Skip to main content

ये तो होना ही था!

वसईसारख्या लहान शहरात रेल्वे स्टेशनजवळ मी पहिला डान्सबार पाहिला. नाचणार्‍या मुली, भोजपुरी अश्लील गाणी, अंधुक उजेड आणि सर्व टेबलं खच्चून भरलेली.
तेव्हा दुकानात ७० रु. ना मिळणारी बिअर इथं ३०० रु. ला मिळत होती. जसजसं मुंबईच्या दिशेचे बार पाहत गेले ही रक्कम ६००० पर्यंत गेली. कारण इतकंच की समोर मुली नाचताहेत.
'नीट' नाचता येणार्‍या मुली समोर आणि नवख्या, नाचता न येणार्‍या घोळक्यात मध्ये वा मागे. मधूनच समोरची मुलगी पैसे उचलायला गेली की मधल्यांचे चेहरे दिसायचे. ब्लाउजमध्ये नोटा कोंबायला जागा राहिली नाही की मुलगी नाचत मागे सरकत जायची. भिंतीशी उभ्या एकाला पैसे काढून द्यायची, ते तिच्या नावच्या लॉकरमध्ये जायचे तात्पुरते. मोजणी नंतर होणार.
एका चेहर्‍यावर माझं लक्ष खिळलं. भांबावलेली होती. नाचता येत नव्हतं. रात्रीचे दोन वाजत आले होते. तिला जांभई आली आणि नेमकं त्याचवेळी मी तिच्याकडे पाहिलं. ती अक्षरशः घाबरली की तक्रार होईल. मी चेहरा निर्विकार ठेवण्याचा प्रयत्न केला. ती मागे सरकून दुसर्‍या मुलींजवळ कुजबुजली. त्या मुलींनी माझ्याकडे पाहिलं आणि थोडावेळ तिला मागेच ठेवलं. काहीवेळाने ती पुन्हा दिसू लागली. मी पैसे दाखवून खुणावल्यावर इकडे तिकडे दचकून पाहिलं तिनं की दुसर्‍या कुणाला बोलावतेय का? मग आली. पैसे घेऊन गेली. ध्यानात आलं की तिचं वय जेमतेम १२-१३ असावं. मी पुन्हा तिला खुणावलं. या खेपेला पैसे देताना तिचा फोननंबर मागितला. ती पुन्हा घोळक्यात जाऊन आली. हातून पैसे घेताना कुजबुजली की,"नंबर टिश्यु पेपरपे लिख लेना."
याचा अर्थ ती शरीरविक्रीही करत होती, एरवी नंबर दिला जात नाही. भयाण उदास वाटलं. ही सुरुवात होती.
पुढे मग अनेक लेडिजबार पाहिले, अनेकींशी बोलले. मुंबई - अहमदाबाद हायवे वरच्या लेडिजबारमध्ये तर अनेक परिचित प्रतिष्टितही दिसले.
बारचे आर्थिक व्यवहार समजत गेले.
वसईत चहा पावडरच्या दुकानात सेल्सगर्ल म्हणून आणलेल्या मुली बारमध्ये नाचवल्या जातात, शरीरविक्रीही करतात, हे पाहिलं. जे बाई हे उद्योग करत होती, तिने भाड्याने दोन फ्लॅट घेऊन सुरुवात केली होती, आज तिची अख्खी इमारत आहे. अधूनमधून धाड पडते, पुन्हा सारे सुरळित चालते.

मग लेडिजबार बंद झाले. अनेक कहाण्या समोर आल्या. कहाण्यांच्या अनेक आवृत्त्या समजत राहिल्या. लपूनछपून बार कुठे सुरू आहेत हेही कळत राहिलं.
आता तर मुंबई हायकोर्टानं बंदी उठवली.
कायदे न करता आधी बार बंद करण्याच्या घोषणांची हौस काय निकाल लावणार हे माहीत होतंच.
हजारो बेकार मुली कुठे जाणार म्हणणार्‍यांना समजेल आता की 'त्या, तेव्हाच्या' मुलींपैकी आता एकही नाचणार नसेल; कारण नाचणार्‍यांचं कामाचं आयुष्यच कितिक असतं? आता हजारो नव्या मुलींची खरेदीविक्री होईल. बार पुन्हा गजबजतील.
बाई आणि जमीन या काळा पैसा पांढरा करण्यासाठीच्या हमखास यशस्वी करण्याचं साधन असलेल्या गोष्टी. जमीन मर्यादित आहे, पण बायका जन्मत राहतातच.

ऋषिकेश Tue, 16/07/2013 - 18:21

विदारक परिस्थिती होती ! आता पुन्हा तसेच होणार असा विचार करून खिन्न वाटते.
मात्र गेल्यावेळी बार बंद झाल्यावर बारगर्ल्सपैकी शरीरविक्रय न करणार्‍या मुलींच्या हातातही विक्रयाच्या धंद्याला लागण्यावाचून गत्यंतर न राहिल्याच्या बातम्याही कानावर आल्या होत्या. तेव्हाही असेच खिन्न वाटले होते.

यावर उपाय बारबंदी पेक्षा या स्त्रीयांचे सबलीकरण होऊ शकेल का?

अवांतरः आता बदललेल्या काळातही (ही 'बघायची भूक' भागवायला अधिक साधने उपलब्ध, इंटरनेटची सहज उपलब्धता वगैरे) या बार्सचा धंदा उत्तरोत्तर कमी होत जाईल का तसाच चालेल?

कविता महाजन Tue, 16/07/2013 - 19:06

In reply to by ऋषिकेश

सबलीकरण अवघड.
वेश्यांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न फसले आहेत. ( अवांतर : पण वेश्यांच्या मुलांसाठीचे काही प्रयत्न मात्र यशस्वी ठरताहेत. )
मुळात ही साखळी इतकी मोठी आणि मजबूत असते की ती तोडणं केवळ अशक्य बनतं. ज्या वेगाने आणि ज्या संख्येने मुलींची विक्री होत असते, त्यांचं फ्लाइंग क्विन्समध्ये रूपांतर करून कुठून कुठेही हलवलं जात असतं, ते सारं पाहता प्रयत्न किरकोळाहून किरकोळ ठरतात.
पुनर्वसनाबाबत विचार केला तर जे कायदे आहेत, त्यांचा आजतागायत कुणीही उपयोग केला नाही. ( हे मी २००२ ते २००६ या काळात 'भिन्न'चे लेखन करत असताना अनुभवले व लिहिले, ते अर्थातच आजही बदलले नाहीयेच.)
जी महिला सुधार गृहे आहेत, त्यांची ( आणि बाल सुधार गृहांचीही, कारण तिथेही अल्पवयीन मुली असतात.) अवस्था भीषण आहे.
एड्सच्या निमित्ताने काही स्वयंसेवी संस्थांनी थोडे काम केले आहे, नाही असे नाही. पण ते अर्थातच दरयामें खसखस.

धंदा बंद होईल असे कोणतेही चिन्ह नाही. उलट पोर्नो साइट्स पाहून जागी झालेली विकृत कुतूहले शमविण्यासाठी वेश्यावस्तीत येणार्‍या शाळकरी मुलांची संख्या वाढतेच आहे. ( केवळ भारतात बनलेल्या १८ लाख पोर्नो साइट्स आहेत आणि दर ३ सेकंदांना एक व्हिडिओ अपलोड होत असतो.)
व्हर्चुअल ते अखेर व्हर्चुअल असते आणि काही काळाने त्यातील कुतूहल संपते व नजर मरते. ज्यांच्या लैंगिक समस्या असतात ते अर्थात कोणत्याही वयात पोर्नो पाहत राहतातच. काहींना त्याशिवाय उत्तेजना येत नाही व काहींना उत्तेजनाच येत नसल्याने पर्याय म्हणून ते पोर्नो पाहत बसतात.
धंदा आता उलट अधिक कल्पकतेने चालेल.

चित्रगुप्त Tue, 16/07/2013 - 18:44

माहितीपूर्ण लेख.
अमेरिका, थायलंड वगैरेतील बार, बारबाला याबद्दल माहिती अहे का कुणाला? तिकडल्या आणि इकडल्यांत काय फरक आहे वगैरे?

नितिन थत्ते Tue, 16/07/2013 - 19:41

मिळून सार्‍याजणी च्या मागील वर्षीच्या (२०११) दिवाळी अंकात वेश्यांचा सर्वे होता. त्यात >६०% वेश्या स्वखुशीने वेश्याव्यवसायात आल्याचे वाचले होते. [विद्या बाळ त्या अंकाच्या संपादिका आहेत. तेव्हा हे आकडे खोडसाळ असण्याची शक्यता कमी आहे].

तोपर्यंत १०% सोडून उरलेल्या वेश्या जबरदस्तीने/फसवणुकीतून त्या व्यवसायात ढकलल्या गेलेल्या असतात असा माझा समज होता. तेव्हापासून वेश्यांच्या विषयावर मी जरा बिचकतच मते व्यक्त करत असतो.

कविता महाजन Tue, 16/07/2013 - 22:27

In reply to by नितिन थत्ते

त्याच अंकात त्या परिसंवादाच्या 'समारोपा'चा दीर्घ लेख मी लिहिला होता. तुम्ही सांगितलेल्या लेखातील मुद्दे त्यात खोडून काढलेले होते. ( माझा संपूर्ण लेख माझ्या भिन्न या ब्लॉगवर वाचण्यास उपलब्ध आहे.)
आपले हे दुर्दैव आहे की काही स्त्रिया आपल्या स्वयंसेवी संस्थांची दुकाने चालवण्यासाठी अशा चुकीच्या भूमिका मांडताहेत. आज टीव्हीवरील अनेक चर्चांमध्ये, फेसबुकवर अशी विपर्यस्त मते मांडली गेलेली दिसतील.
पहिला मुद्दा : अभिव्यक्ती / व्यवसाय स्वातंत्र्य. ( मुंबईतील सोनापूर मधील वेश्यावस्तीत चांगले काम करणार्‍या 'अदिती' या स्वयंसेवी संस्थेने उत्तम नृत्य करणार्‍या ज्या वेश्या होत्या, त्यांना रीतसर नृत्याचे प्रशिक्षण दिले आणि केवळ नृत्याचे काम अर्थार्जनासाठी उपलब्ध करून दिले. लेडिज बारमध्ये नाचणे म्हणजे नृत्य करणे नक्कीच नव्हे.) शरीर हे कमाईचे साधन बनवायचे असेल तर स्वतःचे निर्णय घेण्याइतकी क्षमता ( वयाची / शिक्षणाची / अर्थार्जनाची) त्यांच्याकडे आहे का? ही त्यांची स्वतःची मते आहेत की त्या कुणाचा तरी पोपट बनून पढवलेलं बोलताहेत? व्यवसाय असेल तर व्यवसायवृद्धीसाठी त्या काय प्रयत्न करतात आणि हा व्यवसाय पिढीजात चालू राहावा असा त्यांचा विचार आहे का? आम्ही फक्त नाचणार, पण तिथं कुणी आम्हांला स्पर्शही करायचा नाही किंवा आमचं शरीर विक्रीसाठी उपलब्ध नाही, अशी काही विभाजनाची अट तिथे घालता येते का? दारू प्यायलेली, हातात मुबलक पैसा व सत्ता असलेली माणसे अशा अटी पाळतील का?
दुसरा मुद्दा : इतर कायदे आहेत असे न्यायालय सांगते. उदा. कुणाला वेश्याव्यवसायाला लावण्याविरुद्ध किंवा बालमजुरीविरुद्ध किंवा लैंगिक शोषण-विनयभंग-बलात्कार इ. विरुद्ध किंवा फसवणुकीबाबत वगैरे. तर हा कायदा कशाला हवा? याचे उत्तर देण्यास महाराष्ट्र शासन कमी पडले आहे.
तिसरा मुद्दा : उपकलमात एलीट क्लास जिथे जातो त्या ३ वा ५ तारे असलेल्या हॉटेल्समध्ये नाचण्यास सवलत कशासाठी दिली गेली? याचे काहीही उत्तर नाही.

राजन बापट Tue, 16/07/2013 - 22:32

लिखाण परिणामकारक आहे. "भिन्न"च्या निमित्ताने या जगाची ओळख प्रस्तुत लेखिकेमार्फत झालेली होती. हा लेख त्या परिस्थितीचाच "अपडेट" आहे असा भास वाचताना होत होता.

बारबालांच्या - विशेष करून अल्पवयीन मुलींच्या - शोषणाचा प्रश्न हा दारिद्र्याच्या प्रश्नाशी निगडीत आहे असा माझा सर्वसाधारण समज आहे. "डान्स बार" जेव्हा अस्तित्त्वात नव्हते - किंवा मध्यंतरी बंद झालेले होते - तेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात शोषण होत नव्हतं असं सांगणारे काही निर्देशक आहेत का ? (माझा असा अंदाज आहे की तसं दाखवणारे आकडे सापडतील. )

डान्सबार ही गोष्ट शरीरविक्रयाच्या व्यवसायाचं अद्ययावत "मार्केट्प्लेस" आहे असं दिसतं. थोडक्यात, गर्हणीय, त्याज्य आणि मुख्य म्हणजे अल्पवयीनांच्या शोषणाला मुख्यप्रवाहात आणण्याचं संसाधन. ड्रग्ज् सारख्या गोष्टींच्या प्रसाराला आळा घालणारी यंत्रणा अस्तित्त्वात आल्यासारखी दिसते तशी या संदर्भात का नसावी ?

सन्जोप राव Wed, 17/07/2013 - 06:01

मी काही डान्सबार पाहिले आहेत. ज्या मुली तिथे नाचत होत्या त्यातल्या फार कमी मुलींच्या चेहर्‍यावरुन, देहबोलीतून हे सगळे त्या अत्यंत नाखुशीने करत आहेत असे वाटत होते. (हाही त्यांच्या उत्कट अभिनयाचा भाग असेल तर गोष्ट वेगळी). त्यातल्या कुणाकडेही नृत्यकौशल्य औषधालाही नव्हते. त्या काही फार देखण्या, सौष्ठवदार होत्या असेही नाही. त्या मुली, माद्या होत्या इतकेच. प्रेक्षक चेकाळून दौलतजादा करत होते. एखादा बहकला की अक्षरशः अमेरिकेन सिनेमात दाखवतात तसले 'बाऊन्सर्स' त्याला बाहेरचा रस्ता दाखवत होते. एकूण सगळा खुशीचा मामला होता.
पहिला प्रश्न त्या मुलींचा. त्यातल्या काही विवाहित स्त्रिया, आयाही असतील. त्यांचे शोषण, त्यांना मिळणार्‍या पैशापैकी किती पैसा त्यांच्या हातात जातो हा भाग वेगळा. पण कोणतेही कौशल्य नसलेल्या, सुमार रुप आणि बुद्धिमत्ता असलेल्या (लेटस फेस इट! हा त्यांचा दोष नाही, कुणाचाही नसतो! रुपाचा उल्लेख अशासाठी की सुंदर मठ्ठ मुलीला लग्न करुन नवर्‍याचा संसार करणे ही तरी पर्याय उपलब्ध असतो) मुलींना सध्याच्या समाजव्यवस्थेत आणि निष्क्रिय, उदासीन, भ्रष्ट राज्यव्यवस्थेत तातडीने दुसरा कोणता पर्याय उपलब्ध होऊ शकेल हे मला माहिती नाही. अल्पवयीने मुलींना जबरदस्तीने नाचवणे, वेश्याव्यवसायाला लावणे हे भयंकर गुन्हे आहेत हे खरे आणि त्याला सतत आणि तीव्र विरोध केला पाहिजे हेही खरे, पण 'हे करु नका, आणि उपाशी मरा' हे सांगण्याआधी 'मग त्याऐवजी हे करा' असे काहीतरी तयार असले पाहिजे. नाहीतर या धंद्यात पैसाच इतका आहे की त्यामुळे त्यातून या अशा मुली आपखुशीने बाहेर पडतील अशी शक्यता फार कमी आहे.
दुसरा भाग प्रेक्षकांचा. मी वारंवार मांडलेले मत पुन्हा मांडतो. भारत हा लैंगिकदृष्ट्या वैफल्यग्रस्त लोकांचा -सेक्शुअली फ्रस्ट्रेटेड लोकांचा देश आहे. शरीरसुखाची गरज सतत नाकारत राहाणे आणि कालबाह्य शुचितेच्या कल्पनांचे उदात्तीकरण करत राहाणे हा भारतीय संस्कृती वगैरेचा भाग आहे. आजही त्यात फार फरक पडलेला नाही. त्यामुळे वासना चेकाळवण्यासाठी आणि मग शक्य असेल तर त्यांचे शमन करण्यासाठी डान्सबारसारख्या गोष्टींकडे एक मोठा वर्ग ओढला जाईल यात शंका नाही. पण पुन्हा तेच. त्यांनी हे करु नये तर काय करावे? विवेक वगैरे सगळे लिहा-बोलायला ठीक आहे. पण हातात चार सोन्याची कडी, गळ्यात अर्धा किलो साखळ्या, डोळ्यात मस्ती, पोटात दारुचे चार पेग आणि
xxखाली बोलेरो अशा आण्णा, आप्पा, बापू, तात्यांना किंवा त्यांच्या बगलबच्च्यांना हे सांगून पहावे. वयाच्या तेराव्या वर्षापासून निसर्ग आतून धडका द्यायला लागलेला असताना तिशीपर्यंत ज्याला हक्काची (बायको या अर्थी. 'हक्क' या शब्दावरुन वेगळे वादळ नको!) स्त्री मिळत नाही अशा एका मोठ्या वर्गाला हे पटते का पहावे. 'घरात एक थोडं चांगलं सुख मिळत असेल तर माणूस रांडेकडं कशाला जाईल?' हे त्या काळातही खरे होते, आजही खरे आहे. पण हे त्या काळातही लोकांना आवडले नव्हते, आजही आवडत नाही.
मला वाटते डान्सबार, मसाज पार्लर्स, उच्च्भ्रू समाजात चाललेला कॉलगर्ल्सचा व्यवसाय किंवा फोरास रोडवरचा भयाण, बकाल शरीरविक्रय हे सगळे काय आणि यावरची बंदी काय- हे सगळे रोगाच्या लक्षणांवरचे उपचार आहेत. मूळ रोग वेगळाच आहे.

राजेश घासकडवी Wed, 17/07/2013 - 06:46

In reply to by सन्जोप राव

...त्याला सतत आणि तीव्र विरोध केला पाहिजे हेही खरे, पण 'हे करु नका, आणि उपाशी मरा' हे सांगण्याआधी 'मग त्याऐवजी हे करा' असे काहीतरी तयार असले पाहिजे.

अगदी बरोबर.

नाहीतर या धंद्यात पैसाच इतका आहे की त्यामुळे त्यातून या अशा मुली आपखुशीने बाहेर पडतील अशी शक्यता फार कमी आहे.

मी फार जुन्या काळी एक प्रख्यात जपानी सिनेमा बघितला होता. वेश्यांच्या जीवनावर होता. त्यातली एक अशीच 'हा अनैतिक धंदा सोडून चांगल्या नोकऱ्या करा' या प्रचारातून खरोखरच नोकरी करायला जाते. आणि एक आठवडाभर सतत काम करून मिळणारा पगार तिच्या एका रात्रीच्या कमाईपेक्षाही कमी असतो म्हणून परत येते.

व्यापक मुद्दा असा आहे की 'जर जबरदस्ती होत नसेल तर (आणि हा एक मोठा 'जर-तर' आहे) वेश्याव्यवसाय एक सन्मानित व्यवसाय असायला काय हरकत आहे?'
'सुशिक्षित पुरुष त्याची बुद्धी विकतो त्याप्रमाणे एखाद्या स्त्रीने तिचं शरीर विकलं तर त्यात गैर ते काय?'
या प्रश्नांचं उत्तर मला कुठेही सापडलेलं नाही. जे मिळालेलं आहे ते तथाकथित उच्चवर्गीयांकडून आलेल्या 'गास्प्स'च्या पलिकडे काही नाही.

प्रश्न असा आहे की समाजाची या गोष्टीची गरज मान्य करून हा व्यवसाय योग्य प्रकारे नियंत्रित करण्याला (थायलंडमध्ये ज्याप्रमाणे करतात त्याप्रमाणे) करायला नक्की काय हरकत आहे?

कविता महाजन Wed, 17/07/2013 - 10:29

In reply to by राजेश घासकडवी

'सुशिक्षित पुरुष त्याची बुद्धी विकतो त्याप्रमाणे एखाद्या स्त्रीने तिचं शरीर विकलं तर त्यात गैर ते काय?'

या विषयी मी 'भिन्न'मध्ये सविस्तर लिहिले आहे. केवळ स्त्रीनेच नव्हे तर पुरुषानेही शरीर विकण्यात काय गैर आहे ( आणि विकत घेण्यातही!) हे तिथे मांडले आहे. दुसर्‍या 'ग्राफिटीवॉल' या पुस्तकात 'पुरुषवेश्या आणि गिर्‍हाईक बायका' या लेखात अजून काही अनुभव व मतं आहेत.
तरी इथे थोडक्यात सांगते.
शरीराचे वस्तुकरण होणे हे अनेक तर्‍हांनी नुकसानकारक ठरते. त्यातही ती वस्तू सार्वजनिक मालमत्ता बनली तर ती नीट राखण्याची जबाबदारी कुणाचीच नसते.
१. एखाद्या स्त्रीवर अत्याचार झाला तर एरवीही पोलीसस्टेशन, न्यायालय इथले अनुभव चांगले नसतात. ती स्त्री कुणी ठेवलेली किंवा वेश्या / बारगर्ल / बारमधली वेटर / तमासगीर इ. असेल तर वाईट वागणूक मिळणे टोक गाठते. मॉडेल, अभिनेत्री यांनाही असेच अनुभव येतात. सामाजिक प्रतिष्ठा मिळत नसल्याने समाजातला दैनंदिन वावर मुश्कील होऊन बसतो. आत्मसन्मान राहत नाही व आत्मविश्वासही.
२. अनेकांशी लैंगिक संबंध प्रस्थापित करताना विकृतींना सामोरं जावं लागतं. त्यातून शारीरिक व मानसिक विकार उद्भवतात.
३. गुन्हेगारी कृत्ये वाट्याला येण्याची शक्यता खूप वाढते. आर्थिक गुन्हेही घडतात.
४. शरीर खूप कमी काळ पुरतं. त्यानंतर काय? हा प्रश्न भेडसवणारा असतो. त्यातून गुन्हेगारीकडे वळलं जातं किंवा आत्मघाताकडे. शरीर अधिक काळ उपयोगात आणण्यासाठी औषधांचा वापर केला जातो. शरीरविक्री करणारे जे पुरुष अशी औषधे दीर्घकाळ व सातत्याने घेतात त्यांच्या लैंगिक क्षमता नाहीशा होतात.
५. लैंगिक गरजा भागवणे आणि लैंगिक सु़ख यातील फरक लक्षात घेतला तर व्यापारात सुख कणभरही नसते.
६. कुटुंबाचे सुख / सुरक्षितता इ. मिळण्याची शक्यता दुरावते. एकाकीपणा येतो.
थोडक्यात शरीराच्या वस्तुकरणाने आर्थिक, शारीरिक, लैंगिक, सामाजिक, भावनिक, कौटुंबिक इ. नुकसान होते.

राजेश घासकडवी Wed, 17/07/2013 - 16:19

In reply to by कविता महाजन

ही युक्तिवादमाला वरवर पटण्यासारखी आहे.

पण त्याच युक्तिवादाने तीनशे वर्षांपूर्वीच्या भारतात विचारलेल्या 'बायकांनी शिकून नोकरी करायला काय हरकत आहे?' या प्रश्नाला खालील उत्तर मिळेल.

तत्वतः काहीच हरकत नाही, गार्गी मैत्रेयी नव्हत्या का शिकल्या. पण
१. मुलींना शिकवलं तर अनेक ठिकाणी समाज वाळीत टाकतो.
२. स्त्रियांना उघड पुरुषांमध्ये वावरायचं म्हणजे त्यांचं शील भ्रष्ट होण्याची शक्यता असते. आधीच आत्ता मुलींना पडद्याबाहेर वागू दिलं तर काय होतं याचे परिणाम दिसतातच.
३. इतक्या वयस्क मुलीशी मग लग्न कोण करणार? म्हणजे केवढं आर्थिक नुकसान.
४. त्यांना शिक्षण ते किती मिळणार आणि पैसा तो किती मिळणार? बरं, लग्न झालं की नोकरी सोडावी लागणारच. मग काय फायदा?

थोडक्यात मुलींना शिकवून नोकरी करायला लावण्यामध्ये आर्थिक, शारीरिक, लैंगिक, सामाजिक, भावनिक, कौटुंबिक इ. नुकसान होते.

'एक वाईट रूढी बदलणं तत्त्वतः योग्य असलं तरी इतर वाईट रूढी तिच्याशी संलग्न आहेत, म्हणून ती बदलणं योग्य नाही.' या स्वरूपाचा हा युक्तिवाद आहे.

कविता महाजन Wed, 17/07/2013 - 17:00

In reply to by राजेश घासकडवी

त्याचे एक कारण असे की हा प्रश्न फक्त स्त्रियांचा आणि त्यातही विशिष्ट काम करणार्‍या स्त्रियांचा नाही.
( जे प्रश्न हे स्त्री-प्रश्न आहेत असे आपण वरवर समजतो, ते कधीच केवळ स्त्री-प्रश्न नसतात; पूर्ण समाजाचे प्रश्न असतात.)
देहविक्री पुरुषदेखील करतात. त्यांचाही हा प्रश्न आहे. त्यात मुख्य फरक एक आहे की त्यांनी कमावलेल्या पैशांवर त्यांचाच हक्क असतो.
देहविक्री कुणीच करू नये व देहखरेदी कुणीच करू नये... असे टोकाला जाऊन स्पष्टपणे सांगता येईल. (आणि अर्थातच हे घडणार नाही, हेही ज्ञात आहे. बलात्कार होऊ नयेत, अशासारखेच हे विधान आहे.)

देहविक्रीत फायदा काय आहे, हे आता दुसर्‍या बाजूने पाहू.
१. या व्यवसायाला भांडवल लागत नाही. ( रांडेच्या धंद्याला पलंगाचं भांडवल, अशी एक म्हण तिथं प्रचलित आहे.)
२. कोणत्याही जातीधर्माची, कोणत्याही वयाची, रंगाची इ. स्त्री हे काम करू शकते.
३. कामासाठी शिक्षण-प्रशिक्षणाची गरज नाही. ( वस्तीत राहिलात तर 'प्रशिक्षण' फुकट होते!)
४. स्वतःहून व्यवसाय निवडला असेल तर स्वातंत्र्य आहे असे भासते. उदा. किती गिर्‍हाईकं घ्यायची, कशी गिर्‍हाईकं घ्यायची, कुणाला नाही म्हणायचं? किंवा किती पैसे घ्यायचे? घेतलेल्या पैशांचं काय करायचं? काय खायचं-प्यायचं-ल्यायचं? कोणती व्यसनं करायची? कुठे फिरायचं? कोणती भाषा वापरायची वा अपशब्द वापरायचे? नाचा-गायचं इत्यादी.
५. शरीर कसंही असलं ( दुबळं, अपंग, रोगट ) तरीही ते विकता येतं, विकलं जातं. त्या-त्या आर्थिक स्तरातले ग्राहक मिळतात. सगळ्यात शेवटी हायवेवर धंदा करणार्‍या बायकांना प्रती गिर्‍हाईक २५ ते ३० मिळतात. ज्यातून दारू + जेवण जेमतेम निघून दिवस ढकलता येतो. तेही मिळेनासं झाल्यावर भिकेचा धंदा करणार्‍या लोकांकडे अजून एक पर्यायी काम मिळतं. घरवाल्या आपल्याकडील निकामी मुली भिकेचा धंदा करणार्‍यांना २-३ हजार रुपयांना विकून टाकतात.
६. आपल्या देहाकारणे इतर अनेकांची पोटं भरतात, इमले उभारले जातात, राजकीय व व्यावसायिक देवाणघेवाणीत लेदरकरन्सी म्हणून आपला उपयोग महत्त्वपूर्ण ठरतो; हे मनाला समाधान देणारे असते.
७. लवकर आणि मोठे आजार जडल्याने आयुष्यमान कमी होते. जगण्याविषयी निरीच्छ भाव येतो, देवधर्म वाढतो, कुटुंबाप्रती मोह उरत नाही; त्यामुळे मृत्यूचा सहज स्वीकार केला जातो. ही आध्यात्मिक वृत्ती साधते.

राजेश घासकडवी Wed, 17/07/2013 - 18:42

In reply to by कविता महाजन

त्याचे एक कारण असे की हा प्रश्न फक्त स्त्रियांचा आणि त्यातही विशिष्ट काम करणार्‍या स्त्रियांचा नाही.

मीदेखील हेच म्हणतो आहे. प्रश्न अधिक व्यापक आहेत. स्त्रियांना शिक्षण, नोकऱ्या, समाजात मान वगैरे गोष्टी सुधारणं आवश्यक आहे. समाजातली आत्यंतिक गरीबी कमी व्हायला हवी. त्याचबरोबर योनिशुचितेला दिलं जाणारं महत्त्व कमी होणं आवश्यक आहे.

देहविक्री कुणीच करू नये व देहखरेदी कुणीच करू नये... असे टोकाला जाऊन स्पष्टपणे सांगता येईल.

याच्या मात्र मी बरोब्बर उलटं म्हणतो आहे. देहविक्री जरूर करावी. मात्र त्या खरेदी विक्रीला सरकारी पातळीवर बंदी नसावी. खरं तर इतर कुठल्याही खरेदी विक्रीच्या बाबतीत ग्राहक, विक्रेते व कामगार यांना न्याय मिळण्यासाठी जी सरकारी यंत्रणा असते ती असावी. नाहीतर चोरून केल्या जाणाऱ्या गर्भपातांप्रमाणे भयंकर परिणाम होतात.

देहविक्रीच्या फायद्याचे तुम्ही जे तिरकस वर्णन केलं आहे त्यातला तिरकसपणा आवडला. मात्र मुद्दे पूर्णपणे पटले नाहीत. माझ्या मते शास्त्रोक्त प्रशिक्षण व्हावं. स्वातंत्र्याबाबतीत - मोठ्या कंपन्या निघाव्यात, त्यात नोकरी असावी, कामाच्या वेळा ठरलेल्या असाव्यात, ओव्हरटाइम असावा, युनियन असावी, पेन्शन असावं, अनएम्प्लॉयमेंट बेनेफिट्स असावेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा कंपनीत नोकरी करतो हे सांगायला लाज वाटू नये.

सन्जोप राव Wed, 17/07/2013 - 20:29

In reply to by बॅटमॅन

प्रॅक्टीकल व्हायला पाहिजे. मला भूक लागली की हॉटेलात जाऊन जेवतो की नाही? तसा रोकडा व्यवहार शरीरसंबंधाच्या बाबतीतही व्हायला हवा. किंग कोब्रासारखा रोकडा व्यवहार. बर्‍याच लोकांचे बरेच प्रश्न सुटतील.

ऋता Wed, 17/07/2013 - 21:54

In reply to by सन्जोप राव

एक व्यक्ती थोड्यावेळासाठी 'वस्तू' कशी होईल (त्या व्यक्तिचे स्वातंत्र्य, हक्क वगैरे सर्व सुरक्षित राहूनही) ?

खोडसाळच व्ह्यायचं तर, तुम्ही हॉटेलातल्या जेवणाचा उपभोग घेतल्यावर जेवणाची काय अवस्था असते ? अशी 'कन्झ्यूमेबल' माणसं असावीत असे सुचवत आहात का?
आत्ता जे व्यवहार चालू आहेत त्यानी बर्‍याच लोकांचे प्रश्न सुटतातच आहेत तसे म्हटले तर.

ऋता Wed, 17/07/2013 - 19:51

In reply to by राजेश घासकडवी

"देहविक्रीच्या फायद्याचे तुम्ही जे तिरकस वर्णन केलं आहे त्यातला तिरकसपणा आवडला. मात्र मुद्दे पूर्णपणे पटले नाहीत. माझ्या मते शास्त्रोक्त प्रशिक्षण व्हावं. स्वातंत्र्याबाबतीत - मोठ्या कंपन्या निघाव्यात, त्यात नोकरी असावी, कामाच्या वेळा ठरलेल्या असाव्यात, ओव्हरटाइम असावा, युनियन असावी, पेन्शन असावं, अनएम्प्लॉयमेंट बेनेफिट्स असावेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा कंपनीत नोकरी करतो हे सांगायला लाज वाटू नये."

ह्या कंपनीत मोठं होऊन नोकरी मिळावी ही महत्त्वाकांक्षा लहान मुला-मुलींनी ठेवावी का? झालंच तर समर प्रोजेक्ट वगैरेही करावी कॉलेजात असताना...

तुमचा मुद्दा कळला नाही....की तिरकस लिहिलं आहे तुम्ही ?

राजेश घासकडवी Thu, 18/07/2013 - 03:48

In reply to by ऋता

माझ्या प्रतिसादात कुठेही तिरकसपणा नव्हता.

ह्या कंपनीत मोठं होऊन नोकरी मिळावी ही महत्त्वाकांक्षा लहान मुला-मुलींनी ठेवावी का? झालंच तर समर प्रोजेक्ट वगैरेही करावी कॉलेजात असताना...

जरूर. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की मुळात लैंगिक व्यवहाराला असलेला कलंक नाहीसा व्हावा. तसं झालं की या कल्पनांमध्ये सध्या जे वैचित्र्य वाटतं ते वाटेनासं होईल. एकेकाळी मुलींनी शिकण्या, नोकरी करण्याबद्दलही याच स्वरात बोलत असत.

'न'वी बाजू Thu, 18/07/2013 - 13:34

In reply to by राजेश घासकडवी

(माझ्या या प्रतिसादात कोठेही तिरकसपणा नाही. फक्त एक प्रामाणिक कुतूहल आहे.)

ह्या कंपनीत मोठं होऊन नोकरी मिळावी ही महत्त्वाकांक्षा लहान मुला-मुलींनी ठेवावी का? झालंच तर समर प्रोजेक्ट वगैरेही करावी कॉलेजात असताना...

जरूर.

(डिस्क्लेमर: खालील प्रश्नावली ही पूर्णतः ऐच्छिक आहे. खालीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर आपण मला, आपणा स्वतःला अथवा अन्य कोणालाही देण्यास तसेही बांधील नाहीच; परंतु त्यांपैकीसुद्धा विशेष करून प्रश्न क्र. ३ आणि ४ (दोन्ही उपप्रश्न) यांचे बाबतीत या ऐच्छिक स्वरूपाचा पुनरुच्चार करू इच्छितो. अर्थात, अशा कोणत्याही बंधनांच्या अभावीसुद्धा आपण या प्रश्नांची उत्तरे देऊन उपकृत केल्यास माझ्या कुतूहलाचे शमन होऊन आपली विचारधारा अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास आणि पारखण्यास मला मदत तर होईलच; शिवाय, त्या कानशीवर घासून, पारखून आपले विचार परिष्कृत करण्याचे दृष्टीने कदाचित आपणांसही फायदा होऊ शकेल, अशी आशा आहे.)

१. समजा समाजात प्रगती होऊन अशा कंपन्या आजच स्थापित झाल्या, आणि लवकरच भरभराटीला आल्या. आपण आपल्या पाल्यास अशा कंपनीत समर प्रॉजेक्ट करावयास पाठवाल का?

वरील प्रश्न क्र.१.चे उत्तर आपण 'होय' असे दिल्यास:

२अ. आपल्या पाल्याने अशा कंपनीत समर प्रॉजेक्ट करण्यात आपण होऊन रस दाखवला, तर (आणि तरच केवळ) आपण आपल्या पाल्यास केवळ अनुमती द्याल, की

२ब. आपल्या पाल्याने अशा कंपनीत समर प्रॉजेक्ट करण्यात आपण होऊन रस दाखवला, तर (आणि तरच केवळ) आपण आपल्या पाल्यास उत्तेजन वा प्रोत्साहन द्याल, की

२क. आपल्या पाल्याने आपणाजवळ अशा काही रसाची वाच्यताही केलेली नसतानासुद्धा आपण स्वतः पुढाकार घेऊन अशा समर प्रॉजेक्टची आपल्या पाल्यास शिफारस (रेकमेंडेशन) कराल, की

२ड. वरीलपैकी एकाहून अधिक, की

२ई. वरीलपैकी कोणतेही नाही?

वरील प्रश्न क्र.२.च्या उत्तरार्थ आपण २ड. हा पर्याय निवडल्यास:

३. नेमके कोणकोणते पर्याय?

वरील प्रश्न क्र.२.च्या उत्तरार्थ आपण २ई. हा पर्याय निवडल्यास:

४अ. का नाही?
४ब. यांव्यतिरिक्त अन्य कोणत्या प्रकारें अथवा परिस्थितींत आपण आपल्या पाल्याच्या अशा कंपनीत समर प्रॉजेक्ट करण्याच्या शक्यतेस स्वेच्छेने हातभार लावाल?

आगाऊ धन्यवाद.

ऋता Thu, 18/07/2013 - 14:07

In reply to by राजेश घासकडवी

ओके. मला वाटतय आज जे हे दुकानं उघडून बसले आहेत त्यांची सुद्धा अशी 'प्रोफेशनल' कंपनी असावी अशीच आशा होती...पण तसं होत नाही ना...गिर्‍हाइकं आणि माल दोन्ही वस्तू नसून माणसं असतात.

"जरूर."
हे उत्तर मला हा संवाद जिथे साधला जातोय ते शेवटी व्हर्चुअल जग आहे याची आठवण करून देत आहे. असो.

"सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की मुळात लैंगिक व्यवहाराला असलेला कलंक नाहीसा व्हावा. "- हे व्हावं जरूर. पण त्याची पहिली पायरी म्हणजे याला व्यवसाय म्हणून मान्यता द्यावी हे योग्य होईल का (भारतात)? व्यवसाय एकदा मान्य झाला सरकाकडून ही काही जादू झाल्यासारखी परिस्थिती बदलेल असं मला वाटत नाही.

राजेश घासकडवी Thu, 18/07/2013 - 16:35

In reply to by ऋता

व्यवसाय एकदा मान्य झाला सरकाकडून ही काही जादू झाल्यासारखी परिस्थिती बदलेल असं मला वाटत नाही.

निव्वळ व्यवसाय म्हणून मान्यता मिळणं पुरेसं नाहीच. 'लगेच' परिस्थिती बदलणार नाही हेही मान्य. कधीच बदलणार नाही याची शाश्वती मात्र कोणी देऊ नये. आपल्या पूर्वजांनी ज्या अनेक गोष्टी अब्रह्मण्यम मानल्या होत्या त्या आपण आजकाल सर्रास करतो. (मुलींना स्वातंत्र्य देणं, शिकवणं, त्यांना नोकरी करून स्वतःच्या पायावर उभं राहू देणं, त्यांचे लग्नाचे निर्णय त्यांना घेऊ देणं वगैरे वगैरे)

ऋता Thu, 18/07/2013 - 17:57

In reply to by राजेश घासकडवी

"निव्वळ व्यवसाय म्हणून मान्यता मिळणं पुरेसं नाहीच. "
बरोबर. पण समाजातली लैंगिक व्यवहारांबाबत परिस्थिती बदलायची असेल तर पहिल्यांदा हा व्यवसाय कायदेशीर करा हे पटत नाही. परिस्थिती गिर्‍हाइकांची बदलायची(लपून छपून जावं लागतं वगैरे) आहे की त्यात पिळवणूक होणार्‍यांची?

व्यवसाय म्हणून मान्यता मिळाल्याने पिळवणूक कायदेशीर होईल ही भिती आहे. भारतात गरीबी आहे, शिक्षण विशेष नाही. तसंच व्यक्तिस्वातंत्र्याची जाणीव नाही. अशा परिस्थितीत व्यवसाय म्हणून मान्यता मिळणे हे धोक्याचं वाटतं- नेमका कसा सकारात्मक बदल (बर्‍यापैकी लगेच घडणारा) या मान्यतेमुळे पडेल हे त्या व्यावसायिकांनी/त्यांचा अभ्यास केलेल्यांनी सविस्तर सांगितलं तर त्यात धोका नाही असं पटेलही कदाचित. यथावकाश परिस्थितीत बदल होऊन मान्यता प्राप्त व्यवसाय होईलही- आत्ता नको/धोक्याचे वाटते असे काहीसे मत आहे. केवळ 'हा मान्यताप्राप्त व्यवसाय नको' असा 'हट्ट' नाहीये- सध्या असलेली परिस्थिती जी लेखिकेने समोर ठेवली आहे त्यामुळे झालेलं मत आहे.

"मुलींना स्वातंत्र्य देणं, शिकवणं, त्यांना नोकरी करून स्वतःच्या पायावर उभं राहू देणं, त्यांचे लग्नाचे निर्णय त्यांना घेऊ देणं वगैरे वगैरे"- याबाबत सावधान ---"देणं" हा शब्द वापरताय...नक्की काय म्हणायचय त्याचा विचार करा.

असो.
तसा मूळ विषय 'डान्सबार' बद्द्ल आहे. 'डान्स' आणि वेश्याव्यवसाय हे वेगळे काढले जात नाहीत/जाणे शक्य नाही यामुळे गुंतागुंत वाढत जाते.

बॅटमॅन Thu, 18/07/2013 - 18:11

In reply to by ऋता

बाकी ठीकच, पण

"मुलींना स्वातंत्र्य देणं, शिकवणं, त्यांना नोकरी करून स्वतःच्या पायावर उभं राहू देणं, त्यांचे लग्नाचे निर्णय त्यांना घेऊ देणं वगैरे वगैरे"- याबाबत सावधान ---"देणं" हा शब्द वापरताय...नक्की काय म्हणायचय त्याचा विचार करा.

यात चूक ते काय? जुन्या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत हे असंच होतं, स्त्रियांना स्वातंत्र्य देणं असा शब्दप्रयोग त्या काळासाठी ओके आहेच. घासकडवींनी तो शब्दप्रयोग जुन्या समाजव्यवस्थेसंदर्भातच वापरला आहे.

ऋता Thu, 18/07/2013 - 18:39

In reply to by बॅटमॅन

एका अर्थी ठीकच असेलही पण इतर अर्थही निघतात म्हणून विचार करा असं सुचवलं.
पूर्वी स्वातंत्र्य "नव्हतं", ते आज "आहे" असे वाक्य याबाबतीत (मला) जास्त योग्य वाटते ("आम्ही देतोय" असे नाही तर परिस्थिती बदलली आहे म्हणून ते "आहे" अशा अर्थाने). फाटे फोडण्याचा हेतू नाही.

बॅटमॅन Thu, 18/07/2013 - 18:43

In reply to by ऋता

इतर अर्थही निघतात, पण जे निघतात त्यात चूक काय आहे? स्त्रिया शिकू लागल्या. सुरुवातीला प्रचंड विरोध झाला, अन नंतर या ना त्या कारणाने कुटुंबप्रमुख पुरुषांनी मुभा दिल्यामुळेच शिकल्या हे खोटं आहे काय? दास्यत्वभाव जाणवतोय हा आक्षेप मान्य आहे पण त्यात चूक काय आहे? जनमताचा रेटा, शिकल्यामुळे होणारे फायदे, इ.इ. कारणांमुळे मुभा देणे भाग पडले असे म्हणा नैतर मुभा दिली म्हणा- त्या काळापुरता दोन्हींत फारसा फरक माझ्या मते नाही.

ही चर्चा मूळ मुद्द्याशी संबंधित नसल्याने मी इथेच थांबतो.

बॅटमॅन Thu, 18/07/2013 - 16:38

In reply to by ऋता

हे उत्तर मला हा संवाद जिथे साधला जातोय ते शेवटी व्हर्चुअल जग आहे याची आठवण करून देत आहे. असो.

तंतोतंत.

सविता Thu, 18/07/2013 - 17:16

In reply to by राजेश घासकडवी

जरूर. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की मुळात लैंगिक व्यवहाराला असलेला कलंक नाहीसा व्हावा. तसं झालं की या कल्पनांमध्ये सध्या जे वैचित्र्य वाटतं ते वाटेनासं होईल. एकेकाळी मुलींनी शिकण्या, नोकरी करण्याबद्दलही याच स्वरात बोलत असत.

कुठल्या गोष्टीची कुठल्या गोष्टीशी तुलना केली जातेय ते बघून हसू आले. वाद घालण्यासाठी घातला जातोय असे वाटले.

परवाच "शिंडलर्स लिस्ट" बघितला. त्यामुळे नाझी आणि ज्यूंचे हत्याकांड वगैरे डोक्यात अजून ताजे आहे. राजेश हे चर्चेमध्ये नाझींची बाजू घेऊन ते करतात ते कसे योग्य आहे, पूर्वी ते जरी घॄणास्पद वाटले तरी लोकसंख्या काबूत ठेवण्यासाठी कसे आवश्यक आहे, अजून एफेक्टिव्हली कसे करता येयील याचे विवेचन करतायेत अशी कल्पना केली.

काय पोकळ गप्पा तर मारायच्या अहेत ना, मग काय कुठलाही मुद्दा पुढे ढकलता येऊ शकतो.

बॅटमॅन Thu, 18/07/2013 - 17:21

In reply to by सविता

कुठल्या गोष्टीची कुठल्या गोष्टीशी तुलना केली जातेय ते बघून हसू आले. वाद घालण्यासाठी घातला जातोय असे वाटले.

+१०१००. "श्वानं युवानं मघवानमाह" आठवले एकदम.

शहराजाद Thu, 18/07/2013 - 02:07

In reply to by कविता महाजन

शरीराचे वस्तुकरण

वस्तुकरण म्हणजे नक्की काय? समजा, एक गाणारी व्यक्ती आवाज विकून चरितार्थासाठी पैसा मिळवते. त्यासाठी बहुतेक वेळा कलानंद न मिळता मागणी असेल तेच गावे लागते. ह्याला शरीराच्या गाणार्‍या भागाचे वस्तूकरण म्हणावे का? मागे ग्लॅक्सो कंपनीच्या एका टॉनिकच्या जाहिरातीत माझे चित्र वापरले होते, की हे बघा, आमचे टॉनिक घेणारे कुटुंब कसे आनंदी, धडधाकट असते. त्या चित्रात तसे दिसण्यासाठी मला त्याचे पैसेही मिळाले होते. आता हे माझ्या निरोगी आणि हसरे दिसणार्‍या शरीराचे वस्तुकरण का? असेच इतर अनेक व्यवसायांबद्दल म्हणता येईल.

ह्या चर्चेत मला सरळ देहविक्रय म्हणणे रास्त वाटते. त्याचे योग्य- अयोग्य, धोके, स्वेच्छा- जबरदस्ती हे पुढचे.

कुठलाही सेवा विकणारा व्यवसाय सेवा घेणार्‍यांची काय मागणी आणि मोबदल्याची काय तयारी ह्यावर अवलंबून असतो. कमी अधिक प्रमाणात. ज्या व्यवसायात, सुरक्षा, दर्जा प्रमाणन इ ला कायद्याचे- संघटनान्चे पाठबळ असते तिथे असे व्यावसायिक धोके ( अनारोग्य, अतिरेकी काम, अपुरा मोबदला, शोषण इ) कमी होतात. उदा. सफाई कामगार इ ना खूप व्यावसायिक धोके असतात. ते कमी करणे हा खरा उपाय. त्यासाठी त्या व्यवसायावर बंदी आणणे हा नाही.

सार्वजनिक मालमत्तेचा मुद्दा-
रस्ते, भुयारी मार्ग, स्वच्छ्तागृहे इ साठी आपण कर देत असल्याने ते सर्वजनिक धरले जाते. त्यांची अवस्था काय असते हे सर्वांना माहित आहे. त्यावर उपाय म्हणून, ते बंदच करायचे की लोकांचे वागणे सुधारण्यासाठी जागृती, कायद्याची काटेकोर अंमलबजावणी इ करायचे? तेच इथेही लागू पडते. वर म्हटल्याप्रमाणे लैंगिक सेवा व्यावसायिकांना वरील धोक्यांसाठी सुरक्षा व्यवस्था निर्माण करणे हा पिळवणूक कमी करण्याचा उपाय ठरू शकतो.

समाजाचा लैंगिक दृष्टिकोन बदलणे ही अर्थातच पटकन होणारी गोष्ट नाही. स्त्रिया, दलित इ विषयीचा दृष्टिकोन आणि वागणूक बदलायला कित्येक वर्षे लागलेली आहेत, आणि आणखीही लागणार आहेत. पण १००, ७५, ५०, २५ वर्षांपूर्वीपेक्षा कितीतरी सुधारणा झाली आहे. देहविक्रय हा जगातला अत्यंत जुना व्यवसाय आहे, कारण सर्वच काळांत ही समाजाची एक गरज होती. तो व्यवसायच बंद कसा करणार? तो बंद होईल का?

अवांतरः
मंडी चित्रपटातले रुक्मिणीबाई कोठेवालीने ' हे बंद करा' म्हणणार्‍यांना दिलेले साखरेत घोळ्लेले पण तिरकस उत्तर आठवले. ' अहो हे 'नाच-गाणे' म्हणजे आम्हा कलावंतिणींचा श्वास. आता उद्या तुम्ही म्हणाल, श्वास घेणंच बंद करा. म्हणून काय आम्ही ते बंद करू?'
(येथे शरीरविक्रयाची श्वासाशी तुलना करण्याचा हेतू नाही. सर्वच वेश्या आपखुशीने हे करतात असेही मला म्हणायचे नाही. अशा बंदीने खरोखर हा व्यवसाय (आंणि शोषण) बंद होइल का हा प्रश्न आहे.)

शारीरिक गोष्टींवर आधारित व्यवसायांत व्यवसायाचा कालावधी खूपच कमी-जास्त असू शकतो. खेळांतही, व्यावसायिक गॉल्फपटू, क्रिकेट्पटू हे धावपटू, जिम्नॅस्ट यांपेक्षा जास्त काळ खेळत राहू शकतात. नटांना नट्यांपेक्षा बराच जास्त काळापर्यंत प्रमुख (किंवा अन्य) भूमिका मिळतात. लैंगिक सेवा पुरवणार्यांचा भरपूर मागणी असण्याचा काळ बहुतेकांच्या बाबतीत छोटा असतो. पण स्वखुशीने (हे महत्वाचे), जर कोणी हा व्यवसाय करात असेल तर त्याला बंदी नसावी. तो त्या व्यक्तीचा निर्णय आहे. नेदरर्लॅंडसारक्या ठिकाणी काही वेळा असेही दिसून येते की जोडधंदा म्हणून काही स्त्रिया (विद्यार्थी, अगदी नवीन नोकरदार) पार्ट टाइम देहविक्रय करतात, पुढे गरज संपल्यावर बंद करतात. त्यांची लग्ने होतात, नोकरी-धंद्यात जम बसतो, पुधचे आयुष्य सामान्य लोकांप्रमाणेच जाते. आपल्याकडे हे इतक्या उघडपणे होणे नाही, पण लपून छपून कितीतरी प्रमाणात आहेच. पुढे इतर व्यवसाय करण्यात शारीरिक- मानसिक अडचण येऊ नये, इतत समाजाला धोका उद्भवू नये ह्यासाठी वरीलप्रमाणे दर्जा नियमन इ ची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. घासकडवी म्हणतात त्याप्रमाणे कायद्याने नियमित व प्रमाणित व्यावसाय केल्यास देवादाते आणि सेवा उपभोक्ते दोन्ही वर्गाना ते सुरक्षिततेचे ठरेल.

अजो१२३ Wed, 17/07/2013 - 20:38

In reply to by सन्जोप राव

भारत हा लैंगिकदृष्ट्या वैफल्यग्रस्त लोकांचा -सेक्शुअली फ्रस्ट्रेटेड लोकांचा देश आहे.
पूर्ण असहमत. शहरातल्या चार उच्चवर्णियांचा सर्व्हे देशाला लावू नकात. भारतीय लोक भावनाभारीत अनेक लफडी करतात. त्यात लैंगिकता असतेच असते. 'व्यक्तिस्वातंत्र्यवादी (रीड आकडू)शहरी' जेव्हा आपल्या स्त्री साथीदारासोबत 'भारतात' जातात, तेव्हा गावकरी ज्या नजरेने पाहतात त्यामूळे असा समज होतो. नव्या शेळीवर लाळ टपकावणार्‍या लांड्ग्याने पूर्वी चार खाल्ल्या नाहीत हा चूकिचा निष्कर्ष आहे.

भारतीय लोक आपली लफडी मुळीच सांगत नाहीत. सगळे सर्वे फेल होतात.

भारतीय लोकांचे लैंगिक जीवन सर्वांगाने अतिशय समृद्ध असते. आणि उभ्या जगात त्यात भावनिकता सर्वात जास्त असेल.

सन्जोप राव Thu, 18/07/2013 - 05:26

In reply to by अजो१२३

विनोदी प्रतिसाद. यावरुन बाळ ठाकरेंचे भाषण आठवले. पहिल्या वाक्याचा दुसर्‍या वाक्याशी संबंध आहे. दुसर्‍याचा तिसर्‍याशी नाही. तिसर्‍याचा पहिल्याशी तर नाहीच नाही.
असो, चालू द्या.

अजो१२३ Thu, 18/07/2013 - 12:20

In reply to by सन्जोप राव

१. मला काय लिहायचे होते ते पुन्हा लिहितो. माझ्या मराठी लिखाणात इतका फ्लो नाही हे मलाही मान्य आहे. हा विनोदी नसलेला प्रामाणिक प्रयत्न करत आहे.
२. भारतील लोक sexually frustated आहेत असं विधान लोक करतात. याचा अर्थ 'सर्व भारतीय' आणि 'सर्वाथानं (लैंगिक) वैफल्यग्रस्त' असा निघतो किंवा एखादा वाचणारा याच टोन मधे हे वाक्य वाचू शकतो. आपण फार ब्लँकेट स्टेटमेंट केलं आहे.
३. या विधानाला statistical आधार नाही. असेल तर मी ते मानायला तयार आहे.
४. ज्या वयापासून ज्या प्रमाणात ज्या frequency ने जितक्या partners शी सरासरी स्री वा पुरुषाचे लैंगिक संबंध असावेत त्यापेक्षा ते खूप कमी प्रमाणात होतात, इतके की मानसिकतेवर परिणाम होतो, हे भारताबाबत विधान असत्य आहे. असे विधान करण्याकरता निवडलेले सॅंपल चुकिचे आहे. शहरातल्या ब्रेनवॉश्ड सवर्ण तरुणांची मानसिकता आपल्याला सांगायची असेल तर आपलं विधान जास्तीत जास्त ३०-४०% खरं असू शकतं. याची दोन कारणं आहेत - एक तर खरोखरीच लैंगिक शुचिता पाळलेली असावी, आणि अश्या लोकांमधे वैफल्य असावं. लोक लैंगिक सुचिता पाळतच नाहीत किंवा त्याबद्दल (पाळल्याबद्दल) त्यांना वैफल्य नसते. हाच टक्का जास्त आहे.
५. http://www.rediff.com/getahead/slide-show/slide-show-1-specials-sex-and…

http://www.indianexpress.com/news/indians-happiest-with-sex-lives-surve…
असे सर्व्हे कुचकामी आहेत. यांचा १००% विरुद्ध निकाल का यावा?
६. या वाक्यात 'आंतरराष्ट्रीय तुलनेत' असे शब्द आपल्याला अभिप्रेत असावेत. (कदाचित नसेलही.) अमेरिकेत इथल्या पेक्षा ३ पट जास्त रेप होतात आणि लोकसंख्या भारताच्या ३ पट कमी आहे. म्हणजे लैंगिक गुन्हे दरडोई ९ पट जास्त होतात. frustate हे विशेषण भारताला का?
७. भारतीय लैंगिकतेला (विवाहापूर्वीची/ विवाहातील /विवाहबाह्य) भावनिकतेचा टच आहे जो पाश्च्यात्य जगात नाही. तिथे विवाहेतर, इ लैंगिकता व्यापार,वासनेसाठी जास्त आढळते. भावनाहिन लैंगिकता (बार, इ)भारतात कमी आहे.

आता ही वाक्ये सुसुत्र नाहीत हे मान्य पण ती आपल्या विधानाबद्दल वगवेगळ्या प्रकारे शंका दर्शवतात. बाय द वे, मी सहसा कोणत्या विधानात असा घुसत नाही आणि हा धाग्याचा मूळ विषयही नाही. पण असं लिहिण्याची तीन कारणे - १. आजन्म भारतभर सर्वस्तरांवर रासलीला पाहणार्‍या मला हे वाक्य ढेकरा देणार्‍या माणसाला चतकोर भाकरीचा तुकडा फेकल्यासारखे वाटले. २. इथे (ऐसीवर) फार गंभीर (किंवा कष्ट घेऊन केलेले) लेखन होते तेव्हा सहजवाचक सगळं खरं मानत चालतो. ३. हे मत निराधार आहे.

Something else -

लेखिकेच्या मताशी मी सहमत आहे. भारतीय सरकारने/इकॉनॉमिने जर व्यवस्थित व्यवस्था उपलब्ध करून दिली तर बारबालांचा प्रश्न सोडवता येईल. असे असताना 'हा धंदा त्यांनी आनंदाने करावा', 'हा धंदा समाजाने आदराने पाहावा' 'हा धंदा नष्ट होऊ शकत नाही कारण ही समाजाची गरज आहे' इ सूर उमटत आहे. चोरी/डाकूगिरी समाजात अंशतः असावी, त्याने सामाजिक न्याय प्रस्थापित होतो. प्रचलित व्यवस्थेमधे काही लोकांना नियमां अंतगर्त न्याय (say जीवनमान) मिळूच शकत नाही , अगदी व्यवस्थेच्या धुरीणांना खूप अपेक्षित असूनही!! तिथे सिस्टिम अशी सेल्फ बॅलेंस करते. असे होणे वेगळे आणि सगळ्यांनी मिळून चोरीला कायदेशीर मान्यता देण्यासाठी रान पेटवणे वेगळे. वर एका प्रतिसादकाने गायन विकण्याचा उल्लेख केला आहे. गायन विकावे तर लिंग का नाही असा त्यांचा सुर दिसला. मग प्राण का नाही? आणि तुमचे (as common noun) प्राण तुम्हीच का विकावे, तुमची बायकोही विकू शकते. बाजाराच्या नियमांत अडथळा का? चालेल का? मालकी, कायदा, बाजार, पैसा या कल्पना कृत्रिम आहेत, त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या व्यवस्थेमुळे, मानवाच्या अस्तित्वविषयक , भावनाविषयक स्थायी विश्वाला एका सीमेपलिकडे हात लाऊ नये. उद्या सॅडिस्ट लोकांनी एक बाजार निर्माण केला - (कायद्याच्या आत) कि लहान मुलांना हातावर सर्वांदेखत छडिने सपकन मारायचे आणि एका छडिला १००० रु द्यायचे. याचे समर्थन व्हावे का? अर्थव्यवस्थेशी निगडित आहे म्हणून कशाचेही समर्थन व्हावे का? 'देहाचा लैंगिक विक्रय/खरेदी' नैसर्गिक नाही, विकृत आहे. या विकृतीची आपल्याला सवय झाली आहे. वरच्या सॅडिस्ट उदाहरणापेक्षा त्यात काहीच वेगळं नाही, पाहणारे नंब झाले आहेत त्यापेक्षा.

सविता Thu, 18/07/2013 - 11:03

In reply to by सन्जोप राव

भारत हा लैंगिकदृष्ट्या वैफल्यग्रस्त लोकांचा -सेक्शुअली फ्रस्ट्रेटेड लोकांचा देश आहे. शरीरसुखाची गरज सतत नाकारत राहाणे आणि कालबाह्य शुचितेच्या कल्पनांचे उदात्तीकरण करत राहाणे हा भारतीय संस्कृती वगैरेचा भाग आहे.

काही लैंगिक गुन्हे घडले की हे वाक्य सारखे इकडे तिकडे फेकले जाते. मला वाचून वीट आलाय!

म्हणजे नक्की काय?

जिकडे " शरीरसुखाची गरज" सतत नाकारली जात नाही तिकडे काय परिस्थिती सुधारली आहे ते कोणी तुलना करून सांगू शकेल का?

वयात आल्याबरोबर भिन्न लिंगी साथिदाराबरोबर सेक्स अगदी गे, लेस्बियन साथिदार निवडणे ह्या गोष्टी सुद्धा फार भयानक जिथे समजल्या जात नाहीत त्या देशात लैंगिक प्रश्न नाहीत का? तिकडे बलात्कार होत नाहीत का? डान्स/गे/लेस्बियन बार येथे मिळालेल्या साथिदाराबरोबर जबरदस्तीचे प्रकार अजिबात होत नाहीत का?

शुचितेचा उदो उदो नको हे ठिक आहे पण च्यामारी अगदी "आपला हात जगन्नाथ" अगदी स्त्री आणि पुरूष दोघांना जगाच्या पाठीवर कुठेही माहीत नसते का? का झाली इच्छा की मला साथिदार पाहिजेच हे "मस्ट" आहे? ह्याच गरजेला इतके मोठे स्थान का द्यायचे? बाकीच्या कितीतरी गरजा आपण दुधाची तहान ताकावर नाही भागवत का?

-जाम झोप आलीये - पण ऑफिस्/अभ्यास आहे, व्यवस्थित आंथरूण टाकून झोप काढणे शक्य नाही, काढ बसल्या बसल्या डुलकी.
-जाम भूक लागलिये - मस्त भरपेट थाळी आवडेल, पण वेळ्/व्यवस्था/पैसे उपलब्ध नाही,खा पोहे/वडा-पाव/सॅन्डविच आणि एक कप चहा.
-जाम गरम होतेय, गार पाण्याने आंघोळ आवडेल - पण वेळ्/व्यवस्था उपलब्ध नाही, लाव जोरात फॅन, थंड सरबत पी.

ह्याच चालीवर लैंगिक इच्छेवर पण उपलब्धतेनुसार पर्याय वापरले जाऊ शकतात. पण मला "लैंगिक इच्छा" झालीये - ही फार्फार महत्वाची गोष्ट आहे, शिवाय मी भारतीय आहे, आमच्या इकडे असल्या गोष्टींचे दमनच होते असले ओरडे का?

बॅटमॅन Thu, 18/07/2013 - 12:25

In reply to by सविता

बलात्काराच्या समर्थनासाठी हे वाक्य फेकू नये म्हटले तरी फॅक्ट रिमेन्स-लैंगिक गरजेचे पाहिजे तसे शमन होत नाही. तसे ते झाले तर काही चांगले फरक तरी अवश्य पडतील असे वाटते.

ऋषिकेश Thu, 18/07/2013 - 13:56

In reply to by बॅटमॅन

लैंगिक गरजेचे पाहिजे तसे शमन होत नाही.

म्हणजे कसे? किती प्रमाणात व कशा प्रकारे शमन झाल्यास बलात्कार थांबतील?

असो.
सॉरी! पण ही फॅक्ट नाही केवळ पळवाट आहे.

बॅटमॅन Thu, 18/07/2013 - 14:02

In reply to by ऋषिकेश

पुन्हा एकदा-बलात्काराशी त्याची सरळसरळ कॉज अँड इफेक्ट अशी लिंक लावत नाहीये. अन ती पळवाट तर मुळीच नाही-गैरसमज नसावा. तस्मात साधे प्रश्न असे:

१. नैसर्गिकपणे संभोगेच्छा होण्यास सुरुवात झाल्यापासून ते पहिल्यांदा संभोग करेपर्यंतचा काळ भारतात टिपिकली बराच जास्त आहे की नाही?

२. मधल्या काळात सारखी कामेच्छा दाबली जाणे चूक की बरोबर?

३. बलात्काराशी याचा संबंध सरळसरळ जोडता येईलच असे नाही. पण दमन न होता सेफ सेक्सबद्दल अनावश्यकरीत्या टॅबू असलेली मानसिकता बदलली तर चांगले की वाईट? ओव्हरऑल व्यवस्थेवर याचा काही ढोबळ परिणाम जर झाला तर तो वाईट होईल असे कशाच्या आधारावर वाटते?

ऋषिकेश Thu, 18/07/2013 - 14:35

In reply to by बॅटमॅन

१. नैसर्गिकपणे संभोगेच्छा होण्यास सुरुवात झाल्यापासून ते पहिल्यांदा संभोग करेपर्यंतचा काळ भारतात टिपिकली बराच जास्त आहे की नाही?

नक्की सांगता येणार नाही पण लग्नाआधीच (तथाकथित) 'अल्लड वयात' शरीरसंबंध ठेवण्याचे प्रमाण भारतात फार कमी नाही. एका अभ्यासाप्रमाणे (पीडीएफ : सारांशासाठी पान १३ ते १६)अभ्यासलेल्या गटाच्या सरासरी २२% मुलग्यांनी (मीन वय १९.३ वर्षे) लग्नाआधीच शारीरव्यवहार केलेला आढळतो. (२४ वर्षांच्या तर ३०% हून अधिक मुलग्यांनी) (तर तो केवळ ७% स्त्रीयांनी) आणि त्यापैकी केवळ ०.८३% मुलग्यांनी लग्ना आधी संभोगाला मान्यता नसल्याचे सांगितले. इतकेच नाही तर लग्नापूर्वी संभोग केलेल्यांपैकी २४% मुलग्यांनी २ किंवा अधिक पार्टनर्सबरोबर संभोग केला आहे.
टाईम्सच्या याबातमी नुसारही ९९% मुलगे लग्ना आधीच्या संभोगाला अयोग्य मानत नाहीत, त्याच बातमी प्रमाणे 50% of teens have kissed someone of the opposite sex

२. मधल्या काळात सारखी कामेच्छा दाबली जाणे चूक की बरोबर?

मधला काळ कमी असणे योग्य पण परस्पर संमतीने संभोग करायला कोणी हरकत घेतली आहे? आणि तोपर्यंत कामेच्छा दाबली जाऊ नये म्हणून काय उपाय सुचवाल? आणि अगदी मध्यमवर्गीय सोसायट्यांमध्ये / चाळींमध्येसुद्धा जरा आजुबाजुला डोळसपणे (चौकसपणे? ;) ) बघितले तर इतकीही कामेच्छा दाबली गेल्याचे दिसत नाही

३. पण दमन न होता सेफ सेक्सबद्दल अनावश्यकरीत्या टॅबू असलेली मानसिकता बदलली तर चांगले की वाईट?
चांगलेच, (त्यामुळे पुढील प्रश्न गैरलागु)

बलात्काराशी याचा संबंध सरळसरळ जोडता येईलच असे नाही

बाकी, बलात्काराशी सरळसरळ काय कसाही संबंध न लावणेच योग्य! आता गंमत बघा भारतात (आणि जगभरातही) पुरूषांपेक्षा स्त्रियांच्या कामेच्छेचे अधिक दमन होते पण त्यांच्याकडून अश्या जबरदस्तीचे वर्तन का आढळत नाही? कारण अशी जबरदस्ती अर्थात बलात्कार हा अश्या इच्छेमुळे नसून त्य इच्छेचे शमन करणे हा पुरुषांचा हक्कच असल्यासारख्या वर्चस्वाच्या भावनेतून होतो. हे अजिबातच पटत नाहिये का?

बॅटमॅन Thu, 18/07/2013 - 14:44

In reply to by ऋषिकेश

सर्व्हेच्या लिंकबद्दल धन्यवाद. वाचतो. त्यामुळे दमन नक्की होते आहे किंवा कसे, याबद्दल अजून माहिती कळेल.

बाकी, बलात्काराशी सरळसरळ काय कसाही संबंध न लावणेच योग्य! आता गंमत बघा भारतात (आणि जगभरातही) पुरूषांपेक्षा स्त्रियांच्या कामेच्छेचे अधिक दमन होते पण त्यांच्याकडून अश्या जबरदस्तीचे वर्तन का आढळत नाही? कारण अशी जबरदस्ती अर्थात बलात्कार हा अश्या इच्छेमुळे नसून त्य इच्छेचे शमन करणे हा पुरुषांचा हक्कच असल्यासारख्या वर्चस्वाच्या भावनेतून होतो. हे अजिबातच पटत नाहिये का?

पुन्हा तेच! बलात्काराची मुख्य कारणे काय इ. बद्दल मी असहमती दर्शवली नव्हतीच कधी :) तसे असल्यासारखा गैरसमज कृपया नसावा. लैंगिक व्यवहारांबद्दल मोकळेपणा आला तर त्याचा परिणाम वाईट होईल असे वाटत नाही एवढेच म्हणालो. राहता राहिला स्त्रियांच्या इच्छादमनाचा प्रश्न- पुरुषप्रधान समाजव्यवस्था हे दोन शब्दी उत्तर बस आहे त्याकरिता.

बॅटमॅन Thu, 18/07/2013 - 15:53

In reply to by विसुनाना

नाही. प्रीमॅरिटल सेक्सबद्दल मोकळेपणा आत्ता आहे त्यापेक्षा वाढला तर ते चांगले आहे असे सुचवायचे आहे.

बॅटमॅन Thu, 18/07/2013 - 18:18

In reply to by विसुनाना

रोचक लेख आहे. प्रीमॅरिटल सेक्सबद्दलचा मोकळेपणा-इफ अ‍ॅट ऑल वाढला-तर ती वरवरची मलमपट्टी असेल असे लेखावरून मत सांगता यावे. म्हणजे एक तर वय, त्यात परत मीडिया चा मारा, अन प्लस लग्ने उशिरा-मग फ्रस्ट्रेट होणारच. तर त्यातला मीडिया चा मारा कमी करणे हे जास्त श्रेयस्कर असे लेख सुचवितो. मान्य करायला हरकत नाही. पण त्याचबरोबर मोकळेपणा वाढला तरी चांगलेच असे वाटते. असो.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 18/07/2013 - 20:56

In reply to by विसुनाना

हा लेख शीर्षकापासूनच फार काही आवडला नाही.

विचारांवर सेन्सॉर नाही

.. (वयात येणारा मुलगा म्हणतो,) "वयाचे काय करायचे ते मग बघा, मला मात्र तसे करावेसे वाटते. माझ्या मनात हेच विचार येतात."

(आणि अशी इतर काही वाक्य लेखाच्या उत्तरार्धातही आहेत.)
अशा प्रकारचे विचार येण्यात काय अनैसर्गिक किंवा वाईट आहे? विचारांवर सेन्सॉर म्हणजे नक्की काय?

एकंदर या लेखिकेच्या डोक्यात/विचारांत, डोक्यात विचार येणे आणि त्यावर तश्शीच कृती करणे या दोन गोष्टी वेगळ्या असण्याबाबत गोंधळ आहे असं दिसतंय. किंवा लेखिका दुसर्‍या अमेरिकन पिढीतल्या कट्टर, कर्कश स्त्रीवादाची उपभोक्ती, ग्राहक असावी.

---

अवांतर १: Bound and Gagged याच्या पहिल्या प्रकरणात दोन अमेरिकन समलैंगिक, S/M मधे रस असणार्‍या पुरुषांची गोष्ट आहे. या दोघांना लैंगिक आनंद, उपभोगासाठी पालक-मूल अशा प्रकारच्या फॅण्टसी करण्याची सवय होती. प्रत्यक्ष समागमाच्या वेळेस सोबत असणार्‍या एखाद्या वयस्क (adult) पुरुषाबरोबर हे दोघे असं नाटक करत असत, एक वडील आणि दुसरा मुलगा किंवा एक धसमुसळा मालक आणि दुसरा नाजूकसाजूक गुलाम, असे. प्रत्यक्ष या कृती, व्यवहारात कुठेही लहान मुलांचा समावेश नसे. दोन पोलिसांनी यांना भरीस पाडून असं काही, लहान मुलांचा कृत्यात समावेश करण्याबद्दल, फक्त बोलायला भाग पाडलं (प्रत्यक्ष पीडोफिलीया नाहीच), तरीही या दोघांना अनुक्रमे ३० आणि ३३ वर्ष तुरूंगवास झाला.

अवांतर २: सतीश तांबेंच्या एका कथानायकाला कोणाचातरी खून करण्याची फार इच्छा होते. प्रत्यक्षात तो एका वृद्ध भिकार्‍याची काळजी घेतो. हा भिकारी मरतो तेव्हा नायकाला ते समाधान मिळतं, असं काहीसं कथानक आहे. (आता कथाही नीटशी आठवत नाही. बहुदा 'माझी लाडकी पूतनामावशी' या कथासंग्रहातली ही एक कथा आहे.)
दुसरं उदाहरण सिमोन दी बोव्व्हॉरच्या She came to stay चं. त्यातही तिने व्यक्तिगत आयुष्यातला बदला घेण्याच्या इच्छेने, जी इच्छा तिला फार प्रिय नव्हती, या कादंबरीतल्या एका पात्राचा खून घडवला.

वास्तवात खून करणं वाईटच. पण लोकांच्या डोक्यात असे विचार येतात, ते शांत करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय काढतात, त्यांतले काही उपाय अशा प्रकारचे मनोरंजकही असतात. मग "विचारांवर सेन्सॉर" हा शब्दप्रयोग फार फसलेला वाटतो.

अवांतर ३: स्टार ट्रेक-व्हॉयेजर याच्या एका भागात हे लोक ज्या ग्रहावर जातात ते लोक टेलिपॅथ असतात. इतर जमातींच्या हिंस्त्र विचारांवर ताबा मिळवून त्याचा पॉर्नोग्राफीसारखा उपयोग काही लोक करत असतात. त्या ग्रहावर हिंस्त्र विचार करणं हाच दंडनीय गुन्हा असतो. आणि या व्हॉयेजर यानावरची एक इंजिनियर क्षणिक हिंस्त्र विचार करते, त्यावर कृतीही करत नाही पण बाजारपेठेत इतर कोणी केलेल्या खुनाची शिक्षा भोगण्याची वेळ हिच्यावर येते असा तो भाग आहे.

विसुनाना Fri, 19/07/2013 - 11:58

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

डॉ. शुभांगी पारकर यांचे मत विचारात घेण्याजोगे आहे असे वाटते.

"एकंदर या लेखिकेच्या डोक्यात/विचारांत, डोक्यात विचार येणे आणि त्यावर तश्शीच कृती करणे या दोन गोष्टी वेगळ्या असण्याबाबत गोंधळ आहे असं दिसतंय.">>>>>
ज्याअर्थी लेखिकेने आपल्या लेखात - 'वयपरत्वे चंगळ व क्षणभंगुर प्रवृत्ती असताना स्वत:च्या विचारांवर व कृतीवर आतून नियंत्रण येत नाही.'- या वाक्यात विचार आणि कृती या दोन बाबी पृथक मांडल्या आहेत त्याअर्थी लेखिकेला त्या दोन्ही वेगळ्या आहेत याची पूर्ण जाणीव असलेली दिसते.

"लेखिका दुसर्‍या अमेरिकन पिढीतल्या कट्टर, कर्कश स्त्रीवादाची उपभोक्ती, ग्राहक असावी.">>>>
याबाबत थोडे स्पष्टीकरण दिलेत तर माझ्यासारख्या एतद्देशियांना ('देसीं'ना) नीट समजेल.(Second-wave feminism??)कट्टर-कर्कश स्त्रीवाद म्हणजे काय? या लेखाचा त्याच्याशी कसा काय संबंध येतो? वगैरे.

अवांतर :
१.लेखिकेबद्दल काही माहिती सापडली :
http://www.dnaindia.com/mumbai/1757263/report-for-them-leisure-is-learn…
पण म्हणून काही त्यांना या क्षेत्रातले एकमेवाद्वितीय तज्ञ मानता येणार नाही. ;)

२.बाकी, आपण दिलेली उदाहरणे पौगंडावस्थेतील व्यक्तींची/पात्रांची नाहीत असे दिसते.

३.मूळ चर्चेत हे प्रतिसाद अयोग्य असतील तर जरूर उडवावेत.

अजो१२३ Fri, 19/07/2013 - 12:13

In reply to by विसुनाना

याला hypomania म्हणतात. याने माणसे थकत नाहीत. त्यांचा मेंदूही नॉर्मलपेक्षा चांगला चालतो.
हा परिणाम चांगले असणारा पण 'आजार' आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 19/07/2013 - 19:12

In reply to by विसुनाना

दुसर्‍या पिढीतली कर्कशता तेव्हाच्या (७०-८० ची दशकं) सगळ्याच स्त्रीवाद्यांकडे होती असं नाही. काही ठराविक विचारसरणी कर्कश होती असं आता (तिसर्‍या पिढीतल्या स्त्रीवाद्यांना) वाटतं (आणि त्याची उलट प्रतिक्रियाही उमटली). त्या प्रकाराचं एक उदाहरण म्हणजे रॉबिन मॉर्गन यांचं वाक्य Pornography is theory, rape is practice. या स्त्रीवाद्यांचा कोणत्याही प्रकारच्या शरीरविक्रयाला विरोध होता, पॉर्नोग्राफी, वेश्याव्यवसाय, स्ट्रीपटीझ, पोल डान्स इ. ठराविक प्रकारचे विचार केले म्हणून माणूस त्यावर तशीच कृती करणार अशा प्रकारची त्यांची भूमिका होती. असे विचार लोकांवर लादण्यासाठी (लोकशिक्षण नव्हे!) सरकारी मदत, कायदे इ. मार्गाला त्यांचा विरोध नव्हता. (अन्य काही स्त्रीवादी अमेरिकन सरकारला पितृसत्ताक सरकार म्हणत. याच आठवड्यात टेक्ससमधे पास झालेल्या गर्भपातविरोधी कायद्यामुळे अमेरिकेत पितृसत्ताक, धर्मप्रेमी गटाचं मोठ्या प्रमाणात असणारं अस्तित्त्वही दिसून येतं. अशा प्रकारच्या, स्त्रियांवर अन्याय सुरू करणार्‍या विचारसरणीच्या लोकांकडून मदत घेण्याला त्यांचा विरोध होता.)

डॉ. पारकर यांच्या लेखनातल्या कृतीवर बंधनं हवीत या भागाबद्दल अजिबात आक्षेप नाही.

आक्षेप "विचारांवर सेन्सॉर" या विचारसरणीवर आहे. विचारांवर सेन्सॉर आणून कोणाचं, काय आणि कसं भलं होईल हे समजत नाही. उलट अशा प्रकारची वैचारिक शिस्त लावली तर फ्री थिंकींग, नव्या कल्पनाही दडपल्या जातील अशी भीती वाटते. आपल्या समाजात बालवयात प्रश्न विचारण्याची बंदी, वयात येताना, टीनेजमधे जर अशा प्रकारचे सेन्सॉर्ड विचार करायला भाग पाडलं तर हॉर्मोन्समुळे, या वयामुळेच जी नैसर्गिक प्रेरणा आहे त्याची मुस्कटदाबी होऊन काय फायदा होणार आहे? उलट संभोगाचे विचार मनात येणं नैसर्गिक आहे, पण हे वय त्याचं नाही, अशा विचारांचं शमन होण्यासाठी हस्तमैथुन इत्यादी मार्ग आहेत, कोणाच्याही इच्छेविरोधात त्या व्यक्तीशी संभोग करू नये, अशा प्रकारच्या शिक्षणातून मुला-मुलींचं भलं होणार नाही का? "विचारांवर सेन्सॉर" म्हणजे प्रश्न कार्पेटखाली ढकलणं वाटतं.

ख्रिस्ती धर्मातले काही पंथ समलैंगिकता अनैसर्गिक आहे यावरून लोकांचं समुपदेशन करतात. या लोकांची नैसर्गिक प्रेरणाच पाप आहे असं सांगण्यामुळे अशा लोकांची किती कुचंबणा होत असेल याची कल्पना करता येईल.

(डॉ. पारकरांचं शिक्षण काय आहे हे वाचून या लेखाबद्दल अधिकच आश्चर्य वाटलं. का हा संपूर्ण लेख ठराविक प्रकारचे मनोरुग्ण गृहित धरून लिहीलेला आहे आणि हे गृहितक सांगायचंच राहिलं?)

विसुनाना Sat, 20/07/2013 - 17:00

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'विचारांवर सेन्सॉर नाही' या शब्दप्रयोगात विचारांवर सेन्सॉर असावे असा अर्थ दडलेला नाही तर 'विचारांना सेन्सॉर करताच येत नाही' असा अर्थ आहे असे वाटते.

दुसरी स्त्रीवादी लाट म्हणजे डाव्या विचारांची असावी असा एक समज झाला. तिसरी स्त्रीवादी लाट ही भांडवलशाही विचारांची वाटते.(जिच्यात स्त्रीने आपल्या देहाचा 'स्वखुशीने' एक भांडवल म्हणून वापर करण्यास कोणताही प्रत्यवाय नाही.)
डॉ. पारकर या दुसर्‍या स्त्रीवादी लाटेतल्या असाव्यात असे मानायला जागा आहे. ( कारण त्यांच्याबरोबर एका समारंभात महेश भट व डॉ. मोहन आगाशे दिसतात. ते दोघेही डाव्या विचारसरणीचे आहेत असे मला वाटते. )

माझ्या दृष्टीने दुसरी स्त्रीवादी लाट जास्त योग्य आहे कारण तिच्यात स्त्री आणि पुरुष यांच्यातल्या 'बौद्धिक' समानतेला जास्त प्राधान्य आहे.

ऋषिकेश Thu, 18/07/2013 - 16:22

In reply to by विसुनाना

नव्हे. सेक्सचा लग्नाशी संबंध नसावा ('लग्न' म्हणजे जोडीदारासाठी (आणि अपत्य झाल्यास त्या/त्यांच्यासाठी) प्रॉपर्टीच्या नैसर्गिक व्हिलेवाटीसाठी केलेला करार हे जुने मत कायम) तर कोणाचीही फसवणूक न करता असणार्‍या परस्पर संमतीशी असावा असा मुद्दा आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 17/07/2013 - 06:57

डान्सबार चालवणे किंवा बंद करणे या संदर्भात बरेच प्रश्न, मुद्दे, विस्कळीत विचार आहेत.

कोणत्याही प्रकारे बालकांना (जे काही कन्सेंटचं वय असेल त्याच्या आतले लोक) शरीरविक्री आणि तत्संबंधी व्यवसायात आणणं आणि कोणत्याही वयस्क व्यक्तीला जबरदस्तीने या व्यवसायात आणणं घृणास्पद वाटतं.

१. डान्सबार बंद करण्यामागचं कारण (चारचौघात सांगताना) नैतिकता असं दिलं गेलं. याच नैतिकता, स्त्रियांवर होणारे अत्याचार या नावाखाली अलिकडेच मुंबईतल्या पुतळ्यांना फक्त बिकीनी घालून उभं करण्यास मनाई केली गेली. या बंदीमुळे स्त्रियांचं आयुष्य अधिक सुरक्षित होईल आणि समाजाची नैतिक पातळी उंचावेल असं सांगितलं जातं. खरंच असं होतंय का? मॅनेक्वीन्सच्या बाबतीतला निर्णय हास्यास्पद का आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नसावी. डान्सबारसंबंधित निर्णयामुळे प्रश्न पडले.
अ. या स्त्रियांना अर्थार्जनाचं अन्य साधन उपलब्ध करून दिलं का?
आ. अर्थार्जन करता येत असल्यास आधी मिळत होते तेवढेच, अधिक किंवा साधारण तेवढेच पैसे मिळण्याची सोय होती का? नसल्यास या स्त्रियांनी स्वतःच्या जबाबदार्‍या कशा प्रकारे पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा होती?
इ. अशी काही सोय केली नसल्यास कोणाच्याही पोटावर पाय आणण्याचा नैतिक अधिकार बहुसंख्य लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला असावा का?
ई. या व्यवसायामधे स्त्रियांची पिळवणूक होत असावी याबद्दल शंका नाही. अगदी लहान मुलांचीही. मग डोंबारी, कडकलक्ष्मी, किंवा तत्सम प्रकारचे शारीरिक दुखापती होणारे खेळ करून उपजीविका भागवणार्‍या लोकांवरही अशा प्रकारची बंदी का आणली जात नाही?

२. अर्थार्जनासंदर्भातः १९८० च्या दशकात काही अमेरिकन स्त्रीवाद्यांनी पॉर्नोग्राफीविरोधात बर्‍यापैकी मोठं आंदोलन उभं केलं होतं. पॉर्नोग्राफीला संपूर्ण विरोध करण्याची भूमिका घेणार्‍या स्त्रियांना वेश्याव्यवसाय, नग्ननृत्य, आणि तत्सम व्यवसाय करणार्‍या स्त्रियांनी अर्थार्जनासंदर्भात प्रश्न विचारले होते; आम्हाला टायपिंग येत नाही, आम्ही फार शिकलेलो नाही. आम्ही किमान वेतन मिळणार्‍या नोकर्‍याच मिळणार. त्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे आम्हाला या व्यवसायातून मिळतात. बहुतांश मध्यमवर्गीय स्त्रिया घरांमधे पुरुषांच्या नोकरच असतात आणि तिथेही त्यांच्यावर अत्याचार होतात. मग आम्ही आमच्या अटी-शर्ती, वेळानुसार इथे काम करतो आणि त्याचे बरेच जास्त पैसे आम्हाला मिळतात. आमच्या पोटावर पाय आणण्याचा तुम्हाला काहीही हक्क नाही.

शिवाय या संदर्भात अमेरिकन स्त्रीवाद्यांवर वंशवादाचाही आरोप होता. कारण स्त्रीवादी स्त्रिया बहुतांशी गोर्‍या, मध्यमवर्गीय होत्या. वेश्याव्यवसाय, नग्ननृत्य इ. व्यवसायातल्या स्त्रिया कृष्णवर्णीय किंवा लॅटीनो, निम्न आर्थिक गट.

-- संदर्भ: बॅटलिंग पॉर्नोग्राफी.

शिक्षण नाही (याची कारणं निरनिराळी आहेत), आर्थिक भांडवल नाही म्हणून यांच्यापैकी बहुतेक स्त्रिया स्वखुशीने शरीरविक्रीच्या व्यवसायात येत असतील. ६०% आकडेवारी स्त्रीवादी संस्थेकडून आलेली आहे म्हणताना, अन्य पर्याय नसण्याचा उल्लेख त्यात आहे का, असा प्रश्न अगत्याने विचारावासा वाटतो.

२अ. वेश्याव्यवसाय आणि पॉर्नोग्राफी यांची समाजाला, पुरुष आणि स्त्रियांनाही, आवश्यकता आहे, समाजाचे काही घटक यांचा उपभोग घेण्यासाठी उत्सुक असतात, त्यांना अशी आवश्यकता भासते. मागणी आहे म्हटल्यावर पुरवठा होणार आणि अधिकृत भांडवलशाही येण्याआधीपासूनही या आवश्यकतांसाठी हे होत आलेलं आहे. स्टोयासारख्या स्त्रिया (ज्या अतिशय स्वखुशीने या व्यवसायात आलेल्या आहेत) समाजात आहेत तर त्यावर बंदी आणणं कितपत योग्य आहे.

३. बंदी घातल्यावर अर्थातच दुसरी बाजू येते ती म्हणजे पोलिस आणि राजकारण्यांची दंडेली, खंडणीखोरपणा. फौजिया सईद यांच्या टॅबूमधे या प्रकारांचा उल्लेख आहे. अशा प्रकारच्या बंदी आणण्याबद्दल, कायदे करून बंदी आणली असती तरीही, असा प्रश्न उरतोच. शांता गोखले यांनी हाच मुद्दा मॅनक्वीन-बिकिनी-बंदीसंदर्भात मांडलेला आहेच. (दुवा)

३अ. उलट या व्यवसायांना कायदेशीर मान्यता दिल्यास निदान या स्त्रियांना करदात्या बनवून समाजात सामावून घेणं अधिक सोपं होईल का? शिवाय आयुर्विमा इ. सवलतींसाठीही काही धोरण ठरवणे इ.

४. अशा बंदीमुळे धार्मिक, संस्कृतीरक्षक उजवे आणखीनच सोकावण्याची भीती वाटते.

---

त्याच अंकात त्या परिसंवादाच्या 'समारोपा'चा दीर्घ लेख मी लिहिला होता. तुम्ही सांगितलेल्या लेखातील मुद्दे त्यात खोडून काढलेले होते. ( माझा संपूर्ण लेख माझ्या भिन्न या ब्लॉगवर वाचण्यास उपलब्ध आहे.)

हा लेख हाच का? वेश्या : वस्तुस्थिती, विचार व चित्रण

---

जाताजाता: भारतीय समाज आणि धारणांचा विचार करता १२-१३ वर्षांच्या मुलीने एका स्त्रीशी पैशांसाठी संभोग करण्याची तयारी दर्शवणं कल्पनातीत वाटलं. अशा प्रकारची 'तयारी' करवून घेतली जात असेल असं वाटत नाही. (कारण या प्रकारच्या गिर्‍हाईकावर वेळ नामक भांडवल गुंतवावं एवढं मोठं मार्केट उपलब्ध नाही.)

कविता महाजन Wed, 17/07/2013 - 09:43

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अर्थार्जनाला अन्य पर्याय उपलब्ध करुन दिले तर बहुतांश स्त्रिया ते स्वीकारू इच्छितात, असा अनुभव आहे. फक्त यासाठी खूप चिकाटी लागते. कामाचे प्रशिक्षण, काम तात्पुरते नहे तर ते सातत्याने मिळत राहणे या गोष्टी आवश्यक असतात. असे प्रयोग आम्ही काही संस्थांमध्ये करून पाहत आहोत. त्यात अनेक अडचणी आहेत. स्वतंत्र छोटे व्यवसाय शिकवायचे तर कामाची जागा, बनवलेला माल साठवण्याची जागा, विक्रीसाठी प्रयत्न असे मुद्दे येतात.
स्वतःहून व्यवसायात आलेल्या स्त्रियांपैकी अनेक स्त्रिया कामाचे इतर सर्व पर्याय धुंडाळून अखेरीस इथे आलेल्या असतात. त्या पैकी बहुतेकींवर कौटुंबिक जबाबदारी असते. चांगले पर्याय मिळाले तर त्या बाहेर पडतात. त्याच परिसरात ( वेश्या व हिजड्यांच्या वस्त्या ) कॉण्डोम विक्री, भाजी-पोळी केंद्र अशी ( सुरू केलेल्या कामांपैकी ) दोन कामे चांगली चालली आहेत.
दोन-तीन वर्षांहून अधिक काळ कोणत्याही स्त्रीची शरीरविक्री नीट चालत नाही. पैसे कमी मिळू लागतात आणि नंतर त्या वस्तीबाहेर फेकल्या जातात. बारमधल्या मुलींबाबतही हेच होते. त्या फार लवकर विद्रूप होतात. ( अपवाद उच्चभ्रू गटातील लोकांसाठीचे ए दर्जाचे लेडिज बार. तिथे मिळणारा पैसा मुबलक असतो आणि मुलींचे राहणीमानही त्यामुळे चांगले असते. त्या अधिक वर्षे टिकाव धरतात.) रस्त्यांवर, रेल्वेस्थानके, बसस्थानके अशा जागी राहणार्‍या या बायांना कामाचे पर्याय उपलब्ध करून दिले तर त्या ते स्वीकारतात.
ज्यांच्याकडे राहण्याची स्वतंत्र जागा नाही आणि ज्यांची विक्री होऊन त्या घरवाल्यांच्या ताब्यात आहेत, त्यांना पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य नसते. कुणी तसा विचार करतेय हे ध्यानात जरी आले तरी तिला रातोरात दुसरीकडे फेकले जाते. ( कोलकाता, थायलंड इ. )
या कामात अजून काही अडचणी आहेत.
१. अनारोग्य. यामुळे काही कामे त्यांना देता येत नाहीत ( उदा. स्वयंपाकाशी निगडित ) आणि काही कामे त्या करूच शकत नाहीत. ( उदा. अनेकींना सतत उभं राहून पायांचे विकार जडतात. त्या बसूच शकत नाहीत. त्यामुळे शिलाईसारखे प्रशिक्षण देण्याचे काम फसते आहे.)
व्यसने पुष्कळ आहेत. खाण्यापिण्याच्या सवयी चुकीच्या आहेत. बॉडीक्लॉक बदलून गेलेले आहे. हे सर्व पुन्हा सुरळित करण्यात करणार्‍यांची व करवून घेणार्‍यांची दमछाक होते.
२. शारीरिक विकारांवर उपचार करण्यासह मानसिक विकारांवर उपचार आणि समुपदेशनही आवश्यक ठरते. डिप्रेशन भयंकर आहे. बाहेर पडण्याची तयारी नसणे याचे एक कारण डिप्रेशन हे आहे आणि दुसरे कारण बाहेरच्या जगातले ज्या अनेक स्तरांमधले पुरुष इथे येतात त्यांना पाहून बाहेरचे जगही सुरक्षित नाही, अशीच भावना आहे.
३. कोणतीही कागदपत्रे त्यांच्याजवळ नाहीत. त्यामुळे अद्यापही त्यांची बँकेत खाती काढण्यात यश मिळालेले नाही. मग चोर्‍या होणे, पैशांपायी त्रास / हत्या होणे इथपासून ते प्रसंगी केवळ सावकारांकडूनच कर्ज घेण्याचा पर्याय शिल्लक राहणे अशा गोष्टी घडतात.
४. समाजात एकदा गेलेली प्रतिष्ठा परत मिळत नाही. अत्यंत घृणेच्या भावनेने त्यांना वागवले जाते. व्यवसाय सोडला तरी त्या उपलब्ध आहेत असे समजले जाते. समाज सामावून घेत नाही. ( हे अशा व्यवसायांत नसलेल्या, पण ज्यांचे चारित्र्यहनन केले गेले आहे अशा इतर बायकांबाबतही दिसून येते.)

कविता महाजन Wed, 17/07/2013 - 10:04

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अशा व्यवसायांना कायदेशीर मान्यता नको, असे मत असणार्‍यांपैकी मी आहे. ( तो पुन्हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.)
जाताजाता तुम्ही जे सांगितले आहे त्या बाबतचा खुलासा असा : अशा जागी जाणार्‍या बायका स्वतःचे मनोरंजन करून घेण्यासाठी जात नसतात. ( त्यांच्या जागा वेगळ्या आहेत.) त्या जातात ते इतर तथाकथित सभ्य पुरुषांची कामे करवून देण्यासाठी. दलाली करणार्‍या किंवा बायकांना वापरून इतर गुन्हेगारी कामे करवून देणार्‍या बायकाच लेडिजबारसारख्या ठिकाणी दिसू शकतात.
तिथे जाण्यासाठी मला पुष्कळ उचापती कराव्या लागल्या व काळजी घ्यावी लागली, तो निराळा विषय आहे.

नितिन थत्ते Wed, 17/07/2013 - 12:17

In reply to by कविता महाजन

>>अशा व्यवसायांना कायदेशीर मान्यता नको, असे मत असणार्‍यांपैकी मी आहे.

मी ही त्याच मताचा आहे. बेसिकली कायदेशीर मान्यता असण्यापेक्षा क्रिमिनलायझेशन* नसलं तरी पुरे.

*क्रिमिनलायझेशन= गुन्हा आहे असे "मानणे".

रोजगार बुडतील म्हणून काही अनडिझायरेबल** व्यवसाय चालू देणे हे पटण्यासारखे नाही.

** व्यवसाय समाजाने हस्तक्षेप करून बंद पाडण्याइतका अनडिझायरेबल आहे का (उदा. अंमली पदार्थ) हे समाजाने ठरवायचे आहे. डान्सबार हा व्यवसाय तितका अनडिझायरेबल नसू शकेल.

[सरकारी हस्तक्षेप वगैरे बाबतीत मत व्यक्त करताना "आपला देश भांडवलवादी आणि स्वातंत्र्यवादी असावा की समाजवादी कल्याणकारी राज्य असावा?" हा प्रश्न स्वतःला विचारणे गरजेचे आहे. दोन्ही असणे शक्य नाही].

कविता महाजन Wed, 17/07/2013 - 09:54

ज्या स्त्रिया आपण स्वखुशीने आलो आहोत असं सांगतात त्यांचे पुढे काय होते? याबाबत कुणी सर्वेक्षण केले आहे का? माझ्या पाहण्यात तरी नाही.
स्त्रीवाद्यांनी ज्या चुका केल्या त्यातील ही एक महत्त्वाची चूक आहे.
स्वखुशीने काम करताना मग व्यसनांची गरज का भासते? त्याशिवाय अनेकींना शुद्धीवर, भानावर असताना धंदा करणे जमत नाही ते का? आता असे व्यवसाय करणारे पुरुषही वाढताहेत; त्यांच्याबाबतही हेच म्हणता येईल.
निव्वळ शरीराचा अविचारी वापर करणार्‍या इतर काही सभ्य मानल्या जाणार्‍या व्यवसायांबाबतही हेच होते. शरीराचे भांडवल फार काळ टिकणारे नसते हे एक कारण आणि नवनवी शरीरे बाजारात सातत्याने येत असतात हे दुसरे कारण.

प्रकाश घाटपांडे Wed, 17/07/2013 - 10:20

थोडक्यात समाजाचे लैंगिक व्यवस्थापन हा गहन विषय आहे. समाजात लैंगिक क्रांती होणे गरजेचे आहे. संजोपराव व कविता महाजन यांनी मांडलेले मुद्दे आपापल्या जागी योग्यच आहेत. बारबाला, वेश्या, हायप्रोफाईल शरिरविक्रय यांना एकाच तराजूत तोलून चालणार नाही. सगळ्यांच्या समस्या, मर्यादा,बलस्थाने वेगळी आहेत. सर्व स्त्रिया सारख्या नाहीत व सर्व पुरुष ही सारखे नाहीत. तरी देखील प्रातिनिधिक म्हणुन असलेले स्त्रियांचे काही प्रश्न आहेत तसेच पुरुषांचे ही आहेत. असो...

गवि Wed, 17/07/2013 - 11:13

अत्यंत योग्य, उत्तम लेख आणि मत.

प्रत्यक्ष त्या स्त्रियांसोबत काम करुन आलेली मतं ही निश्चित आदरणीय आहेत. कायदेशीर दर्जा दिला जाऊ नये हे मत अत्यंत योग्य आहे. त्याविषयी तुमची अधिक तपशिलात जाणारी भूमिका वाचायला आवडेल. जेव्हा शक्य होईल तेव्हा लिहावी ही विनंती.

बाकी "त्यावर पोट असलेल्या अमुक लाख लोकांचं काय होईल?" हा प्रश्न कोणत्याही वैध / अवैध बंदीबाबत नेहमीच उभा केला जातो. त्या व्यवसायाच्या केवळ चालू राहण्यामुळे अपाय होणार्‍या अन्य घटकांवर मात्र दोष टाकला जातो. याचं उत्तम उदाहरण आजच्या मुंबई मिररमधल्या एका हाय्येस्ट पेड बार डान्सरच्या मुलाखतीत / विधानांमधे आहे.

आता ती अशा आशयाचं म्हणतेय की "आम्ही लोकांच्या घरोघरी जात नव्हतो की डान्सबारमधे या किंवा दौलतजादा करा. पुरुषांना स्वतःला अक्कल असायला हवी आणि कंट्रोल असायला हवा.. पुरुषांनी सभ्यपणे केवळ नृत्य म्हणून पाहिलं तरी चालेल, पण त्यांचाच कंट्रोल राहात नाही आणि ते पैसे फेकतात. इ. इ."

तिला दंडवत.

तिरशिंगराव Wed, 17/07/2013 - 12:47

लेख आणि त्यावरील संजोपराव आणि अदितीचे प्रतिसाद आवडले.
यावर अजून एक बाजू तपासून पहावी लागेल. अशा ठिकाणी जो पैसा उधळला जातो तो बहुतांशी काळा पैसा असतो. म्हणजे हा धंदा फोफावायला आर्थिक भ्रष्टाचारही हातभार लावतो आहे. बेताचे उत्पन्न असलेले लोक अशा ठिकाणी कुतुहल म्हणून गेले तरी दौलतजादा करायला धजावणार नाहीत असे वाटते. पैसे खाणार्‍या काही 'बाबूं'बरोबर मी त्यांना मिळणार्‍या या अफाट पैशाचं ते काय करतात,यावर चर्चा केली होती. बहुतेक बाबूंनी हे पैसे आम्ही घरी नेत नाही, व्यसने,बायका, डान्सबार यावरच उधळून जिवाची चैन करतो असे कबूल केले होते.
रोग समाजालाच झालेला आहे. आणि तो असाध्य आहे असे म्हणण्यापर्यंत परिस्थिती बिघडली आहे.

मी Wed, 17/07/2013 - 12:54

कविता महाजनांचे अनुभव व विचार पटले.

मुंबई-पुणे करणार्‍या कॅबचालकाने पुण्यातली आयटीतली/इतरही तरुण पिढी शुक्रवारी रात्री पनवेलपर्यंत जाऊन बरेच पैसे ऊडवून येते अशी माहिती दिली होती ते आठवलं. वैफल्यग्रस्त जनतेची जागा आता कामाच्या रगाड्यात घरासाठी पुरेसा वेळ न मिळणार्‍या माणसांनी घ्यायचं ठरवलं आहे असं वाटतयं.

विसुनाना Wed, 17/07/2013 - 13:49

बारमधली नृत्ये आणि फाईव्ह स्टार हॉटेलातले क्यॅबरे दोन्ही बंद झाले पाहिजेत. हे झाले आदर्शवादी मत.
होणार नाहीत. हे झाले वस्तुनिष्ठ मत.

मग पुढे- का हवेत? का नकोत? असले तर कसे असावेत? नसले तर काय करता येईल? इथपासून ते स्त्री,पुरुष आणि त्यांचे समाजातले स्थान यापर्यंत मतामतांचा गलबला.

जोवर खरीददार आहेत तोवर वस्तूंची निर्मिती होणार आणि जोवर विकण्यालायक वस्तू आहे तोवर खरीददार असणार. हे तत्त्व इथे लागू पडू नये- पण ते पडतेच. :(

नितिन थत्ते Wed, 17/07/2013 - 14:09

In reply to by विसुनाना

>>जोवर खरीददार आहेत तोवर वस्तूंची निर्मिती होणार आणि जोवर विकण्यालायक वस्तू आहे तोवर खरीददार असणार. हे तत्त्व इथे लागू पडू नये- पण ते पडतेच.

सहमत आहे. काचांचे तुकडे करून खाणारे वगैरेंचा ही असाच आरोग्याचा प्रॉब्लेम होत असेल. त्यांना टीव्हीवर वगैरे क्षणिक प्रसिद्धी कधीकधी मिळते. त्यांचे जीवन तर फारच क्षणभंगुर.

चित्रगुप्त Wed, 17/07/2013 - 14:49

आपल्याइकडे प्रत्येक क्षेत्रात पाश्चात्त्य देशांचे अनुकरण करण्याचा हा काळ आहे, आपल्याकडील परिस्थिती सर्वच बाबतीत वेगळी असूनही तसे केले जात आहे.
या संदर्भात तिकडे हा प्रश्न कसा काय सोडवला गेला आहे, वा जात आहे, वगैरे कुणी सांगेल का?

ऋता Wed, 17/07/2013 - 17:28

लेखिकेची अभ्यासपूर्ण मतं वाचायला आवडली- काही नवीन कळले आणि काही मुद्दे नव्याने विचारात आले.
भारतात असे प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचे होतात-शक्य असल्यास ते तसेच ठेवलेही जातात. काही प्रगत देशांमध्ये शरीरविक्रय हा व्यवसाय म्हणून मान्य आहे असं ऐकलं आहे. नेदरलँड्स मध्ये या बाबतीत अगदी मुक्त व्यवहार आहे असं वाचनात आलं आहे- या व्यवसायात असणार्यांची खरी परिस्थिती काय आहे ते माहित नाही.
भारतात शरीरविक्रयाला व्यवसाय म्हणून मान्यता मिळाली तर परिस्थितीत काय बदल होतील ?

जगात पराकोटीची गरीबी आहे - पालक खुद्द आपल्या मुलांना /मुलींना विकतात-विकत घेणारे आहेत- हे चक्र कसं थांबवणार?
हे करून त्यात 'फायदा' कुणाचाच नाही अशी परिस्थिती आणायला हवी. पण सध्या त्यात कुणाचा तरी प्रचंड फायदा आहे त्यामुळे हे सगळे चाललेले आहे.

ऋषिकेश Wed, 17/07/2013 - 17:37

In reply to by ऋता

पुढील नकाशा शरीरविक्रय कायदेशीर आहे की नाही ते दाखवतो:

हिरवा रंग शरीरविक्रयाला कायदेशीर मान्यता + त्याचे प्रमाणीकरण (regulated business) दाखवतो. निळा रंग कायदेशीर मात्र non-regulated स्थिती दर्शवतो. लाल रंग पूर्णत: बेकायदेशीर स्थिती दर्शवतो तर उर्वरित देशांचा विदा उपलब्ध नाही.

(संदर्भ)

Nile Thu, 18/07/2013 - 02:09

In reply to by ऋता

अमेरीका खरंतर संपूर्ण लाल आहे. हिरवा दाखवलेले नेवाडा हे राज्यही तसे संपूर्ण लाल आहे फक्त एक-दोन काउंटीचा अपवाद सोडता. फक्त त्या काऊंटीतच कायदेशीर वेश्याव्यवसाय चालतो. अमेरीका तशी (कमी)कमी(आणि अधिक)अधिक "लाल" आहे. (अधिक इथे: http://en.wikipedia.org/wiki/Prostitution_in_Nevada)

'न'वी बाजू Thu, 18/07/2013 - 11:58

In reply to by Nile

अधिकृतरीत्या, होय. म्हणजे, 'वेश्याव्यवसाय' म्हणून उघडउघड नावाने, अशा अर्थी ही माहिती योग्यच आहे. पण सत्यदेव म्हणा किंवा सत्यनारायण म्हणा, शेवटी सगळे नमस्कार केशवंप्रतिच जातात, नाही काय?

अजो१२३ Wed, 17/07/2013 - 20:23

जे लोक देहविक्रयाचे समर्थन करतात त्यांचे तीन प्रकार असावेत.

१. योनिशुचिता, लैंगिक निष्ठा, वैवाहिक निष्ठा हे मूर्खपणाचे (कालबाह्य) प्रकार आहेत. ज्या ज्या गोष्टीने पैसा मिळतो ती बाजारात आणावी (आर्थिक स्थिती काही का असेना! Always some more money may makes sense.). किंवा स्वांनंदासाठी (डायरे़क्ट किंवा मिळालेल्या धनातून) मुक्त संभोग करणे समर्थनीय आहे म्हणून तात्विक दृष्ट्या देहविक्रय करणे यात काहीही चूक, टाळण्याजोगं, लाज वाटण्याजोगं इ अगदी सामाजिक दृष्ट्या ही नाही. सरकारने त्यात बाधा आणू नये.
२. प्राप्त (वाईट) आर्थिक/सामाजिक परिस्थितीत, देहविक्रय हा स्वतःच्या अर्थिक समस्या सोडवण्याचा एक मार्ग, त्याच्याभोवतीच्या अनिष्ट वलयांमूळे टाळू नये. तो चोखाळावा आणि सरकारने त्यात बाधा आणू नये. ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी हा (दुर्दैवी) प्रकार टाळावा.
३. वरील १ किंवा २ स्थितीत सरकारचे नियमन असावे म्हणजे ते नीट चालतील, इ.

हे तिन्ही विचार पटत नाहीत. निष्ठा ही आंतरिक, भावनिक आहे. अन्यथा निसर्गात सर्वत्र orgy चाललेली दिसली असती, जी दिसत नाही. १००% देहविक्रय करणारे abnormal, depressed, psychic, अनंत मानसिक भावनिक आजारांनी व्याप्त असतात. याला समाज १००% कारणीभूत का? हजारो वर्षापासून देहविक्रय आहे, त्यामूळे निसर्गतः किमान ८०% देहविक्रेते नॉर्मल असायला हवे होते. असे का नाही?

रखेल सुखी असते कारण तिचे नाते असते. प्रस्थापित वेश्या देखिल सुखी असते, पण यांचा टक्का या व्यवसायिकांमधे फारच कमी. बाकी ९९.९९% जनता दु:खी आणि ९९% दु:खी. Is this your recommendation?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 17/07/2013 - 20:25

बहुतांश खेळांमधे शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते, शरीर हेच माध्यम, बुद्धीबळ हा अपवाद. खेळाडूंपैकी मोठं करियर असणारे सचिन तेंडुलकर आणि मार्टीना नवरातिलोवा हे अपवादच. एकाचं वय झालं, एकीचा फॉर्म गेला तर या जागा भरून काढायला चार लायक खेळाडू रांग लावून उभे असतात. परफॉमन्स सुधारण्यासाठी काही खेळाडूही ड्रग्ज घेतात. अलिकडच्या काळातलं प्रसिद्ध उदाहरण, सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँगचं. पण खेळाडूंच्या नार्को चाचण्या सातत्याने होत रहातात. भारतात क्रिकेट, युरोपीय, दक्षिण अमेरिकन देशांमधे फुटबॉल वगैरे बघण्यासाठी लोक स्वतःचा वेळ फुकट घालवतात. भारतात आयपीएलच्या मागचे काळे-गोरे धंदे या मोसमी बातम्या जोरदार असतात.

वेश्याव्यवसाय कायदेशीर करू नये, पण क्रिकेट, अन्य खेळ कायदेशीर आहेत; क्रिडा मंत्रालय, ऑलिंपिक संघटना वगैरे आहेत असा दुजाभाव का? (ऑलिंपिकचे बहुतेकसे खेळ हे योद्धे निवडण्यासाठी चाचणी, गाळणी म्हणून निवडलेले आहेत. हा अडीच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे आणि आजही बहुतांश खेळ अशाच प्रकारचे आहेत. प्रत्यक्ष युद्ध सुरू नसतं तेव्हा युद्धाबद्दल सामान्य लोकांमधे नाराजी, नाखुशी असावी. इतरत्र सुरू असणार्‍या युद्धाबद्दल आणि संबंधित हिंसेबद्दलही कोणी गौरवोद्गार काढत नाहीत. असं असूनही ऑलिंपिकमधे पदक जिंकणं, फक्त ऑलिंपिकमधे भाग घेणं हे सुद्धा फार प्रतिष्ठेचं आहे.)

शरीरविक्रयाशी संबंधित व्यक्ती, विशेषतः महिला, त्याही कनिष्ठ आर्थिक वर्गातल्या, शोषण, दारू, ड्रग्ज, अत्याचार यांना बळी पडतात हे सगळं मान्य आहे. स्टोया किंवा सनी लेऑनला असे त्रास असतील असं वाटत नाही. स्टोयाने दोनेक वर्ष रजा काढल्याचंही जाहीर केलं होतं. (दोन वर्ष रजा काढून पुन्हा काम सुरू करताना त्रास झालेला नाही अशा किती स्त्रिया आहेत? बहुतांश उच्चशिक्षित स्त्रिया बाळंतपणासाठी वगैरे काही महिने रजा काढतात आणि पुढे त्यांच्या करियरचं काय होतं?) या स्त्रियांचा 'करियर कालावधी' कमी असतो आणि त्यात आर्थिक व्यवस्थापनही त्यांना नीट जमत नाही ही बाबही मान्य आहे. पण त्यासाठी व्यवसायच बंद करणं हे पाय मुरगळण्यावर इलाज म्हणून पाय कापण्यासारखं होईल का?

---

'मिळून सार्‍याजणी'मधे प्रकाशित झालेल्या लेखात असा एक प्रश्न आहे की, वेश्या, बारबाला स्वतःच्या मुलींना या व्यवसायापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न का करतात? याच्या विपरीत उदाहरण किशोर शांताबाई काळेंच्या 'कोल्हाट्याचं पोर'मधे आहे, कोल्हाटी समाजात मुलगी जन्माला आली की आनंद होतो, मुलगा झाला तर दु:ख. आजघडीला, महाराष्ट्रातल्या किती शेतकर्‍यांना आपल्या मुलांनीही शेतकरीच व्हावं असं वाटतं? (अमेरिकन शेतकरी "आम्ही आठ पिढ्या याच व्यवसायात आहोत" अशा प्रकारची वाक्यं अत्यंत अभिमानाने मिरवतात.) किती कंत्राटी शिक्षक, शिक्षणसेवकांना आपल्या मुलांनी आपलाच व्यवसाय पुढे सुरू ठेवावा असं वाटतं? किती अभियंते, डॉक्टर, संशोधक पालकांना आपल्या पुढच्या पिढीने आपल्या क्षेत्रात जायचं ठरवल्यास त्यांना असं करण्यापासून रोखलं जातं?

असा 'भेदाभेद' असण्याचं कारण व्यवसायांना असणारी सामाजिक (अ)प्रतिष्ठा आणि आर्थिक उत्पन्न हे नाही का?

'न'वी बाजू Thu, 18/07/2013 - 12:08

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वेश्याव्यवसाय कायदेशीर करू नये, पण क्रिकेट, अन्य खेळ कायदेशीर आहेत; क्रिडा मंत्रालय, ऑलिंपिक संघटना वगैरे आहेत असा दुजाभाव का? (ऑलिंपिकचे बहुतेकसे खेळ हे योद्धे निवडण्यासाठी चाचणी, गाळणी म्हणून निवडलेले आहेत. हा अडीच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे आणि आजही बहुतांश खेळ अशाच प्रकारचे आहेत. प्रत्यक्ष युद्ध सुरू नसतं तेव्हा युद्धाबद्दल सामान्य लोकांमधे नाराजी, नाखुशी असावी. इतरत्र सुरू असणार्‍या युद्धाबद्दल आणि संबंधित हिंसेबद्दलही कोणी गौरवोद्गार काढत नाहीत. असं असूनही ऑलिंपिकमधे पदक जिंकणं, फक्त ऑलिंपिकमधे भाग घेणं हे सुद्धा फार प्रतिष्ठेचं आहे.)

ऑलिंपिक खेळांमध्ये व्यावसायिक खेळाडूंना मज्जाव असल्याबद्दल काहीसे ऐकून होतो. आता एवढ्यात नियम बदलले असल्यास कल्पना नाही. चूभूद्याघ्या.

पण ऑलिंपिक्समध्ये हौशी खेळाडूंसाठी आणखी एक क्रीडाप्रकार सुरू करण्याची कल्पना तशी वाईट नसावी. वेगवेगळ्या पातळींवर हा क्रीडाप्रकार राबविता यावा. जसे, मेन्स सिंगल्स, वीमेन्स सिंगल्स, मेन्स डबल्स, वीमेन्स डबल्स, मिक्स्ड डबल्स, सांघिक, वगैरे वगैरे. असो.

कविता महाजन Thu, 18/07/2013 - 16:48

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सामाजिक (अ)प्रतिष्ठा आणि आर्थिक उत्पन्न याहून एक महत्त्वाचे कारण आहे.
अनारोग्य, विकृती व छळाला सामोरे जावे लागणे, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांकडून होणारा त्रास आणि केवळ स्वत:लाच नव्हे तर इतर कुटुंबियांनाही आपल्या कामाच्या स्वरूपामुळे आलेली असुरक्षितता.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 18/07/2013 - 20:21

In reply to by कविता महाजन

अनारोग्य, विकृती व छळाला सामोरे जावे लागणे, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांकडून होणारा त्रास आणि केवळ स्वत:लाच नव्हे तर इतर कुटुंबियांनाही आपल्या कामाच्या स्वरूपामुळे आलेली असुरक्षितता.

हे मान्य आहे.

अनारोग्याचा प्रश्न संबंधित काळजीचं शिक्षण देऊन, औषधं, आहार यांच्यामुळे सोडवता येईल. त्यासाठी आर्थिक सबलीकरण होणं आवश्यक आहे. विकृती आणि छळासाठी योग्य कायदे आणि त्यांची चोख अंमलबजावणी करून.

छळाच्या बाबतीत, समाजाच्या धारणा बदलल्या की अडचणी बर्‍याच कमी होतात. एकेकाळी विधवा, परित्यक्ता आणि त्यांच्या कुटुंबियांनाही छळाला सामोरं जावं लागत असे. घटस्फोट हा पर्यायच स्त्रियांना नव्हता. सासरी छळ सहन कर पण माहेरी येऊ नकोस, असं त्यांना सांगितलं जात असे. समाजाच्या धारणा बदलल्या, स्त्रिया कमावत्या झाल्या तसा हा छळ कमी कमी होतो आहे. संन्याशाच्या मुलांना वाळीत टाकण्याचा प्रकार आजच्या जमान्यात शक्यही नाही.

गवि Fri, 19/07/2013 - 12:07

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती प्रत्येक समस्येला / प्रश्नाला फराफरा प्रिस्क्रिप्शन लिहून "सोल्युशन" प्रिस्क्राईब करता येतं. पण अशा पद्धतीचे बरेच उपचार हे कितीही आवश्यक असले तरी त्यांची आवश्यकता तातडीचे आणि तात्पुरते उपचार अशीच मर्यादित असते आणि असायला हवी. आणि इव्हन ते उपचारसुद्धा इतके आयडियलिस्टिक असून चालत नाहीत हीच तर दुर्दशा आहे ना मनुष्यजातीची.. :(

अनारोग्याचा प्रश्न : प्रशिक्षण, औषधं, आहार.
फसवणूकः आर्थिक सबलीकरण
विकृती आणि छळः योग्य कायदे आणि चोख अंमलबजावणी..

खटाखट उपाय आहेत एकदम.

पण काही प्रकारच्या व्यवसाय आणि धंद्यांमधे अनारोग्य, फसवणूक , विकृती आणि छळ हेच मुख्य घटक असू शकतात हे मान्य करता येणार नाही का? कुठेतरी कायद्यानेच सरसकट अंकुश आणणं म्हणजे हमखास दडपशाहीच का? वापरुन गुळगुळीत झालेली वाक्यं "गुलामालासुद्धा गुलामीची जाणीव करुन द्यावी लागते" ही पार घासून नष्टच झाली आहेत का?
वेश्यांना कमाईविषयी किमान हमी, वेतनविषयक कायदे, विमासंरक्षण, कायद्याचे संरक्षण हे सर्व द्यायचे आणि त्यांचं शोषण टळेल अशी अपेक्षा करायची हा उपाय फक्त सध्याची अगदीच "नको रे" अवस्था टाळून किमान "नाही रे" व्हावी इतपतच उद्देशाने असावा. पण तेच अंतिम ध्येय असावं असं तुझं म्हणणं आहे का? स्थिती आहे त्यापेक्षा बरी करण्याचा उद्देश सध्याच्या स्त्रियांना जरा आधार मिळावा आणि त्यांनी किंवा किमान पुढच्या पिढीने नीट बाहेर रहावं असा आहे की नव्यानव्या स्त्रियांनाही इथे येताना बरं वाटावं हा आहे.. ????
सर्व थरातल्या वंचित पुरुषांची लैंगिक इच्छापूर्ती होत राहण्याची इतकी तीव्र जबाबदारी ?

शरीरसंबंध ही अत्यंत उत्कट आणि अनेक शक्यतांना जन्म देणारी क्रिया धंद्यात रुपांतरित करणं कसं आवश्यक आहे, किंवा ते आहेच, ते चालणारच असं म्हणताना त्यांना एकीकडे संरक्षणही देऊ इच्छितो आपण. . म्हणजे काय करायचं? प्रत्येक वेश्येच्या पडदे लावून केलेल्या त्या वास मारणार्‍या जागेत एक पोलीस उभा ठेवायचा? लाईव्ह वॉच ठेवायला? की सीसीटीवी ठेवायचे? कोणी काही अनैसर्गिक करत नाहीये ना? कंडोम प्रत्यक्ष लावला ना? हे पाहून तिथल्यातिथे दंडाची पावती फाडायची? की सध्याच्या दलालांनाच या जॉबसाठी प्रशिक्षित करायचे? की कोणतं मैथुन अनैसर्गिक आहे हे ठरवण्याचा हक्क गिर्‍हाईकाला द्यायचा? की सर्व प्रकारचं मैथुन नैसर्गिकच आहे, आणि वेश्येला मान्य असलं की झाला म्युच्युअल कन्सेंट असा लिबरल दृष्टिकोन ठेवायचा? की त्या अनैसर्गिक प्रकारे मैथुन करण्यासाठी अधिक अपमानधन घेण्याची वेश्येची तयारी असेल तर त्या दरांच नियमन, दरपत्रक बनवायचं? (भारतात बरेचसे कामगार वर्क कंडिशन सुधारण्याच्या मागणीपेक्षाही त्याचा भरपाईभत्ता कॅशमधे मागण्याचीच विचारपद्धती बाळगतात..) ऐनवेळी काही बदल घडला की तिने बाहेर उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकाला हाक मारायची?

संभोग करायला खिशात पैसे भरुन आलेल्या माणसाला आधी बुकिंग घेऊन इन्स्टंट रक्ततपासणी करुन आत सोडायचं? प्रत्येक खाटगृहामागे गिर्‍हाईकाची संभोगपूर्व तपासणी आणि त्याला अमुक प्रकारचं मैथुन करुन नये हे कौन्सेलिंग करणारा एक डॉक्टर+ एक कौन्सेलर ठेवायचा?
की सर्व अपेक्षित गुप्तरोगांवर सर्वच वेश्यांना कायमची एम्पिरिकल ब्रॉड स्पेक्ट्रम अँटिबायोटिक ट्रीटमेंट सुरु ठेवायची? मग पडेनात पचनमार्गाला क्षतं..

औषधं आणि आहार.. क्या बात है.. :)

गवि Fri, 19/07/2013 - 12:53

In reply to by गवि

याला आणखी एक पोस्टस्क्रिप्टः

एकंदरीत चर्चेवरुन (या आणि अशा अन्यत्र चालू असलेल्या) असं स्पष्ट दिसतं आहे की यात असलेला स्त्री-पुरुष संबंध (डान्स किंवा त्यासोबत चालणारा देहविक्रय) हा नक्कीच एक व्यवहार, व्यवसाय, रोकडा देवघेव या कॅटेगरीतला आहे. यामधे प्रेम, लाँग टर्म इन्वॉल्वमेंट , लाँग टर्म कमिटमेंट, (विशेषतः) स्त्रीच्या (किंवा स्त्री वेश्या तितकी प्रोफेशनली कमिटेड नसल्यास - जी नसण्याची शक्यता बर्‍याचवेळा असू शकते- पुरुषाच्याही) जास्तीतजास्त सुखद संवेदना आणि इच्छापूर्तीची इच्छा यापैकी कोणत्याही आर्थिक व्यवहारात न बसणार्‍या प्रकारच्या शरीरसंबंधांचा समावेश नसावा.

अशा वेळी हा प्रकार निव्वळ शरीराची लैंगिक तृप्ती यासाठी असावा. सुखापेक्षा जास्त सोय म्हणून याकडे पाहिलं जातं आहे. म्हणजे हस्तमैथुनाऐवजी जिवंत शरीर मिळणे यातल्या अधिकच्या आनंदासाठी वेश्या ही संस्था टिकून रहावी आणि इच्छा असो नसो ती राहीलच असं मत व्यक्त होतंय. पण त्यात एक व्यक्ती वापरली जातेय हेही जाणवतंय. शरीरावर आधारित अन्य व्यवसाय (खेळ, मॉडेलिंग, गायन) इत्यादिंशी या व्यवसायातील शरीराच्या सहभागाशी झालेली तुलना एका बाबतीत अत्यंत चुकीची आहे, ती म्हणजे बाकीचे बहुतांश व्यवसाय हे शरीर विकूनच होत असले तरी ते दोन व्यक्तींमधे इतक्या जास्त निकटताजनक शक्यता उत्पन्न करत नाहीत. (संसर्ग, चुकीने राहिलेला गर्भ, हिंसात्मक इजा इ)

अशा वेळी आपण मनुष्यप्राण्यांनी जशी अनंत सुखे आणि सोयी यंत्रांकडे ट्रान्स्फर केली आहेत, तसेच या बाबतीत करावे. बर्‍याच देशात निर्जीव किंवा सजीवसदृश खेळणी आणि अन्य उपकरणांनी हे सुख मिळवता येणं कायदेशीर आहे आणि भारतात माझ्यामते तसं नाही. सेक्स टॉईज बेकायदेशीर आहेत.

कायदा करायचाच तर तो अशा दिशेने करावा. केवळ एका जिवंत स्त्रीकडूनच वंचित पुरुषगटाची लैंगिक भूक भागली पाहिजे हा विचार कायद्याने नष्ट करायला लावून कदाचित तुलनेत कमी समाधानकारक पण यांत्रिक पर्यायांचा अशा ठिकाणी वापर करण्याची सिस्टीम उभी राहण्यास प्रोत्साहन द्यावं असा उपाय कोणी सुचवल्यास तो योग्य म्हणता येईल.

एकदा कायदेशीर मार्गाने एक पर्याय बंद आणि दुसरा राजरोस झाला की त्यात नक्कीच संशोधन, इनोव्हेशन होत राहतं आणि अगदी रियल लाईफलाईक शोध लागू शकतात.

एकेकाळी डॉसच्या काळ्या पडद्यावर टाँय टाँय करत फिरणारे पॅकमॅन, मारिओ टाईप गेम्स आणि आता दिसणारे एकदम सुप्पर रियालिस्टिक व्हर्च्युअल गेम्स यातला फरक इथे उदाहरण म्हणून काहीसा समजून घेता येईल.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 19/07/2013 - 19:28

In reply to by गवि

मुळात अडचण काय आहे? या व्यवसायातलं शोषण, अनारोग्य, जबरदस्ती, हिंसा, बालमजुरी का शरीरविक्रय?

कोणत्याही दोन किंवा अधिक वयस्क स्त्री-पुरुषांनी परस्परसंमतीने त्यांना मान्य असणार्‍या कोणत्याही अटींवर किंवा अटींशिवाय संभोग किंवा गायन, वादन, नृत्य करण्यात काय अडचण आहे? या व्यवहारातली हिंसा, शोषण, जबरदस्ती, अनारोग्य कमी/नाहीसे करण्यासाठी जे करता येणं शक्य आहे ते करावं. एका फटक्यात या समस्यांना उत्तरं मिळणार नाहीतही. पण मुळात समस्या काय आहे हे निश्चित करू या.

कविता महाजन Fri, 19/07/2013 - 21:13

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अडचण किंवा संकट किंवा प्रश्न कधीही केवळ 'एक' नसतात अदिती. ती साखळी असते. त्यामुळे शोषण, अनारोग्य, जबरदस्ती, हिंसा, बालमजुरी का शरीरविक्रय या सर्वच अडचणी आहेत आणि या यादीत अजूनही भर घालता येईल.
संमतीने काहीही बरे-वाईट करता यावे, हे योग्य नाही. इथे मग खुनापासून अनेक गुन्हे येतील. 'संमती'साठी काही बाबतीत 'वय' हा मुद्दा पाहिला जातो, आरोग्य हा मुद्दा पाहिला जातो ते याचसाठी. १८ पेक्षा काही महिने लहान म्हणून एखादी व्यक्ती बाल्गुन्हेगार ठरते. अल्पवयीन मुलींशी संमतीने केलेला विवाह / संभोग हा गुन्हा मानला जातो. या '१८' आकड्यावरही सध्या वाद सुरू आहेच.
गायन, वादन, नृत्य इथे पुन्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही मुद्दा आणला जातो. पण त्यातही स्तर आहेत, हे आपण पहायला नको का? अंगविक्षेप आणि नृत्य यात फरक मानायला नको का? या मुलींपैकी खरोखरच ज्यांच्यात 'नृत्य आहे' असे जाणवले, त्यांपैकी सहा जणींना आज आम्ही नृत्याचे प्रशिक्षण देतो आहोत. त्या नृत्याने त्यांचा सर्वार्थाने विकास होईल आणि दर्शकांनाही काही दर्जेदार पाहण्याचा अनुभव मिळेल. मुलींना वेडेवाकडे अंगविक्षेप करण्यास भाग पाडणं वा प्रवृत्त करणं ( जसं आत्महत्येला प्रवृत्त करणं हा गुन्हा मानला जातो तसंच ) हे वाईटच आहे.
समस्या अनेक आहेत, त्या एकमेकींत गुंतलेल्या आहेत आणि त्यांवर उत्तरंही अनेक आहेत; तीच कृतीतून शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 22/07/2013 - 05:51

In reply to by कविता महाजन

ऋता आणि कविता यांना एकत्र प्रतिसादः

अल्पवयीन मुलामुलींना कामाला लावलं जातं हे शोषण आहे, हा गुन्हा समजला जावा आणि त्याची तीव्रता अधिक मोजली जावी हे मान्यच आहे. मग ही बालमजुरी कोणत्याही प्रकारची का असेना! ज्या स्त्रियांना या प्रकारच्या व्यवसायात उतरायचंच नाहीये, आणि इच्छेविरोधात जबरदस्तीने आणलं जातं त्यांच्याबाबतीतही काहीच मतभेद नाही. जबरदस्ती वाईटच आणि कोणातरी व्यक्ती, व्यक्तीसमूहाची लैंगिक (किंवा कोणतीही) भूक शमवण्याकरता दुसर्‍या व्यक्तीच्या इच्छेचा मान राखला जात नाही, तो ही गुन्हाच! बलात्कार, खून, अन्नाची चोरी, यांची तीव्रता वेगवेगळी असली तरीही सगळेच गुन्हे.

उरलेल्या काही व्यक्ती या व्यवसायांमधे अन्य पर्यायांअभावी येतात. शिवाय काही व्यक्ती आपखुशीने येतात. प्रश्न या व्यक्तींच्या बाबतीत येतो. दुसरा प्रश्न येतो तो ब्रेन वॉश झालेल्या व्यक्तींच्या बाबतीत.

अंगविक्षेप आणि नृत्य यांच्यात फरक असतो, तो मला जाणवतो हे ही मान्य. (त्यामुळे 'द डर्टी पिक्चर'बद्दल लिहीताना विद्या बालन कितीही चांगली अभिनेत्री असली तरीही सिल्क स्मिता बनू शकत नाही, हे समजतं. पण) यात अडचण अशी आहे की अंगविक्षेप आणि नृत्य यांच्यात फरक कसा करणार? अंगविक्षेप आणि नृत्य या दोन गोष्टी काळ्या-पांढर्‍या नाहीत, त्यातही अ‍ॅनालॉग स्केल येते. I know it when I see it अशा प्रकारची व्यक्तिनिष्ठ "व्याख्या" देता येते, पण तिथे सगळ्याच अडचणी येतात. एकाची पॉर्नोग्राफी दुसर्‍याची इरॉटीका असते, एखाद्याचं इरॉटीका दुसर्‍याला हिंस्त्र वाटतं. अशा वेळेस सर्व समाजाला लागू पडेल असे नियम, कायदे, सिस्टम बनवताना अंगविक्षेप-नृत्य अशी विभागणी करण्यापेक्षा आपखुशी-जबरदस्ती अशा प्रकारची विभागणी करणं सोपं जातं. आपखुशीने कामं करणार्‍या व्यक्तींची पिळवणूक होणार नाही, त्या शारीरिकदृष्ट्या कमी असल्या तरीही कोणी त्यांच्यावर सहजरित्या अन्याय, अत्याचार करणार नाही, त्यांचं शिक्षण कमी असेल तर आर्थिक बाबतीत त्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेणारी सिस्टम बनवणं कमीतकमी अन्यायकारक होतं.

भारतात अशा प्रकारचे कायदे केले तरीही त्याची अंमलबजावणी करण्यात किती, काय अडचणी येतात याची पूर्ण कल्पना आहे. सहजासहजी कोणीही स्वतःचे हितसंबंध तोडू इच्छित नाही, कायदा करणारे (यात बहुसंख्य पुरुष आणि पुरुषप्रधान संस्कृतीवर गाढा विश्वास असणारे लोकच जास्तच), अंमलबजावणी करणारे पोलिस (यांच्याबद्दल अधिक काय लिहीणे?) हे ही पुरुषप्रधान संस्कृतीचेच पाईक असलेले दिसतात. यांच्याकडून स्त्रियांचं, विशेषतः वाईट किंवा पददलित समजल्या गेलेल्या स्त्रियाचं काही भलं होईल असं वाटत नाही. या गटाकडून आतून काही बदल झाले, करतात ते काम हीन न समजणं ज्यातून आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो, तर उलट यांचं आहे हे आयुष्य थोडं सुधारून शिवाय अन्य स्त्रियांवर जबरदस्ती होणं कमी होऊ शकतं.

----

इथे जातीव्यवस्थेचं उदाहरण द्यावंसं वाटतं, त्यात सगळ्यात जास्त अन्यायकारक काय होतं तर व्यवसाय बदलता येण्याची मुभा नसणं आणि ठराविक व्यवसाय करणार्‍या व्यक्तींना खालचं समजणं. खालचे समजले गेलेले व्यवसाय खरोखरच खालचे होते का? चांभारकाम करणं खरोखरच वाईट का? चांभार लोकही खालच्या दर्जाचे असतात/होते का? जे काम खरंच वाईट होतं, भंगीकाम, त्याला तंत्रज्ञानाचा पर्याय आला. मृत जनावरांची कातडी कमावण्यासाठी टॅनिंग व्यवसायात नवीन तंत्रज्ञान आल्यावर मनुष्याचे श्रम आणि किळस बरेच कमी झाले.

तसेच संभोगाचे परिणाम, रोग, गर्भ रहाणे यांना पर्याय आले आहेत. रधों ज्या हेतूसाठी संततिनियमनाचा प्रचार करत, स्त्रियांनाही लैंगिक स्वातंत्र्य, हे कोणासाठी असावं? फक्त आनंदासाठी संभोग करणार्‍या स्त्रियांनाच हे पर्याय उपलब्ध असावेत का? ज्या स्त्रिया संभोग करून आनंद मिळवताना, मधे पैसा कमावण्याची एक पायरीही वापरतात त्यांना हे पर्याय उपलब्ध असावेत का नसावेत हे कसं ठरवणार; त्यामागचा विचार काय? तंत्रज्ञान असणे आणि त्याची अतिस्वस्त उपलब्धता यांच्यामुळे

नृत्यासाठी नृत्य (किंवा अंगविक्षेपही!) असतं तेव्हा काहीच प्रश्न नसतात. जेव्हा त्यात देवघेव येते, कोणत्याही प्रकारचा व्यवहार असतो तेव्हा नृत्य असो वा संभोग, निदान दोन सहभागी व्यक्ती, पार्टी, संस्था येणार. त्यामुळे उपलब्ध असणारी संतती नियमनाची साधनं वापरल्यास (आणि योनीशुचिता हे प्रकरण भंपक आहे असं मानल्यास) नृत्य-गायन-वादन आणि शरीरविक्री यांच्यात फरक काय हे समजत नाही.

१. फाळणीनंतर हिंदू स्त्रिया मुस्लिम घरांत लग्न करत्या झाल्या, मुस्लिम स्त्रिया हिंदू घरांत, आणि कुटुंब वेगळ्या देशांत राहिली. अशा स्त्रियांना कुठे रहायचं याचा पर्याय दिल्यानंतर त्यांनी आपल्या वाडवडलांच्या कुटुंबात, देशात जावं का लग्नानंतर जे घर आपलं मानलं आहे त्या देशात रहावं, असा प्रश्न आला होता. एकदा त्यांना बाकी सगळ्याच्या जोडीला मानसिक त्रास झालेला होताच, पुन्हा एकदा तशा प्रकारचा मानसिक त्रास त्यांना द्यावा का?
ब्रेनवॉशिंग पूर्ण झालेल्या व्यक्तींच्या बाबतीत निर्णय त्यांच्यावरच सोडावा का, हा प्रश्न कठीण वाटतो. उत्पन्नाची अन्य साधनं आहेत पण ते उत्पन्न पुरेसं वाटत नाही, पण या व्यवसायाला प्रतिष्ठा नाही. प्रतिष्ठा नसण्यात चूक या व्यक्तींची नाही, समाजाची आहे. चूक किंवा धारणा काहीही म्हणा. मग त्यांच्या मनाविरोधात त्यांना बुद्धी अथवा अन्य कौशल्यविक्री करून स्वयंपूर्ण बनवावं का?

२. अलिकडच्या काळातल्या काही मराठी लेखिकांचं ठराविक प्रकारचं लिखाण वाचून काही स्त्री-पुरुष, हे लिखाण पॉर्नोग्राफीक, स्त्रियाचं वस्तुकरण करणारं - म्हणून वाईट - आहे, अशी तक्रार करतात. या प्रकारचं लिखाण वाचून या तक्रार करणारे लोक स्कॅंडलाईज का होतात हे लक्षात आलं तरीही, व्यक्तिशः मला हे लिखाण पॉर्नोग्राफिक, स्त्रियांचं वस्तुकरण करणारं वाटत नाही. कधीमधी हे लिखाण रंजक वाटतं, कधीमधी अती वास्तवदर्शी.

---

शोषण आणि मनाविरोधात एखादं काम करणं हे अन्य अनेक लोकांचं, इतर अनेक व्यवसायात होतं. बाकी काही जमत नाही म्हणून मास्तर बनलेले अनेक इंजिनियर्स, अन्य शिक्षक दिसतात. पण त्यांच्याकडे फार सहानुभूतीने पाहिलं जात नाही. त्यांना अधिक सहानुभूती मिळावी असं मानण्यापेक्षा ज्या सगळ्यांनी मजबूरीने एक ठराविक पेशा पत्करला आहे त्यांच्याकडे समानतेने पहावं का?

ऋता Fri, 19/07/2013 - 21:39

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

"...संभोग किंवा गायन, वादन, नृत्य.... "
मला अजूनही संभोग आणि इतर उल्लेखिलेल्या गोष्टी करणे ह्यांचा एकाच प्रकारे विचार कसा केला जातोय ते कळत नाहिये...मुळात संभोगात दोन व्यक्ति सहभागी आहेत...इतर गोष्टी एकट्याने करण्यासारख्या आहेत, वयाची मर्यादा नाही, ते दुसर्‍यांची संमती असल्या नसल्याशिवाय केल्याने फरक पडत नाही, गर्भ रहाण्याचा संबंध नाही, रोग पसरण्याची भिती नाही. मग सगळ्यांचा एकाच पातळीवर विचार कसा करायचा ? आणि का ?
ही माझी या चर्चेतल्या काही प्रतिसादांबाबत असलेली एक मूळ अडचण आहे.

राजन बापट Wed, 17/07/2013 - 22:10

माझ्या मते शोषणाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि माझ्या दृष्टीने तो एकमेव महत्त्वाचा मुद्दा आहे.

देहविक्रय करायला परवानगी असावी का ? असावी. त्या प्रक्रियेत सामील झालेल्या कुणाचंही शोषण होत नसेल तर.
पुरुषांनी आपापल्या लैंगिकतेला वाट करून द्यावी का ? करावी. त्या प्रक्रियेत सामील झालेल्या कुणाचंही शोषण होत नसेल तर.
पुरुषांनी दौलतजादा करावा का ? करावा. त्या प्रक्रियेत सामील झालेल्या कुणाचंही शोषण होत नसेल तर.
लोकांनी एडस सकट रोगराईचा धोका पत्करावा का ? जरूर. त्या प्रक्रियेत सामील झालेल्या कुणाचंही शोषण होत नसेल तर.

थोडक्यात सार्‍या प्रश्नांच्या उत्तरामागचं "कॅव्हिआट" एकच आहे : त्या प्रक्रियेत सामील झालेल्या कुणाचंही शोषण होत नसेल तर.

आणि मी जे ऐकतो/वाचतो/पाहातो, मला जे समजतं ते असं की देहविक्रयाच्या व्यवसायाचा मूलाधार आहे शोषण, अल्पवयीनांचं, समाजातल्या दुर्बल घटकांचं. शोषणाचा मुद्दा बाजूला काढा. डान्स बार थांबतील. देहविक्रयाची उच्च आर्थिक वर्तुळातली प्रकरणं वगळतां बाकीची यंत्रणा थांबेल. देहविक्रयाच्या - फ्लेश मार्केटचा - पाया आहे शोषण.

या कारणामुळे डान्सबारवरची बंदी उठणं ही घटना मला दुर्दैवी परिस्थितीत "दुष्काळात तेरावा महिना" आहे अशी वाटते. डान्सबारशी संलग्न असणार्‍या लोकांच्या काम करण्याच्या हक्कापेक्षा शोषण होत असलेल्या घटकांच्या मानवाधिकाराचं रक्षण करणं ही माझ्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. उच्च-सर्वोच्च न्यायालय , एकंदर शासनयंत्रणा, समाजातल्या अनेकांची विचारसरणी असा विचार करत नाही याचा मला खेद आहे.

सन्जोप राव Thu, 18/07/2013 - 05:33

In reply to by राजन बापट

प्रतिसाद आवडला. प्रतिसादाच्या पहिल्या भागाशी पूर्ण सहमत आहे. दुसर्‍याशी पूर्ण असहमत.
आणि मी जे ऐकतो/वाचतो/पाहातो, मला जे समजतं ते असं की देहविक्रयाच्या व्यवसायाचा मूलाधार आहे शोषण, अल्पवयीनांचं, समाजातल्या दुर्बल घटकांचं. शोषणाचा मुद्दा बाजूला काढा. डान्स बार थांबतील. देहविक्रयाची उच्च आर्थिक वर्तुळातली प्रकरणं वगळतां बाकीची यंत्रणा थांबेल. देहविक्रयाच्या - फ्लेश मार्केटचा - पाया आहे शोषण.
शोषण थांबले की देहविक्रय थांबेल असे मला वाटत नाही. देहविक्रय कशानेही थांबेल असे मला वाटत नाही. मागणी तसा पुरवठा. ही मागणी कमी होण्याची किंवा थांबण्याची कोणतीही कारणे मला दिसत नाहीत.
शोषण न होता डान्सबार किंवा देहविक्रय सुरु राहिला तर ते समाजाला घातक नाही, किंबहुना ते समाजासाठी चांगलेच आहे, असे मला वाटते. लाल दिव्याच्या गल्लीत आपल्या काही भगिनी समाजातून बहिष्कृत होऊन कुणाकुणाच्या वासनांचे, विकृतींचे शमन करताहेत म्हणून आपल्या काही भगिनींना, आयांना, बायकोला, मुलीला रस्त्यावरुन (त्यातल्या त्यात) सुरक्षितपणे वावरता येते आहे.

राजन बापट Thu, 18/07/2013 - 07:08

In reply to by सन्जोप राव

कायदे केल्यामुळे आणि त्यांची अंमलबजावणी करण्याची व्यवस्था अस्तित्त्वात असल्यामुळे जगातले खून, चोर्‍या, बलात्कार आणि बाकीचे गुन्हे पूर्णपणे थांबत नाहीत. परंतु कायदा नि सुव्यवस्था हा प्रकार आपल्याला आवश्यक आहे.

तद्वतच, देहविक्रय थांबणार नाही (आणि काळ अनंत आहे आणि पृथ्वी विशाल आहे) हे सारं मान्यच आहे. परंतु 'समाजाचा, देशाचा, संस्कृतीचा प्रवास हा कालक्रमानुसार अधिकाधिक सकलजनहिताय दिशेने व्हायला हवा' असं गृहितक असेल तर अल्पवयीन आणि सहज बळी पडतील अशा घटकांना शोषणाच्या खाईत ढकलणार्‍या यंत्रणेला चालना/पुनरुज्जीवन देणारा हा निर्णय प्रतिगामी आहे.

अवांतर : कुठल्याही समस्येचं विवेचन करताना तिच्या सार्वकालिकत्वाचं , स्थलकालनिरपेक्षतेचं प्रस्थ मांडणारं प्रतिपादन करताना मला जॉन मेनर्ड केन्स या अर्थशास्त्रज्ञाचं प्रसिद्ध वचन आठवतं. आर्थिक मंदी कशी वेळोवेळी येतच असते आणि अर्थव्यवस्थेचा दोला हा चिरंतन इकडून तिकडे जातच असतो असं म्हणण्यार्‍या अर्थशास्त्रज्ञांना उद्देशून तो म्हणतो : "But this long run is a misleading guide to current affairs. In the long run we are all dead."

सविता Thu, 18/07/2013 - 10:41

In reply to by सन्जोप राव

लाल दिव्याच्या गल्लीत आपल्या काही भगिनी समाजातून बहिष्कृत होऊन कुणाकुणाच्या वासनांचे, विकृतींचे शमन करताहेत म्हणून आपल्या काही भगिनींना, आयांना, बायकोला, मुलीला रस्त्यावरुन (त्यातल्या त्यात) सुरक्षितपणे वावरता येते आहे.

हा भंपकपणा आहे. दिल्ली मध्ये वेश्या नव्हत्या म्हणुन त्या मुलीवर अत्याचार झाले का?

विकॄत मनुष्य घरी बायको आणि अजून एखादी "मैत्रिण", वेश्येकडे जाण्याइतके पैसे असली तरी संधी दिसली की बलात्कार करणारच आहे.

ऋषिकेश Thu, 18/07/2013 - 10:51

In reply to by सविता

मार्मिक!
बलात्काराचा संबंध वासनेशी नसून अधिकार/वर्चस्व/सत्ता यांच्याशी आहे हे कितीही वेळा सांगितलं तरी अनेकांना पटत नाहीच! ;) असो.

सन्जोप राव Thu, 18/07/2013 - 11:03

In reply to by ऋषिकेश

वर उल्लेख केलेले उदाहरण घ्यायचे तर दिल्लीत झालेल्या बलात्कारात वासनेचा, विकृतीचा भाग नसू तो फक्त त्या दुर्दैवी मुलीवर पुरुषी वर्चस्व दाखवण्याचा भाग होता असे म्हणावे लागेल.

ऋषिकेश Thu, 18/07/2013 - 11:13

In reply to by सन्जोप राव

अर्थातच!
सहा जणांनी केलेल्या बलात्कारासोबत, पोटातील आतडी हाताने बाहेर काढण्यासारख्या घटना घडलेल्या असताना ही घटना केवळ वासनेला शमवण्यासाठी झाली असे का बरे वाटावे?

सन्जोप राव Thu, 18/07/2013 - 11:06

In reply to by सविता

विकॄत मनुष्य घरी बायको आणि अजून एखादी "मैत्रिण", वेश्येकडे जाण्याइतके पैसे असली तरी संधी दिसली की बलात्कार करणारच आहे.
बलात्कार हा पुरुषी वर्चस्व आणि विकृती या दोन भावनांतूनच होतो का? निव्वळ शरीराची अनावर भूक या भावनेतून बलात्कार होत नाही का? शरीर पेटून उठले की विवेकाचे त्यासमोर काहीएक चालत नाही असे एरवी विवेकी असणार्‍या एखाद्याच्या बाबतीत शक्य नाही का?

ऋषिकेश Thu, 18/07/2013 - 11:21

In reply to by सन्जोप राव

बलात्कार हा पुरुषी वर्चस्व आणि विकृती या दोन भावनांतूनच होतो का?

होय!

निव्वळ शरीराची अनावर भूक या भावनेतून बलात्कार होत नाही का?

नाही! मुळात या भूकेवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पुरूषी अहंकारामुळे या भुकेचा निचरा स्त्रीवर अधिकार गाजवून करणे हा जणू जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखे वाटणे आले की मगच बलात्काराची पातळी गाठली जाते.

मुळात अशी विधाने हीच या अहंकारातून येतात असेही खेदाने म्हणावे लागेल. हे म्हणजे असे झाले की तसा तो चांगला आहे हो पण "त्याच्यावर त्याचा स्वतःचा ताबा नाही हो बिचार्‍याचा" वगैरे पोकळ, हास्यास्पद आणि संतापजनक विधाने करून या गुन्ह्याला पाठीशी घालणे आणि समर्थन केल्यासारखे वाटतेच

सविता Thu, 18/07/2013 - 11:23

In reply to by सन्जोप राव

पहिली गोष्ट - शरीर पेटून उठले की विवेकाचे त्यासमोर काहीएक चालत नाही अशा माणसाला "एरवी विवेकी" म्हणणे किंवा तो "एरवी विवेकी" असणे हास्यास्पद आहे.

दुसरी गोष्ट - वयात आलेल्या ९९% पुरूषांना आणि किमान ७५% स्त्रियांना कुठल्याही साथिदाराशिवाय स्वत: "आनंद" कसा मिळवायचा हे माहित झालेले असते.

तरीही " निव्वळ शरीराची अनावर भूक या मी भावनेतून बलात्कार केला" असे म्हणणारा माणूस स्वतःची समजूत घालत असतो की "मी गुन्हा करण्यासारखी परिस्थिती झाली मी काय करू?" हे फक्त स्वतःची अपराधी भावना कमी करण्यासाठी असते. आणि अर्थात आजूबाजूचे लोक ओरडत असतात "भारत फार सेक्शुअली फ्रस्ट्रेटेद देश आहे बाबा!", मग तर "स्वत:चे कॄत्य/असे कॄत्य करण्याची इच्छा" अजूनच जस्टिफायेबल वाटते.

'न'वी बाजू Thu, 18/07/2013 - 12:35

In reply to by सविता

लाल दिव्याच्या गल्लीत आपल्या काही भगिनी समाजातून बहिष्कृत होऊन कुणाकुणाच्या वासनांचे, विकृतींचे शमन करताहेत म्हणून आपल्या काही भगिनींना, आयांना, बायकोला, मुलीला रस्त्यावरुन (त्यातल्या त्यात) सुरक्षितपणे वावरता येते आहे.

याइतके घृणास्पद वाक्य उभ्या आयुष्यात दुसरे ऐकले नसावे. दुर्दैवाने, हे वाक्य आयुष्यात प्रथमच ऐकलेले नाही. भारतात हा 'युक्तिवाद' सर्रास ऐकावयास मिळालेला आहे. ही एका प्रकारची मानसिकता आहे. (असली आर्ग्युमेंटे एक तर भारतात तरी ऐकायला मिळतात, नाहीतर आमच्याकडल्या रिपब्लिकन पक्षाच्या मान्यवर लोकनियुक्त प्रतिनिधींच्या तोंडून तरी.)

हा भंपकपणा आहे. दिल्ली मध्ये वेश्या नव्हत्या म्हणुन त्या मुलीवर अत्याचार झाले का?

नेमके!

सन्जोप राव Thu, 18/07/2013 - 18:05

In reply to by 'न'वी बाजू

याइतके घृणास्पद वाक्य उभ्या आयुष्यात दुसरे ऐकले नसावे.
कबूल. पण त्याचे पटेल असे खंडन कुणाकडूनच झालेले नाही. भारत सेक्शुअली फ्रस्ट्रेटेड लोकांचा देश आहे या विधानावरही असाच नुसता आक्रस्ताळेपणा दिसतो आहे. वेश्यांकडून सेक्शुअली फ्रस्ट्रेटेड लोकांची काही प्रमाणात का होईना कामतृप्ती होते आहे म्हणून इतर स्त्रिया अधिक सुरक्षित आहेत या वाक्यातली घृणा समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. याचा अर्थ वेश्या नसतील तर सरसकट रस्त्यावर प्रत्येक स्त्रीवर बलात्कार होईल असे मला म्हणायचे आहे असा अर्थ काढणार असाल तर काढा बापडा. पण कामवासनेचे शमन झाल्यामुळे लैंगिक स्वरुपाचे गुन्हे कमी होतात हे तरी मान्य करायला हरकत नसावी. मग असे गुन्हे म्हणजे प्रत्येक वेळा बलात्कारच असला पाहिजे असे नाही. स्त्रियांची टिंगल करणे, त्यांच्यावर अश्लील शेरेबाजी करणे, गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या अंगचटीला जाणे हे सगळेच लैंगिक स्वरुपाचे गुन्हे आहेत. वेश्याव्यवसाय पूर्ण बंद झाला तर असे प्रकार वाढतील यात मला तरी शंका नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 18/07/2013 - 19:56

In reply to by सन्जोप राव

स्त्रियांची टिंगल करणे, त्यांच्यावर अश्लील शेरेबाजी करणे, गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या अंगचटीला जाणे हे सगळेच लैंगिक स्वरुपाचे गुन्हे आहेत. वेश्याव्यवसाय पूर्ण बंद झाला तर असे प्रकार वाढतील यात मला तरी शंका नाही.

असे गुन्हे लग्न झालेले पुरुष करतच नाहीत का? त्यांच्या वर्तनाचं काय बरं स्पष्टीकरण?
(तरी बरं, भारतातल्या बहुसंख्य लैंगिक सुखभोगाबद्दल जाहीर बोलतच नाहीत त्यामुळे हे वाईट असं म्हणण्याचा प्रश्नच येत नाही, बहुसंख्यांच्या धर्मात संततीनियमन वाईट समजलं जात नाही, इ.)

वेश्यांच्याही बाबतीत फक्त संभोग एवढाच व्यवहार असतो काय? त्यांना शारीरिक अत्याचाराला सामोरं जावं लागतं. जळती सिगरेट, तिखट इ. गोष्टींचा योनीभागावर उपयोग वगैरे भीषण वर्णनंही बाहेर आलेली आहेत. सुनिता कृष्णनच्या भाषणात यापेक्षा भीषण गोष्टींचे उल्लेख आहेत. हे गुन्हे, अत्याचार कशामुळे होतात? यांचं काय स्पष्टीकरण/सबबीकरण?

शरीरविक्रय करणार्‍यांना भगिनी समजण्याचं स्वागतच आहे; पण त्यांच्यामुळे बुद्धी/कौशल्यविक्रय करणार्‍या सुरक्षित रहातात, असं म्हणून स्त्रियांच्या अधिकारांची कुचंबणा करून त्यांच्यावर अधिकार गाजवणार्‍या पुरुषांचं समर्थन साफ अमान्य आहे.

ऋषिकेश Fri, 19/07/2013 - 09:19

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असे गुन्हे लग्न झालेले पुरुष करतच नाहीत का? त्यांच्या वर्तनाचं काय बरं स्पष्टीकरण?

+१ इतकंच नव्हे तर भारतातील स्त्रियांचे लैंगिक दमन पुरूशांपेक्षाही अधिक आहे. मात्र त्यांच्याकडून असे वर्तन सर्रास होताना का बरे दिसत नाही?
तस्मात या अश्या वर्तनाचा संबंध लैंगिक भूक न भागण्याशी नसून पुरूषी वर्चस्ववादाशी (अर्थातच व्यक्तींवर (पुरूषांवर) घरून/समाजातून होणार्‍या अशा प्रकारच्या कडीशनिंगशी) अधिक संबंध आहे.

लहानपणापासून मुलग्यांना मुलींची छेड काढताना बघणे, घरातून-समाजातून मुलांचे (मुलग्यांचे) काही वर्तन क्षम्य समजणे, वडिलांनी आईला दिलेली दुय्यम वागणूक दिसणे (हे तर इतके कॉमन आहे की असे सहसा मुलांसमोर होत नसलेले घर पहायला वयाची २५एक वर्षे तरी जावी लागली), पालकांनी मुलगी व मुलगा यांना दिलेली वेगळी वागणूक, मुलांचे खेळ-मुलींचे खेळ, मुलांची कामे मुलींची कामे वगैरे लहानसहान गोष्टींतून मुलांमध्ये रुजवली जाणारी वेगळीपणाची आणि श्रेष्ठपणाची म्हणा किंवा अधिकाराची सवय या गोष्टींमागे आहेत.

छेड काढणे काय किंवा बलात्कार काय त्याचा लैंगिक भुकेशी काहिहि संबंध नाही!

सन्जोप राव Fri, 19/07/2013 - 09:33

In reply to by ऋषिकेश

लहानपणापासून मुलग्यांना मुलींची छेड काढताना बघणे, घरातून-समाजातून मुलांचे (मुलग्यांचे) काही वर्तन क्षम्य समजणे, वडिलांनी आईला दिलेली दुय्यम वागणूक दिसणे (हे तर इतके कॉमन आहे की असे सहसा मुलांसमोर होत नसलेले घर पहायला वयाची २५एक वर्षे तरी जावी लागली), पालकांनी मुलगी व मुलगा यांना दिलेली वेगळी वागणूक, मुलांचे खेळ-मुलींचे खेळ, मुलांची कामे मुलींची कामे वगैरे लहानसहान गोष्टींतून मुलांमध्ये रुजवली जाणारी वेगळीपणाची आणि श्रेष्ठपणाची म्हणा किंवा अधिकाराची सवय या गोष्टींमागे आहेत.

छेड काढणे काय किंवा बलात्कार काय त्याचा लैंगिक भुकेशी काहिहि संबंध नाही!
शब्दच संपले! काहीही युक्तिवाद करणे शक्य नाही....

शहराजाद Fri, 19/07/2013 - 22:47

In reply to by ऋषिकेश

छेड काढणे काय किंवा बलात्कार काय त्याचा लैंगिक भुकेशी काहिहि संबंध नाही!

वरील वाक्य वगळता सर्व प्रतिसादाशी सहमत. बलात्कारासाठी वर्चस्व गाजवणे, शिकार साधणे, धडा शिकवणे इ प्रवृत्ती प्रामुख्याने कारणीभूत आहेत ह्याबद्दल दुमत नाही. पण लैंगिक भुकेच्या प्रभावाखाली नसलेले ( बालके इ ) किती वेळा बलात्कार /छेड्छाड करतात?

छेडछाड, अंगचटीला जाणे इ शमनाचा मार्ग म्हणून वापरले जाते. शिवाय भारतीय समाजात, आपण हे करू शकतो, कोण काय करणार आहे, बहुधा स्त्रिया संकोचाने/ गैरसोयीने गप्पच बसणार (फार फार तर चार शिव्या घालणार) ह्याची खात्री असते. धक्का मारण्य, स्पर्श करणे यांमध्ये त्यामानाने धोका कमी, कष्ट नगण्य आणि संधी तर खूपच जास्त. जाता जाता तेवढीच मजा!
मागे मुंबईत रस्त्यावरून चालताना ह्याच विषयावर मी आणि सोबतच्या पन्नशीच्या बाई बोलत होतो. ' धक्काबुक्की होते, पण अगदीच बस/ ट्रेन सारखी झुम्मड नसेल तर इतका काही तक्रार करण्याजोगा त्रास भारतात नसतो. परदेशाचे काय एवढे? आपण सांभाळून चालले की झाले.' असे त्यांचे म्हणणे. मी म्हटले, " आता हे बोलताना समोरून येणार्या माणसाला तुम्ही किंचित तिरक्या होऊन इंचभराने टाळले. मागच्या दोन चौकांपासून तुम्ही किती वेळा हे केले आहे तुमच्या लक्षात तरी आले का? चुकवून चालणे इतके अंगवळणी पडावे एवढ्या प्रमाणात असा चान्स मारण्याचा प्रकार येता जाता होत असतो." आंतर्जाल, इतर प्रसारमाधमे आजच्याइतकी पसरली नसतानाही ही परिस्थिती फार वेगळी नव्हती.
ईतर प्रतिसादांत म्हटल्याप्रमाणे, पाश्चिमात्य देशांमध्ये देखील शमनाचे मार्ग असतानाही वर्चस्ववादी प्रवृत्तीमधून होणारे बलात्कार असतातच. पण गर्दीचा फायदा घेऊन स्पर्श करणे आदी प्रकार नगण्य म्हणावेत एवढे कमी असतात. गर्दीतही पावलोपावली एवढे सांभाळून, चुकवत चालावे लागत नाही. भारतात ते प्रचंड प्रमाणात असते. संजोप रावांनी म्हटल्याप्रमाणे केवळ पुरुषप्रधान विचारसरणीच नव्हे तर लैंगिक दमन हेच मोठे कारण आहे असे माझे मत आहे.

'न'वी बाजू Fri, 19/07/2013 - 11:36

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्त्रियांची टिंगल करणे, त्यांच्यावर अश्लील शेरेबाजी करणे, गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या अंगचटीला जाणे हे सगळेच लैंगिक स्वरुपाचे गुन्हे आहेत. वेश्याव्यवसाय पूर्ण बंद झाला तर असे प्रकार वाढतील यात मला तरी शंका नाही.

असे गुन्हे लग्न झालेले पुरुष करतच नाहीत का?

आपले अधोरेखित विधान हे 'सेक्षुअल फ्रष्ट्रेषण थियरी'च्या प्रतिवादार्थ असावे, असे वाटल्याने काही खुलासा करू इच्छितो.

आपल्या इमेजरीतील 'लग्न झालेले पुरुष' हा संच 'सेक्षुअली फ्रष्ट्रेटेड पुरुष' या संचाशी म्यूच्युअली एक्स्क्लूज़िव असावा, असे प्रतीत होते. (तसे नसल्यास चूभूद्याघ्या.)

उलटपक्षी, या दोहों संचांत (१) आंतरछेद, (२) खूप मोठा आंतरछेद अथवा (३) एकरूपता, यांपैकी काही असावे, असा कदाचित आपल्या सन्माननीय प्रतिवादींचा दावा असू शकतो (चूभूद्याघ्या.), एवढेच आपल्या निदर्शनास आणून देऊन आपली रजा घेतो. (त्यातील कोरिलेशन, कॉज़ेशन वगैरे आपल्या भाषेत जेजे कायकाय म्हणतात ते त्या सगळ्या भानगडी तुम्हीच ठरवा. म्यां मूढाचे ते काम नोहे.)

(आपल्या प्रतिसादातील उर्वरित मुद्द्यांशी सहानुभूती नि बहुतांशी सहमती आहे.)

कविता महाजन Fri, 19/07/2013 - 21:27

In reply to by सन्जोप राव

"वेश्याव्यवसाय पूर्ण बंद झाला तर असे प्रकार वाढतील यात मला तरी शंका नाही."

शंका असलीच पाहिजे.
केवळ महाराष्ट्राचे उदाहरण घ्यायचे झाल्यास इथे प्रत्येक जिल्ह्यात वेश्यावस्ती नाहीये. काही जिल्ह्यांत तुरळक व विखुरलेला व्यवसाय चालतो. अनेक जिल्ह्यांत ही उपलब्धता नाही. विनयभंगापासून बलात्कारापर्यंत अत्याचार घरात, पाळणाघरात, शाळेत, इथपासून ते पोलीस स्टेशन, न्यायालय अशा सर्वच ठिकाणी होत असतात. केसेस तपशीलाने पाहिल्या तर स्थळे, व्यक्ती, त्यांचे बळीशी नाते, वय, व्यवसाय, शिक्षण, आर्थिक स्थिती इ. सर्व ध्यानात येईल.
मी हाताळलेल्या केसेसमध्ये बलात्कारित मुलीचे सर्वात कमी वय सहा महिने होते.
कुमारिकांशी ( त्यातही जिची मासिक पाळी सुरू झालेली नाही, तिच्याशी ) संभोग केल्याने धंद्यात बरकत येते, नुकसान टळते, गुप्तरोग बरे होतात, वंध्यत्व नाहीसे होते इत्यादी समज आहेत.
पुरुषी अहंकार हा मुद्दा तर आहेच.
बलात्कार बारबालांवर आणि वेश्यांवरही होतात. "त्यांचे 'श्रम' विकत घेण्याची" उपलब्धता असूनदेखील!

एकट्या असणार्‍या / राहणार्‍या स्त्रियांबाबत एक सर्वेक्षण केले होते, त्यातही अधिक त्रास विवाहित आणि परिचित / नातलग पुरुषांकडून होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
बलात्कारांबाबत व चाइल्ड अ‍ॅब्युजबाबत तर आकडेवारीही उपलब्ध आहे, जी परिचित व नातलगांकडेच अंगुलीनिर्देश करते.

मी Thu, 18/07/2013 - 11:57

सन्जोप रावांच्या काही विधानांच्या समर्थनार्थ - Addiction is a primary, chronic disease of brain reward, motivation, memory and related circuitry. Addiction affects neurotransmission and interactions within reward structures of the brain, including the nucleus accumbens, anterior cingulate cortex, basal forebrain and amygdala, such that motivational hierarchies are altered and addictive behaviors, which may or may not include alcohol and other drug use, supplant healthy, self-care related behaviors. Addiction also affects neurotransmission and interactions between cortical and hippocampal circuits and brain reward structures, such that the memory of previous exposures to rewards (such as food, sex, alcohol and other drugs) leads to a biological and behavioral response to external cues, in turn triggering craving and/or engagement in addictive behaviors.

--American Society of Addiction Medicine

अर्थात तेवढं एकच कारण आहे असं नाही.

चिंतातुर जंतू Thu, 18/07/2013 - 16:04

ह्या विषयावर आजच्या 'लोकसत्ता'त अग्रलेख आला आहे. त्यातले प्रमुख मुद्दे -

- बंदीच्या निर्णयाला कायद्याचा आधार नव्हता. त्यामुळे तो कोर्टात टिकणारा नव्हता.
- तीन वा अधिक तारांकित हॉटेलात चालू डान्स बारवर बंदी नाही हा दुटप्पीपणा होता.
- तंबाखू-दारू ह्यातून उत्पन्न मिळतं आणि राजकारण्यांचे त्या व्यवसायांशी लागेबांधे आहेत. त्यामुळे नैतिकतेचे मुद्दे तिथे उपस्थित केले जात नाहीत. हा दुटप्पीपणा आहे.
- आधुनिक शहरांत रात्रीच्या प्रौढ मनोरंजनाची गरज नाही म्हणणं दांभिक आहे.

नितिन थत्ते Thu, 18/07/2013 - 16:31

In reply to by चिंतातुर जंतू

>>तंबाखू-दारू ह्यातून उत्पन्न मिळतं आणि राजकारण्यांचे त्या व्यवसायांशी लागेबांधे आहेत. त्यामुळे नैतिकतेचे मुद्दे तिथे उपस्थित केले जात नाहीत. हा दुटप्पीपणा आहे.

डान्सबारच्या व्यवसायात सुद्धा राजकारण्यांचेच लागेबांधे असतात.

प्रकाश घाटपांडे Thu, 18/07/2013 - 18:17

पेशव्यांच्या काळात बावनखणीत हेच प्रकार चालायचे की! योग्य कि अयोग्य ही चर्चा कैक शतके चालूच आहे.

कविता महाजन Thu, 18/07/2013 - 21:18

शारीरिक अत्याचार आपण कल्पना करू शकणार नाहीत, इतके भीषण आहेत.
दोन उदाहरणे नाइलाजाने सांगते. कारण लिहिताना बायका डोळ्यांसमोर येतात आणि खुपत राहतात, मग कैक रात्री झोप येत नाही.
कुमारिकेला जास्त किंमत येते म्हणून पुनःपुन्हा योनी शिवून तिला विकत राहणे, हा एक प्रकार.
एका वस्तीतील सर्व मुलींचे दात काढून टाकले आहेत, ओरल सेक्स करताना दात लागून त्रास होऊ नये म्हणून. ही पूर्ण वस्ती ओरल सेक्ससाठी प्रसिद्ध आहे.

जे लोक व्यवसाय म्हणून हा सुरू रहावा याचे 'वैचारिक मुद्दे' मांडत समर्थन करताहेत, त्यांना माझ्यासारख्यांचे भावनाविवश होणे हास्यास्पद वाटेल.
पण अशा लोकांशी केवळ व्हर्चुअल चर्चा करण्यासाठी म्हणून देखील संपर्कात राहू नये असे इथल्या काही कॉमेंट्स वाचून वाटते आहे.
या जगाच्या भीषणतेचा अंदाज नाही असे मानले तरी शिकलेल्या माणसांची इतकी असंवेदनशीलता मी तरी सहन करू शकत नाही. थांबते.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 18/07/2013 - 22:00

In reply to by कविता महाजन

हेच अत्याचार थांबवण्यासाठी नियमन, व्यावसायिकता यावी असा मुद्दा आहे. ही असंवेदनशीलता नाही.

बॅटमॅन Thu, 18/07/2013 - 22:57

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

व्यावसायिकता आली तर वर नमूद केलेले अत्याचार थांबतील कशावरून? नो ग्यारंटी. उलट ग्राहक जास्त पैसे फेकून अमुक विकृती पाहिजे असे डिमांड करू धजावतील-जे आत्ताही चालू आहेच.

Nile Thu, 18/07/2013 - 23:01

In reply to by बॅटमॅन

अधिकृत मान्यता जर मिळाली तर त्या व्यावसायातील लोकांना इतर अधिकृत व्यावसायातील अधिकारही आपोआप प्राप्त होतील, असा युक्तिवाद आहे. किमान अशा सर्वमान्य हक्कांची दाद मागण्याची सोय तरी निर्माण होईल. जर तुम्ही अनधिकृत काम करत असाल तर ते करताना झालेल्या अन्यायाविषयी दाद मागता येत नाही. (दाद मागायला गेलात तर त्यामुळे मिळणार्‍या उत्पन्नाला मुकावे लागते. उदा. बालमजुरी, वेश्याव्यवसाय इ.)

बॅटमॅन Thu, 18/07/2013 - 23:23

In reply to by Nile

हा युक्तिवाद बराच फसवा आहे. बाकी सोडा, परंतु जगात कुठे असे उदाहरण पाहण्यात आहे का? यात व्यावसायिकता आणली तर आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास होण्याची शक्यता जास्त आहे. वरवर म्हणायला ठीक आहे, पण प्रत्यक्षात या व्यवसायाचे एकूण स्वरूप पाहता असे होण्याची शक्यता अतिशय कमी- ना के बराबर आहे. प्रॅक्टिकल उदाहरणे न देता निव्वळ सैद्धांतिक मते इथे मांडली जाताहेत त्याचे आश्चर्य वाटते आहे. विदा काय म्हणतो?

Nile Fri, 19/07/2013 - 01:09

In reply to by बॅटमॅन

हा युक्तिवाद बराच फसवा आहे.

का?

विदा काय म्हणतो?

सती निर्मुलनाच्या वेळीही लोकांनी विचारले असेलच, विदा काय म्हणतो म्हणून. बोंबलायला तुमच्याशिवाय कोणी सती देतच नसेल तर विदा काय हत्तीच्या कानातनं येणार आहे का?

बॅटमॅन Fri, 19/07/2013 - 01:23

In reply to by Nile

माझे मत मी या आणि इतरही प्रतिसादांतून मांडलेच आहे.

आणि सतीनिर्मूलनाच्या उदाहरणाशी तुलना कैच्याकै आहे. माझा प्रश्न साधा आहे: सैद्धांतिकली काहीएक पाहिजे/नको अशी टनावारी अर्ग्युमेंट्स या धाग्यावर पाहिलीत. तदुपरि त्यांना सत्याचा थोडा आधार पाहिजे ही मागणी अवाजवी का वाटावी? तुमचे काहीएक म्हणणे आहे, ते समजले. जगात कुठेतरी तसे झाले आहे काय हे पाहायला आवडेल. नसेल झाले तर थिअरीत घोळ असण्याची शक्यता अज्जीच नजरेआड का केली जावी?

Nile Fri, 19/07/2013 - 02:07

In reply to by बॅटमॅन

विदा मागणी अवाजवी असू शकते हे सतीच्या उदाहरणातून स्पष्ट व्हावे. वेश्याव्यवसायाबद्दल विदा गोळा करणे कठिण काम आहे, व्यवसाय बेकायदेशीर आहे हे एक त्याचे मुख्य कारण.

थिअरीत घोळ असु शकतो, पण तो कुठे आहे हे तर दाखवा. नुसतं थेअरीत घोळ आहे म्हणून काय होणार?

असो. हा घ्या विदा: http://diginole.lib.fsu.edu/cgi/viewcontent.cgi?article=4482&context=etd

वरवर चाळता, नेवाडात (कायदेशीर) वेश्याव्यवसायानिगडीत गुन्ह्याचे प्रमाण सरासरी कमी आहे असे लेखक म्हणतोय असे दिसते. विद्याचा फारसा अभ्यास मी केलेला नाही, तितका वेळ नाही. पण तार्किकदृष्ट्या थेअरीत काय घोळ आहे हे कोण सांगणार असेल तर त्यावर वेळ खर्चायची तयारी आहे.

इथे लेखिकांनी याच विषयावर तार्किक उहापोह (आणि काही सत्य परिस्थिती) केला आहे. (त्यांचा निष्कर्ष मी दिलेल्या युक्तिवादाशी जुळतोय असे दिसते.) http://esplerp.org/wp-content/uploads/2012/08/Violence-and-Legalized-Br…

तुर्तास इतकेच.

अजो१२३ Thu, 18/07/2013 - 23:15

In reply to by कविता महाजन

माझ्या कोणत्याही प्रतिसादात सहसा कोणताही 'सुर' येऊ नये असे मला वाटते. पण स्वानुभव, सत्ये, तर्क आणि मतांतराचा आदर असाच सिमित प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केल्याने प्रतिसाद चक्क निरर्थक बनतात असा अनुभव आहे. कोणतीतरी बाजू घ्यावी आणि विरोधकांना शेवटपर्यंत झोडपावे हा अतिशय सोपा मार्ग चोखाळताना जगात लोक दिसतात. तर्कशास्त्राचा स्वतःसाठीचा तार्किक/वैज्ञानिक आधार नाही, त्यामुळे तर्काधारित चर्चा अनंतकाळ चालू शकते. ती सिमित करण्यासाठी काही गृहितके सर्वांनी करायची असतात.

दुर्दैवाने 'इथे' (ऐसीवर सत्य पाहून मत बदलण्यास लोकांची सहसा हरकत नसते) प्रकट झालेली अशी मते क्षणिक भरकटलेली मते नाहीत. ती एक मनोमन पूर्णतः जस्टीफाय झालेली, घट्ट झालेली विचारधारा आहे. मानवाला आपल्याला अक्कल असल्याचा झालेला अलिकडील अविष्कार हा खरंतर इंटरनेट पेक्षाही मोठा आणि व्यापक आहे. पण तो सुप्त असा आहे. अढळ अशी मानवी मूल्येच नाहीत, बिग बँगनंतर ४*१०^-९०० व्या सेकंदाला पैशाची उत्क्रांती झाली, मग थोड्या वेळाने कायद्याची, मग बाजाराची अशी साधारणत: मानसिकता आहे. वर एका प्रतिसादकाने आपले पाल्य वेश्याव्यवसायात (corporate form) यावे यासाठी तो/ती सर्वकष प्रयत्न करेल असे लिहिले आहे. एकिकडे यातला प्रामाणिकपणा आणि असं लिहिण्याचं धैर्य कौतुकास्पद आहे. पण मला माझ्या हॄदयाच्या एका कोपर्‍यात त्या पाल्याबद्दल भयंकर दःख उमाळून आलं आहे.

मानवाच्या अस्तित्वाचं वेगवेगळ्या एककांमधे विघटन केलं, जसे मन, आत्मा, शरीर, बुद्धी, स्वातंत्र्य, चरित्र्य, इ इ तर कशाकशावर प्राइस टॅग लागावा? अगदी खूप macro level ने पाहिले तर माणसाने उभे केलेले वस्तूंचे बाजार हा एक खेळ आहे. त्या खेळाच्या नादात निर्माण झालेल्या परिस्थितीने शेवटी माणसावरच प्राईस टॅग लागला तर? खेळ अशा पद्धतीने खेळू नये इतकी संवेदनशील अपेक्षित आहे.

सन्जोप राव Fri, 19/07/2013 - 05:32

In reply to by कविता महाजन

वर दिलेल्या उदाहरणांतील दाहकता जाणवली आणि तिचा चटकाही बसला. पण अशी उदाहरणे ठाऊकच नव्हती असे नाही.
लेखिकेने (आणि काही प्रतिसाददात्यांनी) डान्सबारचे आणि वेश्याव्यवसायाचे समर्थन करणार्‍यांचे असंवेदनशील, वासनांध पशू, स्त्री म्हणजे फक्त ओरबडायची वस्तू असे चित्र रंगवण्यात यश मिळवले आहे. एक तर डान्सबारचा आणि वेश्याव्यवसायाचा विरोध केला म्हणजे सगळ्या जगाच्या हळवाहुळव्या फुलपाखरी संवेदनशीलतेचा मक्ता आपल्याकडे आला असे समजण्याचे कारण नाही. दुसरे म्हणजे डान्सबार हवेत आणि नियंत्रित वेश्याव्यवसायही हवा असे म्हणणारे रोज झिंगून दौलतजादा करुन घरी जातात आणि मग मिळेल त्या स्त्रीचे शरीर ओरबाडून समाधानाने झोपी जातात असेही नाही. उलट डान्सबारचे आणि वेश्याव्यवसायाचे समर्थन करणारे बरेचसे पुरुष (या मंचावरचे- ज्यांना मी वैयक्तिकरीत्या ओळखतो - आणि त्यात मीही आलो) स्त्रियांबद्दल अतीव आदर बाळगणारे आहेत. त्यामुळे हे जग किती भीषण आहे याची कल्पना करण्यासाठी स्त्री असले पाहिजे आणि डान्सबारचा आणि वेश्यावृत्तीचा विरोधक असले पाहिजे असे नाही. पुरुषांना बाळंत होता येत नाही म्हणून त्यांना प्रसववेदना म्हणजे काय हे समजत नाही किंवा स्त्रियांना प्रोस्टेट कॅन्सरच्या वेदना काय असतात हे समजत नाही असे म्हणण्याइतपत हे बालीश आहे.
शेवटी भावनावश होऊन मंच सोडून जाण्याविषयी. असा आक्रस्ताळेपणा करुन तडकाफडकी संकेतस्थळे सोडून जाण्याचे प्रकार फार पूर्वीपासून घडत आले आहेत. त्याने काही होत नाही. विचारांचा विचारांने विरोध आणि त्यातून परिवर्तन हे अधिक मॅच्युअर वर्तन आहे. एरवी काय सगळा एका क्लिकचा सवाल आहे.

कविता महाजन Fri, 19/07/2013 - 08:35

In reply to by सन्जोप राव

"सगळ्या जगाच्या हळवाहुळव्या फुलपाखरी संवेदनशीलतेचा मक्ता" घेण्याचे काहीच कारण नाही. मात्र केवळ विचार पुरेसे नसतात, त्यामुळे जगण्यात कोरडेपणा येतो आणि वागणे यंत्रवत होते; त्यामुळे भावनांची जोड हवीच. दुसर्‍या बाजूने नुसत्याच भावना कुणी मांडत असेल तर तेही निरर्थक हुळहुळणे होते. प्रत्यक्ष फिल्डवर्क करताना विचारांना संवेदनशीलतेची जोड असेल तर कृती सार्थक होते, असे माझे मत अनुभवांती बनले आहे.
भावनावश होऊन मी आक्रस्ताळेपणा केला आहे, असे मला तरी इथे जाणवलेले नाही. मात्र अशा वृत्ती पाहून एक हताश थकवा येतो, जो प्रत्यक्ष कामे करण्यास अडथळे आणतो, त्यामुळे या लांबणात अडकून न पडणे योग्य असे वाटले. बाकी चर्चा चालू द्या... आकडेवार्‍या आणि सर्वेक्षणे यातून काही स्वयंसेवी संस्था आणि सरकारी खात्यांमधले लोक किती चुकीच्या ( आणि अर्थातच त्यांना सोयीच्या ) निष्कर्षांपर्यंत जातात हे कुपोषण आणि शेतकरी आत्महत्या या दोन समस्यांबाबत अनुभवले आहेच. त्यामुळे बारबाला आणि वेश्या यांच्याबाबतच्या अशा आकडेवार्‍या उपलब्ध नाहीत, हे एका अर्थी चांगलेच आहे.

लैंगिक गरज आणि लैंगिक सुख यांतील फरक जोवर आपण लक्षात घेणार नाही तोवर व्यवसायाचे समर्थन करणारे निर्माण होत राहणारच.
विक्री करणारे गरज भागवतील, पण सुख देऊ शकत नाहीत, हे साधे गणित आहे. ज्यांना फक्त गरजाच भागवण्याच्या पातळीवर थांबायचे आहे, त्यांच्यासाठी हे ठीकच.

अतिव आदरच बाळगायचा असेल तर तो केवळ स्त्रियांविषयीच नव्हे, एकूणच माणसांविषयी बाळगला पाहिजे. शरीरविक्री काही केवळ स्त्रियाच करत नाहीत, तर पुरुष आणि हिजडेही करत असतात आणि त्यांनाही विपरित अनुभवांना सामोरे जावे लागते. हे समजून घेण्यासाठी मला माणूस असणे पुरेसे ठरले; मी त्यातली स्त्री / पुरुष / हिजडा काय आहे, हे महत्त्वाचे नाही. "जग किती भीषण आहे" हे समजण्यासाठी हे पुष्कळ. प्रत्यक्ष वाईट वर्तन केले नाही तरी अविचारी बाजूचे समर्थन केल्याने वाईट वर्तन करणार्‍यांना एका अर्थाने पाठबळच मिळते.

"विचारांचा विचारांने विरोध आणि त्यातून परिवर्तन हे अधिक मॅच्युअर वर्तन आहे." - हे विधान अपुरे वाटले. संवेदनशील वैचारिकतेने संवाद आणि त्यातून परिवर्तन घडवणारी कृती, ही प्रगल्भता आहे असे म्हणता येईल.

सन्जोप राव Fri, 19/07/2013 - 09:52

In reply to by कविता महाजन

फील्डवर्कचे इथे फार ग्लोरिफिकेशन होते आहे असे वाटते. 'बाई ग! माझे इत्के मोठ्ठे काम आणि त्यात पुन्हा हा मानसिक थकवा!' असे भावनिक आवाहन करण्याचे काहीच कारण नाही. फील्डवर्कचा ज्यांनी उल्लेख केला नाही ते लोक काहीच करत नसून नुसत्या वांझ चर्चा करत आहेत असे समजण्याचे कारण नाही. हां, त्याचा उल्लेख कुणी करत नसेल. हा त्यांचा संकोच म्हणावा की मोठेपणा हे ज्याने त्याने ठरवावे. 'परिवर्तन घडवणारी कृती' प्रत्येकजण आपापल्या परीने करतच असतो. त्याच्या पाट्या हातात घेऊन उभे राहाणे सगळ्यांना जमत नसेल.
आणि सुख वगैरे सापेक्ष गोष्टींपर्यंत न गेलेलेच बरे. मार्स्लोच्या उतरणीच्या पायथ्यातल्या एकदोन पातळ्यांत अडकून राहिलेल्यांचा हा देश. इथल्या लोकांच्या प्राथमिक गरजा जरी भागल्या ( ज्यात लैंगिक गरज हेही आले) तरी खूप झाले.
आदराबाबतीत बोलायचे झाले तर स्त्रिया या एकूण माणसांमध्येच येतात असा माझा समज होता. किंबहुना 'स्त्रियांना माणूस समजा' यावरच हा सगळा वाद सुरु आहे असे मला आत्तापर्यंत वाटत होते. त्यात पुन्हा पुरुष आणि हिजडे हे आणून चर्चेला एक संपूर्ण वेगळे वळण कशासाठी हे कळाले नाही. स्त्रियांनी बारबाला म्हणून काम करावे, स्त्रियांनी वेश्याव्यवसाय करावा असे मत असणार्‍यांना स्त्रियांबद्दल अतीव आदर असू शकतो. बस्स. इतकेच. पुरुष, हिजडे, माकडे, , जिराफ, अपृष्ठ्वंशीय प्राणी यांच्याविषयी अशा लोकांना आदर आहे की नाही हे इथे संपूर्ण गैरलागू आहे.
प्रत्यक्ष वाईट वर्तन केले नाही तरी अविचारी बाजूचे समर्थन केल्याने वाईट वर्तन करणार्‍यांना एका अर्थाने पाठबळच मिळते.
याच्याशी संपूर्ण सहमत आहे. डान्सबारला आणि वेश्याव्यवसायाला विरोध हे असेच अविचारी बाजूचे समर्थन आहे असे माझे मत आहे.

अजो१२३ Fri, 19/07/2013 - 10:44

In reply to by सन्जोप राव

आणि सुख वगैरे सापेक्ष गोष्टींपर्यंत न गेलेलेच बरे. मार्स्लोच्या उतरणीच्या पायथ्यातल्या एकदोन पातळ्यांत अडकून राहिलेल्यांचा हा देश. इथल्या लोकांच्या प्राथमिक गरजा जरी भागल्या ( ज्यात लैंगिक गरज हेही आले) तरी खूप झाले.
------अटलांटीक महासागरावरची किती मीटर क्युब हवा डोक्यात गेली कि असे विचार सुचतात? त्यावर उतारा म्हणून कोणत्या हवेत बसावे?

कविता महाजन Fri, 19/07/2013 - 21:42

In reply to by सन्जोप राव

फिल्डवर्कचे ग्लोरिफिकेशन करण्यात मला समाधान वाटते.
टेबलवर्क महत्त्वाचे आहे, पण फिल्डवर्कनंतर आणि फिल्डवर्कसोबत! अन्यथा चर्चा वांझच ठरतात.
अशा नुसत्या टेबलावर बसून आखलेल्या योजनांचे बोजवारे कसे उडाले आहेत आणि त्यामुळे किती स्तरांवर नुकसान झाले व होते आहे, हे किती वर्षं अनुभवतो आहोत. योजनांच्या अंमलबजावणीवर बहुतांशवेळा बोट ठेवले जाते, पण मुळात योजनाच फिल्डच्या अज्ञानातून आलेली असल्याने ती फसणे गृहीत असते.
मी, माझी संस्था, माझे काम, माझी महत्ता हे सांगण्याचा हेतू असता, तर तसे मी तपशीलाने व नावानिशी सांगू शकले असते. पण मला तशी आवश्यकता भासलेली नाही. माझ्याहून हजार पटीने फिल्डवर काम करणारी माणसे मी पाहत आली आहे आणि टेबलवर्क करणारीही; त्यातून फिल्डवर्कर्सविषयी आदर वाढलेला आहे. व्यक्तीने आपल्या परीने केलेली कृती हा खारीचा वाटा असतोच, त्याचे महत्त्व मी नाकारत नाहीच. तरीही पूर्णवेळ काम करणारे कार्यकर्ते हे त्यांच्यापेक्षा केव्हाही अधिक आदरणीय ठरतात. अनेक वर्षे तेच काम करून माणसे बर्नआउट होतात आणि थकतात, हे सांगण्यात वा कबुल करण्यात काहीही गैर नाही. ते हातात पाटी घेऊन उभे राहणे असे कुणाला वाटले तरी हरकत नाही.

दुसरे म्हणजे जेव्हा फक्त बारबालांविषयी चर्चा सुरू होती, तेव्हा केवळ स्त्रियाच नजरेच्या टप्प्यात होत्या. चर्चेत शरीरविक्री हा मुद्दा आला, तेव्हा त्यात स्त्रिया, पुरुष, हिजडे सारेच आले. चर्चा पुन्हा एकदा वाचून पाहिलीत तर हे ध्यानात येईल.

ऋता Fri, 19/07/2013 - 13:42

In reply to by कविता महाजन

तुम्ही या भीषणतेच्या प्रत्यक्ष संपर्कात आला आहात...त्यामुळे तुम्हाला या समस्येचं आकलन झालेलं आहे. तुम्ही तुमच्या अभ्यासात आलेल्या उदाहरणांनी मुद्दे स्पष्ट करत आहात. शरीर विक्रय या व्यवसायात मूळातच 'स्लेवरी' आहे- एखाद्या माणसाचं शोषण आहे, आणि ते कितीही कायदे आणले/व्यावसायिकता आणली तरी थांबणार नाही- हा मुद्दा सर्वांनाच थोड्याफार प्रमाणात भिडला आहे असं मला वाटतं.

इथे वाद घालणारे असंवेदनशील वाटतील. पण मला वाटतं भारतात कोण (रोजचं खायला प्यायला मिळणार्‍या पासून अगदी करोडपतींपर्यंत सर्वजण कमी जास्त प्रमाणात) असंवेदनशील नाहिये? प्रत्येकाच्या आयुष्यात 'भिकारी' कधी ना कधी आलेला आहे- त्या प्रत्येकाचीच एक भीषण कहाणी असणार.प्रत्येकवेळी थांबून त्याचं पुनर्वसन करून पुढे जातात का माणसं? अनेकजण आपापल्यापरीने मदत करतातच पण प्रत्यक्ष परिस्थितीत बदल आणण्यासाठी थांबून विचार झालेला नसतो. या चर्चे निमित्त विचार होतो आहे...नक्कीच 'सगळे पालथ्या घड्यावर पाणी' इतकी वाईट परिस्थिती नाहीये.

गवींनी वर 'सेक्स टॉइज' कायदेशीर करण्या बाबत लिहिले आहे- हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो.

चिंतातुर जंतू Fri, 19/07/2013 - 18:16

एकंदर चर्चा भरकटलेली वाटली, कारण ती वेश्याव्यवसाय कायदेशीर असावा की असू नये ह्यावरच मुख्यतः होत होती. ह्यात मूळ विषयापासून भरकटणं का आहे? कारण न्यायालयाचा निर्णय हा डान्स बारवरच्या बंदीमागे दिसत असलेल्या उच्चनीचतेच्या भेदभावावर आधारित होता असं दिसतं. महाराष्ट्र सरकारचा निर्णय घटनाबाह्य होता असं ठरवताना न्यायालय हे म्हणतं -

“Rather it is evident that the same dancer can perform the same dance in the high class hotels, clubs and gymkhanas but is prohibited from doing so in the establishments covered under Section 33A. We see no rationale which would justify the conclusion that a dance that leads to depravity in one place would get converted to an acceptable performance by a mere change of venue. In our opinion, in the present case, the legislation is based on an unacceptable presumption that the so- called elite i.e. the rich and the famous would have higher standards of decency, morality or strength of character than their counterparts who have to content themselves with lesser facilities of inferior quality in the dance bars.”

[...]

“Such a presumption is abhorrent to the resolve in the Preamble to secure the citizens of India. In our opinion, if a certain kind of dance is sensuous in nature and if it causes sexual arousal in men, it cannot be said to be more in the prohibited establishments and less in the exempted establishments. Sexual arousal and lust in men and women and degree thereof cannot be said to be monopolised by the upper or lower classes. Nor can it be presumed that sexual arousal would generate a different character of behaviour, depending on the social strata of the audience.”

संदर्भ - 'हिंदू' - Maharashtra ban on dancing in bars ultra vires Constitution: court

ऋता Fri, 19/07/2013 - 20:12

In reply to by चिंतातुर जंतू

थोडी भरकटली चर्चा...पण प्रस्ताव वाचला तर तो फक्त या बातमीबद्द्ल नव्हता, त्यासंदर्भात असला तरी.

उद्धृत केलेला कोर्टाचा युक्तिवाद पुढे येइल हे सरकारच्या वतीनी असलेल्या वकीलांना माहित नव्हतं का?तसा बेसिक मुद्दा दिसतोय जो वकिलांनी आधीच ओळखायला हवा होता. आणि माहित असून मुद्दाम कमकूवत केस(किंवा जे अधिकृत रित्या म्हणतात ते) पुढे नेणं हे एक कारस्थान वाटत आहे.

आता पुढे सरकार तर्फे काय केलं जाण्याची शक्यता आहे? या निर्णयाला न जुमानता बंदी कायम ठेवली जाईल असं वाचनात आलं. असं शक्य आहे का?
आणि ३* आणि वरच्या दर्जाच्या डान्स बारवर बंदी कधीच नव्हती हे यातून पुढे आलं. बंदी कायम ठेवणार तर आता सगळ्यांवर घालणार की असमानता तशीच ठेवणार?

कविता महाजन Fri, 19/07/2013 - 21:51

In reply to by चिंतातुर जंतू

होय. भरकटलोत हे खरे.
आरं आरं पाटलांचा हा नेहमीचा घोळ आहे. कायदे अस्तित्वात नसताना ते घाईने घोषणा करून टाकतात. ज्या काळात ही घोषणा झाली, तेव्हा प्रसिद्धीचा सोस त्यांच्यात अमाप वाढला होता. शेतकर्‍यांबाबतही त्यांनी हेच केले. 'सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढा' ही त्यांची चमकदार घोषणा सरकारवर आंधळा विश्वास ठेवणार्‍या अनेक शेतकर्‍यांना नडली आणि गेली काही वर्षे ते कोर्टाच्या खेपा घालताहेत आणि इतर अनेक अडचणींना सामोरे जाताहेत.
बारबालांच्या प्रश्नात नैतिकतेचा मुद्दा आणल्याने ते तात्पुरते हिरो बनले, पण मग पितळ उघडे पडलेच.

अवांतर : सगळ्याच हकिकती व सगळे तपशील कुणाच्याही नावानिशी अशा जागी सांगता येत नाहीत; म्हणून तर कथा-कादंबर्‍या लिहाव्या लागतात.
वास्तव जणू फक्त काल्पनिकात शिल्लक राहिलंय. :-(.

अप्पा जोगळेकर Sat, 20/07/2013 - 20:22

लेडिज बारमधल्या मुलींचे हावभाव इतके कॄत्रिम असतात की त्यामुळे उद्दीपीत होणार्‍या पुरुषांचे आश्चर्य वाटते.

राजेश घासकडवी Sun, 21/07/2013 - 00:54

या जगाच्या भीषणतेचा अंदाज नाही असे मानले तरी शिकलेल्या माणसांची इतकी असंवेदनशीलता मी तरी सहन करू शकत नाही. थांबते.

सद्य परिस्थितीत भीषण गोष्टी होतात याबद्दल कोणाचंच दुमत मला तरी इथे दिसत नाही. या प्रश्नावर उपाय काय या विषयाकडे अपरिहार्यपणे चर्चा वळणारच होती, तशी ती वळली. त्याचा उहापोह करताना काही वेगळे विचार मांडले गेले. ते उपाय परिणामकारक असतील वा नसतील. मात्र ते मांडणारांवर असंवेदनाशीलतेचा आरोप करणं मला तरी अन्याय्य वाटतं.

फील्ड वर्क आणि टेबल वर्कचा मुद्दा सनातन आहे. मी स्वतः एक्स्परिमेंटल क्षेत्रातला असल्यामुळे प्रत्यक्ष निरीक्षणांतून सत्य दिसतं यावर विश्वास आहेच. एके काळी 'ब्लडी थिअरिस्ट' म्हणून काहींना कृतक हिणवलं देखील आहे. आता थोडा अनुभव आल्याने टेबल वर्कसाठी फील्ड वर्क अत्यावश्यक असतं यावर तितका विश्वास राहिलेला नाही. आइन्स्टाइनने जे केलं ते पूर्णपणे टेबलवर्क होतं. 'अर्थंशब्दानुधावंते'प्रमाणे त्याच्या थियरीजमुळे सत्याच्या जाणीवेतच आमूलाग्र बदल झाला. अनेक वेगवेगळ्या उपयुक्त फील्ड्सची दारं वर्कसाठी खुली झाली. तेव्हा अनुभव तेवढा खरा, तो नसेल तर बाकी सब झूट या टोकाला मी जाऊ शकत नाही.

आइन्स्टाइन वगैरे बाजूला ठेवू. एक साधं उदाहरण देतो. अग्निशामक दलातल्या लोकांना अनेक वेळा आगीमुळे भाजून जखमा होत, अजूनही होतात. यावर उपाय म्हणून त्यांना संरक्षक कपडे तयार करायचे आहेत. जो इंजिनियर हे कपडे तयार करणार, त्याला फील्ड अनुभव नक्की किती हवा? त्याने अशा जखमा झालेल्या दुर्दैवी व्यक्तींना प्रत्यक्ष भेटलेलं असण्याची आवश्यकता आहे का? त्याला मुख्यतः आग, कपड्याच्या मटेरियलची क्षमता, किती उष्णता आत गेली तर जखमा होतात, कपड्यांचं जास्तीत जास्त वजन किती असावं अशा गोष्टी माहित असाव्या लागतात. अशी अनेक उदाहरणं देता येतील जिथे फील्ड वर्क (प्रश्न जाणून घेणं) आणि टेबल वर्क (उत्तरं शोधून काढणं) या प्रक्रिया एकमेकांपासून पुरेशा विलग आहेत.

याचा अर्थ संरक्षक कपडे तयार करणाऱ्या इंजिनियरला संवेदनाशीलता नाही असा होत नाही. प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो इतकंच. किंबहुना या विलगतेमुळेच येणारे उपाय परिणामकारक असतात. अग्निशामक दलातल्या अनेक लोकांचे प्राण आधुनिक कपड्यांमुळे वाचलेले आहेत.

बॅटमॅन Sun, 21/07/2013 - 01:55

In reply to by राजेश घासकडवी

फील्डवर्क अन टेबलवर्क यांचा परस्परसंबंध ज्ञानशाखेप्रमाणे बदलतो हे मान्य. पण प्रस्तुत विषयात टेबलवर्कपेक्षा फील्डवर्क कधीही जास्त क्रेडिटेबल आहे.

राजेश घासकडवी Sun, 21/07/2013 - 03:31

In reply to by बॅटमॅन

प्रत्यक्ष त्या वास्तवात जगण्यामुळे प्रश्नांची असणारी जाणीव आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढण्याची व राबवण्याची क्षमता हे दोन वेगवेगळी स्किलसेट्स आहेत. दोन्ही एकमेकांना पूरक आहेत.

दुसरं एक उदाहरण देतो. डकवर्थ लुइस पद्धत येण्याआधी पाऊस पडून खेळ थांबला आणि ओव्हर कमी झाल्या तर किती रन कराव्या लागतील याचे काही निश्चित नियम नव्हते. त्यावेळी सरळ सरासरी रनसंख्या वापरायचे. त्यामुळे कमी ओव्हर्स शिल्लक राहिल्या की टारगेट खूप सोपं व्हायचं. ३ विकेट बाकी असताना २५ ओव्हरमध्ये १०० रन करणं कठीण. पण पावसानंतर ५ ओव्हरमध्ये २० रन करणं खूपच सोपं. ते बरोबर न वाटल्यामुळे सर्वाधिक रनसंख्या असलेल्या ओव्हर्स वापरण्याचं ठरवलं गेलं. हा नियम काही सीनियर क्रिकेटर मंडळींनी तयार केला होता - रिची बेनॉ हे नाव लक्षात आहे. १९९२ सालच्या वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये २ ओव्हर १ बॉलमध्ये २२ रन आवश्यक होत्या. पाऊस पडल्यामुळे दोन ओव्हर्स गेल्या. मात्र त्या नियमाप्रमाणे उरलेल्या १ बॉलमध्ये २१ रन करण्याचं नवीन टारगेट मिळालं!

डकवर्थ आणि लुइस या दोघांनी प्रत्यक्ष किती क्रिकेट खेळलं आहे हे बिलकुल महत्त्वाचं नाही. त्यांनी जी गणिती/सांख्यिकी थिअरी मांडली त्या आधारे त्यांची पद्धत तयार झाली. हे संपूर्ण टेबलवर्क होतं, त्यासाठी त्यांना केवळ आकडेवारीची गरज पडली. पण जेनु काम तेनु थाय या उक्तीप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर गणिती/सांख्यिकी पद्धतीनेच सोडवणं भाग होतं. क्रिकेटच्या अनुभवावरून हे उत्तर सापडणं अशक्य होतं.

फील्डवर्क अन टेबलवर्क यांचा परस्परसंबंध ज्ञानशाखेप्रमाणे बदलतो हे मान्य. पण प्रस्तुत विषयात टेबलवर्कपेक्षा फील्डवर्क कधीही जास्त क्रेडिटेबल आहे.

हे म्हणण्याला नेमका काय आधार आहे? अनेक समाजशास्त्रीय प्रश्नांची उत्तरं टेबलवर्कमधून सुचलेली आहेत. मार्क्स स्वतः कामगार किंवा शेतकरी होता का? स्त्रियांच्या लैंगिक मुक्तीचा पाठपुरावा करणारे र. धों. कर्वे स्वतः स्त्री होते का? त्यांनीच लोकसंख्येवर मर्यादा घालण्यासाठी साधनांचा आणि विचारांचा पुरस्कार केला - त्यांना तर मुलंही नव्हती.

प्रत्यक्ष ते वास्तव जगलेली आणि त्यानंतर प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी लागणारं टेबलवर्कही करणारी बाबासाहेब आंबेडकरासारखी माणसं विरळाच.

सांगायचा मुद्दा इतकाच की चर्चांकडे पहाण्याचा दृष्टिकोन हा ब्रेनस्टॉर्मिंग सेशनप्रमाणे असायला हवा. दुसऱ्याचं चूक किंवा माझं बरोबर हे सिद्ध करण्यापेक्षा कोणाला काय वाटतं हे पाहून आपलाच या प्रश्नाकडे पहाण्याचा दृष्टिकोन विकसित होतो का हे पहावं.

अनामिक Sun, 21/07/2013 - 09:49

In reply to by राजेश घासकडवी

ह्या दोन उदाहरनातील फिल्डवर्कमधे फरक आहे असे वाटते. जसे डकवर्थ-लुईस ह्यांना प्रत्यक्ष क्रिकेट खेळण्याची गरज नाही तसे लेखिकेला प्रत्यक्ष वेश्याव्यवसाय करण्याची गरज नाहीच. पण डकवर्थ-लुईस ह्यांना जो सांख्यिकी विदा उपलब्ध होता तसा विदा आणि इतर माहिती लेखिका/त्यांचा ग्रुप फिल्डमधे जाऊन गोळा करत असाव्यात असे वाटते. लेखिकेने उपलब्ध असलेली माहिती किती वरवरची आणि फोल आहे हे एका ठिकाणी सांगितले आहेच.

बॅटमॅन Sun, 21/07/2013 - 11:36

In reply to by राजेश घासकडवी

हे म्हणण्याला नेमका काय आधार आहे? अनेक समाजशास्त्रीय प्रश्नांची उत्तरं टेबलवर्कमधून सुचलेली आहेत. मार्क्स स्वतः कामगार किंवा शेतकरी होता का? स्त्रियांच्या लैंगिक मुक्तीचा पाठपुरावा करणारे र. धों. कर्वे स्वतः स्त्री होते का? त्यांनीच लोकसंख्येवर मर्यादा घालण्यासाठी साधनांचा आणि विचारांचा पुरस्कार केला - त्यांना तर मुलंही नव्हती.
प्रत्यक्ष ते वास्तव जगलेली आणि त्यानंतर प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी लागणारं टेबलवर्कही करणारी बाबासाहेब आंबेडकरासारखी माणसं विरळाच.
सांगायचा मुद्दा इतकाच की चर्चांकडे पहाण्याचा दृष्टिकोन हा ब्रेनस्टॉर्मिंग सेशनप्रमाणे असायला हवा. दुसऱ्याचं चूक किंवा माझं बरोबर हे सिद्ध करण्यापेक्षा कोणाला काय वाटतं हे पाहून आपलाच या प्रश्नाकडे पहाण्याचा दृष्टिकोन विकसित होतो का हे पहावं.

सहमत-असहमत दोन्हीही. असहमत असलेल्या मुद्द्यांबद्दलच तूर्तास बोलतो. स्त्रियांसाठी काम करण्यासाठी स्त्री असण्याची गरज नसली तरी प्रत्यक्ष फील्डवर्क करून स्त्रियांना भेटून काय ते समजावून घेतलं पाहिजे, नैतर त्याला अर्थ नाही. कर्व्यांनी आसपासचं वास्तव पाहिलं आणि एका सिद्धांताचा त्या परिप्रेक्ष्यात पुरस्कार केला. मार्क्सचीही तीच कथा आहे.

थिअरी मांडण्याला विरोध असण्याचे वट्ट काही कारण नाही. ते मांडणार्‍याने काहीएक फील्डवर्क केले असेल तर त्याची क्रेडिबिलिटी वाढते. सामाजिक शास्त्रे हा विषयच मुळात समाजाशी निगडित आहे तस्मात चार लोकांना भेटून बोलून थोडीतरी माहिती, फीडब्याक इ. घेतल्याशिवाय नुस्ते तर्क लढवून कसं चालेल? गणितादि शास्त्रांचे स्वरूप वेगळे आहे. सामाजिक शास्त्रांमध्ये, तुम्ही पुरुष/स्त्री/तृतीयपंथी कोणीही असाल तरी योग्य ते फील्डवर्क केल्याशिवाय तुमच्या थिअरीला किंमत नसते. फील्डवर्कचा आग्रह धरणे म्हंजे प्रत्येक गायनॅकॉलॉजिस्टने प्रेग्नंट राहिलेच पाहिजे असे म्हणणे नव्हे.

इथे चूक अन बरोबर सिद्ध करण्याचा सवाल नाहीच-जे तर्कशुद्ध वाटत नाही त्याबद्दलचा आहे. डकवर्थ-लुईस नियम बनवणार्‍यांना विश्वासार्ह सांख्यिकी विदा उपलब्ध होता सबब सिद्धांत मांडणे एकवेळ समजू शकतो. इथे ते उदाहरण त्यामुळे लागू पडत नाही हे अनामिक यांनी सांगितलेलं आहेच.

राजेश घासकडवी Sun, 21/07/2013 - 17:08

In reply to by बॅटमॅन

सामाजिक शास्त्रं आणि विज्ञानाच्या इतर शाखांमध्ये तत्त्वतः फरक नाही. विदा गोळा करणे, आणि गोळा केलेल्या विद्यावरून थिअरी मांडणे, ती थिअरी वापरून सुयोग्य यंत्रणा निर्माण करणं हे टप्पे सगळीकडेच समान आहेत. पहिलं करणारा ऑब्झर्व्हर/एक्स्परिमेंटॅलिस्ट, दुसरं करणारा थिअरिस्ट आणि तिसरं करणारा इंजिनियर/तंत्रज्ञ. या तिघांचीही स्किलसेट्स वेगवेगळी असतात, इतकाच मुद्दा आहे.

रधोंना जे वास्तव दिसलं ते शतकानुशतकं चालत असलेलं उघड वास्तव होतं. ते दिसण्यासाठी त्यांना सर्वसाधारण ज्ञान असणं पुरेसं होतं. 'स्त्रीची लैंगिक मुक्ती व्हायला हवी' व त्यासाठी पूरक म्हणून 'गर्भप्रतिबंधक साधनं सर्वत्र उपलब्ध व्हावीत' ही मांडणी करण्यासाठी स्वतंत्र विदा मिळवण्याची गरज नव्हती. 'वेश्याव्यवसायाला असलेला अनैतिकतेचा धब्बा नष्ट व्हावा' ही मांडणीही त्याच स्वरूपाची, जनरल आहे.

असो. मुळात हा युक्तिवाद सुरू झाला तो बचावात्मक होता - अनुभव न घेता थिअरी मांडणारांना लेखिकेने 'असंवेदनाशील' म्हटलं, ते तसे नाहीत हे सांगण्याचा प्रयत्न होता.

बॅटमॅन Sun, 21/07/2013 - 19:06

In reply to by राजेश घासकडवी

स्किलसेट्स वेगळी असतातच, नो डौट. पण या केसमध्ये मुळात वेश्याव्यवसायातले शोषण हे निव्वळ तो धंदा अनैतिक/बेकायदेशीर असल्यामुळे होते असे काहीसे गृहीतक जाणवते आहे. याची पडताळणी करण्यासाठी विदा हवाच.

लेखिकेचे या केसमध्ये विदा न घेता थिअरी मांडणार्‍यांना असंवेदनाशील म्हणणे नक्कीच समजू शकतो. एखाददुसरे विशेषण कमी-जास्ती झाले तर त्याने काही खास फरक पडेल असे नाही- कार्यकर्ते लोक इन जण्रल त्यांच्या कामाबद्दल जास्त संवेदनाशील असतात हे तर जाहीरच आहे-पण त्यासाठी "आर्मचेअर सोशियॉलॉजी" चे अस्थानी समर्थन खटकले.
असो. इतकाच मुद्दा होता.

सन्जोप राव Mon, 22/07/2013 - 04:25

In reply to by बॅटमॅन

एखाददुसरे विशेषण कमी-जास्ती झाले तर त्याने काही खास फरक पडेल असे नाही-
भलतेच! शब्द हे शस्त्र आहे, ज्पून वापरा वगैरे. एका अक्षराने, एका कानामात्रेनेही फरक पडतो. वपु म्हणतात 'मानवता चे मानवत होते'... मी म्हणतो (आणि या चर्चेच्या संदर्भात तर हे अधिकच बोलके आहे) 'सगे सोयरे चे 'गे सोयरे' होते!
After retiring, you me and the kids would take the world tour.
After retiring you, me and the kids would take the world tour.
A woman, without her man, is nothing.
A woman. Without her, man is nothing.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 22/07/2013 - 06:00

In reply to by बॅटमॅन

नक्की किती विदा जमवावा म्हणजे सर्वसमावेशक चित्र बघता येईल? फक्त विदा जमवला म्हणजेच सर्वसमावेशक चित्र दिसण्याइतपत दृष्टीकोन तयार होतो का? स्वतः जाऊन विदा जमवला तरच त्याला काही महत्त्व असं काही आहे का? का चार वेगवेगळ्या देशांतल्या, वेगवेगळा दृष्टीकोन, चित्र मांडणार्‍या लोकांची पुस्तकं वाचली तरीही परिस्थितीची योग्य कल्पना येते.

(फक्त) विदा जमवणे म्हणजेच निष्कर्ष योग्य येणं असं गृहितक असेल तर शास्त्रज्ञांच्या जागी गायगर काऊंटर्स, हबल स्पेस टेलिस्कोप आणि अलिकडच्या काळात हार्ड ड्राईव्ह्जना पुरस्कार मिळायला हवेत. प्रत्यक्षात मात्र माणसांनाच मिळतात.

अनामिक Mon, 22/07/2013 - 09:14

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कितीही विदा गोळा केला तरी शेवटी ते एक सँपलच ठरावे, त्या विदामुळे सर्वसमावेशक चित्र दिसण्याइतपत दृष्टीकोन तयार होईलच असे नाही. आणि स्वतः जाऊन विदा जमवला तरच त्याला काही महत्त्व असंही काही नसावं. पण चार वेगवेगळ्या देशांतल्या, वेगवेगळा दृष्टीकोन, चित्र मांडणार्‍या लोकांची पुस्तकं वाचली तरीही परिस्थितीची जशी योग्य कल्पना येते, त्या परिस्थितीशी आपल्याला सिंपथाईज करता येतं, तसं लेखिकेने केलेल्या फिल्डवर्कमुळे त्या परिस्थितीशी तिला एम्पथाईज होता येत असाव. पर्यायाने ह्या व्यवसायात फिल्डवर्क करणार्‍यांना फक्तं टेबलवर्क करणारे असंवेदनशील वाटू शकत असतील. फरक सिम्पथाईज वि. एम्पथाईज चा आहे. ह्या फिलींग्ज कुणासाठी 'तत्वतः' सारख्याच असू शकतात तर कुणासाठी नाही.

बॅटमॅन Mon, 22/07/2013 - 11:32

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या प्रतिपादनातले मुद्दे औट ऑफ संदर्भ घेतल्यावर असे वाटणे साहजिक आहे. फक्त पुस्तके वाचून जी कल्पना येईल ती स्वतः विदा गोळा केल्यावर येणार्‍या कल्पनेपेक्षा धूसरच असेल. कितीतरी मधल्या पायर्‍या, कितीतरी अलिखित गोष्टी या स्वतः त्यात पडल्यावरच समजतात. इथे विदा मिळवण्याचा आग्रह धरलाय म्हणजे थिअरीला महत्वच नाही असा ग्रह का करून घेतला जातोय देव जाणे. थिअरी मांडा, पण त्यासाठी पुष्टिकारक विदा पाहिजे-नैतर काही कामाची नस्ते थिअरी. ऐन्स्टैनला प्रतिष्ठाही फ्रुंडलिच बरोबरच्या शास्त्रज्ञ दलाने आफ्रिकेतून सूर्यग्रहणाची कॅल्क्युलेशन्स करून पाहिल्यावरच मिळाली. नैतर नुस्ती थिअरी काय कामाची होती-अपार्ट फ्रॉम अ‍ॅन एलेगंट कन्स्ट्रक्शन?

इथेही तोच न्याय. थिअरीमागे काही विदा, काही प्रत्यक्ष फील्डवर्क नसेल आणि ज्या क्षेत्रात थिअरी मांडताय ते क्षेत्रच मुळी माणसांच्या आपसात इंटरअ‍ॅक्शनशी निगडित असेल तर ती थिअरी काय कामाची??

अ‍ॅज़ फॉर किती विदा जमवला तर सर्वसमावेशक चित्र होईल? सँपलिंग थिअरी आणि आपले वेळ व पैशाचे बजेट यांनी ते ठरविता येईल. पण असे करण्याला ऑप्शन नाही हे ध्यानात असू द्यावे. त्याचा खयाल सुटला तर आर्मचेअर सोशिऑलॉजीचे आयव्हरी टॉवर समर्थन केले जाते- व्हिच इज ऑफ कोर्स ल्यूडिक्रस.