Skip to main content

[अनुवाद] भारताचे प्रश्न सोडवणे: वानर पद्धत

3 minutes

सदर स्फूट द हिंदू या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेला श्री साजन राजगोपाल यांनी लिहिलेले आहे. मूळ लेखन इथे वाचता येईल. सदर लेखनाचे भाषांतर करून केवळ चर्चेकरता ऐसी अक्षरेवर प्रकाशित करण्याची परवानगी लेखकाकडून घेतलेली आहे. आवश्यकता भासल्यास ती ऐसी अक्षरेच्या संचालकांकडे सुपूर्त/सादर करता येईल.
======

भारताचे प्रश्न सोडवणे: वानर पद्धत
मूळ लेखक: श्री साजन राजगोपाल (ब्लॉगः http://sajanrajagopal.wordpress.com/)

आपण भारतीय ज्या तर्‍हेने प्रश्न सोडवतो ते मला खूप आवडते. मग ते हालत्या खुर्चीखाली मुडपून टाकलेल्या पेपरसारखे सोपी गोष्ट असो किंवा आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी किरकोळ विक्रीक्षेत्रात परकीय गुंतवणूक करणे असो, भारतीयांना वरवरची आणि तात्पुरती उत्तरे शोधणे आवडते, ज्याने खरंतर मूळ प्रश्न अधिकच जटिल होतो.

आपण या देशात आपल्यासमोरील प्रश्न कसे सोडवतो याचे एक अभिजात उदाहरण म्हणजे दिल्लीतील लंगूर वानरे आणि माकडांची केस. सामान्यतः दिसणार्‍या माकडांचा प्रश्न सोडवण्यासाठी दिल्ली महानगरपालिकेने हल्ली काही लंगूर-वानरांना कामावर नेमले. एरवी माणसांना न घाबरणारी सामान्य माकडे, या वानरांना बघताच अतिशय घाबरतात. जेव्हा एखाद्या भागात माकडांनी धुमाकूळ घातला आहे अशी तक्रार (महापालिकेकडे) येते, तिथे वानर आणि त्याच्या मालकाला घटनास्थळी पाठवले जाते. तेथील माकडे या वानराला बघतात भितीने आतंकीत होतात आणि त्या भागातून पळ काढतात. मिशन अकंप्लिश्ड - प्रश्न सुटला! ते वानर आणि त्याचा मालक आनंदाने आपली फी घेतात आणि त्यांचा दिवस संपतो.

थांबा, पण ती माकडे प्रत्यक्षात जातात कुठे? हा प्रश्न भारतात कोणी विचारत नाही किंवा उत्तर द्यायच्या भानगडीत पडत नाही. खरंतर सत्य असंय की ही माकडं फक्त एका भागातून दुसर्‍या भागात पळून जातात. दोनेक दिवसांत, त्याच किंवा वेगळ्या वानराला जिथे ते पळालेले असतील त्या नव्या भागात विध्वंस करणार्‍या त्याच माकडांना हाकलायसाठी बोलावले जाते. तेव्हा सध्याची परिस्थिती अशी आहे की, एका भागातून दुसर्‍या भागात पळणार्‍या या माकडांच्या मागे दररोज लागावे लागते. आपली सध्याची सिस्टिम, कोणताही कायमचा उपाय न शोधता, फक्त या विध्वंसाचा भार आपल्या नागरिकांत समसमान वाटण्याचा प्रयत्न करते!

भारतात अशी बरीच माकडं आहेत - काही नावं घ्यायचीच तर जातिभेद, गरिबी आणि निरक्षरता. आणि या माकडांना एका झाडावरून दुसर्‍यावर फिरवत, उदासीनता आणि दुर्लक्षाच्या पडद्याआड दडवून समाजापासून लपवून ठेवले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजपर्यंत, या प्रश्नांना नष्ट करायला ना कोणती ठोस उपाययोजना केली आहे, ना एकत्रितपणे काही कार्यवाही केली आहे. याऐवजी, आपण ही माकडे आपल्या दरवाज्यात येणार नाहीत ना याची खात्री करत, आपण आपले आयुष्य त्यांना चुकवत स्वार्थीपणे घालवतो.

पण माकडं कधीच जात नाहीत. ती नेहमी आजूबाजूला असतात. आणि एक दिवस असा येईल जेव्हा ती आपल्या दारापाशी येतील. आणि मग एकीकडे आपल्या सरकारला आणि समाजाला आपल्या प्रश्नांबद्दल दूषणे देत, आपणच तयार केलेल्या अकार्यक्षम प्रणाली आणि सेवारूपी वानरांचा शोध घेत पळत राहावे लागेल.

परंतू असे बाहेर जाऊन सगळ्यांना दूषणे देण्याआधी, काही वेळ द्या आणि आपणच आपल्या रोजच्या जगण्यातून इतरांच्या दारात तयार करत असलेल्या या माकडांकडे बघा: "नो पार्किंग झोन" मध्येच पार्क केलेली बाइक, आपल्या कारमधून बाहेर फेकलेली प्लॅस्टिक पिशवी, वाहन चालवताना उचललेला मोबाईल फोन, पोलिसाला दिलेली चिरीमिरी.

अश्या स्वतःच तयार केलेल्या माकडांची यादी न संपणारी आहे. आता वेळ आली आहे ती अश्या माकडांच्या निर्मितीला थांबवायची आणि जी माकडे आहेत त्यांचा कायमचा बंदोबस्त करायची. दिल्लीच्या वानरांसारख्या प्रणालीवर आणि उपायांवर अवलंबून राहायची मानसिकता हे प्रश्न कधीच मिटवू शकणार नाही. भारत अश्या त्रास देणार्‍या माकडांमुळे मागे राहिला आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक श्रेष्ठ आहे. आपल्याला फक्त गरज आहे ती वानरांचा उपाय म्हणून वापर करणारी सवय बदलण्याची!

Node read time
3 minutes

ॲमी Thu, 16/05/2013 - 14:30

चांगला झालाय अनुवाद.
"भारत अश्या त्रास देणार्या माकडांमुळे मागे राहिला आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक श्रेष्ठ आहे." याबद्दल थोडी शंका आहे बरं का :-P

मन Thu, 16/05/2013 - 15:20

(शेवटून दुसरा परिच्छेद सोडून)लेख आवडला. नेमका आहे.
निदर्शनास आणून दिल्याबद्दल आभार ऋषि.
बाकी....
http://www.aisiakshare.com/node/1657

गवि Thu, 16/05/2013 - 15:31

अप्रतिम लेख..समाजातल्या ज्या तुलनेत संपन्न वर्गाला सहज भ्या घालता येतं आणि ज्यांच्या कमाईला थेट हात घालून सोर्सलाच कर कापता येतो त्यांच्याकडचा पैसा कापून दुसरीकडे अनुत्पादक कामे रोजगार म्हणून काढून पगार दिला जातो. कोट्यवधी रुपये पगार. बेकारी कमी केल्याचा भास.

पण तो रोजगार कोणतीच नवीन क्रयशक्ती निर्माण करत नाही. फक्त असलेली क्रयशक्ती विभागून दाखवतो.

हेही एक वानरच.

राजेश घासकडवी Thu, 16/05/2013 - 16:14

"नो पार्किंग झोन" मध्येच पार्क केलेली बाइक, आपल्या कारमधून बाहेर फेकलेली प्लॅस्टिक पिशवी, वाहन चालवताना उचललेला मोबाईल फोन, पोलिसाला दिलेली चिरीमिरी.

ही माकडांची उदाहरणं पटतात. एका गमतीदार उदाहरणातून आपला मुद्दा मांडण्याची पद्धतही आवडली. मात्र माकडांबाबत जे करतो तेच वाघसिंहांबाबत करतो असं म्हणणं अन्यायकारक ठरेल

भारतात अशी बरीच माकडं आहेत - काही नावं घ्यायचीच तर जातिभेद, गरिबी आणि निरक्षरता.

ही माकडं नाहीत, हे वाघसिंह आहेत. त्यांना हाकलून लावण्यासाठी स्वातंत्र्यापासून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत. आणि त्यांचं क्षेत्र कमी कमी करण्यात यशही आलेलं आहे. आरक्षणातून शिक्षण व नोकऱ्या देऊन जातीभेदांची दात नखं काढलेली आहेत. आता जातीव्यवस्था जळलेल्या सुंभाच्या पिळासारख्या राहिलेली आहे. निरक्षरता ८०% वरून १५% पर्यंत खाली आलेली आहे. गरिबी संपलेली नाही, पण त्यातून येणारे भूकबळी, रोगराई, अशिक्षितता घटलेली आहे.

मन Fri, 17/05/2013 - 10:20

In reply to by राजेश घासकडवी

गरिबी संपलेली नाही, पण त्यातून येणारे भूकबळी, रोगराई, अशिक्षितता घटलेली आहे.

ह्याबद्दल एक सरकारी का आंतरराष्ट्रिय संस्थेचा अहवाल वाचला होता. त्यात बरच काही होतं सविस्तर विश्लेषण वगैरे. पण त्याचा सारांशच सांगायचा झाला दोन वाक्यात तर तो असा होता:-
भारतात hunger/भूकबळी ही समस्या फारच थोड्या प्रमाणात आहे. malnutrition/कुपोषण ही मात्र समस्या आहे.
अन्न मिळतच नाही आणि भुकेने टाचा घासून लोक मेले असं आता होत नाही. पण ज्यांची पोटे भरलेली आहेत, तेही सुपोषित आहेतच असे नाही. कित्येक पोषक पदार्थ त्यांना पुरेसे मिळत नाहित.(लोह्,प्रोटिन्स, विटॅमिन्स वगैरे.अन्नात कर्बोदकांचाच भरणा अधिक, त्यामुळे जीव तर तगतो पण जीवनमान अजून उंचावलेले नाही. म्हणजे प्रगती नक्कीच आहे, पण अंतिम्/निर्णायकयश अजून मिळालं नाही. लोकसंख्या वाढीच वेग जर थोडासा कमी व sustainable(मंद पण सतत होत राहणारी लोकसंख्यावाढ, २.१ पेक्षा किंचित जास्त दर) असला असता तर आता पर्यंत तीही समस्या सुटली असती.)
असो.

............सा… Thu, 16/05/2013 - 19:20

अनुवाद छानच आहे. विचार करण्यास उद्युक्त करणारे गंभीर प्रश्न रुपकातून मांडले आहेत.

पुढील अनुवाद सहज कळून येतो आहे - "मग ते हालत्या खुर्चीखाली मुडपून टाकलेल्या पेपरसारखे सोपी गोष्ट असो = स्वीप अंडर द कार्पेट" असे म्हणणार होते तितक्यात त्या लेखावरुन नजर फिरवली. त्यातही ते खुर्चीचेच उदाहरण आहे.