भविष्याला आपली गरज आहे का?
'पृथ्वी वाचवा' ही घोषणा बर्याच लोकांना विनोदी वाटते. मलाही वाटते. शिवाय 'पृथ्वी' वाचवण्यासाठी लोकांना सुचवले जाणारे उपायही बरेच गमतीदार आहेत. उदाहरणार्थ, प्लॅस्टिकच्या पिशव्या न वापरणे, घरातले दिवे विनाकारण लावून न ठेवणे किंवा घरात पाणी जपून वापरणे वगैरे. काहीतरी बिघडलंय आणि हे असे उपाय केल्याने बराच फरक पडेल अशी समजूत असलेले भाबडे लोक ते उपाय प्रामाणिकपणे करतही असतील. या 'पृथ्वी वाचवा' वरून एक व्हिडिओ पाहिल्याचे आठवले, तो इथे डकवण्याचा मोह आवरत नाही.
पृथ्वी वाचवायची गरज असो वा नसो, मानवाने स्वतःला वाचवण्याची गरज आहे यावर बर्याच लोकांचे आजकाल एकमत झालेले दिसते. मानवजात नष्ट व्हायचा धोका आहे वगैरे बरेच शास्त्रज्ञही मासिकांमध्ये खळबळजनक विधाने करत असतात (खळबळ होत नाही ही गोष्ट वेगळी). पर्यावरणवाद्यांचा आणि तंत्रभीतांचा (Luddites) तर हा एक आवडीचा विषय आहे. गेल्या दोन-अडीचशे वर्षांत औद्योगिकीकरणामुळे झालेला पर्यावरणाचा र्हास, तपमानवाढ, लोकसंख्येचा विस्फोट, अन्न-पाण्याचे दुर्भिक्ष्य, आण्विक युद्धे आणि अगदी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात बदल, सौर वादळे इत्यादीपर्यंत अनेक कारणे दिली जातात. यातली सौर वादळे, उल्कापात वगैरे नैसर्गिक कारणे सोडली तर बाकीची सगळी मानवनिर्मित आहेत असे म्हटले जाते आणि हा तंत्रज्ञानाने साधलेल्या प्रगतीवर मोठा आरोप आहे. एकीकडे तंत्रज्ञानातील नवनवीन शोधांमुळे मानवी आयुष्य खूपच सुखकर झाले आहे, प्रदीर्घ झाले आहे असे विविध आकडेवारीने सांगितले जात असताना दुसरीकडे अमुक एक टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, अमुक इतके लोक उपाशी आहेत, अमुक अब्ज लोकांना स्वच्छ पाणी मिळत नाही अशीही आकडेवारी कानावर येत असते. एकीकडे सगळ्यांना शिक्षण, कामधंदा वगैरे देऊन सगळ्या जगातल्या लोकांचे जीवनमान सारखे करण्याची धडपड आणि दुसरीकडे मानवाच्या स्वच्छंद नैसर्गिक जीवनावर घाला येत असल्याची बोंब. एकीकडे लोकसंख्या भयानक वाढतेय आणि लोकांना उपाशी मरावं लागेल असा आकांत तर दुसरीकडे लोकसंख्येच्या वाढीचे आलेख काढून ती कशी स्थिर होईल हे सिद्ध करण्याची धडपड. हे सगळं पाहून नक्की काय चाललंय हे कळेनासं होतं.
माझा स्वतःचा स्वभाव अत्यंत आळशी असल्याने तंत्रज्ञानामुळे आयुष्य सुकर झाले आणि प्रचंड प्रमाणावर श्रमबचत झाली वगैरे गप्पांवर विश्वास नाही. उलट जितकी तंत्रज्ञानात प्रगती होईल तितकी भोगस्पर्धा आणि त्यामुळे कामाचे तास वाढलेलेच दिसतात. तरीही होताहोईतो तटस्थ राहून मी उत्तरे शोधण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला.
वर्तमानात खरोखर आपण म्हणतो तसा नैसर्गिक साधनसंपत्तीचा भरमसाठ वापर होतोय की नाही आणि खरंच नैसर्गिक स्त्रोत संपत आले आहेत का हे शोधताना मला Global Footprint Network बद्दल माहिती मिळाली. ही संघटना पर्यावरणाचं अकाऊंटिंग करून मानवी उपभोगाचा नैसर्गिक स्त्रोतांवर कितपत परिणाम होतो याची आकडेवारी काढते. सप्टेंबर २०११ मध्ये त्यांनी "Earth Overshoot Day" 'साजरा' केला. म्हणजे २०११ या एका वर्षात जितकी साधनसंपत्ती तयार झाली असती ती सप्टेंबर महिन्यातच वापरली गेली हे जाहीर केलं. त्यांच्या ब्लॉगवर तो लेख वाचता येईल.आता हे पाहून कोणालाही अशी शंका येईल की माणसाच्या उद्योगांचा निसर्गावर परिणाम होतोय हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले की काय? तशी ती मलाही आली आहे, पण अजून तसे म्हणण्यासाठी कोणाकडून मान्यता मिळायला पाहिजे ते मला महित नाही. त्यांच्या संस्थळावर त्यांनी लोकसंख्येचे अंदाज दिले आहेत. विशेष काहीही घडले नाही आणि जसे चालले आहे तसेच चालत राहिले तर २०५० साली लोकसंख्या ९ अब्ज असेल असा अंदाज त्यांनी बांधला आहे.
त्याचदरम्यान UNO च्या Food and Agriculture Organization (FAO) चा एक अहवाल प्रसिद्ध झाला. त्यातही २०५० साली ९ अब्ज लोकसंख्या असेल असा अंदाज केला गेला आहे. या ९ अब्ज लोकसंख्येसाठी सध्याच्या अन्नधान्य उत्पादनात ७०% वाढ झाली पाहिजे, त्यातच उपलब्ध शेतजमिनीपैकी २५% जमीन निकामी झाली आहे, ८% अर्धवट निकामी आणि १०% सुधारत आहे असे आव्हानात्मक प्रश्न उभे केले आहेत. अर्थातच नव्या तंत्रज्ञानामुळे आणि सुधारित पद्धतींमुळे आपण हे आव्हान पेलू शकू असा विश्वासही व्यक्त केलाच आहे.
मग हे नवे तंत्रज्ञान म्हणजे काय ते शोधणे आले. उत्तर थोडेसे माहितीतलेच होते. पाण्याचा अतिकिफायतशीर वापर आणि जेनेटिक्स. जेनेटिक्समधील वाईड क्रॉसिंग, सेल/टिश्यू/प्रोटोप्लास्ट कल्चर आणि सोमॅटिक सेल हायब्रिडायझेशन अशा तंत्रांची भारदस्त नावं वाचता वाचता जेनेटिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी आणि रोबोटिक्स या तीन क्षेत्रात प्रचंड वेगाने होत असलेल्या प्रगतीबद्दल कुणकुण लागली. (http://www.foresight.org/). Molecular Manufacturing आणि cell computing वगैरे भन्नाट विषय पाहून हतबुद्ध झालो आणि तशाच अवस्थेत Singularity या नवीनच संकल्पनेशी ओळख झाली. सिंग्युलॅरिटी समिटच्या संस्थळावर महिती तंत्रज्ञानातल्या चढत्या भाजणीत होणार्या वाढीबद्दल माहिती देणारी रे कर्झ्विल यांची एक चित्रफीत पाहण्यात आली. रे कर्झ्विल यांच्या मते या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ही सिंग्युलॅरिटी २०२९ सालापर्यंत गाठता येईल. त्यानंतर काय होईल हे सांगणे अवघड असले तरी माणसाने आपल्यापेक्षा कित्येकपटींनी बुद्धिमान असे यंत्र तयार केले असेल एवढे नक्की. असे हे यंत्र स्वतःपेक्षाही जास्त बुद्धिमान यंत्रं तयार करू शकेल आणि 'बुद्धिमत्तेचा स्फोट' होईल. या बुद्धिमत्तेच्या स्फोटापुढे माणसाचे सध्याचे प्रश्न अगदीच किरकोळ असतीलच शिवाय खुद्द माणसाची बुद्धिमत्ताही खूपच किरकोळ असेल. आता यावरही दुसर्याच दिशेने विचार करणारे महाभाग आहेतच. सन मायक्रोसिस्टीम्सचे संस्थापक आणि प्रमुख संशोधक, जावा या प्रोग्रॅमिंग लँग्वेजच्या रचनेचे तपशील लिहीणारे श्री. बिल जॉय यांनी लिहीलेला एक लेख (Why The Future Does Not Need Us) या बाबतीत अतिशय उद्बोधक ठरावा.
हे सगळं पाहून डोकं गरगरायला लागलं आणि "Man moves in mysterious ways his problems to resolve." यातल्या पहिल्या भागाबद्दल खात्री पटली.
पण दुसर्या भागाचं काय? तुम्हाला काय वाटतं? माणसाचे प्रश्न सुटतील? की आणखी वाढतील? वाढणार असतील तर उपाय काय?
Home
इथल्याच एका धाग्यातील चर्चेत HOme ह्या माहितीपटाचा उल्लेख केला होता.कालच पाहिला त्यातील पहिली ८३ मिनिटे बघून अस्स्वस्थ व्हायला होत होते.शेवटच्या दहा मिनिटात आशेचा किरणही दिसतो.अधिक लिहू शकत नाही. याच विषयाशी निगडित असा हा माहितीपट अवश्य बघावा.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
पाहिली आहे
होम डॉक्युमेंटरी पाहिली आहे. त्यातली पहिली ८३ मिनीटे पाहून जितका अस्वस्थ झालो त्यापेक्षा जास्त अस्वस्थ करणारा हा सिंग्युलॅरिटी प्रकार आहे, आणि त्या डॉक्युमेंटरीत शेवटच्या दहा मिनीटात दाखवलेला आशेचा किरण इथे लागू होत नाही.
सिंग्युलॅरिटीची कल्पना
सिंग्युलॅरिटीची कल्पना पॅरेनॉईड वाटली.. पण हे सर्व खूप रोचक आहे. सविस्तर प्रतिसाद वेळ मिळताच लिहिण्याचा विचार आहे.
पॅरॅनॉईड नाही.
उलट सिंग्युलॅरिटीची कल्पना काही शास्त्रज्ञांसाठी खूपच उत्साहवर्धक आहे आणि ती लवकरात लवकर गाठावी असे पयत्न आहेत. माणसाचे सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा त्यांचा अंदाज आहे.
शेतीमध्ये भरघोस उत्पादन देणार्या वनस्पतींची जनुके तयार करता येतील, हवेतून थेट नायट्रोजन घेता येईल असे जनुकीय बदलही घडवून आणता येतील. अशा बदलांमुळे जमीन कशी आहे त्याने पिकावर परिणाम होणार नाही किंबहुना पिकांसाठी जमिनीची आवश्यकताच उरणार नाही. फळांच्या नवनव्या जाती सहज निर्माण करता येतील इतकेच काय पूर्णपणे नवीच फळेही तयार होतील.
प्राण्यांमध्ये विशिष्ट प्रकारचे मांस असणारी गुरे, डुकरे निर्माण करता येतील आणि त्यासाठी जिवंत प्राणी असण्याची गरज नाही. डोके नसलेले प्राणी तयार केले जातील. अर्थात कोणाला भेजाफ्राय खायचा असेल तर त्यांच्यासाठी डोके असलेले काही प्राणी असतीलच म्हणा. आपण ज्या प्राण्यांच्या नष्ट होण्याबद्दल काळजी करतो, ते आणि आधीच नष्ट झालेले प्राणी पुन्हा निर्माण करता येतील.
शिवाय सर्व प्रकारचा कचरा रिसायकल करता येईल.
अशा रीतीने या पृथ्वीवर अन्नाची कधीही ददात राहणार नाही.
मानवी अवयवांची शेती करून निकामी झालेले अवयव बदलता आल्याने माणूस प्रदीर्घ आयुष्य जगेल. किंबहुना मेंदू डाऊनलोड करता आल्याने क्लोनिंगच्या सहाय्याने माणूस अमर होऊ शकेल किंवा म्हातारपणासाठी जबाबदार असलेला जनुक काढून टाकल्याने माणूस म्हातारा होणारच नाही.
शिवाय माणसांच्या दिमतीला त्यांचे अतिबुद्धिमान असे नोकर यंत्रमानव असतील. मॉलेक्युलर मॅन्युफॅक्चरिंगमुळे हे यंत्रमानव अगदी माणसासारखे किंबहुना माणसापेक्षा जास्त चपळ, जास्त टिकाऊ आणि जास्त ताकदवान असतील. माणूस या यंत्रमानवांच्या तुलनेत प्रत्येक बाबतीत दुय्यम असेल. तरीही अर्थात या यंत्रमानवांवर माणसाचेच नियंत्रण असेल.
विपुल प्रमाणात अन्न उपलब्ध असल्याने गरिबी मुळापासून उखडून फेकली जाईल आणि सर्वांना अन्न मिळेल. मानवतेने निसर्गावर परिपूर्ण विजय मिळवला असेल.
मार्क्स अण्णा
मार्क्स अण्णांचा सृजनशील विनाशाचा सिध्दांत हे सांगतो कि भांडवलशाही जगामधे विनाशातच सृजनाची सुरुवात असते.
भविष्याला आपली गरज आहे का?
भविष्याला आपली गरज आहे का?
आपल्याच (मानवाच्या) भविष्याबद्द्ल म्हणत असाल तर नक्कीच आहे. पण पृथ्वी किंवा जीवसृष्टीसाठी नाही असे वाटते.
प्लास्टिक कमी वापरा, कचरा कमी करा वगैरे ऊपाय करून मानवजात किंवा पृथ्वी वाचेल (म्हणजे आधी धोक्यात असेल तर!) की नाही हे माहित नाही...पण असलेला आसपासचा कचरा कमी झाला ....तर ते ही नसे थोडके ! अधिक माहितीसाठी "स्टोरी ऑफ स्ट्फ" पहा.
"नॅचरल सिलेक्शन" हे अव्याहतपणे चालूच आहे..त्यामुळे शेवटी तेच ठरवेल की जीवसृष्टीतले काय टिकेल.
लेखाचा विषय चांगला आहे..
पण लेख शेवटच्या परिच्छेदात घाईघाईत गुंडाळला आहे असं वाटलं.
आपल्याच (मानवाच्या)
मानवाच्या भविष्यातसुद्धा आपली (म्हणजे आज आहे त्या स्वरुपातल्या मानवाची) गरज आहे का हा खरा चर्चाविषय आहे. दिलेल्या दुव्यांमधले लेख वाचले (विशेषतः बिल जॉय यांचा) तर माणूस कोणाला म्हणायचे असा प्रश्न पडण्याची शक्यता आहे.
हा लेख, लेख म्हणून माझी मते मांडण्यासाठी नसून एक चर्चाविषय म्हणून मांडला होता आणि चर्चेतून आणखी नवनवीन मुद्दे येतील असे वाटले होते.
असो.
आज 6apr 2020
आज सर्व जग एका जागेवर थांबलं आहे.
कोणाच्याच आयुष्याची शास्वती नाही.
विज्ञान प्रगत असून सुध्दा ते माणसाचे रक्षण करेल ह्याची तिळमात्र खात्री नाही.
बघा विचार करा .
बुध्दी मस्त्तेचा किती ही स्फोट झाला तरी तो क्षण भंगुर असेल.
अन्यात संकट माणसाला कधी ही नेस्तनाबूत करू शकतात.