Skip to main content

किरणोत्सर्ण, खाणी-अणुभट्ट्या आणि आरोग्य

'डॉन'मधे आज ही बातमी वाचली. भारतातील एकमेव युरेनियमच्या खाणीभोवतालच्या गावांमधे पाण्यातून रेडीयोअ‍ॅक्टीव्ह पदार्थांचा प्रादुर्भाव आरोग्यावर होऊ लागला आहे असे बातमीतील रिपोर्ट नमूद करतो. नुकत्याच झालेल्या फुकुशिमा येथील अणुभट्टीच्या दुर्घटनेमधे असा प्रादुर्भाव 'अपघात' किंवा 'नैसर्गिक आपत्ती' असल्यास होऊ शकतो हे जगाने पाहिले.
आपल्याकडे एकीकडे अणुभट्ट्यां उभारण्याची अहमिका लागलेली दिसते. दुसरीकडे स्वतःकडे एकही अणुभट्टि नसणारा ऑस्ट्रेलिया आपल्याला युरेनियम विकायला तयार आहे. मात्र त्याचवेळी, या बातमीवरून असे दिसते की अणुभट्टीतून/खाणीतून तयार होणार्‍या आण्विक कचर्‍याची विल्हेवाट लावणे आपल्याला जमत नाहिये किंवा ते शक्यच नाही. या बातमीवरून तुम्हाला काय वाटते?

  • आण्विक कचर्‍याची विल्हेवाट लावणे आपल्याला जमत नाहिये का? का या कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचे तंत्रज्ञान अजुन तरी तयार व्हायचे आहे?
  • इतर देशांत, जसे अमेरिका, युरोपिय देश जिथे मोठ्याप्रमाणावर अणुभट्ट्या आहेत तिथे हा कचरा कसा संपवला जातो?
  • भारताने अणुभट्ट्यांसाठी घाई करावी का पुन्हा एकदा इराण पाईपलाईनसारखे इतर पर्याय चोखाळायला सुरवात करावी?
  • मुळ प्रश्न पुन्हा उभारहातो: भारतात अणुभट्टी - अणूउर्जा हवी असे तुम्हाला वाटते का?

अर्थात चर्चा याच प्रश्नांवर सिमीत नाहि/नसावी. प्रश्न केवळ दिग्दर्शनासाठी आहेत. याशिवाय अश्या गळतीमुळे आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात? ते कायमचे असतात की त्यावर इलाज आहेत? याबद्दलही माहिती असल्यास ती द्यावी.

माझे मत मी चर्चेच्या ओघात देईनच.

नगरीनिरंजन Mon, 05/12/2011 - 14:15

किरणोत्सर्गाचे परिणाम, कचर्‍याची विल्हेवाट (जमिनीत गाडतात असे वाटते) आणि त्यावरचे उपाय याबद्दल फारशी माहिती नाही, पण भारताने या बाबतीत घाई करू नये असे वाटते.
सध्या तंत्रज्ञानाबाबत आपण स्वावलंबी नाही आहोत हे बाहेरच्या कंपन्यांना दिल्या जाणार्‍या कंत्राटांवरून दिसते. शिवाय आपले प्रशासन प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या नियमांबद्दलच्या काटेकोरपणाबद्दल कधीच प्रसिद्ध नव्हते. प्रशासन काटेकोर नसताना परकीय कंपन्या इथल्या लोकांच्या सुरक्षेबद्दल स्वखुशीने खर्च सहन करून काळजी घेतील अशी सुतराम शक्यता नाही.
तंत्रज्ञानात स्वावलंबी झाल्याशिवाय एका पेक्षा जास्त प्रकल्प हाती घेणे धोकादायक आहे.
पाण्याचे कमी प्रमाण आणि कोळशाचे महाग प्रकल्प यांच्यामुळे अणुऊर्जेला पर्याय नाही पण अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

मन Mon, 05/12/2011 - 15:08

In reply to by नगरीनिरंजन

त्याचे असे organised रूप सध्या नाही. अणुभट्ट्या वगैरे मिळाल्यावर त्याची reverse engineering करून ते सहज ५-७ वर्षात आत्मसात होइल असे वाटते.(बरीचशी लढाउ विमाने व काही मिसाइल्स भारताने व जगातील इतरही देशांनी अशी कित्येकदा "ढापलेली" आहेत.) पण.....
युरेनिअम हे जगभर वापरले जाणारे त्यातल्या त्यात किफायतशीर व सुरक्षित इंधन आहे.
तंत्रज्ञान आपल्याकडे व जगाकडेही युरेनिअम वापरायचे आहे. पण भारतात प्रचंड साठे थोरिअमचे आहेत.पैकी सर्वात मोठे साठे आहेत भारत्-लंकेदरम्यानच्या उथळ समुद्रात. इतके प्रचंड आहे की दीड्-दोन शतके पुन्हा दुसरीकडे पहायची गरज नको.पण सध्यातरी थोरिअम नीट किफायतशीररित्या process होउ शकत नाही. त्यावर केले जाणारे संशोधन अमेरिकन दबावाखाली थांबवले गेले असा आरोप स्व राजीव दिक्षित व RSS मधील काही व्यक्ती करीत असतात.

थोरिअमचे फायदे:-
१.शुद्धीकरणाची गरज नाही. मूळ रुपातच सर्वत्र भूमीवर उपलब्ध.त्यामुळे शुद्धीकरणादरम्यान होणारे अपाय/धोके आपोआप टाळले
जातात.
२.ऊर्जानिर्मिती दरम्यान chain reaction होण्याची नगण्य शक्यता.
३.युरेनिअम थोरिअमच्या निदान दहापट किरणोत्सारी कचरा निर्माण करते.

ह्यासर्व गोष्टीमुळे आरोग्याच्या/सुरक्षेच्या दृष्टीने तरी थोरिअम सर्वोत्तम. वर भारतात प्रचंड साठे आहेत, ते वेगळेच.
अडचण फक्त किफायतशीरपने त्यातून ऊर्जानिर्मिती करण्याची आहे.
माझा अंदाजः- भारतीय शास्त्रज्ञांचा प्रयत्न बाहेरचे जमतील ते सगळे तंत्रज्ञान व इतर गोष्टी जमवून त्यांचे थोरिअमशी लग्न लावण्याचा असेल्.जमल्यास उत्तमच.

अवांतरः-
१.भोपाळच्या वायूपिडितांचे काय झाले?
२.अणुभट्ट्यांनी खरोखर काही अपाय झाला तर पिडितास काही मिळेल ह्याची खात्री वाटते का?
३.स्वतःच्या घराजवळ असा प्रकल्प उभारायला खुशीने होकार देणार का?

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 06/12/2011 - 05:24

In reply to by मन

"थोरियममधून ऊर्जानिर्मितीसाठी संशोधन होण्यास वेळ लागेल आणि तेवढा वेळ युरेनियम वापरून आपण विकत घेत आहोत", अशा अर्थाचं विधान डॉ. अनिल काकोडकर यांनी २-३ वर्षांपूर्वीच केल्याचं त्यांच्या व्याख्यानात ऐकलं होतं. (विधान आठवणीतून लिहीलं आहे, शब्द अर्थातच माझे आहेत, पण अर्थ असाच काहीसा!) अमेरिकेच्या दबावाखाली आपण संशोधन करत नाही हा आरोप मला थोडा बालिश वाटतो, पण मला त्यातली फारशी माहिती नाही.

युरेनियमच्या खाणींमुळे पाणी खराब होत असेल तर पाण्याचा स्रोत बदलणे इष्ट नाही का? किंवा रहाण्याची जागा तरी? अर्थात या गोष्टी एका माणसाच्या, कुटुंबाच्या पातळीवर व्हाव्यात अशी अपेक्षा नसून संघटीतपणे व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. युरेनियमची खाण आहे याचा अर्थ जमिनीतच युरेनियम आहे; हे युरेनियम तिथे मनुष्य तयार होण्याच्या आधीपासूनच आहे. युरेनियमचं उत्खनन केल्यामुळे युरेनियम पाण्यात मिसळतं हे मला समजलेलं नाही; उलट तिथल्या जमिनीतून युरेनियमचं संयुग काढून घेतलं जातं आहे.
शीर्षकात युरेनियमची खाण असं म्हटल्यावर या बातमीत पुढे म्हटलं आहे की तिथे "वापरलेलं" युरेनियम तिथे 'डंप' केलं जातं. आता यातलं नक्की कोणतं म्हणणं खरं मानायचं? याचा नक्की अर्थ कसा लावायचा?

तिथल्या लोकांना त्रास होत नाही असा माझा दावा नाही पण माझ्या मते ही बातमी अर्धवट आणि म्हणून दिशाभूल करणारी वाटते.

१.भोपाळच्या वायूपिडितांचे काय झाले? हाल आणि अन्याय
२.अणुभट्ट्यांनी खरोखर काही अपाय झाला तर पिडितास काही मिळेल ह्याची खात्री वाटते का? सद्यस्थितीत फार आशा नाही.
३.स्वतःच्या घराजवळ असा प्रकल्प उभारायला खुशीने होकार देणार का? मी रहाते तो भाग दाट मनुष्यवस्तीचा असल्यामुळे अशा ठिकाणी असा प्रकल्प उभा करण्याचा विचार सरकार किंवा कोणतीही संशोधन संस्था किंवा कंपनी करणार नाही. विरळ वस्तीच्या भागात अणुभट्टीच काय, तेवढी जागा वापरता येत नाही हा वगळता इतर काही त्रास नसणारी रेडीओ दुर्बीण बांधण्यासाठीही विरोध झाला होता आणि त्याची एक बाजू मी समजू शकते. पण माझ्या घराखालीच युरेनियम, थोरियमचे साठे असतील तर मीच तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करेन. माझ्या घराखाली अगदी क्रूड तेल किंवा नैसर्गिक वायूसाठा सापडला तरीही मी तिथे रहाणार नाही.
विरळ वस्तीच्या भागात माझ्या घराखाली, गावात जर युरेनियम डंप करण्याचा निर्णय झाला आणि त्याबदल्यात माझी, माझ्या कुटुंबाची व्यवस्थित सोय झाली, आम्ही "कोयना किंवा नर्मदा धरणग्रस्त" झालो नाहीत तर कुरबूर करत का होईना मी घर सोडेन.

आपल्याला आवडो वा न आवडो, भारतात लोकशाही आहे. बहुसंख्य लोकांच्या भल्यासाठी अल्पसंख्यांना जास्त त्याग करावा लागणार. लोकशाही आहे म्हणून तिचे तोटे नाहीतच असं थोडीच आहे? अल्पसंख्य हे धर्म, जात, वर्ण, शिक्षण, लैंगिकता अशा मुद्द्यांवर ठरू नयेत एवढी अपेक्षामात्र लोकशाहीकडून आहे. लोकांच्या जमिनी घ्याव्यात आणि रेल्वे उभारावी, पण माझ्या अंगणातून रेल्वेरूळ जाऊ नयेत, लोकांच्या घराशेजारून फ्लायओव्हर बांधला तरी चालेल पण माझ्या घराजवळ नको असले प्रकार लोकशाहीत असू नयेत.

ऋषिकेश Tue, 06/12/2011 - 09:21

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

युरेनियमचे साठे असल्यास हा तर्क लागु पडावा.. मात्र युरेनियम वापरून उर्जानिर्मिती करताना कचरा मानवनिर्मित आहे. एखाद्याला किंवा समुहाने बहुसंख्यांच्या हितासाठी प्रकल्पग्रस्त असावे हे म्हणणे 'काहि प्रमाणात' ठिकही (सरकार योग्य मोबदला + पर्यवसन करत आहे हे गृहित). परंतू या प्रश्नाची व्याप्ती तिथे रहाणे इतपतच थांबत नाहि.
युरेनियममुळे पाणी --> पाण्यामुळे वनस्पती --> त्यामुळे शाकाहारी प्राणी वगैरे करत लांब वस्ती केली तरी त्याचे दुष्परीणाम भोगायला लागु शकतात. दुसरे असे की याचे परिणाम काहि कुटुंबांवर नसुन काहि पिढ्या बाघित होऊ शकतात.
तेव्हा इतर लोकोपयोगी कामे आणि अणुभट्ट्यांमधे तफावत करायला हवी कारण किर्णोत्सर्गाच्या परिणामांवर जर कंट्रोल ठेवणे फार कठीण असेल किंवा भारताकडे अजुन ते तंत्रज्ञान - know how नसेल तर जरा वाट बघणे मी श्रेयस्कर समजतो.

तिरशिंगराव Tue, 06/12/2011 - 20:33

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लोकांच्या घराशेजारून फ्लायओव्हर बांधला तरी चालेल पण माझ्या घराजवळ नको असले प्रकार लोकशाहीत असू नयेत.

पेडर रोडच्या फ्लायओव्हरला विरोध करणार्‍यांना मस्त शालजोडीतला हाणलाय.

युरेनियमच काय कुठल्याही रसायनाची संपूर्ण विल्हेवाट लावायचे तंत्रज्ञान पूर्णपणे विकसित झालाय. ते तज्ञांना माहित आहेच. पण ते करायला जो खर्च येतो तो करण्याची कोणाची तयारी नसते.' झीरो डिस्चार्ज' हे फक्त म्हणायला सोपे आहे.

Nile Wed, 07/12/2011 - 12:56

In reply to by तिरशिंगराव

युरेनियमच काय कुठल्याही रसायनाची संपूर्ण विल्हेवाट लावायचे तंत्रज्ञान पूर्णपणे विकसित झालाय.

या बद्दल अधिक वाचायला आवडेल.

नितिन थत्ते Mon, 05/12/2011 - 14:19

जपानमधील दुर्घटनेनंतर सध्या तेथील किरणोत्साराची परिस्थिती काय आहे?

ती ठीकठाक असेल तर पंचवीस वर्षांपूर्वीच्या तंत्रज्ञानात झालेल्या अपघाताला धरून निर्णय घ्यायचा असेल तर अवघड आहे.

नितिन थत्ते Tue, 06/12/2011 - 11:31

>>स्वतःच्या घराजवळ असा प्रकल्प उभारायला खुशीने होकार देणार का?

याचे उत्तर हो असे असेल. सध्या देवनार गोवंडी भागातले लोक अणुभट्टीच्या आणि इतर किरणोत्सारी संशोधनकेंद्राच्या बरेच जवळ दाट लोकवस्ती करून किमान ४०-५० वर्षे रहात आहेत. तीच गोष्ट तारापूरची. तारापूर किंवा इतर अणुभट्ट्यांच्या आसपासच्या प्रदेशात रोगराई कमी झाली आहे का याची माहिती मिळाली तर बरे होईल.

आनंद घारे Tue, 06/12/2011 - 20:02

"शकका इलाज हकीम लुकमानके पासभी नही है" अशी म्हण आहे. त्याचप्रमाणे "किरणोत्सार किरणोत्सार" म्हणून भुई धोपटत बसायचे ठरवणार्‍या लोकांच्या मनातले संशयाचे भूत काहीही करून दूर होण्यासारखे नाही. या विषयावर विपुल प्रमाणात शास्त्रीय माहिती उपलब्ध असतांना तिच्याकदे काणाडोळा करायचा आणि सांगोवांगी गप्पांवर विश्वास ठेवायचा असे ज्यांनी ठरवले आहे त्यांना काहीही सांगणे पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यासारखे आहे.