एअर इंडिया मध्ये सध्या काय चालले आहे?
1960च्या दशकात किंबहुना 1970 च्या दशकात सुद्धा, प्रवाशांना देण्यात येणार्या सुखसोयींचा विचार केला असता, भारताची राष्ट्रीय विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाची गणना, जगातील त्या वेळच्या सर्वोत्कृष्ट विमान कंपन्यांत होत असे. पुढच्या बाजूस पंखे असलेल्या सुपर कॉन्स्टेलेशन विमानांचा ताफा या कंपनीकडे प्रथम असे व नंतर या विमानांची जागा बोइंग कंपनीच्या 707 या जेट विमानांनी घेतली होती. 1975 मध्ये एअर इंडियाच्या विमानाने मुंबई ते रोम असा केलेल्या माझ्या पहिल्या आंतर्राष्ट्रीय प्रवासाच्या सुखद स्मृती अजूनही माझ्या स्मरणात आहेत. ते विमान, त्यातील सुखद इंटिरियर डिझाइन, बसण्याची आरामदायी आसने, दोन रांगांमध्ये पुरेसे अंतर ठेवलेले असल्याने पाय ताणून देण्याची असलेली सुविधा, तसेच रुचकर खाद्यपदार्थ व पेये यांची रेलचेल या सर्व गोष्टींमुळे तो प्रवास बहुधा आजही स्मरणात राहिला आहे. त्या वेळेस सुद्धा एअर इंडियाच्या विमानातील हवाई सुंदरी आजच्या सारख्याच साडी परिधान केलेल्या असत. परंतु त्या वेळेस एअर इंडियाची साडी ही एक फॅशन अभिव्यक्ती मानली जात असे आणि अनेक स्त्रिया बाहेर बाजारात एअर इंडिया डिझाइन समान डिझाईन असलेल्या साड्या आवडीने खरेदी करत असत. भारतातील एका विशाल औद्योगिक गटाची धुरी सांभाळणारे कै. श्री. जे.आर.डी.टाटा हे त्या वेळेस एअर इंडियाचे चेअरमनपद संभाळत असत असत आणि एअर लाइन्स उद्योगातील जागतिक मानकांप्रमाणे एअर इंडियाचे कार्य चालू आहे की नाही याकडे ते जातीने लक्ष घालत असत.
1975 या वर्षापासून मात्र एअर इंडियाची परिस्थिती उतरणीला लागली. लागली.या वर्षी तेंव्हाच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी जेआरडी टाटा यांना पदभार सोडण्याची आज्ञा केली आणि चेअरमनचे अधिकार, ज्याला विमान कंपनी चालवण्याच्या धंद्यातील ओ किंवा ठो माहीत नव्हते अशा दिल्लीतील कोणा नोकरशहाला दिले. तेंव्हापासून एअर इंडिया प्रवाशांना देत असलेल्या सेवेचा दर्जा खालावण्यास सुरवात केली. 2007 मध्ये मध्यवर्ती सरकारने, एअर इंडियाचे आणि सदोदित नुकसानीत चालणार्या आणि सेवेचा दर्जा अत्यंत नित्कृष्ट असलेल्या इंडियन एअरलाइन्स या विमानसेवेचे, एकत्रीकरण केले आणि एअर इंडियाची मृत्यूघंटाच वाजवली असे म्हटले तरी चालेल. शक्य तेवढ्या अडचणींचा डोंगर अंगावर घेऊन, कशीतरी विमानसेवा पुरवणार्या इंडियन एअरलाइन्स बरोबर झालेल्या एकत्रीकरणाने, एअर इंडिया आतापर्यंत देत असलेल्या सेवेचा दर्जा आणखी खालावत गेला.
विमानसेवा पुरवणार्या खाजगी विमान कंपन्यांच्या भारतातील आगमनामुळे सरकारी मालकीच्या विमान कंपन्यांची भारतातील मक्तेदारी संपुष्टात आली आणि त्यांच्यापुढची व्यावसायिक संकटे वाढतच जाऊ लागली. एअर इंडियाच्या, इंडियन एअरलाइन्स बरोबर झालेल्या एकत्रीकरणाला आता 6 वर्षी पूर्ण झाली असली तरी प्रत्यक्षात या दोन्ही विमानसेवांचे एकत्रीकरण जेमतेम 70% पूर्ण झाले आहे. एकत्रीकरण झालेल्या कंपनीच्या या दोन्ही विभागांमध्ये असलेल्या कर्मचार्यांचे पगार आणि पदोन्नतीची उपलब्धता यांच्यात अजूनही मोठी तफावत असल्याचे दिसते आहे. 1975 सालापासूनच एअर इंडिया ही कंपनी कर्मचार्यांबरोबरचे विवाद आणि कर्जबाजारीपणा यांच्या विळख्यात अडकलेली आहे. हे विवाद अजूनही सुरूच आहेत. आज एअर इंडियाच्या डोक्यावर कर्जाचा प्रचंड डोंगर उभा आहे आणि ती केवळ मध्यवर्ती सरकार कडून मिळत असलेल्या पैशांमुळे कशीबशी तग धरून आहे.
एकेकाळी जगभर सुप्रसिद्ध असलेल्या या विमान कंपनीची ख्याती आता इतक्या खालच्या पातळीवर आहे की भारतीय प्रवासी सुद्धा जर दुसरा कोणताच विकल्प उपलब्ध नसला तरच एअर इंडियाने प्रवास करण्याचा विचार करतात. मात्र एअर इंडियाच्या या खालावलेल्या प्रतिमेमागची कारणे त्या कंपनीची खराब आर्थिक परिस्थिती किंवा तिच्या ताफ्यात असलेली विमाने ही नसून अनेक छोट्या मोठ्या विवादास्पद प्रसंगामुळे ती तशी बनली आहे. हे प्रसंग खरे तर चांगले व्यवस्थापन आणि योग्य रित्या सर्व पातळ्यांवर आणि विमानकंपनीची विविध अंगे असलेल्या सर्व सेवांबाबत, केलेल्या दर्जा विषयक चाचण्या आणि तपासण्या यांचे व्यवस्थित पालन केल्यास सहज रित्या टाळता येणे शक्य आहे.
2013 च्या मे महिन्यात एअर इंडियाच्या एका उड्डाणाच्या दरम्यान विमानाची ऑटोपायलट यंत्रणा, विमानाचे दोन्ही पायलट एकाच वेळी विश्रांती घेत असल्याने दुसर्याच कोणाच्या तरी हातून चुकून बंद केली गेली. वृत्तपत्रांतील बातम्यांनुसार एका हवाई सुंदरीच्या हातून ही घटना घडली होती. या घटनेनंतर याच महिन्यात, एअर इंडियाच्या एका विमानाला, पायलट केबिनच्या बाहेर असलेल्या टॉयलेट मध्ये गेलेला असताना केबिनचे दार लॉक झाल्याने, केबिनच्या बाहेर अडकून पडावे लागले होते. विमानाचा पायलटच केबिनच्या बाहेर अडकल्याने, विमानाला परत खाली जमिनीवर उतरण्याचे आदेश कंट्रोल टॉवरला द्यावे लागले होते.
याच प्रकारच्या आणखी दोन घटना, ज्यांना एअर इंडियाचे कर्मचारी आणि तपासणी यंत्रणांचा आत्यंतिक निष्काळजीपणाच कारणीभूत आहे, घडल्याचे वृत्त नुकतेच परत वाचनात आले. 28 सप्टेंबर 2013 रोजी न्यूयॉर्क येथून नवी दिल्लीला जाणार्या एअर इंडियाच्या विमानातील एका प्रवाशाने तक्रार केली की त्याला उड्डाणाच्या दरम्यान दिल्या गेलेल्या सॅन्डविचमध्ये किडे असल्याचे आढळून आले. एअर इंडियाच्या एका प्रवक्त्याने या प्रकरणात न्यूयॉर्कच्या ज्या खानपान सेवा कंपनीने हे खाद्यपदार्थ पुरवले होते त्यांच्यावर जबाबदारी ढ्कलण्याचा प्रयत्न केला. त्याच्या निवेदनाप्रमाणे ही खराब सॅन्डविचेस, भारतातील कोणीही पुरवली नसून अमेरिकेमधल्याच एका प्रसिद्ध खानपान सेवा देणार्या कंपनीने पुरवली होती व हीच कंपनी अमेरिकेमधील सर्व बड्या विमानकंपन्यांना ही सेवा पुरवीत असते. सर्वसाधारणपणे खानपानसेवा पुरवणार्या कंपन्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबद्दल अतिशय काळजी घेत असतात. परंतु ही घटना घडल्यामुळे एअर इंडिया या कंपनीविरूद्ध योग्य ती कारवाई म्हणे करणार आहे.
या महिन्यात (ऑक्टोबर 20130) घडलेली आणखी एक घटना म्हणजे बेंगलुरूकडे जाणार्या एअर इंडियाच्या नव्या कोर्या ड्रीमलायनर किंवा बोइंग 777 विमानाच्या खालच्या बाजूचे एक पॅनेल विमान हवेत असतानाच खाली गळून पडले. विमान उड्डाण सुरक्षा या विषयातील तज्ञ मंडळींच्या मताप्रमाणे, जरी हे विमान सुखरूपपणे विमानतळावर उतरले असले आणि त्यातील 150 प्रवासी काहीही दुखापत होण्यापासून वाचले असले तरी हे सर्व प्रवासी एका महाभयंकर दुर्घटनेचे शिकार होण्यापासून केवळ सुदैवानेच वाचले आहेत. मात्र तरीही एअर इंडियाच्या सुरक्षा अधिकार्यांनी या प्रकरणाची चौकशी करणार्या Indian Directorate General of Civil Aviation च्या पदाधिकार्यांना हे प्रकरण, विमानाच्या फ्युजलाज ला एक मोठे भोक पडलेले दिसत असूनही फारसे गंभीर नव्हते व आपत्कालीन तर अजिबातच नव्हते असा अहवाल दिला आहे.
कोणालाही सहजपणे हे स्पष्ट व्हावे की वर उल्लेख केलेल्या सर्व घटना अतिशय सरळ सोप्या पद्धतीची शिस्तबद्ध व्यवस्थापकीय यंत्रणा आणि कर्मचार्यांद्वारे विमानाचे उड्डाण होण्याआधी केल्या जाणार्या सेवांच्या दर्जा विषयक तपासण्या, अशा प्रकारच्या उपायांमुळे सहज टाळता येणे शक्य आहे. एअर इंडियाच्या विमानांत, मोडक्या हातांच्या खुर्च्या, खुर्च्यांच्या पाठीवर बसणार्याची मान जेथे टेकते त्या भागावर ठेवले जाणारे टॉवेल्स गायब असणे आणि विमानाच्या आतील भागात असलेल्या पॅनेल्सना तडे गेलेले असल्याने त्याला सेलोटेपने चिकटवून ठेवलेले असणे वगैरे सारख्या डोळ्यांना खुपणार्या गोष्टी नेहमीच दृष्टोत्पत्तीस येत असतात. परंतु असे म्हणणे गैर ठरणार नाही की एअर इंडिया समोरच्या बहुतेक अडचणी या कर्मचार्यांचे औदासिन्य, अकार्यक्षमता आणि निष्काळजीपणा यामुळेच निर्माण होत असतात. व्यवस्थापन कर्मचार्यांच्या एकूण वर्तनामध्ये सुधारणा व्हावी म्हणून साम, दाम, दंड आणि भेद यापैकी कोणत्याच प्रकारची उपाययोजना करते आहे असे दिसत तरी नाही. त्यामुळेच भारताच्या हवाई वाहतूक संबंधी विषयाचे मंत्री ज्यावेळी एअर इंडियाच्या खाजगीकरणाबद्दल अनुकूलता दर्शवतात त्यावेळी त्यात नवल वाटण्यासारखे काही आहे असे मला तरी वाटत नाही.
सध्याच्या कालात ज्या हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या विमान कंपन्या सर्वोत्कृष्ट म्हणून मानल्या जातात त्यापैकी असलेल्या सिंगापूर एअरलाइन्स मधून प्रवास करत असताना मला आलेला एक छोटासा अनुभव येथे देण्याचा मोह आवरत नाही. सिंगापूर- सॅन फ्रान्सिस्को प्रवास करत असताना मला असे आढळून आले की माझ्या आसनासमोरचा टीव्ही पडदा हा सतत काळाच दिसतो आहे. विमानात एकही आसन मोकळे नसल्याने मला दुसरे कोणतेही आसन देणे कर्मचार्यांना शक्य नव्हते. पुढचे 15 ते 19 तास मला त्या उड्डाणाच्या अंतर्गत कोणत्याही करमणुकीशिवाय काढावे लागल्याने मी सिंगापूर एअरलाइन्सच्या विमान सेवेबद्दल बराच नाखूष झालो होतो. प्रवासाच्या अखेरीस, एक कर्मचारी माझ्या आसनापाशी आला व बिघडलेल्या टीव्ही पडद्याबद्दल माझी त्याने क्षमा मागितली व मला झालेल्या असुविधेची भरपाई म्हणून त्याने माझ्या हातात 150 अमेरिकन डॉलरचे एक कुपन त्याने ठेवले. विमानात विक्रीसाठी उपलब्द्ध असलेल्या वस्तूंपैकी कोणतीही हवी ती वस्तू मला त्या कुपनावर घेता येईल असे त्याचे म्हणणे दिसले. विमान कर्मचार्यांच्या अनवधानाने किंवा निष्काळजीपणामुळे विमानातील एका सेवेची योग्य वेळी दुरुस्ती न केली गेल्यामुळे मला जो त्रास सहन करावा लागला होता त्याची भरपाई करण्याची ही पद्धत बघून माझी नाखुशी केंव्हाच निघून गेली. आपल्या ग्राहकांना कशी सेवा दिली पाहिजे याचे हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे. एअर इंडिया कडून अशा काही प्रकारच्या सेवेची अपेक्षा करणे सुद्धा बहुधा मूर्खपणा ठरेल.
जोपर्यंत एअर इंडिया आपल्या विमानांची देखभाल आंतर्राष्ट्रीय दर्जानुसार करत नाही आणि त्यांच्या ग्राहक सेवेचा दर्जा सुधारत नाही तोपर्यंत एअर इंडियाला पूर्वीचे स्थान प्राप्त करणे जवळपास अशक्यप्राय आहे असे मला वाटते.
3 नोव्हेंबर 2013
प्रतिक्रिया
एअर इंडीया लवकर विकून टाकले
एअर इंडीया लवकर विकून टाकले पाहिजे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
कशी दिली?
चार आण्यात देताय काय? दोन घेतो.
एअर इंडियातली माझी इक्विटी
एअर इंडियातली माझी इक्विटी चार आण्यात दोनदा काय दोन करोडदा विकायला तयार आहे. फायनल?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
?
तीचतीच ईक्विटी परतपरत विकणार?
नाही म्हणजे, त्याबरोबर बोनस म्हणून ताजमहाल, नाहीतर कुतुबमिनार, गेला बाजार ब्रूकलिन ब्रिज देताय की नाही?
चला, बोनस म्हणून ताज महालातली
चला, बोनस म्हणून ताज महालातली माझी इ॑॑क्विटी देतो. आता सौदा फायनल?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
एअर इंडिया आणि तशाच अन्य कंपन्या
ह्या विषयावर अधिकारवाणीने लिहावे असे माझे ज्ञान नाही पण सर्वसामान्य चौकस व्यक्ति म्हणून आणि गेली कित्येक दशके प्रवासाचा अनुभव असल्याने माझे दोन पैशाचे मत नोंदवितो.
एअर इंडियामध्ये जे चालू आहे तेच आणि त्याच कारणांसाठी जगभरच्या अनेक कंपन्यांमध्ये दिसून आले आहे.
जुन्या विमान कंपन्या, सरकारी नजरेखालील विमान कंपन्या, अमेरिकेतील मोटरगाडया बनवणार्या जुन्या कंपन्या अशा कंपन्या जेव्हा सुरू झाल्या तेव्हा त्यांना स्पर्धा अशी नव्हतीच. बाजारपेठ मर्यादित होती, ह्या कंपन्या जे देत होत्या त्याला ग्लॅमर होते आणि ग्राहक जे मिळते आहे ते आनंदाने घ्यायला तयार होता. कंपन्यांना सहजगत्या चांगला फायदा मिळत असल्याने त्या काळात कर्मचारी वर्गाला खूष ठेवणे हे सहज जमण्याजोगे होते आणि म्हणून उत्तम पगार, उत्तम पर्क्स आणि सुरक्षित निवृत्तिवेतने देणारे करार कंपन्यांनी आपल्या कर्मचारीसंघटनांबरोबर करून ठेवले होते. (अमेरिकेत फोर्ड मोटर मध्ये काम करणारा आणि हायस्कूलपर्यंतच शिकलेला तान्त्रिक कामगार दोन गाडया, गावाबाहेर प्रशस्त घर हे सहज मिळवू शकत असे.) PanAm, TWA, Alitalia, BOAC, Air India, Air Canada हे सर्व ह्या गटात मोडतात.
६५-७० नंतर परिस्थिति बदलू लागली. खनिज तेलाचे भाव वाढले. पूर्वीच्या एकदोन उत्पादकांच्या जागी दहाबारा नव्या दमाचे स्पर्धक उभे राहिले. ह्या नव्या स्पर्धकांच्या पायात लाडावलेल्या आणि सुखासीन कामाची सवय असलेल्या कर्मचारीवर्गाचे लोढणे नव्हते. ह्यांच्याशी स्पर्धेत उभे राहणे जुन्या खोडांना अवघड जाऊ लागले. त्यतील काहीजण वेळीच सावरले आणि बाकीचे मागेमागे पडू लागले. ह्यामध्ये एअर इंडिया एक आहे.
एअर इंडियाच्या गळयात अजून एक लोढणे आहे. ती सरकारच्या मालकीची असण्यामुळे दिल्लीतल्या मन्त्र्यापासून संत्र्यापर्यंत सर्वाना तिच्याकडून सवलती उकळता येतात आणि आपले देशपरदेशचे लाड पुरवून घेता येतात.
खरे पाहू गेल्यास देशाबाहेर राहणारे भारतीय आणि भारतातून परदेशी येणारे-जाणारे भारतीय हे एअर इंडियाचे कॅप्टिव मार्केट असायला हवे होते. पण तसे ते बिलकुल नाही. उत्तर अमेरिकेतून युरोपकडे जाणार्या कोठल्याहि विमानात ५० टक्के प्रवासी भारतीयच दिसतात आणि युरोपात कोठेतरी विमान बदलून ते पुढे भारताकडे चाललेले असतात. ती सर्व विमाने भरून वाहात असतात. तीच स्थिति आखाती देशांच्या प्रवासाची. बाकी सर्व विमान कंपन्यांची ह्या प्रवाशांच्या जिवावर चांदी चालली आहे पण ह्या वाहत्या गंगेत एअर इंडियाला एक लोटाहि भरून घेता येत नाही ही दु:खाची गोष्ट आहे.
लोकांचे 'एअर इंडिया'बद्दल फार
लोकांचे 'एअर इंडिया'बद्दल फार बरे अनुभव नसल्याचं वाचून मला धक्का बसतो. 'स्वस्त ते मस्त' या तत्त्वानुसार मी तिकीटं घेते. दोन वेळेलाच ए.इ. ने प्रवास केलाय आणि दोन्ही अनुभव चांगले आहेत. त्यांचं जेवण तर फारच आवडलं (अर्थात मी स्वतःच्या हातचं खाते, तेव्हा विरोधाभास अधिक जाणवला असावा). विमानातल्या कर्मचाऱ्यांची वर्तणूकही कायम प्रेमळ, आपुलकीची दिसते. (काही परदेशी विमानकंपन्यांमधल्या तरूण, भारतीय, स्त्री कर्मचाऱ्यांच्या उद्धटपणाचाही अनुभव आहे. वयस्कर स्त्री-पुरुष कर्मचारी प्रेमाने वागतात असंही दिसलं आहे.)
गैरसोय मोजायची तर ब्रिटीश एअरवेजचं विमान ऐनवेळी, विमानात बसलेलं असताना रद्द होणं आणि अस्मादिकांचा जर्मन/शेंगन व्हीजा त्याच दिवशी संपत असल्यामुळे विमातळावर सत्रा खेटे घालायला लागणं (नशीब तो बर्लिनचा जुना, छोटा 'तेगेल' विमानतळ होता), KLM ने आसनसंख्येपक्षा अधिक तिकीटं विकल्यामुळे एक रात्र अॅमस्टरडॅममधे काढायला लागणं, (त्यातही नुकतंच लंडनच्या ट्यूबवर नुकताच बॉंबहल्ला होऊन गेला होता. मी आणि माझा गोरा बॉस यांच्यावर विमातळावरच्या लोकांना जास्तीचा अविश्वास दाखवणं, त्यात निष्कारण वेळ वाया जाणं हे झालं. हे सगळं हातात सगळं सामान वागवत असतानाच.), 'एअर फ्रान्स'ला सांगूनसुद्धा शाकाहारी जेवण न देणं वगैरे प्रकार पाहून झाले आहेत. अमेरिकेत प्रवास करताना विमान वेळेत पोहोचणारच नाही अशी माझी मनाची तयारी असते. निदान ३०% वेळेला विमान तासापेक्षा जास्त उशीरा आलेलं आहे. पाच तासांच्या प्रवासात एक तास उशीर हे फार आहे. अशाच एका प्रवासात, एका रात्री काही तास चॅटानूगा नामक बारकुड्या विमानतळावर उपाशी, तहानलेल्या अवस्थेत घालवल्यानंतर मला (एकदाची) अक्कल आली. खिशात पैसे आणि समोर कपाटात खाणं असणं पुरेसं नाही, अन्न विकायला मनुष्यही पाहिजे. आता अमेरिकेतला विमानप्रवास म्हटल्यावर बॅगेत चिवडा, लाडू, (एखादी वळकटी!) सगळं भरूनच घराबाहेर पडते.
त्यात ग्राहकाच्या दृष्टीने 'एअर इंडिया' फार वेगळी नसावी, तोट्यात आहे हे मात्र नाकारता येत नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
एअर इंडियाचा मला फारसा अनुभव
एअर इंडियाचा मला फारसा अनुभव नाही. त्यामुळे त्याबाबतीत काही म्हणता येत नाही. पण एकेकाळी राजेशाही वागणुक देणारी एअरलाइन आता डबघाईला आलेली आहे, आणि आपल्याला तितकी चांगली सेवा देत नाही हे फक्त एअर इंडियाच्या बाबतीतच लागू नाही. सर्वच एअरलाइन्समध्ये हा बदल झालेला आहे. याचं कारण काय?
मी वैयक्तिक उदाहरण देतो. १९७५ चं माहीत नाही. पण १९९१ साली मी शिकागो-मुंबई-शिकागो तिकिट काढलं होतं. डिसेंबरचा पीक सीझन असल्यामुळे मला ते १२२५ डॉलरला पडलं. आज बावीस वर्षांनी साधारण त्याच तारखांचं तिकिट तपासून बघितलं तर ते १५०० डॉलरच्या आसपास आहे. बावीस वर्षांत बाकी सर्व किमती दुप्पट झाल्या (३-३.५ टक्के दराने) तरीही विमानाच्या तिकिटांच्या किमती दीडपटच जेमतेम. हा ट्रेंड अनेक वर्षं चालू आहे.
१९५१ सालची ही युनायटेड एअरलाइनची जाहिरात पहा. न्यूयॉर्क ते हवाई २३ तासात पोचण्यासाठी ३१८ डॉलर द्यावे लागत. त्या काळी ३०० डॉलर हे चौघांच्या कुटुंबाचं महिन्याचं उत्पन्न असायचं. आज ते ३५०० आहे. पण आज तोच प्रवास १२ तासांत आणि ६५० डॉलरमध्ये होऊ शकतो. थोडक्यात डॉलरमधलं उत्पन्न बारापट झालं, तरी दुप्पट वेगवान सेवा फक्त दुप्पट किमतीत दिली जाते. तेव्हा राजेशाहीपण गेला आणि एस्टीकरण झालं तर नवल नाही. मला खात्री आहे, की तुलनात्मक तेवढेच पैसे आज देण्याची तयारी असेल तर तुम्हाला फर्स्ट क्लासने जाता येईल.
विमानप्रवास गेल्या तीस वर्षांत निम्म्याने स्वस्त झाला आहे हे सांगणारा लेख.
चारचाकी गाड्या
अवांतर १:-
विमान प्रवासप्रमाणेच चारचाकी गाड्याही स्वस्त झाल्यात असे वाटते.
वीस्-पंचवीस वर्षापूर्वी लाखभर रुपयाच्या खाली अगदि प्रिमिअर पद्मिनीही मिळणे अवघड असे.
आता पंचवीस वर्षानंतर तीन्-चार लाखात एखादे बेसिक हॅबॅक मॉडेल तरी नक्की मिळू शकेल.
(ही १००% ऐकिव माहिती आहे. पण विमानप्रवासाबद्दल वाचून स॑र्वप्रथम हेच आठवलं.
टीव्ही, भ्रमणध्वनी, दूरध्वनी , संगणक ह्याबद्दल अधिक लिहित नाही; त्या बोलून चालून इलेक्ट्रॉनिक वस्तू.
)
.
अवांतर २ :-
कुणी ह्याच प्रकारचा विदा पक्क्या घरात राहणार्या लोकांबद्दल गोळा केलाय का?
शहरीकरण वाढलं म्हणून बकाल वस्त्या वाढलेल्या दिसतात; पण एकूण पक्क्या घरात राहणार्अय लोकसंख्येची टक्केवारी कमी झाली की वाढली?
.
पारले G हे बिस्किट इकडे प्रचंड लोकप्रिय. हे मागील दशकापर्यंत सलग दहा का कितीतरी वर्षे त्याच किमतीस उपलब्ध होते. इतर वस्तूंच्या किमती दुप्पत झालेल्या असताना हे त्याच किमतीस होते.
म्हणजेच, एका अर्थाने ह्याचे दर निम्मे झाले.
.
अवांतर ३:-
parity exchange rate ही संकल्पना ह्या सगळ्या गणिताच्या जवळ जाते काय?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
विमान प्रवासप्रमाणेच चारचाकी
गाड्या, टीव्ही, फ्रिज, फोन या एकेकाळी मोजक्याच लोकांकडे असणाऱ्या आणि श्रीमंतीची लक्षणं समजल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू स्वस्त झालेल्या आहे. या सगळ्यावर एक स्वतंत्र लेख लिहायची इच्छा आहे. तेव्हा इथलं अवांतर आणखीन पुढे वाढवत नाही.
हो, मी एकेकाळी वाचून बुकमार्क करून ठेवला होता. मात्र कॉंप्युटर बदलण्यापोटी तो गेला. थोडक्यात उत्तर असं आहे की भारतीय सेन्ससनुसार पक्कं घर, पाण्याचा अॅक्सेस, वगैरे घरासंदर्भात मूलभूत सुविधांबाबत विदा गोळा केला जातो. त्यात प्रत्येक घटकात २००१ ते २०११ या काळात सुधारणा झालेल्या होत्या. अर्थात ही फक्त आठवणच आहे. आणि या धाग्यावर ही चर्चा अवांतर होईल म्हणून विदा मिळाल्यावरच बोलू. (कोणाला दुवा सापडला तर कृपया व्यनि करावा)
बावीस वर्षांत बाकी सर्व किमती
इंडिगोची दिल्ली ते इम्फाळ विमानसेवा ३००० रु ला २००४ मधे होती. आता हेच त्याच दिवशीचे तिकिट ६०००-८००० रु ला मिळते. एअर इंडियाचे/इंडियनचे तिकिट तर १६००० (सोळा हजार फक्त)रुला २००४ मधे होते, मी ते काय असावे हे पाहायचे सोडून दिले आहे.
शिवाय किमान भारतात तरी पगारी जितक्या पटीने वाढल्या आहेत त्याला कामाचे तास किती पटीने वाढले आहेत त्याने भागणे आवश्यक आहे. म्हणजे किती पटीने पगारी वाढल्या, इतर किमती वाढल्या आणि विमान प्रवासाचा खर्च वाढला त्याचे नीट गुणोत्तर येईल.
अजून, ३० वर्षांपूर्वी भारतात तरी एअर ऑपरेशनना स्केल नव्हता. अजून एक, आता सगळे असेट्स पूर्णतः डिप्रिसिएट झाले आहेत, तेव्हा त्यांची किंमत लगेच वसूलायची होती.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
एअर इंडियामध्ये कुरुप(?) आणि
एअर इंडियामध्ये कुरुप(?) आणि तिरसट भाव चेहर्यावर असलेल्या हवाईसुंदर्या* सोडल्या एअर इंडियाची सेवा चांगली आहे. विशेषतः वेळेवर विमाने सुटण्याचे पोचण्याचे प्रमाण आणि आयत्यावेळी तिकीट हवे असल्यास स्वस्त तिकीट मिळणे या बाबतीत.
सध्या भारतातील इंडिगो सोडली तर बाकी कंपन्यांची सेवा यथातथाच आहे. आणि जेट एअरवेजकडून तर शुद्ध फसवणूक चालू असते.
पर्सनली सिलेक्ट केलेल्या अप्रतिम लावण्यवती हवाईसुंदर्या असलेली आणि उत्तम आणि सौजन्यपूर्ण सेवा देणार्या विमानकंपन्या सुद्धा तोट्यातच असतात हे पाहिले की एअरइंडियाचा तोटा हवाईसुंदर्यांमुळे नाही हे स्पष्ट होते.
*हवाईसुंदर्या लावण्यवती असायची काही गरज नसते पण त्या प्रसन्न दिसाव्यात हे मात्र गरजेचे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पारले G मधील नफा -तोटा ..
अवांतर -
"पारले G हे बिस्किट इकडे प्रचंड लोकप्रिय. हे मागील दशकापर्यंत सलग दहा का कितीतरी वर्षे त्याच किमतीस उपलब्ध होते. इतर वस्तूंच्या किमती दुप्पट झालेल्या असताना हे त्याच किमतीस होते.
म्हणजेच, एका अर्थाने ह्याचे दर निम्मे झाले."
अतिअवांतर - पारले G बिस्किट, इतर वस्तूंच्या किमती दुप्पट झालेल्या असताना, सलग दहा का कितीतरी वर्षे त्याच किमतीस उपलब्ध होते. आता पारले कंपनी काही तोट्यात वगैरे नाही. म्ह्णजे सुरुवातीची काही वर्षे कंपनीने पारले G बिस्किट ज्या किमतीत विकले त्यात किती नफा अंतर्भूत होता ? इतर वस्तूंच्या किमती दुप्पट झाल्या म्हणजे बिस्किटाच्या मूलभूत कच्च्या मालाच्या किमतीदेखील वाढल्या असणार. असे असतानाही अनेक वर्षे एकाच किमतीत विक्री करणे कंपनीला शक्य झाले याचा अर्थ कंपनीच्या मूळ विक्री किमतीत पुरेसा नफा अंतर्भूत होता.
उदा. - समजा "क्ष" वस्तूची विक्री किंमत रु. २० आहे. यात - उत्पादन किंमत (production cost) - रु. २ आणि नफा रु. १८ आहे. दहा वर्षात उत्पादन किंमत दुप्पट (रु. ४ झाली) तरी विक्री किंमत तीच ठेवल्यास नफा रु. १६ होइल म्हणजेच नफ्यात निव्वळ घट फक्त ११.११%. ग्राहकांसाठी दर निम्मे झालेले दिसले तरी वास्तवात कंपनीला फार तोटा नाही ...
बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "