Skip to main content

सांस्कृतिक दहशतवादाचं आव्हान... : प्रज्ञा पवार ह्यांनी केलेलं भाषण

प्रज्ञा दया पवार ह्यांच्या फेसबुक भिंतीवरून.

---

पाटणला विभागीय मराठी साहित्य संमेलनात जे घडलं त्यासंदर्भात विस्तृत अशी पोस्ट मी आजच टाकली आहे. त्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना अनेकांनी मी तिथे जे भाषण केलं ते इथे देण्यासंबंधी सुचवलं आहे. भाषण देते आहे. जरा दीर्घ आहे. थोडा पेशन्स ठेऊन वाचावं लागेल. :)

सांस्कृतिक दहशतवादाचं आव्हान...

हे जग स्वातंत्र्य समतेच्या दिशेने बदलण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावणाऱ्या सर्व महामानवांना मी सुरुवातीलाच वंदन करते.

महाराष्ट्र कवी यशवंत, कवी विहंग आणि लोकशाहीर भाऊ फक्कड यांच्या काव्यनिर्मितीने ओळखल्या जाणाऱ्या पाटणमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे - शाखा पाटण आणि बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विचारस्मृतीस समर्पित फुले शाहू आंबेडकर साहित्य नगरीत आयोजित केल्या गेलेल्या विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून आपल्याशी संवाद साधताना मला आनंद होतो आहे आणि या क्षणी माझ्या मनात सन्मानाची भावना आहे.

विचारमंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधूभगिनींनो,

महाराष्ट्राला संमेलनाध्यक्षांच्या भाषणांची दीर्घ आणि उभी-आडवी परंपरा आहे. गेल्याच वर्षी झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी तब्बल १००हून अधिक पृष्ठसंख्या असलेले भाषण लिहिले होते. तर संमेलनाध्यक्षपदावरून करावं लागणारं हे माझं पहिलंच भाषण आहे. तसं तीन-चार वर्षांपूर्वी मुंबईत एकदा साहित्य संघाने आयोजित केलेल्या विद्यार्थी साहित्य संमेलनाची मी अध्यक्ष होते. पण पेशा प्राध्यापकीचा असल्याने समोर जमलेल्या विद्यार्थ्यांना पाहून मला दडपण वगैरे असं काही आलंच नाही. सहज ४०-५० मिनिटांचा तास झाला माझा. पण आज मात्र मी एकदम गडबडून गेले आहे, त्याला आणखी एक कारण आहे. त्याचा संबंध साहित्य संमेलनाशी, संमेलनाशी असलेल्या माझ्या द्वंद्वात्मक नात्याशी आहे. साहित्य संमेलनाविषयीच्या माझ्या भूमिकेबाबत अनेकदा उलट सुलट चर्चा होत असते. आज या निमित्ताने मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे.
मी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय निवडणुकीत अत्यंत नेमाने मतदान करते. लोकशाही प्रक्रियेवर माझा पूर्ण विश्वास आहे. संमेलनाच्या अध्यक्षनिवडीसाठी मतदान करू शकणाऱ्यांची संख्या वाढायला हवी असे माझे मत आहेच. गेल्या २५ वर्षात मी अनेक साहित्य संमेलनांमध्ये कवितावाचन, सूत्रसंचालन, तर कधी परिसंवादामध्ये वक्ता, अशा विविध प्रकारे सहभागी झालेले आहे. आजवर मी केवळ दोनदा साहित्य संमेलनावर बहिष्कार घातला. नेमके सांगायचे तर मुंबई (१९९९) आणि चिपळूणच्या (२०१३) संमेलनांवर. मुंबईच्या संमेलनात ज्येष्ठ कवी वसंत बापट अध्यक्ष होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांनी साहित्यिकांना 'वाडगा घेऊन फिरणारे भिकारी' आणि 'बैल' असे संबोधले होते. त्यावेळी आम्ही मुंबईमध्ये कमल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पर्यायी सकल साहित्य संमेलन भरवले होते. त्यानंतर चिपळूणमध्ये जेव्हा साहित्य संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाला बाळ ठाकरे यांचे नाव देण्याचे घोषित झाले, कार्यक्रम पत्रिकेवर परशुरामाची प्रतिमा छापली गेली, तसेच साहित्यिकांपेक्षा राजकारणी मंडळींना झुकते माप दिले तेव्हा पुन्हा एकदा मी संमेलनावर बहिष्कार घातला. त्यावेळी मी हेही म्हटले की, मी संमेलनाच्या विरोधात नाही तर त्यातील दुष्प्रवृत्तीच्या विरोधात आहे. तरीही त्या संमेलनानंतर मला कधीही अ. भा. म. साहित्य संमेलनात निमंत्रित करण्यात आले नाही. अर्थात सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे २०१४ मध्ये मी मुंबई साहित्य संघ व रुईया महाविद्यालय आयोजित विद्यार्थी साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाले आणि आता या विभागीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल मी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आणि पाटणच्या आयोजकांचे मनापासून आभार मानते आणि पुन्हा एकदा आनंद व्यक्त करते.

....

मी आज प्रथमच पाटणला आले आहे. पण म्हणून मी स्वतःला परकीबिरकी असं काही मानत नाही. याचे कारण पाटणचा साहित्याशी घनिष्ठ संबंध आहे. माझी ज्येष्ठ मैत्रीण आणि कवयित्री रामकली पावसकरमुळेच केवळ मी हे बोलत नाही. या गावाचे वेगळेपण हे आहे, की या गावाने वाचनसंस्कृती घडवली आहे, साहित्यिक अभिरुची घडवली आहे. याचे मुख्य श्रेय मेजर सरदार भीमराव पाटणकर यांना द्यावे लागेल. त्यांनी जवळपास ७५ वर्षांपूर्वी नागोजीराव पाटणकर स्मारक वाचनालय उभे केले. आज हे वाचनालय पाटणची विशेष ओळख झाले आहे. या वाचनालयाने तालुक्यातील गावागावांमध्ये वाचनालये घडवण्यामध्ये, टिकवण्यामध्ये आणि विकसित करण्यामध्ये कळीची भूमिका बजावलेली आहे. त्यानंतर उभ्या राहिलेल्या बाळासाहेब देसाई महाविद्यालयाने तर त्यात अधिक मोलाची भर घातली. विशेषतः निवृत्त ग्रंथपाल देशपांडे सर यांनी त्यासाठी महत्त्वाची कामगिरी पार पाडलेली आहे. डॉ. पु. ना. परळे यांनी कोयना भूकंपाच्या वेळी मदतकार्यात जी अहोरात्र निरलस भूमिका बजावली, त्यासंबंधी त्यांनी त्यांच्या 'कोयनेच्या कुशीत' या आत्मचरित्रात लिहिलेले आहे. तसेच त्यांनी चालवलेली साहित्य चळवळ ही केवळ पाटणचीच नव्हे तर एकूणच या परिसरातली वाचनसंस्कृती घडवण्यास कारणीभूत ठरली आहे. ज्येष्ठ पत्रकार इलाही मोमीन, साहित्याची आणि विशेषतः संमेलनादि साहित्यिक उठाठेवींची आवड असणारे क्षीरसागरसर, मूळचे अलिबाग - रायगडचे पण आता सातारचे झालेले प्राचार्य पुरुषोत्तम शेठ अशा अनेकांचा पाटणच्या साहित्यिक सांस्कृतिक जडणघडणीला हातभार लागलेला आहे. विशेषतः शेठ सरांनी तळमावलेसारख्या लहानशा गावातल्या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून शैक्षणिक आणि व्यवस्थापकीय जबाबदाऱ्यांबरोबरच बजावलेल्या साहित्य – सांस्कृतिक आणि सामाजिक कामगिरीमुळे पाटण परिसराच्या वैचारिक समृद्धीस आकार आला आहे. त्यातूनच तळमावले, मालदन, खळे अशा गावांमध्ये अनेक लिहिते हात निर्माण झालेले आपण पाहतो आहोत. कालांतराने नावारूपाला आलेला लेखक जन्मलेला असला म्हणजे आपापता: गाव साहित्यिक वारसा असलेले गाव होते असे मी मानत नाही. तर ज्या गावात, ज्या परिसरात जनसामान्यांमध्ये वाचनसंस्कृती, लेखनसंस्कृती घडवण्याचा सामुहिक पातळीवर, संस्थात्मक पातळीवर सजग प्रयत्न होतो, ते गाव खऱ्या अर्थाने साहित्यिक गाव असते, आज अशा गावात संमेलनाध्यक्ष म्हणून आपल्यासारख्या जाणत्यांसमोर मी उभी आहे हा मला माझा सन्मान वाटतो.

....

मुख्य भाषणाकडे वळण्यापूर्वी या संमेलनाविषयी एक महत्त्वाची बाब सांगायलाच हवी. मी मसाप आणि पाटणच्या साहित्यिक – सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळींचे आभार यासाठी मानते की, त्यांनी हे संमेलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने त्यांच्या विचारस्मृतींना अर्पण केले आहे. विचारांना संमेलन अर्पण करणे ही विशेष कौतुकाची बाब आहे. कारण आपल्याकडे व्यक्तिमहात्म्याची वानवा नाही. आता मी माझ्या मांडणीकडे वळते.

....

काय सुरु आहे सध्या आपल्या भारतात? कमालीची असहिष्णुता आणि कमालीचा विघटनवाद, एकमेकांशी संवाद साधण्याच्या शक्यतांचा दिवसेंदिवस आकसत जाणारा अवकाश असा सगळा माहौल आहे गेल्या दोनेक वर्षातला. त्याची सूचक सुरुवात पुण्यात जून २०१४मध्ये मोहसीन शेखपासून झाली. हिंदू राष्ट्र सेना या अतिरेकी पण कथित परिघावरील गटाच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा विजय डोक्यात गेल्यामुळे मोहसीनची भर रस्त्यात हत्या केली. मोहसीन दहशतवादी नव्हता. त्याने कधीही दंगलीत सहभाग घेतलेला नव्हता. ना त्याने गाय मारलेली होती, अगदी बीफदेखील त्याने खाल्लेले नव्हते. त्याचे कुठल्याही हिंदू मुलीवर प्रेम बसलेले नव्हते. ना तो स्वयंघोषित बुद्धिप्रामाण्यवादी / विवेकवादी अथवा किमानपक्षी पुरोगामी लेखक कलावंत होता. तारुण्यात नुकताच प्रवेश केलेला उणापुरा २४ वर्षांचा मोहसीन हा एका खाजगी आय टी कंपनीत आय टी व्यवस्थापक म्हणून एक सामान्यशी नोकरी करत होता. पण त्याला ठार मारल्याबरोबर सोशल मीडियामध्ये एक मेसेज व्हायरल झाला. 'पहिली विकेट पडली.' ही विकेट कुणाची होती तर एका मुस्लिमाची होती. पहिली का? तर दिल्लीमध्ये सत्तेत आलेल्या नवीन पंतप्रधानाच्या, मोदींच्या सन्मानार्थ मोहसीनच्या रूपाने पहिली आहुती देण्यात आली होती, पहिला बळी चढवण्यात आला होता. तेही खरे तर साहजिकच म्हटले पाहिजे. कारण मुस्लिमांचे शिरकाण ही एकमेव ऐतिहासिक कामगिरी पार पाडून मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. अर्थात त्यानंतरच्या दहा बारा वर्षात भांडवलदार वर्गाला खुश करून 'विकासपुरुष' म्हणून आपली प्रतिमा ते उभी करू शकले होते. प्रत्यक्षात गुजरातचा विकास किती झाला, हे ते मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होताच झालेल्या पाटीदार आंदोलनाने स्पष्ट झाले. त्यापाठोपाठ दलित समाजही रस्त्यावर उतरला. असो. पण पंतप्रधानपदी विराजमान होताना त्यांनी राज्यघटनेचे संरक्षण करण्याची शपथ घेतली होती. पण, ती शपथ ते इतक्या लवकर पायदळी तुडवतील, असे कोणाला वाटलेही नव्हते. फार लवकर ते मनमोहनसिंग यांच्या मूक नायकाच्या भूमिकेत शिरले. अर्थात मोदींचा हा शिरकाव निवडक गोष्टींसाठी होता. मराठी अभिनेत्री स्मिता तळवलकर यांच्या मृत्यूनंतर त्यांना ताबडतोबीने श्रद्धांजली ट्वीट करणाऱ्या मोदींकडे मोहसीनच्या हत्येबद्दल बोलण्यासारखे मात्र काहीही नव्हते. माझ्या राजवटीत असे गुन्हे कदापि चालवून घेतले जाणार नाहीत असे त्यावेळी न म्हणून त्यांनी कायद्याचे राज्य या संकल्पनेलाच सोडचिठ्ठी दिली. खुद्द पंतप्रधानच जर कायद्याबाबत इतके उदासीन असतील तर मग त्यांच्या नावाने हैदोस घालणाऱ्या उन्मादी वानरांचे काय! मोहसीनच्या हत्येबद्दल न बोलून मोदींनी वानरांना जणू हिरवा झेंडाच दाखवला.

तेव्हापासून या वानरांचे सुरु झालेले कायदाविहीन राज्य आपण गेली दोन वर्षे अनुभवतो आहोत. गेल्या दोन वर्षातील अनेक हत्या, मारहाणीचे प्रसंग, गुंडगिरी, धाकधपटशा आणि राष्ट्रवाद आणि धर्माच्या नावाखाली आगजाळपणा यांची देशभरातील तपशीलवार यादी तुमच्यासमोर वाचून दाखवण्याची खरोखरच गरज आहे काय? आणि हे सगळे करण्यामध्ये रस्त्यावरील गावगुंड गो-रक्षकांपासून ते थेट केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सगळेच अहमहमिकेने सहभागी झालेले आहेत! अशा प्रत्येक वेळी पंतप्रधान गप्प राहिले. जणू काही ते देशाचे पंतप्रधान नव्हतेच. त्यांना जगाची मोफत सैर करण्यासाठीच जनतेने निवडून दिले होते ! तिथे जाऊन त्यांच्यासमोर आणि मुख्य म्हणजे अनिवासी भारतीय गोळा करून त्यांच्यासमोर बुद्ध आणि गांधींवर लंबीचौडी भाषणे देणे हा त्यांचा आवडता उद्योग आहे. खरे तर त्यांना या दोन्ही व्यक्तिमत्वांबद्दल अत्यंत तिरस्कार वाटतो, फक्त तो तिरस्कार देशाबाहेर दाखवायचा नाही असे त्यांचे धोरण आहे. त्यामुळे त्यांनी एकाला संशयास्पद शांततेचे (वाजपेयींच्या काळात झालेल्या अणूचाचणी झाल्याचा कोड वर्ड 'बुद्ध हसला' हा होता हे कसे विसरता येईल?) तर दुसऱ्याला स्वच्छतेचे प्रतीक करून टाकले. हातात लांबलचक झाडू घेऊन खास जमा केलेला निवडक कचरा हटवतानाचे मोदींचे फोटो आपण पाहिले आहेत,

साहित्य संमेलनाच्या भाषणाची सुरुवात मी मोदींवर बोलून का केली असा प्रश्न तुम्हाला कदाचित पडला असेल. मी राजकीय भाषण करते आहे असेही आपल्यापैकी काहीजणांना वाटले असेल. अलीकडच्या काळात तर राजकीय कारणांसाठी विराट पण मूक मोर्चे काढण्याची लाट महाराष्ट्रात आलेली आहे. खुद्द पंतप्रधान 'मन की बात' करून जनतेशी संवाद साधतात. त्यावेळी चार मित्रांशी गुजगोष्टी कराव्यात किंवा शाळेतल्या विद्यार्थ्यांना इसापनीतीमधील गोष्टी सांगण्याचा त्यांचा अविर्भाव असतो. मग मी एक लेखिका, एक कवयित्री 'राजकीय' भाषण का करते आहे? त्याचे एक खोलवरचे कारण आहे. ते मी पुढे विस्ताराने सांगणार आहेच. जो आजच्या माझ्या भाषणातील कळीचा मुद्दा असणार आहे, सांस्कृतिक दहशतवादाचा. पण त्याआधी एक दृश्य पातळीवरचे आणि वरवरचे उदाहरण मी सांगते. ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे, ज्यांना मी 'सर' म्हणते, त्यांच्या 'हिंदू' या बहुचर्चित कादंबरीच्या पुनर्मुद्रित आवृत्तीच्या मलपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नेमाडे सर ज्ञानपीठ पुरस्कार घेतानाचा फोटो छापण्यात आला आहे. मराठी साहित्यातील नेमाडे यांचे स्थान वादातीत आहे. वादासाठीच आहे, असेही कदाचित म्हणता येईल. पण, मुद्दा मोदींचा आहे. अशा रीतीने मोदी साहित्यात आहेत. तसे तर ते सगळीकडेच आहेत. ते देशाचे असे पहिले पंतप्रधान ठरले, ज्यांनी मुकेश अंबानी यांच्यासाठी त्यांच्या खाजगी उद्योगाच्या म्हणजे जिओ मोबाईलच्या जाहिरातीत आपला फोटो देशभरातील सर्व वर्तमानपत्रांमधून छापून आणण्यास दिलदारपणे परवानगी दिली. आपल्या नावाचा हजारोंनी उल्लेख असलेला शर्ट घालून भारतभेटीवर आलेल्या ओबामांना भेटणाऱ्या मोदींनी आपल्याशिवाय अन्य कुठल्याही मंत्र्याचा फोटो सरकारी जाहिरातीत छापला जाणार नाही असा नियमही करून घेतलेला आहे. मोदी हे सगळे करू शकतात कारण त्यांच्यामागे एकचालकानुवर्तीत्वाचा आदर्श सांगणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही पितृसंघटना आहे. आम्ही राजकीय संघटन चालवत नाही तर सांस्कृतिक संघटन चालवतो असे संघ कायमच सांगत आला आहे. संस्कृती आणि साहित्य यांचा जैव संबंध असतो. रा. स्व. संघाचे सांस्कृतिक राजकारण जगद्विख्यात आहे. गोव्यामध्ये अलीकडेच काही फुटीर संघीयांनी विधानसभा निवडणुकीत थेटपणे उतरण्याची घोषणा केली आहे. आणि तरीही साहित्यात राजकारण मी का आणते असा प्रश्न हमखास केला जातो. चिपळूणच्या साहित्य संमेलनात तर माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी मराठी साहित्यिकांना राजकारणावरून कानपिचक्या दिल्या होत्या. पण, साहित्य संमेलनातून साहित्य हटवून त्याला कायमस्वरूपी राजकीय इव्हेंट बनवणाऱ्या आणि संमेलनाध्यक्षांच्या भाषणाचा पद्धतशीरपणे वेळ खाऊन आपले स्वतःचे साहित्यिक भाषण पुढे रेटणाऱ्या या जाणत्या राजाबद्दल आणखी काय बोलावे!

आता मी खोलवरच्या मुद्द्याकडे येते. माझ्या 'राजकीय' बोलण्याकडे. दोन तऱ्हेचे राजकारण असते, एक असते निवडणुकीचे राजकारण, ज्यालाच आपल्याकडे राजकारण म्हणून बव्हंशी ओळखले जाते, पण आणखी एक दुसरे राजकारण असते. ते असते मुक्तिदायी राजकारण. ते असते वेगवेगळ्या प्रकारच्या शोषित, पीडित, वंचितांचे राजकारण, हे राजकारण त्यांना त्यांच्या त्या शोषितावस्थेतून, वंचितावस्थेतून बाहेर काढणारे आणि म्हणून मुक्तिदायी राजकारण असते. ते तीन स्तरांवरचे असते, प्रबोधन, संघटन आणि संघर्ष हे ते तीन स्तर होत. दलितांचे राजकारण, स्त्रियांचे राजकारण, भटक्या विमुक्तांचे राजकारण ही त्याची काही आपल्या माहितीतली उदाहरणे होत. आज भारतातील लेखक वर्ग हा सर्वाधिक घाबरलेला, असुरक्षित वर्ग झालेला आहे. त्याने काय लिहावे, काय लिहू नये याच्या नोटिसा त्याच्या शरीरावर लिहिल्या जात आहेत आणि असे वातावरण निर्माण होण्याला जबाबदार आहे तो रा. स्व. संघाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादातून विकसित होणारा सांस्कृतिक दहशतवाद.

इथे एक थोडे अधिकचे वळण मी घेणार आहे. भारतच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशियामधील लेखकांवर आज ही भीषण स्थिती आलेली दिसते. विशेषतः बांगलादेश, पाकिस्तान आणि भारत हे देश तर लेखकांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या बाबतीत, म्हणजे खरे तर हे स्वातंत्र्य काढून घेण्याबाबतीत एकमेकांशी जोरकस स्पर्धा करत असावेत इतक्या गतीने आपापल्या लेखक-कलावंतांना नामोहरम करताना दिसत आहेत. बांगला देशातल्या अनेक धर्मनिरपेक्ष लेखकांच्याहत्या इस्लामी दहशतवाद्यांनी केल्या, पाकिस्तानात सुफी गायकांवर, पत्रकारांवर जीवघेणे हल्ले झाले, महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉमेड गोविंद पानसरेतसेच कर्नाटकातील निवृत्त कुलगुरू एम. एन. कलबुर्गी यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. ठार मारणे ही अंतिम कृती झाली. पण लेखकांना तुम्ही काय लिहावे, आणि काय लिहू नये याचे आदेश काढले जात आहेत. अगदी अलीकडे महाराष्ट्रात मराठा समाजाचे मूकमोर्चे काढणाऱ्यांची एक मागणी 'आपल्या लेखकांनी आपल्या समाजाचे योग्य चित्रण करणे आवश्यक आहे' ही असल्याचे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कादंबरीकार आणि महाराष्ट्र टाइम्समधील ज्येष्ठ पत्रकार जयंत पवार यांनी अलीकडेच सांगितले. त्यावर भाष्य करताना पवार म्हटले की, ही सामाजिक सेन्सॉरशिप झाली आणि ती शासकीय सेन्सॉरशिपपेक्षा अधिक भयावह आहे.

पेरूमल मुरुगन हे एक जाणते तमिळ लेखक आहेत. तमिळ भाषेचे प्राध्यापक. आजवर त्यांच्या ६ कादंबऱ्या, ४ कथासंग्रह आणि ४ कवितासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. गेल्यावर्षी जानेवारीमध्ये त्यांनी आपण 'साहित्यिक आत्महत्या' करत असल्याचे घोषित केले. म्हणजे यापुढे आपण काहीही लिहिणार नाही आणि केवळ एक सामान्य शिक्षक म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर प्रकाशकांनी आपली पुस्तके नष्ट करावीत अशी विनंतीही त्यांनी केली. २०१० साली त्यांनी लिहिलेली 'मथोरुभगन' (अर्धनारीनटेश्वर) नावाची कादंबरी हिंदू धर्माची नालस्ती करणारी आहे असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी २०१४ च्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये केला आणि त्यांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले. 'मथोरुभगन'वर सरकारने बंदी घोषित करावी अशी मागणीही हिंदुत्ववाद्यांनी केली. मुरुगन यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यांमधून त्यांची सुटका करताना मद्रास उच्च न्यायालयाने आपल्या निकालाचा शेवट अत्यंत मार्मिक शब्दात केला. न्यायालयाने म्हटले, 'आपण लेखकाचे पुनरुज्जीवन करूयात आणि त्याला त्याचे आवडते लिहिण्याचे काम करू देऊयात.'

तत्पूर्वी न्यायालयाने लेखनामुळे भावना दुखावणाऱ्याना उद्देशून असेही म्हटले, 'वाचायचे की नाही हा पर्याय वाचकाला कायम उपलब्ध असतो. जर तुम्हाला एखादे पुस्तक आवडत नसेल, तर ते फेकून द्या. पुस्तक वाचण्याची कोणतीच सक्ती तुमच्यावर नसते. साहित्यिक अभिरुची ही एकाच स्वरूपाची असत नाही, एखाद्याला जे योग्य आणि स्वीकारार्ह वाटेल ते अन्य कुणाला तसे वाटेलच असे सांगता येत नाही. तथापि, लेखकाचा लिहिण्याचा हक्क हा अनिर्बंधित असला पाहिजे.'

पण उठसुठ भावना दुखावण्याचा रोग भारतात इतक्या मोठ्या प्रमाणात बळावला आहे की, अशा रीतीने न्याय करण्यासाठी न्यायालयाची गरजही कुणाला वाटेनाशी झाली आहे. आपल्याला अयोग्य वाटल्या गेलेल्या गोष्टींचा रस्त्यावरच न्यायनिवाडा करण्यात येऊन ताबडतोबीने कथित गुन्हेगाराला शासनही केले जाते आणि यालाच न्यायाचे राज्य म्हंटले जाते. याला मी अघोषित आणीबाणी असे म्हणते.

ज्येष्ठ कन्नड लेखक आणि समीक्षक यू. आर. अनंतमूर्ती यांच्या मृत्यूनंतर बेंगलोरमध्ये आनंदाने फटके फोडण्यात आले. ते जिवंत असताना त्यांच्या घरावर पोस्टर लावून पाकिस्तानचं तिकीटही त्यांना पाठवण्यात आलं होतं. का बरे? कारण त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जर मोदी भारताचे पंतप्रधान झाले तर आपल्याला देश सोडून जावे असे वाटते असे विधान केले होते.

कर्नाटकमध्येच हुचंगीप्रसाद या तरुण दलित लेखकावर तो त्याच्या कादंबऱ्यांतून जातिव्यवस्थेवर टीकात्मक लिहित असल्यामुळे हिंदू धर्माची बदनामी होते असा आरोप करून त्याला मारहाण केली गेली आणि त्याला पुन्हा असे न लिहिण्याबद्दल निर्वाणीचा इशारा देण्यात आला.

राजस्थानमध्ये जयपूर कला शिखर परिषदेत अनिश अहलुवालिया आणि चिंतन उपाध्याय या परिषदेच्या आयोजकांना करारवाल नावाच्या एका कलाकाराचे गायीचे स्टायरोफोमचे (थर्माकोलसारखा एक प्रकार) शिल्प तयार करून हवेत लटकावले या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांना मारहाण तर केलीच आणि अत्यंत मानहानीकारक वागणूक दिली. गायीला उलटे लटकावले गेल्याने गायीचा अपमान होतो आणि सामान्य माणसांच्या भावना दुखावतात असे पोलिसांनी आयोजकांना सांगितले.

आपल्या पुरोगामी महाराष्ट्रातली परिस्थिती फारशी वेगळी नाही. एम एफ हुसेन यांना ते त्यांच्या चित्रातून हिंदू देवदेवतांची नालस्ती करतात म्हणून मुंबईत राहणे अशक्य केले गेले. अखेर त्यांना देश कायमसाठी सोडावा लागला. डॉ. नरेद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या या त्यांचे विचार पटत नाहीत म्हणून करण्यात आल्या. आनंद यादव यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून येऊनही संमेलनाला उपस्थित राहता आले नाही. त्यांची संतसूर्य तुकाराम आणि सखा ज्ञानदेव या कादंबऱ्या कितीही अनैतिहासिक आणि खरे तर फालतू असू देत पण अशा रीतीने त्यांना संमेलनापासून दूर ठेवणे ही चुकीचीच बाब म्हटली पाहिजे.

अगदी अलीकडे प्रेमानंद गजवी यांच्या 'छावणी' या नाटकाला ते थेट राजकीय भाष्य करणारे नाटक आहे म्हणून सेन्सॉर बोर्डाने परवानगी नाकारली. अखेरीस त्याबद्दल जेव्हा वर्तमानपत्रातून बरेच काही बोलले जाऊ लागले तेव्हा एका सुजाण सदस्याच्या पुढाकाराने ही बंदी उठवण्यात आली.
ही सर्व उदाहरणे साहित्य जगताशी संबंधित आहेत. आणि गेल्या दोन-तीन वर्षातली आहेत. अधिक उदाहरणे मी सांगणार नाही. साहित्यबाह्य जगातले एक उदाहरण सांगणे मात्र अत्यंत आवश्यक आहे. मी ज्या अघोषित आणीबाणीचा उल्लेख केला त्याची भयावहता या घटनेतून धडधडीतपणे उभी राहते.
ती घटना घडली मुंबईमध्ये. दोन महिन्यांपूर्वी. इंडियन एक्सप्रेसमध्ये त्या घटनेचे विस्तृत वृत्तांकन आलेले आहे. कश्यप नावाचा एक आसामी नागरिक रिक्षाने निघाला होता. त्याच्याकडे एक लेदर बॅग होती. ती बॅग बघून रिक्षावाल्याने त्याला विचारले ही बॅग कसल्या कातड्याची बनलेली आहे? गाईच्या चामड्याची तर नाही न? कश्यप म्हटला, नाही, नाही, ही बॅग मी राजस्थानमध्ये खरेदी केलेली आहे, त्यामुळे ती उंटाच्या चामड्याची असणार. पण या उत्तराने रिक्षावाल्याचे समाधान झाले नाही. त्याने अचानकच रिक्षा एके ठिकाणी थांबवली. तिथे पारावर टिळा लावून बसलेल्या दोघांना त्याने त्या बॅगबद्दल सांगितले. त्यांची आपापसात काहीबाही चर्चा झाली. तोपर्यंत कश्यप हा पूर्णपणे तणावात होता. अखेर त्यांनी त्याला सोडले. त्यावेळी त्यांच्या तोंडून तो नावाने ब्राह्मण असू शकतो ही चर्चा त्याने ऐकली होती. सोडले खरे, पण जाता जाता त्याला, पुन्हा ही बॅग वापरू नकोस अशी धमकी देऊन मुद्दा संपवण्यात आला आणि कश्यपचा जीव बॅगेत पडला! कल्पना करा की कश्यपच्या जागी कुणी काझी अथवा कांबळे आडनावाचा इसम असता तर... मी अतिशयोक्ती करतेय? हरयाणामध्ये सप्टेंबर महिन्यात दोन मुस्लीम स्त्रियांवर बलात्कार केल्यानंतर, तुम्ही बीफ खाता म्हणून तुमच्या वाट्याला हे आल्याचे सांगण्यात आले. २००२ साली याच हरयाणामध्ये गोहत्येच्या संशयावरून पाच दलितांना ठार मारण्यात आले होते. तेव्हा विश्व हिंदू परिषदेच्या गिरीराज किशोर यांनी 'धर्मशास्त्रानुसार गायीचा जीव हा माणसांच्या जिवापेक्षा किती तरी अधिक महत्त्वाचा आहे' असे विधान केले होते.

जर हा सगळा दहशतवाद नाही आणि फक्त उरी ते उरण हीच दहशतवादाची दोन टोके आपण मानू लागलो तर आपण आपल्याला फसवतो आहोत हे स्पष्ट आहे. इस्लामी दहशतवादाबद्दल आपण दिवस रात्र ऐकत असतो. पण सांस्कृतिक राष्ट्रवाद या रा. स्व. संघाच्या भूमिकेतून निर्माण झालेल्या सांस्कृतिक दहशतवादाबद्दल आपण कधीही बोलत नाही. काय असतो सांस्कृतिक दहशतवाद?

तसे पहिले तर सांस्कृतिक दहशतवाद ही काही आज निर्माण झालेली गोष्ट नाही. मानवी इतिहासाच्या सुरुवातीपासून तो माणसांनी अनुभवलेला आहे. जेत्यांनी जीत लोकांची संस्कृती उद्ध्वस्त करून टाकणे, तिला नामोहरम करणे म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद. भारतात बाबरी मशिदीच्या नावाने एक कपोलकल्पित इतिहास रचला गेला, म्हणे पंधराव्या शतकात बाबराने अयोध्येतील राम मंदिर पाडून तिथे मशीद उभी केली. पण त्याच्या कितीतरी अगोदर येथील बौद्ध संस्कृतीचा असाच पाडाव हिंदू संस्कृतीने केला आहे, ही गोष्ट कुणी सांगत नाही. त्याच्याही पूर्वी आर्य वैदिक संस्कृतीने अनार्य, द्रविड संस्कृतीचे नामोनिशाण मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खुद्द ब्रिटिशांनी भारतासह तिसऱ्या जगातील अनेक देशांवर जे साम्राज्य गाजवले ते केवळ आधुनिक शस्त्रांच्या आधारे नाही तर सांस्कृतिक साम्राज्यवादाच्या, दहशतवादाच्या आधारे केले आहे. 'व्हाईट मॅन्स बर्डन'च्या आधारे त्यांनी हे केले आहे. तुमच्यावर राज्य करणे हे तुमच्या भल्यासाठी आहे असे सांगत त्यांनी हे केले आहे. अर्थात हा काही भारतीय उपखंडापुरता मर्यादित अनुभव नसून जगभरचा आहे. अलीकडच्या काळात तर सांस्कृतिक दहशतवादाला जागतिक पातळीवर अधिकृत गुन्हा मानले गेले आहे. पश्चिम आफ्रिकेतील टिंबक्टूमधील प्राचीन कागदपत्रे आणि प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त केल्याबद्दल मुस्लीम मूलतत्त्ववाद्यांविरोधात जागतिक न्यायालयाने सांस्कृतिक दहशतवादाचा गुन्ह्याखाली खटला चालवला.

पण आज जेव्हा जेव्हा आपण त्याची चर्चा करतो तेव्हा मात्र जणू हे इतिहासात पहिल्यांदाच होते आहे असे समजत असतो. त्याचे एक कारण आहे. जेव्हा आपल्या स्वतःच्या संस्कृतीवर हल्ले होऊ लागतात तेव्हाच आपण सांस्कृतिक दहशतवादावर बोलू लागतो. तोवर अन्य संस्कृतींवर झालेल्या हल्ल्याबद्दल आपल्याला काहीच म्हणायचे नसते, कारण त्यातून आपले काहीच दुखले-खुपलेले नसते. २००२मधील गुजरातच्या कुप्रसिद्ध मुस्लीमसंहाराच्या वेळी वली दखनी या सुफी संताची कबर, जी अहमदाबादच्या पोलीस आयुक्त कार्यालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावर होती, ती रातोरात नाहीशी करून त्यावर डांबरी सडक तयार करण्यात आली, तेव्हा या सांस्कृतिक दहशतवादाबद्दल महाराष्ट्रात कुणीच बोलले नाही.

आज गंमत अशी आहे की सगळेच स्वतःला सांस्कृतिक दहशतवादाचे बळी मानू लागले आहेत. जातींगटांची नावं घेऊनच बोलते, ब्राह्मण मराठ्यांना पुण्यातील भांडारकर संस्थेवर हल्ला केल्यामुळे सांस्कृतिक दहशतवादी ठरवतात तर मराठे ब्राह्मणांना ब्राह्मणी रंगात मराठ्यांचा इतिहास चित्रित केल्याबद्दल सांस्कृतिक दहशतवादी ठरवतात. रोचक बाब म्हणजे भांडारकर संस्थेवरील हल्ल्याचा दिवस अनेक मराठा संघटना सांस्कृतिक दहशतवाद दिन म्हणून साजरा करत आलेल्या आहेत. आणखी एक वेगळे उदाहरण घेते. जेव्हा फ्रांसमध्ये चार्ली हेब्डोच्या व्यंगचित्रकारांवर हल्ले झाले तेव्हा मराठी व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर (व्यंगचित्रकाराला भाषिक विशेषण लावण्याचा मी गुन्हा करते आहे, पण काय करू बहुसंख्य मराठी चित्रकार मराठीच असतात!) सांस्कृतिक दहशतवादाबद्दल बोलले. तोपर्यंत झालेल्या असहिष्णूतेच्या अगणित प्रकरणांबद्दल त्यांनी भूमिका घेतल्याचे ऐकिवात नाही. कदाचित त्यावेळी त्यांना कुणी विचारायला गेलेही नसेल म्हणा. पण निदान व्यंगचित्रांमधून तरी ते भूमिका घेत होते तर असेही दिसत नाही!

आज मराठा समाज मोर्चे काढत आहे. प्रत्येक मोर्च्यात लोकसहभागाचे नवनवे रेकॉर्डस निर्माण केले जात आहेत. पण या मोर्च्याचे मुद्दे काय आहेत? कोपर्डीतील बलात्काराचे प्रकरण हा पहिला मुद्दा. कोपर्डीबद्दल एकच मुद्दा मांडते आणि पुढे जाते. ज्या नगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षात दलित अत्याचाराची माणुसकीला काळिमा फासणारी अनेक प्रकरणे घडली त्या प्रकरणांबद्दल या मोर्च्यांना काहीच म्हणायचे नव्हते व नाही. खैरलांजीबद्दल काही म्हणायचे नाही. मराठा सोडून अन्य स्त्रियांबद्दल, त्यांच्या इभ्रतीबद्दल मराठा नेतृत्वाला काहीच भूमिका नाही? आमच्या त्या सगळ्या जिजाऊच्या लेकी, इज्जतदार बायका आणि दुसऱ्यांच्या बायका म्हणजे काय फक्त 'वाड्यावर या'व्यात म्हणून! हे कसे चालेल? नुकत्याच झालेल्या गणपती उत्सवात जे गाणे जबरदस्त चालले त्या गाण्यातले शब्द काय आहेत ते नीटपणे ऐका.

लयी लयी वाकडा, मिशीचा आकडा,
पाटलाचा नाद तुम्ही करू नका,
धोतर घालून कोट वर टाकला,
पाटलाच्या वाटंला तुम्ही जाऊ नका,
डोक्यावर टोपी आन तोंडात पानं,
पाटील गातोया गाणं,
बाई वाड्यावर या..बाई वाड्यावर या.

या गाण्यावर बंदी घाला अशी मागणी कुणी केल्याचे मी ऐकलेले नाही. आता असे चालणार नाही, एवढेच मी सांगते. असो.

अन्य मागण्यांमध्ये अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर आहे. मग मराठा आरक्षण आहे. मोर्चागणिक मागण्या मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढतच चालल्या आहेत. शेतीमालाला किमान भाव, कर्जमुक्ती. अलीकडेच सुरुवातीला जिचा उल्लेख मी केला ती मागणी म्हणजे लेखकांनी मराठा समाजाचे चित्रण नीटपणे करावे. एका उन्मादाला दुसऱ्या उन्मादाने उत्तर द्यावे असे हे चालले आहे.

हिंदुत्ववाद्यांच्या सेन्सॉरशिपला तर उधाण आले आहे. हिंसाचाराच्या बळावर जेव्हा देशाचा पंतप्रधान निवडून येतो तेव्हा देशभरात भुरट्या दहशतवादाला उधाण येणार ही तर साहजिकच बाब मानावी लागेल. लव्हजिहाद, घरवापसी अश्या जुन्या मुद्द्यांना आजच्या काळात गायीची जोड मिळाली आहे. अलीकडेच गुजरातेतील सौराष्ट्रात उनामध्ये चार दलित मुलांना मृत गायींची वाहतूक करताना पकडले गेले आणि त्यांना जाहीरपणे चामडी पट्ट्याने मारहाण करण्यात आली. मारणारे आपल्या या पवित्र व न्याय्य कृत्याबद्दल इतके समाधानी होते की त्यांनी हा सगळा प्रकार बेधडकपणे रेकॉर्ड केला आणि तो व्हायरलही केला. या घटनेनंतर पहिल्यांदाच गुजरातेतील दलित समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला. यापुढे मेलेले गायी बैल आम्ही उचलणार नाही असा निश्चय त्यांनी केला. त्याचबरोबर आम्ही घाणीची कामे करणार नाहीत, आम्हाला घरटी ५ एकर जमीन द्या अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. ज्या राज्यात दिवसाला हजार पंधराशेहून अधिक गायी नैसर्गिकपणे मरतात त्या राज्याची स्थिती या आंदोलनाने काय केली असेल याची आपण कल्पना करू शकतो. त्यामुळेच मग उना अत्याचाराच्या विरोधात राज्यातून निघालेल्या संघर्ष मोर्च्यावर सौराष्ट्रातील चिडलेल्या उच्चजातीयांनी पुन्हा हल्ले केले.
उत्तरप्रदेशातील दादरीतील मोहम्मद अखलाक पासून अगदी परवा अहमदाबादेतील एका मुस्लिम व्यक्तीच्या हत्येपर्यंत गायींनी मुस्लिमांना जिणे नकोसे करून सोडले आहे. मुस्लिमांच्या नंतर दलितांचा नंबर आहे. विशेषतः आंबेडकरी बौद्ध वारसा मानणाऱ्या दलितांचा. कारण डॉ. आंबेडकरांनी येथील दलितांना प्रतिसंस्कृती मिळवून देण्याचा गंभीर प्रयत्न केला. संघ परिवाराने बाबासाहेबांचे कितीही कौतुक करू देत की त्यांनी भारतीय भूमीच्या बाहेरील मुस्लीम, ख्रिश्चन धर्म स्वीकारले नाहीत आणि हे त्यांच्या भारतीयत्वाचे लक्षण आहे तरी त्यांना हे नीट माहित आहे की हिंदू सनातन धर्माला जर कुठली संस्कृती आव्हान देऊ शकत असेल तर ती बौद्ध संस्कृती आहे. कारण बौद्ध संस्कृती ही समतेच्या तत्त्वावर उभी आहे. हिंदू जातिव्यवस्थेला, वर्णव्यवस्थेला सुरुंग लावण्याची ताकद या संस्कृतीत आहे. त्यामुळे बौद्ध संस्कृतीचा पाडाव करणे हे संघ परिवाराचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. अर्थात हे करण्याची त्यांची पद्धत ही आमनेसामने संघर्षाची नाही. ती त्यांना परवडणारीदेखील नाही. त्यामुळेच ते एका बाजूला तिला आपलेसे करून तिचे दात काढून टाकणे आणि दुसऱ्या बाजूला पाहुण्यांच्या काठीने साप मारणे अशा विविध क्लुप्त्यांचे उपयोजन करीत आहेत. गुजरातेत त्यांनी दलित आणि आदिवासींना मुस्लिमांच्या विरोधात उतरवले होते. हे सगळे विसरून आज मराठा क्रांती मोर्चा अॅट्रॉसिटीच्या विरोधात रस्त्यावर उतरून नेमके संघाचेच काम सुकर करतो आहे, हे सखेदपणे सांगावेसे वाटते. मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध या सांस्कृतिक शत्रूंना मिटवण्याचे कार्य संघ परिवाराचे आहे. आणि आपल्या सत्ताविहीनतेने उद्विग्न झालेले मराठा नेतृत्त्व हे प्रत्यक्षाअप्रत्यक्षपणे त्या इशाऱ्याबरहुकूम काम करते आहे. मूक मोर्चे काढायचे आणि जे कुणी विचारतील तुमचे म्हणणे काय आहे तर त्यांना अत्यंत बालिश उत्तरे द्यायची असे सुरु आहे. याला मूक मोर्चा म्हणत नाही. हा एक नवा दहशतवादच आहे. ज्याला हरवायचे त्याच्याच पद्धती वापरून आपण त्याला हरवू शकत नसतो तर आपण त्यालाच ताकद मिळवून देत असतो, हे विसरून चालणार नाही.

आता मी भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात येते. सांस्कृतिक दहशतवाद हा बाहेरचा असतो असे त्याच्या व्याख्येवरून दिसते खरे, पण त्याची मुळे आपल्याही आत रुजलेली असतात. जोवर आपण हे ओळखत नाही तोवर दहशतवादाविरोधातील प्रत्येक लढा हा नवीन दहशतवादाला जन्म देणारा ठरणारा असतो. मराठा मोर्चावर विस्ताराने बोलण्याचे कारण नेमके हेच आहे.

डॉ. सुहास पळशीकर यांच्यावर काही तथाकथित आंबेडकरवाद्यांनी केलेल्या हल्ल्याविरोधात मी जेव्हा महाराष्ट्र टाईम्समध्ये लेख लिहिला तेव्हा माझ्यावर मोठी टीका झाली. मी अति लिहिले आहे ही एक टीका तर होतीच. पण मी 'त्यांच्या' बाजूने 'आपल्या' लोकांवर टीका केली असे म्हटले गेले. मला हे अधिक भयावह वाटते. तेंडूलकरांच्या 'घाशीराम कोतवाल' आणि 'सखाराम बाईंडर' या नाटकांवर ब्राम्हण समाज नाराज झाला, ही नाटके बंद पडण्याचे पण प्रयत्न झाले. काहीजण कोर्टात गेले. कमलाकर सारंग यांनी 'बाईंडरचे दिवस' या पुस्तकामध्ये हा सगळा इतिहास नोंदवलेला आहे. या दोन्ही नाटकांच्या वेळी आंबेडकरवाद्यासकट सर्व पुरोगाम्यांनी त्यांची पाठराखण केली. पण पुढे त्यांच्या 'कन्यादान' नाटकात ज्या पद्धतीने त्यांनी दलित नायकाचे चित्रण केले त्यामुळे दलित समाज खूपच नाराज झाला. एकदा एका कार्यक्रमात त्यांच्यावर चप्पलदेखील भिरकावण्यात आली होती. हे योग्य कसे म्हणता येईल? किंवा मराठीमध्ये आत्मकथनात्मक साहित्यप्रवाहाचं नवा आणि सशक्त दालन ज्या 'बलुतं'नामक दलित आत्मकथनामुळे निर्माण झालं त्यावर सर्वाधिक टीका करणारा वर्ग हा बौद्धवाचकच होता. अलीकडच्या काळात लिहू लागलेल्या दलित लेखिका, कवयित्री यांनाही अशाच प्रकारे प्रच्छन्न टीकेला सामोरे जावे लागत आहे कारण त्यांनी जातवर्गपितृसत्ताक व्यवस्थेला आव्हान देतानाच लैंगिकतेचे प्रश्न ऐरणीवर आणायला सुरुवात केली आहे. अशा अनेक अंतर्विरोधांना आपल्याला भिडावे लागेल.

डॉ. कलबुर्गी, कॉ. पानसरे आणि डॉ. दाभोलकर यांच्या झालेल्या हत्या या सांस्कृतिक दहशतवादाची परिणती आहेत. त्याविरोधात लढणे हे काम अजिबात सोपे नाही, कारण ही लढाई एकाच वेळी त्यांच्याबरोबर आणि आपल्या स्वतःशी पण असणार आहे. भारतीय समाज हा जातवर्गीय आणि पुरुषसत्ताक समाज आहे हे आपण नेहमीच बोलतो. गरज आहे ती त्या विरोधातील लढ्याला हे सर्वंकष परिमाण मिळवून देण्याची. अन्यथा एकेका जातीने आपल्या अस्मितेचे प्रदर्शन करत केवळ स्वतःच्या मुद्द्यांवर लढणे हे सांस्कृतिक दहशतवादाला पूरक ठरणारे आहे. सांस्कृतिक दहशतवादाविरोधी लढ्याचे दिशादिग्दर्शन करण्याचे काम साहित्यिकाचे आहे, कलाकाराचे आहे.

पण त्यासाठी साहित्यिकांना बदलावे लागणार आहे. यु आर अनंतमूर्ती यांनी ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणात लेखकाने भूमिका घेण्याचे आवश्यकता सांगताना म्हटले होते, 'आपण लिहित असलेल्या प्रत्येक नवीन पुस्तकागणिक आपण लेखकांनी आपल्या चाहत्यांपैकी काहींना गमावलेच पाहिजे. तसे न झाल्यास आपल्या लेखनात काहीतरी चुकत आहे असे मानावे. चाहते न गमावल्यास असे मानावे की आपण काहीच नवीन करत नाही आहोत तर स्वतःचीच नक्कल करत आहोत. लिहित असताना, म्हणजे आपण जेव्हा पूर्णपणे एकटे असतो तेव्हा आपण त्या सर्वच बाबी अभिव्यक्त केल्या पाहिजेत ज्यावर आपला विश्वास आहे.' थोडक्यात स्पष्टपणे विरोध पत्करत, प्रसंगी पूर्णतः एकाकी पडत परखडपणे अभिव्यक्त होणे म्हणजे भूमिका घेणे. सर्वांना रिझवत, ज्याला जे ऐकायला आवडते ते ऐकवत फिरण्याला भूमिका घेणे म्हणत नाहीत.

आजचे किती मराठी साहित्यिक भूमिका घेताना दिसतात? भूमिका घ्यायची म्हणजे लोकांना नाराज करायचे, आपल्या संभाव्य सन्मानांना, पुरस्कारांना तिलांजली द्यायची. बरोबर एक वर्षापूर्वी भारतात साहित्यिकांनी एक अभिनव आंदोलन केले, पुरस्कार परतीचे. आजच्या वातावरणात लेखक कलावंताची अभिव्यक्ती कशी अवरुद्ध झालेली आहे आणि त्यामुळे ते किती अस्वस्थ आणि संतप्त झाले आहेत हे या पुरस्कार परतीच्या मोहिमेतून समोर आले. गेल्या दोन वर्षातील सांस्कृतिक, वैचारिक दहशतवादाच्या अनेक घटना त्यांच्या समोर होत्या. ए. के. रामानुजम यांचा 'थ्री हंड्रेड रामायणाज' हा महत्त्वपूर्ण निबंध दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आला होता. वेंडी डोनिजर यांचा 'द हिंदूज' हा ग्रंथ मागे घेऊन नष्ट करण्याचा दबाव प्रकाशकांवर टाकण्यात आला होता. गुजरातमध्ये अभ्यासक्रमाला पूरक वाचनासाठीचे बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तक आयत्यावेळी काढून घेण्यात आले. या साऱ्यामुळे संतप्त झालेल्या साहित्यिकांनी पुरस्कार परत करायला सुरुवात केली. तर सरकारतर्फे आणि सत्ताधारी पक्ष व त्याच्या समर्थक गटांनी, व्यक्तींनी त्या लेखकांवरच हल्ला चढवला. भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन करण्यासाठी जे षड्यंत्र शिजते आहे त्याचा हे लेखक भाग आहेत, हे सगळे कॉंग्रेसी विचारवंत आहेत. या लेखकांनी सरकारच्या पैशांवर घरे घेतलेली आहेत, केवळ फुकटच्या प्रसिद्धीसाठी लेखक हे पाउल उचलत आहेत, असे अनेक बिनबुडाचे आरोप केले गेले. पण तरीही बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीने दाखवून दिले की हा लेखकवर्ग आपली भूमिका लोकांपर्यंत नेण्यात यशस्वी ठरला होता.

१९७७ मध्ये जनतेने असाच धडा इंदिरा गांधींनाही शिकवला होता आणि आता बिहारच्या जनतेने नरेंद्र मोदींना शिकवला आहे. मी तर सामान्य माणसांचीच प्रतिनिधी आहे आणि मी मुळीच निराशावादी नाही. म्हणूनच भारताच्या लोकशाहीवरचा हा हल्ला परतवून लावण्यासाठी सर्वांनीच एकत्र येऊन ताकद उभी करण्याची गरज आहे, असं मला वाटतं.

या भाषणाचा समारोप मी माझ्या 'मी नाही निवडलं हे जग' या कवितेच्या काही ओळींनी करणार आहे.

मी नाही निवडलं हे जग
नाही निवडलं हे शरीर
नाही निवडला मी
चेहरा माझा
हत्याकांडात छिन्नविच्छिन्न झालेला

कधी केली मी?
निवड माझ्या भाषेची?
निर्ममपणे नष्ट करून टाकलेल्या...
एक संपूर्ण वाक्य?
ज्याच्या आत राहात होते
माझे कितीतरी उच्चार
ओठांआड लपवून ठेवलेले उत्कट...

.....

हा रस्ता
बुळूबुळू रक्त सांडणारा अव्याहत
कधी निवडला मी?

हे शरीर आहे
हजारो तुकड्यातुकड्यांनी शिवलेले
ज्याच्यावर आहेत
असंख्य घाव
वर्तमानाला उधडून
स्वप्नांचा धुम्मस कापूस पिंजणारे

मी नाही निवडलं हे जग
नाही निवडलं हे शरीर
तरी
मला ते करायचंय
जगायला लायक
सुंदर
आणि नम्र
ज्याच्यावर असतील मानुषतेच्या सर्व खुणा
ज्या मिरवेन मी छातीवर
मंगळसूत्राऐवजी

धन्यवाद!

.शुचि Thu, 13/10/2016 - 00:02

हे भाषण इथे दिल्याबद्दल माहीतगार धन्यवाद. दॅट रिमाईंडस मी - फेसबुकच्या "फॉलो" या सुविधेचा उपयोग करुन घ्यायला हवा. यावर बोलण्याची पात्रता, तयारी नसल्यामुळे अन्य आय डीज चे विचार ऐकण्यास उत्सुक.
___
आणि तसंही अमेरीकेत राहून शूरपणे विरोधी अथवा समर्थन करणारे कोणतेच बोल बोलायला फारसे शौर्य-धैर्य लागणार नाही जसे भारतात राहून अमेरीकेच्या राजकारणाबद्दल लंब्याचवड्या गप्पा मारणे अर्थहीन आहे, निव्वळ टामपास आहे तसेच. पण या विषयावरचे अन्य लोकांचे विचार ऐकून शिकावयास मिळाले तर शिकावेसे जरुर वाटते.
___
अर्थात शब्दांमध्ये खूप ताकद असते हे मान्यच आणि जर कोणी कोणाचे मतपरिवर्तन करु शकले तर ते पहायला खूप आवडेल बाकी कोणता खेळाडू कोणती चाल चालणार हे आंजावर वावरुन माहीत झालेले आहेच.

.शुचि Thu, 13/10/2016 - 00:21

Correlation does not imply causation.
सर्व हगले पादले*, मोदीं सत्तेवर आल्यामुळे होत आहे असा समज काही लोकांमध्ये का दिसतो कोण जाणे.
*- असांसदीय भाषा :(
____
बाय द वे रा स्व संघ = मोदी हे समीकरण बरोबर आहे का? => (मोदी इज सबसेट ऑफ रास्व संघ) AND (रा स्व संघ इज सबसेट ऑफ मोदी)
विशेषतः अधोरेखीत भाग.
रा स्व संघ ही एन्टिटी मोदींपेक्षा कितीतरी व्यापक असणार मग त्यांनी केलेल्या प्रत्येक दहशतवादास मोदी कसे जबाबदार?
.
आता कोणी तरी म्हणेल मोदींची मूकसंमती = होकार. तर तसं का?
मौन रहाणे = नकार असे का नाही?
का हे सर्व चिंतन फार फार बालीश अथवा "शहामृग वालुका न्याय" आहे?

नितिन थत्ते Thu, 13/10/2016 - 11:40

In reply to by .शुचि

>>Correlation does not imply causation.

१. माझ्या घेट्टो*मधले बहुतांश लोक २०१४ पूर्वी मोदी पंतप्रधान का व्हावेत याचं उत्तर जहाल असतील "धडा शिकवण्यासाठी" पासून अगदी जहाल नसतील तर "वचक बसावा म्हणून" असे देत असत. "देशाचा विकास व्हावा म्हणून" हे उत्तर क्वचितच देत असत.
२. धडा शिकवणे वगैरेसाठी मोदी का? याचं उत्तर मोदींच्या ट्रॅक रेकॉर्डमध्ये होतं. आर्ग्युमेंट करताना हेच लोक "पण त्यांच्यावरचा कुठलाच आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही" असं म्हणत असले तरी जेव्हा हा धडा शिकवण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाईल तेव्हा 'तिकडे काणाडोळा करणारे, आणि त्याबद्दल खेद न वाटणारे' मोदी चांगले असा विचार होता. भाजपमधील इतर कोणाबद्दल "असा विश्वास" त्यांच्या मनात नव्हता.

*Includes women.

>>आता कोणी तरी म्हणेल मोदींची मूकसंमती = होकार. तर तसं का?
>>मौन रहाणे = नकार असे का नाही?

सरकार नावाच्या एंटिटीचे कर्तव्य सरकारबाह्य व्यक्तींना कायदा हातात घेण्यापासून रोखणे हे आहे. तसे न करणे** म्हणजे त्या गुंडगिरीला मूकसंमती आहे असा एकच अर्थ निघू शकतो. मौन = नकार हा अर्थ निघू शकत नाही.
** सरकार रोखण्याचे नाटक तरी करू शकते. पण नाटक सुद्धा न करणे हे अनअ‍ॅक्सेप्टेबल आहे.
-------------------------
मोदी हा संघाचा विठोबा आहे काय?

.शुचि Thu, 13/10/2016 - 16:16

In reply to by नितिन थत्ते

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
.
एकंदर एक तुमचा घेट्टो मोठा असावा हे मानण्यास वाव आहे कारण इथे बर्‍याच जणांचा मित्रसंग्रह अफाट आहे = तितक्या मेनांशी/मेंदूंशी ओळख. तितक्या विविध विचारप्रणालींशी ओळख. आणि तसेही एकंदर नीरीक्षण करता "तशाच" लोकांचा मोदींना जास्त पाटींबा आहे असे वरवर वाटते खरे.
.

मौनम सर्वार्थ साधनम तद्वत मौन = मूकसंमती हेच नकारापेक्षा बरोबर वाटते हेही खरे आहे.

अनुप ढेरे Thu, 13/10/2016 - 00:30

कश्यप तरूणाची बातमी बोगस होती म्हणे.
http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Film-executive-cooked-up… आणि http://www.huffingtonpost.in/2016/10/03/real-victims-will-face-the-cons…

बाकी सगळे मुद्दे तेच तेच...

अक्षरमित्र Thu, 13/10/2016 - 01:12

संपूर्ण भाषणाचे दोन भाग करता येतील. राजकारण व साहित्य सेवा. राजकारणाबाबत लिहितांना,
दोन वर्षापुर्वीच्या, कांग्रेसी राजकारणाबद्दल सुद्धा लिहिले असते तर तेव्हढा भाग ' एकांगी ' वाटला नसता. थोडक्यात नरेन्द्र मोदी सत्तेत आल्यामुळेच, साहित्य क्षेत्रात ' भयंकर ' असे काही घडत आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न दिसून येतो. त्याच्या अगोदर सर्व काही ' आलबेल ' होते असे तर म्हाणवयाचे नाही ना ? अशी शंका येते. एकच उदाहरण सॅटनिक व्हर्सेस चे आठवते का ? इस्लामिक राष्ट्रांनी बंदी घालण्याच्या अगोदरच, भारतात बंदी घातली गेली. हे कशाचे द्योतक होते ?

गब्बर सिंग Thu, 13/10/2016 - 02:01

In reply to by अक्षरमित्र

दोन वर्षापुर्वीच्या, कांग्रेसी राजकारणाबद्दल सुद्धा लिहिले असते तर तेव्हढा भाग ' एकांगी ' वाटला नसता.

(१) लेखकाने एकांगी नसावे असं तुम्हाला का वाटतं ? विचारवंतांनी एकांगी का नसावे ? (एखादा लेखक एका विशिष्ठ विचारप्रणालीचा पाईक असेल तर त्याने आपल्याच भूमिकेच्या विरोधी मतं का मांडावीत ? )

(२) लिखाण करताना अभिनिवेश नसावा - अशी पण मागणी असते काही लोकांची.

अ‍ॅकेडेमिक विचारवंतांनी/संशोधकांनी लिहिलेलं वाचलंत तर त्यांचं लिखाण हे अनेक वेळा (सर्वदा नव्हे) अभिनिवेशविहीन व वस्तुनिष्ठ (म्हंजे एकांगी नसलेलं) च असतं की. मग अ‍ॅकेडेमिक विचारवंतांनी लिहिलेलं "आयव्होरी टॉवर" मधून लिहिलेलं म्हणून डिसमिस का केलं जातं ? ( हे सगळं तुम्ही म्हणताय/करताय असं मला म्हणायचं नाही. पण तुम्ही एकांगी शब्द वापरलात त्यातून विचारचक्र सुरू झाले. )

आदूबाळ Thu, 13/10/2016 - 03:21

In reply to by गब्बर सिंग

लेखकाने एकांगी नसावे असं तुम्हाला का वाटतं ? विचारवंतांनी एकांगी का नसावे ?

विचारवंतानेच काय, पण दूधवाल्यानेही आपापल्या विषयापुरतं एकांगी असू नये. जेव्हा लोक तुमच्याकडे त्या विषयातील तज्ज्ञ म्हणून बघतात तेव्हा शक्य तो सर्व उलटसुलट विचार करून समतोल मत देणं ही तज्ञाची जबाबदारी आहे.

गब्बर सिंग Thu, 13/10/2016 - 03:35

In reply to by आदूबाळ

मी तुमचा प्रतिसाद एका टोकाला नेतो. बघा हं ... आपली चर्चा कुठे जातेय ते पाहू.

गुन्हेगाराच्या बाजूने केस लढणार्‍या (बचावपक्षाच्या) वकिलाकडे जर त्या गुन्हेगाराविरोधी सबळ पुरावा असेल आणि तोच पुरावा फिर्यादीपक्षाकडे नसेल. आणि त्या पुराव्या अभावी तो गुन्हेगार सुटत असेल तर बचावपक्षाच्या वकीलाने (आपल्या अशीलाच्या विरोधी असलेला) तो पुरावा कोर्टासमोर ठेवावा का ? तो वकील तर वकीलीतला/कायद्याचा तज्ञच आहे की.

( मुद्दा टोकाचा, गैरवाजवी आहे असं वाटू शकेल पण बघा प्रतिवाद करून ...)

आदूबाळ Thu, 13/10/2016 - 14:48

In reply to by आदूबाळ

स्पष्टीकरणः

गुन्हेगाराच्या बाजूने केस लढणार्‍या (बचावपक्षाच्या) वकिलाकडे जर त्या गुन्हेगाराविरोधी सबळ पुरावा असेल आणि तोच पुरावा फिर्यादीपक्षाकडे नसेल. आणि त्या पुराव्या अभावी तो गुन्हेगार सुटत असेल तर बचावपक्षाच्या वकीलाने (आपल्या अशीलाच्या विरोधी असलेला) तो पुरावा कोर्टासमोर ठेवावा का ? तो वकील तर वकीलीतला/कायद्याचा तज्ञच आहे की.

यातला कायदेशीर अँगल सध्यापुरता बाजूला ठेवू. (आरोपी गुन्हेगार आहे की नाही हे ठरवायचं काम न्यायालयाचं आहे. उभयपक्षाच्या वकिलाने आगावपणा करून ती जबाबदारी सुओ मोटो घेऊ नये. वगैरे.)

हा raison d'être चा प्रकार आहे. म्हणजे कोणाला कशासाठी 'ठेवलंय' याचा.

लेखक / विचारवंत / एक्सपर्टला समतोल मत देण्यासाठी ठेवलेलं असतं. (म्हणजे मला आपलं असं वाटतं. हे अ‍ॅझम्पशन मान्य नसेल तर पुढच्या प्रतिसादाची नळी करावी.) त्यामुळे त्याने एकांगीपणा केला तर ती raison d'être शी प्रतारणा आहे. त्याला अप्रेझलमध्ये शून्य रेटिंग देऊन घरी बसवावं.

बचावपक्षाच्या वकिलाला बचाव करण्यासाठी ठेवलं आहे. त्याने बचाव करावा. (तो करतानाही स्वतःच्याच आर्ग्युमेंटच्या प्रेमात पडण्यासारखा एकांगी बावळटपणा त्याने करून चालणार नाही. समोरच्याची काय मूव्ह असेल त्याचा अंदाज घेऊन आधीच त्यावर मात करण्याची तयारी करणे हे लिटिगेशन १०१ आहे.) इन्फर्मेशन असिमेट्री आपल्या बाजूने राबवून घेणे हा एकांगीपणा नव्हे.

.शुचि Thu, 13/10/2016 - 20:02

In reply to by आदूबाळ

इन्फर्मेशन असिमेट्री आपल्या बाजूने राबवून घेणे हा एकांगीपणा नव्हे.

क्या बात है!
.

लेखक / विचारवंत / एक्सपर्टला समतोल मत देण्यासाठी ठेवलेलं असतं.

हे मात्र भाबडे आनि निराधार गृहीतक वाटते. विचारवंताने, लेखकाने स्वतःच्या विचारांशी मग ते किती का प्रक्षोभक, असमनतावादी असेना, प्रामाणिक असावे असे वाटाते.

आदूबाळ Thu, 13/10/2016 - 20:11

In reply to by .शुचि

हे मात्र भाबडे आनि निराधार गृहीतक वाटते. विचारवंताने, लेखकाने स्वतःच्या विचारांशी मग ते किती का प्रक्षोभक, असमनतावादी असेना, प्रामाणिक असावे असे वाटाते.

समतोल मत म्हणजे "हीही बाजू खरी आणि तीही बाजू खरी" असा समतोल नव्हे. समतोल म्हणजे त्या विषयाच्या सर्व पैलूंवर विचार करून बनवलेलं अभ्यस्त मत. अ‍ॅन ओपिनियन फॉर्म्ड आफ्टर मेकिंग ड्यू डिलिजन्स. उचलली जीभ... प्रकारचं नव्हे. मग ते कितीही प्रक्षोभक, असमानतावादी असलं तरी हरकत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 13/10/2016 - 20:49

In reply to by आदूबाळ

प्रश्न असा की, समोर मांडलं गेलेलं मत प्रक्षोभक, असमानतावादी दिसत आहे तरीही ते समतोल आहे, हा निवडा करणार कोण?

---

प्रतिक्रियांमध्ये एक आक्षेप आहे की काँग्रेसी राज्यावर टीका नाही. इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी, खैरलांजी, कोपर्डीच्या भागात घडलेले दलितविरोधी गुन्हे असे उल्लेख भाषणात विखुरलेले आहेत. दाभोळकरांचा, त्यांच्या हत्येचा उल्लेख आहे. हे सगळे प्रकार काँग्रेसी राज्यातच घडले होते. ह्या सगळ्या घटना भूतकाळात घडलेल्या, आणि/किंवा खूप ग्लॅमर नसलेल्या असल्यामुळे सध्या भाषणात त्यांवर फार भर नाही; सध्याच्या आणि ग्लॅमरस सांस्कृतिक दहशतवादाचाच अभ्यास अधिक हे एक कारण मला दिसतं.

गब्बर सिंग Thu, 13/10/2016 - 20:40

In reply to by आदूबाळ

लेखक / विचारवंत / एक्सपर्टला समतोल मत देण्यासाठी ठेवलेलं असतं. (म्हणजे मला आपलं असं वाटतं. हे अ‍ॅझम्पशन मान्य नसेल तर पुढच्या प्रतिसादाची नळी करावी.) त्यामुळे त्याने एकांगीपणा केला तर ती raison d'être शी प्रतारणा आहे. त्याला अप्रेझलमध्ये शून्य रेटिंग देऊन घरी बसवावं.

आता मला सांगा की लेखकाला कोणी नेमलेले आहे ? ठेवलेले आहे ? समाजाने, सरकारने, व्यक्तीने ?

तो स्वतःहून स्वतःच्या भूमिकेची वकीली करण्यासाठी पुढे आलेला आहे असं अनेकदा होऊ शकतं की नाही ?

आदूबाळ Thu, 13/10/2016 - 20:55

In reply to by गब्बर सिंग

म्हणजे लेखक** कोणाची चाकरी करतो असा प्रश्न आहे का? तो कोणाचीही करत असला तरी सर्वांगीण विचार करायची त्याची जबाबदारी त्याला टाळता येत नाही.

___
**इथे लेखक हा प्लेसहोल्डर आहे. दुसरं कोणतंही प्रोफेशन इथे चालेल. भारतीय क्रिकेट संघातला फलंदाज हेही चालेल.

गब्बर सिंग Thu, 13/10/2016 - 20:58

In reply to by आदूबाळ

म्हणजे लेखक** कोणाची चाकरी करतो असा प्रश्न आहे का? तो कोणाचीही करत असला तरी सर्वांगीण विचार करायची त्याची जबाबदारी त्याला टाळता येत नाही.

(हे वाक्य आपल्या दोघांमधला मतभेद योग्य शब्दात मांडतं. नेमकेपणे.)

पण मग असं होत असेल लेखकांमधील स्पर्धा (competition to propose ideas) प्रिक्लूड होत्ये की नाही ?

दुसर्‍या शब्दात सांगायचे तर --- लेखक्/विचारवंत - are able to acquire, store, process, analyze all the pertinent information themselves - हे फार मोठं गृहितक आहे यात.

(लेखक हा शब्द प्लेसहोल्डर आहे हे मान्य).

अनु राव Thu, 13/10/2016 - 22:59

In reply to by आदूबाळ

सर्वांगीण विचार करायची त्याची जबाबदारी त्याला टाळता येत नाही.

लेखकानीच काय कोणी पण सर्वांगीण विचार केला पाहिजे अशी कुठलीही जबाबदारी नैतिकदृष्या कोणावरही नाही. तसेही वैज्ञानिक दृष्या सर्वांगिण विचार कोणी करु शकत नाही. जे आम्ही सर्वांगिण विचार करतो असा दावा करतात ते धाधांत खोटे बोलतात, त्यांना फोडुन काढले पाहिजे.

गब्बर सिंग Thu, 13/10/2016 - 20:45

In reply to by आदूबाळ

या उदाहरणाचा एकांगी विचार करण्याशी काय संबंध आहे?

धक्कादायक प्रश्न.

बचाव पक्ष हे एक अंग, फिर्यादीपक्ष हे दुसरे अंग. (या दोन अंगांबरोबर न्यायमूर्ती जर कन्सिडर केलेत तर "the whole"/सर्वांगं होतील.)

बचाव पक्षाच्या वकीलाने त्याची बाजू मांडण्या आधी (अ) दोन्ही अंगांची माहीती मिळवायचा यथाशक्ती यत्न करणे परंतू (ब) समर्थन/प्रचार/वकीली फक्त आपल्या पक्षकाराचीच करणे --- ह्या दोन स्टेजेस आहेत. व आपण (ब) बद्दल बोलत आहोत. की लेखक्/विचारवंत हा एका विशिष्ठ भूमिकेची वकीली करत आहे.

आदूबाळ Thu, 13/10/2016 - 20:55

In reply to by गब्बर सिंग

आपण (ब) बद्दल बोलत आहोत. की लेखक्/विचारवंत हा एका विशिष्ठ भूमिकेची वकीली करत आहे.

मीही (ब) बद्दलच बोलत आहे. माझं म्हणणं असं आहे - "बाबा रे, वकिली कोणाचीही कर. विचार सगळ्या अंगांचा कर."

इथे:

(तो करतानाही स्वतःच्याच आर्ग्युमेंटच्या प्रेमात पडण्यासारखा एकांगी बावळटपणा त्याने करून चालणार नाही. समोरच्याची काय मूव्ह असेल त्याचा अंदाज घेऊन आधीच त्यावर मात करण्याची तयारी करणे हे लिटिगेशन १०१ आहे.)

अनुप ढेरे Thu, 13/10/2016 - 21:19

In reply to by गब्बर सिंग

गुन्हेगाराच्या बाजूने केस लढणार्‍या (बचावपक्षाच्या) वकिलाकडे जर त्या गुन्हेगाराविरोधी सबळ पुरावा असेल आणि तोच पुरावा फिर्यादीपक्षाकडे नसेल. आणि त्या पुराव्या अभावी तो गुन्हेगार सुटत असेल तर बचावपक्षाच्या वकीलाने (आपल्या अशीलाच्या विरोधी असलेला) तो पुरावा कोर्टासमोर ठेवावा का ?

असा पुरावा कोर्टासमोर आणणं आणि प्रतिपक्षाशी शेअर करणं हे कायद्याने बंधनकारक आहे. पुरावा दडपणे हा वकीलाने केलेला गुन्हा समजला जातो. वकीलाला शिक्षा होऊ शकते. *




===




* हे अर्थात अनेक टीव्ही सिरिअयल/सिनेमे बघून मिळवलेल्या ज्ञानाच्या आधारे.

adam Thu, 13/10/2016 - 22:21

In reply to by अनुप ढेरे

पण नेमका, पुरेसा बचाव करता येत असेल; तर गुन्हा करणं हाही गुन्हा नाहिच. गुन्ह्याचा बचाव करणं ही तर फार मोठी,चांगली गोष्ट आहे. एकूणातच न्यायव्यवस्थेबद्दल बर्‍याच शंका आहेत मला. गोश्टी सिद्ध करणं, कायद्याच्या चौकटित बसवणं हे एक "तंत्र" , "क्राफ्टिंग","कौशल्य" असतं. ते तुमच्या वकिलाकडे असायला हवं. शिवाय त्याला साथ देण्यासाठी अशीलही तयारीचा असावा लागतो. अशीलाचा सराव करुन घ्यावा लागतो. (साधारण तोंडी परीक्षेचा/व्हायवाचा सराव करुन घेता येतो तसच. हेही क्राफ्टिंग.) . सोबतीला काही प्रमाणात नशीबाची साथही लागते. हे वादी-प्रतिवादींपैकी ज्याला नेमकं जमेल; निकाल त्याच्या बाजूनं झुकतो. निकाल ज्याच्या बाजूनं लागलाय तो "न्याय" मिळाला असं म्हणतो.
म्हणजेच, जर ते तंत्र/कौशल्य नसेल, किंवा नशीब तुमच्या बाजूनं नसेल; तर तुमची बाजू न्यायाची नाही; असं मानलं जातं.
.
.
शिवाय मुळात खटल्याचा निकाल काहीही लागो, खटला लढवणं हीच एक मोठ्ठी , जबरदस्त शिक्षा वातू शकते. माणूस घायकुतीला येतो. क्वचित दिवाळखोरीतही जाउ शकतो किंवा त्याच्या मनःस्वास्थ्यावर, करिअरवर भयावह असा परिणाम होउ शकतो निव्वळ खटला लढवत राहण्यानं.
नियमानुसार, कायद्यानुसार, सगळ्या प्रोसेस सांभाळून करायचं म्हटल्यावर खूपदा खटला लढवणं हीच एक शिक्षा असते. शिवाय निकालाची निश्चिती नसल्यानं त्या अनिश्चिततेची तलवार टांगती डोक्यावर असते. सतत अशा तणावात राहिल्यानं मग.....
असो. भलतच अवांतर होतय.

गब्बर सिंग Thu, 13/10/2016 - 04:38

In reply to by मिलिन्द

"एकांगीपणा"चेच एक नाव "पॅशन" हेही असू शकते .

आज दारू प्यायचा मूड नैय्ये. नैतर एकत्र बसलो असतो यार.

मिलिन्द Thu, 13/10/2016 - 04:16

In reply to by अक्षरमित्र

सॅटनिक व्हर्सेस चे आठवते का ? इस्लामिक राष्ट्रांनी बंदी घालण्याच्या अगोदरच, भारतात बंदी घातली गेली. तेंव्हा ते पुस्तक मी अमेरिकेतून भारतात "स्मगल " केले होते . (दुर्दैवाने पुस्तक मात्र भिकार निघाले! असो! तो मुद्दा नाही!) कोणत्याही अभिव्यक्तीवर बंदी घालणे हे न्यूनगंडाने पछाडले असण्याचे लक्षण आहे.

मिलिन्द Thu, 13/10/2016 - 04:10

यात शिवाजी महाराजांवर टीका कोठे आहे, ज्या कारणासाठी प्रज्ञा पवारांवर खटला भरण्याची मागणी शिवसेनेने केली आहे ? आणि साहित्य संमेलनात कोणत्याही प्रकारची झुंडशाही म्हणजे सांस्कृतिक दहशतवादच म्हणावा लागेल .

बिटकॉइनजी बाळा Thu, 13/10/2016 - 10:24

In reply to by मिलिन्द

शिवसेनेत महाराष्ट्रातील सगळ्यात मंद नेते भरले आहेत.
प्रज्ञा दया पवार पहिल्याच नाहीत, "कोण ही पुष्पा भावे" असं बाळासाहेब शेरदिलानं ओरडले.

ॲमी Mon, 07/11/2016 - 20:04

In reply to by मिलिन्द

उत्तर इथे मिळाले www.hindustantimes.com/india-news/to-counter-maratha-agitation-dalits-g…

Incidentally, on the second day of the literary event in Satara, a mob of Maratha youth demanded its boycott. They complained Kasbe had insulted Shivaji in his speech the previous day. Kasbe says, “I had only said what every Marathi historian has written about — the fact that Shivaji was in theory a shudra.”

चिंतातुर जंतू Tue, 08/11/2016 - 13:35

In reply to by ॲमी

मिलिंद यांचा प्रश्न -

>> यात शिवाजी महाराजांवर टीका कोठे आहे, ज्या कारणासाठी प्रज्ञा पवारांवर खटला भरण्याची मागणी शिवसेनेने केली आहे ?

यावर तुम्ही म्हणता 'उत्तर इथे मिळाले'. जरा आम्हालाही सांगा की प्रज्ञा दया पवारांच्या भाषणात शिवाजी महाराजांवर जी काय टीका आहे ते हिंदुस्तान टाइम्स वाचून तुम्हाला कसं कळलं?

ए ए वाघमारे Thu, 13/10/2016 - 10:56

कंटाळा आला बॉ तेच ते ऐकून..त्यामुळे कंटेटवर फार चर्चा करण्यात काही अर्थ नाही.

'साहित्य' सम्मेलनातल्या भाषणात साहित्याबद्दल काही मौलिक चर्चा असेल म्हणून धागा वाचला. पण टीव्हीवरच्या खिडकीचर्चांपेक्षा काही वेगळं सापडलं नाही.

एका गोष्टीची मात्र गंमत वाटते.एकीकडे लेखकाने भूमिका घ्यायला हवी असा आग्रह करायचा.आणि अनंतमूर्तींसारख्या एखाद्याने राजकीय भूमिका घेतल्यावर(की जाहीर केल्यावर?) त्यावर राजकीय प्रतिक्रिया आल्या की,'सांस्कृतिक दहशतवादा'ची हाकाटी पिटायची. म्हणजे एखाद्या साहित्यिकाने घेतलेली राजकीय भूमिका ही त्याची राजकीय भूमिका नसून (त्याच्या मूळ फंक्शनला अनुसरून असलेली ती)वैचारिक,सांस्कृतिक भूमिका आहे असं म्हणायचं.मात्र त्यावर प्रतिक्रिया देणार्‍या राजकीय पक्षांवर मात्र तुम्ही (त्यांच्या मूळ फंक्शनला अनुसरून असलेली) राजकीय भूमिका न घेता आमच्यासारखी (राजकीय पक्षांच्या मूळ फंक्शनला असंबद्ध असलेली)वैचारिक,सांस्कृतिक भूमिका घ्या अशी अपेक्षा करायची हे कुठलं लॉजिक झालं?

या भाषणात शिवाजी महाराजांवर काय आक्षेपार्ह आहे ते मलाही कळलं नाही. समजा या मजकूरात न आलेलं, कुणाला आक्षेपार्ह वाटलेलं काही असलंही तरी शिवसेनेसारख्या दांडगाईसाठी कुप्रसिद्ध असलेल्या संघटनेने रीतसर खटला वगैरे करण्याची लोकशाही मागणी करणं या त्यांच्या नव्या नरमाईच्या भूमिकेचं स्वागत करायला हवं. :)

May Thu, 13/10/2016 - 11:32

In reply to by ए ए वाघमारे

'साहित्य' सम्मेलनातल्या भाषणात साहित्याबद्दल काही मौलिक चर्चा असेल म्हणून धागा वाचला. पण टीव्हीवरच्या खिडकीचर्चांपेक्षा काही वेगळं सापडलं नाही.

बाडिस, अगदी मनातलं बोललात..

गब्बर सिंग Thu, 13/10/2016 - 20:33

In reply to by ए ए वाघमारे

एका गोष्टीची मात्र गंमत वाटते.एकीकडे लेखकाने भूमिका घ्यायला हवी असा आग्रह करायचा.आणि अनंतमूर्तींसारख्या एखाद्याने राजकीय भूमिका घेतल्यावर(की जाहीर केल्यावर?) त्यावर राजकीय प्रतिक्रिया आल्या की,'सांस्कृतिक दहशतवादा'ची हाकाटी पिटायची. म्हणजे एखाद्या साहित्यिकाने घेतलेली राजकीय भूमिका ही त्याची राजकीय भूमिका नसून (त्याच्या मूळ फंक्शनला अनुसरून असलेली ती)वैचारिक,सांस्कृतिक भूमिका आहे असं म्हणायचं.मात्र त्यावर प्रतिक्रिया देणार्‍या राजकीय पक्षांवर मात्र तुम्ही (त्यांच्या मूळ फंक्शनला अनुसरून असलेली) राजकीय भूमिका न घेता आमच्यासारखी (राजकीय पक्षांच्या मूळ फंक्शनला असंबद्ध असलेली)वैचारिक,सांस्कृतिक भूमिका घ्या अशी अपेक्षा करायची हे कुठलं लॉजिक झालं?

आदूबाळ यांच्यासाठी.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 13/10/2016 - 19:56

भाषणातलं 'तेच ते' दिसणाऱ्यांना त्यावर आलेल्या 'दहशतवादी' प्रतिक्रियेतलं 'तेच-ते' दिसत नाही; कदाचित अशी 'दहशतवादी' प्रतिक्रिया आली नसती तर ह्या भाषणाचा निराळा विचारही करावा लागला/केला नसता.

.शुचि Thu, 13/10/2016 - 20:05

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पण "दहशतवादी" प्रतिक्रियांवर रिअ‍ॅक्ट करण्याची बळबरी कोणीच केलेली नाही. भाषणाचा निराळा विचार स्वतंत्रपणेही कराता येतो की. तसा करताना कोणीच दिसत नाहीये. तसाही विषयच "सांस्कृतिक दहशतवादाचं आव्हान..." आहे.
___
वाचनसंस्कृती व निरलस हे शब्द आवडलेले आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 13/10/2016 - 20:33

In reply to by .शुचि

मूळ भाषणावरही प्रतिक्रिया देण्याची जबरदस्ती कोणावरही नाही. तरीही, आपण होऊन, उत्स्फूर्त प्रतिक्रिया देताना, भाषण तेच-ते असल्याचं दिसलं; त्या पुढचा 'दहशतवाद' तोच-तो असल्याचं दिसलं नाही. ह्यातून दोन शक्यता दिसतात -

१. भाषणातला मजकूर, मुद्दा तोच-तो असेल तरीही हा मुद्दा घासून गुळगुळीत झालेला नाही; पण सांस्कृतिक दहशतवाद घासून गुळगुळीत झालेला आहे.
२. सांस्कृतिक दहशतवाद होणं फक्त गृहित धरलं गेलं एवढंच नाही तर तो हवाहवासा वाटतो.

ए ए वाघमारे Fri, 14/10/2016 - 09:40

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भाषणातलं 'तेच ते' दिसणाऱ्यांना

तेच ते म्हणजे दोन्ही बाजूंच्या त्याच त्या 'सदियोंसे चल्या आ रह्या' आर्ग्युमेंट्स इतकंच (माझं तरी) म्हणणं आहे.

तुम्हालाही त्याच त्या आर्ग्युमेंटसमध्ये मजा येत असेल तर, हे घ्या :)

०१. लेखिका ब्रिटीश राजवटीपासून ते बौद्ध संस्कृतीच्या र्‍हासापर्यंत सगळ्याला (म्हणजे एतद्देशियांच्या संस्कृतीचे दमन करण्याला)'सांस्कृतिक दहशतवाद' म्हणतात. हे ब्रिटीशांनी आधुनिकतेच्या नावाखाली केलं असंही त्यांचं मत आहे. आजचे मागास,शोषित,वंचित,स्त्रीवर्ग यांचे सामाजिक उन्नयन करणे,त्यांना त्यांच्या त्या शोषितावस्थेतून, वंचितावस्थेतून बाहेर काढणारे मुक्तिदायी राजकारण करणे आवश्यक आहे असे त्या म्हणतात.यालाच बहुधा समाजाच्या 'मुख्य प्रवाहात' आणणे असं म्हणत असावेत. पण हे करताना 'सांस्कृतिक दमन' होणार नाही याची काळजी कशी घ्यायची? असं दमन झालं तर तो सांस्कृतिक दहशतवाद होतो का? काही उदाहरणे बघू:समजा मुस्लिम समाजातील बहुभार्यापद्धती, त्रिवार तलाक, बुरखा यासारख्या महिलांप्रती भेदभावी व अन्यायकारक प्रथांमध्ये सुधारणेसाठी एखादे सरकार प्रामाणिक प्रयत्न करत असेल तर हा 'सांस्कृतिक दहशतवाद' झाला का? वनांत राहणार्‍या आदिवासींमध्ये सरकार आधुनिक राहणीमानाचा प्रचार करत असल्याने आदिवासी आपली परंपरागत कौशल्ये,सण -उत्सव विसरत गेले तर तो 'सांस्कृतिक दहशतवाद' झाला?

०२.JNU hypocrisy: No room for courses on Hinduism at premier university
यालाही 'आपला तो बाब्या' न्यायाने सांस्कृतिक दहशतवाद म्हणावे का?

गब्बर सिंग Fri, 14/10/2016 - 09:47

In reply to by ए ए वाघमारे

काही उदाहरणे बघू:समजा मुस्लिम समाजातील बहुभार्यापद्धती, त्रिवार तलाक, बुरखा यासारख्या महिलांप्रती भेदभावी व अन्यायकारक प्रथांमध्ये सुधारणेसाठी एखादे सरकार प्रामाणिक प्रयत्न करत असेल तर हा 'सांस्कृतिक दहशतवाद' झाला का?

नाय नाय ओ.

मोदी करत असतील तर तो सांस्कृतिक दहशतवादच असतो. काँग्रेस ने केले तर ते "अल्पसंख्यांकाना राष्ट्रीय मुख्य प्रवाहात आणणे" असते.

नितिन थत्ते Fri, 14/10/2016 - 09:57

In reply to by गब्बर सिंग

>> काँग्रेस ने केले तर ते "अल्पसंख्यांकाना राष्ट्रीय मुख्य प्रवाहात आणणे" असते.

काँग्रेसने केलेच नाही ना ते?

गब्बर सिंग Fri, 14/10/2016 - 10:09

In reply to by नितिन थत्ते

काँग्रेसने केलेच नाही ना ते?

प्याकेजेस दिली. उदा मे २०१३ मधे एक ३००० कोटींचे प्याकेज दिले ... मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी.

नितिन थत्ते Fri, 14/10/2016 - 10:29

In reply to by गब्बर सिंग

मी "मुस्लिम समाजातील बहुभार्यापद्धती, त्रिवार तलाक, बुरखा यासारख्या महिलांप्रती भेदभावी व अन्यायकारक प्रथांमध्ये सुधारणेसाठी " याविषयी बोलतोय. ते काँग्रेसने केलेच नाही ना !!!

गब्बर सिंग Fri, 14/10/2016 - 10:34

In reply to by नितिन थत्ते

मी "मुस्लिम समाजातील बहुभार्यापद्धती, त्रिवार तलाक, बुरखा यासारख्या महिलांप्रती भेदभावी व अन्यायकारक प्रथांमध्ये सुधारणेसाठी " याविषयी बोलतोय. ते काँग्रेसने केलेच नाही ना !!!

त्यांचा उद्देश नेमका विरुद्ध होता. सुधारणा न घडवणे हा हेतू होता. म्हंजे मुसलमान राष्ट्रीय मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले जातील. मग पैसे मंजूर करायचे. कंत्राटं द्यायची. त्यातून पैसा ओरपायचा आणि वर मिरवायचं की आम्ही अल्पसंख्यप्रेमी आहोत.

चिंतातुर जंतू Fri, 14/10/2016 - 13:36

जमिनीवरचं वास्तव काय आहे ह्याची जाणीव मराठी आंजाकरांना फारशी नसते ह्याची पुन्हा एकदा प्रचिती ह्या चर्चेमुळे मिळाली. मला समजलेलं वास्तव अंतिम आहे असा माझा दावा नाही, पण ते असं आहे :

भाषणात राष्ट्रपुरुषांविषयी आक्षेपार्ह बोललं गेलं असा प्रज्ञा दया पवारांवर आरोप आहे. इथे काही जणांनी असं कबूल केलेलं आहे की तसं ह्या भाषणात काहीच दिसत नाही. मग हे काय चाललं आहे? थोडक्यात सांगायचं, तर एका दलित स्त्रीनं कोपर्डीतल्या पीडित (मराठा) स्त्रीची बाजू घेतली आहे, पण त्या निमित्तानं मराठ्यांचे जे मोर्चे निघत आहेत त्यामागे कसा कांगावा आहे हे सांगितलं आहे.

>> ज्या नगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षात दलित अत्याचाराची माणुसकीला काळिमा फासणारी अनेक प्रकरणे घडली त्या प्रकरणांबद्दल या मोर्च्यांना काहीच म्हणायचे नव्हते व नाही. खैरलांजीबद्दल काही म्हणायचे नाही. मराठा सोडून अन्य स्त्रियांबद्दल, त्यांच्या इभ्रतीबद्दल मराठा नेतृत्वाला काहीच भूमिका नाही? आमच्या त्या सगळ्या जिजाऊच्या लेकी, इज्जतदार बायका आणि दुसऱ्यांच्या बायका म्हणजे काय फक्त 'वाड्यावर या'व्यात म्हणून! हे कसे चालेल?

इथे खरी गोम आहे.

(इथे मराठा, पण एकंदर) सरंजामी व्यवस्थेचा एक गुणधर्म हा असतो, की तिला बाईला पवित्र वगैरे मानायचं असतं पण तिला आवाज द्यायचा नसतो. 'आमच्या बायकांवर अत्याचार होतो आहे म्हणजे आमची इभ्रत लुटली जाते आहे. आणि असं करण्याची कुणाची हिंमतच कशी होते आहे?' इथे मराठा अंगाराचं मूळ आहे. त्यात ते कृत्य दलितांनी केलेलं आहे ही विशेष अपमानाची गोष्ट आहे. म्हणजे जात्यभिमान ह्यात विशेष दुखावला गेला आहे. अशा परिस्थितीत एक दलित बाई आपल्याला शहाणपणा शिकवते आहे हे झोंबलेलं आहे.

त्यात पुन्हा पाटणचे आजी आमदार देसाई (शिवसेना) आणि माजी आमदार पाटणकर (राष्ट्रवादी) (माझ्या माहितीनुसार हे संमेलनाचे संयोजक होते) ह्यांच्यातल्या पूर्वापार संघर्षाचा संदर्भ ह्या वादाला आहे. आता पुन्हा जिल्हा परिषद / पंचायत निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे भावना भडकवून मतं आपल्याकडे खेचण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे दोन मराठ्यांच्या सत्तासंघर्षामध्ये प्यादं म्हणून हे लोक प्रज्ञा दया पवार, कसबे, मराठा सर्वसामान्य आणि तुम्हा-आम्हालाही वापरू पाहात आहेत. ह्यातली कोणतीही गोष्ट लक्षात न घेता जर तुम्ही तुमचं नेहमीचंच तुणतुणं वाजवत असाल, तर मग प्रकरणाकडे जरा खोलवर पाहा असं म्हणेन.

१. कोपर्डी प्रकरण बाहेर आल्यानंतर प्रज्ञा दया पवारांनी फेसबुकसह अनेक ठिकाणी ही जाहीर भूमिका घेतलेली आहे.

ए ए वाघमारे Fri, 14/10/2016 - 15:47

In reply to by चिंतातुर जंतू

इथे खरी गोम आहे.

सहमत!

इथे दुसरी गोम आहे:

हे सगळे विसरून आज मराठा क्रांती मोर्चा अॅट्रॉसिटीच्या विरोधात रस्त्यावर उतरून नेमके संघाचेच काम सुकर करतो आहे, हे सखेदपणे सांगावेसे वाटते

तुम्ही म्हणता तसं अशा प्रकरणांना स्थानिक अ‍ॅंगलही नेहमीच असतात.पण मुख्य प्रवाहातील माध्यमांमधून त्याची फारशी चर्चा (मुद्दामहून?‌) केली जात नाही. कारण ते सर्वांच्या सोयीचं असतं.मी स्वत: सातार्‍या जिल्ह्यातील अंतर्गत भागात वास्तव्यास असताना जातिभेदाची धग बरीचशी शिल्लक असल्याचा अनुभव घेतला आहे.

तुम्ही तुमचं नेहमीचंच तुणतुणं वाजवत असाल, तर मग प्रकरणाकडे जरा खोलवर पाहा असं म्हणेन.

तुम्ही विषय छेडलाच आहे तर,याच्याही पुढे जाऊन म्हणावसं वाटतं की, मराठा आंदोलनाच्या मागण्यांवर,त्याच्या फॉर्मवर, त्याच्या कुणा 'जाणत्या'ने केलेल्या डिझाईनवर नेमके प्रश्न उपस्थित करणारी चर्चा करताना माध्यमे,पत्रकार,विचारवंत कच खाताना दिसत आहेत. ही दहशत कोणाची? प्रज्ञा पवारांसारखं कुणी बोललं तरी 'लांडगा आला रे आला' प्रमाणे लोकांचं त्याकडे दुर्लक्ष होतं. त्यांचे काही मुद्दे बिनतोड असले तरी एकूणच पुरोगामी चळवळीच्या झालेल्या अवमूल्यनाने व बदनामीमुळे लोक त्याकडे सिरिअसली बघायला तयार नाहीत. प्रज्ञा पवारांनी अनेक गोष्टी एकाच पिशवीत कोंबायचा प्रयत्न केला आहे;तो तसा नसता केला तर भाषणाला मिळालेले प्रतिसाद कदाचित वेगळे असते.असो. या मूक मोर्चांबद्दल मुख्य माध्यमांमधून भव्य,विराट,शांततापूर्ण आणि हो..शिस्तबद्ध वगैरे कौतुके वाचल्यावर(यात मागे संघाच्या पुण्यातील अतिविशाल 'शिस्तबद्ध' कार्यक्रमाबाबत बोटे मोडणारी माध्यमेही आली)मी नंतर त्यांचं कव्हरेज वाचायचंही सोडून दिलं.

यानिमित्ताने दुसरीही एक बाब अधोरेखित करावयास हवी,आधुनिक महाराष्ट्रातील परिवर्तनवादी,शाहू-फुले-आंबेडकरवादी,पुरोगामी इत्यादी चळवळी यांचं उघड टार्गेट ब्राह्मण समाज राहिला आहे.म्हणजे दलित मनुवादाला म्हणजे ब्राह्मणांना दोषी ठरवणार; ओबीसी ब्राह्मणांना दोषी ठरवणार; डाव्या वळणाचे इतिहासकार, अभ्यासक,विचारवंत यांनीही ब्राह्मणांना दोषी ठरवलं तिकडे पुरुषोत्तम खेडेकर,मराठा महासंघ,इतर ब्रिगेडस यांनी उघड ब्राह्मणद्वेष्टी मोहीम चालवली. परंतु जमिनीवर जातीभेद कोणी राबवला हे उघड गुपित आहे.

आता मात्र हा फोकस शिफ्ट झाला आहे. आजवर सॉफ्ट टार्गेट असलेला ब्राह्मण वर्ग यात वरवर तरी दिसत नाही. तो संघटितपणे काहीही करू शकत नाही हे दोन्ही विरोधी वर्गांना (दलित आणि मराठे) पुरतं ठाऊक आहे. आता मराठा-दलित हा खरा संघर्ष सुरू झालेला आहे असं वाटतं.स्पृश्य-अस्पृश्य वाद, अ‍ॅट्रोसिटी कायदा हे मायनर एलिंमेंटस आहेत. अ‍ॅट्रोसिटी कायदे रद्द/बदलता येणार नाही हे मराठ्यांनांही पुरतं माहीत आहे.मग उरलं काय तर तो म्हणजे जातिवर्चस्वातून येणारा इगो आणि हातातली गेलेली सत्ता.

आताच मराठा मूक मोर्चांत मराठा-कुणबी वाद सुरू झाले आहेत.

दोन-तीन वर्षांपूर्वी मातंग समाजाने नागपूर अधिवेशनावर मोठा मोर्चा काढला होता.मागणी होती- SC आरक्षणाअंतर्गत एका ठराविक जातीची मक्तेदारी मोडून काढणे.

फडणवीसांना शरद पवार डॉक्ट्राईन नीट हाताळता येत नाहीये असं दिसतंय.

महाराष्ट्रातील आजवरच्या सगळ्या पुरोगामी, परिवर्तनवादी,जातिवादावरील चर्चांमध्ये एका वर्गाची चर्चा फारशी होताना दिसत नाही,तो म्हणजे वैश्य,व्यापारी वर्ग.यात मराठी व्यापारी, सोनार, वाणी, मारवाडी, सिंधी, गुजराती, शीख,जैन,बोहरा इत्यादी व्यवसायी वर्ग आला. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही कारण राजकीय पक्ष/सामाजिक संस्था चालवायला वर्गणी देणारा हाच वर्ग आहे अशी सर्वसाधारण समजूत आहे. आजवर चार्तुवर्णावरची ही चर्चा प्रामुख्याने ब्राह्मण, शूद्र आणि काही प्रमाणात क्षत्रिय या तीन वर्णापर्यंतच मर्यादित दिसते.त्यामुळेही तोच तोच पणा येतो.

असो. अजून अनेक मुद्दे आहेत,स्वतंत्र लिहिण्याचा प्रयत्न करेन.

नितिन थत्ते Fri, 14/10/2016 - 16:12

In reply to by ए ए वाघमारे

>>वैश्य,व्यापारी वर्ग.यात मराठी व्यापारी, सोनार, वाणी, मारवाडी, सिंधी, गुजराती, शीख,जैन,बोहरा इत्यादी व्यवसायी वर्ग आला.

भाजप (जनसंघ) हा भटजींप्रमाणेच शेटजींचा पक्ष आहे ना ??
८० च्या दशकापासून सुरू झालेला संघ परिवाराचा उत्कर्ष प्रामुख्याने मारवाडी, सिंधी, गुजराती, शीख,जैन यांच्यामार्फत झाला आहे असे दिसते.

बिटकॉइनजी बाळा Fri, 14/10/2016 - 17:24

In reply to by ए ए वाघमारे

खेडेकर, साळुंखे यांनी मांडलेल्या ब्राह्मणद्वेषाचा भोज्ज्या उडाला आहे. त्यांच्या मांडणीत ब्राह्मणद्वेष हाच मध्यवर्ती भाग होता. मराठा समाज कुणबी ठरवून त्याला ओबीसीमध्ये समाविष्ट करणे हे त्यांच्या अनेक पॉलिसिजपैकी एक. परंतु संभाजीराजे सारख्यांनी त्यातला ब्राह्मणदोष बाजूला व्यवस्थित ठेऊन आरक्षणाची मागणी प्रामुख्याने रेटली. तरीही मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण द्या अशी मागणी होत नाही. ती असते मराठा आरक्षण द्या अशी. (शब्दयोजना तरी अशीच आहे. टेक्नीकली कुणी खोलात जात नाही.) मराठ्यांना कुणबी म्हणवून घ्यायचे नाही, ओबीसी म्हणवून घ्यायचे नाही, पण आरक्षण हवे आहे. तेही सामाजिक आरक्षण. हे नोटेबल आहे. आरक्षण हव असलं तरी त्यांची एकंदरीत दलितांविषयीची मते ही कडवीच राहणार आहेत. सध्याच्या आरक्षणाने मराठ्यांवर प्रचंड अन्याय होतो अशीच त्यांची सर्वसाधारण भावना आहे. माझ्या सर्व मराठा मित्रांना आंबेडकरांविषयी राग आहे. रामदास आठवले सारख्यांची खिल्ली उडवण्यात त्यांचे मराठा इगो सुखावतात. आंबेडकर मिरवणुकांना शिव्या घालताना शिवाजी मिरवणूक ही तितकीच हिडीस आहे हे त्यांना दिसत नाही.
ही भंपकबाजी आहे.

गब्बर सिंग Fri, 14/10/2016 - 23:08

In reply to by ए ए वाघमारे

यानिमित्ताने दुसरीही एक बाब अधोरेखित करावयास हवी,आधुनिक महाराष्ट्रातील परिवर्तनवादी,शाहू-फुले-आंबेडकरवादी,पुरोगामी इत्यादी चळवळी यांचं उघड टार्गेट ब्राह्मण समाज राहिला आहे.म्हणजे दलित मनुवादाला म्हणजे ब्राह्मणांना दोषी ठरवणार; ओबीसी ब्राह्मणांना दोषी ठरवणार; डाव्या वळणाचे इतिहासकार, अभ्यासक,विचारवंत यांनीही ब्राह्मणांना दोषी ठरवलं तिकडे पुरुषोत्तम खेडेकर,मराठा महासंघ,इतर ब्रिगेडस यांनी उघड ब्राह्मणद्वेष्टी मोहीम चालवली. परंतु जमिनीवर जातीभेद कोणी राबवला हे उघड गुपित आहे.

पण मराठा मूकमोर्चा, मराठा आरक्षण ह्या सगळ्या नंतर असा आरोप कसाकाय झालेला नाही की ब्राह्मण हे मराठे व दलित यांच्यामधे भांडणं लावताहेत ? (बामनी कावा). कारण आरक्षण ५०% पेक्षा जास्त असू शकत नाही. म्हंजे एकतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशास सुपरसीड करण्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल किंवा कसे ? कारण ... आरक्षण हे "रायव्हलरस गुड" आहे.

ए ए वाघमारे Sat, 15/10/2016 - 09:39

In reply to by गब्बर सिंग

असा आरोप कसाकाय झालेला नाही की ब्राह्मण हे मराठे व दलित यांच्यामधे भांडणं लावताहेत ?

असा आरोप या लेखातच आहे.तुम्ही लेख पूर्ण वाचलेला दिसत नाहीये. अभ्यास वाढवा आणि हे वाचा (आम्ही पकडलेली दुसरी गोम)-

हे सगळे विसरून आज मराठा क्रांती मोर्चा अॅट्रॉसिटीच्या विरोधात रस्त्यावर उतरून नेमके संघाचेच काम सुकर करतो आहे, हे सखेदपणे सांगावेसे वाटते. मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध या सांस्कृतिक शत्रूंना मिटवण्याचे कार्य संघ परिवाराचे आहे. आणि आपल्या सत्ताविहीनतेने उद्विग्न झालेले मराठा नेतृत्त्व हे प्रत्यक्षाअप्रत्यक्षपणे त्या इशाऱ्याबरहुकूम काम करते आहे

संघ ही ब्राह्मणांची मनुवादी संघटना आहे हे पुरोगामी AXIOM तर तुम्हाला माहिती असेलच. त्यामुळे संघावर आरोप म्हणजे ब्राह्मणांवरच आरोप असतो हे वेगळे सांगायची गरज आहे काय?

जाता जाता हे नोंद करायचं माझ्याकडून सुटलं होतं-

कारण मुस्लिमांचे शिरकाण ही एकमेव ऐतिहासिक कामगिरी पार पाडून मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले होते

इतका तिरस्कार? संवाद, समन्वय, चर्चा अशी भाषा अशा 'लेखकां'च्या तोंडी शोभत नाही. हे जर खरं असेल (जे बव्हंशी खरं आहे हेमावैम) तर मुस्लिमांचे शिरकाण ही त्यांची कामगिरी त्यांना निवडून देणार्‍या लोकांना ऐतिहासिक का वाटावी,याबद्दल आत्मपरीक्षण कोण करेल? कारण तसाही संघाला काही जनाधार नव्हता व नाही आणि नेहरू-गांधी यांच्या अहिंसक, समाजवादी,सेक्यूलर विचारावर पोसल्या गेलेल्या भारतीय समाजमनाने इतक्या क्रूरकर्म्याला सत्तेवर का आणावं?

तिरशिंगराव Fri, 14/10/2016 - 18:54

सांस्कृतिक दहशतवाद या देशांत वाढीला लागला आहे, हे खरेच आहे. पण तो फक्त गेल्या दोन वर्षांपासूनच वाढीला लागला आहे, हे पटले नाही.
बाबरी मशीद पाडली त्यावेळेसही तो टोकाला पोचला होता. मुंबईच्या दंगलीही त्याला अपवाद नाहीत.
भाषणातली काही गृहीतके अतिरेकी आहेत.. मोदी फक्त संहाराच्या जोरावर सत्तेत आले हे अतिरेकी विधान आहे. भारतीय मतदार आता भोळा राहिलेला नाही. जर अपेक्षित बदल दिसून आले नाहीत तर तो भल्या भल्यांना सत्तेवरुन फेकून देतो. मोदींनी जर काही भरीव काम केले नाही तर त्यांची गच्छंतीही अटळच आहे.
अ‍ॅट्रोसिटी कायदा, बलात्कारविरोधी सुधारित कायदा, अशा अनेक कायद्यांनी प्रश्न सुटत नाहीत. त्याचा गैरवापर करणारेही आपल्या समाजात भरपूर आहेत. आपल्या देशांत संपूर्ण समाजाचेच अधःपतन होत आहे. ते केवळ काही ठराविक लोकांमुळेच होत आहे आणि ते सत्तेवरुन गेली की लगेच समतेचे राज्य येणार आहे, हा समजही 'अच्छे दिन' सारखाच भ्रामक आहे.
एकूणच भाषण वाचल्यावर, तेही संघीयांप्रमाणे ठराविक चष्मे घालूनच केल्यासारखे वाटले.

अंतराआनंद Fri, 14/10/2016 - 22:01

कमाल आहे. अतिशय स्पष्ट भाषण आहे. पण "गेल्या दोनेक वर्षात" या दोन शब्दांमुळे लोकांनी डोळ्यावर असा काही चष्मा चढवला की त्यांना पुढील भाषणात काही सूत्र, मुद्दा आहे की नाही हे ही दिसले नाही. मान्य करूया की हा दहशतवाद वर्षानुवर्षे चालला होता; पण तेव्हा भाजपाने प्रमुख आणि शहाणा विरोधी पक्ष या नात्याने कोणती भूमिका घेतली? उलट काही घटनेत तर ह्या सांस्कृतिक दहशतवादाच्या पायर्^या रचण्यात त्यांनीच पुढाकार घेतला. आणि सत्तेवर आल्यावर पूर्वसूरींच्या पावलांवर पाऊल टाकून चालू अशी शपथ घेऊन का ते सत्तेवर आले? मग प्रत्येकवेळी मोदींची पाठराखण करणारे आधीच्या काळाचा हवाला का देतात? आधीचे नालायक होते म्हणून तुम्हाला निवडले तर तुम्ही प्रत्येक वेळी "ते नव्हते का नालायकपणा करत तर आम्ही केला तर काय झालं?" असं म्हणणार?
आधीचे पंप्र मौनी होते पण हे आहेत ना बोलके मग महत्वाच्या किंबहुना एखाद्या समाजघटकाला भिती वाटेल अश्या घट्ना घडल्यावर त्यांनी कधीही थेट "कायद्याचे राज्य आहे" एवढी तरी भूमिका घ्यायला हवी ती कधीही वेळेवर आणि ठामपणे घेतलेली नाही. तरिही इकडे बर्^याच जणांना हे भाषण खटकलेलं दिसतय हे बघून पानतावणेंच्या ओळी आठवल्या
बुध्दीवान लोक,
ज्यांना अंधारच माहित नाही
ते एखाद्या कवडी किमतीच्या वेश्येप्रमाणे,
जळणार्^या माणसांकडे बघ्यासारखे बघत रहातात.

पूर्वी हिंदू आणि मुसलमान या दोनच घटकांची एकमेकांवर कुरघोडी चालतेय असे दृश्य वरवर तरी दिसत होते. ब्राम्हण-मराठा, मराठा-ओबीसी, दलित-मराठा असे अनेक पातळीवर चाललेली युद्धे या दोन वर्षातलीच आहेत हे खोटे आहे का? मान्य आहे की हे बरीच वर्षे आत कुठेतरी होते ते वरील स्तरावर आले, पण असे का व्हावे,आणि या दोनच वर्षात? आणि मग इतकी वर्षे वेगवेगळ्या संस्थांद्वारे समाजाची सांस्कृतिक मशागत करणार्^या रास्व संघाला हे कळले कसे नाही आणि कसे होऊ दिले त्यांनी असे? हिंदू -मुस्लिम जाऊदे हो हिंदू समाजातच हे वेगवेगळे घटक एकमेकांच्या उरावर बसलेत हे हिंदू राष्ट्राची स्वप्ने बघणार्६या संघाचे अपयश नाही का?

बॅटमॅन Fri, 14/10/2016 - 23:13

In reply to by अंतराआनंद

र्वी हिंदू आणि मुसलमान या दोनच घटकांची एकमेकांवर कुरघोडी चालतेय असे दृश्य वरवर तरी दिसत होते. ब्राम्हण-मराठा, मराठा-ओबीसी, दलित-मराठा असे अनेक पातळीवर चाललेली युद्धे या दोन वर्षातलीच आहेत हे खोटे आहे का?

२००४ सालच्या भांडारकर एपिसोडमध्ये हिंदू-मुसलमान इश्श्यू होता हे नवीनच ज्ञान झाले.

गब्बर सिंग Fri, 14/10/2016 - 23:45

In reply to by अंतराआनंद

आणि मग इतकी वर्षे वेगवेगळ्या संस्थांद्वारे समाजाची सांस्कृतिक मशागत करणार्^या रास्व संघाला हे कळले कसे नाही आणि कसे होऊ दिले त्यांनी असे? हिंदू -मुस्लिम जाऊदे हो हिंदू समाजातच हे वेगवेगळे घटक एकमेकांच्या उरावर बसलेत हे हिंदू राष्ट्राची स्वप्ने बघणार्६या संघाचे अपयश नाही का

तांबड्या मजकूराशी संलग्न chain-of-reasoning विस्कटून सांगाल का !

जर याच्या नेमकी उलट परिस्थिती असती - म्हंजे - आजच्या घडीला हिंदू समाजातले वेगवेगळे घटक एकमेकांच्या उरावर बसलेले नसते व सामोपचाराने राहत असते तर ते संघाचे यश झाले असते का ?

अंतराआनंद Sat, 15/10/2016 - 11:01

सांस्कृतिक दहशतवाद नक्कीच दोन वर्षातला नाही. वर्षानुवर्षाचा आहे. पण आतापर्यंत तो करणारे सत्तेबाहेर असल्याने त्यांचे उपद्रवमुल्य हा चिंतेचा विषय नव्हता तो आता झाला. अनेकांना असुरक्षित वाटते आहे. हे वाटणे वरच्या भाषणात व्यक्त होतेय.

हिंदूंच्या हितरक्षणाचा ठेका संघवादी सतत घेताना दिसत आलेले आहेत. हिंदू हा एकजिनसी धर्म नाही. त्यात वेगवेगळेच नव्हे तर परस्परविरोधी मते, चालीरिती आहेत. हिंदू झेंड्याखाली सर्वांना एकत्र करायचे तर आपला रंगही या झेंड्यात आहे असे इतर समाजघटकांना वाटले पाहिजे. तसे त्यांना वाटावे अशी संघाची वर्तणुक नाही. ज्या वाईट भाषेत "मुसंड्या"ना शिव्या दिल्या जातात त्या भाषेत थेट त्या महार-चांभारांना दिल्या जात नाहीत एवढेच. पण संघ ब्राम्हणीच ठसा मिरवतो आणि तोच शिक्का हिंदूत्वाचा अधिकृत शिक्का म्हणून वापरतो. सर्वांना एकत्र आणायचे तर वरच्या समजल्या जाणार्^या जातींनी आपल्या जातींचा अधिकृतपणे त्याग करणे आवश्यक होते पण 'एकत्र हिंदू समाज' ही खरी कळकळ असती तर तसे झालेही असते पण हिंदूंच्या नावाखाली ब्राम्हणत्व राबवणे हा एकमेव कार्यक्रम असतो. मुळात लाठ्या घेऊन आपल्याला कोणातरी विरूद्ध लढायचे आहे हे बिंबवत राहयचे. मुळात एकमेकामधील उच्चनीच संकल्पनाच तुम्चे खरे शत्रु आहेत आणि त्याविरुद्ध लढायचे असेल तर शूरपणाऐवजी समजुतदारपणा हवी, संवेदना हव्या. आम्ही "नीच" नाही म्हणत वर जाऊ बघणार्^यांना "आम्हीही खाली उतरतो" असं म्हटलं गेलं असतं तर खरा समरस हिंदू समाज दिसला असता.

अजूनही समाजात ब्राम्हण सर्वश्रेष्ठ असं मानलं जातंच. मग आपल्या सोईनुसार कोणी काहिही म्हणो. ही समजूत निपटण्यासाठी संघाने काय केलं? जमिनीवर अन्याय करणारा समाज ब्राम्हण नसेलही पण असे अन्याय थांबवण्यासाठी धर्माच्या पायावर योग्य कार्यक्र्म देणे (स्वतःला हिंदूहितवादी समजणार्^या) संघाने कधीतरी केले आहे काय? समाजाच्या उच्चनीचतेच्या कल्पना काढून टाकण्यासाठी ब्राम्हणांनी धार्मिक/ सामाजिक बाबतीत उच्चपदावरून खाली उतरणे हा साधा कार्यक्रम संघाने दिला असता तर मानण्यासारखे होते. पण तसे झालेले नाही. एवढ्या वर्षात एका हिंदू स्माजघटकाने दुसर्६या समाजघटकावर केलेल्या अन्यायाबद्द्ल संघ कधीही बोललेला नाही. कारण ते आहेत हे मान्य करण म्हण्जे ते सोडवण्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल.

सत्ताकेंद्र आपल्या जवळ आल्यबरोबर "गोहत्या" हा एकाएकी अत्यंत महत्वाचा विषय होऊन गेला. हिंदू धर्मातलाच एक घटक गाय खातो हे सत्य सोयीस्करपणे विसरले गेले. विरोधी आवाजांनाही फारशी किंमत दिली गेली नाही.
शाकाहार हा असाच एक मुद्दा.

संघाचे अनेक चेहरे आहेत. सांस्कृतिक,सामाजिक पातळ्यांवर काम करणारे. हिंदू राष्ट्र बनताना या समाजातील वेगवेगळ्या संस्कृतींचा झगडा अटळ आहे हे जाणवली नाही का? पण एकचालकानुवर्ती संघाला त्याकडे बघायचेच कुठे आहे?

मनात आलं तसं भराभर लिहीत गेलेले आहे. कदाचित तुम्हाला मला काय म्हणायचं ते स्प्ष्ट झालं असेल. अजून काही लिहायचं आहे. वेळ मिळाला की नक्की.