सायलेन्स एव जयते - एस्. आनंद (सौजन्य - आऊटलुक)
आमिर खानच्या 'सत्यमेव जयते' कार्यक्रमाच्या नुकत्याच झालेल्या एका भागात जातपातीबद्दल मांडणी होती. कार्यक्रमाचं प्रत्यक्ष चित्रीकरण झालं तेव्हा व्यक्त झालेले काही विचार प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचायच्या आत त्यांना पद्धतशीरपणे कशी कात्री लावली गेली याविषयी एस्. आनंद यांनी लिहिलेला एक लेख 'आऊटलुक'मध्ये प्रकाशित झाला आहे. पडद्यावर दिसलेल्या कार्यक्रमात आंबेडकर आणि आरक्षण या दोन गोष्टींना पद्धतशीरपणे बगल देण्यात आली, पण मुद्रित झालेल्या भागात तसं नव्हतं, असं त्यांचं म्हणणं आहे. या मुद्द्यांमुळे आपला मध्यमवर्गीय प्रेक्षक आपल्यापासून दूर जाईल अशी भीती आमिर खानला वाटली असावी असं विधान आनंद करतात. 'अॅट्रॉसिटी' कायद्याविषयीदेखील एक अक्षर उच्चारलं गेलं नाही; काही ठिकाणी दाखवल्या गेलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया खोट्या आहेत कारण ते लोक त्या प्रसंगी स्टुडिओमध्ये उपस्थितच नव्हते, असे अनेक दाखले देत आनंद यांनी कार्यक्रमावर टीका केली आहे. आमिर खाननं या भागाविषयी 'हिंदू'मध्ये लिहिलेल्या लेखाचेही दाखले आनंद देतात आणि गांधीजींपुढे आंबेडकरांच्या अस्पृश्यतेविरोधातल्या लढ्याकडे आमिरनं दुर्लक्ष केल्याचं दाखवतात.
हा लेख (दुव्यातला, आनंद
हा लेख (दुव्यातला, आनंद यांचा) विषेश महत्त्वाचा वाटला नाही. मुळात कोण्ताही टी.व्ही वर होणारा शो हा जसाच्या तसा नसणारच...कार्यक्रम करणार्यांना दंगल घडवून आणायची नसून प्रत्येक व्यक्तिला विचार करण्यास प्रवृत्त करायचं आहे असं मला वाटतं.आणि तुम्ही जे विचार मनात साठवून आहात ते त्यांनी व्यक्त करावेत ही अपेक्षा का? जे कार्यक्रमात दाखवलं ते भले संकलित असावं (कधी नसतं?)...पण ते कमी महत्त्वाचं नव्हत.
स्पृश्य-असपृश्य या समाजातल्या दरी बद्द्ल सांगताना या कार्यक्रमातून प्रत्येकाला आपाल्याल्या मनात डोकावून आपण हे भेदभाव तर मानत नाही आहोत ना हे विचारण्यास आमिर खानने प्रवृत्त केलं.
उगाच काहीतरी उपटून वाद निर्माण करायचे..असा कहीसा हा लेख (दुव्यातला, आनंद यांचा) वाटला.
क्षणभर श्री. आनंद मराठी भाषिक
क्षणभर श्री. आनंद मराठी भाषिक नाहीत (नावावरून अंदाज) याचा आनंद झाला. असते तर कदाचित पुन्हा एकदा "मराठी माणसाला (डॉ. आंबेडकर) आणि मराठी माणसावरचा अन्याय (खैरलांजी) भले तो मराठी माणसांनीच केलेला का असेना न दाखवून भाषेलाच डावलले" वगैरे आरडाओरडा लेखात दिसला असता.
मी सत्यमेव जयते पाहिलेलं नाही, त्यामुळे आनंद यांनी जे काही लिहीलं आहे त्यावर विश्वास ठेवूनः
डॉ. आंबेडकरांचा क्वचित उल्लेख, आरक्षण आणि खैरलांजीबद्दल चकार शब्द न काढणे या गोष्टी मलाही खटकल्या.
फालतू टीव्ही कार्यक्रमांच्या चकमकाटात कदाचित सत्यमेव जयतेची लंगडी गाय शहाणी ठरत असावी. त्यामुळे आनंद यांनी काढलेले मुद्दे, केलेली बरीचशी टीका योग्य आहे असं वाटतं. प्रत्यक्षात स्टुडीओत उपस्थित नसणार्या लोकांच्या मुलाखती दाखवण्यात काही गैर आहे असं वाटत नाही, पण ते लोकं तिथे नाहीत असं दाखवायला काही हरकत नसावी. झाकलं जाईल इतपतच खोटं बोलावं, अगदी उघडं पडेल असं करू नये.
आनंद यांनी सत्यमेव जयतेचा ठराविक भागच का पाहिला याबाबत असंही उत्तर देता येईल, त्यांना ज्या समस्येविषयी अधिक ममत्व आहे त्यासंदर्भात असणारा भाग त्यांनी पाहिला. इतरांनीही चुका केल्या आहेत किंवा इतर भागांमधेही असाच ढोबळपणा आहे त्यांना का सोडलं अशा प्रकारची टीका मला 'उगाच', टीकेसाठी केलेली टीका वाटते. त्यातून दाखवलेले दोष कमी होत नाहीत का झाकले जात नाहीत.
आनंद यांनी केलेल्या टीकेला आमीर खान उत्तर देईल अशी आशा नाहीच. 'सत्यमेव जयते'कडे फार आशेने डोळे लावून बसलेल्या चार मध्यमवर्गीयांना परिस्थितीची थोडी जाणीव झाली तरी लेखाचा उद्देश सफल होईल.
एक तर तद्दन व्यावसायिक
एक तर तद्दन व्यावसायिक गोष्टींची दखल घ्यायला जायचं, त्यांच्याकडून भलती अपेक्षा करायची आणि अपेक्षाभंग झाला की अशी टीका करायची हा आजकालचा ट्रेंड आहे काय?
मला आधी हिंदी चित्रपट निर्मात्यांचा, टीव्ही मालिकावाल्यांचा फार राग यायचा. प्रेक्षकांना हे इतके बावळट का समजतात असं वाटायचं. पण नंतर लक्षात आलं की खरंच लोकांना तेच पाहिजे असतं. सत्यमेव जयते पाहून भावूक वगैरे होणे ही आजच्या मध्यमवर्गीयांची गरज आहे, आपल्या जाणिवा मेलेल्या नाहीत असं स्वतःलाच सिद्ध करण्यासाठी. लोकांना जे पाहिजे ते देणे हेच मनोरंजन माध्यमांचे ध्येय असते हे सत्य आहे आणि त्याच सत्याचा नेहमी विजय होतो. त्यात नवीन काय?
या एपिसोडमध्ये खैरलांजी, मंडल-आरक्षण, आंबेडकर, अॅट्रोसिटी कायदा या सगळ्याचा उल्लेख आला असता तरी काय फरक पडला असता? लोक काय कार्यक्रम पाहून लगेच क्रांती करायला बाहेर पडतात काय? कार्यक्रम संपला की लगेच चॅनल बदलून कार्टून नेटवर्क लागत असेल बर्याच घरांमध्ये.
आरक्षणाचा अनुल्लेख
>>या एपिसोडमध्ये खैरलांजी, मंडल-आरक्षण, आंबेडकर, अॅट्रोसिटी कायदा या सगळ्याचा उल्लेख आला असता तरी काय फरक पडला असता?
फरक किती पडेल वगैरे ठाऊक नाही, पण कार्यक्रमाची सुरुवातच संस्कृतमध्ये पीएच.डी. केलेल्या ज्या बाईंपासून केली होती त्या बाई आरक्षणामुळे तिथवर पोहोचल्या आहेत हे उघड होतं. आरक्षणाशी संबंधित असे इतर अनेक मुद्दे उघड दिसत असताना आरक्षणाचा अनुल्लेख करणं म्हणजे खोलीतल्या हत्तीकडे दुर्लक्ष केल्यासारखं होतं. तुमच्या दृष्टिकोनानुसार मग ते विनोदी किंवा केविलवाणं किंवा संतापजनक दिसू लागतं.
"..पण कार्यक्रमाची सुरुवातच
"..पण कार्यक्रमाची सुरुवातच संस्कृतमध्ये पीएच.डी. केलेल्या ज्या बाईंपासून केली होती त्या बाई आरक्षणामुळे तिथवर पोहोचल्या आहेत हे उघड होतं."
हे तुमच विधान अजिबातच पटलं नाही..सरळ तुम्ही त्या बाईंचा अनादरपूर्वक उल्लेख करताय अस वाटतय. निदान मला तरी अस काही 'उघड' वगैरे जाणवलं नाही.
???
>>हे तुमच विधान अजिबातच पटलं नाही..सरळ तुम्ही त्या बाईंचा अनादरपूर्वक उल्लेख करताय अस वाटतय. निदान मला तरी अस काही 'उघड' वगैरे जाणवलं नाही.
??? पिढ्यानपिढ्या शिक्षण नाकारण्यात आलेल्या समाजातल्या एखाद्या मनुष्याला आरक्षणधोरणामुळे उच्चशिक्षण घेता आलं असं म्हणण्यात अनादर काय आहे? ही तर चांगली गोष्ट आहे. आपण कोणत्या समाजातून आलो आहोत याचा उल्लेख त्या बाईंनी स्वतःहून केला होता. अशा परिस्थितीतून येऊन दिल्ली युनिव्हर्सिटीत प्राध्यापक इथपर्यंतचा त्यांचा प्रवास कार्यक्रमात वर्णन केला गेला. आरक्षणामुळे त्यांना मदत झाली असली तर त्यात काहीतरी वाईट आहे असं तुमचं म्हणणं आहे का?
तुमच्या म्हणण्याचा रोख आधी
तुमच्या म्हणण्याचा रोख आधी स्पष्ट झाला नव्हता. तरी एक म्हणावसं वाटतय - शिक्षणात आरक्षण हे प्रवेश मिळण्यासाठी मदत करतं, पण पदवी ही सगळ्यांना समान निकषांवर दिली जाते. त्यामुळे आरक्षणाचा पुनरुच्चार, मला त्यांच्या जागी स्वतःला ठेवून विचार करता, करायला आवडला नसता. अर्थात नोकरी मिळण्यात परत आरक्षणाचा मुद्दा येतो, पण परत ..तेच वाटत.
आणि आरक्षण जेव्हा नव्ह्तं तेव्हाही या जातींमधले लोक (नगण्य प्रमाणात का होईना) शिकत होतेच...त्यामुळे आरक्षणाचा उल्लेख आला नाही तरी काही फरक पडला अस वाटत नाही. आरक्षणाशिवाय त्या जिथे आहेत तेथे पोहोचू शकल्याच नसत्या असं तर आपण म्हणू शकत नाही ना?
रोचक लेख
रोचक लेख आहे.
सत्यमेव जयते 'सिलेक्टिव्ह ट्रुथ' दाखवतो हे तर दुसर्या भागापासूनच स्पष्ट होतं. त्यामुळे खरं तर हे निरिक्षण इतक्या उशीरा, याच भागात लेखकाला हे कसे जाणवले? असे वाटले. पण मग लेखकच पहिल्या परिच्छेदात स्पष्ट करतो की मित्राने सांगितला म्हणून त्यांनी हा एपिसोड पाहिला (अन्यथा ते पाहत नाहित असे मानायला जागा आहे)
त्याच बरोबर या कार्यक्रमात ज्यावर खरोखरीच चर्चा करण्याची व त्यातून उपाय शोधायची गरज आहे असेच विषय निवडले जाताहेत आणि घाऊक वक्तव्ये कमी असावीत असे मी माहिलेल्या २-३ एपिसोड्स वरून वाटले. शेवटी एक व्यावसायिक कार्यक्रम म्हणून 'किती दाखवावे' एक मर्यादा असणेही अपेक्षित होते - आणि तसे होताना दिसतही आहे. त्याच बरोबर जो आव आणला जातो तितक्या दर्जाचा हा कार्यक्रम नाही हे मात्र पटते. (मात्र हे आपण उच्चभ्रु आहोत असे भासवायचा प्रयत्न करणार्यांसोबत होत असावे ;) )
बाकी आंबेडकरांवरचा अन्याय वगैरेवर नो कमेंट्स