काही जाहीर खरे आणि बरेचसे खाजगी खोटे
प्रास्ताविक: आज होळी. उद्या धूलीवंदन. जेंव्हा होळी ही शिमगा होती आणि धूलीवंदन ही धुळवड होती तेंव्हापासून आमचे हे आवडते सण. ’बेंबट्या,होळीत बोंबलावयास लाजणे यात पुरुषार्थ नाही. कोर्टात भांडण आणि तीर्थास मुंडण न लाजता करावे..’ असे धोंडो भिकाजी जोशांचे तीर्थरुप त्यांना सांगत असत. आमच्या लहानपणी शिमगा हा असाच न लाजता साजरा करायचा सण होता. गल्लीतल्या सार्वजनिक होळीत मनसोक्त बोंबलून जाले की दुसऱ्या दिवशी त्या होळीच्या राखेचा चिखल करुन त्याचे गोळे हातात घेऊन टवाळ कार्ट्य़ांची टोळी गावभर खंडणी मागत हिंडत असे. चार-आठ आणे खंडणी न देणाऱ्या लोकांच्या घरांच्या दारावर त्या राखेचे गोळे फेकून मारण्याची पद्धत होती. होळीत बोंबलताना वापरली जाणारी भाषा ही स्वच्छ अश्लील, निलाजरी असे. ’आज होळी, उद्या पोळी, बामण मेला संध्याकाळी’ ’अलीकडं तुरकाटी पलीकडं तुरकाटी, बामणाची …… खरकाटी’ असले सगळे सोपे, बिनइस्त्रीचे असे. उगीच बामणाला रावण म्हणणे अशी मखलाशी नव्हती. शिमगा आणि धुळवडीच्या निमित्ताने लिहिलेले हे चार शब्द असेच होळीत बोंबलताना म्हणायचे गाणे आहे. त्यात कुणाला गुदगुल्या झाल्या किंवा कुणाला चिमटे बसले तर राग मानू नये. अहो, अॅगनीशिवाय एक्स्टसी कुठली? धुळवडीच्या शुभेच्छा!
हां हां म्हणता ’ऐसी अक्षरे’ ला दीडेक वर्ष होत आले. हां हां नाही म्हटले तरी तितकेच दिवस झाले, उगीच खोटे कशाला बोला? ’ऐसी अक्षरे’ च्या स्थापनेपासूनच ’ऐसी अक्षरे’च्या पाठीशी आमचे आशीर्वाद आहेत. ’मिसळपाव’च्या स्थापनेच्या वेळीही असेच काहीसे आशीर्वाद आम्ही दिल्याचे स्मरते. त्यामुळे ’आय मे बी राँग बट अॅट लीस्ट आयम कन्सिस्टंट’ असे आम्ही म्हणू शकतो. असो. ’ऐसी अक्षरे’च्या स्थापनेच्या वेळी एकूण मराठी आंतरजालविश्वात (म्हणजे आम्ही ज्या दोन चार स्थळांचे सदस्य आहोत त्या स्थळांवर) वादळी वातावरण होते. ’’मनोगता’वर लाथाळी झाली म्हणून ’मिसळपाव’ जन्मले. ’मिसळपाववर’ जमेना म्हणून आता ’ऐसी अक्षरे’. अशा किती वेगळ्या चुली मांडणार? आणि कशासाठी” हे त्या काळात गाजलेले उद्गार जाणकारांच्या स्मरणात असतीलच. अहो, कुणाचे म्हणून काय विचारता? अर्थात आमचेच! तर अशा ’एक्सेप्शनल’ परिस्थितीत जन्माला आलेली अपत्ये अल्पजीवी ठरतात असे आजवर जर कुणी म्हटले नसेल तर आता कुणीतरी ताबडतोब म्हणून टाकले पाहिजे असेही त्या वेळी आमच्या मनात आले होते. ’स्पीड’ या चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या शेवटी सांड्रा बुलकला मिठीत घेऊन कानू रीव्हज असेच काहीसे म्हणतो. ’त्रिशूल’ या सिनेमात राखीही अमिताभला ’कोईभी इन्सान इस तरह नफरत के सहारे जिंदा नहीं रह सकता’ असे म्हणते. (’एवढ्या लांब कशाला जायला पाहिजे? ’बजबजपुरी’ आठवते ना?’ असेही त्यावेळी आमच्या कानात कुणीतरी खाजगीत सांगितले होते. खाजगीत सांगण्याची परंपरा इतकी जुनी आहे, असो.) असे सगळे असतानाही ’ऐसी अक्षरे’ आजवर जिवंत राहिले आहे, इतकेच नव्हे तर त्याने चांगल्यापैकी बाळसे धरले आहे, याबद्दल ’ऐसी अक्षरे’ च्या समग्र चमूचे पहिल्याछूट कौतुक केले पाहिजे. ’ऐसी अक्षरे’ च्या स्थापनेच्या वेळी ’मिसळपाव’ वर ’ऐसी अक्षरे’ ला आम्ही त्या वेळी दिलेल्या या आशीर्वादावर आमचे परंप्रिय जालमित्र प्रा. डॉ. दिलीप बिरुटेसाहेब इतके खूष झाले की त्यांनी आम्हाला चक्क फेसबुकवर फ्रेंड रिक्वेष्ट टाकली. शप्पत! वाटल्यास प्रकाश घाटपांडेंना विचारा. एरवी ’तात्या जावो अथवा राहो’ या न्यायाने ’मिसळपाव’शी पदरकुंकूचुडा निष्ठा बाळगणाऱ्या डाक्टरांनी आमची बदनामी करण्यापुरतही दखल घेतल्याचे आम्हांस कधी आठवत नाही. नाही म्हणायला ते कुणाला तरी आमच्याविषयी बोलताना खाजगीत ’तो ना? तो रात्री आठनंतर तर्र असतो…’ च्या धर्तीवर ’तो ना? तो त्याच्या ब्लॉगवर जी.ए. कुलकर्णींविषयी लिहितो…’ असे म्हणाल्याचे कळते. एरवी अनुल्लेखाने मारण्यात ज्यांचा हात धरता येणार नाही असे आमच्या माहितीतले शरद पवारांनंतरचे प्राडॉच. शप्पत! वाटल्यास राज ठाकरेंना विचारा. नाही म्हणायला प्राडॉराव मध्ये काही दिवस झोपेत ’नाही, नाही, मी कुठल्याही कॅन्सर पेशंटच्या मदतीसाठी पैसे देणार नाही, मग भले इनकमटॅक्समधून सूट नाही मिळाली तरी चालेल’ असे काहीसे म्हणत होते असे नीलकांतने कुणालातरी खाजगीत सांगितले असे कानावर आले आहे. त्यांच्या (म्हणजे प्राडाँच्या) मोबाईल फोनची कॉलर ट्यूनही ’मैं कितना तनहा तनहा लोनली लोनली अशी काही दिवस होती म्हणे. फेसबुकवर ऊतू जाणारी कढी बघून मग त्यानी (म्हणजे प्राडाँनी) ती बदलली असेही काहीतरी नीलकांत म्हणाला म्हणे. हे प्रकरण आम्हास फारसे कळाले नाही. प्राडॉ हल्ली ’अण्णा आणि बाबुजींच्या पंगती आता तुझ्या मांडवात बसायला लागल्या की रे मार्क.’ असेही काहीतरी म्हणत असतात म्हणे. हेही प्रकरण आम्हास फारसे कळाले नाही, पण मार्कांचा उल्लेख झाल्यावर हे काहीतरी प्राध्यापकांच्या संपाच्या संदर्भातले असावे असे समजून आम्ही गप्प बसलो. तर्ते असो. पण एकदा ’ऐसी अक्षरे’ ला आशीर्वाद दिल्यानंतर (दिल्या म्हणजे ’दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे’ किंवा ’दिल्या घरी तू सुखी राहा’ मधला दिल्या. उगीच पुन्हा प्राडाँची खवळाखवळी नको!) जे आहे ते सगळे गोड मानून घेण्याशिवाय आम्हाला काही गत्यंतरच राहिले नाही. सुरवातीला ’ऐसी अक्षरे’ चा ’सोपा’ आणि ’पिपा’ ला विरोध आहे हे वाचून आम्ही अंमळ बुचकळ्यात पडलो होतो. एकतर ही ’सोपा’ आणि ’पिपा’ ची भानगड काय आहे हे आमच्या ध्यानात येईना. एकतर आम्ही म्हणजे सोपा म्हटल्यावर माजघर, शेजघर, न्हाणीघर, जानवसा (यातले काही शब्द नव्याने आठवायला मदत केल्याबद्दल ’सोपे वाटेल असे शब्दकोडे’ च्या महेश यांना धन्यवाद. यातल्या ’सोपे’ चा ’सोपा’शी काही संबंध आहे असे आम्हांस वाटत नाही. चूकभूल देणे घेणे) असले आठवणाऱ्यांपैकी. तर अशा सोप्याचे ’ऐसी अक्षरे’ ला एवढे वावडे का असावे हे आम्हाला कळेना. शिवाय सोपा आणि पिपा हे शब्द वाचून आमचे मन आळशांच्या राजाच्या प्रतिसादासारखे भूतकाळात मोकाट उंडारू लागले. आम्हाला आमच्या जुन्या घरातल्या सोप्यातले पीप आठवले. इयत्ता चौथीत ’डब्बा ऐस पैस’ खेळताना आमच्या सोप्यातल्या पिपामागे गोगट्यांच्या कुंदाबरोबर (डोंबिवलीला असते. नवरा स्टेट ब्यांकेत आहे. गोरटेली घारी कुंदा. बेळगावी कुंद्यासारखी… असो. चवळीची शेंग होती हो. आता काय सुटली आहे म्हणता! शप्पत! सुटली म्हणा!) आम्ही जरासे जास्तच रेंगाळलो होतो. बापू गोगट्याने आम्हांस बदड बदड बदडले होते. बापू डावरा होता. त्याचा हात भलताच लागत असे. अजूनही कधीकधी ’आये कुछ अब्र’ असे झाले की आमच्या बरगड्या तेल न घातलेल्या झोपाळ्यासारख्या कुरकुरू लागतात. तर्तेही असो. पण हे सगळे वैयक्तिक, खाजगी झाले हो. त्याचा 'ऐसी अक्षरे'च्या बापटांनी (आणि ’ऐसी अक्षरे’ च्या स्थापनेत त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी) जाहीर धिक्कार का करावा हे काही आम्हांस कळेना. शेवटी ’जाऊ दे, सगळं आपल्याला कळालंच पाहिजे असं कुठं आहे?’ असा विचार करुन (आणि ’आता जंगलवाटेवरचे कवडसेच बघ..’ हा विचार दाबून) आम्ही ’आपल्या चाळीला संस्कृती आहे’ असे बाबा बर्वे म्हणाल्यावर ’इतके दिवस आहोत, पण दिसली नाही कुठे?’ असे कानात कुजबुजणाऱ्या द्वारकाबाईंना ’बाबा खोटं कशाला बोलतील?’ म्हणून गवारीच्या शेंगा मोडू लागणाऱ्या यश्वदाबाईंचे स्मरण करुन आम्ही ’(घासकडवींचं काही सांगता येत नाही, पण)बापट खोटं कशाला बोलतील?’ असे ’मना सज्जना’ ला म्हणालो. बापट कशाला खोटं बोलतील म्हणालास, तर मग घासकडवींनी काय घोडं मारलं आहे असे आमचे सज्जन मन विचारुन कुरतडू लागताच बाकी आम्ही हैराण झालो. तसे बघायला गेले तर घासकडवीही आम्हाला तितकेच जवळचे हो. त्यांची ’पूजेची पथ्ये’ वाचून तर आम्ही त्यांचे फ्यान झालोच होतो शिवाय त्यांची लेखनशैली आणि एकूण जालवर्तन बघता राजेश घासकडवी हेच मिलिंद भांडारकर उर्फ सर्किट आहेत असा काही काळ आमचा समज झाला होता. (आमच्या दुर्दैवाने) हा आमचा समज भांडारकरांच्या कानावर गेला आणि त्यांनी आम्हाला फेसबुकवरुन अनफ्रेंड करण्याची धमकी दिली असे परवाच आम्ही कुणाला तरी खाजगीत सांगितले. हाच समज घासकडवींच्या कानावर गेला आणि पुढच्या भारतभेटीत आमच्यासाठी ग्लेनमारूंजीची बाटली आणण्यासाठी त्यांनी ब्यांकेत एक रिकरिंग खाते उघडले असे आम्हाला परवा कुणी तरी खाजगीत सांगितले. म्हणजे वन म्यान्स पॊयझन इज अदर म्यान्स मेडिसीन वगैरे. जगाची ही रीत कशी उफराटी आहे बघा! तर घासकडवीही आमचे मित्रच. घासकडवींची लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली ही मालिका वाचून ’राघूनानांची कन्येस पत्रे’ ची आठवण येते असे परवा कुणीसे कुणाला तरी खाजगीत म्हणाले तर आम्ही त्यांच्यावर काय उखडलो म्हणता! लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली हे शीर्षक कुणाला तरी कमालीचे अश्लील वाटते असे ऐकून तर आम्हाला फेफरे यायचे बाकी राहीले होते. ’असलेच लिखाण छापायचे होते, तर उपक्रम काय वाईट होते? नव्या विचारजंत्यांपेक्षा जुने विचारजंती बरे नव्हेत काय?’ असे रिकामटेकड्याने (पुन्हा) घाटपांडेंनाच खाजगीत विचारले म्हणे. ’आमच्या श्रमपरिहाराला स्मरुन तरी असले अवघड प्रश्न विचारत जाऊ नकोस रे..’ असे घाटपांडे रिट्याला कळवळून म्हणाले म्हणे. घाटपांडेंचे श्रमपरिहार स्मरणे एकूण कठीणच हो. आम्हाला तर या श्रमपरिहारातले आमचे खुर्चीत दण्णकन कोसळता कोसळता एक सिग्रेट पेटवून योगप्रभूकडे वळून ’काय योगेश, हल्ली दिसत नाहीस कुठेच..’ असे म्हणणे आणि घाटपांडेंकडे वळून ’भरा, प्रकाशराव..’ असे म्हणणे इतपत स्मरते. त्यापुडचे काही, का कोण जाणे, स्मरतच नाही! तर तात्पर्य काय तर राजेश घासकडवी म्हणजे मिलिंद भांडारकर नव्हेत. सत्यदेव वेगळे आणि सत्यनारायण वेगळे. (घासकडवी विरुद्ध भांडारकर असे लिहीत होतो – ’लेन्स्की विरुद्ध श्लाफ्ली’ वाचल्याचा परीणाम असावा!) तर आमचे परंप्रिय घासकडवी हे जालावर तसे नवीन. त्यामानाने आम्ही जुने. त्यांच्यापेक्षा आमच्या अधिक कुकीज मस्णात गेलेल्या. ते जेन वाय तर आम्ही बेबी बूमर. त्यामुळे जालीय वादविवाद, थयथयाट यांचा त्यांना फारसा अनुभव नाही. त्यामुळे जालावर वादविवाद गवैरे झाले की ते अंमळ हळवे होतात. त्यातल्या त्यात स्त्रीमुक्ती वगैरे विषयांवर तुंबळ वगैरे हाणामाऱ्या सुरु झाल्या की काही कारण नसताना घासकडवींना कुठे लपू आणि कुठे नको असे होते. तरी मीना प्रभुंची पुस्तके, नवऱ्याच्या पैशाने जग भटकणाऱ्या भवान्या- आपलं बायका वगैरे वादाच्या वेळी ते नव्हते म्हणून बरे. पण ते असोच. त्यामुळे एकूण जालावरचा थयथयाट आणि आक्रस्ताळेपणा याला आपण तर ब्वा घाबरुनच असतो असे ते परवाच कुणाला तरी खाजगीत म्हणाले म्हणे. हे ऐकून जालावरचे आमचे दुसरे परंप्रिय मित्र विसुनाना ’च्यायला!’ असे म्हणाले असे कळते. यावर ’’नाना, माफ करा हं, पण ऐसी अक्षरे’ हे मुलाबाळांचे, ताईआक्कांचे संकेतस्थळ अहे. तेथे वावरताना भाषा जरा जपून वापरावी असे विसुनानांना राजन बापट खाजगीत म्हणाले; आणि त्यावर विसुनाना ’इचिभनं’ असे म्हणाले असेही आम्हाला परवा कुणीतरी खाजगीत सांगितले. बापट त्यानंतर या विषयावर खाजगीतही बोलायचे बंद झाले आहेत म्हणे. खरे खोटे देव जाणे हां! ! पण हे खाजगीत सांगण्याचे आणि खाजगीत ऐकण्याचे एकंदर हाताबाहेर जात चालले आहे हे बाकी खरे.
’ऐसी अक्षरे’ वरील आमची दुसरी परंप्रिय व्यक्ती म्हणजे ३-१४विक्षिप्त अदिती महोदया. त्यांच्या एकोळ्या प्रतिसादांचे आम्ही पयल्यापासून फ्यान आहोत. आणि त्यांच्या स्त्रीमुक्तीच्या चळवळीला तर आमचा कधीचाच मुलायमसिंगांसारखा बाहेरुन पाठिंबा आहे. हल्लीच्या त्यांच्या लिखाणात स्त्रीमुक्तीचा इतका जिंदाबाद जयघोष ऐकू येतो की त्या लवकरच समग्र पुरुषजातीच्या नरड्याला तलवारीचे टोक लावून ’बऱ्या बोलाने बाळंत होऊन दाखवता की नाही..’ असे विचारतील असे वाटते. त्यावर समग्र पुरुषजात घाबरुन ’अहो, अहो, आम्ही नर आहोत हो! वाटल्यास आमच्यातल्या काही लोकांच्या बीअर बेल्या बेबी बंप म्हणून चालवून घेता येतात का बघा…’ असे म्हणते आहे अशी स्वप्ने पडून आम्ही घामाघूम होऊन जागे होऊ लागलो. काळजी वाटून आम्ही शेवटी हॄषिकेशला ’दादा, हे आशानुअसं चाल्यालं हाय, मग कसंकसं म्हंता?’ असे खाजगीत विचारले. हॄषिकेश ’मराठी शुद्धलेखन पाठ तीन’ वाचत होता. हातातले पुस्तक खाली ठेऊन तो म्हणाला ’हे बघा रावसाहेब, मोठ्या मुश्किलीने मला मि आणि मी मधला फरक कळायला लागलाय. असलं काही विचारलं की लिंक तुटते हो माझी. पण आता तुम्ही विचारतायच तर सांगतो. आमचं धोरण काय आहे माहिती आहे का?’ आम्ही नकारार्थी मुंडी हलवली. हॄषिकेशने हातातले पुस्तक खाली ठेवले आणि खाकरुन तो एकदम गायलाच लागला…
’ना मै समझा
ना मै जाना
जो भी तुमने मुझसे कहा है सीन्योरीटा
मगर फिर भी
ना जाने क्यूं
सुनके मुझ्को अच्छा लगा है सीन्योरीटा.. कसं म्हणता?’ त्यावर आम्ही जो पळ काढला तो अद्याप पळतोच आहोत!
तर अशा या आमच्या परंप्रिय ३-१४विक्षिप्त अदिती महोदया यांचे हल्लीचे जालवर्तन बघून मराठीसंकेतस्थळनिवृत्ती घेतलेल्या आणखी एका राणी लक्षुंबीबाईंची आम्हांस लई आठवण येते असे आमचे परंप्रिय मित्र राजेश घासकडवी आमचे दुसरे परंप्रिय मित्र केशसुमार यांस खाजगीत म्हणत होते म्हणे. यावर ’जाऊ दे रे राजेश, झालं गेलं गंगेला मिळालं. तुला कशाला पाहिजेत आता नस्त्या उठाठेवी?’ असे केशवसुमार खाजगीत म्हणाला म्हणे. तर्तेपण असो. तर समग्र पुरुषजात समग्र स्त्रीजातीला हिणवून आणि तुच्छ लेखून राहिली आहे असे अदिती महोदयांचे ज्वालाग्रही मत आहे. पुणे-मुंबई-नाशिक हा महाराष्ट्राचा तथाकथित सांस्कृतिक त्रिकोण विदर्भ-मराठवाडा-खानदेशाला अनुल्लेखाने मारुन राहिलेला आहे असे सांगत फिरणाऱ्या असंख्य निनावी साहित्यिकांची या वेळी आठवण येते. ’कस्ले तुमचे कल्याण भेळेचे आणि तिरंगाच्या बिर्याणीचे कवतुक? आमच्या नागपुरातली एक साधी पाणीपुरी तुमच्या सगळ्या रश्श्यांना आणि नळ्यांना पुरुन उरेल…’ असे सार्थ अभिमानाने सांगणारे आमचे आणखी एक परंप्रिय मित्र चित्तरंजन यांचीही आठवण येते. (हयात असलेल्या लोकांचीही इतरांना आठवण येऊ शकते हे या निमित्ताने नम्रपणे सांगणे आवश्यक आहे.) ’सावजी मटण’ या विषयावर बोलताना चित्तरंजन यांच्या हातातल्या सिग्रेटीवर इंचभर राख जमत असे. (हरहर! गेल्या त्या मैफिली आणि गेल्या त्या सिग्रेटी!) या मैफिली बऱ्याच वेळा ’आवारे मटण हाऊस’ च्या दारातच होत असत हे विशेष.( हे ’आवारे मटण हाऊस’ हे सदाशिव पेठेच्या तोंडाशीच आहे हे जाताजाता (बापटांच्या माहितीसाठी) सांगणे अप्रस्तुत ठरु नये)या बाबतीत (म्हणजे सिग्रेटीवर राख जमवण्याच्या बाबतीत) त्यांच्याशी स्पर्धा करणारा आमचा दुसरा परंप्रिय मित्र म्हणजे योगप्रभू. योगप्रभूने एकदा एक नवी सिग्रेट पेटवली आणि एक दीर्घ कश घेऊन बोलायला सुरवात केली- आणि मध्ये एकही सेकंद न थांबता किंवा एकही झुरका न घेता ती सिग्रेट सरळ रक्षापात्रात विझवली असे बिपीन कार्यकर्त्यांनी परवा प्रकाश घाटपांडेंना खाजगीत सांगितले. घाटपांडेही हल्ली सगळ्यांचे ऐकून ऐकून विनोबांसारखे सूक्ष्मात गेले आहेत. ते बिपीनला म्हणाले की आंतरजालावरची मारामारी बघून वीट आला आहे. सगळे नुस्ते एकमेकांच्या तंगड्या खेचताहेत. त्यावर बिपीन त्यांना म्हणाला की का, तुम्हीही खेचा की कुणाच्या तरी तंगड्या. तुम्हीही काढा लोकांच्या लिखाणातले दोष. तुम्ही आता असं म्हणणं म्हणजे सौ चूहे खाके बिल्ली चली हज असं आहे. यावर घाटपांडे ’रत्नांग्रीस हवा थंड असती तर शिमला नस्ते म्हणाले आमच्या गावांस?’ या धर्तीवर म्हणाले की हम्म. नुसते लोकांचे दोषच काढत बसायचे हे आम्हाला जमले असते तर लोक श्रावण मोडक नसते म्हणाले आम्हांस? यावर मोडक खवळून ’वाट्टेल ते बोलू नका घाटपांडे. आता ’वर्तुळ-कोन सिद्धांत'’चेच उदाहरण घ्या. त्यात म्हणालो का कुणाला वाईट मी?’ असे म्हणाले असे परवाच कुणीतरी खाजगीत म्हणत होते. त्यावर आजानुकर्ण हळूच ’वाईट सोडाच, पण तुम्ही त्या लेखात काय एकूण काय म्हणाला हेही फारसे कुणाला कळाले नाही’ असे म्हणाला म्हणे. यावर मोडक अधिकच खवळून ’कर्णा, तू तेरा देख. तुझा आयडी हॅक झाल्यासारखं काहीतरी लिहिणं बंद कर आधी..’ असं काहीसं म्हणाले म्हणे.. विसुनानानी मध्येच ’मोडक, पण हे विजारजंती, आपलं विचारजंती प्रतिसाद मिळवण्यासाठी एकीकडे रतीब घालायचा आणि शतक पूर्ण करण्यासाठी दुसरीकडे.. हे काही बरे नव्हे’ असे मोडकांना चापले म्हणे. मोडक अधिकच उखडून ’नाना, तरी तुमच्यापेक्षा बरं. तुम्ही ’लाईफ ऑफ पाय’चं काय केलं? हां आता तुम्ही हुच्च्भ्रू. म्हणून तुम्ही कफ परेडला आणि लिंकिंग रोडला रतीब घालता. आम्ही तळागाळातले कार्यकर्ते. म्हणून आम्ही धारावी आणि कुर्ल्याला रतीब घालतो. पण एकूण एकच. तुम्हीही तुमचा भूतकाळ आठवा की. अगदी परवापरवापर्यंत.. परसूंकीच बात है..’ त्यावर विसुनाना ’हेज्यायलाहेज्या’ असे दादा कोंडकेंसारख्या खर्जातल्या आवाजात म्हणाले म्हणे. हे आता सगळे शेवटी हाणामारीवर येणार या शंकेने मध्ये काहीतरी बोलण्यासाठी नंदनने तोंड उघडले आणि आता तो बोलताना परत एखादी कोटी करणार की काय या शंकेने आम्ही घाबरेघुबरे झालो. एखाद्या माणसाच्या चेहऱ्याकडे बघून त्याला आता शिंक येणार आहे हे जसे कळते तसे नंदनच्या चेहऱ्यावरुन तो आता एखादी कोटी करणार हे ध्यानात येते. आम्हाला तशी शंका येताच त्याच्या बखोट्याला धरुन आम्ही त्याला एका बाजूला खेचले. ’हे बघ नंद्या,…’ आम्ही त्याला खाजगी आवाजात म्हणालो. ’ प्रत्येक वाक्यावर कोटी केलीच पाहिजे असे नाही. हे म्हण्जे एखाद्या पहिलवानाने दिसेल त्याला आता याला धोबीपछाड घालू, की घिस्सा हाणू की सवारी भरु असा विचार केल्यासारखे आहे…’ उत्तरादाखल नंदन आधी आमच्या खांद्यावर चार वेळा फडाफडा शिंकला. मग ’सुधाकर, तुम्ही आमचे कनिष्ट बंधू. आम्ही तुम्हांस सांगू नये, पण तुम्ही दारु सोडा..’ असे म्हटल्यासारखा म्हणाला, ’रावसाहेब, इतरांच्या लिखाणावर लिहून हस्तकंड शमवणारे परपुष्ट लेखक तुम्ही. तुम्ही आमच्या बोलण्या-लिहिण्याविषयी बोलू नये. हे आता तुम्ही जे बोलला त्यातल्या उपमाही उसन्या घेतलेल्या आहेत. तुम्ही स्वतंत्र लिखाणावर बोलू नये. अहो, उसात कांदा पेरायचा असला तर कांद्याचं बी विरळविरळ पेरलं जावं म्हणून त्यात भाजलेले राळे मिसळतात. राळे भाजके असल्याने काही उगवत नाहीत, फक्त कांदे तेवढे उगवतात. असले भाजके बियाणे पेरुन बांधावर मोड केंव्हा फुटतील, पीक केंव्हा येईल अशी वाट बघणारे लेखक तुम्ही. तुमच्या लिखाणातून काहीतरी उगवून आलेलं आहे का? तुम्ही म्हणजे एकतर जुन्या धान्याच्या पेवातून काहीतरी काढून त्यावर लिहिणार, नाहीतर काहीतरी भंपक काल्पनिक लिहून कंडशमन करणार…’ त्याच्या या सवालावर हतबुद्ध होऊन आम्ही शून्यात बघत राहिलो. मग भानावर येऊन त्याला म्हणालो की नंद्या तेवढं पोएटिक लायसन दे की रे आम्हाला. साल्या, कल्पनेची इल्याष्टिकं नसतील तर तुमच्या वास्तवाच्या चड्ड्या घसरणार नाहीत का खाली?’
या वाक्यावरील प्रतिक्रियेसाठी बापट अद्याप उपलब्द्ध होऊ शकलेले नाहीत.
प्रतिक्रिया
बाब्बौ...
नाव घेउन प्रा डॉ,घाटपांडे,तात्या, नीलकांत ,बजबजपुरी, मिसळपाव, ऐसीअक्षरे अशी सरळ नावे घेउन स्वच्छ शिमगा. उगीच "एक स्वस्तखाद्यनामधारी सवंग संकेतस्थळ" अशी हुच्चभ्रूंची आडवळणे नाहित.
ज ब रा ट.
कुठल्याही झगड्यात तुम्ही इकडून असा किंवा तिकडून असा; पण जे काय म्हणायचं ते थेट म्हणा , स्पष्ट म्हणा असे आम्ही म्हणतो; ते ह्यामुळेच. पण इतके स्वच्छ षटकार आम्हाला अजूनही जमले नाहित.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
हेहेहेहे
मजा आला. पण माफक.
होता है शबो रोज तमाशा मिरे आगे
खी: खी: खी:
आंतरजालीय तमाशाचा फड तसा कमीअधिक प्रमाणात सर्वांसमोरच रंगत असतो, पण असा 'अंदाज-ए-बयाँ' फक्त रावसाहेबांचाच!
इतर बाज़ीचह-ए अतफ़ाल सोबतच -"अजूनही कधीकधी ’आये कुछ अब्र’ असे झाले की आमच्या बरगड्या तेल न घातलेल्या झोपाळ्यासारख्या कुरकुरू लागतात. तर्तेही असो." - सारखी वाक्यंही खासच.
>>> तुमच्या लिखाणातून काहीतरी उगवून आलेलं आहे का?
'बरेच काही उगवून आलेले'बद्दल एकदा आपल्याशी चर्चा करायची आहे
आज इथे मौजमजेचा दिवस दिसतो
आज इथे मौजमजेचा दिवस दिसतो आहे. नाही आपल सहजच म्हणालो.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
सहजच!
'सहज'च!
हॅहॅहॅ
हॅहॅहॅ!
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
चोख!
ठार झालो आहे..
"घाटपांडेही हल्ली सगळ्यांचे ऐकून ऐकून विनोबांसारखे सूक्ष्मात गेले आहेत." काय किंवा "हे बघा रावसाहेब, मोठ्या मुश्किलीने मला मि आणि मी मधला फरक कळायला लागलाय" काय किंवा हातातल्या सिगारेटीवर साचणारी इंचभर राख काय किंवा "बर्या बोलाने बाळंत होता की नाही?" काय आणि इतर बरेच काही वाचताना अक्षरशः फु ट लो!!
शिवाय एकेकाळी "धन्यु" सारखे शब्द वापरण्याबद्दल खाजगीत कानउघडणी करणार्या रावसाहेबांनी "तर्ते', 'कस्ले' वगैरे जालीय भाषेत लिहिणे हा जालीय परंपरेचा विजय म्हणावा लागेल
एकदम "चोख" लेखन!
स्वगतः बाकी इतके स्पष्ट युजरनेम असूनही 'हृ' चा 'ऋ' काही केला नाही त्यांनी
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मजा आली.
मजा आली.
हे काय आहे ?
आमच्या सारख्या नव्या सदस्यांना काहीच कळणे अवघड आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
असेच म्हणतो. (नोव्हाउ
असेच म्हणतो.
(नोव्हाउ इग्नोरॅमस) बॅटमॅन.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ख्यॅख्यॅख्यॅ.. आपलं हे - बोंबोंबों
’अलीकडं तुरकाटी पलीकडं तुरकाटी, बामणाची …… खरकाटी’ ह्या बोंबीतली टिंबं काय 'पचली' नायत आपल्याला.
निदान 'नितंबे' (मराठी द्विवचनी ;)) हा अतिश्लील शब्द वापरावयास हरकत नव्हती.
मला तर शंका आहे हा लेख
मला तर शंका आहे हा लेख तुम्हीच लिहीलेला आहेत. आणि पुन्हा तुमचा स्किझोफ्रेनिया कोणाला समजू नये म्हणून सन्जोप रावांच्या नावाने छापून आणण्याची कंपूबाजी केलेली आहेत. बापटांचे लागेबांधे कोणाकोणाशी आहेत याचा अंदाज आहे मला!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
च्यायला एखादा लेख जरा उशीरा
च्यायला एखादा लेख जरा उशीरा वाचला की हे सगळे साले हरामखोर लोक आपल्याला म्हणायचं ते म्हणून टाकतात, आणि मग थोरामोठ्यांना प्लस वन म्हणण्यापलिकडे काही फारसं करता येत नाही. आता 'नाव घेउन प्रा डॉ,घाटपांडे,तात्या, नीलकांत ,बजबजपुरी, मिसळपाव, ऐसीअक्षरे अशी सरळ नावे घेउन स्वच्छ शिमगा.' अशा डायरेक ऍप्रोचबद्दल आम्हालाही कौतुक करायचं होतं - पण छ्या, या मनोबाने ते म्हणून टाकलं. "अजूनही कधीकधी ’आये कुछ अब्र’ असे झाले की आमच्या बरगड्या तेल न घातलेल्या झोपाळ्यासारख्या कुरकुरू लागतात. तर्तेही असो." - सारखी वाक्यंही खासच म्हणण्याचंही वाचतावाचता मेंटल नोट करून ठेवलं होतं. पण या फोकलीच्या नंदनने ते आधीच म्हटलं. त्यातही 'अंदाज ए बयान' वगैरे उर्दू (की फार्शी? या बाबतीत आम्हाला फार्शी जाण नाही म्हणून विचारतोय..) शब्द वापरून आणि ते बगीचा वगैरे काहीतरी उल्लेख करून त्याविषयी काही बोलण्याची दारं जनरल डायरने जालियनवाला बगीचाची करावीत तशी बंद करून टाकली.
बाकी भांडारकरांशी आमची क्षणभर का होईना तुलना केल्याने आमचं ऊर भरून आलं आणि आमच्या बाराबंदीच्या सर्व बंद्या तटातटा तुटायला लागल्या. पण फाईन प्रिंटमध्ये ग्लेनमोरांजी वगैरे वाचल्याने रावसाहेबांचा डाव ताबडतोब लक्षात आला, आणि मग बाराची असलेली ही मूळ बंदी आता केवळ बंडी म्हणून वापरायच्या लायकीची राहिली त्याची तक्रार कोणाकडे करावी असा प्रश्न पडला. असल्या फाइन प्रिंटी भानगडी आम्हाला आजकाल लक्षात येतात चटाचट. अगदी आत्ताआत्तापर्यंत मी 'मी नवखाच आहे जालावर' असं म्हणायचो, आणि एखाद्या नवोदित नटीने जाहीरपणे जपलेल्या कौमार्याइतक्याच काळजीपूर्वक माझी जालीय अनाघ्रतावस्था जपलेली होती. पण एखाद्या नवजात अर्भकाने लवकरच (पस्तिशीत वगैरे) आपला इनोसन्स संपल्याचं ऍक्सेप्ट करावं तसा मीही तो संपल्याचं ऍक्सेप्ट केलेलं आहे. सम पीपल आर बॉर्न विदाउट इनोसन्स, सम वर्क ऍट लूझिंग इट, आणि फॉर सम, इट इज फोर्सफुली टेकन अवे फ्रॉम देम या उक्तीतल्या तिसऱ्या कॅटेगरीत आहे हे स्वतःपुरतं स्वीकारण्यासाठी मला सायकिऍट्रिस्टच्या पोराच्या कॉलेजची ट्यूशन भरावी लागली. पण ते एक असो.
शिसानविवि
शिसानविवि. लेखनसीमा.
_________/\_______
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
+१
सहमत
दंडवत!!
स्वीकार व्हावा!!
बाकी उरलेले कवित्वही येऊ द्या!
_/\_
शिमगाच कि हो हा.....
घरबसल्या
हा लेख शिमग्याचा आनंद देऊन गेला. रावसाहेब, नानासाहेब, तात्यासाहेब, डॉ. साहेब इत्यादि सर्वच साहेब वा साहेबिणी, वयाने आमच्या पेक्षा सान असले तरी आम्हाला गुरुतुल्य आहेत. या सर्वांचेच लेख वाचताना आणि वाचनखुणांत साठवताना आम्हाला 'उच्च उच्च' वाटते.
आवडले.
काही जाहीर आणि बरेचसे खाजगी आवडले.
-Nile
+
आवडले.
(स्वगतः च्यायला या घासकडवीपेक्षा आम्ही जालावर जुने असूनही आमचा उल्लेख नाही? आणि घासकडवीवर चार पाच वाक्यं?)
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अज्ञानात सुख
इतक्या आंतरजालीय स्थळांचा उदयास्त झाला याचे ज्ञान नसल्याने ,
अज्ञानात सुख अजूनही प्रेझेंट कंटिन्यूअस आहे.
कल्पनेची इल्याष्टिकं नसतील तर तुमच्या वास्तवाच्या चड्ड्या घसरणार नाहीत का खाली?’
कल्पनेची इल्याष्टिकं नसतील तर
हे वाक्य मी 'वास्तवाची इल्याष्टिकं नसतील तर तुमच्या कल्पनेच्या चड्ड्या घसरणार नाहीत का खाली?' असं वाचलं आणि फुर्रकन का कायसं म्हणतात तसं हसलो.
फारसे संदर्भ माहित नाहीत तरी
फारसे संदर्भ माहित नाहीत तरी काही ठिकाणी वाचताना हसू आवरले नाही. आयड्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांची अतीशयोक्ती भारीच.
छानच.
खुदू खुदू हसू आले. 'बर्या बोलाने बाळंत होता की नाही?' इथे मात्र खो खो
अर्कचित्रे
आणि ठणठणपाळी शिमगा आवडला.
(No subject)
बिपिन कार्यकर्ते
ज ह ब र द स्त!
ज ह ब र द स्त!
__________/\____________
भरून पावलो आहे.
- (कुठेली वाक्ये कोट करू आणि कुठली नको ह्या विवंचनेत असलेला) सोकाजी
ब्लॉग हा माझा...
सांगे स्वतःचीच कीर्ती
होली कब है? कब है होली?
- तो शतमूर्ख
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
स्मगत आहासि वाया
या प्रतिसादास 'होलिअर दॅन दाऊ' म्हणता येईल काय?
होळी
हा लेख दुसर्यांदा वाचूनही इतकी मजा आली की उद्या महाराष्ट्र दिन नसून होळीच आहे, असे समजून आम्ही मुदपाकखान्यात पुरणपोळ्यांची आर्डर दिली आहे आणि आता भांगेच्या शोधात घराबाहेर पडणार आहोत.