कातरवेळ – 3
एकदा निक्षून जायचंच असा ठरवल्यावर बाहेरचा दरवाजा लोटून ती घराबाहेर पडली. ऊन कमी झाल असलं तरी झळा कमी झाल्या नव्हत्या. बागेतल्या मातीतून चालताना गरम वाफा जाणवत होत्या. गरम शावासाबरोबर उतू जाणारा कढ प्रत्येक पावलागणिक वाढत होता. चाफ्याच्या झाडाजवळ गेल्यावर ती जरा थांबली. दरवाजापासून चार पावले चालितो ही अवस्था. पुढे काय होणार तुझ? हा सगळा पसारा आवरायचा झाला तर कुठेतरी धस लागणारच. तटकन कुंपणाच दार ढकलून ती पुढे गेली. दाराने कर्र कर्र असा मोठ्ठा आवाज करत विरोध दर्शवला आणि बागेतल्या पावसापाण्याने गंजून उसासे टाकणाऱ्या फक्त ‘त्याच्या’ टेबलाचा पाय तटकन तुटला.
“सारंगा.........”
कोणीतरी जोरात हाक मारली म्हणून मी मग वळून पाहिलं. मागच्या ग्रुप मधला तो उंच ढोल्या.. तो च असणार.. मला असा जंगलात वगैरे गेलं आणि कुणी गाणी बिणी म्हटली ना कि जाम डोक्यात जातं..आणि समूहगान वगैरे केल ना की अजून जास्त.. बर मान्य आहे कि तुमचा आवाज स्वर्गीय आहे पण माझ्या कानाशी ही गुणगुण का???
त्या आवाजापासून आणि मुख्य म्हणजे त्या उंच ढोल्या पासून जरा दूर जाव म्हणून मी झपाझप पुढे निघाले. तेवढ्यात मला कोणीतरी गाठून विचारले..”तुझ नाव सारंगा आहे ?” अच्छा म्हणजे हा उंच ढोल्या नाहीये होय्. कोणीतरी वेगळाच आहे की ..पण डोक गरम असल्याने कि काय कोण जाणे मला त्या आवाजात कुतूहलापेक्षा खवचटपण जास्त जाणवला. “तुझ नाव सारंगा आहे ..” परत त्याने प्रश्न विचारला. आता या प्रश्नात उत्सुकता किती आणि “अरेरे... तुझ नाव सारंगा आहे होय..” हा भाव किती.. हेही खरय की मला माझ नाव मुळीच आवडत नाही. सारंग म्हणजे मोर आणि सारंगा म्हणजे त्याच स्त्रीलिंगी रूप.. लांडोर... आता माझ्या आई बाबांनी अस नाव का ठेवल ते माहित नाही. या नावामुळेच आईबाबांनी मला जोंधळ्यावर बोहारणीकडून घेतलं आहे असा माझा समज किती दिवस कायम होता. जोपर्यंत लांडोर प्रत्यक्षात किंवा चित्रात पहिली नव्हती तोवर कोण आनंद. कृष्ण इतका सुंदर आणि राधा त्याहून सुंदर. आजीच्या घरात रामाचा फोटो होता आणि त्यामागे अवगुंठनातली सीता.. किती सुंदर..मग लांडोर किती सुंदर असेल अस माझ लॉजिक. लांडोर अवगुंठनात होती तेच बर होत. कारण प्रत्यक्ष लांडोर पाहिली तेव्हा जे काही भोकाड पसरलं होत.. नंतर नावाचे इतर अर्थ समजूनही मनातली अढ तशीच राहिली. तोवर त्याने सिक्सर मारला..”किती सुंदर नाव आहे तुझ...!!!!” ... आयला.. दादा ..कोने तू.. माझ नाव याला आवडलं. त्या दिवशी कधी नव्हे ती मी शेकोटीला सगळ्या ग्रुपबरोबर बसले तेही गिटार-बिटार घेतलेले लोक आजूबाजूला असूनही. कुठल्या वयात काय आवडावं याचा खरंच कुठला नियम नाही. ही तुझी आणि माझी अशीच एक भेट.
‘झळझळीत’ असा एकाच शब्द आहे घरापासून तळ्यापर्यंतच्या रस्त्यासाठी. सकाळचे कोवळं ऊन असो किंवा कडकडीत दुपार हा रस्ता कायम झळाळणारा. आजूबाजूच्या कुठल्याही झाडाची एकाही खुरटी सावली तो अंगाला लावून घ्याचचा नाही. अगदी त्याच्या कडेने उगवणार हिरवागार गवत असो किंवा दमदार पावसाने तयार केलेलं पाण्याचं खळ असो. थोडेच दिवसात हा रस्ता त्यांना स्वत:सारखं करून टाकतो.
आणि एखादी गाडी गेली की सोनेरी धूळ उडवत मिजास मिरवतो. याच रस्तावरून चालत कित्येकदा ते दोघे तळ्याकाठी गेले आहेत ते हि अश्या अडनिड्या वेळी. दुपारचे साडे चार ही नक्कीच सूर्यास्त बघायची वेळ नाही. चारचा गजर झाला की तळ्याकाठी जायची कोण गडबड. एकदा खूप खोदून तिने कारण विचारलं तर तो म्हणे “ऐनवेळी जाणं हा त्या कलाकृतीचा शुध्द अपमान आहे. सूर्यास्त म्हण किंवा सूर्योदय हे अख्ख चित्र नाही आहे. हळूहळू चढत जाणार गारुड आहे. आधी जाऊन वाट बघून आपल्याला ताटकळत ठेऊन मग एक आकाशात गुलाबी पट्टा दिसतो. मग एका एका फटकाऱ्याने चित्र पूर्ण होत. आणि मुख्य म्हणजे आपण त्या चित्राचा भाग असतो कारण त्या फटकाऱ्यातले रंग आपल्यावरही उतरतात.” खर आहे गड्या म्हणून ती गप्प बसली. पण आता तिला आठवत होती तळ्याच्या उतरणीला खडकावर निश्चल बसून राहिलेली त्याची मूर्ती. आधी ऊन सोसून मग हळूहळू निवत जाणारी .. झळझळीत.....
रस्त्याच्या या डौलदार वळणावर आज फक्त माझी पाऊले उमटतील. किती सहज हातातून हात सोडवून घेतलास? कुठल्या आणाभाकांनी मी तुला अडवलं होत? नव्हत ना? मग निघताना ‘येतो गं’ इतका सांगावा तरी धाडायचा.
पदरात अडकली त्यांच्या चांदीची उडते धूळ
मोराने केलेले मोरणीचे प्रियाराधन..डौलाने सामोरे येणाऱ्या मोराचा पिसारा, पिसार्यातले हजार चकाकते डोळे,त्याच्या थरथरण्याने नजाकतीने चमकून गेलेली विजेची लहर जणू त्याच्या पिसारयातात अडकलेली चांदीची धूळ. पुढच्या सगळ्या कडव्यांतही हाच गर्भित अर्थ. हीच कविता म्हटली होती न तू शेकोटीच्या रात्री. कमाल मजा वाटली होती, आपलं नाव गुंफून कविता वगैरे असते हेच अप्रूप वाटत होत.
एकदा कुठल्यातरी समुद्रकिनारी गेल्यावर निळ्याशार आकाशाखाली चंदेरी वाळू तुडवताना मी अशक्य भंकस गप्पा मारत होते. दूरवर वाळूत पडलेलं झाडच खोड आणि त्याला अडकलेली हिरवी प्लास्टिकची पिशवी वाळूत पहुडलेल्या माणसासारख कस दिसतं आहे. जर आपण हा समुद्र ही कपड्यांची थीम केली तर कसले भन्नाट कपडे होतील. मऊ, तलम, हिरवी, निळी वस्त्रे आणि लाटांची लेस.. मलाच मनातल्या मनात ‘आवारा’ होत होत. पण तुझ्या सोबत पाऊलओल्या पाण्यात चालण, लुसलुशीतवाळूत पडून राहाण जे काही अफाट होत. तेव्हा म्हणालास ,”सारंगा, पाणी इतकं आवडतं न तुला..मग त्या सारंगाच्या कवितेचा हा अर्थ बघ. समुद्र म्हणजे तर सखाच तुझा..तू सारंगा..एक नाव..कितीही किनाऱ्याशी जवळीक केलीस तरी तू सुखावातेस जेव्हा हा सखा हजार लाटांनी गोंजारतो तेव्हा..शंखशिंपल्यांची स्वप्ने लेऊन चकाकणाऱ्या लाटा जेव्हा किनाऱ्याशी सलगी करतात तेव्हा उडालेले तुषार..जणू त्याच्या पदरातली अडकलेली धूळ.”
विचारात पडले होते हा तुझा अर्थ ऐकून. आता वाटतंय खरय तुझ, फ्रेम ऑफ रेफरन्स बदलली की अर्थही बदलतात. इतके बदलतात की आपण एकाच पानावर कधीच नव्हतो असं वाटायला लागतं. तू मला सोडून गेलास. याचं भुईवर कुठेतरी सताड उघड्या डोळ्यांनी झोपी गेलास. ‘का गेलास? का सांगितलं नाहीस? काय खुपत होत तुला? थोडी चाहूल सुद्धा लागू दिली नाहीस? माझ्याशी असं का वागलास?’ घसा खरवडून विचारलेल माझे सगळे प्रश्न अज्ञाताच्या पोकळीवर आदळून परत येतात. तू तुझ्या तंद्रीत असताना टीश्शू पेपरच्या असंख्य घड्या घालतोस. पुस्तक वाचताना मध्येच काही आठवलं तर पेस्टइट च्या चिरकुटावर काहीबाही लिहितोस. तू असा निघून गेल्यावर मी घरात सापडलेल्या प्रत्येक चिठ्ठी-चपाटीत या प्रश्नांची उत्तरं शोधली आहेत. परवा सापडलेल्या टीश्शू पेपरच्या कोड्यात तू लिहिलं होत ‘हवं ते नको’. काय अर्थ आहे याचा? काय नको आहे तुला? आणि काय हवं आहे? आपल्यातली असंख्य कोडी सोडवण्याची ताकद नाही आता माझ्यात. फुटलेल्या काच-कवड्यांची कॅलिडोस्कॉपात आपलंच रूप परावर्तीत होऊन सुंदर रांगोळी तयार होते पण एकसंध चित्र नाही. असंख्य ठिगळे लाऊन मी शेवटी मनाला तयार केल आणि रडत भेकत, अडखळत इथवर आले. पुढच वळण सरल की झालंच.
उमजेल सख्यांना तैसे अंगात फुलांची चोळी
समजून उमजून मनभर पसरलेल्या तुझा अस्ताव्यस्त पसारा जरा आवरायला घ्यावे म्हणते!
तळ्याकडे जाणारा हा रस्ता किंचित उभ्या चढणीचा असला तळ्याच्या बाजूची उतरण अगदी अलगद पाण्यात उतरते. चढणीच्या टोकावर पोहचता तिला दम लागला होता. तिथल्याच एका मोठ्या दगडाला ती जरा टेकली. पक्ष्यांची कुजबुज आता स्वच्छ ऐकू येत होती. हलकीशी वाऱ्याची झुळूक तळ्याच्या विस्तीर्ण पात्रावर तरंग उठवत होती. बऱ्याच वेळाने आकाशात एक हलका सोनेरी केशरी पट्टा उमटला तेव्हा उठून ती उतरणीला असलेल्या कदंबाच्या झाडाकडे चालू लागली.
परतीच्या वाटेवरती परतीचे फिटते अंजन
किती वाजलेत कुणास ठाऊक? पण तुझ्या चित्रकाराची कॅनवासवर उधळण सुरु झालीये. हळूहळू त्यात रंग भरतील पण माझ्यावरची तुझी सगळी उधळण आज मी निपटून काढणार आहे. मला माझा रंग परत हवा आहे. कदाचित एक कप्पा तुझ्यासाठी असेल गूढ, मखमली, जांभूळ-निळ्या मोरपंखी रंगाचा.
कदंबाच्या झाडाजवळ पोहचल्यावर तिने मागे वळून बघितलं. झाडीतून दिसणारं तिचं घर हात उंचावून हसत निरोप देणाऱ्या मित्रासारख वाटलं. तिचाही हात नकळत उंचावला आणि मग या झाडाच्या भल्यामोठ्या खोडतूनच फुटाव्या अश्या घाटदार पायऱ्यानी तिला वाट दिली.
या कदंबाच्या झाडाखालून एक दगडी वाट तळ्याशी जाते आणि मागे पाहिलं की इतक्या वेळ झाडीत लपलेलं आपलं घर दिसत. मागे एकदा एका कडक उन्हाळ्यात तळ्याच पाणी एकदम कमी झाल आणि गावकरी ज्या मंदिराच्या सुरस आणि चमत्कारी कथा सांगायचे ते हेमाडपंथी मंदिर कित्येक वर्षांनी उघड पडलं. तेव्हा आपल्याला कळल की ही दगडी पायवाट या मंदिराच्या मागच्या आवारात जाते. नेहमीप्रमाणे एका रात्रीत मंदिर पूर्ण करायचा घाट घालून पांडवानी मंदिर बांधायला सुरुवात केली पण सूर्याचा पहिला किरण येताच अर्धवट बांधलेले मंदिर सोडून अज्ञातात निघून गेले; कितीतरी शिल्पांच्या घाटीव वळश्यांना अर्थ न देताच. पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत तिष्ठणाऱ्या शिल्पांना जलाप्रवाहाने वेढून एका वेगळ्या सृष्टीत नेले. जलपर्णीच्या ओढाळ हातांनी सावरलं. रंगबेरंगी माश्यांनी मोहवलं. तिथल्या सुफळ कहाण्यांत अर्थ शोधितो आता पुन्हा स्वच्छ सूर्यप्रकाशात आल्या. आपण गेलो ही होतो ते मंदिर पाहायला. इतक्या वर्षांनी सूर्यप्रकाश पाहिलेल्या मुर्त्यांचे डोळे उगाचच मला मिचमिचे झाल्यासारखे वाटत होते. तीच आज माझी गत. झेपेल का मला स्वच्छ प्रकाशाची तिरीप. तू, तुझ अस्तित्व, सगळ मिटवून या मंदिराच्या मूर्तीत लपवून ठेवता आला तर?
हलके हलके पायऱ्या उतरत ती पाण्यापाशी आल. अजूनही निळ्या जांभळ्या ढगांचा कल्लोळ मिटला नव्हता. वाऱ्याच्या झोताने एक हळवी लाट निवळशंख पाण्यात उमटली आणि तिच्या पायाशी येऊन विरून गेली. सुखावून आपसूकच अजून एक पाउल तिने उचललं. अजून एक खालची पायरी. आणि मग त्या नंतरची एक.
सारंगा माझ्या मागे ठेविते निळी अंबारी
आपल्या भिंतीवर गॉगचे चित्र काढलस त्यातलं गव्हाचं शेत आणि तू जिथे कायमचा पहुडलास ते पिवळजर्द गवत सारखच वाटत होत मला. फक्त त्या चित्रातला आकाशाचा निळा रंग वेगळा. तिथे काळसर निळ आकाश आणि तू सापडलास तेव्हा तुझ्या नजरेत तरंगणार निळेभोर आकाश. मलाच उशिरा उमजल का रे? की तुला देखील उमजायाच्या आत तू निघून गेलास? काय गंमत आहे नाही, आता माझ्या डोक्यावरच अफाट सोनेरी आकाश पण तुझ्या त्या चित्रातल्या सारखच पिवळजर्द दिसतंय. आणि माझ्या पायात चुळबुळणार पाणी काळभोर निलगहिरं!... कुठली जमीन आणि कुठलं आकाश. शेवटी तुझी फ्रेम ऑफ
रेफरन्स अशी अधांतरीच बघ. ही आपली शेवटची एकत्र संध्याकाळ. बोलायचे ते बोलून घेऊ. नंतर सगळे मिटवून इथेच कुठेतरी खोल पाण्यात गाडून देऊ. पण जे काही सांगायचे ते आत्ता सांग..... बोल माझ्याशी...
गार पाण्याने शिरशिरी उमटली. दूरवर दिसणारी झाडांची टोक लांब झाली आणि संधीप्रकाशाला काळोख्या रात्रीचं काजळ लाऊन गेली. काहीतरी पाण्यात पडून चुबुक असा आवाज झाला. एक टिटवी कर्कश चित्कारली. आणि तिलाच कळल नाही कुठल्या पायरीवरून तिची पावले हलकेच निसटली.
समाप्त
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पंडित हृदयनाथ मंगेशकरांची “सारंगा परतून आली..” ही एक रचना आहे आणि कविता आहे ग्रेसची. मी कविता आधी कुठतरी वाचली होती तेव्हा मला वेगळाच अर्थ (जो कथेत आला .. असा मला वाटतंय तो ) भावला होता. आणि गाणं आहे चक्क लावणी.. मोर आणि लांडोर वगैरे.. आणि दोन्ही अर्थ सारखेच चपखल बसतात. कमाल ना!!
दिलगिरी. खर तर सगळे भाग मी एकत्र टाकले असते तर बर झाल असतं. पुढच्या वेळेपासून नक्की तसेच करेन.
प्रतिक्रिया
पाय कुठायत?? नै ओढायचे
पाय कुठायत??
नै ओढायचे नैयेत... पाया पडायचंय!
अतिशय चोक्कस, नी मनस्वी लेखन!
मराठी आंजावर उत्तम ललित लेखन कमी होऊ लागलं असेलही, पण असं काही येतं नी "झळाळून" सोडतं!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सुंदर शैली. वॅऩ गॉग आणि
सुंदर शैली. वॅऩ गॉग आणि त्याचं वेडपाखरु, पाखराचा वैचारिक प्रवास आवडला. जाणिव पुर्वक ओळींना दिलेलं italic वळन पण भावलं.
बुद्दीच्या स्तरावर 'हवं ते नको’ आणि "मला माझा रंग परत हवा आहे" दोन्ही वाक्ये अंतरंगाला स्पर्शुन गेले.भावुक करुन गेले.
सगळं समजुन काहीही न उमजणारे बरेच मोर-लांडोर दोन्हीही बघितलेले आहेत.
खरचं 'हवं ते हवं' आणि 'रंग परत' हवा असतो का?
फ्रेम ऑफ रेफरन्स बदलुन खरचं स्वच्छ प्रकाशाची तिरीप झेपेल का? स्वच्छ तिरीपात अर्थहीन जगन्याला नविन अर्थ देता येईल का? असो
म्हनुन तं बै म्हणतो,
"दु:ख अन स्वताहाले फसवनं ह्या मानसीक गरजाचं हाये म्हना मानसाच्या"
अवांतरः या पामराला वाचायला लेख फारच किचकट वाटला.
कं लिवलंय कं लिवलंय!!!! भारीच
कं लिवलंय कं लिवलंय!!!! भारीच एकदम!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ज्यांनी या ललितलेखनाचा चांगला
ज्यांनी या ललितलेखनाचा चांगला स्वाद घेतला, त्यांनी माझा हा प्रतिसाद न वाचलेलाच बरा.
एकूण कथेत दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे आणि जीवनाचा ते आनंद घेत आहेत असे दाखवले आहे. मग अचानक नायक जातो. जातो म्हणूजे पळून जातो, मरत नाही. ते ही काहीही कारण नसताना. कहर म्हणजे न सांगता जातो. नवलाची गोष्ट म्हणजे असे झाल्यावर प्रेयसी मुळीच चवताळत नाही. उलट आठवणी कुरवाळते. कहर म्हणजे विरहाने व्यथित होऊन पाण्यात सती जाते. हे मला काही झेपलं नाही. स्वीकार्य लिमिट म्हणजे आठवणी कुरवाळणे, मुळीच शंका न घेणे, इ. असे कोणी प्रत्यक्ष केले तर एखादेवेळेस मी जाऊ देईन. पण ते तळ्यात खोल खोल जात राहणं अस्वीकार्य वाटलं. तिथेही नक्की हून जीव दिला का हे कळत नाही, कारण पाय निसटला असे लिहिले आहे. ललित कसं लिहावं, कथेत पात्रांनी कसं वागावं हे अर्थातच लेखकाचं स्वातंत्र्य आहे, त्याचा सन्मान आहेच. पण ज्या काळातले, ज्या सामाजिक स्तरातले नायक नायिका आहेत ते पाहता एकून थीम पचली नाही. पण ते जीव द्यायचं वाक्य अगदी शेवटाला असल्यानं मी बाकी दर्जेदार लिखाणाचा स्वाद घेऊ शकलो.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अरुणजोशी आणि अस्मि असा एक
अरुणजोशी आणि अस्मि असा एक अक्ष बनतो आहे :-D.
पण नक्की नायक निघुन गेलाय की एक्झिट घेतलीय? "आपल्या भिंतीवर गॉगचे चित्र काढलस त्यातलं गव्हाचं शेत आणि तू जिथे कायमचा पहुडलास ते पिवळजर्द गवत सारखच वाटत होत मला. फक्त त्या चित्रातला आकाशाचा निळा रंग वेगळा. तिथे काळसर निळ आकाश आणि तू सापडलास तेव्हा तुझ्या नजरेत तरंगणार निळेभोर आकाश. मलाच उशिरा उमजल का रे? की तुला देखील उमजायाच्या आत तू निघून गेलास?" यावरुन एक्झिट घेतलीय असं वाटतय. तरीही दुःखी शेवट आवडला नाही. शब्दबंबाळ काहीतरी वाचल्यासारखं वाटल. कथाबीज खूप कमी आहे. नॉट माय टाइप एवढच म्हणेन.
लेखनशैली मात्र चित्रमय आहे. रोचक! लिहीत रहा
नक्की काय म्हणायचे आहे
@अरुण जोशी : नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला?? जरा विस्ताराने सांगा.
ओहो!!. तुम्ही असा गुप्त
ओहो!!. तुम्ही असा गुप्त प्रतिसाद दिलाय होय.. असो...
तुमच सगळ मला मान्य आहे.. पण मृत्यूवर कोणाचा ताबा??
मृत्यू कि पलायन
याचा अर्थ नायक निघून गेला आहे असा निघतो. मेला आहे असा निघत नाही. आणि तसाही मी फार चांगला अर्थ काढायला जातो म्हणून नायक मेला असं स्पष्ट लिहिलेलं दिसेपर्यंत मी सगळ गुडीगुडीच आहे असा अर्थ घेतला.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
@ऋषिकेश, सिफर ,बॅटमॅन
@ऋषिकेश, सिफर ,बॅटमॅन :धन्यवाद!
@अस्मि : प्रतिक्रियेबद्दल आभार!..
खर बघायला गेल तर दु:खी शेवट नाही आहे. तिच्या प्रियकराच्या मृत्यूनंतर तीच सैरभैर होणे साहजिकच आहे. काहीच न सांगता सावरता आपल्या जवळच्या व्यक्तीच जाणं याच्याशी डील करण अवघड आहे. पण म्हणून ती संपली नाही. एकदा तो आपल्या आयुष्यात नाही हे उमजून मान्य केल तर ती प्रश्नांच्या लांबलचक भेंडोळ्यातून बाहेर येईल पण येईल कदाचित.
दंडवत __/\__ आधीचे दोन्ही भाग
दंडवत __/\__
आधीचे दोन्ही भाग इतके दिवस बाजूला ठेवले होते. ज्यादिवशी समाप्त दिसेल त्यावेळेला सगळे सलग वाचायचे असं ठरवलं होतं. आज तीनही वाचले. मस्तं! मजा आली.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
आवडला
लिखाण प्रचंड आवडले. दंडवत!
अवांतरः
कविता ग्रेसची आहे असे लिहिले आहे पण प्रकाशकाचे नाव दिलेले नाही
घालावा आवर कसा वेगळाच सूर माझा
माझ्या तहानेच्यासाठी वेगळा पाऊस माझा.
तरल अन सुंदरच आहे.
तरल अन सुंदरच आहे.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...