांधीजी प्रचंड शिकलेले होते आणि या काळात मोदी, खूपच समर्पक शब्दांत सांगायचं झालं तर क्लम्जी(वा ऐसीवर मी जसे लिहितो तसे) आहेत. या आय आय एम वाल्यांची मोदी 'स्मार्ट', 'वेल स्पोकन' असण्याची अपेक्षा का नाही हे कळतच नाही.
पण राहून राहून एक वाटतं, साला टिळक, गांधी लकी होते, यासाठी कि तेव्हा श्रीरंजन आवटे भरपूर होते (असावेत) नि इंटरनेटच नव्हते.
*टिळकांचं त्याकाळचं नेतेपण आज प्रश्निलं जात नसलं तरी, त्यांचं महानपण (being fair) बर्याच लोकांकडून आजकाल मान्य केलं जात नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
प्रिन्स
मॅकियाव्हेली इतका उत्तम अभ्यासलेल्या लेखकाने - "अगदी उत्तराखंडच्या आपत्तीच्या वेळी भारतीयांमधून पंधरा हजार गुजराथींना निवडून-हुडकून त्यांनी त्यांचे जीव वाचवले. "
हा टाइम्स च्या भोंगळपणाचा नमुना असलेला मुद्दा वापरावा हे अनपेक्षित आहे..
त्यावर टाइम्स ने नंतर आतल्या पानावर कोपर्यात माफी मागणे / दुरुस्ती करणे वगैरे - थेट माहिती नव्हती - आमच्या क्ष बातमीदाराने ऐकीव माहितीवर लिहिलं वगैरे.
अर्थात त्यावर मोदीभक्तांनी त्यांना रँबो करुन टाकलं आणि विरोधकांनी खलनायक.
सगळाच सावळागोंधळ --
असो..
अवांतर :
फक्त झेंडा दाखवायला राहुल गांधी दिल्लीत नव्हते म्हणून काही दिवस मदतीचे ट्रक वाट बघत राहिले आणि नंतर डेहराडून मध्ये गेल्यावर त्यांना पैसे द्यायला स्थानिक पदाधिकार्यांनी टाळाटाळ केली यापेक्षा गुजरात किंवा बिहार वगैरे राज्याच्या मुख्यमंत्र्यांची कार्यक्षमता बरी होती. ही पण टाइम्सचीच बातमी त्यामुळे विश्वासार्हतेची पूर्ण खात्री नाही