सांगलीतल्या वेश्यांची परदेशात दखल
वेश्याव्यवसाय म्हटलं की त्याविषयी अनेक ठोकळेबाज प्रतिक्रिया दिसतात. त्यात कार्यरत महिला नाइलाजानं किंवा जबरदस्तीनं वगैरे त्यात कार्यरत असणार; त्यांचा छळ होत असणार अशा अनेक गोष्टी गृहित धरल्या जातात. पण सांगली परिसरातल्या 'व्हॅम्प' ह्या संस्थेनं त्या भागातल्या वेश्यांना एकत्र आणून जे काम केलं आहे ते ह्या संदर्भात अनोखं आहे. त्याची दखल आता परदेशी वृत्तमाध्यमांनी घेतलेली आहे हे ह्या बातमीतून दिसून येतं. बातमीचा दुवा - http://www.guardian.co.uk/global-development/poverty-matters/2012/jul/26...
महिला सक्षमीकरणाचं उदाहरण म्हणून 'गार्डियन'मध्ये 'व्हॅम्प'चा उल्लेख आला आहे. एके काळी सांगली परिसरात एड्सचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत होता. वेश्याव्यवहार हा त्या प्रसारातला एक महत्त्वाचा दुवा होता. वेश्यांना सक्षम करून आणि सुरक्षित संभोगाचा आग्रह धरायला लावून या संस्थेनं क्रांती घडवली. एड्सच्या प्रसाराबाबत आपण लग्न झालेल्या स्त्रियांपेक्षाही अधिक सुरक्षित आहोत असा दावा आज या बायका करू शकतात. त्यामुळे त्या आपल्या पेशाकडे इतर व्यवसायांसारखाच एक व्यवसाय म्हणून पाहू शकतात. १९९७पासून कार्यरत असलेल्या ह्या संस्थेकडे आज ५००० सदस्य आहेत. केवळ वेश्यांमध्येच नव्हे, तर ट्रक ड्रायव्हर, समलिंगी पुरुष अशा एड्सच्या प्रसाराला कारणीभूत ठरणार्या अनेक समाजघटकांमध्ये जागृतीचं काम त्या करत आहेत. डॉक्टर, पोलीस अशा समाजघटकांसोबत काम करून त्या आपला व्यवसाय अधिक सुरक्षित कसा होईल यासाठी झटत आहेत. चांगलं समाजकार्य कसं असू शकतं त्याचा हा दाखला उर्वरित महाराष्ट्र, देश आणि आता जगासाठीही उद्बोधक ठरतो आहे.
प्रतिक्रिया
अत्यंत रोचक बातमी, माहिती
अत्यंत रोचक बातमी, माहिती माहितगार नेहमीच शोधतात त्यांचे आभार!
लेख वाचून, त्यातला विडीयो बघुन या संस्थेच्या कामाचे मुल्य जाणवले. (समलिंगीसंबंधांप्रमाणेच) वेश्या व्यवसाय हा समजातील एक प्रमुख व्यवसाय/घटना/सत्य असुनही तो प्रत्यक्षात असून-नसल्यासारखे दाखवले जाते त्याच्या इतका सामाजिक दांभिकपणा नसावा. अश्या प्रकारे व्यवसायात प्रतिष्ठाच नव्हे तर सुरक्षितता देऊन व्हॅम्पने उत्तम काम केले आहे असे वाटते.
"जर मी लग्न केले असते तर मला नक्की एड्स झाला असता, कारण मी नवर्याला 'नाही' म्हणू शकत नाही; पण इथे नाही म्हणता येते" हा उद्गार रोचकही आहे आणि बोलका देखील!
हा परिच्छेद या कार्याचे सार ठरावा.
व्हॅम्प संस्थेला कार्याबद्दल शुभेच्छा!
स्थानिक वृत्तपत्रे, मिडीया, सरकार या कार्याची दखल कितपत घेतेय असा प्रश्न पडला
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सार
म्हणजे? रादर दॅन रेस्क्यूड अँड रिहॅबिलिटिटेड? रादर दॅन? सेक्स वर्कर्स असे आपण कोणाला म्हणतो आहे, हे भान राहिलेले दिसत नाही. स्वेच्छेने त्या बायका या व्यवसायात आल्या आहेत हे गृहितक येथे आहे. त्यामुळे त्यापुढे जे झाले ते त्या कार्याचे सार नव्हे. इतर काही इलाज नसल्याने काढलेला मार्ग आहे तो. वर्क अराऊंड. त्यातून त्या बायकांवर (किमान काही बायका तरी नक्कीच) झालेल्या सक्तीचे परिमार्जन होते आहे की काय? ज्या क्षणी आपण या गोष्टी वर्कर्स या मालिकेत नेतो त्या क्षणी वर्किंग कंडिशन्समधील सुधारणा ही क्रांती वाटू लागते. घोळ तिथंच आहे. पेटामध्येच रद्द करून या व्यवसायाला कायदेशीर मान्यता देऊन टाकावी, वर्किंग कंडिशन्स सुधारल्या की झाल्या या बायका सेक्स वर्कर्स.
वर्क अराऊंडचे 'तत्वज्ञान' होते आहे येथे. माझी हरकत त्या तत्वज्ञानीकरणाला आहे. बाकीच्या कार्याविषयी मी खाली लिहिले आहे, ते मत कायम.
+ / -
होय हा सुर मलाही जाणवला. पण "सांगली"च्या केस मध्ये हे गृहितक अगदी अवाजवी नाही अशी ऐकीव माहिती आहे.
जरी ही माहिती नुकीची असली आणि जरी त्या बायकांना/पुरूषांना या व्यवसायात ओढले गेले असले तरी त्यांना "वाईट वर्किंग कन्डिशन्स" मध्ये काम करावे हे आगीतून फुफाट्यात गेल्यासारखे होते. या कार्यामुळे त्यांच्यावर (जर झाला असेल तर) झालेल्या अन्यायाचे परिमार्जन होणार नाही (हे मान्य) पण एक अन्याय झाल्यामुळे त्यांनी हालाखीतच जगावे हा अधिकचा अन्याय तरी कमी झाला आहे असे वाटते.
ज्यांना 'मुक्त' व्हायचे आहे त्यांच्यासाठी सांगलीतच काही इतर संस्था काम करताहेत असे अनेकदा वाचनात येते. तेव्हा तो मार्ग अव्हेरून ज्यांना याच व्यवसायात रहायचे आहे त्यांच्यासाठी हा वर्काराऊंड नसावा. अन्य केसेस मध्ये मुद्दा मान्य.
या वर्कअराऊंडचा मुद्दा गविंनी खाली दिलेल्या राजीव साने यांच्या परिच्छेदातून अधिक चांगला व्यक्त होतो आहेच.
दुसरा थोडा वेगळा मुद्दा असा: यातून एक फायदा असाही होतो आहे की या क्षेत्रातील व्यक्ती संघटित होत आहेत. जे अन्यथा (रेहॅबिलिटेशन वगैरे करून) फारसे जमत नव्हते ते या द्वारे जमत असेल तर या निमित्ताने संघटित झालेल्या व्यक्तींना पर्यायी-पुरक व्यवसाय शोधणे, त्यांनाअ आयोग्य/शिक्षण आदी सुविधा पुरवणे अधिक सोयीचे व्हावे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
स्पष्टीकरण
हे मी म्हटलेलेच नाही. म्हणतही नाही.
मुद्दा आहे तो अधिकच्या अन्यायाचे निराकरण 'होण्याने' (याच्या मुळात मी जात नाही) 'वूमन्स एम्पॉवरमेंट' झाली वगैरे तारे तोडण्याविषयी आणि त्याचे तत्त्वज्ञान करण्याविषयी. खाली सविस्तर प्रतिसाद दिला आहे. 'गार्डियन'ची थोरवी गाण्याचे कारण कळले नाही. पुरस्कृत ब्लॉगच्या आधारे गोडवे गाताना थोडे तरी तारतम्य हवे, ही अपेक्षा आहे.
सांगलीत 'सकाळ', 'पुढारी', 'तरुण भारत' वगैरेनी या मुद्यांना याआधी प्रसिद्धी दिलेली नाही का?
ओके.
ओके. तुमचा रोख/आक्षेप वेगळ्या गोष्टिकडे आहे (याचे तत्त्वज्ञान होणे गैर याच्याशी काहिसा सहमतही आहे). मात्र त्याबद्दल ठाम मत द्यायला असमर्थ आहे - तेवढा विदा/माहिती/अनुभव काहीच नाही.
मला ही बातमी पहिल्यांदा या माहितगाराच्या धाग्यावर कळली. व्हॅम्पबद्दल पुसटसे ऐकून होतो. या धाग्यावर माहिती मिळाली म्हणून इथे प्रतिक्रीया देतोय. त्यात त्या ब्लॉगचे गोडवे गायचा उद्देश नाही.
मात्र किमान या धाग्यावरून/दुव्यावरील माहितीमधून तरी व्हॅम्प जे कार्य करतेय ते सकारात्मक वाटले आणि अश्या कार्यामुळे उद्या कोणी या व्यवसायाकडे खेचला जाईल असे मला वाटत नाही. हे मत मात्र अजूनही आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
काळ्या खणीकडून स्वरुप टॉकीजला
काळ्या खणीकडून स्वरुप टॉकीजला शॉर्टकट "तिथून" पडायचा त्यामुळे अंतर वाचवण्यासाठी "तिथून" जाताना अंगावर आलेला काटा थरारदर्शक नसून किळसदर्शक असायचा. त्यांच्या पाठीशी कोणीतरी उभं आहे हे पाहून बरं वाटलं.
रोचक
रोचक लेखन आहे. त्या लेखनाची दखल घ्यावी असे वाटत नाही१. कारण त्यात केलेल्या उखळ लेखनापेक्षा वेश्याव्यवसायासंदर्भात सांगलीतूनच झालेली मांडणी अधिक खोलवर जाणारी आहे. त्यात अर्थकारणासह महिला सबलीकरण, स्त्रीमुक्ती, स्त्रीवाद आदी मुद्देही समाविष्ट झालेले आठवतात.*
ब्लॉगमधले लेखन वरवरचे आहे. कसे ते या धाग्यातच मांडलेल्या सारावरून सांगता येईल -
म्हणजे, असे असत नाही? खुद्द सांगलीतील या वेश्या स्वेच्छेने या व्यवसायात उतरल्या आहेत असे काही वाटते आहे की काय? असा प्रश्न येतो, कारण पुढचे वाक्य,
असे 'पण' या शब्दासह येते. एकत्रित ही तिन्ही वाक्ये वाचली तर असा अर्थ निघेल की सांगलीतल्या या वेश्या या व्यवसायात स्वेच्छेने आल्या आहेत आणि तो व्यवसायच त्यांनी 'प्रोफेशनली'** असा काही आकाराला आणला आहे की त्यातून त्या महिलांचे सबलीकरण झाले आहे. हेच प्रस्तुत लेखनातील पुढच्या परिच्छेदात मांडलेले दिसते,
क्रांतीविषयी न बोललेले बरे. त्यातील सुरक्षिततेच्या तौलनिक संदर्भाचा दावा एक भोंगळपणा आहे. त्या दाव्यात हे एक गृहितक आहे की (किमान त्या अर्थस्तरातील आणि त्या जातस्तरातील तरी नक्कीच) अन्य विवाहित महिलांना एड्सचा धोका या बायकांपेक्षा अधिक आहे. त्याचा विदा काही आहे का? नसेल तर या दाव्याला महत्त्व काय? आणि, एड्सबाबत समाजात असलेली भावना लक्षात घेता असल्या दाव्याला महत्त्व किती द्यायचे?
हा भाग ठीक आहे. ही संस्था खरोखरच काम करते आहे हे खरे आहे. विविध कारणांमुळे लादल्या गेलेल्या परिस्थितीतच काही सुधारणा घडवत काही भरीव करता येऊ शकते इतके त्यांनी निश्चित दाखवले आहे. वेश्या असाव्यात की नसाव्यात हा वेगळा मुद्दा. पण हा व्यवसाय लादला गेला असून त्यातच रहात त्यांनी केलेले काम समाजाच्या मुस्काडीत मारणारे आहे हे निश्चित. मुस्काडीत मारले जाते आहे, कारण तो व्यवसाय ('व्यवसाय' हा शब्द अतिशयोक्त आहे, त्यांची मूळची स्थिती ध्यानी घेतली तर तो 'अन्याय' असे म्हटले पाहिजे) त्यांच्यावर लादलेला आहे आणि तरीही त्यांनी त्यातूनच त्यांच्यासाठी काही गोष्टी घडवून किमान सुरक्षीतता स्वतःच्या बळावर आणली आहे. समाजाला फाट्यावर मारतच. पण या फटकावण्यावरून त्यांचे त्या व्यवसायात असणे स्वेच्छा आहे असे काही तरी गृहीतक मांडले जात असेल तर त्याविषयी न बोललेलेच बरे.
१. हे संपादन केले आहे. येथे दखल म्हणजे 'या लेखनाला फार भाव द्यायची गरज नाही' असा अर्थ घ्यावा.
* उत्पल चंदावार आहेत का? त्यांच्याकडे याविषयी काय काय माहिती आहे?
** 'गार्डियन'मधला ब्लॉग बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने सपोर्ट केला आहे. प्रोफेशनली हा शब्द वापरला आहे तो यासंदर्भात टिप्पणी करण्यासाठी.
हे एक नवे तत्वज्ञान आकाराला येते आहे. सांगलीतल्या वेश्यांच्या गीता सेशू वगैरे मंडळींनी चालवलेल्या संस्थांना तेच अपेक्षीत होते का हे पाहिले पाहिजे.
महिलांचे सबलीकरण की शबलीकरण?
गार्डियनमधील हा ब्लॉग दिशाभूल करणारा ठरो ही मनापासून अपेक्षा.
गार्डियन ब्लॉगमध्ये जे म्हटले आहे ते वाचून ठोकताळे उध्वस्त झाले: वेश्या-व्यवसायाबाबतचे नव्हे तर वेश्यांना मदत करणार्या संस्थांबद्दलचे. सामाजिक संस्था हे काय करत आहेत? वेश्यांची पराभूत मानसिकता बदलून त्यांना इतर व्यवसायाकडे न्यायचे सोडून, आहे त्याच व्यवसायाबाबत त्यांचे काऊन्सेलिंग करून 'यात वाईट काही नाही, उलट उत्तमच आहे' असे त्यांच्या मनावर बिंबवण्याचा मार्ग त्यांनी स्विकारलेला पाहून धक्का बसला.
जर स्वतः वेश्याच त्या व्यवसायाला इतर नोकरी-व्यवसायांपेक्षा जास्त सोपा, जास्त निर्धोक आणि जास्त कमाईचा व्यवसाय समजू लागतील आणि अभिमानाने ते बिरुद मिरवू लागतील तर त्यांचे असे 'सबलीकरण' नकोच नको.
कदाचित वेश्यासबलीकरण हाच एक 'धंदा' झाला आहे की काय असे वाटते. उद्या याच सामाजिक संस्था गरीब मुलींना या फायदेशीर व्यवसायात स्वेच्छेने यायला 'मदत' करणार काय? असा एक भीषण प्रश्न समोर उभा ठाकला. (तसे झाले तर संस्थेचे नाव व्हॅम्प ऐवजी भाड असे ठेवावे.)
या ब्लॉगवर प्रतिक्रियेतही 'sex work as empowerment' असा मुद्दा आला आहे. भ्रष्टाचार हीच देशाची प्रगती असाही उलट युक्तीवाद करता येईलच की! आता कशालाही काहीही म्हटले तर चालते की काय?
मोडकांचे म्हणणे समजण्यासाठी सांगलीतली संस्था नक्की काय करते आहे ते नेमकेपणाने मांडले गेले पाहिजे. मोडकांनीही त्यांना माहिती असल्यास स्पष्टीकरण देण्यास हरकत नाही.
...
संस्थेच्या कार्याविषयी गैरसमज होतोय असं प्रतिसादांच्या प्रथमदर्शनाने वाटतंय. प्रथम एकदोन वाक्यं लिहीतो आणि पुढे मत लिहितो.
सांगलीतल्या वेश्यांचा विषय आलाच आहे म्हणून सांगतो. सांगलीतल्याच वेश्यांच्या फर्स्ट हँड आणि सेकंड हँड पण विश्वासार्ह माहितीप्रमाणे स्वेच्छेने वेश्याव्यवसाय सुरु करणार्यांची संख्या मोठी आहे. अर्थातच यामुळे जबरदस्तीने त्या व्यवसायात आणल्या जाणार्यांवरचा अन्याय किंवा त्यांची संख्या कमी होत नाही. पण त्या व्हिक्टिमायझेशनमधे स्वेच्छेने येणार्यांचा मोठा भाग एकदमच अंडरस्टेट होऊ नये.
सांगलीत काळी खण हा वेश्यांचा प्राईम एरिया आहे / (निदान दहापंधरा वर्षांपूर्वी होता.) तिथली आरोग्यविषयक परिस्थिती ही वर्णनापलीकडली आहे. उलटी दाबतच तिथून जावे यावे लागावे अशी (किमान दहा वर्षांपूर्वी तरी होती. आता लोकेशन शिफ्टिंग झालं असेल तर माहीत नाही). एका वेश्येने सांगितल्याप्रमाणे यत्ता दहावीपासून वयस्क लोकांपर्यंत मोठा ग्राहकवर्ग असून ते कंडोम वापरत नाहीत. तिला स्वतःला एड्सची बाधा झालेली होती. ते गिर्हाईकाला सांगूनही ते कंडोम वापरत नाहीत अशी बेदरकार स्थिती होती.
अशा वेळी जोपर्यंत अन्य काही फार उच्च लेव्हलच्या उपायांनी / क्रांतीने सामाजिक स्थितीच बदलत नाही तोपर्यंत त्यांची असलेली परिस्थिती सुधारणं हे अवघड पण शक्य कोटीतलं काम कोणी हाती घेतलं आहे हे ऐकून खूप बरं वाटलं.
गिर्हाईकांनी कंडोम वापरणं कोणत्याही मार्गाने सक्तीचं झालं. वस्ती आणि व्यक्तिगत हायजिन सुधारलं तर इन गिव्हन कंडिशन या वेश्या "नको रे" स्थितीतून "नाही रे" स्थितीत तरी येतील.
श्री. मोडक यांचा मुद्दा "तत्वज्ञानीकरणा"चा आहे आणि तो रास्त आहे. या सर्व गोष्टीत वेश्याव्यवसायाला उत्तेजन मिळावं असा आउटकम निघणं चुकीचंच. पण त्यांची परिस्थिती / सुरक्षितता सुधारणं याचा अर्थ त्याला वैधता / कायदेशीरपणा आणणं असाच घेतला पाहिजे असं नाही. इनफॅक्ट एखादी गोष्ट अवैधात ढकलून आपण ती आणखीच अनकंट्रोल्ड करुन सोडतो. आणि मग तात्विक शब्दप्रधान वादविवादाला काही अर्थ उरत नाही.
श्री. राजीव साने यांनी त्यांच्या युगांतर या पुस्तकात अन्य संदर्भात वापरलेलं एक उदाहरण इथे पाहता येईल. मी ते स्वैरपणे देत आहे.
रक्तदाब हा विविध कारणांनी होतो. बर्याचदा याचं कारण शोधता येत नाही (याचा अर्थ कारण नसतं असा नव्हे तर तिथपर्यंत पोचणं चालू वैद्यकतंत्राच्या मर्यादेत आजरोजी अवघड असतं). काहीवेळा हे कारण दिसतं. उदाहरणार्थ किडनीच्या रचनेतला काही दोष किंवा हार्मोनल ग्रंथींचा बिघाड.
हा दोष डायग्नोस होईपर्यंत किंवा काय दोष आहे ते न कळण्याच्या काळात किंवा सध्या यावर काही उपाय नाही हे स्वीकारल्यानंतरच्या काळात, किंवा अतिरिक्त वजन कमी करायला हवे असण्याच्या काळात (लाँग टर्म वेट लॉस - लाईफस्टाईल चेंज- ही अवघड, दीर्घ आणि कसोटी पाहणारी प्रक्रिया आहे)या कोणत्याही अल्प - दीर्घ पण ट्रांझियंट परिस्थितीत अनियंत्रित रक्तदाब हा हृदय, डोळे, किडन्या, मेंदू यांना नुकसान पोचवत राहतो. अशा वेळी मूळ कारणावर थेट वार नसलेल्या मार्गांनी (डाययुरेटिक गोळ्या, हृदयगती नियंत्रित करणार्या गोळ्या, मीठ टाळणे) रक्तदाब आटोक्यात ठेवावा लागतो. मूळ कारण सापडून त्याचा नायनाट होईपर्यंत असे अॅन्सिलरी उपाय करु नयेत हा चुकीचा विचार आहे.
किंवा असे अन्यमार्गी उपचार हे रक्तदाबाला प्रोत्साहन देताहेत / उत्तम आहार-व्यायामापासून लोकांना दूर नेताहेत / मूळ कारणाचा शोध घेण्यापासून रोखताहेत / रक्तदाबाच्या रुग्णाला बळी न मानता त्याच्या त्या रोगिष्ट स्थितीला राजरोसपणा (लेजिटिमेट दर्जा) देताहेत असं नव्हे.
खरं आहे
या सहमतीबद्दल धन्यवाद.
तसा अर्थ घेता कामा नये. मी घेत नाही. कारण त्या कामाच्या मूल्याची कल्पना मला आहे. पण, अनेकदा विपरितच होतंय हे दिसतं. वर विसुनानांनी वेश्यांचे सबलीकरण (की शबलीकरण) असा जो मुद्दा मांडला आहे तो यासंदर्भात खरा आहे. मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी लिहितो.
या वेश्यांची ही परिस्थिती सुधारण्यासाठी, आणि त्यांना त्याच व्यवसायात ठेवण्यासाठी, जो खर्च होतो तसाच खर्च त्यांना त्या व्यवसायातून बाहेर काढून त्यांच्या पुनर्वसनासाठीही करता येतो आणि तो करण्याची क्षमता गेट्स फाऊंडेशनकडे आहे. पण फाऊंडेशनला वैश्विक आणि सर्वव्यापी वावर महत्त्वाचा वाटत असेल तर ती क्षमता त्यांच्याकडेही नसावी. मग मलमपट्टी सुरू होते. या मलमपट्टीच्या लाभाचे तत्त्वज्ञान करणे, हा आक्षेपाचा मुद्दा आहे. या ब्लॉगमध्ये केलेल्या उथळ (वर माझ्या पहिल्या प्रतिसादात उखळ असा शब्द लिहिला गेलाय) अशा प्रसिद्धीतून या तत्त्वज्ञानाला हातभार लागतो आहे. त्या मलमपट्टीला वूमन्स एम्पॉवरमेंट म्हटले जाते तेव्हा हसावे की रडावे कळत नाही!
खुद्द सांगलीत काम करणाऱ्या या संस्थांची मांडणी कुणी तरी मिळवून इथं मांडावी. सध्या माझ्याकडे ती उपलब्ध नाही. तिथं अशा स्वरूपाचे युक्तिवाद झालेले आहेतच. वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता द्याच, कारण त्यातूनच त्यांची पोलीस वगैरेंकडून होणारी पिळवणूक (तरी - हा शब्द त्यांच्या विधानात असावा असा अंदाज आहे) थांबेल, असे या संस्थांपैकी काहींनी म्हटले होते, हे मला पक्के आठवते आहे. त्याचा अन्वयार्थ कसा लावायचा? अशा स्वरूपाच्या सामाजिक, संघटनात्मक कामातून नंतर ती वेश्या स्वेच्छेने या व्यवसायात आली आहे इथंपर्यंत मांडणी व्हायला वेळ लागत नाही. लागलेला नाहीच हे या ब्लॉगमधील 'रादर दॅन...' या भूमिकेतून व्यक्त होतंय, असं माझं मत बनलं आहे. आणि त्यामागे त्या फौंडेशनच्या 'भव्य-दिव्यता'चा प्रभाव आहे, असं मला वाटतं.
गवि, इथंच मुद्दा येतो. ही स्वेच्छा कशी ठरवायची? मीही अशा वेश्यांना भेटून केलेल्या चर्चेअंती माझ्यासमोर आलेलं एक (एकमेव नव्हे, तुमच्यासमोरचे चित्र भिन्न असेलच) चित्र मांडतो. निर्वाहाचा प्रश्नच इतका भयंकर असतो की बाई वेश्या होते. तिचा नवरा, पोरंही तिच्यासमवेतच असतात. मग सुरू होते ती पिळवणूक. याला स्वेच्छा म्हणायचे का, हा प्रश्न आहे. त्याचे तसे प्रोजेक्शन उथळ लेखनातून होते. ते लेखन, किंवा वृत्तांकनही, मुळापर्यंत जात नाही. मुळाशी असणारे मुद्दे धर्मकारण, जात-पात, शेती-दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि त्यातून विस्थापन, पर्यायी जीवनस्रोतांचा अभाव, असे अनेक असतात. या मुद्यांमुळे, शेतकाम करणे इतकीच जीवनस्रोत कला जिच्या अंगी असेल तिने किंवा त्याने, अन्य कामांना ते अनुपयुक्त असल्याने, देहविक्रयातून निर्वाह चालवला तर त्याला स्वेच्छा म्हणायचे का, असा माझा प्रश्न आहे.
दुसरा स्वेच्छेचा मुद्दा असतो तो (येथे उदाहरणापुरते आर्थिक लिहितोय) आर्थिक आणि ननैतिक अंगाने जातो. निखळ जगण्यासाठी इतर काही कामांतून पैसे मिळतात, तसेच येथे मिळतात असे म्हणत वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेची स्वेच्छा वेगळी. माझी त्याला हरकत नाही. इतर निवडी शक्य असताना तिने ती निवड केली. तिच्याकडे जाऊन कोण गिऱ्हाईक काय करते यातही मी पडणार नाही. कायदा कायद्याचे पाहील. त्याहीपलिकडे, मला चैन करायची आहे यासाठीचे पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून वेश्याव्यवसाय, असाही प्रकार आहेच. ही स्वेच्छा आणखीनच वेगळी.
अर्थात, मूलगामी प्रश्नांच्या निराकरणापोटी आहे त्या विपरित स्थितीतच सारे रहावे, असे माझे म्हणणे नाही. त्यामुळे या संस्थांकडून होणाऱ्या या कामाचे अवमूल्यन करावयाचे नाही.
---
सांगलीतील या संस्थांचे काम स्थानिक माध्यमात आलेले नाहीच की काय असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. गार्डियनमध्ये प्रसिद्धी मिळाली आणि जणू क्रांती झाली. स्थानिक माध्यमातून हे मुद्दे येतात तेव्हा येथे ते का येत नसावे? मला वाटतं, व्हँपच्याच एका नाटक किंवा नाटिकेचा प्रयोग पुण्यात झाला होता. त्याविषयी येथे काही चर्चा झाली असावी, असे अंधुकसे वाटते.
---
अवांतर: खान्देशातील माहिजी गावाची कुणाला माहिती आहे? हे गाव फक्त वेश्याव्यवसायावर चालतं. आज नाही. काही पिढ्यांपासून. प्रत्येक घरातील प्रत्येक स्त्री वेश्या असते (निदान अगदी अलीकडेपर्यंत होती, तेथील बेटीव्यवहार कसे होत असावेत याविषयी पूर्वी एकदा खोदकाम केलं होतं. आत्ता आठवत नाही.). त्या गावात गेल्यानंतरचा एक अनुभव एका प्रख्यात लेखकाचा आहे. पाचसात वर्षांचं पोरगं आईकडे गिऱ्हाईक म्हणून त्यांना नेण्यासाठी विक्रेत्याच्या भूमिकेत गाडीसमोर आलं होतं. तो लेखक तिथं गिऱ्हाईक म्हणून गेला नव्हता, हा भाग वेगळा. असो.
अशीच गावे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात आहेत. अशा गावांविषयी लिहिलं पाहिजे कुणा माहितगारानं.
---
लेखनात सांगली असे लिहितोय, कारण सांगलीच्या वेश्यांमधले काम हा यूएसपी होऊ लागलेला दिसतोय गेल्या काही काळात. एरवी, मी जे लिहितोय ते इतरत्रही अशाच स्थितीला लागू आहे.
मुद्देसूद नेमक्या
मुद्देसूद नेमक्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तुमचा मुद्दा मुळातच पटलेला आहे. त्याखेरीज मी केलेली बाकीची टिप्पणी जेनेरिक आहे. संस्थेच्या कार्यामुळेच वेश्या जणू पुन्हा त्याच व्यवसायात गुरफटत आहेत अशी समजूत होतेय अशा "परसिव्ह्ड" समजुतीने मी ते लिहिलं. तसं प्रत्यक्षात तुम्हाला तरी वाटत नाही हे तुम्ही इथे स्पष्ट केलं आहेच.
बादवे:
मला दाट शंका आहे की या व्यवसायाची सवय असलेल्या स्त्रिया पुनर्वसनातले नवे काम / व्यवसाय / नोकरी स्वीकारत नसाव्यात. असे आल्टर्नेट कामे ऑफर करण्याचे प्रयत्न फोल ठरल्याचं ठिकठिकाणी ऐकलं आहे. विदा हाती नाही. कोणी स्पष्ट केलं तर खूप बरं होईल.
मुख्य कारण असं की या व्यवसायात मानसिक त्रास आहे अशी आपली समजूत असली तरी सरावल्यानंतर हा व्यवसाय बराच पॅसिव्ह असावा. किमान फार कष्टाचा नसावा. पुनर्वसनाचे जॉब्स तुलनेत बर्याच अधिक कष्टाचे असण्याची (शारिरिक कष्ट किंवा मानसिक किचकट कारकुनी प्रकारचे यापैकी कोणतेही)शक्यता असतेच.
क्वालिफिकेशन / अनुभव पाहता धुणीभांडी यापेक्षा वरच्या लेव्हलची कामं मिळणं आणि मुख्य म्हणजे तितका अधिक पैसा मिळणं हे पुनर्वसनानंतरच्या कामात अवघड असतं. ते त्यांना कितपत स्वीकारार्ह असेल यात शंका आहे.
ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपरिनिर्दिष्ट वेश्येकडून माहिती मिळाली त्यानुसार याखेरीज कोणताच व्यवसाय करायची तिची आणि अनेकींची तयारी नाही कारण कष्टांची सवय नाही.
नेमका मुद्दा
नेमका मुद्दा पकडला आहे तुम्ही. माझ्यापुरता विदा गरजेचा नाही मला, कारण हे अनुभव मी प्रत्यक्ष पाहिलेले आहेत. त्यामुळेच पुनर्वसन हा प्रकार सोपा नाही. सहमत.
इथे मी असहमत आहे. कारण, हे काम 'पॅसिव्ह असणं' हे आपल्यासमोर येणारं एक चित्र आहे. एकमेव नाही. जिथं ते चित्र आहे तिथं तुमच्याशी सहमत. जिथं नाही तिथं माझं पुढचं म्हणणं लागू होतं. मानसीक स्तरावर एकदा का या व्यवसायातील अवमानतेविषयी, अमानवीयतेविषयी, सन्मानाच्या अभावाविषयी बधीरपणा आला की तिथं पॅसिव्हिटी शिरते. हे मी काही वेश्यांशी बोलल्यानंतर समजून घेऊ शकलो. त्यासाठी बोलणं तेवढं खोलवर व्हावं लागलं. आणि त्याला फुंकर घालून 'सन्मानासाठी तुलनेने अधिक कष्ट' हे संस्कार घडवून पुढे जाऊन पुनर्वसन करणे हा दूरगामी उपाय अवलंबणं सोपं नाही. ते काही संस्था-संघटना अवलंबतात. पण हे काम सोपं अशासाठी नाही, की या संस्था-संघटनांना समाजही कितपत साथ देतो हा प्रश्नच असतो. यात त्या त्या व्यक्तींची अधिक कष्टाची तयारी आहे की नाही यापेक्षा त्या अधिक कष्टाकडे केवळ अधिकत्व म्हणून पाहिले जाते का या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे, असे मला वाटते (आलो मी पुन्हा आदर्शांच्या स्थितीकडे). माझ्या अनुभवात तसे काही ठिकाणी दिसले. म्हणजे सन्मान वगैरेविषयी बधीरताच असल्याने कष्टाच्या हिशेबात पॅसिव्हली होणारे काम असं म्हणत त्याचा स्वीकार होतोच. आणि जेव्हा त्यातून बसलेले फटके कळतात तेव्हा वेळ गेलेला असतो.
हे प्रतिवादासाठी लिहिलेले नाही. चर्चा म्हणूनच लिहितोय.
'वेश्या : वस्तुस्थिती, विचार व चित्रण' - कविता महाजन
लेखिका कविता महाजन यांनी या विषयावर खूप अभ्यास केलेला आहे. (त्या येथे असतील तर त्यांनी याविषयी लिहावे.)
त्यांच्या ब्लॉगवर 'वेश्या : वस्तुस्थिती, विचार व चित्रण' हा लेख आहे.
(जाणत्या वयाच्या वाचकांनी) जरूर वाचावा.
त्या म्हणतात-
वेश्यांसाठी काम करणार्या सामाजिक संस्थांचा उल्लेख हा अस्वस्थ करणारा आहे.-
या लेखात लेखिकेने मांडलेली मते पटण्यासारखी आहेत. गेट्स फाऊंडेशनच्या उदार देणगीसाठी द गार्डियन मध्ये उथळ ब्लॉग लिहिणार्या आणि आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीसाठी धडपडणार्या संस्थांना त्यातून योग्य दिशा मिळावी.
काय हे?
<वेश्यांची पराभूत मानसिकता बदलून त्यांना इतर व्यवसायाकडे न्यायचे सोडून, आहे त्याच व्यवसायाबाबत त्यांचे काऊन्सेलिंग करून 'यात वाईट काही नाही, उलट उत्तमच आहे' असे त्यांच्या मनावर बिंबवण्याचा मार्ग त्यांनी स्विकारलेला पाहून धक्का बसला.>
मनातले बोललात.
श्रावण, हे कसं?
<< निखळ जगण्यासाठी इतर काही कामांतून पैसे मिळतात, तसेच येथे मिळतात असे म्हणत वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेची स्वेच्छा वेगळी. माझी त्याला हरकत नाही. >
श्रावण, उलट यालाच हरकत असायला हवी ना? :O
श्रामो प्रतिक्रिया देतीलच, पण
श्रामो प्रतिक्रिया देतीलच, पण मला वाटतं, नाही. याला हरकत नसावी.
श्रामोंनी म्हटल्याप्रमाणे नाइलाजाने किंवा काही स्युडो-स्वेच्छेने (नाईलाज डीम्ड अॅज स्वेच्छा) ज्या स्त्रिया यात एकदा येतात आणि बाहेर पडता येत नसल्याने तिथेच राहतात त्यांच्या परिस्थितीविषयीच हरकत घेणं योग्य ठरेल.
खरंच शुद्ध स्वेच्छेने येणार्या स्त्रीला हरकत घेतली तर ती व्यक्तिगत हरकत होईल. समष्टीच्या चांगल्यासाठी - फॉर हायर कॉज- हरकत होणार नाही.
मला ज्या वेश्येकडून फर्स्टहँड कथा कळली तिच्या बाबतीत ती पूर्ण स्वेच्छेने आली होती आणि अनेकजणी इतर चॉईस असूनही केवळ आणि केवळ कमी कष्टाचा मार्ग म्हणून इथे येतात असं म्हणाली.
तिचं लग्न झाल्यावर पती चांगला(!) नव्हता म्हणून इतर एका वरिष्ठाशी तिचा संबंध आला आणि मग फेव्हरिझमच्या नादात ती एकदा दोनदाच वाहावत गेली. मग (मला अगम्य वाटणार्या लॉजिकने) एकदा आपण तथाकथित "भ्रष्ट" झालोच आहोत तर मग सरळ व्यवसायावर बसावे म्हणून तिने हाच मुख्य मार्ग निवडला. याबाबतचे तिचे साधारण शब्द असे होते (फार काळ झाला): "मग मी म्हटलं हीच लाईन चांगली आहे. आरामाची आहे. यात पैसे मिळतात. मग मी हीच लाईन चालू ठेवली.."
हेच
जवळपास हेच माझे म्हणणे आहे. ननैतीक भूमिकेतून.
नाटक आणि वास्तव
चर्चा वाचतो आहे. मी या विषयाचा अभ्यास केलेला नाही, पण वर कुठेतरी ज्या नाटकाचा उल्लेख झाला ते मी पाहिलेलं आहे; म्हणून त्या अनुषंगानं हा प्रतिसाद आहे. 'व्हय मी सावित्रीबाई' या एकपात्री प्रयोगानं महाराष्ट्राला परिचित झालेल्या सुषमा देशपांडे यांनी सांगलीतल्या या 'व्हॅम्प' संस्थेतल्या वेश्यांसाठी बहुधा नाट्यप्रशिक्षण कार्यशाळा घेतली होती. त्यातून त्या नाटकाचा उगम झाला. नाटक म्हणजे त्या वेश्यांची कथा होती. या माध्यमाद्वारे प्रेक्षकाला त्यांच्या आयुष्याच्या वेगळेपणाची जाणीव करून द्यावी असा त्यामागचा हेतू होता. संस्थेशी संलग्न असलेल्या वेश्याच त्यात अभिनय करत होत्या. अभिनय म्हणण्यापेक्षा त्या आपली कथा रंगमंचावर सादर करत होत्या. त्यात जे दाखवलं होतं ते आणि प्रयोगानंतर कलाकारांशी प्रेक्षकांची जी चर्चा झाली त्यातून उपरोल्लेखित लेखातल्या मजकुरासारखंच काहीतरी निष्पन्न झालं. म्हणजे आपण स्वतःच्या मर्जीनं या व्यवसायात आहोत असं त्या वेश्या म्हणत होत्या. पोलीस, भडवे आणि गिर्हाइकं यांच्याकडून सर्वसाधारणतः वेश्यांचं जे शोषण होतं त्याला या संघटनेनं आळा घातला आहे असं त्या सांगत होत्या. नाटकातही तेच दाखवलेलं होतं. त्यांना परवडतील अशा किमतीत औषधं आणि वैद्यकीय चिकित्सा उपलब्ध करून देणं हेदेखील संस्थेनं साधलं होतं. त्यांच्या मुलांचं शिक्षण, रात्रीच्या त्यांच्या कामाच्या वेळी मुलांचा सांभाळ करणं अशी मदतही त्यांना दिली जात होती. या परिस्थितीत आपण सुखी आहोत असं त्या म्हणत होत्या.
लग्न झालेल्या स्त्रियांविषयी म्हणायचं, तर एड्सच्या संदर्भात काम करणार्या काही ओळखीच्या डॉक्टरांकडून ऐकू येतात त्या कथा विषण्ण करणार्या असतात. लग्नाआधी मुलींना कल्पना न देता पॉझिटिव्ह (एच. आय. व्ही. बाधित) रोग्याशी लग्न लावलं जातं किंवा बाहेरख्यालीपणामुळे नवरा लग्नानंतर बाधित होतो. मग त्या बाधित होतात. गरोदरपणात ते उघडकीला येतं, कारण त्या वेळी एच. आय. व्ही. चाचणी महाराष्ट्रात अनिवार्य आहे. पण होणार्या मुलालाही बाधा होण्याचा धोका तोवर निर्माण झालेला असतो, वगैरे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
समांतर आणि अवांतर
विवाहित स्त्रियांपेक्षा वेश्याव्यवसायातल्या स्त्रियांना अधिक सबला असल्यासारखं वाटत असेल हे मी समजू शकते. ज्या आर्थिक, सामाजिक वर्गातल्या या स्त्रिया असाव्यात त्या वर्गात विवाहित, "चांगल्या घरातल्या" स्त्रियांचे अधिक हाल होत असण्याची शक्यता अधिक वाटते. नवर्याला शरीरसंबंधांसाठी नकार देणं या विवाहितांना शक्य असेल का? घरात चूल आणि मूल या पलिकडे काही आयुष्य असेल का? शिकलेल्या, नोकरी करणार्या स्त्रियांनादेखील आर्थिक स्वातंत्र्य असेल का? मुळात विवाहित स्त्रियांसमोर अशा अडचणी आहेत याची जाणीव किती लोकांना असेल?
लाहोरमधल्या खानदानी वेश्यांच्या आयुष्यावर फौजिया सईद यांनी लिहीलेलं 'टॅबू' नावाचं पुस्तक वाचनात आलं होतं. फौजिया यांच्याशी बोलताना अनेक वेश्यांनी अशा प्रकारची भावना व्यक्त केली होती. त्याच पुस्तकात वेश्या व्यवसायातल्या अनेक स्त्रियांची उतारवयात होणारी फरफटही दाखवलेली आहे.
वेश्याव्यवसायात उतरण्याची स्त्रियांवर सक्ती होऊ नये याबाबतीत मतभेद नसावेत.
अवांतरः "चांगल्या घरातल्या", शिकलेल्या, नोकरी करणार्या किती मुली, स्त्रियांवर लैंगिक अत्याचार होत असतील? माझ्या प्रत्यक्ष ओळखीतल्या काही स्त्रिया आहेत ज्यांनी नकाराधिकार वापरला म्हणून त्यांना त्रास झाला. इतर काही ऐकीव उदाहरणं माहित आहेत ज्यात त्या मुलीला नकार देता आला नाही आणि पुढे पुरूष नामानिराळा राहिला. क्वचित कधी अतिशय खालच्या पदावरच्या मुली, स्त्रियांना नकार दिला किंवा दिला नाही म्हणून नोकरी सोडावी लागण्याची उदाहरणंही ऐकून आहे.
स्वतःच्या किंवा नवर्याच्या व्यावसायिक प्रगतीसाठी शरीराचा माध्यम म्हणून वापर करून घेणार्याही स्त्रिया या जगात आहेत. तेव्हा पोटासाठी कमी श्रमाचा मार्ग म्हणून वेश्या व्यवसायाकडे बघणार्यांबद्दल फार वेगळा दृष्टीकोन कसा बाळगावा?
बाकी चर्चा वाचते आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.