'शाळा' – एक नेटकं आणि देखणं माध्यमांतर
गाजलेल्या पुस्तकावर आधारित सिनेमा (आणि तोदेखील मराठी) असं म्हटलं की आधी धास्तीच वाटते. पात्रांना कुठल्यातरी ठिकाणी नेऊन पुस्तकातले संवाद म्हणायला लावले आणि अधूनमधून पुस्तकातलं निवेदन कोणत्यातरी दृश्यांच्या पार्श्वभूमीवर वाचून दाखवलं की पुस्तकावरचा सिनेमा झाला असं साधारणत: आपल्याकडे समजलं जातं. याला सुखद छेद देणारा अनुभव नुकताच आला. हा अनुभव म्हणजे मिलिंद बोकील यांच्या कादंबरीवर आधारित सुजय डहाके दिग्दर्शित ‘शाळा’ हा चित्रपट. कादंबरी/चित्रपट चांगला आहे की वाईट यापेक्षा एक माध्यमांतर म्हणून चित्रपट कितपत यशस्वी झाला आहे या अंगानं प्रस्तुत लेखात त्याचं किंचित विश्लेषण केलेलं आहे.
(कादंबरी सुपरिचित आहे असं मानून यात चित्रपटाचं कथासार वगैरे दिलेलं नाही.)
वाचलेल्या पुस्तकातल्या व्यक्तिरेखा चित्रपटात पाहताना अनेकदा भ्रमनिरास होतो; कारण कादंबरीतल्या त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांसह आपल्या मनात असलेल्या व्यक्तिरेखा आणि पडद्यावरच्या त्यांच्या आवृत्ती यांत मोठा फरक असतो. गुळगुळीत चेहेऱ्यांच्या नटलोकांच्या अवाजवी आकर्षणामुळे अनेकदा ही तडजोड केली जाते. इथे मात्र जोशी, सुऱ्या, शिरोडकर अशा मुलांच्या भूमिकांसाठी चेहऱ्यांची निवड अगदी चपखल वाटते.
उदा: बुजरा आणि हुशार कथानायक जोशी, दांडगट पण निर्मळ सुऱ्या आणि चित्रे, फावड्या वगैरे मित्रमंडळी:
जुना काळ उभा करणं मराठी सिनेमात चांगलं जमत नाही असा अनुभव बर्याचदा येतो, पण कादंबरीतलं १९७५-७६ सालचं छोटं टुमदार गाव इथे चांगलं उभं राहतं. चाळ, शाळा, छोट्या आळ्या, बैठी घरं, देऊळ, मुलींची टेहळणी करण्याची जागा, तळ्याचा परिसर, काठावरचे दगड अशा अनेक गोष्टींतून हे गाव जिवंत होतं. कपड्यांचे तपशील आणि ‘जो डर गया, समझो मर गया’ सारखे संवाददेखील काळ उभा करायला चांगली मदत करतात. उदा: अमिताभ बच्चन स्टाईलमधलं हे (बहुधा मांजरेकर सरांचं) पात्र पाहा:
(फोटो चित्रीकरणादरम्यानचा आहे. त्यामुळे १९७५ मध्ये मोबाईल कुठे होते असं विचारू नये.)
कादंबरीत असणारी मुला-शिक्षकांची शाळेतली आणि शाळेबाहेरची गंमत आणि कथानकाला असणारी आणीबाणीची पार्श्वभूमी या दोन्ही गोष्टी परिणामकारक पद्धतीनं चित्रित झाल्या आहेत. लहान मुलांनी वास्तवदर्शी अभिनय केला आहे. अवघड वयातला अवघडलेपणा, बुजरेपणा, निरागसता आणि अवखळ खोडकरपणा यांचं सुयोग्य मिश्रण त्यांच्या अभिनयात आहे. (छायालेखनकार परदेशी आहे; कदाचित त्यामुळेच की काय) एरवीचा मराठी सिनेमातला बटबटीत दृश्यपरिणाम टाळला गेला आहे आणि कथानकात असणारी अल्लड वयातल्या तलम प्रेमाची हुरहूर पडद्यावर उतरताना तशीच तलम पोताची राहिली आहे. सौम्य रंग, फार प्रखर न भासणारा सूर्यप्रकाश, हिरव्या-काळ्या रंगातली निसर्गरम्य स्थळं, शाळा-घरा-देवळांचे दगडी पोत, तळ्याकाठी पाण्याचा आणि दगडांचा काळेपणा अशा अनेक गोष्टी प्रसंगांची भावुकता वाढवतात. मुख्य पात्रं आणि त्यांच्या आजूबाजूला दिसणारी साधी, ओबडधोबड माणसं खरीखुरी वाटतात; मेकअप केलेली गुळगुळीत कचकड्याची नटमंडळी वाटत नाहीत.
काही गोष्टी मात्र फसल्या आहेत. त्यातली अगदी सुरुवातीपासून सातत्यानं जाणवणारी गोष्ट म्हणजे मराठी मालिकांतल्यासारखं सतत वाजणारं संगीत. हे बटबटीतपणे प्रत्येक प्रसंगातली भावुकता ठळक करणारं आहे. कादंबरीच्या तलम पोताला ते साजेसं नाही आणि ते सतत वाजत राहायची अजिबात गरज नाही. अनेकदा चांगले संवाद त्यात हरवून जातात. ‘मी तुझी मदत करेन’ अशासारखा एखादा काळविसंगत (आणि बहुधा कादंबरीत नसलेला) संवाद मधूनच डोकावतो. आणीबाणीच्या काळातल्या बंडखोर तरुणाला चे गव्हेरा आवडत असणार हे ठीकच आहे, पण त्याच्या हातातला चे गव्हेराचं चित्र असणारा चहा/कॉफीचा चकचकीत मग मात्र काळविसंगत वाटतो आणि म्हणून चाळीतल्या खोलीच्या वातावरणात खुपतो. पण बाकी अनेक तपशीलांवर इतकी मेहनत घेतलेली दिसते की (संगीत सोडता) हे किंचित दोष सहज दुर्लक्ष करण्याजोगे वाटतात.
कादंबरी पडद्यावर आणताना काही काटछाट जवळजवळ अपरिहार्य असते. निवेदनं आणि दीर्घ वर्णनांतून कादंबरीत अनेक गोष्टी हळूहळू फुलवत नेता येतात, पण चित्रपटाचा वेग संथ झाला तर कथानक रेंगाळतंय असं वाटू शकतं. शिवाय, परदेशातल्या महोत्सवांत दाखवता यावा म्हणून हा चित्रपट कमी लांबीचा केला आहे. या कसरतीत अविनाश देशपांडे यांची पटकथा बऱ्यापैकी यशस्वी झाली आहे असं म्हणता येईल. कादंबरीच्या दीर्घ प्रसंगांच्या सलगतेपेक्षा इथे छोटेछोटे तुटक प्रसंग रचून पात्रं उभी केली आहेत आणि कथानक झरझर पुढे नेलं आहे. अर्थात, कादंबरी वाचलेल्या काहींना त्यांची आवडती पात्रं/प्रसंग यांची काटछाट पाहून दु:ख होईल. कादंबरीतल्या निवेदनाला जवळपास नाहीसं करूनदेखील नायकाचं भावविश्व रेखाटण्यात चित्रपट यशस्वी होतो. सुजय डहाके या दिग्दर्शकाचा हा पहिलाच पूर्ण लांबीचा चित्रपट असल्यामुळे हे त्याचं मोठं यश आहे. या माध्यमांतरात त्यातल्या त्यात बळी जातो तो कादंबरीतल्या शाळाबाह्य वातावरणाचा आणि राजकीय पार्श्वभूमीचा. नायकाच्या चाळीत रात्री रंगणारे बुद्धिबळाचे डाव, नायकाचे आई-वडील, चाळीतले बंडखोर तरुण आणि इतर चाळकरी, अंबाबाईच्या प्रेमाचा धागा वगैरे कथानकाच्या ओघात अगदी पुसटसे येऊन जातात. या परिच्छेदाचा यापुढचा भाग गोष्टीचा शेवट उघड करतो. ज्यांना कादंबरी सुपरिचित नाही त्यांना शेवट माहीत व्हायला नको असेल तर परिच्छेदाच्या पुढच्या ओळी वाचू नयेत. त्यामुळे अखेर चाळीतल्या बंडखोर तरुणांना अटक होते तेव्हा तो प्रसंग पुरेसा परिणाम करत नाही. त्यामुळे मग नायकाचं भावविश्व हे प्रामुख्यानं शिरोडकरच्या गाव सोडून जाण्यानंच उद्ध्वस्त झालं आहे असं वाटतं. चाळीतल्या त्या वातावरणाचा नायकाच्या जडणघडणीवर मोठा प्रभाव होता; आणि त्याच्या आयुष्यातला हा एक महत्त्वाचा भागसुद्धा आता कदाचित कायमचा हरवून गेला आहे हे प्रेमभंगाच्या दु:खापुढे फारसं जाणवत नाही. कादंबरीत या दोन्ही गोष्टी सतत एकत्र विणलेल्या आहेत; त्यामुळे अखेर अधिक गडद परिणाम होतो असं स्मरतं.
असो. नव्या मराठी चित्रपटांत आपल्या नेटक्या बांधणीनं उठून दिसणारा आणि एका सुघड आणि तलम कादंबरीच्या अंगभूत गोडव्याला दृश्यभाषेत चांगला न्याय देणारा हा चित्रपट पाहावा अशी शिफारस करेन. चित्रपटाचे दोन ट्रेलर इथे पाहता येतील:
प्रतिक्रिया
अरे वा.. आला का हा चित्रपट..
अरे वा.. आला का हा चित्रपट.. तातडीने जाऊन पाहतो.. फारफार वाट पाहिली..
उत्सुकता..
परीक्षण आवडले,
चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहेच,
स्वाती
गेल्या उन्हाळ्यात हा चित्रपट
गेल्या उन्हाळ्यात हा चित्रपट बघायला मिळणार असं बरोबर एक वर्षांपूर्वी ट्रेलरमधून बघत होते. पण परदेशी चित्रपट महोत्सवांत जाऊन पहाण्याची पत नसल्यामुळे आता बहुदा छोट्या पडद्यावर पाहूनच समाधान मानावं लागणार ... आणि ते ही कधी मिळणार माहित नाही.
'शाळा' कादंबरीबद्दल असणारं हे ब्लॉगपोस्ट आधी वाचनात आलं नव्हतं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आला का? क्धी? कुठे?
मुळातच एका अप्रतिम पुस्तकावर चित्रपट येतोय ऐकलं की एक धाकधुक जाणवू लागते. एक वाचक म्हणून कादंबरी वाचताना ती पात्रे डोळ्यासमोर उभी असतात. प्रत्येक वाचकाचे अनुभवविश्व, परिसर, आठवणी आदींच्या संस्काराने जो तो आपापल्या वकूबानुसार एक काल्पनिक विश्व डोळ्यापुढे आणतो मात्र एकदा का त्याला दृक््-श्राव्य माध्यमात आणायचं म्हटलं की मुळ संहितेबरोबर मुळ कादंबरीतील वेग, तपशील, पोत सार्याबरोबर तडजोड केली जाते.
तरीही या चित्रपटाची प्रोमोज बघुन वाट पाहत होतो. कधी प्रदर्शित झाला? कुठे लागला आहे? लेखकाने महोत्सवात पाहिला की थिएटरमधे?
असो. फटु बघुन पात्रनिवड बरीचशी चपखल वाटते आहे. मुळ कादांबरीत गाव नसून मुंबईचे एक लांबचे उपनगर आहे (नाव पूर्ण कादंबरीत नाहि) तेव्हा इतकी गर्द वनराई कशी हा प्रश्न पडतो. बरीच शेते असल्याचे वर्णन आहे मात्र इतक्या गर्द जंगलाचे नाही.
केवळ या दोन नव्हेत तर या चौकडीचं विस्कटणं, दहावीच्या वर्षाची धाकधुक, सुर्याचे नापास होणे इत्यादी अनेक कारणांनी नववीचे वर्ष संपताना जोश्याइतकाच वाचकाचे अंतकरणही जडशीळ होते. हे सारे धागे नेमके गुंफले आहेत.
बाकी, थेटरात चित्रपट लागून गेला असल्यास कधी ते कळलेच नाही याचे वाईट वाटते आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
डोंबिवली
कादंबरीतलं वर्णन डोंबिवलीला चपखल लागू पडतं. गावात चिक्कार डास असल्यामुळे डासिवली असं लोकांनी म्हणणं, गावात नगरपरीषद असणं (आता कल्याण डोंबिवलीची मनपा आहे), भांडूप, घाटकोपरहून शिक्षक येणं, म्हात्रे, भोईर आडनावाच्या लोकांची, आगर्यांची मुख्य गावाशेजारच्या गावात वस्ती असणं अशा वर्णनांवरून केलेला तर्क. आणखी डीटेल्स काढायचे असतील तर सुखदेव नामदेव वर्हाडकर अशा नावाशी समांतर शाळेचं नाव 'धनाजी नानाजी चौधरी' जी ठाकुर्लीच्या जवळच आहे, उच्चभ्रू सुभाष स्कूल म्हणजे टिळकनगर विद्यामंदीर इत्यादी.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सदर कादंबरी हि डोंबिवली आणि
सदर कादंबरी हि डोंबिवली आणि ठाकुर्ली या २ गावात घडते
गावातल गणपतीच देऊळ, तसेच ज्या शाळेवर अक्खी कादंबरी लिहिलेली आहे , ती म्हणेज स वा जोशी विद्यालय.
सुऱ्या हा सुद्धा ठाकुर्लीत्ल्याच काही आग्र्यांपैकी एक.
वर्णन केलेली रेल्वे लाईन , हि सुद्धा शाळेसमोरच आहे.
भव्य पटांगण.
तसेच इतरही बरीच स्थळ डोंबिवलीत अजूनही आहेत
+१
मुंबईहून अनेक शिक्षक लोकलने येतात (घाटकोपर, भांडुप). अंबाबाई माटुंग्याच्या भावमारु कॉलेजात जाते.. चित्र्या दर आठवड्याला सहजी बांद्र्याच्या आत्याकडे जातो.. अशा उल्लेखांनी मुंबईनजीक असल्याची खात्री होते.
त्यावर आणि जांभूळपाड्याचे डोंगर, सोनारपाडा अशा उल्लेखांनी डोंबिवलीची शक्यताच दाट होते.
शिवाय मुंब्र्याच्या देवीचा संदर्भ, सुर्याने दिलेला, हाही परिसरातलाच आहे. लहान पोरं फार दूरचे संदर्भ देत नाहीत सहसा..
१९७५-७६ साली डोंबिवली मुंबईच्या जवळ असूनही इतकी लहान गावासारखी होती..
बरोबर
कादंबरी डोंबिवली, ठाकुर्ली जवळच घडते. या कादंबरीत एक वाक्य आहे " खरंतर आमच्या गावाचं नाव डासिवली ठेवायला हवं"
वसई?
का कोण जाणे , मुळ पुस्तकातील कथा वसईजवळ घडत असावी असे मला नेहमी वाटे / वाटते. आगरी समाज वसई, भायंदर, उत्तन या भागात व्यवस्थित स्थिरावला आहे. या भागात आजही मोठ्या प्रमाणात भातशेती दिसते. तिथे अजुनही नगर परिषद आहे.. दलदलीमुळे चिक्कार डास आहेतच!
असाच तर्क मागे मी पार्ल्याबद्दलही वाचला होता.
किंबहुना जुन्या उपनगरातील प्रत्येकाला आपलेसे वाटेल असे वर्णन या कादंबरीत असणे हे एक वैषिष्ट्यच!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
स्काऊटचा कँप "जवळच्या खडवली'त
स्काऊटचा कँप "जवळच्या खडवली"त न जाता इतर कुठे जातो (कुठे ते विसरले) हे आणखी एक कारण डोंबिवली समजण्याचं!
प्रत्येकाला आपापल्या उपनगरांतली वाटते याच्याशी सहमत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
"हम ने जीना सीख लिया"
आत्ताच गुगलताना दिसलं याच कादंबरीवर आधारीत "हम ने जीना सीख लिया" नामक हिंदी चित्रपट २००७ मधे आला होता. काय झकास वाट लावली आहे कादंबरीची! 'शाळा' चित्रपटाची चित्रं पाहूनच चित्रपट पहावा अशी मनापासून इच्छा झाली. हिंदी चित्रपटाचा ट्रेलर पाहून पुन्हा एकदा पुस्तक उघडावं आणि मनःशुद्धी करावी असं झालं.
अगदीच मासोकीस्ट असाल तर हे घ्या ट्रेलर.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
प्रतिसादांना प्रतिसाद
बरोबर. सिनेमात शाळा आणि शाळासोबती यांच्यावर भर आहे त्यामुळे हे सर्व आलं आहे. शाळाबाह्य गोष्टी मात्र ओझरत्या येऊन जातात.
कथेतलं गावः मुळात लेखकाचं (मिलिंद बोकील) बालपण डोंबिवलीत (शाळा: स. वा. जोशी विद्यालय) गेलेलं असल्यामुळे कादंबरीत डोंबिवलीच आहे याविषयी शंका नाही. काही डोंबिवलीकरांना या कादंबरीचा राग आला होता असंही अंधुक स्मरतं. चित्रपटात ते एक वेगळ्या नावाचं गाव म्हणून येतं आणि त्याचं भौगोलिक स्थान वगैरेबाबत फार काही कळत नाही. आगरी जमातीचे लोक मुंबईजवळच्या कोकणात पुष्कळ आढळतात त्यामुळे कुणाला कथानकात वसई/न्हावाशेवा/पनवेल वगैरे जाणवले तर नवल नाही.
चित्रपट प्रदर्शित झाला का?
महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांत महोत्सवांमध्ये किंवा फिल्म क्लबच्या सुट्या शोंमध्ये वगैरे सध्या 'शाळा' दाखवला जात आहे. अधिक माहिती त्यांच्या फेसबुक पानावर मिळावी. महेश मांजरेकर तो वितरित करणार आहे असंही एका ठिकाणी वाचनात आलं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
चित्रपट पाहिला. आवडला. आणि बरंच काही..
'चाळीतलं ते बंडाचं वातावरण दाखवण्यात चित्रपट कमी पडतो' या जंतूंच्या मताशी किंचीतसा सहमत. एकूण शाळेचा कादंबरी ते चित्रपट हा प्रवास व्यवस्थितपणे घडवला गेला आहे असं मला वाटलं. मी या चित्रपटाच्या प्रीमियर ला गेलो होतो. तिथं बर्याच जणांनी "वा सुजय, खूप छान! आम्हाला आमचे शाळेचे दिवस आठवले." किंवा "ग्रेट यार! आमचीही शिरोडकर होती तिची आठवण झाली. खूप छान डिरेक्ट केलंयस तू.." वगैरे प्रतिक्रिया दिल्या. पण हे मूळ कथानकाचं, शाळा 'कादंबरी'चं यश आहे. शाळा चित्रपटाचं सर्वात मोठं यश म्हणजे त्याची सिनेमॅटोग्राफी आणि साऊंड इंजिनिअरींग! मराठी चित्रपटात कदाचित पहिल्यांदाच असा इंटरनॅशनल क्रूचा वापर करून टेकनिकली एक अत्युच्च दर्जाचा सिनेमा बनवण्यात सुजय यशस्वी ठरला आहे असंच म्हणावं लागेल. पुढे आढावा घेण्याचा प्रयत्न केलाच आहे.
काही विचारात घेण्याजोगे मुद्दे :
१. चित्रपट पाहताना शक्य तितक्या त्रयस्थपणे पाहण्याचा प्रयत्न केला. 'शाळा' कादंबरीला बाजूला ठेवून 'शाळा' चित्रपट पाहण्याचा प्रयत्न केला. अजिबात जमलं नाही. हे सुजय व सार्या टीमचं यशच म्हणायला पाहिजे.
२. शाळा कादंबरीच दृक्-श्राव्य माध्यमात समोर उभी आहे हे जाणवल्याने चित्रपटाच्या टेकनिकल बाजूंचा (मला जमेल तसा) विचार करू लागलो. हाती पडलं ते हे :
अ. सिनेमॅटोग्राफी फर्स्ट क्लास! जेव्हा जेव्हा कॅमेरा एखादी सकाळ दाखवताना त्या गावावर पॅन होतो तेव्हा तेव्हा ते ७० च्या दशकातल्या एका टुमदार खेड्याचं वातावरण निर्माण होतंच! ते पहाटचं निर्मळ वातावरण, ती थंडी, तो घराघरांतून येणारा धूर. 'पहाट' या शब्दाच्या व्याख्येत ज्या म्हणून गोष्टी सामावल्या जातील त्या बारकाईनं टिपलेल्या आहेत. केवळ या दृष्यांत असंच नव्हे तर संपूर्ण चित्रपटात सारं इतकं उत्तमरित्या साकारलं आहे की शिरोडकरनं माळलेल्या त्या गजर्याचा सुगंध आपल्यालाही यावा नि स्वेटर, मफलर घालून फिरणारे ते लोक पाहिले की ती गुलाबी थंडी आपल्यालाही जाणवावी! (मला हे नक्कीच जाणवलं. आणि इतकं की 'न्हालेल्या गर्भवतीची सोज्वळ मोहकता' ती हीच, इतकं!) I found the whole movie to be very CLEAR!
ब. जंतू म्हणतात सतत वाजणारं संगीत हे अजिबात गरजेचं नव्हतं. माझंही असंच मत पडलं खरं पण कदाचित आपण ती कादंबरी पडद्यावर शोधत असतो म्हणून ते संगीत नकोसं वाटत असावं. अन्यथा केवळ चित्रपटाची बाजू पाहिली तर ते तितकंसं अस्थानी वाटत नाही. उदा. जोशी जेंव्हा शिरोडकरला भेटायला देवळात जातो तेव्हा त्यांच्यात जो काही 'शब्देविण संवादु' घडतो त्या प्रसंगाला दिलेलं संगीत त्या एकूण प्रसंगाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं.
क. पात्रांची निवड (चार मुलांच्या निवडीकरता १८०० मुलांच्या स्क्रीन टेस्टस घेतल्याचं सुजयनं सांगितलं) व सादरीकरण सुद्धा चपखल आहे. कलाकाराकडे केवळ बघून पात्र ओळखता यावे इतके! पण हे झालं कादंबरी वाचलेल्यांचं. मात्र ज्यांना कादंबरी ठाऊकच नाही असे प्रेक्षकसुद्धा जेव्हा नरूमामा आणि मुकुंदातल्या नात्याशी रिलेट करू शकतात तेव्हा ते सर्वस्वी त्या चित्रपटाचं यश असतं! जोशी-शिरोडकरच्या प्रेमकथेवर फोकस करून त्याच्या आजूबाजूला मांजरेकर सराचं प्रकरण, चाळीतली बंडाळीचं वातावरण इ. कथानकं गुंफत या सर्वाचा जोशीच्या भावविश्वावर पडणारा परिणाम व्यवस्थितपणे साकारण्यात आला आहे. आणि हे व्हायचंच होतं. वर्ल्ड सिनेमा टार्गेट केल्यानं लांबवून चालायचं नाही. त्यामुळे उपकथानकांची काटछाट ही आलीच. पण ती अति कापली गेली नाहीत नि अति लांबवलीही गेली नाहीत हे एडिटरचं यश म्हणायचं!
ड. आणि प्रकर्षानं जाणवलं ते वारंवार उठून दिसणारा सुजयमधला हुशार दिग्दर्शक! बारीक बारीक तपशीलांवर बरीच मेहनत घेतलेली आहे. आता सगळे आठवत नाहीत! पण पुन्हा बघितल्यावर नक्की सांगू शकेन.
३. चित्रपटाचा प्रीमियर शो लंडनमध्ये झाला. आणि ही गोष्ट मला फक्त दोन दिवस आधी कळली. मराठी चित्रपटांचं ग्लोबल मार्केटिंग तितकं व्यवस्थितपणे होत नाही हेच खरं. वर्ल्ड सिनेमाच्या ताकदीचे तसे मोजकेच चित्रपट बनतात हेही तितकंच खरं. मात्र सुजयनं वर्ल्ड सिनेमा टार्गेट करूनच शाळा बनवला जाऊनही त्याचं प्रीमीयर लंडनमध्ये आहे तर त्याचा केवढा गाजावाजा व्हायला हवा होता, तो अजिबात झाला नाही. फेसबुकादि नेटवर्किंग माध्यमांचा मार्केटिंगकरता उपयोग मराठी फिल्मजगतात होतच नाही.
किंचित अवांतर : महेश मांजरेकरनं भारतात चित्रपटाच्या वितरणासाठी प्रयत्न चालू आहेत वगैरे काहीतरी सांगितल्याचं स्मरतं. दरम्यान, विक्रम गोखल्यांशी गप्पा झाल्या. त्यांनी त्यांच्या 'आघात' चित्रपटाला अमूक एवढी नॉमिनेशन्स आहेत नि मी तो चित्रपट असा केला, तसा केला, कथा कशी ग्रेट आहे वगैरे खूप सांगितलं. पण मुळात आम्हाला कुणालाच 'आघात' बद्दल काहीच कल्पना नसल्याने सगळंच बाऊन्सर! लॅक ऑफ मार्केटिंग!
एकूण, कादंबरी वाचलेल्यांना आवडलाच तसंच ज्यांनी कादंबरी वाचली नाही त्यांनाही आवडला अशी बरीच उदाहरणं माझ्यासमोर असल्यानं चित्रपट माझ्या दृष्टीनं सुपरहिट आहे! आणि खरंच एक नेटकं आणि देखणं आणि यशस्वी माध्यमांतर आहे!
बाकी, 'हमने जीना सीख लिया' मध्ये कादंबरीची वाट लावली आहे या अदितीच्या मताशी सगळेच सहमत व्हावेत!
पिक्चर पहयला जाय्ला पाहिजे.
पिक्चर पहयला जाय्ला पाहिजे.
महाराणी पद्मिनी~ तेजस्वितेची दिव्य ज्योती!
शिरोडकर
शिरोडकर चा रोल केलेली मुलगी कोण आहे? तिला कुठेतरी पाहिल्या सारखे वाटते पण नीट आठवत नाहीय.
मला कादंबरी बर्यापैकी आवडली होती, आणि सिनेमा पहायला आवडेल, पण चिंजं च्या परीक्षणात चित्रपटाबद्दल मत थोडेफार "अंधों में काना राजा" असल्यासारखे वाटले - म्हणजे "एकूण मराठी सिनेमातली परिस्थिती पाहता हा बरा" असे. परीक्षणाचा हा गोषवारा बरोबर आहे का?
ट्रेलर मधल्या जॅझ संगीताने मात्र थोडीशी निराशा केली - चांगले असले तरी चित्रणाबरोबर अजिबात बसत नाही असे वाटून गेले.
याच निमित्ताने कादंबरीबद्दलही चर्चा इथे चालेल का? मुक्तसुनीत बरोबर काही वर्षांपूर्वी थोडी चर्चा झालेली आठवते - त्यांनी कादंबरीबद्दल थोडेसे लिहावे ही विनंती!
केतकी माटेगांवकर ती. सारेगमप
केतकी माटेगांवकर ती. सारेगमप लिट्ल चॅम्प्स मध्ये होती बहुतेक..
याच निमित्ताने कादंबरीबद्दलही
नेकी और पूछ पूछ!
ट्रेलरमधलं जॅझ संगीत आवडलं तरी मलाही खटकलं. किंबहुना ट्रेलर दोन फूटांवरून ऐकताना "ही भाषा कोणती?" असा प्रश्न मराठी माणसांकडूनच आला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
'शाळा' कुठे पाहायला मिळेल?
हो. मराठी सिनेमाकडेही आता तांत्रिक सफाई आलेली आहे, पण आंतरराष्ट्रीय महोत्सवांत देशोदेशीचे गाजलेले ताजे सिनेमे पाहताना त्या तुलनेत मराठी सिनेमाला खूप मोठा टप्पा अजून गाठायचा आहे.
हे दोन्ही ट्रेलर परदेशातल्या प्रेक्षकांसाठी केलेले असावेत. त्यासाठी त्यांना परिचित संगीत वापरलं असावं असा अंदाज आहे.
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार मुंबई, पुणे आणि कोल्हापूर इथे होणार्या आशिआई चित्रपट महोत्सवात शाळा दाखवला जाणार आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
परीक्षण
आवडले. मंदारचा प्रतिसादही उत्तम. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता आहे. पाहू केव्हा योग येतो ते.
किंचित अवांतर - पुस्तक आणि त्यावर आधारित चित्रपट ह्याबद्दल एक वाचनीय लेख.
गमभन
याच कादंबरीवरची बहुधा रूइयाच्या मुला-मुलींनी केलेली एकांकिंका 'गमभन' पाह्यलीय. खरं पुस्तक त्यानंतर तीनेक वर्षांनी वाचलं. मोजकंच पण परिणामकारक नेपथ्य, कलाकारांचा अभिनय इतका छान होता की पुस्तक वाचनाताच एकांकिकेतले प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले होते. चित्रपटाच्या बाबतीत अशीच अपेक्षा होती/आहे आणि उगीच सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली तितल्या मूळ सौंदर्याला धक्का बसू नये असं मनोमन वाटत होतं. मंदारचा प्रतिसाद वाचून असंच झालं असावं असं वाटतं आहे.
-मस्त कलंदर
उदरभरण नोहे
'गमभन'
मी पण 'गमभन' एकांकिका शिवाजी मंदीर ला पाहिली होती. एकांकिंका खुप आवडली म्हणुन नंतर पुस्तक विकत घेऊन वाचले. त्यावर्षीच्या बहुधा २००५ च्या सवाईत ती एकांकिका पहिली आली होती. अद्वैत दादरकरने डायरेक्ट केलेल्या ह्या एकांकिकेतला सुर्या (नितीन जाधव) आणि शिरोडकर (स्पृहा जोशी) हे कॅरेक्टर्स मनात अगदी फिट्ट बसले आहेत. कांदबरी वाचताना तेच सगळे डोळ्यासमोर येतात. सुर्याचं काम करणार्या नितीनला प्रयोगानंतर विंगेत जाऊन भेटलो पण होतो. एकांकिकेत बेंद्रेबाई ज्या मुलाला पट्टीने मारतात तो मुलगा अंध आहे. ह्याच एकांकिकेचे नंतर नाटक झाले आणि बरेचसे प्रयोगही झाले.
’शाळा’ चित्रपट शनीवारी पाहिला. आवडला. सगळ्यांची कामे छान झाली आहेत. चित्रपट ७० च्या काळात घेऊन जातो. मस्तच अनुभव.
एकांकिका असो वा चित्रपट शिरोडकर जेव्हा "छे बाबा आम्हाला नाई जमायचं हे सगळं" हे वाक्य स्पृहा आणि केतकी मातेगावकर दोघीही म्हणतात तेव्हा आपण खल्लास होतो.
शाळा पाहिला. जंतूंच्या
शाळा पाहिला. जंतूंच्या शब्दाशब्दाला अनुमोदन.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
'मनाचे पारणे' फिटले नाही
काल चित्रपट (एकदाचा) पाहिला
१. संगीत खटकलंच खटकलं काहि वेळा ध्वनीही खटकले
२. चित्रपट शाळा पुस्तक वाचले आहे असे गृहित धरुन बनविल्यासारखा वाटला. पात्र परिचय लोकांना आहेच असे समजुन चित्रपट पुढे गेला आहे. चित्रे, बिबिकर, पुढच्या बाकांच्या चिमण्या यांना इंट्रोड्युस न करता इतरांच्या बोलण्यात यांची नावे येतात. माझ्या पुस्तक न वाचलेल्या भावाला बिबिकर कोण? असा प्रश्न काहि काळ पडला होता
३. मक म्हणते तसं 'सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली तितल्या मूळ सौंदर्याला धक्का' लावलेला नाहिये, मात्र काहि महत्त्वाच्या गोष्टींना काट मारली आहे. जसं जोश्याची हुरहुर नीट उतरली आहे, मात्र चित्र्याची पार्श्वभुमी येतच नाही आणि थेट चित्रपटाच्या शेवटी तो बांद्र्याला शिफ्ट होणार असं कळतं. ते का वगैरे न कळल्याने 'हे काय मधेच' असे वाटते. चित्रपटाचा वेग किंवा सारं न दाखवण्याचा थोडा अट्टाहास झाल्यासारखा वाटलं
थोडक्यात चित्रपट आवडला मात्र त्याने 'मनाचे पारणे' फिटले नाही
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
काल आमचं कुटुंब शाळा पिक्चर
काल आमचं कुटुंब शाळा पिक्चर पाहून आलं. त्यांच्या ग्रुपमधील महिलांना चित्रपट आवडला नाही. कादंबरीप्रमाणे चित्रपट पकड घेत नाही असे मत ऐकले.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अभिरुची
सिंहगड रोडवरचं अभिरुची मल्टीप्लेक्स. बरं वातावरण. खुर्च्या अगदी ऐसपैस. मऊ, गुबगुबीत उशा. मागं रेलून मस्त बसता येतं. ध्वनियंत्रणाही चांगली. हे सारं मल्टिप्लेक्स नवं असल्यानं असावं. अर्थात, आवाज थोडा कमी असता तर या ठिकाणी दोनेक तासांची झोप घेता यावी. अत्यंत सुखद वातावरण. खाली एक महाकाय किराणा, भुसार दुकानही आहे. फुडकोर्ट या नावानं काही गोष्टीही मिळतात, असं दिसलं.
तिथं मी काल 'शाळा' पाहिला.
अभिरुची
अभिरुची कसं वाटलं ते सांगितलंत; आता 'शाळा' कसा वाटला तेही सांगा ना
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अहो तेच तर सांगितलं ना
अहो तेच तर सांगितलं ना त्यांनी! छ्या: तुम्हाला असं उलगडून सांगायला लागावं! हा हंत हंत!
बिपिन कार्यकर्ते
हेच
हेच. असेच. प्रोबॅब्ली दॅट्स द डिफरन्स बीटविन अॅन आर्किटेक्ट अँड अ मॅनेजर!
तुमच्या बेसिकमधे लोच्या आहे
तुमच्या बेसिकमधे लोच्या आहे किंचित! तपासून घ्या!
बिपिन कार्यकर्ते
शक्य
शक्य आहे, म्हणूनच प्रोबॅब्ली असं मी म्हटलं होतं. काय आहे, आर्किटेक्टला सगळ्या गोष्टी एक्स्प्लीसिट लागतात; मॅनेजर रिइंजिनिअरिंगला फारसा तयार नसल्यामुळं गृहितकांवर (तीही त्याच्याच मनची) जातो. मग त्यात त्याला त्याच्या हिताच्याही गोष्टी कळत नाहीत. मॅनेजरला स्वार्थ कळतो, असं अॅकॅडेमिक बेसिक मी गृहीत धरलं होतं. ते चुकलं.
आता मी थांबतो, अवांतर फार होत असल्यानं. वरचा पावशेर टाकण्याची संधी तुम्हाला!
आय रिपिट! सॅडली यु फोर्स्ड
आय रिपिट! सॅडली यु फोर्स्ड मी! बेसिक्स / गृहितकं बहुधा तुम्हाला नवीन आहेत. चालायचंच!
बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद.
अभिरुचीच्या परीक्षणाबद्दल धन्यवाद, सिंहगड सोडल्यास सिंहगड रोडवर जाण्याशिवाय दुसरं कारण आणि पैसे घालवण्यासाठी उत्तम जागा आहे असं वाटतय.
मी शाळा
पाहिलीपाहिला नाही. पुस्तकात समाधानी आहे.शाळा
परीक्षण अतिशय आवडले.
मी शाळा बघितला नाही. वाचलेले पुस्तक विसरले आहे. त्यामुळे कदाचित सिनेमा आवडेल असे वाटते.
मास्तरांना पाहून माझ्या वडिलांकडे त्या काळात पद्धतीचे कपडे होते ते आवडले. किमान छायाचित्रे पाहून तो काळ उभा केला असावा असे वाटले. माटेगावकरचा चेहराच मला आवडतो, ती व्यक्तीरेखाही चांगली झाली असावी.
शाळेच्या नव्या को-या इमारतीला मांजरेकरांचा आधार मिळण्याआधी एक वर्षे इमारत तशीच होती असे ऐकले आहे..
एका शब्दपेक्षा दोन बरे.
माध्यमान्तर म्हणजे काय ?
छान परीक्षण. पण माध्यमान्तर म्हणजे काय ते थोडक्यात समजावून सांगितले असते बरे झाले असते. म्हणजे सर्जनक्रिया, मांडणी आणि कार्यपद्धतीचा विचार केल्यास सिनेमा आणि साहित्य ह्या दोन माध्यमांतली असलेली नसलेली साम्ये कुठली वगैरे वगैरे.
पण माध्यमान्तर म्हणजे काय ते
मलाही हे समजून घ्यायला आवडेल! कृपया लिहाच.
बिपिन कार्यकर्ते
माध्यमांतर
अरुण खोपकरांचा माध्यमांतरवर हा लेख अलिकडेच वाचण्यात आला. चिं. जं. यांनी यावर ही टिप्पणी करावी ही विनंती!
Thanks a ton.
Thanks a ton.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
उत्तर फोडले
रोचना ह्यांनी उत्तर फोडले की
शाळा आणि माध्यमांतर
खोपकरांच्या लेखाच्या दुव्याबद्दल आभार. त्यांच्या लेखाचा पट पुष्कळ विस्तृत आहे आणि त्या अनुषंगानं त्यांनी घेतलेली उदाहरणंसुद्धा वेगवेगळ्या अभिजात कलाकृतींमधली आहेत. त्या सर्वांविषयी उहापोह करायचा झाला तर ते इथे फार अवांतर होईल. 'शाळा'विषयी मी लेखात मांडलेल्या मुद्द्यांच्या आधारे इथे किंचित विस्तार करतो. चर्चा पुढे जाईल तसे आपण आणखी मुद्दे विचारात घेऊ शकतो.
शेक्सपियर-कुरोसावा तुलनेत मूळ संहितेतले शब्द आणि चित्रपटातले ध्वनी आणि प्रतिमा यांच्याद्वारे होणाऱ्या अर्थवाहनाविषयी खोपकर बोलतात. याउलट मी वर वर्णन केलंय ते वाईट दर्जाचं किंवा ‘अंध’ माध्यमांतर आहे. पण अनेकदा मराठी चित्रपटांत तसंच होताना दिसतं. इतकंच काय, मराठी प्रेक्षक अनेकदा आपल्या आवडीच्या माध्यमांतराविषयी बोलतात तेव्हा अतिशय शब्दबंबाळ कलाकृतींचा उल्लेख गरजेहून अधिक आदरानं करतात असं वाटतं.
‘दुविधा’ आणि ‘पहेली’ असा जाताजाता उल्लेख खोपकर करतात. माझ्या मते शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांना घेऊन केलेलं माध्यमांतर हे फसणारच, कारण मूळ कथानकात पात्रांना असलेला खरबरीत पोत अशा तुकतुकीत चेहऱ्यांना येणार नाही. या तुलनेत विचार करता ‘शाळा’मधली मुलं खरोखर त्या अवघड वयाला साजेशी बावळट आणि गोड दिसतात.
रंगभाषेविषयी खोपकर अनेक उदाहरणं देतात ती मुळात वाचनीय आहेत. ‘शाळा’पुरतं बोलायचं झालं तर कादंबरीत एक खास मराठी मध्यमवर्गीय भाव आहे. त्याचा अर्थ असा की कादंबरीत सर्व काही सौम्य स्वरूपात आहे. प्रेमही सौम्य, शिक्षकांचा/पालकांचा रागही सौम्य आणि अगदी शेवटचा संघर्षही हा सौम्यपणा टिकवूनच रंगवला आहे. सुऱ्याचं पात्र आणि त्याचे वडील यांचा अपवाद वगळता बाकी लोक, म्हणजे मुख्यत: शिरोडकर, जोशी वगैरेंची कुटुंबं ही समंजस आणि सौम्य वृत्तीची आहेत. त्यामुळे कादंबरीतलं भावविश्व आणि त्यातलं नाट्य कुठेही चकचकीत, बटबटीत किंवा भडक होत नाही. कादंबरीच्या गोडव्याचा गाभाच म्हणता येईल असा हा सौम्यपणा आहे. मी वर उल्लेख केलेले चित्रपटाच्या रंगभाषेतले घटक या भावाशी सुसंगत आहेत आणि त्यामुळे चित्रपटात हा सौम्य गोडवा आणण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. यातलं काहीच कादंबरीत नाही. तरीही कादंबरीला दृक-श्राव्य माध्यमात आणतानाची ही दृष्टी सर्वसाधारण मराठी सिनेमाचा विचार करता मला उल्लेखनीय वाटते ती या कारणामुळे.
याच्या अगदी उलट संगीताचा मुद्दा आहे. प्रत्येक प्रसंगात प्रेक्षकाच्या मनात काय भाव उमटले पाहिजेत ते अगदी बटबटीत रीतीनं अधोरेखित करणारं हे संगीत कादंबरीच्या सौम्यपणाशी फटकून उभं राहतं आणि म्हणून खुपतं.
शाळाबाह्य वातावरणाचा आणि राजकीय पार्श्वभूमीचं पुरेसं परिप्रेक्ष्य सिनेमात न लाभण्याच्या मुद्द्याचा माध्यमांतराशी असाच काहीसा संबंध लागतो. या परिप्रेक्ष्यामुळे कादंबरी निव्वळ लहान वयातली प्रेमकथा न राहता तिचा पट विस्तारतो. चित्रपटात काटछाट अपरिहार्य असली तरी त्यामुळे हे परिप्रेक्ष्य पुरेशा ताकदीनं उभं राहत नाही. त्यामुळे चित्रपट प्रेमकथेत अडकून राहतो. म्हणून हे माध्यमांतर मर्यादित प्रमाणात यशस्वी झालं आहे. काटछाट करताना अधिक विचार गरजेचा होता असं मला वाटलं. असो. ‘शाळा’ माध्यमांतर म्हणून कुठे यशस्वी होतो आणि कुठे फसतो हे मी मूळ लेखात मांडलेल्या मुद्द्यांचाच आधार घेत या प्रतिसादात अधोरेखित केलं आहे. त्याद्वारे माध्यमांतराबद्दलचे काही मुद्दे स्पष्ट झाले असतील अशी आशा आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
यशस्वी माध्यमांतर म्हणजे काय?
एखादा चित्रपट एखाद्या साहित्यकृतीवर बेतलेला असणे आणि माध्यमांतर ह्यांत काय फरक आहे? माध्यमांतर ह्या दर्जेदार शब्दांत नवीन दर्जेदार सर्जन अभिप्रेत आहे असे मला बहुधा उगाचच वाटते.
माध्यमांतरात अगदी मूळ साहित्यकृतीपेक्षा वेगळे इंटरप्रिटेशन, बदल करण्याचे स्वातंत्र्य असू शकते का? तसेच चिल्लरशा साहित्यकृतीचे माध्यमांतर एका ग्रेट सिनेमात झाले तर ते अयशस्वी माध्यमांतर म्हणायचे की यशस्वी? दिग्दर्शकाला हवा तसा चित्रपट त्याने बनवला तर त्याला कुठल्या प्रकारचे माध्यमांतर म्हणायचे?
शाहरुख खान आणि राणी मुखर्जी ह्या तुकतुकीत चेहऱ्यांचा ऍक्टरांची असलेली-नसलेली अभिनयक्षमता किंवा कौशल्य इथे विचारात न घेता असे म्हणावेसे वाटते की, तुकतुकीत चेहऱ्यांना खरबरीत पोत आणण्याचे काम नीट जमले नाही हा मेकपवाल्याचा, म्हणजेच दिग्दर्शकाचा, दोष असू शकतो.
सर्जन, स्वातंत्र्य वगैरे
भाषांतर किंवा माध्यमांतर करताना सर्जन गरजेचं असतं याविषयी सहमत. खोपकरांच्या लेखात याचे काही उल्लेख आले आहेत. उदा: अमृता शेरगिलच्या चित्रशैलीचा 'उसकी रोटी'मधला वापर. मूळ साहित्यकृतीमध्ये अमृता शेरगिलचा काही संदर्भ नसणार. साहित्यकृतीचा भावार्थ चित्रपटात व्यक्त करू शकेल असा दृश्यात्मक घटक मणि कौलला त्या चित्रशैलीत सापडला म्हणून त्यानं ती शैली वापरली. हे सर्जन आहे. 'शाळा'च्या अगदी छोट्या जिवाच्या पातळीवर सांगायचं झालं तर सिनेमाचा एकंदर दृश्यपरिणाम मूळ कादंबरीतल्या सौम्यपणाच्या भावाशी मिळताजुळता ठेवणं हा एक तशा प्रकारचा दिग्दर्शकीय निर्णय म्हणता येईल. त्याला 'सर्जन' वगैरे म्हणावं इतका काही तो उच्च नाही, पण सर्वसाधारण मराठी चित्रपटात असा विचार केला जात नाही हेही खरं.
भाषांतर करताना मूळ साहित्यकृतीच्या आशयापेक्षा वेगळंच काहीतरी त्यातून व्यक्त होऊ लागलं तर ते भाषांतर चांगलं समजलं जाईल का? तसंच काहीसं इथे आहे असं वाटतं. मूळ कलाकृतीतला आशय/भाव परिणामकारकरीत्या व्यक्त होण्यासाठी थोडं स्वातंत्र्य घ्यावं लागतंच. मूळ पुस्तकातले सगळे प्रसंग, सगळे संवाद, सगळी निवेदनं कायम ठेवायची तर आशयाला बाधाच निर्माण व्हायची शक्यता दाट असते. पण मग काटछाट अपरिहार्य असली तरीही ती कशाकशाची करायची हा निर्णय घ्यावा लागतोच, आणि तो घेताना कळत-नकळत विपर्यास होऊ शकतो. 'शाळा'पुरतं बोलायचं झालं तर प्रेमकथेवर अधिक भर दिल्यामुळे आणि राजकीय पार्श्वभूमीला काहीसं (त्या मानानं) कमी महत्त्व दिल्यामुळे एकंदर परिणाम बदलला असं वाटलं. अर्थात मूळ कलाकृतीतला फसलेला भाग वगळून चांगला जमलेला भाग निवडून झालेलं माध्यमांतर मूळ कलाकृतीहून अधिक परिणामकारक (आणि म्हणून यशस्वी) झालं असं एखादे वेळी होऊ शकतं. उदाहरणार्थ, नेमाड्यांच्या 'हिंदू'वर निवडीची अशी चाळणी लावून एक चांगला चित्रपट बनू शकेल इतपत सामग्री कादंबरीत आहे.
शक्यता अर्थात नाकारता येत नाही, पण ज्या चेहर्यांच्या 'स्टार' असण्यामुळेच त्यांना मुळात निवडलेलं आहे अशा चेहर्यांना मूळ कलाकृतीबरहुकूम बदलण्याची, म्हणजे थोडक्यात त्यांचं ग्लॅमर झाकोळण्याची इच्छाशक्तीच इथे नसावी असं वाटतं. याउलट गल्ला भरण्यासाठी 'स्टार' लोकांचा वापर करून घेण्याची प्रवृत्ती साहजिक आणि पुरेशी सार्वत्रिक आहे असं दिसतं. शिवाय आपल्याकडे प्रत्येक स्टार आपला रंगपट, मेकपमॅन वगैरे वापरून चित्रपटातला आपला 'लूक' आपल्या प्रतिमेशी सुसंबद्ध राखण्याची काळजी घेतो; मग त्यात चित्रपटाच्या आशयाचं वाट्टेल ते नुकसान झालं तरी काही बिघडत नाही. सिनेसृष्टीत कित्येक वर्षं वावरणारा पालेकरांसारखा माणूस या वास्तवाशी अनभिज्ञ असेल असं वाटत नाही. त्यामुळे इच्छा होती पण प्रयत्न फसला किंवा तितकासा जमला नाही असं या उदाहरणापुरतं तरी मला वाटत नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||