Skip to main content

इतिहासाच्या पुस्तकांचे नवीकरण

महाराष्ट्राच्या ९ आणि १० इयत्तांच्या इतिहासाच्या पुस्तकांचे नवीकरण झाले आणि नव्या इतिहासातून मुघल साम्राज्य, तत्पूर्वीचे रझिया सुलताना, तुघलक, इत्यादि सुलतान, 'रुपये आणे' सुरू करणारा शेरशहा सूर, तसेच राजपूत इतिहास इत्यादि वगळण्यात आले आणि सर्व भर केवळ मराठी राज्यावर देण्यात आला आहे अशा बातम्या आल्याला आता जवळजवळ महिना झाला. (मुस्लिमपूर्व इतिहासाचे काय झाले आहे हे कळले नाही.)

असे असूनहि पुरोगामी विचाराच्या 'ऐसी अक्षरे' नावाच्या बालेकिल्ल्यात त्याच्याविषयी एक शब्दहि उमटलेला नसावा असे वाटते. हे आश्चर्य व्यक्त करावे असे वाटले म्हणून हा धागा उघडला आहे.

भारत हा एकसंध देश आहे आणि आपण कोठल्याहि प्रान्ताचे वा भाषेचे असलो तरी सर्व भारताविषयी आपणास सारखेच प्रेम वाटते, ते प्रेम केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही अशा विचारावर आपण सर्व वाढलो आहोत. असे असता इतिहास असा संकुचित करण्याविरुद्ध कोणीच कसे काही बोलत नाही?

हा संकुचित विचाराचा संदेश देशाबाहेरहि पोहोचला आहे. BBC World news वर ह्यावर एक रिपोर्ट पाहिला. पाकिस्तानमध्ये क्रमिक पुस्तकांमधून अशा प्रकारचे सोयीस्कर बदल होतात असे ऐकत आलो आहोतच. त्यांच्याच पातळीला आपणासहि जायची घाई झालेली दिसते.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

अबापट Tue, 05/09/2017 - 09:30

या विषयावर ऐसी चे इतिहास प्रेमी श्री बॅटमॅन यांना मी विचारणा केली होती . त्यांचे त्या वेळचे मत या अर्थाचे काहीतरी होते " अशा बातम्या खूप येतात ( त्यात बऱ्याच वेळा तथ्य नसते ) खरच बदल झाला असेल तर बघू ( म्हणजे मत व्यक्त करू ) . अर्थात वगळलेल्या इतिहासाबद्दल , हे चूक होते आहे असेही किती जणांना वाटते याबद्दल मी साशंक आहे . पाकिस्तान मध्ये झिया कालखंडात झालेल्या सगळ्याच गोष्टींचे ( ज्यात शिक्षण पण आले) इस्लामी करण झाल्यानंतर किती पिढ्या नासल्या* आहेत हे सरळ सरळ आपल्या समोर आहे.पण लोकशाही आहे . लोकांना काही गैर वाटत नसेल तर ... दुर्दैव म्हणावे , अजून काय ? (अर्थात, वैयक्तिक माझा भारतातील अशिक्षित गरीब मतदात्याच्या सुजाण पणावर पूर्ण विश्वास आहे . आता बघू पुढे काय होते ते )

Nitin Palkar Thu, 07/09/2017 - 20:20

In reply to by अबापट

आपल्या एकंदरीतच ऱ्हासास पराकोटीची उदासीनता या शिवाय काहीही कारण नाही.अगदी आत्तापर्यंतआपण इंग्रजांनी लिहिलेला खोटा इतिहास शिकत होतो, आपल्या खर्या इतिहासाची आपल्याला माहितीनही आणि तो जाणून घेण्याची इच्छा नाही हे आपले दुर्दैव आहे.

नितिन थत्ते Tue, 05/09/2017 - 14:50

"लिबरल राहिल्याने धर्माचे* नुकसान होते. म्हणून कट्टर राहिले पाहिजे" असा मतप्रवाह पसरवण्यात सध्याच्या सत्ताधाऱ्यांना यश मिळाले आहे.

*धर्माचे म्हणजे धर्मबांधवांचे की कुणाचे ते ठाऊक नाही

बॅटमॅन Tue, 05/09/2017 - 16:50

खूप दिवस झाले या विषयावर लिहू की नको अशा संभ्रमात होतो. आता धागाच निघाल्याने लिहूनच टाकतो ऐसाजे.

सर्वप्रथम ज्या पुस्तकावरून इतका गदारोळ चाललेला आहे ते टीचभर पुस्तक वाचण्याचे कष्ट घेतलेत का कुणी? अवघे ९८ पानी आहे, इतिहास आणि नागरिकशास्त्र धरून. त्यातही नागरिकशास्त्र ३२ पाने भरून आहे. प्रस्तावना वगैरे सोडली तर इतिहासाचा सिलॅबस अवघा ६० पानी आहे. त्या पुस्तकाची पीडीएफ लिंकच देतो, म्हणजे लोक बिनकामाचे आणि बिनबुडाचे आरोप करणार नाहीत.

हे सातवीचे पुस्तक आहे. मूळ धाग्यात नववी व दहावीचा उल्लेख असून इथे सातवीचा उल्लेख का? तर बातम्यांमध्ये सातवीच्या पुस्तकाचा उल्लेख होता म्हणून. पुढे जमेल तसा ९ वी १० वी च्या पुस्तकांचाही परामर्श घेऊ.

http://cart.ebalbharati.in/BalBooks/pdfs/701000584.pdf

बातमी

http://www.maharashtratoday.in/now-mughal-empire-vanished-maha-state-bo…

बातमीतले मुखपृष्ठ सातवीच्या पुस्तकाचे आहे ते पुस्तकाची पीडीएफ पाहिल्यास दिसेल. मुखपृष्ठही मस्त आहे. शिवाजी महाराज व राजमुद्रा, पश्चिमसमुद्रातले मराठ्यांचे आरमार, अटक व कटक दोन्ही ठिकाणचे किल्ले, मध्ये लाल किल्ला ऑफ दिल्ली. आणि तंजावरला पुस्तके. अगदी छान सूचक.

आता आपण अनुक्रमणिका पाहू.

पहिला धडा आहे "इतिहासाची साधने" या नावाचा. इतिहास लिहितात त्याला आधार काय, कसे वगैरे दिले आहे. पान क्र. १ ते ४. मराठे सोडून बाकी कुणाचा उल्लेख नाही असे वाटते का? वाचा आणि सांगा. अख्ख्या भारताच्या परिप्रेक्ष्यात संक्षिप्तपणे उत्तम ओळख करून दिलेली आहे.

दुसरा धडा आहे "शिवपूर्वकालीन भारत" या नावाचा. पान क्र.५ ते १०. यात इ.स. सातव्या-आठव्या शतकापासून सुरुवात करून त्या काळातील लोकांची माहिती दिलेली आहे. बंगालमधील पाल राजे, पृथ्वीराज चौहान, मुहम्मद घोरी, यांचा उल्लेख आहे. तमिळनाडूच्या चोळांनी आरमारी स्वाऱ्या करून भारताबाहेरचे प्रदेश जिंकले हे सांगितलेले आहे. होयसळ, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव यांचा उल्लेख आहे. हे सगळं अर्ध्या पानात उरकलंय.

त्यानंतर मुहम्मद बिन कासिम ते दिल्ली सल्तनत. एक पान. पुढे विजयनगर साम्राज्य अर्धेपाऊण पान. बहमनी राज्य अर्धे पान. मुघल राज्य पाऊण पान. अकबराची स्तुती केली आहे. पुढच्या पानावर मुघलांशी संघर्ष करणाऱ्या उल्लेखनीय राजांची ओळख एकेक परिच्छेदात केलेली आहे. महाराणा प्रताप, चांदबिबी, राणी दुर्गावती. पुढे औरंगजेबाचा उल्लेख एक परिच्छेदभर येतो आणि त्याच्याशी यशस्वी संघर्ष करणाऱ्या आसामातील आहोम सत्तेचाही उल्लेख येतो. हा उल्लेख जनसामान्यांना अगोदर तरी माहिती होता काय? तरी पुस्तक संकुचित असल्याचे आरोप येतात.

त्यानंतर मग शीख, रजपूत आणि मराठ्यांनी मुघलांविरुद्ध केलेल्या उठावांची कहाणी प्रत्येकी एकेक परिच्छेदभरून येते आणि धडा संपतो.

तिसरा धडा आहे "धार्मिक समन्वय". पान क्र. ११ ते १३. सर्व संतमहात्म्यांचा सर्व्हे आहे. सुरुवातीला भक्ती चळवळ म्हणजे काय, तिचा उगम दक्षिण भारतात कसा झाला वगैरे दिलेले आहे. तमिळनाडूतील अळवार व नायनमार यांची माहिती एक परिच्छेदभरून आहे. त्यानंतर उत्तरेतील संत रामानंद व संत कबीर यांची माहिती एक परिच्छेद. संत मीराबाई, चैतन्य महाप्रभू आणि बसवेश्वर, प्रत्येकी एक परिच्छेद. महानुभाव एक परिच्छेद. महानुभाव प्रांताचा विस्तार पंजाब अफगाणिस्थान पर्यंत झाला होता हे आवर्जून नमूद केलेय. पुढे गुरुनानक व शीख धर्म, दोन परिच्छेद. सूफी पंथ, एक परिच्छेद. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती, शेख निजामुद्दीन अवलिया यांचा गौरवाने उल्लेख.

चौथा धडा आहे "शिवपूर्वकालीन महाराष्ट्र". पान क्र. १४ ते १८. त्यात तत्कालीन महाराष्ट्राची अस्थिर पोलिटिकल स्थिती सांगितलेली आहे. पुढे गाव, कसबा, परगणा या संज्ञांची प्रत्येकी एका परिच्छेदात माहिती.दुष्काळाचे संकट इ. बद्दल काही माहिती दोनेक परिच्छेद. पुढे वारकरी पंथ दीड पान. त्यात नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ आणि तुकाराम यांची माहिती. आणि रामदासस्वामी एक परिच्छेद.

पाचवा धडा आहे "स्वराज्यस्थापना". पान क्र. १९ ते २३. शहाजी व जिजाबाई एक पान. शिवचरित्र आहे पान क्र. २० पासून ते पान क्र. २८ पर्यंत. मध्ये सहावा धडाही त्यातच येतो. त्यातच तंजावर भोसले इ.इ. वर्णन त्यांच्या "सांस्कृतिक योगदानासकट" एक परिच्छेदभरून येते.

सातवा धडा आहे "स्वराज्याचा कारभार". पान क्र. २९ ते ३२.

आठवा धडा आहे "आदर्श राज्यकर्ता". पान क्र. ३३ ते ३६.

नववा धडा आहे "मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम". पान क्र. ३७ ते ४३. संभाजीराजे, दोन पाने. राजाराम, दीड पान. जिंजीस प्रयाण वगैरे. ताराबाई, दीड पान. जिंजीच्या किल्ल्याचा फोटो.

दहावा धडा आहे "मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार". पान क्र. ४४ ते ४६. संभाजीपुत्र शाहूची सुटका वगैरे. १ पान. बाळाजी विश्वनाथ दोनतीन परिच्छेद. पहिला बाजीराव दीडेक पान.

अकरावा धडा आहे "राष्ट्ररक्षक मराठे". पान क्र. ४६ ते ५२. नानासाहेब, अटकेपार (नकाशासह), दत्ताजी (बचेंगे तो और भी लडेंगे), पानिपत, वगैरे. थोरला माधवराव व हैदर अली टिपू इ.सवाई माधवरावापर्यंत.

बारावा धडा आहे "साम्राज्याची वाटचाल". पान क्र. ५३ ते ५६. शिंदे, होळकर, भोसले यांचे वर्णन. मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर, महादजी शिंदे, नाना फडणवीस, यांचे कार्य. अहिल्याबाईंचे धर्मकार्य व पब्लिक स्पेंडिंग याचा उल्लेख. कलकत्त्यातील मराठा डिच चा उल्लेख. महादजी शिंद्यांनी युरोपीय पद्धतीने मिलिटरी ठेवली त्याचा व वडगावच्या लढाईत इंग्रजांचा पराभव केला त्याचा उल्लेख. "आम्ही भारत मराठ्यांशी लढाया करून घेतला" हे इंग्रजांचे मत उद्धृत. नाना फडणविसांच्या मुत्सद्देगिरीचा गौरवपर उल्लेख. आरमारी आंग्रे व गुजरातच्या गायकवाडांचा उल्लेख.

तेरावा धडा आहे "महाराष्ट्रातील समाजजीवन". पान क्र. ५७ ते ६०. तत्कालीन महाराष्ट्रातील शिल्पकला, वास्तुकला, वाङ्मय, खाद्य, वस्त्र, इ.इ. घृष्णेश्वराच्य जीर्णोद्धारित देवळाचा फोटो.

एकूण पुस्तकाचा मासला आहे तो असा आहे. आता याबद्दल मला काय वाटते ते सांगतो.

१. पुस्तकात फक्त राजकीय इतिहास आहे. बाकी गोष्टींवर भर ना के बराबर, ॲट बेस्ट आनुषंगिक आहे.

२. पुस्तकात शिवचरित्र १७ पानेभरून आहे. तुलनेने शाहू व पेशवाई काळाला १३ पाने आहेत. हा बॅलन्स अजून संतुलित पाहिजे होता. पण यातला बराचसा एम्फसाईझ करण्यायोग्य भाग हा धड रिसर्चमध्येही आलेला नाही. तुलनेने शिवकाळाबद्दल खूप रिसर्च झालाय. पेशवेकाळाबद्दल तितका रिसर्च बऱ्याच अंशी झालेला नाही.

३. पुस्तकात देशाची पूर्ण पार्श्वभूमी देऊन त्यातील मराठ्यांचे महत्त्व विशद केलेले आहे. हे माझ्या मते फार आवश्यक आहे. अजूनही मराठी सत्तेबद्दल गाढ अज्ञान आणि तुच्छतेची भावना बिगरमराठी जनतेत दिसून येते. दिल्लीकडच्या प्रस्थापित इतिहास वर्तुळात मराठ्यांची घ्यावी तितकी दखल अजूनही घेतली जात नाही. हे चुकीचे आहे. शिवकाळानंतर खरेतर मराठी सत्तेचा उत्कर्ष झाला. भारतभर मराठ्यांचे कसे प्रभुत्व होते हे या पुस्तकात अजून नीट सांगायला हवे होते पण सुरुवात चांगली केली हे उत्तम आहे.

४. मलिक अंबरचा उल्लेख दिसला नाही. तो खूप मोठा माणूस होता, त्याच्या उल्लेखाला टाळणे बरोबर नाही. आता हा एकमेव मुद्दा धरून कोणी झोडणार असेल तर तशा माकडांच्या हाती हे कोलीत अगोदरच दिलेले आहे.

आता जे संकुचित असण्याचे आरोप आहेत त्यांबद्दल थोडेसे.

होय, मुघल वगैरेंना अगदी थोडक्यात आटोपलंय. पण आजवर पाठ्यपुस्तकात कधी मराठे हे राष्ट्ररक्षक होते हे वाचलं नव्हतं. मुघलांचा इतिहास जगभर शिकवला जातो. मराठ्यांच्या इतिहासाला सापत्न वागणूक सगळीकडेच मिळते. मराठ्यांची राजकीय अचीवमेंट पाहिली तर हे अतिशय विपर्यस्त आहे. हे बदलायचे असेल तर सुरुवात घरापासूनच झाली पाहिजे. ती उत्तम झालीय.

आणि जे मुघलांचे पित्ते यामुळे खवळतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य. मुसलमान सत्तांमध्ये मुघल एकटेच नव्हते. मुघलांच्या नादात बाकी बहमनी सत्तांकडे दुर्लक्ष केले जाते. ते तर सोडाच पण मुघलांना ज्यांनी विरोध केला त्यांपैकी आहोम वगैरे कैकांचा उल्लेखही आजवर कधी पाहिला नव्हता.

एकुणात- इतर हिंदू सत्तांचा जास्त कव्हरेज, मराठी सत्तेच्या भारतभरच्या लढायांना आणि एकूणच प्रभुत्वाला दिलेले केंद्रस्थान ही माझ्या मते या पुस्तकाची बलस्थाने आहेत. यात संकुचित काहीही नाही. मुघलांना थोडक्यात आटपणे हा गुन्हा नाही कारण आजवर त्यांना इतरांच्या तुलनेत इतके जास्त महत्त्व दिले गेलेय की मुघल सोडून कुणी नव्हतेच की काय असे वाटावे. त्यांना विरोध करणारेही कैकजण होते आणि सगळेच अयशस्वी झालेले नाहीत हा एक अंडरकरंट या पुस्तकाद्वारे उत्तमरीत्या दाखवला गेला आहे.

मराठी सत्ता ही देशभर पसरलेली असल्याने मराठी सत्तेचा इतिहास म्हणजे नेसेसरिली भारत देशाच्या खूप मोठ्या भूभागाचा इतिहास होतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे. मराठी सत्तेच्या इतिहासाचा अभ्यास करून संकुचितपणा येतो असे म्हणणारे लोक ज्या पद्धतीने विचार करतात ती अतिशय हास्यास्पद विचारपद्धती आहे. सध्या मराठी लोक फक्त महाराष्ट्रातच बहुसंख्येने आहेत. त्यांचे मुख्य प्रभुत्वही इथेच आहे. त्यामुळे मराठी इतिहासाला भाव दिला तर प्रांतीयवाद वाढीस लागेल अशी ती विषारी विचारपद्धती. जुन्या मराठ्यांवर सद्यकालीन स्थितीचा आरोप करून खिजवू पाहणाऱ्यांच्या बथ्थड डोक्यात हे कसे काय शिरत नाही की १८ व्या शतकात मराठे अख्ख्या भारतभर पसरलेले होते? बाकी सोडा, राघोबाचा एक प्रतिनिधी, हणमंतराव नामक ब्राह्मण १७८० च्या आसपास लंडनला जाऊनही आलेला होता. प्रायश्चित्त घेतल्यावर त्याला स्वीकारलेलेही होते. मराठे म्हणजे फक्त प्रांतीय असे हे लोक का म्हणतात? आजही मराठी नामक भाषा आहे, महाराष्ट्र नामक राज्य आहे म्हणून? जुन्या इतिहासाबद्दल बोलताना सध्याच्या परिमाणांनी का बंदिस्त रहावे? आपल्याच इतिहासाची हेटाळणी व उपेक्षा करणाऱ्यांच्या ब्रेनवॉशिंगची कमाल आहे.

पुंबा Tue, 05/09/2017 - 16:44

In reply to by बॅटमॅन

अतिशय माहितीपूर्ण प्रतिसाद.. बहुत धन्यवाद बॅटमनभौ..

अवघे ९८ पानी आहे, इतिहास आणि नागरिकशास्त्र धरून. त्यातही नागरिकशास्त्र ३२ पाने भरून आहे.

हा मुर्खपणा आहे..
इयत्ता नववीला एवढे छोटुसे पुस्तक का? या वयात अटेन्शन स्पॅन वाढलेला असतो, पुस्तक मोठे असते तरी चालले असते. वाटल्यास काही भाग परिक्षेसाठी नाही पण संकल्पना स्पष्ट करण्याकरिता असा द्यायला हवा..

बॅटमॅन Tue, 05/09/2017 - 16:45

In reply to by पुंबा

सॉरी ते सातवीचे पुस्तक आहे. बातम्यांमध्ये कॉण्ट्रोवर्सी सातवीच्या पुस्तकाबद्दल असल्याने तेच वाचले. प्रतिसादात तसा बदल करतो.

अजो१२३ Wed, 06/09/2017 - 10:42

In reply to by बॅटमॅन

बॅट्समन, रनर आणि पॅव्हिलियनमधला अजून एक जण असे तिघे एकाच बॉलवर हॅट्ट्रिक. बढिया प्रतिसाद.
==============================
शिवाय काय गाळलं आहे आणि काय सोडलं आहे हे सर्वच इयत्तांची पुस्तके एकत्र पाहून म्हणायला हवे. इथे अतिप्राचीन, प्राचीन, वैदिक, जैन, बौद्ध, पहिले मिलेनियम, राजपूत, इस्लामिक, मराठे, अन्य हिंदू, इंग्रज, महायुद्द्धे, स्वातंत्र्योत्तर इतिहास असे विभाग वेगवेगळ्या इयत्तांत शिकवतात.
=======================
बाकी बॅट्याचा शेवटचा पॅरा दणकेबाज आहे. दिल्लीत शिवाजीला थेट चोर समजतात इतका विपर्यास्त इतिहास शिकवला जाई. दिल्लीचे, पर्यायाने भारताचे मराठ्यांपासून संरक्षण??? असले कंसेप्ट. त्यातल्या त्यात ज्या कर्मठाने आपल्या मुलाला मराठ्यांची महती सांगितली त्यांचे मत बरे.
============
अहोम साम्राज्याचा उल्लेख पाहून हुरळून गेलो आहे. पवना ब्रजवासी, टिकेंद्रजित आणि थंगल जनरल यांचा देखिल उल्लेख हवा.

बॅटमॅन Tue, 05/09/2017 - 16:08

त्या तथाकथित लिबरल ब्रिटिशांच्या पाठ्यपुस्तकात ब्रिटिश एंपायरची कडी निंदा आणि त्यामुळे जगभरच्या देशांवर कशी संकटे उद्भवली हे जेव्हा शिकवले जाईल तेव्हा बघू प्रांतीयतेचं. जगातल्या सर्वश्रेष्ठ चोर लोकांनी आणि त्यांची तळी उचलणाऱ्यांनी इतरांना शहाणपण शिकवू नये.

नितिन थत्ते Tue, 05/09/2017 - 18:54

In reply to by बॅटमॅन

महाकठीण काम आहे ते. कारण धागा बहुधा या धाग्यासारखा इतिहासाच्या पुस्तकाबद्दल नव्हता. बातमी किंवा छोटे प्रश्न वाला धागा होता.

अजो१२३ Wed, 06/09/2017 - 11:25

In reply to by नितिन थत्ते

इतर असतात, खुजे असतात असे दाखवू शकला असाल.
============
आमची इतिहासाची पुस्तके मंजे नेहरू आणि गांधिंचा बॉलिवूडि नाच आणि बाकीचे सोमे गोमे येणार जाणार, त्या हिरो हिरॉइनच्या मागे, अंधुक अंधुक

नितिन थत्ते Wed, 06/09/2017 - 19:31

In reply to by अजो१२३

टेक अ चिल पिल

"दे दी हमें आजादी" हे हिंदी चित्रपटातलं एक गाणं आहे; इतिहासाच्या पुस्तकातला धडा नाही. त्या गाण्याचा वापर करून "असा इतिहास शिकवतात काँग्रेसच्या राज्यात" असा बकवास कांगावा पन्नास एक वर्ष चालू आहे.
=======================================================================
या गाण्याला "सत्याचा अपलाप" म्हणून आक्षेप घेणाऱ्यांनी पुढील गाण्यांना सुद्धा आक्षेप घ्यायला हवा
१. जहां डाल डाल पर सोनेकी चिडिया
२. मेरे देश की धरती सोना उगले
३. होठोंपे सच्चाई रहती है, जहां दिल में सफाई रहती है
.
.
.
पंध्रागष्ट आणि सव्वीसजानेवारीला वाजणारी बरीचशी गाणी

अजो१२३ Thu, 07/09/2017 - 12:19

In reply to by नितिन थत्ते

त्या गाण्याचा वापर करून "असा इतिहास शिकवतात काँग्रेसच्या राज्यात" असा बकवास कांगावा पन्नास एक वर्ष चालू आहे.

आम्ही या देशातच जन्मलो आहोत, शिकलो आहोत, मोठे झाले आहोत, नोकरी करत आहोत (ते ही केंद्र, राज्य आणि स्थानिक सरकारांच्या अगदी जवळून) तेव्हा "त्या गाण्याचा आधार" हा तुमचा जावईशोध तुम्हाला लखलाभ असो.

चिमणराव Tue, 05/09/2017 - 17:05

ही जी पुस्तके क्रमिक म्हणून आहेत ती फक्त महाराष्ट्र शासन पुरस्कृत अभ्यासक्रमासाठी आहेत? इतर जे CBSE / IBSE यांनाही आवश्यक केलेली असतात का?

धागा इथे ऐसीवर आणल्याबद्दल लेखकाचे आभार.
बॅटमॅनने विस्तृत उत्तर दिलं आहेच.

इतिहासाची साधने हा धडा आहे. स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांच्या काळातील रस्ते इमारती यांची ओळख पुसून नवीन नावे का देता? तो इतिहास नाही का? असा प्रश्न विद्यार्थीम्हणून मी विचारला तर साधनांचं काय? किती वर्षांपुर्वीची गोष्ट म्हणजे इतिहास? इथे ते राज्यकर्ते होते हे विसरायचं असेल तर १५ ओगस्टही विसरूया. त्यांच्या काळातल्या विंटिंज कार्सचं काय करायचं? अडिचशे रु तिकीट भरून पाहायच्या का?

जरा विस्कळीत विचार उसळले ते सर्व लिहून काढले.

बॅटमॅन Tue, 05/09/2017 - 17:09

१. फक्त राज्य अभ्यासक्रमाची पुस्तके. सीबीएसईची नव्हेत.

२. विषय काय, बोलताय काय? पुस्तक आहे मध्ययुगीन इतिहासाचं. तिथे रस्त्यांची नावे आणि विंटेज कार्सचा विषय येतोच कुठून? नक्की म्हणायचंय काय?

चिमणराव Tue, 05/09/2017 - 21:56

इतिहासाची साधने - त्यामधून इतिहास कळतो.इतिहास गाळला तरी ओरड होते मग साधने का पुसायची हा प्रश्न आहे.त्या ब्रिटिशांनी अथवा मोगलांनी नावं दिली ती बदलायची का?काही शाळांत ही पुस्तकं आवश्यक करता येत नाहीत मग काय करणार? शिवाय त्या शाळाही आता वाढताहेत. मग ही पुस्तकं पुढे जिपच्या शाळेपुरतीच उरतील.

बॅटमॅन Wed, 06/09/2017 - 00:03

In reply to by चिमणराव

हे पुस्तक फक्त मराठी माध्यमापुरते नसून इंग्लिश माध्यमासाठीही तेच आहे. तेव्हा फक्त सोकॉल्ड घाटी लोकच हे पुस्तक वाचतील असे आजिबात नाही.

राहता राहिला साधने पुसण्याचा प्रश्न: "अगोदर अबक, मग क्षयझ" असे नमूद केले तर अडचण काय आहे?

पुंबा Wed, 06/09/2017 - 11:13

In reply to by बॅटमॅन

राहता राहिला साधने पुसण्याचा प्रश्न: "अगोदर अबक, मग क्षयझ" असे नमूद केले तर अडचण काय आहे?

उलट केलेच पाहिजे असे..
अवांतर: रॉबर्ट लीचा पुतळा पाडणे ही योग्य कृती आहे. कारण त्याने गाजवलेले शौर्य किंवा त्याची विचारसरणी हे प्रतिगामी होते. आजच्या अमेरिकनांना त्याचे गौरवीकरण अयोग्य वाटणे योग्य आहे. त्याचप्रमाणे औरंगजेब देखिल जो धर्मांध होता त्याचे गौरवीकरण करणारी प्रतिके पुसून टाकणे योग्य आहे(जसे की पुतळे, रस्त्यांची नावे, शहरांची नावे).
बॅटमॅन सॉरी बर्का, रस्त्यांची नावे, पुतळे इतिहासाची साधने नाहीत हे माहित आहे पण...

अरविंद कोल्हटकर Tue, 05/09/2017 - 23:12

बॅटमन ह्यांच्या विस्तृत प्रतिसादानंतर - आणि त्यांनी पुरविलेल्या लिंकचा मागोवा घेऊन - मी इयत्ता .७, ८ आणि ९ ही तीन वर्षांची इतिहासाची क्रमिक पुस्तके पाहिली. महाराष्ट्राच्या इतिहासाचे आवश्यकतेपेक्षा अधिक उदात्तीकरण आणि तुलनेने भारताच्या उर्वरित इतिहासाचा संकोच ह्या पुस्तकांमधून झाला आहे हे माझे मत पुन: मांडतो. ते का?

प्रथम एक बाब नोंदवतो. सर्वच पुस्तके छपाईच्या दृष्टीने पाहिल्यास उत्तम आहेत. सुबक टाइप आणि भरपूर चित्रे ह्यामुळे पुस्तके मोहक झाली आहेत. भाषा प्रवाही आणि शुद्ध आहे. हे प्रथम मान्य केल्यावर असे दिसते की माहितीच्या भरीवपणामध्ये पुस्तके कमी पडतात. पुस्तकांची एकूण पृष्ठसंख्या ७वी - ९८, ८वी - १४६ आणि ९वी - १०६ = ३५० इतकी आहे. ह्यामध्येच प्रस्तावना. पुस्तक निर्माण करणाऱ्या तज्ज्ञांची नावे, भारतीय घटनेचे प्रास्ताविक (Preamble) असा मजकूर आहे. ह्याशिवाय पुस्तकांमध्ये नागरिकशास्त्रहि आहे. (ह्या मजकूराला आक्षेप नाही, केवळ गणती करीत आहे हे स्पष्ट करतो. ) ३५० पृष्ठांमध्ये असा प्रस्तावनेचा मजकूर ७वी - ७ पाने, ८वी - ७ पाने, ९वी - ७ पाने = एकूण २१ पाने असा आहे. नागरिकशास्त्राने घेतलेली पाने ७वी - २९ पाने, ८वी - ० पाने, ९वी - ४३ पाने = एकूण ७२ पाने इतकी आहेत. म्हणजे निव्वळ भारताच्या इतिहासाला २५७ पाने मिळतात.

त्यातही आधुनिकपूर्व इतिहास केवळ सातव्या इयत्तेच्या पुस्तकात आहे. (आठवी मध्ये स्वातन्त्र्याचा लढा आणि नववी मध्ये १९६१-२००० ह्या काळातील भारत असे विषय आहेत. सातवीच्या आधुनिकपूर्व इतिहासात शिवपूर्वकालीन भारत ६ पाने, धार्मिक समन्वय ३ पाने, शिवपूर्वकालीन महाराष्ट्र ५ पाने असे मजकूर आहेत. शिवपूर्वकालीन भारत ८व्या शतकातील पाल राज्याच्या उल्लेखाने सुरू होतो. तत्पूर्वी भारतात काही होते काय ह्याचे काहीच मार्गदर्शन पुस्तकात नाही. ह्या एकूण १४ पानांमध्ये सर्व महत्त्वाच्या राजे-बादशहांची आणि अन्य व्यक्तींची नावे आलेली आहेत पण त्यापलीकडे काहीच नाही.

अशा रीतीने महाराष्ट्राच्या इतिहासाची जी माहिती आलेली आहे ती उपयुक्त आहे ह्यात संशय नाही पण १७व्या शतकाच्या पूर्वीच्या काळाला केवळ १४ पानांमध्ये अजिबात न्याय मिळालेला नाही असे वाटते. विद्यार्थी ७व्या इयत्तेत जो १७व्या शतकापूर्वीचा इतिहास वाचणार तीच त्यांची त्या इतिहासाची एकूण समज. शालेय शिक्षण संपल्यानंतर ते कॉलेजात जातील तेथे बहुतेकांना इतिहासाशी काही देणेघेणे नसणार हे उघड आहे.

महाराष्ट्रबाह्य इतिहासाकडे जवळजवळ दुर्लक्ष हे तर आहेच पण महाराष्ट्राच्या १७व्या शतकानंतरच्या इतिहासाचे उदात्तीकऱण हा दुसरा दोष ह्या मांडणीत मला जाणवतो. 'राष्ट्ररक्षक मराठे' ह्या क्र. १० च्या धड्यामध्ये पान ५८ वर भारताचा नकाशा दाखविला आहे त्यामध्ये दिल्लीच्या आसपासचा थोडा भाग मुघलांच्या सत्तेखाली, हैदराबादच्या आसपास थोडा भाग निजामाचा, बाकी सर्व आसेतुहिमाचल भारत (पूर्वेकडील पटना, काशी, बंगाल इत्यादि सोडता) 'मराठ्यांच्या सत्तेखाली आलेला प्रदेश' अशा वर्णनाने दाखविलेला आहे. हे वस्तुस्थितीला धरून नाही. हा इतका विस्तीर्ण प्रदेश जर खऱ्या अर्थाने 'मराठ्यांच्या सत्तेखाली' असता तर तेथील सर्व जागी मराठा अंमलदार मुक्काम करून कर गोळा करतांना आणि प्रजेचे रक्षण करतांना दिसले असते. पण दिसते काय? तर प्रत्येक वेळी चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करण्यासाठी मराठ्यांना तगादे लावणे, जिकीर करणे, वेळप्रसंगी लढाई करणे ह्या उपायांनीच चौथाई आणि सरदेशमुखी उगवत असे. मराठ्यांकडे सैन्य असल्याने स्थानिक सत्ताधीश मान तुकवून चौथाई आणि सरदेशमुखी देतहि असतील पण त्याला 'सत्ता असणे' हे वर्णन लागू पडत नाही. मराठ्यांच्या ह्या ओरबाडण्याच्या सवयीमुळेच त्यांना फार थोडे मित्र उत्तरेत वा दक्षिणेत होते आणि ह्याची प्रचीति पानिपतच्यावेळी आलीच. मराठ्यांच्या बंगालमधील छळणुकीची आठवण बंगालमध्ये अजून टिकून आहे. दर्शविलेल्या ह्या 'सत्तेखालच्या प्रदेशा'पैकी खरी सत्ता शिंदे-होळ्कर-पवार-गायकवाड ह्यांचे मोठे प्रदेश आणि झाशी सारखे काही छोटे प्रदेश इतकीच होती. सर्व पंजाब, सर्व राजस्थान, बहुतांशी मध्यप्रदेश, आजचा उत्तर प्रदेश आणि बिहार, पूर्वेकडील बंगाल, सर्व दक्षिण भारत येथे धाकदपटशाने आणि जिकीर करून बादशाहाने बहाल केलेला चौथाई-सरदेशमुखीचा हक्क मानायला लावायचा ह्याला 'सत्ता असणे' हे वर्णन लागू पडत नाही. आपण सर्वसत्ताधीश आहोत असे तत्कालीन मराठ्यांना खरोखरी वाटत असेल तर बादशाहापुढे मुजरे करून सनदा पुण्याला आणायच्या आणि पेशव्यांनी फर्मानबारीपर्यंत स्वत: जाऊन आदरपूर्वक त्यांचा स्वीकार करायचा ह्या नाटकाची काय आवश्यकता होती? ह्याचे कारण असे होते की मराठ्यांना कसलेहि चिरस्थायी साम्राज्य उभारण्याची आकांक्षा नव्हती तर बादशहाची पोकळ सत्ता मान्य करून चौथाई-सरदेशमुखी उकळायची इतकाच त्यांचा स्वार्थी हेतु होता. 'राष्ट्ररक्षक मराठे' ह्याचा असा अर्थ होतो काय?

ब्रिटिशांना मराठ्यांशी संघर्ष करूनच देशावर सत्ता बसविता आली ही अशीच एक अवास्त्व बढाई. प्लासीनंतर इंग्रजांनी हातपाय पसरायला सुरुवात केली तेव्हा अंतर्गत दुफळ्यांमुळे मराठी सामर्थ्याचा संकोच होण्यास सुरुवात झालेलीच होती. पहिल्या ॲ'ग्लो-मराठा युद्धापर्यंत आणि महादजी उत्तरेत होता तोपर्यंत मराठे इंग्रजांना तुल्यबल
होते पण महादजीनंतरच्या शिंदे बाया-दौलतराव-सर्जेराव ह्यांच्यातील चुरशीमुळे शिंद्यांची ताकत उताराला लागली.
त्यातच शिंदे-होळकरांच्या आपसातील चुरशीची भर पडली. लासवारीच्या लढाईत इंग्रजापुढे शिंदे कमी पडले. पाठोपाठ रघूजी भोसल्याने देवगावच्या तहाने कटकवरचा अम्मल सोडून दिला. ह्यानंतर अष्टीच्या लढाईत १८१८ मध्ये इंग्रजांनी पेशवाईचा आणि मराठी राज्याचा अस्त केला. अन्य भारतामध्ये मराठी सत्तेची पोकळीच होती तेथे इंग्रजांनी सहजगत्या पाय पसरले. ह्या घटनाक्रमाला 'ब्रिटिशांना मराठ्यांशी संघर्ष करूनच देशावर सत्ता बसविता आली' हे वर्णन अतिशयोक्त वाटते.

हे एकांगी उदात्तीकरण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना 'भारताचा स्वातन्त्रपूर्व इतिहास' म्हणून शिकवून काय मिळणार? खोट्या अभिमानाने फुरफुरणारी ब्रिगेड काय ती तयार होईल.

अजो१२३ Wed, 06/09/2017 - 11:54

In reply to by अरविंद कोल्हटकर

मराठ्यांकडे सैन्य असल्याने स्थानिक सत्ताधीश मान तुकवून चौथाई आणि सरदेशमुखी देतहि असतील पण त्याला 'सत्ता असणे' हे वर्णन लागू पडत नाही.

या न्यायाने चित्तोड सोडाच, जयपूर देखिल मुघल कसे म्हणावे?

अजो१२३ Wed, 06/09/2017 - 12:14

In reply to by अरविंद कोल्हटकर

सर्व पंजाब, सर्व राजस्थान, बहुतांशी मध्यप्रदेश, आजचा उत्तर प्रदेश आणि बिहार, पूर्वेकडील बंगाल, सर्व दक्षिण भारत येथे धाकदपटशाने आणि जिकीर करून बादशाहाने बहाल केलेला चौथाई-सरदेशमुखीचा हक्क मानायला लावायचा ह्याला 'सत्ता असणे' हे वर्णन लागू पडत नाही.

ब्रिटिशांचे तरी भारतावर राज्य होते का असे वाटावे असा प्रतिसाद. गांधी आणि नेहरू यांना धाकदपटशाने दाबून ब्रिटिश स्वत:ला इथले राज्यकर्ते मानत?

अजो१२३ Wed, 06/09/2017 - 13:19

In reply to by अरविंद कोल्हटकर

मराठ्यांच्या बंगालमधील छळणुकीची आठवण बंगालमध्ये अजून टिकून आहे.

जालियानवाला बागची आठवण आजही पंजाबात आहे. मिरतमधे १८५७ चि आहे. त्याला सत्ता नाही म्हणणार?

'राष्ट्ररक्षक मराठे'

बहुतेक कोल्हटकरांना याच फ्रेजचा राग आला आहे. 'राष्ट्ररक्षक मराठे'? 'राष्ट्ररक्षक नेहरू' 'राष्ट्ररक्षक गांधी' च्या जागी मराठे कूठून आले?

बॅटमॅन Wed, 06/09/2017 - 01:49

मराठे लुटारू, मुघल महान आणि ब्रिटिश सर्वांहून महान ही त्रिसूत्री घोकत कितीतरी पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या. स्वातंत्र्यानंतर मराठ्यांना अभ्यासक्रमात लुटारू म्हणणे सोयीचे न राहिल्यामुळे त्यांची गणना तद्दन प्रादेशिक सत्तांमध्ये करून पेट्रनायझिंग उल्लेखांद्वारे बोळवण केली गेली. राजवाड्यांपासून आजवर इतक्या इतिहासकारांनी हाडाची काडे करून जे पत्रसंग्रह प्रकाशित केले, त्यांमधील इतिहास मात्र काही वेगळेच सांगतो. समकालीन इंग्रजी पुरावे व अव्वल इंग्रजीतील मुत्सद्यांचाही त्याला दुजोरा आहे. मराठ्यांबद्दल आकस असलेले प्रमुख लोक कोण? दिल्लीकर वर्तुळातील लोक आणि मुघल सिंपथायझर असलेला अलिगढ विद्यापीठातला कंपू. त्यांनी हरतऱ्हेने भारताचा इतिहास दिल्लीकेंद्रित कसा राहील याची काळजी घेतली. परिणामी भारतातील जनतेच्या जाणिवेत तेच होत गेले. दिल्ली सोडून जणू काहीच नाही असे कितीतरी उत्तर भारतीयांना आजही वाटत असते ते याचमुळे. कितीतरी लोकांना हे चूक वाटते, पण नीट मांडणी करता येत नाही. परिणामी काहीतरी अर्धवट जोशात लिहून जातात. शब्दबुडबुडे प्रसवण्यात प्रवीण असलेल्या दिल्लीकरांना त्यामुळे आयतेच कोलीत मिळते. त्याचा अर्थ असा नाही की मुद्यात दम नाही. मुद्यात दम आहे, खरेतर भरपूर दम आहे. उपिंदर सिंग यांच्यासारखे काही इतिहासकार आता भारताच्या इतिहासाची सम्यक मांडणी करत आहेत ही स्वागतार्ह गोष्ट आहे.

कोल्हटकर यांच्या आक्षेपांचा इथे त्या पार्श्वभूमीवर परामर्श घेणे अवश्य आहे.

त्यांचा पहिला आक्षेप म्हणजे पुस्तकात दाखवलेला नकाशा चूक आहे. हे मान्य आहे. इतक्या मोठ्या भूभागावर मराठ्यांची स्थायी सत्ता नव्हती हे खरे आहे. माझ्या मते नकाशात स्थायी सत्ता असलेला प्रदेश आणि जिथवर मराठी सैन्य पोहोचले तो प्रदेश असे दोन्ही वेगवेगळ्या रंगात दाखवले पाहिजेत. पाठ्यपुस्तकात तितका विचार केलेला दिसत नाही, तो करायला पाहिजे होता. हे जरी मान्य केले तरी मराठी फौज पेशावरपर्यंत पोहोचली होती हे का नजरेआड करावे? ते सांगितले गेलेच पाहिजे. आजवर मराठ्यांच्या चांगल्या गोष्टींची चर्चा करणे म्हणजे प्रांतीयता व जातीयतेचा शिक्का ओढवून घेणे असे समीकरण होते. हे झुगारायची वेळ आलेली नाही का?

दुसरा आक्षेप कालविसंगत आहे. पुस्तकात इतिहास शिकवताना राजकीयदृष्ट्या राष्ट्र ही संकल्पना अगोदर होती की नव्हती, नसल्यास ती कुठून आली, वगैरे उहापोह अंमळ अप्रस्तुत आहे- किमान इयत्ता सातवीला तरी. त्यामुळे राष्ट्ररक्षक मराठे या शब्दप्रयोगाला त्या अर्थाने आक्षेप तरी घेऊच नये. राहता राहिला लुटालुटीचा आरोप- अहो लुटालूट सगळेच करतात. जो प्रदेश आपल्या सत्तेखाली नाही तिथे सगळेच लूट करतात. इतकेच जर मराठ्यांना नैतिकतेच्या तराजूने तोलायचे असेल तर मुघलांना तरी का सोडायचे? मराठ्यांबद्दलचा जुना राग बंगालमध्ये असेल तर पंजाब, आसाम आणि महाराष्ट्रात मुघलांबद्दलचा जुना राग आहे त्याचे काय? सध्याचा हिंदुत्वप्रचार सोडून द्या. मराठीत आजही मनमानी अरेरावी कुणी करत असेल तर "काय मोगलाई लागून गेली का?" असे म्हणतात. ते काय उगीच टाईमपास म्हणून? शिखांच्या धार्मिक गुरूंना मुघलांनी हालहाल करून मारले. त्याची काय वाट?

मराठ्यांनी त्यांच्या प्रत्यक्ष अंमलाखालील प्रदेशाची व्यवस्था उत्तम लावली. स्वराज्याबाहेरील आणि अगोदर मोगलाईत असलेल्या मुलुखातही मुघलांपेक्षा जास्त शेतसाऱ्याचे दर लावले नाहीत. याला साक्ष पेशवा दफ्तरातील माळवा विभागाची कागदपत्रे आहेत. आणि हे मी किंवा कुणी ब्लडी हिंदुत्वसमर्थक म्हणत नाही, तर स्टुअर्ट गॉर्डन नामक ब्रिटिश इतिहासकार त्याच्या "द मराठाज" नामक पुस्तकात म्हणतो. हे केंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया या सेरीजमधील त्याचे पुस्तक आहे. आता गोऱ्यांनी म्हटले म्हणजे तरी ते खरे असलेच पाहिजे, नाही का? मराठी कागदपत्रांवरील याच अविश्वासामुळे फारसी आणि युरोपियन साधनांनाच प्रमाण मानले गेले. जदुनाथांसारखा संशोधकही यातून सुटला नाही. मराठी कागदपत्रे वाचायची तर मोडी लिपी शिकावी लागते, मराठी भाषा शिकावी लागते. कोण शिकणार? स्वस्तातलं काम म्हणजे निकालात काढलं की झालं.

मराठ्यांचा मुख्य दोष म्हणजे त्यांच्यातली दुफळी ही होय. त्यामुळे त्यांना संपवणे सोपे झाले. आणि इतरांची मदत मिळाली नाही म्हणून मराठे वाईट असे आजिबात नाही. शिवकाळातील मराठी फौज बह्वंशी हिंदू होती. औरंगजेबाच्या धर्मवेडेपणामुळे तत्कालीन संघर्षाला एक धार्मिक परिमाणही मिळाले होते. पण त्यानंतर मात्र मराठी फौजेत अक्षरश: अठरापगड जातीधर्माचे लोक होते. पानिपतच्या लढाईत शेजवलकरांच्या अंदाजाने ४५००० लढाऊ फौज १४ जानेवारी रोजी उपस्थित होती. पैकी ८००० मुसलमान गारदी होते. युरोपियनही पुढे शिंद्यांनी खूप वापरले. अशा अठरापगड लोकांची मोट बांधून मराठे पानिपतावर लढले. तत्कालीन कागदपत्रांतच "परकी अब्दालीची मुळी रुतो देणे चूक" अशा अर्थाची वाक्ये आढळतात. मुघलांचे राजकीय वारसदार आपण हे मराठे मानत आणि आचरणही तसेच करत. त्यांना मदत न करणाऱ्यांनी फक्त स्वत:चा स्वार्थ पाहिला. त्याकरिता त्यांना जसा दोष देता येणार नाही (एका मर्यादेपलीकडे) तसाच मराठ्यांनाही इतरांची मदत मिळाली नाही म्हणून तितकासा दोष देता येणार नाही.

ज्या रजपुतांचे इतके गोडवे गायले जातात, ज्या रजपुतांची मदत मराठ्यांना न मिळाल्यामुळे मराठेच फक्त दोषी असे मानले जाते, त्या रजपुतांनी निव्वळ मराठ्यांचे प्रभुत्व वाढल्यामुळे मुघलांना आपल्या मुली देणे बंद केले हे आज किती जणांना माहिती आहे? १७४०-५० च्या आसपासची गोष्ट आहे आय थिंक. सगळे रजपूत राणे पुष्करजवळ जमले आणि ठरवले की आजपासून मुघलांना मुली देणे बंद. त्यालाच पुष्कर करार म्हणतात. ज्या मराठ्यांमुळे हे शक्य झाले त्यांच्याबद्दल कृतज्ञतेचा एक शब्द तरी कुणी काढलेला दिसतो का? तरीही मराठेच वाईट!

ब्रिटिशांनी पोकळीत हळू हळू हातपाय पसरले हे खरे. पण मुख्य संघर्ष कुणाशी होता याबद्दल त्यांच्या मनात कुठलाही किंतू नव्हता. एल्फिन्स्टनच्या चरित्रातच तो सरळ म्हणतो की आम्ही भारत मराठ्यांपासून घेतला. वॉटर्लूला नेपोलियनला ज्याने हरवले तो वेलस्लीही म्हणतो की त्याच्या आयुष्यातली सर्वांत अवघड लढाई म्हणजे १८०३ ची असईची लढाई. मराठे संतमहात्मे होते असे मला आजिबात म्हणायचे नाही. पण १८व्या शतकातल्या भारताच्या राजकीय इतिहासात त्यांना डावलून पुढे जाताच येत नाही. हे त्यांचे केंद्रीय स्थान आज नीट मांडले जात नाही. त्या पाठ्यपुस्तकवाल्यांना जमलं नाही म्हणून मूळ मुद्दाच रद्दीत का टाकायला निघावे?

मराठ्यांच्या नौदलाचेही तसेच. अखिल भारतात १८व्या शतकात सर्वांत मोठे लढाऊ नौदल कुणाचे होते? मराठ्यांचे. आंग्रे, पेशवे, गायकवाड, सावंतवाडीकर आणि कोल्हापूरकर अशी एकूण सहा नौदले होती. सर्वांत ताकदवान अगोदर आंग्रे आणि मग धुळप. याचा पाया शिवछत्रपतींनी घातला. पोर्तुगीज, इंग्रज, डच या सत्तांचे सर्वांत मोठे बलस्थान म्हणजे आरमार. तिथे त्यांना जाब विचारणारी अखिल भारतात एकच सत्ता होती, ती म्हणजे मराठे. केरळातील राजांनी काही दोनेक लढाया जिंकल्या, पण मराठ्यांइतक्या आजिबात नाही. आंग्र्यांचा उल्लेख तत्कालीन वृत्तपत्रांमध्ये लुटारू म्हणून येतो. त्यामागचा बायस कुणी कधी तपासलाय? पोर्तुगीजांनी प्रथम सुरू केलेली सिस्टिम म्हणजे कार्ताझ ऊर्फ परवाना. काहीएक फी घेऊन प्रत्येक जहाज पोर्तुगीजांचे कार्ताझ घेई. कार्ताझ नसल्यास पोर्तुगीज लोक ते जहाज सरळ ताब्यात घेत. त्याचेच अनुकरण पुढे आंग्रे व धुळपांनी केले. आंग्र्यांचे प्रभुत्व इंग्रज वगैरे मानत नसल्याने त्यांची बोळवण लुटारू म्हणून केली जाते. इ.स. १६०० ते १८०० या कालावधीतील भारतातले एकमेव बहुपराक्रमी लढाऊ नौदल हे फक्त मराठ्यांचे होते. भारतीय हे केवळ जमिनीपुरते मर्यादित नाहीत आणि युरोपियन लोकांचा समुद्रातही पराभव करू शकतात हे दाखवायला मराठ्यांइतके चांगले उदाहरण दुसरे कुठले सापडेल?

आता आरमार म्हटले की सिद्दीचा विषय येणारच, आणि सिद्दीचा जंजिरा घेता आला नाही म्हणून मराठी नौदल कसे फालतू असेही लोक म्हणणारच. पण मला त्यांना असे विचारावेसे वाटते की बाबांनो इतके जर मराठी नौदल फालतू होते तर ती ढीगभर इंग्रज, पोर्तुगीज आणि डच गलबते कशीकाय मराठ्यांकडे आली? की सिद्दीचे नौदल युरोपियनांपेक्षाही श्रेष्ठ होते? वास्तविक पाहता १७३९ नंतर सिद्दीने अगोदर इतके कधीच तोंड वर केले नाही. आंग्रे व धुळपांनीही त्याच्याकडे तितके लक्ष दिले नाही. द्यायला पाहिजे होते का? हो. पण न दिल्याने त्यांचे बाकीचे पराक्रम पूर्ण निकालात निघतात का?

एकुणात पाहिले तर आजवर मराठी इतिहासाचा अभ्यास करताना मराठ्यांबद्दलची तुच्छताबुद्धी जी अगोदर इंग्रजांनी व नंतर उत्तर भारतीयांनी दाखवली ती जाणे खूप अवघड आहे असेच दिसते. पण त्या दिशेने या पाठ्यपुस्तकाने पहिले पाऊल टाकले आहे हे नक्की. कोल्हटकरांचा "खोट्या अभिमानाने फुरफुरणारी ब्रिगेड" हा शब्दप्रयोग त्यामुळे अतिशय अज्ञानमूलक आणि द्वेषपूर्ण वाटतो. विशेषत: ब्रिगेड या शब्दाच्या वापराला जी छटा आहे ती पाहता जास्तच. म्हणजे मराठ्यांच्या देशव्यापी इतिहासाला महत्त्व दिले तर संभाजी ब्रिगेडसारखे संकुचित विचारांचे लोक पैदा होतील असे त्यांना म्हणायचे आहे की काय? मराठ्यांचा इतिहास म्हणजे महाराष्ट्राचा, त्यातही फक्त एका जातीचा इतिहास नव्हे तर तो जवळपास शंभरसव्वाशे वर्षे भारतीय उपखंडाच्या बऱ्याच मोठ्या भागावर प्रभुत्व गाजवणाऱ्या एका विजिगीषु, पराक्रमी आणि प्रजाहितदक्ष सत्तेचा इतिहास आहे.

आणि खोटा अभिमान म्हणजे काय? गेल्या दोन हजार वर्षांतील भारतीय इतिहासात नर्मदेच्या दक्षिणेकडील सत्तेने उत्तरेकडील भरपूर प्रदेशावर सत्ता गाजवण्याची आजवर किती उदाहरणे आहेत? फक्त तीन. एक म्हणजे तमिळनाडूचे चोळ. त्यांनी ओरिसा व बंगालपर्यंत राज्य नेले होते म्हणतात. पण त्यापलीकडे नाही. दुसरे उदाहरण म्हणजे आजच्या कर्नाटकातील मळखेड येथे दुसरी आणि महाराष्ट्रातील लातूर येथे पहिली राजधानी असलेल्या राष्ट्रकूटांचे. उत्तरेस कनौजच्याही उत्तरेस व दक्षिणेस रामेश्वरापर्यंतच्या सर्व राजांना त्यांनी कैकवेळेस हरवले आहे. आणि तिसरे उदाहरण मराठ्यांचे. उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेतील राज्ये तितकी मोठी कधी राहिली नाहीत. पण मराठ्यांनी हे करून दाखवले. आणि नर्मदेच्या दक्षिणेस उदयाला आलेल्या सत्तेने पंजाबपर्यंत धडक मारायचे पूर्ण दोनेक हजार वर्षांत एकच उदाहरण आहे ते म्हणजे मराठ्यांचे. मुघलांच्या पूर्ण सामर्थ्याचा २५ वर्षे चिवट प्रतिकार करून त्यांचे कंबरडे मोडले मराठ्यांनी. युरोपियनांचा समुद्रात अनेकवेळेस पराभव केला मराठ्यांनी. शिवछत्रपतींना आरमाराची कसलीही माहिती नसताना त्यांनी मोठ्या धाडसाने लढाऊ आरमार तयार केले. भूयोद्धे असे कुशल आरमारी झाल्याची खूप कमी उदाहरणे सापडतात. तरीही मराठ्यांचा अभिमान म्हणजे खोटा आणि तो बाळगणाऱ्यांची म्हणे "ब्रिगेड" तयार होईल. खासा न्याय!

मराठा या शब्दाला आज एक वेगळा जातीय अर्थ आलेला आहे. मराठ्यांचा इतिहास अभिमानास्पद वाटेल असा लिहिला म्हणून हा जातीय अर्थच बळावेल ही विचारपद्धती अतिशय दुर्दैवी आणि दिशाभूल करणारी आहे. मराठ्यांचा इतिहास वगळून १८व्या शतकातील भारताचा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही हे ठसवायचा प्रयत्न हे पाठ्यपुस्तक करते. तो सर्वच प्रकारे उत्तम जमलाय असे नाही पण त्यामागचा मूळ हेतू लक्षात न घेता त्याच त्या जुनाट आक्षेपांचे रिसायकलिंग करणे हे कोल्हटकरांकडून तरी अपेक्षित नव्हते. असो.

अरविंद कोल्हटकर Wed, 06/09/2017 - 01:58

माझ्या वरच्या लेखनामध्ये मला जाणवलेले आक्षेप दोन होते ते असे:

पहिला -

अशा रीतीने महाराष्ट्राच्या इतिहासाची जी माहिती आलेली आहे ती उपयुक्त आहे ह्यात संशय नाही पण १७व्या शतकाच्या पूर्वीच्या काळाला केवळ १४ पानांमध्ये अजिबात न्याय मिळालेला नाही असे वाटते. विद्यार्थी ७व्या इयत्तेत जो १७व्या शतकापूर्वीचा इतिहास वाचणार तीच त्यांची त्या इतिहासाची एकूण समज. शालेय शिक्षण संपल्यानंतर ते कॉलेजात जातील तेथे बहुतेकांना इतिहासाशी काही देणेघेणे नसणार हे उघड आहे.

आणि दुसरा -

महाराष्ट्रबाह्य इतिहासाकडे जवळजवळ दुर्लक्ष हे तर आहेच पण महाराष्ट्राच्या १७व्या शतकानंतरच्या इतिहासाचे उदात्तीकऱण हा दुसरा दोष ह्या मांडणीत मला जाणवतो.

आपल्या अभिनिवेशपूर्ण प्रतिसादामध्ये बॅटमन ह्यांनी दुसऱ्या आक्षेपाला उत्तर दिले आहे. त्यावरचे माझे म्हणणे आणि बॅटमन ह्यांचे उत्तर दोन्ही वाचकांसमोर आहेत. ह्याबाबत मी वर लिहिल्यापलीकडे मला आणखी काही लिहिण्याची इच्छा नाही.

पण माझा पहिला आक्षेप, जो मुख्यत्वेकरून पाठ्यपुस्तकातील कमालीच्या असन्तुलतेबद्दल आहे, त्याचे काय? मी लिहिल्याप्रमाणे पाठ्यपुस्तकातील प्राचीन काळाचा इतिहास ८व्या शतकातील पाल राजांच्या त्रोटक नाममात्र उल्लेखाने सुरू होतो आणि रोलकॉल घेतल्यासारखी राजेबादशहांची नावे घेऊन 'शिवपूर्वकालीन भारत' ह्या ६ पानांमध्ये संपतो. ह्यामध्ये मुघल बादशहा, सुलतान नाममात्र आहेत तर अशोक, बुद्ध, महावीर, चन्द्रगुप्त मौर्य, गुप्त साम्राज्य, हर्षवर्धन इत्यादिकांच्या वाट्याला तितकेहि आलेले नाही. भारताचा इतिहास काय १७व्या शतकापासूनच सुरू होतो जसा पाकिस्तानचा सरकारी इतिहास महम्मद बिन कासिमपासून सुरू होतो? तीन वर्षांच्या इतिहासाच्या अभ्यासामध्ये वेगळी मांडणी करून हा सर्व प्राचीन काळापासूनचा इतिहास शाळेतील मुलांना झेपेल इतपतच सांगता आला असता, जरा ह्यापूर्वी सांगितला जातच असे. मराठ्यांची - माझ्या मते अतिरंजित - स्तवने कमी करून हे होऊ शकले असते. त्यामुळेच विद्यार्थ्यांना भारतीय परंपरेचे सम्यक् ज्ञान होईल.

अजो१२३ Wed, 06/09/2017 - 11:46

In reply to by अरविंद कोल्हटकर

महाराष्ट्रबाह्य इतिहासाकडे जवळजवळ दुर्लक्ष हे तर आहेच

महाराष्ट्राच्या बोर्डात सर्वच भागांना समान हिस्सा असणार नाही ना?

अजो१२३ Wed, 06/09/2017 - 11:53

In reply to by अरविंद कोल्हटकर

भारताचा इतिहास काय १७व्या शतकापासूनच सुरू होतो जसा पाकिस्तानचा सरकारी इतिहास महम्मद बिन कासिमपासून सुरू होतो?

भारतात भाजपचे सरकार आल्यापासून पुरोगाम्यांना भारत पाकिस्तानसारखा वाटायला लागलाय. काँग्रेसला निवडून द्या आम्ही पुन्हा भारताला भारत म्हणू अशी ती मानसिकता.
====================
इतिहास कोण लिहिला आहे, कोणासाठी लिहिला आहे, कोठल्या मुलांसाठी लिहिला, किति वयाच्या मुलांसाठी लिहिला आहे, कोठल्या प्रांततल्या मुलांसाठि लिहिला आहे आणि पहिली ते दहावी मधे तो सर्वत्र कसा विभागला आहे हे कोल्हटकरांनी पाहावे. मग मागे (तथाकथित नवीकरणाच्या आधी) काय काय शिकवले जाई ते पाहावे. फरक पाहावा.
=======================
जमल्यास रविना टंडनचा एक ट्विट देखिल पाहावा.

बॅटमॅन Wed, 06/09/2017 - 02:22

तर प्राचीन इतिहास गुंडाळलाय हा आक्षेप.

मुळात हा इतिहास मध्ययुगीन भारताचा आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तसे पाठ्यपुस्तकाच्या प्रस्तावनेत दिलेही आहे. त्यामुळे अशोक ते गुप्त व हर्षादि लोकांचा उल्लेख त्यात असणे आजिबात गरजेचे नाही. तो इतिहास इयत्ता सहावीच्या पुस्तकात व्यवस्थित कव्हर केलेला आहे. ते पुस्तक पहावे ही विनंती. त्यात अगदी हडप्पा ते गुप्त, पल्लव वगैरे सगळे दिलेले आहेत. तेव्हा महाराष्ट्राचा इतिहास १७व्या शतकापासून सुरू होतो अशा आरोपांना काही अर्थ नाही. ती मुहम्मद बिन कासिमसोबतची तुलना तर अतिशयच हास्यास्पद आहे. हडप्पा काळापासून सगळे शिकवलेय, बहामनींचाही परामर्श घेतलाय. अजून काय पाहिजे? आपल्या इतिहासाला थोडेही झुकते माप देऊ नये?

मध्ययुगीन इतिहासाचा मधला कालखंड नीट लिहिलेला नाही हा आक्षेप मान्य आहे. पण यात महाराष्ट्र बोर्डाचा विशेष दोष नाही. एकूणच भारतीय इतिहास शिकवताना मध्ययुगीन, त्यातही गुप्तोत्तर आणि मुघलपूर्व कालखंड हा कैक वर्षांपासून कुठेच नीट शिकवला जात नाही. न शाळांमध्ये न कॉलेजांमध्ये. न महाराष्ट्रात न दिल्लीत. जे एन यू अपवाद असेल फार तर. तेव्हा यात महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळ दोषी आहे हे मान्य, पण तो दोष आनुवंशिक आहे, यांचा स्वत:चा नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. भारतातल्या कुठल्याही पाठ्यपुस्तकात हा कालखंड धड शिकवलेला मिळणार नाही असे वाटते, विशेषत: राज्य बोर्डात.

बॅटमॅन Wed, 06/09/2017 - 02:47

आता नव्या पुस्तकासोबत त्याच साईटवर जुने २०१६ चे सातवीचे पुस्तकही दिलेले आहे. त्यातला मजकूर पाहिला तर त्यात पहिली ६७ पाने मध्ययुगीन भारत व शिवपूर्वकालीन महाराष्ट्र आहे. मराठ्यांचा इतिहास त्यानंतर सुरू होतो तो पान ११६ पर्यंत चालतो. आणि ज्या नकाशाबद्दल कोल्हटकरांनी इतकी नापसंती दर्शवली तो नकाशाही जुन्या पुस्तकात आहे. पहिली ७ पानेही खरेतर भारताबद्दल नाहीत. तेव्हा शिवपूर्वकालीन महाराष्ट्राची ७ पाने अजून वगळली तर ५३ पानेच उरतात. ही ५३ पाने जुन्या पुस्तकातली आणि १३ पाने नव्या पुस्तकातली पाहिली तर नव्या पुस्तकात हा मॅटर जुन्याच्या एकचतुर्थांश केलेला आहे.

तेव्हा सकृद्दर्शनी पाहता लोकांनी असा आक्रोश करणे क्रमप्राप्त आहेच. पण याचा अर्थ जुन्या पुस्तकात काहीच दोष नाहीत असा होतो का? छिद्रान्वेषी नजरेने पाहता तिथेही बरेच काही दिसेल. जमेल तसे तेही करीन. तूर्त तरी नव्या पुस्तकाचा फोकस हा महाराष्ट्र देशव्यापी कसा आहे हे सांगण्याकडे आहे हे बेष्टच.

वनराज Wed, 06/09/2017 - 03:45

अहो अशोक, बुद्ध, गुप्त, मौर्य, हर्षवर्धन वगैरे सर्व सहावीच्या पुस्तकात व्यवस्थित दिले आहेत. आक्षेप घेण्याआधी जरा सहावीचं पुस्तक पाहिलं असतं तरी चाललं असतं.
मधल्या वर्षांमध्ये काही प्रॉब्लेम झाला असल्यास माहित नाही. पण आमच्या अभ्यासक्रमात (सुमारे नव्वद साल) सहावी आणि आठवीमध्ये मिळून (महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम) शिवाजी, पेशवे, पानिपत, नाना फडणवीस वगैरे सर्व व्यवस्थित कव्हर केले होते. अगदी एकेका पेशव्याला घेऊन त्याचे मूल्यमापन केले होते. त्यामुळे हे सातवीचे पुस्तक त्यापेक्षा काही फार जास्त कव्हर करते आहे असे वाटत नाही.

१४टॅन Wed, 06/09/2017 - 08:46

In reply to by वनराज

मला नक्की इयत्ता आठवत नाहीत, पण सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य इ. भाग साधारण पाचवी-सहावीच्या पुस्तकांत होता. डीटेल्ड. हडप्पा वगैरे संस्कृतींसहित. त्याच्यात 'मध्ययुगा'ला अजिबातच स्थान नव्हतं. चौथीचं अख्खं पुस्तक फक्त शिवाजी महाराजांवर होतं.
पण, पण, पण...
मला पूर्ण बारा वर्षांत एकदाही पेशवे किंवा त्यापुढच्या मराठा साम्राज्याबाबत 'तितकं' शिकल्याचं अजिबात आठवत नाही. नंतरचा इतिहास हा परदेशातल्या क्रांत्यांनी, भारतीय स्वातंत्र्ययुद्धाने भरून गेलेला होता. मला अजूनही पेशव्यांची फॅमिली ट्री नीट येत नाही. पानिपत वाचल्यामुळे अगदी त्यातल्या अगदीच महत्त्वाच्या पात्रांचा नातेसंबंध कळला होता. सवाई माधवरावांचा कालखंड नक्की कोणता हे माहित नाही. माझ्या पिढीतल्या ('ब्याच') मधल्याही कोणालाही नाही. पानिपतचं, अत्यंत ऐतिहासिक युद्ध तर ५ वर्षांच्या इतिहासात फक्त एकाच ओळीत येऊन गेलं, पण टेनिस कोर्ट प्रतिज्ञा, बोस्टन टी पार्टी, रक्तरंजित रविवार ह्या गोष्टी अक्षरश: अक्षरन् अक्षर पाठ कराव्या लागल्या होत्या.
महाराष्ट्राचा साधारण दीडशे तरी वर्षांचा इतिहास गायब आहे. व्हॉईड. १८व्या शतकात महाराष्ट्रात काय घडलं, ह्याबाबत एक मोठ्ठं शून्य आहे फक्त.
त्यामुळे बॅटमॅन ह्यांच्या मूळ आक्षेपास +११११.

अजो१२३ Wed, 06/09/2017 - 13:15

In reply to by १४टॅन

मला जे जे लिहियचं होतं ते ते प्रतिसादात तशास तसं आलं आहे.

मला पूर्ण बारा वर्षांत एकदाही पेशवे किंवा त्यापुढच्या मराठा साम्राज्याबाबत 'तितकं' शिकल्याचं अजिबात आठवत नाही.

मोघलांच्या इतिहासात पानीपतची लढाई वाचली. अब्दाली बहुतेक त्यांच्यावर चाल करून आला होता. पानीपतची कोणती लढाई मराठ्यांसाठी महत्त्वाची हे मला १२ पर्यंत कळलं नाही. पेशव्यांच्याबद्दल त्रोटक माहीती. शिवाजींचे राज्य पेशव्यांनी हळूहळू लहान लहान करून नष्ट केले असे इंप्रेशन होते - खास करून कोणी पेशवा इंग्रजांना मिळाला. महादजी शिंदे, संताजी धनाजी, उदगीरची लढाई, १८१८ ची शेवटची लढाई, इ इ.
================
ऐसी, मिपावर राहून बराच इतिहास, तत्सम माहित झालं.

अजो१२३ Wed, 06/09/2017 - 11:44

In reply to by वनराज

आक्षेप घेण्याआधी जरा सहावीचं पुस्तक पाहिलं असतं तरी चाललं असतं.

तेच तेच. इतिहास काय तीनच कक्षांत असतो? आणि तोच तोच असतो?

चिमणराव Wed, 06/09/2017 - 05:59

खरंतर अरविंदराव,बॅटमॅन दोघांचेही काही मुद्दे पटलेले आहेत. वनराज यांनीही गाळलेला भाग सहावीच्या पुस्तकात दिला आहे हे म्हटलं आहे.

१) मराठे लढाया जिंकत दूरवर गेले , तिथे व्रवस्थापक/मांडलिक ठेवून परत पुणे/सातारा इथे आले आणि त्यांना नंतर तीसेक वर्षं( एक पिढी) तिकडचा महसूल पोहोचता होत होता असं झालं नाही बहुतेक.
२) बडोदा,इंदुर,झाशी,तंजावूरची सत्ता मराठा सत्ता होती. परंतू ते सरदार तिकडच्या भाषा चालीलीरिती वापरू लागल्याने ती मराठा सत्ता आहे हे त्यांना वाटले नसेल. ते इकडे महसुलाचा वाटा देत नसावेत. तंजावूरचा शिवाजीचा भाऊच तो स्वतंत्र उपभोक्ता होता.
४) शिवाजीनंतर तीन पिढ्या सक्षम आल्या नाहीत हे दुर्दैव॥
५) जे काही प्रयत्न झाले ते इतके यथासांग जाडजुड पुस्तकांत देण्याचा प्रयत्न मंडळ करणार नाही.
६) मराठा पॅावर नावाचे पुस्तक कुणीतरी लिहून दिल्लिकरांकडून झालेले दुर्लक्ष पुसले गेले पाहिजे.
- विस्तृत माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद

घाटावरचे भट Wed, 06/09/2017 - 12:02

In reply to by चिमणराव

६) मराठा पॅावर नावाचे पुस्तक कुणीतरी लिहून दिल्लिकरांकडून झालेले दुर्लक्ष पुसले गेले पाहिजे.

हे काम नजीकच्या भविष्यकाळात आपले रा. रा. ब्याटोपंतच करणार हे निछ्छित! बोले तो, 'कह के लेंगे'!

अजो१२३ Wed, 06/09/2017 - 13:03

In reply to by घाटावरचे भट

मराठ्यांना इतिहासात यथायोग्य स्थान मिळावे का नाही यात प्रत्येकाची आस्था वेगळी असू शकते. तसा रस असेल तर लेखकांस शुभेच्छा.
======================
पण याही पेक्षा महत्त्वाचं आहे औकात-हास लिहिणे. मागे असंतुलित लिहिलेला स्टफ, आज असंतुलित लिहायची इच्छा. म्हणून इतिहासाचा खरे खोटे पणा, राज्यांचं रिलेटिव महत्त्व, अनेक प्रकारच्या तुलना असलेलं लेखन. हे जास्त आवश्यक आहे. त्यासाठी वेग्वेगळ्या धाटणीचे इतिहासकार त्याच गोष्टिबद्दल काय म्हणतात, काय आधार देतात, काय लॉजिक देतात याची चांगली तुलना केली पाहिजे.

बॅटमॅन Wed, 06/09/2017 - 18:56

In reply to by अजो१२३

अगदी बरोबर आहे, विविध इतिहासकार एकाच गोष्टीकडे कसे पाहतात हे पाहणे रोचक असते. तसा प्रोजेक्ट अमेरिकेत आणि पायलट तत्त्वावर भारतात- बहुधा मुंबईत झाला होता असे वाटते. भारत आणि पाकिस्तान या दोहोंच्या दृष्टिकोनातून फाळणीचा इतिहास पोरांना सांगणे वगैरे.

पण हे होणे अवघड आहे, शाळापातळीवर तरी खूपच अवघड. कारणे अनेक. अनास्थाबिनास्था तर झालीच, शिवाय शिक्षणक्षेत्राची दुरवस्था, राजकीय हितसंबंध, वगैरे वगैरे.....पण अशी लेक्चर्स झाली पाहिजेत, असे लेख आले पाहिजेत हेही तितकेच खरे. एकाच गोष्टीकडे बघायचे अनेक दृष्टिकोन असू शकतात हे लोकांना लक्षात आले पाहिजे. त्याने त्यांमधील कट्टरपणा कमी होण्यास मदत होईल.

अजो१२३ Wed, 06/09/2017 - 12:33

In reply to by चिमणराव

परंतू ते सरदार तिकडच्या भाषा चालीलीरिती वापरू लागल्याने ती मराठा सत्ता आहे हे त्यांना वाटले नसेल.

मग मोघल नावाच्या परकी सत्तेखाली राहिले म्हणून भारतीयांना नावे ठेवणे बंद केले पाहिजे. मोघल स्वत: परकेपण विसरले असतील तर भारतीय देखिल विसरले असतील. मराठी सरदार स्थानिक संस्कृतीत समरस झाले ही गोष्ट मराठ्यांच्या विरोधात वापरात वापरायची तर मोघलांच्या पण वापरायची.

तिरशिंगराव Wed, 06/09/2017 - 12:09

बॅटमन व कोल्हटकरांचे प्र्तिसाद वाचनीय आहेत. शाळेत असताना, इतिहास हा विषय मला खूपच आवडायचा. पण वेगवेगळ्या यत्तांत , त्यावेळच्या पुस्तकांत , अत्यंत विस्कळीत स्वरुपांत असल्याने समाधान व्हायचे नाही. त्यांतच पुढे, स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास सुरु झाला की काँग्रेसच्या नेत्यांची प्रमाणाबाहेर भलामण आणि इतर क्रांतिकारकांवर अन्याय, हे दिसतच होतं. खरं तर, इतिहास ही एक खरी घडलेली गोष्टच असते. तर ती सहावी पासून क्रमाक्रमाने का शिकवण्यांत येत नाही ? आधी थोडं पुढचं, मग परत मागे, असं काहीसं झाल्यावर, विद्यार्थ्याचा गोंधळ उडतो.
शिवाय, इतिहास हा वस्तुनिष्ठ हवा. तसा तो आमच्या काळच्या पाठ्यपुस्तकांत होता, असेही म्हणता येणार नाही. राज्यकर्त्यांनी, संपूर्ण निरपेक्ष इतिहासकारांकडून तो लिहिला पाहिजे. त्यांत सरकारची कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ असता कामा नये. पण तसे होत नाही. मागच्या भाजपाच्या राजवटीतही, मुरली मनोहर जोशी यांनीही प्रचंड ढवळाढवळ केली होती. हे खऱ्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे.
पुढच्या पिढ्यांना,(ज्यांनी आत्ताचे राजकारणी बघितलेच नसतील) उगाचच, अनेक हिंदुहृदयसम्राटांबद्दल आदर वाटायला लागेल आणि मानवी आयुष्यांतल्या सर्व षडरिपुंना बळी पडलेल्या या नरपुंगवांना देवत्व प्राप्त होईल.

अजो१२३ Wed, 06/09/2017 - 12:26

In reply to by तिरशिंगराव

पुढच्या पिढ्यांना,(ज्यांनी आत्ताचे राजकारणी बघितलेच नसतील) उगाचच, अनेक हिंदुहृदयसम्राटांबद्दल आदर वाटायला लागेल आणि मानवी आयुष्यांतल्या सर्व षडरिपुंना बळी पडलेल्या या नरपुंगवांना देवत्व प्राप्त होईल.

आपणांस आदर असलेले ऐतिहासिक पूर्णपुरुष कोण कोण आहेत? मग आम्हाला आयडिया येईल तुम्हाला नक्की काय अभिप्रेत आहे.

वनराज Wed, 06/09/2017 - 20:07

तशी मुघलांची सुद्धा त्यांच्या साम्राज्यावर अगदी monolithic सत्ता नव्हती. राजपुतान्यावर राजपूत सरदारांमार्फत अंमल चालवत असत. तर मुद्दा असा आहे की मराठ्यांनी मुघल साम्राज्याच्या बहुतेक भागातून मुघल सत्ता उखडली. त्या भागांपैकी काही ठिकाणी आपली थेट सत्ता प्रस्थापित केली (इंदूर , ग्वाल्हेर , गुजरात वगैरे). काही ठिकाणी लोकल सत्तांना मांडलिक केले, जसे राजपुतांकडून खंडणी घेत असत. काही ठिकाणे अशी होती की तेथील मुघल सत्ता उखडली गेली होती, मराठी सत्तेची locally पकड नसेलही, त्यायोगे तेथून कधी महसून मिळत असेल, कधी नसेल, कधी वसुलीसाठी सैन्य घेऊन जावे लागत असेल. पण एक गोष्ट निश्चित होती की इतर कुणाला तेथून महसूल मिळवायचा असेल, किंवा तेथे वर्चस्व प्रस्थापित करायचे असेल, तर मराठ्यांना हरवणे भाग होते. उदाहरणार्थ Falkalnd Islands मध्ये इंग्रजांचे नगण्य अस्तित्व होते. पण अर्जेंटिनाने १९८१ मध्ये जेव्हा बळकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा इंग्रज भिडले. म्हणजेच Falkalnd Islands इंग्रजी साम्राज्याचा भाग होती. म्हणजे मराठ्यांच्या साम्राज्याच्या काही भागात local power vacuum असेल, पण at large Maratha hegemony होती.

अस्वल Wed, 06/09/2017 - 22:57

वाचून मजा आली.
------------------
इतिहास कुठे वाचता त्यावर अवलंबून आहे असं वाटतं. माझ्या मराठी शाळेत इयत्ता चौथीत आम्हाला शिवाजीचा इतिहास होता- आणि आमच्या बाईंनी तो मस्त गोष्टीरूपात सांगितला होता. त्यामुळे शिवाजी महाराज एक हिरो वाटायचे तेव्हापासून (शाईस्तेखान/अफझलखान/आग्र्याहून सुटका हे मुख्य आवडते.)
पाचवीनंतर मराठ्यांबद्दल खास वाचलेलं आठवत नाही.
आता जर का महाराष्ट्रात राहून जर कुणाला "शिवाजी चोर होता, किंवा असाच आपला कुणी एक होता" असं क्रमिक पुस्तकांत वाचावं लागत असेल तर ते चूक आहे, आणि ती चूक सुधारलीच पाहिजे.
----------------
शिवाय नवी नवी साधनं वाचून, नवा पुरावा बघून जर का रूढ इतिहासाची नवी मांडणी होत असेल तर ते उत्तमच आहे - आणि असं झालंच पाहिजे. इतकी वर्षं मुघलांबद्दल, दिल्ली सल्तनबद्दल शिकलो- आता बाकीच्यांचीही माहिती मिळू देत की. काही बिघडत नाही.
------------
ह्या सगळ्याचा फायदा राजकीय पक्ष घेतील आणि आपलाच अजेंडा पुढे चालवतील अशी भीती वाटत असेल तर नाईलाज आहे. इतिहासाची "दुसरी" बाजू, मांडायची संधीच दिली नाही हे बरोबर नाही. डावी बाजू-उजवी बाजू असं करत करत पुढे कधीतरी योग्य बॅल्न्स वाला इतिहास खरा इतिहास वाचायला मिळेल अशी आशा आहे.

वनराज Thu, 07/09/2017 - 01:44

खरा प्रॉब्लेम CBSE च्या इतिहासात आहे. https://www.flexiprep.com/Subject-Wise-NCERT-Books-PDF/History/
असंतुलित इतिहासाचे मूर्तिमंत उदाहरण! इयत्ता सातवीच्या पुस्तकात आठव्या ते अठराव्या शतकापर्यंतच्या इतिहास कव्हर केला आहे. मुघल आणि इतर सुलतान ह्यांच्याविषयी विस्तृत माहिती दिली आहे. पण त्यांच्या धार्मिक जुलमाबद्दल चकार शब्द नाही. उलट ते देवळे का तोडायचे ह्याचे जस्टिफिकेशन (पान ६५) आहे. शिवाजीच्या वाट्याला तीन-चार ओळी. इतर कुठल्याही छत्रपतींचा उल्लेख नाही. अठराव्या शतकाच्या पंधरा पानी धड्यात (दहावा धडा) मराठ्यांना जेमतेम एक पान. एकाही पेशव्याचा नावाने उल्लेख नाही. पुस्तकात चित्रे भरपूर आहेत. अकबराची एकट्याची चार वेगळी वेगळी चित्रे, इतर मुघल बादशहांची सुद्धा प्रत्येकी दोन किंवा अधिक चित्रे. यःकश्चित फरुखसियर, अवधचा नवाब आणि बंगालचा नवाब अलिवर्दी खान ह्यांची सुद्धा मोठी चित्रे आहेत. अगदी नूरजहाँ च्या फर्मानाचे सुद्धा चित्र आहे. मराठ्यांशी संबंधित एकही चित्र नाही. हा घ्या शिवाजीचा संपूर्ण इतिहास "Campaigns against the Maratha chieftain Shivaji were initially successful. But Aurangzeb insulted Shivaji who escaped from Agra,declared himself an independent king and resumed his campaigns against the Mughals." "Shivaji (1627-1680) carved out a stable kingdom with the support of powerful warrior families (deshmukhs). Groups of highly mobile, peasantpastoralists (kunbis) provided the backbone of the Maratha army. Shivaji used these forces to challenge the Mughals in the peninsula."
श्री बॅटमॅन ह्यांना विनंती आहे की ह्याबद्दल लिहावे.

बॅटमॅन Thu, 07/09/2017 - 01:47

In reply to by वनराज

क्या बात है वनराज! एक नंबर मुद्दा उपस्थित केलात. खरेतर हे सांगणे अपेक्षित आहे, त्याचीही चिरफाड अवश्य करू. थोडं थांबा फक्त. नीट सगळं वाचून सगळी चिकित्सा करूच करू. जे लोक कायम बोलतात ते इथल्या इथे पुराव्यानिशी मांडल्याने परिणाम होईल यात शंका नाही.

अजो१२३ Thu, 07/09/2017 - 12:27

In reply to by वनराज

हा इतिहास शिकवणं कैक वर्शांपासून चालू आहे. हे वाचून कोण्याही पुरोगाम्याच्चा पोटशूळ उठत नाही. मदरशांत शिवाजीचा इतिहास कसा शिकवला जातो ते अजूनही रोचक आहे.

चिमणराव Thu, 07/09/2017 - 06:53

तुम्ही इथे चिरफाड कराल परंतू या मराठीविरोधी लॅाबी/गटाने पाठ्यपुस्तक मंडळाची पुस्तके अभ्यासक्रमात येऊ नये म्हणून कशी CBSE/IBSE बोर्डांची पळवाट काढली आहे पाहा. शिवाय आता शहराशहरांतले सधन लोक आपल्या मुलांना याच cbse शाळांतच पाठवत आहेत.(भरमसाठ फिया आहेतच.)कारण त्या मुलांचा परदेशांत जाण्याचा/ आइएएस होण्याचा मार्ग मोकळा होणार.तुमच्या शिवाजीला कोण विचारतो?
डोंगर कधीच पोखरला गेला आहे

वनराज Thu, 07/09/2017 - 11:52

तुमचा मुद्दा बरोबर आहे अचरटबाबा
म्हणून इंग्रजी social media, पुस्तके, आणि mainstream research ecosystem ह्या सर्व माध्यमांतून योग्य इतिहास पुढे आणला गेला पाहिजे. नुसते मराठीत आपणच आपली पाठ थोपटत बसून फारसा उपयोग नाही. (थोडा उपयोग आहे, कारण brainwash झालेल्या मराठी लोकांची झापडे तरी निघतील). इंग्रजी academic ecosystem मध्ये (भारतीय आणि आंतरराष्ट्रीय) डाव्या, मराठीद्वेषी, हिंदुद्वेषी मंडळींचे खूपच वर्चस्व आहे.त्यामुळे हे एक दोन पिढ्यांचे काम आहे. पटकन होणारे नाही. खरे तर निष्पक्ष किंवा उजवीकडे झुकलेले असे लायक इतिहासकार जे objectively चुका सुधारू शकतील असे मुळात फार नाहीत (वर्षानुवर्षांच्या डाव्या academic domination चे फलित). सत्तेत असल्यामुळे निदान सरकारकडून विरोध होणार नाही. पण हे भाजपेयी फालतू लोकांना पुस्तके बदलायच्या कामाला लावतात आणि ही मंडळी नीट मांडणी करू शकत नाहीत, कधीकधी वेड्यासारखे दुसऱ्या extreme ला जाऊन काहीतरी claim करतात, आणि मग सगळेच मुसळ केरात जाते. त्यामुळे श्री बॅटमॅन हे जेव्हा चिरफाड करतील तेव्हा त्यांनी ती इंग्रजीमध्ये सुद्धा करून शक्य त्या त्या मीडियामध्ये टाकावी ही विनंती.

चिमणराव Thu, 07/09/2017 - 15:38

कोणाची झापडे निघतील?
आयांनासुद्धा आपले मूल cbse मध्ये नसल्याची खंत वाटते.
भिमाशंकरलाही मी cbse शाळेचा फलक पाहिला.
गडागडावरही फलक लागतील.

जाऊ दे. आताचीही पुस्तके सम्यक लिहून काढावीत, अथवा अधिक वाचनासाठी मंडळानेच पुस्तके लिहून शाळेच्या वाचनालयात ठेवण्याचे आवश्यक करावे. हे आताही करता येईल आणि वाहवा मिळवता येईल.

धर्मराजमुटके Thu, 07/09/2017 - 20:24

मस्त चर्चा ! बॅटमन यांचे सर्व प्रतिसाद आवडले.
अवांतर : पु.लं. एकदा म्हटले होते ना की शाळेत तुकाराम दोन मार्कांचा असतो तर पु.ल. किती मार्काचा असेल ? असेच काहितरी !