रजा आणि विश्रांती
थकलात ? कंटाळलात? जरा विश्रांती घ्या. रजा घ्या.
विश्रांती घेउन थकला असाल तरी विश्रांतीमधून विश्रांती घेउ नका.काम करायला लागू नका.
फक्त अधिक विश्रांती घ्या. आराम करा. काम करुन लवकरच थकणार आहात.
कामातील बदल ही विश्रांती असते असं गांधीजी म्हणतात. असं काही वाचण्यात आलं तर सर्वप्रथम तुमच्या वाचनाच्या सवयीत बदल करा.
वाचनातून विश्रांती घ्या. मिळेल तिथून घ्या. ती फार काही केवढ्याला मिळेल असं नाही. तिची वेगळी थेट किंमत द्यावी लागत नाही.
किंवा किंमत देउन विकत नेहमीच घेता येत नाही. तुम्हाला जे मिळताहेत ते सोडणं म्हणजेच विश्रांती.
कामातून विश्रांती घेता तशी खाण्यातूनही घ्या. खाणं हीसुद्धा एक विश्रांतीच आहे, असं मानत असाल तर असं मानणं सुरु ठेवा. म्हणजे तुमची विश्रांती सुरुच राहिल.
सुरु राहण्यावरनं आठवलं , गाडी सुरु राहते ते ती अधून मधून थांबल्यामुळेच. त्यामुळे थांबत थांबत जा. किंवा नुसतेच थांबा . जाउच नका.
जाउन जाउन जाणार कुठे? तीच तीच स्टेशनं गाठून पुन्हा पहिल्याच स्टेशनाला यायचं असेल तर मुळात जायचं कशाला ?
जाण्यापेक्षा थांबणं चांगलं. गाडी चालत राहिल्यामुळे तिच्यावर प्रचंड खर्च होतो. गाडिनं चालायचच नाही म्हटलं की खर्चही नाही.
शांत, निवांत ती पडून राहू शकते. थंडगार स्थितप्रज्ञ लोखंडी रेल्वेचा डबा हा तुमचा आदर्श हवा.
अर्थात आदर्श हवा हे मुंबैत मोठ्यानं म्हणू नका. सी एम असाल तर खुर्ची जाइल. नसाल तर प्रमोशन होइल.
पण प्रमोशन केल्यावर काम करावं लागेल. विश्रांती गमावून बसाल.
तस्मात् , श्शsssss
शांत बसा.
निवांत बसा.
मला धरुन हाणायची इच्छा सोडून द्या आणि चार घटका आराम करा ; मलाही करु द्यात.
शुभप्रभात.
;)
--मनोबा
In Praise of Idleness
चांगले मनोगत. बर्ट्रांड रसेलचा लेख "In Praise of Idleness" जरूर वाचावा, असे सुचवावेसे वाटते.
किंवा कुत्र्याचाच बाष्कळ बडबड
किंवा कुत्र्याचाच बाष्कळ बडबड हा ब्लॉग वाचावा. विशेष करून 'राजपुत्र धृमणाचा धर्वणाश्रम'. कंटाळ्याचे हरण होईल याची ग्यारण्टी.
गाडी सुरु राहते ते ती अधून
गाडी सुरु राहते ते ती अधून मधून थांबल्यामुळेच.
अलिस लाल राणीला म्हणते 'या देशात सगळे लोक सारखे धावत का असतात?'
लाल राणी 'अगं, या देशात जागाच हलत असतात. त्यामुळे आपल्याला एकाच जागी राहण्यासाठीही धावत रहावं लागतं. कुठे जायचं असेल तर दुप्पट वेगाने धावावं लागतं'
अलिस 'हे फारच चमत्कारिक आहे. आमच्या देशात तर बुवा धावलं तर होतो त्यापेक्षा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जायला होतं'
मला हे वाचून तर वाटायला लागलं आहे की समजा धावत्या जगात आपण धावलोच नाही, तर कुठेतरी दुसरीकडे जाणं नाही का होणार? रिलेटिव्ह मोशन! आणि मागे जातोय असं वाटू नये म्हणून सरळ मागेच तोंड करून उभं रहायचं. म्हणजे मग काय चिंता नाय!
इतके होऊनही
मनोबा टंकण्यातून रजा/विश्रांती घ्यायला काही तयार नाहीत ! ;)
----
कंटाळ्यावरून एक अवांतर आठवले. अनेक वर्षांपूर्वी शफाअत खानांनी लिहीलेल्या 'क' नांवाच्या नाटिकेचे सादरीकरण आठवले. अद्वैत दादरकर आणि वीणा जामकर या कलाकारांनी केवळ अर्ध्या - पाऊण तासाच्या त्या नाटिकेत जबरा धमाल आणली होती. ( क = कंटाळा )
काय रे? काय झालंय नक्की? घरी
काय रे? काय झालंय नक्की? घरी सगळं ठीक आहे ना? काळजी घे हो...