दुध (अगोदरच्या भडक शीर्षकासाठी सर्वांची जाहीर माफी मागतो )
आजच सकाळी दैनिक दिव्य मराठी त आलेल्या एका बातमीने लक्ष वेधुन घेतले. ती अशी की महाराष्ट्राचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ़ यांनी कुठल्याशा कार्यक्रमात (राजकारण्यांच्या टीपीकल तुलादान इ. सारख्या) स्वत:वर दुधाचा अभिषेक करुन घेतला व दुधाची भरपुर नासाडी या कार्यक्रमात त्यांच्या निष्टावंत कार्यकर्त्यांनी केली. या घटनेवर डॉ. राणी बंग यांची प्रतिक्रीया आली आहे ती अशी की,
राज्यातील बरीच मुले अन स्त्रिया कुपोषणाच्या जंजाळात अडकल्या असताना स्वत:वर दुधाचा अभिषेक करुन घेण्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ़ यांचे कृत्य लज्जास्पद अन घृणास्पद असुन यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला एक प्रकारे ठेच पोहोचली आहे. अभिषेकासाठी वापरण्यात आलेल्या दुधाची रक्कम कुपोषण असलेल्या भागातील मुलांच्या शाळा अथवा एखाद्या बालसंगोपनगृहाला देउन मुश्रीफ़ व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रायश्चित्त घ्यावे असा सल्ला त्यांनी दिला. त्या पुढे म्हणाल्या दुध हे पुर्णान्न आहे. राज्याने अजुनही दुग्धोत्पादनात स्वयंपुर्णता मिळवली नाही. बरयाच स्त्रीयांना अन बालकांना त्यांचे आरोग्य राखण्यासाठी दुधाची गरज आहे परंतु गरीबीमुळे ते त्यांना मिळत नाही. असे असतांना दुधाची अशी नासाडी व्हावी ही वेदनादायक बाब आहे. त्या पुढे म्हणतात की मुश्रीफ़ पालकमंत्री असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा, संग्रामपुर, जळगाव जामोद हे तालुके कुपोषणग्रस्त आहेत. मेहकर तालुकाही काही प्रमाणात या समस्येने ग्रासला आहे याचेही भान त्यांना (मुश्रीफ़ांना) कसे राहीले नाही ?. देवांच्या मुर्तीवर केले जाणारे असे अभिषेकही आपणास मान्य नसुन त्याकरीता वापरण्यात येणारे दुध एखाद्या बालकाश्रमाला दिल्यास ती भक्ती परमेश्वराला अधिक प्रिय होईल. इत्यादी. असे त्या म्हणाल्या.
वरील मागणी अत्यंत योग्य आहे. डॉ. राणी बंग जे काही बोलल्या त्यातला शब्द न शब्द अक्षरश: खराच आहे. याचे कारण त्यांची संस्था कुपोषणा वर अनेक वर्षे अत्यंत महत्वाचे असे काम गेली कित्येक वर्षे अत्यंत निष्ठेने करीत आहेत. हे सर्व तर आपल्याला माहीत आहेच. पण त्यांचा वरील शब्द कीती कळकळीतुन आलेला आहे कीती सच्चा आहे हे मला अतिशय तीव्रतेने जाणवले याचे कारण वरील बातमी वाचल्या बरोबर अतिशय तीव्रतेने आठवला तो राणी बंग यांच्या संस्थेसंदर्भात वाचनात आलेला एक सुंदर लेख जो मला खात्रीने आठवतो साप्ताहीक सकाळ च्या काही वर्षांपुर्वीच्या दिवाळी अंकात आलेला होता.( फ़क्त वर्ष नेमके आठवत नाही पण अगदीच जुना ही नाही प्लिज कुणाकडे असल्यास नेमका संदर्भ द्यावा ) तर त्या लेखात एक याच राणी बंगांविषयी एका घटनेचे वर्णन आलेले होते ती अशी की,
डॉ.राणी बंग या ज्या आदिवासी भागात काम करतात तेथे च एक गरीब आदिवासी स्त्री होती जीने नुकताच एका बाळाला जन्म दिला होता आणि झाल अस होत की काही वैद्यकीय कारणास्तव या आदिवासी बाईला पान्हा फ़ुटला नव्हता त्यामुळे ती स्वत:च्या बाळाला स्वत:चे दुध पाजण्यास असमर्थ होती. बाळ अतिशय कुपोषीत व जगेल की वाचेल अशा अवस्थेतच होते. आईचे दुध बाळा साठी सुरुवातीच्या काही महीन्यात तरी कीती महत्वाचे असते ते आपल्याला माहीतच आहे. हे न होण्यामागे ही त्या आदिवासी दुर्देवी बाईची गरीबी/ कुपोषण हीच कारणे अर्थातच होतीच. आणि त्याच वेळेस डॉ. राणी बंग यांनी ही एका बाळाला जन्म दिला होता. तेव्हा ही आदिवासी बाई त्यांच्या कडे पेशंट म्हणुन आलेली होती व तिची ही अडचण डॉ.राणींना समजली. तेव्हा डॉ. राणी बंग यांनी स्वत: त्या आदिवासी बाईच्या बाळाला आपलं (आपल्या पोटच्या बाळांसाठीचं दुध ) शेअर करुन त्या आदिवासी बाईच्या बाळाला त्यांनी वाचवल होत. त्या स्वत:च्या बाळाबरोबरच अर्ध अर्ध शेअर करुन दोन्ही बाळांना स्वत:च दुध पाजतं असत. व असं करुन त्यांनी त्या गरीब आदिवासी बाईच्या बाळा ला कुपोषणापासुन वाचवुन एक प्रकारे संजीवनी च दिली. असा अनुभव त्या लेखात दिलेला होता.
यामुळे ही वरील मुश्रीफ़ यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली दुधाची नासाडी खरोखरच डॉ.राणी यांच्या संवेदनशील मनाला कीती वेदना पोहोचवत असेल याची जाणीव एका क्षणात कुठलेही स्पष्टीकरण न देताही होते. आणि त्यांच्या आजपर्यंतच्या कार्यावरुन व या घटनेवरुन मनात त्यांच्या विषयीचा असलेला आदर अनेक पटींनी वाढतो.
बर यातही विशेष म्हणजे या घटनेचा उल्लेखही त्यांनी स्वतहुन कधी केलेला नाहीये त्यांच्याबद्दल कोणी तरी दुसरयाने च सांगितलेल आहे.आजच्या “करुन दाखविले” चे होर्डींग बनवुन रस्त्यावर लावण्याच्या जमान्यात इतकी संवेदनशीलता इतकी माणुसकी इतक प्रेम कोणा मध्ये इतरांविषयी असु शकत हेच फ़ार दुर्मिळ वाटत. ते दोन्ही ही ( डॉ.राणी व डॉ. अभय बंग ) स्वत:विषयी कीती कमी बोलतात या संदर्भातील अनिल अवचट यांच्या “कार्यरत” या पुस्तकातील हा खालील उतारा ही पुरेसा बोलका आहे.
अभय, राणीला स्वतःविषयी बोलायला नको असायचं. विशेषतः राणीला काही विचारलं तर ती म्हणायची, "ते तू अभयला विचार." हळूहळू त्यांचं मागचं समजायला लागलं तेंव्हा लक्षात आलं, की ही दोघं म्हणजे भलतेच स्कॉलर लोक आहेत. आपल्याकडे मेडीकलला अॅडमिशन मिळणं हेच मुळात केवढं अवघड असतं. अॅडमिशन मिळाल्यावर मुलं तर चार बोटं वर चालायला लागतातच; पण त्यांचे पालकही तरंगू लागतात. इथं अभय आणि राणी MBBS काय MD काय सगळ्या विद्यापीठात पहिले तर आलेच, पण ते ही सुवर्णपदक मिळवून. अभयला MBBS ला तीन विषयांत सुवर्णपदकं होती. राणीला MD ला मिळालेलं सुवर्णपदक विद्यापीठात त्या आधी कितीतरी वर्षं कुणालाच मिळालेलं नव्हतं. MBBS नंतर अभय चंदीगडच्या, संपूर्ण भारतात अग्रगण्य असलेल्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल रिसर्च (PGI) मध्ये गेला. तिथे काही काळ काम करून नंतर प्रवेशपरीक्षा असते. तिथं तो रेकॉर्ड मार्क मिळवून पहिला आला, नंतर दोघंही अमेरिकेतल्या बाल्टिमोर येथील जॉन्स हाफकिन्स विद्यापीठात शिकायला गेले. 'पब्लीक हेल्थ' या क्षेत्रातला जगातला 'लास्ट वर्ड' समजली जाणारी ही संस्था. सर्व जगातून तिथं विद्यार्थी येतात. तिथल्या सगळ्या विद्यार्थांत तर अभय पहिला आलाच; पण त्याला ९९% मार्क पडले. त्या विद्यापीठाच्या इतिहासात कुणाला इतके मार्क पडले नव्हते आणि अजूनपर्यंत कुणाला पडले नाहीत. राणीची आई त्या काळात वारली. तिला थोडे दिवस इकडे यावं लागलं तरीही तिला ८०% मार्क पडले. हे सर्व मला तुकड्या तुकड्यानं दीड वर्षांच्या काळामध्ये समजलेले तपशील. याहून किती आहे, ते माहिती नाही.
प्रतिक्रिया
Kudos to Dr. Bang.
Kudos to Dr. Bang.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
स्पेलिंगविषयी शंका
Dr. Bang की Dr. Bung?
उच्चार आम्रविकन पद्धतीने
उच्चार आम्रविकन पद्धतीने करताहात की भार्तीय त्यावरून स्पेलिंग ठरेल, नै का?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
भारतीय?
भारतीय पद्धतीत दबंग चे स्पेलिंग Dabangg असे आहे :- http://en.wikipedia.org/wiki/Dabangg
ह्यापैकी Da वाला भाग सोडल्यास योग्य ते स्पेलिंग टह्रावे.
तशीही त्यांची कामगिरी त्यांच्या क्षेत्रात "दबंग " अशीच आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
ते ठीक पण दबङ्ग मधील ङ्ग चे
ते ठीक पण दबङ्ग मधील ङ्ग चे स्पेलिंग डबल जी ने करत नैत भारतात. एका पिच्चरचे स्पेलिङ्ग तसे केले म्हणून अन्य स्पेलिङ्गचे करतील असे नाही. डबल जी ने ङ्ग लिहिणे ग्रीक पद्धत आहे खरे तर- डब्बल ग्यामा वापरतात.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
काय बोलणार यावर? कुपोषित
काय बोलणार यावर?
कुपोषित मुलांची संख्या कमी झालीय म्हणे, त्या आनंदात केली असेल दुधाने आंघोळ.
काही वर्षांपूर्वी भाव मिळत नाही म्हणून लाखो लिटर दूध अक्षरशः रस्त्यावर ओतून दिल्याचा फोटो पेप्रात पाहिला होता.
एवढं दूध वाह्यलं पण काहीच "ट्रिकल डाऊन" झालं नाही असं कसं होईल?
बाकी बंग दांपत्य थोर आहेत याबद्दल शंकाच नाही; प्रश्न तुमच्या-आमच्यासारख्यांचा आहे.
माफी मागितलीय मुश्रीफ यांनी अस नुकतच वाचलय.
एक फोटो तुपाचा ही बघितला कीती तरी कोटी चे तुप रस्त्यावर अभिषेकाचे तुप होते.काय समजत नाही.
www.theparisreview.org
http://all-art.org
www.spring.org.uk
अं....
हं.
छान लेख.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
अभय व राणी बंग खरोख्खर ग्रेट
अभय व राणी बंग खरोख्खर ग्रेट माणसं आहेत. ग्रेट भेट मधे वागळेंनी त्यांची मुलाखत घेतली होती.
---
दुध हे पुर्णान्न आहे. राज्याने अजुनही दुग्धोत्पादनात स्वयंपुर्णता मिळवली नाही. बरयाच स्त्रीयांना अन बालकांना त्यांचे आरोग्य राखण्यासाठी दुधाची गरज आहे परंतु गरीबीमुळे ते त्यांना मिळत नाही. असे असतांना दुधाची अशी नासाडी व्हावी ही वेदनादायक बाब आहे.
नासाडी होउ नये हे बरोबर खरेच.
राज्यातील अनेक स्त्रियांना व बालकांना दूध मिळत नाही कारण त्यांची गरीबी. व दुध परवडत नसल्याने काही प्रमाणावर का होईना कुपोषणात वाढ होणार. पण दुधाचे भाव तर बांधून दिलेले आहेत. माझ्या माहीती नुसार रु. ३२ ते ३३ प्रति लिटर. (हा दुवा पहा)
पण कुमारकौस्तुभ साहेब तुम्हास एक प्रश्न आहे. - रु. ३२ प्रतिलिटर हा दर खूप महाग आहे असे तुम्हास वाटते का ? की खूप कमी आहे असे तुम्हास वाटते ?
जर भाव कमी दराने बांधून दिले तर (उदा. प्रति लिटर रु. २०) तर समस्या सुटेल का? किमान समस्येची तीव्रता कमी होईल का ? दर किती असावा ? असा कोणता व किती दर आहे (प्रति लिटर) की जो दुधाचा प्रचलित दर असेल तर दूध सर्वांना उपलब्ध होईल ? जेणेकरून दुधाच्या टंचाईमुळे (व रिझल्टंट महागाई मुळे) कुपोषणाची समस्या कमी होईल ? (एकट्या दुधाच्या मुबलकतेने कुपोषणाची समस्या दूर होणार नाही हे सगळ्यांना माहीती आहेच.)
(दर ठरवून दिलेले असताना सुद्धा अनेक ठिकाणी दूध ठरवून दिलेल्या दरांना विकले जात नाही हे मान्य. पण त्यावर वचक ठेवणारे यंत्रणा नक्कीच आहे. खोटं वाटत असेल तर तुमचा प्रतिदिन दुधाचा दर तपासून पहा.)
दूध - किंमत
दूध व किंमत हा लै मोठा झोल आहे.
किंमत वाढवली तर "ग्राहकाच्या तोंडचे दूध हिसकावले, परवडत नाही" वगैरे वगैरे मथळे येणार.
पण म्हणून किंमत थोडी जरी कमी केली तर "दुग्धोत्पादकास, पर्यायाने बव्हंशी शेतकर्अयंस नागवले जातेय. त्याच्या जीवार इतरेजन दुधाची तृप्त ढेकर देउन त्यास उपाशी ठेवून मारताहेत" हे मथळे येणार.
.
.
भारतात साले "ऊसाला किंमत मिळालीच पायजेल.शेतकर्यांस पैसा मिळालाच पायजेल." अशाही घोषणा असतात.
"साखर स्वस्त हवी" असे कोकलणारा मिडियाही तोच असतो दोन्ही घोषणांत.
प्रॅक्टिकली ऊसाला भरघोस भाव मिळणे व साखर स्वस्त असणे हे दोन्ही एकाच वेळी कसे शक्य आहे?
(मुळात "का शक्य असावे" असे विचारणार होतो, पण समाजवादी मित्र धरुन बडवतील.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
संकेतपालन
शुद्ध पाण्याचे कितीतरी हिमनग खारट महासागरात उन्हाळ्यात कोसळतात. कितीतरी (कदाचित जमिनीवर पडणारापेक्षा जास्त) वर्षा समुद्रावरच होते (नि वाया जाते.). त्याचे उदाहरण देऊन पाण्याच्या संवर्धनाची चर्चा करणे अनुचित ठरावे.
मोठ्या लोकांची क्रयशक्ती प्रचंड असते. आज हे मोठे लोक (१००००करोड पती) जर काहीही कितीही घेऊन वापरू लागले (व्यापार नव्हे) तर अवघड वेळ येईल. त्यांनी आपली श्रेष्ठता कशी जाहीर करावी याचे संकेत आहेत. मोठे घर बांधणे, पॉश गाड्यांचा ताफा घेणे, समारंभ करणे, इ. पण रोज टेबलावर दहा सफरचंद ठेऊन ते प्रत्येकातून एक टवका खात नाही. माजही कसा करावा याचे संकेत आहेत.
कोणत्याही कमोडिचे एकूण किती उत्पादन होऊ शकते याला नैसर्गिक मर्यादा आहेत, त्या खेचल्या जाऊ शकतात पण खेचल्यानंतर पुन्हा नव्या स्वरुपात उरतात. उत्पादन किती करावे, व्यापारी खेळ म्हणून किती कमी करावे, वापरा कशासाठी कोणत्या प्राधान्याने किती करावा या सर्वांचे संकेत आहेत. ते पाळले नाहीत तर कायदा पळत तिथे येतो, नसेल तर नवा कायदा बनतो.
दुधाची किंमत किती असावी हा प्रश्न नाहीच आहे. तो प्रश्न गरीब लोक कमित कमी किती दुधात राहू शकतात हा आहे. जे दुग्धोदपादक आहेत त्यांच्यात कोण कमी प्रतीचे राहणीमान किती पातळीपर्यंत स्वीकारायला तयार आहे असाही तो प्रश्न आहे. व्यवस्थेने सप्लाय चेन मधल्या विविध घटकांची स्वीकार्य राहणीमानाची अपेक्षा अभ्यासली पाहिजे आणि नफा योग्य जागी स्थानांतरीत होईल अशी प्रलोभने दिली पहिजेत. अन्यथा लोक ही साखळी सोडून जातील, वा ती नासवतील. अशा सोडून व नासवून जाणाचा पाहिजेच म्हणता येईल इतके दूध पुरवण्यावर परिणाम झाला तर व्यवस्था कोलमडेल.
काही संकेत आणि मर्यादा आहेत. समाजाच्या आहेत. म्हणून बाजाराच्याही आहेत. समाजाचे धुरीण जेव्हा मर्यादा सोडतात तेव्हा असंतुलन येऊन ठेपते. बाजार तर नंतर वरखाली उसळ्या मारतो. मानवता मरते. म्हणून संकेतपालनाचा आग्रह (कोणी आपल्याच पैशाने भले का करेना) आवश्यक आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
तपशील
नक्की?
मी जे वाचले त्याप्रमाणे,
(१) हा "राजकारण्यांचा टिपिकल तुलादान"टैप प्रकार वगैरे नव्हता. बुलढाण्यात कोठेतरी श्री. मुश्रीफ यांच्यावर शाई फेकण्यात आली. या प्रकाराकरिता "शुद्धीकरण" म्हणून, दुसर्या दिवशी ते कोल्हापुरास गेले असता, तेथे त्यांना भेटावयास आलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना दुग्धाभिषेक घातला.
(२) श्री. मुश्रीफ यांनी "स्वतःवर दुधाचा अभिषेक करून (वगैरे) घेतला" नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांना भेटावयास येणारे कार्यकर्ते त्यांना दुग्धाभिषेक घालतील याची त्यांना कल्पनाही नव्हती.
(३) तरीही, झाल्या प्रकाराबद्दल श्री. मुश्रीफ यांनी जाहीर माफी मागितलेली आहे.
त्याच न्यायाने...
त्याच न्यायाने, महाराष्ट्रातील प्रमुख दुग्धोत्पादिका या नात्याने, दुधाची किंमत काय असते हे म्हशींहून अधिक चांगले कोणाला कळणार?
पण म्हशींना बोलता येत नाही म्हणा, किंवा त्यांनी हंबरलेले माणसांना समजत नाही म्हणा. तेव्हा म्हशींना वाचा फोडण्याचे काम कोणाकडूनतरी झाले, हे चांगलेच झाले म्हणायचे.
कुपोषणाच्या समस्येला कोणत्याही प्रकारे डिस्काउंट न करतासुद्धा, ष्टोरी भंपक नि भडक आहे, असे मत प्रांजळपणे नोंदवू इच्छितो.
यात दोन गोष्टी आहेत. १.
यात दोन गोष्टी आहेत.
१. दुधाचा असा गैरवापर अयोग्य आहे. जे मला मान्य आहे. या महाशयांवरच नव्हे तर इतर कुठेही (इन्ल्युडिंग मंदीरे) दुधाचा असा वापर होऊ नये असे वाटते. त्यापेक्षा असे अतिरिक्त दुधाची भुकटी करणार्या कारखान्यांना सरकारने(त्या मंत्र्यांनी) तिथे प्रोत्साहन दिले पाहिजे किंवा तेथील आणंदसारखे दुधाचे व्यवसायात रुपांतर केले पाहिजे.
२. मात्र असे अभिषेक थांबल्याने कुपोषितांचे कल्याण होईल याचा संबंध कळला नाही.
कुपोषितांना दुध आदी पौष्टिक गोष्टी मिळत नाहियेत हे खरेच. पण त्याचे कारण दुधाची कमतरता नसून दुध घेण्याची कुवत (आर्थिक), दुधाची अनुपलब्धता(प्रशासनिक - ढिसाळ वितरण व्यवस्था), समाजात रुजलेल्या जाती पातींची गणिते(सामाजिक) अधिक आहेत असे वाटते.
याहून विपरीत विदा असल्यास वाचायला मिळावा.
बाकी, बंग या डॉक्टर दांपत्याबद्दल आदर आहेच.
====
मंत्रीमहोदयांना कल्पना नव्हती हे ग्राह्य कारण असु शकत नाही. त्यांचे लक्ष नसताना त्यांच्यावर अचानक दूध ओतले होते काय?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
असा त्यांचा दावा आहे
असा त्यांचा दावा आहे.१
याहून विपरीत विदा असल्यास वाचायला मिळावा.२
===============================================================================================================
१ 'महाराष्ट्र टाइम्स'मधील बातमीस अनुसरून, त्यांचे विधान येणेंप्रमाणे: "काल घडलेल्या प्रकारानंतर आज अनेक कार्यकर्ते मला भेटायला आले होते. मी त्यांना भेटण्यासाठी बाहेर गेलो असता त्यांनी माझ्यावर अचानक दुग्धाभिषेक सुरु केला. याबाबत मला काहीही कल्पना नव्हती."
२ विपरीत विद्याअभावी त्यांच्या दाव्यानुसार त्यांनी दिलेल्या कारणास ग्राह्य धरणे भाग पडते. अन्यथा, त्याच न्यायाने, त्या शाईफेक प्रकरणाबद्दलसुद्धा "त्यांना (आपल्यावर शाईफेक होणार ही) कल्पना नव्हती हे ग्राह्य कारण असू शकत नाही; त्यांचे लक्ष नसताना त्यांच्यावर अचानक शाई फेकली होती काय?" असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतोच, आणि त्यावरून "मंत्रीमहोदयांनी स्वतःवर शाई फेकवून घेतली" या निष्कर्षावरही पोहोचता येतेच. (अर्थात, तत्त्वतः हेही अशक्य नाही; परंतु अशा निष्कर्षास पुष्टी देणारा काही विदा निदान तूर्तास तरी उपलब्ध नाही.)
सदर बातमीतील फोटो ही माहिती
सदर बातमीतील फोटो ही माहिती खोटी असल्याचा पुरावा नाही काय? सदर गृहस्थ व्यवस्थित खूर्चीत बसून अभिषेक करून घेत आहेत - कोणताही प्रतिकार करताना दिसत नाहियेत. शाईफेक प्रकरणातही ते असेच बसून शाई फेकून घेत होते काय?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
रोचक निरीक्षण!
तूर्तास पास.
(तसेच पाहायला गेले, तर वृत्तवाहिनीचे छायाचित्रकार घटनास्थळी नेमके उपस्थित कसे काय होते, असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतोच. फॉर व्हॉटेवर इट इज़ वर्थ.)
घटनास्थळी स्वतः उपस्थित नसल्याकारणाने याबद्दल कोणतीही माहिती पुरविण्यास मी असमर्थ आहे.
कुपोषितांना दुध आदी पौष्टिक
कुपोषितांना दुध आदी पौष्टिक गोष्टी मिळत नाहियेत हे खरेच. पण त्याचे कारण दुधाची कमतरता नसून दुध घेण्याची कुवत (आर्थिक),
ऋषिदा, तुम्हास असे म्हणायचे आहे का की - त्याचे कारण दुधाची कमतरता नसून दुध घेण्याची आर्थिक कुवत नाही - हे आहे?
पण खालील बाबी पहा -
१) कल्पना करा की तुम्ही म्हणता ते खरे आहे - की - दुधाची कमतरता नाही. दूध प्रचंड प्रमाणावर उपलब्ध आहे.
२) दूध नाशवंत आहे. ही फॅक्ट आहे.
३) तसेच आपल्या इथे दुधास दीर्घकाल स्टोरेज ची व्यवस्था नाही. याबद्दल दुमत असू शकेल पण प्रचंड दुमत नाही असे गृहित धरूया.
अशा परिस्थितीत दुधाचे भाव कोसळत का नाहीत ? व दूध सामान्यांना (गरिबांना) परवडेल अशा किंमतीस उपलब्ध का होत नाही ?
अगदी काही शेतकरी दूध ओतून देत असतील ही (भाव योग्य नाही म्हणून). पण हजारो शेतकरी तसेच करत असतील ????
>>अशा परिस्थितीत दुधाचे भाव
>>अशा परिस्थितीत दुधाचे भाव कोसळत का नाहीत ? व दूध सामान्यांना (गरिबांना) परवडेल अशा किंमतीस उपलब्ध का होत नाही ?
सरप्लस दूध इतर (मूल्यवर्धित) उत्पादनांसाठी वापरले जाते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
इथे कुपोषण चालू असताना...
...शिक्रणी खातात साले!
(हा प्रतिसाद थत्तेचाचांना उद्देशून नाही.)
नॉट ऑल्वेज
त्यासाठी स्टोरेज व सक्षम वितरणव्यवस्था आवश्यक आहे. ती फक्त काही पॉकेट्स मध्येच उपलब्ध आहे.
(उदा:- पश्चिम महाराष्त्रातील सातारा-सांगली-कोल्हापूर बेल्ट.वारणा पट्टा. पुणे - कात्रज इथला काही भाग.
बारामतीचे दुग्धोत्पादन तर थेट दिल्लीला जाते दौंडमार्गे असे ऐकून आहे.
(परवाच दोन्-तीन मोठे रेल्वेचे मालवाहतूक डबे दुधासाठी राखीव असलेले दौंडला रेल्वेला जोडले जात असताना पाहिले. चौकशी करता ही माहिती मिळाली. )
)
सर्वत्र वितररण व्यवस्था व स्टोरेज सक्षम नाही ह्यावर ऑलरेडी आपल्याकडे बोंबा मारत असतात सगळे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
ऋषिदा, तुम्हास असे म्हणायचे
प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे कारण केवळ आर्थिकच नाही तर त्याच बरोबर प्रशासकीय (ढिसाळ वितरण व्यवस्था) व सामाजिकही आहे (काही जातीतील लोकांना दूध नाकारणे, काही जातीतील व्यक्तीकडूनच दूध विकत घेणे इत्यादी).
शहरी भागात साठवणूक, पाश्चरायझेशन व वितरण व्यवस्था बरीच चांगली आहे.
लहान खेडेगावांमध्ये/गावांमध्ये साधारणतः रोज जितकी गरज असते तितकेच दूध काढले जाते. (वर वासरांचे दूध आम्हाला हवे तितकेच घेतो तुम्हा शहरी लोकांसारखे ओरबाडत नाही वगैरे मौक्तिकेही ऐकावी लागतात). अर्थात सप्लाय कंट्रोल केला जातो.
शिवाय काही ग्रामीण भागात दूपार उतरायला आल्यावर -मात्र गाई चरायला गेल्या असताना - दूध घ्यायला/मागायला गेलात तर दूध स्वस्तात मिळू शकते असा स्वानुभव आहे. पूर्वी मुंबईत दहिसरमध्ये गोठे होते तेव्हा ठराविक वेळेत दूध घेतल्यास कमी भाव जाहिर केलेला होता. अर्थात वर म्हटल्याप्रमाणे दुग्ध-कुपोषणाचे कारण केवळ आर्थिक नाही. (यावरून आठवले: एका ट्रेकच्यावेळी वाटेत आडगावात थांबून चहापुरते दूध मागताच आडनाव विचारण्यात आले- त्यावरून जातीचा पक्का अंदाज न लागल्याने थेट जात विचारण्यात आली आणि मग दुधाचा भाव सांगितला गेला)
पश्चिम महाराष्ट्रात करत नसावेत. इतरत्र काही पॉकेट्समध्ये त्याशिवाय गत्यंतर नसावे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
विज्ञानाच्या दृष्टीने मानवी
विज्ञानाच्या दृष्टीने मानवी बालकांना (मातेच्या दुधानंतर*) दुधाची गरज असूच नये ना? इतर प्राण्यांना कुठे गरज असते?
*मातेचे दूध पुरेसे नसेल तर बाह्य दुधाची गरज पडू शकेल.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सहमत आहे. तशी गरज नसावीच.
सहमत आहे. तशी गरज नसावीच. गेल्या दहाबारा हजार किंवा कदाचित त्यापेक्षाही कमी वर्षांतले इनोव्हेशन आहे हे. त्यामुळे अजूनही "लॅक्टोज इन्टॉलरन्स" नामक प्रकार हा "रेशियल" ट्रेट आहे. जे समाज शेतीपासून जितके दूर किंवा कमी/नंतर एक्स्पोस्ड तितका त्यांचा लॅक्टोज इन्टॉलरन्स जास्त असतो असे सर्वसामान्य निरीक्षण आहे.
कम टु थिंक ऑफ इट दो, दुसर्या प्राण्याचे दूध प्यायचे हा शोध माणसाला कुठून लागला असेल? डोकं लैच जबरी बॉ माणसाचं.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ते सोडा...
ते सोडा. दुसर्या प्राण्याचे दूध काढायचे हा शोध माणसाला कुठून लागला असेल?
आय रिज़र्व माय ओपीनियन.
एकदा का दूध प्यायचं हे ठरलं
एकदा का दूध प्यायचं हे ठरलं की कसं काढायचं हे कळणं तुलनेनं सोपं आहे.
बाकी डोकं मात्र आहेच- सवालच नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कम टु थिंक ऑफ इट दो, दुसर्या
माणसाचा हा जर शोध असेल (म्हणजे अगोदर नव्हता, मग एका समाजात लागला, मग जगभर पसरला, इ इ ), आणि अग्नि हा ही शोध असेल, तर असे चार पाच महत्त्वाचे शोध (आणि शक्य असेल तर त्यांचा संभाव्य क्रम) सांगता का?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
मला तर कॉन्ट्रासेप्टीव्ह हा
मला तर कॉन्ट्रासेप्टीव्ह हा शोध फार भारी वाटतो ब्वॉ!
नसतेच...
दुधाची "गरज" अशी कुठे असते?
पण भरपूर पोषण मूल्ये असलेला तो एक पदार्थ आहेच की.
दूध पूर्णपणे वगळून इतर पोषक आहार घेतला, व मांसाहारातील निदान अंडी खाल्लीत तर दुधाला अन्नातून हद्दपार करता येते. "गरज" अशी नाहिच.
गरज शरीराची नाही, पण संस्कृती, मार्केट,अर्थव्यवस्था, थाट ह्याची नक्कीच असेल.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
"दूध मिळत नसेल तर..."
"...अंडी खा!" - 'न'.बा. आन्त्वानेत.
पण मग तसे केल्यास (निषेध म्हणून वगैरे) अंडी फेकणार्यांवर कम्बख्ती येईल. "इथे कुपोषण असताना, महाराष्ट्र अंड्यांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण नसताना केवढी ही नासाडी! कोल्हापुरात अंडी फेकून मारली नसती, तर बुलढाण्यातील कुपोषित मुलांना अंडी मिळाली नसती? तरी हे निंदनीय कृत्य करणारांनी अंडी घालून प्रायश्चित्त घ्यावे," वगैरे वगैरे.
(प्रस्तुत लेखाचे भडक नि ग्रोस शीर्षकही अधिकच भडक नि ग्रोस झाले असते, परंतु त्या तपशिलांत शिरू इच्छीत नाही. टॉक अबाउट रिडीक्युलस.)
मध्ये स्पेस आल्याने त्या आई
मध्ये स्पेस आल्याने त्या आई नंतरच्या कोट्स ची दिशा चुकलेली आहे
खर्च व पोषण यांचे गणित
खर्च व पोषण यांचे गणित केल्यास तसेच प्रगतीशील देशातील कुपोषण बघता, दुध हे अशा देशांत गरजेचे आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय (कित्ती कित्ती दिवसांनी वापरला हा शब्द!) नसावा.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
विचार करुन पाहीले - स्वतःच्या
विचार करुन पाहीले - स्वतःच्या मुलाला दूध पाजण्यातच (त्यांच्या भूकेच्या फ्रिक्वेन्सीमुळे अन छोट्याशा पोटात काही टिकत नसल्यामुळे ) जीव इतका मेटाकुटीला येतो की अन्य कोणाच्या मुलाला दूध पाजण्याचा विचारच करवत नाही
नाही त्या ग्रेटच आहेत.
विचारही ग्रेटच आहेत. अभिषेक वगैरेवर दूध नासूच नये.
४४६
बिल्ला क्र ४४६ यांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मी लहानपणी आई वाचत असलेल्या
मी लहानपणी आई वाचत असलेल्या श्रावणातल्या कहाण्या ऐकायचो. मला त्यातील सोमवारच्या कहाणीतील खुलभर दुधाची गोष्ट आठवते. त्यातून कुणी अर्थबोध घेत नाही. मुश्रीफांना सांगितली पाहिजे ती कहाणी. ओ माय गॊड मधे दुधाचा अभिषेकावर छान टिपणी केली आहे. आमची शेतीवाडी गाईगुर असल्याने मी दुध दुभत्यात वाढलो. मला कंपल्सरी गाईचे दुध प्यायला लागायचे. त्याची चव मला आवडायची नाही.पण गाईचेच दुध प्यायचे म्हणुन पुण्याहून माझ्यासाठी खास बोर्नव्हिटा किंवा साठे ड्रिकिंग चॉकलेट आणले जायचे.ते दुधात घालून प्यायचो. म्हशीचे दुध आवडायचे. नैवेद्याला साखर घातलेले दुध प्यायला खूप आवडायचे. घरात धार्मिक कार्याला अभिषेकाला शास्त्रापुरती दुधाने आंघोळ घातली जायची. थोडक्यात दुध हा जीवनाचा अपरिहार्य घटक होता.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
माझी आवडती गोष्ट आहे ती.
माझी आवडती गोष्ट आहे ती. चाईल्डीश वाटेल विशेषतः वैचारीक बकासुरी आहार असणार्यांना पण त्या कथेतील मनातील भावाचे महात्म्य खूप आवडते. बाकी सर्वांना फसवता येते, देवाला (अंतरात्म्याला) कसे फसवाल?
धार्मिकतेचा भर मनुष्याने
धार्मिकतेचा भर मनुष्याने जीवनात सद्वर्तन करावे हे सांगण्याचाच राहिला आहे. धर्म आणि धर्माचा अनैतिक वापर ची तुलना कायदा आणि कायद्याचा अनैतिक वापर शी केला तर धर्मराज्यच बरे वाटते. गोष्ट वाचून छान वाटले.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अनैतिक वापर कोणत्याच बाबतीत
अनैतिक वापर कोणत्याच बाबतीत चांगला वाटत नाही. धर्माचा अनैतिक वापर = जोगते/जोगतिणी , सती प्रथा, अंधश्रद्धा, बळी प्रथा व बरेच काही.
यात डावे उजवे काहीही वटत नाही.
धर्माचा "अनैतिक" वापर तितकाच गलीच्छ.
हे अर्थातच आहे. पण
हे अर्थातच आहे. पण कायद्याच्या नावाखाली वेल्थ ट्रांन्सफर चालली आहे तिचाही विचार करावा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
प्रदर्शनार्थ अपव्यय
थॉर्स्टीन वेब्लेन (विकिपीडिया दुवा) याने अर्थकारणात (वा अर्थमानसशास्त्रात) "प्रदर्शनार्थ उपभोग" (conspicuous consumption) ही संकल्पना सांगितली. त्यातही एक टोकाचा प्रकार म्हणून "प्रदर्शनार्थ अपव्यय" (conspicuous waste) हा प्रकार सांगितला.
वेब्लेनच्या मते गरीब आणि श्रीमंत, दोन्ही प्रकारचे लोक "प्रदर्शनार्थ खर्च" करतात, "प्रदर्शनार्थ विश्राम" घेतात, जेणेकरून बाकीच्या लोकांवर प्रभाव पडावा. असे केल्यामुळे त्यांचे समाजातील वरचे स्थान सिद्ध होते, बळकट होते, आणि पुढे त्यांना फायदा मिळत जातो.
---
वेब्लेनला अर्थशास्त्राचा प्रणेता मानण्यापेक्षा चांगल्यापैकी व्यंग्यसाहित्यिक म्हटले पाहिजे. त्याचे विश्लेषण आर्थिक निर्णय घेण्यास ठोस आधार देत नाही. त्याने त्याच्या सूत्रांच्या पुष्टीकरिता खरोखरची निरीक्षणे वापरण्याऐवजी काल्पनिक दृष्टांत वापरले. परंतु त्याचे लेखन आठवावे असे प्रसंग पुन्हापुन्हा डोळ्यांसमोर येतात.
करेक्ट!!! हॉटेलमध्ये
करेक्ट!!! हॉटेलमध्ये सर्वांच्या बरोबर मुद्दाम (प्रदर्शनार्थ) खाणे ताटात सोडणे हा मला या प्रकारचा अपव्यय वाटतो. अगदी सर्व संपविणे लोक = भिकारड्यासारखे मानताना पाहीले आहेत.
माणसाच्या प्रदर्शनार्थी अप्रामाणिकपणाची खिल्ली उडवावी तितकी कमीच वाटते.
श्रीमंत लोक हे एक प्रकारचे प्रदूषण आहे
वेब्लेन यांची हीच थियरी ब्रॅड डीलाँग यांनी पुढे नेऊन श्रीमंत लोक हे एक प्रकारचे प्रदूषण आहे अशा टाईप मधे मांडलेली होती. अर्थात डीलाँग यांनी प्रदूषण हा शब्द वापरला नव्हता पण तो शब्द ग्रेग मॅनक्यु यांनी वापरला होता.
डिलाँग यांच्या लेखाचा दुवा
मॅनक्यु यांच्या लेखाचा दुवा
चांगले दुवे, धन्यवाद
चांगले दुवे, धन्यवाद.
धनंजय जी !
धनंजय जी
तुमचे म्हणणे १०० % अचुक आणि मला माझ्या बाबतीत १०० % मान्य.
मला मात्र यात एक पॅरॉडॉक्स आहे.
१-माझे वरील विधान मी नुसते एका अक्षराने जरी व्यक्त जरी केले तर ते प्रदर्शनार्थ खर्च होईल.
२-वरील प्रतिसादा वर उत्तर न देता गप्प बसलो तर प्रदर्शनार्थ विश्राम होईल.
असेही आणि तसेही म्हणुन मी हा प्रतिसाद देउन प्रदर्शनार्थ खर्च करतो.
आणि खर्च च केल आहे तर अजुन प्रदर्शन करत एक प्रश्न विचारतो
गे परेड आणि कमिंग आउट या संकल्पने संदर्भात आपण वरील थेअरी कडे कसे बघतात.
हो मी गे आहे म्हणुन रस्त्यावर येणे प्रदर्शनार्थ खर्च होते ?
की गे म्हणुन लपुन राहणे प्रदर्शनार्थ विश्राम होते का ?
हे मी कोर्णाक च्या शिल्पांवीषयी संपुर्ण आदर बाळगुन विचारतो
तुम्ही प्रतिसाद देउन वा टाळुन
प्रदर्शनार्थ खर्च / प्रदर्शनार्थ विश्राम करायचा पर्याय अर्थातच निवडु शकतात.
याने कीमान आता तुम्हाला प्रतिसाद देताना मी कोणत्या पॅरॉडॉक्स मधुन गेलो याची कल्पना यावी.
इतकाच हेतु आहे. तुम्हाला दुखवणे नाही.
www.theparisreview.org
http://all-art.org
www.spring.org.uk
:-)
"कमिंग आऊट"
"कमिंग आऊट" घटना प्रदर्शनाशी फारशी संबंधित नसावी.
व्यक्तिगत "कमिंग आऊट" घटनेमध्ये तर प्रदर्शनार्थ काही नाहीच ("व्यक्तिगत"च्या व्याख्येमुळे).
प्रिय व्यक्तींसोबत उघड असण्यातही भावनांचा प्रामाणिकपणा प्राथमिक आहे, जेणेकरून प्रिय व्यक्तींबरोबर भावनांची देवाणघेवाण, परस्पर आधार, वगैरे आचरण अधिक बळकट आणि परिणामकारक होते. ज्या संदर्भात भावनांची देवाणघेवान होते आहे, ती संदर्भचौकट उघड असणे म्हटल्यास "प्रदर्शन" असली, तरी "प्रदर्शनार्थ" नाही. संदर्भचौकट उघड नसली, तर देवाणघेवाण नि:संदर्भ होऊ शकते.
आपल्याच समाजातील तिर्हाइतांकडे कम-आऊट असण्यातही समाजातील वावरातला साधेपणा आणि सर्वांना उपलब्ध असलेल्या सोयींचा समसमान लाभ, समसमान जबाबदार्या, हा उद्देश असतो. समाजात तिर्हाइतांकडून काही व्यक्तिगत चौकशा होणे सामान्य आहे - तेव्हा विचित्र मौन किंवा असत्य बोलणे हा वाकडेपणा त्रासदायक असतो. अथवा "मला काही विचारू नका" अशी खत्रुड प्रतिमा तयार करून चौकशा->असत्य टाळले, तर बिगर-खत्रुड लोकांचे एकमेकांसह चांगले वागणे मुकावे लागते. शिवाय समाजात उघड ठिकाणी सह-मनोरंजन वगैरे घेण्याच्या सोयी असतात, ज्यांनी नाती बहु-आयामी होऊ शकतात. (Dating आणि Hookup मधील फरक मोठाच असतो.) शिवाय कायद्याकडून रक्षण (असल्यास मिळवणे, नसल्यास ते मिलवण्याकरिता लोकशाही प्रयत्न करणे), वगैरे मुद्दे जीवहानी वा वित्तहानी टाळण्याकरिता महत्त्वाच्या असतात.
मिरवणुका
मिरवणुकांवरील खर्चाच्या बाबतीत समलिंगी आणि विषमलिंगी असा काही आर्थिक फरक स्पष्ट माहीत नाही. त्यामुळे प्रश्न सुसंदर्भ वाटत नाही.
" " चिन्ह शीर्षकात कशाकरिता वापरले?
वरील प्रतिसाद/पृच्छा मला सकृद्दर्शनी विषयापासून अवांतर भासली. "कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे" वाचल्यानंतर "वावरात प्रामाणिकपणा नसेल तर जगण्यात त्रुटी येते" हा मुद्दा समोर यायला हवा होता. त्या लेखानंतर मोठी प्रतिसाद-शृंखला सुद्धा आहे. त्यामुळे या इथल्या धाग्यात अवांतर उपचर्चा वाढवण्यात काही हशील नाही. नवी माहितीसुद्धा नाही, आणि "दुग्धाभिषेका"बाबत संवादही नाही. ही उपचर्चा "अवांतर आहे" दाखवण्यासाठी एका प्रतिसादापुरतीच आहे, असे सूचित करण्याकरिता हे चिन्ह वापरलेले आहे.
धनंजय जी !
धनंजय जी
नवि बाजु यांनी खालील प्रतिसादात दाखवुन दिले की लेखाचे शीर्षक भडक आहे.यावर ते बदलुन मी फ़क्त दुध असे न्युट्र्ल ठेउन माफ़ी मागितली.
नवि बाजुंचा प्रतिसाद
"...अंडी खा!" - 'न'.बा. आन्त्वानेत.
पण मग तसे केल्यास (निषेध म्हणून वगैरे) अंडी फेकणार्यांनवर कम्बख्ती येईल. "इथे कुपोषण असताना, महाराष्ट्र अंड्यांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण नसताना केवढी ही नासाडी! कोल्हापुरात अंडी फेकून मारली नसती, तर बुलढाण्यातील कुपोषित मुलांना अंडी मिळाली नसती? तरी हे निंदनीय कृत्य करणारांनी अंडी घालून प्रायश्चित्त घ्यावे," वगैरे वगैरे.
(प्रस्तुत लेखाचे भडक नि ग्रोस शीर्षकही अधिकच भडक नि ग्रोस झाले असते, परंतु त्या तपशिलांत शिरू इच्छीत नाही. टॉक अबाउट रिडीक्युलस.)
आता तुम्ही त्यानंतर मी अगोदर शीर्षक भडक ठेउन प्रदर्शनार्थ खर्च करतो व त्यानंतर बदलुन त्यावर काहीही न बोलता गप्प बसुन प्रदर्शनार्थ गप्प बसुन विश्राम करतो हे खालील थेअरी चे वाक्य देउन स्पष्ट करतात.(असे अनुभव येत असतात आज माझ्याविषयी आला)
तुमचा प्रतिसाद
वेब्लेनला अर्थशास्त्राचा प्रणेता मानण्यापेक्षा चांगल्यापैकी व्यंग्यसाहित्यिक म्हटले पाहिजे. त्याचे विश्लेषण आर्थिक निर्णय घेण्यास ठोस आधार देत नाही. त्याने त्याच्या सूत्रांच्या पुष्टीकरिता खरोखरची निरीक्षणे वापरण्याऐवजी काल्पनिक दृष्टांत वापरले. परंतु त्याचे लेखन आठवावे असे प्रसंग पुन्हापुन्हा डोळ्यांसमोर येतात.
यावर गप्प बसु की उत्तर देउ असा पॅरॊडॊक्स मला पडतो. तो तुम्हाला कळावा यासाठी हा प्रश्न विचारला होता. तुम्हाला दुखावण्याचा हेतु कधीही नव्हता.
चुक तर मान्य च आहे मला आता आणखी कसा व्यक्त होउ हा प्रश्न होता.कारण गप्प बसणे हा ही प्रदर्शनार्थ विश्राम आहे असे तुम्ही सुचवितात. आणि व्यक्त झालो तर प्रदर्शनार्थ खर्च झाला.
www.theparisreview.org
http://all-art.org
www.spring.org.uk
गैरसमज - दुधाची नासाडी हा प्रदर्शनार्थ खर्च
काहीतरी गैरसमज होत असावा. दुधाची नासाडी हा प्रदर्शनार्थ अपव्यय आहे, असा माझ्या प्रतिसादाचा मुद्दा आहे. तो तुमच्या मूळ धाग्याच्या विषयाला (बहुधा) सहमतिदर्शक आहे. प्रतिसाद लिहिताना मूळ धाग्याशी बहुतेक सहमती सांगत आहे, अशी खात्री होती.
धाग्याचे शीर्षक बदलणे वगैरे प्रतिसाद मी वाचलेले नाहीत. त्यांच्यावर प्रदर्शनार्थ मौनही नाही आणि प्रदर्शनार्थ प्रतिसादही नाही. आणि या प्रतिसादशृंखलेनंतर वाचणारही नाही.
अवांतर
भारतीय लेखक वा इतर कोणताही लेखक जे सामान्यपणे लिहून/अभिप्रेतून सांगतो त्यासाठी हे इंग्रज वेगळी थेरी का बनवतात? या थेर्यांचा , त्यांच्या मागचा संपूर्ण संदर्भ पुनरुद्धृत करणे इतके क्लिष्ट असते कि मला त्यात काही अर्थ वाटत नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
समजले नाही
"क्लिष्ट आहे" म्हटले तर समजू शकतो.
पण "अवांतर आहे" ते कसे?
"वाया घालवणे वाईट असते" अशा प्रकारचे लेखन पुष्कळ वाचले आहे, परंतु "वाया घालवण्याचे उद्दिष्ट्य असते, ते कसे आणि त्याचा परिणाम काय?" असे विश्लेषण क्वचितच कुठे वाचलेले आहे. हा फरक नुसता क्लिष्ट करणारा नाही, तर वेगळा मुद्दा आहे. भारतीय लेखकांनी केलेल्या विश्लेषणाचीसुद्धा माहिती द्यावी. आपण एकमेकांना येथे संवादाने माहिती पुरवत असतो.
"उद्धरणाची लांबी" वगैरे टीका फारच सूक्ष्म आहे. जमल्यास प्रतिसादांच्या शैलीत सुधार करेन किंवा प्रयत्न जड वाटल्यास सुधार करणार नाही.
"वाया घालवणे वाईट असते" अशा
"वाया घालवणे वाईट असते" अशा प्रकारचे लेखन पुष्कळ वाचले आहे, परंतु "वाया घालवण्याचे उद्दिष्ट्य असते, ते कसे आणि त्याचा परिणाम काय?" असे विश्लेषण क्वचितच कुठे वाचलेले आहे. हा फरक नुसता क्लिष्ट करणारा नाही, तर वेगळा मुद्दा आहे.
धनंजयराव, या वाक्यासाठी माझ्याकडून तुम्हास एक चिकन बिर्याणी + टेकिला ची पार्टी. काय जबरदस्त लिहिलेत राव.
कोण्या भारी चिकन आणि टेकिला
कोण्या भारी चिकन आणि टेकिला पार्टीचे वर्णन वाचले तर तिथेच काय का वाया घालवले हे वाचायला मिळेल.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
थेर्या संदर्भ बदलला कि गळून पडतात
हा कोट आपण दिला आहे. हे निरीक्षण माणसाची थेरी /थिअरी म्हणून बर्याच विद्वान लोकांना ज्ञान असणे /असावे हे मला कुतुहलाचे वाटते. आणि संदर्भ नीट सांगता येत हाच खरा मुद्दा आहे. कारण वापरलेल्या प्रत्येक शब्दाला एक सिमित , गतिमान अर्थ आहे. दिखावा आणि भोग/सेवन हे शब्द भारतीय साहित्यात कितीदा तरी जोडून सांगीतले आहेत. थोडासा संदर्भ बदलला कि थेरी गडबडते म्हणून मला या थेर्या क्षुद्र वाटतात हे सांगायचे होते. अर्थातच हे धाग्याच्या विषयाशी अवांतर आहे.
माझी आई सकाळी उठल्या उठल्या एक स्त्रोत्र म्हणे. त्यातल्या काही ओळी उलट्यासुलट्या क्रमाने मी खाली लिहितो - गरीबाचे श्रीमंताच्याबद्दलचे फ्रस्टेशन त्यात ईश्वरावर श्रीमंत असण्याचा करून केला आहे असे मानता येईल. (अचूक उदाहरण देण्याइतके साहित्य मला माहितच नाही, म्हणून अॅडजस्ट्मेंट)
समर्थाचिये घरचे श्वान, त्याशी सर्वे देती मान, हा अपमान कौणाचा?
द्रौपदीशी वस्त्रे अनंता, पुरवित होताशी भाग्यवंता, आम्हालागी कृपणता, कोठुनिया आणलिशी?
अन्नासाठी दाहीदिशा, आम्हा फिरविशी जगदिशा, ....ऋषिश्वरांच्या बैसल्या पंक्ति, तृप्त केल्या क्षणमात्रे...
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सिग्नलिंग ही एक दणकट
सिग्नलिंग ही एक दणकट अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. (काहींच्या मते ती मुळात मानसशास्त्रीय संकल्पना आहे. काहींच्या मते समाजशास्त्रीय.) मायकेल स्पेन्स यांनी १९८१ मधे याबद्दल चा एक महत्वाचा संशोधनात्मक पेपर लिहिला होता. त्याबद्दल त्यांना नोबेल ही मिळाले होते.
ठिक आहे. आपल्याला एक सल्ला
ठिक आहे. आपल्याला एक सल्ला आहे. कोर अर्थशास्त्र, सीमेवरचं अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्राच्या बाहेरच्या गोष्टी यांचे स्वरुप स्प्ष्ट करणारा एक छोटेखानी लेख लिहा. हे यासाठी कि विज्ञान, नैतिकता आणि कायदा यांचेच कंफ्यूजन सरता सरत नाहीय. अर्थशास्त्र हीच एक मूळ शाखा असेल आणि तिच्याच काही मानवी मूलभूत प्रेरणा असतील तर हा या शास्त्राचा स्कोप माहित हवा.
थोडक्यात कुठे अर्थशास्त्राच्याचे म्हणणे ऐकावे आणि कूठे त्याला 'हो बाजूला' म्हणावे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
भारतीय लेखक वा इतर कोणताही
भारतीय लेखक वा इतर कोणताही लेखक जे सामान्यपणे लिहून/अभिप्रेतून सांगतो त्यासाठी हे इंग्रज वेगळी थेरी का बनवतात?
तुमच्या प्रश्नाचे थेट उत्तर हे की - अर्थशास्त्री मंडळी Positive Vs. Normative असा भाव करतात. याला Descriptive Vs Prescriptive असे ही म्हणतात. पॉझिटिव्ह म्हंजे विवेचनात्मक/विवरणत्मक. व नॉर्मेटिव्ह म्हंजे विवेचनातून जे निष्पन्न होईल त्याला पॉलिसी रिस्पॉन्स काय असावा याबद्दल लिखाण. व ही पद्धत (Descriptive Vs Prescriptive ) बव्हंशी अर्थशास्त्री वापरतात असा माझा समज आहे. भारतीय व/वा इंग्रज.
मागे धाग्याचे शीषर्क काय
मागे धाग्याचे शीषर्क काय होते? माफी मागावी लागली म्हणजे कोण दुखावले गेले, गेले असते?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सध्याच्या शीर्षकामुळे मी दुखावलो गेलो आहे.
सध्याच्या शीर्षकामुळे मी दुखावलो गेलो आहे. दुध ऐवजी दूध असे लिहिल्यास मी दुखावलो जाणार नाही.
विनोदी?
या प्रतिसादास विनोदी श्रेणी? दुध हा अशुद्ध शब्द वाचून दुखावले जाणे हे विनोदी का वाटावे?
इदं न मम, पण... (हितोपदेश, गीतोपदेश किंवा काय वाट्टेल ते)
...बोले तो, ही श्रेणी आम्ही दिली नाही, पण तरीही:
- आपल्या प्रतिसादाला वाटेल त्याने वाटेल ती श्रेणी दिली, तरी त्याचे एवढे मनास काय म्हणून लावून घ्यावे? आम्ही नाही वाटेल त्या प्रतिसादांस 'भडकाऊ' आणि 'माहितीपूर्ण' या श्रेणींचे सढळहस्ते प्रदान करत? तसाच प्रकार समजावा.
- लिहिण्याचे काम आपले, श्रेणी देण्याचे काम इतरांचे. आपण आपले लिहीत रहावे, श्रेणींची चिंता करू नये. 'निष्काम कर्मयोग' यालाच म्हणतात.
- श्रेणींचे असे आहे: 'देणार्याने देत जाव्यात, घेणार्याने घेत जाव्यात, नि देता देता एके दिवशी देणार्याच्या परतवून लावाव्यात'. (जमले नाही नीटसे बहुधा. हवे तसे बदलून घ्यावे.)
- आणि एवढेच असेल, तर आपल्याला हव्या त्या श्रेणी बिनधास्त (आणि निर्लज्जपणे) मागून घ्याव्यात. आम्हीही हेच करतो. (कोणीतरी 'मार्मिक' नाहीतर गेलाबाजार 'माहितीपूर्ण' द्या रे या प्रतिसादाला!)
गेलाबाजार कोणता part of
गेलाबाजार कोणता part of speech आहे? त्याचा अर्थ काय? आगमागचा?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
उत्तर
येथे पहावे. किंवा येथे.
दाते शब्दकोशाप्रमाणे:
गेला बाजार तरी = किमानपक्षीं; निदान; कमीतकमी; बाजार होऊन गेल्यावर विकला तरी. (उदा., 'गेला बाजार तरी त्या पागोटयाचें पांच रुपयें मिळतील.')
मला तर असे वाटत नाही की
मला तर असे वाटत नाही की धाग्याचे मागील/मूळ्/पहिले शीर्षक कुणाला तरी दुखावणारे असेल/होते.