GRACE: MAKING SENSE WITH NONSENSE
'ग्रेस हा अब्सर्ड कवी आहे.' आता हे विधान वाचताना वाचकाच्या मनात या वाक्याबद्दल अनेक प्रश्न उभे रहात असतील. म्हणून मी आधी अब्सर्ड या शब्दाची नीट व्याख्या करतो(?!?). अल्बर्ट कामूच्या अब्सर्डिस्ट तत्वज्ञानानुसार, अस्तित्वाचा अर्थ शोधणारं मन आणि कोणताच ठाम अर्थ नसलेलं निरर्थक जग यांच्यातल्या मुलभूत भेदामुळे अब्सर्ड मानसिकता तयार होते. संपुर्ण वास्तव हे एकमेकांशी जोडलेलं,एकमेकांवर आधारीत,सहसंबंधित किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या तर्कशात्रीय मांडणीत असतं का? याचं नक्की उत्तर अजुन देता आलेलं नाही. आपल्याला संपुर्ण वास्तवाचे ज्ञान आहे का? मानवीय दॄष्ट्या ते अशक्य आहे. कारण आपल्या जाणीवांच्या टप्प्यात येणार्या विश्वाला आपण वास्तव म्हणुन संबोधतो आणि त्याला एका ठराविक तर्कशात्रीय मांडणीत बसवू पहातो.त्याद्वारे एक ठराविक अर्थ असलेली संदर्भ चौकट आपण बनवू पहातो (आपल्याला लांबी मोजायला फूटपट्टी लागते ना, तशीच.) आणि त्या संदर्भचौकटीचा वापर करुन आपण इतर गोष्टी समजावून घेण्याचा प्रयत्न करतो. ग्रेस यांच्या कविता वाचताना मला जाणवले की, त्यांना एका ठराविक अर्थाकडेच पोहोचायचे आहे असे वाटत नाही. आपली कविता अंतिम वाक्य नाही याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. हे मी का म्हणतोय, हे त्यांच्या पुढच्या काही विधानांवरुन स्पष्ट होते.
'माझ्या कवितेने मराठी काव्यात निर्मितीची प्रक्रिया, त्यातून सिद्ध झालेली कलाकृती व तिचा आस्वाद या त्रिवेणीसंबंधी महत्वाचे प्रश्न निर्माण केलेत.'
मुळात असं की मी प्रश्न निर्माण केलेत, कशाची उत्तरे दिलेली नाहीत वा द्यायचा प्रयत्न केलेला नाही हे मान्य करणंच महत्वाचं आहे. कुठल्याही गोष्टीची जडणघडण कशी आणि कुठल्या टप्प्यात होते आणि त्यात आपले स्वतःचे स्थान नक्की काय व कोणते याची व्यापक जाणीव असलेला हा कवी आहे. ग्रेस यांनी कुठेही संदिग्धतेला (कन्फ्युजन) नाकारलेलं नाहीये.
'पळवाट नकोच आहे मला, हवीये फक्त दु:ख टेकण्यापुरती थोडीशी संदिग्धता'
हे समजून घेताना आधी 'something -genesis-something' म्हणजे काय ते ही समजून घेतले पाहीजे. माझ्या आधी ही अर्थहीन जग होतं(something), आता मी आहे. मी माझ्या अमर्याद स्वातंत्र्याच्या बळावर, माझ्या अस्तित्वाला आणि त्याच्या जाणीवांना माझ्या आकलनात असणार्या संदर्भांतुन तौलनिकरित्या अर्थ देईन, देत राहीन.(genesis) यापुढे माझ्यानंतर ही अर्थहीन जग कायम राहील.(something) संपुर्ण अर्थ किंवा पुरेपूर निरर्थकता यापैंकी मी काहीच अनुभवू शकणार नाही. ग्रेसच्या कवितेत येणारी संदिग्धता आणि आपला प्रवास हा संदिग्धतेकडून संदिग्धतेकडेच आहे हे दर्शवणं मला नेहमी जाणवतं. तोच प्रकार त्यांनी स्वतःच्या आयुष्यात जगताना घेतलेल्या भुमिकेमध्ये ही जाणवतो.
'माझी कविता हे एक बेट आहे. मी ही एक बेटच आहे. या बेटावरुन परतवण्याची हमी मी वाचकाला देत नाही. त्याने स्वतः होडी होऊन गेले पाहीजे.'
स्वतःला आणि मुख्यतः स्वतःच्या निर्मितीला एका बेटाची उपमा देऊन त्यांनी आपल्या अस्तित्वाचा स्थायीभाव दर्शवला आहे. मी कुठेही जात नाहिये आणि कुठुनही येत नाहीये. मला काही विशेष उद्दिष्ट साध्य करायचं नाहीये. मी केवळ आहे आणि स्वतंत्र जगतोय. स्वतःच्याच आयुष्य जगण्याच्या पद्धतीतुनसुद्धा त्यांनी हाच दॄष्टिकोन दिलेला आहे. त्यांच्यावर दुर्बोधतेचे कितीही आरोप झाले तरी, स्वतःच्या कविता वाचकांना समजावुन सांगाव्यात असे त्यांना वाटले नाही. त्यांनी कुठलाही अजेंडा राबवला नाही. नाहीतरी लोकप्रियता हे एकप्रकारचे मास सेन्सिबिलिटी मिथ आहे. शेवटी अब्सर्ड व्यक्तीसाठी कोणतीही गोष्ट समजावुन सांगणे किंवा सोडवणे महत्वाचे नसते तर ती स्वतः अनुभवणे आणि स्वतःच्या अनुभवांचे वर्णन करणे हे महत्वाचे असते. ग्रेस यांच्या काव्यात हा गुणधर्म विशेष आढळून येतो. त्यांच्या कवितेचे 'इझम' बनवता येत नाही.ग्रेस यांच्या कवितेला स्वतंत्र अस्तित्व आहे, ते आढळुन येतं जेव्हा ते स्वतः द्वैती असल्याचं कबूल करतात.
या लेखात मी कुठेही ग्रेस यांच्या कवितांचा परामर्श घेऊन त्यांचा अब्सर्डिटीशी संबंध जोडलेला नाहीये. जी वाक्ये घेतलीयेत ती केवळ त्यांच्या ललितलेखनातुन घेतली आहेत.पण ग्रेसांच्या कविता अब्सर्ड अंगाने समजावुन घ्यायचा प्रयत्न करता येईल आणि त्यातुन मिळणारा आस्वाद फार वेगळा असेल असे माझे मत. ग्रेसांच्या बेटावरुन परतताना स्वतः जहाज बनण्याचा हा माझा प्रयत्न. वेगळ्या अंगानेही सेन्स देउन ग्रेस समजावता येऊ शकतात आणि इथले बरेच जण ही कविता आपल्या अंगाने समजावून घेऊन त्याला अर्थ देण्याचा प्रयत्न करतीलच, after all 'we have art in order not to die of the truth'- Nietzsche
प्रतिक्रिया
अॅब्सर्ड
अॅब्सर्ड आणि संदिग्ध असेल तर ही कविता समजून घेतलीच पाहिजे हा आग्रह असू नये. त्या आग्रहातून, कवित वाचल्यनंतर तत्काळ जे गवसलेले किंवा निसटलेले असेल त्याला चिमटीत पकण्यासारखे होइल. पकडता येणार नाही, पण चुकून काही चुकार सापडलेच तर मात्र फसगत होईल, कारण ते उत्तर वाटण्याची शक्यता आहे. तिथे तो आस्वादाचा, शोधाचा प्रवास त्या रचनेपुरता थांबू शकतो.
कविता समजुनच घेतली पाहीजे असा
कविता समजुनच घेतली पाहीजे असा माझा आग्रह मुळीच नाही. पण म्हणुन तिथे बिलकुल न फिरकण्यापेक्षा, त्या संदिग्धतेच्या प्रवाहात सामील होणे महत्वाचे आहे. बरेचदा आपल्याकडे संदिग्धता नाकारली जाते. आपल्याला उत्तरं हवी असतात आणि प्रश्न विचारणारा आपल्याला पुरेसा पटत नाही.(माझ्या स्वाक्षरीत तोच विचार आहे.) ग्रेस यांचे नाव मराठी साहित्यात बाजूला पडण्याचे कदाचित हेच कारण असावे. 'संदिग्धतेकडुन संदिग्धतेकडे' याचा आस्वाद घ्यावा, केवळ हीच माझी आशा.
“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre
आयला !
अशाच काहीशा विचारांनी आजकाल कविता वैग्रे चाळायला सुरुवात केली होती, मात्र तुमचा हा लेख वाचून मेंदूचे मातेरे झाले.
शपथ सांगतो, ह्या लेखातले शष्प काही कळाले नाही. आजवर आम्ही फक्त 'प्रसिद्धीची हौस' ह्या सदराखालीच लिखाण पाडायचे म्हणून ग्रेसवर लिहिले गेलेले लिखाणच वाचल्याचा हा परिणाम असावा बहूदा.
असो..
ह्या लेखाचे सुगम मराठी भाषांतर कोणी करून दिल्यास, करणार्याच्या मृत्युपर्यंत कृतकृत्य राहीन.
आणि हो,
'ग्रेस कसे दुर्बोध आहेत आणि ते फक्त आम्हालाच कसे कळतात, आणि ग्रेस म्हणजे सहजता,सरळता, सुबोधता.. ग्रेस न कळणारे हे अडाणी' अशा दोन्ही विषयांवरील लेखनाचा मी पंखा आहे हे सांगायचे राहीलेच.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
जहाज
ग्रेसांच्या बेटावरुन परतताना स्वतः जहाज बनण्याचा हा माझा प्रयत्न.
पण लेख वाचल्यावर हे 'जहाजच हरवल्यासारखे' वाटते.
संदिग्धता
मूळ कवी प्रमाणे लेखनही संदिग्धच (आपोआप होत असावे?)
आणि हो! ग्रेस यांना आदरांजली!
समयोचित लेखाबद्दल आभार!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
माझा काका नाटकात काम करायचा,
माझा काका नाटकात काम करायचा, कलाकार टाईप होता. त्याने "चर्चबेल" आणलं होतं घरी. तेव्हा मी असेन सहावी-सातवीत. तेव्हापासून कॉलेजला जाईपर्यंत मी ते पुस्तक कितीतरी वेळा वाचलं असेल. एकदम सगळं नाही, पण मध्येच उघडून कोणतीही कविता वाचायचो. आज एकही कविता आठवत नाही आणि तेव्हाही कधी पूर्ण समजली नाही, पण रंग बदलणार्या रुबिक क्यूबशी खेळल्यासारखा निरर्थक आनंद मिळायचा हे खरे.
चर्चबेल
चर्चबेल आणि कविता?
चर्चबेलच नाव होते की नाही
चर्चबेलच नाव होते की नाही याबद्दल साशंक आहे. दोन पुस्तकात गडबड झाली वाटते.
काहीतरी मूलभूत संकल्पनात्मक गोंधळ?
काहीतरी मूलभूत संकल्पनात्मक गोंधळ होतो आहे असं हे स्फुट वाचून वाटलं. त्याचं कारण अगदी साधं आहे आणि ते म्हणजे काम्यूच्या अब्सर्ड संकल्पनेत ग्रेस कसे बसतात तेच इथे स्पष्ट होत नाही. 'अस्तित्वाचा अर्थ शोधणारं मन आणि कोणताच ठाम अर्थ नसलेलं निरर्थक जग यांच्यातल्या मुलभूत भेदामुळे अब्सर्ड मानसिकता तयार होते.' हे वाक्य मुळात गोंधळात पाडणारं आहे. जगण्याचा अर्थ सापडत नाही, पण तरीही जगणं भाग आहे म्हणून जगणं 'अब्सर्ड' होतं असं साधारण काम्यूच्या याविषयीच्या विचारांबद्दल म्हणता येईल. 'मिथ आॅफ झिझिफस' किंवा 'आउटसाइडर'मध्ये हे प्रकर्षानं जाणवतं. ही अर्थहीनता (कशासाठी जगावं?) आणि ग्रेसच्या कवितेतली संदिग्धता याचा नक्की काय संबंध लागतो ते इथे कळत नाही.
१. काम्यूच्या मते जगण्याचा अर्थ माणसाला सापडत नाही;
२. जर जगण्याला अर्थ नसेल तर माणूस कशाहीविषयी जे काही म्हणतो त्याचा एकच एक असा अर्थ लागेलच असं नाही;
२. ग्रेस यांच्या कवितांचा एकच एक असा अर्थ लागत नाही.
या तीन विधानांना खरं मानलं तरीही त्यातून ग्रेस यांची कविता काम्यूच्या अब्सर्ड संकल्पनेत बसते असं म्हणायला पुरेसं तर्काचं बळ मला दिसत नाही. मुळात जगण्याचा अर्थ न सापडण्यातून आलेली आर्तता ग्रेसच्या कवितेत दिसते का, याचा शोध घेतला तर या दोन गोष्टींचा संबंध जोडण्याच्या दृष्टीनं ते पहिलं पाऊल ठरेल.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ग्रेस यांच्या ललित लेखनाचे
ग्रेस यांच्या ललित लेखनाचे संदर्भ देता का...मी अजून वाचलं नाहीये पण वाचावसं वाटतय.
काहीवेळा 'दुर्बोध' कविता/काव्य जर चांगल्या चालीत, चांगल्या आवाजात कोणी गायल्या तर कवितेचा अर्थ शब्दात व्यक्त करण्याइतका कळेल असं नाही..पण त्या (संगीत+शब्द)रचनेचा आस्वाद घेता येतो. उदाहरणादाखल ग्रेस यांची 'घनकंप मयूरा...' (लता आणि हृदयनाथ मंगेशकरांच्या 'मैत्र जिवाचे' मध्ये आहे)...अर्थ काही लागत नाही (मला)-फारसा प्रयत्न कधी केलाही नाही- मात्र ते गाण आवडतं.
तसच बॉब डिलनच्या बर्याच गाण्यांचं म्हणता येईल.
लेख 'दुर्बोध' झाला आहे. इंग्रजी शीर्षकाचं प्रयोजन कळलं नाही.
अमूर्त संकल्पना
अमूर्त संकल्पना सुगम करुन समजावता आल्या तर त्यांना अमूर्त कसं म्हणावं? हा विरोधाभास होईल. ग्रेस ह्यांनी जे लिहिलं ते सोपं करुन सांगता आलं असतं तर त्यांनी ते तसं लिहिलं असतं का असा प्रश्न पडतो. दूर्बोध वाटणारी कलाकृती उत्स्फूर्त,अवचेतन (subconscious) मनाची निर्मिती असते असं अमूर्त कलाकृतीकार म्हणतात. तसं असल्यास खुद्द कलाकारही कलाकृतीला समजावून सांगू शकणार नाही.
कलाकाराचा असा दृष्टीकोन मला पटतो - I look at a piano, I see a bunch of keys, three pedals, and a box of wood. But Beethoven, Mozart, they saw it, they could just play. -Will Hunting
श्रावण मोडक ह्यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे.
Absurd की Abstract हे वाद होऊ
Absurd की Abstract हा वाद होऊ शकतो का? याचं उत्तर ग्रेसच्या कविता समजण्यासाठी असलेल्या उपलब्ध साधनांवर अवलंबून आहे असं वाटतं.
मला वाटतं ग्रेसची कविता ही ग्रेसच्या वैयक्तिक अनुभवांच्या सावल्यांसारखी आहे.
हे वैयक्तिक अशा साठी कारण ग्रेसनं ते अनुभव कवितेबाहेर कुठं मांडलेले नाहीत.
त्यात शब्दवेल्हाळ रचना आणि रुपकांच्या विविधता या मुळं कविता अनाकलनीय वाटते.
अर्थात याला एक प्रसिद्ध अपवाद आहे.
'ती गेली तेंव्हा रिमझीम...' च्या सुरुवातीच्या कडव्यातून ही कविता आईच्या मृत्यूच्या दु:खाची असावी असा अर्थ लावण्याचा प्रयत्न होत होता.
पण पुढं 'वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता' इथं विकेट उडते.
आणि ही मातृविरहाची थिअरी चालत नाही.
आणि कविता दुर्बोध बनते.
पुढे ग्रेस यांनीच याचा संदर्भ मातेच्या मातृत्वाशी नाही तर स्त्रित्वाशी/बाईपणाशी आहे ही उकल केली आहे.
द्रौपदी आणि कृष्ण यांच्या संबंधाचं रूपक समजावून सांगितलं आहे.
आता हे ग्रेस यांच्या शिवाय कोणाला कळणे शक्य नाही. म्हणून त्यांच्या कविता या प्रचंड वैयक्तिक आहेत.
इथे पहा -
संध्यासुत्राचा यात्रिक
''माझ्या कवितेने मराठी काव्यात निर्मितीची प्रक्रिया, त्यातून सिद्ध झालेली कलाकृती व तिचा आस्वाद या त्रिवेणीसंबंधी महत्वाचे प्रश्न निर्माण केलेत."
हे वाक्य ग्रेसच्या 'मितवा' तल्या 'दुर्बोधतेची बेसरबिंदी' तलं...
मला वाटतं त्यातंच ग्रेसनी त्यांच्या कवितेच्या निर्मितीप्रक्रियेचा आणि अर्थाचा संबंध काय याचं उत्तर द्यायचा प्रयत्न केलांय.
ग्रेस पुढं म्हणतात -
"त्या प्रश्नांच्या सोडवणुकीतून, समजातून आणि अपसमजातून या माझ्या शब्दमयी, शब्दवेल्हाळ आणि अर्थकाहूर कवितेवर दुर्बोधतेचा आरोप केला जातो, त्या आरोपाचे मी निराकरण करीत नाही.
त्याचे कारण कलावंत म्हणून, जरी मला ठाऊक असले तरी कुमारिकेची बेसरबिंदी कुठल्याही प्रियाळ समीक्षकाला, वाचकाला मी देणार नाही.
खरे तर माझ्या कवितांच्या शब्दविसर्जानाच्या प्रदेशात ही दुर्बोधतेची बेसरबिंदी मी अनेक ठिकाणी दडवून ठेवली आहे. ती चोरीचा माल म्हणून नव्हे तर रहस्यशरणाचे दैवी गुपित म्हणून!"
म्हणजे ग्रेसना याची पूर्ण कल्पना आहे की रसिकांना/समीक्षकांना कविता समजत नाहीयेत.
म्हणून ग्रेसच्या कवितेतला अर्थ शोधण्याल्या ग्रेस 'रहस्यशरण' ही उपमा देतात.
आणि पुढे त्यांच्या कवितेकडे कसे पहावे याची दिशा देतात ती अशी -
"साहित्यशरणवृत्तीने कुठल्याही अनवट कलाकृतीकडे गेले की मग संभोगासाठी तिला विवस्त्र करण्याची प्रियकराला गरजच भासत नाही.
तिच्या अंगावरची सर्व वस्त्रे आपोआप गळून पडतात.
आणि मग आपली लाडकी समीक्षामूल्ये आणि साहित्याचे तथाकथित महासिद्धांत सिद्ध करण्याकरिता कोणताही
सुजाण समीक्षक कलावंताच्या कलाकृतीचा बळी मागत नाही, आज घडते आहे ते उफराटे, विपरीत."
याचा अर्थ स्पष्ट आहे की ग्रेसला त्यांच्या कवितांना समिक्षेची मानके लावून अर्थ लावण्याचा प्रयत्न करू नये.
'साहित्यशरणवृत्ती'नं पाहताना म्हणजे त्यांच्या कवितेला शरण जाऊन त्या कवितांचे वाचकाला जे अर्थ लागतात तेच खरे मानावेत येव्हढंच वाचकाच्या हातात उरतं.
पुढे त्यांचं विवेचन आहे -
'वाचक होण्यासाठी निर्मितीची अवस्थाच स्वत: भोगावी लागते.
अनेकदा ती आपण भोगतो, किंवा ती आपल्याजवळ आहे असा वेडबागडा पार्थिव दावा अनेकजण मांडतात. मांडोत.
काळोख उजळण्यासाठी जीवाने स्वत:ला जाळून घ्यावे लागेते हे खरेच आहे.
म्हणजे उजळण्यासाठी जळणे आलेच.
पण तेवढयावरच जळणारा प्रत्येकजण उजळून निघेलच याची हमी मात्र देता येत नाही.
काळोख उजळण्यासाठी
जळतात जिवाने सगळे
जो वीज खुपसतो पोटी
तो एकच जलधर उजळे.'
आता निर्मितीची अवस्था वाचकांना समजण्यात निश्चीत लिमिटेशन्स आहेत.
जोवर ग्रेस त्यांच्या कवितांचे अर्थ सांगत होते तोवर हे शक्य होतं आता ते शक्य नाही.
आता आकाशातल्या ढगांना आपण जसे आकार देत राहतो तसंच या कवितांच्या अर्थाबद्दल होत राहिल.
काही आकार सापडतील आणि बरचसे नुसतेच वाहून जातील.
त्यामुळं लौकिकअर्थानं कविता दुर्बोध आहेत हे खरंच आणि त्याही पुढं जाऊन आपल्याला लागलेला अर्थच हा खरा अर्थ आहे असा पवित्रा घेणंही चुकिचंच...
दुव्याबद्द्ल धन्यवाद.
दुव्याबद्द्ल धन्यवाद. दुव्यातील फिल्म आत्ताच पूर्ण पाहिली. रोचक आहे.