ब्राह्मण्यमापक, विद्रोहमापक, दालित्यमापक, माराठ्यमापक वगैरे
'आमचा ब्राह्मणांना विरोध नाही तर ब्राह्मण्याला विरोध आहे' हे आपल्याला अनेक ठिकाणी ऐकायला, वाचायला मिळतं. माणूस वेगळा आणि दुर्गुण वेगळे हे तत्व आम्हांस फारच आवडलं. माणूस हा सगुण, साकार, सवर्ण असतो, तर त्याचे दुर्गुण हे निर्गुण, निराकार, आणि वर्णहीन असतात. आपल्या परमपूज्य हिंदू संस्कृतीत शरीर हे आत्म्याच्या वस्त्राप्रमाणे मानलेलं आहे. शरीर नाशवंत - आत्मा अविनाशी. शरीर दृश्य तर आत्मा अदृश्य. 'नैनं छिंदन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः' असं आत्म्याबद्दल प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णानेच म्हणून ठेवलेलं आहे. आत्मा अमर आहे. एका शरीरातून दुसऱ्या शरीरात त्याचा अनादी अनंत काल प्रवास चालू असतो. मोक्ष मिळेपर्यंत. तेव्हा व्यक्ती निमित्तमात्र आहे, परमात्म्याचं जे काही कर्मसंचयाचं देणं घेणं आहे ते आत्म्याशी. तसंही सर्व आत्मे हे एकाच परमात्म्याची वेगवेगळी रूपं असतात. त्यामुळे वेगवेगळ्या आत्म्यांमध्ये दिसणारे गुणदोष हे त्याच अंतिम परमात्म्याच्या गुणांचे पैलू असतात. हे गुणही निर्गुण निराकार - आत्माही निर्गुण निराकार. तेव्हा ते त्या व्यक्तीशी संलग्न नसून त्या शरीरातल्या आत्म्याचे, पर्यायाने परमात्म्याचेच अंश असतात. तेव्हा एखाद्या ब्राह्मण अशा व्यक्तीवर काम-क्रोध-लोभ-मद-मोह-मत्सर या षड्रिपुंच्या तलवारी शरीरांवर चालवायला गेलं तर आपल्याच आत्म्याला क्लेष होतात. आपण त्या रिपुंच्या जंजाळांत अडकतो. आणि शेवटी ते क्लेष परमात्म्याला पोचतात. त्याऐवजी ब्राह्मण्य या गुणसमुच्चयावरच लक्ष केंद्रित केलं तर त्यात सर्वांचंच भलं आहे.
पण दुर्दैवाची गोष्ट अशी की सवर्ण साकार असलेला ब्राह्मण स्पष्ट दिसतो, मात्र त्याचं ब्राह्मण्य निर्वर्ण निराकार असल्यामुळे दृष्टीला पडत नाही. त्यामुळे ब्राह्मण्याला असलेल्या विरोधाचं अस्त्र अकारण ब्राह्मणांवर पडतं. उदाहरणार्थ जेम्स लेन प्रकरणच घ्या ना. त्याने मारे संशोधन वगैरे करून एक तथाकथित विद्वत्ताप्रचूर पुस्तक लिहिलं. तो आपल्या देशाला परत गेला आणि नासधूस झाली भांडारकर संस्थेची. का, तर तिथल्या लोकांनी त्याला ते वादग्रस्त पुस्तक लिहायला मदत केली. म्हणजे खरं ब्राह्मण्य दाखवलं जेम्स लेनने. पण मार पडला ब्राह्मणांना. नसत्या विषयांमध्ये नाक खुपसून काहीतरी विद्वत्ताप्रचूर लेखन करणं एवढ्यावरच जेम्स लेनने आपलं ब्राह्मण्य सिद्ध केलं होतं. त्यावरून आठवलं, कोणे एके काळी आपल्या पवित्र हिंदूभूमध्ये वर्तनावरून जाती ठरायच्या. त्यानंतर संस्कृतीचा नेहेमी होतो तसाच ऱ्हास झाला आणि जाती जन्माप्रमाणे ठरायला लागल्या असं काही लोकं म्हणतात. आता जेम्स लेन हा काही जन्माने ब्राह्मण नाही. पण कर्माने ब्राह्मणच. किंवा वेगळा विचार करून असंही म्हणता येईल की जेम्स लेन कोणी का असेना, पण त्याचं कर्म हे ब्राह्मण्य. किंवा असंही म्हणता येईल की प्रत्येकच व्यक्तीच्या कर्मांतून वेगवेगळ्या प्रमाणात ब्राह्मण्य, वैश्यत्व, क्षत्रियत्व, आणि शौद्र्य दडलेलं असतं. नक्की कुठची वागणूक तिरस्करणीय हे ठरवता यायला हवं. नाहीतर ब्राह्मण्याचा तोटा विनाकारण कोणा गरीब ब्राह्मणाला त्याच्या ब्राह्मण जन्मापोटी सहन करावा लागेल. आता याला कोणी पोएटिक जस्टिस वगैरे म्हणेलही. पण आमच्या मते जेव्हा लाथाळी होते तेव्हा लाथा योग्य ठिकाणी बसणं अत्यावश्यक आहे.
ही परिस्थिती सुधारायची असेल तर त्यासाठी काहीतरी करणं क्रमप्राप्त आहे. ब्राह्मण्य नक्की ओळखायचं कसं? तर त्यासाठी एक उपाय आम्ही केलेला आहे. वैज्ञानिकांच्या मदतीने आम्ही ब्राह्मण्यमापक तयार केलेला आहे. सनातन डॉट ऑर्ग या वेबसाइटमधून त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळाली, तेव्हा त्यांचं ऋण मान्य करायलाच हवं. त्या साइटवर अनेक शुभ-अशुभ वस्तू, वर्तणुकी, कपडे यांमधून काळ्या शक्तींचे किरण किंवा पवित्र किरण कसे बाहेर पडतात याचं यथासांग सचित्र वर्णन आहे. त्यांनी केलेल्या आध्यात्मिक संशोधनातून रांगोळ्यांमुळे आणि गुढ्यांमुळे कुठले किरण आकर्षित होतात हेही अतिशय बारकाव्यांनी लिहिलेलं आहे. आत्तापर्यंत हे पहाण्यासाठी केवळ त्यांनी काढलेल्या चित्रांचा उपयोग करता यायचा. आमच्या शास्त्रज्ञांनी याच प्रकारचे किरण मोजण्यासाठी यंत्र तयार केलेलं आहे. कुठचीही वागणूक, लेखन, उक्ती, आचार यांमध्ये या किरणांचे स्रोत ठासून भरलेले असतात. ते मोजल्यावर आम्हाला कुठच्या कृतीत ब्राह्मण्य आहे आणि कुठे नुसताच आव आणला आहे हे अचूकपणे सांगता येतं.
मनूने आपल्या थोर ग्रंथात ब्राह्मण्याचे हक्क आणि अब्राह्मण्यावर असलेली बंधनं सांगितली. पण त्याने ब्राह्मण्य म्हणजे काय याची व्याख्या केली नाही. ती त्रुटी या ब्राह्मण्यमापकामुळे भरून निघेल अशी आम्हाला आशा वाटते. वर नोंदल्याप्रमाणे, जन्मामुळे जी जात मिळायची ती आता कर्मामुळे मिळायला लागलेली आहे. पुलंनी म्हटलेलंच आहे 'आजकाल काय पट्टेवालेसुद्धा बीए होतात.' एकेकाळी अगदी मोजक्यांना मिळणारं शिक्षण आजकाल सगळ्यांना मिळायला लागलं आहे. संस्कृत जाणणं हे एकेकाळी तेजःपुंज ब्राह्मण्यासाठी आवश्यक होतं. आजकाल कुठल्यातरी स्कूटरच्या जाहिरातीत दाखवलेल्या गावाशिवाय कोणीच संस्कृत बोलत नाही. (याचा अर्थ ती मृत भाषा आहे असं समजू नये) पण हे नवशिक्षित थोडे नवश्रीमंतांसारखे असतात. नुकताच आलेला शिक्षणरूपी पैसा कसा उधळायचा याची जाण नसते त्यांना. 'बाटगे जास्त कर्मठ असतात. ते जास्त जोरात बांग देतात.' या नियमाप्रमाणे नवार्जित ब्राह्मण्य तेच जास्त पाजळतात. त्यामुळे ब्राह्मण्यमापकाची गरज वाढलेलीच आहे.
ब्राह्मण्यमापनाची सुरूवात सुमारे चाळीसेक वर्षांपूर्वी सुरू झाली, जेव्हा लक्ष्मण मानेंनी साडेतीन टक्के हा शब्द वापरला. साडेतीन टक्क्यांची भाषा, साडेतीन टक्क्यांचे विचार इतर साडेशहाण्णव टक्क्यांवर लादले जातात असं काहीसं त्यांनी म्हटलं होतं. नीटसं आठवत नाही, कारण आता ते सगळं फार जुन्या काळचं वाटतं. माने तेव्हा आजकालइतके मानमरातबदार झाले नव्हते. पण ते एक असो. प्रश्न असा येतो साडेतीनच टक्के का? हा आकडा कुठून आला? पेशवाईत असलेल्या साडेतीन शहाण्यांवरून हा आकडा आला असावा अशी आमची वैयक्तिक शंका आहे. त्या साडेतीनांपैकी किती ब्राह्मण होते हेही आता आठवत नाही, पण तेही एक असो. कदाचित सर्व विश्वातलं दिसणारं मॅटर हे केवळ सुमारे चार टक्के आहे, बाकी सर्व काळं मॅटर आणि काळी ऊर्जा आहे असं संहितामॅडम म्हणतात त्याचा इथे काहीतरी संबंध असेल. कोण जाणे. मात्र आत्ता या घडीला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या साडेतीनांचा टक्का वाढून तो साडेबावीस किंवा पावणेसव्वीस झाला असावा अशीही आमची एक दाट वैयक्तिक खात्री आहे. शिक्षणाची दारं सर्वांनाच खुली केल्यावर ब्राह्मण्याचा प्रसार झाला नाही तरच नवल. याला कोणी दुधात पाणी वाढलं म्हणेल तर कोणी म्हणेल की पाण्यात दूध वाढलं. जे काय असेल ते - ब्राह्मण्यमापकामुळे नीर आणि क्षीर वेगवेगळं होण्यासाठी सर्वांनाच मदत होईल.
या ब्राह्मण्यमापकाची क्षेत्र-चाचणी (फील्ड टेस्ट) घेतल्यावर काही गमतीदार निष्कर्ष दिसून आले. आम्ही जेव्हा हा मापक बनवायला घेतला तेव्हा कॅलिब्रेशन करण्यासाठी शंभर वर्षांपूर्वीच्या वर्तणुकी वापरल्या. मग जेव्हा आजकालचे विचार, घटना, वर्तणुकी यांवर त्याची चाचणी घेतली तेव्हा त्याचा काटा हलेचना. आम्हाला प्रथम वाटलं की हे यंत्र मोडलेलं आहे की काय? नंतर जेव्हा खोलात जाऊन तपासणी केली तेव्हा लक्षात आलं की ब्राह्मण्याची ऍब्सोल्यूट पातळी पार खाली आलेली आहे. शंभर वर्षांपूर्वी जे सर्रास चालायचं ते आजकाल जवळपास कुठेच घडताना दिसत नाही. त्यामुळे आजकालच्या घटनांसाठी आम्हाला त्याची स्केल पार बदलावी लागली. म्हणजे आम्ही यंत्र तयार केलं होतं ते डायनोसॉरचं वजन करायला आणि आता जेमतेम बैलांची वजनं करायची पाळी येते आहे. (ब्राह्मण्य इज नो लॉंगर व्हॉट इट युज्ड टू बी.) डायनोसॉर केव्हाच नष्ट झाले. तरीही कुठचा बैल किती वजनाचा हे जाणण्याची तीव्र गरज समाजाला वाटत असल्याने आम्ही नवीन, अधिक सेन्सिटिव्ह काटा तयार केलेला आहे.
ब्राह्मण्यमापक बनवताना आम्ही सुरूवातीला त्याच्या बरोब्बर उलटा सिग्नल दाखवणारा मापकही तयार करत होतो. हा होता विद्रोहमापक. दुर्दैवाने आजकाल समीकरणं ब्राह्मण्य नाहीतर विद्रोह अशी सोपी राहिलेली नाहीत. त्यामुळे आम्हाला थोडं नवीन संशोधन करून दालित्यमापक, विद्रोहमापक आणि माराठ्यमापक अशी अजून दोन यंत्रं तयार करावी लागली. माराठ्यमापनासाठी तो समाज काढत असलेल्या पदरांची खूपच मदत झाली. कुणबीपण मोजण्यासाठी वेगळ्या मापकाची गरज नाही. माराठ्यमापकावर काटा 100 पेक्षा जितका खाली तितके टक्के कुणबीपण. आता कोणी म्हणेल की विद्रोहमापकाची खरोखर गरज आहे का? दालित्यही एके काळी जे होतं तसं आता राहिलेलं नाही. हे खरं आहे. दालित्यमापक किंवा विद्रोहमापक बनवतानादेखील आम्ही चाळीसेक वर्षांपूर्वीच्या घटना, वक्तव्यं कॅलिब्रेशनसाठी वापरली होती. त्या स्केलवर आताचा विद्रोह हा थोडा मवाळच ठरतो. आणि गंमत म्हणजे आता काही काही जन्माने ब्राह्मण आणि मराठा असणाऱ्यांची वागणूकही दालित्यमापकावर बरंच मोठं रीडिंग दाखवते. उदाहरणार्थ मराठा समाजाचा स्वतःला दलितांमध्ये सामावून घेण्यासाठी आणि आरक्षण मिळवण्यासाठी केलेला दावा. आणि इतकी शतकं शिक्षणाचा अधिकार स्वतःकडेच ठेवून दलितांची पायमल्ली करून झाल्यावर आता आरक्षणामुळे आमची पीछेहाट होते अशी ओरड करण्याची ब्राह्मणांची तऱ्हा.
एकेकाळी तीव्र असलेले हे सिग्नल मोजण्यासाठी मापकांची गरज नव्हती. ब्राह्मण्य आणि तदनुषंगिक अरेरावीपणा ताबडतोब दिसून यायचा. दालित्य उघड्या डोळ्यांना दिसायचं. या सगळ्यात बदल झाला तो आरक्षणामुळे. गेल्या साठ पासष्ठ वर्षांत दोनतीन पिढ्या क्रमाक्रमाने अधिक शिकल्या, आणि या सगळ्या जातीजमातीत कर्माधिष्ठित वर्णसंकर झाला. समाज अधिकाधिक होमोजिन्यस का काय म्हणतात तसा झाला. मग तुम्ही म्हणाल की या मापकांची गरज काय? तर त्याचं उत्तर असं आहे, की जेव्हा खरे मूलभूत फरक जवळपास नष्ट होतात, तेव्हाच तर खरी ते बारीकपणे मोजण्याची गरज निर्माण होते. जळलेल्या सुंभांचे पीळ कसे वेगवेगळे आहेत हे शोधणं एकेकाळी त्या सुंभांनी बांधले गेलेल्यांना महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे आजच्या नवजागृत अस्मितांच्या काळात आमच्या विविध मापकांचा खप प्रचंड होईल याची आम्हाला खात्री आहे.
(हे सुंभ जाळणारी मशाल पेटवणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती. त्यानिमित्त हा लेख त्यांना अर्पण.)
(ब्राह्मण्यमापकामागची प्रेरणा)
प्रतिक्रिया
लेख आवडला. प्रेरणा?
इतरत्र असाच एक समांतर लेख काफिरोमीटर या उपकरणावर आलेला आहे असे आठवते. बरोबर का? चूभूद्याघ्या
धन्यवाद
त्याच लेखावरून मला ब्राह्मण्यमापकाची कल्पना सुचली. १४ एप्रिल संपायच्या आत लेख टाकण्याच्या घाईत ते श्रेय द्यायचं राहिलं. आता दुरुस्ती केलेली आहे.
धन्यवाद.
धन्यवाद.
ब्राह्मणी कावा
हा सगळा तुमचा ब्राह्मणी कावा आहे.
नवशिक्षितांना तुम्ही असं हीन लेखता, त्यांची तुलना बाटग्यांशी करता तिथेच तुमचा डाव उघडकीस येतो. त्यांचं ब्राह्मण आल्टर्नेटींग करंटसारखं वर-खाली होत रहातं, पण तुम्ही त्याची आर.एम.एस. किंमत न मोजता फक्त उणे किंमत आहे तीच कशावरून मोजत नाही. तुम्ही तुमच्या प्रयोगाची आणि साधनसामग्रीची पूर्ण माहिती उघड केल्याशिवाय आम्ही तुमचं कोणतही यंत्र बाजारात येऊ देणार नाही.
शिवाय तुम्हाला मराठ्यांबद्दलही नीट माहित नाही असं दिसतंय. तुम्ही १०० पासून खाली मोजता हे साफ चूक आहे. मुळात तिथे चार कमी आहेत हेच तुम्हाला माहित नाही. डाऊन विथ कॅलिब्रेशन, डाऊन विथ ब्राह्मणी कावा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आम्ही तुमचं कोणतही यंत्र
अरे वा, मुखवट्याच्या आड लपून अशा धमक्या देणं यातूनच तुमचे हेतू स्पष्ट होतात.
तुम्हाला माझं म्हणणं कळलेलंच नाही हे उघड आहे. मी कुणाच व्यक्तीला, समाजाला हीन लेखत नाही. वर्तन हीन किंवा उच्च असू शकतं. व्यक्ती नाही. किंबहुना त्याचसाठी या वर्तनमापकांचा शोध लावण्यात आलेला आहे.
तुम्हाला फिजिक्सच काय, एकंदरीतच विज्ञान समजत नाही हे तुमच्या विधानावरून स्पष्ट होतं. ही मोजमापं आहेत ती डार्क मॅटर व डार्क एनर्जीची आणि त्यांतून निघणाऱ्या प्रारणांची आहेत. ती वरखाली होणाऱ्या आल्टरनेटिंग करंटसारखी नसून दोन स्टेटमध्ये असलेल्या वेव्हफंक्शनप्रमाणे असतात. थोडा अभ्यास वाढवा. आणि हो, 'त्यांचं ब्राह्मण' नाही, तर 'त्यांचं ब्राह्मण्य'!
उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. अहो, ९६ ही कुळांची संख्या आहे. त्या कुळातल्या प्रत्येकालाच ० ते १०० टक्क्यापर्यंत काही ना काही माराठ्य असतंच. पदरचं नाही सांगत.
तुम्हाला माझं म्हणणं कळलेलंच
आणि हे यंत्र तुम्ही अशा पद्धतीने कॅलिब्रेट करणार की त्यात नवसाक्षर बाटगे म्हणून त्यांचे विचार हीन दिसणार. तुम्ही यंत्र काय ते बनवा आणि कॅलिब्रेशन आमच्याकडे सोपवा. नाहीतर हा कावाच आहे हे मान्य करा. आम्ही मुखवट्यांमागे लपणारे भ्याड नाही. आम्ही तुमच्या कामातल्या फक्त त्रुटी दाखवत आहोत, त्या निस्तरल्याशिवाय तुम्ही लोकांवर आरोप करणारं यंत्र बाजारात आणू नका.
कोणाला काय समजतं ते येणारा काळच ठरवेल. त्यातून आमच्या शुद्धलेखनावर घसरलात म्हणजे मुद्दे संपले वाटतं.
तुमची मोजमापं आता लगेच क्वांटम स्टेटमधे गेली वाटतं. ब्राह्मण्य हे काही असं सूक्ष्मात नसतं, ते स्थूलातल्या गोष्टींमधूनच दिसतं. तुम्ही त्याला श्रोंडींजरचे नियम लावू पहाल तर त्यातून तुमचाच कावा उघडा पडतो आहे. स्थूलातल्या ब्राह्मण्यासाठी न्यूटनचे नियमच वापरावे लागणार. त्यातून तुमचं उपकरण बरं असल्याचं दिसलं तर सूक्ष्मासाठी मॅक्सवेलचे नियम वापरा. आईनस्टाईननेच सांगितलेलं "God doesn't play dice.". तुम्ही सोयी-सवडीने फासे फिरवू नका.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आणि हे यंत्र तुम्ही अशा
यंत्राच्या तुरी बाजारातही आल्या नाहीत, आणि तुम्ही भटणी मारायला सुरूवात करताहात. या यंत्राचा हेतूच ब्राह्मण कोण आहे यापेक्षा ब्राह्मण्य कशात आहे हे मोजण्याचा आहे. त्यामुळे बाटगा कोण आहे यापेक्षा बांग किती मोठी आहे हे महत्त्वाचं. व्यक्ती आणि प्रवृत्ती यांचं नीरक्षीर करायची सवय लावून घ्या - थोडक्यात तुमचाच दृष्टिकोन नीट कॅलिब्रेट करून घ्या.
या धाकदपटशाला अनेक मापकांवर हाय रीडिंग येतं आहे. त्यामुळे त्याचा निषेध.
कुठचं दोन शतकांपूर्वीचं विश्व-चित्र वापरता आहात तुम्ही! जरा सत्यात या. सत्य हे क्वांटम मेकॅनिकल असतं, न्यूटनीय विश्व हे एक ऍप्रॉक्झिमेशन. मांजर जिवंत आहे की मेलेली आहे हे सांगता येत नसताना तुम्ही ती मेलेली आहे असं जाहीर करून टाकता आहात. एखाद्या गोष्टीच्या निरीक्षणाआधीच सोयीस्कर क्वांटम स्टेटमध्ये आहे असं म्हणणं चुकीचं असतं. तुमचा वरचा संपूर्ण प्रतिसादच या प्रकारच्या चुकांनी भरलेला आहे.
यंत्राच्या तुरी बाजारातही
तुम्ही आधी तुमच्या प्रकल्पाची ब्लू प्रिंट दाखवा. ती यथायोग्य नसेल तर तुमचा प्रकल्प फसणार आणि अशा प्रकल्पांसाठी तुम्ही लोकांच्या खिशातून पैसे उधळू नका. तुमची विश्वासार्हता आधीच तुमच्या लिखाणातल्या त्रुटींमुळे खाली गेलेली आहे; आम्हाला ब्लू प्रिंट दाखवली नाहीत तर डॉमिनो इफेक्ट होऊन ती गडगडल्याशिवाय रहाणार नाही.
तुमच्या संकल्पनाच फार चुकलेल्या आहेत, तुम्ही या विषयाचा मुळातूनच अभ्यास करा आणि त्यानंतरच अशा प्रकारची उपकरणं बनवण्याचा विचार करा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
व्यक्ती स्थूल असतात व्यक्तित्व/वैयक्त्य स्थूल नसते
> ब्राह्मण्य हे काही असं सूक्ष्मात नसतं, ते स्थूलातल्या गोष्टींमधूनच दिसतं.
व्यक्ती स्थूल असतात व्यक्तित्व/वैयक्त्य स्थूल नसते.
(आणि हा व्यक्ती स्थूल आहे, तो मेट्याबोलिझमचा दोष आहे, बरे का... पण "स्थूल" म्हटल्यास उगाच खाण्याचा हव्यास आणि व्यायामात आळस, वगैरे, ध्वनित होते.)
व्यक्ती स्थूल असतात
माझ्या लेखनाचा स्थूलमानाने अर्थ तुमच्याच लक्षात आलेला दिसतो. मात्र असा समजूतदारपणा माझ्याकडे असलेल्या कुठल्याच मापकावर फारसं रीडिंग देत नाही. त्यामुळे तुमचं वर्तन नक्की कुठच्या लेबलाखाली बसवावं असा प्रश्न पडला आहे.
मात्र स्थूलत्व मेट्याबोलिझमने येतं यावरून तुम्हीही जन्माधिष्ठित विचारसरणीच अवलंबता आहात असं दिसतं आहे. तुमच्यात ब्राह्मण्यवादाकडे छुपा कल आहे की नाही, हे तुमच्या स्थौल्यावरून निश्चित करता येईल.
तुमचा अभ्यास कमी पडतो हो
तुमचा अभ्यास कमी पडतो हो घासकडवी! धनंजय हे उघड ब्राह्मणसमर्थक आणि छुपे बहुजनवादी आहेत.
मेट्याबॉलिझम हे कर्माने वाढवता किंवा कमी करता येतं. त्यामुळे स्थौल्याचा दोष त्यांनी कर्मावर लादलेला आहे. तुमचं ब्राह्मणोमीटर आणि बाकीची मीट्रं चुकलेलीच असणार. ब्लू प्रिंट पाठवा आमच्याकडे. बघा, नावातही निळा रंग येतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
>>आणि हो, 'त्यांचं ब्राह्मण'
>>आणि हो, 'त्यांचं ब्राह्मण' नाही, तर 'त्यांचं ब्राह्मण्य'!
समोरच्याच्या शुद्धलेखनावर घसरणे हे ब्राह्मण्याचेच द्योतक आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
समोरच्याच्या शुद्धलेखनावर
हे पहा, तुमचं म्हणणं बरोबर असलं तरी आमच्या ब्राह्मण्यमापकात वापरलेल्या तंत्रज्ञानाचं आम्ही पेटंट मागवलेलं आहे. ते असं जाहीर करण्याबद्दल तुमच्यावर मी खटला भरू शकतो. त्यासाठी मी माझ्या वकिलाशी सल्लामसलत करतो आहे. लवकरच मी एक पत्रकार परिषद घेऊन तुमचा हा कावा उघड करेन.
हॅ:
ब्राह्मण्य मोजण्यासाठी शुद्धलेखनाचा हव्यास* हा एक पॅरामीटर घ्यावा अशी ऐड्या मीच तुम्हाला दिली असताना त्याची रॉयल्टी / श्रेय न देता तुम्ही परस्पर पेटंटें घ्यायचा खटाटोप चालवल्यामुळे आम्हांस हे जाहीर करावे लागले. तुमच्या वकीलाला आणि पत्रकार परिषदेला मुळीच भीत नाही.
*हव्यास हा शब्द हवस या उर्दू शब्दावरून आलेला असल्याने त्याच्या वापरामुळे माझे ब्राह्मण्य कमी मोजले जाईल आणि ते इतरत्र वापरलेल्या अनुस्वारांना कॅन्सलौट करून टाकेल. वकील हासुद्धा उर्दू शब्द आहे का?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
वकील हा अरबी किंवा फारसी शब्द
वकील हा अरबी किंवा फारसी शब्द आहे हे नक्कीच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हव्यास हा शब्द हवस या उर्दू
मराठी भाषेचंच ब्राह्मण्य कमी करण्याचा प्रयत्न करण्याचा कावा लक्षात येतो आहे. मराठी भाषा १५०० वर्षं जुनी आहे हे लवकरच सिद्ध होईल कदाचित २००० वर्षं जुनी आहे हेही सिद्ध होईल. इतक्या जुन्या भाषेत हव्याससारखा स्वतंत्र शब्द नाही असं म्हणून मराठी भाषा नवीनच असावी असं तुम्ही सूचित करत आहात. हे निषेधार्ह आहे.
बहुतेक तथाकथित फार्सी शब्द हे खरे तर संस्कृतोद्भव तरी आहेत किंवा मूळ मराठी तरी आहेत. याहीपलिकडे जाऊन म्हणेन की संस्कृत ही भाषाच मराठी, हिंदी वगैरे सारख्या भाषांवर संस्करण करून झालेली आहे.
हव्यास ह्या शब्दाची व्युत्पत्ती हवं + आस = हवं असण्याची आस, इच्छा अशी आहे हे उघड आहे. वकील हा शब्ददेखील वाक् = वाणी, बोलणे यावरून आलेला आहे. अनेक उच्चार महाराष्ट्रातून उत्तरेत आणि तिथून खुष्कीच्या मार्गाने पर्शियात गेले. (पर्शियाची व्युत्पत्तीदेखील पर + श्याः = इतर घाणेरडे लोक यावरून झालेली आहे)
>>पर्शियाची व्युत्पत्तीदेखील
>>पर्शियाची व्युत्पत्तीदेखील पर + श्याः = इतर घाणेरडे लोक यावरून झालेली आहे
छे छे. इराण मधील लोक पाकी लोकांना तुम सुन्नी हो पर हम शिया हैं असं सांगताना पर-शिया असा शब्द निर्माण झाला हे इथे नमूद करतो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
या व्युत्पत्तीत पु ना ओकिश
या व्युत्पत्तीत पु ना ओकिश कल्पकता आहे!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आपला तो बाब्या
नाही, नाही. पर्शिया या शब्दाची व्युत्पत्ती एवढी मर्यादित नाही. या शब्दांत "आपला तो बाब्या" हे वैश्विक तत्त्वज्ञान समाविष्ट आहे. आपले ते सुभाषित आणि परक्याच्या श्या अशा रितीने पर-श्या -> पर्श्या -> पर्शिया हा शब्द आलेला आहे. भारतातूनच पर्शियन संस्कृतीचा विकास झाला याचा आणखी काय पुरावा हवाय? मराठीत एवढे फारसी शब्द का आणि मराठी ही बहुजनांची भाषा का समजली जाते याचंही आकलन यातून होतं. (आठवा ज्ञानेश्वरांनी बहुजनांसाठी गीता मराठीतून सांगितली.)
पण या ब्राह्मणी काव्यात अडकलेल्या लघुदृष्टीच्या लोकांना कुठून वैश्विक आकलन होणार?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मला ही हा ब्राह्मणी कावा
मला ही हा ब्राह्मणी कावा वाटतो. पाट्यावरवंट्यावरील चटणीची चव काही तुमच्या मिक्सरवरील चटणीला येणार नाही. खरा विद्रोह हा 'आतून' येतो.
या धर्तीवर आमचा मराठ्यांना विरोध नाही तर मारठ्याला आहे, आमचा दलितांना विरोध नाही तर दालित्याला आहे, आमचा राजकारणींना विरोध नाही तर राजकारण्याला आहे अशी मालिका चालू करण्याचा आपला कावा दिसतो.आम्हाला यात छुपा अजंडा दिसतो. या ब्राह्मणी काव्यात आपला हा देशस्थी कावा आहे कि कोकणस्थी याचा उहापोह करण्याची देखील गरज आहे. मार्केट मधे ब्राह्मण्यमापक, दालित्यमापक वा माराठ्य मापक या पैकी कुठलेतरी उत्पादन नक्की चालेल असा आपला कयास आहे. म्हणजे देशाच्या एकात्मतेशी आपल्याला काहीएक घेणेदेणे नाही आपल्याला केवळ आपला धंदा करायचा आहे हे स्पष्टपणे दिसून येते. आपण कुणाला कुठले मापक लावणार हे अधिकार आपल्याकडेच राखून ठेवलेले दिसतात. यातच आम्हाला खरा ब्राह्मणी कावा दिसून येतो. कारण आपण यातून संख्याशास्त्रीय धुळवड उडवणार आणि आपल्याला हवे तेच संख्याशास्त्रीय निकष लावणार. माराठ्यमापकावर आपण कौणिब्याचे कॅलिब्रेशन हा सध्याचा राजकीय पटलावरचा मुद्दा हायजॅक करण्याचा आपला विचार दिसतो.मला तर असे वाटते कि आपण दोन माराठ्यमापक तयार केले असावेत. रोटीबेटी व्यवहाराच्या वेळी वेगळा मापक वापरायचा व राजकीय लाभासाठी वेगळा मापक वापरायचा.
तुमच्या सगळ्या मापकांचे पेटंट तुम्ही बनवू पहात असाल तर एक लक्षात ठेवा हे आमच्या परंपरागत वापराच्या हक्काची पायमल्ली आहे. आम्ही कोर्टात जाउ. ही लोकशाही आहे.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
नवीन कल्पनांना नेहेमीच
नवीन कल्पनांना नेहेमीच प्रस्थापितांकडून विरोध होत आलेला आहे. तुमचा प्रतिसाद हे याचं उत्तम उदाहरण आहे.
याला कावा का बरं म्हणावं? मार्केटमध्ये ज्या ज्या उत्पादनांची गरज आहे ती पुरवणं हे आमचं कामच आहे. त्यासाठी सेगमेंटेशन आणि स्पेशलायझेशन लागतंच. तुम्ही एकच साबण सर्व अंगाला वापरता का? नाही. चेहेऱ्याची त्वचा जपणारा साबण वेगळा, हातांना मुलायम राखणारा वेगळा, केसांना स्वच्छ करणारा शॅंपू वेगळा आणि त्यांना तेजस्वी करणारा कंडिशनर वेगळा.
हे सेगमेंटेशन करणारं विधान त्यानंतरच येतं... तुमच्या मांडणीत आंतर्विरोध आहे हेही तुमच्या लक्षात आलेलं नाहीये.
मग यात गैर ते काय? ब्राह्मणांनी नाही का वेगवेगळी पंचांगं तयार केली, सोयीप्रमाणे पत्रिका जुळते की नाही जुळते हे ठरवण्यासाठी?
एकंदरीत तुम्ही केवळ विरोधासाठी विरोध करत आहात. दुर्दैवाने हे करणं सर्वच मापकांवर हाय रीडिंग देतं.
वैशिष्ट्य
>>एकंदरीत तुम्ही केवळ विरोधासाठी विरोध करत आहात. दुर्दैवाने हे करणं सर्वच मापकांवर हाय रीडिंग देतं.
हे वैशिष्ट्य एखाद्या जातीचे नसून एका शहराचे आहे असे कोणीकोणी म्हणतात. तुमच्या मापकावर कसं मोजता येईल?(काडी टाकलेली आहे )
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
+१११११११११११११११. पौणेर्यमापक
+१११११११११११११११.
पौणेर्यमापक करा बे कोणीतरी लौकरात लौकर. हातोहात पौणेर्याची टेस्ट होऊनच जाईल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
:-D
:-D
+१
प्रत्येक व्यक्तिमधे काही
प्रत्येक व्यक्तिमधे काही दालित्य, काहि मारठ्य, काही विद्रोह व काही ब्राह्मण्य असतेच. याचे प्रमाण स्थलकाल सापेक्ष आहे. आपण कुणाला कुठले मापक लावणार हे अजुन ही उघड केले नाही. सगळ्यांना सगळे मापक लावणार का?
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
तीच तर गंमत आहे. हा मापक
तीच तर गंमत आहे. हा मापक व्यक्तीला लावायचा नाहीच्चे मुळी. हा वर्तनांना, उक्तींना, लिखाणांना, भूमिकांना लावायचा आहे. त्यामुळे या गोष्टी कुठच्या व्यक्तीत सापडतात हे शोधणं व्यर्थच व्हावं अशी इच्छा आहे. आणि त्यांतून येणारी सरसकटीकरणंही टळतील.
गुर्जी
या गुढीपाडव्याच्या (की ब्रह्मध्वजप्रतिपदेच्या?) दिवशी आयुष्यात पहिल्यांदा गुढीला 'ब्रह्मध्वज' असे संबोधलेले ऐकले/पाहिले.
काही पॅरॅनॉईड लोकांनी आपले ब्राह्मण्य वाढवण्याचा केलेला हा प्रयास तर नव्हे? तसे असेल तर पॅरॅनॉईड्य व ब्राह्मण्य आणि पॅरॅनॉईड्य व माराठ्य
यांचे मिश्रणप्रमाण किती असणे सुरक्षित आहे?
की आम्हालाच हा शब्द उशीरा कळला म्हणजे आम्च्यातले बाहुजन्य कमी झालेले नाही आणि ब्राह्मण्य वाढलेले नाही असे सिद्ध होते?
कृपया मार्गदर्शन करावे.
>>आम्च्यातले बाहुजन्य कमी
>>आम्च्यातले बाहुजन्य कमी झालेले नाही
जुन्या कुठच्यातरी पोथीत क्षत्रिय बाहूपासून जन्मले असे लिहिले आहे. त्या अर्थाने हा क्षत्रिय या ऐवजी बाहुजन्य शब्द बरोबरच वाटतो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पण बहुजन म्हणजे केवळ क्षत्रिय
पण बहुजन म्हणजे केवळ क्षत्रिय नव्हेत. त्यामुळे मग बाहुजन्य ऐवजी बहुजनत्व असा शब्द वापरायला हवा.
कुठचा बैल किती वजनाचा
तुमच्या मीटरमध्ये आमचा हा अनुभव तपासून घेऊन आम्हाला कुठचा बैल किती वजनाचा ते हवं आहे -
स्थळ : विद्येचं माहेरघर म्हणून प्रख्यात नगरीतल्या मध्यवर्ती आणि मध्यमवर्गीय वस्तीतलं महानगरपालिकेचं क्षेत्रीय कार्यालय. मिळकत कर भरायची खिडकी.
रांगेत सुमारे २० गृहस्थ (सर्व पुरुष) उभे असावेत. खिडकीवर स्पष्ट अक्षरात मराठीमध्ये 'ही खिडकी चेकसाठी आहे' आणि शेजारच्या खिडकीवर 'ही खिडकी कॅशसाठी आहे' असं लिहिलं होतं. शिवाय चेक कुणाच्या नावे काढावा; चेकच्या मागे काय लिहावं वगैरे सूचना खिडकीवर (स्पष्ट अक्षरात मराठीमध्ये) लिहिल्या होत्या. शिवाय प्रत्येकाच्या हातात असलेल्या मिळकत कराच्या बिलाच्या पाठच्या पानावर तीच माहिती सुवाच्य अक्षरात इंग्रजी आणि मराठीत छापलेली होती. तरीही रांगेतला जवळपास प्रत्येक माणूस रांगेत शिरताना किंवा शिरल्यानंतर यातली कोणती तरी माहिती इतरांना विचारत होता. रांगेतल्या फक्त दोन माणसांनी ही संपूर्ण माहिती घरूनच भरून आणली होती. ते रांगेतल्या इतरांना तीच माहिती पुन्हा पुन्हा सांगत होते. वर 'देयक' म्हणजे मराठीत 'बिल' आणि मिळकत कर म्हणजे मराठीत 'प्राॅपर्टी टॅक्स' वगैरे अतिरिक्त माहितीसुद्धा पुरवत होते. रांगेतला प्रत्येक माणूस शिक्षित होता (कारण तो आपल्या हातानं ती माहिती चेकवर भरत होता). आता बोला.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अनुभव रोचक (खरे तर सामान्य) आहे, पण...
...यात ब्राह्मण्याचा संबंध नेमका कोठे आला, हे कळले नाही.
यात ब्राह्मण्यापेक्षा पौणेर्य, (कदाचित काहीशा कमी प्रमाणात) माहाराष्ट्र्य, कदाचित भारतीय्य*, आणि एकंदरीतच दैडशहाण्य यांचा भाग असावा, अशी शंका आहे.
* हवे तर 'हैन्दुस्तान्य' किंवा 'हैन्दुस्थान्य' म्हणा. 'चलता है, हिन्दुस्तान है' अशा अर्थी.
पौणेर्य आणि दैडशहाण्य वाचून
पौणेर्य आणि दैडशहाण्य वाचून डौळ्य पाणावले आणि "आमच्या तारुण्यातील औनाड्याचे अवशेष" हे औपक्रम्य आठवले. प्रातिक्रिय्य लैच भारी आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं