सरणार कधी रण..?
सरणार कधी रण.... (येथे ऐका)
बाजीप्रभू उवाच - हे देवा, हे परमेश्वरा, कधी रे सरणार हे युद्ध..? अजून माझ्या शिरावर किती घाव बसणार आहेत ते तरी सांग एकदा..!
हां हां, असं नको समजूस की मी हिंमत हारलो आहे! ..आणि हारणारही नाही कधी! माझा शिवबा जो पर्यंत विशाळ्यावर पोहोचत नाही ना, तो पर्यंत मी नक्की मरत नाही रे.. अगदी खात्री बाळग. तिथे तुझीही मर्जी चालणार नाही रे. मी फक्त 'हे रण सरणार कधी', इतकं सहजच विचारतो आहे..!
काही नाही रे, समोर जरा धुरकट दिसू लागलं आहे, छाती थोडीशी फाटायला आली आहे, पण चिंता नाही रे देवा..
'अजून जळते आंतरज्योती..!'
ही आतली ज्योत, ही आंतरज्योती अजून जळते आहे. ती कधीच विझणार नाही जो पर्यंत माझा शिवराय विशाळ्यावर पोहोचत नाही..! ही आंतरज्योत माझ्या शिवबानेच पेटविली आहे रे.. ती विझायची बातच सोड..!
तात्या उवाच - 'आंतरजोती' शब्दावर दीदीचा अलगद लागलेला शुद्ध मध्यम खरोखरच ती ज्योत, नव्हे बाजींची ती आंतरज्योत दाखवून जातो. बाह्य शरीरावर हजारो जखमा झाल्या आहेत, पण तरीही ती आंतरज्योत तितकीच शांतपणे तेवत आहे. आणि तेवत राहील जोवर महाराज विशाळ्यावर पोहोचत नाहीत तोवर.!
महाराजांनी कुठून आणली ही माणसं? कुठलं एंप्लॉयमेन्ट एक्स्चेन्ज अन् कुठलं बॉडी शॉप..? पर्कस् किती व कोणते..?
बाजीप्रभू उवाच - देवा, खूप जखमा झेलल्या रे या देहावर. इतक्या की आता शरीराची चाळण झाली आहे अन् झालेल्या प्रत्येक जखमेतून प्राण बाहेर पडू पाहताहेत..! डोळेदीखील आत थोडे मिटू पाहात आहेत, तलावार जमिनीवर गळून पडली आहे..!
तात्या उवाच -
होय तनूची केवळ चाळण..??
तनूची चाळण..? वाचकहो, मंडळी आपण आता एक काम करू.. आत्ता घरात एखादी ब्लेड किंवा सुरी असेल ना, तिने फक्त तर्जनीवर वा अंगठ्यावर फार नाही, फक्त अर्धा-पाव इंचाची जखम करून पाहू.. म्हणजे 'तनुची चाळण..' हा नक्की काय प्रकार आहे हे तुमच्या-माझ्या लक्षात येईल..! च्यामारी बोट चोखत 'दुखतंय गं खूप..' असं म्हणत नाय आईच्या वा बायकोच्या कुशीत शिरलात तर नावाचा तात्या नाही..!
अन् इथे काय? तर तनूची चाळण..??
जाऊ द्या मंडळी, उगाच अधिक काही लिहित बसत नाही..!
आपल्या मायमराठीत अनेक उत्तमोत्तम कवी झाले, यापुढेही होतील, परंतु बाजीप्रभूंचं हे मनोगत फक्त अन् फक्त कुसुमाग्रजच लिहू शकतात..!
मास्टर दिनानाथरावांची मुलं किती गुणी असावीत..? हृदयनाथ हे गाणं बांधातात काय अन् दीदी ते गाते काय..!
बाजीप्रभू, कुसुमाग्रज, हृदयनाथ, दीदी.. सगळेच भन्नाट..! पण सर्वांहून भन्नाट अन् केवळ अलौकिक असे शिवराय..!
जाऊ द्या मंडळी, मी खूप छोटा माणूस आहे. आता संपवतो हे लेखन.!
-- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
तात्या!
ते रण झाले तेंव्हा मी तर नव्हतो.
पण बाबासाहेब पुरंदरे आठवतात. ७-८वीत असतांना तो प्रसंग जिवंत करून सांगणारे.
मग ते बाजी. त्या व्हिडिओत तरवार आहे हातात. बाजी दांडपट्टा खेळवत होते. (म्हणे) जवळ येण्याची हिम्मत नव्हती गनीमांत. कान तोफेच्या इशार्याकडे..
कधीतरी तो पावनखिंडीचा ट्रेक पायी चालून बघा. जाम मजा येते.
(भरून आलेला)
आडकित्ता
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
तात्या,
प्रकाटाआ.
(डबल पोस्ट)
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
अप्रतिम
तात्या, अप्रतिम लेख. जीयो!
कुसुमाग्रज
एखाद्या गाण्याने भारून जाऊन लेखन करण्याची तुमची पद्धत भिडते. इतिहासातला एक रक्ताने माखलेला सोन्याचा क्षण, लताचे स्वर, आणि त्यातून येणारे कुसुमाग्रजांचे शब्द. कुसुमाग्रजांनी लिहिलेली कविता त्या प्रसंगावर आधारित असलेली तरी ती त्यापलिकडे जाण्यात यशस्वी झालेली आहे. पावनखिंडीतला निकराचा लढा हा जीवनाच्या संग्रामाचं रूपक बनतो. आयुष्याच्या आघातांचे घाव सोसले, देह छिन्नविछिन्न झाला, आता या सगळ्यातून मुक्ती कधी मिळणार? कधी वाजणार पाच तोफा?
सुंदर लेखन तात्या.
हे गाणं ऐकताना डोळ्यात पाणी येते. लताचा स्वर आणि कुसुमाग्रजांचे शब्द, हृदयनाथांचे संगीत ही त्रयी म्हणजे अधिक काय बोलावे? तुम्ही म्हणता तसे भन्नाटच!!
साक्षात..
परिस्थिती डोळ्यासमोर उभ्या करणार्या लेखन.. संगीत .. गायन कलेला त्रिवार प्रणाम...यामुळेच इतिहास अजरामर होतो आणि होत राहील...
निष्ठेचे याहून चांगले उदाहरण ते कोणते?
- निष्ठावान.. कोदरकर..
अप्रतिम बाजीप्रभूंच्या लढाउ
अप्रतिम
बाजीप्रभूंच्या लढाउ वृत्तीचे स्वामिनिष्ठेचे सुंदर वर्णन केले आहे
गाण्याची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद तात्या
.