Skip to main content

अलक्ष्मी देवीची कथा

तुम्ही कधी अलक्ष्मी देवीची कथा ऐकलीय का? नसणारच ऐकली मला खात्री आहे . कारण इतर देवींसारखं तिला ही सगळंच खूप गुडी गुडी करून सादर केलं गेलंय.

पण त्यामुळे काही फार फरक नाही पडत. तिच्या देवळाच्या परिसरात जाताच तुम्हाला जाणवत की काही तरी गडबड आहे इथे .

इथे काही नेहमीसारखा पवित्र प्रसन्न मंगल असं काही वाटत नाही ब्वा. इथे सगळीच गडबड आहे .

अलक्ष्मी मातेची मूर्ती फार वेगळी आहे. इतर देवींसारखा तिला साज शृंगार काही आवडत नाही.

ती अतीच गोरी (पांढरी) आहे . चेहऱ्यावर छद्मी भाव आहेत. डोळे कुणालाही हिप्नोटाईज करतील असे वेगळेच तेजस्वी आहेत.

आता लोकांचा साडी चोळीचा धंदा व्हावा म्हणून तिला साडी नेसवली जाते पण तिच्या चेहऱ्यावरच्या भावाशी एकूण तिला यात इंटरेस्ट नसावा असा भाव आहे,

रादर असलं काही बाही देऊन तुम्ही इतर देव्यांना फसवलं पण मला फसवणं जमायचं नाही असं तिला सांगावं वाटत असावं.

माझी आणि या देवीची भेट झाली कशी आणि मी सगळं इतक्या ठाम पणे कसं सांगते या विषयी आता पुरेसं कुतूहल निर्माण झालं आहे .

तर,

ऐका देवी अलक्ष्मी तुमची कहाणी.

आटपाट नगर होतं . तिथे एक मुलगी होती .

मुलगी जरा अतीच देखणी, (मुलगी आहे म्हणजे दिसायला कशी हे पहिल्यांदा सांगणे आले), हुशार, स्वप्नाळू आणि संवेदनशील इत्यादी होती.

तिला काही हे जग आहे तसं पटायचं नाही, ती रुसायची, रडायची, न नीट खायची न प्यायची न ल्यायची. अभ्यास मात्र करत असायची.

मुलीला दिवसेंदिवस (आणि रात्रीही) भलती भलती मुक्ततेची स्वप्नं पडायची. ती स्वप्नं जरी स्वतःजवळच ठेवून विसरून जायची असतात तरी ती इतरांना सांगत सुटायची.

ती स्वप्नं ऐकून तिचा बाप भलताच संतापायचा. एकतर आधी मुलगी, त्यात ती सर्वसामान्य नाही. डोक्यात भलभलते विचार करते.

त्यात ती देखणी (खरंतर हा प्रॉब्लेम व्हायला नको, पण मुलीच्या बाबतीत काय सांगता येत ना. चांगल्या गोष्टी पण वाईट ठरू शकतात).

तर अशा मुलीचं जे काय बालपण संपायच ते संपलं. लग्नाची वेळ आलीच. (या गोष्टीची मुलीला कायमच धास्ती.)

आता मुलगी होती म्हणजे आई असणारच.

आईला काही हे सगळं झेपायचं नाही. तिला तर ही आपली मुलगी आहे का नाही अशीच शंका येत असे.

मुलीच राहणं, वागणं, बोलणं सगळंच हळूहळू हाताबाहेर जायला लागलं.

अशावेळी टिपिकल आई करते त्याप्रमाणे देवाचं करणे भागच होते.

तेव्हा आई मुलीला घेऊन गेली पहिल्यांदा अलक्ष्मी देवीच्या मंदिरात.

मुलीला अर्थात आवडलं नाहीच पण सतत न पटणाऱ्या, न आवडणाऱ्या गोष्टी करणे हे पुढील आयुष्याचा सराव आहे हे तिला सांगण्यात आले.

म्हणून ती गेली. तिथे गेल्या क्षणीच तिला जाणवलं हे काहीतरी वेगळंच.

देवीच्या दर्शनासाठी गाभाऱ्यात गेली .

सरावाप्रमाणे हात जोडून पाहिलं देवीकडे, डोळे मिटले आणि वीज चमकावी तसे झाले. डोळे उघडून ती पाहते तो काय. चमत्कार. मूर्ती गायब.

मग तिथे भलताच गदारोळ उठला त्याचे वर्णन करण्यात विशेष नाही. (कारण अहो आपण सततच गदारोळातच जगत असतो की!)

मुलगी घरी आली. येऊन एकांतात आरशात पाहू लागली तो पाहते तो काय तिला स्वतःच्या जागी अलक्ष्मी देवीच दिसू लागली.

स्वतःमध्ये देवीचा संचार झालेला तिने शहाणपणा करून कुणाला सांगितलं मात्र नाही. (नाहीतर अहो तिचा मठ वगैरे झाला असता आणि सगळंच मुसळ केरात!)

देवीचीच कृपा.

नंतर मात्र तिचं आयुष्य बदललंच.

तिला हवं तसं तिचं आयुष्य तिने घडवलं. अभ्यास भरपूर केला होताच. भरपूर पगाराची नोकरी मिळवली.

लग्न नामे गोष्टीला निक्षून नाही म्हणली.

संसार मटेरीअल आपल्यात नाही हे तिचं म्हणणं तिच्या आई बापानं कधी पचवलं नाही. तरी तिने त्यांना दाद दिली नाही.

ती वेगळी राहू लागली. स्वातंत्र्याची किंमत आणि फायदे दोन्ही मिळवू लागली. बेजबाबदार मात्र ती नव्हती. आपल्या वागण्यासाठी दुसऱ्याला दोष देत नसे.

तिला अलक्ष्मी असल्यामुळे सात्विकतेपेक्षा राजस जगण्याची आवड होतीच.

उत्तम गोष्टी (कपडे, साहित्य, संगीत, मनोरंजन), मद्य, मांस, मुक्तपणे पुरुषभोग आदी सर्व प्रिय होत्या .

आदिम प्रेरणा दाबून टाकण्यापेक्षा त्यांना वाहून देणे तिला योग्य वाटत असे. सामान्य मुलगी असती तर तिला बालपणापासूनच्या संस्कारामुळे हे सगळे आवडूनही आवडत नाही असे दाखवावे लागले असते परंतु आता तसे करायची गरज नव्हती.

अलक्ष्मी झाल्यामुळे तिने स्वतःला आहे तसे स्वीकारले.

आपण काही सृजनाची, कौटुंबिक, महन्मंगल, पवित्र इत्यादी मातृदेवता नाही हे तिला कळले .

आपण व्यक्तीस्वातंत्र्याची, मुक्त आणि आनंदी देवता आहोत.

आणि आपण जे अहो जसे आहोत तसेही असण्यात काहीच चूक नाही हेही तिला कळले.

पुढे तिनेच मोठ्या मनाने तिच्यासारख्याच अनेक लोकांसाठी अलक्ष्मी देवीच्या मूर्तीची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करवली.

तिच्यासारख्या अनेक वेगळ्या लोकांना अलक्ष्मी देवीची कृपा लाभो आणि त्यांचे आयुष्य सुखी होवो.

ही साठा जणांची कहाणी पाच इंद्रियात सुफळ संपूर्ण.

विशेषांक प्रकार

राजन बापट Tue, 13/11/2012 - 10:45

अशक्य कथा.
मी इतकंच म्हणतो : उतू नका मातू नका असलं भन्नाट ल्याहायचा वसा टाकू नका !

... Tue, 13/11/2012 - 14:17

अलक्ष्मी सबंधित झाडूची कथा वाचली होती. हे वेगळच आहे

आतिवास Tue, 13/11/2012 - 17:15

सृजनाची, कौटुंबिक, महन्मंगल, पवित्र इत्यादी मातृदेवता >> आणि उत्तम गोष्टी (कपडे, साहित्य, संगीत, मनोरंजन), मद्य, मांस, मुक्तपणे पुरुषभोग आदी सर्व प्रिय होत्या >> या दोन टोकांच्या मध्ये - म्हणजे "मला ज्या गोष्टी उत्तम वाटतात त्यांच्यासाठी" निमित्तमात्र - कोणती बरं लक्ष्मी/अलक्ष्मी असेल (की आणखी कुणी असेल), की बाहेरच्या कुणाची गरज नसतेच खरं पाहता ..... असा विचार करते आहे!

ऋता Tue, 13/11/2012 - 23:52

आवडली कथा. कथाच काय, मी "अलक्ष्मी देवी" हे सुद्धा कधी ऐकलं नव्हतं आत्तापर्यंतं.

फक्त एक सुरुवातीला थोडं खटकलं:
"इथे काही नेहमीसारखा पवित्र प्रसन्न मंगल असं काही वाटत नाही ब्वा."
थोडी द्वयर्थी वाक्यरचना वाटली. इथे "पवित्र प्रसन्न मंगल" तर वाटतय पण "नेहेमीसारखं" नाही- काही वेगळ्या प्रकारे "पवित्र प्रसन्न मंगल" वाटतय असा अर्थं अभिप्रेत असावा. पण असंही वाटतं पटकन वाचून की देऊळ असून "पवित्र प्रसन्न मंगल" कोणत्याच प्रकारे वाटत नाहीये. असो. अलक्ष्मीला 'अमंगलाशी' जोडलं जाण्याचा संभव वाटला म्हणून सूचित करावसं वाटलं. माझाच हा गैरसमज असू शकेल.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 14/11/2012 - 23:03

अलक्ष्मी देवीची कथा आवडली.

स्वातंत्र्याची किंमत आणि फायदे दोन्ही मिळवू लागली. बेजबाबदार मात्र ती नव्हती. आपल्या वागण्यासाठी दुसऱ्याला दोष देत नसे.
तिला अलक्ष्मी असल्यामुळे सात्विकतेपेक्षा राजस जगण्याची आवड होतीच.
उत्तम गोष्टी (कपडे, साहित्य, संगीत, मनोरंजन), मद्य, मांस, मुक्तपणे पुरुषभोग आदी सर्व प्रिय होत्या .

आणि ही वाक्य विशेषकरून आवडली.

लेखिकेच्या प्रोफाईलमधलं 'भलती भोळे' हे नावही आवडलं.

आडकित्ता Thu, 15/11/2012 - 01:13

ब्रह्माऽस्मी?

संजीव Fri, 16/11/2012 - 06:25

लेख निटसा समजला नाही. काही रुपक वगैरे वापरुन लिहीला असेल, तर मला संदर्भ लागला नाही असे म्हणावे लागेल.

ह्या लेखात उल्लेखलेली अलक्ष्मी आणि भारतिय लोकदैवतांमधली अलक्ष्मी एकच आहे का?

प्रसिद्ध संशोधक व लेखक श्री. रा. चिं. ढेरे यांच्या 'लोकदैवतांचे विश्व' या पुस्तकात अलक्ष्मी वर लेख आहे, त्यातील काही वाक्ये पुढे देतो -

'भारतीय दैवतमंडलातील जेष्ठा देवी ही अनिष्ट दैवतांत गणली जाते. ती लक्ष्मीची ज्येष्ठ भगिनी असल्यामुळे तिला ज्येष्ठा म्ह्णतात आणि लक्ष्मीविरोधी गुणांनी युक्त असल्यामुळे तिला अलक्ष्मी म्हणतात. खरे तर एकाच लक्ष्मी या संकल्पनेची इष्ट आणि अनिष्ट अशी ही द्वंदात्मक अंगे आहेत. लक्ष्मीच्या इष्ट अंगाला 'पुण्य लक्ष्मी' अथवा केवळ 'लक्ष्मी' म्ह्णून संबोधायचे आणि तिच्या अनिष्ट अंगाला 'पापी लक्ष्मी' अथवा 'अलक्ष्मी' म्हणावयाचे.

श्रीसूक्तात लक्ष्मीविषयीच्या भक्तीबरोबरच अलक्ष्मीविषयीचा तिरस्कार व्यक्त झालेला आहे - (क्षुधा आणि त्रुषा यांनी जिला अवकळा आलेली आहे, अशा ज्येष्ठा अलक्ष्मीला मी नाहीशी करतो. हे लक्ष्मी, माझ्या घरातून सर्व प्रकारची अवकळा आणि दारिद्र्य दूर घालव.)

अमृतप्राप्तीसाठी देवासुरांनी समुद्रमंथन चालवले असता कालकूटानंतर समुद्रातून लक्ष्मीच्या जन्मापूर्वी अलक्ष्मीचा जन्म झाला, असे वर्णन पद्मपुराणातील ब्रम्हखंडात आले आहे - (कालकूटाच्या उद्भवानंतर काळ्या तोंडाची, तांबड्या डोळ्यांची, रुक्ष व पिंगट केसांची आणि सुरकुतलेल्या शरीराची अलक्ष्मी उत्पन्न झाली).'

वगैरे, वगैरे....

'आपण व्यक्तीस्वातंत्र्याची, मुक्त आणि आनंदी देवता आहोत'. हे तुमच्या लेखातले अलक्ष्मीचे वर्णन देखील पुराणांतील अलक्ष्मीच्या वर्णनाच्या अगदी उलटे आहे. कारण पुराणांमधे, अलक्ष्मीची निवासस्थाने अशुभ, अनिष्ट, दु:खमय, आचारभ्रष्ट आणि दुराचारयुक्त आहेत, तसेच देवांच्या मुखी तिची "दु:खदा, दु:खदारिद्र्यदायिनी, कलुषदायिनी, पापदारिद्र्यदायिनी' अशी संबोधने आलेली आहेत.

थोडक्यात, तुमचा लेख खरोखरीच्या अलक्ष्मी या लोकदैवताबद्दल आहे किंवा कसले विडंबन आहे, हे समजले नाही.

आडकित्ता Sat, 17/11/2012 - 00:29

दोन्हीवेळा समजला.
पुराणकथांत/सूक्तांत वर्णन केलेल्या अलक्ष्मीबद्दल हे नाही. हे 'सर्वमान्य' झालेल्या स्त्रीप्रतिमेविरुद्ध वागण्याचे बंड करणार्‍या स्त्रीचे वर्णन आहे.
अभ्यास करून विचारसरणी बदलेली आहे. देवी 'संचारल्यामुळे' नाही ही तिची प्रेरणा होती.
'देवी' म्हणून, 'लक्ष्मी' म्हणून स्त्रीला ठोकून पिटून एका चाकोरीत रहायला भाग पाडणार्‍या चाकोरीतली अन तरीही त्या बाहेरची एक देवताच जणू तिच्यात संचारली, तिची ही कहाणी आहे.
स्वातंत्र्याची फळे चाखण्यासाठी किंमत द्यावीच लागते, अन स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, हेही त्यात आहे.

असा काहिसा तो मला समजलेला अर्थ आहे. शक्य तितका प्राध्यापकी स्टाईलने क्लिष्ट करून सांगायचा प्रयत्न केला आहे. तुम्हीही कथा पुन्हा वाचा. (कहाणि वारंवार ऐकली तरच फळ मिळते ;) )