डाऊन वुइथ नॉस्टाल्जिया !
"गेले ते दिन गेले ! किंवा 'काय घोर कलियुग आले' या दोन्ही वाक्यांमधे तसं काही तथ्य नाही. प्रत्येक काळाचं काही अधिक-उणं असतंच. पण ते दिसण्यासाठी भूतकाळात गाडलेली नजर वर्तमानाकडे वळवायला तर हवी. आपल्याकडे मात्र सगळे उमाळे-उसासे जुन्या काळासाठीच राखून ठेवणारी मंडळीच जास्त. त्यांच्यासाठी स्मरणरंजन हेच मनोरंजन ! पण कोणतीही रेकॉर्ड जेव्हा "गतस्मृतिंना उजाळा" देण्याकरताच बनवली जाते तेव्हा तिच्यात "गुणवत्तेशी अपरिहार्य तडजोड" केलेली असणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही कितीही "अहाहा, ओहोहो" करा हो , अशा रेकॉर्डीतून फक्त 'खरखरच' ऐकायला येते हे त्रिवार सत्य आहे. "
- मुकेश माचकर , प्रहार दिवाळी २०११
"छान छान वाचून मराठी वाचकांच्या किमान तीन पिढ्या सुस्त आणि समाधानी झाल्यात. या पिढ्यांनी आपल्या शूर , भोळ्या , कौटुंबिक, परंपरानिष्ठ पूर्वजांचं अचिकित्सक कौतुकच केलं. आजची चौथी पिढी हेच करताना पाहून काळजी वाटते. मरठी साहित्यातलं आठवणींचं चेटूक जबरदस्तच आहे. जगण्याचं आणि लिहिण्याचं मूलगामी भान मराठीत फारसं कुठे दिसत नाही."
विश्राम गुप्ते , अक्षर दिवाळी २०११
मागच्या एका लेखात म्हण्टल्याप्रमाणे , दिवाळी अंकांमधून विविध क्षेत्रांमधे कुठले वारे वहात आहेत, कुठले मतप्रवाह जोमदार आहेत, वेगवेगळ्या वर्तुळांमधे , स्तरांमधे कसली घुसळण चाललेली आहे याची एक झलकच पहायला मिळते , तशी यंदाही मिळाली हे वेगळे सांगणे नलगे.
उपरोक्त दोन उधृतांमधून, "नॉस्टाल्जिया" या तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या व्यसनावर संक्रांत आलेली आहे असं समजायला हरकत नाही. दोन्ही लेखांचा सूर , त्यांची उद्दिष्टे, त्या लेखांची व्याप्ति किंवा खोली निरनिराळी आहे ; परंतु त्यांनी पकडलेली दुखरी नस एकच आहे असं म्हणता येईल.
माचकरांचा लेख हा सरळसरळ शिरिष कणेकरादि लेखकांच्या - आदि वगैरे कशाला , कणेकरांच्याच ! - स्मरणरंजनाने ओतप्रोत भरलेल्या, स्मरणरंजन हाच ज्याचा आत्मा आहे आणि स्मरणरंजन हाच ज्याचा सालंकृत देह आहे अशा लिखाणावर आलेली एक तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया आहे. मनाने पन्नास-पंचावन्न सालाच्या पुढे न सरकलेल्या , लता-आशा-रफी यांच्यापुढे शास्त्रीय, फिल्मी, गैरफिल्मी , उपशास्त्रीय , कुठल्याही प्रकाराची दखल न घेणार्या , मुख्य म्हणजे आपल्या आवडत्या विषयाच्या बाहेरचे (सिनेमातले आणि संगीतातलेच नव्हे तर जीवनातलेही !) जे काही घटक असतील त्या सर्व घटकांबद्दल अत्यंत कुत्सितपणे बोलणार्या प्रवृत्तींवर कठोरपणे हाणलेला "प्रहार" असंच या लेखाचं वर्णन करावं लागेल.
माचकरांच्या या मूर्तीभंजक - किंवा खरे सांगायचे तर मूर्तीपूजकभंजक - लेखामागची भूमिका सहज समजण्यासारखी आहे. कणेकर आणि त्यांची भ्रष्ट नक्कल करणार्या अभिजित देसाई आदि लोकांनी गेली तीनेक दशकं मराठी पत्रकारितेमधे केवळ पन्नासच्या दशकाच्या नावाने जो धुमाकूळ घातला त्याची सगळी कटुता या लेखात आलेली आहे. इतरांवर काटेरी, कुत्सित विनोद करणार्यांच्या पदरात त्यांनी पूर्ण माप घातलेलं आहे.
विश्राम गुप्त्यांच्या लेखाचा पैस मात्र बराच मोठा आहे. त्यांची दृष्टी एकंदर मराठी साहित्यातल्या एका महत्त्वाच्या पैलूवर आहे. त्यांनी दिलेली उदाहरणं , मांडलेले मुद्दे या सार्यातून त्यांनी केवळ मराठी साहित्याच्या स्थितीवर कोरडे ओढण्याचय उद्दिष्टाने त्यांनी तो नक्कीच लिहिलेला नाही हे स्पष्ट आहे. त्यांच्या लेखाचं शीर्षकच मुळी "आठवण" असं आहे. आठवणींचं आपल्या आयुष्यातलं स्थान , त्याचे जीवशास्त्रीय (न्यूरोलॉजिकल ) संदर्भ , या प्रकाराचा जागतिक साहित्यात केला गेलेला वापर , मराठी साहित्यात त्या प्रकाराने मांडलेलं ठाण या सार्याचा सविस्तर उहापोह लेखात आहे. "आठवण्याची ही प्रक्रिया किती खोलवर असू शकते याचं सर्वश्रेष्ठ जागतिक उदाहरण म्हणजे मार्सेल प्रूस्त या एकोणीसाव्या शतकातल्या फ्रेंच कादंबरीकाराची सप्तखंडात्मक 'इन सर्च ऑफ लॉस्ट टाईम" ही महाकादंबरी" हे गुप्ते सांगतात आणि त्याचे बारकावे पुरवतात . हे सगळं सांगताना "विवेकाची पुनर्रचना" यांसारख्या गोष्टींच्या खोल पाण्यात गुप्ते शिरतात. आजवरची मराठी अभिरुची ही कशी पूर्वसुरींच्या पराक्रमांच्या , त्यांच्या गुणगानात बुडलेली आहे हे ते दाखवतात आणि या वरचा उपाय म्हणजे कोरडारुक्ष, कलाविहीन वास्तववाद असं वाटत असेल तर हाही अपुराच आहे असं विदित करतात. त्यांच्या शब्दात सांगायचं तर -
"वास्तवात खोलवर डोकावून बघा" असा नव्या शतकाच्या साहित्याचा अजेंडा आहे. जे देय वास्तव आहे त्याच्या पोटात शिरा. सूक्ष्म व्हा आणि बघा, वरवरचं वास्तव किती फसवं आहे, त्याच्या आठवणी किती भ्रामक आहेत हे कळतं. वास्तवाला भेगा आहेत. तिथे सत्य लपलेलं असतं हे लक्षात घेतलं की वास्तववाद खोटा वाटू लागतो तो सत्याचा पर्याय ठरू शकतो.
एकंदरीत काय तर गुप्ते आणि माचकर , दोघांचेही लेख डोळे उघडणारे आहेत. आपली एखादी सवयीची - आणि त्यामुळे हक्काची वाटू लागलेली - कारपार्किंगची जागा असाअवी , जिच्यावर वर्षानुवर्षं आपण पार्क करत असू, अशा ठिकानी अचानक नो पार्किंगची पाटी लागावी आणि आपण संभ्रमात पडावं तसं या स्वरूपाचं लिखाण वाचताना होऊ शकतं. मराठी साहित्यातल्या सर्वात मोठ्या स्मरणरंजनकाराची - पु ल देशपांड्यांची आठवण आल्यावाचून रहात नाही. इतकंच काय , आपल्या शिळोप्याच्या , एकांताच्या , कंटाळवाण्या स्थितीमधे गुणगुणलेली हजारो गाणी , आठवलेल्या गोष्टी , व्यक्ती, प्रसंग या सार्याच्या खजिन्याचे मूल्य काय असा काहीसा हृदयद्रावक प्रश्न मनात येतो. ( असा प्रश्न हृदयद्रावक वाटणे हेही दोषास्पद ठरेल काय हेही विचारणे क्रमप्राप्त होतेच !)
स्मरणरंजन सोडा , पणा स्मरण - आठवणी - ही तर एक प्रतिक्षिप्त क्रियाच आहे. शि़ंक , जांभई यांसारख्या गोष्टींसारखी आठवण येते. त्यांचा पदर सुटणे प्रायः अशक्य आहे. परंतु इतर जीवशास्त्रीय , इम्प्लसिव्ह क्रियांप्रमाणेच , याही गोष्टीचा बडिवार हा एकंदर विवेकी जगण्याशी , वर्तमानातल्या गोष्टींच्या भानाशी, त्यांचा आनंद घेण्याशी , त्याना समजून घेण्याशी , प्रसंगी त्यांचा सामना करण्याशी विसंगत ठरतो, नवं निर्माण करण्याच्या प्रेरणेच्या मुळाशी येतो हे अशा लेखांमधून वाजणार्या पडघमांमधून समजून घ्यायला हवं.
अशी मते ऐकून डोळे उघडले
अशी मते ऐकून डोळे उघडले नाहित.. स्मरणरंजन करणे-आवडणे म्हणजे इतर गोष्टी न करणे-आवडणे असा होत नाही
काहिंचा भुतका़ळच असा असतो की त्यांना तो स्मरून आनंद मिळत नाही त्यांची गोष्ट निराळी.
बाकी, फ्याशन असल्याप्रमाणे येनकेनप्रकारेण जो उठतो तो पुलंवर, किंवा त्यांच्या शैलीवर टिका-टिप्पणी करतो मात्र एकालाही लोकांना त्याहीपेक्षा हसवणारं, निरिक्षणात्मक, मार्मिक लिहिणं जमत नाहि - अजुन तरी जमलेलं नाही.. तेव्हा तोपर्यंत असे लेखन त्यांच्या स्मरणाशिवाय आले असते तर अधिक अपिलिंग वाटले असते. असो.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+१
ऋ शी करड्या अक्षरांबाबत सहमत.
जसा जसा मोटह मोटह होतोय तसे तसे असे लोक अमेक भेटतात. त्यांचे म्हणणे एकच
"छ्या.. हे काय लिखाण आहे. हे असं नको".
"अरे प्राण्या, असं नको" म्हणण्यापेक्सह "कसं हवं" ते सांग ना.
उप्लब्ध साहित्यापैकी मला जे उत्तम वाटेल तेच मी घेणार ना. "हे वाईट, तर मग कसं हवं" ते विचारल्यावर मग "तसं म्हणजे मराठित काहिच नाही." असे हे सांगतात.
हे म्हणजे देशात "देशी दारुचे गुत्ते प्रचंड झालेत. थोडी दर्जेदार इथे असायला हवी." अशी तक्रार करण्यासारखे आहे. अरे तक्रार असेल तर तूच यथाशक्ती काही कर ना रे बाबा. शंख करिऊन त्रास कशाल द्यायलास?
थेट बोलायचे तर असे म्हणता येइल की मराठित समजा प्रामुख्याने शं ना नवरे, विआ बुआ हेच किंवा ह्यांच्यासारखेच इतरजण लिखाण करताहेत. ह्यांच्या लिखाणाच्या खोलीचीही इथल्यांना कल्पना आहेच. आता "हे सकस नाही होSSSSS" अशी बोंब मारण्यात काय हशील ते मला समजत नाही.
द मा मि किंवा जी ए हे जन्मभर असलीच समिक्षकी बोंब ठोकत बसले असते, तर त्यांच्यामुळे आमच्या मराठिला जो भिन्न भिन्न प्रकारचा आयाम, वपु,पुल ह्यांच्यापेक्षा वेगळं असं काही मिळालय, वपु पुल ह्यांचा साचा घेउन पुढची लेखकुंची पिढी बनाय्ची टळलीय तो कधीच मिळाला नसता. नुसते दोन किरकिरे समीक्षक मिळाले असते.
समीक्षक आहात ना म्हणे? जगभरचं वाचलय ना म्हणे? मग वेळ तक्रारी करण्यापेक्षा योगदान देण्यात लावा की. स्वतःची अशी काही प्रतिभा शिरवाडकरांच्या तोडीची सगळ्यांनाच मिळते असे नाही, हे मान्य. पण जे उत्तमोत्तम सापडलय, ते जमेल तितके प्रभावीपणे पोचवा की तुमच्या भाषेत,(जिच्याबद्द्ल चिंता असल्याचे तुम्ही बोलताय).
वीणा गवाणकर करते ना, शर्मिला गाडगीळ करते ना, तुम्हीही करा की.
कुठल्या तरी समीफुलराणी""ती फुलराणी"चा पहिलाच तूफान रंगलेला प्रयोग बघून उद्गार काढले "छ्या. हे कसले आलेय पिग्मॅलियन चे रुपांतर. ह्या शॉ कुथेच दिसत नाही, दिसतो तो त्याचा फक्त मुडदा."
असे का? ह्या "मुडद्या"पेक्षा अधिक समग.(अभिजन्-बहुजन संस्कृती वादावरचे)सध्या मराठित किती नाटके, एकांकिका आहेत हे सांगा की मग.
असो. फार होतय. उगाच माझी अक्कल किती हे जगाला समजायच्या आत आपली सव्वा लाखाची मूठ पुन्हा झाकून घ्यावी हे उत्तम.
इथेच थांबतो.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
सहमत
>>>समीक्षक आहात ना म्हणे? जगभरचं वाचलय ना म्हणे? मग वेळ तक्रारी करण्यापेक्षा योगदान देण्यात लावा की. स्वतःची अशी काही प्रतिभा शिरवाडकरांच्या तोडीची सगळ्यांनाच मिळते असे नाही, हे मान्य. पण जे उत्तमोत्तम सापडलय, ते जमेल तितके प्रभावीपणे पोचवा की तुमच्या भाषेत,(जिच्याबद्द्ल चिंता असल्याचे तुम्ही बोलताय).<<<
थोडे अवांतर होते आहे (कदाचित) पण वरील वाक्यांशी २००% सहमत! Mainstream जे काही आहे ते कसे भिकार, उथळ इ.इ. हे सांगण्यासाठी शब्दांचा कापूस लीलया पिंजणार्या या प्रजातीला स्वतःच्या म्हणून काऊचिऊच्या गोष्टीदेखील लिहिता येत नाहीत. लिहिणारे लिहिताहेत, वाचणारे वाचताहेत, नाही आवडले तर सोडून देताहेत. ही जमात मात्र सदैव काठावर उभी राहून पिंका टाकत राहणार.
कसे काय?
(क्षमस्व. खरडवही उपलब्ध असती, तर तिथे स्पष्टीकरण विचारले असते. प्रतिसाद वाचल्यावर -१ श्रेणी दिल्यास हा प्रतिसाद मिटवता येईल.)
समीक्षक प्रजातीचे म्हणणे कमी वजनाचे कसे? त्यांना काऊचिऊच्या गोष्टीसुद्धा लिहिता येत नाही, या तपशिलामुळे त्यांच्या मताच्या वजनात काय फरक पडतो?
(फरक पडतो हे मला मान्य आहे. पण अन्यत्र तुम्ही मला समजावत होता, की रंगकर्मी व्यक्तीने नाटकाच्या तंत्राबद्दल व्यक्त केलेले मत आणि बिगररंगकर्मी व्यक्तीने नाटकाच्या तंत्राबाबत केलेले मत यांच्यात वजनाचा फरक करू नये. लेखनात कौशल्य नसलेल्याने लेखनाबाबत व्यक्त केलेले मत हे लेखनात कौशल्य असलेल्याने व्यक्त केलेल्या मतापेक्षा कमी प्रतीचे आहे ("काठावर उभे", "पिंका" वगैरे शब्द अप्रियता-दर्शक शब्द आहेत), असा तुमचा अनुभव आहे. तर जे लेखनकौशल्याला लागू आहे, तसे नाट्यकौशल्याबाबतही समांतररीत्या लागू करता येईल का?)
त्यांना काऊचिऊच्या
हे मात्र पटले. एखाद्या कलेवरती टीका ही फक्त त्या कलेत नैपुण्य मिळवल्यानेच करावी हा दुराग्रह आहे. "मताच्या वजनात फरक पडत नाही" या अभिप्रेत/अध्याहृत असलेल्या धनंजय यांच्या मताशी मी सहमत आहे.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
छ्या.. हे काय लिखाण आहे. हे
अगदी हेच्च मनात येतं. पण ते अवघड असतं ना. नीट शब्दांची जुळवाजुळव, आपल्या भाषेत, करुन काय आवडत नाही अथवा आवडते हे सांगणे परीश्रमाचे काम असते. त्यापेक्षा मोघम टीका सोपी असते. माचकरांच्या लेहात म्हटल्याप्रमाणे, विश्लेषण न करता फक्त शब्द्चकल्या पाडणे.
मन इथे मी तर म्हणते त्या महाभागाने, शॉ ने लिहीलेल्या "पिग्मॅलिअन" ची कोणती बलस्थाने त्या वविक्षित मराठी नाटकात गाळली गेली, त्यावर थोडा प्रकाश टाकला असता तरी चालून जावं. पण हे महाभाग ते करत नाहीत. अन मान्य आहे की पिंका टाकणं सोप्पं असतं. काय आवडले-नावडले त्याची नस पकडणं मुष्कील असतं. शॉ कुठेच दिसत नाही , दिसतो तो त्याचा मुडदा वगैरे शब्दफेकीमध्ये मला तरी "नेम-ड्रॉपिंग" चा भाग अधिक वाटतो म्हणजे आपण शॉ वाचले आहे हे कळकळीने लोकांपर्यंत पोचवण्याचा दांभिकपणा वाटतो.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
मराठीतील लिखाण हे एक साचलेले डबके
मराठीतील लिखाण हे एक साचलेले डबके झाले आहे हे श्री राजन खान ह्यांनी आधीच सांगितले आहे.
डबक्याचे विश्लेषण करत बसल्याबद्द्ल गुप्ते व माचकर ह्यांचे कौतुक करावे काय?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मराठीतील लिखाण हे एक साचलेले
मराठीतील लिखाण हे एक साचलेले डबके झाले आहे हे श्री राजन खान ह्यांनी आधीच सांगितले आहे.
डबक्याचे विश्लेषण करत बसल्याबद्द्ल गुप्ते व माचकर ह्यांचे कौतुक करावे काय?
आता कोणीही उठून मराठी लिखाणाला डबके म्हणावे काय? डबके म्हणणाऱ्या माणसाची मराठी साहित्यातील कर्तबगारी काय?
कर्तबगारीचा प्रश्न
"डबके म्हणणाऱ्या माणसाची मराठी साहित्यातील कर्तबगारी काय?"
~ असा खरेतर प्रश्न उद्भवू नये, प्रसाद. म्हणजे असे की घटनेने दिलेल्या भाषण/लेखन/विचारव्यक्ती स्वातंत्र्याच्या आधारे जर व्यक्तीने एखाद्या विषयाबाबत/घटनेबाबत मत मांडले असेल तर त्याचा तो हक्क आहे. {हां -- भाषेच्या मांडणीविषयी त्याला दोष देता येईल}. सचिनविषयी एक क्रिकेटप्रेमी असे म्हणाला, "क्काय तुमचा तेंडुलकर, च्यामारी ९४ वर आऊट झाला. साधा शॉट मारला असता तरी चाल्ले असते." ~ आता इथे त्या प्रेमीला 'लेका तुझी क्रिकेटमधील काय कर्तबगारी. तू मारून दाखव बघू तसला साधा शॉट !" असे म्हणता येणार नाही. कारण सचिनने "चांगलेच खेळले पाहिजे" ही त्या प्रेमींची मागणीच असते. त्याच न्यायाने जर श्री.राजन खान याना 'मराठीतील लिखाण हे एक साचलेले डबके झाले आहे' असे वाटते याचा अर्थ त्याना मराठी भाषेविषयी आत्मियता आहे आणि सध्याच्या तिच्या स्थितीविषयी ते असमाधानी आहेत असा होतो. त्यामुळे त्यांची साहित्यातील कर्तबगारी ती काय असा प्रश्न अनुचित आहे असे माझे मत आहे.
अशोक पाटील
आपल्या मताचा आदर आहे.
आपल्या मताचा आदर आहे.
मुसुंनी उल्लेखलेल्या दोन्ही
मुसुंनी उल्लेखलेल्या दोन्ही प्रतिक्रिया अगदी रास्त आहेत.
पण -
नॉस्टॅल्जिया - आठवण - भूतकाळ या घटकाला आयुष्यातून इतक्या सहजी हद्दपार करण्याची आवश्यकता आहे का, आणि तसं पूर्णत: करणं शक्य आहे का असे प्रश्नही तत्काळ पडलेच. एकदा एखादा अनुभव घेतला की त्याची स्मृती असते, स्मृती असते तोवर तुलनाही अपरिहार्यपणे असतेच. तुलना करायची नसेल, तर उद्मेखून तसा प्रयत्न करावा लागतो, जी एक प्रतिक्रियात्मक कृती ठरते, नैसर्गिक नव्हे.
अर्थात वर उल्लेखलेले दोन्ही लेख म्हणजे स्मरणरंजनाची अतिरेकी व्याप्ती आणि इतर नवीन, समकालीन अनुभवांच्या आविष्काराचा अभाव या दोहोंना दिलेली काहीशी तीव्र प्रतिक्रिया आहे हे मान्य आहे. पण हेही दुसरं टोकच आहे. नेहमीप्रमाणेच - वास्तव या दोहोंच्या मधे कुठेतरी असू शकेल, याचं भान सुटू नये.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
सॉरी - पटले नाही
मुक्तसुनीत यांच्यासारख्या विचक्षण वाचकाने "गुप्ते+माचकर वाचून डोळे उघडले" असे म्हटल्याचे वाचून फार वाईट वाटले. साहित्य असो वा संगीत - इतकेच काय पण ललितकलेअंतर्गत येणार्या सर्वच घटकांशी तुमचा परिचय खास वरच्या दर्जाचा आहे (च) हे तुमचे जालीय मित्रही मान्य करतात, त्यात तथ्य आहे असे माझ्यासारख्या नवख्यालाही पटते. मग असे असताना रुपये २५०/- अशा क्षुल्लक मानधनावर लिहिल्या गेलेल्या गुप्ते माचकरांच्या लेखातून असे काय ब्रह्मज्ञान मराठी वाचकाला मिळावे की ज्यामुळे त्याने 'डोळे उघडले' म्हणावे ?
बरे त्यातही मुकेशराव टीका करणार शिरिष कणेकरासारख्या अशा लेखकाच्या आठवणीच्या सवयीवर की ज्याचे ते हक्काचे दुकान आहे आणि त्या दुकानातून माल घेणारे संपादक सांप्रत महाराष्ट्र देशी बक्कळ संपादक असल्याने कणेकरसुद्धा त्याच रश्श्यात दरवर्षी नेमाने पाणी वाढवून ते रसायन ढवळत बसतात. ते आणि अभिजित देसाई यांच्यासारखे बारमाही लेखक स्वत:च्या मताने किती आणि साप्ताहिकी संपादकांच्या रेट्यामुळे किती लिहितात हा संशोधनाचाही विषय नसल्याने त्यांच्या लिखाणावर प्रबंधात्मक लिहिण्यासारखेही काही नसते. त्यामुळे माचकर जे मतप्रदर्शन करतात त्यावरही कसला विचार करावा ?
दिवाळी अंकातील मतप्रदर्शने 'आला वारा, गेला वारा' अशा टाईपची असल्याने त्याकडे गंभीरपणे पाहू नये असे मी गेल्या चाळीस वर्षाच्या दिवाळी अंकांच्या वाचनातून शिकलो आहे.
अशोक पाटील
असहमत. दिवाळी अंकातून बर्याच
असहमत.
दिवाळी अंकातून बर्याच आगामी मराठी पुस्तकांची पहिली पावले उमटतात. बर्याच भूमिका मांडल्या जातात. मराठी सारस्वतातल्या (हां, आता हे जे काही तेच किती उथळ, बिनमहत्त्वाचे आणि बुडबुडासदृश आहे आणि त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करावे असे म्हणणार असलात, तर बोलणेच खुंटले) बर्याच हवाबदलांची चाहूल तिथे लागत असते.
खेरीज माचकर आणि विश्राम गुप्ते हे दोन्हीही लेखक असे वार्यावर उडवून लावण्याइतके हलके-फुलके आणि निव्वळ मनोरंजक आहेत, असेही मला वाटत नाही.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
परत छापला गेल्यामुळे
परत छापला गेल्यामुळे प्रकाटाआ.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
असेच अप्रूप
असेच. गुप्ते-माचकर जे सांगताहेत त्यात नवीन काही नाही. पण श्री. मुक्तसुनीत ह्यांच्यासारख्या विचक्षण वाचकाचे डोळे उघडण्यासाठी गुप्ते-माचकर ह्यांचे दिवाळी अंकातले लेख उजाडावे लागले ह्याचे मोठे अप्रूप. मराठी वाचकांची आणि रसिकांची अभिरुची अत्यंत सीमित आहे आणि ते नवे काही स्वीकारत नाहीत हा आक्षेप किंवा निरीक्षण बाबा आदमच्या जमान्यातले झाले. किंबहुना श्री. मुक्तसुनीत ह्यांनी सामान्य वाचकाच्या भूमिकेतून लिखाण केले असावे.
लेखात मांडलेले विचार अतिशय
लेखात मांडलेले विचार अतिशय पटले, किंबहुना माझ्या मनात कधीकधी उमटून गेलेल्या विचारलहरींचेच दृष्यरूप वाटले.
जुन्या गोष्टींच्या, गतकाळातल्या घटनांच्या आठवणीने उमाळे काढणारे लेखन हमखास लोकप्रिय झालेले दिसते. अगदी फेसबुकावर "कट्ट्याच्या" आठवणींनी रडणारी कविता लोक भराभर कॉपीशेअर करताना दिसतात.
"आठवणीतलं गाव, "आठवणीतल्या वाटा", "आठवणीतली गाणी" हे हमखास टाळीखेचक विषय आहेत.
यात काही वाईट आहे असे नाही पण त्या मानाने वर्तमान किंवा भविष्याकडे बघणारे विचार, लेखन अगदीच तुटपुंजे आहे आणि बहुतेकवेळा अशा विचारांना तितकासा प्रतिसाद मिळत नाही हे सत्य आहे.
यात पुलंच्या लेखनालावर टीका करण्याची गरज नाही कारण त्यांचे लिखाण स्मरणरंजनात्मक असले तरी त्याचा अतिरेक तेव्हा नव्हता. तो आजकाल मात्र झाला आहे. किंबहुना कणेकर, देसाई, संझगिरी या व यांच्यासारख्या लोकांनी ती शैली ताणून तिचा अतिरेक केला आहे आणि अनेक होतकरू लोकही करत आहेत.
संझगिरी??
संझगिरींचे नाव पाहून आश्चर्य वाटले. ते देशोदेशीच्या प्रवासाबद्द्ल जे लिहितात ते फारच ओघवते वाटले.
कणेकर कधी कधी "लता-आशा-ओपी"च्या नावाने गळे काढून वैताग आणतात, तसे संझगिरींचे वाटले नाही.
त्यांचे छोटेखानी, सुटासुटीत लेख तर आपल्याला आवडतात ब्वा.
अगदि प्रवासवर्णनावर ढीगबह्र (टुरिस्ट गाइड सदृश) पुस्तके लिहिनार्या मीना प्रभूंपेक्षा तरी नक्कीच आवडतात.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
संझगिरींचे नाव पाहून आश्चर्य
हो. त्यांनी प्रवासाबद्दलच लिहावे. क्रिकेटर्सबद्दल लिहायला लागले की त्यांचा नॉस्टॅल्जिया उफाळून येतो. मग पार कोण तो व्हिक्टर ट्रंप किंवा डॉन ब्रॅडमन आपल्या रोजच्या बैठकीतला असावा असं ते लिहीतात.
एखादी सवयीची - आणि त्यामुळे
एखादी सवयीची - आणि त्यामुळे हक्काची वाटू लागलेली - कारपार्किंगची जागा असाअवी , जिच्यावर वर्षानुवर्षं आपण पार्क करत असू, अशा ठिकानी अचानक नो पार्किंगची पाटी लागावी आणि आपण संभ्रमात पडावं तसं या स्वरूपाचं लिखाण वाचताना होऊ शकतं.
>>>>>>>>>>
हे अतिशय आवडलं. आणि लेखही. नॉस्टाल्जिया वाईट नसला तरी त्याविषयीचे विचार जे मांडलेत त्यात तथ्य नक्कीच आहे. नॉस्टाल्जिया वाईट नाही, पण त्याने नवीन काही बनण्यात बोळा बसणं हे नक्कीच वाईट.
गुप्तेंचा लेख
मी माचकरांचा लेख अद्याप वाचला नाही कारण प्रहारची प्रत जालावरून मागवता आली नाही - पण अक्षर मधल्या लेखात पु.लं चा अजिबात उल्लेख नाही. मुक्तसुनीत यांनी सांगितल्याप्रमाणे "आठवण" या कल्पनेचा साहित्यिक व्याप खूप मोठा असला, व अधिक व्यापक आणि पैलूदार होण्याची शक्यता असली, तरी मराठी साहित्यात ती "स्मरणरंजना" च्या शैलीत अडकली आहे असे त्यांचे मत आहे. पण हे मत मांडून हे पैलू कसे खुलू शकतील हे ते रोचक पद्धतीने मांडतात. मेमरी आणि नॉस्टॅल्जिया मध्ये केलेला फरक आणि त्यातून उद्भवू शकणार्या नवीन वास्तविकतेवरचे विचार विचारप्रवर्तक आहेत.
मी फार वर्षे दिवाळी अंक वाचत नाहीय, पण या वर्षीचे अंक मला तरी अगदी टाकाऊ, फॅक्टरीतून ओकलेले वाटले नाही. गुप्तेंनी जाता जाता एकाच वाक्यात स्वामी आणि हिंदू ह्या दोन कादंबर्या एकाच संचात बसवल्या आहेत ते मला पटले नाही - अधिक उदाहरणे दिली असती तर बरे झाले असते असे आधी वाटले. पण लेखाचा उद्देश्य वेगळा आहे असे मग जाणवले - एडमंड हसर्ल या विचारवंताचा "फेनॉमेनॉलॉजी" वर आधारित, वर्तमानाचे भान राखून आठवणींतल्या "सत्याचे" उत्खनन कसे करता येईल, आणि स्मरणरंजनापलिकडे जाता येईल, यासाठी एक ताजी वाट शोधू पाहतो.
लेख वैयक्तिक अजेंडा धरून, किंवा घाईत मानधनासाठी लिहीला आहे असे मला तरी वाटत नाही - उलट या वैचारिक चौकटीबद्दल अधिक चर्चा व्हायला हवी असे वाटते. आठवण ही व्यक्तीलाच झाली, आणि सहसा होत असली तरी, तिची धडण वैयक्तिक नसून सामाजिक असते (आणि सामाजिक म्हणजेच राजकीय - सत्तासंबंधाच्या अर्थाने - ही हे ओघाने आलेच) हा विचार ही अनेक समाजशास्त्रज्ञांनी मांडला आहे. ही घडण साहित्यातून होतेच, पण तिचे भौतिक, भौगोलिक स्वरूपही असते. न्यूरॉन्स मध्ये दडलेल्या आठवणी बाह्य, सांस्कृतिक रूप कसे घेतात, आणि बाह्य सांस्कृतिक घडामोडींमुळे वैयक्तिक आठवणी कशा आकार घेतात हा गुंतागुंतीचा विषय आहे. ही देवाण घेवाण मानसशास्त्रज्ञ, तसेच मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, समीक्षक सगळ्यांच्या अभ्यासाचा विषय राहिली आहे.
उदा. हिटलरच्या हाते ज्यूंच्या कत्तलीची आठवण, किंवा भारतीय उपखंडातल्या फाळणीच्या कत्तल-बलात्काराच्या आठवणी पुढच्या पिढ्यांपर्यंत कशा पोहोचल्या आहेत? त्या वणव्यातून वाचलेल्या लोकांच्या वैयक्तिक आठवणींतून - त्यांनी जे सांगितले, लिहीले, आणि ज्यावर शांतताच बाळगली यावरून? की साहित्याचा आधार घेत भीषण वास्तवाचे कथास्वरूप दर्शन घडवणार्या लेखनातून? सर्वांचेच अनुभव काहीसे निराळे असले, तरी यातून एक सामाजिक, किंवा सामुहिक स्मृति कशी तयार होते? तिचे 'सत्य' कसे ओळखायचे? संग्रहालये, स्मृतिस्थळं, प्रदर्शनी, यांचा स्मृती तयार करण्यात काय सहभाग होत असतो? ऐतिहासिक कादंबर्यांचा आणि "खर्या" इतिहासाची देवाण-घेवाण नेमकी कशी होते? स्मरणरंजनात्मक साहित्याचा असा सामाजिक-राजकीय इतिहास निघू शकतो का? हा निव्वळ लेखन-बाह्य अजेंडाचा प्रश्न नाही; तर साहित्याची पोहोच, बदलते महत्त्व, आणि ऋची-वाचनसंस्कृती चा शोध आणि प्रश्न आहे.
असो. लिहायला सुटले की मी आपली सुटलेच. गुप्तेंच्या लेखातले विवेचन पटले नाही, किंवा अर्घवट वाटले तरी त्यात विचार करण्याजोगे बरेच काही आहे, आणि ते साहित्याच्या एकूण प्रवाह, महत्त्वाबद्दल आहे, एवढेच म्हणायचे होते...
प्रतिसाद आवडला. विशेषत।
प्रतिसाद आवडला. विशेषत। शेवटून दुसरा परिच्छेद.
रोचना, तुम्ही 'सुटलात' की जे काही निघते ते रोचक असते. कृपया थांबू नये!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
+१
+१ अगदी अस्सेच म्हणतो
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
स्मृतीरंजन
रोचना यांचा प्रतिसाद रोचक. तरुणांना भविष्यात स्वप्न पहायला आवडत. त्यांना अजुन जगण्याचा बराच टप्पा शिल्लक असल्याने ते भविष्यकाळात पहात असतात.या उलट वार्धक्यात भविष्यकाळात स्वप्न पहाण्यासारख काही राहिलेले नसते. घडुन गेलेल्या, भुतकाळातील स्मृतीरंजनातच ते रमतात. मनुष्याचे वय जसजसे वाढु लागते तसतसे त्याची वाटचाल स्मृतीरंजनाकडे वाढत जाते. हे मेंदुत होणार्या जैवरासायनिक बदलांमुळे घडत असावे.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
कुठे गेला कान्हा
मराठी वाचकांची आवड बदलणे (की चांगली पुस्तकेच फार न निघणं),कातिल/गालिब वगैरेच्या गझला लेखातुन झळकणे, रणांगण/त्या वर्षी/डिफिकल्ट डॉटर्स सम जुन्याच कादंबर्यावरच्या चर्चा, जुन्याच कवितांचे दिले जाणारे दाखले, दिवाळी अंकातील साहित्यिक गरिबीच्या चर्चा, मराठीत उत्तम चित्रपट न/कमी बनण्याची तक्रार, बुकर पारितोषिकाच्या साहित्यिक मूल्याच्या घसरणीची चर्चा... हे सर्व बहुदा आजुबाजुची परिस्थिती पुर्वी-एवढी चांगली नाही हेच जणू सांगत आहे, त्यामुळे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे फक्त पुराणकालचे दाखले देउन रडायला सर्वांना आवडते हेच खरे कारण असू शकेल काय? नविन पण उत्तम असे ते कुठे लपून आहे तेच कळत नाही असे काही आहे काय? मिलिंद बोकिल, मेघना पेठे, कविता महाजन अशी काही निवडक नावे सोडली तर बाकिची उत्तम नावे आम वाचकाला जणू फार ऐकायलाच येत नाहित. कविता म्हणजे जुने मर्ढेकर, केशवसुत, इंदिरा संत, बहिणाबाई, कुसुमाग्रज, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, ग.दि. माडगूळकर कि नविन संदीप खरे...आणि...आणि...आणि..?? मला कदाचित माहित नसतिल्..पण जुन्याच्या दर्जाचे कुठे आहेत तेच सापडत नाहित...तुम्ही सांगा..असेच काहीसे कादंबरी, विनोदी लेखन, ललित साहित्य, नाटक ह्याबद्दल देखिल सांगताच येइल, हा नविन कान्हा कुठे सापडतच नाहिये.
जुन्यात अडकलेले पाय पुढे जाउ शकत नाहीत हे खरय पण अति-शॉर्ट-टर्म-मेमरी असलेली ही तमाम मराठी जनता स्मरणरंजनात अडकुन कशी आणि का पडली हे जाणुन घेणे पण जरुरिचे आहे.
विश्राम गुप्ते हे नविन, रुढ अर्थी बंडखोर लेखकांच्या फळितले वाटतात, त्यामुळे रुढ गोष्टींच्या विरोधात त्यानी बोलणे सहाजिकच वाटते आणि ते ठिकही आहे, फक्त स्मरणत्रास(रंजन नव्हे) हे सृजनाच्या आड येणार्या अनंत कारणांपैकी एक कारण आहे, त्याचा विचार एककल्ली होउ नये एवढीच विनंती.
माचकरांचे हे वाकय तर फारच रोचक वाटते, त्रिवार सत्य त्यांना सोडुन समस्त मराठी साहित्यजगताला कसं कळलं नाही हे गुपितच आहे, असो, त्यानी कदाचित भावनेच्या भरात केलेलं विश्लेषण म्हणुन त्याकडे दुर्लक्ष करू.
बाकी, डोळे उघडणे चांगलेच आहे, हे असे लेख आपल्याला कंफर्ट झोनच्या बाहेर खेचतात आणि मग काहीतरी नविन गवसते. हे चांगलेच आहे.
लेख आवडला, थोडा मोठा चालला असता.
माचकरांच्या 'खरखर' विधानात थोडा भावनातिरेक असावा पण ज्या नॉस्टॅल्जियावर कणेकर आणि दवणे इत्यादी स्तंभलेखक आपलं दुकान चालवतात त्यांच्याच 'अस्त्राने' त्यांच्यावरच हल्ला केला असं काहीसं वाटलं; मला हे अस्त्र मान्य नाही, पण मूळ अर्थाशी सहमत.
"आमच्यावेळी कसं सगळं छान होतं" असं सांगणार्यांची गाडी चुकली आहे असं अनेकदा दिसतं. आमच्याकाळी पोरं दंगा करायची नाहीत, आईवडलांचं ऐकायची असं सांगाताना दुसर्या बाजूने आजची चिमुरडी नवीन तंत्रज्ञान शिकण्यात माझ्यापेक्षा कितीतरी पटीने चपळ आहेत हे मला अनेकदा दिसतं. माझं बालपण वाईट होतं असं नव्हे पण या चंटपणामुळे मला पुढच्या पिढीचा थोडा हेवा वाटतोच. आमचे लता, रफी आणि एस्डी यांच्यातच अडकून पडणार्यांना नवीन पिढीची आवडनिवड समजत नाही का समजून घ्यायची नाही असा प्रश्न पडतो. नवीन काही प्रयोग करून पहावा मग तो साहित्यात, संगीतात, खाण्यात नाहीतर कपड्यांतही असेल; हा प्रयोग फसला तर फसला पण प्रयत्नपूर्वक नवीन काही करणार्यांचं कौतुक करणं फार काही कठीण नसावं.
माचकर आणि गुप्ते यांच्या लेखांच्या निमित्ताने मुसुंचे डोळे उघडले असतील तर ती पुन्हा अतिशयोक्ती असावी असं वाटतं, किंबहुना तेच ते भावनातिरेकाचं हत्यार. पण त्या निमित्ताने मला इरावती बाईंचा एक छोटा निबंध आठवला. (पुस्तकाचं नाव आठवत नाही, थोड्या वेळाने संग्रहातून शोधून देते.) साधारण संदर्भ असा की, इरावतीबाई हेड ऑफ द डीपार्टमेंट आहेत आणि एका तरूण शिक्षकाशी त्यांचे मतभेद होतात. थोड्या विचारांती आपण नवीन पिढीला समजून घेऊ शकत नाही तेव्हा आपण त्यांच्या डोक्यावर असण्याचं प्रयोजन काय असा काहीसा प्रश्न त्यांना पडला. 'आमच्याकाळी' यात त्या अडकल्या नाहीत यातही त्यांचं मोठेपण दिसतं.
सहज म्हणून nostalgia या शब्दाचा अर्थ "जुन्या" मेरियम वेबस्टर आणि "नव्या" अर्बन डिक्शनरीत शोधला. मला मजेशीर वाटलेले अर्थ:
मेरियम वेबस्टर: a wistful or excessively sentimental yearning for return to or of some past period or irrecoverable condition; also : something that evokes nostalgia
अर्बन डिक्शनरी: reminiscent of a time when the world ceased to move around you because you had it all.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
काही स्पष्टीकरणे
१. पु लंचा उल्लेख या दोन्ही लेखांमधेही नाही. मी देखील माझ्या टिपणात , पुलंची या संदर्भात आठवण आली इतपतच म्हण्टलेलं आहे. यात पुलंवर "टीका टिप्पणी" कुठे झाली माहिती नाही. पु लंच्या नुसत्या उल्लेखामुळे माझे लिखाण "अपीलिंग" होता होता राहिले असल्यास मला खेद वाटतो. बाकी पुलंसारखं लिहिता येत नसेल तर लोकांनी त्यांच्या लिखाणाबद्दल बोलू नये ही भूमिका मला नीटशी कळली नाही. असो. मला व्यक्तिशः पु ल देशपांड्यांचं बरचसं लिखाण मनापासून आवडतं. परंतु कुणी त्यांच्या भाषांतरांबद्दल , रूपांतरांबद्दल काही अभ्यास करून बोलत असेल तर त्याने तसे करायला हरकत नाही.
२. "नॉस्टॅल्जिया - आठवण - भूतकाळ या घटकाला आयुष्यातून इतक्या सहजी हद्दपार करण्याची आवश्यकता आहे किंवा तसं पूर्णत: करणं शक्य आहे" अशा स्वरूपाची भूमिका मी उल्लेखलेल्या लेखांमधे नाही. मीही तशी घेतलेली नाही.
३. "माझे डोळे उघडले" या स्वरूपाच्या विधानाबद्दल भवति-न-भवति झालेली दिसते. त्यापैकी "श्री. मुक्तसुनीत ह्यांनी सामान्य वाचकाच्या भूमिकेतून लिखाण केले असावे" हे विधान सत्याच्या सर्वाधिक जवळ जाणारे आहे असं मला वाटतं. "डोळे उघडणे" हा वाक्प्रचार कदाचित नाट्यपूर्ण किंवा कुणी म्हण्टल्याप्रमाणे भावनातिरेकातून आलेला नसून , तो एकंदर माझ्यासारख्या सामान्य वाचकाच्या र्हस्वदृष्टीतून आलेला आहे असंच मी मानतो.
मराठीतल्या लोकप्रिय लिखाणामधे "जुनं तेच सोनं" अशा स्वरूपाच्या दृष्टीकोनाची छाया पडली आहे आणि माचकरांचा लेख ही त्यावरची सरळसरळ प्रतिक्रिया आहे. गुप्त्यांचा लेख बराच मोठ्या व्याप्तिचा , नवे पर्याय सुचवणारा , (रोचना यांनी सांगितल्याप्रमाणे) फेनोमेनॉलॉजीसारख्या शास्त्रानुसार , इतर अनुभवांप्रमाणेच आपल्या स्मृतिंच्या इंटरप्रिटेशनबद्दल नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न करणारा आहे.
बाकी दिवाळी अंकांच्या एकंदर मराठी लेखनवाचनवेव्हारातल्या स्थानाबद्दल मेघना भुस्कुटे यांनी मांडलेल्या मताशी मी सहमत (आणि अशोक पाटील यांच्या मताशी असहमत ) आहे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
स्मरणरंजन
स्मरणरंजन, जुने ते सोने, आमच्यावेळी.. इत्यादी मधे काही गैर आहे असे मला वाटत नाही. भूतकाळात रमण, आठवणी, त्याची तुलना हे चुकीचे आहे असे मला वाटत नाही. या तुलनेन्ंतर जे चांगले आहे, खणखणीत नाणे आहे ते आजवर पुढे येत गेले आहे. नाटक चित्रपट कला क्रीडा कोणतेही क्षेत्र याला अपवाद नसावे. ते पुढे यायला लागणारा वेळ कदाचित कमी जास्त असेल. जे नवे नवे आहे ते कालांतराने जुने होणार हे तर अटळच आहे. जुन्याच नाव वारंवार समोर येते यात केवळ नॉस्टालजिया कारण असतो का? नाही तर दर्जा , लोकप्रियता ही कारणे सुद्धा आहेतच , ती नाकारता येणार नाहीत.
नवे पुढे येण्याकरता स्मरणरंजन हा एक तात्कालिक अडथळा वाटू शकतो पण नवनिर्मितीमधे मात्र तो अडथळा ठरत नाही, उलट स्फूर्तीदायी ठरू शकतो. काय वाचायच लिहायच ऐकायच याच स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, माणसाला कोणत्याही रूटीनचा कंटाळा येतो, त्यात बदल हवा असतो हे सुद्धा साहजिक आहे. तसा बदल या आस्वादातही करून बघावा, पटला तर उत्तम अन्यथा जे आधी आवडत ते आहेच की.
अशा चर्चा आपण एकमेकांशी बोलतांना करतोच , लेखी स्वरूपात त्या पुढे येतात हे आनंदाचे आहे.
सोनाली
एका शब्दपेक्षा दोन बरे.
चांगली चर्चा
चांगली चर्चा आहे. मराठी वाचन पुरेसे नसल्यामुळे माझा स्वतःचे मत तितकेसे निश्चित नाही.
परंतु लहानपणी स्मृतिरंजक लेखन जितके आवडत असे, तितके आजकाल आवडत नाही, हे माझ्याबाबतीत खरे आहे.
- - - पु ल देशपांडे आणि स्मृतिरंजन या उल्लेखावरून टँजंट - - -
पु.ल.देशपांडे यांच्या चाळसंस्कृतीबाबत दोन कृती समोर ठेवतो : "बटाट्याची चाळ" आणि "सदू आणि दादू".
दोन्ही कृतींमध्ये कोट्या, खटकेबाज संवाद, मजेशीर अतिशयोक्ती, व्यंग्य आणि विनोद आहेत. फरक हा की "सदू आणि दादू" मध्ये कथानकात निव्वळ वर्तमानकाळ आहे. आणि त्या "इथल्या-इथे-खरे"पणामुळे आजही मला त्यातल्या पात्रांशी मन जुळवता येते. दादू आणि त्याच्या बायकोचे भांडण आणि प्रेम हे आदल्या किंवा पुढल्या पिढीपेक्षा खालच्या किंवा वरच्या दर्जाचे आहे, हे स्मृतिरंजन कुठेच नाही. नाटकातील घटना भूतकाळात असला तरी स्वभावाचे चित्रण आजही जिवंत आहे. त्यामुळेच या कथानकाला काळ असला तरी त्यातील मनुष्यस्वभाव कालातीत आहेत.
.
बटाट्याच्या चाळीत मात्र वेगळे आहे. ५०-६० दशकातली चाळ ही पूर्वीच्या काळापेक्षा भित्री, पोरकी, रयाहीन होऊ लागली आहे. आज माझ्यासाठी ५०-६०च दशकेच आई-वडलांनी रंगवलेल्या रम्य स्मृतींची दशके आहेत! त्यामुळे पुस्तकातील आदल्या दशकांबाबत रंजन मला कालबाह्य वाटते.
.
एकूण मला "सदू आणि दादू" हे नाटक अजूनही फार आवडते. "बटाट्याची चाळ" हे लहानपणी आवडलेले पुस्तक, आता तितकेसे आवडत नाही.
.
आवडणारे/कमी-आवडणारे लेखन अशी दोन्ही उदाहरणे पु.ल. देशपांडे यांच्याच कृतींची घेतली आहेत. त्यामुळे "पुलंना नाक मुरडायची ऐट" या आरोपातून सूट मिळावी. दोन्ही कृतींमध्ये विनोद आहे. त्यामुळे "नावड सांगण्यापूर्वी असे एक विनोदी वाक्य लिहून दाखव" या मागणीतून सूट मिळावी. गोग्गोड स्मृतिरंजन नसलेल्या विनोदी वाक्यांची सोय पु.लंनीच "सदू आणि दादू" मध्ये केलेली आहे आहे.
असहमत
बटाट्याची चाळ या पूर्ण पुस्तकाला स्मरणरंजनात्मक म्हणणं चुकीचं वाटतं. समारोपाचा लेख निश्चितच त्या अंगाचा आहे. पण बाकीचे लेख हे तत्कालीन परिस्थितीतल्या घटनांवर ओढलेले ताषेरे आहेत. 'चाळ एक संगीतिका' या विनोदी वाटणाऱ्या लेखनात किंबहुना स्मरणरंजन करून पुराणकालात वावरणाऱ्या वाङमयाची चेष्टा आहे. त्या संगीतिकेच्या शेवटच्या भागात लोकप्रिय कलाकृतींची अभिजात कलांवर होणाऱ्या वरचष्म्यावर टिप्पणी आहे. मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे ची टिंगल गच्चीसह चाळ झालीच पाहिजे या घोषणेत आहे. कम्युनिझमविषयी निर्माण झालेल्या आकर्षणाची चेष्टा शिष्टमंडळात आहे. नेहरूंच्या आपल्या मुलीला पत्र पाठवून शिकवण्याची चेष्टाही आहे. निष्काम साहित्यसेवामध्ये कॉंट्रॅक्ट घेऊन केलेल्या लेखनाची चेष्टा आहे. त्यांनी जे कलाकृतींतून बेमालूमपणे जाहिराती करून पैसे कमवण्याविषयी लिहिलं आहे ते त्याकाळी कितपत होतं मला माहीत नाही. पण आजकालच्या चित्रपटांमध्ये, सीरियल्समध्ये या गोष्टी होताना सर्रास दिसतात. त्यांना हवी ती कलात्मक आणि वैचारिक विधानं करण्यासाठी त्यांनी चाळ हे कंस्ट्रक्ट म्हणून वापरलं असंच म्हणावं लागतं. स्मरणरंजनाचा लेख हे केवळ आयसिंग आहे.
त्यामानाने सदू आणि दादू मध्ये येणारी कल्पना काहीशी घिसीपिटी आहे. ती त्यांनी अनेक ठिकाणी वापरली आहे (उदाहरणार्थ सखाराम गटणे). पण ते नाटक कालातीत आहे याबद्दल वाद नाही.
+१
शेजारच्या सांडग्यांच्या चाळीत जाताना "सांडगे बटाटे भाई भाई" अशा घोषणाही होतात.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
वाटल्यास "डेटापॉइंट" म्हणून घ्या
माझ्या वरच्या प्रतिसादात माझ्या आस्वाद-अनुभवाबाबत सांगितले आहे. वाटल्यास "असाही अस्वादाचा अनुभव असू शकतो" या अर्थाने घ्या.
बटाट्याच्या चाळीत वेगवेगळ्या गोष्टींबाबत टिप्पणी आहे हे मान्यच आहे. हे सगळे गृहीत धरूनच माझे वरील मत दिलेले आहे - बालपणी ते पुस्तक जितके आवडले तितके आता आवडत नाही. (नावडत नाही!)
नोस्टाल्जिया सोडताना
वरील उद्बोधक आणि विचारप्रवर्तक चर्चा वाचून जुन्याला कवटाळून बसणार्या आमच्यासारख्या लोकांना लिहायवाचायचाच नव्हे तर जगायचाच अधिकार नाही असे वाटू लागले आहे. जुने ते सगळेच त्याज्य असे ठरवून टाकल्याशिवाय नव्या पिढीत आपल्याला प्रवेश नाही हे ध्यानात आल्याने सगळे जुने पाश तोडून टाकावेसे वाटू लागले आहेत. 'मनोगत' वर लिहिणे-वाचणे आम्ही केंव्हाच बंद केले आहे. आता तर 'मिसळपाव','उपक्रम','मायबोली' इत्यादि संकेतस्थळांवरील आपले खाते गोठवून फक्त 'ऐसी अक्षरे' वर वावरावे, पण 'ऐअ' पण पुरेसे जुने झाले असल्याने दुसरे एखादे नवीन संकेतस्थळ शोधावे, ते न जमल्यास स्वतः काढावे या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. कालपासूनच आम्ही पोळी-भाजी खाणेही बंद केले आहे. आता केवळ बर्गर! थालीपीठ, डांगर, माडगे, चुरमुर्याचे लाडू, मोदक असल्या पदार्थांची स्वयंपाकघरातून हकालपट्टी करण्याचा आदेश देण्याचा आमचा विचार होता, पण असे आदेश देणे जुनाटपणाचे असल्याने तूर्त आम्ही फक्त तसे आवाहन केले आहे. शर्ट व पाटलोण घालून कामावर जाणे बंधनकारक असल्याने आणि अर्ध्या चड्ड्या व चटेरीपटेरी शर्ट घालून गेल्यास भाकरीवर-नव्हे पिझ्झ्यावर गदा येण्याची शक्यता असल्याने सध्यातरी तेच कपडे 'अंडर प्रोटेस्ट' घालावे लागत आहेत. रिवाजाप्रमाणे पालकांना करण्याचा चौकशीचा आणि खुशालीचा फोन आम्ही आता टाळला आहे. घरातली सर्व पुस्तके, क्यासेटी व सीड्या आम्ही जुन्या बाजारात नेण्यासाठी तयार ठेवल्या आहेत आणि त्या भकास दिसणार्या फडताळांमध्ये भरण्यासाठी आता नवे काय आणावे हा विचार आम्ही करतो आहोत. मराठी व इंग्रजी या जुन्या भाषा वापरण्याऐवजी 'हिंग्लिश' किंवा 'मिंग्लिश' या भाषा वापराव्या असे मनात येऊ लागले आहे. शुद्धलेखन वगैरे सगळे बुरसटलेले प्रकार टाळण्यासाठी रावले सरांची शिकवणी लावावी आणि 'सी या', 'एनीवेज' असले शब्द वापरावेत असेही मनात येऊ लागले आहे. 'धन्स, धन्यु, वीकांत, चेपु' हे शब्द वापरताना चेहरा वाकडा होऊ न देणे आम्हाला हल्ली जमू लागले आहे आणि 'मालिकने हर इन्सान को इन्सान बनाया, हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया' हे मनात घोळत असले तरी सध्या ओठावर 'कोलावरी दी' आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. डाऊन विथ नोस्टाल्जिया!
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
हाहाहा
कमरेचे सोडून डोक्याला बांधणे - नॉस्टाल्जिक एडीशन.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
चेपु
धन्स, विकांत वगैरे पाहिले आहेत, पण "चेपु" म्हणजे काय?
चेपु
चेपु = चेहरापुस्तक/पुस्तिका अर्थात फेसबुक
चला आता याला माहितीपूर्ण श्रेणी द्या बघु
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
माहितीपूर्ण श्रेणी दिल्या
माहितीपूर्ण श्रेणी दिल्या गेली आहे.
(आम्हाला श्रेणी देण्याची सुविधा आहे हे दाखवायचा एक क्षीण प्रयत्न.)
------------------------
घणघणतो घंटानाद
फेसबुक
मी "चेपु" काय असेल हे ओळखायचा खूप प्रयत्न केला, पण हे उत्तर अजिबात अपेक्षित नव्हते. चेपु! म्ग ट्विटर चे काय होईल - किलबिल?
श्रेणी अर्थातच दिली आहे... [पण धन्स किंवा धन्यु म्हणवत नाहीय...]
चेपु
चेपु ला काही लोक लाडाने थोपु असेही म्हणतात (थोबाड पुस्तक)
बाकी किलबिल लै झक्कास.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
ट्विटर
नाही. टिवटिव! आपण नाही का म्हणत, काय टिवटिव लावलीय रे... तीच ही.
ट्विटर
नाही. टिवटिव! आपण नाही का म्हणत, काय टिवटिव लावलीय रे... तीच ही.
मी पण!
मी पण रावांच्याच विहीरीत!
एक गमतीदार किस्सा
स्मरणरंजनाविषयी बोलणं निघालं की पुलंची आठवण आल्यावाचून रहात नाही हेच खरं. त्यांची 'चाळ - एक चिंतन' ही गेलेल्या काळाची महती व नवीन आलेल्या काळाचा बेगडीपणा सांगणाऱ्या लेखनाचा अत्यंत उत्कृष्ट नमुना. स्मरणरंजन करावं तर असं, असं म्हणायला लावणारं लेखन.
पण त्या लेखाविषयीच्या स्मरणरंजनाची अत्यंत रंजक कथा जयवंत दळवींनी सांगितलेली आहे. 'पुल एक साठवण' चं संकलन करताना त्यांनी अनेकांना कुठचं लेखन यात असावं असं अनेकांना पत्राने विचारलं. त्यातल्या बहुतेकांनी 'चाळ - एक चिंतन' हे पुलंच्या सर्वोत्तम लेखनापैकी असल्याचं आग्रहाने सांगितलं होतं. तसं सांगायला काहीच हरकत नाही. पण दळवी पुढे म्हणतात की ज्यांनी या लेखाचं आत्ता कौतुक केलं त्यांच्यापैकी अनेकांनी वीस-पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा हे लेखन प्रसिद्ध झालं तेव्हा 'उबवलेला लेख' अशा शब्दांत त्याची हेटाळणी केली होती.
सांगायचा मुद्दा काय वयाच्या तिशीत जे भोंगळ स्मरणरंजन वाटू शकतं ते पिकल्या पन्नाशीत गोड वाटू शकतं. माझा तर असा दावा आहे की चाळिशीनंतर लेखनाची बंदी केली तर हे स्मरणरंजन वगैरे बहुतांशी थांबेल.
आपल्याला
आपल्याला ह्यातल काय बी कळत नाय पण हल्ली अनेक मराठी लेख स्मरणरंजनवालेच असतात. किरकेट असो वा फिल्लमबाजी आपले लेखक ५०-६०च्या दशकात गेलेच म्हणून समजा. एवढेच् काय विज्ञानवाले लेख पण तसेच असतात.म्हणजे लेखात एकदा तरी भाभा,रामन पाय्जेच पायजे्. ह्यात आमचो कुमार केतकर पण आघाडीवर असतो.लेख लिहिला की नेहरु, ईंदिरा गांधी आल्याच म्हणून समजा.
बाकी, आमच्या चेतन भगतच्या पुस्तकांची हेटाळणी करणारे त्या निमित्ताने इथे बोलते झाले हे बी झकास.
ऐसी अक्षरे गिरवीन की....
दोन पावलं
टार्या लई स्वॉप हाय. दर टायमाला तू जे दोन पावल पुढ जाउन मी म्हणेन...... अस म्हंतो त्याच्या ऐवजी दोन पावल माग येउन मी अस म्हणेन अस म्हनायच म्हंजी झालं.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
स्मरणाचा उत्सव जागून...
एकंदरीत चर्चा वाचून Writing about nostalgia isn't what it used to be असे म्हणावेसे वाटले
थोडे अवांतर
ह्याच विषयावरचा नव्हे, पण 'बटाट्याच्या चाळी'प्रमाणे हाती थोडा पैसा आल्यावर छोट्या, गजबजलेल्या जागा सोडून अधिक प्रशस्त, खाजगीपणा जपता येईल अशा जागांत रहायला गेल्यावर लोकांना अधिक समाधानी वाटते का - ह्या विषयावरचा एक पेपर वाचनात आला - http://www.amacad.org/publications/spring2004/frank.pdf
उत्तर बरेचसे नकारार्थी आहे. ज्या लेखात ह्या पेपरबद्दल वाचले, त्यातील संदर्भ असा -
Alan Ehrenhalt once wrote a great book called “The Lost City,” about the old densely packed Chicago neighborhoods where kids ran from home to home, where people hung out on their stoops. When the people in those neighborhoods made more money, they moved out to more thinly spaced suburbs with bigger homes where they were much less likely to know their neighbors.
In the 1990s, millions of Americans moved outward so they could have bigger houses and bigger lots, even if it meant long commutes. Research by Robert Frank of Cornell suggests this is usually a bad trade-off.
अधिक अवांतर - कणेकरांचा साधारण ह्याच सुरातला थोडा मेलोड्रॅमाटिक लेख
या लेखा संबंधातला दुवा
ऐसीअक्षरेवरचा हा लेख ज्या "प्रहार" मधील लेखावर आधारित आहे तो माचकरांचा लेख आता जालावर उपलब्ध झालेला आहे :
http://maayaabaazaar.blogspot.in/2011/12/blog-post_1682.html
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
लेख आवडला असं म्हणवत नाही.
लेख आवडला असं म्हणवत नाही. "नॉस्टॅल्जिक" लोकांना, फारच झोडलय
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
वाह!
र्ं@|डम गोष्टी वाचताना आत्ताच हे वाचलं. त्यातला माचकरांचा हा लेख एकदम बोले तो एकशेतीस टक्के पटला.
कणेकरांच्या समग्र लेखनातील रिपिटेशन माफ केलं तरी त्यांचा नॉस्टाल्जिक पकावपणा माफ करणं कठीण आहे. आणि मग ते "चित्रपट जाणकार" वगैरे म्हणून ओळखले जाणार.
आपण खूप चित्रपट पाहिले आहेत या भांडवलावर स्वतःला थोर दिग्दर्शक समजणारा साजिद खान आणि आपण एके काळी तुफान चित्रपट पाहिले/ऐकले आहेत त्या भांडवलावर स्वतःला "सिरिअस" चित्तरपट जाणकार समजणारे कणेकर दोघेही एकाच लायनीत.
==================================
==================
भूतकाळातील आस्वल्य.
प्रदीप यांचा तद्दनबाई गेली हा
प्रदीप यांचा तद्दनबाई गेली हा लेख मस्त वाटला या संदर्भात.
माचकरांचा लेख मस्त
माचकरांचा लेख मस्त आहे.
(माधुरी दिक्षीतचा उल्लेख त्या यादीत क्रोनोलॉजिकली न आल्याने अडखळले...)